Latest Post

माननीय आयशा (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना काही नमाजींमध्ये ही दुआ करताना ऐकले, ‘‘अल्लाहुम्मा हासिब्नी हिसाबयं यसीरा’’ (हे अल्लाह! माझ्याकडून सोपा हिशोब घेतला जावा.) तेव्हा मी विचारले, ‘‘सोप्या हिशोबाचा अर्थ काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सोपा हिशोब म्हणजे अल्लाहने आपल्या दासाचे कर्मपत्र पाहावे आणि   त्याच्या वाईट कर्मांना क्षमा करावी.’’ मग म्हणाले, ‘‘हे आयशा! एखाद्याचा हिशोब घेताना एकेका गोष्टीची सखोल चौकशी केली तर त्याचे काही खरे नाही.’’ (हदीस मुसनद अहमद)

स्पष्टीकरण
पवित्र कुरआन आणि दुसऱ्या हदीसींमध्ये स्पष्टपणे अशी शुभवार्ता देण्यात आली आहे की जे लोक अल्लाहच्या मार्गाचा अवलंब करतात आणि दुराचाराच्या शक्तींशी सामना करीत  राहतात, इतकेच नव्हे तर लढता लढता त्यांच्या जीवनाची अवधी संपून जातो, तेव्हा अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाह त्याच्या चुका क्षमा करील आणि पुण्यकर्मांची दखल घेऊन  त्यांना स्वर्गात स्थान देईल.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले ‘यौमइ़िजन तुहद्दिसु अ़खबारहा’ (त्या दिवशी जमीन आपल्या सर्व स्थितींचे विवरण  करील) आणि सहाबा (रजि.) (पैगंबरांचे सहकारी) यांना विचारले, ‘‘स्थितीचे विवरण करण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?’’ लोकांनी म्हटले, ‘‘अल्लाह आणि त्याचे  पैगंबर यांनाच त्याचे ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जमीन अंतिम निवाड्याच्या दिवशी साक्ष देईल की अमुक पुरुष अथवा अमुक स्त्रीने माझ्या पाठीवर अमुक दिवशी आणि अमुक  समयी सत्कर्म अथवा दुष्कर्म केले.’’ हाच अर्थ आहे या आयतीचा. लोकांच्या या कर्मांना वरील आयतीत ‘अ़ख्बार’ म्हटले गेले आहे. (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो आणि विचारले, ‘‘त्या दिवशी ज्याच्या बाबतीत अल्लाहने म्हटले आहे, ‘‘यौमा यकूमुन्नासु लिरब्बिल आलमीन’’ (तू त्या दिवसाच्या बाबतीत विचार कर जेव्हा लोक हिशोब देण्यासाठी जगाच्या पालनकत्र्यासमोर हजर होतील) त्या दिवशी कोण लोक उभे राहू शकतील बरे (जेव्हा तो एक दिवस हजार वर्षांइतका असेल)?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘(त्या दिवसाची कठोरता गुन्हेगार आणि बंडखोरांसाठी आहे, त्यांना तो एक दिवस हजार वर्षांइतका   वाटेल. संकटात सापडलेल्या मनुष्याचा दिवस मोठा असतो, जाता जात नाही.) तो दिवस ईमानधारकांसाठी लहान असेल, फक्त लहानच नाही तर फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) सारखा  त्याच्या डोळ्यांत गारवा बनून राहील.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
‘कचरा ठेवण्याचे ठिकाण’ म्हणजे ती लहानशी जागा आहे जेथे मनुष्य आपले अंथरुण टाकून पहुडलेला असतो. अर्थात अल्लाहच्या ‘दीन’- जीवनधर्माचे अनुसरण करताना एखाद्याचे  जगच नष्ट झाले, सर्व सामानसुमानापासून वंचित झाला आणि त्या बदल्यात स्वर्गातील मर्यादित आणि लहानशी जमीन मिळाली तर हा फारच क्षुल्लक सौदा आहे, नाशवंत वस्तूच्या  बलिदानाच्या परिणामस्वरूप अल्लाहने त्याला ती वस्तू दिली जी निरंतर राहणारी आहे.

इस्लामवर आरोप करणारे काही भ्रमिष्ट लोक असे म्हटल्याचे ऐकण्यात आहे, की इस्लामी जीवनपद्धत आधुनिक युगाच्या गरजांशी व निकडींशी एकरुप नाही. म्हणून वर्तमान युगातील लोकांना इस्लाम स्वीकारार्ह होऊ शकत नाही. इस्लामचे आदेश केवळ गतकाळाकरिताच होते व आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. इतकेच नाही तर प्रगतीच्या मार्गात ते अडथळा होऊन राहिले आहेत, असे त्यांना वाटते ते असे म्हणतात,
  1. व्याज (जी सध्याच्या काळी एक अनिवार्य आर्थिक गरज आहे) देण्याघेण्याला तुम्ही अजून गैर व बेकायदा असे मानता काय?
  2. जकातची रक्कम ज्या वस्तीत गोळा केली जाते, तिचा खर्च निश्चितपणे तेथील रहिवाशांच्याच कल्याणासाठी करावयास हवा काय? पहिली गोष्ट अशी की जकात एक जुनाट व मागासलेली पद्धत आहे व त्यामुळे वर्तमान सरकारच्याही गरजा पुऱ्या होऊ शकत नाहीत. तसेच दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गावात अगर शहरातील श्रीमंत लोकांकडून गोळा केलेली जकात, तेथील गरिबांना जेव्हा वाटली जाते तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. कारण त्यांच्या दृष्टीने त्या पैशांचा दर्जा ‘दाना’ पेक्षा काही अधिक नसतो.
  3. तुम्ही मदिरापान, जुगार, स्त्रीपुरुषाचे अनिर्बंध मिसळणे, नाचगाणी, बाई ठेवणे, कामविलास या सर्व गोष्टींवर बंधने घालून त्यांना अवरोध करु इच्छिता? या सर्व गोष्टी तर सामाजिक जीवनात अनिवार्य गरज होऊन राहिल्या आहेत.
    इस्लाम व्याज वर्ज्य करतो हे बरोबर आहे; पण व्याज ही एक आवश्यक निकड विवशता आहे. असे म्हणणे चुकीचे आहे. आजसुद्धा जगात दोन प्रकारच्या जीवनपद्धती इस्लाम व कम्युनिझम अस्तित्वात आहेत. ह्या दोन्ही व्याजावरील आधारलेली आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार करत नाहीत. दोहोंत फरक एवढाच आहे की कम्युनिझमजवळ आपल्या दृष्टिकोनानुसार आचरण करण्यासाठी व जीवनाला त्याच्या नुसार आकार देण्यासाठी अनिवार्यपणे लागणारी शक्ती तसेच सत्ताही आहे व इस्लामला अशी शक्ती किवा सत्ता प्राप्त नाही. इस्लामला वास्तविक सत्ता प्राप्त असती तर व्याज ही अनिवार्य आर्थिक गरज नाही, हे त्याने शिकविले असते. इस्लामी आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारली जात नाही, जशी आज रशियाची आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारलेली नसून व्याजापासून पूर्णपणे मुक्त होऊन उभी आहे.
कोणत्याही दृष्टीने व्याज ही वर्तमान युगाची अनिवार्य आर्थिक गरज आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. जर ती अनिवार्य आवश्यकता असेल तर ती भांडवलदारांकरिताच आहे. कारण त्याच्या शिवाय ते भांडवलशहा होऊच शकत नाहीत. खुद्द पश्चिमेतील काही अर्थतज्ञाच्या शिरोमणीचाही व्याजाला विरोध आहे. ते आम्हाला अशी चेतावनी देत आहेत, व्याजावर जर प्रतिबंध लावला गेला नाही तर हळूहळू सर्व संपत्ती एकवटून काही लोकांच्याच हातात साठली जाईल. गरीब जनता आर्थिकदृष्ट्या बरबाद होऊन ते भांडवलशहांच्या अधीन होऊन त्यांचे गुलाम बनतील. पश्चिमेतील भांडवलशाहीच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांत अर्थतज्ञांचे हे मत अगदी खरे असल्याचे दिसून येते. व्याज व मक्तेदारी पद्धत, जे भांडवलवादांचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत या दोहोंना जेव्हा भांडवलवादाचे अस्तित्वही नव्हते, तेव्हा आजपासून सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वीच इस्लामने व्याज वर्ज्य असल्याची घोषणा करुन टाकली आहे. इस्लामी जीवनपद्धतीला अवतरित करणारा सर्वशक्तिमान व सर्वज्ञ अल्लाह आहे व तो मागच्या पुढच्या सर्व पिढ्यांतील लोकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतो व व्याजापासून कोणते बिघाड, आर्थिक दोष व पेच निर्माण होऊ शकतात हे तो चांगले जाणतो.
ज्या देशातील आर्थिक व्यवस्था परकीय मदतीवर अवलंबून असते त्याच्या बाबतीत तर व्याज ही एक मानहानीकारक बाब होऊ शकते, पण इस्लामी अर्थव्यवस्था स्वतंत्र असते आणि स्वंतत्र निकोप पायावर उभारलेली व आधारलेली असते. इतर देशांशी त्याचे संबंध समानतेच्या तत्त्वावर आधारलेले असतात. ते जीहुजुरीवर, आज्ञापालनावर किवा दास्यत्वावर नसतात. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत मार्गदर्शन त्या इस्लामी आदेशानुसार व तत्त्वानुसार करतो जे व्याज निषिद्ध व वर्ज्य ठरवितात. या सिद्धान्तांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामी अर्थव्यवस्था आत्सित्वात येते, तिला जगात प्रगती व श्रेष्ठत्वाच्या ध्वजाचे स्वरुप असते.
जकातसंबंधी या अगोदर दाखवून दिले आहे, की हुकूम आहे व तो असा हक्क आहे ज्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्यावर असते.
या प्रकरणात आम्ही जकातसंबंधी असणाऱ्या त्या शंकेचे उत्तर देऊ इच्छितो जी तिच्या स्थानिक बाबतीत म्हणजे जेथे जकात गोळा केली जाते, तेथील गरजू लोकांतच तिचे वाटप व्हावे, या नियमावर केली जाते.
येथील बहुतेक विद्वान पश्चिमेकडून आणलेल्या प्रत्येक व्यवस्थेला व पद्धतीला सुधारणांचे परमोच्च बिदू मानून त्यांना कवटाळीत असतात. ही अत्यंत खेदजनक अवस्था होय. पण तीच गोष्ट जर इस्लामने त्यांच्यापुढे ठेवली तर तिला ते प्रतिगामित्व व अंधश्रद्धा समजू लागतात.
या विद्वानांना, या गोष्टीची आठवण करुन देणे इष्ट ठरेल की, संयुक्त राज्य अमेरिकेची शासकीय चौकट पूर्णतः विकेंद्रीकरणावर आधारलेली आहे. संयुक्त राज्य अमेरिका व त्यामधील राज्यातील प्रत्येक गाव व वस्ती आपल्या सामान्य व्यवस्थेबाबत आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्टीने स्वयंपूर्ण व स्वतंत्र असते. या स्वतंत्र घटकांच्या नगरपरिषदा आपल्या हद्दीतील रहिवाशांवर कर लागू करतात, ते वसूल करतात व मग आपल्या गावाच्या अगर वस्तीच्या शैक्षणिक, औषधोपचार, परिवहन तसेच इतर सार्वजनिक कार्यावर गरजेनुसार तो खर्च करतात. हा सर्व खर्च करुन काही शिल्लक उरली तर ती राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवून त्यांच्या ताब्यात देऊन टाकतात. या उलट जर गावाचा एकंदर खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर राज्याकडून तुटीची भरपाई करण्यात येते. निस्संशय ही एक चांगली पद्धत आहे. यात भिन्न मानवी प्रयत्नांना सुरेखपणाने एकवटून खर्चाचा एकंदर भार विभागला जातो व हा सर्व भार एकट्या केंद्रसरकारला वाहावा लागत नाही. या शिवाय खर्चाचा विनिमय, स्थानिक लोकांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या सर्व गरजाही चांगल्यारितीने पुऱ्या होत असतात. कारण स्थानिक मंडळी आपल्या हद्दीतील गरजा केंद्रापेक्षा अधिक चांगल्या रितीने जाणत असतात.
आमच्या देशातील विद्वान, अमेरिकेच्या या पद्धतीची फार प्रशंसा करतात, पण हीच पद्धत इस्लामने तेराशे वर्षापूर्वी स्थापन केली होती ही गोष्ट ते विसरुन जातात. प्रत्येक गावातील पदाधिकारी आपापल्या गावात कर वसूल करीत असत व त्यातून गावाच्या गरजा पुऱ्या करीत असत. खर्च व उत्पन्न यांत जी तफावत असे, त्यात शिल्लक असल्यास राज्याच्या खजिन्यात जमा करीत व तूट असल्यास राज्याकडून कर्जांच्या रुपाने रक्कम घेतली जात असे.
आता उरली जकात वाटपाची समस्या, तर या बाबतीत आम्ही या आधी असे सांगितलेले आहे, की जकात निश्चितपणे रोख रकमेत अथवा असेल त्या स्वरुपात लोकात वाटली गेली पाहिजे, असे सिद्ध करणारे कोणतेही कलम आमच्या कायद्यात नाही. जकात गरिबांच्या शिक्षणासाठी, औषधासाठी व सामाजिक सुखसोईसाठीही खर्च केली जाऊ शकते व त्यातून जे वार्धक्यामुळे, अशक्तपणामुळे व अल्पवयामुळे कामे करण्यास विवश आहेत अशा गरजूंना रोख आर्थिक मदतही दिली जाऊ शकते.
आम्ही आपल्या देशात असे लहान लहान शासकीय घटक स्थापावे, जे राज्यात इस्लामी जगतात व जगाच्या सामूहिक व्यवस्थेत राहून आपल्या स्थानिक समस्या व आर्थिक बाबींची स्वतः देखरेख करुन स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यास जबाबदार होतील. असे आज जर इस्लामचे आर्थिक सिद्धान्त वर्तमान समाजात स्थापू इच्छिले तर त्या उद्देशाकरिता आम्हाला फार काही करावे लागणार नाही.

- सय्यद अबुल आला मौदूदी

    या पुस्तिकेत `पैगंबर मुहम्मद (स.) जीवन संदेश' जग प्रसिद्ध इस्लामी धर्म पंडित मौ. सय्यद अबुल आला मौदूदी यांचे एक भाषण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलेल्या आजच्या मानव पीढीला महान मार्गदर्शक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनादर्शाची नितांत आवश्यकता आहे.
    वाचकाने पूर्वग्रह दुषितपणा, संकुचितपणा व मानसिक गुलामी झुगारून पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जीवन संदेश समजण्यासाठी ही पुस्तिका लाभदायी आहे.
   
आयएमपीटी अ.क्र. 154      -पृष्ठे - 24    मूल्य - 16   आवृत्ती - 6 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/lzcqp08tgwu0s2rzj87rtnc1gtq13g5h


चर्चा करताना एक सज्जन उद्गारले, ‘तुम्ही अतिसंकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारे आहात.
‘का?’ मी विचारले.
‘तुम्ही ईश्वराचे अस्तित्वावर ईमान (विश्वास) बाळगता काय?’
‘निश्चितपणे.’
‘त्याची उपासना करता व रोजे (उपवास) करता काय?’
‘अगदी खरे.’
‘छान! मग माझे म्हणणे बरोबर आहे. तुम्ही संकुचित दृष्टीचे व जुन्या चाकोरीतून जाणारें आहात.’
त्यावर मी विचारले, ‘आम्ही संकुचित दृष्टीचे असून जुन्या चाकोरीतून जाणारे आहोत. हे तुम्ही कशावरुन म्हणू शकता?’
‘कारण ज्या गोष्टींवर तुम्ही श्रद्धा ठेवता त्या सर्वच्या सर्व अगदी निरर्थक बडबड व निराधार गोष्टी आहेत, त्यांना कसलीही वास्तवता व अस्तित्व नाही.’
मी विचारले, ‘तुम्ही कोणत्या गोष्टीवर ईमान (श्रद्धा) बाळगता?’
‘ही सृष्टी कोणी निर्माण केली आणि जीव व अस्तित्व कोणी प्रदान केले?’
‘निसर्गाने.’
‘पण निसर्ग म्हणजे काय?’
‘ती प्रकृतीची दडलेली व अमर्यांद अशी शक्ती आहे, जिचे ज्ञान आम्हाला ज्ञानेंद्रियामार्फत होते.’
यावर मी म्हटले, ‘तुम्ही मला अदृष्य शक्ती (ईश्वर) च्या आदेशाधीन होण्यापासून अडवून, मला त्यासदृष्य एका अनभिज्ञ व रहस्यमय शक्ती (प्रकृती) ची आज्ञापालन करणारा बनवू इच्छिता काय? पण प्रश्न असा आहे की ज्यामध्ये मला सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक सुख व समाधान तसेच शांती लाभते, त्याला सोडून शेवटी मी या तुमच्या खोट्या उपास्याकडे-प्रकृतीकडे कशाकरिता शरण जाऊ? ती माझी कोणतीही गरज भागवू शकत नाही की माझ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्याची तिच्यांत ताकद नाही?’
या संक्षिप्त संभाषणातून विचारस्वातंत्र्याचे प्रतिपादन करणाऱ्या प्रगतिवाद्यांच्या बुद्धीचा अंदाज सहज केला जाऊ शकतो. त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा अर्थ असा की इस्लामने आपल्या वास्तविक उपास्यापासून तोंड फिरवावे, पण हा नास्तिपणा असून त्याला विचारस्वातंत्र्य हे नाव कदापिही दिले जाऊ शकत नाही. जे विचारस्वातंत्र्य माणसाला नास्तिकपणाच्या ओटीत टाकते. तसले विचारस्वातंत्र्य, इस्लाम माणसांना देत नाही, असा हे लोक इस्लामवर आरोप करतात. पण प्रश्न असा आहे की विचारस्वातंत्र्य व निरीश्वरवाद वा नास्तिकपणा या दोहोंचा अर्थ एक आहे काय?
युरोपच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करताना हे सत्य ते विसरतात की युरोपातील काही परिस्थितीच्या कारणास्तव तेथे जर निरीश्वरवादाची वाढ झाली असली तरी त्यावरुन जगात सर्वत्र तशीच परिस्थिती असेल व त्याचप्रमाणे निरीश्वर्वाद व नास्तिकपणा वाढेल, असे हे लोक समजतात हीच खरी चूक आहे.
युरोपवासी लोकांसमोर चर्चने ख्रिश्चन धर्माचे जे विचार मांडले, वैज्ञानिक तथ्यांना खोटे ठरविण्याचा जो प्रयत्न केला व विज्ञान शास्त्राचा जो छळ केला; तसेच खोट्या व अंधविश्वासरुपी अंधकाराला ईशधर्म म्हणून जे नाव दिले, या सर्व गोष्टीचा एकंदर परिणाम असा झाला की स्वतंत्र विचारांचे युरोपतील विचारवंत निरीश्वरवादाच्या ओढ्यात जाऊन पडले. कारण त्यांच्या पुढे परस्परांविरुद्ध असलेले जे दोन दृष्टिकोन होते. त्यापैकी एकाचा स्वीकार करण्याखेरीज त्यांना कसलाही मार्ग उरला नव्हता. म्हणून त्यांनी ईश्वरावरील स्वाभाविक श्रद्धेच्या मार्गांचा त्याग करून विज्ञान आणि त्याने दिलेल्या गोष्टीवर श्रद्धा व विश्वास ठेवला. चर्चने युरोपला ज्या द्विधा अवस्थेत आणून सोडले होते त्यापासून काही अंशी सुटका करून घेण्याचा केवळ हाच मार्ग तेथील विचारवंताना दिसला. सारांश असा की चर्चच्या वर्चस्वापासून बाजूला झाल्याची घोषणा उघडपणे करताना त्यांनी म्हटले की, ‘ज्याच्या नावाने तुम्ही आम्हाला दास बनवून ठेऊ इच्छिता अशा ईश्वरापासून आम्ही दूर राहतो. आमच्यावर असह्य कर्तव्यांचे डोंगर लादता व आमची तडकाफडकी मुस्कटदाबी करुन दडपून ठेवता. तुमच्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा अर्थ असा होतो, की आम्ही जगाचा परित्याग करुन अरण्यात निर्जन ठिकाणी वास्तव्य करावे. आम्हाला असा ईश्वर व असे निवासस्थान नको आहे. त्याऐवजी आता आम्ही आमच्याकरिता एक नवीन ईश्वर बनवू, त्यात तुमच्या ईश्वराचे सर्व गुण असतील तरीही त्याच्याकडे आम्हाला गुलाम बनवून ठेवण्यासाठी, चर्चप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसेल. तसेच तो आमच्यावर कोणतीही नैतिक, आध्यात्मिक व भौतिक बंधने घालणार नाही, जी तुमच्या ईश्वराची ठळक वैशिष्ट्ये आहेत.’

माननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.)   (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा? (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार?)’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.)! मग  आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘याचे पठण करीत राहा- ‘हसबुनल्लाहु व निअमल-वकील.’ (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य  घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ‘‘जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल? सांगा,  आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.’’ पैगंबरांनी त्यांना सांगितले, ‘‘अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत  करणारे सफल होतील.’’

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, (अंतिम निवाड्याच्या दिवशी) एक दास अल्लाहच्या समोर येईल, अल्लाह त्याला विचारील, ‘‘हे  अमुक माणसा, मी तुला प्रतिष्ठा दिली नव्हती काय? तुला पत्नी दिली नव्हती काय? तुझ्या ताब्यात घोडे आणि उंट दिले नव्हते काय? आणि मी तुला अवधी दिला नव्हता काय? तू  तुझे राज्य चालवित होता आणि लोकांकडून कर वसूल करीत नव्हता काय?’’ तो त्या ईशदेणग्यांचा स्वीकार करील. मग अल्लाह त्याला विचारील, ‘‘तुला एक दिवस माझ्यासमोर हजर  व्हावे लागेल, असे तुला वाटत होते काय?’’ तो म्हणेल, ‘‘नाही.’’ मग अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘ज्याप्रकारे तू मला जगात विसरला होतास, तसेच आज मी तुला विसरेन.’’ मग असाच   एक दुसरा मनुष्य (अंतिम निवाड्याचा दिवस नाकारणारा) अल्लाहसमोर हजर होईल आणि त्यालादेखील वरीलप्रमाणे प्रश्न केले जातील. मग एक तिसरा मनुष्य हजर होईल आणि  अल्लाह त्यालाही तेच प्रश्न विचारील जे पूर्वीच्या दोन्ही मनुष्यांना (जे सत्य नाकारणारे होते) विचारले होते, तेव्हा हा तिसरा मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या! मी तुझ्यावर, तुझ्या ग्रंथावर आणि तुझ्या पैगंबरांवर ईमान बाळगले होते, मी नमाज (प्रार्थना) अदा करीत होतो, रोजे (उपवास) करीत होतो, तुझ्या मार्गात माझी संपत्ती खर्च करीत होतो.’’ (पैगंबर  मुहम्मद (स.) पुढे म्हणाले,) आणि अशाचप्रकारचे पूर्ण क्षमतेने आपले आणखीन अनेक पुण्यकर्म सांगेल, तेव्हा अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘थांब, पुरे झाले.’’ मग अल्लाह म्हणेल, ‘‘आम्ही  आता तुझ्याविरूद्ध साक्ष देणाराला बोलवितो.’’
तेव्हा तो आपल्या मनातल्या मनात विचार करील की माझ्याविरूद्ध साक्ष देणारा हा कोण असेल. मग त्याचे तोंड मोहोर लावून बंद केले जाईल. (कारण तो अल्लाहसमोरदेखील खोटे बोलायला मागेपुढे पाहणार नाही, ज्याप्रमाणे जगात पैगंबर आणि ईमानधारकांच्या समोर निर्लज्जपणे खोट्या पवित्रतेचा डांगोरा पिटत होता. मग त्याच्या मांड्या, मांस आणि हाडांना  विचारले जाईल तेव्हा ते सर्व त्या व्यक्तीची एक-एक लबाडी व्यवस्थितपणे सांगतील. मग अशाप्रकारे अल्लाह अनावश्यक संभाषणाचा दरवाजा बंद करील.’’
पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हा तोच मनुष्य आहे ज्याने जगात धर्मद्रोह केला आणि हा तोच मनुष्य आहे ज्यावर अल्लाहचा कोप झाला.’’ (हदीस : मुस्लिम)

जगाला सगळयात अगोदर लोकशाहीचा परिचय इस्लाम ने करुन दिला. त्यापुर्वी जगात सगळीकडे बादशाहात (राजेशाही) चाच अंमल होता. खलिफा म्हणतात सर्वशक्तिमान अल्लाहच्या नायबला. रशिद म्हणतात नेक (पुण्यवान/पवित्र) ला. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यानंतर झालेल्या चार खलिफांना खुलफा-ए-राशेदीन अर्थात अल्लाहचे चार पवित्र खलिफा असे म्हणतात. प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता. तसेच त्यांना मुलगा ही नव्हता म्हणून त्यांचा उत्तराधिकारी कोणाला नेमण्याचा प्रश्‍नच उद्भवत नव्हता. परंतु खुद्द प्रेषितांच्या तालमीत तयार झालेले सहाबा (साथीदार) रज़ि. यांनी ओळखले होते की इस्लाम शूराई निजाम  (सल्लागार मंडळाच्या व्यवस्थे)च्या माध्यमातून लोकप्रशासन करु इच्छितो. ज्याला अरबी भाषेमध्ये निजाम-ए-खिलाफत असे म्हणतात. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपल्या साथीदारांची मुल्यवान मते ऐकून घेवून त्यानुसार निर्णय घेतले होते. ते स्वत: साहब-ए-वही (अल्लाहकडून मार्गदर्शन प्राप्त करणारे) होते. त्यांच्या मनात आले असते तर सगळे निर्णय त्यांनी स्वत:च्या मर्जीने घेतले असते पण त्यांनी तसे केले नाही. यामुळेच सहाबांनी मजलिस-ए-शूरा (जानकार आणि पात्र व्यक्तिंचे सल्लागार मंडळा) च्या माध्यमातून प्रेषित (सल्ल.) यांच्या नंतर लागोपाठ चार खलिफांना निवडून दिले. म्हणूनच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर कुठल्याही घराणेशाहीला थारा देण्यात आला नाही. चारही खलिफा चार वेगवेगळया घराण्याचे होते. मजलिस-ए-शूरा एका नंतर एक खलिफा निवडून देत गेली व जनतेनी त्यांच्या हतावर बैत (एकनिष्ठतेची शपथ) केली. ह. अबु मुसा अशआरी रज़ि. यांनी म्हंटले आहे की खिलाफत ती आहे जिच्या स्थापनेमध्ये मश्‍वरा (सल्ला मसल्लत) केला जातो आणि बादशाहत ही तलवारीच्या जोरावर मिळविली जाते. खिलाफतचा आत्मा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात आहे जे की त्याकाळात नागरीकांना उपलब्ध होते.
    खलिफा देशाचा प्रशासकीय प्रमुख असल्यामुळे त्याच्याकडे असीमित अधिकार असतात. मात्र तो दोन गोष्टींनी बांधलेला असतो. एक कुरआन आणि हदीस, दोन मजलिस-ए-शूराचा सल्ला. आधुनिक लोकतंत्रात जनता सार्वभौम असते, इस्लामी लोकतंत्रात अल्लाह सार्वभौम असतो. कोणत्याही देशाची घटना त्या देशाचे बुध्दीमान लोक तयार करत असतात. इस्लामी देशांची घटना दस्तूरखुद्द सर्वशक्तिमान अल्लाह ने तयार केलेली आहे. त्या घटनेचे नाव कुरआन असे आहे. प्रत्येक देशाची घटना त्या-त्या देशाच्या नागरीकांना समर्पित असते. इस्लामची घटना (कुरआन) सर्व मानवतेला समर्पित आहे. इस्लामी इतिहासात एकूण चार खुलफाए-राशेदीन झाले आहेत. 1. ह. अबूबकर रज़ि. 2. ह. उमर रज़ि. 3. ह. उस्मान रज़ि. 4. ह. अली रज़ि. त्यांच्यानंतर कांही काळासाठी शूराने त्यांचे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रज़ि. यांना खलिफा म्हणून निवडले, मात्र तीव्र मतभेद झाल्याने व निष्पाप नागरीकांचे रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह.हसन रज़ि. यांनी स्वत:हून पदत्याग केला. त्यांच्यानंतर मात्र मजलिस-ए-शूराला डावलून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेच एक ज्येष्ठ सहकारी ह. अमीर मुआविया यांनी स्वत:ला खलिफा घोषित केले. मात्र त्यांना मजलीस-ए-शूराची मान्यता नसल्यामुळे इस्लामी इतिहासात त्यांची गणना खलिफा म्हणून नव्हे तर राजा म्हणून केली जाते. त्यांच्या स्वत:च्या राज्यरोहणांमुळे इस्लामी इतिहासाला एक नवे वळण मिळाले. इस्लामी राजनीति खिलाफतीच्या व्यवस्थेकडून मुलुकियती (राजेशाही) व्यवस्थेकडे वळली. ह.मुआवियाच्या पूर्वी चार ही खलिफा साधारण जीवन जगत होते, त्यांचे राहणीमान ही साधे होते, त्यांचे घर ही साधे होते, मात्र ह. अमीर मुआविया यांची जीवन पध्दती विलासी होती. त्यांनी स्वत:साठी एक मोठा राजप्रसाद ही बांधून घेतला होता. त्यांनी स्वत:हाच्या हयातीतच स्वत:च्या अपात्र मुलास ज्याचे नाव यजीद होते, त्यास आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलेले होते. त्यांनी वीस वर्ष राज्य केले. राजधानी मदीना येथून हलवून कुफा (इराक़) येथे नेली. त्यांच्या मृत्यू पश्‍चात त्यांचा मुलगा यजीद याला राजा करण्यात आले. त्याने चार वर्ष म्हणजे सन 680-84 पर्यंत राज्य केले.
करबलाची घटना
    यजीदच्या राज्यरोहणाचा विरोध मोठ्या प्रमाणात झाला. जनतेची आणि शूराची तीव्र इच्छा होती की प्रेषितांचे नातू ह. हुसैन रज़ि. यांना खलिफा म्हणून निवडण्यात यावे. हीच मागणी कुफावासियांनी केली. त्यांनी सरळ-सरळ ह. हुसैन रज़ि. यांच्याशी संपर्क साधून त्यांना कुफा येथे येऊन देशाची सूत्र हतात घेण्याची विनंती केली. त्यांना या कामी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी ही दिली. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून ह. हुसैन रजि. आपल्या खानदानातील 72 लोकांना सोबत घेऊन (ज्यात कांही महिला व मुले सुध्दा सामिल होती) कुफाकडे रवाना झाले. या घटनेची माहिती यजीदला मिळताच त्याने कुफावाल्यांना धमकी दिली. पुढाकार घेणार्‍यांना मृत्यू दंड देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यामुळे कुफावासी घाबरलेे व त्यांनी आपला निर्णय बदलला. त्याचवेळेस ह. हुसैन रज़ि. यांनी आपला एक दूत मुस्लिम बिन अक़िल यांना यजीदकडे पाठवले. यजीद ने त्यांचाही खून केला. इकडे फुरात नदीच्या किनार्‍यावर करबला नावाच्या मैदानात पोहचल्यावर यजीदच्या एका सरदारांने ज्याचे नाव इब्ने जियाद असे होते. ह. हुसैन आणि त्यांच्या सोबत्यांचा चार हजार सैनिकांसह घेराव केला. त्यांने ह. हुसैन रज़ि. यांच्याकडे यजीदला राजा स्वीकार करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र यजीद ज़ालिम (अत्याचारी) असल्यामुळे ह. हुसैन यांनी इब्ने जियादचा प्रस्ताव धुडकावला. तेव्हां इब्ने जियाद ने त्यांना युध्दाचे आवाहन केले. इकडे 72 लोक तिकडे 4 हजार सैनिक. हे एकतर्फी युध्द होते. पराभव डोळयांसमोर स्पष्ट दिसत होता. तरी पण पराक्रमी ह. हुसैन रज़ि. यांनी या विषम युध्दात उतरण्याचा निर्णय घेतला. युध्द सुरु झाले. 72 लोकांमधील सर्व पुरुष शहीद झाले. अपवाद फक्त ह. हुसैन रज़ि. यांचे पुत्र ह. जैनुल आबेदीन यांचा. ते आजारी असल्यामुळे व अंथरुणावर खिळून असल्यामुळे युध्दात सहभागी होऊ शकले नाही. इब्ने जियादने ह. हुसैन रज़ि. यांचे शीर कापून एका तबकात ठेवून यजीद कडे पाठवून दिले. ह्यानंतर हे युध्द संपले. या युध्दाची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया इस्लामी जगतात उठली. मक्का मदीना भागात हाहाकार माजला. ह. अब्दुल्लाह बिन जुबैर यांच्या नेतृत्वात लोक यजीदच्या विरुध्द युध्द करण्यासाठी सज्ज झाले. या उठावाची कल्पना यजीदला मिळताच त्याने एक मोठे लष्कर तिकडे रवाना केले. तेथे ही तुंबळ युध्द झाले. त्यात अनेक नागरीक मारले गेले. नेमक्या याच वेळेस यजीदचा मृत्यू झाला. लोकांचा राग पाहुन यजीदच्या मुलाने शहाणपण दाखवत सत्ता स्वीकारण्यास नकार दिला. शूराने ह. अब्दुल्लाह बिन जुबैर यांचीच खलिफा म्हणून निवड केली. करबलाच्या या विषम युध्दातून जगाला हा संदेश मिळाला की मुस्लिम हे अत्याचारी व्यवस्थेपुढे आपले बलिदान देण्यास तयार असतात मात्र ते त्या व्यवस्थेपुढे गुडघे टेकायला तयार नसतात. जर का तसे असते तर ह. हुसैन रज़ि. यांनी यजीदचा प्रस्ताव स्वीकारला असता व त्याच्या अत्याचारी शासनात एखादे मंत्रीपद घेऊन सूखात राहिले असते. मात्र त्यांनी असे न करता स्वत: व स्वत:च्या खानदानातील सर्वांची कुर्बानी यासाठी दिली की कयामत (प्रलय) पर्यंत हा संदेश जीवंत रहावा की मुस्लिम प्रसंगी आपला जीव सुध्दा देऊ शकतात परंतु अत्याचारी व्यवस्थेपुढे आपली मान कदापि झुकवत नाहीत. समस्त मुस्लिम जगतासाठी करबलाच्या ह्या घटनेचा संदेश फक्त संदेशच नसून एक प्रेरणेचे स्त्रोत आहे. रडण्याचा, छाती बडवून घेण्याचा, दुःखी होण्याचा विषय नाही तर हा अभिमानाचा विषय आहे. करबलाच्या या अभिमानास्पद घटनेची नोंद डॉ. इक्बाल यांनी खालीलप्रमाणे घेतलेली आहे - कहे दो गम-ए-हुसैन रजि. मनानेवालों से, मोमीन कभी शोहदा का मातम नहीं करते, है इश्क अपनी जान से ज्यादा आले हुसैन से, यूं सरे आम हम उनका तमाशा नहीं करते, रोएं वो जो मुन्कीर हैं शहादते हुसैन (रजि.) के, हम जिंदा व जावीद का मातम नहीं करते.

- फेरोजा तस्बीह -9764210789

जहां भी जाएगा रौशनी लुटाएगा
किसी चरा़ग का कोई मकां नहीं होता
वजूद अर्थात अस्तित्व, मानवी अस्तित्व एकमेकांसाठी कल्याणकारी असावयास हवा. प्रत्यक्षात मात्र माणसं एकमेकांना शक्य तेवढी हानी पोहोचवितांना दिसत आहेत, असे का होत आहे? या प्रश्‍नावर विचार केला तर असे लक्षात येते की, अशा माणसांनी आपल्या अस्तित्वाचा उद्देशच समजून घेतला नाही.
    माणसे आपल्या भविष्यातील असुरक्षिततेबाबत सतत विचार करत असतात. परंतु त्यांच्या लक्षात एवढी साधी गोष्ट येत नाही की, भविष्य वर्तमानात केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम असतो. तुम्ही वर्तमानामध्ये चांगले असाल तर तुमचे भविष्यही चांगले असेल. आणि वर्तमानात तुमची वर्तणूक चांगली नसेल तर भविष्यही चांगले नसणार. काहीही करून भविष्य सुरक्षित करण्याच्या नादामध्ये माणसे अनेकांच्या हक्कांचे हनन करून आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून समाजाचे फार मोठे नुकसान होत असते.
    भविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमानात योजना तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी लागते. नसेल तर अल्पावधीतच चांगली वागण्याची उरमी थंड पडते व चांगले वागणे बंद पडते. हेच वर्तन एखाद्या समाजाचे असेल तर तो समाज मागे पडतो. जो समाज आपल्या इतिहासाची खरी जाण ठेवत नाही तो समाज आपल्या भविष्याबद्दल खरी योजनाही तयार करू शकत नाही.
भारतात मुस्लिमांचे आगमन
    भारतात मुस्लिमांचे आगमन सुफी संतांच्या रूपाने झाले. तेव्हा भारतीय समाज जाती-पातीमध्ये विखुरलेला होता. वर्णव्यवस्थेमध्ये खालच्या वर्णातील लोक भरडले जात होते. समाजात अनेक अंधश्रद्धा होत्या. शिक्षण आणि     - (उर्वरित पान 2 वर)
संस्कृतीवर मुठभर लोकांची मक्तेदारी होती. निम्नवर्णीय लोक अनेक समस्यांना तोंड देत होते. समाजामध्ये प्रचंड विषमता होती. म्हणूनच सुफी संताच्या आगमनाचे तत्कालीन लोकांनी स्वागत केले. त्यांची साथ दिली. त्यांच्या समतामुलक विचारांनी ते भारावून गेले. मुस्लिमांनीही या देशाला स्वतःचा देश मानला व येथील लोकांना स्वतःचे लोक समजून या देशात ’लोकसेवा हीच ईश्‍वरसेवा’ या तत्वाप्रमाणे काम सुरू केले. सुफींच्या सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन विषमतेचे चटके झेलणारे स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये दाखल झाले. दुसर्‍या बाजूने मुस्लिम आक्रमणकार्‍यांनीसुद्धा येथे आल्यावर या देशाला स्वतःचा देश समजून या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या. सामाजिक सुधारणांबरोबर राजकीयदृष्ट्या देशाला एकसंघ करण्यामध्ये या मुस्लिम बादशहांनी मोलाची भूमिका बजावली. ते जरी अपरिचित होते तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे या देशाला एक व्यापारीपेठ न समजता, इथला माल न लुटता विकासाची कामे केली. न्यायाची स्थापना केली, अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या, अनेक किल्ले बांधले, स्थानिक लोकांशी रोटी-बेटी व्यवहार केला. तुकड्या-तुकड्यात विखुरलेल्या शेतीचे एकत्रिकरण केले. नहरी बांधून सिंचन व्यवस्था उभी केली. शेतमालाच्या विक्रीसाठी अनेक मंड्या उभ्या केल्या. व्यापार्‍यांसाठी व्यापारपेठा उभ्या केल्या. रस्ते बांधले, त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली. प्रवाशांसाठी मुसाफिरखाने बांधले. विहिरी खोदल्या आणि अल्पावधीतच या देशाला सोन्याची चिडिया बनवून टाकले. त्यांच्या अस्तित्वाने अवघा देश भारावून गेला. याच जुल्मी (?) बादशहांच्या काळात अनेक कलाकारांना राजाश्रय मिळाला. त्यामुळे कला आणि संस्कृतीचा विकास झाला. त्यांनीच गुजरातमध्ये कपड्यांच्या उद्योगाला चालना दिली. दिल्ली, लाहोर, आग्रा, हैद्राबाद, अहमदाबाद सारख्या शहरांना वैभव प्राप्त करून दिले. तुर्की आणि इराणमधून कारागीर बोलावून अनेक सुंदर इमारती बांधल्या. व्यापाराला उत्तेजन देऊन पूर्वेकडे चीन तर पश्‍चिमेकडे युरोपपर्यंत भारतीय मालाला लोकप्रियता मिळवून दिली.
    मुस्लिमांच्या या कल्याणकारी सेवांची दखल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरूंनीसुद्धा घेतली. ते म्हणतात, ”भारतात मुस्लिमांच्या आगमन व त्यांच्या इस्लामी श्रद्धेमुळे येथील समाजजीवन प्रभावित झाले. परदेशी आक्रमक किती जरी वाईट असले तरी त्यांनी एक फायदा जरूर केला. त्यांनी येथील लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण केले. त्यांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणला. त्यांना संकीर्ण विचारातून बाहेर पडण्यास मदत केली. त्यांच्या लक्षात आणून दिले की जग किती मोठे आहे. त्यांच्या आगमनाने भारतीय समाजजीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आले. त्यातल्या त्यात मुगलांच्या आगमनानंतर तर भारतीय जनमानस एकदम बदलून गेले. ते त्या काळात उच्च शिक्षण आणि सभ्यतेचे प्रतीक होते. त्यांनी त्या काळात भारतात सभ्यता आणि संस्कृतीचा विकास केला. जी की त्या काळात फक्त ईरानमध्ये होती. (संदर्भ ः डिस्कव्हरी ऑफ इंडिया पान क्र. 219).
    नेहरू म्हणतात, ”मुस्लिमांनी आमच्या संस्कृतीला श्रीमंत करून टाकले आणि आमच्या कायदा आणि सुव्यवस्थेला सामर्थ्यशाली बनविले. अनेक तुकड्यामध्ये विखुरलेल्या भारताला त्यांनी एकसंघ केले. या देशातील साहित्य आणि कलेच्या क्षेत्रामध्येही त्यांनी आपली छाप सोडलेली आहे.” (संदर्भ ः भारतीय मुस्लिम, पान क्र.30).
सद्य परिस्थितीत मुस्लिमांची भूमिका
    इंग्रजांच्या आक्रमनाबरोबर भारतात मुस्लिमांची जी पिछेहाट सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या साहबा रजि. यांच्या काळात मुस्लिमांनी जगाच्या एक तृतीयांश भूभागावर यासाठी राज्य प्रस्थापित नव्हते केले की ते केवळ मुस्लिम होते. ते मुस्लिम होण्याबरोबरच त्या काळातील सर्वात पुढारलेले लोक होते. त्या काळात असलेल्या ज्ञान आणि विज्ञान तसेच लष्करी शक्तीमध्ये जगात सर्वोत्कृष्ट होते.    
    इंग्रज ज्या वेळेस भारतात आले. त्यावेळेस त्यांनी सोबत बंदुका आणल्या. मुस्लिम मात्र तलवारी आणि भाल्याच्या भरोशावरच त्यांच्याशी लढत होते. स्पष्ट आहे मुस्लिमांना पराजय स्वीकारावा लागला. या जगात तोच समाज पुढे जातो जो श्रद्धेबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्येही प्रगती करतो. युरोपीय देशांनी आपल्या श्रद्धेचा बळी देऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती साध्य केेलेली आहे. मध्ययुगानंतर मात्र मुस्लिम या क्षेत्रात मागे पडलेले आहेत.
    आज परिस्थिती अशी आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये एकांगी प्रगती झालेली आहे. श्रद्धेच्या अभावामुळे मानवी जीवन विस्कळीत झालेले आहे. एकट्या अमेरिकेमध्ये रोज 100 लोकांचा मृत्यू बंदुकीतून झालेल्या गोळीबारातून हत्या आणि आत्महत्येच्या रूपाने होतो. अशी प्रगती मानवी जीवनाला अल्पावधीतच नष्ट करणारी प्रगती आहे. मुस्लिमांच्या बाबतीत एक गोष्ट समाधानकारक आहे ती म्हणजे बहुसंख्य मुस्लिमांनी आपली श्रद्धा प्राणपणाला लावून जपलेली आहे. त्यांना आवश्यकता आहे फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये झेप घेण्याची. एवढं त्यांनी केलं की ते पुन्हा महासत्ता बनू शकतील. कारण आज अमेरिका महासत्ता आहे. त्यापूर्वी ब्रिटन महासत्ता होती. त्यापूर्वी मुस्लिम देश महासत्ता होते. आज मुस्लिमांना पूनर्वैभव प्राप्त करावयाचे असल्यास आपल्या श्रद्धेच्या जपणुकीबरोबर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनवीन शाखांमध्ये प्रगती करावी लागेल.
    मुळात इस्लामी श्रद्धेच्या बाबतीतही अनेक मुस्लिम गफलतीमध्ये आहेत. त्यांनी इस्लामला स्वतःच्या वैयक्तिक जीवनापर्यंत सीमित करून टाकलेले आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. या युरोपमधून निघालेल्या लोकप्रिय घोषणेची आज बहुतेक मुस्लिम आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करत आहेत. वास्तविक पाहता इस्लाम फक्त वैयक्तिकच नव्हे तर सार्वजनिक जीवनातही उपयोगीच नव्हे तर एकमात्र यशस्वी जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. साधी गोष्ट आहे जो धर्म वैयक्तिक जीवनामध्ये उपयोगी आहे, तो सार्वजनिक जीवनामध्येही उपयोगी असणार. म्हणून आज मुस्लिमांना इस्लामला जो की काळाच्या कसोटीवर खरा उतरलेला आहे, आपल्या जीवनाचा आधार बनवायला हवा. इस्लामी ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून आपल्या नवीन पीढिची रचना करायला हवी. एका बाजूला स्वतःचा विकास तर दुसर्‍या बाजूला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचवायला हवा.
    आज देशात अनेक समूह असे आहेत ज्यांचा कुठलाही इतिहास नाही. कृत्रिम प्रतिके तयार करून ते त्यांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशात मुस्लिमांचा इतिहास सूर्यासारखा तेजस्वी आहे, याचा विसर पडता कामा नये. आपल्या इतिहासाकडून आत्मविश्‍वास प्राप्त करून भविष्याकडे वाटचाल केल्यास आपले अस्तित्व या देशामध्ये उपकारक राहील, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.
    अल्लाह पाक ने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सार्‍या जगासाठी कृपावंत म्हणून पाठवलेले होते. आपण त्याच कृपावंत प्रेषितांचे वारसदार आहोत. त्यांचे मिशन जगाच्या शेवटपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे. ते जगावर कृपावंत होते तर त्यांचे वारसदारही कृपावंतच असायला हवेत. या मूळ संकल्पनेचा भारतीय मुस्लिमांना विसर पडल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास रसातळाला गेलेला आहे. तो परत मिळविण्याची जबाबदारी उलेमा, मुस्लिम बुद्धीजीवी आणि मुस्लिम प्रेसची आहे. एकदा का मुस्लिमांना या देशाला घडविण्यामध्ये आपली ऐतिहासिक भूमिका आठवली की त्यांचा आत्मविश्‍वास आपोआप परत येईल. त्याची सांगड मजबूत इस्लामी श्रद्धेशी घालून हा समाज पुन्हा राखेतून फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे परत भरारी घेतोत्याप्रमाणे भरारी घेऊ शकेल व एका नवीन भारताच्या जडणघडणीमध्ये पुन्हा आपली भूमिका बजावू शकेल. या देशाला महासत्ता करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकेल, यात शंका नाही. शेवटी अल्लाकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! आम्हाला रास्त मार्ग दाखव आणि या देशाच्या सेवेसाठी आमचा पुन्हा स्वीकार कर. (आमीन.)

- एम. आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget