हिजरी सन सातमध्ये ‘मुहर्रम’ महिन्याच्या एक तारखेस गुरुवारच्या दिवशी
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे सर्व अनुयायी मस्जिदमध्ये जमा झाले.
प्रेषितांनी सर्व अनुयायांना संबोधित करताना म्हटले,
‘‘लोकहो! मला ईश्वराने संपूर्ण विश्वासाठी दया व कृपेचा प्रेषित बनवून
पाठविले आहे. लक्षात ठेवा! येशू ख्रिस्त या प्रेषितांच्या अनुयायांप्रमाणे
आपसात मतभेद करू नका. माझ्यातर्फे सत्यसंदेशाचा प्रचार करण्याचे कर्तव्य
पूर्ण करा.’’
प्रेषितांचे हे भाषण मुळात मदीनावरून सुरु होणार्या आंतरराष्ट्रीय
प्रसार व प्रचाराच्या नवीन आंदोलनाची प्रस्तावना होती. सत्यधर्माच्या या
क्रांतिकारी आंदोलनामध्ये आतापर्यंत स्थानीय संघर्षांमुळे मानवजातींच्या
विशाल क्षेत्रात कार्य करण्यात बाधा येत होती. कोणतेही आंदोलन सुरुवातीस
स्थानीय आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असते आणि मग आपली यशस्वी वाटचाल
करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचते.
‘हुदैबिया’ समझोत्यामुळे ‘कुरैशां’च्या हल्यांपासून प्रेषित आणि इस्लामी
आंदोलनास रक्षण मिळाले असल्याने प्रेषितांना संपूर्ण जगात ईश्वरी कृपाशील
सत्यधर्माचा प्रचार करण्याची संधी मिळाली. या कार्याची सुरुवात विविध
देशांतील बादशाहांना आणि राष्ट्रप्रमुखांना पत्र लेखनाने झाली.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या अनुयायांच्या सल्ल्याने पत्रावर मारण्याचा एक ठसा
(मोहर) तयार केला, ज्यावर ‘मुहम्मदुर्रसूलुल्लाह’
(मुहम्मद ईश्वराचे प्रेषित) असे लिहिण्यात आले.
एकाच ईश्वराच्या उपासनेच्या आधारावर स्थापन होणार्या क्रांतीपूर्ण
राज्याचे संस्थापक आणि सत्यधर्माचे आवाहन करणारे प्रेषित मुहम्मद(स) यांनी
रोमन सम्राट, इजिप्शियन राजा, इराकचा सम्राट आणि अरबच्या सरदारांच्या
नावे पत्र पाठविले. रोमन सम्राट ‘हिरकल’च्या नावे पाठविण्यात आलेल्या
पत्राचा काही महत्त्वाचा मजकूर खाली देत आहोत.
‘‘असीम दयाळू व कृपाळू ईश्वराच्या नावाने, हे पत्र ईश्वराच्या दास आणि
प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून रोमन सम्राट ‘हिरकल’च्या नावे आहे.
ईश्वराचे त्यास रक्षण लाभो जो सत्याचा मार्ग स्वीकारेल.
या प्रस्तावनेनंतर मी तुम्हास इस्लाम धर्माकडे हाक देत आहे. इस्लामचा
स्वीकार केल्यास. तुम्हास संरक्षण लाभेल आणि ईश्वर तुम्हास या कर्माचे
द्वीगुणित फळ देईल. आणि जर तुम्ही हे निमंत्रण स्वीकारले नाही, तर संपूर्ण
राष्ट्राचा इस्लाम न स्वीकारण्याचा अपराध तुमच्या माथी असेल.’’
‘बैतुल मक्दिस’
(पवित्र भूमी यरुशलेम) येथे ज्या वेळी रोमन
सम्राटास हे पत्र मिळाले, तेव्हा त्याने आदेश दिला की, एखादा अरब म्हणून
या भागात असल्यास त्यास हजर करण्यात यावे. योगायोगाने मक्कातील ‘कुरैशचा
सरदार ‘अबू सुफियान’ व्यापारी उद्देशाने तेथे आलेला होता. त्यास त्याच्या
सहकार्यांसहित सम्राट दरबारी हजर करण्यात आले. रोमन सम्राटाने ‘अबू
सुफियान’ ला विचारले, ‘‘तुम्ही या माणसास
(प्रेषितांना) ओळखता काय?’’
‘‘होय! ओळखतो, परंतु आमचे त्याच्याशी वैर आहे.’’ अबू सुफियानने उत्तर दिले.
‘‘हा माणूस पप्रेषित मुहम्मद(स)ब कधी खोटे बोलताना तुम्ही ऐकले काय?’’ रोमन
सम्राटाने प्रश्न केला. ‘‘नाही! मुळीच नाही.’’ अबू सुफियान उत्तरला. ‘‘जो
माणूस कोणाशीही कधीच खोटे बोलत नाही, तो ईश्वराविषयी देखील कसे काय खोटे
बोलणार!’’ रोमन सम्राट बोलत गेला.
‘‘हाच तर प्रेषिताचा विशेष गुणधर्म असतो. तो नमाज, ईशपरायणता आणि क्षमा
करण्याची शिकवण देतो. हा मनुष्य निश्चितच ईश्वराचा प्रेषित आहे. आम्ही खूप
पूर्वीपासून वाट पाहात होतो की, एक प्रेषित प्रकट होणार आहे. परंतु
आम्हास याची कल्पना नव्हती की, ते अरब राष्ट्रात उदयास येतील. त्यांचे
दर्शन झाले असते, तर आमचे सुदैवच म्हणावे लागले. मी त्यांच्याजवळ असतो, तर
त्यांचा अनुयायी झालो असतो. एके दिवशी त्यांचे शासन इथपर्यंत पोहोचेल
ज्या ठिकाणी मी उभा आहे.’’
एवढे बोलून त्याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना पत्र पाठविले की,
‘‘मी तर मुस्लिम आहे!’’ प्रेषितांना पत्र मिळाल्यावर ते म्हणाले, ‘‘तो
चक्क खोटे बोलतो. तो तर अजूनही येशू ख्रिस्ताच्या धर्मावरच आहे.’’
पर्शियाचा सम्राट ‘खुसरो परवेज’ ला जेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स)
यांच्याकडून इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रणपत्र मिळाले, तेव्हा त्याचा राग
अनावर झाला आणि संतापाच्या भरात पत्र फाडून टाकून तो म्हणाला, ‘‘माझी
सत्ता संपूर्ण प्रदेशावर असून हा माणूस पप्रेषित मुहम्मद(स)ब माझ्या
रयतेपैकी असून माझ्यावर आदेश गाजवितो!’’
ईश्वराची करणी अशी झाली की, अगदी अल्पकाळातच पर्शियन साम्राज्याचे तुकडे
विखुरले. ‘खुसरो परवेज’ने प्रेषित मुहम्मद(स) चे पत्र फाडून ‘येमेन’चा
गव्हर्नर ‘बाजान’ यास आदेश दिला की, ‘प्रेषितत्वाचा दावा करणार्या या
माणसास तत्काळ अटक करून सम्राटदरबारी हजर करावे. आदेश मिळताच ‘बाजान’ने
प्रेषितांना अटक करण्यासाठी दोन शिपायांना पाठविले. दोन्ही शिपाई
प्रेषितदरबारी हजर होऊन म्हणाले, ‘‘आपण सम्राटाचा आदेश मान्य केला नाही तर
तो तुमच्या देशाला उद्ध्वस्त करील.’’ प्रेषितांनी त्या शिपायांना स्पष्ट
शब्दांत सांगितले, ‘‘तुम्ही परत जाऊन माझा निरोप सांगा की, इस्लामचे शासन
किसरा
(खुसरो परवेज)च्या राजधानीपर्यंत पोहोचणारच! तुम्हीसुद्धा
तुमच्या डोळ्यांनी पाहा, किसराच्या पुत्रांनी त्याची हत्या केली आहे.’’
प्रेषितांचा निरोप ‘बाजान’पर्यंत पोहोचला आणि त्याला मुहम्मद
(स.)
यांच्या प्रेषितत्वावर विश्वास बसला. कारण तिकडे खरोखरच ‘खुसरो’च्या
मुलांनी त्याचा वध केला होता. तेव्हा त्याने इस्लामचा स्वीकार केला,
त्याच्याबरोबर त्याच्या दरबारींनी आणि त्यांच्या देशातील बर्याच जणांनी
इस्लाम स्वीकारला.
आंतरराष्ट्रीय धर्मप्रसारात इस्लामला मिळालेले हे पहिले आणि मोठे यश होय.
‘इजिप्त’ देशाचा राजा ‘मकूकस’ने प्रेषित मुहम्मद(स) यांचे
इस्लामनिमंत्रणाचे पत्र वाचून चांगले विचार व्यक्त केले. त्याने मोठ्या
आदराने प्रेषितांचे पत्र हस्तीदंताच्या एका डब्यात सुरक्षित ठेवले.
उत्तरादाखल एक आदरयुक्त पत्रही पाठविले. सोबत काही वस्तू भेट म्हणून
पाठविल्या. प्रेषितांचे पत्रवाहक ‘माननीय हातिब(र)’ यांनाही काही वस्त्र
आणि सोने भेट म्हणून दिले.
‘अॅबीसिनिया’ या देशाचा राजा ‘नेगूस’ हा पूर्वीपासूनच प्रेषित
मुहम्मद(स) यांचा खूप आदर करीत असे. त्याने मागील काळात प्रेषितांच्या
अनुयायांना आपल्या देशात आश्रय दिला होता. प्रेषितांचे पत्र मिळताच त्याने
अत्यंत आदराने प्रेषितांना उत्तर पाठविले की, ‘आपण एक ईश्वर आणि
प्रेषितांवर श्रद्धा बाळगली आहे आणि इस्लामचा स्वीकार करीत आहे.’
‘यमामा’चा सरदार ‘हौजा बिन अली’ यानेसुद्धा प्रेषितांचे पत्र खूप
आदरपूर्वक वाचले आणि इस्लाम स्वीकारण्याची तयारी दर्शविली, परंतु त्याने
एक अट ठेवली की, अधिकांरामध्ये त्याचाही वाटा ठेवावा. प्रेषितांनी त्याची
अट मान्य केली नाही आणि काही काळानंतर तो मरण पावला. अशा प्रकारे बर्याच
सरदारांनासुद्धा प्रेषितांनी पत्रे पाठविली.
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या या लेखन प्रचारप्रणालीमुळे त्यांचा परिचय
सभोतालच्या लहान मोठ्या दरबारांत झाला. प्रेषितांची शिकवण आणि प्रेषित्वाची
विभिन्न क्षेत्रांमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली. बाह्य प्रदेशातील काही
महत्त्वाच्या व्यक्तींनी आणि इतर बर्याच जणांनी इस्लामचा स्वीकार केला.
तसेच काहींनी विरोधी भूमिका घेतली. तरीदेखील या विरोधी भूमिकेमुळेसुद्धा
प्रेषितांचा परिचय होत गेला. त्याचबरोबर सभोवताली असणार्या शासनांस या
गोष्टीची जाणीव झाली की, ज्या प्रदेशात लोक कबिल्यांच्या स्वरुपात गटागटाने
राहात होते आणि आपसात लढत होते, त्या प्रदेशात एक नवीन अनुशासनबद्ध राज्य
स्थापन झाले आहे.
सारांश असा की, काही दिवसांतच प्रेषित मुहम्मद(स) यांचा सुख-शांतीचा संदेश आंतरराष्ट्रीय क्षेत्रात दाखल झाला.