Latest Post

दुर्दैवाने आजकाल मुलांमध्ये मैदानी खेळामधील रस संपत चाललेला आहे, जो कधीकाळी तरूणांना वेड लावणारा होता. आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की, उन्हाळ्याच्या  सुट्टीमध्ये मैदानात आणि गल्लोगल्ली मुलं आपापली गट करून प्रत्येक खेळ खेळत होती. ज्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहत होते. निर्विवादपणे खेळण्याची ती संधी अल्लाह सुबहानहू तआला ने त्यांना दिलेली होती. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल इत्यादी खेळांतून मुलांची आरोग्यदायी वाढ होत होती. हे सर्व खेळप्रकार आता मागे पडलेले असून, तंत्रज्ञानावर  आधारित मोबाईल गेमवर येऊन तरूण पिढी विसावली आहे. या खेळाने खरे पाहता मुलांचं लहानपण हिरावून घेतलेले आहे. आपल्या छोट्याश्या वयामध्ये ते एकटे पडलेले आहेत. त्यांचे  मित्र तुटलेले आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र राहू इच्छितो.
आता मुलं एकत्रित खेळ खेळत नाहीत की, खळखळून हसत नाहीत. मस्तीसुद्धा करीत नाहीत. आजकाल बुद्धीबळ, कॅरम, लुडो आणि सापशिडी सारखे खेळही त्यांना आवडेनासे झालेले  आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारण्यातही त्यांना रस उरलेला नाही. आज मुलं पूर्णपणे एकांतात रमतात. त्यांचा सारखा शोध सुरू असतो कधी आणि कुठे त्यांना एखादा रिकामा कोपरा  मिळेल आणि ते तिथे निवांत बसून आपल्या प्रिय मित्र म्हणजेच स्मार्टफोनमध्ये मग्न होऊन जातील.
असेही ऐकण्यात आले आहे की, दज्जाल एका डोळ्यांनी आंधळा असेल आणि लोकांना पथभ्रष्ट करेल. लक्षपूर्वक पाहता मोबाईल फोनलाही एकच डोळा (कॅमेरा) असतो. या मोबाईल फोनमध्ये लहान, मोठे, स्त्री, पुरूष सर्वच एवढे गुंग होत आहेत की, त्यात त्यांचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आरोग्य उध्वस्त होत आहे, हे ही त्यांना कळेनासे झाले आहे.  इतपत या फोनचा वापर वाढलेला आहे. मोबाईल फोन कधीचाच मैदानी खेळांचा पर्याय म्हणून लोकांच्या जीवनात आलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे 50 ट्न्नयापेक्षा जास्त लोक या  फोनच्या मायाजालात अडकलेले आहेत.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा एक अंगठी बनविली आणि आपल्या बोटात घातली व फर्माविले की, ’ इसने आज मेरी तवज्जोह तुम्हारी तरफ से हटा दी है, एक नजर इसे देखता  हूं और एक नजर तुम्हे’ आणि त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ती अंगठी काढून टाकली. (संदर्भ : नसाई 5301).
यावरून स्पष्ट होते की, प्रेषित सल्ल. यांना अंगठी बोटात घातल्यावर त्यांचे लक्ष वारंवार त्या अंगठीकडे जात होते. प्रेषित जेव्हा आपल्या सोबत्यांसोबत बसले असले तरी त्यांचे लक्ष  बोटाकडेच जात होते. आपल्यामध्ये होत असलेला हा बदल त्यांनी तात्काळ अनुभवला. त्यांच्या लक्षात आले की, आपले लक्ष या अंगठीमुळे विचलित होत आहे. आपल्या महान  उद्देशापासून ही अंगठी काही प्रमाणात का होईना आपल्याला दूर घेऊन जात आहे. म्हणून तात्काळ त्यांनी ती अंगी काढून टाकली.
ज्याप्रमाणे आज लोकांनी स्वतःला मोबाईल फोनशी जोडून घेतलेले आहे. हे मोबाईल तर इतके लक्षवेधी आहे की, पाहणाऱ्याचे नुसते लक्षच विचलित होत नसून, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. आपल्या महान प्रेषितांच्या या कृतीचा गांभीर्याने विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे की, मोबाईल फोनमध्ये एवढा  जीव गुंतविणे योग्य नाही. जो की तुम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांपासून सुद्धा दूर घेउन जात आहे. मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय, खोट्या सबबी सांगण्याची सवय ही केवळ मोबाईलफोनमुळे वाढत आहे. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटवर ते काय- काय पाहत असतील, कोणत्या गोष्टी आणि गीत ऐकत असतील, कोणते फोटो पाहत असतील, हे  त्यांचे त्यांनाच माहित. एवढे मात्र नक्की की मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या सामुग्रीमुळे मुलं वाममार्गाकडे वेगाने जात आहेत. आज इंटरनेट हेच लहान मुलांपासून त्यांचे बालपण हिसकावून घेत आहे आणि तारूण्यामध्ये प्रवेश करणाऱ्या मुलां-मुलींना वाममार्गाला लावत आहेत. मुलां-मुलींना फॅशनच्या नावाखाली अर्धनग्नतेला प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे नवीन  पिढी निर्लज्जपणे वागत आहे.
मोबाईलने आज नवीन पिढीच्या त्या सर्व गोड आठवणी हिरावून घेतल्या आहेत. ज्याचा अनुभव मागच्या पिढीने काही वर्षापूर्वीच घेतला होता. किती चांगले झाले असते जर आपण व आपल्या मुलांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नमूद हदीसचा विचार करून मोबाईल फोनचा चुकीच्या वापर करून आपण स्वतःला रोखू शकलो असतो. मोबाईलशी एवढे प्रेम करू  नये की, ज्यामुळे आपण आपले आरोग्य, मित्र, शिष्टाचार, संस्कृती, आणि धार्मिक आचरणापासून दूर होऊन जावू.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

माननीय अबू सईद खुदरी (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यापैकी ज्याने आपल्या समाजात वाईट कर्म पाहिले आणि बलपूर्वक वाईट  कर्मास रोखले, त्याने आपले कर्तव्य पार पाडले. ज्याने शक्ती आणि पात्रता असुनदेखील आपल्या जिभेचा वापर केला व त्याविरूद्ध आवाज उठविला, त्याने सुद्धा आपले कर्तव्य पूर्ण केले.  तसेच ज्याच्यामध्ये तोंड उघडण्याची व जीभेने विरोध करण्याचीही शक्ती नसेल आणि केवळ आपल्या मनात त्यास वाईट समजत असेल तर तो सुद्धा जबाबदारीतून मुक्त होईल, परंतु  हा इमान (श्रद्धा) चा किमान दर्जा आहे.’’ (हदीस : तऱगीब व तरहीब, निसाई)

भावार्थ
या हदीसचा अर्थ असा आहे की, कूकर्म संपविण्याची शक्ती असतानादेखील, ते कूकर्म न संपविल्यास ईश्वराच्या कोपास बळी पडण्यापासून राहणार नाहीत. त्याकरीता माणसाने  आपली सर्व शक्ती व पात्रता पणाला लावून दुष्कर्माविरूद्ध कंबर कसली पाहिजे, अट मात्र एवढीच की दुष्कर्मिकाविरूद्ध बळाचा वापर करण्याच्या परिणामस्वरूप एखादे मोठे संकट उभे  राहू नये. या हदीसमध्ये हे स्पष्ट होते की, असत्य आणि दुष्कर्माच्या वर्चस्वकाळात सत्यवानांनी कोणत्याही परिस्थितीसमोर आत्मसमर्पण करून आरामाची झोप घेणे निर्लज्जतेचे आणि  सत्याची प्रेम नसल्याचे लक्षण आहे.
अल्लाह दासांची परीक्षा घेण्यासाठी जी पद्धत स्विकारतो, त्यापैकी एक पद्धत ही आहे की जेव्हा कधी व्यक्ती किंवा समुदायात अवज्ञा वाढत जाते तर त्याच्यासमोर अवज्ञेच्या संधीचे दार उघडले जाते. ह्यामुळे त्याची इच्छा जी आत लपलेली असते ती स्पष्टत: समोर येते. ज्या अपराधांद्वारा ते आपल्या स्वत:ला कलंकित करू इच्छितात, ते यामुळे वंचीत राहू नये की  त्यांना संधीच मिळाली नाही. प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘अल्लाह थोरामोठ्यांच्या अपराधांसाठी जनसामान्यांना शिक्षा देत नाही जोपर्यंत जनसामान्य आपल्या डोळ्यांसमोर वाईट  कृत्ये होतांना पाहतात, आणि त्या दुष्ट कामांचा प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य ठेवून सुद्धा त्याविरूद्ध रोष व्यक्त करीत नाहीत, जेव्हा लोकांची ही अवस्था होते, तेव्हा सामान्य, असामान्य, सर्वावर अल्लाहचा कोप कोसळतो.’’
सामुहिक उत्पाताची आग जेव्हा भडकते, त्यात चांगले आणि वाईट, सगळेच त्याचे भक्ष ठरतात. यापासून सुरक्षीत राहण्यासाठी समाजाचे सामुहिक अंतर्मन जागृत असावे. एखादा उत्पात  डोके काढीत असलेला पाहून, तत्क्षणीच तो दाबून टाकण्याचा प्रयत्न करावा. आग लावणाऱ्याचे हात त्याचवेळी धरावेत. या आज्ञेनुसार जोपर्यंत मुसलमान वागत राहिले, तोपर्यंत त्याच्यात कोणत्याही उत्पाताने डोके वर काढले नाही.

धन, संपत्ती माझ्या समुदायाचा (उत्पात) फितना
ह. क़ाब बिन अया़ज (रजी.) म्हणतात की, ‘‘प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, प्रत्येक मानवी समुहाचा उत्पात (फितना) वेगवेगळा आहे, धनसंपत्ती माझ्या समुहाचा  फितना आहे.’’(हदीस : तिर्मिजी)
वेगवेगळ्या काळात, मानवी समुहाला, ईश्वराने वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेतली आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्या समुहाची परीक्षा धनसंपत्तीद्वारे होईल. भौतीक जगालाच जीवनाचे सार्थक एखादी व्यक्ती समजत असेल तर त्याची धन, संपत्ती त्याच्यासाठी एक कठीणतम परीक्षा सिद्ध होईल. अर्थात यामध्ये तो (असफल) नापास होईल.

पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे... अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.

कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर हा ग्रंथ जसा अवतरला होता, अक्षरशः त्याच अवस्थेत आजही तो आमच्यापाशी उपलब्ध आहे. इस्लामच्या पहिल्या शताब्दीपासून ते आजपर्यंतच्या कुरआनच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. या प्रती एकमेकांना प्रमाणित करतात आणि पुष्टी देतात. कुरआन हे जगातील पहिले असे पुस्तक आहे, ज्याला प्रत्येक कालखंडात, जगातील लाखो माणसांनी मुखोद्गत केले आहे. संपूर्ण कुरआन मुखोद्गत करणार्याला ‘हाफीज’ असे म्हटले जाते. रमजान महिन्यात दररोज रात्री संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. अशा प्रकारे सबंध जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआनचे पुनःर्पठण केले जाते.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी तो संपूर्णपणे लिहून मुहम्मद(स.) यांच्याकडे देण्यात आला नव्हता. प्रेषितपद प्राप्त झाल्यानंतरच्या त्यांच्या २३ वर्षांच्या जीवनकाळात तो टप्प्याटप्प्याने अवतरित होत राहिला. कुरआनच्या अवतरणाची या शृंखलेचा, मुहम्मद(स.) यांच्याद्वारा इस्लाम धर्माच्या स्थापनेशी थेट संबंध होता.
प्रेषित मुहम्मद (स.)
पवित्र कुरआन जसा मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजला जातो. त्याचबरोबर मुहम्मद(स.) यांनाही मुस्लिमांचे प्रेषित मानले जाते. वास्तवतः ही गोष्ट खरी नाही. अल्लाहने मुहम्मद(स.) यांना अखिल मानवजातीसाठी आपला प्रेषित बनवून धाडले होते.
जगात आजवर होऊन गेलेल्या धर्मगुरूंपैकी प्रेषित मुहम्मद(स.) यांचे जीवनचरित्र सर्वांहून अधिक तपशिलासह आणि विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध आहे. त्यात त्यांचे जीवन व त्यांची शिकवण या दोहोंचा समावेश आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म कालौघाच्या अशा वळणावर झाला, जेव्हा संस्कृतीचा प्रकाश पसरला होता आणि मानवजात आधुनिक युगात प्रवेश करीत होती.
प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म मक्केत झाला. त्या काळी मक्का एक छोटे शहर होते. त्यांचा जन्म झाला, तेव्हा परिस्थिती अत्यंत विपरित होती. जन्मापूर्वीच त्यांच्या पित्याचे निधन झाले. मातेची मायाही त्यांना अधिक काळ मिळू शकली नाही. एखादा थोरला भाऊही नव्हता, त्यांचे चुलते अबू तालीब यांचा थोडासा आधार होता. आर्थिक स्थितीही हलाखीची होती. यासाठी त्यांना शेळ्या चारावयास नेण्याचे आणि दुसर्या लोकांचा व्यापारी माल विक्रीसाठी नेण्याचे काम करावे लागले. त्यांचे मोठे धन, त्यांच्या नैतिक चारित्र्यात होते, ज्याचा सुगंध मक्केतील सर्व लोकांना जाणवत होता. विश्वासू व प्रामाणिक म्हणून त्यांना ओळखले जाई. आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापाशी ठेवून सुरक्षिततेचा निःश्वास सोडीत असत. लोक त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत, त्यांचा शब्द मानीत असत. एखादे भांडण झाले आणि ते मिटण्याचे लक्षण दिसले नाही, तर लोक त्यांना पंच म्हणून निवड करीत व त्यांनी दिलेला निर्णय स्वीकार करीत असत.
त्यांचे वय चाळीस वर्षांचे झाले तेव्हा अल्लाहने त्यांना आपला प्रेषित म्हणून घोषित केले. आणि त्यांच्याकडे पवित्र कुरआनचे अंश येऊ लागले. अल्लाहचा संदेश घेऊन ते लोकांपाशी गेले. त्यांना सांगितले की केवळ एकमेव अल्लाहचीच उपासना करा आणि मूर्तिपूजा सोडा. लोकांना सांगितले की खरे बोला, न्यायाने वागा, कोणाचीही संपत्ती हडप करू नका, सर्व माणसे एकाच माता-पित्याची संतती आहेत. त्यांच्यात कसलाही भेदभाव करू नका. या गोष्टी ऐकून मक्केचे लोक बिथरले, किबहुना ते प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठार मारण्याचा कट शिजवला गेला. तेव्हा प्रेषितांनी मक्का शहर सोडण्याचे ठरविले. मदिन्याच्या लोकांनी त्यांना साथ देण्याची शपथ घेतली व आपल्या शहरात त्यांना जागा दिली. काही दिवसांतच तेथे एक आदर्श इस्लामी समाज स्थापन झाला. मक्केचे लोक तेथेही लढाई करायला आले, पण पराजित होऊन परतले. शेवटी मुहम्मद(स.) व त्यांच्या सोबत्यांची सत्ता मक्केवरही प्रस्थापित झाली. मुहम्मद(स.) यांच्या नंतरही इस्लामी राज्याचा विस्तार होत राहिला. राज्यच नव्हे, तर त्यांच्या शिकवणींचा व पवित्र कुरआनचा प्रसार सर्वदूरपर्यंत झाला.

जगात जितके धर्म आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामकरण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे. अथवा ज्या जातीत व ज्या राष्ट्रात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ धर्माचे नाव, येशू ख्रिस्तांशी निगडीत असलेल्या कारणाने ‘ख्रिश्चन’ धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते, म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव ‘बौद्ध’ धर्म असे ठेवले गेले. झरतुष्ट्र धर्माचे नाव, त्याचे संस्थापक ‘झरतुष्ट्र’ यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी (ज्यू) धर्म हा ‘यहुदा’ नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले. अशीच अवस्था अन्य धर्माच्या नावासंबंधी आहे. परंतु ‘इस्लाम’ चे वैशिष्ट्य असे आहे की, त्याचे नामकरण कोणत्याही व्यक्तीशी अथवा जाती अगर वंशाशी संबंधित नाही उलट त्याचे नामकरण एक विशिष्ट गुण प्रकट करते. या गुणाचा अविष्कार ‘इस्लाम’ शब्दाच्या अर्थामध्ये आढळतो. हे नामकरण स्वतःच असे स्पष्ट दर्शविते, की ते कोणाही व्यक्तीच्या बुद्धीची निपज नाही. तसेच कोणाही एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. त्याचा संपर्क कोणाही व्यक्तीशी, देशाशी भूभागाशी अथवा जातीशी नाही. जनमानसात ‘इस्लाम’ चा गुणधर्म निर्माण करणे हाच त्याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात व प्रत्येक जातीत व वंशात ज्या सज्जन व सद्वर्तनी लोकांमध्ये हा गुण आढळून आला ते सर्व मुस्लिम होते. मुस्लिम आहेत व पुढेही ते मुस्लिम असतील.

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ
अरबी भाषेत ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञापालन असा आहे. (‘इस्लाम’ शब्दाचा दुसरा अर्थ, शांती, कुशलता, संरक्षण, शरण इ. मनुष्याला वास्तविक शांती त्याचवेळेस प्राप्त होते, जेव्हा तो स्वतःला अल्लाहपुढे अर्पण करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनशांती प्राप्त होते आणि समाजात खरी शांती नांदू लागते.) अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव ‘इस्लाम’ असे ठेवले गेले आहे.

- वहीदुद्दीन खान
    मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती? उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर हिशेब देण्यासाठी प्रत्येकाला हजर व्हावे लागणार आहे. या वास्तवतेशी आज मनुष्य गाफिल बनला आहे.
    मनुष्याने जीवनाची वास्तवता जाणून घेतली तर विद्यमान जगातील नव्हे तर पारलौकिक जीवनाची खरी समस्या तो जाणून घेईल, हेच सत्य या पुस्तकांत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 108    -पृष्ठे - 16    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/f8rw0o2iz06bhjs2zhza13ue9u78nazq


जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांची निवड नुकतीच झाली. त्यांचा जन्म 1973 चा असून, ते इले्नट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर  आहेत. त्यांची स्वतःची एक संगणक कंपनी आहे. त्यांना इस्लामची अत्यंत चांगली समज असून, आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके आणि 200 पेक्षा जास्त लेख उर्दू आणि इंग्लिशमध्ये  लिहिलेले आहेत.
या पदावर निवड होण्यापूर्वी ते जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी ते स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते बोर्ड ऑफ ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन  दिल्लीचे सदस्य असून, सेंटर फॉर स्टडी अँड रिसर्च दिल्लीचे संचालक आहेत. इदारतुल तहेकीक व तसनीफ-ए-इस्लामी अलिगढचे ते आजीवन सदस्य असून, इस्लामिक अ‍ॅकॅडमिक ट्रस्ट  दिल्लीचे विश्वस्त आहेत. शिवाय, बोर्ड ऑफ इस्लामिक पब्लिकेशन दिल्लीचे सदस्यही आहेत. शिवाय, एडिटोरियल बोर्ड ऑफ तसनीफी अ‍ॅकॅडमी, एमएमआय पब्लिशर्स दिल्लीचे सदस्य  असून, अ‍ॅडव्हायझरी बोर्ड जमियतुल फलाह आजमगढचे माजी सदस्य राहिलेले आहेत. ते आपल्या लेखन शैली आणि विचारपूर्ण भाषणांसाठी इस्लामी जगतामध्ये परिचित आहेत. त्यांची  ही निवड 4 वर्षासाठी म्हणजे 2023 पर्यंत झालेली आहे. अगदी साधी राहणीमान आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.  भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून  निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी अमीर (अध्यक्ष) निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

जमाअते इस्लामीच्या अध्यक्षांची निवड कशी होते?
जमाअते इस्लामी हिंदची स्थापना ऑगस्ट 1941 मध्ये अखंड भारत असताना लाहौर येथे झाली. देशाच्या फाळनीनंतर 1948 साली जमाअते इस्लामी हिंद नावाची स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली जिचा जमाअत-ए-इस्लामी पाकिस्तानशी कुठलाच संबंध नाही. जमाअतए- इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष अबुलैस इस्लाही नदवी हे होते. आतापावेतो या संघटनेचे पाच  अध्यक्ष झालेले असून, मागच्या आठवड्यात मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या ठिकाणी तरूण अभियंते व जमाअतचे उपाध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड कशी होते? याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लोकांना वाटते की, इतर संघटनांच्या निवडीप्रमाणेच या संघटनेध्येही काही लोक अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल   करत असतील, उमेदवार जोरदार प्रचार करत असतील आणि शेवटी त्यावर मतदान होऊन अध्यक्षाची निवड होत असावी. मात्र असा काही प्रकार येथे होत नाही. जमाअत-ए-इस्लामी  हिंद हिची व्यवस्था शुराई निजाम म्हणजे एकमेकांच्या सल्लामसलतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबवून आहे. जी की पूर्णपणे देशाच्या घटनेच्या आधीन काम असून नोंदणीकृत  संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामीचे जवळ-जवळ 12 हजार पेक्षा अधिक सदस्य भारताच्या 20 मोठ्या राज्यात आहेत. 31 मार्च 2019 रोजी मागच्या अध्यक्षांची 4 वर्षांचा कार्यकाळ  संपला होता. पुढील अध्यक्षांच्या निवडीसाठी देशभरातून मजलिस-ए-नुमाईंदगान (प्रतिनिधी सभा)चे 157 सदस्य दिल्लीत जामिया नगरमधील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य  कार्यालयात 1 एप्रिलपासूनच जमा झाले होते. त्यांची निवड याआधीच झालेली होती. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची निवडसुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. यांची निवड दोन टप्प्यामध्ये  झाली.
पहिल्या टप्प्यामध्ये जमाअते इस्लामीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या पसंतीच्या राज्याबाहेरील सदस्याचे नाव सुचवायचे असते व दूसऱ्या टप्प्यात स्वतःच्या राज्यातील पसंतीचे नाव  सुचवायचे असते. यात स्वतःचे नाव सुचविता येत नाही. जमाअते इस्लामी हिंदचे वैशिष्ट्ये असे की, या संघटनेमध्ये कोणत्याही पदासाठी कोणालाही स्वतःचे नाव सुचविता येत नाही किंवा त्यासाठी लॉबिंग करता येत नाही. तसे काही आढळून आल्यास तात्काळ त्या सदस्याची संघटनेतून हकालपट्टी केली जाते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेचे सर्व सदस्य दिल्ली येथे जमा झाले. प्रतिनिधी सभा ही जमाअते इस्लामी हिंदची सर्वात मोठी आणि प्रभावशाली सभा असते. या  सभेच्या सदस्यांना अमीरे जमाअतच्या निवडीचे व त्यांना काढून टाकण्याचे सुद्धा अधिकार असतात. शिवाय, चार वर्षाच्या काळामध्ये जमाअतची ध्येय धोरण ठरविणे तसेच कामाचे नियोजन करणे हे अधिकार याच प्रतिनिधी सभेला असतात. यावर्षी 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 157 सदस्यांनी आपसात विचारविमर्श  करून अनेक नावांपैकी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. येथेही सआदतुल्लाह हुसैनी यांनी स्वतःला अध्यक्ष करावे म्हणून नामांकन  दाखल केले नव्हते किंवा लॉबिंगही केलेली नव्हती. उलट ही जबाबदारी मला नको, असे ते म्हणत होते. उपस्थित 157 सदस्यांपैकी काही सदस्यांनी काही लोकांची नावे या पदासाठी  सुचविली होती. त्यावर ज्यांची नावे या पदासाठी सुचविली गेली होती. त्यांना बैठकीत सामील न करता त्या सर्व नावावर प्रतिनिधी सभेमध्ये सखोल चर्चा झाली. जमाअतच्या  संविधानाप्रमाणे अध्यक्षामध्ये जी गुणवत्ता हवी ती सुचविल्या गेल्या लोकांपैकी कोणामध्ये जास्त आहे. त्यांची बलस्थाने कोणती आहेत इत्यादीवर सखोल चर्चा झाली व त्यानंतर  सआदतुल्ला हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड मजलिसे नुमाईंदगान ने एकमताने 7 एप्रिल रोजी केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्षपद तर सोडा साध्या सदस्यात्वासाठीही जर कोणाची निवड करायची असेल तरी त्याचे चारित्र्य तपासले जाते, त्याचे व्यवहार तपासले जातात व  जमाअतच्या संविधानाच्या कलम 8 आणि 9 प्रमाणे त्याचा दर्जा आहे काय, हे पाहिले जाते. जमाअतचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि काटेकोरपणे केले जातात.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget