Latest Post

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्यधर्माचे प्रसारकार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य सुरुच ठेवले. याच कार्याचा एक भाग म्हणजे आदरणीय प्रेषितांनी माननीय हारिस बिन उमैर(र) यांना ‘सीरिया’कडे दूत म्हणून पाठविले. परंतु ‘हिरकल’ सम्राटाचा राज्यपाल शुरह बिल बिन अम्र याने त्यांना रस्त्यातच शहीद केले. हे पातक कृत्य मानवनीतीची पायमल्ली करणारे आणि दूतांचे अधिकृत अधिकार हिरावून घेणारे असल्याने इस्लामी शासन एवढे घोर पाप सहन करण्याएवढे आणि आपले मूल्य पायदळी तुडविताना उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहण्यासारखे तर मुळीच नव्हते.
‘मौता’चे युद्ध अगोदरच घडले होते. ते असे की, हिजरी सन ७ मध्ये ‘जमादिलआखिर’च्या महिन्यात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय जैद बिन हारिसा(र) यांच्या नेतृत्वात तीन हजारांचे सैन्य ‘सीरिया’च्या ‘बलका’ या प्रदेशाकडे पाठविले होते. हे सैन्य रवाना करण्यासाठी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जातीने मदीना शहराबाहेर त्यांच्यासोबत गेले होते.
हे सैन्य जेव्हा ‘मुआन’ या ठिकाणी पोहोचले तेव्हा ‘सम्राट हिरकल’ तेथे दौर्यावर आल्याचे समजले. त्याच्यासोबत खूप बलाढ्य लष्कर आणि मोठ्या संख्येत ख्रिस्ती समुदाय होता. त्याच्यासोबत असलेल्या लष्कराची आणि ख्रिस्ती समुदायाची संख्या जवळपास एक लाखावर होती. इस्लामी लष्कराच्या अधिकार्यांनी सल्लामसलत करून निर्णय घेतला की शत्रूच्या बलाढ्य सैन्यास न घाबरता त्याचा सामना करू. ‘मुशारिफ’ या ठिकाणी दोन्ही सैन्याची टक्कर झाली. तुंबळ युद्ध सुरु झाले. या युद्धात इस्लामी लष्कराचे सेनापती माननीय जैद बिन हारिसा(र) हुतात्मे झाले. सेनापतींचा झेंडा माननीय जाफर(र) यांनी सांभाळला आणि त्यांनीही शत्रूंचे नव्वद घाव शरीरावर झेलून आपल्या प्राणाचे बलिदान दिले. नंतर माननीय खालिद बिन वलीद(र) पुढे सरसावले आणि शत्रूसैन्यावर अक्षरशः तुटून पडले. शत्रूवर हल्ला करताना त्यांच्या हातून नऊ तलवारी तुटल्यात. अंततः शत्रूसैन्य पराभूत झाले. इस्लामी लष्कराचे बारा शूर वीर या युद्धात शहीद झाले.
अत्यंत कमी संख्येत असलेले आणि कमी शस्त्रसामुग्री असलेले इस्लामी लष्कर ही मोहीम फत्ते करून परतले. याच युद्धामधील विजयाचे श्रेय माननीय खालिद बिन वलीद(र) यांना मिळाले आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांना ‘सैफुल्लाह’ (अर्थात ईश्वराची तलवार) हा किताब बहाल केला.
हा ‘मौता’ च्या युद्धाचा वृत्तान्त आहे. याच युद्धाचा दुसरा भाग म्हणजेच ‘तबूक’चे युद्ध होय. ‘तबूक’चे युद्ध हे इस्लामी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे. मक्काच्या विजयानंतर हिजरी सन ०९ च्या रजब महिन्यात खबर मिळाली की, ‘सम्राट हिरकल’चे लष्कर मदीना शहरावर हल्ला करण्याची ‘सीरिया’मध्ये जोरदार तयारी करीत आहे. ‘सम्राट हिरकल’ हा अफाट भूप्रदेशाचा सम्राट होता आणि त्याने ‘ईराण’च्या अफाट शक्तिशाली शासनास पराभूत केले होते. त्यामुळे त्याच्या नावाने संपूर्ण जगाचा थरकाप उडत असे. परंतु इस्लामी शासन मात्र जगातील कोणत्याही शक्तीला न जुमानता सत्यधर्माचा प्रसार करीत होते.
‘मदीना’ शहरास केंद्र बनवून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी मोठ्या त्याग व परिश्रमाने इस्लामी राज्याची स्थापना केलेली होती. त्यामुळे या शासनास क्षती पोहोचणे म्हणजे एक असहनीय बाब होती. म्हणून असा ठाम निर्णय घेण्यात आला की, कोणत्याही परिस्थितीत रोमन सम्राटाच्या सैन्यास अरब प्रदेशात घुसू न देता बाहेरच हे युद्ध सर करावे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी इस्लामी लष्कराने युद्धाची जोरदार तयारी सुरु केली. उन्हाची रखरख वाढलेली होती. दुष्काळही पडलेला होता. अशा विषम परिस्थितीतही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी युद्धासाठी वर्गणी देण्याचे आवाहन करताच मुस्लिमांनी वर्गणीचे असे उदाहरण सादर केले की, ही बाब जगाच्या इतिहासात इतरत्र कोठेच सापडत नाही. एकट्या माननीय उस्मान(र) यांनी नऊशे उंट आणि शंभर घोडे प्रेषितांना सादर केले. माननीय अब्दुर्रहमान बिन औफ(र) यांनी ४० हजार दिरहम (आजचे जवळपास आठ लाख रुपये) चा प्रेषितांसमोर ढीग लावला. माननीय अबू बकर सिद्दीक(र) यांनी तर घरातील संपूर्ण संपत्तीच अगदी झाडू मारून आणून प्रेषितांसमोर हजर करून या देणगीस्पर्धेत बाजी मारली. माननीय उमर(र) यांनी आपल्या पूर्ण संपत्तीचा निम्मा भाग प्रेषितांसमोर ठेवला. परंतु या देणगीकार्यात सर्वांत जास्त पुण्य मिळविणारे एक गरीब श्रमिक होते की, ज्यांनी दिवसभर पाण्याचे डोल खेचून खेचून चार शेर खजुरी मजुरीत मिळविल्या आणि दोन शेर खजुरी आपल्या परिवारासाठी ठेवून दोन शेर खजुरी प्रेषितांच्या सेवेत अर्पण केल्या. त्यांची ही त्यागभावना पाहून सर्वांच्या पापण्या पाणावल्या आणि प्रेषितांनीसुद्धा आपले आनंदाश्रू आवरत त्यांच्या दोन शेर खजुरी सर्वांनी दिलेल्या देणगीच्या ढिगार्यावर ठेवून त्यांचा सन्मान वाढविला. स्त्रियांनीसुद्धा आपल्या त्यागभावनांना वाट काढून देत आपल्या शरीरांवरील सोने-चांदीचे सर्व दागिने प्रेषितांसमोर टाकले.
अशा प्रकारे परिपूर्ण त्याग आणि बलिदानाच्या भावनेतून ३० हजाराचे इस्लामी सैन्य तयार झाले. हे लष्कर ‘तबूक’च्या ठिकाणी पोहोचताच अशी माहिती मिळाली की, आता शत्रूपक्षाने इस्लामी शासनावर हल्ला करण्याचा निश्चय सोडून दिला आहे. खरे पाहता ‘सीरिया’ देशाच्या राजास कोणीतरी चुकीची वार्ता कळविली होती की, प्रेषितांचा देहान्त झाला असून इस्लामी राज्यावर हल्ला करण्याची ही उत्तम संधी आहे. परंतु त्यास जेव्हा सत्य परिस्थिती समजली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) जीवित असून मदीनाचे इस्लामी शासनही अबाधित आहे, तेव्हा त्यांच्या हल्ल्याच्या तयारीवर विरजन पडले.
मग प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘तबूक’मध्ये एक महिनाभर थांबून बरेच कार्य तडीस लावले. या महिन्याभराच्या कार्यकाळात ‘ऐला’ या ठिकाणच्या राजाने आत्मसमर्पण करून कर निश्चित करून समझोता केला. त्याचबरोबर ‘अरबा’ आणि ‘अजरुह’च्या लोकांनीसुद्धा ‘जिजया’ (रहिवासी कर) प्रेषितांना सादर केला. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना चारशे सैनिकांची तुकडी देऊन ‘दौमतुल जुन्दल’च्या राज्यपाल ‘उकैदर’वर ताबा मिळविण्यासाठी पाठविण्यात आले. या लढाईत ‘उकैदर’चा भाऊ ठार झाला आणि ‘उकैदर’ला कैदी बनविण्यात आले. त्याने ‘जिजया’ देण्याचे स्वीकारले आणि अशा प्रकारे संपूर्ण उत्तर क्षेत्रावर इस्लामी शक्तीचा प्रभाव कायम झाला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) मदीना शहरी परतले. या अतिशय कठीण परिस्थितील युद्धात सामील न होणारे बरेचसे दांभिकजण मदीना शहरात होते. आदरणीय प्रेषितांनी त्यांना युद्धात सामील न होण्याचा जाब विचारला, तेव्हा त्यांनी खोटेनाटे निमित्त प्रेषितांसमोर ठेवले. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु काही निष्ठावान लोकही असे होते की, ज्यांच्याकडून या महत्त्वाच्या युद्धात सहभागी न होण्याची चूक घडली. नंतर एके दिवशी उन्हाच्या वेळी ते आपल्या परिवारजणांसह थंड सावलीत बसले असताना अचानक उठून म्हणाले की, ‘‘हे ईश्वरा! तुझे प्रेषित तर अशा तीव्र उन्हात युद्धासाठी प्रवासावर निघालेत आणि मी मात्र आपल्या परिवारासह थंड सावलीत आहे!’’ असे म्हणून त्यांनी तत्काळ आपल्या उंटावर स्वार होऊन प्रेषितांच्या लष्करात सहभागी झाले.
या प्रसंगाची आणखीन एक विचित्र घटना अशी घडली की, माननीय काब बिन मालिक(र), हिलाल बिन उमैया(र) आणि माननीय मुरारह बिन रूबैअ(र) हे तिघें प्रेषितांचे निष्ठावंत सोबती असूनही युद्धात सहभागी होऊ शकले नाहीत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांनी ईश्वराचा आदेश येईपर्यंत त्यांना सामूहिक जीवनापासून विभक्त होण्याचा आणि आपापल्या पत्नींशी दूर राहण्याचा आदेश दिला. प्रेषितांची ही नाराजी या तिघांना खूप असह्य ठरली. त्यांनी हे दिवस अतिशय शोकावस्थेत काढले. अशा या शोकाकुल अवस्थेत आणि अरिष्टपूर्ण परिस्थितीत मुस्लिम समुदायाची कोणतीच व्यक्ती त्यांच्याशी बोलतदेखील नव्हती. याच काळात ‘गस्सानी’च्या राजाने ‘माननीय काबबिन मालिक(र)’ यांना पत्र पाठविले की,
‘‘आम्हास अशी माहिती मिळाली आहे की, तुमच्या प्रमुख असलेल्या मुहम्मद(स) यांनी तुमच्यावर अत्याचार केला. कदाचित त्यांना तुमची कदर नसावी. तुम्ही सरळ आमच्या छत्रछायेत या. आम्ही तुमची कदर करू आणि तुम्हास वाट्टेल ते देऊ!’’
माननीय काब बिन मालिक(र) यांनी त्याचा प्रस्ताव झुगारून दिला, त्याचे पत्र जाळून टाकले. कारण ते खरोखरच प्रेषितांचे निष्ठावंत असून कोणीही त्यांच्या निष्ठेस खरेदी करण्याच्या लायकीचा नव्हता. जगातील कोणत्याही संपत्तीस ते प्रेषितांच्या निष्ठेवर ओवाळून टाकीत असत. अशा या शोकाकुल आणि कठीण वातावरणात पूर्ण पन्नास दिवस व्यतीत झाले आणि मग ईश्वराने या तिघांना जाहीर माफी दिली. मदीना शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्व बाजूंनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत गेला. माननीय काब बिन मालिक(र) यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अत्यानंदाच्या भरात त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग दान केला.
हाच आहे तो चारित्रिक आदर्श. हा आदर्श आदरणीय प्रेषितांच्या सत्यधर्म आंदोलनास हवा होता आणि हा आदर्श निर्माण करण्यात इस्लामी विचारशक्तीचा इतिहासात नेहमीच विजय झाला.
आणखीन एक महत्त्वाची घटना अशी की, या युद्धात माननीय अब्दुल्लाह बिन दुबजादैन(र) या तरूणास हौतात्म्य मिळाले. अगदीच तारूण्याच्या उंबरण्यावर त्यांना इस्लामचे निमंत्रण मिळाले आणि त्यांचे अंतःकरण इस्लामच्या विचारसरणीने प्रभावित झाले. परंतु यामध्ये त्यांच्या काकांचा खूप विरोध होता. मक्का विजयानंतर आदरणीय प्रेषितांसह परत आल्यावर त्यांनी आपल्या काकांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देताना म्हटले की, ‘‘हे काकावर्य! आपण इस्लाम स्वीकारण्याची बर्याच वर्षांपासून मी वाट पाहत आहे. परंतु अद्यापही आपले अंतःकरण पाणावलेले नाही. आता मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची परवानगी द्यावी.’’
परंतु पाषाणहृदयी काकांनी त्यांना खडसावले की, ‘‘जर तुम्हास मुहम्मद(स) यांची साथ द्यायचीच असेल तर खुशाल द्या! परंतु तुमच्या संपूर्ण वडिलोपार्जित संपत्तीतून एक कवडीदेखील मिळणार नाही. शिवाय तुमच्या अंगावरील हे वस्त्रसुद्धा मिळणार नाही. माननीय अब्दुल्लाह(र) म्हणाले, ‘‘हे काका! आता मूर्तीपूजेचा मला खूप कंटाळा आलेला आहे. मी तर केवळ एकाच ईश्वराची उपासना करण्याच्या मानसिकतेत आहे.’’ मग त्यांनी आपल्या आईकडून एक घोंगडी पांघरली आणि शरीरावरील पोषाख काकाच्या स्वाधीन करून आदरणीय प्रेषितांच्या सेवेत हजर झाले.
हे क्रांतिकारी तरूण जिहाद (धर्मयुद्ध) आणि हौतात्म्याची तीव्र प्रेरणा घेऊन प्रेषितांच्या लष्करात सामील झाले आणि त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. मग आदरणीय प्रेषितांनी स्वतःहून त्यांचा दफनविधी केला आणि ईश्वरदरबारी प्रार्थना केली की,
‘‘हे ईश्वरा! मी यांच्याशी राजी आहे. तूसुद्धा यांच्यावर प्रसन्न हो!’’
हे दृष्य पाहून ‘माननीय इब्ने मसऊद(र)’ यांच्या मुखावर शब्द आले की,
‘‘या कबरीत मलादेखील दफन करण्यात आले असते, तर किती चांगले झाले असते!!!’’
‘तबूक’ नंतरच्या दोन महत्त्वाच्या घटना
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तबूक’च्या युद्धावर रवाना होण्यापूर्वी काहीजण प्रेषितांना येऊन भेटले आणि म्हणाले की, ‘‘आम्ही वृद्ध आणि अपंगांच्या सवलतीसाठी आणि विशेष करून पावसाळ्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘कुबा’ मस्जिदच्या जवळच ‘बनी सालिम’ मोहल्यात एक मस्जिद बांधली असून तिच्या उद्घाटनास्तव आपण येऊन नमाज पढवावी. या प्रसंगी प्रेषितांचे संपूर्ण लक्ष ‘तबूक’च्या मोहिमेच्या तयारीकडे केंद्रित झालेले असल्याने त्यांना सांगितले की, ‘‘‘तबूक’च्या मोहिमेवरून परत आल्यावर पाहू या!’’
ही मस्जिद ९२ दांभिक जणांच्या एका गटाने ‘अबू आमेर’ या दांभिकाच्या नेतृत्वात बांधली होती. त्याने आपल्या गटास सांगितले होते की, ‘‘शक्य होईल तेवढी हत्यारे गोळा करून ठेवावीत. मी रोमन सम्राटाशी साठगाठ करून ‘मुहम्मद(स)’ आणि त्यांच्या सहकार्यांना मदीना शहरातून बाहेर घालवितो.’’ याबरोबरच आपल्या दांभिक अनुयायांना असेदेखील सांगितले होते की, मी प्रत्येक सूचना कोणत्या ना कोणत्या मार्गे तुमच्यापर्यंत पोहोचवीत राहीन. परंतु यासाठी तुम्ही एका मस्जिदीची निर्मिती करावी. त्या मस्जिदमध्ये मी पाठविलेला खबर्या असेल. तो प्रवासी म्हणून तेथे मुक्कामास असेल आणि कोणासही शंकादेखील येणार नाही. अशा प्रकारे इस्लामी शासनाविरुद्ध कट शिजला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘तबूक’च्या मोहिमेवरून परत येताना ‘जी- अवान’ या ठिकाणी पोहोचताच ईश्वराने आपल्या वाणीद्वारे प्रेषितांना या कटाबाबतीत सूचना दिली. याप्रसंगी आदरणीय प्रेषितांनी आपल्या दोन निष्ठावान सहकार्यांना दांभिकांनी निर्माण केलेली मस्जिद जमीनदोस्त करण्याचे आणि तेथील संपूर्ण साहित्यास आग लावून जाळण्याचे आदेश दिले. हे दोन्ही सहकारी तत्काळ दांभिकांच्या मस्जिदवर पोहोचले आणि मस्जिदीस जमीनदोस्त करून सर्व साहित्या जाळून भस्म केले. या मस्जिदच्या बाबतीत ईश्वराने अत्यंत कडक शब्दांत वर्णण केले. ते अशा प्रकारे,
‘‘ज्या लोकांनी इस्लामविरोधी कारस्थानांचा अड्डा बनविण्यासाठी आणि श्रद्धावंतांमध्ये फूट टाकण्यासाठी, ईश्वर आणि प्रेषितांविरुद्ध आणि इस्लामविरुद्ध लढण्यासाठी या मस्जिदीजी निर्मिती केली, तेव्हा त्या मस्जिदमध्ये मुळीच जाऊ नये.’’(दिव्य कुरआन)
या घटनेवरून हा सिद्धान्त समोर येतो की, केवळ मस्जिदीचा सांगडा उभा करून ती इमारत ईशपरायणता, संयम आणि पावनतेचे केंद्र होत नसते. यासाठी इमारत निर्मात्यांच्या निश्चयानुसारच योग्य परिणाम मिळेल. याचबरोबर मस्जिद ही ईश्वर आणि प्रेषितांच्या विरुद्ध कारवाया करण्याचेच केंद्र बनता कामा नये आणि एवढेच नव्हे तर मस्जिद ही मुस्लिमांदरम्यान फूट पाडण्याचे केंद्रसुद्धा बनता कामा नये.
दुसरी महत्त्वाची घटना ही घडली की, इस्लामी शासनाने जकातव्यवस्था स्थापन केली. हिजरत (मदीना स्थलांतर) च्या नवव्या वर्षी मुहर्रम महिन्याची पहिलीच तारीख उगवली असताना संपूर्ण मानवतेचे हितेषी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी देशभर जकात वसुलीची विधिवत वसुलीची व्यवस्था लागू केली. हा महिना म्हणजे जकात (जण कल्याण कर) च्या वसुलीचे स्मरण करून देणारादेखील आहे. जवळच्या आणि दूरवरच्या विविध कबिल्यांकडे जकात वसुलीप्रतिनिधी पाठविण्यात आले. या वसुलीप्रतिनिधींना जमा करून प्रेषितांनी आदेश दिला की, लोकांच्या संपत्तीतून उत्तम प्रतीचा माल गोळा करावा.
या ठिकाणी ही बाब स्पष्ट करणे आवश्यक ठरते की, एकेश्वरवादाच्या मुळावर आधारलेले इस्लामी शासन हे पारलौकिक यशाबरोबरच मानवाच्या रोजीरोटीचा प्रश्नसुद्धा सोडविते. अंतःकरणाच्या पावित्र्याबरोबरच पोटापाण्याची समस्यासुद्धा सोडविते. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास ही बाब अत्यंत प्रखरतेने जाणवते की, रोजीरोटीविना श्रद्धा अथवा ईश्वरी मार्गदर्शनापासून वंचित असलेल्या निधर्मी सत्तेमुळे जग किती भयंकर संकटात सापडलेले आहे. ऐहिक आणि सामाजिक समस्यांना डावलून होणारी ईश्वरभक्ती, तसेच रोजीरोटी सोडविणारी किवा रोजीरोटीच्या वैध अधिकारांचा विसर पाडणारी श्रद्धा म्हणजेच एक अतिशय विषम आणि असंतुलित व अनैसर्गिक बाब होय. अशा बाबींना इस्लाम धर्मात कोणतेच स्थान नाही.
सुरुवातीस ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी एकाच ईश्वराच्या उपासनेचा प्रचार केला, त्यात नमाज पढण्याबरोबरच दुर्बलजणांना भोजन देण्याचासुद्धा प्रचार केला. अर्थातच दीनदुबळ्यांच्या पोटापाण्याची समस्या सोडविल्याशिवाय एकेश्वरवादाचा हेतूच मुळी पूर्ण होत नाही. हेच दानधर्म पुढे चालून अनिवार्य करण्यात आले आणि याचेच नाव ‘जकात’ असे होय. कारण याच जकातीच्या अर्थसाह्यावर दीनदुबळ्यांच्या आणि पददलितांच्या सर्व समस्यांचे समाधान होते. म्हणूनच इस्लामी शासनाने ही व्यवस्था सुरु केली. जकातीची मात्रा, प्रमाण व दर निश्चित करण्यात आले, जेणेकरून प्रत्येक सधन व्यक्तीकडून रोकड आणि अन्नाची ठराविक मात्रा घेऊन आर्थिक दुर्बल, निराधार आणि पददलितांना जणांना देण्यात यावी.
वास्तविक पाहता इस्लामी समाजाची व्यवस्थाच बंधुभावावर आधारलेली आहे आणि इस्लामी अर्थव्यवस्थेस आपण ‘आर्थिक भातृत्व’ असे म्हणू शकतो. प्रत्येकाच्या पडत्या अवस्थेत त्याला हात देऊन आणि जीवनाच्या शर्यतीत मागे पडणार्याला हात देऊन पुढे आणण्याची व्यवस्था म्हणजेच ‘जकात’ होय.
एका कबिल्याने या प्रसंगी जकात वसूल करणारे ‘माननीय बिशर(र)’ यांना विरोध करताना म्हटले की, ‘‘ईश्वराची शपथ! येथून एक उंट ही हलू देणार नाही.’’ प्रेषितांना या घटनेची खबर मिळताच पन्नास जणांच्या तुकडीसह ‘माननीय उऐना बिन हिसन(र)’ यांना पाठविले. ‘माननीय उऐना(र)’ यांनी तेथील अकरा पुरुषांना व २१ स्त्रियांना अटक करून प्रेषितांसमोर हजर केले. शेवटी ‘तमीम’ कबिल्याचे प्रतिनिधी मंडळ प्रेषितांना भेटण्यासाठी आले आणि त्यांच्या घरासमोर ओरडून म्हणू लागले,
‘‘हे मुहम्मद(स)! बाहेर या! आम्ही तुमच्याबरोबर कविताशास्त्रात स्पर्धा करु इच्छितो, पाहू या कोण जिकतो ते!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे तर सभ्यता आणि शिष्टाचाराचे आदर्श आणि अग्रदूत होते. प्रेषितांशी असे हे असभ्यवर्तन ईश्वरास नाराज करणारे होते. त्यामुळे ‘सूरह-ए-हुजरात’च्या क्रमांक ४ आणि ५ च्या आयती अवतरल्या. मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) घरातून बाहेर आले. माननीय बिलाल(र) यांनी जुहरची (दुपारच्या नमाजची) अजान दिली. नमाज आटोपल्यावर प्रेषितांनी मस्जिदीच्या अंगणात येऊन प्रतिनिधी मंडळास येण्याचे कारण विचारले. मंडळाने उत्तर दिले, ‘‘आम्ही आमचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आलो आहोत!’’ (अशा प्रकारे श्रेष्ठत्व सिद्ध करणे हे अरब संस्कृतीचा एक भाग होता.) ‘तमीम’ कबिल्याने आपल्या वाडवडिलांचे गुणगान केले. त्यांच्या उत्तरादाखल प्रेषितांकडून ‘माननीय साबित बिन कैस(र)’ यांनी आपल्या वंशाचे गुणगान न करता ईश्वराचे महिमत्व वर्णन केले आणि प्रतिनिधी मंडळाच्या ‘अकरा बिन हाबिस’ने म्हटले की, ‘‘खरोखरच आमच्या कवी आणि वक्त्यांपेक्षा प्रेषितांचे कवी आणि वक्ते जास्त पारंगत आहेत. वंशश्रेष्ठत्वापेक्षा त्यांनी ईश्वरमहिमेचे गुणगान वर्णन केले!’’ आणि मग या संपूर्ण प्रतिनिधी मंडळाने इस्लाम स्वीकारला. प्रेषितांनी त्यांच्या सर्व कैद्यांना सोडून दिले.

मा. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात की, एक माणूस आला व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जवळ बसुन प्रश्न विचारला की, ‘‘हे ईश्वराच्या प्रेषिता! इस्लाम काय आहे? प्रेषितांनी (स.)  यांनी सांगितले, ‘‘ईश्वराच्या उपासनेत कोणाला सामिल करू नये, नमाज प्रस्थापित करावी, ईशमार्गात संपत्ती खर्च करावी, पवित्र रमजानचे रोजे (उपवास) ठेवावेत.’’
प्रेषितांचे उत्तर ऐकून त्याने विचारले की, ‘‘इमान (श्रद्धा) काय आहे’’? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ईश्वर एकच आहे, यावर दृढ असणे, मृत्यूनंतर पुर्नजिवित होण्यावर  विश्वास ठेवणे, आणि जे काही जगांमध्ये घडले ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसार व त्याच्याच निर्णयानुसार घडते, यावर विश्वास ठेवणे होय.’’ मग त्याने तिसऱ्यांदा प्रश्न केला की  ‘‘एहसान काय आहे?’’ यावर प्रेषितांनी सांगितले, ‘एहसान’ हे आहे की तुम्ही ईश्वराचे असे भय बाळगा की, तुम्ही ईश्वरास पाहात आहात किंवा तुम्ही जरी त्यास पाहु शकत नसाल तर तो मात्र तुम्हाला निश्चितच पाहत आहे’’? यावर तो म्हणाला, ‘‘कयामत  (प्रलयकाळ) केव्हा येईल?’ यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे तुम्हाला हे माहित  नाही, त्याचप्रमाणे मला पण कयामतची निश्चित वेळ माहित नाही. मात्र मी तुम्हाला त्याची काही पुर्नलक्षणे सांगतो. जेव्हा तुम्ही पहाल की, स्त्री आपल्या स्वामीची आई बनेल. जेव्हा  तुम्ही पहाल की, अनवाणी पायी चालणारे, नागवे शरीर ठेवणारे, मुके व बहिरे लोक शासनकर्ते होतील. आणि पशुपालन करणारे उंच-उंच इमारती उभी करण्यात एक दुसऱ्यांशी स्पर्धा करतील. ही कयामत (जग नष्ट होण्याचा दिवस) ची लक्षणे आहेत. (हदीस : बुखारी व मुस्लीम)

भावार्थ- ‘इमान’चा शब्दश: अर्थ विश्वास व भरवसा आहे. ‘इस्लाम’चा अर्थ, ‘‘स्वत:ला ईश्वराच्या स्वाधीन करणे’’ असा आहे. ‘एहसान’चा अर्थ ‘एखादे कार्य कौशल्यपूर्ण व व्यवस्थितरित्या पूर्ण करणे. एखादा माणूस ईश्वराचा उत्तम आणि ईशपरायणदास कसा होऊ शकतो? शुद्ध आचरण आणि शुद्ध अंत:करणाची संपत्ती केवळ अशाच स्थितीत मिळू शकते  की माणसांवर प्रत्येक वेळी ही कल्पना आरुढ असावी की, जणू तो ईश्वराला पाहात आहे, त्याचे अस्तित्व नेहमीच व प्रत्येक वेळेस ईश्वराच्या दृष्टीत आहे, इतके मनोसामर्थ्य नसेल  तर किमान असे समजावे की ईश्वर त्याला पाहात आहे. तात्पर्य हे की तुम्ही स्वत:ला ईश्वरासमोर हजर समजावे अथवा ईश्वराला नेहमी आपल्याजवळ हजर असण्याचा विश्वास असावा. याशिवाय कोणत्याही सत्कार्याला परिपूर्णत: येत नाही. स्त्रीचे आपल्या स्वामीची माता होण्याचा अर्थ म्हणजे पत्नी आपल्या पतीची अवज्ञा करील. दासी आपल्या स्वामीवर प्रभुत्व गाजविल. मुले आपल्या पित्याच्या डोक्यार बसतील - (डोईजड होतील) आणि प्रत्येक धाकटा आपल्या थोरांचा (ज्येष्ठांचा) आदर-सन्मान करणार नाही, हे एक लक्षण झाले. दुसरे  लक्षण असे की, संस्कृती व सभ्यता नसलेल्या आणि बुद्धिमत्ता व आकलनक्षमतांचा अभाव असलेल्या लोकांच्या हाती जमीनीची सत्ता येईल. संपत्तीच्या अवास्तव रेलचेलीमुळे उंचच  उंच व भव्य इमारती बांधण्यात अमाप संपत्तीचा वापर होईल, आणि उंच इमारती बांधण्यामध्ये स्पर्धा होईल. जेव्हा ही लक्षणे प्रकट होतील तेव्हा असे समजावे की, ‘‘कयामत (जग  नष्ट होण्याची वेळ) जवळ येऊन ठेपली आहे. मात्र कयामतची निश्चित वेळ सर्व शक्तिमान ईश्वराखेरीज कोणालाही माहित नाही.

मक्कामधील कुरैशजणांच्या सामरिक शक्तीची पाळे-मुळे सभोवतालच्या परिसरात ‘हकाजन’ आणि ‘सकीफ’ परिवारांपर्यंत पसरलेली होती. हे दोन्ही परिवार ‘ताइफ’ शहरात होते. या ताइफवासीयांचे मक्कातील कुरैशजणांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आर्थिक बाबतीतही त्यांचे घनिष्ट संबंध होते. अर्थातच या कुरैशजणांच्या सहकारी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय ‘मक्का’ शहरावरील विजय अपुरा समजण्यात येईल.
त्याचे असे झाले की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी उच्च रणनीतीचा अवलंब अशा प्रकारे केला की, मक्कातील कुरैशजणांवर एवढ्या अचानकपणे ताबा मिळविला की, त्यांना सहकार्यांना मदतीस बोलावण्याची संधीच मिळू दिली नाही.
‘हुदैबिया समझोता’ भंग होण्याची जी कारणे होती, त्याचा जो परिणाम समोर येईल. त्याची चांगलीच जाणीव तिकडे ‘हवाजन’ कबिल्याच्या म्होरक्यांना होती. म्हणून या म्होरक्यांनी संभावित परिणामा निपटून काढण्यासाठी सामरिक शक्ती जमा करण्यास सुरुवात केली होती आणि कबिल्यात दौरा करून मुस्लिम शक्तीविरुद्ध उत्तेजना निर्माण करीत होते. मक्केवर मुस्लिमांच्या विजयाची खबर मिळताच त्यांनी तर आपली संपूर्ण शक्ती एकवटून ‘हुनैन’ आणि ‘औतास’ या ठिकाणी मुस्लिम शक्तीस प्रत्युत्तर देण्यासाठी जमा केली. या प्रसंगी मात्र या सामरिक कारवाईतून ‘काब’ कबिला आणि ‘किलाब’ कबिला विभक्त राहिले. ही खूप मोठी कमतरता होती.
इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या कारवाईची सूचना मिळताच ‘अब्दुल्लाह बिन हदरद अस्लमी(र)’ यांना परिस्थितीची शहानिशा करण्यासाठी पाठविले. त्यांनी गुप्त शहानिशा करून पूर्ण वृत्तान्त प्रेषितांना कळविला.
इस्लामी सेनेचे सर्वोच्च सेनापती आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कुरैशजणांच्या छोट्या शक्तीचा पाडाव करण्यासाठी कमी प्रमाणातच मदीनात रसद आणि हत्यारे जमा केली होती आणि त्याची गरजही पडली नव्हती. मात्र ‘हवाजन’ आणि ‘सकीफ’ कबिल्यांचे प्रकरण तसे मोठे असल्याने प्रेषितांनी तत्काळ व्यवस्था करण्यासाठी ‘अब्दुल्लाह बिन रबिया’कडून ३०,००० दिरहम आणि मक्कावासी सरदार ‘सफवान बिन उमैया’कडून १०० सामरिक कवच आणि हत्यार कर्ज स्वरुपात घेतली.
हिजरी सन आठमध्ये शव्वाल महिन्यात मक्केतून १२ हजारांचे इस्लामी लष्कर रवाना झाले. तिकडे मात्र शत्रू सैन्यानेसुद्धा जोरदार तयारी केलेली होती. परंतु या युद्धात ‘ताइफ’ शहरात रक्तपात होऊ न देता प्रेषितांनी ते शहर तसेत ठेवून त्यांना या गोष्टीची संधी दिली की, तेथील लोकांनी नवीन परिस्थितीवर विचार करून स्वयं भावनेने इस्लामचा स्वीकार करावा. या युद्धानंतर शत्रूपक्षाची मोठी संपत्ती हाती लागली. त्यात २४,००० उंट, ४०,००० शेळ्या आणि कित्येक मन चांदी होती. या संपत्तीचा २० टक्के भाग ‘बैतुलमाल’ (जणकल्याणास्तव सरकारी खजीना) मध्ये जमा करून बाकीची संपत्ती लष्करात वाटण्यात आली.
दिव्य कुरआनने विरोधकांची मने वळविण्याकरिता संपत्ती देण्याचा जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार, मक्का शहरातील लोकांना आणि पामरांना संपत्ती वाटप करण्यात आली. कारण मक्का शहरातील पूर्वीचे प्रेषितविरोधी आणि शक्तिशाली सरदारसुद्धा याचकांच्या मागील रांगेत उभे होते. त्यांमध्ये काहीजण प्रेषितांचे जवळचे नातलगसुद्धा होते. एवढेच नव्हे तर ६००० कैदी आपल्या नशिबाच्या निर्णयाची वाट पाहत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे त्या कैद्यांतर्फे कोणीतरी प्रतिनिधी येण्याची दोन आठवड्यापासून वाट पाहत होते. अद्यापही त्यांना घेण्यासाठी कोणीच न आल्याचे पाहून शेवटी प्रेषितांनी या कैद्यांना सैनिकांच्या स्वाधीन केले की त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी. प्रत्येक सैनिकाने कैद्यांच्या उदरनिर्वाहाची जवाबदारी स्वीकारून त्यांना आपापल्या घरी नेले. तेवढ्यात ‘हलीमा सादिया’च्या कबिल्यातील काही प्रतिष्ठित जणांचे एक प्रतिनिधी मंडळ प्रेषितदरबारी हजर झाले आणि त्यातील ‘जुहैर बिन अबी सुर्द’ याने प्रेषितांना कळकळीची विनंती करताना म्हटले की,
‘‘हे मुहम्मद(स)! ज्या महिला आपल्याकडे कैद आहेत, त्यांत तुझ्या मावश्या आणि आत्या आहेत. अरबच्या एखाद्या बादशाहने आमच्या परिवारात दूध पिले असते तर आमच्या त्यांकडून खूप अपेक्षा असत्या. परंतु तुमच्याकडून तर आम्हास खूप जास्त अपेक्षा आहेत.’’ (अरब समाजात त्या काळी आईशिवाय इतर स्त्रियांसुद्धा पैसे घेऊन बाळांना दूध पाजण्याची प्रथा होती. ज्या स्त्रीने ज्या बाळास दूध पाजले, तिलादेखील मातेचा दर्जा देण्यात येत असे आणि तिचा सन्मान करण्यात येत असे. त्यांच्या मुलांना भावंडांचा आणि इतर नातलगांनासुद्धा नातलगांचा दर्जा देण्यात येत असे. ‘हलीमा सादिया’ यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना लहानपणी दूध पाजले होते. म्हणून त्या त्यांच्या माता, बहिणी आणि मावश्या होत्या. म्हणून याच सन्मानाचे संदर्भ देऊन त्यांनी प्रेषितांना विनंती केली होती.)
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांचा सन्मान करून अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितले की, ‘‘मी स्वतःच वाट पाहत होतो की, कोणीतरी येऊन त्यांना घेऊन जाईल.’’ मग प्रेषितांनी सर्व कैदी प्रतिनिधी मंडळाच्या स्वाधीन केले. बर्याच कैद्यांना प्रेषितांनी वस्त्रदानसुद्धा दिले. हे कार्य आटोपल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी मक्का शहरात माननीय अत्ताब बिन उतैब(र) यांना राज्यपालपदी नियुक्त करून मदीना रवाना होण्याची तयारी केली.
‘मक्का’ आणि ‘हुनैन’च्या विजयानंतर
वास्तविक पाहता मक्का आणि हुनैनच्या युद्धानंतर इस्लामी क्रांतीच्या विरोधकांचा नायनाट होत होता. त्यांना पळता भुई थोडी झाली होती. काही ठिकाणी उरलेसुरले उपद्रव नष्ट करण्याच्या छोट्याछोट्या कायवाया करण्यात आल्या.
‘तमीम’, ‘खसअम’, ‘किलाब’ आणि जिद्दामधील ‘हब्शी’ कबिल्याच्या दरोडेखोरांना जेर करण्यासाठी मोहीम आखण्यात आली. हिजरी सन नऊच्या ‘रबिउल आखिर’च्या महिन्यात ‘माननीय अली(र)’ यांच्या नेतृत्वात ‘तै’ कबिल्यावर १५० स्वार चढाई करण्यासाठी पाठविण्यात आले. या लष्करास आदेश देण्यात आले होते की, तेथील मोठेमोठ्या मूर्तीगृहांना जमीनदोस्त करण्यात यावे. मदीनाचे आस्थापूर्ण व हेतूपूर्ण राज्य हे आस्था आणि धर्मस्वातंत्र्य बिगरमुस्लिमांना तर देऊ शकत होते. परंतु मूळ तत्त्वांशी अगदीच विरुद्ध असलेल्या प्रतीक आणि संस्थांचे अस्तित्व मुळीच सहन करू शकत नव्हते. कारण याच विभूतींच्या श्रद्धांना बळी पडून लोक उत्तेजित होऊन इस्लामी शक्तींशी लढाया लढत आणि आतंक माजवीत असत. असे कोणतेही कारण नव्हते की, अज्ञानीजण मूर्तीगृह आणि अनेकेश्वरवादाने आणि अंधविश्वासाने भरलेल्या व्यवस्थांना समानांतर स्वरुपात चालू दिले जावे. या विभूती आणि देवतांच्या मूर्ती मुळात एका असत्य जीवनव्यवस्थेचे प्रतीक बनले होते आणि या प्रतिकांना नष्ट करणे खूप आवश्यक होते. ‘तय’ हा कबिला मूर्तीपूजेच्या भावनांच्या आहारी जाऊन मदीना शहरावर हल्ला करण्याची तयारी करीत होता. ‘आदी बिन हातिम’ याने या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वार्या आणि सामरिक हत्यारांची व्यवस्था केली होती.
माननीय अली(र) यांनी ‘कुल्स’ या ठिकाणी पोहोचून सकाळीसकाळीच हल्ला चढविला आदि बिन हातिम याने जीव मुठीत धरून पळ काढला. प्रतिवादी पक्षाने आत्मसमर्पण केले. कैदी, पशु आणि हत्यार इस्लामी लष्कराच्या ताब्यात आली. कैद्यांमध्ये ‘आदी बिन हातिम’ ची वृद्ध बहीणसुद्धा होती. त्यांनी प्रेषितांना मुक्त करण्याची विनंती केली. आदरणीय प्रेषितांनी त्या वृद्ध स्त्रीचा पूर्ण सन्मान करून परत पाठवून दिले. त्यांनी आपले बंधु ‘अदी बिन हातिम’ यास सांगितले की, ‘मी मदीना शहरात आपल्या पित्याप्रमाणे अर्थात ‘हातिमताई’ प्रमाणेच दया, कृपा आणि दानशीलतेचे दृष्य पाहिले आहे. तू मुहम्मद(स) यांच्याशी लढण्याचा विचार सोडून दे आणि तेथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. बहिणीच्या सांगण्यावरून ‘आदि बिन हातिम’ तत्काळ प्रेषितदरबारी हजर झाला आणि इस्लाम धर्म स्वीकारला.

- मुहम्मद फारुक खान
    या पुस्तकात काही लेख व प्रश्नोत्तरांचा संग्रह आला आहे. याचा मूळ उद्देश इस्लामची मूळ शिकवण व त्याच्या सत्याचे वास्तविक रूप समजावून सांगणे आहे.
    मनुष्य जीवन ईश्वरालाच अर्पण आहे, मुक्तीची साधनं, रोजा (उपवास) मनुष्य जीवनासाठी वरदान, इस्लाम एक समाज शास्त्रीय विवेचन इ. विषयांचा समावेश आहे ज्यामुळे वाचकास चेतना व बळ प्राप्त होवून योग्य दृष्टिकोन बनतो.

आयएमपीटी अ.क्र. 96    -पृष्ठे - 32     मूल्य - 12      आवृत्ती - 2 (2012)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/gangie0nv44yvfjkqogi5sny9zzcw34b

हुदैबियाच्या समझोत्यामुळे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणाचा पूर्णतः लाभ उचलत प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘मदीना’ या इस्लामी सत्ताकेंद्रास अत्याचार्यांच्या उपद्रवापासून मुक्त केले, तर दुसरीकडे उत्तरेत ज्युडिशियांच्या कटकारस्थानांची सर्व केंद्रे उद्ध्वस्त केली. तिसरे कार्य असे केले की, छोट्याछोट्या कबिल्यांच्या उपद्रवी आणि आंतकवादी कारवायांवर अंकुश ठेवून इस्लामी शासनाची दूरपर्यंत धाक पसरली आणि खंदकच्या युद्धानंतर इस्लामी शासनाचे अगदी निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. सर्वांना हे कळून चुकले की, सत्य आणि न्यायाची ही नवीन शक्ती क्षणभंगुर नसून स्थायी स्वरुपाची आहे.
आता मदीनाच्या इस्लामी आंदोलनासमोर सर्वांत मोठे सामरिक पर्व एवढेच बाकी राहिले होते की शत्रूच्या शक्तीचे मूळ केंद्र नष्ट करण्यात यावे. अन्यथा लढायांची शृंखला कधीच थांबणार नाही. कुरैशजणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की, ही शृंखला त्यांनीच सुरु केली होती.
या शृंखलेची पार्श्वभूमी अशी की, मक्का शहराच्या आसपास ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ नावाच्या दोन मोठ्या कबिल्यांदरम्यान दीर्घ काळापासून तंटेबखेडे चालू होते. तात्पुरत्या प्रमाणात एवढेच घडले की, ज्या वेळी इस्लामी शक्ती एका प्रतिस्पर्धी शक्तीच्या स्वरुपात प्रकट झाली, तेव्हा कुरैश कबिल्याने इस्लामविरोधी मोर्चास ‘बक्र’ आणि ‘खुजाहा’ या एकमेकांचे शत्रू असलेल्या कबिल्यांना सामील करून घेतले. म्हणून या दोन्ही कबिल्यांतील कायमस्वरूपी वैर काही काळापुरते थंडावले. परंतु जेव्हा हुदैबिया समझोता झाला आणि पूर्ण दहा वर्षांपर्यंत मक्का आणि मदीनादरम्यान युद्धबंदी झाली, तेव्हा ‘बक्र’ आणि ‘खुजाआ’ यांच्यातील हाडवैर परत उफाळून आले व समझोत्याच्या एका अटीनुसार ‘बक्र’ कबिल्याने कुरैश कबिल्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आणि हे पाहून ‘खुजाआ’ परिवाराने ‘बक्र’ परिवारास संतप्त करण्यासाठी प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या इस्लामी शासनाशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित केले. काही दिवस दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांत तनावपूर्ण शांतता राहिली आणि एके दिवशी अचानक ‘कुरैश’जणांचा मित्रकबिला असलेल्या ‘बक्र’ कबिल्याने ‘खुजाआ’ परिवारावर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ज्या लोकांनी काबागृहात आश्रय घेतला, त्यांनादेखील सोडले गेले नाही. त्यातल्यात्यात कुरैशजणांनी हल्ला करण्यात ‘बक्र’ परिवाराची मदत केली. ‘खुजाआ’ कबिल्याचे प्रतिनिधी ‘अम्र बिन सालिम’ यांनी आदरणीय प्रेषितांच्या दरबारी मदतीची विनंती केली. प्रेषितांनी दूताच्या माध्यमाने कुरैशजणांसमोर तीन अटी मांडल्या.
  1. खुजाआ कबिल्याच्या ठार करण्यात आलेल्या लोकांचा ‘कसास’ (बदला) द्यावा. (अर्थात, ज्यांनी खुजाआ परिवाराच्या लोकांच्या हत्या केल्या त्यांच्याकडून बदला घेण्यात यावा.)
  2. ‘बक्र’ च्या समर्थनातून वेगळे व्हावे किवा
  3. हुदैबिया समझोता संपुष्टात आणण्याची घोषणा करावी. (अर्थात युद्धास तयार व्हावे.)
कुरैशजणांचे आधीच संतुलन बिघडले होते. त्यांनी दूताकरवी प्रेषितांना निरोप पाठविला की, केवळ तिसरी अट मान्य आहे. रागाच्या भरात युद्धाची घोषणा केली खरी, परंतु या अविवेकी निर्णयाचा त्यांना खूप पश्चात्ताप झाला. ते चितातूर झाले होते. कारण त्यांची सैनिकशक्ती नष्ट झाली होती आणि अर्थव्यवस्थासुद्धा खिळखिळी झाली होती. त्यांचे जोरदार समर्थक आणि सहकारी ‘ज्यूडिश’ पराभूताचे जीवन व्यतीत करीत होते. मदीना शासन मजबूत आणि स्थीर झाले होते आणि खूप दूरपर्यंत या शासनाची जबरदस्त धाक बसली होती. केवळ हुदैबियाच्या समझोत्यावर अंमलबजावणी करूनच स्वतःस सुरक्षित ठेवणे शक्य होते आणि तरी देखील स्वतःच समझोता मोडण्याचा मूर्खपणा त्यांनी केला.
शेवटी ‘मक्का’ शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या, ‘अबू सुफियान’ हा ‘हुदैबिया समझोत्याचे’ नूतनीकरण करण्यासाठी मदीना शहराकडे रवाना झाला. या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरुवातीस तो आपली कन्या ‘माननीय उम्मे हबीबा(र)’ (या प्रेषितांच्या भार्या होत) यांच्याकडे पोहोचला, परंतु त्यांच्याकडे काही जमले नाही. मग त्यांनी माननीय अबू बक्र(र), उमर(र), अली(र) यांची भेट घेऊन समझोता नूतनीकरण करण्याची शिफारस केली. परंतु काहीही साध्य झाले नाही. शेवटी तो रिकाम्याहाती मक्का पोहोचला.
इकडे मानवतेचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना दैवी संकेत मिळाले की, ‘सत्यावर आपल्या प्राणांचे बलिदान देणार्यांनी बलिदनासाठी तयार राहावे.
हा मोठा विचित्र संयोग आहे की, सत्य-असत्याची लढाईसुद्धा (ब्रदची लढाई) रमजान’ महिन्यातच झाली आणि आता अंतिम लक्ष्य पूर्ण करणारी लढाईसुद्धा रमजान महिन्यातच होणार होती.
रमजान महिन्याच्या दहा तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे दहा हजार सैन्य घेऊन मदीनाहून ‘मक्का’कडे निघाले आणि प्राचीन धर्मग्रंथातील भविष्यवाणी सत्य सिद्ध झाली. कुरैशजणांचे लोक ज्या मार्गावर गस्त घालीत होते, तो मार्ग सोडून दुसर्याच मार्गाने प्रेषित आपले सैन्य घेऊन निघाले आणि अचानक मक्का शहरासमोर पडाव टाकला.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘जुहफा’ या ठिकाणी पोहोचल्यावर आपले काका माननीय अब्बास(र) हे आपल्या मुलांबाळांसह तेथे पोहोचले आणि प्रेषितांबरोबर सल्लामसलत झाली. त्यांच्या रवानगीच्या वेळी प्रेषितांनी त्यांना आपली स्वारी सोबत देऊन पाठविताना ‘अबू सुफियान’ला सोबत घेऊन येण्यास सांगितले.
यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘मर्रज्जहान’ या ठिकाणी लष्करी तळ लावून सैनिकांना सूचना दिली की सर्व सैनिकांनी आपापल्यासाठी स्वतंत्र चुली पेटवाव्या. रात्रीच्या वेळी मक्का शहराचा सर्वांत मोठा म्होरक्या ‘अबू सुफियान’ आणि त्यांच्यासोबत बडया नेत्यांनी पर्वतावरून हजारोंच्या संख्येत सैन्यांच्या चुली पाहून पार घाबरून गेले. तेवढ्यात ‘माननीय अब्बास(र)’ हे तेथे येऊन त्यांना म्हणाले की, प्रेषित मुहम्मद(स) हे मोठी फौज घेऊन आले आहेत व आता कुरैशजणांचे काही खरे नाही. ‘अबू सुफयान’ने त्यांना विचारले की, ‘आता काय करावे? कसा मार्ग काढावा?’ माननीय अब्बास(र) यांनी म्हटले, ‘‘तुम्ही माझ्यासोबत प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे चला. आपण त्यांच्याशी बोलणी करून काही मार्ग निघतो काय ते पाहू या’ अबू सुफियान हा प्रेषितांनी पाठविलेल्या स्वारीवर स्वार होऊन माननीय अब्बास(र) सोबत प्रेषितांकडे आला. त्याला पाहताच माननीय उमर(र) यांचे रक्त खवळले. त्याला ठार करण्याची त्यांनी प्रेषितांना परवागनी मागितली. परंतु माननीय अब्बास(र) यांनी प्रेषिातंना म्हटले, ‘‘हे प्रेषिता! मी ‘अबू सुफयान’ ला जीवदान देण्याचे वचन देऊन आपल्यासमोर हजर केले आहे.’’
दुसर्या दिवशी सकाळी ‘अबू सुफियान’ याने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर इस्लाम धर्म स्वीकारला. माननीय अब्बास(र) यांनी प्रेषितांच्या सूचनेनुसार एका उंच टेकडीवर अबू सुफियान(र) यांना इस्लामी सैन्याच्या दर्शनास्तव उभे केले. सैन्याने ‘कदा’च्या मार्गाने प्रस्थान केले. वेगवेगळ्या कबिल्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या. ‘अबू सुफियान(र)’ हे प्रत्येक तुकडीच्या बाबतीत काही ना काही विचारत होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी जोरदार घोषणा केली, ‘‘आजचा दिवस हा ‘काबा’ मुक्तीसाठी युद्धाचा दिवस आहे. आजचा दिवस नेकी आणि भलाईचा दिवस आहे.’’ सैन्याच्या प्रस्थानाच्या प्रसंगी प्रेषितांनी घोषणा केली की, ‘‘जी व्यक्ती काबागृहात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती अबू सुफियान(र) यांच्या घरात दाखल होईल तिला अभय! जी व्यक्ती स्वतःच्याच घराचे दरवाजे बंद करून घरातच बसेल तिला देखील अभय! केवळ गुन्हेगारांनाच त्यांना आपल्या गुन्ह्यांची फळे चाखावी लागतील!’’ माननीय अबूसुफयान(र) यांनी प्रेषितांची ही घोषणा शहरात प्रसारित केली.
रमजान महिन्याच्या २० तारखेस आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपले इस्लामी लष्कर घेऊन कोणतेही विजयी नारे न लावता, ढोल ताशे न वाजवता आणि कोणत्याही प्रकारे आपल्या विजयाचे सूर न काढता अत्यंत नम्रपणे मक्का शहरात दाखल झाले. जगातील सर्वांत महान मानव आदरणीय प्रेषित हे आपल्या स्वारीवर बसून ईश्वरासमोर नतमस्तक झालेले होते. ईश्वराच्या कृतज्ञतेचे भाव त्यांच्या अंतःकरणात होते. ओठांवर दिव्य कुरआनच्या ‘अलफतह’ या सूरहचे पठण चालू होते.
या प्रसंगी कुरैशच्या काही सरदारांनी काही टवाळ तरुणांना फूस लावली आणि त्यात इस्लामी सैन्याचे दोन योद्धे ठार झाले. माननीय खालिद बिन वलीद(र) यांना खबर मिळताच त्यांनी शत्रूपक्षाच्या काहीजणांना कंठस्नान घालविले. अशाच प्रकारचे एक टोळके शहरात उपद्रव करण्यास निघाले. प्रेषितांनी ‘अन्सार’च्या एका तुकडीस बोलावून हे दृष्य दाखविले की, एकीकडे विजयी मुस्लिम शक्ती शत्रुच्या रक्ताचा एक थेंबही सांडू देत नाही तर दुसरीकडे हे उपद्रवी लोक आपल्या म्यानात असलेल्या तलवारी बाहेर काढण्याची चेतावणी देत आहेत. मग प्रेषितांनी आपल्या सैनिकांना उपद्रव्यांचा सफाया करण्याचा आदेश दिला. तेवढ्यात अबू सुफयान(र) हे धावत प्रेषितांजवळ आले आणि म्हणाले, ‘‘हे प्रेषित! कुरैशजण अगोदरच खूप उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना सोडून द्यावे.’’ मग प्रेषितांनी त्यांची विनंती मान्य केली. थोडीशी झडप झाल्यावर उपद्रव्यांनी तेथून पळ काढला.
लोकांनी प्रेषितांना विचारले की, ‘‘आपण आपल्या वडिलोपार्जित घरावर थांबाल काय?’’
‘‘येथील लोकांनी माझे घर ठेवलेच कुठे?’’ प्रेषित म्हणाले, मग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी निवासासाठी एक स्थान निवडले. नंतर ते त्यांना ‘नजरबंद’ करण्यात आलेल्या स्थळावर गेले आणि मग काबागृहात पोहोचले. माननीय बिलाल(र) यांनी काबागृहाच्या उंचीवरून ‘अजान’ पुकारली. आदरणीय प्रेषितांनी काबागृहाच्या ‘अस्वद’ चा मुखस्पर्ष केला आणि मग ते हातात धनुष्य घेऊन एकेका विभूतींजवळ जाऊन हाक देत होते, ‘‘सत्य आले आणि असत्य मिटले. निश्चितच ‘असत्य’ हे मिटणारच होते.’’ धनुष्याच्या इशार्यानेच काबागृहातील मूर्ती तोंडावर पडत होत्या. मग काबागृहाची चावी मागवून प्रवेशद्वार उघडले. आंतमध्ये प्रेषित इब्राहीम(अ) आणि प्रेषित इस्माईल(अ) यांच्या मूर्ती लावलेल्या होत्या. त्या मूर्तींच्या हातात धनुष्यबान होते. मस्जिदीच्या प्रवेशद्वारावर जनसमुदाय जमलेला होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अफाट जनसमुदायास संबोधित करताना म्हटले,
‘‘केवळ एकमेव ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नाही. त्याचा कोणीच भागीदार नाही. त्याने केलेला वादा सिद्ध झाला. त्यानेच एकट्याने संपूर्ण शत्रूसैन्यास पराभूत केले. आज दंभ, अहं, खुनाचे व हत्यांचे सर्व दावे आणि संपत्तीच्या मागण्या माझ्या पायाखाली आहेत. मात्र हरम (काबागृह) च्या ‘मुतवल्ली’ (विश्वस्त) आणि ‘हज यात्रेकरूंना’ पाणी पाजण्याची जवाबदारी आणि हुद्दे यास अपवाद आहेत.
हे कुरैश आज ईश्वराने तुमचा अज्ञानी अहंकार आणि वंशाभिमान नष्ट केला आहे. संपूर्ण मानवजात ही आदमचीच संतती आहे आणि आदमची निर्मिती मातीपासून करण्यात आली आहे. सर्व मानव एकच आहेत. कोणताच मानव हा वंशाने श्रेष्ठ नसून तो केवळ ईशपरायणतेमुळेच श्रेष्ठ आहे. ईश्वराने मद्य आणि त्याची खरेदी-विक्री निषिद्ध ठरविली आहे.
तुम्हाला माहीत आहे काय की, मी तुमच्याशी कसा व्यवहार करणार?’’
प्रेषितांचे हे शब्द कानी पडताच कुरैशजणांनी प्रेषितांशी केलेल्या धोकेबाजी, अमानुष यातना आणि मानवी हत्यांचे पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आले. कारण कुरैशजणांनी या वीस वर्षांत मुस्लिमांवर जे अमानुष अत्याचार केले होते, जी कत्तल केली होती आणि ज्या सामरिक कारवाया केल्या होत्या, त्या आठवून त्यांचे काळीज फाटत होते. त्यांना वाटत होते की, आता प्रेषित या यातनांचा बदला घेतील. थरथरत्या आत्म्याने त्यांनी प्रेषितांना हाक दिली,
‘‘हे मुहम्मद(स)! तुम्ही प्रामाणिक व दयाळू व्यक्तीची प्रामाणिक व दयाळू संतती आहात. आम्हास क्षमादान द्यावे!’’
दयाळू प्रेषित मुहम्मद(स) उत्तरले, ‘‘आज तुम्हा सर्वांना क्षमादान देण्यात येत आहे. आज कोणाचीही पकड होणार नाही. जा! तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात!!!’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या सोबत्यांवर कुरैशजणांनी जे अमानुष अन्याय व अत्याचार घडवून आणले होते, ते पाहता जगातील कोणत्याही माणसास असे वाटल्याशिवाय राहणार नाही की, विजय प्राप्त झाल्यावर विजयी पक्ष पराभूत पक्षाकडून बदला घेईल. एकेका छळाचा आणि एकेका रक्ताच्या थेंबाचा बदला घेतला जाईल. कारण क्षमा करण्यासारखा कोणाचाच गुन्हा नव्हता. त्यांच्या अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने रक्ताळळेली होती. परंतु प्रेषितांचे अंतःकरण किती प्रेमळ आणि दयाळू होते. ते केवळ एक विजयी शासक नव्हते, तर ते परम दयाळू आणि कृपाळू ईश्वराचे प्रेषित होते. केवळ मानवावर विजय मिळवून शासन हस्तगत करण्याचा हेतु मुळीच नव्हता, तर सर्व मानवजातीचे नवनिर्माण करण्याचा त्यांचा हेतु होता.
प्रेषितांची ही महीम शान होती की, त्यांनी मुहाजिरीन (ज्यांनी कुरैशजणांच्या अत्याचारांमुळे विवश होऊन वतनत्याग केला होता.) यांना आदेश दिले की, त्यांच्या ज्या जमिनी आणि संपत्तींवर स्थलांतराच्या वेळी ज्यांनी ताब्यात घेतल्या होत्या, त्या त्यांनाच राहू द्या. मग काबागृहाची मागवून घेतलेली चावी ‘उस्मान बिन तलहा’ नावाच्या त्याच माणसाच्या स्वाधीन केली, ज्याने मागे एकदा द्वार उघडण्याची प्रेषितांची विनंती धुडकावली होती. त्यावेळी प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले होते,
‘‘हे उस्मान! निश्चितच एक दिवस असा येईल की चाबी माझ्या ताब्यात येईल आणि मला योग्य वाटेल त्यास मी ही चावी देईन!’’
प्रेषितांच्या ठिकाणी दुसरा विजेता असता तर त्याने ही चावी मागच्या घटनेचा वचपा काढण्यासाठी कोणाच्याही स्वाधीन केली असती आणि ‘उस्मान बिन तलहाची मान त्याच्या तलवारी खाली आली असती.
परंतु प्रेषितांनी म्हटले, ‘‘आजचा दिवस चांगुलपणा भलाईचा व क्षमेचा आहे!’’
मग प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या घरी गेले आणि स्नान करून आठ रकअत नमाज अदा करून ईश्वराची कृतज्ञता व्यक्त केली. विजयाच्या दुसर्या दिवशी ‘सफा’ टेकडीवरून संबोधित करताना काबागृहाचे प्रतिष्ठा बहाल केली. सार्वजनिक माफीतून केवळ ‘अब्दुल उज्जा बिन मक्तल’ नावाचा अपराधी वगळण्यात आला होता. त्यास मृत्यूदंड देण्यात आला.
मक्का विजयाशी संबंधित घटनांची एक मोठी शृंखला आहे. बर्याच घटनांना कात्री देण्यात आली. सर्वांत महत्त्वाची बाब जी या विजयाशी संबंधित आहे ती अशी की, जगातील कोणत्याही इतर शक्तीने मागील चौदा शतकादरम्यान विजयाचे असे आदर्श उदाहरण सादर केलेले नाही की, कोणाकडूनही बदला घेतला गेला नाही व कोणाच्याही सन्मानात बाधा येऊ दिली नाही. कोणत्याही महिलेच्या इभ्रतीस हात लावण्यात आला नाही. हे आदर्श उदाहरण केवळ त्याच व्यक्तिमत्त्वाचे (अर्थात प्रेषित मुहम्मद(स) यांनीच) सादर केले जे संपूर्ण मानवतेवर परमोपकारी होय. मग परत समता व न्यायाची ही घोषणा की, ‘‘संपूर्ण मानवजात ‘आदम’चीच संतती असून कोणीही कोणत्याच परिने श्रेष्ठ व नीच नाही. श्रेष्ठ मानव केवळ तोच आहे, ज्याचे आचरण श्रेष्ठ आहे,’’ ही घोषणा संपूर्ण मानवजगताच्या कल्याणासाठीच होती.

- सय्यद अबुल आला मौदूदी
    पृथ्वीवर जेव्हापासून मनुष्य जीवनाची सुरुवात झाली, तेव्हापासून समस्त मानव जातीसाठी इस्लामचा उगम झाला, असे या पॉकेट साईझ पुस्तिकेत वर्णन आले आहे. इस्लामचा अर्थ आहे अल्लाहचे आज्ञापालन करणे.
    इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे मनुष्य जातीचा निर्माणकर्ता व पालनकर्ता अल्लाह आहे. अल्लाहने पृथ्वीवर प्रथम मानवी जोडी आदम व हव्वा (अ.) यांना धाडले. त्यावेळी अल्लाहने त्यांना आदेशित केले की सर्वांचे कल्याण माझ्या मार्गदर्शनात जीवन यापन करण्यात आहे.

आयएमपीटी अ.क्र. 95    -पृष्ठे - 08     मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2011)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/yxwd779ob18p1vqh7i2a1ptqjeq9df7l

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget