Latest Post

ईशपरायणता रोजामुळे मनुष्यात निर्माण होते हे कळल्यानंतर इतर महत्त्वाचे काही विचार करण्यासाठी उरत नाहीत, कारण जो ईशपरायणता धारण करतो तो अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घालून दिलेल्या मर्यादांचे तंतोतंत पालन करीत राहतो. यामध्ये संपूर्ण धर्माचरण समाविष्ट आहे. तरी आणखी काही फायदे रोजामुळे होतात त्यांना आपण येथे पाहू या, जेणेकरून आपणास रोजाचे अनन्यसाधारण महत्त्व कळून येईल.

१) रोजामुळे अल्लाहचे प्रभुत्व आणि सार्वभौमत्वाच्या विश्वासाला आणखी बळकटी मिळते. पहाटे सहेरी केली जाते, परंतु जेव्हा उषःकाल होतो त्याचक्षणी खाणेपिणे आणि जीवनातील इतर सुखांचा उपभोग घेण्यापासून मनुष्य दूर राहतो. संपूर्ण दिवसभर त्याला ईशपरायणता यापासून रोखून धरते. सूर्यास्तानंतर लगेचच रोजा सोडल्यानंतर त्याला खाण्यापिण्याला आणि जीवनांनद उपभोगता येतो. हा आदेश आणि आज्ञापालनाची व्यवस्था इतर कोणत्याच धर्मात तुम्हाला सापडणार नाही. हे पाहणाऱ्याला अल्लाहचे स्वामीत्व आणि प्रभुत्वाची जाणीव करून देते.

२) रोजा समाजात सहानुभूतीचे वातावरण निर्माण करतो. सहजीवनाच्या इस्लामी समाजनिर्मितीला प्रोत्साहन देतो. श्रीमतांना गरीबीचे चटके कळून येतात. महिनाभर त्यांना ही आठवण येत राहते. भूक आणि तहान काय असते हे त्यांना कळते. यातूनच गरीबांबद्दलची सहानुभूती त्यांच्या मनात निर्माण होते आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मानसिकता तयार होते. याच कारणावरून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रमझान महिन्यास ‘‘सहानुभूतीचा महिना’’ म्हणून संबोधले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) रमजान महिन्यात त्यांच्याकडील सर्व गुलामांना सोडून देत असत आणि प्रत्येक भिक्षुकाला भिक्षा देत असत.

‘‘रमजान महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) प्रत्येक गुलामास मुक्त करीत असत आणि प्रत्येक मागणाऱ्यास दान देत असत.’’ (मिश्कात)

इब्ने अब्बास यांच्यानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) सर्वांपेक्षा दयाळू जरी होते तरी ते रमजानमध्ये अतिशय दयाळू होत असत.

‘‘अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) हे सर्व मानवांपेक्षा दानशूर आणि दयाळू होते. आणि विशेषतः रमजानमध्ये ते अतिशय दानशूर बनत असत.’’ (बुखारी)

३) रोजा एकतेची भावना समाजात वाढीला लावते. रमजान महिन्यात समाजातील श्रीमंत आणि गरीब, राजा आणि रंक, सर्वसामान्य आणि सामान्येतर सर्व एकसारखे असतात. प्रत्येकजण एकसारखीच आज्ञाधारकता बाळगून असतो, त्या सर्वांचे चेहरे जगाला दाखवून देतात की आम्ही एकाच स्वामीचे दास आहोत. आम्हा सर्वांचा मालक- शासक एकच आहे. त्यांची ही मानसिकता समाजातील सर्व लोकांना एका स्तरावर एकत्र करते आणि समाजात एकीला बळ देते.

४) रोजादार व्यक्तीस रोजा अल्लाहच्या मार्गात काबाडकष्ट झेलण्यास तयार करतो. यासाठी मनुष्याला तहान, भूक आणि इतर गैरसोयीच्या कठीणतेची जाणीव होते. या सर्व हालअपेष्टा आणि कष्ट तो अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच फक्त सहन करतो. अशी व्यक्ती अल्लाहच्या प्रसन्नतेखातरच आपली संपत्ती खर्च करते आणि वेळ पडल्यास आपला जीवसुध्दा त्यागून देते. हे फक्त तीच व्यक्ती करू शकते जी संयमी आहे, ईशपरायण आहे, रोजा हे त्यासाठी अत्युत्तम प्रशिक्षण आहे. हालआपेष्टांना सामोरे जाण्यासाठी तयारी याच महिन्यात माणूस करून घेतो. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या महिन्यााला ‘संयमाचा महिना’ म्हणून संबोधले आहे आणि रोजा त्याचा निम्मा संयम आहे असे म्हटले आहे.

५) रोजाच्या मान्य व्यवस्थेमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते. यामुळे मनुष्यांना सतत स्मरण करून दिले जाते की तुम्ही एकेश्वरवादी चळवळीचे ध्वजवाहक आहात. प्रत्येकजण रमजान महिन्यातच रोजा पाळतो, कारण तसा ईशआदेश आहे. प्रत्येकजण प्रातःकाळापूर्वी सहेरी करतो आणि दिवसाचे १२ ते १४ तास काही न खाता-पिता आणि वासनेपासून दूर राहून सूर्यास्तानंतर लगेचच उपवास सोडतो. रोजाची ही वैश्विक व्यवस्था आहे. एकाच कालावधीत जगभर रोजा पालन केले जाते. जगभरातील मुस्लिम एकाच कारणासाठी, एकाच वेळी, एकाच ध्येयासाठी एकसारखा असा शिस्तबध्द रोजापालन महिनाभर करत राहतात. जगात कोण्याही दुसऱ्या धर्मात ही वैश्विक व्यवस्था आपणास सापडणार नाही.

काही अटी: इतर सर्व उपासनापद्धतींप्रमाणे रोजाचे फायदे मिळविण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.

१) रोजाच्या पूर्ण औपचारिकतेचे पालन होणे आवश्यक आहे. हेतुचे गांभीर्य, अल्लाहचे भय आणि दृढ विश्वास की अल्लाह आणि फक्त अल्लाहच पूजनीय आहे आणि मनुष्य काहीच नाही, परंतु त्याचा दास आहे. तसेच अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याची ओढ आणि पारलौकिक जीवनातील यशप्राप्तीसाठी सतत कार्यरत राहणे या रोजासाठीच्या पूर्वअटी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कथनानुसार, रोजापालन पूर्ण श्रध्देने आणि आत्मपरीक्षणपूर्वक होणे आवश्यक आहे. वरील अटींशिवाय रोजा निव्वळ उपाशी राहण्यासारखे आहे. या अटींशिवाय जो कोणी रोजापालन करीत असेल आणि तो समजत असेल की माझे कर्तव्य मी बजावत आहे आणि इस्लामच्या आधारस्तंभाला उभारण्याचे काम मी करीत आहे तर ही त्याची घोडचूक आहे. त्याचे असे रोजापालन निरर्थक आहे.

२) फक्त अनिवार्य रोजापालन करून भागले असे समजू नये, तर ऐच्छिक रोजापालनसुध्दा माणसाने करीत राहावे. या ऐच्छिक रोजापालनमुळे त्याला रोजाचे उद्देश सतत स्मरणात राहतील. असे करण्याने ती व्यक्ती स्वयंनियंत्रणासाठीचे प्रशिक्षणसुध्दा वारंवार घेत राहते. ऐच्छिक रोजापालनसाठी तपशीलवार माहिती प्रेषित कथनांत आलेली आहे. त्यातून कोणते रोजे (उपवास) पाळावेत हे प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार ठरवावे, कारण ते ऐच्छिक आहेत.

इस्लामने आपल्या आरंभीच्या काळात त्या वेळची विशिष्ट परिस्थिती नजरेसमोर ठेवून जकात वसूल करण्याची रोखीच्या अगर इतर स्वरुपात कायदेशीर पद्धत ठरविली होती. परंतु याचा असा अर्थ होऊ शकत नाही की जकात वाटपाची एवढी एकच पद्धत होती की गरजुंनी स्वतःच जाऊन जकात गोळा करीत फिरावे व दुसरी कसलीही पद्धत अवलंबली जाऊच शकत नाही. इस्लामी कायद्यात अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, ज्यामुळे असा निष्कर्ष काढणे शक्य व्हावे. इस्लाम जकातच्या रकमेतून शाळा, इस्पितळे वगैरे जनकल्याणाच्या संस्था स्थापन करण्यास रोखत नाही. तसेच अशा रकमेतून सहकारी संस्था व कारखाने निर्मांण करण्यातही अडचण असू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जकातची रक्कम सामाजिक कल्याणाच्या सर्व हितकर कामाकरिता खर्च केली जाऊ शकते. जकातच्या मालातून रोख रकमेचे सहाय्य फक्त वृद्धांना, बालकांना व रुग्णांना दिले जाते आणि इतरांना निर्वाहाची साधने उपलब्ध करण्यासाठी अगर त्यांना हितावह असणाऱ्या योजनाच्या पूर्ततेसाठी असे सहाय्य दिले जाऊ शकते, कारण इस्लामी समाज एक असा समाज आहे ज्यामध्ये निव्वळ जकातीच्या सहाय्यावर सतत निर्वाह करणारा दरिद्री वर्ग आढळून येत नाही.

जकात देणे अनिवार्य का ठरविले आहे याबद्दल आता आपण चर्चा करू या. तसेच जकातमुळे कोणता हेतु साध्य होतो हेसुध्दा पाहू या. कुरआन अध्ययन आणि हदीसचा परामर्श घेतल्यानंतर कळून येते की जकातचे तीन हेतू आहेत. पहिला मौलिक आणि विशिष्ट प्रकारचा आहे तर दुसरे दोन दुय्यम आणि सामुदायिक महत्त्वाचे आहेत.

मनाचे पावित्र्य: जकातचा मौलिक हेतु मनाचे शुध्दीकरण करणे होय. यामुळे संपत्तीची लालसा जाऊन त्या जागी मनात ईशपरायणता निर्माण होते आणि मनुष्य सदाचारी बनतो. कुरआनोक्ती आहे,

‘‘निःसंदेह मार्ग दाखविणे आमच्यावर आहे आणि खरे पाहता परलोक आणि इहलोक, दोन्हीचे स्वामी आम्हीच आहोत. तर मी तुम्हाला खबरदार केले आहे भडकत्या अग्नीपासून. त्यात होरपळणारे नाही परंतु तो अत्यंत दुर्देवी ज्याने खोटे ठरविले आणि तोंड फिरविले, आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापभीरू, जो निर्मळ होण्यासाठी आपले धन देतो, त्याच्यावर कुणाचेही काही उपकार नाहीत. ज्याचा बदला त्याने द्यायला हवा, तो तर केवळ आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या प्रसन्नता प्राप्तीसाठी हे कार्य करतो. आणि जरूर तो (त्यावर) प्रसन्न होईल.’’ (कुरआन ९२: १२-२१)

दुसऱ्या ठिकाणी कुरआन स्पष्टोक्ती आहे,

‘‘है पैगम्बर (स), तुम्ही याच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुध्द करा आणि (सदवर्तनाच्या मार्गात) यांना पुढे करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुवा यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.’’ (कुरआन ९: १०३-१०४)

वरील कुरआन संकेत वचनाने जकातचे महत्त्व अगदी स्पष्ट होते. जकात देण्याने मन निर्मळ होऊन आत्मशुध्दी होते. हे सर्वश्रुत आहे की या जगातील वस्तूवरील प्रेम (भौतिक प्रेम) हाच खरा शत्रु आहे नमाज आणि जकात यांचा! हे मनुष्याला अल्लाह आणि परलोकपासून दूर अतिदूर ठेवते. प्रेषित (स) एकदा म्हणाले होते,

‘‘प्रत्येक पापी कृत्याच मूळ हे भौतिक प्रेमात आहे.’’ (मिश्कात)

हे ऐहिक प्रेमात अनेकानेक गोष्टी येतात परंतु सर्वांत शक्तिशाली आणि धोकादायक साधनसंपत्तीबद्दलचे प्रेम आहे. म्हणून प्रेषित (स) यांनी साधनसंपत्तीच्या प्रेमाला मुस्लिमांचा सर्वांत धोकादायक शत्रू ठरविले आहे.

‘‘माझ्या अनुयायींची कसोटी साधन संपत्ती आहे.’’ (तिरमिजी)

मुस्लिम हा धनलालसेपासून अलिप्त राहिला तर तो इतर अनेक पाफत्यांपासून दूर राहू शकतो. या शत्रूपासून सुटका म्हणजे इतर अनेकानेकांपासून सुटका, मुक्तता मिळणे होय. ऐहिक प्रेमापासून मनाला निर्मळ ठेवणे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर मनशुध्दी - मनःशांती होय! जकात देण्यामुळे ऐहिक साधनसामुग्रीच्या प्रेमापासून मन स्वतंत्र होते, तर याचाच अर्थ हा आहे की त्यामुळे आत्मशुध्दी होते. ऐहिक सुख व ऐहिक लालसेपासून स्वतंत्र मनुष्य अल्लाहची प्रसन्नता आणि परलोक सफलता (मुक्ती) प्राप्त करून घेतो. तो सदाचारी बनतो. म्हणूनच जकातचा परिणाम फक्त मनशुध्दीपर्यंतच सीमित नाही. त्याने अनेक सकारात्मक फायदे होतात. जकातमुळे सदाचार करण्याची एक प्रेरणा सतत मनात जागृत राहते.

इस्लाममध्ये गरीबांचा हक्क अदा करण्यासाठी जकात हा शब्द त्याच्या हेतु आणि उद्देशामुळेच वापरला जातो. जकातचा शब्दशः अर्थ होतो ‘‘शुध्दीकरण आणि वाढ’’. एखाद्याने दुसऱ्या गरजू, गरीब मनुष्याला आपल्या संपत्तीतून काही विशिष्ट भाग अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी देणे जकात आहे, कारण ते आत्मशुध्दी करते आणि धनसंचय शुध्द करते आणि त्यात वाढ करते.

हेसुध्दा येथे ध्यानात ठेवले पाहिजे की जकातचा उद्देश फक्त उत्पन्नाचा काही भाग गरीबास देऊन प्राप्त होत नाही तर तो उद्देश प्राप्त करण्यासाठी जकात शुध्द मनाने आणि व्यावहारिक कष्टाने प्रेरित असणे आवश्यक आहे. अल्लाहची प्रसन्नता ही प्रथम आणि सर्वांत महत्त्वाची अट आहे. इतर सर्व उद्देशांपासून हे कृत्य अलिप्त राहाणे अत्यावश्यक आहे. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे नबी (स), लोकांना सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. अल्लाह ज्याला इच्छितो त्यालाच मार्गदर्शन प्रदान करतो आणि कल्याणकारी मार्गात जी संपत्ती तुम्ही खर्च करता ती तुमच्या स्वतःच्या हिताकरिता होय, शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना की अल्लाहची मर्जी संपादन करावी. म्हणून जी काही संपत्ती तुम्ही कल्याणकारी मार्गात खर्च कराल त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क कदापि हिरावला जाणार नाही.’’ (कुरआन २: २७२)

‘‘शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना, की अल्लाहची मर्जी संपादन करावी.’’ या वाक्यामुळे जकात देण्याची तत्त्वे मांडली गेली आहेत.
कुरआन वारंवार हे स्पष्ट करीत आहे की सच्चा मुस्लिम तोच आहे जो जकात देतो दानधर्म करतो ते फक्त अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच! म्हणून जकात देण्यास ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करणे’’ असेही संबोधले आहे.

दुसरी अट जकात ही वैध (हलाल) मार्गाने कमविलेल्या संपत्तीतूनच अदा केली जाते कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो! जी संपत्ती तुम्ही कमविली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरिता उत्पन्न केले आहे, त्यापैकी उत्कृष्ठ भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करा.’’ (कुरआन २: २६७)

प्रेषित (स) यांनी वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खुलासा दिला आहे,

‘‘लोकहो! अल्लाह सर्वोत्तम गुणांनी संपन्न आहे आणि तो उत्कृष्ठतेचाच स्वीकार करतो अन्य काहीही नाही. तो शुध्द आहे आणि शुध्दतेचाच स्वीकार करतो.’’

तिसरी महत्त्वाची अट आहे अल्लाहच्या मार्गात चांगलेच खर्च करा निकृष्ट खर्च करणे हा दांभिकपणा आहे.

‘‘असे होता कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरिता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा.’’ (कुरआन २: २६७)

चौथी अट आहे की जकात ज्याला दिली जाते तो गरीब मनुष्य उफत होता कामा नये. त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू नये. अन्यथा जकात देणे व्यर्थ ठरते. कुरआनोक्ती आहे,

‘‘हे श्रध्दावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो.’’ (कुरआन २: २६४)

हदीसनुसार तीन माणसे सर्वप्रथम नरकात जाणार आहेत. त्यांच्यापैकी एक आहे तो मनुष्य जो दान फक्त आपले वर्चस्व समाजात वाढावे आणि लोकांनी आपणास दानशूर म्हणावे याच हेतुने दान करतो. दुसऱ्या हदीसमध्ये चांगलीच कानउघाडणी केली आहे,

‘‘जो कोणी दान दुसऱ्यांनी प्रशंसा करावी म्हणून देत असेल तर असा मनुष्य अल्लाहशी शत्रुत्व स्वीकारतो.’’ (मिश्कात)

जकात देतानाच्या काही अटी आहेत. या अटींचे काटेकोर पालन केल्यास हे कृत्य पुण्यमयी आणि शुध्दीकरणाचे स्त्रोत ठरते. जकात माणसात एक नैतिक अधिष्ठान निर्माण करते. याचमुळे सर्वसाधारण दानधर्म करणे आणि जकात देणे यात मौलिक अंतर आहे. जकात देण्याच्या अटींचा जर विचार केला तर असे कळते की स्वतःचे काटेकोर आत्मपरीक्षण करणे हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. ही एक अशी उपासना व भक्ती आहे की जिच्या आजुबाजूला असंख्य विरोधी तत्त्वे कार्यरत असतात. त्यावर कुठाराघात करण्यासाठी म्हणून कुरआनने सदाचरणी माणसाची मानसिकता स्पष्ट करताना म्हटले आहे,

‘‘आणि अल्लाहच्या प्रेमात गरीब आणि अनाथ व कैद्यांना जेवू घालतील आणि त्यांना म्हणतील.’’ आम्ही तुम्हाला केवळ अल्लाहसाठी जेवू घालीत आहोत, आम्ही तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाही की आभार प्रदर्शन.’’ (कुरआन ७६: ८-९)
‘‘जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या संकेतांवर श्रध्दा ठेवतात, जे आपल्या पालनकर्त्यांबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही, आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकाप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्यांकडे परतावयाचे आहे.’’ (कुरआन २३: ५९-६०)

गर्वाबद्दल काय बोलावे? अत्यानंद, डामडौल इ. लाभकारींच्या आत्मसन्मानाला आघात करतात. जकात देताना श्रध्दावंत हे अल्लाहच्या भयाने भयभीत झालेले असतात ते यामुळे की मनात काही अविचार गुपचूप येऊन त्यांच्या या सत्कृत्याला वाया घालवू नये. त्याला भीती असते की पुनरुत्थानाच्या दिवशी अल्लाहसमोर त्याचे दान देणे, जकात देणे हे सर्व वाया जाऊ नये.

गरीबांची मदत: आता आपण दुय्यम दर्जाच्या हेतुचा विचार करू या जकात देताना गरीब मुस्लिमांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मदत करणे हा हेतु कार्यरत असतो. प्रेषित (स) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहने जकात त्यांच्यावर अनिवार्य केली आहे. श्रीमंत मुस्लिम कडून जकात घेऊन ती गरीब मुस्लिमांना देण्यात यावी.’’ – मुस्लिम

कुरआन जकात देणे हे सदाचारी मुस्लिमाचे लक्षण ठरवतो आणि जकात देण्याचा तपशील खालीलप्रमाणे स्पष्ट करतो.

‘‘सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान धारण करतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितांवर ईमान धारण करतात. ईशप्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू व याचक तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी संकटे आणि युध्दप्रसंगीदेखील संयम राखतात. हेच लोक सत्यशील आणि अल्लाहच्या कोपचे भय बाळगणारे आहेत.’’ (कुरआन २: १७७)

वरील संकेतवचनावरून हे सिध्द होते की जकात अदा करण्याचा आर्थिक आणि सामाजिक अंग आहे. त्याच्याशिवाय जकात देण्याला काहीच अर्थ उरत नाही. जकात देणारा तर आपली आत्मशुध्दी करून घेतो. परंतु गरीबाला ती रक्कम (जकात)दिल्यानंतरच त्या रकमेतून तो गरजू आपली गरज भागवितो. यानंतरच त्याचे (जकातचे) उद्देश साध्य होते. म्हणूनच कुरआन जकातचा उल्लेख श्रीमंत लोकांच्या धनसंपत्ती वर गरीबांचा हक्क असा उल्लेख करतो.

‘‘परंतु ते लोक जे नमाज अदा करतात, जे आपल्या नमाजात नेहमी नियमित पणा ठेवतात, ज्यांच्या मालमत्तेत याचक व वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे. जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या कोपचे भय बाळगतात.’’ (कुरआन ७० : २३-२६)

या हक्कासाठी इस्लामी शासनाला युध्द घोषित करण्याचा अधिकार आहे. आदरनीय अबू बकर (र) यांच्या उदाहरणाने वर हे स्पष्ट झालेले आहे. गरीबांना मदत करणे हा जकात देण्याचा दुय्यम हेतु जरी असला तरी त्याचे महत्त्व हे असाधारण असे आहे. त्याचे महत्त्व या ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनात उल्लेखनीय असे आहे. खालील हदीसनुसार त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

१) ‘‘जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी मात्र उपाशी पोटी राहतो, तर असा मनुष्य खरा मुस्लिम नाही.’’ (मिश्कात)

२) न्यायदानाच्या दिवशी अल्लाह विचारणा करील की,

‘‘हे आदमच्या संततीनो, मी तुम्हाला अन्नाबद्दल विचारले होते परंतु तुम्ही मला ते दिले नाही.’’ मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या प्रभुस्वामी, मी तुला अन्न कसे देणार की जेव्हा तू सर्वांचाच अन्नदाता आहेस!’’ या प्रश्नाचे उत्तर अल्लाह देईल की ‘‘तुला आठवत नाही की तुझ्याकडे एक मनुष्य आला होता आणि तो उपासी होता. तो तुझ्याकडे अन्नासाठी भीक मागत होता आणि तू त्यास नकार दिला?’’ (मुस्लिम)

हे अगदी निर्विवाद आहे की इस्लाम गरीबांच्या आणि गरजूंच्या गरजा भागविण्याबद्दल अत्यंत भावनाशील आहे. गरीबांच्या गरजा पुऱ्या करणे इस्लाममध्ये असाधारण असे कृत्य आहे.

इस्लामचा आधार: इस्लाममध्ये जकातचा दुय्यम हेतु मदत करणे आहे. कुरआन जकातच्या लाभ धारकांबद्दल तपशील देताना स्पष्ट निर्देश देत आहे,

‘‘हे दान तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोर-गरीबांसाठी आहे. आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईशमार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे. एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणणारा द्रष्टा व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन ९: ६०)

अल्लाहच्या मार्गात (ईशमार्गात) ही शब्दावली इस्लामसाठी केलेला संघर्ष दर्शविते, विशेषतः जिहादच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी जकात व दान देणे हेसुध्दा उद्देशांपैकी एक उद्देश आहे. या उद्देशाने मुस्लिमांना कुरआन सतत सतर्क ठेवित आहे.

‘‘निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोजड असा व संघर्ष करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित व वित्तानिशी, हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल.’’ (कुरआन ९: ४१)

कुरआन ज्या वेळी सदाचारी मुस्लिमांच्या गुणांचा उल्लेख करतो त्या वेळी हा गुण उल्लेखित केला जातो की ते अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करतात आपल्या वित्तानिशी. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जिहादसाठी जो काही खर्च होतो तो मुस्लिमांनी आपल्या खाजगी मालमत्तेतून देणे आवश्यक आहे. धर्माचे रक्षण आणि धर्माची मदत करणे ही काही साधी बाब नाही. म्हणूनच आपली संपत्ती त्यासाठी खर्च करणे हे अतिमहत्त्वाचे आहे. जिहादवर खर्च करण्यासाठी आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाहच्या मार्गात (संपत्ती) खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःला अडचणीत टाकण्यापासून (स्वतःचा विनाश करण्यापासून) परावृत्त राहा आणि सद्वर्तन करा, अल्लाहला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (कुरआन २: १९५)

यावरून हे सिध्द होते की धर्माचे रक्षण आणि धर्माला मदत करण्यासाठी आपली संपत्ती खर्च न करणे म्हणजे स्वतःच्याच हातून स्वतःचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन उध्वस्त करणे होय. आपल्या हाताने स्वतःचा विनाश करणे थांबविण्यासाठी दान व जकात देणे ही काही साधी बाब नाही. हे एक महान सद्वर्तन आहे.

प्रथमतः आपण काबागृहाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व पाहू या. पितापुत्र (इब्राहीम व इस्माईल) काबागृहाचे बांधकाम उभारीत होते व प्रार्थना करीत होते,

‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे प्रभू आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव, जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. निःसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.’’    (कुरआन २: १२७-१२८)

पितापुत्राच्या वरील प्रार्थनेवरून हेच सिध्द होते की काबागृह बांधण्याचा जो मूळ हेतु होता तो साध्य करण्यासाठी त्यांच्या वंशामधूनच तो समाज उभा राहिला जो आज्ञाधारक (मुस्लिम) होता.

येथे हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेत त्यांनी विनवणी केली होती,

‘‘आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल.’’

येथे मुस्लिम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारक.

काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला आणि पत्नीला इतरत्र स्थलांतरित केले नाही. ते तेथेच स्थायिक झाले, जो वाळवंटी, ओसाड प्रदेश होता व तो निर्मनुष्य प्रदेश होता. काबागृहाजवळ त्यामुळे त्यांची जी वंशावळ जन्माला येणार होती ती सर्व ‘‘त्या एक अल्लाहचेच आज्ञाधारक असतील.’’ इब्राहीम (अ.) यनी स्वतः अल्लाहजवळ त्यावेळी प्रार्थना केली,

‘‘हे पालनकर्त्या प्रभू! मी एका निर्जल व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी.’’ (कुरआन १४: ३७)

‘‘या लोकांनी येथे नमाज कायम करावी’’ याचा अर्थ असा आहे की त्यांनी अल्लाहची सेवा (इबादत-उपासना) करावी. अल्लाहचा धर्म पाळावा आणि त्याचा प्रसार करावा. प्रार्थना श्रध्दाशीलतेचे अनिवार्य अंग आहे. म्हणून ‘‘लोकांनी नमाज कायम करावी’’ याचा अर्थच असा होतो की इस्लाम धर्म (आज्ञाधारकता) पूर्णरूपेन प्रस्थापित केला जावा. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचा (इस्लाम) एक आदर्श त्यांच्या वंशात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला याची साक्ष इतिहास देत आहे.

त्यांच्या वंशातून पुढे आज्ञाधारक समाज कसा बनणार होता? अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या पध्दती त्यांना कशा प्रकारे माहीत होणार? यासाठी त्या पितापुत्रांनी अल्लाहजवळ अशी विनवणी केली होती,

‘‘हे पालनकर्त्या प्रभू! या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर. जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभूत्वशाली न्याय करणारा आहेस.’’ (कुरआन २: १२९)

मानवी इतिहासातील या दोन प्रार्थना आहेत ज्यांचा स्वीकार अल्लाहने कालांतराने (सुमारे २००० वर्षानंतर) केला. आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या रूपात ‘प्रेषित’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (सहाबी) रूपात ‘आज्ञाधारक समाज’ उभा केला. (इस्लामी राष्ट्र निर्माण केले.) हा आज्ञाधारक समाज म्हणजेच मुस्लिम समाज आणि मुस्लिम राष्ट्र होय. त्यांचे नाव मुस्लिम (आज्ञाधारक) यासाठी झाले की इब्राहीम (अ.) यांनी त्यांचा उल्लेख आपल्या प्रार्थनेत याच मुस्लिम शब्दाने केलेला होता. अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुस्लिम हे नाव अगोदरच दिले होते. हे कुरआनच्या ‘हज्ज’ या अध्यायाने सिध्द केले आहे.

वरील विवेचनाने हे सिध्द होते की काबागृहाला इस्लामचे प्रेरणास्रोत आणि केंद्र संबोधने अगदी योग्य आहे.

इस्लामची साक्ष काय आहे? हा एक समर्पक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर हे इस्लामला जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इस्लाम हा धर्म सत्य धर्म पूर्वनियोजित आहे. तीच स्थिती ‘इस्लामची साक्ष’च्या उत्तराची आणि त्याच्या व्यावहारिक स्वरुपाची आहे. हे नियोजन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यावहारिक जीवनाची देन आहे. सामान्यतः साक्षीला आपण एखाद्या व्यक्तीचे खरे दस्तऐवज (प्रतिज्ञापत्र) म्हणतो. इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून हे खरे दस्तऐवज म्हणजे प्रतिज्ञापत्र या जगापुढे सर्व लोकांना दाखविले पाहिजे. सत्याची साक्ष देण्याला दोन अंग आहेत एक शाब्दिक, तोंडी आणि दुसरे व्यावहारिक.

अ) तोंडी साक्ष: तोंडी साक्ष देणे म्हणजे इस्लामबद्दल त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून ते सर्वकाही माहिती इस्लामच्या आदेशांपर्यंतची मुस्लिमेतर बांधवांना अतिशय योग्य पध्दतीने देणे. माहिती त्यांच्यासमोर अशा पध्दतीने मांडणे की जेणेकरून एक खुला ग्रंथ त्यांच्या पुढे राहावा आणि त्यांना त्यांच्या श्रध्देविषयीचा दोष जाणून घेण्यास व इस्लामचे उघड सत्य आत्मसात करण्यास काही एक अडचण राहू नये. या कार्यासाठी काही अत्यावश्यक बाबींचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे.

१) प्रथमतः चर्चा ही त्यांच्या मूलभूत तत्त्वांविषयी व्हावी जेणेकरून त्यांना त्यांच्या श्रध्देविषयी उघड उघड कल्पना येऊन जावी. इस्लामविषयी माहिती देताना अल्लाह एकमेव ईश्वर आहे (एकेश्वरत्व) प्रेषित्व आणि पारलौकिक जीवनावर उघड चर्चा व्हावी. इस्लामचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ.विषयींचे आदेश त्यांना स्पष्ट करून सांगावेत. इस्लाम मानवी जीवनाच्या समस्या कशा प्रकारे सोडवतो आणि इस्लामच्या आज्ञाधारकतेत या क्षणभंगूर जीवनाचे साफल्य दडून बसले आहे याची स्पष्ट माहिती (उकल) त्यांना करून द्यावी.

२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इस्लाम आणि इस्लामेतर काय आहे याची बौध्दिक आणि तार्किक चर्चा करून गांभीर्याने त्यांना समजून सांगावेत. यासाठी आजचे प्रचलित धर्म तत्त्वज्ञान, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेविषयी इतंभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे मुस्लिमेतरांविषयी एक तार्किक बैठक तयार होते आणि त्यामुळे इस्लामेतर तत्त्वांना मुळासकट उखडून टाकण्यास मदतच होते. हे अशा पध्दतीने व्हावे की त्यांच्या भावनांना स्पष्टपणे उघड केले जावे आणि त्यांच्या श्रध्देमुळे आणि धार्मिक आचरणांमुळे मानवतेची कशी हानी होते हे समजून दिले पाहिजे. मुस्लिमेतर श्रध्दा आणि तत्त्वे हे सर्व इस्लामची साक्ष देण्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यांच्याशिवाय साक्ष देणे पूर्ण होऊ शकत नाही. इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देणे म्हणजे नवीन इमारत बांधण्यासारखे आहे आणि नवीन इमारतीसाठी सर्वप्रथम नवीन पाया घालणे अत्यावश्यक आहे. पायाविना इमारत अशक्य आहे. पायाभरणी झाल्यानंतरच इमारत व भिती उभ्या राहू शकतात. जनमानसात इस्लामचा पाया मजबूत व्हावा आणि त्यांच्या मनात आणि हृदयात घर करून राहावे यासाठी जमीन तयार करणे (पाया भरणे) अत्यावश्यक आहे. यासाठी जमिनीची मशागत तेव्हाच होईल जेव्हा आपण जमिनीत उगवलेले खोटे तत्त्व आणि श्रध्दांना उपटून त्यांचे मन निर्मळ बनवू शकू. जहाजात सामान तेव्हाच ठेवता येईल जेव्हा ते रिकामे असेल अन्यथा नाही. याच तत्त्वाने, इस्लाम मनुष्याच्या मनात तेव्हाच घर करून राहील जेव्हा ते इतर श्रध्दांपासून मोकळे आणि निर्मळ होईल. कुरआननुसार एकेश्वरत्व, प्रेषित्व आणि परलोकत्व यांनाच फक्त इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देण्यासाठी उपयोगात आणणे पुरेसे नाही. तर यासाठी अनेकेश्वरत्वाचा, असत्य धर्माचा स्वीकार करण्याचा आणि प्रेषित्वाविषयी आणि पारलौकिक तत्त्वाविषयी श्रध्दाहीनतेचा कडाडून निर्धारपूर्वक विरोध होणे अत्यावश्यक आहे. यासाठी अश्रध्देचे प्रकार आणि ही श्रध्दाहीनता त्यांच्या मनात कशी प्रवेशकरती झाली याचा ऐतिहासिक आढावा घेणे, तसेच त्यांच्या शिळ्या आणि खोट्या मनोकामनांना उघड करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्यांच्या तत्त्वांची निरर्थकता त्यांच्यासमोर उघड होते आणि त्यांना जमीनदोस्त करण्यास ते स्वतःहून तयार होतात. काबागृहातील ३६० मूर्तींना याच एकमेव पध्दतीने त्या लोकांनी स्वतः जमीनदोस्त केले होते. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तिला कुरआन स्पष्ट करीत आहे,

‘‘धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी तागूत (मूर्तींचा) इन्कार करून अल्लाहवर श्रध्दा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन २: २५६)

३) तिसरी बाब आहे इस्लामचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा तसेच इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा मित्रत्वाने, सौजण्याने आणि गोडीने अत्यंत व्यवस्थितपणे मांडला गेला पाहिजे. मृदुभाषेमध्ये लोकांना पटेल अशा प्रकारे तसेच सौहार्दपूर्ण चर्चेतून शास्त्रोक्त पध्दतीने उद्देश प्राप्ती सहज होते. कारण इस्लामचा प्रामाणिकपणा आणि इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा समोर आणणे ही काही फक्त शैक्षणिक बाब नाही. एक सत्यधर्म प्रचार आणि प्रसारकार्य आहे. बुध्दीविवेकास आवाहन करून श्रोत्याच्या मनात आणि हृदयावर इस्लामसंदेशाची खोलवर छाप पडणे आवश्यक आहे, अन्यथा सर्व व्यर्थ. यासाठी समोरच्या श्रोत्याच्या मानसिक स्थितीचा विचार करूनच त्याच्याशी संभाषण व्हावे. आमंत्रण देण्याची पध्दत, भाषा आणि तंत्र कुरआननुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. कुरआनची पध्दत प्रभावशाली असून कुरआनची भाषाशैलीसुध्दा सुसंगत अशी आहे. कुरआनचा संवाददेखील गोड आहे. गैरसमज निर्माण होईल अशी कुरआन संवादाची भाषाशैली मुळीच नाही. कुरआनची स्पष्ट शैली आहे आणि ती स्फूर्तीदायक आणि आकर्षक भाषणशैली आहे. कारण अरबांना ही शैली फार आवडत होती. दुसरीकडे वैश्विक तत्त्वे, नैसर्गिक नियम आणि दररोजच्या घटनांचा उल्लेख अत्यंत प्रभावीपणे आणि अनुकूल चर्चेतून मांडला गेला आहे. लोकांना इस्लामकडे आमंत्रिक करण्यासाठी अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना खालीलप्रमाणे उपदेश केला,

‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)

वरील तिन्ही गरजा या मूलाधाराचे व्यावहारिक स्वरूप आहे.

४) चौथी बाब इस्लामकडे आमंत्रण कार्य - हे एखाद्या सहानुभूतीमुळे अथवा राष्ट्राभिमानाने अथवा भाषणकौशल्याच्या प्रेरणेने प्रवृत्त झालेले मूळीच नसावे. जे काही सांगितले गेले ते गांभीर्यपूर्वक, श्रध्दापूर्वक आणि अल्लाहच्या प्रेमातून बाहेर पडले पाहिजे. ते मानवतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. हृदयातून आपले म्हणणे इतरांच्या चुकांसाठी शोक करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. श्रोत्यांची ही भावना झाली पाहिजे की सांगणारा (प्रचारक) आपणास काही नवीन देत आहे. आपणाकडून काहीही न घेता एक उघड सत्य आपणापुढे मांडत आहे. लोकांना इस्लामच्या कृपाछत्राखाली आणण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची जी चिता आणि प्रबळ आकांक्षा होती त्याला कुरआनने खालील शब्दांत वर्णन केले आहे,

‘‘बरे तर हे पैगम्बर (स.)! कदाचित तुम्ही यांच्यामागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रध्दा ठेवली नाही?’’ (कुरआन १७: ६)

ब) व्यावहारिक साक्ष: व्यावहारिक साक्ष अथवा पुरावा तो आहे जो इस्लामचा प्रचारक आपल्या प्रत्यक्ष जीवनातून देतो. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशः आणि मुस्लिम राष्ट्राने इस्लामचे खरे रूप प्रदर्शित केले पाहिजे.
त्यांची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर गाढ श्रध्दा पाहिजे. तसेच प्रेषितवाद आणि परलोकत्वाची श्रध्दासुध्दा अटळ पाहिजे आणि जीवनकार्यात त्याचे प्रतिबिब पडले पाहिजे. त्यांचा स्वभाव आणि वर्तणूक ही इस्लामच्या आदेशाबरहुकूम पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य कुरआन आणि हदीसनुसार नियंत्रित असणे अत्यावश्यक आहे.

त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्य अर्थात संपूर्ण जीवन अल्लाह आणि प्रेषित (स.) यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच नियंत्रित आणि संचलित असणे अत्यावश्यक आहे. ह्या प्रकारची आज्ञाधारकता इस्लामचे खरे रुप दर्शविते. ह्या आज्ञाधारकते मुळे जगाला कळून येते की कशा प्रकारचे नागरिक, कशा प्रकारचा समाज आणि सामाजिक व्यवस्था इस्लामला अभिप्रेत आहे.

व्यावहारिक साक्षीची स्थिती ही नैतिक किवा तोंडी साक्षी पेक्षा अत्यंत महत्वाची आहे. की ज्यांत प्रचारकाचे व्यावहारिक रूप लोकांसमोर येत नाही. तसेच नव्वद टक्के लोकांना धर्म प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून व्यावहारिक साक्ष अथवा पुरावाच अपेक्षित आहे. बौध्दिक आव्हान अथवा भावनात्मक आवाहन त्यांच्या आकलनापलिकडचे असते. ह्या संदर्भात येथे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्राचा पुरावा अपेक्षित आहे जो एक आदर्श आहे. त्यांनी लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले तेव्हा ते स्वतः इस्लामचे पाईक म्हणूनच. त्यांनी जेव्हा दुसऱ्यांना इस्लामच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले तत्पूर्वी ते स्वतः त्या आदेशा बरहुकूम आचरण करीत राहिले.

इस्लामचे हे खरे स्वरुप आहे. इस्लामचा खरा अर्थ हा आहे जो प्रमाण आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या इस्लामसाठीच्या प्रयत्नांचे मोजमाप करता येते. ह्या प्रमाणाच्या जितक्या जवळ व्यक्ती (मुस्लिम) असेल तितके ते ह्या कामी (इस्लाम प्रचार) यशस्वी ठरतात. ह्या ध्येयापासून दूर तेच राहतात जे ह्या प्रमाणापासून (स्टँडर्ड) पासून अथवा आदर्शापासून दूर राहतात.

‘अर्रहमानु अर्रहीमु’– हे दोन्ही शब्द कृपेपासून बनले आहेत. पहिल्यामध्ये आवेश व उत्साह आणि विपुलतेचा अर्थ आपल्यात सामावलेला आहे आणि दुसऱ्यात निरंतरता आणि कायमस्वरूपीपणाचा अर्थ आढळतो. कृपाळू तो ज्याची कृपा अतिशय जोशपूर्ण आहे. हवा, पाणी व दुसऱ्या सर्व गरजांची पूर्तता त्याच कृपेचे प्रतिबिंब आहे. मग त्याच गुणवैशिष्ट्याचा परिणाम आहे की त्याने सर्वांत मोठी कृपा (कुरआन) पाठविली. अल्लाह म्हणतो,
‘‘अर्रहमानु, अल्लमल कुरआना, खल़कल इन्साना अल्लमहुल बयाना.’’
    कृपाळूने कुरआनची शिकवण दिली, कृपाळूने मानवाला निर्माण केले, कृपाळूने मानवाला बोलण्याची क्षमता दिली. आणि कृपावंत तो ज्याच्या कृपेचा क्रम कधीच संपत नाही, ज्याची कृपा व दया निरंतर राहणार आहे. ही गुणवैशिष्ट्ये मानल्यामुळे अनिवार्य ठरते की मानवाने अशाप्रकारे जीवन व्यतीत करावे जे कृपावंत पसंत करतो, जेणेकरून आणखीन अधिक कृपेचे हक्कदार बनावे आणि त्या नियमांनुसार आपल्या जीवनाची इमारत बांधू नये जे त्याला आवडत नाहीत, अन्यथा तो आपली दृष्टी वळवील. मग जे लोक ‘दीन’चे कार्य करतात त्यांना वाईट परिस्थितींमध्ये आणि संकटांमध्ये आठवले पाहिजे की जेव्हा ते पालनकत्र्याचे कार्य करीत आहेत तेव्हा तो त्यांना या जगात आपल्या कृपांपासून वंचित का करील?
‘अल-काईमु बिल-किस्ति’– म्हणजे न्यायी व न्यायाधीश. जर अल्लाह न्यायी व न्यायाधीश आहे तर त्याच्या दृष्टीने प्रामाणिक व आरोपी समान असू शकत नाहीत. दोघांशी तो सारखाच व्यवहार या जगात करणार नाही आणि त्या जगातही करणार नाही.
‘अल-अ़जी़ज’– शासक. ज्याच्या सत्तेने सर्वांना घेरले आहे, ज्याच्या सत्तेला कोणी आव्हान देऊ शकत नाही, अथवा त्याने आपल्या प्रामाणिक दासांना प्रभुत्व व सत्ता देण्याचा निर्णय घेतला तर कोणतीही शक्ती त्याचा निर्णय रोखू शकणार नाही आणि ज्याला तो शिक्षा देऊ इच्छिल तो त्यापासून वाचू शकणार नाही आणि कोणी त्याचा निर्णय टाळू शकणार नाही.
‘अल-ऱकीब’– देखरेख करणारा. जेव्हा तो दासांच्या कर्मांची देखरेख करीत आहे तेव्हा त्यांच्यानुसारच मोबदला व शिक्षा देईल.
‘अल-अलीम’– जाणणारा. संपूर्ण ज्ञान बाळगणारा. कोण कुठे आहे व काय करीत आहे आणि कोणाला कशाची आवश्यकता आहे, त्याचे प्रामाणिक दास कुठे आहेत आणि कोणत्या संकटात अडकले आहेत. तसेच तो ज्ञान बाळगतो म्हणून कोणाला एखादी वस्तू देण्यात अन्याय करीत नाही. प्रत्येकाला तोच देईल ज्याचा तो हक्कदार आहे. त्याच्या कृपा व मदतीचे हक्कदार निष्क्रिय होऊ शकत नाहीत आणि त्याच्या राग व शिक्षेचे हक्कदार यशस्वी होऊ शकत नाहीत.
    येथे सांगण्यात आलेल्या काही आवश्यक गुणवैशिष्ट्यांमध्ये आणखी सर्व गुणवैशिष्ट्ये सामावतात. या ठिकाणी यापेक्षा अधिक सांगणे कठीण आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की अल्लाहच्या अनेक गुणवैशिष्ट्यांना विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी कुरआन व हदीसचे पठण व अध्ययन करणे गरजेचे आहे. जे लोक अरबी भाषा जाणतात आणि जे लोक जाणत नाहीत, दोघांनी विचार करण्याची गोष्ट आहे की आयतींच्या शेवटी अल्लाहची गुणवैशिष्ट्ये का आणली गेली आहेत आणि त्यांना त्यापासून कोणत्या उपदेशाचा लाभ होतो.
जगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी
    माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले,
‘‘फ-मय्यंरिदिल्लाहु अय्यंहदियहू यश्रह सदरहू लिलइस्लामि.’’
(ज्याला अल्लाह उपदेश देण्याचा निर्णय घेतो त्याची छाती इस्लामसाठी उघडतो.)
    या आयतीच्या पठणानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा प्रकाश छातीत प्रवेश करतो तेव्हा छाती उघडते.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्याला ओळखता येईल अशी त्याची एखादी अनुभूत निशाणी आहे काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय त्याची अनुभूत निशाणी ही आहे की मनुष्याच्या हृदयाला या जगाचा वीट आलेला असतो आणि कायमस्वरूपी घराची त्याला ओढ लागलेली असते आणि मरण येण्यापूर्वी मरणाच्या तयारीला लागतो.’’
स्पष्टीकरण : ज्या मनुष्याच्या हृदयात इस्लामची वास्तविकता उतरते तेव्हा त्याचे हृदय
    या समाप्त होणाऱ्या जगापासून दूर पळू लागते आणि त्याला परलोकाची ओढ लागते. मृत्यू येण्यापूर्वी पुण्यकर्म करू लागतो.

- एम.आय.शेख

आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामां है सौ बरसका पल की खबर नहीं

प्रथम मी आपले अभिनंदन करतो की आपण हा लेख वाचण्याचा निर्णय केला. मला खात्री होती की, या लेखाचे शिर्षक वाचूनच अनेक वाचक हा लेख वाचणार नाहीत. मृत्यू अटळ आहे मात्र आपण सर्वजण अशा अभिनिवेशात जगत आहोत जणू कधी आपण मरणारच नाही. अनेक लोक तर ’मृत्यू’ संबंधी बोलणे टाळतात. त्यासंबंधी बोलणे अशुभ समजतात. इस्लामने मात्र मृत्यूला नजरेसमोर ठेवून आचरण करण्याची ताकीद केलेली आहे. 
गम्मत पहा जगातील बहुतेक व्यवस्था मृत्यूवर बोलने टाळतात तर इस्लाम मृत्यूला नेहमी डोळ्यांसमोर ठेवण्याची ताकीद करतो. अशा वेळी इस्लाममध्ये मृत्यू संबंधी नेमकी काय संकल्पना आहे? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. तर चला या संबंधी पाहूया. मृत्यूची भीती यासाठी वाटते की, तो माणसाचा जीव घेतो, पत्नीला विधवा करतो, मुलांना अनाथ करतो, अवलंबिताना निराधार करतो, आप्तांना रडवितो, वस्त्यांना उध्वस्त करतो, संस्थांचा नाश करतो, चविला नष्ट करतो, आशेला निराशेमध्ये बदलतो. गरीबांनाही मृत्यू येतो, श्रीमंतांना ही मृत्यू येतो, आस्तिकही मरतात, नास्तिकही मरतात. 
मृत्यू म्हणजे काय?
शरिरापासून आत्मा विलग होणे म्हणजे मृत्यू. मग प्र्रश्न उरतो की आत्मा काय आहे? कुरआन त्याचे उत्तर देतो की, आत्मा अल्लाहचा, शरिराला जिवंत राहण्याचा आदेश आहे. तो एका ठरावीक मुदतीसाठी दिलेला आहे. ती मुदत संपताच आदेश परत घेतला जातो आणि शरीर निपचित पडते. आत्मा ’आलमे बरजक’(मृत्यूलोक) मध्ये रवाना होतो. तो तेथे ’डे ऑफ जजमेंट’ (प्रलयाचा दिवस) पर्यंत वास्तव्यास राहतो. तद्नंतर त्याला पुन्हा शरीर प्राप्त करून दिल्या जाईल व त्याच्या जीवनाचा हिशोब घेण्यात येईल. ही आहे इस्लाममध्ये मृत्यूसंबंधीची संकल्पना.
न्यायासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता
जगाच्या रचनेकडे डोळसपणे पाहिले असता एक गोष्ट चटकन लक्षात येते ही की, हे जग अपूर्ण आहे. याला पूर्णत्व प्रदान करण्यासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता आहे. उदा. कल्पना करा की एका सुनेला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मारून टाकले. तेंव्हा प्रश्न हा निर्माण होतो की, ऐन तारूण्यात तीला जीव द्यावा लागला त्याची भरपाई कोण करणार? कुणी म्हणेल सासरच्यांना ’लॉ ऑफ द लँण्ड’ ने शिक्षा दिली आहे. ठीक आहे! पण त्यामुळे तिचे अकाली संपलेले जीवन तिला परत थोडेच मिळणार? तीला सर्वंकश न्याय मिळण्यासाठी ’आखिरत’ची दुनिया असणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने ज्या शक्तीशाली लोकांनी दुर्बलांवर अत्याचार केले, दंगे केले, लोकांची घरे जाळली, निरपराध लोकांच्या हत्या केल्या, अबलांवर बलात्कार केले, त्यांना न्याय तेंव्हाच मिळेल जेंव्हा शक्तीशाली व दुर्बल पुन्हा आमने-सामने उभे केले जातील व दुर्बलांना सर्व शक्तीमान अल्लाहकडून न्याय दिला जाईल. तेव्हाच हे जग पूर्णत्वाला आले असे म्हणता येईल. 
जगात बलवानांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला देण्यासाठी एक सर्वशक्तीमान अशी शक्ती आणि ’द डे ऑफ जजमेंट’ची आवश्यकता यासाठीच आहे. म्हणून आखिरत आवश्यक आहे. याची कल्पना जगाला स्पष्ट शब्दात कुरआनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. या गोष्टीची जाणीव सतत डोळ्यापुढे राहिली व मृत्यूनंतर येणार्या अनिवार्य अकांउन्टीब्लिटी (जबाबदारी)ची सतत आठवण राहिली तर माणसं जगामध्ये जबाबदारीने वागतील. म्हणून इस्लाममध्ये मृत्यूची सतत आठवण ठेवण्याची वारंवार ताकीद दिली गेली आहे. या संबंधी कुरआन स्पष्ट निर्देष देतो की, ’प्रत्येक जीवीतास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रूजू व्हायचे आहे.’ (सुरे अंबिया आ.नं.35).
मृत्यूची वैशिष्ट्ये 
मृत्यूचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला, कुठे आणि केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. याच्यात तर खरी मजा आहे. कल्पना करा मृत्यूची जर का माणसाला पूर्व कल्पना असती तर किती गजहब झाला असता? एक-एक दिवस जड गेला असता. जीवन निरस झाले असते. ही अल्लाहची एक प्रकारची कृपाच आहे की त्या असीम दयावंताने आपल्याला मृत्यूची तिथी कळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. खरे पाहता ही एक सवलत आहे. मात्र या सवलतीचा दुरूपयोग करण्याकडेच आपल्या सर्वांचा कल असतो. आपण असे वागतो जणू कधी मरणारच नाही. म्हणून कुरआन आपल्याला सावधानतेचा इशारा देतो की, ”त्या घटकेचे ज्ञान अल्लाहपाशीच आहे, तोच पर्जन्यवृष्टी करतो, तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे, कोणतीही व्यक्ती जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा व माहितगार आहे.”(सुरे लुकमान, आयत नं. 34).
मृत्यूचे आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला ? कोणत्या वयात? येईल हे कोणालाच सांगता येत नाही. अगदी तज्ञ डॉक्टर सुद्धा याबाबतीत ठामपणे काही सांगू शकत नाहीत. या तरतुदीचा सुद्धा आपण गैरफायदा घेत असतो. प्रत्येकाला वाटत असते की ”अजून आपले वय तर काय?” आपल्याला भरपूर जगायचे आहे. रोज रस्त्यावर होणारे अनेक अपघात व त्यात मरणारी अनेक माणसे आपल्याला रोज खोटं सिद्ध करत असतात. तरी माणूस आपल्या धुंदीत जगत असतो. त्याचा विचार असतो की आपण खूप जगणार आहोत. त्याचा हाच विचार त्याला दुसर्यावर अन्याय करून स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी प्रेरित करीत असतो. म्हणून इस्लामची ताकीद आहे की, जगाच्या झगमगाटात मृत्यूला विसरू नका. 
आपल्याला कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. अपघातच नव्हे तर जगात अनेक कारणांनी, अनेक लोक मरत असतात, काही ना आईच्या गर्भातच मृत्यू येतो तर काही बाल्यावस्थेत मृत्यू पावतात. काहीना ऐन तारूण्यात मृत्यू येतो तर काही दरम्यानी वयात मरतात. साधारणपणे वृद्ध झाल्यातर मृत्यू येतो हा समज सतत खोटा सिद्ध होत असतो. तरी प्रत्येक माणूस स्वतःला पूर्ण आयुष्य मिळणार याच विश्वासाने जगत असतो. हाच विश्वास माणसाला बेजबाबदार जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. म्हणून इस्लाम ताकीद करतो की लक्षात ठेवा तुम्हाला कधीही मृत्यू येऊ शकतो. म्हणून जबाबदारीने वागा, अल्लाहचे भय बाळगा.
अनेक जणांना आपल्या आरोग्यावर मोठा विश्वास असतो. पण अनेक ’सुपर फिट’ अंतरराष्ट्रीय खेळाडूंना सुद्धा अचानक मृत्यू येतो. तर अनेक व्यक्ति आपले रोगट शरीर घेऊन वर्षोनवर्ष जगत असतात. म्हणून चांगले आरोग्य जीवंत राहण्याची हमी होऊ शकत नाही. म्हणून सतत मृत्यूची आठवण डोळ्यासमोर ठेऊन जगण्यातच शहाणपण आहे. याचे कारण असे की, समजा कोणाला पूर्ण आयुष्य जरी लाभले तरी ते साधारणपणे 60-70 वर्षाचे असते. त्यातही 15-20 वर्ष बालपण व शेवटची 15-20 वर्षे वृद्धत्वात व्यतीत होतात. मग उरलेल्या तारूण्याच्या 30-40 वर्षात कुणावर अन्याय करून नेहमीसाठीच्या मृत्यूनंतरचे जीवन धोक्यात घालणे किती धोक्याचे आहे, याची चेतावणी कुरआन खालील शब्दात देतो.” लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी-अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. (सुरे आलेइम्रान, आयत नं. 14).
आखिरत संबंधी एक सुंदर तर्क असा देता येईल की, आज आपले अस्तित्व आहे. म्हणून यापूर्वीही (म्हणजे जन्मापूर्वी) ते होते व या नंतरही (म्हणजे मृत्यूनंतरही) ते राहील एवढे निश्चित. ज्याअर्थी आपल्या जन्मापूर्वीच्या जीवनावर आपला काही अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावर ही काही अधिकार नसणार आहे तर मग या दोहोंमधील 60-70 वर्षांच्या आयुष्यातच आपल्याला अमर्यादित अधिकार कसा काय मिळू शकतो की आपण मनाला वाटेल तसे जगू, मनाला वाटेल तसे वागू?
वास्तविक पाहता जग हे एक परीक्षा केंद्र आहे. उदा. विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करण्यासाठी कोणतेही पुस्तक / गाईड वापरण्यासाठी स्वतंत्र असतो पण परीक्षा केंद्रात प्रवेश करताच त्याचे सर्व स्वातंत्र्य संपते व वर्षभर त्याने केलेल्या अभ्यासावर त्याचे पुढील भविष्य अवलंबून असते. ठीक असेच या 60-70 वर्षाच्या जीवन काळात माणसं कसेही वागण्यासाठी स्वतंत्र आहेत. मात्र मृत्यू येता क्षणी आपले स्वातंत्र्य संपते. 60-70 वर्षात जगतांना केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांवरच आपले पुढील भविष्य अवलंबून असते. या संबंधी एक सुंदर हदीस आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छीतो ती अशी की - प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टी पूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा.
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नाची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे. 
1.जीवन कुठे व्यतीत केले 2. तारूण्य कुठे खर्चि घातले 3. संपत्ती कोठून मिळविली. 4. कोठे खर्च केली. 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला.
मृत्यूची सतत आठवण कशी ठेवता येईल?
आधून-मधून कब्रस्तान मध्ये जावे. त्यावेळी आपल्याला जाणीव होईल की या ठिकाणी अशी अनेक माणसं शांतपणे पडलेली आहेत ज्यांना जीवंतपणी वाटत होतं की त्यांच्या शिवाय त्यांचे घर, व्यापार, देश चालूच शकत नाहीत. मृत व्यक्तीच्या गुस्लच्या वेळी हजर राहणे आणि पाहणे तो स्वतः अंघोळ करण्याच्या सुद्धा लायक नाही. तेव्हा त्याची असाह्यता लक्षात येते व आपली औकात आपल्याला कळते. अशा प्रकारे मृत्यूची सतत आठवण ठेवता येईल.
मृत्यू आणि नमाज
माणूस दर दिवशी जीवनापासून दूर तर मृत्यूच्या जवळ जात असतो, मग शहाणा माणूस जवळ येणार्या अडचणीवर मात करण्याच्या तयारीला लागतो. मूर्ख मात्र दर वाढदिवसाला नवीन केक कापत कशाचीच पर्वा न करता जगत राहतो. जरा गंभीरपणे विचार केला तर लक्षात येईल की, मृत्यू आणि नमाज दोन्हीमध्ये एक समानता अशी आहे की, दोन्हीमध्ये माणसाला अल्लाहशी भेटण्याची समान संधी आहे. नमाज मध्येही माणूस अल्लाहची भेट घेतो. मृत्यूनंतरही माणूस अल्लाहची भेट घेतो. नमाज पढतांना ज्याला जेवढा आनंद येत असेल तेवढाच मृत्यू येताना त्याला आनंद येईल. नमाजला जाण्यासाठी ज्याला भिती वाटते त्याला मृत्यूचीही भिती वाटणार, एवढे नक्की. म्हणून मन लावून नमाज अदा करणे अत्यंत आवश्यक आहे. 
जगात मोठ्या प्रमाणात अनैतिकता बोकाळलेली आहे. त्यामुळे नातेसंबंध उध्वस्त होत आहेत. कोणावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, अशा परिस्थितीत मुस्लिमांसमोर नैतिक जीवन जगण्याचे एक मोठे आव्हान आहे. यातून मुस्लिमांवरील इतर समाजाचा विश्वास वृद्धींगत होत जाईल, अन्यथा गैरविश्वासाचे जे वातावरण सध्या जगात सर्वत्र व्याप्त आहे त्यात आणखीन भर पडेल. शेवटी कोणीतरी असायलाच हवा ना! ज्याच्यावर विश्वास ठेवून लोक आपले व्यवहार करू शकतील. तर मित्रांनों! सज्ज व्हा, नमाजच्या माध्यमातून नीतिमत्ता हस्तगत करा. कुरआनच्या आदेशांना समजून घ्या म्हणजे त्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. त्यासाठी कायम मृत्यूला डोळ्यासमोर ठेवा. नैतिकतेवर चलण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. अल्लाह आपल्या सर्वांचे रक्षण करो. आमीन.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget