Latest Post

- शकील शेख
येवला


रमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद स.अ. यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो.
    इस्लामिक महीने चान्द्रिक काल गणनेवर आधारित असल्याने अन्य महिन्यांच्या सुरुवातीप्रमाणेच या महिन्याची सुरूवात देखील चंद्र दर्शनाने होते. चंद्र दर्शन ज्या दिवशी होते याचा अर्थ रमजान महिना सुरू झाल्याचे द्योतक आहे, म्हणूनच त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन मुस्लिम बांधव रोजा (उपवास) करतात. या दिवसापासून जन्नत चे दार उघडले जातात व जहन्नम (नरक) चे दार बंद केले जाते. आणि त्यानंतर सुचना होते की, ज्या लोकांना पुण्य हवे आहे. त्यांनी पुढे व्हावे. आणि जे लोक वाईट कृत्य करणारी आहेत त्यांनी त्यापासुन लांब थांबावे.
    या महिन्यातील प्रमुख गोष्टी :
1. रोजा, 2. नमाज, तराविहची विशेष नमाज, 3. कद्रची रात्र 4. कुरआन 5. जकात आणि फित्र
1. रोजा (उपवास) - रोजा म्हणजे पहाटे सुर्येदयापासून अगोदरच न्याहारी करून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी जेवण केले जाते. मध्यंतरीच्या काळात अन्न - पाण्याचे एक कण सुध्दा खाणे-पिणे वर्ज्य असते, असे पुर्ण महिनाभर 30 दिवस चालते.
    या मागेही शास्त्रीय कारण आहे. वैज्ञानिक दृष्टीने जसे आपण वर्षानुवर्ष चाणार्‍या मशीनला/गाडीला वर्षातून एकदा का होईना सर्व्हिसिंग करून घेतो. जेणेकरून गाडीचे/मशीनचे आयुष्य वाढते. तशाच प्रकारे आपल्या शरीराच्या अन्न प्रक्रियेला आराम मिळावा व आपले शरीर रूपी मशीन सर्व्हिसिंग होऊन आणखीन चांगले कार्य करावे म्हणुन रोजा केला जातो. यामुळे शरीराची पचन व्यवस्था आणखीन चांगल्या प्रकारे कार्य करते. व शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
    1. रोजा ठेवलेल्यांच्या पोटात काही नसल्याने पोटात एक प्रकारची उर्जा तयार होऊन पोटाची चरबी नैसर्गिक रित्या कमी होते. म्हणजेच रोजामुळे पोटावरची ढेरी कमी होते. रोजा हा श्रीमंताला गरीबीची जान करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवन न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाण श्रीमंताला या रोजामुळे होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीप्रमाणे दररोज लाखो लोक उपाशी झोपतात, श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्‍याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजादारांना या रमजानच्या रोजामुळे होते.
    रोजा हा गर्भवती महिला, मोठा आजार असलेली व्यक्ती (उदा. कॅन्सर, हार्ट पेशन्ट, शुगर आदी), रोजा ठेवल्याने ज्यांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न उदभवु शकतो. अशा व्यक्ती, प्रवासी, कमीत-कमी सात वर्षे/अकरा वर्ष वयाच्या आतील (समज नसलेला) लहान बालक यांच्यावर माफ करण्यात आला आहे.
    2. तराविह (रात्रीची विशेष नमाज) : मुस्लिम धर्मात पाच वेळा नमाज फर्ज करण्यात आलेली आहे. पहाटे फजर ची नमाज, दुपारी जोहर ची नमाज, दुपारी असरची नमाज (सुर्यास्ताच्या अगोदर), सायंकाळी मगरीब ची नमाज, आणि रात्री इशाची नमाज असे एकुण पाच नमाज आहेत.
    नमाज हाही एकप्रकारे शास्त्रीय प्रकारच म्हणावा लागेल. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द अल्लाहु अकबर याचा अर्थ होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत नमाजसाठी उभे असतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते.
    3. शब-ए-कद्र (पवित्र रात्र) : सर्वात पवित्र मानली गेलेली रात्र. याच पवित्र रात्री दिव्य कुरआनचे अवतरण सुरू झाले. ’आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. ’(दिव्य कुरआन 97:1)
    या रात्रीची प्रार्थना, मग ती नमाजच्या स्वरूपात असो, कुरआन पठण असो किंवा अल्लाहची स्तुती असो इतर दिवसांच्या तुलनेत उत्तम ठरते. किंबहुना इतर दिवसांच्या 1000 महिन्यांच्या तुलनेत देखील या रात्रीची महत्ता फार जास्त आहे.
    कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.
(दिव्य कुरआन 97:3)
    या पवित्र रात्री एखाद्या गुन्ह्याची माफी मागण्याचे विशेष महत्व आहे जो कोणी खर्‍या भक्ति भावाने भूतकाळात घडलेल्या गुन्ह्यांवर पश्‍चाताप करून अल्लाह दरबारी माफी मागितली तर नक्कीच गुंह्यांची माफी मिळते परंतु अट ही असते की एखाद्याचे हक्क त्याला परत करणे आणि भविष्यकाळात गुन्हे न करण्याची हमी त्याने द्यावी लागते.
    4. कुरआन : इस्लाम धर्माचा सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्या वर अल्लाहकडुन उतरलेला आसमानी संदेश, कुरआन हा धर्मग्रंथ होय. जो समस्त मानव जातीला अनुसरून मार्गदर्शन आहे. रमजान महिन्याच्या पवित्र कद्रच्या रात्री हा ग्रंथ अवतरीत झाला.
    जो संपूर्ण सृष्टीचा निर्माता आहे तोच या ग्रंथाला अवतरीत करणारा आहे. या पवित्र धर्मग्रंथाची विभागणी 30 खंड, 114 अध्यायामध्ये करण्यात आलेली आहे. यात 6000 पेक्षाही जास्त आयती आणि विशेष म्हणजे 1000 पेक्षा जास्त आयती आधुनिक विज्ञानाशी निगडित आहेत.
    कुराण हा पवित्र ग्रंथ असून तो कयामत (अंतिम निवाड्याचा दिवस) पर्यंत हयात आणि कायम राहणार आहे, ज्यात प्रलयापर्यंत फेरफार शक्य नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत सर्व लोकांना मार्गदर्शन आहे. या पवित्र ग्रंथाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वतः अल्लाहने स्विकारलेली आहे. व याच प्रमुख कारणामुळे आज 1438 वर्षे लोटली तरी या पवित्र ग्रंथाच्या काना-मात्रात कोणताही बदल झालेला नाही. आणि इन्शाअल्लाह कयामत पर्यंत होणारही नाही.
    ’उरले हे स्मरण, तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’ (दिव्य कुरआन 15:9)
    5. जकात- फित्र (दानधर्म) - हा या महिन्याचा फार महत्वाचा भाग आहे. जकातूल फित्र म्हणजे ते दान जे प्रत्येक श्रीमंत आणि कमीतकमी चांगली आर्थिक परिस्थिती असणार्‍या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिमागे 1.75 किलो धान्य वा तेवढी रक्कम हलाकीची परिस्थिती असणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबाला दान म्हणून रमजान महिन्यात द्यावयाचे असते. जेणेकरून त्या गरीब कुटुंबाला देखील ईदच्या सणामध्ये सामील होता यावे.
    फित्र्याशिवाय, प्रत्येक सधन व्यक्तीला त्याच्याकडे असलेल्या एकूण नगदी आणि सोनेनाणे धरून 7.5 तोळे सोने किंवा 52.5 तोळे चांदी. यापैकी कोणताही एक संपत्ती असेल व त्यावर एक वर्षे पूर्ण झालेले असेल तर त्याला 2.5 टक्के जकात द्यावी लागेल.
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार लाखो कुटूंब दररोज उपाशी झोपतात अशा परिस्थितीत या जकात व फित्रचे महत्व अधिकच स्पष्ट होते. या पवित्र महिन्यामध्ये जकात व सदकतुल फित्रचे दान म्हणून मिळालेले धान्य वा रक्कम एका एका कुटुंबाकडे इतके जमा होते की त्या कुटुंबाचे वर्षभराची जेवणाची अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होते.
    वरील सर्व बाबीवरून आपल्या असे लक्षात येते की, रमजानचा रोजा म्हणजे केवळ खाणे-पिणे सोडणे एवढेच नाही तर रोजा, तराविह ची विशेष नमाज, शब-ए-कद्र (कुरआन अवतरीत झालेली रात्र), कुरआन, जकात आणि फितरा या सर्वांचा योग्य असा मेळ आहे. जो व्यक्ती हे आचरण योग्य प्रकारे करेल तोच खर्‍या अर्थाने बक्षिसास पात्र ठरेल, अन्यथा रोजा असून देखील वाईट कृत्य, निंदा नालस्ती, शिवीगाळ, दारू, जुगार या अनैतिक गोष्टींपासून वाचत नसेल तर प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे त्या रोजेदाराची अल्लाहला अजिबात गरज नाही.
    महिनाभराच्या उपवासानंतर चंद्र दर्शन होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मुस्लिम बांधव यात पुरूष, महिला, लहान-मोठे सर्वच जण सुवासिक तेल, अत्तर (इत्तर) लाऊन, नवीन कपडे परिधान करून ईदच्या विशेष नमाजसाठी ईदगाह मैदान, मस्जिद मध्ये जातात. या विशेष नमाजला ईद-ऊल-फित्रची नमाज असे म्हणतात. सर्व मुस्लिम बांधव ईदच्या नमाजनंतर ऐकामेकांना अलिंगण (गळाभेट) देतात. त्यानंतर घरोघरी शिरखुरमा-शेवय्यांचा गोड आहार घेतला जातो.

- सरफराज शेख

भारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमी प्रयत्न केले आहेत. सण हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने त्याचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. होळी, रक्षाबंधनसारखे सण भारतीय समाजाची एकात्मीक रचना मजबूत करत आले आहेत. मध्ययुगीन काळापासून ईदच्या माध्यमातून भारतीय समाजातील काही समाजघटकांनी एकामेकांच्या जवळ येण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. मोहम्मद तुघलकाच्या काळात ईदच्या दिवशी व त्याच्या आधी हिंदु बांधवासाठी ईद साजरी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असत. सुफींच्या खानकाह मधील लंगर असो वा इफ्तारसाठी वाटसरुंना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा असो, हिंदू-मुस्लीमांसाठी सारख्याच पध्दतीने उपलब्ध असत. मानवी मुल्यांची उद्घोेषणा या माध्यमातून केली जात असे. सुफींनी मानवकल्याणाची जाणीव रमजान महिन्यात देखील जपली होती. वस्त्रभांडार त्यांनी रमजान महिन्यात गरीबांच्या सहाय्यासाठी खुले केल्याचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनात उपलब्ध आहेत. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ययुगीन काळात हा कर शासनाच्या एका विशिष्ट विभागामार्फत वसूल केला जात असे. त्या माध्यमातून समाजोपयोगी कामे केली जात असत. औरंगजेबाने ब्रम्हपुरी मुक्कामी असताना रमजानच्या काळात विहिरी व कालव्यांचे बांधकाम करुन घेतले होते. काही बागा निर्माण केल्या होत्या. जहांगीरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ईदचा माध्यम म्हणून वापर करण्यात आल्याचे संदर्भ ’तुज्क इ जहांगीरी’ मध्ये उपलब्ध आहेत. सेतू माधव पगडी यांनी भाषांतरीत केलेल्या काही फारसी बातमीपत्रांच्या माध्यमातून अशा अनेक नोंदी समोर आल्या आहेत. ईदच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपण्याची ही प्रेरणा भारतीय समाजाने घेतली. आजही अनेक मुस्लीम बांधव जकात च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे. 

- डॉ.रफिक पारनेरकर
अहमदनगर


रोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्या लोकांवर ही अनिवार्य होते. यासाठी की तुमच्यात ’तक्वा’ निर्माण व्हावा” (2-182).
    ’तक्वा’ हाच रोजांचा उद्देश आहे. म्हणूनच तक्व्याचा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे रोजासंबंधीचे काही उपदेश यासाठी पुरेसे आहेत. ते एकदा म्हटले, ’जो रोजा ठेवूनही खोटे बोलने व खोटे वागणे सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही.’ अर्थातच माणसाच्या वागण्यात, बोलण्यात परिवर्तन होऊन त्याने सत्य बोलावे व सत्य वागावे हाच रोजांचा खरा उद्देश आहे. पैगंबर (सल्ल.) एकदा म्हटले, ’रोजा म्हणजे फक्त पहाटे पासून ते सायंकाळपर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे! रोजा जिभेचापण आहे, डोळ्यांचा पण आहे. कानांचा देखील व हाता पायांचा सुद्धा रोजा आहे!” या पैगंबरी उपदेशातून स्पष्ट होते की माणसाचे संपूर्ण चारित्र्यसंवर्धन हा खरा रोजांचा उद्देश आहे. जर कोणी रोजा ठेवूनही निंदा-नालस्ती, शिवीगाळ करीत असेल, डोळ्यांनी अश्‍लीलता, नग्नता पाहात असेल, कुणाकडे वाईट नजरेने पाहत असेल, भ्रष्टाचार करत असेल, अन्याय-अत्याचार करत असेल तर त्याच्या रोजाची, त्याच्या अन्न-पाणी सोडण्याची अल्लाहला काडीमात्र गरज नाही. आदरणीय उमर (र.) यांंनी आपले ज्येष्ठ व जाणकार सहकारी मा. उबई बिन कअब (र.) यांनी ’तक्वा’ विषयी विचारणा केली असता ते म्हटले, हे उमर (र.)! कधी आपणांवर अत्यंत काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग झाला? उमर (र.) म्हटले, ’हो! एकदा असे घडले!’ ’मग काय केलं?’  उमर (र.) म्हटले, एक-एक पाऊल अत्यंत दक्षतेने पुढे टाकून , की एखादा काटा टोचू नये, अशा सावधानतेेने मी ते पार केले. उबई बिन कअब म्हटले, ” उमर (र.)! हाच तक्वा आहे!” अर्थात माणसाने संपूर्ण जीवन अशा सावधानतेने जगावे की त्यांच्याकडून ईश-अवज्ञा अर्थात अन्याय-अत्याचार घडू नये हाच तक्वा आहे. हाच रोजांचा खरा हेतू आहे. थोर इस्लामी विद्वान मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी ’ रोजा आणि वासनांवर नियंत्रण’ या पुस्तकात तक्वाचे स्पष्टीकरण करतांना दोन घोडेस्वारांचे सुंदर उदाहरण दिले आहे. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे तर दूसर्‍याच्या हातातून तो सुटलेला आहे. लगाम हाती असल्याने पहिल्याचे घोड्यावर पूर्ण नियंत्रण आहे. मात्र लगाम हाती नसल्याने दुसर्‍या घोडेस्वाराचे घोड्यावर नियंत्रण नाही. उलट तो घोड्याच्या नियंत्रणात आहे. हे उदाहरण देऊन मौलाना लिहितात की, घोडे म्हणजे वासना (ख्वाहिशाते नफ्स) आहेत आणि जगातील प्रत्येक माणूस वासनारूपी घोड्यावर स्वार असलेल्या प्रवाशासमान आहे. रोजाचा उद्देश अर्थातच तक्वा हा आहे की वासनांरूपी घोड्याचा लगाम रोजेदाराच्या हाती यावा व त्याला वासनांवर नियंत्रण प्राप्त व्हावे. वासनांची गुलाम बनलेली माणसं अल्लाहची अर्थात सत्याची गुलामी कदापि करू शकत नाहीत. रोजानंतर रमजानचे दूसरे वैशिष्ट्ये कुरआन आहे. कुरआनची ओळख स्वतः कुरआननेच अशी करून दिली आहे, ” रमजान तो पवित्रा महिना आहे, ज्यात कुरआनचे अवतरण झाले. कुरआन समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे, सुस्पष्ट असे मार्गदर्शन, कुरआन सत्य-असत्याची कसोटी (अलफुर्कान) आहे.” जीवनाविषयी जे मार्गदर्शन माणसासाठी कुरआन ने सांगितले ते संक्षिप्तपणे असे आहे.
    1) दुनिया अंधेर नगरी नव्हे आणि मोकळे रान (चरण्याची) ही नाही. सफल चराचर सृष्टिचा व तुझा निर्माता अल्लाह तुला सदा सर्वदा पाहात आहे. तू सार्‍या जगाला फसवशील मात्र त्याच्या नजरेतून वाचू शकत नाहीस, ही दुनिया तुझ्यासाठी परीक्षा गृह (एक्झाम हॉल) आहे. त्यासाठीच तुला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र मृत्यू येताच तुला या परीक्षा गृहामधून बाहेर पडावे लागेल. आणि मग एक दिवस तो उजाडलेला असेल जेव्हा या परीक्षेचा रिझल्ट लागेल. जो सर्वस्वी तुझ्या कर्मावर (कृत्यावर) अवलंबून असेल. आज तू सत्याच्या न्यायाच्या नीतिच्या मार्गाने जगलास तर जीवनरूपी या परीक्षेत उत्तीर्ण होशील. मात्र जर असत्य, अन्याय, अनीतिच्या मार्गाने जगलास तर घोर निराशा तुझ्या पदरी येईल! मग पश्‍चाताप करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून वेड्या आजच शहाणा हो! सत्य जाणून घे, जीवनाचा वास्तविक उद्देश जाणून घे! चंगळवादाच्या आहारी जाऊ नकोस! ही संपूर्ण मानवजात अल्लाहने एकाच जोडप्यापासून निर्मिली आहे. म्हणून तुम्ही सर्व आपापसात बंधू भगिनी आहात. समान आहात. कोणी श्रेष्ठ नाही. की कोणची नीच नाही. म्हणून वेड्या, जीवनात भेदभाव करू नकोस. सर्वांशी बंधू भावाने, प्रेमाने, आपुलकीने वाग! कुणाचे स्वातंत्र्य हिराऊन घेऊ नकोस. कुणाला स्वतःपेक्षा हीन लेखू नकोस कोणाचा द्वेष-मत्सर करू नकोस.
    3) हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेही सत्कर्म अल्लाह स्विकारत नाही. म्हणून अर्थार्जन कर पण कष्टाने, न्यायाने, नीतिने, भ्रष्टाचार करू नकोस, बेईमानी धोकेबाजी करू नकोस.
    4) माता-पिता, भाऊ-बहिणी, पत्नी, मुले व इतर आप्तेष्टांचे तुझ्यावर हक्क आहेत. त्यांना पायदळी तुडवू नकोस, माय-बापाशी अत्यंत आदराने, सन्मानाने वाग. त्यांच्याशी कृतघ्नता करणे, अल्लाहशी कृतघ्नता करण्यासमान आहे. याची जाणीव ठेव. पैगंबर (सल्ल.) यांनी म्हटले, आईच्या चरणाखाली (स्वर्ग) जन्नत आहे. माता-पिता प्रसन्न तरच अल्लाह प्रसन्न! माता-पिता नाराज तर अल्लाह नाराज. हे सारं जग अल्लाहच कुटुंब आहे असे जाणून जो सार्‍या जगाच भलं इच्छितो तोच खरा सज्जन आहे.
    5) मृत्यू अटळ आहे! तुझी इच्छा असो वा नसो, मृत्यू पश्‍चात तुझी गाठ शेवटी अल्लाहशीच आहे हे वास्तव कधी नजरेआड होऊ देऊ नकोस. मृत्यूचे स्मरण तुला मार्गभ्रष्ट होऊ देणार नाही आणि कुरआनचे अध्ययन कर! ते तुला खर्‍या सन्मार्गाची ओळख करून देईल. पैगंबरांचा हा उपदेश सतत ध्यानी-मनी असू दे की अंत्येयात्रा जेव्हा निघते (जनाजा) तेव्हा तीन गोष्टी तिच्याबरोबर निघतात. दुनिया (संपत्ती), आप्तेष्ट आणि कर्म. पैकी पहिल्या दोन गोष्टींना एक मर्यादा आहे. मृत्यू आला की ही सारी दौलत वारसांची होईल. आप्तेष्ठ तुझा विधी करून परत जातील. तीसरी गोष्ट तुझे कर्म तुझ्या विधीपश्‍चातही तुझ्या संगती येतील आणि तुझ्या कर्मावरच तुझ्या मृत्यू पश्‍चातच्या जीवनाची धुरा आहे. ते चांगले असले तरच तुझ्या मरणोत्तर जीवनाच ’चांगभलं’ होईल! याची जाणीव ठेव!

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489


आज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत नाही, असं नाही, पण त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. आजही अनेक गाव खेड्यात तेच वातावरण नक्कीच आहे, पण शहरी वातावरण बर्‍याच अंशी जातीय वार्‍याने प्रदुषित झालेले आहे, हे कटू सत्त्य आहे. मला आठवते माझ्या बालपणातली दिवाळी. आमच्या बच्चे कंपनीने दिवाळीच्या फराळावर मारलेला ताव! तुम्ही कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, पण तुमच्याही बालपणात जर तुमचा एक जरी मुस्लिम मित्र असेल तर तुम्हाला तुमच्या बालपणातला अनुभवलेला रमजान, ईद आणि शिरखुर्मा आजही आठवत असेलच.
पाटलाच्या वाड्यावर चढून आकाशात चंद्रकोर शोधत असलेले ते जुम्मनमियां ... चंद्रकोर दिसली रे दिसली की, ’चांद दिख गया ... चांद दिख गया’ करत सगळी येटाळ डोक्यावर घेणारी ती चिल्लर पार्टी अन् विजेच्या खांबावरील जुन्या दिव्याच्या त्या अंधूक प्रकाशात त्या चिमुकल्या पाखरांच्या पदन्यासाने उडालेल्या धुराळ्यातही एक अजबच चैतन्य निर्माण होत असे. येटाळीतल्या एकमेव पाटलाच्या वाड्यातून बाहेर आलेल्या काकूंच्याही चेहर्‍यावर तोच आनंद वाहत असलेला दिसायचा जो त्या बाल-गोपालांच्या चेहर्‍यावर असायचा.
    आजची ’हॅप्पी रमदान’ म्हणून सदिच्छा देणारी धीर गंभीर चेहर्‍याची कॉन्वेंटठास्त मुलं त्या निरागस गोड आनंदाला कुठंतरी पारखी झालेली दिसत आहेत. तो आनंद पुन्हा परत आणायची गरज आहे. तो भारत आपल्याला पुन्हा परत हवा आहे. लहाणपणीच वैचारिकतेची घडी बसत असते. म्हणून भविष्यात जातीयवादाच्या दुर्धर रोगाची लागण होऊ नये म्हणून धर्मसहिष्णुतेची लस लहाणपणीच देणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे. विशेष करून जे लोकं रोजे ठेऊन रमजान पाळतात, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांवर रमजानचे सहिष्णुतेचे, एकात्मतेचे, समतेचे संस्कार घडवण्यासाठी इथे काही ’टिप्स’ दिल्या जात आहेत -
    आपल्या लेकरांच्या मुस्लिमेतर मुलांसाठी आपल्या घरी छोटीसी इफ्तार पार्टी घ्या. त्यात त्यांना सोप्या भाषेत इफ्तार, रोजा, रमजानविषयी माहिती द्या. त्याविषयावर छोटी छोटी मराठी पुस्तकं असतील तर ती त्यांना भेट म्हणून अवश्य द्या.
    ईदच्या दिवशीही त्यांना शिरखुर्म्यासाठी विशेष करून निमंत्रित करण्यास सांगा. ईदच्या दिवशी अनेक ठिकाणी झोके, आकाश पाळणे व इतर लहान मुलांच्या करमणुकीची साधणं येत असतात. तेंव्हा आपल्या लेकरांना तिथे नेतांना मुस्लिमेतर आणि विशेष करून तळागाळातील वंचित गोरगरीबांच्या मुलांना आपल्या लेकरांसोबत तिथे न्या. ईदगाहवर नमाज पढण्यासाठी शक्य असेल तर लेकरांनाही न्या.
    ईदच्या दिवशी भिक्षा मागणारे ईदगाहबाहेर उभे असतात. त्यांना भिक्षा देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जकातची रक्कमही गोरगरीबांना देतांना आपल्या लेकरांच्या हाताने द्या. जेणेकरून त्यांच्यात दातृत्वाचे संस्कार होऊ शकावे. मुस्लिम समाजात ईदसाठी नवीन कपडे वगैरे घेतांना मुलगा - मुलगी असा भेद केला जात नाही, उलट मुलींना झुकते माप दिले जाते, हा एक चांगला गुण आजही मुस्लिम समाजात आढळतो, ही उदात्त प्रेषित परंपरा अशीच पुढेही सुरू राहिली पाहिजे.
      अशाप्रकारे आम्ही आधी बालपणी जसा भेदभावरहित सर्वधर्मसहिष्णु वातावरणात रमजान साजरा करायचो, ईद साजरी करायचो तसाच रमजान आणि तशीच ईद आताही प्रत्येक गावा-गावात शहरा-शहरात साजरी होवो आणि समाजात शांती निर्माण होऊन देश प्रगती करो, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन!

- एम.आय. शेख -
9764000737


ईद-उल-फित्र

ईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.
    ना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.
    महिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.
ईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप
    आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.
    समाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.
    अनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.
    व्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.
    वाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.
       या आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक संधी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी  इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.
    इस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर  पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.
    इस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.
    भारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
    शेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी पुरे आहे. ईद  मुबारक.

- सीमा देशपांडे
7798981535


रमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन ये! अचानकपणे माझे बेचैन मन ’रमजान’ या शब्दाकडे वळले व डोक्यात असंख्य प्रश्‍न उत्पन्न झाले. खरंच! काय असतील रमजान? मुस्लिम लोक एवढे कडक उपवास कसे करत असतील?  माझी कुतुहुलता त्या उपवासाकडे जास्त होती, कारण मी जे उपवास पाहिले होते ते तर भरपूर खावुन-पिऊन होते. ज्यावर माझे आईसोबत नेहमी वाद व्हायचे.  माझ्या मते उपवास म्हणजे स्वईच्छांवर नियंत्रण ठेवणे व त्या भुकेची जाणीव होणे जे लोक पैशाअभावी कित्येक दिवस उपाशी राहतात. ह्या विचाराने मी रमजान महिन्यातील उपवासाची माहिती इंटरनेटद्वारे गोळा केली व माझे अशांत मन प्रफुल्लित झाले; हे वाचून कि उपवासाची व्याख्या तीच होती जी माझ्या मनात रचलेली होती. त्याशिवाय माझी नजर कुरआनच्या एका आयातवर पडली. ज्यात अल्लाह कुरआनमध्ये म्हणतो, ”रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. आणि जेव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धावा करणारा जेव्हा माझा धावा करतो तेव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा व माझ्यावर श्रद्धा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.”(कुरआन ः सुरे अल बकरा, आयत क्र. 185-186)
    हे वाचुन माझे मन खुप आनंदी झाले. ह्या विचाराने की जर मी उपवास केले तर आपणास ईश्‍वर भेटेल. खरच तो कसा असेल या कुतुहलतेने मी मनाशी निश्‍चय केला की मी उपवास करेन. पण त्यासोबत द्विधा मनःस्थिती झाली होती की मी पूर्ण 30 दिवस उपवास करु शकेन की नाही. कारण असंख्य अडचणींचे जाळे समोर उभे होते. जसे सासरचे उपवास करु देतील की नाही?, कॉलेजचे कलीग काय म्हणतील? पण माझे मन या अडचणीना दुय्यम स्थान देत होते व एका आध्यात्मिक प्रेरणेकडे ओढावत होते. मग मी ठरविले की, जे होईल ते होईल मी उपवास करेनच. रमजानच्या दोन दिवस आधी मी खजूर आणले व एका रॅकमध्ये लपवून ठेवले, जेणेकरून कोणाला संशय येवू नये. मला वेळा माहिती नसल्यामुळे मी जवळच्या मस्जिद बाहेर लावलेल्या वेळेचा फोटो काढून आणला व रमजानची सुरुवात केली. माझा पहिला दिवस पहाटे उठून मी आंघोळ केली व दोन खजूर व एक लोटा पाणि पीऊन मी सैरी केली व फज्र च्या नमाजासाठी रूजू झाले.  मी नमाज माझ्या भाषेत पढली. कारण मला एवढीच माहिती होती की, ईश्‍वर हे पाहत नाही की तुम्ही कुठल्या भाषेत प्रार्थना करता, उलट तो हे पाहतो की तुम्ही त्याला किती मनापासून हाक मारता. नंतर कुरआन वाचायला सुरुवात केली. खरंतर याआधी मी कुरआनचे थोडे अध्याय वाचले होते परंतु रमजानचा पहिला दिवस मला कुरआनची नवीन ओळख करुन देत होता. मी कुरआन वाचत असताना अचानक माझ्या पोटात गोळा आला जेव्हा मी काफिर व मुनाफिकची आयात वाचली. मला याची जाणिव झाली की मी ज्या मूर्तीला पूजत होते तो ईश्‍वर नाही,  मी लहान मुलीसारखी हुंदके देवून रडत होते आणि माथा टेकवून ईश्‍वराला विणवणी करत होते, हे ईश्‍वरा!  मी तुला आत्तापर्यत ओळखू शकले नाही. माझे विचार तुला सतत टाळत गेले, माझे कृत्य तुझे आज्ञाभंग करत गेले परंतु, तू एक क्षणभर मला विसरला नाही.  खरंच तू किती दयाळू आहेस. हे अल्लाह! माझे मन बदलून टाक व मला तुझा मार्ग दाखव.”
    संध्याकाळी उपवास सोडला व मगरिब व ईशाची नमाज लपुन पढली. अशाप्रकारे पहिला रोजा तर पुर्ण झाला पण त्याचबरोबर त्या पहिल्या रोजाने सीमा देशपांडे चा नविन जन्म झाला. दूसरा रोजाला मी अजून धीट झाली व माझे मन, शरीर आत्मा भुकेपेक्षा ईश्‍वराच्या जवळ जाण्याच्या शोधात होते. मला एकीकडे खुप दुःख वाटत होते की मी आत्तापर्यंत किती गुन्हे केले आहेत व त्यासोबत आनंद ही झाला की मी ईश्‍वराला जाणले. मी ईश्‍वराची खुप माफी मागितली व मनाशी ठरविले मी आता ह्या मार्गापासुन मागे हटणार नाही, ज्या सत्याच्या शोधात मी कित्येक दिवसापासून होते. कुरआन ने माझ्या जीवनाला कलाटणी दिली व मला अनुभूती झाली की मी हे तीस दिवस उपवास करणारच. कुरआन मधे ईश्‍वर म्हणतो, ”हे पैगंबर (स.), तुम्हाला जो हवा आहे त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकत नाही परंतु अल्लाह ज्याला इच्छितो त्याला मार्गदर्शन करतो आणि तो त्या लोकांना चांगल्याप्रकारे जाणतो, जे मार्गदर्शन स्वीकारणारे आहेत.(कुरआन - सुरे अल्कसस आयत क्र. 56)
    पहिले तीन दिवस सुरळीतपणे गेले मात्र नंतर हळूहळू प्रत्येकाचे डोळे माझ्याकडे संशयरूपी नजरेने पाहत होते. सासूचा चेहरा प्रश्‍न करत होता परंतु विचारण्याचे धाडस त्यांच्यात होत नव्हते. कारण घरच्यांना हे उपवास अमान्य होते. असेच एकदा सासू व नवर्‍याने मुद्दामहून माझे आवडते पदार्थ खायला घेवुन येवून मला जबरदस्ती ने उपवास तोडायला सांगितले, पण मी  ठामपणे नाकारत होते व मनात ईश्‍वराला विणवनी करत होते, ’हे अल्लाह माझे उपवास तोडू नकोस अणि एकच स्मरण करत होते, ला ईलाहा इलल्लाह मुहम्मदुर्रसुलुल्लाह!’ घरची वेळ टळली नाही तोच कॉलेजमधे संकटाचे जाळे सुरु झाले. माझे कलिग मला सतत प्रश्‍न करत होते की, तू रोजे का करत आहेस? मी ठामपणे उत्तर दिले ईश्‍वरासाठी! त्यावर ते म्हणाले मुस्लिमांचा ईश्‍वर आपला नाही त्यावर मी हसत म्हणाली त्यांचा आपला सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, जो आपल्याला जन्म देतो व मृत्यु पण. मला माझी आध्यात्मिक प्रेरणा ईतकी मजबूत करत होती की त्यांच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे मी सडेतोडपणे देत होती व ते निरुत्तर होत होते. जणूकाही मला वाटत होते की ईश्‍वर मला प्रेमाने हात धरून घेवून जात आहे व म्हणतोय, ’मी तुला निवडलेले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.’ जसे-जसे मी कुरआन वाचत गेली तसेतसे माझे मन,आशा व बुद्धी आकांक्षा लावून होती ईश्‍वराच्या जवळ जाण्यासाठी.
    संकटे तर येत होती पण अगदी सहजपणे टळतही होती. जणूकाही वार्‍याची थंड झुळुक आली अन् क्षणात निघून गेली. असेच एकदा सुट्टीचा दिवस होता. माझ्या पतीने मुद्दामहून सत्यनारायणाची पूजा आयोजित केली व तिकडे सासूने पाहुण्याना जेवायला बोलाविले व पतीने अट्टाहास केला की, मी पूजेला बसावे. माझ्यासाठी हा सर्वात अवघड क्षण होता. माझे ते सुकलेले ओठ पाणी मागत नव्हते तर ते ईश्‍वराला हाक मारत होते व  मनाशी एकच ध्यास घेवून होते, ”हे ईश्‍वरा माझे उपवास तोडू नकोस, मला तुझ्या मार्गापासुन दूर करु नकोस.” पाहणार्‍याला ही परिस्थिती अत्यंत अवघड दिसत होती परंतु माझ्यासाठी ते दुय्यम होते. कारण प्रत्येक जण माझ्या  विरोधात असूनही काहीच प्रहार करत नव्हते. हे पाहून मला असे वाटत होते की ईश्‍वराचे फरिश्ते मला सुरक्षा देत आहेत. उपवासासोबत माझी नमाजची कसरत होत होती. मला प्रत्येक नमाज लपून पढावी लागत होती. असेच एकदा कॉलेजमध्ये जुम्माची नमाज पडायला हातात एक स्कार्फ घेवून लेडिज रुममध्ये गेले. तेव्हा माझ्या एका कलिगने माझा पाठलाग केला व तिने मला नमाज पडताना पाहिले व काही क्षणात तिने पूर्ण कॉलेजमध्ये बातमी पसरवली की सिमा देशपांडे  रोझा करत आहे परिणामतः प्रत्येकजण माझ्याकडे संशयरुपी नजरेने पाहत होते. मात्र मी त्यांच्या नजरेला नजर लावून संभाषण करत होते. म्हणतात ना, जेव्हा ईश्‍वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा कुणीही काहीच करु शकत नाही आणि जेव्हा ईश्‍वर तुम्हाला सोडून देतो तेव्हा कोणीही तुम्हाला वाचवू शकत नाही. माझे हे अनुभव मला ईश्‍वराच्या चमत्काराची जाणीव करुन देत होते, ज्याने माझे ईश्‍वराशी नाते घट्ट होत होते. मला प्रत्येक क्षण मोलाचा वाटत होता, मी काय-काय करावे जेणेकरून मी ईश्‍वराचे मन जिंकू शकेन? एकदा अशी वेळ आली की असरची अजान होत होती पण कुठेही जागा नव्हती जिथे मी नमाज पढू शकेन.कुणाच्या समोर पढू शकत नव्हती. ह्याच भीतीने की ते मला पुर्ण उपवास करु देणार नाहीत. कानात एकच कुरआनचे शब्द गुंजत होते नमाज कायम करा! नाईलाजाने मी बाथरूम मध्ये नमाज पढली. म्हणतात ना कडक उन्हानंतर गारवा पण येतो अगदी तसेच. ईश्‍वराने पंधराव्या रोजी माझे पूर्ण स्टेज बदलून टाकले. त्या माझ्या पालनकर्त्याने प्रत्येकाचे मन बदलून टाकले जी सासू उपवास तोडण्याचे कट रचत होती तीच माझ्या इफ्तार साठी जेवण बनवून ठेवायची. तिने मला नमाज पढताना पाहिली पण ती अबोल झाली. जणुकाही ईश्‍वराने तिच्या डोळ्यांवर पडदा पाडला होता. तिकडे कॉलेजमध्ये माझे कलिग राग न करता माझ्या कामात मदत करत गेले. खरंच ईश्‍वर कुरआनमध्ये म्हणतो,
”जेव्हा अल्लाहची मदत आली आणि विजय प्राप्त झाला आणि (हे पैगंबर सल्ल.) तुम्ही पाहिले की लोक झुंडी झुंडीने अल्लाहच्या धर्मात प्रवेश करीत आहेत. तेव्हा आपल्या पालनकर्त्याच्या स्तुतीबरोबरच त्याचे पावित्र्य गान करा, आणि त्याच्याकडे क्षमेची प्रार्थना करा. निःसंदेह तो मोठा पश्‍चात्ताप स्वीकारणारा आहे.” (कुरआन : सुरे अन्नस्र - आयत नं.1-3).
    खरंच कुरान हा एका मित्रासारखा आहे जेवढा वेळ तुम्ही त्याच्यसोबत घालवाल तेवढा तो त्याच्या गुप्तगोष्टींचा उलगडा करतो. असेच पंधरावा रोजा होता. त्यादिवशी कॉलेजमधे एक मावशी स्वतःच्या मुलीची फीस भरण्यासाठी मंगळसूत्र विकायला निघाली होती. त्याच क्षणी मला अनुभूती झाली की ईश्‍वराने कुरआनमधे आज्ञा दिली आहे की, गरूजूंना जकात द्या. मी काहीच विचार न करता तिला 5000/- रुपये काढून दिले. त्या स्त्रीच्या चेहर्‍यावरच्या आनंदापेक्षा कित्येकपट आनंद माझ्या मनाला झाला. याच भावनेने की मी हे दान ईश्‍वरासाठी केले आहे व हे पाहून माझा अल्लाह माझ्यावर किती खुष झाला असेल. त्याचबरोबर मी अनेक अनाथालयाला दान केले, मोलकरीणी ला नवीन कपडे दिले, गरिबांना जेवण दिले. मी प्रत्येक काम हे ईश्‍वरासाठी करत होते आणि त्यात मला इतके समाधान वाटत होते ज्याची मी भुकेली होती. अखेरीस ईश्‍वराच्या कृपेने मी पूर्ण तीस रोजे पूर्ण केले आणि ईदच्या दिवशी अल्लाहला वचन दिले, की, मी मरेपर्यंत मूर्तिपूजा करणार नाही! माझ्यासाठी हा पहिला रमजान एका दुर्मिळ फुलाप्रमाणे वाटला. ज्यात फुल एकदाच उमलते परंतु त्याचा सुगंध पूर्ण वर्षभर दरवळत राहतो. माझी ईश्‍वराकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्याने माझे संपूर्ण आयुष्य त्याच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याची प्रेरणा द्यावी व एक चांगली मोमीना बनण्याची माझ्यात क्षमता प्रदान करावी. आमीन!

- एम.आय.शेख
याद करता है जमाना उन इन्सानों को,
रोक देते हैं जो बढते हुए तुफानों को. 
 
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पूर्वी अरब देशांमध्ये जी समाजव्यवस्था अस्तित्वात होती त्याचे वर्णन प्रसिद्ध इतिहासकार मा.म.देशमुख यांनी खालील शब्दात केलेले आहे. मते आर्यांसारखे होते. आर्यांमध्ये जशी कूळाची व्यवस्था होती, तशीच अरबांमध्ये कबिल्यांची व्यवस्था होती. प्रत्येक कबिल्याची एक कूलदैवता होती. मक्का प्रमुख तीर्थक्षेत्र होते. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या काबाग्रहामध्ये 360 बूत (मूर्त्या) होत्या. त्यांची नियमितपणेे पूजा- अर्चा केली जात होती. मंत्र-तंत्र, जादू-टोण्याचा बाजार फोफावलेला होता. मक्का या शहराची नागरी व्यवस्था बनी हाशम नावाच्या एका कुलीन कुळाकडे होती. या कुळाला अरबांमध्ये अतिशय मानाचे स्थान होते. याच कुळामध्ये त्या महान व्यक्तीचा जन्म झाला. ज्याने पुढे चालून अरबांची सगळी व्यवस्थाच बदलून टाकली आणि इस्लामी लोकतंत्राची स्थापना केली.फ (संदर्भ : मध्ययुगीन भारताचा इतिहास पान क्र. 11).
    ते श्रेष्ठ पुरूष प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. होत. त्यांचा जन्म एप्रिल 570 मध्ये झाला. जन्माच्या काही दिवस अगोदरच वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे संगोपन आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी केले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना प्रेषित्व मिळाले. त्यानंतर ते 23 वर्षे जगले. याच 23 वर्षाच्या अल्पशा काळात त्यांनी जगाचा नकाशा बदलून टाकला. अरब समाजातील सर्व कुरीतींचा नाश केला. अंधश्रद्धा समाप्त केली. गुलामीची पद्धत बंद केली. सर्व माणसं एकाच आई (हजरत हव्वा/ईव्ह अलै.) व एकाच पित्यापासून (हजरत आदम/अॅडम अलै.) जन्माला आलेली आहेत. त्या नात्याने जगातील  सर्व लोक एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत. म्हणून माणसा-माणसात फरक करता येत नाहीत, सर्व समान आहेत. प्रेषित सल्ल. यांनी समतेचे हे तत्व जगाला दिले आणि याच तत्वावर मदिन्यामध्ये पहिल्या लोकशाहीची स्थापना केली.
    मदिनामध्ये इस्लामी लोकशाहीची स्थापना
    प्रेषित्व मिळाल्यानंतर मदिनामध्ये 10 वर्षे काम केल्यानंतर प्रेषित (सल्ल.) यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्या विचारांचा स्विकार करणारे लोक मक्कापेक्षा मदिन्यामध्ये जास्त आहेत. तेव्हा त्यांनी मदिन्याला हिजरत (स्थलांतर) केली व तेथे अन्य समाज घटकांना सोबत घेऊन लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली. मदिन्यामध्ये तेव्हा ख्रिश्चन आणि यहूदी अल्पसंख्यांक होते. त्यांच्या बरोबर एक कॉमन मिनीमम प्रोग्राम (किमान सामाईक कार्यक्रम) ठरवून प्रेषितांनी त्यांच्याबरोबर एक करार केला. त्याला इतिहासामध्ये प्रसिद्ध ’मदिना करार’ म्हणतात. यात बहुसंख्य मुस्लिमांच्या सोबत अल्पसंख्यांक ख्रिश्चन आणि यहूदी सुख-समाधानाने राहत होते. त्यांच्या अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत: प्रेषित सल्ल. यांनी घेतली होती. या अल्पसंख्यांकाना जिम्मी (शासनाच्या जिम्मेदारित असलेला समूह) म्हंटले जाते असे. अल्पसंख्यांक असल्यामुळे हे लोक स्वत:ची रक्षा स्वत: करण्यास असमर्थ होते. म्हणून ही सरकारची जबाबदारी होती की सरकारने स्वत: त्यांची रक्षा करावी. प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अल्पसा कर घेऊन सरकारवर टाकली होती. त्या कराला झिजीया कर म्हणत होते. ज्याचे वर्णन अनेक इतिहासकारांनी जाणून बुजून विकृत स्वरूपात केलेले आहे. मूळात हे सुरक्षेच्या मोबदल्यात दिले जाणारे शुल्क होते. या कराराप्रमाणे अंतर्गत आणि बाहेरील आक्रमणापासून ख्रिश्चन आणि ज्यू लोकांची रक्षा करण्याची जबाबदारी सरकारची होती. झिजीया कराच्या मोबदल्यात अल्पसंख्यांकांना लष्करामध्ये भरती होण्यास भाग पाडता येत नव्हते. शिवाय, त्यांना सदका, फित्रा, जकात सारखे मुस्लिमांवर अनिवार्य केलेले कर देण्यासही भाग पाडता येत नव्हते.
    प्रेषित सल्ल. नंतर ज्या चार व्यक्तींनी मदिना सरकारची सत्ता चालविली त्यांना इस्लामचे चार पवित्र खलीफा असे म्हणतात. खलीफा म्हणजे नायब (डेप्युटी). मूळात इस्लामची संकल्पना ही आहे की, जमीन अल्लाहची व खल्क (जनता) ही अल्लाहची आणि हुकूमसुद्धा अल्लाहचाच. खलीफा फक्त अल्लाहच्या हुकूमाची अंमलबजावणी करणारी व्यक्ती असते. त्यांचा दर्जा ट्रस्टी (विश्वस्था) सारखा असतो. पहिले खलीफा ह.अबुबकर सिद्दीक रजि., द्वितीय खलीफा हजरत उमर रजि., तृतीय खलीफा हजरत उस्मान रजि. व चौथे खलीफा हजरत अली रजि. होते. यानंतर मात्र इस्लाममध्ये मुलूकीयत (राजेशाही) चा उदय झाला. हजरत अमीर मुआविया रजि. हे स्वत:ला जरी खलीफा म्हणवून घेत होते, तरी त्यांच्या कामकाजाची पद्धत आणि राहणीमान राजेशाही होते. त्यांच्या नंतरसुद्धा त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून, अनेकांनी राज्य केले व स्वत:ला खलीफा म्हणवून घेतले. त्यांना उमई वंशाचे खलीफा म्हंटले जात होते. त्यानंतर बगदादमध्ये अब्बासी वंशाच्या राजांनी खिलाफत स्थापन केली. या खिलाफतीची शेवटची कडी तुर्कस्थानात 1924 साली खालसा करण्यात आली. त्या खिलाफतीला उस्मानी (ऑटोमन) खिलाफत म्हंटले जात होते.
तुर्की खिलाफतीचा संक्षिप्त इतिहास
    तुर्की खिलाफतीची स्थापना 1299 मध्ये सुलतान बिन तुर्गलने केली होती. 1924 मध्ये जेव्हा या खिलाफतीचा अंत झाला तेव्हा अब्दुल हमीद (द्वितीय) खलीफा होते. मुस्तफा कमाल पाशा आणि अन्वर नावाच्या व्यक्तींनी मिळून या खिलाफतीचा अंत केला. तुर्कस्तानची तीन टक्के भूमी युरोपात असून, बाकी आशियाखंडात आहे. यामुळे युरोपीयन संस्कृतीचा या देशाच्या समाजमनावर पूर्वीपासूनच प्रभाव होता. मुस्तफा कमालपाशाला युरोपीयन संस्कृतीचे आकर्षण होते. त्याला खिलाफत ही प्रतिगामी व्यवस्था वाटत होती. म्हणून त्याने शेकडो उलेमांची निघृण हत्या करून तुर्कस्थानमध्ये युरोपीयन लोकशाहीची स्थापना करून स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. राष्ट्रपती झाल्याबरोबर सर्वात अगोदर त्याने युरोपीयन पद्धतीचे संविधान तयार केले आणि आपल्या साथीदारांकडून ते मंजूर करून घेतले. या संविधानात इस्लामी परंपरांवर प्रतिबंध लावण्यात आला. कमालपाशाच्या या कृत्यामुळे सगळ्या युरोपीयन समाजाला हर्षवायू झाला. त्यांनी कमालपाशाची भरपूर मदत केली. कमालपाशाने युरोपच्या साह्याने एक मजबूत लष्कर उभे केले आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी लष्करावर टाकली. एरव्ही ही जबाबदारी कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयाकडे असते. येणेप्रमाणे तुर्कस्तान एक आधुनिक देश बनला. 90 टक्के मुस्लिम जनता असलेल्या या देशात हळूहळू युरोपीयन संस्कृतीचा प्रादुर्भाव इतका वाढला की दारूवरील प्रतिबंध उठले. जुगाराचे क्लब सुरू झाले. नव्याने सिनेमागृहांची निर्मिती झाली. वेश्याव्यवसायाला मान्यता देण्यात आली. व्याजाधारित बँकांना लायसेन्स दिले गेले. त्यामुळे सगळ्या युरोपीयन बँकांनी तुर्कस्थानामध्ये आपल्या शाखा उघडल्या. पुरूषांवर कोर्ट, पँट, टाय घालण्याचे तर महिलांना स्कर्ट घालण्याचे फर्मान निघाले. दाढीवर प्रतिबंध लावण्यात आले. ते एवढे कडक होते की, मस्जिदीमध्ये इमाम दाढीचा विग लावून इमामत करत होते व नमाज संपल्याबरोबर विग खुंटीला टांगून मस्जिदीच्या बाहेर पडत होते. युरोपीयन सभ्यतेचे दुष्परिणाम लवकरच लोकांच्या लक्षात आले. लोक बँकांच्या अजगरी आकाराच्या व्याजाच्या विळख्यात अडकून पडले व अल्पावधीतच सगळा देश कर्जबाजारी झाला. अनेक लोक व्यसनाधिन झाले. देशाचा गुन्हेगारी निर्देशांक वाढला. लोक एकमेकांना फसवू लागले. अश्लिलता आणि व्याभिचार वाढला, सेना आणि सरकारमध्ये भ्रष्टाचार फोफावला, म्हणजेच युरोपीयन लोकशाहीमध्ये जे कांही दुर्गून होते त्या सर्वांची लागण तुर्कस्तानात झाली.
    काही मुठभर सद्प्रवृत्तीच्या मुस्लिमांना हे आवडले नाही. त्यांनी रेस्टोरेशन ऑफ इस्लामीक प्रिन्सीपल्स अर्थात इस्लामी सभ्यतेच्या पुनरूज्जीवन करण्याचे काम हाती घेतले. त्यात त्यांना प्रचंड विरोध झाला. मात्र वाईट प्रवृत्तीला कंटाळलेल्या लोकांच्यामध्ये हे आंदोलन आतल्याआत रूजत गेले. या लोकांनी एकत्र येवून फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीची स्थापना केली. हा पक्ष सत्तेतही आला. मात्र लष्काराने या पक्षाच्या सरकारी धोरणांना विरोध केला. सरकारचे धोरण इस्लामी तत्वांच्या अनुकूल होते. जनतेनी लष्कराच्या नाराजीची परवानगी न करता इस्लामी तत्वांची पाठराखण सुरू ठेवली. पुरूषांनी दाढी ठेवायला तर महिलांनी हिजाब वापरायला सुरूवात केली. सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर लादण्यात आलेले प्रतिबंध महिलांनी झुगारून दिले. ज्या विद्यापीठांमध्ये दाढी आणि हिजाबला प्रतिबंधित करण्यात आला होता तेथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठांचा बहिष्कार केला. विद्यापीठे ओस पडू लागली. तेंव्हा नाईलाजाने विद्यापीठ प्रशासनाला दाढी आणि हिजाबला परवानगी द्यावी लागली. दरम्यान फ्रिडम अॅन्ड जस्टीस पार्टीमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास आले. रज्जब तय्यब उर्दगान यांनी पक्षाचा विश्वास जिंकला तसेच एकापाठोपाठ तीन निवडणुका जिंकल्या. मात्र 2012 आणि 2016 मध्ये लष्करी उठाव करून त्यांचे शासन उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जनेतेनी तो हाणून पाडला आणि उर्दगान यांची प्रशासनावरील पकड अधिक मजबूत झाली. उर्दगान यांनी देशात दारूबंदी लागू केली. कमालपाशाने 1924 साली ज्या चक्राची सुरूवात केली होती, ते चक्र आजमितीला पूर्णपणे फिरवून टाकण्याची किमया उर्दगान यांनी करून दाखविली.
    मात्र उर्दगान यांची सत्ता म्हणजे शुद्ध खिलाफत नव्हे. शुद्ध खिलाफतीची व्यवस्था जगात कुठेच अस्तित्वात नाही. केवळ खिलाफतीचा परिचय आणि थोडक्यात त्याचा इतिहास सांगून या दुर्लक्षित विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधावे एवढाच उद्देश ठेवून हा लेख मी वाचकांच्या सेवेत सादर केला आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget