Latest Post

आपल्या आजोबाप्रमाणेच आदमच्या संततीवरही अल्लाहची कृपा आहे. आपल्या अपराधानंतरही आदरणीय आदम (अ) जसे अल्लाहच्या कृपेपासून वंचित झाले नाहीत तसेच त्यांची संतती ही गुन्हा व पाप घडल्याकारणाने अल्लाहच्या कृपेपासून वंचित होत नाही. कारण अल्लाह मानवी स्वभावधर्मातील कमकुवतपणा व त्याच्या मर्यादा चांगल्या रीतीने जाणतो व जेवढा भार ते पेलू शकतात तेवढाच भार त्यांच्यावर टाकतो -
‘‘अल्लाह कोणत्याही प्राण्यावर त्याच्या कुवतीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे लादत नाही.’’ (कुरआन,२:२८६)
सर्व मानव (आदम (अ) ची संतती) अपराधास व चुकास पात्र आहेत व जे आपल्या अपराधासाठी (लज्जित होऊन) क्षमा याचना करतात, ते लोक अपराध्यांमध्ये महान आहेत.’ (तिर्मिजी)
अल्लाहच्या कृपेची व्यापकता
अल्लाहच्या दयेक्षमेबाबत तर कुरआनमध्ये अनेक आयती आहेत, पण आम्ही येथे एकच उदाहरण देतो
‘‘तुमच्या पालनकर्त्यांची क्षमा व स्वर्गाकडे नेणाऱ्या मार्गांने दौडत चला व स्वर्ग, जमीन व आकाशाप्रमाणे विशाल असून ते अशा संयमी जनांसाठी निर्माण केलेले आहे जे, सुस्थितीत तसेच कुस्थितीत संपत्ती खर्च करतात जे क्रोधाला जाळून टाकतात व इतरांच्या चुकांची क्षमा करतात. असे भले व सज्जन ईश्वराला अतिप्रिय असतात. त्यांची अवस्था अशी असते की एखादे कुकर्म त्यांच्या हातून घडते, अगर एखादे पाप करुन स्वतःवर ते अत्याचार करुन बसतात, तेव्हा तात्काळ त्यांना अल्लाहचे स्मरण होते व आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमायाचना भाकू लागतात. कारण अल्लाहखेरीज अपराधाची क्षमा कोण करू शकतो व ते हेतुपुरस्सर आपल्या अपराधाचे समर्थन करीत नाहीत. अशा लोकांना त्यांचा पालनकर्ता क्षमा करून, त्यांच्या क्षमायाचनेचा मोबदला देईल व त्यांना स्वर्गांच्या अशा उद्यानात दाखल करील तेथे खालून पाण्याचे कालवे वाहात असतील व तेथे ते चिरकाल राहातील. सद्वर्तन करण्यासाठी किती छान मोबदला आहे.’’ (३:१३३-१३६)
अल्लाहची कृपा किती व्यापक आहे, हे यावरून स्पष्ट होते. तो आपल्या दासांची क्षमायाचना स्वीकारतो एवढेच नाही तर त्या पापाच्या घाणीतून वर काढून व त्याला निर्मळ व शुचिर्भूत बनवून, आपल्या वेचक दासांच्या समूहात त्याचा समावेश करून टाकतो.
अल्लाहच्या कृपेचा एक आश्चर्यजनक पैलू
अशा कृपाळू व मेहेरबान अल्लाहच्या दये व क्षमेबाबत थोडासुद्धा संशय उरतो काय? अल्लाहच्या कृपेच्या अशा व्यापक धारणेमुळे आध्यात्मिक कष्ट व अस्वस्थपणा नष्ट होऊन जातो. तो माणसाला दाखवून देतो की तो आजन्म अपराधी नाही. तसेच त्याच्या पालनकर्त्याची कृपाही त्याच्या अवस्थेबद्दल गाफील नाही. उलट तो जेंव्हा पापाकरिता त्याची अंतःकरणपूर्वक क्षमायाचना भाकतो तेव्हा तो त्याला आपल्या आश्रयस्थानात घेतो. त्याकरिता खरोखरीने व निष्ठेने लज्जित व खजील होण्याखेरीज दुसरी कसलीही अट नाही. ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की तिचे समर्थनार्थ आणखी अधिक पुरावे देण्याची गरज नाही, तरी इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या अनुपम वचनावर एक दृष्टिक्षेप टाकू या. मुस्लिमनुसार त्यांनी असे सांगितले,
‘‘ज्याच्या ताब्यात माझा प्राण आहे त्या शक्तिची शपथ, जर तुम्ही कसलेही पाप केले नसते, तर अल्लाहने तुम्हाला नष्ट करुन तुमचे जागी अशा लोकांना निर्माण केले असते, जे पापे करुन त्याची क्षमायाचना भाकीत आहेत व त्याने त्यांना क्षमा केली असती.’’ (मुस्लिम)
असे समजा की, माणसांच्या चुकांकडे डोळेझाक करुन त्यांना क्षमा करणे हाच जणू अल्लाहचा मानस आहे, कुरआनची ही शानदार आयतही हीच गोष्ट उघड करते,
‘‘जर तुम्ही कृतज्ञ भक्त होऊन श्रद्धेच्या मार्गाने गेलात तर शेवटी तुम्हाला अकारण शिक्षा करण्यात अल्लाहला काय स्वारस्य आहे. अल्लाह मोठा गुणग्राही आहे व सर्वांची अवस्था चांगल्या तऱ्हेने जाणतो.’’ (कुरआन ४:१४७८)
निःसंशय अल्लाह माणसाला कष्टात खितपत असलेला पाहू इच्छित नाही. उलट त्याला आपली कृपा व क्षमा प्रदान करतो.

आज विज्ञानाच्या आश्चर्यजनक यशाने पाश्चिमात्य लोकांना असे काही भारून टाकले आहे की त्यांच्यात असा शीघ्रगतीने विचार पसरला आहे, की विज्ञानाने धर्माला कायमचे परागंदा करून टाकले आहे. कारण त्याची उपयुक्तता संपली आहे. मानसशास्त्राच्या तसेच समाजशास्त्राच्या प्रसिद्ध तज्ञापैकी जवळजवळ सर्वांनी अशाप्रकारचे विचार व्यक्त केले आहेत. उदाहरण द्यावयाचे म्हटले तर युरोपमधील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ ‘फ्राईड’ने धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नावर हल्ला व उपहास करताना असे लिहिले की मानवी जीवन तीन प्रकारच्या स्पष्ट मानसशास्त्रीय कालातून जात असतो. रानटीकाल, धर्मकाल आणि वैज्ञानिक काल, आता विज्ञानाचे युग आहे म्हणून धर्माच्या गोष्टीत काही अर्थ व तथ्य नाही, तो संपला आहे व आपले मूल्य हरवून बसला आहे.
धर्माशी वैरभावाचे खरे कारण
धर्माच्या बाबतीत युरोपियन वैज्ञानिकांच्या विरोधी भूमिकेचे खरे कारण तो संघर्ष होता जो त्यांना युरोपीय चर्चच्या विरुद्ध करावा लागला. त्या संघर्षात चर्चने ज्या प्रकारच्या आचरणाचे प्रदर्शन केले ते पाहून ते लोक हेच सत्य आहे असे समजू लागले की धर्म हा प्रतिगामीत्व, रानटीपणा, अंधविश्वास निर्मूल व बिनबुडाच्या विचारांचा परिपाक आहे. म्हणून श्रेयस्कर असे आहे की धर्म कायमचा नष्ठ केला जावा. विज्ञानाला पुष्टी दिली जावी व त्याच्या मार्गदर्शनात मानवजातीची, तसेच संस्कृतीचा विकास चालू राहू शकेल.
युरोपीयन वैज्ञानिकांचे धर्माशी वैर असण्याचे खरे कारण हे होते. धर्माविरुद्ध असणारे काही मुस्लिम या खऱ्या कारणाला समजून घेत नाहीत, तसेच पूर्व व पश्चिमेतील परिस्थितीचा फरक लक्षात घेत नाहीत व धर्माला विरोध करीत असतात. त्यांचा विरोध एखाद्या गंभीर चितन व विचारांती नसतो, किबहुना तो युरोपच्या अंधानुकरणाचे अपत्य आहे. त्यांच्यासमीप विकास व उन्नतीचा तोच एकमेव मार्ग आहे ज्या मार्गाने युरोपियन राष्ट्रे जात आहेत. म्हणून आम्हालाही धर्माची कास सोडून दिली पाहिजे. असे नाही केले तर लोक आम्हाला प्रतिगामी व मागासलेले म्हणून टोमणे मारतील.
दुर्दैवाने हे लोक विसरतात की युरोपियन विद्वानांमध्येही धर्मविरोधाच्या बाबतीत पूर्वी एकमत आढळत नाही. तसेच आताही पूर्ण एकमत आढळत नाही. याउलट काही मोठे विद्वान या निरीश्वरवादी संस्कृतीला विटून हे सत्य उघडपणे बोलू लागले आहेत, की धर्म ही मानवाची अनिवार्य मानसशास्त्रीय व बौद्धिक गरज आहे.
युरोपियन विद्वानांची साक्ष
या विद्वानात प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जेम्स जीन्स प्रमुख आहे. जेम्सच्या जीवनाचा आरंभ एक निरीश्वरवादी व प्रत्येक विषयात शंकादृष्टी ठेवणाऱ्या युवकाच्या रुपात झाला. पण आपल्या अनेक वैज्ञानिक शोधांनंतर शेवटी या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचला की धर्म ही मानवी जीवनातील अनिवार्य गरज आहे, कारण ईश्वरावर आस्था बाळगल्याविना विज्ञानाच्या मूळ समस्या उलगडल्या जाऊ शकत नाहीत. हा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ जेम्स जीन्ज धर्माच्या समर्थनार्थ इतका पुढे गेला, की त्याने जडवाद व अध्यात्मावाद या दोघांच्या समन्वयावरील विश्वास व आचरण यांचा समतोल एकत्रित करण्याच्या पद्धतीवर इस्लामची उघडपणे स्तुती केली. इंग्लंडचे प्रसिद्ध साहित्यिक ‘समर्सेटमॉम’ने धर्माच्या बाबतीत आजच्या युरोपातील नकारात्मक भूमिकेला या शब्दांत संबोधिल आहे, ‘‘युरोपने आपल्याकरिता एक नवीन ईश्वर ‘विज्ञान’ शोधून काढले आहे आणि जुन्या ईश्वरापासून तोंड फिरविले आहे.’’
युरोपचा नवा ईश्वर
परंतु युरोपचा हा नवीन ईश्वर मोठा ‘‘परिवर्तनवादी’’ निघाला आहे. हा प्रत्येक क्षणी बदलत असतो व त्याचा दृष्टिकोन नेहमी बदल व स्थित्यंतर करण्याकडे असतो. एखाद्या गोष्टीला तो आज ‘सत्य’ मानतो, तर उद्या खोटे, असत्य व फसगत असे म्हणून टाकतो. परिवर्तनाचे हे चक्र असे चालतच राहते. ते कधी संपत नाही आणि त्याचे भक्त नेहमी त्रासलेले असतात. अशा तऱ्हेच्या परिवर्तनशील व प्रत्येकक्षणी बदलणाऱ्या ईश्वराच्या छत्राखाली ते आणखी वेगळी कसली आशा करू शकतात. आजचे पाश्चिमात्य जगत बेचैनी व असंतोषाच्या मेघांनी झाकोळलेले आहे. ते अनेक मानसिक व मानसशास्त्रीय रोगांचे बळी होत आहेत. ती त्यांच्या मूळ आध्यात्मिक रोगाची बाह्यचिन्हे होत.
विज्ञानाचे नवे जग
विज्ञानाला ईश्वरपद बहाल करण्याच्या कृतीचा आणखी एक असा परिणाम निघाला आहे की जेथे तुम्ही आम्ही राहतो, हे जग कुठल्याही स्पष्ट उद्देशापासून अथवा ध्येयापासून बिलकूल वंचित झाले आहे. त्याचा कुठलाही उच्च उद्देश नाही, व्यवस्था नाही तसेच कोणतीही श्रेष्ठ सत्ता वा शक्ती येथे अस्तित्वात नाही, जिच्याद्वारे जगाचे मार्गदर्शन होऊ शकेल. येथे परस्परविरोधी शक्तींमध्ये सतत संघर्ष चालू आहे व येथील प्रत्येक वस्तू परिवर्तनाचे लक्ष्य आहे. आर्थिक पद्धती असो की राजनैतिक तसेच राज्य आणि व्यक्तीचे संबंध असो, येथील प्रत्येक गोष्ट बदलत असते इथपर्यंत की वैज्ञानिक सत्येही बदलतात. उघड आहे की या अंधकारमय व भयानक जगात, मानवाला सततच्या त्रास, बेचैनी व असंतोषाखेरीज काही प्राप्त होऊ शकत नाही. विशेषकरुन अशावेळी जेव्हा वातावरण एखाद्या उच्चतम सत्तेच्या कल्पनेशीही अनभिज्ञ आहे. गुंतागुंतींनी जीवनातील अडचणींनी, दुखांनी पीडित झालेल्यांना व गांजलेल्यांना त्याच्या पदराखाली शरण जावून आश्रय घेतल्याने सुख व शांती प्राप्त होऊ शकेल.

- प्रेमचंद मुन्शी
    प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप' (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले नाहीत.
    आजही हिंदुसाठी मुस्लिम एक रहस्य आहे तसेच मुस्लिमांसाठी हिंदु एक रहस्य आहे. ते दोन्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेत नाहीत. ही चिंता या पुस्तकात वर्णन करण्यात आली आहे. संस्कृतीचे तीन प्रकार न्याय, समानता, विश्वबंधुत्व तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची आणखी काही वैशिष्ट्यें वर्णन केली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 127    -पृष्ठे - 08  मूल्य - 06      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/p9x27qwhzzkr7evsmku9s53o8tx2o4lz

इस्लाम पुरूषास चार विवाहांपर्यंत मान्यता देतो. इस्लामने बहुपत्नित्वाची अनुमती दिली याचा अर्थ असा नाही की कितीही स्त्रियांशी विवाह करावा. अनेक विवाह करण्यासाठी तशाच  प्रकारच्या अटीदेखील घातलेल्या आहेत. इस्लाम ज्या काळात आणि ज्या प्रदेशात अवतरित झाला त्या वेळेच्या परिस्थितीचा विचार करूनच मान्यता दिली. इस्लामच्या पुनरोद्धारावेळी  स्त्रियांचे प्रमाण मुबलक होते. आज जसे जागतिक पातळीवर स्त्री-पुरूषांच्या प्रमाणात स्त्रीचे प्रमाण कमी आणि पुरूषांचे अधिक आहे, तसे प्राचीन काळी मुस्लिमांमध्ये स्त्रियांचे प्रमाण  पुरूषांच्या प्रमाणापेक्षा जास्त होते. म्हणून बहुपत्नित्वाला मान्यता देण्यात आली. स्त्रियांचे प्रमाण अधिक असण्यासही काही बाबी कारणीभूत होत्या. उदा. युद्धे, लढाया, पुरूषांचे स्थलांतर  या कारणांनी पुरूषांची संख्या लढाईत मारले जाऊन कमी होते. पुरूषांचे प्रमाण कमी झाल्याने स्त्रियांना एकटीला जीवन व्यतीत करावे लागेल या कारणास्तव बहुपत्नित्वास मान्यता  आहे. त्या काळात आजच्यासारख्या वैद्यकीय सुविधा विकसित व सुधारित नव्हत्या. त्यामुळे स्त्रियांच्यात आजारपण अधिक होते. इस्लामचा स्त्री-पुरूषांच्या शारीरिक संबंधाला   विवाहाच्या माध्यमातून मान्यता देऊन त्यांच्याकडून आपला वंश वाढविण्यास मान्यता आहे. म्हणजेच विवाह हे यापासून वंश वाढविण्याचेदेखील माध्यम आहे. जर पत्नी वांझोटी असेल  किंवा सतत आजारी असेल तरीदेखील बहुपत्नीवास मान्यता आहे (केवळ चार). काही वेळा विवाहप्रसंगी पती-पत्नी यांच्यात जरी समेट प्रेम असले तरी  पुन्हा एकमेकांत न  पटल्यासारखे होते. कारण दोघांच्या स्वभावात तफावत असल्यास अनंत अडचणी निर्माण होतात आणि जिच्याशी पटत नाही ती एकमेव पत्नी असल्यास वैवाहिक जीवन आनंदी जगता  येत नाही. तसेच त्या काळात विवाह जुळविण्यासाठी बरोबरीची तोलामोलाची स्थळे यांचा अभाव असायचा. माता- पित्यास आपल्या मुलीसाठी उत्तमोत्तम व धनदांडगा पती मिळावा असे वाटायचे. तसा पती मिळविण्यासाठी प्रयत्न केले जायचे. परिणामी दोन्ही परिवार सारख्या प्रमाणात नसायचे व चांगल्या स्थळांचा अभाव निर्माण व्हायचा. यामुळे बहुपत्नित्वाने  चांगले स्थळ मिळवण्याची शक्यता निर्माण झाली. युद्धामुळे अनेक पुरूष (सैन्य) मारले जायचे. तेव्हा त्यांच्या बायका विधवा व्हायच्या, तर मुली अनाथ व्हायच्या. प्रत्येकाला दर्जेदार  स्थळ हवे असल्याने अशा अनाथ व विधवा मुली-स्त्रियांची अवहेलना व्हायची व त्यांच्यावर एकलकोंडी जीवन जगण्याची वेळ यायची. याचेही प्रमाण बहुपत्नीत्वामुळे कमी करण्यासाठी हा  उपाय असे.
इस्लामने स्त्रीचा सन्मान करताना विधवा पुनर्विवाहास मान्यता दिली. आज आपण जो इतिहास अभ्यासक्रमात शिकतो त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा भारतावर इंग्रजांची सत्ता  असताना गव्हर्नर लॉर्ड डलहौसी याने इ.स.1856 ला केला. यासाठी विशेष प्रयत्न ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले होते. याच दरम्यान म्हणजे इ.स. 1869 ला क्रांतीज्योती महात्मा  ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला होता. पण वास्तविक पाहता संपूर्ण जगाताचा इतिहास अभ्यासताना इ.स. 1856 च्या पूर्वी (1250 वर्षापूर्वी  अंदाजे) इस्लाममध्ये जगातील पहिला विधवा पुनर्विवाह झाला व तो ही पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केला. तेव्हा त्यांचे वय 25 वर्षे होते व त्यांच्या पत्नी (मक्का येथील) हजरत खदिजा  यांचे वय 40 वर्षे होते व त्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विवाह करण्यापूर्वी दोन वेळा विधवा झाल्या होत्या.
अनेकेश्वरत्व जोपासणे इस्लामने निषिद्ध केले आहे. कारण एकेश्वरत्व हे इस्लामची मूळ धारणा असून तो निर्विकार, निराकार आहे. त्याची छाया, चित्र, मास, मूर्ती असे काहीही अस्तित्वात नाही. म्हणजेच मूर्तीपूजा त्याज्य आहे. पतीपत्नीने कसे जीवन व्यतीत करावे यासाठीही इस्लामने फार मोठे तत्वज्ञान सांगितले आहे. एकमेकांचा आदर करीत असताना  जर पत्नी आपल्या पतीचा अनादर (अपमान) करीत असेल तर तिला समजावून सांगा. याप्रसंगी हलक्या साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करा.
’’ज्या पत्नीकडून अवज्ञा होण्याचे तुम्हाला भय असेल, त्यांनी उपदेश करा (समजावून सांगा- सामनीती) आणि बिछान्यात त्यांच्यापासून दूर राहा (भेदनिती), मग जर त्या तुमच्या  आज्ञा पाळायला लागल्या तर मात्र जुलूम (दंडनिती) करण्यासाठी निमित्त (कारण) शोधू नका’’

वरील आयातीच्या अर्थातून हे लक्षात येते की पत्नीला सजा करण्याचा अधिकार तिच्या नवऱ्यास दिलेला आहे. तो ही फक्त जर पत्नी पतीचा अपमान करत असेल तर. परंतु तिला अगोदर समजावून सांगा, तिच्यापासून दूर राहा (बिछान्यात). तरीही तिच्या वर्तनात फरक पडत नसेल तर तिला ’किरकोळ मारहाण’ (तोंडावर मारू नका) करा. पत्नीच्या कितीही  मोठ्या पराकोटीच्या अवज्ञेसाठी किरकोळच मारहाण करणे, ही मर्यादा आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणे, विनाकारण मारझोड करणे, छोट्या अवज्ञेसाठी मोठी शिक्षा करणे अथवा  पराकोटीच्या अवज्ञेवर किरकोळ मारहाणीची मर्यादा ओलांडणे हा एक प्रकारचा जुलूम, अत्याचार ठरेल. स्त्रियांवर अन्याय-अत्याचारास सक्त मनाई आहे. इतर बहुतेक धर्म आणि राष्ट्रांत  पुरूषाला स्त्रीवर प्राधान्य दिल्याचे भासवले आहे. याच्याच आधारावर पुरूषांनी स्त्रियांना आपली दासी मानून तिला तुच्छ समजले. तिचा अपमान केला, तिला आर्थिक, सांस्कृतिक,   सामाजिक, राजकीय स्वातंत्र्य दिले नाही.इस्लामने तर स्त्रीचा सन्मान केला आहे आणि काही धार्मिक मर्यादेत राहून इच्छिल त्या क्षेत्रात कार्य करण्यास अनुमती दिली आहे.
काही मर्यादांमध्ये स्त्रियांसाठी दागिन्यांच्या संदर्भात इस्लामने जाहीर केले आहे, ’’स्त्रियांनी आपल्याकडील दागिने शरीरावर परपुरूषांना दिसतील असे परिधान करू नयेत. ’’ इस्लाम  शिकवण देतो, ’’ वायफळ खर्च करू नका, वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.’’
इस्लामने अहंकार व घमेंड असणाऱ्यांचा धिक्कार केला आहे. दागिने परिधान करून अथवा दागिन्यांची साठवण करून व्यक्तीमध्ये दिखाऊपणा निर्माण होतो, त्याला त्याचा संपत्तीचा  गर्व वाटतो व अहंकारी व्यक्तीला नरकाचा मार्ग खुला केला आहे. इस्लाम धर्म नातेवाईकांच्या हक्काबरोबरच आपल्या शेजाऱ्यांच्या हक्काबद्दलही जाणीव निर्माण करतो. आपण जर पोटभर जेवण करीत असू आणि आपला शेजारी भुकेने तरसतोय, अन्नअन्न करतोय, त्याला उपाशी न ठेवता त्याच्या जेवणाची काळजी शेजाऱ्याने घ्यावी. म्हणजेच आपण पोटभर  खायचे व शेजाऱ्याने उपाशीपोटी झोपायचे,हे इस्लामविरूद्ध आहे. एखादा शेजारी पुरूष संपूर्ण शरीरावर लाखो रूपयांचे दागिने घालून मिरवत असेल तर आपल्या उपाशी शेजाऱ्याकडे कधीच  लक्ष देणार नाही आणि शेजाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो कधीही पुढाकार घेणार नाही. तसेच शेजारधर्म निभावण्यासाठी सर्वात पुढे स्त्रीच असू शकते. कारण स्त्रीच आपला शेजारी  कसा आहे, त्याचे वर्तन कसे आहे, त्याच्या घरातील सदस्य काय करतात, त्याची मुले कोणत्या वर्गात आहेत, त्याची आर्थिक परिस्त्तिी कशी आहे? अशा बाबींची माहिती आपल्या  शेजारच्या परिवारातील स्त्रीशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्याशी वागू शकते व जवळीक निर्माण करू शकते.
कर्ज घेऊन इस्लामने मर्यादेपेक्षा अधिक दागीने वापरणे, खरेदी करणे तसेच साठवून ठेवणे याला मज्जाव केला आहे. म्हणून इस्लामने दागिने वापरणे हे अनिवार्य केले नाही. जसे हिंदू  धर्मामध्ये लग्नसमारंभात वराकडून वधूला मंगळसूत्राबरोबर काही दागिने विवाहितेची निशाणी, सौभाग्याचं लेणं म्हणून दिली जातात व त्यातील काही दागिने तिला वापरावेच लागतात.  कारण ते दागिने तिचे स्त्रिधन असते व ते धर्म नियमांनुसार वापरावे लागतात. तशी इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांनी दागिने वापरण्यास अनिवार्यता दर्शविलेली नाही. स्त्री तिच्या व  नवऱ्याच्या आर्थिक कुवतीनुसार साज-शृंगार आपल्या नवऱ्यासाठीच करू शकते. परपुरूषांसमोर दागिने व शृंगार यांचे प्रदर्शन करणे पाप आहे. स्त्री व तिचा नवरा यांची आर्थिक कुवत  जशी असेल तशी ती दागिने खरेदी करू शकते. मात्र वर्षाच्या शेवटी (रमजान ईद) च्या वेळी एकूण दागिन्यांवर त्यांना 2.5 टक्के जकात अदा करावीच लागते. दागिन्याच्या हव्यासापोटी  कोणाचे कर्ज काढून ते घेऊ नयेत. (इस्लाममध्ये व्याज देणे-घेणे निषिद्ध आहे.) मात्र स्त्रीचा स्वभावगुण असल्याकारणाने ती दागिन्यांची अपेक्षा करते. मात्र इस्लाममध्ये मंगळसूत्र वगैरे  दागिने वापरण्यास धर्माचा आधार दिलेला नाही. पण भारतातील काही भागातील (उदा. महाराष्ट्र) स्त्रिया मंगळसूत्र वगैरे दागिने वापरण्यात धर्माचा आधार नसताना ती बाब धार्मिक आहे  (अज्ञानामुळे) भासवतात व गळ्यात विवाहानंतर लच्छा, बोरमाळ (दागिन्यांचा प्रकार) तसेच इतर दागिने वापरणे अनिवार्य भासवतात. पण वास्तविक पाहता धर्माची अनुमती फक्त  आणि फक्त शृंगारासाठीच दागिने वापरण्यास आहे. महाराष्ट्रात अनेक मुस्लिम बांधव इस्लामचे अनुयाची तर आहेत पण त्यांनी इस्लामच्या उपासनेबरोबर इस्लाम जीवनपद्धती  आचरणात आणली नाही. इतर धर्मियांप्रमाणे त्यांच्या जीवनपद्धतीचा शिरकाव त्यांच्यात झाला याला बहुतांशी स्त्री जबाबदार आहे.
इस्लाममध्ये ईश्वराची आराधना प्रत्येकाला अनिवार्य आहे. मग ती स्त्री असेल अथवा पुरूष. स्त्रीयांनादेखील इस्लामच्या ईमान (श्रद्धा) राखणे, नमाज, जकात, रोजा, हज हे करावेच  लागते. स्त्रीने स्वतःची (समाजाबरोबर) कितीही प्रगती केली असली तरी प्रगतीच्या महालात वावरताना धर्मक्षेत्रातही कार्य करावे. धर्माने केलेल्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत.  दिवसभरातील पाचवेळा नमाज अदा केलीच पाहिजे, याला अजिबात सूट नाही. कोणतीही स्त्री नमाजपासून दूर राहू शकत नाही. गरोदर स्त्री  (जिला गर्भातील अर्भकामुळे जमिनीकडे  वाकात येत नाही.) नमाज इशाऱ्याने अदा करू शकते. म्हणजे ईश्वराची आराधना केली पाहिजे. पुरूषांपेक्षा स्त्रीया नक्कीच अधिक धार्मिक असतात, हेही तितकेच खरे आहे. याचा दाखला  म्हणजे जेव्हा इस्लाम धर्म प्रगटला तेव्हा इस्लामची तत्वप्रणाली निश्चित झाली व त्या तत्वाच्या व्यापकतेमुळे इस्लाम स्वीकारायला मोठ्या प्रमाणात आघाड्या वाढल्या. तत्पूर्वी जेव्हा  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामची घोषणा केली. तेव्हा तात्काळ सर्वप्रथम माननीय खदिजा (रजि.) यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. अशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम श्रद्धा बाळगण्याचा सन्मान स्त्रीला प्राप्त झाला.

इस्लाम हा अखिल मानवाच्या कल्याणासाठी परमेश्वराने दिलेली एक अनुपम भेट आहे. इस्लाम अखिल मानव जातीसाठी एकमेव ईश्वरी धर्म आहे. हा नुसता धर्मच नसून एक परिपूर्ण  ईश्वरी जीवनव्यवस्था आहे. एक अशी व्यवस्था जी मानवाच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाविषयी तसेच अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, सामाजिक व्यवस्था व  न्यायव्यवस्था इत्यादी सर्वच बाबीबद्दल सखोल चर्चा आणि परिपूर्ण मार्गदर्शन करणारी एकमेव संतुलित आणि आदर्शव्यवस्था आहे.
इस्लाम हा शब्द अरबी आहे. याचा अर्थ शांती, पावित्र्य आणि संपूर्ण जीवन ईश्वरी नियमानुसार जगणे म्हणजेच इस्लाम होय. आणि जो संपूर्ण ईश्वरी नियमानुसार जीवन जगतो तो  मुस्लिम आहे. मुस्लिम होण्यासाठी अनिवार्य आहे की, 1) माणसाने आपल्या अंतःकरणाने अल्लाहाच्या अस्तित्वाला एक मानने. 2) अल्लाहाच्या प्रेषितांवर म्हणजेच आदरणीय  आदमअलैह सलाम पासून ते अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) पर्यंत ही प्रेषितांची शृंखला होती त्याला मान्य करणे. आणि अल्लाहाच्या अंतिम प्रेषितावर जी परिपूर्ण ईश्वरी  जीवनव्यवस्था अवतरित झाली होती त्याला मान्य करणे.

इस्लामचे मुलभूत पंचतत्व :- इस्लाम ही एक संपूर्ण जीवनव्यवस्था असल्याकारणाने साहजिकच या जीवनातील प्रत्येक कर्म इस्लामच्या दृष्टीने इबादत (सत्कर्म, उपासना, प्रार्थना)  ठरते. उपासनेचे काही प्रकार असे आहेत जे सर्वांना बंधनकारक व अनिवार्य आहेत. ते मूलतः पाच आहेत. ज्यांना इस्लामचे आधारस्तंभ म्हटले जाते. हेच पाच स्तंभ ईश समर्पित 
जीवनाची रूपरेखा निर्धारित करतात.

1) इमान (श्रद्धा) :- हे मान्य करणे ही की सृष्टी आपोआप अस्तित्वात आलेली नाही आणि असेही नाही की या सृष्टीचे अनेकानेक स्वामी, निर्माते व शासक असावेत. या संपूर्ण  विश्वाचा स्वामी, निर्माता, शासक, नियंत्रक, सामर्थ्यवान, प्रभूत्वशाली एकमेव एकच अल्लाह (ईश्वर) आहे. अर्थात इमानने अभिप्रेत आहे की, साक्ष देणे की, अल्लाह (ईश्वर) शिवाय  कोणीही नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व अंतिम प्रेषित आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांना अंतिम प्रेषित म्हणून मान्य करण्याचा अर्थ हा आहे की, जीवनाच्या प्रत्येक  क्षेत्रात ईश्वरांने जी परिपूर्ण आणि अंतिम जीवनव्यवस्था अंतिम प्रेषितावरती अवतरित केली. तयला मान्य करून त्यानुसार संपूर्ण जीवनात त्याचे अनुसरण करावे.

2) नमाज (प्रार्थना) : प्रत्येक मुस्लिमावर एक अनिवार्य कर्तव्य म्हणून दिवसातून पाच वेळा सामुहिक नमाज अदा करणे बंधनकारक आहे. नमाजच्या माध्यमाने प्रत्येक व्यक्तीचा  अल्लाहशी थेट संपर्क प्रस्थापित होतो. नमाजमध्ये अल्लाह समोर नतमस्तक होताना माणसांतील गर्विष्ठपणा संपुष्ठात येतो. नमाजमुळे संपूर्ण समाजात समता प्रस्थापित होते. नमाज  माणसाच्या चारित्र्य संपन्नतेच्या उच्चतम शिखरावर पोहचविते. नमाज माणसाचे अंतः करण शुद्ध करते व त्याला दुराचार व निर्लज्जतेपासून परावृत्त करते.

3) रोजा (उपवास) - रोजा प्रत्येक मुस्लिमावर रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य आहेत. याचा उल्लेख कुरआनमध्ये असा करण्यात आला आहे. ’’या अय्युहल्लजीना आमनु कुतिबा  अलैकुमस् सियामु कमा कुतिबा अलल-लजीना निकबलिकुम लाअल्लक्कुम तत्तकून. (सुरे अलबकरा : आयत क्र. 183.)

अर्थ : हे श्रद्धावंतांनों! तुम्हावर उपवास त्याच प्रमाणे अनिवार्य करण्यात आले आहेत, ज्या प्रमाणे तुमच्या पूर्वीच्या उम्मतींच्या अनुयायांवरती अनिवार्य केले गेले होते. जेणेकरून  तुम्हामध्ये तकवा (संयम, ईशपरायणता, चारित्र्यसंपन्नता) निर्माण व्हावा.
रोजा केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न-पाणी सोडणे नव्हे. प्रेषित मुहम्मद (स.) म्हटले ’’ जो रोजा ठेवूनही खोटे बोलणे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काहीच गरज नाही.’’ पवित्र कुरआनने इशपरायणता हाच रोजांचा खरा उद्देश आहे. असा उल्लेख केला आहे. जो वरील आयातींमध्ये दर्शवितो, ’’तकव्याचा अर्थच आहे  ईशपराणता, ईश-भीरूता, आचार-विचारांची शुद्धता चारित्र्य संपन्नता. ज्याचा परिपूर्णपणे संपूर्ण जीवनावरती परिणाम असावा.

4) जकात : प्रत्येक धनसंपन्न मुस्लिामासाठी त्याच्या पवित्र कमाईतून संपत्तीच्या 2.5 प्रतिशत वर्षा अखेरच्या हिशोबांती ठरवून दिलेली रक्कम होय. जकात ही श्रीमंत लोकांच्या  संपत्तीवरती ज्याचे प्रमाण 52.5 तोळे चांदी (595 ग्रॅम) व 7 तोळे सोने (70 ग्रॅम) यांच्या किमती बरोबरच्या व त्या अतिरिक्त रक्कमेवर सुद्धा 100 रू. वर 2.5 पैसे म्हणजेच 2.5  प्रतिशत यानुसार श्रीमंत लोकांचा संपत्तीवरचा गरीबांचा काढलेला वाटा होय. जकात नियोजन सामुहिकरित्या व्हावे असे निर्देश आहेत. जकातचा उपयोग समाजातील दीन-दुबळ्यांसाठी,  प्रवासी, गुलामांना व कैद्यांना मुक्त करण्यासाठी, सदाचाराच्या संवर्धनासाठी व दृष्टकृत्यांच्या निर्मुलनासाठी, इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी व ईशमार्गात केला जावा, असे संकेत पवित्र  कुरआनात आहेत.

5) हज :- आर्थिक व शारीरिक ऐपत असणाऱ्या प्रत्येक मुस्लिमावर आयुष्यात एकदा हज अनिवार्य आहे. हजमध्ये मक्का येथील पवित्र काबागृहाची प्रदक्षिणा (तवाफ) व हजच्या  इतर  विधिंचा समावेश होतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण (तमाम) मुस्लिम बांधव हजसाठी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येतात. सर्वांचा एकच पोशाख - एहरामच्या दोन पांढऱ्या  शुभ्र चादरी ! विश्वबंधूत्व व समतेचे प्रत्यक्ष दर्शन घडविणारा आगळा वेगळा, डोळे दिपवून टाकणारा असा हा महान सोहळा ! इस्लामची वरील पाचही अनिवार्य कर्तव्ये पुरूष व स्त्रिया  दोघांना सारखेच लागू आहेत. हे येथे विषद करणे महत्त्वाचे आहे. सुरूवातीपासूनच इस्लामने स्त्रियांनाही मानाचे स्थान दिले आहे. ईमान, नमाज, रोजे, जकात, हज इत्यादी स्त्रियांसाठी 
बंधनकारक आहे.
जीवनाचा उद्देश :-
अल्लाहने या सृष्टीत व्यर्थ अशी कोणतीही वस्तू निर्माण केली नाही, मग ती कितीही क्षुल्लक का असेना. मग या सृष्टीतील सर्वात महान असलेल्या मानवाची निर्मिती का व्यर्थ असेल?  कदापि नव्हे! हे जीवन प्रत्येक माणसासाठी परीक्षा आहे. साधन-सामुग्री देवून पात्रता देवून, आचार-विचारांचे स्वातंत्र्य देवून, सन्मार्ग व वाम मार्ग स्पष्ट करून येथे प्रत्येकाची वेगवेगळ्या  स्वरूपात परीक्षा घेतली जात आहे. की कोण स्वेच्छेने ईश सन्मार्गाची निवड करतो कोण वाममार्गाची निवड करतो हे जीवन खरे तर ईश अज्ञांचे अनुपालन करण्यासाठी आहे.  अल्लाहशी कृतज्ञ राहण्यासाठी आहे, कृतघ्नतेसाठी नव्हे.

प्रत्येक व्यक्ती उत्तरदायी :-
सद्य जीवन नाशिवंत असून प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे. तद्वतच या संपूर्ण सृष्टिचाही एक ठराविक वेळी अंत होईल. तत्पश्चात समस्त मानवजातीला पुन्हा जीवंत केले जाईल.  न्याय-निवाडा होईल. प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. ज्यांनी ईशसंदेशाचा स्वीकार करून त्यानुसार कर्म केले, त्यांना पुरस्कृत केले जाईल व ज्यांनी ईश-संदेश  धुडकावून वाममार्ग अंगीकारला, अन्याय-अत्याचार केला व केवळ चंगळवादी जीवन जगले त्यांना कठोर शिक्षा भोगावी लागेल. मृत्यू पश्चातचे हे जीवन अविनाशी, निरंतर, आनंत व  शाश्वत असेल.

पवित्र कुरआनातील या सर्वांगीण मार्गदर्शनानुसार प्रेषित मुहम्मदांनी (स.) एक आदर्श राष्ट्र निर्माण केले. कुरआन : अल्लाहने पवित्र कुरआनला दिव्य प्रकरटनाद्वारे (वह्य) प्रेषित मुहम्मदांवर (सल्ल.) अवतरित केले. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अशिक्षित होते. त्यांना ना लिहिता येत होत न वाचता येत होते. त्यांच्या अनुयायांनी पवित्र कुरआनला मुखोदत करून व  लिपीबद्ध करून सुरक्षित ठेवले हे कार्य प्रेषितांच्या देखरेखीत त्यांच्या हयातीतच पूर्ण झाले. ज्या पवित्र कुरआनच्या आधारे प्रेषित मुहमम्मद (सल्ल.) यांनी एक आदर्श राष्ट्र उभे केले. तो  कुरआन आजही अगदी त्याच मूळ स्वरूपात, तंतोतंत जसाच्यातसा उपलब्ध आहे. त्यात यत्कींचितही हेराफेरी झाली नाही. आणि हा पवित्र संदेश अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक  आहे. जगातल्या बहुतेक भाषेमध्ये त्याची भाषांतरे उपलब्ध आहेत.

हदीस : प्रेषित मुहम्मद सल्ल. उपदेशांना हदीस म्हणून संबोधले जाते. मोठी सतर्कता व सावधगिरी बाळगून त्यांच्या अनुयायांनी हदीसचे संकलन केले. कुरआन हा ईशग्रंथ असून हदीस  हे त्याचे प्रात्यक्षिक आहे. इस्लामच्या दृष्टीकोनातून सदाचार म्हणजे केवळ नमाज, रोजा, जकात व हज यात्राच नव्हे. तर जीवनातील प्रत्येक पवित्र कार्य हे सदाचार होय. अल्लाह  जवळ प्रार्थना आहे की, तो आम्हा सर्वांना व अखिल मानवजातीला त्याच्या नियमावरती पूर्णपणे सत्यावरती आधारित जीवन जगण्याची सद्बुद्धी देवो व पारलौकीक (मरणोत्तर) जीवनातील यश प्राप्ती होवो. आमीन! सुम्मा आमीन!

- शेख मु. जुबैर अहमद, लातूर

ह. जाबीर (रजी.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वोत्कृष्ट वाणी अल्लाहचा ग्रंथ (कुरआन) आणि सर्वोत्कृष्ट चारित्र्य मुहम्मद (स.) यांचे चारित्र्य होय.’’  (हदीस - मुस्लिम)
मा. अनस (रजी.) यांचे निवेदन आहे, मला प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘हे माझ्या प्रिय मुला! जर तू अशाप्रकारे जीवन पार पाडू शकशील की, तुझ्या मनात कोणाचे अनिष्ट चिंतन  नसावे तर असेच जीवन व्यतीत कर. मग फर्माविले, ‘‘आणि हीच माझी पद्धती आहे. (की माझ्या मनात कोणासाठी खोट नाही) आणि ज्याने माझ्या आचरण शैलीशी प्रेम राखले तर  नि:संशय त्याने माझ्याशी प्रेम राखले आणि ज्याने माझ्याशी प्रेम राखले, तो जन्नतमध्ये माझ्या सोबत राहील. (हदीस - मुस्लिम)

प्रेषितांशी प्रेम राखणे म्हणजे....
मा. अब्दुल्ला यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित (स.) यांच्याजवळ आला आणि तो प्रेषित (स.) यांना म्हणाला, ‘‘मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘जे  तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हंटले की ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. यावर प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या  बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्याच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी, पुरापेक्षा जास्त वेगाने  सरसावून येतात. (हदीस - तिर्मिजी)

भावार्थ
एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्याच्या पसंतीस आपली पसंत, आणि त्याच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. ‘प्रिय’ ज्या  मार्गावरून चालतो त्यास आपला जीवनमार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे. आणि बलिदानासाठी, प्राणार्पण करण्यासाठी सदैव तत्पर असावे.  प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ त्यांचे एक एक पाऊलचिन्ह व प्रत्येक मार्ग चिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार चालावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन  केले, त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ ही प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे आणि ‘बद्र व हुनेन’ देखील त्यांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर  चालण्याचा परिणाम स्रfरद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टीचा मारा होईल. आर्थिक आघात हा सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी  प्रेमाने केला जाऊ शकतो. इमानधारक मनुष्य अशा वेळी हा विचार करतो की अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही, आणि शेवटी मी एक गुलाम  आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे, अशा प्रकारचे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करते. सैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम  करून टाकते. प्रेषित (स.) यांनी असे सांगितले की, ‘‘तुमच्यापैकी कोणताही मनुष्य (अपेक्षित दर्जाचा) ईमानधारक होऊ शकत नाही, जो पर्यंत मी त्याच्या नजरेत, त्याचा पिता, त्याचे  पूत्र, आणि सर्व माणसापेक्षा अधिक प्रिय न व्हावे. (हदीस - बुखारी, मुस्लीम)
मनुष्य इतर सर्वांचे प्रेम आणि निकडींना बाजूला सारून केवळ प्रेषित (स.) यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्यास तयार होईल, तेव्हा समजून घ्या की तो खऱ्या अर्थाने मोमीन  (ईमानधारक) आहे.

आपण ज्या घरात वास्तव्य करतो त्या घराला घरपण स्त्रीच बहाल करते. एखाद्या व्यक्तीची साधी झोपडी आहे, तिला घरपण एक सुशील सुसंस्कृत स्त्री निर्माण करून देते, तर एखाद्या महालरूपी घराला संस्कारहीन स्त्री ’घर’ राहू देत नाही. म्हणून घराचे घरपण निर्माण होते ते स्त्रीमुळे आणि घरपणाचे अस्तित्व संपुष्टात येते तेदेखील स्त्रीमुळेच. पण इस्लाम सांगतो की स्त्रीने घराला घरपण बहाल केलेच पाहिजे आणि ते तिचे कर्तव्य आहे. एखादे घर बाहेरून प्रचंड शोभिवंत असेल, पण आतमध्ये वास्तव्य करणारे जर सैतानी वृत्तीचे असतील तर त्याला घर म्हणता येत नाही. म्हणून घर म्हणजे नेमके काय आणि ते कोणामुळे निर्माण होते याविषयी थोडे पाहू या.
    ”घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती,
    तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.”
    या काव्यपंक्तीवरून चार भिंतीचे घर होत नाही तर त्याच घराची माया, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, स्नेह यांचा वावर असायला पाहिजे. पोकळ नाती असून त्याचा काहीही उपयोग नाही. त्या नात्यांमध्ये प्रेमाची उब असायला हवी. ज्या घरात प्रेमाची उब मिळत नाही, वात्सल्याची शितलता सुखावत नाही, नात्यांतील स्नेह जाणवत नाही, जिव्हाळ्यातील गोडवा सुखवत नाही, त्याला घर कसे म्हणायचे? घर भिंती बांधल्याने तयार होत नाही, तर घर त्या घरातील स्त्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांशी असणार्‍या सद्वर्तनाने तयार होते. कारण पूर्णवेळ घराची देखभाल करणारी मुख्य स्त्री घराच्या संसाराचा कणा असते. जसा माणूस त्याच्या पाठीच्या कण्यावर उभा असतो, तसा संसाराचा कणा स्त्री आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीच्या कण्याचा आजार झाला तर ती व्यक्ती खाली वाकून चालते अगदी, तसेच स्त्री जर दुबळी, अज्ञानी, अशिक्षित असेल तर प्रपंचही तसाच चालतो. म्हणूनच म्हटले आहे, ”शिकलेली आई घराला पुढे नेई.” इस्लामने तर शिक्षण अनिवार्य केले आहे, मग ती मुलगी असो वा मुलगा. कसलाही भेदभाव न करता शिक्षण देणे हे अनिवार्य केले आहे. मुलींसाठी शिक्षण व स्त्रीचा फार मोठा सन्मान इस्लामने हजारो वर्षांपूर्वी केला आहे.  अशा अनेक प्रकारे स्त्रियांचा इस्लामने सन्मान केला.
    स्त्रियांवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराविरूद्ध व स्त्रियांच्या गुलामीविरोधात सर्वप्रथम इस्लामने आवाज उठविला. जगात स्त्रियांना उच्च स्थान देणारा अरबस्थान हा सर्वप्रथम देश ठरला. इस्लामच्या तत्वज्ञानात स्त्री-पुरूष दोघांमध्ये थोडाही फरक केला नाही. पुण्य करणारे सर्वच स्वर्गात जातील त्यात कोणताही भेदभाव होणार नाही किंवा अन्याय होणार नाही, मग ती स्त्री असो वा पुरूष. इस्लामने दानधर्म (जकात)  याला महत्त्व दिले आहे. इस्लाममध्ये जी व्यक्ती आपली विधवा व घटस्फोटित मुलीचा सांभाळ करते ते सर्वात मोठे दान आहे. कारण विधवा व घटस्फोटित स्त्रीला आपल्या पित्याशिवाय कोणीही दूसरा पर्याय नसतो. अशा परिस्थितीत तर त्या विधवा, घटस्फोटित सत्रीचा (मुलीचा) सांभळ केल्यास ते सर्वात मोठे दान (पुण्य) ठरते. घटस्फोटित स्त्री वडिलाशिवाय दुसर्‍या कोणाकडे जाऊच शकत नाही. अशा वेळी तिला आधार देण्यासाठी व तिचा सांभाळ करण्यासाठीच या कार्याला पुण्यकार्य म्हटले आहे.
    ”एखाद्या सद्वर्तनी, सुशील (पतिव्रता) स्त्रीवर व्याभिचाराचा तसेच चारित्रहीनतेचा आरोप करणे म्हणजे माणसाला संपविणार्‍या सात गुन्ह्यांपैकी एक आहे. अशा प्रकारचा गंभीर गुन्हा करणार्‍या इसमास कोणत्याही प्रकारची साक्ष गृहीत न धरता 80 फटके मारावेत.” वरील विवेचनावरून हे लक्षात येते की आपल्या स्वार्थासाठी अथवा राग-मत्सरासाठी एखादी व्यक्ती स्त्रीची बदनामी करून आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न करील अथवा आपली मनिषा (इच्छा) पूर्ण करण्यासाठी स्त्रीची बदनामी करून आपला स्वार्थ साधेल, अशा प्रकारचे किस्से होऊ शकतात व एखाद्या चारित्र्य संपन्न, सुशील, सुसंस्कृत निरपराधी स्त्रीची अवहेलना, बदनामी, चारित्र्यहीनता होत असेल किंवा एखादी व्यक्ती तसे भासवत असेल तर त्याला त्याने सादर केेलेली कोणतीही साक्ष मान्य न करता 80 फटके (चाबकाने) मारावेत. ही शिक्षा फर्मावत असताना ज्या स्त्रीवर आरोप कला आहे ती स्त्री सद्वर्तनी (पतिव्रता) आहे का, ते पाहणे जरूरीचे आहे. इस्लामने स्त्री व पुरूषाचे कार्यक्षेत्र जरी वेगवेगळे ठेवले असले तरी स्त्रीला कार्य करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे. धर्माच्या मर्यादेत राहून कार्य करणे म्हणजे आपले कार्य नीतीमत्तेला धरून असावे, तसेच ते आपल्या चारित्र्यात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलेे आहे. म्हणून स्त्रियांना कुरआनने शिक्षण अनिवार्य केले आहे. जर एखाद्या स्त्रीने कुरआनचे शिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केले आणि ती म्हातारी होऊन मरण पावली तर ती स्वर्गात गेल्यानंतर तरूण होईल, असे प्रतिपादन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आहे. याच्याच उलट जी स्त्री आपल्या मिळालेल्या आयुष्यात (मृत्यू पश्‍चाताच्या जीवनाची परीक्षा) दांभिकपणे वागेल, बदवर्तन करेल, तिला अंतिम महाप्रलयाच्या दिनी (न्यायनिवाड्याच्या दिवशी) शिक्षा होणारच, यात सुतभरदेखील शंका नाही. एवढेच नाही तर अनेक देवांची उपासना करणे हेदेखील नरकयातनेचे आमंत्रण ठरविले आहे. म्हणून इस्लामने (स्त्री-पुरूष) फक्त आणि फक्त इस्लाम धर्मास मानावे, इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मुहम्मद सल्ल. यांना मानावे, तसेच त्यांचे धर्मांचे आणि मानवजातीस योग्य असणारे सर्व विचार सर्व लोकांपर्यंत पोहचवावेत (फक्त मुस्लिम लोकांपर्यंत नाही), असे करणे पुण्यकर्म समजले जाते. याशिवाय इतर देवांची आराधना करणे, अनेकेश्‍वरत्व जोपासने हेदेखील दांभिक कृत्याच्या बरोबरीचे कृत्य आहे. इस्लाम जसा स्त्रीचा सन्मान करतो तसाच तो त्यांना काही मर्यादादेखील घालतो. सर्व बाबतीत इस्लामने स्त्री-पुरूषांना समान दर्जा देऊनसुद्धा दोघांत स्त्रीचे स्थान उच्च समजावले आहे. आणि जो पुरूष स्त्रीशी अत्यंत आदराने वागतो तो उत्तमोत्तम पुरूष होय. जसे पुरूषांना स्त्रियांशी आदराने वागावयास सांगतो, तसेच स्त्रीलाही दुसर्‍या स्त्रीशी सन्मानाने वागण्याची ताकीद केली आहे. मग ती स्त्री कितीही गरीब वा कितीही श्रीमंत असो, तिने इतर स्त्रियांची टिंगल (चेष्टा) करू नये. आपसात बोलताना टोमने मारू नयेत. एकमेकींचा वाईट नावाने उल्लेख करू नये (शिव्या-शाप), तसेच एकमेकीचीं चहाडी-चुगली करू नये, असे वागणार्‍या स्त्रीचा इस्लाम विरोध करतो. इस्लामने स्त्रीला बालपणी पित्याच्या, तारूण्यात पतीच्या व वृद्धापकाळात पुत्राच्या संरक्षणात राहण्यास सांगून त्यांच्यासमोर आपली मते मांडण्यास मुभा दिली, तर त्यास पुरूषांनी स्वातंत्र दिले. तसेच तिला गृहकार्यात मुबलक प्रमाणात अधिकार दिले. सर्वच स्त्रिया कपटी, पापी, दोषी, दुर्गुणी असतात असे नाही. त्याचबरोबर विवाह करताना स्त्रीचे वय पुरूषापेक्षा कमीच असले पाहिजे असाही धर्माचा काही संकेत नाही. याचे उदाहरण म्हणजे पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे पहिल्या विवाहाच्या वेळी वय 25 वर्षे तर त्यांची पत्नी माननीय खदीजा यांचे वय 40 वर्षे होते. या विवाहामध्ये वधू वरापेक्षा तब्बल 15 वर्षांनी मोठी होती. त्या विवाहास गैर समजले नाही. सारांश, सध्या मुस्लिमांमध्ये (फक्त भारतात) वधू वरापेक्षा लहानच असायला पाहिजे असा जो गैरसमज पसरला आहे तो साफ चुकीचा आहे. कारण वय कमी अधिक असले तरी चालते, मात्र ते संबंध विवाहाच्या माध्यमातून मान्य झालेले असावेत.
    विवाहाने दोघांना (पती पत्नींना) काही अधिकार प्राप्त होतात व ते बजावणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. म्हणजेच स्त्री-पुरूषांचे एकमेकांवर अधिकार आहेत. तसेच वैवाहिक संबंधातूनच झालेली संतती इस्लाम वैध समजतो. संततीचे संगोपन करीत असताना त्या संततीत ईशपरायणता आणि परलोकीचे सृष्टीच्या प्रति शुभचिंतक बनून वृद्धींगत व्हावी. मुलाचे पालनपोषण, संगोपन मुलांशी संवाद करा, त्यांना सदाचार शिकवा, मुलांना रागाऊ नका, त्यांना ताकीद आहे की प्राण्यांनादेखील अपशब्द वापरू नका. मुलांच्या खोट्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करू नका, मुलांना खोटे बोलू देऊ नका, स्वतःही कोणाशी खोटे बोलू नका, मुलांना मारू-झोडू नका, त्यांना शिक्षा करू नका, मुलांवर आरोप करू नका, असे वर्तन आपण आपल्या मुलांशी केले तर ती बिघडणार नाहीत तर चांगलीच घडतील. हे सर्व मुलांना अगदी लहान वयापासून शिकवावे लागते व लहान मुल जास्त काळ आईजवळ असतात, त्यामुळे अप्रत्यक्षपणे ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक स्त्रियांची आहे. म्हणजे पुरूषांनी काहीही जबाबदारी स्वीकारायची नाही असे नाही.
    सुशील स्त्रीच्या चारित्र्यावर (व्यभिचाराचा) जसा आरोप करायचा नाही याची सूचना इस्लामने केली तसेच स्त्रीने आपले चारित्र्य सांभाळावे. व्याभिचाराचा विचारदेखील मनात यायला नको. व्याभिचार म्हणजे स्त्री-पुरूष यांनी विवाह न करता वैवाहिक जीवन (शारीरिक संबंधासह) जगणे म्हणजेच व्याभिचार होय. व्यभिचार ही अत्यंत वाईट बाब आहे. ती धार्मिकदृष्ट्या पापाची व दुष्कृत्याची गोष्ट आहे. प्राचीन काळापासून आजपर्यंत या बाबीला समाजाची मान्यता नाही. उलट ही बाब लज्जास्पद आहे. म्हणून इस्लामने समाजाला व्याभिचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामने विवाह एक धार्मिक विधी जरी समजले असले तरी तो एक करार असून दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घ्यावी लागते. याची सुरूवात सर्वात अगोदर इस्लामने केली आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget