Latest Post

रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र. सर्व जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव. जगभरातील ईद साजरा करण्याचा पॅटर्नही एकच आणि रोजाचाही पॅटर्नही एकच. फक्त भौगोलिक घटनाक्रमावरून थोडा फार एखाद दिवसाचा किंवा सहर, इफ्तार आणि ईद साजरी करण्यातला वेळेचा फरक. महिनाभराच्या कठीण उपवासानंतर रोजेधारकांना बक्षीसाच्या स्वरूपात अल्लाहकडून भेट म्हणून ईदचा दिवस. या दिवशी समाजातील सर्वच स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने ईद साजरी करतात परंतु, शेजारी, मित्रपरिवाराला सोबत घेत, गळा भेट घेऊन, ईद मुबारक म्हणत आणि एकाच पंगतीत बसवून स्वत: सर्वांना शिरखुर्मा आणि इतर रूचकर पदार्थ वाढत. यात भर पडते ती अत्तर आणि सुरम्याची. हा माहोल एवढं सुख आणि समाधान देतो की कितीही कुणाबद्दल कटूता असलीतरी त्याला माफ करत आलींगन द्यायला भाग पाडतो. 
    रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिम बांधवाला त्यातल्या त्यात रोजेधारकाला स्वत:ला बदलायला, विचार करायला आणि दान, धर्म करायला प्रेरित करतो. संयम, आत्मीयता आणि माफ  करण्याच्या प्रवृत्ती या महिन्यात अधिक वृद्धींगत होते. त्याची फलश्रुती ईदच्या दिवशी दिसते. कुठल्याही सणादिवशी लोक आपल्या कुटुंबातील लोकांसोबत रममाण असतात. मात्र ईदच्या दिवशी कुटुंबापेक्षा अधिक मित्रांना, शेजार्‍यांना, ओळखीच्या व्यक्तींना, परिसरातील गरीबांच्या सेवेत अधिक जातो. त्यांना आग्रहाने घरी बोलावून शिरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी भाग पाडतो. घरातील प्रत्येकाचे कोणी ना कोणी मित्र असतात. लहानगा असेल तर त्याचे मित्र, मोठा असेल तर त्याचे मित्र. म्हणजेच या दिवशी घरातल्या सर्व लहान, थोरांच्या सर्वधर्मीय जवळच्या व्यक्तीना घरी बोलावून जेवू घातल्याशिवाय ईद साजरी झाल्यासारखी वाटतच नाही. गळा भेट घेऊन ईद मुबारक म्हणणे, एवढीच भेट या दिनी स्विकारली जाते. ज्यामुळे चेहर्‍यावर नूर बहरत असतो आणि स्मीत हास्याने ईदची खुशी झळकत असते. ही खुशी चेहर्‍यावर फुलविण्यात मोठा वाटा असतो तो घरातील स्त्रीयांचा. कारण त्यांच्या परिश्रमामुळेच सर्व काही मिष्टान्न तयार झालेले असतात. खासकरून ईदच्या दिवशी शिरखुर्म्याची चव ही सर्वश्रेष्ठ स्वादाच्या पलीकडील असते. तसा स्वाद इतर दिवशी येत नसल्याचा मित्रपरिवाराचं म्हणण आलं.
    रमजानमध्ये कोणाला काय मिळते?
    अल्लाहने कुरआनमध्ये म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ : सुरह बकरा आयत नं.183).
    म्हणजेच अल्लाहकडून इमानधारकांसाठी चारित्र्यनिर्माणाची भेट मिळते. सर्वचजण म्हणतात, उत्तम चारित्र्य ही यशाची गुरूकुल्ली असते. ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनातही. रोजाच्या काळात कठीण प्रशिक्षण असते. त्यामुळे महिनाभर नियमानुसार रोजे करणे, तरावीहची नमाज अदा केल्यामुळे रोजेधारकाला उत्तम शरीरयष्ठी प्राप्त होते. त्याचे शरीर निरोगी बनते. रोजा माणसामध्ये भुकेची जाणीव उत्पन्न करतो. अन्न धान्यांची कदर करायला शिकवितो. पाण्याची महत्ता वाढवितो. भुकेलेल्याचा त्रास करवून देतो. जेणेकरून त्यांच्याबद्दलही मनात आत्मीयता वाढावी. या सर्वांमुळे अन्नदान करायला माणूस प्रेरित होतो. तसेच रमजान गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी श्रीमंताना प्रेरित करतो. ते म्हणजे जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून. जकातमुळे तर समाजातील जवळपास 8 गटातील लोक सुखावतात. कुरआनच्या सुरे तौबात म्हटले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”   
म्हणजेच 1. फकीर 2. मिस्कीन, 3. जकात वसूल करणारे 4. तालीफे कुलूब. 5. प्रवासी, 6. निर्दोषींना सोडविणे 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभतेसाठी  8. कर्जदारांना कर्जमुक्त करण्यासाठी.
    सदका म्हणजे गरीबांना करण्यात येणारे दान आणि फित्रा म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावने दोन किलो गहू अथवा तत्सम रक्कम गरीबांमध्ये दान करणे. यामध्ये श्रीमंत, मध्यमवर्गीय आदींचा समावेश होतो. याचा अर्थ गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत होते. आणि शेवटी एवढे अल्लाहने या रोजेधारकांसाठी ईदची सर्वात मोठी भेट दिली आहे. ईदची नमाज सामुहिकपणे ईदगाहवर अदा करण्याला प्राधान्य आहे. ज्यामुळे सामुहिकपणे प्रार्थना होते आणि येथे सर्वांच्या भेटीगाठी होतात. आणि आनंदाने ईदगाहून शांततेने आपापल्या घरी जाणे. म्हणूनच रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र ही एकात्मता, सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढविण्यासाठी अल्लाहकडून प्रत्येक इमानधारकाला मिळालेली भेटच आहे.
    आदरणीय सआद बिन औस रजि. आपले वडील औस यांच्या हवाल्याने सांगतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ” जेव्हा ईद-उल-फित्रचा दिवस येतो तेव्हा अल्लाहचे दूत प्रत्येक रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि घोषणा करतात की, ’ हे मुस्लिमानों! आपल्या पालनकर्त्याकडे चला जो फार मोठा कृपाळू आहे. जो पुण्यकर्म करण्याचा आदेश देतो आणि ते करण्याची क्षमता देतो. आणि त्यावर परत बक्षीसही देतो. तुम्हाला त्याच्याकडून (प्रेषितांच्या मार्गाने) तरावीहची अतिरिक्त नमाज अदा करण्याचा आदेश झाला. त्याचेही तुम्ही पालन केले. दिवसा रोजा ठेवण्याचा आदेश झाला तुम्ही रोजेही केले. आपल्या पालनकर्त्याचा आदेश तुम्ही पूर्णपणे मानला तर आता चला आपापले बक्षीस घ्या.”
    जेव्हा ईदची नमाज संपते तेव्हा एक ईशदूत घोषणा करतो की, ” हे लोकांनों ! तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुक्ती दिलेली आहे. आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. अशा पद्धतीने ही आठवण ठेवत की हा दिवस बक्षीसाचा दिवस आहे. जगामध्ये याला भलेही ईदचा दिवस म्हटले जात असेल मात्र परलोकांमध्ये याला बक्षीसाचा दिवस म्हटले जाते. (संदर्भ : तरगीब : अलमंजुरी, हदीस प्रभा पेज नं.41)
गावांमधील ईद
    गावातील ईदचा आनंद औरच असतो. कारण सर्व गाव एक कुटुंबासारखं असतं. त्यामुळे प्रत्येक उत्सव येथे सामुहिकपणे साजरा होतो. त्यात ईदचा दिवस म्हणजे सर्वांसाठी पर्वनीच असते. गावातील ईदगाहवर ज्यावेळेस नमाज पठण करण्यासाठी लोक जातात. त्यावेळेस गावातील बारा बलुतेदारही इदगाहकडे वळतात. मुस्लिम बांधव ज्यावेळेस ईदगाहकडे निघतात त्यावेळेस प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या हातात अन्नधान्याची पिशवू भरून घेउन निघतो. जशी नमाज संपते तशी प्रत्येकजण पिशवीतील धान्य, काही पैसे ईदगाहवर जमा झालेल्या बारा बलुतेरादारांना देत राहतो. त्याचवेळेस तो उपस्थितांना जेवणाचे आमंत्रणही देतो. जशी नमाज पठण करून घराकडे लोक निघतात ते घरात जाण्याअगोदर मित्रांना, जवळच्या व्यक्तींना आवतन देउनच घरात प्रवेश करतात. त्यानंतर घरातील आई, बहिण, बायको यांच्याशी सौहार्दपणे सलाम, दुआ देतात. यावेळी बच्चेकंपनी ईदीसाठी घरातील मोठ्यांकडे अट्टहास धरतात. त्यामुळे त्यांनाही कोणी नाही म्हणत नाही. अशा पद्धतीने सर्वांशी आत्मीयतेने साजरा होणारी ईद-उल-फित्र अल्लाकडून मिळालेली देणगीच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शेवटी अल्लाहकडे प्रार्थना आहे की, माझ्या देशात शांतता नांदावी, पाऊस मुबलक व्हावा, शेती भरभराटीला यावी, प्रेम, आपुलकी वृद्धींगत व्हावी, प्रत्येकाला न्याय मिळावा, दारू, गुटखा, जुगार, व्याज यापासून देशबांधवांना दूर ठेव, देश सुजलाम, सुफलाम व्हावा, राजकारण्यांना सद्बुद्धी मिळावी, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी, सर्व देशबांधवाना चारित्र्यसंपन्न बनव. (आमीन.)

ईद म्हणजे उत्सव फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईदुल फित्र म्हणजे दान देण्याचा उत्सव. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लामध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद उल फित्र दूसरी ईद उल अजहा. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर जी ईद येते तिला ईदुल फित्र असे म्हणतात. अल्लाहने या दोन्ही ईदच्या दिवशी श्रीमंतांवर गरीबांना दान देऊन ईद साजरी करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ईदला जाण्यापूर्वी फित्रा अर्थात गहू, खजूर, किशमिश किंवा नगदी रूपये गरीबांना दान दिल्याशिवाय ईदच्या नमाजला जाता येत नाही. रमजानच्या महिन्यात महिनाभर दान, पुण्य केले जाते. तेवढ्यावरही न थांबता परत ईदच्या दिवशी दान देण्यासाठी अल्लाहने श्रीमंतांना प्रोत्साहित केलेले आहे.
    कुठल्याही प्रकारचा कर्कश संगीत, डीजेचा आवाज, टुकार चित्रपटातील गीतावर केला जाणारा अश्‍लिल नाच, पैशाचा किंवा विजेचा अपव्यय किंवा हुल्लडबाजी ईदच्या दिवशी करता येत नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदुषण ईदच्या दिवशी होत नाही. कुठल्याही प्रकारचा नशापाणी ईदच्या दिवशी कोणी करत नाही, कुठलीही घोषणाबाजी होत नाही. गटागटाने लोक अल्लाहचे नामस्मरण करत ईदगाह मैदानावर शांतपणे जमा होतात. तेवढ्याच शांतपणे दोन रकात नमाज अदा करून घरी परत येतात आणि मित्र परिवारासह शिरखुर्म्याचा आस्वाद घेतात. ईदचा जो मुख्य कार्यक्रम असतो तो ईदगाहवरील नमाजचा असतो. तो साधारणत: एक ते दीड तासात संपतो. महिनाभर उन्हा-तान्हात उपाशीपोटी राहिलेल्या जिवांवरील खाण्यापिण्याची बंधने ईदच्या दिवशी उठलेली असतात. त्यामुळे त्या दिवशी थकलेल्या जीवांना दिलासा मिळतो आणि कळते की खाणे आणि पाणी पिणे याचे महत्त्व मानवी जीवनात किती असते?
    ईदच्या पूर्वी ईदच्या तयारीसाठी म्हणून बाजार फुललेले असतात. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक मुस्लिम नवीन कपडे, चप्पल, बूट, कॉस्मेटिक्स, सुकामेवा, साखर, सुगंध इत्यादी खरेदी करत असतो. त्यामुळे मार्केटमध्ये नवचैतन्य निर्माण होते.
    महिनाभर केलेल्या उपवासातून आणि अतिरिक्त ईबादतीतून मुस्लिमांच्या चारित्र्याचा ग्राफ उंचावलेला असतो. मोह, माया, काम, क्रोध यावर मात करून येत्या 11 महिन्यात सदाचाराने वागण्याचा प्रत्येकाने आपल्या परीने निर्णय केलेला असतो. ज्यांनी जाणीवपूर्वक रोजे केले आणि 11 महिने आपले चारित्र्य जपण्याचा प्रण केला. ते त्यामध्ये यशस्वीही होतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी भांडवल ठरते.     लौकिक अर्थाने ईदचा अर्थ एवढाच जरी असला तरी ईदचे महत्त्व यापलिकडेही आहे. ते कोणते हे समजून घेऊ.
    आज समाजामध्ये चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई आहे.  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, महिला आणि मुलांचे शोषण होत आहे, वाईट चारित्र्याच्या लोकांनी प्रत्येक क्षेत्र व्यापल्यामुळे असे घडत आहे. अशावेळी चांगल्या लोकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी इतर समाजाप्रमाणे मुस्लिम समाजावरही आहे. त्यासाठी दरवर्षी इस्लाम महिनाभर लोकांना चारित्र्यसंवर्धनाचे प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण अनिवार्य असल्यामुळे प्रत्येकजण ह्या प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जातो. महिनाभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याला समाजामधील वंचित लोकांच्या भूकेची व तहानलेल्या लोकांच्या वाईट परिस्थितीची आपोआप जाणीव होते. रमजान नंतर तो आपल्या मगदूरीप्रमाणे दानपुण्य करत राहतो. समाजातून गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो. हे फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच शक्य आहे की, श्रीमंतांकडून जकात, फित्रा, सदका, घेऊन तो गरीबांना दिला जातो. अन्यथा इतर व्यवस्थांमध्ये तर व्याजाच्या व्यवस्थेतून गरजूंचे आर्थिक शोषण केले जाते. गरीबांना अधिक गरीब तर श्रीमंतना अधिक  श्रीमंत बनविण्याकडे व्यवस्थेचा कल असतो. गरीब लोक कायम गरीबीत राहिल्यास स्वस्तात मजूर उपलब्ध होत राहतील व त्यामुळे कारखानदारी भरभराटीला येते व देशाची आर्थिक प्रगती होते, असा विचार भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने केला जातो. हा विचार एवढा प्रबळ आहे की, साम्यवादाला सुद्धा यावर उपाय सुचवूनसुद्धा काही साध्य करता आलेले नाही.
    समाजातील काही घटकांना ठरवून सातत्याने गरीब ठेवले गेल्यामुळे समाजामध्ये विषमता वाढत चाललेली आहे. आपल्या देशामध्ये तर विषमतेने तर एवढा कळस गाठलेला आहे की, गरीबीमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यात आता शहरी भागातील गरीबांच्या आत्महत्येंचीही भर पडत चाललेली आहे. गरीबीमुळे येणारे अनेक रोग उदा. टी.बी., दमा, अ‍ॅनिमिया, मानसिक आजार वाढलेले आहेत. सार्वजनिक स्वास्थ्य व्यवस्था बकाल असल्यामुळे या आजारांना बळी पडणार्‍या गरीबांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मतदान ग्रामीण भागामध्ये होत आहे, विकास शहरी भागाचा होत आहे. अनुत्पादक गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढत आहे, अत्यावश्यक कृषी उत्पादनामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. अशा या विषम परिस्थितीशी लढण्याची शक्ती इस्लामच्या समाजवादी वैचारिक शक्तीतून मिळू शकते. इतर कुठल्याही व्यवस्थेमध्ये या विषमतेला नष्ट करण्याची क्षमता राहिलेली नाही, याची खात्री झालेली आहे. रमजान आणि ईदच्या पार्श्‍वभूमीवर चारित्र्यवान नागरिक देशाला मिळत राहोत. एवढीच प्रार्थना. आमीन. सर्व देशबांधवांना ईदच्या शुभेच्छा.

- एम.आय.शेख

प्रेषित ह. मुहम्मद (स.,) यांनी फर्माविले आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने ईमानपूर्वक आणि अल्लाहकडून मोबदला मिळावा या आशेवर ‘लैलतुल  कद्र’ (शबे कद्र) मध्ये इबादत (प्रार्थना) केली, त्याचे सर्व गुन्हे (पाप) माफ केले जातील.’’ (हदीस– बुखारी)

भावार्थ
ज्याप्रमाणे पावसाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फार मोलाचा असतो, त्याचप्रमाणे अल्लाहची निकटता सामीप्य प्राप्त करण्यासाठी इस्लामी शरिअतने ठरविलेल्या खास वेळा, खास दिवस व  खास रात्री अत्यंत मोलाच्या असतात. उदा. रात्री तहज्जुदच्या नमाजची वेळ, शुक्रवारचा दिवस, रमजानचा महिना, अरफातचा दिवस वगैरे. त्याचप्रमाणे ‘कद्र’ची रात्र, अल्लाहची प्रसन्नता  प्राप्त करण्यासाठी अत्यंत योग्य व अनुकूल अशी रात्र आहे. म्हणूनच रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा रात्रीमध्ये तिचा शोध घेण्यास प्रेषित (स.) यांनी फर्माविले आहे.

माननीय ह. आयेशा (रजि.) निवेदन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘शबे कद्र’चा रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात, विषम रात्रीमध्ये (२१, २३, २५,  २७, २९ वी रात्र) शोध घ्या. (हदीस- बुखारी) ठराविक रात्र यासाठी दर्शविली गेली नाही की तिच्या शोधाची आवड निर्माण व्हावी. लोकांनी काही रात्री अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यतीत  करावे. या दृष्टीने ‘अ‍ेअतिकाफ’ मागील हिकमत ही स्पष्ट होते. जो रमजानच्या शेवटच्या दशकामध्ये केला जातो. आता प्रश्न उद्भवतो की जगाच्या एका भागात रात्र असताना, इतर  भागात दिवस असतो. मग इतर भागातील लोकांना ‘कद्र’चे फायदे कसे मिळेल? याचे उत्तर असे की, शरीअतने ज्यावेळेला लाभदायक ठरवून इबादतीसाठी निश्चित केले आहे,  त्याबाबतीत स्थानीक वेळा प्रमाण मानली जाईल. त्यामुळे शबे ‘कद्र’चा लाभही स्थानीक वेळ प्रमाणित मानल्याने, शिल्लक राहतो आणि जगातील सर्व भागातील इबादत करणाऱ्यांना तो  मिळू शकतो. ‘रुह’ने अभिप्रेत ‘रुहूल अमीन’आहेत. ही हजरत जिब्रईल (अ.) यांची पदवी आहे. त्यांचा उल्लेख विशेषकरून यासाठी केला गेला आहे की ते फरिश्त्यांचे (देवदुतांचे) सरदार  आहेत. त्यावेळची परिस्थिती नजरेसमोर यावी, जेव्हा फरिश्ते अल्लाहचा संदेश घेऊन उतरत होते. प्रत्येक आज्ञा घेऊन उतरतात याचा अर्थ हा आहे की, ‘शबे कद्र’मध्ये फरिश्ते अकारण  उतरले नव्हते. उदा. कुरआनच्या पाच आयतींना ज्या सुरए ‘अलक’च्या सुरुवातीच्या आयती आहेत उतरविणे, मक्केमधील ‘हिरा’ गुहेत उतरणे, ह. मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहची  वह्यी (संदेश) उतरवून, त्यांना प्रेषितत्वाची वस्त्रे देणे, त्याच्यामध्ये वह्यी ग्रहन करण्याची व तिला योग्य प्रकारे वाचण्याची पात्रता निर्माण व्हावी म्हणून त्यांना आपल्या हृदयांशी धरून  कवटाळणे, याशिवाय कल्याण व समृद्धी उतरविण्यासंबंधी देवदुतांना जे आदेश दिले गेले होते, त्यापैकी प्रत्येक आज्ञेचे त्यांनी योग्यप्रकारे पालन केले. कुरआन उतरविण्याच्या समयी  आकाशावर कडक पहारे बसविण्यात आले होते. शैतानांनी व्यत्यय आणू नये, त्यांना आकाशात काही ऐकण्याची संधी मिळू नये म्हणून पहारे बसविले होते. कुरआन अवतरण्यापूर्वी  कोणालाही ही खबर नव्हती की अल्लाहचा संदेश अवतरणार आहे. अशाप्रकारे अल्लाहने त्या रात्री (कद्र) कुरआन उतरविले तिला सर्व प्रकारच्या संकटापासून सुरक्षित राखण्याची व्यवस्था  केली होती. त्या रात्रीला पूर्णपणे शांततेची रात्र बनविले होते. ही मंगलरात्र पवित्र कुरआनच्या उद्घाटनाची रात्र होती, जी ‘शबे कद्र’ म्हणून साजरी केली जाते. ‘कद्र’च्या रात्री  सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत शांततेचा व समृद्धीचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच ही संपूर्ण रात्र इबादतीस पात्र आहे. या रात्री जो ग्रंथ अवतरण झाला (कुरआन) तो ही पूर्णपणे शांततेचाच ग्रंथ आहे, कुरआन हा मानवजातीस शांततेचा संदेश आहे. याचा स्वीकार करणारे भौतीक जगात शांततेचे जीवन जगतील आणि परलौकीक जीवनात त्यांना चिरस्थायी शांतता  लाभेल.

हज’चा अर्थ होतो पवित्र स्थानाला भेट देणे. या उपासनापध्दतीला हज असे म्हणतात, कारण त्यात पवित्र स्थान काबागृहाची यात्रा अभिप्रेत आहे.
महत्त्व: प्रत्येक श्रध्दावंताचे कर्तव्य आहे की त्याने आयुष्यात एकदा हजयात्रा करावी, जर तो प्रौढ असेल आणि त्याची तितकी आर्थिक क्षमता असेल. एखादी प्रौढ आणि आर्थिक सक्षम व्यक्ती काबागृहाची यात्रा (हज) करत नाही तर ती व्यक्ती आज्ञाधारक (मुस्लिम) राहण्याचा दावा करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की या गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत आहे त्याने त्याची हजयात्रा करावी आणि जो कोणी या आदेशाचे पालन करण्यास नकार देईल त्याने समजून असावे की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे.’’ (कुरआन ३: ९७)
वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खालील हदीस (प्रेषितवचन) आहेत,
‘‘जर एखाद्या व्यक्तीला सशक्त कारण नसेल अथवा जालीम राज्यसत्तेमुळे हजयात्रा करणे अशक्य आहे, हेसुध्दा कारण नसेल तर ती व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मृत्यु पावली तरी काही एक फरक पडणार नाही.’’
‘‘आदरणीय उमर (रजि.) यांच्यानुसार, अशी व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मरण पावली (हे शब्द तीनदा उच्चारले गेले) जिला आर्थिक सुबत्ता आहे आणि हजयात्रा करणे सुकर आहे तरी हजयात्रा न करता मृत्यु आला.’’
याविरुध्द ज्याने हजयात्रा गांभीर्यपूर्वक व्यवस्थितरित्या पार पाडली अशा व्यक्तीची वाखाणणी करताना स्पष्ट करण्यात आले आहे की या पवित्र कार्याव्यतिरिक्त अधिक चांगले कृत्य दुसरे असूच शकत नाही.
अशा प्रकारच्या मान्यताप्राप्त हजयात्रेसाठी स्वर्ग हेच एकमेव पारितोषिक आहे.
‘‘जो हजयात्रेला जाऊन तेथे कोणतेही पाप आपल्या हातून करीत नाही आणि विधीपूर्वक सर्व हजकार्य व्यवस्थित पार पाडतो तो नुकत्याच जन्मलेल्या बालकाप्रमाणे निरागस बनून परत येतो.’’ (बुखारी)
अल्लाह आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांनी हजयात्रेला इतके महत्त्व का दिले आहे? हजयात्रेव्यतिरिक्त एखाद्याचा मुस्लिम (आज्ञाधारक) राहण्याचा दावा खोटा कसा ठरतो? हजयात्रेने स्वर्गप्रवेश सुकर कसा बनतो? या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी आपणास हजयात्रा म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहावे लागेल. इस्लाम धर्माच्या आत्म्याशी हजयात्रेचा कसा संबंध आहे, इस्लामी चारित्र्यसंवर्धनकार्यात हजयात्रेला काय महत्त्व आहे? अल्लाहची उपासना करण्यात व्यक्तीला हजयात्रेमुळे काय मदत मिळते? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपणास खालील दोन प्रश्नांची उकल करून घ्यावी लागेल. प्रथम काबागृह म्हणजे काय, जिथे लोक हजयात्रेला जातात? ते कशासाठी बांधले गेले? त्याचा इस्लामशी संबंध काय? आणि दुसरे म्हणजे हजयात्रेत कोणते धर्मविधी पार पाडले जातात आणि त्यांचा हेतु काय? हे सर्व मुद्दे अभ्यासले गेले तर स्पष्ट होईल की हजयात्रेला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व का आहे.

- प्रा. खुर्शीद अहमद
    11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे प्रतीक होती.
    विश्वव्यापी भांडवलशाहीचे वैभवशाली प्रतिरूप म्हणजे वर्ल्डट्रेड सेंटर होते. याविषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे जेणेकरून वास्तवता वाचकाच्या समोर यावी आणि वाचकास निर्णया प्रत येण्यास मदत व्हावी.

आयएमपीटी अ.क्र. 121   -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती 

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/6yip84dic1668zm6n0arh12j9khp5ay4


जो विश्वास व श्रद्धा द्वेषापासून व वैरभावापासून निपजलेले नसते आणि त्यापासून प्रेरणा घेतलेली नसते, त्यापासून भौतिक लाभ तत्काळ मिळत नाही. जी श्रद्धा माणसात प्रेम, बंधुभाव, त्याग एवढेच नाही तर आपल्या बांधवाखातर प्राणार्पण करण्याची भावना निर्माण करते; खरे पाहता हीच श्रद्धा मानवतेला वास्तविक व सुदृढ देणग्यांनी व सुखांनी अलंकृत करु शकते आणि भविष्यातील समृद्धी व उन्नतीचे आधार बनू शकते. या विश्वासाचा गाभा ईश्वरावर श्रद्धा व त्याच्याशी मनःपूर्वक प्रेम होय. हा विश्वास व्यक्तिगत जीवनास पावित्र्य देऊन आपल्या निर्माणकर्त्याशी सानिध्य मिळवून देतो; पण पारलौकिक जीवनावरील श्रद्धेखेरीज ईश्वरावरील विश्वास वा त्याच्यावरील प्रेमाला काही अर्थ उरत नाही. परलोकची कल्पना माणसाला एक प्रकारच्या रक्षणाची भावना देत असते. यानंतर मानवाला अशी खात्रीपूर्वक शाश्वती प्राप्त होते जी आपल्या पार्थिव अंतानंतर नष्ट होत नाही. आपल्या जीवनात केलेले प्रयास व कष्ट निष्फळ होत नाहीत. उलट त्याला त्यांचा मोबदला या नश्वर जगात जरी मिळाला नाही तरी तो मोबदला पुढे येणाऱ्या परलोकीय जीवनामध्ये कसल्याही परिस्थितीत मिळल्याशिवाय राहणार नाही.
अशी ही फळे आहेत जी केवळ अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर विश्वासरूपी वृक्षापासून निर्माण होतात; पण इस्लाम केवळ येथेच थांबत नाही याखेरीज आणखी बरेचसे आम्हाला देतो. त्याची कहाणी इतर कहाण्यांपेक्षा भिन्न व अधिक रुचिर आहे.

इस्लामने ’नातेवाईकांशी सदाचाराने वागा’ अशी सूचना केली आहे. पवित्र कुरआनमध्ये ’’नातेवाईकांचे हक्क अदा करा’’ असा आदेश दिला आहे. याचाच अर्थ घरातील स्त्रीवर ही  जबाबदारी अप्रत्यक्षपणे सोपविली आहे. नातेवाईकांशी सद्व्यवहार, सहानुभूती, शुभचिंतनाचा व्यवहार, प्रेम, माया, सुख, दुःखात सहभाग या सर्व गोष्टींचा अंतर्भाव अपेक्षित आहे. परिवाराबरोबर नातेवाईकदेखील जोडले जाणे आवश्यक आहे. हा जोड इतका घट्ट असावा की जर एका नातेवाईकाच्या पायात काटा रूतला तर त्याची कळ दुसऱ्या नातेवाईकाला जाणवावी  आणि तिसऱ्या आप्तेष्ठाच्या डोळ्यांतून अश्रु वहावेत. पवित्र कुरआनमध्ये निवेदन आहे, ’’ ते जोडतात त्या संबंधाना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे. आणि  आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगा’’ (दिव्य कुरआन).
अल्लाहने प्रत्येकाला नाते जोडण्याचा आदेश दिला आहे. नाते जोडणे हे सद्वर्तन समजले आहे. हे सद्वर्तन प्रत्येक स्त्री-पुरूषाने करावे, पण निर्माण झालेले, जोडलेले नाते तुटणार नाही  किंवा त्यात फारकत निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण नाते तोडणे हे इस्लाम अमान्य करतो. नातेसंबंध संपविणे म्हणजे पाप करणे होय आणि यासाठी अल्लाहची भीती  बाळगली जाते. या नातेसंबंधामध्ये रक्ताची नाती आणि मानलेली नाती या दोघांचाही समावेश होतो.
’’ जी पत्नी आपल्या नवऱ्याबद्दल कृतज्ञ नसेल तिला अल्लाहचा आशीर्वाद लाभणार नाहीत.’’
’’उत्तम स्त्री दात्याचे (देणाऱ्याचे) नेहमीचे आभार मानते. कोणत्याही कठीण प्रसंगात धीर दाखविणारी, सांभाळ करणारी, आज्ञाचे पालन करणारी असते.’’
ज्या महिलेला उत्तम स्त्रीत्व प्राप्त करावयाचे आहे तिने नेहमी आपणास मदत करणाराचे, घरात आणून देणाराचे, आपला उदरनिर्वाह चालवणाराचे (पतीचे) आभार मानले पाहिजेत. तसेच त्याच्या ऋणात राहायला पाहिजे. जी स्त्री दात्याचे आभार मानते, त्याच्या ऋणात राहते ती कितीही भयावह प्रसंग आला तरी डगमगत नाही. तिचा निश्चय डळमळीत नसतो. ती  आपल्या निर्णयावर कठीण प्रसंगीही ठाम राहते. ती प्रतिकूल परिस्थितीत इतरांचा सांभाळ करते व आज्ञांचेही पालन करते.
बहुतेक धर्मामध्ये आईची थोरवी गायली आहे. कोणताही धर्म आईशी अवमानकारक वागण्यास प्रवृत्त करीत नाही. सर्वच धर्मात आई अत्यंत आदरणीय, व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या तत्त्वज्ञानात आईची अवहेलना किंवा कुचंबना अपेक्षित केलेली नाही. तसेच इस्लाम तत्त्वज्ञाने किंवा धर्माने आईचा (स्त्री) सन्मान केलेला आहे. ’’आईच्या पायात  (चरणात) स्वर्ग आहे.’’ ही शिकवण इस्लामचीच आहे. ’’आईची सेवा हे पुण्यकर्म आहे. इस्लामने आपल्या आईविषयी कृतज्ञ राहण्यास सांगितले आहे. आपल्या आईवडिलांचे हक्क  ओळखण्याची ताकीद केली आहे. कारण आईने मरणयातना सहन करून आपल्याला जन्मास घातले आहे. तसेच तिने आपल्यासाठी अन्न त्यागले आहे. (बाळ दूध पित असताना आई  खारट, तिखट, आंबट, खात नाही, कारण त्याचा परिणाम दुधावर होतो व त्यामुळे बाळाला त्रास होईल यासाठी ती अन्न त्यागते.) बाळ आजारी असल्यास आई रात्ररात्र जागते. बाळाच्या  जन्मानंतर सर्वात पहिला गुरू आई होते. आई ज्ञानपीठ आणि न्यायपीठ या दोन्ही व्यवस्था बाळासाठी स्वतः होते. लहान मुलाच्या मेंदूवर संस्कार करते. जगातील सर्वात आदरणीय  सर्वसमावेशक व्यक्ती म्हणजे आई होय. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ थोडोर रिक त्यांच्या पुस्तकात म्हणतात, (द इमोशनल जिस्पराईट्स) ’प्रत्येक स्त्रीला तिच्या मातृत्वाचा अभिमान  वाटतो.’ तसेच त्यांनी असेही म्हटले आहे, ’स्त्री पुरूषाला अनेक सरस (उत्कृष्ठ) बाबींबद्दल मोठेपणा देते.’
ईश्वराने स्त्रीला बहाल केलेली देणगी म्हणजे तिचे मातृत्व. मातृत्वाच्या देणगीनेच स्त्रीचे प्रतिष्ठा पराकोटीला पाहोचली. कारण मानवाची निर्मिती स्त्री आणि पुरूष यांच्यातून झाली  असली तरी स्त्री जन्मदात्री आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत वंशसातत्याचे काम करते व तिला कायम वाटते की आपण आदर्श माता व्हावे. ’आई’ ही प्रचंड मौल्यवान देणगी आहे.  म्हणूनच  अनेक कवी, साहित्यिक, विचारवंत, व्याख्याते आईचे महत्त्व अनेक शब्दांत सांगतात. जसे ’आईविना माणूस भिकारी’, आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही’ ’प्रेमसिंधू आई, वात्सल्यसिंधू आई, बोलवू आता कोणत्या उपायी’, अशा अनेक प्रसिद्ध रचना आपणांस ऐकावयास  मिळतात. आज संपूर्ण भारतभर गावागावात आईची थोरवी गाणारी आणि सांगणारी माणसे भेटतात. यावरून आपल्या लक्षात येते की कितीही गडगंज श्रीमंत व्यक्ती असली आणि  तिच्याकडे असंख्य भौतिक सुविधा असल्या आणि त्या व्यक्तीस आई नसली तर तो आईसाठी भिकारी आहे. आई म्हणजे आयुष्यभर पुरणारा एक असा मोठा ठेवा आहे तो पुरतही नाही  आणि संपतही नाही. जगात कोणत्याही व्यक्तीची आई नसेल तो सर्वांत जास्त पोरका आहे. ज्याला आई नाही त्याला काही नाही. तसेच एखाद्याला आई नसली तरी त्याला आई नाही  असेही म्हणवत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका इसमाने विचारले, ’’ मी कोणाची अधिक सेवा करावी.’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ पुन्हा तो म्हणाला, ’’त्यानंतर  दूसरे कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’तुमच्या आईची.’’ तो माणूस पुन्हा म्हणाला,’’ आणखी कोण?’’ पैगंबर म्हणाले, ’’ तुमची आई.’’ त्या माणसाने चौथ्यांदा विचारले, ’’यानंतर कोण?’’  पैगंबरानी सांगितले, ’’तुमचे वडील.’’
वरील विवरणावरून आपणास सहज लक्षात येते की इस्लामने प्रथम दर्जा आईला म्हणजेच स्त्रीला दिला आहे, कारण स्त्री आदरणीय आहे. तिचा आदर जेव्हा तीन वेळा होईल तेव्हा  वडिलांचा आदर एक वेळा केला आहे. म्हणजेच पुरूष (वडील) तर आदरणीय आहेच पण त्यापेक्षा आई (स्त्री) तीनपट अधिक आदरणीय आहे. याचा अर्थ स्पष्ट करताना खालील वाक्याचे  पुनर्लेखन करतो, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.’’ मानव ज्या स्वर्गाच्या अपेक्षेसाठी जीवनभर सद्वर्तन करतो, स्वर्गप्राप्तीसाठी अनेक पुण्यमार्ग अवलंबितो, इस्लामने सांगितले की  आपणास सृष्टी दाखवणारी आपल्या मृत्यूपश्चात स्वर्ग-प्राप्तीची संधी देणारी वात्सल्यसिंधू आहे. त्यामुळे आईचे उपकार स्वतःच्या शरीराची कातडी काढून जरी त्याचे बूट करून आईला  घातले तरी ते कमीच आहे. आई हे असे न्यायालय आहे जिच्यापुढे मुलाचे हजारो अपराध माफ होतात. क्षमा मिळते.
मुलाची तब्बेत (शारीरिक स्वास्थ्य) कितीही उत्तम असले तरी आईच्या नजरेत आपले बाळ हे तब्बेतीने कमकुवत आहे, असे वाटते. कारण तिची माया विलक्षण आहे. मराठीमध्ये एक  म्हण आहे, ’’शेजारणीने भरवला भात आणि आईने फिरवला हात दोन्ही सारखेच.’’ आई एक आदरातिथ्य आहे आणि तिच्या चरणाच्या खालीच स्वर्ग आहे. म्हणजे आपण स्वर्गाच्या  अपेक्षेणे वनवन भटकतो आणि खरा आईच्या पायाखालचा स्वर्ग आपणास दिसत नाही. तिची आपल्या मुलावर अलौकिक माया असते, या मायेला जगात तोड नाही.
पवित्र कुरआनमधील आईचा सन्मानच केला गेला आहे. म्हणून आज मातृप्रेम व सन्मान यासाठी स्त्री पात्रच आहे. ज्ञानी, सुसंस्कृत व्यक्ती कधीच स्वतःच्या आईचा मोठेपणा नाकारू शकत नाही. आई ही संपूर्ण जगाची निर्माती आहे. ती बाळाला जन्म देते आणि रिकामी होते असे नाही. तर ती आपल्या बाळाचे लालनपालन, संगोपन करते. उदरात अर्भक  असल्यापासून ते तिच्या अंतापर्यंत आपल्या बाळावर कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. बाळाच्या नुसत्या रडण्याच्या आवाजाने आईचा पान्हा फुटतो. इस्लामने स्पष्ट  ताकीद केली आहे, ’’आपल्या आई-वडिलांचे अधिकार जाणा.’’
अर्थात आपल्या सुखात, ऐश्वर्यात, समृद्धीत त्यांचा अधिकार आहे, तो म्हणजे केवळ त्यांना सुखात सांभाळण्याचा. त्यांना सांभाळावे, त्यांची परवड होऊ नये याची काळजी घ्यावी.  आपल्या आईवडिलांशी चांगले वर्तन ठेवावे. कारण आईने आपल्या रक्ताचे दूध करून बाळाला पाजलेले असते आणि त्या दुधाचे कर्ज कोणीही आणि कधीही फेडू शकत नाही आणि तसा  हिशोबही करू नये. फक्त त्यांच्याशी सद्वर्तन करावे. आई जेव्हा आपल्या बाळाला छातीशी कवळाटून दूध पाजते तेव्हा ती व ते बाळ यांच्यात अतूट नाते निर्माण होते. म्हणून जितके  महत्त्व बाळाला जन्म देण्याला आहे, त्यापेक्षा नक्कीच अधिक महत्व स्तनपाला आहे.
आज समाजामध्ये स्तनपान करण्यास मातेला वेळ मिळत नाही. (नोकरी, व्यवसाय करणाऱ्या माता) तसेच काही स्त्रिया स्तनपान करण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवतात. त्यांच्यासाठी  किंवा अशा स्त्रिया या गरोदर आहेत व बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपान नाकारण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी सांगणे आहे की, आईचे दूध हा बाळाचा अधिकार आहे, तो स्वतः  आईदेखील त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. इस्लामने बाळाला जन्म देणारी जन्मदात्री जितकी महत्त्वाची तितकीच बाळाला स्तनपान करणारी दूध आई आहे, असे सांगितले  आहे. याचे हिंदू धर्मातील एक उदाहरण आहे ते खालीलप्रमाणे.
छत्रपती शिवरायांच्या पत्नीने (सईबाई) 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका मुलास जन्म दिला (संभाजीराजे) पण त्या या बाळंतपणात आजारी पडल्या व त्यांना बाळंतपणाचा रोग जडला व त्यात त्यांचे दूध आटले (दूध आले नाही). तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी पुरंदरजवळच्या कापूरहोळच्या गाडे-पाटील यांच्या घरातील बाळंतीण (जिची मुलगी दगावली होती)  ’’धाराऊ गाडेपाटील’’ हिला गडावर बोलावून घेऊन तान्ह्या संभाजीच्या दुधाची सोय केली. पुढे बाळंतपणाच्या आजारातच 5 सप्टेंबर 1659 रोजी सईचे निधन झाले.
संभाजीच्या जीवनात जेवढे महत्त्वाचे स्थान सईबाईंना होते तेवढेच ’’दुधआई’’ धाराऊ यांना होते. सईबाईंच्या पश्चातसुद्धा धाराऊ अगदी शेवटपर्यंत संभाजीची दूधआई असल्याने त्यांच्या  मृत्यूपर्यंत गडावरच राहिल्या आणि संभाजीला दूध पाजल्याच्या त्यांच्या आयुष्यभर त्यांना मोबदला दिला. स्त्रीला काही कर्तव्ये सांगितली त्यात आपल्या बाळास स्तनपान करणे हे  देखील आहे. पण आज धावत्या युगात स्त्रिया (माता) सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कला, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांच्यासमोर स्तनपानाची आज समस्या निर्माण झाली आहे. काही स्त्रिया अशा आहेत की ज्या बाळाला स्तनपानास स्पष्ट नकार देतात. कारण त्याने त्यांचे सौंदर्य कमी होईल याची  त्यांना भीती वाटते. स्तनपान न करणे म्हणजे आपल्या बाळाचा हक्क काढून घेणे व एक पाप करणे आहे, याची जाणीव स्त्रियां (माता) मध्ये निर्माण करावी लागेल. आज जगभरात  बाळांसाठी स्तनपानाची जागृतीची मोहिम चालू असलेली पहावयास मिळते व त्यासाठी अब्जावधी रूपयांचा खर्च केला जात आहे. पवित्र कुरआनमध्ये इस्लामच्या अवतरणाच्या वेळीच  स्तनपानाविषयी जागृती केलेली दिसून येते. याचाच अर्थ स्त्री आणि तिच्यापासून जन्मास आलेले अर्भक या दोघांच्या अधिकारांच्या बाबतीत इस्लामी तत्वज्ञान संतर्क होते, सतर्क आहे.
(सदरचा लेख : इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री यामधील आहे. प्रकाशक : इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबई.)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget