Latest Post

नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत. त्यातील काही स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहेत.
नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण आहे. नमाज प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या परंपरेनुसारच अदा करतात. श्रध्दाशीलता धारण केल्यानंतर सर्वप्रथम श्रध्दावंत नमाज अदा करतो. नमाज त्या सत्यतेचे द्योतक आहे की व्यक्ती श्रध्दाशील आहे, अल्लाहवरच त्याची निष्ठा आहे. अल्लाह एकमेव स्वामीश्रेष्ठ आहे आणि मी त्याचा नम्र दास आहे. हा विश्वास त्याच्या नमाजच्या कर्तव्यपूर्तीतून दिसून येतो. नमाजबद्दल अनेक हदीसींचा उल्लेख आलेला आहे.
याचप्रमाणे दिव्य कुरआनमध्ये अनेक ठिकाणी श्रध्दाशीलतेच्या उल्लेखानंतर त्वरित नमाजचा उल्लेख आलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
तसेच दुसऱ्या ठिकाणी कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक ग्रंथाचे पालन करतात व ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही.’’ (कुरआन ७: १७०)
‘‘परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली’’ (कुरआन ७५: ३१)
हे त्या सत्यतेला स्पष्ट करीत आहे जर मनुष्याच्या हृदयात श्रध्देचे बीजारोपण झाले तर त्यातून पहिले अंकूर फुटेल ते नमाज असेल. नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण फक्त नाही तर ते तर्कशुध्द परिणाम आहे. ज्याचे हृदय श्रध्देने काठोकाठ तुडुंब भरलेले असेल त्याचे मस्तक आज्ञाधारकतेत नमाजमध्ये नतमस्तक होणारच आहे. हे खरोखर तर ती आंतरिक स्थिती आहे ज्याचे प्रकटीकरण नमाजच्या रूपात होत असते. जसे प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून आहे तसेच श्रध्देतून नमाज आहे आणि नमाज श्रध्देसाठी आहे. म्हणून नमाज श्रध्देची अत्यावश्यक बाब आहे हे काही फक्त अनुमान नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अतिस्पष्ट कथन आहे, ‘‘जो कोणी फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) साठी हलगर्जीपणा करतो, अशा व्यक्तीशी अल्लाहला काही देणेघेणे नाही.’’ (अहमद)
‘‘खरोखरच! नमाज मनुष्याला श्रध्दाहीनतेपासून आणि द्रोहापासून वेगळे करते.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी नमूद करून ठेवले आहे की ज्या वस्तीतून आजान ऐकू येत असे त्या वस्तीवर जिहाद (पवित्र युध्द) केला जात नसे. जेथून अजानचा स्वर ऐकू येत नसे त्या वस्तीवर चढाई केली जात असे. कारण ती वस्ती श्रध्दाहीन लोकांची आहे हे समजून येत असे. म्हणून नमाज श्रध्दाशीलतेचे प्रतीक आहे. श्रध्दावंत व्यक्ती या प्रतीकाशी नमाजशी निगडीत असते.
कुरआनोक्ती आहे की कयामतच्या दिवशी दूत नरकवासींना विचारतील,
‘‘ते (दूत) गुन्हेगारांना विचारतील,‘‘तुम्हाला कोणत्या गोष्टीने नरकात नेले?’’ ते म्हणतील, ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो आणि गरिबांना जेऊ घालत नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४२ - ४३)
नरकवासी लोक उत्तर देतील,
‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४३)
याचाच अर्थ स्पष्ट होतो की जो कोणी नमाज अदा करतो तो श्रध्दावंत असतो आणि त्याची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर निष्ठा असते. हे अगदी स्पष्ट आहे की व्यक्तीची जन्नत (स्वर्ग) अथवा जहन्नम (नरक) साठीची लायकी आणि पात्रता श्रध्दाशीलता आणि श्रध्दाहीनतेवर अवलंबून आहे. जेव्हा मनुष्यांना जहन्नममध्ये (नरकात) डांबले जाईल तेव्हा ते सर्व गुपितांना जाणून घेतील जे अदृश्य सत्य होते. ते मान्य करतील की ही यातना परिणाम आहे त्यांच्या नमाज अदा करण्याच्या हलगर्जीपणाचा! ईमान (श्रध्दा) आणि नमाज कयामतच्या दिवशी एक दुसऱ्यास पूरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे असतील. ‘‘जहन्नमी (नरकवासी) त्या वेळी असे म्हणण्याऐवजी की ‘‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो ज्यांनी श्रध्दा ठेवली.’’ (‘‘आम्ही श्रध्दावंतांपैकी नव्हतो.’’) असा पश्चात्ताप करून करून म्हणतील की ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यापैकी नव्हतो.’’
या संकेतवचनांच्या आधारे काही धार्मिक विद्वानांचे मत आहे की जो कोणी हेतुपुरस्सर नमाजची हेळसांड करेल आणि नियमित हे कृत्य करीत राहील तर तो शिरच्छेद करण्याच्या लायक बनतो. ही शिक्षा धर्मद्रोही (विद्रोही) ला दिलेल्या शिक्षेसारखीच आहे.
आणखी एक अतिमहत्वाचे नमाजचे वैशिष्ट्य कुरआन स्पष्ट करीत आहे त्याची पुष्टी हदीसीमध्ये (प्रेषितकथन) सुध्दा आहे, ती म्हणजे नमाजला धार्मिक कृती म्हणून संबोधले गेले आहे. नमाज श्रध्दाशीलतेची (ईमान) रक्षक आहे. नमाज जर कायम केली गेली तर इतर ईश आदेशांचे पालन आपोआप होऊ लागते. याविरुध्द नमाजची हेळसांड झाली तर इतर ईश आदेशांचे उल्लंघन होणे साहजिक आहे. हृदयाचे महत्त्व शरीरात जसे आहे त्यासारखेच नमाजचे महत्त्व श्रध्दाशीलतेसाठी आहे. हृदय जर तंदुरूस्त असेल तर रक्त शरीराच्या सर्व भागांत पसरते आणि पूर्ण शरीर हे कार्यक्षम व तंदुरूस्त बनते. जर हृदयाची स्पदने बंद झाली आणि हृदयक्रिया बंद पडली तर पूर्ण शरीर निर्जीव बनते, अकार्यक्षम बनते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे कुरआन आणि हदीसीमध्ये स्पष्ट केली गेली आहेत. हदीसीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे इस्लामचा पाया हा पाच स्तंभांवर आधारित आहे आणि तसेच ईमानचा (श्रध्देचा) स्तंभ नमाज आहे, प्रार्थना आहे.
‘‘श्रध्देचे मूळ हे एकेश्वरत्व आणि प्रेषित मुहम्मद (स) यांना मान्य करण्यात आहे आणि श्रध्देचे मूळ (स्तंभ) इस्लाम आहे.’’ (तिरमीजी)
हा एक सज्जड पुरावा आहे या वास्तवतेचा की जकात, हज, रोजे हे श्रध्दाशीलतेचे (ईमानचे) स्तंभ आहेत आणि श्रध्देची इमारत त्यांच्याशिवाय उभीच राहू शकत नसली तरी नमाजचे महत्त्व वेगळेच आहे. नमाजच्या गुणांमुळे नमाज श्रध्देचा सर्वगुणसंपन्न स्तंभ आहे, म्हणूनच नमाजला पूर्ण श्रध्देचे वैशिष्ट्य गणले जाते. जर नमाजला सोडून दिले तर श्रध्दा आपले अस्तित्व गमावून बसते.
आदरणीय खलीफा उमर (र) आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘‘माझ्यासाठी तुमची सर्वात मोठी समस्या नमाज ही आहे. जो कोणी नमाज कायम करील आणि तिला पूर्ण न्याय देईल तर तो पूर्ण श्रध्देचे रक्षण करतो. आणि जो कोणी नमाजला सोडून देतो तर ती व्यक्ती फार काही गमावून बसते.’’ (मालिक)
नमाजच्या वैशिष्ट्यांची कारणे: दिव्य कुरआन आणि हदीसीच्या पुराव्यानुसार नमाजचे महत्त्व लक्षात येते. स्वाभाविकपणे एखादी व्यक्ती विचारू शकते की हे असे कसे की पाच स्तंभांपैकी नमाज एक स्तंभ आहे तर मग नमाज एकटी पूर्ण श्रध्देसारखी कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर हे आणखी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. नमाज काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? दिव्य कुरआन स्पष्ट करीत आहे की नमाज अल्लाहचे स्मरण आहे.
‘‘मीच अल्लाह आहे माझ्या शिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच भक्ती कर आणि माझ्या स्मरणाकरिता नमाज कायम कर.’’ (कुरआन २०: १२-१४)
नमाज ईशदासाला ईश्वराच्या सान्निध्यात नेते.
‘‘आणि नतमस्तक व्हा (नमाज अदा करा) व आपल्या पालनकर्त्याशी जवळीक साधा.’’ (कुरआन ९६: १९)
मनुष्य अल्लाहच्या अगदी जवळ असतो जेव्हा तो नतमस्तक होतो. (सजदा करतो) म्हणून मनुष्य नमाज अदा करीत असेल तर तो त्या वेळी अल्लाहशी संभाषण साधून असतो. नमाज अदा करताना मनुष्य सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊन स्वतःला अल्लाहच्या सान्निध्यात आणि अल्लाहसमोर उभा आहे असे समजून अल्लाहशी वार्तालाप करतो.
अल्लाहचे स्मरण करणे, अल्लाहशी जवळीक साधणे आणि अल्लाहशी संभाषण करणे म्हणजेच नमाज अदा करणे होय. याव्यतिरिक्त दुसरे आणखी काय माध्यम असू शकते अल्लाहची शरणागती आणि पूर्ण श्रध्देला प्राप्त करण्यासाठी? नाही! निश्चित नाही!! अल्लाहची भक्ती करण्यासाठीचे प्रत्येक कृत्य श्रध्देचेच फळ आहे. अल्लाहच्या स्मरणाने (नमाज) श्रध्देचे मूळ सशक्त बनते त्यास जोपासले जाते. श्रध्दावंतांना उपदेश केला जातो की त्यांनी खालील महावाक्य सतत उच्चारून श्रध्देला सशक्त बनावे.
‘‘ला ईलाह ईल्ललाह’’
दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह!
अल्लाहशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही.
‘‘लोकहो, तुमची श्रध्दा बळकट करा’’ दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह’’ हे महावाक्य पुन्हापुन्हा उच्चारून!’’ (बुखारी)
जर झाडाच्या मुळांनी त्यांची जीवनशक्ती आणि अन्नपाणी घेण्याचे बंद केले तर झाडाची वाढ खुंटेल आणि झाड वाळून जाईल. तसेच मनुष्याचे हृदय हे जर अल्लाहच्या स्मरणाने खाली असेल तर श्रध्दा जीवंत ठेवणे त्याच्यासाठी अशक्य आहे. ज्या मनुष्याची श्रध्दा डळमळीत आहे, त्याचे प्रत्येक कृत्य हे सत्यतेविरुध्द आणि अल्लाहच्या भयाने रिक्त असे असेल. धर्मनिष्ठ कृत्य (सत्कार्य) त्याच व्यक्तीच्या हाताने पार पडेल ज्याचे हृदय श्रध्देने आणि सामर्थ्याने पुरेपूर भरलेले असेल, ज्यांचा उगम अल्लाहच्या स्मरणात आहे. नमाज अल्लाहचे फक्त स्मरण नाही तर नमाज खरोखरच अल्लाहच्या स्मरणाचे अत्युत्तम, परिपूर्ण आणि कार्यक्षम असे बेजोड माध्यम आहे. म्हणून धर्मनिष्ठा आणि अल्लाहची भक्ती नमाज अदा करण्यात आहे. हे सत्य आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू या, एखादा भाट (खुशामत्या) जो आपल्या राजासमोर येत नाही आणि त्याच्याविषयी आदर सन्मानसुध्दा दाखवत नाही तर त्याला विश्वासु आणि आज्ञाधारक समजले जात नाही. विश्वासु आणि आज्ञाधारकता त्याच व्यक्तीपासून अपेक्षित आहे जो राजदरबारात राजासमोर हजेरी लावण्यात हलगर्जीपणा करत नाही आणि राजाला आदर सन्मान दाखविण्यात कसूर करत नाही. हे स्वाभाविक आहे की जी व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही ती तुमच्या इच्छेला आणि प्रसन्नतेला जाणून घेण्यास तयार होऊ शकतच नाही. तुमच्यासाठी अशी व्यक्ती काहीएक त्याग करू शकणार नाही. नमाज हे अल्लाहच्या दरबारात हजेरी लावणे आहे. आणि अल्लाहच्या प्रति निष्ठेचे आणि आदराचे प्रकटीकरण आहे. कोणी अंतकरणाने ही हजेरी देण्यास आणि निष्ठा दाखविण्यास तयार नसेल तर अशी व्यक्ती अल्लाहचे आदेश जीवनव्यवहाराच्या या विस्तृत क्षेत्रात पाळू शकणारच नाही हे अगदी स्पष्ट आहे.
नमाजची पूरक वैशिष्ट्ये: नमाजचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, परंतु नमाजचे आणखी काही उपजत अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु ही सर्व पूरक अशी वैशिष्ट्ये आहेत तरी ती अत्यंत महत्त्वाची आणि मौलिक आहेत. त्यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे कारण त्यावरून इस्लामचे दर्शन आणि जीवनप्रणाली कळून येते. हे पूरक आकर्षक गुण आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम आपल्या अनुयायींना त्यांचे जीवनकार्य त्यांच्या मनावर बिबवतो. यासाठी ते स्वाभाविकपणे एक शिस्तबध्द सामुदायिक जीवनाचे नेतृत्व करतात. त्यांचा एक नेता असतो जो अल्लाहच्या आदेशांनुसार स्वतः जीवन कंठत असतो आणि समाजापुढे आदर्श ठेवतो. तो ईशआदेशांना प्रस्थापित करतो. त्याच्या नेतृत्वाखाली लोक एक शिस्तबध्द आणि प्रशिक्षित लष्करासारखे वागतात. तो जेव्हा त्यांना हालचाल करण्याची मुभा देतो तेव्हा ते हालचाल करू शकतात आणि जेव्हा तो त्यांना थांबवतो तेव्हा ते थांबतात. अशी ही उच्च प्रतीची शिस्त नमाजमध्ये अंतर्भूत आहे आणि नमाज इस्लामच्या अनुयायींच्या मनावर शिस्तबध्दता ठसवत असते. जेव्हा त्यांना नमाजसाठी बोलविले जाते तेव्हा ते आपले घरदार, कारखानदारी, दुकानदारी सोडून मशिदीची वाट चालू लागतात. मशिदीत ते सरळ रेषेत व रांगेत उभे राहतात आणि नमाजचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे (इमाम) आदेश पूर्णतः पाळतात. एखादा व्यक्ती या सामुदायिक प्रार्थनेत आपल्या नेत्याविरूध्द शारीरिक आणि मानसिक दुर्लक्ष करूच शकत नाही. हे सर्व काही दैवी आदेशांच्या आज्ञाधारकतेनुसार धार्मिक आज्ञा आणि परलोकाची जाण ठेवून पार पाडले जाते. नमाजव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणती प्रार्थना आहे जी मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण शिस्तबध्दतेने देत आहे?
२) इस्लामला आपल्या अनुयायींमध्ये प्रेमाचे आणि बंधुत्वाचे अतूट नाते स्थापित करणे अपेक्षित आहे. इस्लाम त्याच मुस्लिम व्यक्तीला खरा मुस्लिम सिध्द करतो जो आपल्या भावासाठी तेच पसंद करतो जे स्वतःला पसंद आहे. नमाज माणसामध्ये प्रेम आणि बंधुत्व निर्माण करते. जेव्हा वस्तीतील लोक प्रार्थनेसाठी अल्लाहसमोर एकत्र येतात तेव्हा ते शारीरिक आणि अध्यात्मिक बंधुभाव प्रस्थापित करतात. त्यांचे एकमेकाचे खांदे आणि अंगठे फक्त एकमेकांना भिडलेले असत नाहीत तर त्यांची मनेसुध्दा एकीने बांधली जातात. ते फक्त आपल्या स्वतःसाठीच प्रार्थना करीत नाहीत तर सर्वांसाठी मार्गदर्शन मदतीची आणि क्षमेची याचना करतात. काय यापेक्षा चांगले दुसरे एखादे मार्ग मानवतेवर प्रेम करण्याचे याव्यतिरिक्त आहे? मनुष्य आपल्या बांधवांचा प्रार्थनेत आणि नमाजमध्ये कधीच विसर पडू देत नाही. तो अल्लाहसमोर सातत्याने याचना करतो की,
‘‘आम्हा सर्वांना सरळ मार्ग दाखव.’’ (कुरआन १: ५)
‘‘अल्लाहच्या सर्व सदाचरणी दासांवर शांतीचा वर्षाव सतत होवो.’’
‘‘हे आमच्या पालनकर्त्या ! आम्हाला इहलोकीही चांगले फळ दे आणि परलोका मध्येही चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हा सर्वांना वाचव.’’ (कुरआन २: २०१)
अति उच्च समजली जाणारी विश्वबंधुत्वाची कल्पना इस्लामच्या या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेपुढे फिकी आहे. जो दर्जा इस्लामने आपल्या अनुयायींसाठी निश्चित केला आहे तो बेजोड आहे.
३) इस्लाम समस्त मानवांना एक स्वामीचे दास समजतो. इस्लाम समस्त मानवजातीला एका आईवडीलाची लेकरे मानतो. मानव सर्व एकमेकांचे भाऊ भाऊ आहेत.
‘‘हे अल्लाहच्या दासानों तुम्ही सर्व बंधु व्हा.’’ (कुरवादी)
इस्लाम आज्ञा देतो की कोणीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नये. कुणीही रंगाने, वंशाने, कुळाने, श्रीमंतीने अथवा राष्ट्राने एकमेकात उचनीच नाहीत. ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,
‘‘मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायणता या सदगुणांवर अवलंबून आहेत.’’
नमाज समाजातील, माणसामाणसातील भेदाभेद दूर करून एकसंघ समाजनिर्मितीचा पाया घालते. राजा आणि रक एकसाथ उभे राहून एकसाथ आपल्या स्वामीपुढे नतमस्तक होतात. हे नमाजच्या प्रक्रियेतील एकतेचे प्रकटीकरण आहे. आध्यत्मिक स्तरावरसुध्दा नमाज सर्वांना एकसमान बनविते. अल्लाहचे महात्म्य आणि मनुष्यांचे पूर्ण नम्रता धारण करणे हे सर्व मनुष्यांच्या मनांमध्ये एकीची भावना जागृत करते. प्रत्येकजण जाणून घेतो की अल्लाह आणि फक्त अल्लाह प्रभुत्वशाली आहे. सर्व माणसे त्याची निर्मिती व दास आहेत. नमाजमुळे प्रत्येकाला त्याच्या तुच्छतेची जाणीव सतत होत राहते. म्हणून असा मनुष्य रंगभेद, जातीभेद, वंशभेद, राष्ट्रभेद, उच्चनीचता या कुकर्मांना कधीच थारा देत नाही. स्वतःलासुध्दा इतरांपेक्षा काही वेगळा अथवा श्रेष्ठ समजत नाही. अशा प्रकारे नमाज या सत्यवचनाला सिध्द करून दाखविते की ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायण या सद्गुणांवर अवलंबून आहे.

यांचे सिद्धान्त आणि मूल्यांचे चित्र आहे. तसे नसते तर तो अस्तित्वात येण्याची शक्यता नव्हती. आणि १४०० वर्षापेक्षा अधिक कालावधी पर्यंत त्यांच्यावर लागू झाला नसता. म्हणून या कायद्यासंबंधी बोलणे, चर्चा करणे आणि विचारविनिमय करण्याचा अधिकार प्राप्त करण्यापूर्वी, मुसलमानांच्या विशिष्ट विचार आणि धारणांचे पूर्ण परिक्षण करून या कायद्याचा स्त्रोत निश्चित करणे आवश्यक आहे. मुस्लिम समाज कोणत्याही एका भौगोलिक, वांशिक, भाषिक किवा अशाच कोणत्या एका बाबीवर आधारित समाज नसून तो पूर्णपणे सैद्धान्तिक आणि विशिष्ट मूल्यावर आधारित आहे.
ही वस्तुस्थिती समोर ठेवल्यास दोन पर्याय संभवनीय आहेत

प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा ताकीद केली आहे. यसीरा बिन्ते यासिर (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘हे स्त्रियांनो ! तुम्ही ‘तसबीह’ (सुबहानल्लाह), ‘तहलील’ (ला इलाहा इल्लल्लाहु) आणि ‘तकदीस’ (सुब्बूहुन कुद्दूसुन) हा जप आवश्यक करा. बोटांच्या कांड्यावर त्यांची गणना करा. याचे कारण असे की, बोटांनादेखील विचारले जाईल व म्हणविले जाईल. नामस्मरणात निष्काळजीपणा करू नका; नाहीतर अल्लाहच्या कृपेपासून वंचित रहाल.’’ (मिश्कातुलमसाबीह किताबुद्दावात, तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी काही वेळा स्त्रियांना विशेष नामस्मरणाचासुद्धा उपदेश केला आहे. माननीय अली (र) म्हणतात की, माननीय फातिमा (र) यांच्यापाशी कोणताही सेवक नव्हता. घरचे कामकाज त्या स्वतःच करीत असत. पीठ दळल्यामुळे त्यांच्या हाताला फोड आले होते. एकदा काही गुलाम आले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांना आपल्या कष्टाविषयी सांगायला व एका गुलामाची मागणी करावयास गेल्या. प्रेषित मुहम्मद (स) घरी नव्हते, म्हणून माननीय आयेशा (र) यांच्याजवळ यासंबंधी बोलून माननीय फातिमा (र) घरी निघून आल्या. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचेजवळ माननीय फातिमा (र) यांचे आगमन आणि त्यांच्या गरजेचा उल्लेख केला. प्रेषित मुहम्मद (स) रात्री आमच्या घरी आले. आम्ही पहुडलो होतो. त्यांना पाहून आम्ही उठून बसलो. त्यांनी सांगितले, ‘‘उठू नका. पडून रहा.’’ आणि आम्हा दोघांच्यामध्ये अशा प्रकारे बसले की, त्यांचे चरणकमल माझ्या पोटाला लागले होते आणि मला त्यांचा गारवा लागत होता. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हा लोकांनी ज्या गोष्टीची मागणी केली आहे तिच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू काय ? ती अशी की, जेव्हा तुम्ही आपल्या अंथरुणावर जाल तेव्हा ३३ (तेहतीस) वेळा ‘सुबहानल्लाह’, ३३ वेळा ‘अलहम्दुलिल्लाह’ आणि ३४ वेळा ‘अल्लाहु अकबर’ जपत जा. हे तुमच्यासाठी सेवकापेक्षा अधिक चांगले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह, किताबुद्दावात - प्रमाण बुखारी व मुस्लिम)
एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, या वचनांचे प्रत्येक नमाजनंतर व झोपताना पठन करीत जा. (मागील प्रमाण - मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय फातिमा (र) यांनी सेवकाची मागणी केली आणि त्याच्या उत्तरादाखल प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना अल्लाहची ‘तसबीह’, ‘तहमीद’ व ‘तकबीर’च्या जपाचा उपदेश केला. यात या गोष्टीकडे संकेत आहे की, अल्लाहच्या नामस्मरणाने माणसाच्या बळात व कार्यशक्तीतसुद्धा वृद्धी होते.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या एक कन्या म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांना या दुआचे शिक्षण देत असत -
‘‘मी अल्लाहचा जप आणि स्तुती करते. चांगुलपणाची शक्ती अल्लाहद्वारेच मिळू शकते. अल्लाह जे इच्छितो ते घडते आणि जे इच्छित नाही ते घडत नाही. माझा विश्वास आहे की, अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. आणि अल्लाहच्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीला व्यापले आहे.’’ (अबू दाऊद (किताबुल अदब))
प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, माणसाने जर सकाळी ह्या दुआचे पठन केले, तर महान अल्लाह संध्याकाळपर्यंत व संध्याकाळी केल्यास सकाळपर्यंत त्याचे रक्षण करील.
या वचनामध्ये जो भरवसा, विश्वास आणि समर्पणाची भावना प्रकट केली गेली आहे, ती खरोखर मनात उत्पन्न झाली आणि नंतर माणसाच्या वाणीने तिची अभिव्यक्तीसुद्धा झाली, तर खात्री आहे की महान अल्लाह रात्रंदिवस त्याचे रक्षण करील.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नी आणि दुसऱ्या स्त्रिया नित्याचे जपतप आणि अल्लाहचे नामस्मरण व अल्लाहच्या प्र्रार्थना स्तुति वगैरेंचा जो इतमाम करीत असत त्याचा अंदाज खालील दोन घटनांवरून येईल.
प्रेषित मुहम्मद (स) सकाळच्या नमाजनंतर आपल्या पत्नी उम्मुल मोमिनीन माननीय जबेरिया (र) यांच्या घरातून बाहेर गेले. त्या वेळी त्या नमाजमध्ये मग्न होत्या.
‘चाश्त’च्या नमाजनंतर जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) परतले तेव्हासुद्धा नमाजच्या त्याच ठिकाणी बसून होत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना विचारले की, ‘‘मी जाताना (अल्लाहचे नामस्मरण करीत असता) ज्या स्थितीत तुमच्यापासून गेलो होतो, अद्याप तुम्ही त्याच स्थितीत आहात काय ?’’ त्यांनी होकारार्थी उत्तरादाखल मान हलविली. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुमच्यापासून गेल्यापासून मी चार वचने म्हटली आहेत. परंतु ती (अर्थाच्या दृष्टीने) वजनात तुमच्या अद्यापर्यंतच्या नामस्मरणाबरोबर असतील.’’ ती वचने अशी आहेत -
‘‘मी अल्लाहचे नामस्मरण व स्तुति इतकी करतो की, त्याच्या निर्मितीची संख्या असावी, त्याच्या प्रसन्नतेइतकी, त्याच्या सिहासनाइतकी आणि त्याच्या वचनांच्या शाईइतकी.’’ (मिश्कातुल मसावीह (किताबुद्दअवात) मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय साद बिन अबी वक्कास (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) समवेत एका स्त्री (बहुत करून त्या प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकीच कोणीतरी असाव्यात.) च्या घरी गेलो. त्यांनी पाहिले की, त्यांच्यासमोर बी अथवा खडे पडलेले आहेत आणि त्या त्यांच्या आधारे स्तुति - वचनांची (तस्बीहात) गणना करीत आहेत. त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला तस्बीह (स्तुति - वचनांचे पठन) ची यापेक्षा सोपी व श्रेष्ठ पद्धती सांगू काय ? ती अशी की तुम्ही असे म्हणा -
‘‘मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, आकाशात अल्लाहची जितकी निर्मिती आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितकी अल्लाहची निर्मिती जमिनीत आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितक्या जमीन व आकाशात वस्तु आहेत. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितका महान अल्लाह निर्मितीला उत्पन्न करणारा आहे. अल्लाहची महानता ही त्याच्याबरोबर आणि अल्लाहचे स्तवनसुद्धा त्याच्याबरोबर.’’
मनुष्य महान अल्लाहचे जितके स्तवन व स्तुति करील कमी आहे. यात रात्रंदिवस मग्न राहिला तरीसुद्धा त्याचा हक्क अदा होऊ शकत नाही. या हदीसमध्ये अशा संख्यांचा आश्रय घेतला गेला आहे, ज्यांची सीमा व संख्या अनाकलनीय आहे, जेणेकरून मनुष्याने त्यांच्या आधारे आपल्या असीम भावनांची अभिव्यक्ती करावी.
उपासनेचे आधिक्य
काही अप्रसिद्ध महिला सहाबींनादेखील उपासनेची खूप आवड होती. माननीय उमर (र) यांच्या एका दासीचे नाव जाइदा असे होते. त्यांच्यासंबंधी उल्लेख आहे की -
‘‘त्या, त्या महिलांपैकी होत्या ज्या उपासनेच्या बाबतीत खूप कष्ट घेत होत्या. त्यांच्या या सद्गुणामुळे प्रेषित मुहम्मद (स) त्यांच्याशी आपुलकीने वागत.’’
काही महिला सहाबी इतकी उपासना करीत असत की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना मध्यममार्गी बनण्याची व समतोल राखण्याची ताकीद दिली. माननीय आयेशा (र) म्हणतात की, त्यांच्यापाशी हौला बिन्ते तुवैत बसलेल्या होत्या. इतक्यात प्रेषित मुहम्मद (स) यांचे आगमन झाले. मी म्हणाले, ‘‘या हौला बिन्ते तुवैत आहेत. यांच्या उपासनेची मोठी चर्चा आहे. असे म्हटले जाते की, या रात्री झोपत नाहीत. नमाज पढत असतात.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी नापसंती व्यक्त केली आणि म्हणाले -
‘‘असे करू नका. तितकीच उपासना करा जितकी तुमच्यात शक्ती आहे. अल्लाहची शपथ ! महान अल्लाह (आपल्या कृपाप्रसादाने तर) कंटाळणार नाही. तुम्ही स्वतः कंटाळून जाल. अल्लाहच्या दृष्टीने तर त्याला धर्माची तीच कर्मे पसंत आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणाऱ्याने त्यात निरंतरता व नियमितपणा अवलंबावा.’’ (बुखारी)
माननीय अनस (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी एकदा पाहिले की, मस्जिदच्या दोन खांबादरम्यान दोरी बांदलेली आहे. त्यांनी विचारणा केली की, येथे ही दोरी कसली ? लोक म्हणाले की, ही माननीय जैनब (र) (बहुतकरून उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश (र)) यांची आहे. त्या रात्री नमाज पढत असतात. जेव्हा त्या थकून जातात तेव्हा याचाच आधार घेऊ लागतात. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले -
‘‘नाही ! ही पद्धत बरोबर नाही. ही सोडा, जोपर्यंत तुमच्यापैकी कोणत्याही व्यक्तीमध्ये आल्हाद आणि ताजेतवानेपणा शिल्लक आहे तोपर्यंत त्या व्यक्तीने नमाज अदा करणे आवश्यक आहे. जेव्हा थकेल तेव्हा तिने बसावयास पाहिजे.’’ (बुखारी (किताबुत्तहज्जुद) मुस्लिम (किताबुस्सलात))
सहाबानंतरच्या म्हणजे ताबयीनच्या काळात माननीय राबिया बसरिया आपल्या उपासने व तपश्चयेंसाठी फार प्रसिद्ध होत्या. अल्लामा इब्ने खल्लकान लिहितात -
‘‘त्या आपल्या काळातील मोठ्या लोकांपैकी होत्या. सदाचार, अल्लाहचे भय आणि त्याच्या उपासनेबाबत त्यांच्या घटना प्रसिद्ध आहेत.’’
त्यांची एक सेविका म्हणते की, त्या रात्रभर नमाज पढत असत. सूर्योदयाच्या वेळी थोडावेळ मुसल्ला (नमाज पढण्यासाठी अंथरण्याचे कापड) वरच झोपत असत. जेव्हा सूर्योदय होई तेव्हा घाबरून चटकन आपल्या अंथरूणावरून असे म्हणत उठून बसत ‘‘हे आत्म्या ! किती वेळ झोपशील आणि कोठपर्यंत झोपशील ? ती वेळ लवकरच येणार आहे जेव्हा तू असा झोपशील की, अंतिम दिनीच (कियामतच्या दिवशी) उठशील.’’ त्या प्रार्थनेत म्हणत असत, ‘‘हे अल्लाह ! तू त्या हृदयाला आगीत टाकशील का की जो तुझ्यावर प्रेम करतो.’’ असे म्हटले जाते की, एके दिवशी एक अप्रत्यक्ष आवाज आला की
‘असे होणार नाही. तुम्ही आमच्या बाबतीत सुविचार ठेवला पाहिजे.’ माननीय सुफयान सूरी (र) यांनी त्यांच्याजवळ अंतिम दिनाची आठवण करून म्हटले, ‘‘अरेरे, हे दुःख आणि क्लेश !’’ त्यांनी सांगितले, ‘‘चुकीची गोष्ट सांगू नका. असे म्हणा, ‘‘अरेरे, किती दुःख कमी आहे !’ त्याला कारण असे की, खऱ्या अर्थाने तेथील परलोकीचे दुःख मिळाले, तर श्वासोच्छवास करणे कठीण होईल. (वफीयातुल आयान लिब्नि खल्लकान)
उम्मुस्सहबा मआजा बिन्ते अब्दुल्लाह यांची इब्ने हिब्बान यांनी उपासिकामध्ये गणना केली आहे. असे म्हटले जाते की, त्यांचे पति अबुस्सहबा यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्या कधीही अंथरुणावर झोपल्या नाहीत. त्या रात्रभर जागून उपासना करणाऱ्या महिला होत्या. त्या म्हणत असत की, ‘‘या डोळ्यांचे आश्चर्य वाटते जे झोपत असतात, की जेव्हा त्यांना माहीत आहे की, कबरीत दीर्घ निद्रेत झोपावयाचे आहे.’’ त्या आपल्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, त्यांना पोटाचा काही त्रास होत होता, म्हणून घागरीत ठेवलेल्या नबीज (सातू व खजूरपासून बनविलेले मद्य) चा उपाय म्हणून उपयोग करण्याची त्यांना सूचना केली गेली. जेव्हा त्यांच्यासमोर त्याचा पेला आणला गेला, तेव्हा त्यांनी तो पेला ठेवला व प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! तुला हे ज्ञात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी ही हदीस ऐकविली होती की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी नबीजचा उपयोग करण्यास मनाई केली आहे. तू मला यापासून वाचव आणि आपल्या कृपेने माझी प्रकृती चांगली कर.’’ ही प्रार्थना केल्याक्षणी पेला पालथा झाला आणि त्यांचा त्रास नाहीसा झाला. (तहजीबुत्तहजीब १२ : ४५२ येथे या गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कोणत्याही कर्माचे बरोबर अथवा चुकीचे असण्याचा निर्णय कुरआन व सुन्नतच्या आधारे होईल. या पुस्तकात ज्या घटनांचा उल्लेख आला आहे त्यात एखादे वेळी न्यूनाधिक्य दिसून आले तर तो पुरावा ठरणार नाही. त्यांचा उल्लेख केवळ या दृष्टीने केला गेला आहे की, प्रारंभिक काळातील स्त्रिया उपासनेच्या किती इतमाम करीत असत व अल्लाहशी त्यांचे संबंध किती दृढ होते.)

- डॉ. फजलुर्रहमान फरीदी
    या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहिक नैतिक संकट आहे.
    आज नैतिकतेच्या क्षेत्रासाठी सदृढ आधार अस्तित्वात नाही. आजच्या समाजात नैतिकता एक निरर्थक वस्तू समजून आणि भौतिकवाद प्रभावी ठरला आहे. समाज नवनिर्माणाशी संबंधित चळवळीची सफलता नैतिकतेवर अवलंबून असते, हे स्पष्ट केले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 138    -पृष्ठे - 12     मूल्य - 07        आवृत्ती -2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2lull7xe714o6894r7pa4hjfzkpkyg56


माननीय उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, येणाऱ्या मनुष्याने (जे वास्तवात जिब्रिल (अ.) होते आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ मानवरूपात आले होते) पैगंबर मुहम्मद (स.)  यांना विचारले, ‘‘सांगा, ईमान काय आहे?’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ईमान म्हणजे, तुम्ही अल्लाहला, त्याच्या देवदूतांना, त्याने पाठविलेल्या ग्रंथांना, त्याच्या पैगंबरांना आणि परलोकाला  सत्य समजा आणि सत्य माना आणि या गोष्टीचाही स्वीकार करा की जगात जे काही घडते ते अल्लाहकडून होत असते, मग तो सदाचार असो वा दुराचार.’’ (हदीस : सही मुस्लिम)

स्पष्टीकरण 
 ईमानचा खरा अर्थ आहे एखाद्यावर विश्वास ठेवणे आणि त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टींना खरे मानणे. विश्वास आणि भरवसा हाच ईमानचा खरा आत्मा आहे आणि  मनुष्याला मोमिन (श्रद्धावंत) होण्यासाठी आवश्यक आहे की अल्लाहकडून पैगंबरांद्वारे येणाऱ्या सर्व गोष्टींना सत्य मानून त्यांवर श्रद्धा बाळगावी.
(१) ‘ईमान बिल्लाह’- म्हणजे अल्लाहवर ईमान बाळगण्याचा अर्थ असा आहे की त्याचे निरंतर अस्तित्व मान्य करणे, त्याला जगाचा निर्माणकर्ता आणि जगाचा एकमेव पालनकर्ता  मान्य करणे आणि या गोष्टीचा स्वीकार करणे की जगाच्या निर्मितीत आणि जगातील कायदा प्रस्थापित करण्यात त्याचा कोणीही भागीदार नाही. सर्व प्रकारचे दुर्गुण आणि सर्व  प्रकारच्या कमतरतेपासून तो पवित्र असल्याचे आणि तो सर्व प्रकारच्या उत्तम सवयींचा मालक आणि सर्वगुणसंपन्न असल्याचे मान्य करणे.
(२) देवदूतांवर ईमान बाळगणे- म्हणजे त्यांचे अस्तित्व मान्य करणे आणि ते पवित्र लोक आहेत, ते अल्लाहची अवज्ञा करीत नाहीत, प्रत्येक समयी अल्लाहची उपासना करण्यात मग्न  असतात, प्रामाणिक सेवकाप्रमाणे मालकाचा प्रत्येक आदेश पूर्ण करण्यासाठी हात बांधून त्याच्या समोर उपस्थित असतात आणि जगात सत्कर्म करण्याऱ्यासाठी ‘दुआ’ (प्रार्थना) करतात,  यावर विश्वास ठेवणे.
(३) ईशग्रंथांवर ईमान बाळगणे- म्हणजे अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे मानवांच्या आवश्यकतेनुसार जी उपदेशवचने पाठविली त्यांना सत्य मानणे, त्यापैकी अंतिम उपदेशवचन पवित्र  कुरआन आहे. पूर्वीच्या लोकसमुदायांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये फेरबदल केला तेव्हा शेवटी अल्लाहने आपल्या पैगंबरांद्वारे अंतिम ईशग्रंथ पाठविला, तो स्वच्छ व स्पष्ट आहे, त्यात कसलीही  कमतरता नाही आणि तो प्रत्येक प्रकारच्या फेरबदलापासून सुरक्षित आहे आणि आता या ग्रंथाव्यतिरिक्त जगात कोणताही असा ग्रंथ नाही ज्याद्वारे अल्लाहपर्यंत पोहोचणे शक्य आहे.
(४) पैगंबरांवर ईमान बाळगणे- म्हणजे अल्लाहकडून आलेल्या सर्व पैगंबरांना सत्य मानणे, त्या सर्व पैगंबरांनी कोणत्याही फेरबदल न करता अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला, या  शृंखलेची अंतिम कडी पैगंबर मुहम्मद (स.) आहेत. आता फक्त पैगंबरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यातच मानवांची मुक्ती आहे.
(५) परलोकावर ईमान बाळगणे- म्हणजे मनुष्याने ही हकीकत मान्य करावी की एक असा दिवस येणार आहे ज्यात मानवांच्या जीवनातील सर्व रेकॉर्डची चौकशी केली जाईल तेव्हा  ज्याचे कर्म उत्तम असतील त्यांना बक्षीस मिळेल आणि ज्याचे कर्म तुच्छ असतील त्यांना शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा किती असेल आणि बक्षीस काय मिळेल हे सांगता येणार नाही. 
(६) भाग्यावर ईमान बाळगणे- म्हणजे ही गोष्ट मान्य करणे की जगात जे काही घडत आहे अल्लाहच्या आदेशाने होत आहे. येथे फक्त त्याचाच आदेश चालतो. त्याला जे हवे आहे  त्याऐवजी जगाचा कारखाना वेगळ्याच पद्धतीने चालत आहे, असे कधी घडत नाही. प्रत्येक सदाचार व दुराचार उपदेश आणि मार्गभ्रष्टतेचा एक नियम आहे, जो त्याने अगोदरच बनवून  ठेवला आहे. अल्लाहचे आभार मानणाऱ्या दासांवर जे संकट येते, ज्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि ज्या कसोटीला त्यांना सामोरे जावे लागते, ही सर्व परिस्थिती आणि  त्यांच्या पालनकर्त्याचा आदेश आणि अगोदरच निश्चित करण्यात आलेल्या कायद्यानुसार आहे.

बंधूनों ! सत्याची साक्ष देण्याची ही ती मोठी जबाबदारी आहे जी माझ्या, तुमच्या आणि आपणासर्वांवर येते. अशा सर्व लोकांवर जे आपला संबंध मुस्लिम समाज, पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्याशी जोडून गौरवान्वित होतात.
    आता हे पाहू की ही साक्ष कुठल्या पद्धतीने देता येईल? मित्रानों! कोणतीही साक्ष दोन पद्धतीने देता येते. एक मौखिक, दूसरी कृतीतून. पहिल्या पद्धतीने साक्ष देणे म्हणजे आपण आपल्या वाणी आणि लेखणीने जगासमोर तो संदेश स्पष्टरित्या पोहोचविणे जो की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. समजाविण्याची आणि हृदय परिवर्तन करण्याची जितकी म्हणून साधणे असू शकतात त्या सर्वांचा उपयोग करून हा संदेश जगापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. प्रचार, प्रसार आणि प्रकाशन तसेच विज्ञान आणि कलेशी संबंधित सर्व साधने सुद्धा आपण आपल्या हाती घेऊन जगाला त्या व्यवस्थेच्या संदेशाशी अवगत करायला हवे जी व्यवस्था अल्लाहने समस्त मानवजातीसाठी पाठविलेली आहे.
    आपले चिंतन आणि नैतिकता, चारित्र्य आणि संस्कृतीतून, आपल्या कमाईतून, आपल्या व्यवहारातून, आपल्या कायद्यातून, न्यायव्यवस्थेतून, राजकारण आणि शासन चालविण्याच्या पद्धतीतून, तसेच लोकांच्या आपसातल्या व्यवहारांच्या बाबतीत आणि इतर सर्व दृष्टीकोणातून, इस्लामी व्यवस्थेने मानवासाठी जे मार्गदर्शन केलेले आहे त्याला प्रभावशाली पद्धतीने लोकांसमोर सादर केले गेले पाहिजे. त्याच्या व्याख्या मोकळेपणाने, विस्ताराने, मार्मिक तर्क आणि उदाहरणासहीत लोकांसमोर मांडले पाहिजे, हेच मार्गदर्शन सत्य आहे हे लोकांसमोर सिद्ध केले पाहिजे. आणि पृथ्वीवर जे काही या ईश्‍वरीय मार्गदर्शनाच्या विरूद्ध आहे त्यावर योग्य ती टिका आणि टिप्पणी करून जगाला हे दाखवून दिले पाहिजे की त्याच्यात कोणती खराबी आहे? या तोंडी साक्ष देण्याचे आपले कर्तव्य तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत उम्मते मुस्लिमा सामुहिकरित्या लोकांच्या मार्गदर्शनाची अगदी त्याच प्रमाणे काळजी करेल ज्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. हे व्यक्तिगतरित्या यासाठी त्यांच्या हयातीत करत होते.
    तोंडी साक्ष देण्याचे हे कर्तव्य पूर्ण करणे यासाठी आवश्यक आहे की, हे काम आपल्या सर्व सामुदायिक प्रयत्न आणि आपल्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहील. आपल्याला आपल्या मन आणि बुद्धीमध्ये असलेली सर्व शक्ती पणाला लावून आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली सर्व संसाधने या कामावर लावून प्रयत्न करावे लागतील. आपण करत असलेल्या प्रत्येक कामाच्या वेळी हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे की, आपल्याला सत्याची साक्ष द्यावयाची आहे. आपल्यामधून कुठल्याही परिस्थितीत अशी आवाज उठता कामा नये जी सत्याच्या विरूद्ध साक्ष देणारी असेल.
    राहता राहिला प्रश्‍न प्रत्यक्ष कृतीने साक्ष देण्याचा, तर त्याचा अर्थ असा आहे की, आपण आपले जीवन जगताना त्या तत्वांची अंमलबजावणी करावी ज्यांना आपण सत्य मानतो. जग केवळ आपल्या तोंडी साक्षीने सत्य ऐकूण तेवढे प्रभावित होणार नाही जेवढे कृतीने होईल. त्यांना प्रभावित करायचे असेल तर त्यांना त्यांच्या डोळ्यांनी आपल्या जीवनातील वैशिष्ट्ये आणि बरकती पाहता आल्या पाहिजेत. आपल्या आचरणातून आपण त्यांना त्या गोडव्याची चव चाखवली पाहिजे जो गोडवा इस्लामी श्रद्धा माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर येते. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे की, इस्लामी व्यवस्थेमध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्याची अंमलबजावणी केल्याने किती चांगली माणसं तयार होतात, किती न्यायप्रिय समाज तयार होतो, किती सुंदर समाज बनतो, किती स्वच्छ संस्कृती जन्माला येते, किती योग्य पद्धतीने ज्ञान, कला आणि साहित्याचा विकास होतो, माणसं किती न्यायप्रिय, सहृदयी तयार होतात आणि किती भांडणमुक्त, पवित्र, आर्थिक सहाय्य करणारे लोक पुढे येतात आणि लोकांच्या व्यक्तीगत जीवनाची प्रत्येक बाजू किती चांगल्या पद्धतीने सुधरतेे? माणसं किती एकमेकांची काळजी करतात आणि एकमेकांच्या सहकार्याने समाज किती श्रीमंत होवून जातो? या सत्याच्या साक्षीचे कर्तव्य अशा पद्धतीनेच अदा करता येईल की, आपल्या व्यक्तीगत आणि सामुहिकतेतूनही इस्लामी व्यवस्था सत्य असल्याची लोकांना खात्री पटावी. आपल्या लोकांचे चारित्र्य इतके उंच असावे की, ते सत्याची साक्षीदार बनून जावेत. आपली निवासस्थाने सत्याच्या साक्षीने सुगंधीत व्हावीत, आपली दुकाने आणि आपले कारखाने सत्याच्या प्रकाशाने दैदिप्यमान व्हावेत. आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्याच्या प्रकाशाने न्हाऊन निघाव्यात. आपले साहित्य व वर्तमानपत्रांनी, पाक्षिकांनी (इस्लाम) सत्य असल्याचे प्रमाणपत्र लोकांसमोर सादर करावेत. आपली सामाजिक ध्येय धोरणे आणि सामुहिक प्रयत्न इस्लाम सत्य असल्याचा खुला पुरावा असावा. थोडक्यात असे की, आपला जेथे आणि ज्या हैसियतीमध्ये ज्या व्यक्ती आणि समाजाशी संबंध येतो त्यांना आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक चारित्र्यामध्ये तो पुरावा मिळून आला पाहिजे ज्याला आपण सत्य म्हणतो. हे सत्य असल्यामुळेच त्यांच्यावर आचरण केल्याने प्रत्यक्षपणे मानवी जीवनामध्ये चांगल्या सुधारणा होतात.
मला या ठिकाणी असेही स्पष्ट करावयाचे आहे की, या प्रकारची साक्ष प्रभावशालीपणे देणे तेव्हाच शक्य होते जेव्हा या नियमांवर असे एक राज्य तयार व्हावे जेथे संपूर्णपणे इस्लामी शरियतवर आचरण केले जात असेल. त्या राज्यामध्ये न्याय, सुधार प्रकल्प, चांगली व्यवस्था आणि प्रबंधन, शांती, जनकल्याण आणि सुधारणेने, आपल्या सरकारी अधिकार्‍यांच्या उत्कृष्ट वर्तणुकीने, आपल्या पवित्र अंतर्गत राजकारणाने, सत्य आणि न्यायाने भरपूर अशा विदेश नितीने, आपल्या सभ्य युद्धाने आणि आपल्या एकनिष्ठतापूर्ण तहाने सगळ्या, जगासमोर आपण या गोष्टीची साक्ष देऊ की तीच व्यवस्था श्रेष्ठ आहे ज्या व्यवस्थेने या राज्याला जन्म दिलेला आहे. तोच धर्म वास्तविकपणे मानवी कल्याण आणि यशस्वीतेची गरज पूर्ण करतो. आणि त्यावर आचरण करण्यामध्येच सर्व मानवतेचे कल्याण निहित आहे. ही कृतीपूर्ण साक्ष जेव्हा कौली शहादती (तोंडी साक्ष) सोबत एकरूप होवून जाईल तेव्हाच आपण खरी साक्ष देण्याची जबाबदारी पूर्णपणे अदा केली असे मानले जाईल व ती जबाबदारी जी की अल्लाहने मुस्लिम समाजावर टाकली आहे.
    ही साक्ष जेव्हा मुस्लिम देतील तेव्हाच इतर लोक (मानव समाज) हा आरोप करू शकणार नाही की, सत्याची साक्ष तर आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही. तेव्हाच मुस्लिम समाज यासाठी पात्र होवू शकेल की, आखिरत (परलोक)च्या न्यायालयात प्रेषित मुहम्मद सल्ल.च्या नंतर उभे होवून ते साक्ष देवू शकतील की जे काही प्रेषित सल्ल. यांनी आमच्यापर्यंत पोहोचविले होते ते सर्व आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. याउपरही जे लोक असत्य मार्गावर राहतील त्यांची जबाबदारी आमच्यावर नाही. त्यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत.
    प्रिय बंधूनों ! तर ही ती साक्ष आहे जी मुस्लिम असल्याच्या कारणाने आपल्याला आपल्या तोंडाने आणि कृतीने देणे गरजेचे आहे. मात्र प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, वास्तवमध्ये आपणही सत्याची साक्ष देत आहोत की नाही? चला तर मग याचा आढावा घेऊ.
    अगोदर तोंडी साक्ष देण्यासंबंधी पाहू. या संदर्भात एक महत्वाची बाब ही की  आपल्यामध्ये जरूर एक छोटा गट अशा लोकांचा अस्तित्वा आहे जो काही ठिकाणी व्यक्तीगत तर काही ठिकाणी सामुहिक पद्धतीने मौखिक आणि लिखितरित्या इस्लाम सत्य असल्याची साक्ष देत आहे. मात्र असे लोक आणि संघटना बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत. हे लोक अगदी त्याच पद्धतीने सत्याची साक्ष देत आहेत ज्या पद्धतीने साक्ष देणे अपेक्षित आहे. या मुठभर लोकांना आपण जर वेगळे केले तर आपण पहाल इतर मुस्लिम लोक हे मौखिक आणि लिखितरित्या सत्याची तर साक्ष देतच नाहीयेत उलट त्यांची साक्ष इस्लामविरूद्ध जात आहे. आपले जमीनदार भरपूर जमीन बाळगून इस्लामी वारसाहक्काचा कायदा चुकीचा (अस्तगफिरूल्लाह) असल्याची व अज्ञान काळातील चालीरिती खरी असल्याची साक्ष देत आहेत. आपले वकील आणि काजी (न्यायाधिश) या गोष्टीची साक्ष देत आहेत की, (अस्तगफिरूल्लाह) इस्लामचे सर्व कायदे चुकीचे आहेत. एवढेच नव्हे तर इस्लामी कायदा हा मुळातच स्वीकार्ह नाहीये. स्वीकार्ह फक्त तेच कायदे आहेत जे लोकांनी बनविलेले आहेत. आमचे शिक्षक, आमचे प्राध्यापक आणि आमच्या शिक्षण संस्था या गोष्टीची साक्ष देत आहेत की, इस्लामी तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण आणि कायदा आणि नैतिकतेच्या बाबतीत तेच विचार खरे आहेत जे पश्‍चिमी देशांच्या मुलहिदाना तालीम (नास्तीकतेला प्रोत्साहित करणारे शिक्षण) मधून घेतले गेलेले आहेत. आणि या संदर्भात इस्लामचा दृष्टीकोण लक्ष देण्याइतपत सुद्धा लायकीचा नाही. आमचे साहित्यिक आपल्या साहित्यातून या गोष्टीची साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही आपल्या साहित्यातून तोच संदेश देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही जो ब्रिटन, फ्रान्स आणि रशियासारख्या नास्तीक साहित्यिकांकडे आहे. मुस्लिम असल्याच्या नात्याने त्यांच्याकडे कोणताही कायम असा आत्मा नाही. आमचे प्रेस या गोष्टीची साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही वाद-विवाद करण्यासाठी, प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी, प्रचार करण्याच्या त्याच पद्धती आहेत ज्या मुस्लिमेत्तरांकडे आहेत. आमचे व्यापारी, उद्योगपती आणि कारखानदार साक्ष देत आहेत की, इस्लामी आर्थिक व्यवहाराची जी चौकट आहे ती व्यवहारिक नाही आणि व्यवसाय त्याच पद्धतीनुसार शक्य आहे, जी पद्धत मुस्लिमेत्तरांनी स्विकारली आहे. आमचे नेते साक्ष देत आहेत की, त्यांच्याकडेही वंशवाद आणि राष्ट्रवाद या व्यतिरिक्त दूसरे कुठलेही नारे नाहीत, त्यांच्या मागण्या त्याच पठडीतल्या आहेत. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्याची पद्धतही तीच आहे, राजकारण आणि संविधानाचे नियमही तेच आहेत जे अन्य धर्मियांकडे आहेत आणि इस्लाम (अस्तगफिरूल्लाह) यासंदर्भात कोणतेच मार्गदर्शन करत नाहीये. आमची जनता साक्ष देत आहे की, तिच्याकडेही मौखिक साक्ष देण्यासाठी इतरांप्रमाणेच भौतिकता आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी आहेत. त्यापेक्षा वेगळा दीन (व्यवस्था) त्यांच्याकडे नाही. अशी दीनी व्यवस्था ज्यावर ते आपल्या वाणीने चर्चा करू शकतील किंवा त्यावर आपला थोडासा वेळ खर्ची घालू शकतील. ही आहे मौखिक साक्ष ची आमची परिस्थिती. ही परिस्थिती फक्त भारतीय मुस्लिमांचीच नाही तर जागतिक मुस्लिमांचीसुद्धा आहे.    (क्रमशः)

इस्लामवरील पुस्तकाची चर्चा अलीकडे मराठी भाषकांमध्ये होताना दिसत आहे. मराठी भाषकांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेले कदाचित हे पहिलेच पुस्तक असावे. यापूर्वी मराठीमध्ये  इस्लामवरील अनेक अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पण स्वतंत्र असे पुस्तक स्वरूपात इस्लामवर लेखन झालेले आढळत नाही, त्यामुळे अब्दुल कादर मुकादम यांचे हे  पुस्तक महत्त्वाचे ठरते. मुकादम कोकणी मुस्लिम असल्यामुळे साहजिकच पुस्तकाची भाषा ओघवती व रसाळ अशी आहे. शिवाय त्यांचे इस्लामवरील ४० वर्षांचे चिंतन सार स्वरूपात  या पुस्तकात आलेले आहे. या पुस्तकातून त्यांनी इस्लामी न्यायशास्त्र, इस्लामची पाश्र्वभूमी, मुहंमद (स) पैगंबर यांचा जन्म, हिजरत, त्या काळची आदर्श राजकीय व्यवस्थेची  प्रस्थापना; असे विविध विषय मराठी भाषकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इस्लाममधील नेहमी चर्चेत असणाऱ्या घटकांचा उहापोहदेखील त्यांनी या पुस्तकात केलेला  आहे. तसेच शरीयत, बुरखा पद्धती, तलाक, महिलांचे स्थान, कुटुंब नियोजन, इस्लामिक बँकिंग, युद्ध परंपरा आणि जिहाद आदी घटकांचा समावेश यात आहे.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच इस्लामपूर्वकाळ म्हणजे ‘जाहिलियाँ’ (अज्ञानयुग) मधील लोकसंस्कृती व समाजजीवनाचे सविस्तर विवेचन आलेले आहे. अरब वाळवंटी प्रदेशात अन्नासाठी  वणवण भटकणे तिथल्या सामाजिक जीवनाचे स्वरूप होते. निसर्गाने लादलेल्या या भटक्या जीवनशैलीमुळे ‘तंबूत राहणारे लोक’ हीच त्यांची ‘ओळख’ व ‘अस्मिता’ होती. इस्लामपूर्व   काळात अरबस्थानातील जनजातीसमूह मूर्तिपूजक होते. मक्केत सर्व टोळ्यांची महत्त्वाची मंदिरे होती. या मंदिरात दानाच्या स्वरूपात मिळणारी संपत्ती मोठी असे. मंदिराचे व्यवस्थापन  व पर्यायाने मंदिराच्या संपत्तीचा विनियोग करण्याचे अधिकार मक्केतील श्रीमंत व्यापाऱ्यांच्या हातात होते. याचा अर्थ असा की मक्केतील सामाजिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेवर   या व्यापाऱ्यांचा प्रभाव होता. दुसरीकडे व्यापाराबरोबर त्यांची कामे करणारा कष्टकऱ्यांचा एक वर्गही तिथे उदयास आलेला होता. हा वर्ग अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा कशा भागवायच्या अशा विवंचनेत होता. कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितवर्ग अशी मक्केतील तत्कालीन समाजव्यवस्था होती. श्रीमंत व्यापाऱ्यांकडून कष्टकरीवर्गाचे शोषण होत असे. अन्याय, जुलूम अंगभूत असलेल्या या समाजाचे नियंत्रण करणारी कोणतीही शासनव्यवस्था अस्तित्वात नव्हती.
इसवी सन ६१० मध्ये रमजानच्या एका पवित्र रात्री मक्केजवळच्या हिरा नावाच्या गुहेत मुहंमद (स) पैगंबरांना ईश्वरी साक्षात्कार झाला. हा क्षण इस्लामच्या जन्माचा व कुरआनच्या  प्रकटीकरणाचा होता. इस्लामसारख्या नव्या धर्माचा उदय ही जगभरातील क्रांतिकारी घटना होती. इस्लामने नैतिकता व मानवी मूल्यांचे आरोपण जगात प्रथमच केले होते. समता,  स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्त्वेदेखील इस्लामने प्रथमच आणली होती.
इस्लामची दोन वैशिष्ट्ये होती. मूर्तिपूजेवर आधारित असलेल्या पारंपरिक धर्माचा अंत करून त्याजागी एकेश्वरी निराकार अल्लाहची आराधना करण्याची दीक्षा देणे, दुसरे म्हणजे, अनेक  टोळ्यांमध्ये विखुरलेल्या आणि प्रत्येक टोळीची स्वतंत्र अस्मिता व स्वातंत्र्य नष्ट करून समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित नवसमाजाची उभारणी करणे. या प्रक्रियेमुळे  साहजिकच मक्केतील श्रीमंत गर्भश्रीमंत व्यापाऱ्यांच्या परंपरागत आर्थिक हितसंबंधांना आव्हान उभे राहिले. बदलाला व परिवर्तनाला त्यांचा कठोर विरोध होता.
हा विरोध दिवसागणिक आक्रमक व हिंसक होत गेला. परिणामी त्या दहा-बारा वर्षांच्या कालखंडात या दोन पक्षांत ४ युद्धे झाली. त्यातील पहिल्या बदरच्या युद्धात पैगंबरांना माघार  घ्यावी लागली. पण नंतरची तीन युद्ध मात्र त्यांनी जिंकली. शेवटचे युद्धात मक्केतील श्रीमंत व्यापारी बिनशर्त शरण आले होते. सर्वांनी स्वखुशीने इस्लामचा स्वीकार केला.
अशा रीतीने पैगंबरांनी मक्केत आणि पर्यायाने अरबस्थानात सामाजिक क्रांतीबरोबरच स्थानिकांना एकेश्वरत्वाची दीक्षा देऊन आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. विविध टोळ्यांत विखुरलेल्या विविध जनजातीत समता व न्याय या मूल्यांवर आधारित एकसंघ समाज निर्माण केला. त्याचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी आदर्श अचारसंहिता (शरीयत)  निर्माण  केली. तसेच श्रीमंत आणि गरीब या वर्गातील विभागलेल्या अरबी समाजात बंधुत्वावर आधारित एकसंघ समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न पैगंबरांनी केला. फक्त नवा समाज  निर्माण करून भागणार नव्हते. तर आदर्शवत राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेचे अभूतपूर्व कार्य प्रेषितांनी केले. इस्लामपूर्व कालत अरबी समाजात कसलेच कायदेकानू किंवा नीती  नियमन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे अरब समाज समाजात दांभिकता व अनैतिकता फोफावली होती. यावर नियंत्रण मिळवण्याचे काम प्रेषितांनी केले. इस्लामचा प्रसार वाढत होता.  इराक, इराण, इजिप्त, जॉर्डन, सीरिया येमेन यांसारख्या प्रदेशात इस्लामचा प्रसार झाला. या प्रादेशिक व्याप्तीमुळे अल्लाह, पैगंबर व कुरआनवर श्रद्धा, नमाज, रोजा, दानधर्म आणि  हजयात्रा या इस्लामच्या पाच मूलभूत तत्त्वांचा निष्ठापूर्वक स्वीकार करताना, या नवमुस्लिमांच्या प्रादेशिक अस्मिता, प्रथा, परंपरा आणि व्यावहारिक गरजा यांचा प्रभाव नव्या  व्यवस्थेवर पडत गेला. विशेष म्हणजे आफ्रिकन देशांमध्ये इस्लामचा प्रसार-प्रचार स्थानिक अस्मिता व व्यावहारिक गरजा लक्षात घेऊन होत गेला. अगदी हीच अवस्था भारतातही दिसून  आली. चातुर्वण्र्य व्यवस्थेने ग्रासलेल्या पीडित शोषित समाजाने जगण्याचा आदर्श व्यवहार म्हणून इस्लामकडे पाहिले व धर्मांतरीत झाले. यासंदर्भात या पुस्तकात विवेचन आले आहे.  अनेकांनी आपल्या पूर्वाश्रमीचा धर्माचा त्याग केला व इस्लाममध्ये दाखल झाले. अशा विविध धर्म समुदाय इस्लाममध्ये आले. पण त्यांनी आपल्या रूढी, प्रथा, परंपरा, अस्मिता,  प्रादेशिक व्यवहार मात्र तसाच ठेवला. तसेच धर्म बदलल्याने व्यवसाय बदलला नाही. रोजीरोटीच्या आहे तोच व्यवसाय त्यांनी स्वीकारला. अशा पद्धतीने भारतात प्रादेशिक इस्लामचा  उदय झाला. या संबधीची विस्तृत चर्चा मुकादम यांनी पुस्तकात केलेली आहे.
संबंधित पुस्तकातील इस्लामचा अर्थ विचार या प्रकरणात इस्लामच्या उदयानंतर आदर्श राजकीय व्यवस्थेच्या प्रस्थापनेशी संबंधित सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच  इस्लामिक बँकिंगची तर्कसंगत मांडणीदेखील या प्रकरणातली वाचनीय असा भाग आहे. वाचकांनी हे प्रकरण प्रामुख्याने वाचायला हवे. संबंधित पुस्तकात मुकादम यांनी इस्लामच्या  चार  नीतीसूत्रांची सविस्तर चर्चा केलेली आहे. इतकेच नव्हे तर त्याचे तर्कसंगत निष्कर्षही त्यांनी आपल्या लेखनातून काढले आहेत. न्यायशास्त्राच्या विकासात मानवी बुद्धीला असलेले स्थान  त्यांनी आपल्या अभ्यासातून अधोरेखित केले आहे. इस्लामविषयीची भारतीय मिथकांची चर्चादेखील सदरील पुस्तकात मुकादम यांनी केलेली आहे. लेखकाने नुसते इस्लामचे गौरवीकरण  केले नाही तर इस्लामची तर्कसंगत मांडणी व तत्त्वज्ञानाची सविस्तर चर्चा केली आहे. मराठीमध्ये इस्लामी तत्त्वज्ञानाची चर्चा फारशी कोणी केलेली आढळत नाही. पण सदरील  लेखकाने संबंधित पुस्तकात समता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी मूल्यांवर आधारित नवसमाजनिर्मितीच्या पायाभरणीची चर्चा करताना निसर्गाचे मानवाशी असलेले नाते, नैसर्गिक  साधनसंपत्तीचा विनियोग, धनसंचय, न्यायशास्त्र इत्यादी संदर्भात इस्लामिक तत्त्वज्ञानाची चर्चा लेखकाने केलेली आहे. तसेच पाश्चात्त्य विचारवंतांनी इस्लामची मंडणी करताना केलेल्या  चुकादेखील लेखकाने दाखवून दिलेल्या आहेत. शिवाय अनेक पाश्चात्य विचारवंतांनी इस्लामबद्दल मत व्यक्त केलेली मते व इस्लामच्या गौरवाची परंपरा उल्लेखित केलेली आहे. इस्लामबद्दल एकांगी मते पेरणाऱ्या कथित लेखकरावांची कारस्थानेदेखील मुकादम यांनी उघडकीस आणली आहेत. मराठीतल्या लेखकांनी इस्लामचा अन्वयार्थ लावताना अनेक ठिकाणी  थापा मारलेल्या आहेत, असेही लेखकाने अनेक पुरावे देऊन स्पष्ट केलेले आहे. इस्लामच्या अभ्यासाची विपुल साधने असतानादेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इस्लामचे एकांगी व  आन्यायी चित्रण मराठी लेखकांनी केलेले आहे, या संदर्भात लेखकाने केवळ त्यांच्या लेखनाची चिरफाडच केली नाही तर संबंधित विचार तर्कसंगतीने स्पष्ट करून व उकल करून  विश्लेषण केलेले आहे. युद्ध आणि जिहाद संदर्भात अनेक लेखकांनी धर्मवादी व पूर्वग्रहदूषित मांडणी केलेली आहे, हे करताना त्यांनी इतर धर्म समुदायांमध्ये झाली धर्मयुद्धे यांना सपेशल  दुर्लक्षित केली आहेत. ख्रिश्चन, ज्यू धर्मांमध्ये झालेल्या धर्मयुद्धाने (क्रुसेड) लाखो निष्पाप माणसे मारली गेली. शिवाय हिंदूधर्म पद्धतीत झालेल्या धर्मयुद्धामुळेदेखील अशाच प्रकारची  निष्पाप लोक मारली गेली आहे; यासंदर्भातले विवेचन मराठी लेखकांनी कुठेही केलेले आढळत नाही. पण इस्लामचा युद्धाशी व दहशतवादाची संबंध जोडून त्याला बदनाम करण्याचे  कारस्थान याच लेखक मंडळींनी केले आहे, याची अनेक उदाहरणे अब्दुल कादर मुकादम यांनी संबंधित पुस्तकात दिलेली आहेत.
शिवाय इस्लामचे आधुनिक भाष्यकार असगरअली इंजिनिअर यांचे अनेक उद्धरणे संबंधित पुस्तकात अनेक ठिकाणी आलेली आहेत. पुस्तकाच्या शेवटी वहाबीझमची तर्कसंगत चिकित्सा  लेखकाने केलेली आहे. कुटंबनियोजन, बुरखा, तिहेरी तलाक, विवाह विधी इत्यादी विषय अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने हाताळले आहेत. उपरोक्त पुस्तकांत जागतिक स्वरूप पातलrवर  इस्लामचे होणारे शत्रूकरण व त्याची कारणमीमांसा केलेली आहे. पेट्रो डॉलरमुळे जागतिक पातळीवर इस्लामचा अपप्रचार व दुष्प्रचार करण्याची प्रथा गेल्या ३०-४० वर्षापासून रुजत आहे.  परंपरावादाचे आरोप ठेवून, दहशतवादी कारवायांचा ठपका ठेवून, दृष्कृत्याला अर्थसहाय्य पुरवल्याचे निराधार आरोप ठेवून, इस्लामिक राष्ट्रांना असुरक्षित करून भांडवलशाहीप्रणित वर्चस्ववादाचा बडका उगारायचा व स्थानिक नैसर्गिक साधनांवर साधने बळकावायची असे धोरण गेल्या काही दशकांपासून जगभरात पाहायला मिळत आहे. यासंदर्भात गेल्या तीस-चाळीस  वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पाश्चात्य विद्वानांनी इस्लामच्या शत्रूकरणाचे केलेले कट मुकादम यांनी या पुस्तकातून उघडकीस आणले
आहेत.

पुस्तकाचे नाव- इस्लाम ज्ञात आणि अज्ञात
लेखक- अब्दुल कादर मुकादम, मुंबई
अक्षर प्रकाशन, मुंबई. मो.३२२३९१७२०
किंमत- ३०० पाने- २१५

-कलीम अजीम, अंबाजोगाई
(सौजन्य : लेखकाचा ब्लॉग)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget