Latest Post

- एम.आय. शेख -
9764000737


ईद-उल-फित्र

ईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.
    ना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.
    महिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.
ईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप
    आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.
    समाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.
    अनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.
    व्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.
    वाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.
       या आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक संधी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी  इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.
    इस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर  पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.
    इस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.
    भारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
    शेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी पुरे आहे. ईद  मुबारक.

- सीमा देशपांडे
7798981535


रमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन ये! अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच! काय असतील रमजान? मुस्लिम लोक एवढे कडक उपवास कसे करत असतील?  माझी कुतुहुलता त्या उपवासाकडे जास्त होती, कारण मी जे उपवास पाहिले होते ते तर भरपूर खावुन-पिऊन होते. ज्यावर माझे आईसोबत नेहमी वाद व्हायचे.  माझ्या मते उपवास म्हणजे स्वईच्छांवर नियंत्रण ठेवणे व त्या भुकेची जाणीव होणे जे लोक पैशाअभावी कित्येक दिवस उपाशी राहतात. ह्या विचाराने मी रमजान महिन्यातील उपवासाची माहिती इंटरनेटद्वारे गोळा केली व माझे अशांत मन प्रफुल्लित झाले; हे वाचून कि उपवासाची व्याख्या तीच होती जी माझ्या मनात रचलेली होती. त्याशिवाय माझी नजर कुरआनच्या एका आयातवर पडली. ज्यात अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, ”रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा व माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.”(कुरआन ः सुरे अल बकरा, आयत क्र. 185-186)
    हे वाचुन माझे मन खुप आनंदी झाले. ह्या विचाराने की जर मी उपवास केले तर आपणास ईश्‍वर भेटेल. खरच तो कसा असेल या कुतुहलतेने मी मनाशी निश्‍चय केला की मी उपवास करेन. पण त्यासोबत द्विधा मनःस्थिती झाली होती की मी पूर्ण 30 दिवस उपवास करु शकेन की नाही. कारण असंख्य अडचणींचे जाळे समोर उभे होते. जसे सासरचे उपवास करु देतील की नाही?, कॉलेजचे कलीग काय म्हणतील? पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले.  मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही,  मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा!  मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही.  खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह! माझे मन बदलून टाक व मला तुझा मार्ग दाखव.”
    संध्याकाळी उपवास सोडला व मगरिब व ईशाची नमाज लपुन पढली. अशाप्रकारे पहिला रोजा तर पुर्ण झाला पण त्याचबरोबर त्या पहिल्या रोजाने सीमा देशपांडे चा नविन जन्म झाला. दूसरा रोजाला मी अजून धीट झाली व माझे मन, शरीर आत्मा भुकेपेक्षा ईश्‍वराच्या जवळ जाण्याच्या शोधात होते. मला एकीकडे खुप दुःख वाटत होते की मी आत्तापर्यंत किती गुन्हे केले आहेत व त्यासोबत आनंद ही झाला की मी ईश्‍वराला जाणले. मी ईश्‍वराची खुप माफी मागितली व मनाशी ठरविले मी आता ह्या मार्गापासुन मागे हटणार नाही, ज्या सत्याच्या शोधात मी कित्येक दिवसापासून होते. कुरआन ने माझ्या जीवनाला कलाटणी दिली व मला अनुभूती झाली की मी हे तीस दिवस उपवास करणारच. कुरआन मधे ईश्‍वर म्हणतो, ”हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.(कुरआन - सुरे अल्कसस आयत क्र. 56)
    पहिले तीन दिवस सुरळीतपणे गेले मात्र नंतर हळूहळू प्रत्येकाचे डोळे माझ्याकडे संशयरूपी नजरेने पाहत होते. सासूचा चेहरा प्रश्‍न करत होता परंतु विचारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. कारण घरच्यांना हे उपवास अमान्य होते. असेच एकदा सासू व नवर्‍याने मुद्दामहून माझे आवडते पदार्थ खायला घेवुन येवून मला जबरदस्ती ने उपवास तोडायला सांगितले, पण मी  ठामपणे नाकारत होते व मनात ईश्‍वराला विणवनी करत होते, ’हे अल्लाह माझे उपवास तोडू नकोस अणि एकच स्मरण करत होते, ला ईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्रसुलुल्लाह!’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस? मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी! त्यावर ते म्हणाले मुस्लिमांचा ईश्‍वर आपला नाही त्यावर मी हसत म्हणाली त्यांचा आपला सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, जो आपल्याला जन्म देतो व मृत्यु पण. मला माझी आध्यात्मिक प्रेरणा ईतकी मजबूत करत होती की त्यांच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मी सडेतोडपणे देत होती व ते निरुत्तर होत होते. जणूकाही मला वाटत होते की ईश्‍वर मला प्रेमाने हात धरून घेवून जात आहे व म्हणतोय, ’मी तुला निवडलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.’ जसे-जसे मी कुरआन वाचत गेली तसेतसे माझे मन,आशा व बुद्धी आकांक्षा लावून होती ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी.
    संकटे तर येत होती पण अगदी सहजपणे टळतही होती. जणूकाही वार्‍याची थंड झुळुक आली अन् क्षणात निघून गेली. असेच एकदा सुट्टीचा दिवस होता. माझ्या पतीने मुद्दामहून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली व तिकडे सासूने पाहुण्याना जेवायला बोलाविले व पतीने अट्टाहास केला की, मी पूजेला बसावे. माझ्यासाठी हा सर्वात अवघड क्षण होता. माझे ते सुकलेले ओठ पाणी मागत नव्हते तर ते ईश्‍वराला हाक मारत होते व  मनाशी एकच ध्यास घेवून होते, ”हे ईश्‍वरा माझे उपवास तोडू नकोस, मला तुझ्या मार्गापासुन दूर करु नकोस.” पाहणार्‍याला ही परिस्थिती अत्यंत अवघड दिसत होती परंतु माझ्यासाठी ते दुय्यम होते. कारण प्रत्येक जण माझ्या  विरोधात असूनही काहीच प्रहार करत नव्हते. हे पाहून मला असे वाटत होते की ईश्‍वराचे फरिश्ते मला सुरक्षा देत आहेत. उपवासासोबत माझी नमाजची कसरत होत होती. मला प्रत्येक नमाज लपून पढावी लागत होती. असेच एकदा कॉलेजमध्ये जुम्माची नमाज पडायला हातात एक स्कार्फ घेवून लेडिज रुममध्ये गेले. तेव्हा माझ्या एका कलिगने माझा पाठलाग केला व तिने मला नमाज पडताना पाहिले व काही क्षणात तिने पूर्ण कॉलेजमध्ये बातमी पसरवली की सिमा देशपांडे  रोझा करत आहे परिणामतः प्रत्येकजण माझ्याकडे संशयरुपी नजरेने पाहत होते. मात्र मी त्यांच्या नजरेला नजर लावून संभाषण करत होते. म्हणतात ना, जेव्हा ईश्‍वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा कुणीही काहीच करु शकत नाही आणि जेव्हा ईश्‍वर तुम्हाला सोडून देतो तेव्हा कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. माझे हे अनुभव मला ईश्‍वराच्या चमत्काराची जाणीव करुन देत होते, ज्याने माझे ईश्‍वराशी नाते घट्ट होत होते. मला प्रत्येक क्षण मोलाचा वाटत होता, मी काय-काय करावे जेणेकरून मी ईश्‍वराचे मन जिंकू शकेन? एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देणार नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा! नाईलाजाने मी बाथरूम मध्ये नमाज पढली. म्हणतात ना कडक उन्हानंतर गारवा पण येतो अगदी तसेच. ईश्‍वराने पंधराव्या रोजी माझे पूर्ण स्टेज बदलून टाकले. त्या माझ्या पालनकर्त्याने प्रत्येकाचे मन बदलून टाकले जी सासू उपवास तोडण्याचे कट रचत होती तीच माझ्या इफ्तार साठी जेवण बनवून ठेवायची. तिने मला नमाज पढताना पाहिली पण ती अबोल झाली. जणुकाही ईश्‍वराने तिच्या डोळ्यांवर पडदा पाडला होता. तिकडे कॉलेजमध्ये माझे कलिग राग न करता माझ्या कामात मदत करत गेले. खरंच ईश्‍वर कुरआनमध्ये म्हणतो,
”जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला आणि (हे पैगंबर सल्ल.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्‍चात्ताप स्वीकारणारा आहे.” (कुरआन : सुरे अन्नस्र - आयत नं.1-3).
    खरंच कुरान हा एका मित्रासारखा आहे जेवढा वेळ तुम्ही त्याच्यसोबत घालवाल तेवढा तो त्याच्या गुप्तगोष्टींचा उलगडा करतो. असेच पंधरावा रोजा होता. त्यादिवशी कॉलेजमधे एक मावशी स्वतःच्या मुलीची फीस भरण्यासाठी मंगळसूत्र विकायला निघाली होती. त्याच क्षणी मला अनुभूती झाली की ईश्‍वराने कुरआनमधे आज्ञा दिली आहे की, गरूजूंना जकात द्या. मी काहीच विचार न करता तिला 5000/- रुपये काढून दिले. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरच्या आनंदापेक्षा कित्येकपट आनंद माझ्या मनाला झाला. याच भावनेने की मी हे दान ईश्‍वरासाठी केले आहे व हे पाहून माझा अल्लाह माझ्यावर किती खुष झाला असेल. त्याचबरोबर मी अनेक अनाथालयाला दान केले, मोलकरीणी ला नवीन कपडे दिले, गरिबांना जेवण दिले. मी प्रत्येक काम हे ईश्‍वरासाठी करत होते आणि त्यात मला इतके समाधान वाटत होते ज्याची मी भुकेली होती. अखेरीस ईश्‍वराच्या कृपेने मी पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आणि ईदच्या दिवशी अल्लाहला वचन दिले, की, मी मरेपर्यंत मूर्तिपूजा करणार नाही! माझ्यासाठी हा पहिला रमजान एका दुर्मिळ फुलाप्रमाणे वाटला. ज्यात फुल एकदाच उमलते परंतु त्याचा सुगंध पूर्ण वर्षभर दरवळत राहतो. माझी ईश्‍वराकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्याने माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा द्यावी व एक चांगली मोमीना बनण्याची माझ्यात क्षमता प्रदान करावी. आमीन!

- एम.आय.शेख
याद करता है जमाना उन इन्सानों को,
रोक देते हैं जो बढते हुए तुफानों को. 
 
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पूर्वी अरब देशांमध्ये जी समाजव्यवस्था अस्तित्वात होती त्याचे वर्णन प्रसिद्ध इतिहासकार मा.म.देशमुख यांनी खालील शब्दात केलेले आहे. मते आर्यांसारखे होते. आर्यांमध्ये जशी कूळाची व्यवस्था होती, तशीच अरबांमध्ये कबिल्यांची व्यवस्था होती. प्रत्येक कबिल्याची एक कूलदैवता होती. मक्का प्रमुख तीर्थक्षेत्र होते. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या काबाग्रहामध्ये 360 बूत (मूर्त्या) होत्या. त्यांची नियमितपणेे पूजा- अर्चा केली जात होती. मंत्र-तंत्र, जादू-टोण्याचा बाजार फोफावलेला होता. मक्का या शहराची नागरी व्यवस्था बनी हाशम नावाच्या एका कुलीन कुळाकडे होती. या कुळाला अरबांमध्ये अतिशय मानाचे स्थान होते. याच कुळामध्ये त्या महान व्यक्तीचा जन्म झाला. ज्याने पुढे चालून अरबांची सगळी व्यवस्थाच बदलून टाकली आणि इस्लामी लोकतंत्राची स्थापना केली.फ (संदर्भ : मध्ययुगीन भारताचा इतिहास पान क्र. 11).
    ते श्रेष्ठ पुरूष प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. होत. त्यांचा जन्म एप्रिल 570 मध्ये झाला. जन्माच्या काही दिवस अगोदरच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी केले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना प्रेषित्व मिळाले. त्यानंतर ते 23 वर्षे जगले. याच 23 वर्षाच्या अल्पशा काळात त्यांनी जगाचा नकाशा बदलून टाकला. अरब समाजातील सर्व कुरीतींचा नाश केला. अंधश्रद्धा समाप्त केली. गुलामीची पद्धत बंद केली. सर्व माणसं एकाच आई (हजरत हव्वा/ईव्ह अलै.) व एकाच पित्यापासून (हजरत आदम/अॅडम अलै.) जन्माला आलेली आहेत. त्या नात्याने जगातील  सर्व लोक एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. म्हणून माणसा-माणसात फरक करता येत नाहीत, सर्व समान आहेत. प्रेषित सल्ल. यांनी समतेचे हे तत्व जगाला दिले आणि याच तत्वावर मदिन्यामध्ये पहिल्या लोकशाहीची स्थापना केली.
    मदिनामध्ये इस्लामी लोकशाहीची स्थापना
    प्रेषित्व मिळाल्यानंतर मदिनामध्ये 10 वर्षे काम केल्यानंतर प्रेषित (सल्ल.) यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या विचारांचा स्विकार करणारे लोक मक्कापेक्षा मदिन्यामध्ये जास्त आहेत. तेव्हा त्यांनी मदिन्याला हिजरत (स्थलांतर) केली व तेथे अन्य समाज घटकांना सोबत घेऊन लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. मदिन्यामध्ये तेव्हा ख्रिश्चन आणि यहूदी अल्पसंख्यांक होते. त्यांच्या बरोबर एक कॉमन मिनीमम प्रोग्राम (किमान सामाईक कार्यक्रम) ठरवून प्रेषितांनी त्यांच्याबरोबर एक करार केला. त्याला इतिहासामध्ये प्रसिद्ध ’मदिना करार’ म्हणतात. यात बहुसंख्य मुस्लिमांच्या सोबत अल्पसंख्यांक ख्रिश्चन आणि यहूदी सुख-समाधानाने राहत होते. त्यांच्या अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत: प्रेषित सल्ल. यांनी घेतली होती. या अल्पसंख्यांकाना जिम्मी (शासनाच्या जिम्मेदारित असलेला समूह) म्हंटले जाते असे. अल्पसंख्यांक असल्यामुळे हे लोक स्वत:ची रक्षा स्वत: करण्यास असमर्थ होते. म्हणून ही सरकारची जबाबदारी होती की सरकारने स्वत: त्यांची रक्षा करावी. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अल्पसा कर घेऊन सरकारवर टाकली होती. त्या कराला झिजीया कर म्हणत होते. ज्याचे वर्णन अनेक इतिहासकारांनी जाणून बुजून विकृत स्वरूपात केलेले आहे. मूळात हे सुरक्षेच्या मोबदल्यात दिले जाणारे शुल्क होते. या कराराप्रमाणे अंतर्गत आणि बाहेरील आक्रमणापासून ख्रिश्चन आणि ज्यू लोकांची रक्षा करण्याची जबाबदारी सरकारची होती. झिजीया कराच्या मोबदल्यात अल्पसंख्यांकांना लष्करामध्ये भरती होण्यास भाग पाडता येत नव्हते. शिवाय, त्यांना सदका, फित्रा, जकात सारखे मुस्लिमांवर अनिवार्य केलेले कर देण्यासही भाग पाडता येत नव्हते.
    प्रेषित सल्ल. नंतर ज्या चार व्यक्तींनी मदिना सरकारची सत्ता चालविली त्यांना इस्लामचे चार पवित्र खलीफा असे म्हणतात. खलीफा म्हणजे नायब (डेप्युटी). मूळात इस्लामची संकल्पना ही आहे की, जमीन अल्लाहची व खल्क (जनता) ही अल्लाहची आणि हुकूमसुद्धा अल्लाहचाच. खलीफा फक्त अल्लाहच्या हुकूमाची अंमलबजावणी करणारी व्यक्ती असते. त्यांचा दर्जा ट्रस्टी (विश्वस्था) सारखा असतो. पहिले खलीफा ह.अबुबकर सिद्दीक रजि., द्वितीय खलीफा हजरत उमर रजि., तृतीय खलीफा हजरत उस्मान रजि. व चौथे खलीफा हजरत अली रजि. होते. यानंतर मात्र इस्लाममध्ये मुलूकीयत (राजेशाही) चा उदय झाला. हजरत अमीर मुआविया रजि. हे स्वत:ला जरी खलीफा म्हणवून घेत होते, तरी त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि राहणीमान राजेशाही होते. त्यांच्या नंतरसुद्धा त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून, अनेकांनी राज्य केले व स्वत:ला खलीफा म्हणवून घेतले. त्यांना उमई वंशाचे खलीफा म्हंटले जात होते. त्यानंतर बगदादमध्ये अब्बासी वंशाच्या राजांनी खिलाफत स्थापन केली. या खिलाफतीची शेवटची कडी तुर्कस्थानात 1924 साली खालसा करण्यात आली. त्या खिलाफतीला उस्मानी (ऑटोमन) खिलाफत म्हंटले जात होते.
तुर्की खिलाफतीचा संक्षिप्त इतिहास
    तुर्की खिलाफतीची स्थापना 1299 मध्ये सुलतान बिन तुर्गलने केली होती. 1924 मध्ये जेव्हा या खिलाफतीचा अंत झाला तेव्हा अब्दुल हमीद (द्वितीय) खलीफा होते. मुस्तफा कमाल पाशा आणि अन्वर नावाच्या व्यक्तींनी मिळून या खिलाफतीचा अंत केला. तुर्कस्तानची तीन टक्के भूमी युरोपात असून, बाकी आशियाखंडात आहे. यामुळे युरोपीयन संस्कृतीचा या देशाच्या समाजमनावर पूर्वीपासूनच प्रभाव होता. मुस्तफा कमालपाशाला युरोपीयन संस्कृतीचे आकर्षण होते. त्याला खिलाफत ही प्रतिगामी व्यवस्था वाटत होती. म्हणून त्याने शेकडो उलेमांची निघृण हत्या करून तुर्कस्थानमध्ये युरोपीयन लोकशाहीची स्थापना करून स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. राष्ट्रपती झाल्याबरोबर सर्वात अगोदर त्याने युरोपीयन पद्धतीचे संविधान तयार केले आणि आपल्या साथीदारांकडून ते मंजूर करून घेतले. या संविधानात इस्लामी परंपरांवर प्रतिबंध लावण्यात आला. कमालपाशाच्या या कृत्यामुळे सगळ्या युरोपीयन समाजाला हर्षवायू झाला. त्यांनी कमालपाशाची भरपूर मदत केली. कमालपाशाने युरोपच्या साह्याने एक मजबूत लष्कर उभे केले आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी लष्करावर टाकली. एरव्ही ही जबाबदारी कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे असते. येणेप्रमाणे तुर्कस्तान एक आधुनिक देश बनला. 90 टक्के मुस्लिम जनता असलेल्या या देशात हळूहळू युरोपीयन संस्कृतीचा प्रादुर्भाव इतका वाढला की दारूवरील प्रतिबंध उठले. जुगाराचे क्लब सुरू झाले. नव्याने सिनेमागृहांची निर्मिती झाली. वेश्याव्यवसायाला मान्यता देण्यात आली. व्याजाधारित बँकांना लायसेन्स दिले गेले. त्यामुळे सगळ्या युरोपीयन बँकांनी तुर्कस्थानामध्ये आपल्या शाखा उघडल्या. पुरूषांवर कोर्ट, पँट, टाय घालण्याचे तर महिलांना स्कर्ट घालण्याचे फर्मान निघाले. दाढीवर प्रतिबंध लावण्यात आले. ते एवढे कडक होते की, मस्जिदीमध्ये इमाम दाढीचा विग लावून इमामत करत होते व नमाज संपल्याबरोबर विग खुंटीला टांगून मस्जिदीच्या बाहेर पडत होते. युरोपीयन सभ्यतेचे दुष्परिणाम लवकरच लोकांच्या लक्षात आले. लोक बँकांच्या अजगरी आकाराच्या व्याजाच्या विळख्यात अडकून पडले व अल्पावधीतच सगळा देश कर्जबाजारी झाला. अनेक लोक व्यसनाधिन झाले. देशाचा गुन्हेगारी निर्देशांक वाढला. लोक एकमेकांना फसवू लागले. अश्लिलता आणि व्याभिचार वाढला, सेना आणि सरकारमध्ये भ्रष्टाचार फोफावला, म्हणजेच युरोपीयन लोकशाहीमध्ये जे कांही दुर्गून होते त्या सर्वांची लागण तुर्कस्तानात झाली.
    काही मुठभर सद्प्रवृत्तीच्या मुस्लिमांना हे आवडले नाही. त्यांनी रेस्टोरेशन ऑफ इस्लामीक प्रिन्सीपल्स अर्थात इस्लामी सभ्यतेच्या पुनरूज्जीवन करण्याचे काम हाती घेतले. त्यात त्यांना प्रचंड विरोध झाला. मात्र वाईट प्रवृत्तीला कंटाळलेल्या लोकांच्यामध्ये हे आंदोलन आतल्याआत रूजत गेले. या लोकांनी एकत्र येवून फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीची स्थापना केली. हा पक्ष सत्तेतही आला. मात्र लष्काराने या पक्षाच्या सरकारी धोरणांना विरोध केला. सरकारचे धोरण इस्लामी तत्वांच्या अनुकूल होते. जनतेनी लष्कराच्या नाराजीची परवानगी न करता इस्लामी तत्वांची पाठराखण सुरू ठेवली. पुरूषांनी दाढी ठेवायला तर महिलांनी हिजाब वापरायला सुरूवात केली. सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर लादण्यात आलेले प्रतिबंध महिलांनी झुगारून दिले. ज्या विद्यापीठांमध्ये दाढी आणि हिजाबला प्रतिबंधित करण्यात आला होता तेथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठांचा बहिष्कार केला. विद्यापीठे ओस पडू लागली. तेंव्हा नाईलाजाने विद्यापीठ प्रशासनाला दाढी आणि हिजाबला परवानगी द्यावी लागली. दरम्यान फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आले. रज्जब तय्यब उर्दगान यांनी पक्षाचा विश्वास जिंकला तसेच एकापाठोपाठ तीन निवडणुका जिंकल्या. मात्र 2012 आणि 2016 मध्ये लष्करी उठाव करून त्यांचे शासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जनेतेनी तो हाणून पाडला आणि उर्दगान यांची प्रशासनावरील पकड अधिक मजबूत झाली. उर्दगान यांनी देशात दारूबंदी लागू केली. कमालपाशाने 1924 साली ज्या चक्राची सुरूवात केली होती, ते चक्र आजमितीला पूर्णपणे फिरवून टाकण्याची किमया उर्दगान यांनी करून दाखविली.
    मात्र उर्दगान यांची सत्ता म्हणजे शुद्ध खिलाफत नव्हे. शुद्ध खिलाफतीची व्यवस्था जगात कुठेच अस्तित्वात नाही. केवळ खिलाफतीचा परिचय आणि थोडक्यात त्याचा इतिहास सांगून या दुर्लक्षित विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधावे एवढाच उद्देश ठेवून हा लेख मी वाचकांच्या सेवेत सादर केला आहे.

- बशीर शेख
9923715373

रमजान दु:ख हरण करणारा (गमगुसारी) महिना आहे. या महिन्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आणि जगाला एक अशा जीवन व्यवस्थेची ईश्वरीय देणगी मिळाली की त्यानुसार चालणारा प्रत्येक व्यक्ती आनंदात राहू शकतो. त्याचे सर्व दु:ख हरण होऊन जातात. कुरआनचे आदेश सर्वांसाठी आहेत. त्यामुळे ते कोण्या एका जाती आणि समुहापुरते मर्यादित नाहीत. रमजानमध्ये कुरआन अवतरित झाल्यामुळे या महिन्याला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात, हज या पाच  इस्लामच्या मुलभूत तत्वांपैकी रोजा एक आहे.  रोजाचा मूळ उद्देश चारित्र्यनिर्मिती हा आहे. अल्लाहचे भय मनात वाढावे यासाठी रोजा ठेवला जातो. कारण अल्लाहचे भय असल्याखेरीज चांगले चरित्र असलेली माणसे निर्माणच होऊ शकत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे.
    या महिन्यात नमाज, रोजा, जकात, सदका, फित्रा व ऐच्छिक दान याला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे ऐपतदारच नव्हे साधारण आर्थिक स्थिती असलेले मुस्लिम सुद्धा या महिन्यात दानशूर बनतात. ते आपल्या मेहनतीच्या हलाल कमाईचे शुद्धीकरण करून घेतात. या महिन्यात मोठ्या प्रमाणात जकात अदा केली जाते आणि जकात दिल्याने देणार्याच्या संपत्तीचे शुध्दीकरण तर होतेच उलट त्यात वृद्धीसुद्धा होते. रमजानमध्ये केल्या जाणार्या जकात, सदका, फित्रा, खैरात इत्यादी मार्गाने केलेल्या अर्थत्यागातून प्रत्येकाला आत्मीक आनंद मिळतो. घेणार्याचीही आर्थिक चणचण दूर होते  आणि त्याला जीवन जगणे काही प्रमाणात सुसह्य होते.  यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावा करण्यासही बंद घातलेली असल्यामुळे प्रत्येक देणारा व्यक्ती हा काळजी घेतो की त्याची प्रसिद्धी होणार नाही. आणि ज्याला आपण दान देत आहोत त्यालाही अपमानित झाल्यासारखे वाटणार नाही.   दान देणार्या व्यक्तीबाबत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले की, जो कोणी या महिन्यात एक रूपयाही कुण्या गरजवंतांना दान करील त्याला त्याचा 70 पट मोबदला अल्लाह देईल. जकात काढणे अनिवार्य असल्यामुळे ती योग्य लोकांत देण्याची जबाबदारीही त्याच व्यक्तीवर आहे.
    सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    सदका (दान) : सदका देणे ऐच्छिक आहे. सदका देताना सांगितले आहे की, तो कुठलाही गाजावाजा न करता फार नम्रतेने द्यावा. ’सदका तुम्हारी जान व माल की हिफाजत करता है, अल्लाह गजब को ठंडा करता है’ असेही हदीसमध्ये नमूद आहे. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’आणि ज्यांची स्थिती अशी आहे की जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकांप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्याकडे परतावयाचे आहे’ (कुरआन : अलमोमिनून- 60).
    खैरात (दान) : फकीर/भिकार्याला स्वेच्छेन दान देणे म्हणजे खैरात. याबद्दल असे म्हटलेले आहे की, फकीर आणि गरजवंतांसोबत नरमाईचा व्यवहार करा. त्यांच्याशी तुसडेपणाने वागू नका, त्यांना रूबाब दाखवू नका आणि आपले श्रेष्ठत्व त्यांच्यासमोर जाहीर करू नका. मागणार्याला देण्यासाठी तुमच्याकडे काही नसले आणि तो मागतच असेल तरी तुम्ही त्याला नरमाईने सांगा त्याची नम्रपणे क्षमा मागा, त्यामुळे त्याला काही दिले नाही तरी तो शांतपणे तुम्हाला दुआ देत जाईल. अल्लाहचा आदेश आहे, ” आणि मागणार्याला झिडकारू नका’. खैरात करणे पुण्याचे काम आहे.
    फित्रा : फित्रा देणे अनिवार्य केले गेले आहे. प्रत्येक श्रीमंत व्यक्तीवर त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावणे दोन किलो गहू किंवा तत्सम रक्कम गरजवंतांना दिली गेली पाहिजे. ईदच्या नमाज अगोदर त्यांना फित्रा देणे बंधनकारक केले गेले आहे. म्हणजे महिनाभर दान, पुण्य तर कराच करा उलट ईदचा आनंद साजरा करतानासुद्धा गरीबांकडे अगोदर लक्ष द्या, अशी नितांत सुंदर शिकवण इस्लामणे आपल्या अनुयायांना दिलेली आहे.
    एकंदर या रमजानच्या महिन्यात गरीबांना दिलासा तर देणार्याला अत्युच्च आत्मिक आनंद मिळतोच मिळतो, शिवाय त्याला याचा ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही फायदा मिळतो. याबद्दल अल्लाहने मोबदला देण्याचा वादाही कुरआनमध्ये केला आहे.

- सीमा देशपांडे
7798981535

कुरआनच्या प्रकटीकरणाचा उद्देश सर्व मानवजातीला अल्लाहच्या मार्गावर येण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे. कारण कुरआनमध्ये, मागील सर्व संदेश परिपूर्ण झालेले आहेत. कुरआनमध्ये अगदी प्रेषित आदम अलै. (पहिले मानव) यांच्या काळापासून मानवजातीस अल्लाहकडून मिळालेले संदेश समाविष्ट आहेत आणि ते स्वर्गीय संविधान पुनरुत्थान दिवसा पर्यंत पूर्णपणे अवतरण करण्यात आलेले आहेत. शिवाय, कुराण आकाश, पृथ्वी आणि मानवाच्या निर्मितीच्या घटनांचे वर्णन करतो आणि त्यासोबत प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या आधी आलेले दूत आणि प्रेषितांचे समर्थन करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुराण स्पष्ट करतो की ईश्वरीय संदेशांमध्ये पुर्वीच्या लोकांनी काय लुड्बुड केलेली होती आणी काय लपवून ठेवले होते व त्यातून काय-काय काढून टाकले होते व त्याचा दोष त्या लोकांनी ईश्वरावर  आणि प्रेषितांवर कसे मढलेले होते, म्हणून कुरआनने पूर्वीच्या (ग्रंथात)  ईशसंदेशांमध्ये मनुष्याने जे बदल किंवा विकृत केले होते त्यांना सुधारित केले. कुराणात ईश्वर म्हणतो, ’हे मुहम्मद (सल्ल.) सांगा की, ”हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो व तोच मृत्यू देतो, म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (सल्ल.) वर, जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळमार्ग प्राप्त कराल.”  (  कुरआन 7:158)
    अलिफ, लाऽऽम, रा. ही वचने आहेत ईश्वरी ग्रंथाची व स्पष्ट कुरआनची. (कुरआन 15:1)
    ’दुरापास्तच नाही, जेव्हा ते लोक ज्यांनी आज (इस्लामचा आवाहन स्विकारण्यास) इन्कार केला आहे, पश्चात्ताप करून सांगतील की, आम्ही इस्लामचा स्वीकार केला असता तर बरे झाले असते!  ( कुरआन 15:2).
    ’सोडा यांना, खाऊ-पिऊ द्या, मौज-मजा करू द्या आणि खोट्या आशेच्या संभ्रमात राहू द्या, लवकरच यांना कळून चुकेल.  (कुरआन 15:3)
    खरे मार्गदर्शन केवळ ईश्वराकडून आहे. तथापि, हे केवळ अर्धे समीकरण आहे. इतर अर्धे समीकरण स्वतः मनुष्यावर अवलंबून  आहे. मग प्रश्न पडतो हे ईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण असणे आवश्यक आहे?
    या प्रश्नाचे उत्तर मिळण्याआधी अगोदर आपण ईश्वराच्या मार्गदर्शनाचे परीक्षण करु. विशेषतः, आपण ईश्वराचे ‘सामान्य मार्गदर्शन’ आणि त्याचे ‘विशेष मार्गदर्शन’ यातील फरक ठळकपणे पहायला हवा. चला तर त्यांना एक-एक करुन पाहूया .
    सर्वप्रथम, ईश्वराने मनुष्याला आपल्या मार्गाकडे येण्यासाठी त्याचा धार्मिक विश्वास आणि कृती यांचा विचार न करता, त्याच्या संपूर्ण सृष्टीला मार्गदर्शित केले आहे व त्यासाठी  ईश्वराने प्रत्येक मानवाच्या फायद्यासाठी प्रेषीत (धर्मोपदेशक) आणी दैविक ग्रंथ पाठविले आहे. हे मार्गदर्शन ‘सामान्य मार्गदर्शन’ म्हणून ओळखले जाते. हे मार्गदर्शन प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, पण  त्याचे  अनुसरण करणे किंवा न करणे हे निवडण्याचे स्वातंत्र्य ईश्वराने पूर्णतः मनुष्याला दिले आहे. हे अजुन स्पष्ट होण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया.
जसे एका आईला दोन मुले असतात ,ती दोघांवर सारखे प्रेम करते व त्या दोघांच्या भविष्यासाठी योजना ही आखते. जसेजसे त्या मुलांना समज येते तसेतसे आई त्यांना चांगले जीवन व्यतीत करण्यासाठी नियमावली सांगत जाते जेणेकरून ते त्यांचे भविष्य साध्य करतील. पण त्यामधील एक मुलगा आईच्या नियमांचे पालन व अनुसरण अगदी जोमाने करतो. त्याचबरोबर दुसरा मुलगा आईच्या नियमाचे उल्लंघन करतो कारण त्याला आईपेक्षा ऐहिक सोबत्यांचे जीवन जास्त आकर्षक वाटते व त्यांचेच नियम बरोबर वाटू लागतात. अशावेळी  जरी आई दोघांवर सारखे प्रेम करत असली तरी जो तिच्या नियमाचे अनुसरण करतो त्या मुलाकडे विशेष लक्ष देते जेणेकरून तो त्याचे भविष्य साध्य करेल. व दुसऱा मुलगा जो तिच्या नियमाचे अनुसरण करत नाही तरी त्याला नियमाचे पालन करण्यास वारंवार सांगते पण तेव्हाही तो नाकारत असल्यास आई त्याला त्याच्या निर्णयावर सोडून देते. अशाप्रकारे आई दोन्ही मुलांना सारखेच मार्गदर्शन ( हे झाले सामान्य मार्गदर्शन) करते पण जो तिच्या नियमांचे अनुसरण करेल त्याच्याकडे अजून विशेष लक्ष देते (हे झाले विशेष मार्गदर्शन) व दुसर्याला त्याच्या निर्णयावर सोडून देते.
    मग प्रश्न पडतो आई ही मनुष्य आहे तिचे नियम चुकीचे असू शकतात पण तिला व आपण सर्वांना निर्माण करणार्याचे नियम कसे चुकु शकतात?  तोच तर आहे ज्याने तुम्हाला माती पासून निर्माण केले मग तुम्हाला कान,डोळे, र्हृदय दिले जेणेकरून तुम्ही त्याच्या नियमांचे पालन करुन सात्विक जीवन जगावे व स्वतः चे भविष्य (स्वर्ग) साध्य करावे. म्हणून सर्वसमर्थ अल्लाह  म्हणतो,
जर मनुष्याने  अल्लाह वर विश्वास (एकेश्वरत्व) आणि  सामान्य मार्गदर्शन (कुरआन) नाकारण्याचे निवडल्यास, तो त्याला भ्रामक होण्यास प्रवृत्त करेल. परंतु दुसरीकडे, जर त्याने एका ईश्वराला स्वीकारून कुरआनचे पालन करणे पसंत केले तर अल्लाह त्याला विपुल प्रमाणात मदत करेल व संरक्षण देईल. याला ईश्वराचे ‘विशेष मार्गदर्शन’ म्हणून ओळखले जाते कारण पुढे स्पष्ट म्हटलेले आहे-
    ’उरले ते लोक ज्यांना मार्गदर्शन प्राप्त झाले आहे, अल्लाह त्यांना आणखी जास्त मार्गदर्शन देतो आणि त्यांना त्यांच्या हिश्याची  ईशपारायणता प्रदान करतो. (पापा पासुन संरक्षण व सात्विक जीवन) ( कुरआन 47:17)
    इथे काही लोकांना गैरसमज आहे कि जे लोक अल्लाह वर विश्वास ठेवतात पण कुरआनच्या नियमाचे पालन स्वतःच्या सोयीनुसार केले तरी त्यांना अल्लाहचे विशेष मार्गदर्शन प्राप्त होईल. कदापि नाही! मोठया संभ्रमात आहेत हे लोक.
अशाप्रकारे ईश्वराचे विशेष मार्गदर्शन फक्त त्याच्या वरचा विश्वास व त्याच्या मार्गाचे अनुसरण करणार्यांसाठी आहे. आपण पुढील दोन अध्यायामध्ये ईश्वराचे सामान्य आणि विशेष मार्गदर्शन या दरम्यानचा फरक पाहू शकता. ईश्वर आपल्या प्रेषिताला  संबोधित करून म्हणतो, ’हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.’  (कुरआन - 28:56)
    म्हणून  सर्वात महत्त्वाचा मुद्दा  लक्षात ठेवणे गरजेचे आहे की : ईश्वर  संपूर्ण मानवतेला त्यांचे सामान्य मार्गदर्शन प्रदान करतो पण त्याद्वारे अल्लाहच्या नियमांचे पालन करणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि मग त्यानुसार त्याचे विशेष मार्गदर्शन प्राप्त करणे  हे पुर्णतः आपल्यावर(मनुष्यावर) अवलंबून आहे.
    यावरून  आपण स्वतःला असेही  विचारू शकता की, मी काय करु शकतो? किंवा माझ्यात कोणकोणते गुण असायला हवेत? जेणेकरून मी त्या लोकांमधे असेल, ज्यांना अल्लाह विशेष मार्गदर्शन देतो आणि समर्थन करतो. चला तर या गुणांचे स्पष्टीकरण पाहूया पुढच्या लेखात..

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या मुलाबाळांवर खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे  जो मनुष्य अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा) करण्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या सहकाऱ्यांवर खर्च  करतो, त्या सहकाऱ्यांवर जे अल्लाहच्या मार्गात ‘जिहाद’ करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि विचारले, ‘‘कोणते दान (सदका) कृपा व पुण्याच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट  आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ते दान (सदका) सर्वोत्तम आहे जे तू त्या काळात द्यावे जेव्हा तू योग्य व सुदृढ असशील आणि तुला गरजूपणाचीही भीती आहे आणि अशी आशाही आहे की तुला आणखीन धन मिळू शकते अशा काळात ‘सदका’ (दान) करणे अतिशय उत्तम आहे आणि तू असे करू नये की जेव्हा तुझे प्राण कंठात यावेत आणि मरू लागशील तेव्हा तू दान कर आणि असे म्हण की इतके अमक्याचे आहे, आता तुझ्या म्हणण्याचा काय उपयोग? आता ते अमक्याचे झालेलेच आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहकडून दोन देवदूत (फरिश्ते) उतरत नाहीत असा कधी दिवस उगवत नाही. त्यांच्यापैकी  एक खर्च करणाऱ्या भक्तासाठी प्रार्थना (दुआ) करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! तू खर्च करणाऱ्याला उत्तम बदला दे आणि दुसरा देवदूत संकुचित वृत्तीच्या कंजूष लोकांसाठी  शापाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की हे अल्लाह! कंजूषी करणाऱ्यांना नष्ट व उद्ध्वस्त कर.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे आदमपुत्रा! जर तू आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक धन अल्लाहच्या गरजवंत भक्तांवर  आणि ‘दीन’च्या कार्यावर खर्च केले तर ते तुझ्यासाठी उत्तम असेल आणि जर तू आवश्यकतेपेक्षा अधिक धन गरजवंतावर खर्च केले नाही तर सरतेशेवटी ते तुझ्यासाठी वाईट असेल  आणि जर तुझ्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक धन नसेल म्हणजे तितकेच धन आहे ज्यातून तू आपल्या गरजा भागवू शकतोस, तेव्हा जर तू त्यातून खर्च केला नाही तर खर्च न  केल्याने अल्लाह तुझी निर्भत्सना करणार नाही. आपला सदका (दान) त्या लोकांपासून सुरू करा ज्यांचे तुम्ही संगोपन करता.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘तू माझ्या गरजवंत भक्तांवर आणि ‘दीन’चे कार्य पार पाडण्यासाठी खर्च  करशील तर मी तुझ्यावर खर्च करीन.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘तुझ्यावर खर्च करीन’चा अर्थ आहे की मनुष्य जे काही आपल्या मिळकतीतून अल्लाहच्या गरजवंत भक्तांच्या आवश्यकता आणि ‘दीन’च्या कार्यात खर्च करतो तेव्हा  त्याचा पैसा वाया जाणार नाही तर तो त्याचा बदला परलोकातदेखील प्राप्त करील आणि या जगातदेखील. जगात त्याच्या संपत्तीत समृद्धी येईल आणि परलोकात त्याला इतके मिळेल  की त्याची कल्पनासुद्धा करता येत नाही. माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो असता ते सावलीत बसले होते. जेव्हा त्यांची दृष्टी माझ्यावर पडली तेव्हा ते म्हणाले, ‘‘ते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले.’’ मी म्हणालो, ‘‘माझे माता-पिता तुम्हांवर कुर्बान, कोणते लोक नष्ट व उद्ध्वस्त झाले?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘ते नष्ट व उद्ध्वस्त झाले जे श्रीमंत असतानाही खर्च करीत नाहीत. आपली धनसंपत्ती खर्च करील, समोरच्यांना देईल, मागच्यांना देईल आणि उजवीकडे असलेल्यांना देईल तोच सफल होईल आणि अशाप्रकारचे श्रीमंत खर्च करणारे फारच कमी आहेत.’’  (हदीस : बुखारी, मुस्लिम)

- अबरार मोहसीन 
शहराध्यक्ष जेआयएच लातूर. 
9890946103
 
मागच्या रमजानमध्ये असे कितीतरी लोक होते जे आपल्यासोबत रमजानच्या पवित्र गतिविधींमध्ये हिरहिरीने भाग घेत होते, पण आज ते नाहीत. पुढच्या रमजानमध्ये होणाऱ्या गतिविधींमध्ये भाग घेण्यासाठी आपल्यापैकी किती लोक जीवंत राहतील याचा अंदाज कोणीच करू शकत नाहीत. म्हणून ज्यांना रमजान मिळालेला आहे, ते नशीबवान आहेत. रमजानमधील सर्व गतिविधींमध्ये मुस्लिमांनी अतिशय आनंदाने सहभाग घ्यायला हवा. त्याच गतिविधींपैकी एक महत्त्वाची गतिविधी म्हणजे जकातचे संकलन आणि वितरण होय.
    इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी जकात एक स्तंभ आहे. यात अल्लाहने प्रेषितांना जकात वसूल करून लोकांमध्ये वितरित करण्याचा आदेश दिलेला आहे. याचे दोन फायदे कुरआनमध्ये सांगितलेले आहेत. एक तर जकात देणाऱ्याची संपत्ती पाक (पवित्र) होते व त्या संपत्तीमध्ये वाढ होते. तर दूसरा फायदा असा की, गरीबांची मदत होते. जकात दिल्याने संपत्तीमध्ये वाढ होते. हे सकृतदर्शनी खरे वाटत नसले तरी प्रत्यक्षात वाढ होते, हा प्रत्येक जकात देणाऱ्या व्यक्तीचा अनुभव आहे.
    जकात ही एक सामुहिक इबादत आहे. इस्लामी शासन असलेल्या देशात जकात संकलित करणे व वितरित करणे यासाठी एक मंत्री व त्याचा खास विभाग असतो. ज्या ठिकाणी इस्लामी शासन नाही अशा ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सगळ्यांची जकात एकत्रित जमा करून मग त्याचे न्याय वितरण करण्याची व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी स्थानिक मुस्लिमांवर आहे. जमाअते इस्लामी हिंद या दृष्टीने आपल्या स्थापनेपासून हे काम करत आहे. आजकाल वैयक्तिक जकात अदा करण्याची सवय लोकांना लागलेली आहे. ती चुकीची आहे. जरी या पद्धतीने जकात अदा होवून जाते तरी पण अशामुळे जकात घेणाऱ्या व्यक्तिचा आत्मसन्मान दुखावतो. तसेच जकात देणाऱ्यांमध्ये अहंमभाव निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून जकात कधीही एकत्रित जमा करून अदा करावी, हेच उचित.
    तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि खर्च करून टाकले. तर कुठलीही जकात तुम्हाला द्येय नाही. जकात त्याच बचतीवर द्येय आहे, जी ती वर्षभर तुमच्या ताब्यात होती. साधारणपणे रमजान ते रमजान एका वर्षाचा काळ जकात अदा करण्यासाठी सर्वमान्य समजला जातो, असे अनेक लोक आहेत जे जकातची रक्कम काढण्यात दिरंगाई करतात व रमजानच्या शेवटच्या आठवड्यात अदा करतात. त्यामुळे घाई होते आणि वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही. या घाई गडबडीमध्ये अनेक मुस्तहिक (पात्र) व्यक्ती जकात प्राप्त करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. म्हणून रमजानच्या पहिल्याच आठवड्यात जकात काढून ती संकलित केली गेली पाहिजे. जेणेकरून तिच्या वितरणामध्ये बराच कालावधी मिळू शकतो.
    जकात प्रत्येक ’साहेबे माल’ म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन तोळे चांदी किंवा त्यापैकी एका समकक्ष मुल्याची संपत्ती पदरी असेल, आणि त्यावर एक वर्ष संपलेला असेल, मग तो स्त्री असेल किंवा पुरूष दोघांनाही अडीच टक्के जकात अदा करणे बंधनकारक आहे. सुरे तौबा आयत नं. 34 आणि 35 मध्ये अल्लाहने चेतावनी दिलेली आहे की, जे सोने आणि चांदी जमा करतील आणि त्यावर जकात अदा करणार नाहीत त्यांना मरणोपरांत त्याच धातूला तापवून डाग देण्यात येईल व त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल की, हाच माल तुम्ही जमा केला होता व यावर जकात अदा केली नव्हती. तर आता याच मालाचा स्वाद चाखा. जकात संपत्तीद्वारे केली जाणारी अनिवार्य अशी सुंदर इबादत आहे.
    निसाब प्रमाणे संपत्तीचे मुल्य नसेल तर जकात अनिवार्य नाही. तसेच संपत्तीचा मालक आहे परंतु, ती ताब्यात नसेल व येण्याची शक्यता पक्की नसेल तरी जकात देणे आवश्यक नाही. जकात देणारी व्यक्ती कर्जमुक्त हवी. कर्ज डोक्यावर ठेऊन जकात देता येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीकडे नगदी, दागिने व विक्री करावयाच्या दृष्टीने ठेवलेला प्लॉट या सगळ्यांची बचत अंदाजे 5 लाख होते. मात्र त्याच्या डोक्यावर दोन लाख कर्ज आहे. तर अगोदर ती कर्जाची रक्कम वजा केली जाईल व तीन लाखावर त्याला जकात अदा करावी लागेल. समाजाचे साधारणत: तीन भाग असतात. एक श्रीमंत, दूसरा मध्यमवर्गीय आणि तिसरा गरीब. पहिल्या भागातील व्यक्तींना जकात देणे भाग आहे. दूसऱ्या भागातील व्यक्तींना जकात देणे जरी भाग नसेल तरी त्यांना घेता पण येत नाही. कारण त्यांची सांपत्तीक स्थिती हलाकीची नसते, अशा लोकांना ’सफेद पोश’ असे म्हणतात. तिसरा गट दरिद्री लोकांचा आहे. ज्यांना जकात देण्याची गरज नाही उलट त्यांना जकात घेण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती मेली असेल आणि ती साहेबे निसाब असेल आणि त्याच्या संपत्तीवर एक वर्ष पूर्ण झालेला असेल तर अगोदर त्या संपत्तीची जकात वेगळी काढली जाईल आणि उरलेल्या संपत्तीमधून शरियतप्रमाणे वाटा वारसांमध्ये वाटला जाईल.
    शेअर, इपीएफ, पीपीएफ व इतर प्रकाराची संपत्ती आणि व्यापाऱ्यांनाही त्यांच्या ताब्यात असलेल्या मालाची जकात अदा करावी लागते. तसेच शेती मालावरही जकात द्यावी लागते, त्याला उश्र म्हणतात. या सर्वांचे वेगवेगळे नियम आहेत. ज्यांना तपशील हवा असेल त्यांनी जकात संबंधी आयातींचा अभ्यास करावा. एवढे मात्र नक्की की, एकेका रूपयाचा हिशेब करून जकात अदा करणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास मृत्यूपरांत त्याचे परिणाम भोगण्यास संपत्ती धारक मुस्लिमांनी तयार रहावे. जकात फक्त मुस्लिम व्यक्तिंवर लागू होते.
जकात कोणाला देते येते?
     सुरे तौबाच्या आयत नं. 60 मध्ये 8 व्यक्ती किंवा व्यक्तीसमुह असे नमूद केलेले आहेत ज्यांना जकात दिली जावू शकते. 1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई)म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. माना सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात गुलाम व निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्गासाठी म्हणजे इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी सुद्धा जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी . वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    जकात जवळच्या नातेवाईकांना अर्थात आई-वडिल, आजी-आजोबा, भाऊ-बहिण, पती-पत्नी अशांना देता येत नाही. तसेच हाश्मी म्हणजे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या वंशातील व्यक्तींना ही देता येत नाही. हाश्मी वंशाचे लोक एकमेकांनाही जकात देऊ शकत नाहीत.
    इस्लामी अर्थव्यवस्थेचा मूळ उद्देश चलन हे प्रवाही राहील हा आहे. त्यासाठी जकातीचा फार्म्युला अवलंबिल्यास चलन हे मोठ्या प्रमाणात श्रीमंतांकडून गरिबांकडे नियमितपणे वळते केले जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक विषमता कमी होते व सामाजिक सौहार्द प्रस्थापित होतो, अन्यथा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये श्रीमंतांच्या बाबतीत गरीबांच्या मनामध्ये कायम एक अढी पडलेली असते. त्यामुळे गरीब हे नेहमी श्रीमंताचा दुस्वास करत असतात. त्यातून संधी मिळेल तेव्हा गरीब लोक श्रीमंतांच्या विरूद्ध हिंसक उठावही करतात. एकूणच सामाजिक सौहार्दतेला बाधा पोहोचते. भारतीय परीपेक्षामध्ये प्रत्येक शहरामध्ये सामुहिकरित्या जकातचे संकलन करून वितरण केल्यास समाजाचे अनेक आर्थिक प्रश्न यशस्वीपणे सुटू शकतात.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget