Latest Post

माननीय असन (रजि.) यांनी सांगितले, ‘‘ज्ञान दोन प्रकारचे असते. एक जे ज्ञान जिभेवाटे हृदयात जागा बनवितो. हेच ज्ञान अंतिम निवाड्याच्या दिवशी कामी येईल. दुसरे जे ज्ञान फक्त जिभेवरच राहते, हृदयापर्यंत पोहोचत नाही. हे ज्ञान महिमावान व सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या न्यायालयात पुरावा व प्रमाण बनेल.’’ (हदीस : दारमी)

स्पष्टीकरण : 
अशा माणसाला अल्लाह असे म्हणून शिक्षा देईल की तुला तर सर्वकाही माहीत होते, तरीही तुझी कामी येणारे अंमलबजावणीचे गाठोडे स्वत:बरोबर का आणले नाही. ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्यावर अल्लाह कृपा करू इच्छितो त्याला आपल्या ‘दीन’चे ज्ञान व समज देतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
‘दीन’चे ज्ञान व समज अनेक कृपांचा दााोत आहे, हे उघड आहे. ज्याला ही गोष्ट लाभली त्याला ‘दीन’ व जगाचे भाग्य लाभले. तो त्याद्वारे आपले जीवन उत्तमप्रकारे  व्यतीत करील आणि अल्लाहच्या दुसऱ्या दासांच्या जीवनातदेखील सुधार घडवून आणण्याचा प्रयत्न करील.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दीनचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवास करणाऱ्या मनुष्यासाठी अल्लाह स्वर्गाचा मार्ग प्रशस्त करील. जे लोक अल्लाहच्या घरांपैकी एखाद्या घरात (मस्जिदमध्ये) एकत्र जमा होऊन अल्लाहच्या ग्रंथाचे पठण करतात आणि त्यावर चर्चा करतात त्यांच्यावर अल्लाहकडून श्रद्धात्मक समाधान उतरते, कृपा त्यांना झाकून घेते, देवतूत त्यांना घेरतात आणि अल्लाह आपल्या देवदूतांच्या सभेत त्यांचा उल्लेख करतो. जो त्यापासून दुरावला गेला त्याचा वंश त्याला पुढे जाऊ देत नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
या हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकीकडे ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करणाऱ्यांसाठी शुभवार्ता दिली आहे आणि दुसरीकडे त्यांना या धोक्यापासून सावध केले आहे की  ‘दीन’चे ज्ञान प्राप्त करण्याचा उद्देश त्यावर अंमलबजावणी करणे आहे. जर कोणी अंमलबजावणी केली नाही तर आपला सर्व ज्ञानाचा खजिना असूनसुद्धा मागे राहील. हे ज्ञान त्याला पुढे  जाऊ देणार नाही की त्याच्या घराण्याचा प्रामाणिकपणाही कामी येणार नाही. प्रोत्साहन देणारी गोष्ट फक्त अंमलबजावणी आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन आस (रजि.) यांच्या कथनानुसार, एकेदिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या मस्जिद-ए-नबवीमध्ये आले. दोन समूह तेथे बसले होते. (एक समूह  अल्लाहचे नामस्मरणात व स्तुतिगान करण्यात मग्न होता आणि दुसऱ्या समूहाचे लोक ‘दीन’चे अध्ययन व अध्यापनात मग्न होते.) पैगंबर म्हणाले, ‘‘दोन्ही समूह सत्कर्मांत मग्न  आहेत. परंतु त्यांच्यापैकी एक समूह दुसऱ्या समूहापेक्षा वरचढ आहे. हे लोक अल्लाहचे नामस्मरण, प्रार्थना करणे व अल्लाहकडे क्षमायाचना करण्यात मग्न आहेत. अल्लाहने इच्छिले  तर त्यांना देईल अथवा देणार नाही. तसेच दुसऱ्या समूहाचे लोक ‘दीन’चे अध्ययन व अध्यापन करण्यात मग्न आहेत आणि मला ‘शिकविणारा’ बनवूनच पाठविण्यात आले आहे.’’ असे  म्हणून पैगंबर त्याच समूहात सामील झाले. (हदीस : मिश्कात)

हा तो काळ होता जेव्हा या जगातील समस्त मानवजातीकरिता एक प्रेषित अर्थात आदरणीय मुहम्मद (स.) यांना अरबस्थानातील भूमीवर जन्माला घालण्यात आले. त्यांना इस्लामची परिपूर्ण शिकवण व परिपूर्ण विधान देऊन त्याचा प्रसार सर्व जगभरात करण्याच्या सेवा कार्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
जगाच्या भूगोलाकडे पाहा, आपणास हे कळून चुकेल की साऱ्या जगाच्या प्रेषित्वासाठी पृथ्वीवर अरब भूमीपेक्षा अधिक उपयुक्त स्थान दुसरे कोणतेही असू शकत नाही. हा देश आशिया व आफ्रिका खंडापासून अगदी मध्यवर्ती असून युरोपही येथून नजीकच आहे. युरोपातील सुसंस्कृत जाती त्यावेळी विशेष करून युरोपच्या दक्षिण भागात स्थायिक होत्या. अरबस्थानापासून त्या स्थानाचे अंतर अरबस्थान व भारत त्यांच्या दरम्यान असलेल्या अंतराइतकेच आहे.
त्या काळाचा इतिहास वाचा, तुम्हास हे कळून चुकेल की, त्या काळी अरबवंशापेक्षा उचित दुसरा कोणताही वंश व जात प्रेषित्वासाठी योग्य नव्हती. इतर मोठमोठे वंश आपले सामर्थ्य दाखवून क्षीण झाले होते. अरब वंश त्या वेळी ताज्या दमाचे होते. सामाजिक प्रगतीने इतर जातीवंशात वाईट सवयी जडल्या होत्या आणि अरब वंशात अशी कसलीही प्रगत सामाजिक व्यवस्था नव्हती, ज्यामुळे तेथील लोक ऐषआरामात व विलासात मग्न होतील व हीन अभिरुचीचे बनतील. इसवी सन सहाव्या शतकांतील अरब इतर प्रगत जातीवंशाना जडलेल्या अनिष्ट सवयीपासून मुक्त होते. ज्यांना दोषयुक्त सभ्यतेचे वारे लागले नाही अशा माणसांमध्ये आढळणारी मानवी, गुणवैशिष्टे त्यांच्यात उपलब्ध होती. ते शूर व निर्भय होते, दिलदार व औदार्यपूर्ण होते. वचनाचे पालन करणारे व स्वातंत्र्य व स्वतंत्र विचार-प्रिय होते व कोणत्याही जातीवंशाचे ते गुलाम नव्हते. आपल्या अब्रुसाठी
प्राणार्पण करणे त्यांना अगदी सोपे वाटत असे. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ऐषआराम व विलास याच्याशी ते अपरिचित होते. त्यांच्यात अनेक दोषही होते यात काही संशय नाही, कारण अडीच हजार वर्षांपासून तेथे कोणत्याही प्रेषितांचे आगमन झाले नव्हते.(१) कोणी मार्गदर्शक झाला नव्हता जो त्यांचे चारित्र्य सुधारु शकेल व त्यांना सभ्यता शिकवील. शतकानुशतके वाळवंटात स्वतंत्र व निर्बंध जीवन जगल्यामुळे त्यांच्यात घोर अज्ञान निर्माण झाले होते. आपल्या अज्ञानात ते इतके निर्ढावलेले होते की, त्यांना माणसात आणणे हे कोणाही सामान्य माणसाच्या आवाक्यातील काम नव्हते. परंतु त्याचबरोबरच त्यांच्यात ही पात्रताही खचितच होती की जर एखाद्या महान व्यक्तीने त्यांच्यात सुधारणा घडवून आणली व त्याच्या शिकवणीच्या प्रभावाने ते एखाद्या उच्च ध्येयासाठी उभे ठाकले तर ते संपूर्ण जगावर प्रभावशाली व्हावेत. जगाच्या पाठीवर प्रेषिताच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी अशा तरुण व सामर्थ्यवान वंशाचीच गरज होती.
यानंतर तुम्ही अरबी भाषेकडे जरा दृष्टी टाका. ही भाषा जेव्हा वाचाल व तिच्यात असलेल्या साहित्याचा व ज्ञानाशयाचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हास हे समजून येईल की उदात्त व उच्च विचार व्यक्त करण्यासाठी व ईश ज्ञानासंबंधीच्या अत्यंत नाजूक व संवेदनशील सूक्ष्म गोष्टी व्यक्त करण्यासाठी व जनमाणसाच्या मनावर परिणामाचा ठसा उमटविण्यासाठी अरबी भाषेपेक्षा अधिक उचित व योग्य अशी दुसरी कोणतीही भाषा नाही. या भाषेत मोजक्या काही वाक्यांत मोठमोठ्या गहन विषयांचे विवरण होत असते. त्यातही परिणामकारक प्रभाव इतका असतो की, त्यातील विचार मनःपटलावर कोरले जातात. त्यामध्ये अशी काही गोडी असते की, कानात नाद-माधुर्य घोळत असते. त्यातील काव्य असे असते की मनुष्य अगतिकपणे डोलू लागतो. कुरआनसारख्या ग्रंथासाठी अशीच भाषा आवश्यक होती.
तात्पर्य असे की, अल्लाहचे महान चातुर्य या गोष्टीत ओतप्रोत भरलेले आढळते. संबंध विश्वाच्या प्रेषितासाठी (प्रेषित्वासाठी) अल्लाहने अरब भूमीची निवड केली. जे उज्ज्वल व महान व्यक्तिमत्त्व या कार्यासाठी निवडले गेले होते ते किती अपूर्व व अद्वितीय होते ते आता आपण पाहू या.
१) आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी सुमारे अडीच हजार वर्षे अरबस्थानात आदरणीय इब्राहीम (अ.) व आदरणीय इस्माईल (अ.) हे दोन प्रेषित होऊन गेलेले आहेत व या मधल्या प्रदीर्घ कालावधीत एकही प्रेषित अरबस्थानात जन्मलेला नाही.
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रेषित्वाचे प्रमाण
थोडावेळ आपले डोळे मिटून आपल्या कल्पनाशक्तीच्या भरारीने एक हजार चारशे वर्षापूर्वीचे जग कसे होते ते पाहू या. माणसामाणसातील विचारांची देवाण-घेवाण करण्याची साधने अल्पशी होती, देशादेशांमधील तसेच वंशावंशातील संपर्काची साधने मर्यादित होती, मनुष्याचे ज्ञान अल्प होते, त्याचे विचार संकुचित होते आणि त्याच्या वर भ्रम व रानटीपणाचा फार मोठा प्रभाव होता. अज्ञानरूपी घोर अंधकारात ज्ञान ज्योत धूसर झाली होती व तिचा प्रकाश त्या घनघोर काळोखाला अति प्रयासाने बाजूला सारीत पुढे जात होता. त्या काळी जगात तार नव्हती, टेलिफोन नव्हता, रेडिओ नव्हता, रेल्वे व विमाने नव्हती, मुद्रणालये, प्रकाशनगृहे नव्हती. शाळा व कॉलेज यांचे आधिक्य नव्हते. वर्तमानपत्रे प्रकाशित होत नव्हती, पुस्तकेही जास्त प्रमाणात लिहिली जात नव्हती. तसेच त्यांचे मोठ्या प्रमाणात प्रकाशनही होत नव्हते. त्याकाळात विद्वान समजल्या गेलेल्या माणसांचे ज्ञानसुद्धा काही बाबतीत आधुनिक युगातील सामान्य माणसाच्या ज्ञानापेक्षा कमी होते. त्या काळातील समाजाच्या उच्चस्तरीय माणसांतही आजच्या मजूर वर्गातील माणसापेक्षा शिष्टता कमी होती. त्या काळचा उदारमतवादी माणूस आजच्या अनुदार व्यक्तीपेक्षासुद्धा अनुदार होता.
जे ज्ञान आज सर्वसामान्य आहे त्याकाळी वर्षानुवर्षे परिश्रम करून, संशोधन करून कष्टाने प्राप्त होत असे. आज माहितीचा स्फोट (इनफरमेशन एक्स्प्लोजन) (Information Explosion) घरबसल्या क्षणार्धात उपलब्ध होतो त्यास प्राप्त करण्यासाठी शेकडो, हजारो मैल प्रवास करावा लागत असे आणि त्यात आयुष्य खपविले जात असे. ज्यांना आज आपण अंधविश्वास म्हणतो ते त्याकाळचे ‘सत्य’ होते. ज्यास आज असभ्य समजले जाते, ते त्याकाळचे दैनंदिन कामे होती. ज्या पद्धतींचे मानवी मन आज तिरस्कार करते त्या पद्धती त्याकाळी उच्च कोटीची नैतिकता समजली जात आणि कोणीही असा विचार त्या काळी करू शकत नव्हता की या पद्धतींविरुद्ध दुसरी पद्धत असू शकते. त्याकाळी मनुष्य अति विलक्षण प्रिय होता. तो एखाद्या गोष्टीला तोपर्यंत सत्य, महान व पवित्र मान्य करीत नसे जोपर्यंत ती गोष्ट अप्राकृतिक, अलौकिक, अस्वाभाविक व असाधारण असत नाही. त्याकाळी मनुष्य स्वतःला इतके हीन समजून होता की एखाद्याचे ईश्वरापर्यंत पोच असणे आणि ईश्वरापर्यंत एखाद्याची पोच असणे आणि ईश्वरापर्यंत पोच असलेली व्यक्ती मनुष्य असणे त्याच्या कल्पनेपलीकडे होते.

- प्रा. बी. एन. पांडे
    भारतीय इतिहासाची ही विडंबनाच आहे की, शुद्ध व नि:पक्षपातीपणे ऐतिहासिक दृष्टिकोनानुसार त्याकडे पाहण्याची किंचितही तसदी घेण्यात आली नाही.
    ओरिसा राज्याचे माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य आणि इतिहासतज्ञ मा. बी. एन. पांडे यांनी इतिहासातील जी तथ्ये, वास्तविकता व वृत्तांत या पुस्तकात उघड केले आहेत, त्यावरून स्पष्ट होते की या देशाचा इतिहास त्याच्या मूळ व वास्तविक स्वरूपात न ठेवता वाटेल तसा त्यात बदल करण्यात आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 86   -पृष्ठे - 12      मूल्य - 10      आवृत्ती - 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/7wnit36a5ecqbp9r2kg7fqs26e9o00bq

ईश्वर एकच आहे ही गोष्ट व त्याची वास्तविक गुणवत्ता त्याचे नियम व त्याची शिक्षा तसेच त्याच्या देणग्या जो मनुष्य जाणतो व त्यावर अंतःकरणापासून दृढविश्वास बाळगतो; त्याला ‘मोमिन’ (ईमानधारक) असे म्हणतात. ईमानचा अनिवार्य परिणाम असा आहे की मनुष्य ‘मुस्लिम’ अर्थात अल्लाहचा आज्ञाधारक दास बनतो.

ईमानच्या वरील व्याख्येवरून कोणीही मनुष्य ईमानखेरीज ‘मनुष्य’ होऊ शकत नाही, हे तुम्ही स्वतःच समजू शकता. बीज व वृक्ष यांचे जे नाते आहे तसेच नाते ईमान व इस्लाम यांचे आहे. बीजाशिवाय वृक्ष उगवूच शकत नाही. असे होऊ शकते की बीज जमिनीत पेरले जावे परंतु जमीन खराब असल्या कारणाने अगर हवा व पाणी योग्य रीतीने न मिळाल्यामुळे वृक्ष निस्तेज व खुरटलेली होईल. अगदी याच तऱ्हेने जो मनुष्य मुळातच ईमान बाळगत नसेल तर तो मुस्लिम होणे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. असे मात्र जरूर शक्य आहे की एखाद्या व्यक्तीच्या अतःकरणात ईमान आहे परंतु आपल्या इच्छाशक्तीच्या कमकुवतपणामुळे अथवा कमी प्रतिच्या शिक्षण संस्कारामुळे व कुसंगतीमुळे तो परिपूर्ण व पक्का मुस्लिम असणार नाही.

ईमान व इस्लामच्या दृष्टीने सर्व माणसांचे चार प्रकार आहेत.

  1. जे ईमानधारक आहेत. त्यांचा ईमान त्यांना संपूर्णपणे ईशआज्ञांचे पालन करणारे बनवितो. ईश्वरास अप्रिय असलेल्या गोष्टींपासून ते स्वतःला अशा प्रकारे वाचवितात जसे विस्तवाला हात लावण्यापासून मनुष्य स्वतःला वाचवितो. ईश्वरास प्रिय जे आहे ते अशा तन्मयतेने व मनःपूर्वक करतात, जसे मनुष्य आनंदाने धनद्रव्य प्राप्त करतो. असा मनुष्य खराखुरा मुस्लिम आहे.
  2. मनुष्य ईमान तर बाळगतो परंतु त्याचा ईमान दृढ व मजबूत नसतो आणि तो परिपूर्णपणे अल्लाहचे आज्ञापालन करणारा नसतो. हे जरी खालच्या श्रेणीचे लोक असले तरीही ते मुस्लिमच आहेत. हे लोक ईश्वराच्या आज्ञेची अवहेलना व अवज्ञा करीत आहेत तेव्हा त्यांच्या अपराधाच्या दृष्टीने ते शिक्षेस पात्र आहेत परंतु त्यांची अवस्था अपराध्यांची आहे, बंडखोर व द्रोही माणसाची नाही. याचे कारण असे आहे की ते सर्वसत्ताधीश सम्राटाला सम्राट मानतात व त्याच्या नियम-विधींचा नियमविधी म्हणून स्वीकार करतात.
  3. जे लोक ईमान तर बाळगत नाहीत परंतु ते अशी कृत्ये करीत असतात जी ईशनियमांशी अनुकूल व सुसंगत असे वाटतात, हे लोक वास्तविकपणे विद्रोही आहेत. त्यांची बाह्यत्कारी सत्कृत्ये वास्तविकपणे ईश्वराच्या आज्ञापालनातील आचरण नव्हे, म्हणून ती कृत्ये मूल्यहीन आहेत. सम्राटाला सम्राट न मानणाऱ्या व त्याच्या नियम-विधींना नियम-विधी न मानणाऱ्या माणसाप्रमाणे त्यांचे उदाहरण आहे. अशी व्यक्ती, ईश नियमाविरुद्ध नसणारे एखादे असे कृत्य करताना दिसत असेल तर तो सम्राटासमीप आपल्या कर्तव्याचे पालन करणारा व त्याचे नियम व विधींचे पालन करणारा आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. कोणत्याही अवस्थेत त्याची गणना विद्रोही लोकांतच होईल.
  4. जे लोक ईमान तर बाळगत नाहीतच परंतु आचरणाच्या दृष्टीनेसुद्धा दुष्ट व दुराचारी आहेत, असे लोक सर्वांत वाईट दर्जाचे आहेत. याचे कारण ते द्रोहीही आहेत तसेच ते विघ्न निर्माण करणारे आहेत. ते अत्याचारी आणि उपद्रवी आहेत.
    मानवसमूहाच्या या विभाजनाने हे स्पष्ट होते की ईमानावरच वास्तविकपणे मनुष्याच्या यशाचे श्रेय अवलंबून आहे. इस्लाम मग तो परिपूर्ण असो अथवा अपूर्ण असो, तो केवळ ईमानरूपी बीजानेच निर्माण होतो. जेथे ईमान नसेल तेथे त्याच्या जागी ‘कुफ्र’च असेल व कुफ्रचा अर्थ ईश्वराशी विद्रोह असा आहे, मग तो विद्रोह अल्पप्रमाणात असो की फार मोठ्या प्रमाणात असो.

परोक्ष (अदृश्य) यावर श्रद्धा (ईमान)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते तेव्हा ते ज्ञान असणाऱ्यांचा तुम्ही शोध घेता आणि त्यांच्या सांगण्यानुसार आचरण करता. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा स्वतःच औषधोपचार न करता डॉक्टरकडे जाता. यासाठी डॉक्टराचे प्रामाणिक असणे, अनुभवी असणे व त्याच्या औषधोपचाराने अनेकांना गुण येणे या सर्व बाबी अशा आहेत की ज्यामुळे तुमच्या उपचारासाठीची योग्यता व क्षमता सर्व त्या डॉक्टराच्या ठायी आहे, अशी तुमची श्रद्धा बनते. या श्रद्धेपोटीच तो जे औषध देतो व ज्या पद्धतीने घ्यावयाला सांगतो त्यानुसारच तुम्ही करीत असता आणि ज्या गोष्टीचे पथ्य पाळावयास सांगतो तसे तुम्ही वागता. याचप्रमाणे कायदाविषयक बाबतीत तुम्ही वकिलावर श्रद्धा बाळगता व त्यांच्या म्हणण्यानुसार वागता. शिक्षणाच्या बाबतीत तुमची श्रद्धा गुरुजनांवर असते. प्रवासात मार्ग ठाऊक नसेल तेव्हा जाणकाराच्या सांगण्यानुसार तुम्ही मार्गक्रमण करता. तात्पर्य की या जगातील प्रत्येक व्यवहारात तुम्हाला माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी एखाद्या जाणकारावर श्रद्धा ठेवावी लागते आणि त्याच्या म्हणण्यानुसार वागणे तुम्हाला भाग पडते. यालाच परोक्षावरील श्रद्धा असे म्हणतात.

परोक्षावरील श्रद्धेचा अर्थ असा आहे की जे काही तुम्हास माहीत नाही ते माहीत असणाऱ्याकडून जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. ईशसत्तेशी व ईशगुणांशी तुम्ही परिचित नाही. तुम्हाला हेही ठाऊक नाही की त्याचे फरिश्ते (दूत) त्याच्या आदेशाबरहुकूम सर्व विश्वाची कामे करील असून तुम्हाला चोहोबाजूने त्यानी वेढलेले आहे. तुम्हास हेही माहीत नाही की, ईशइच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे? तुम्हाला पारलौकिक जीवनासंबंधीचा खरा वृत्तांत ठाऊक नाही. या सर्व गोष्टीचे ज्ञान तुम्हाला अशा माणसाकडून प्राप्त होते जो सत्यनिष्ठा, सरळपणा, ईशभय, अत्यंत पवित्र जीवन व बुद्धियुक्त आहे. त्याचे ऐकून तुम्हाला असे पटते की तो जे काही सांगत आहे, ते सर्व सत्य असून त्याच्या सर्व गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत. यालाच परोक्षावरील श्रद्धा (ईमान-बिल-गैब) म्हणतात. अल्लाहचे आज्ञापालन करण्यासाठी व त्याच्या इच्छेनुसार आचरण करण्यासाठी परोक्षावरील श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण असे की, प्रेषिताखेरीज अन्य कोणाकडूनही तुम्हाला उचित ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही व उचित ज्ञानाखेरीज तुम्ही इस्लामच्या जीवनपद्धतीवर नीटपणे आचरण करू शकत नाही.

खंदक’ (खाई) च्या युद्धप्रसंगीच ‘ज्यू’ समाजाच्या ‘कुरैज’ कबिल्याने ‘मदीना समझोता’चा करार मोडून ज्याप्रमाणे इस्लामद्रोही ‘कुरैश’जणांसह केलेला साटेलोटे जर अमलात आला असता तर आदरणीय प्रेषितांचा इस्लामी समूह, कृपा आणि न्यायाचे आंदोलन आणि ‘मदीना’ येथील एकेश्वरवादी व्यवस्था नष्ट झाली असती. अर्थातच ‘ज्यू’ समाजाने ‘मदीना समझोता’ करार मोडून शत्रूची साथ देणे ही मोठीच गद्दारी होय आणि ही गद्दारी खपवून घेण्यासारखी मुळीच नव्हती.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या इशार्यावर प्राण पणाला लावणारे त्यांचे सैनिक अत्यंत थकलेल्या अवस्थेत घरी परतले. आपले हत्यार टांगले आणि स्नान केले. एवढ्यात प्रेषितांना दैवी आदेश झाला आणि त्यांनी आपले लष्कर परत जमा केले. बर्याच सैनिकांनी आपले हत्यार आणि सामरिक पोषाख अंगावरून काढून ठेवला ही नव्हता की, प्रेषितांचा आदेश मिळताच प्रेषितांच्या नेतृत्वाखाली ‘कुरैजा’ कबिल्याकडे कूच केले. ‘कुरैजा’ कबिल्याचे लोक तत्काळ किल्यात शिरले व किल्याचे सर्व दरवाजे त्यांनी आतून बंद करून घेतले. मुस्लिम सैन्याने या किल्ल्यास वेढा दिला. २५ दिवस लोटल्यावर ‘कुरैज’ कबिल्याच्या लोकांनी आत्मसमर्पण केले. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्याशी बोलणी केल्यावर त्यांच्या आवडीनुसार ‘माननीय साद बिन मुआज(र)’ यांना मध्यस्थ बनविले आणि दोन्हीं पक्षांकडून त्यांच्यावर निर्णय सोपविला. ‘माननीय साद(र)’ यांनी ‘ज्यू’ च्या ‘तौरात’ या धर्मग्रंथानुसार निर्णय दिला. या निर्णयात एक धारा अशीदेखील होती की, लढण्यायोग्य असलेल्या सर्व तरूणांना मृत्युदंड देण्यात यावा आणि अशा प्रकारे या द्वेषभावाचा नायनाट झाला.
आता आपण विभिन्न लष्करी कारवायांचा उल्लेख करु या.
‘माननीय मस्लिमा अनसारी(र)’ हे तीस स्वारसह गस्त घालीत असताना त्यांची ‘नज्द’ येथील सरदार ‘सुमामा’ शी चकमक झाली आणि त्यांनी या प्रभावी विरोधकास अटक करून प्रेषितांसमोर हजर केले. ‘सुमामा’ने प्रेषितांना स्पष्ट शब्दांत सांगितले,
‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही जर माझी हत्या केली तर निश्चितच ती एका योग्य माणसाची हत्या होईल. जर जीवदान दिले तर निश्चितच एका उपकाराची जाण ठेवणार्या माणसास जीवदान मिळेल आणि जर माझ्या बदल्यात संपत्ती पाहिजे असेल तर तुम्ही सांगाल तेवढी संपत्ती देऊन टाकीन!’’
आदरणीय प्रेषितांनी त्याची स्पष्टोक्ती पाहून त्यास आदरासहित सोडून दिले. ‘सुमामा’ प्रेषितांच्या या उदार आणि निःस्वार्थी स्वभावाने खूप प्रभावित झाला आणि प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेऊन म्हटले,
‘‘आजघडीच्या पूर्वी प्रेषित मुहम्मद(स) पेक्षा जास्त कुणाशीच वैर बाळगत नव्हतो. परंतु आज प्रेषितांवरील प्रेमापेक्षा जास्त प्रेम कुणावरच नाही.’’ इस्लाम स्वीकारताच ‘सुमामा(र)’ यांनी थेट मक्का जाऊन घोषणा केली की, ‘‘आजपासून तुम्हाला ‘नज्द’कडून अन्नाचा एक दाणाची मिळणार नाही.’’ (‘नज्द’ च्या भागातून मक्का शासनास खंडणी मिळत असे)
‘इजीअ’ येथील ज्या लोकांनी शिक्षकवृदांची धोक्याने हत्या केली होती, त्यांना धडा शिकविण्यासाठी प्रेषितांनी दोनशे सैनिकांसह ‘रजीअ’कडे कूच केले. परंतु त्यांनी तेथून आधीच पळ काढल्यामुळे ते प्रेषितांच्या हाती लागले नाहीत.
मदीना शहरापासून एक मैल अंतरावर एक पाण्याचा झरा होता. (आजही आहे) त्याच्या आसपास गुरे चरण्याचे सरकारी गायरान होते. ‘उसफान’चा एक माणूस गुरांची देखभाल करण्यासाठी नियुक्त करण्यात आला होता. ‘रबाह’ नावाच्या एका नोकरास त्याची खबर आणण्यासाठी पाठविण्यात आले. ‘सलमा बिन अकवा’ हे सैनिकसंरक्षक होते. ते कामावर जात असताना सकाळी सकाळी ‘उयेना बिन फजारी’ याने उंटावर दरोडा घातला. गुरांची देखभाल करणार्याची हत्या केली आणि त्याच्या पत्नीसही बळजबरी उचलून नेले. ‘सलमा’ यांनी जेव्हा या लूटमारीचे दृष्य पाहिले, तेव्हा ते तत्काळ मदीनाकडे धावले आणि मदीनावासीयांना हाक देऊन ‘रबाहा’ या नोकरास कुमक घेऊन येण्याचे आदेश दिले आणि एकटेच त्या डकाइताचा पाठलाग करण्यासाठी धावले. त्यांनी बाणांचा निशाना साधत दरोडेखोरांच्या टोळीच्या एकेकास टिपून ठार केले. रस्ता पर्वतमय होता. डकाइतांची नजर चुकविताना ते बाण सोडून टेकड्यांच्या मागे लपत होते. हे गोरिला युद्धाचे एक उत्तम उदाहरण होते. दरोडेखोरांना वाटले की, कदाचित सैन्य आपल्यामागे लागले आहे. त्यांनी घाबरून जाऊन सर्व उंट सोडून पळ काढला. एवढ्यात प्रेषित मुहम्मद(स) हेदेखील कुमक घेऊन पोहोचले. ‘माननीय सलमा(र)’ म्हणाले,
‘‘माझ्याबरोबर शंभर सैनिक दयावेत. मी या सर्व दरोडेखोरांचा खात्माच करून येतो.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ईश्वराने तुम्हाला विजय प्रदान केलाच आहे, तेव्हा थोड्या नरमाईचा व्यवहार करा!’’
अर्थातच इस्लामी आंदोलनकर्त्यांच्या नसनसात प्रेरणा भरलेली होती. अशा प्रकारे प्रेषितांनी काही छोट्याछोट्या तुकड्या सभोवतालच्या भागातही रवाना केल्या. उदाहरणार्थ, ‘असद’ कबिला, ‘सालबा’ कबिला आणि ‘साद बिन बक्र’ कबिल्यावर विजय मिळविला.

आपण मक्कावासीय कुरैश कबिल्याच्या इस्लामद्रोही कारवायांकडे वळू या. ‘कुरैश’ आणि मदीनातील मुस्लिम शक्तींमध्ये एक मोठा फरक होता. ‘कुरैश’जणांतील ‘अज्ञान व्यवस्थेचा’ आत्मा अत्यंत थकलेला आणि कुजलेला होता. त्या समाजाचा एखादा अवयव प्रत्येक वेळी तुटून मदीनाच्या झोळीत येऊन पडत. त्या तुलनेत इकडे मदीनातील मुस्लिम शक्ती रचनात्मक, सिद्धान्तनिष्ठ, संदेशवाहक आणि जनसमर्थित शक्ती असल्यामुळे ती गतीशील, सक्रीय असून सतत विकास पावत होती. काळ लोटत होता आणि जसाजसा काळ लोटत होता, तसतसा मदीनासाठी फायद्याचा आणि मक्कासाठी हानीकारक सिद्ध होत होता. तेव्हा आता मुस्लिमांवर हल्ला करून त्यांची शक्ती नष्ट करण्यासाठी त्यांना एका प्रचंड शक्तीची नितांत आवश्यकता होतीच. याकरिता कुरैश, ज्यूडिश, अहाबिश, गतफान वगैरे कबिल्याचे लोकही शक्ती निर्माण करण्याच्या जोरदार तयारीस लागले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी एक जबरदस्त योजना मुस्लिम शक्तीविरुद्ध आखली.
या योजनेनुसार दहा हजार सैनिकांचे एक जबरदस्त लष्कर तयार करण्यात आले. आदरणीय प्रेषितांना या योजनेची खबर मिळताच त्यांनी तत्काळ बैठक भरवून निर्णय घेतला की, मदीना शहरात राहूनच शत्रूपक्षाचा प्रतिकार करावा. ‘माननीय सलमान फारसी(र)’ यांचा सल्ला मान्य करण्यात आला की, मदीनेच्या उत्तरेकडे असलेल्या खुल्या भागात खंदक खोदण्यात यावा. या कार्यासाठी तीन हजार मुस्लिम सैनिक कामाला लागले. दहाजणांची टोळी तयार करून पाच किलोमीटर लांबीची असलेला हा खंदक तेरा लाख शेह्यांशी हजार घनफूट माती खोदून तयार करण्याचे कार्य सुरु झाले. यानुसार प्रत्येक सैनिकाच्या वाट्याला जवळपास चारशे बासष्ट घनफूट खड्डा खोदून माती बाहेर फेकण्याचे काम आले. टोपली कमी असल्यामुळे ‘माननीय अबू बकर(र)’ आणि ‘उमर(र)’ यांच्यासारख्या लोकांनी आपल्या अंगरख्याच्या झोळीत माती उचलून काम केले.
खंदक खोदण्याचे काम पूर्ण होताच हि. स. पाचमध्ये शत्रूचे पायदळ सैनिक मदीना शहराजवळ धडकले. खंदकाची कल्पना त्यांना माहीतच नव्हती. काहीजण घोड्यांवर स्वार होऊन खंदक पार करण्याच्या प्रयत्नांत दरीत कोसळून ठार झाले. केवळ एकदाच असे झाले की, शत्रूपक्षाच्या ‘अम्र बिन अब्दे वदूद’ या बलाढ्य योद्ध्याने एका योग्य ठिकाणी येऊन काही सैनिकांसह खंदक पार करून प्रवेश मिळविला. त्याने युद्धाचे आवाहन करताच ‘माननीय अली(र)’ यांनी त्यास यमसदनी धाडले. अशा प्रकारे काही ठिकाणी टोळीटोळीने झडपा होत राहिल्या. परंतु अशा झडपांमुळे लढाई निर्णयास पोहोचत नाही. शेवटी निर्णयात्मक लढाई लढण्याासाठी कुरैश कबिल्याने एक धूर्त चाल आखली. त्यांनी ‘कुरैजा’ परिवारास मदिनातील मुस्लिमांवर पाठीमागून हल्ला करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांना दीड हजार सैनिक देण्यात आले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ‘औस’ आणि ‘खजरज’ कबिल्याच्या सरदारांना बोलावून सांगितले की, तुमची हरकत नसेल तर ‘गतफान’ कबिल्याशी मदीनाच्या मिळकतीच्या एक तृतीयांश भागावर समझोता करु या. परंतु या सरदारांनी अशी भूमिका मांडली की, ‘‘ज्या वेळी आम्ही इस्लामचा स्वीकार केलेला नव्हता त्या वेळी आम्ही एक खडकूसुद्धा त्यांना खंडणी दिली नाही. मग आता कशापोटी आपली संपत्ती त्यांना द्यावी?’’
याच प्रसंगी ‘नुएम बिन मसऊद(र)’ यांनी इस्लाम स्वीकारण्याची घोषणा करून प्रेषितांना सांगितले की, ‘‘आपली परवानगी असेल तर मी ‘कुरैश’ आणि ‘कुरैजा’ कबिल्यात फूट पाडू शकतो. कारण अद्याप त्यांना माझ्या इस्लामस्वीकृतीची खबर मिळालेली नाही.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना परवानगी देऊन टाकली आणि माननीय नुएम बिन मसऊद(र) यांच्या प्रयत्नाने शत्रूपक्षात फूट पडली.
तब्बल एक महिन्यापर्यंत शत्रूने ‘मदीना’ शहरास वेढले होते. सैन्याचे मोर्चावर जाऊन रिकामे बसणे कठीण होत जात असते. त्याचबरोबर ‘रसद’चा प्रश्नही शत्रूसाठी बिकट होत होता. शत्रूच्या रसदीच्या एका खेपेवर मुस्लिम सैन्याने ताबा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. ऋतुमानसुद्धा जास्त थंड होत असल्याने शत्रूपक्षाचे अवसान गळून पडत होते. एके रात्री खूप जोरात सोसाट्याचा वारा सुटला आणि शत्रूसैन्याचे तंबू उडू लागले. प्राणी सैरावैरा पळू लागले. तसेच शत्रूसैन्यसुद्धा वादळास घाबरून पळू लागले. सकाळ होता होता पूर्ण मैदान रिकामे झाले.
या प्रसंगी मदीना शहरात मुस्लिम समुदायाकडे खाद्य सामग्रीची चणचण होती. लोक पोटावर दगड बांधून काम करीत होते. आदरणीय प्रेषितांनीसुद्धा आपल्या पोटावर दोन दगड बांधले हते. अर्थात मुस्लिम समुदायाचे आणि इस्लामी राज्याचे प्रमुख असलेले लोकसुद्धा सामान्यजणांप्रमाणे आपल्या रयतेत मिसळून कामाला लागलेले होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे जातीने खोदकामात मग्न होते. एखादी बिकट समस्या आल्यास विशेषतः प्रेषितांना बोलावून समस्या दूर करण्यात येत असे. माननीय अली(र) यांचे कथन आहे की, ‘‘या कामामध्ये एक मोठे पाषाण लागले. ते लवकर फुटत नसल्याने माझ्या जवळच काम करीत असलेल्या प्रेषितांना दाखविले. प्रेषित मुहम्मद(स) यांनी माझ्या हातून टिकाव घेतला आणि नेमक्या ठिकाणी दोन वार करून ते पाषाण फोडले. याच प्रसंगी ईश्वराकडून प्रेषितांना ‘येमेन’, सीरिया, पश्चिमी अरब आणि पर्शिया विजयाच्या भविष्यवार्ता देण्यात आल्या.
इतक्या कठीण परिस्थितीतही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे प्राण पणाला लावून घाम गाळत होते. कारण त्यांना आता पूर्ण विश्वास झाला की, आता आपणास आणि आपल्या आंदोलनास निश्चितच यश लाभेल. एवढेच नव्हे तर प्रेषितांनी आपल्या प्रबळ विश्वास शक्तीच्या आधारे घोषणादेखील करून टाकली की, ‘‘आता कुरैश ‘मदीना’वर कधीच चढाई करू शकणार नाही.’’ आदरणीय प्रेषितांची ही भविष्यवाणी अगदी सत्य सिद्ध झाली.

‘मुस्तलक’ कबिल्याविरुद्ध कारवाई म्हणजे हिजरी सन पाचमधील एक अतिशय महत्त्वपूर्ण घटना होय. हा कबिला खूप उपद्रवी आणि भांडखोर होता. प्रेषितांना सूचना मिळाली की, हा कबिला बंड करण्याच्या तयारीत आहे. प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आदरणीय प्रेषितांनी ‘माननीय बुरैदा(र)’ यांना पाठवून मिळालेली सूचना खरी असल्याचे समाधान करून घेतले. ‘शाबान’ महिन्याच्या तीन तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) लष्करासह जलद गतीने ‘मुरैसीअ’ या ठिकाणी पोहोचले. शत्रूपक्ष लढण्यासाठी येणारच होता, परंतु प्रेषितांना अचानक आलेले पाहताच त्याचे आवसान गळाले. शत्रूचे संपूर्ण सैन्य घाबरले आणि अभय देण्याची मागणी केली. शत्रूच्या या लष्करात ‘माननीय जुवैरिया’सुद्धा होत्या. त्यांनी मोठ्या आवाजात इस्लाम स्वीकारण्याची घोषणा केली आणि प्रेषितांनी त्यांना त्यांच्या स्वइच्छेने आपल्या विवाहबंधनात घेऊन सन्मान दिला. या ठिकाणी शत्रूपक्षास युद्ध न करताच पराभवाचे तोंड पाहावे लागले. ‘माननीय जुवैरिया(र)’ या कबिल्याच्या सरदाराची कन्या होती.
मुस्लिम समुदायाच्या या विजयामुळे इस्लामद्रोही असलेल्या दांभिकजणांचा जळफळाट झाला. सूड आणि द्वेषापोटी दांभिकांनी मदीना शहरातील मुस्लिम समुदायात कलह निर्माण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु आदरणीय प्रेषितांनी जातीने लक्ष घालून दांभिकांची कूटनीती उद्ध्दस्त केली.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget