Latest Post

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या दरबारी एकदा माननीय अली(र.)हजर होते. एवढ्यात एक अत्यंत देखणी देहयष्टी, रुंद आणि उंच शरीर, सुंदर आणि बोलके डोळे असलेला एक तरुण आत येण्याची परवानगी मागत होता. त्यांचा आवाज ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) म्हणाले,
‘‘हे पवित्र आचरणाच्या तरुणा! तुमचे हार्दिक स्वागत असो.’’
हे तरुण ज्यांना स्वयं आदरणीय प्रेषितांनी ‘‘तय्यबुल मुतय्यिब’’(पवित्र आचरणाचा) या अति-प्रतिष्ठित शब्दांनी संबोधिले, हेच माननीय अम्मार बिन यासिर(र.)होत. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची गणना प्रेषितांच्या अतिशय लाडक्या सोबत्यांमध्ये होते. त्याचे पिता माननीय यासिर(र.)आणि माता सन्माननीय सुमैया(र.)यांनीदेखील इस्लाम स्वीकारला होता. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘अम्मार पिता यासिर पिता आमिर पिता मालिक पिता कनाना पिता कैस पिता अलहसीन पिता लूझीम पिता औफ पिता आमिरुल अकबर पिता याम पिता अनस.’’
माननीय अम्मार(र.)यांचे पिता माननीय यासिर(र.)हे ‘कहतानी’ वंशाचे असून ‘येमेन’ चे रहिवासी होते. ते आपल्या हरवलेल्या भावाच्या शोधार्थ ‘मक्का’ शहरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन बंधु ‘मालिक’ आणि ‘हारिस’ देखील होते. त्यांचा भाऊ मक्का शहरात त्यांना सापडला नाही. म्हणून त्यांचे बंधु ‘येमेन’ला परत गेले, परंतु माननीय यासिर मक्का शहरातच स्थायिक झाले. ही घटना प्रेषितजन्माच्या पांच वर्षापूर्वीची आहे. अबू हुजैफा यांनी माननीय यासिर(र.)यांचे लग्न ‘सुमैया’ नावाच्या मुलीशी केले. याच सन्माननीय सुमैया(र.)च्या पोटी अम्मार(र.)आणि अब्दुल्लाह(र.)ही दोन मुले जन्मली. काही काळानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामचा प्रचार सुरु केला आणि या संपूर्ण कुटुंबाने इस्लामचा स्वीकार केला.
‘सहीह बुखारी’ ग्रंथात आहे की, माननीय अम्मार(र.)यांनी व त्यांच्या परिवाराने अगदीच सुरुवातीच्या काळात इस्लाम स्वीकारला. हा काळ इतका कठीण होता की, इस्लामचे नाव घेणार्यास असीम यातना सहन कराव्या लागत असत. इस्लाम स्वीकारतेवेळेस यांचा परिवार अबू जहल या अत्यंत भयानक इस्लामद्रोह्याचे गुलाम होता. इस्लाम धर्माचे द्रोही आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांनासुद्धा आतोनात अमानवी यातना देत होते. या दोन मुले अर्थात अम्मार, अब्दुल्लाह आणि त्यांचे माता-पिता यासिर आणि सुमैया यांच्यावरसुद्धा खूप अमानवी अत्याचार करण्यात आले. माता सुमैया(र.)आणि पिता यासिर(र.)हे खूप वृद्ध होते. इस्लामद्रोह्यांनी केलेले असीम अत्याचार सोसूनही त्याचे पाय कधीच डगमगले नाहीत. वृद्ध असलेले यासिर(र.)शेवटी शत्रूंचे अत्याचार सहन करताना मृत्यू पावले आणि मग एके दिवशी ‘अबू जहल’ या इस्लामद्रोह्याने अतिशय वृद्ध असलेल्या सुमैया(र.)यांच्या गुप्तांगावर भाला मारून ठार केले. इस्लाम स्वीकारण्यावरून ईश्वरासाठी दिलेले हे इतिहासातील पहिले बलिदान होय. यानंतर अम्मार(र.)यांचे बंधु अब्दुल्लाह(र.)यांनासुद्धा क्रूरकर्मा ‘अबू जहल’ याने ठार केले. आता केवळ अम्मार बिन यासिर(र.)राहिले. त्यांना या घटनांचे अपार दुःख झाले. परंतु क्षणभरही त्यांनी इस्लामचा ध्यास सोडला नाही. माता, पिता आणि बंधुच्या हौतात्म्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचारांची शृंखला चालूच होती.
मदीनेस स्थलांतरापर्यंत माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांनी इस्लाम द्रोह्यांचे खूप छळ सोसले. दरम्यानच्या काळात अॅबीसीनियामध्ये ते काही काळ राहिले. माननीय अम्मार(र.)प्रेषित स्थलांतरपूर्वी एक महिन्यापूर्वी मदीनेस स्थलांतर केले. त्यांच्यासोबत आणखीन प्रेषितांचे पाच सोबती होते.
माननीय अम्मार(र.)यांनी आधी ‘कुबा’कडे स्थलांतर केले. तेथे माननीय मुबश्शिर(र.)यांनी त्यांना आश्रय देऊन त्यांचा पाहुणचार केला होता. नंतर आदरणीय प्रेषितांनीसुद्धा ‘कुबा’कडे स्थलांतर केले होते. त्यांनी तेथे ‘मस्जिद-ए-कुबा’ची आधारशिला ठेवली. इतर सोबत्यांप्रमाणे माननीय अम्मार(र.)यांनीदेखील या कामात मन लावून भाग घेतला. काही दिवसांनंतर माननीय अम्मार(र.)प्रेषितांसोबत मदीनेस आले. प्रेषितांनी त्यांना कायमस्वरुपी तेथे राहण्याकरिता जागा सुद्धा प्रदान केली.
माननीय अम्मार(र.)हे इस्लामचे शूर शिपाई होते. आदरणीय प्रेषितांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. अगदी ‘बदर’च्या युद्धापासून इस्लामचे अंतिम युद्ध म्हणजे ‘तबूक’पर्यंत प्रत्येक युद्धात ते प्रेषितांबरोबर प्राण पणाला लावून लढले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा त्यांच्या कार्य, प्रामाणिकतेची अगदी मनापासून कदर करीत असत.
एका युद्धाच्या वेळी लष्करप्रमुख खालिद बिन वलीद(र.)आणि अम्मार बिन यासिर(र.)यांच्यात मतभेद झाले. प्रेषितदरबारी आल्यावरसुद्धा खालिद बिन वलीद(र.)यांनी अम्मार बिन यासिर(र.)यांना खूप ठणकावले. तेव्हा अम्मार बिन यासिर(र.)प्रेषितांना म्हणाले, ‘‘हा माणूस आपल्या उपस्थितीतसुद्धा मला दरडावून बोलत आहे.’’ यावर आदरणीय प्रेषित खालिद बिन वलीद(र.)यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हे खालिद(र.)! तोंड बंद करा! जो अम्मारकरिता वाईट शब्द बोलतो, तो जणू ईश्वराविरुद्ध वाईट शब्द बोलतो. जो अम्मार यांचा द्वेष करतो, तो जणू ईश्वराचा द्वेष करतो आणि जो अम्मार यांचा अपमान करतो, तो जणू ईश्वराचा अपमान करतो!’’ आदरणीय प्रेषितांचे हे शब्द ऐकून माननीय खालिद बिन वलीद(र.)खूप घाबरले. त्यांनी अम्मार(र.)यांची माफी मागितली. माननीय खालिद बिन वलीद(र.)म्हणतात की, ‘‘तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. मी प्रेषितांना विनंती केली की, मी अम्मारची माफी मागितली आणि त्यांनी मला मनःपूर्वक माफ केले. म्हणून आपण ईशदरबारी माझ्या मोक्षाची प्रार्थना करावी.’’
माननीय अबू बकर(र.)यांचा इस्लामी खलीफा खूप आदर करीत असत. इस्लामचे दुसरे खलीफा माननीय उमर फारुक(र.)यांचेदेखील ते खूप जवळचे मित्र होते. एकदा कुरैश कबिल्याचे काही प्रतिष्ठित लोक माननीय अबू सुफयान(र.), माननीय हारिस(र.), माननीय सुहैल बिन अमरु(र.)हे माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे आलेले होते. एवढ्यात माननीय अम्मार(र.), माननीय बिलाल(र.)आणि माननीय सुहैब(र.)देखील माननीय उमर(र.)यांना भेटण्यासाठी आले, तेव्हा माननीय उमर फारुक(र.)यांनी प्रथम माननीय अम्मार(र.), बिलाल(र.)आणि सुहैब(र.)यांची भेट घेतली आणि मग माननीय अबू सुफयान(र.)यांना भेटले. हिजरी सन २० मध्ये माननीय उमर फारुक(र.)यांनी माननीय अम्मार(र.)यांची ‘कुफा’च्या राज्यपालपदी नेमणूक केली तेव्हा कुफावासीयांना उद्देशून ‘आदेशपत्र’ पाठविले,
‘‘कुफावासियांनो! मी तुमच्याकडे माननीय अम्मार(र.)यांना राज्यपालपदी पाठविले आणि माननीय इब्ने मसऊद(र.)यांना धर्मशिक्षक आणि मंत्रीपदी पाठविले आहे. हे दोघेजण आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे लाडके आणि बदरच्या युद्धात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळविलेले ज्येष्ठ सोबती आहेत. त्यांच्या आदेशांचे पालन करावे. इब्ने मसऊद(र.)यांना मी तुमच्या भागाच्या आर्थिक प्रकरणांची जवाबदारी पण सोपविली आहे. उस्मान बिन हारिस(र.)यांना पूर्व इराकचे भूमापन आणि महसुलाची जवाबदारी सोपविली आहे. माननीय अम्मार(र.)यांनी एक वर्ष, नऊ महिण्यांपर्यंत ‘कुफा’चे राज्यपालपद भूषविले.
माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. संपूर्ण आयुष्यभर इस्लामची सेवा करण्यात गेले त्यामुळे त्यांना स्वतःचे घर बांधण्याचीसुद्धा सवड मिळाली नाही. ते राज्यपालपदी असतानासुद्धा त्यांच्या राहणीमानात काहीच बदल झाला नाही. ते स्वतःची कामे स्वतःच करीत. बाजारात स्वतः जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून स्वतःच्या पाठीवर घेऊन येत. घरातील सर्व कामकाज स्वतःच करीत. पोषाखसुद्धा खूप साधा वापरीत. एखाद्या ठिकाणी फाटल्यास स्वतःच्या हाताने त्यात ठिगळ लावीत. ते अतिशय सौम्य स्वभावाचे होते. धैर्य आणि संयम त्यांच्या स्वभावात होता. कलह आणि भांडणतंट्यापासून ते खूप दूर असत. बदरच्या युद्धात त्यांचा एक कान तुटला होता. एकदा एक टवाळखोराने त्यांना चिडविण्यासाठी आरोळी मारली, ‘‘ए कानकाप्या!’’ माननीय अम्मार(र.)यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय प्रेमपूर्वक स्वरात म्हटले,
‘‘माझा हा कान इस्लामरक्षणार्थ कापण्यात आला व मला याचा अभिमान आहे!’’
त्यांचे माननीय अली(र.)यांच्यावर खूप प्रेम होते. त्यांना कोणी वाईट म्हटलेले ते खपवून घेत नसत. सत्यवचन बोलण्यात ते कोणासमोरही घाबरत नसत. ते प्रत्येक काम ईश्वराच्या प्रसन्नतेखातर करीत असत. सत्यासाठी ते आजीवन लढले.

allah
मनुष्याने स्वतः पूर्ण विचाराअंती निर्णय करावा व आपला मार्ग सुनिश्चित करावा की, तो अंतिम दिवशीच्या कोणत्या परिणामास मान्य करतो व त्याचा काय अंत होणार आहे?
आज संपूर्ण जग अत्यंत व्याकूळ आणि अनिश्चित अवस्थेत आहे. कोठेही शांतता दृष्टीस पडत नाही. जगाच्या विविध भागांत युद्धाचे ढग घोंघावत आहेत. युद्ध आणि आक्रमकता आग ओकीत आहे. अधिकारांचे हनन होत आहे. शक्तिशाली शक्तिहीनास आपल्या जोखडामध्ये बांधत आहे आणि शक्तिहीनाची याचना ऐकणारा कोणी नाही. चोहीकडे अन्याय व अत्याचारचे नग्न नृत्य सुरू आहे. आज अन्याय व अत्याचार व्यक्तीचेच नव्हे तर समाजाचे आचरण बनले आहे. नैतिकतेचे मापदंड जे मानवतेच्या गौरवाचे प्रतीक मानले जाते, ते आज पायदळी तुडविले जात आहे. प्रेम, बंधुता, निष्ठा, सहानुभूती, सत्य, सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा, तसेच वचनाचे पालन यापासून मनुष्याचे नाते संपुष्टात आले आहे. कधी एखादी चांगली गोष्ट नजरेस पडली तरी ती निष्ठा, निस्वार्थ भावना आणि शुभचितन यापासून रिक्त असते. स्वार्थ, सांप्रदायिक स्वार्थ या गोष्टींनी सुंदरता हिरावून घेतली आहे. चोहीकडे भ्रष्टाचार, चोरी, डकैती, लूटमार, रक्तपात सर्रास सुरू आहे. दारू व नशेच्या वस्तु यांचा वापर वाढत आहे. अश्लीलता, नग्नता ही एक सर्वमान्य बाब झाली आहे. ही बाब चोहीकडे विखुरलेली आहे. ही वाईट प्रवृत्ती वेषांतर करून, नवीन नाव धारण करून समोर येत आहे. गरीब लोक छोट्या स्तरावर तर श्रीमंत मोठ्या स्तरावर यामध्ये लिप्त आहेत. या वाईट प्रवृत्तींनी व्यक्तीच नव्हे तर समाज व राष्ट्र यांनासुद्धा गिळंकृत केले आहे. समस्यांचे निराकरण म्हणजे आतंकवाद, रक्तपात समजण्यात येत आहे. मनुष्य न्यायाच्या प्रती निराश होऊन भयभीत जीवन जगत आहे. ही परिस्थिती बदलण्याची त्याची इच्छा आहे, पण त्याचा मार्ग त्यास माहीत नाही.
या जगात जेव्हा काही वाद किवा बिघाड आढळला जो की आज आहे, त्याचे मूळ मनुष्याने स्वतःच्या निर्माणकर्त्यास विसरणे हे आहे. तो स्वतःला विनावेसनी उंटासारखा स्वतंत्र समजत आहे. तो जो काही विचार करतो तो निर्माणकर्त्यास विसरून. तो कोणतेही कार्य करतांना त्याचे भय मनात बाळगत नाही. परलोक ध्यासातच ही शक्ती आहे की, तो मनुष्यास ईशविमुखतेपासून मुक्ती व त्याच्या दुष्परिणामापासून सोडवू शकतो. अंतिम दिवसावरील विश्वास मनुष्याचे नाते निर्माणकर्त्याशी सशक्त व दृढ बनवतो. याचा अंदाज यावरून येतो की सर्वश्रेष्ठ मानव, अल्लाहचे प्रिय आज्ञाधारक प्रेषित मुहम्मद(स) यांना सांगितले जात आहे की,
‘‘सांगा, अल्लाहला सोडून मी इतर कोणाला आपला पालक बनवू काय? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. तो उपजीविका देतो, उपजीविका घेत नाही. सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की, सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी.(आणि सक्त सूचना देण्यात आली आहे की, कोणी अनेकेश्वरवादी होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस. सांगा, जर मी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की, एका मोठ्या(भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल. त्या दिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली आणि हेच स्पष्ट यश आहे.’’(कुरआन ६ : १४-१६)
निर्माणकर्त्यास विसरणार्याच्या समोर फक्त जग राहते. तो त्या बाबतीतच विचार करतो व युक्ती बनवतो. त्यासाठीच त्याचा संपूर्ण संघर्ष, संकल्पना व योजना असतात. त्यासाठी तो सर्व उचित आणि अनुचित साधनांचा उपयोग करतो. अत्याचार, छळ, कपट, असत्य, भ्रष्टाचार यासारख्या कोणत्याही मार्गाचा वापर करण्यास तो संकोच करत नाही. तो जगाच्या प्राप्तीसाठी हिंस्त्र पशु बनू शकतो. त्याच्याकडून चोरी, डकैती किवा लूटमार व हत्या हे सर्व संभावित आहे.
जगप्राप्ती हेच मनुष्याचे लक्ष्य ठरल्यास तो इच्छा व आकांक्षाचा दास होऊन जातो. ते त्यास जिथे वाटेल तिथे घेऊन जातात. तो पोटाची मागणी व वासनाप्रेरक गोष्टींच्या मागे धावत राहतो. यामध्ये कोणताही अडथळा त्यास सहन होत नाही. याच मार्गावर नग्नता, निर्लज्जता आणि अश्लीलता यांचा भडीमार असतो आणि मनुष्य यामध्ये प्रसन्नतापूर्वक पाशविक जीवन जगू लागतो.
अंतिम दिवसाचा विचारच त्यास जगाचा पुजारी होण्यापासून वाचवू शकतो. त्यासाठी ही बाब अत्यावश्यक आहे की, मनुष्याच्या मनात ही बाब बिबली गेली पाहिजे की, येथील जीवन अल्प आहे, येथील भोगविलास व त्याची सामग्री क्षणिक आहे. येथील सुख-चैन नाशवंत आणि येथील सर्व सुंदरता, आकर्षण हे क्षणिक आहे. याच्या विरुद्ध अंतिम दिवसानंतरचे जीवन शाश्वत व चिरकालीन आहे. तेथील प्रत्येक भेट पतनहीन व शाश्वत आहे. तेथील सुख-चैन आणि भोगविलास अमर्याद आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लालसा किवा अपयश याचे अस्तित्व नाही. तेथे सर्व मनोकामनापूर्तीची व्यवस्था आहे. तेथे सर्व उपलब्ध आहे, जे डोळ्यांनी कधी पाहिले नाही, कानांनी कधी ऐकले नाही आणि ज्याच्या सौंदर्याची कधी कोणी कल्पना केली नाही व करूही शकत नाही. ही धारणा जेव्हा बुद्धीच्या क्षितिजावर प्रकट होईल व त्याचा प्रकाश पसरेल तेव्हा आपोआप हे जग तुच्छ वाटेल, त्याचे सौंदर्य व आकर्षण संपुष्टात येईल. त्यापेक्षा भाबडा कोण असेल जो सर्वकाही माहीत असतांना या नाशवंत संसारापायी शाश्वत अंतिम जीवन सोडून देईल?
कुरआनमध्ये दोन्ही जीवनांचे चित्र असे रेखाटले आहे,
‘‘लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग निवडक घोडे, पशु आणि शेतजमिनी अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत. पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. त्यांना सांगा! यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते सांगू? जे लोक अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील. तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील आणि त्या अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर देखरेख ठेवतो.’’(कुरआन ३ : १४-१५)
कुरआन वारंवार आठवण करून देतो की, हे जग अर्थहीन आणि अस्थायी आहे. वस्तुतः विश्वास केवळ अंतिम दिवसावर आहे. याकरिता या नश्वर जगासाठी आपल्या परलोकाची विल्हेवाट लावली जाऊ नये, जे की शाश्वत नेहमी कायम राहणार आहे.
कुरआन म्हणतो की,
‘‘जे काही तुम्हा लोकांना दिले गेले आहे, ते केवळ जगाच्या क्षणभंगूर जीवनाचा सरंजाम आहे आणि जे काही अल्लाहपाशी आहे ते उत्तम आहे आणि सदैव राहणारेदेखील. ते त्या लोकांसाठी आहे ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि जे आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात.’’(कुरआन ४२: ३६)
हीच गोष्ट अन्य प्रकारे अशी आहे की,
‘‘जे काही तुमच्यापाशी आहे ते समाप्त होऊन जाणार आहे व जे काही अल्लाहजवळ आहे तेच बाकी राहणार आहे आणि आम्ही जरूर संयम बाळगणार्यांना त्याचे मोबदले त्यांच्या उत्तम कर्मानुसार देऊ.’’(कुरआन १६ : ९६)
अंतिम दिवसाची सफलता ही ‘‘महान सफलता’’ आणि तेथील असफलता ‘‘स्पष्ट तोटा’’ आहे. ती व्यक्ती सफल आहे जी ही ‘‘महान सफलता’’ प्राप्त करेल व ती अत्यंत तोट्यात आहे जी असफल होईल. तिच्यासाठी सफलतेचे सर्व मार्ग बंद होतील.
‘‘प्रत्येक जीवास मृत्युची चव चाखायची आहे. तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले अंतिम दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’(कुरआन ३ : १८५)
त्या दिवशी सफल होणार्यांशी असफलांच्या बाबतीत असे सांगितले जाईल की,
‘‘आणि वजन त्या दिवशी अगदी बरोबर असेल. ज्यांचे पारडे जड असेल तेच सफलता प्राप्त करणारे असतील आणि ज्यांचे पारडे हलके असेल तेच स्वतःला नुकसानीत टाकणारे असतील, कारण ते आमच्या संकेतवचनांशी अत्याचारी वर्तन करीत राहिले होते.’’(कुरआन ७ : ८-९)
हेच खरे सत्य आहे जे की नेहमी समोर असावयास हवे. याचा विसर पडल्यास अंतिम दिवसाची शाश्वत सफलतेची संभावना समाप्त होते आणि केवळ असफलताच शिल्लक राहते.
आजच्या जगातील विकृतीस सतत नवनवीन कायदे करून संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु विकृती(बिघाड) कायद्यांद्वारा संपविला जाऊ शकत नाही. कायदा प्रेम, सहानुभूती आणि निष्ठा निर्माण करू शकत नाही. याद्वारे मन जोडले जाऊ शकत नाही. न्यायाच्या स्थापनेसाठी कायद्याची मदत होऊ शकते, पण त्याद्वारे अन्याय व अत्याचार पूर्णतः समाप्त केला जाऊ शकत नाही. कारण मनुष्य जगातील प्रत्येक कायद्याचे उल्लंघन करण्याचे उपाय शोधू शकतो व त्यापासून मुक्तीचे पर्याय काढू शकतो. सत्य बाब तर ही आहे की, जगातील विकृती आणि वाद याचे निराकरण यामध्येच आहे की, मनुष्याच्या मनामध्ये अंतिम दिवसावर पूर्ण विश्वास असावा व तो सतत त्याच्या मनात तरंगत असावा. त्याला परलोक ध्यास असावा. त्याने या सत्याचा स्वीकार केला पाहिजे की, तो निर्माणकर्त्याचा आज्ञाधारक आहे. त्याचे आज्ञापालन त्यास बंधनकारक आहे. त्याने त्याच्या आज्ञेचे पालन केले, तर तो अल्लाहच्या कृपेस पात्र राहील व त्याच्या बक्षिसांनी अलंकृत होईल. जर त्याने अवज्ञा केली तर तो जगात त्याच्या शिक्षेपासून वाचून जाईल, पण अंतिम दिवशी यापासून वाचणार नाही. त्या ठिकाणी त्यास आपल्या करणीची शिक्षा भोगावीच लागेल. या धारणांचा प्रभाव व त्यामुळे मनुष्याचे आचरण, व्यवहार यामध्ये होणारी क्रांती याचे उदाहरण इतिहासात सुरक्षित आहेत. आज पण त्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते.
हा एक अशा लोकसमूहाचा इतिहास आहे ज्याच्याकडे हत्या आणि रक्तपात, चोरी आणि डकैत, व्याभिचार, दुष्कर्म, दारू पिणे, जुगार खेळणे यासारखे अपराध सर्वमान्य होते. निर्माणकर्ता प्रभुच्या आणि अंतिम दिवसाच्या भयाने त्या लोकसमूहाचा कायापालट करून टाकला. त्या लोकसमूहाने या अपराधांपासून अशा रीतीने क्षमायाचना केली की, त्याकडे फिरकून पाहणेसुद्धा मान्य केले नाही. त्यांच्याकडे जीव, वित्त आणि अब्रू याविषयी सन्मान निर्माण झाला आणि पाहता पाहता पवित्रता, स्वच्छता, विश्वासू ठेवीदार, सत्य तसेच नशा निर्माण करणार्या वस्तूंचे पथ्य यासारखे सद्गुण निर्माण झाले. अपराधांचे प्रमाण इतके कमी झाले की, प्रेषित मुहम्मद(स) आणि चार आदर्श खलीफा यांच्या काळात त्याचे तुरळक उदाहरण आढळते. संपूर्ण समाज सुरक्षित व शांत आढळून येतो. मग हाच विखुरलेला लोकसमुदाय कोणाच्या कायद्याच्या बंधनात अडकणे अशक्य होते. परंतु त्या कायद्याचा एवढा सन्मान करणारा बनला की, तसे उदाहरण मानवी इतिहासात मिळत नाही. अंतिम दिवसाच्या यातनांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यासमोर शरणागती पत्करणे आणि स्वतःचा जीव देणे त्यांच्यासाठी सहज झाले. ही गोष्ट खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते.
प्रेषित मुहम्मद(स) मस्जिदमध्ये बसलेले आहेत. त्याच वेळी माननीय माइज बिन मलिक(र) त्यांच्या सेवेत हजर होतात व विचारतात की, ‘‘हे प्रेषित! माझ्याकडून व्याभिचारसारखा गुन्हा घडला आहे. मला पापमुक्त करा!’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांच्याकडून आपले तोंड फिरवून घेतले. त्या व्यक्तीने समोर येऊन आपली गोष्ट पुन्हा सांगितली. प्रेषितांनी त्या बाजूनेही आपले तोंड फिरवून घेतले. पुन्हा ती व्यक्ती त्या बाजुला पोहचली. या प्रकारे त्या व्यक्तीने चार वेळेस आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यावर प्रेषित म्हणाले,
‘‘कदाचित तुम्ही चुंबन घेतले असेल किवा डोळ्यांनी इशारा केला असेल किवा पाहिले असेल व त्यास व्याभिचार समजत आहात!’’ त्या व्यक्तीने सांगितले की, ‘‘नाही, असे नव्हे तर मी प्रत्यक्षात व्याभिचार केला आहे. आपण मला पापमुक्त करावे.’’ प्रेषितांनी आपल्या सहकार्यांद्वारे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून ही माहिती घेतली की, ही व्यक्ती वेडी तर नाही ना? माहीत झाले की, ती वेडी नाही. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘याने दारू तर प्राशन केली नाही ना?’’ एका व्यक्तीने तिच्याजवळ जाऊन वास घेतला. तिच्यापासून दारूचा गंध येत नव्हता. प्रेषितांनी विचारले की, ‘‘तुमचे लग्न झाले आहे का?’’ त्याने सांगितले ‘‘होय.’’
माईजच्या मृत्युनंतर कोणी म्हणे की, ही व्यक्ती स्वतःच्या वाईट कृत्यामुळे मारली गेली, तर कोणी तिच्या प्रायश्चित्ताची प्रशंसा केली. दोन-तीन दिवस यावर चर्चा होत राहिली. त्यावर विचार प्रकट होत राहिले. त्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) आपल्या सहकार्यांच्या सभेत आले आणि सांगितले की, ‘‘माईजसाठी मुक्तीची प्रार्थना करा, त्याने असे प्रायश्चित्त केले आहे जे की, सर्व समाजात वाटप केले तर ते सर्वांसाठी पुरेसे होईल.’’(हदीस मुस्लिम)
याच प्रकारे ग्रामीण समुदायाची एक स्त्री प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन निवेदन करते की, ‘‘मला पापमुक्त करा.’’ प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले, ‘‘तुझे वाईट होओ! जा ईश्वराशी क्षमा माग आणि प्रायश्चित्त कर.’’ तिने सांगितले, ‘‘कदाचित आपण मलाही त्याच प्रकारे परतवीत आहात ज्या प्रकारे सुरुवातीला माइजला परतविले होते किवा आपणास वाटते की, मी भविष्यात आपल्या जबानीचा अस्वीकार करीन. माझी तर गर्भधारणाही झाली आहे.’’ प्रेषित म्हणाले, ‘‘ठीक आहे जा, बाळाच्या जन्माची प्रतीक्षा कर.’’
एका व्यक्तीने त्या बाळाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. बाळाच्या जन्मानंतर त्याची सूचना त्या व्यक्तीने प्रेषितांना दिली की, गर्भवती स्त्रीचे बाळ जन्मले आहे. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘आम्ही तिला मृत्यदंड करावा आणि त्याच्या छोट्या बाळास अशा परिस्थितीत सोडून द्यावे की, त्यास दूध पाजणारा कोणी नसावा, असे होऊ शकत नाही. ‘‘एका व्यक्तीने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! त्यास दूध पाजण्याची जबाबदारी मी स्वीकारतो.’’
हदीस कथन आहे की, प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या स्त्रीस सांगितले की, ‘‘जा त्या बाळाच्या दूध पिण्याच्या वयापर्यंत त्यास दूध पाज.’’ सरतेशेवटी बाळाचे दूध सुटल्यानंतर ती त्या बाळास घेऊन आली. बाळाच्या हातात भाकरीचा तुकडा होता. तिने सांगितले की, ‘‘हे प्रेषित! बाळाने दूध सोडून दिले आहे. तो जेवू लागला आहे.’’ प्रेषितांनी त्या बाळास एका व्यक्तीकडे सुपूर्द करून तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली.
त्या स्त्रीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना माननीय खालिद बिन वलीद(र) यांच्या तोंडावर रक्ताचे शितोळे उडाले तेव्हा त्यांच्या तोंडून तिच्या विरोधात काही अपशब्द निघाले. हे ऐकल्यानंतर प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की, ‘‘खालिद! थांबा! उताविळेपणामध्ये चुकीचे बोलू नका. या स्त्रीने असे प्रायश्चित्त केले आहे की, अत्याचारपूर्वक महसूल वसूल करणार्या प्रशासकाने असे प्रायश्चित्त केले तर त्याची मुक्ती होईल.’’ एका प्रचलनात आहे की, माननीय उमर(र) यांनी प्रेषित मुहम्मद(स) समोर निवेदन केले की, तुम्ही एका दुराचारी स्त्रीच्या अंतिम नमाजमध्ये भाग घ्याल काय? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘तिने तर असे प्रायश्चित्त केले आहे की, ते जर मदीनेतील सत्तर लोकांमध्ये वितरीत केले तर ते त्या सर्वांच्या मुक्तीसाठी परिपूर्ण होईल. यापेक्षा मोठे प्रायश्चित्त काय असू शकते की, तिने आपले प्राण समर्पित केले.’’(हदीस मुस्लिम)
माननीय उम्मे सलमा(र) निवेदन सादर करतात की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समोर दोन व्यक्तींच्या वारसाहक्कासंबंधी प्रकरण आले. दोघांचे म्हणणे होते आपल्याला ही वस्तू वारसाने मिळावी. परंतु दोघांकडे त्यासंबंधी पुरावा नव्हता. प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे होऊ शकते की, आपल्यापैकी कोणी एक आपल्या वाकचार्तुयाने ती वस्तु आपली आहे हे सिद्ध करून देईल. पण लक्षात ठेवा की, मी त्याच्या बाजुने निर्णय देईन आणि त्याच्या भावाच्या वाट्याचा वस्तुचा भाग त्याला देऊन टाकीन. तर नरकाचा भाग त्याच्या स्वाधीन करीत आहे.’’ हे ऐकून दोघे सांगू लागले की, ‘‘हे प्रेषित! मी माझा अधिकार सोडून देत आहे. माझा वाटा माझ्या सोबत्याचा आहे.’’ प्रेषितांनी सांगितले की, ‘‘असे नका करू, तर तुम्ही दोघे जा आणि ती वस्तू आपसात वाटून घ्या आणि सत्य व न्याय याची आठवण ठेवा आणि मग वाटा करून एक एक भाग घेऊन टाका. त्यामध्ये काही कमी-जास्त झाल्यास तो परस्परांना वैध घोषित करा.’’(हदीस : अबू दाऊद)
अशा प्रकारच्या भरपूर घटना हदीस आणि इतिहास पुस्तकात नमूद आहेत, ज्या हे सिद्ध करतात की, अंतिम दिवसाची विचारपूस व त्यानुसार दंड किवा पुरस्कार याचे भय मनुष्याच्या मनात कायद्याचा आदर निर्माण करते. याशिवाय कायदा फक्त कायद्याची शोभा वाढवेल. पण व्यक्ती स्वतःस कायद्यास समर्पित करणे किवा त्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर पाडून घेऊ शकणार नाही. कायद्याचे पालन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कायद्याच्या उल्लंघनापासून रोखले जाऊ शकत नाही. कायद्याद्वारा कायद्याचे राज्य निर्माण झाले नाही आणि भविष्यातही होणार नाही.
हेच भय आणि अंतिम दिवसाची पकड यामुळे माननीय उमर(र) यांच्यासारखा न्यायनिष्ठ आणि ईशपरायण शासकसुद्धा अल्लाहच्या कोपाच्या भीतीने कंपित होत असे. एकदा प्रेषित मुहम्मद(स) यांचे सहकारी अबु मूसा अशअरी(र) यांनी माननीय उमर(र) यांच्याकडे मोबदला व पुण्य याबाबत विचारणा केली. यावर उमर(र) म्हणाले की, ‘‘मी अल्लाहपाशी बरोबरीत जरी सुटलो तरी भरपूर आहे.’’(हदीस बुखारी) माननीय अनस(र) म्हणतात की, माननीय उमर(र) एका बागेत गेले. त्यांच्या आणि माझ्या दरम्यान एका भितीचा आडोसा होता. मी ऐकले की, ते बागेत एकांतात सांगत होते की, ‘‘उमर बिन खत्ताब! तुम्ही मुस्लिमांचे शासक आहात! फार चांगले, फार चांगले! ईश्वराशपथ तुम्हाला निश्चित त्याचे भय बाळगून वागावे लागेल अन्यथा तो तुम्हाला दंडीत करेल.(हदीस मुवत्ता इमाम मालिक)
अंतिम दिवसाची ही भावना सर्व व्यक्तींमध्ये जागृत झाल्यास मनुष्याच्या आचार-विचार, चारित्र्य आणि संपूर्ण जीवनावर त्याचे परिणाम दिसू लागतील. त्याच्या प्रकाशाने जीवनाचे प्रत्येक अंग तेजोमय होईल. मनुष्याचा अल्लाहशी वास्तविक संबंध प्रस्थापित होईल. त्याच्या मनास शांती प्राप्त होईल. मनुष्याचे मनुष्यावरील शासन समाप्त होईल. चोहीकडे अल्लाहचे कायदे प्रस्थापित होतील. कायद्याचे उल्लंघन किवा त्याचा अनादर संपुष्टात येईल. कोणतेही कृत्य करण्यापूर्वी मनुष्य एकदा नव्हे तर हजारदा विचार करेल की, ‘‘मृत्यु माझ्या शिरावर उभा आहे आणि अंतिम दिवस जवळच आहे. मला खूप लवकरच जगाच्या निर्माणकर्त्यासमोर उपस्थित होऊन आपल्या कर्माचा अहवाल सादर करावयाचा आहे.’’ याच धारणेमुळे जगाची दिशा बदलून जाईल. जग अन्याय, अत्याचार, दंगली यांपासून मुक्त होईल. मनुष्याच्या सर्व आवश्यक गरजा कोणाचेही हक्क न हिरावता पूर्ण होतील. चोहीकडे शांतता प्रस्थापित होईल. चांगल्या गोष्टीचा प्रसार होईल तर वाईट गोष्टी संपुष्टात येतील आणि गुन्हेगारी जगत मोडीत निघेल. पुण्याईचा सदाबहार ऋतु येईल. नैतिकतेचे चलन वाढेल. अनैतिकता संपुष्टात येऊन मनुष्यास त्याची लाज वाटेल. असे हे नवीन जग किती सुंदर आणि विलोभनीय असेल!

इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
इस्लाम कसा माणूस घडवितो?
माणसाला सज्जन करण्यासाठी इस्लामपेक्षा अधिक चांगली कोणतीही जीवन व्यवस्था नाही. इस्लाम माणसाला त्याचे अचूक स्थान दाखवून देतो, त्याच्या महानतेचे रहस्य त्याला उलगडून दाखवितो, त्याच्या जबाबदारीची त्याला आठवण करून देतो आणि त्याच्यातील चेतना जागृत करतो. त्याला या गोष्टीची आठवण करून देतो की विशिष्ट उद्दिष्टासाठी त्याला जन्माला घातले गेले आहे. त्याला निरर्थक जन्माला घातले गेले नाही. या जगातील जीवन सुख-विलासासाठी नाही. आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशेब आपल्या स्वामीला द्यावा लागणार आहे. तेथे नीट विचार करून प्रत्येक कृती करायला हवी.
आमच्या येथील कृत्यामुळे समाजात सुगंधही पसरू शकतो आणि दुष्कृत्यांमुळे हे जीवन एक शापही ठरू शकते. इस्लाम जो माणूस घडवितो तो इतरांचा आदर करणारा, सत्यावर अढळपणे राहाणारा, आपल्या वचनांचे पालन करणारा, दुर्बलांचा त्राता व आश्रयदाता बनणारा आणि सत्कृत्यात नेहमी पुढाकार घेणारा असतो. तो स्वतःही दुष्कृत्यांपासून दूर राहातो आणि इतरांनाही तो दुष्कृत्यांपासून रोखत असतो. इस्लामी आदर्शाच्या मुशीतून बाहेर पडलेला माणूस सदाचाराचे प्रतीक व दुराचाराचा शत्रू असतो.
शेवटची गोष्ट
इस्लामच्या या संक्षिप्त परिचयाने, त्याचा अर्थ व जीवनाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्या समोर येतो. धर्म पुरातन काळापासून आहे, हे तथ्यही स्पष्ट होते. ईश्वराने जेव्हा जेव्हा आपले प्रेषित धाडले, तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोचविला. सर्व ईश्वरी ग्रंथांपैकी फक्त कुरआनच आपल्यापाशी शाबूत व सुरक्षित आहे. तसेच सर्व धर्मगुरुंपैकी केवळ मुहम्मद(स.) चे जीवन चरित्र सविस्तरपणे आमच्यापाशी आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणाला अशी धाव घेतली पाहिजे, जशी एखाद्या हरवलेल्या व नंतर सापडलेल्या वस्तूकडे आपण आकर्षिले जातो. सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळू शकते, पण आपण परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. शेवटी प्रेषित युसुफ(अ.) ची गोष्ट सांगून माझे मनोगत संपवू इच्छितो, ती गोष्ट त्यांनी बंदिवासात आपल्या साथीदारांना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते.
ईश्वराशी कोणाला भागिदार ठरविणे, हे आपले काम नव्हे. खरे तर ईश्वराची आम्हांवर व सर्व लोकांवर मोठी कृपा आहे(की त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही दास आम्हाला केले नाही.) परंतु अधिकांश माणसे कृतज्ञता दर्शवीत नाहीत. हे तुरुंगातील सोबत्यांनो! तुम्ही स्वतःच विचार करा, भिन्न भिन्न अनेक स्वामी चांगले आहेत की एकच स्वामी, ज्याचे सर्वांवर प्रभुत्व आहे, तो अधिक चांगला आहे? त्याला सोडून तुम्ही ज्यांचे दास्यत्व करीत आहात, ज्यांना तुमच्या पूर्वजांनी नावे दिली आहेत; या शिवाय त्याचे महत्व दुसरे काहीच नाही. आणि अल्लाहने त्यासाठी कसलीही सनद पाठविलेली नाही. शासन करण्याची सत्ता अल्लाहखेरीज अन्य कोणाच्याही हाती नाही. खुद्द त्याचाच आदेश आहे की त्याच्याखेरीज तुम्ही अन्य कोणाचेही दास्यत्व करू नये. हीच थेट व सरळ जीवनप्रणाली आहे, परंतु अधिकांश हे तथ्य जाणत नाहीत.- सूरह : अल् युसुफ - ३८ ते ४०

- वहिदुद्दीन खान

भाषांतर
सलीम अ. अज़ीज़ बुकसेलर


जग हे एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्यासमोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा प्रत्येक शब्द बोलत आहे की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
सदर प्रश्नांना आपण मोजक्या शब्दांमध्ये 'अंतिम सत्याचा शोध' म्हणून संबोधू शकतो, परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बऱ्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा अनेक प्रश्नांचे विवेचन या पुस्तकात केले आहे


आयएमपीटी अ.क्र. 158    -पृष्ठे - 40    मूल्य -16      आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xvic399wh5bszve8ummtrmdbhbtf7bo7

दापोडी (वकारअहमद अलीम)-
इस्लामचे अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (स.) हे समस्त जगवासियांचे आदर्श आहेत. त्यांचे आचार, विचार व मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे ‘दीन’ (इस्लामी जीवनपद्धत) चा ठोस  पाया आहे. आधुनिक शिक्षणाने तुम्ही डॉक्टर, इंजीनियर वा इतर उच्चपदावर जाऊ शकता. परंतु त्या अगदोर तुम्ही सर्वोत्तम मुसलमान बना. यामुळेच भौतिक जगात व पारलौकिक  जगात तुम्ही यशस्वी व्हाल, असे भावपूर्ण उद्गार प्रा. अझहरअली वारसी यांनी येथे व्यक्त केले. रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील  ‘इकरा इंग्लिश मेडियम स्कूल’ येथे जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र अंतर्गत येथे नवीन विभाग सुरू करण्यात आला, त्याच्या शुभारंभानिमित्त येथे ‘स्टडी सर्कल’ (चिल्ड्रन सर्कल) चे  आयोजन करण्यात आले होते. इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्याथ्र्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूना कॉलेजचे रसायनशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. वारसी हे  बोलत होते.
इकरा इंग्लीश स्कूलचे चेअरमन मौलाना उबेर काझी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पुण्याचे अध्यक्ष रिझवान खान, जमाअतचे  पिंपरीचे स्थानिक अध्यक्ष फेरोज खान, जमाअतचे पुणे विभागाचे सचिव तजम्मुल खान, पूना कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख, जमाअतच्या आकुर्डी शाखेचे सदस्य म. सलीम मुजावर   आणि इकरा स्कूलचे सचिव म. सलीम शेख, मौलाना अब्दुल मजीद आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
जमाअतच्या नवनिर्मित दापोडी शाखेचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन शेख यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की वय १४ पर्यंतच्या मुलांमध्ये इस्लामी  जीवनपद्धतीसंबंधी जागृती निर्माण करणे,शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, अंतिम प्रेषितांचा ज्ञानार्जनासंबंधीचा दृष्टिकोन विद्याथ्र्यांमध्ये आणणे हेच स्टडी सर्कलचे उद्दिष्ट आहे. याद्वारे आईवडिलांची आज्ञाधारकता, शारीरिक व सार्वजनिक स्वच्छता, अपायकारक वस्तूंपासून दूर राहाणे, आदि आदर्श मूल्यांची जोपासना मुलांमध्ये करण्यात येणार आहे. तसेच  शालेय स्पर्धा, खेळ इत्यादींमध्ये सहभागी होणे आणि त्याद्वारे निश्चित ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तयारी करवून घेणे, नमाज वेळेवर अदा करणे, उच्च चारित्र्य निर्माण करण्याचा  उद्देश असून दर रविवारी केवळ इकरा स्कूलचेच नव्हे तर सबंध दापोडी परिसरातील १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन जमाअतच्या स्थानिक शाखेतर्फे करण्यात
येणार असल्याची माहिती अजीमोद्दीन शेख यांनी या वेळी दिली.
इकरा इंग्लीश स्कूलचे सचिव म. सलीम शेख यांनी ‘स्टडी सर्कल’ उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले की स्टडीमुळे मुलांमध्ये मूलगामी बदल होणार आहेत. आमच्या शाळेतील उपस्थित विद्याथ्र्यांमधील नैतिक, चारित्र्यात्मक बदल पाहून परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्टडी सर्कलमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील, असा   आशावादही शेख यांनी व्यक्त केला.
लहान मुलांना समजेल व उमजेल अशा अत्यंत सोप्या व रसाळ भाषेत मार्गदर्शन करताना प्रा. वारसी यांनी थेट संवाद साधला. ह. मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून प्रेषित्वाची  शुभसूचना मिळाली. प्रेषितांनी आपल्या घराण्यातील सर्वांना एकत्रित करून याची उद्घोषणा केली. पण एकानेही प्रेषितांचे म्हणणे मान्य केले नाही. पण प्रेषितांच्या काकांचा ११ वर्षांचा  मुलाग उठून उभा राहिला. वडीलधाऱ्यांसमोर उभारताना त्याचे पाय लटपटू लागले. पण... निश्चय पर्वतासमान. त्याने निर्भीडपणे सांगितले, हे प्रेषिता! आपण अल्लाहचे सच्चे प्रेषित आहात. मी त्यावर श्रद्धा ठेवतो. मी इस्लाम स्वीकारून माझे आचरण आपल्या आदेशानुसार करीन. इतिहासात त्या मुलाचे नाव अजरामर झाले. तेच इस्लामचे चौथे खलीफा ह. अली  (रजि.) होत. प्रेषितांचे ते जावईही झाले.
ही दृढनिश्चयता स्टडी सर्कलद्वारे जमाअत मुलांमध्ये आणू इच्छिते. त्यासाठी प्रत्येक रविवारी विविध विभागांतील तज्ज्ञ मंडळी येतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील. येणाऱ्या  काळात समाजाचे नेतृत्व यामधूनच फुलू लागेल, असा विश्वासही प्रा. वारसी यांनी व्यक्त केला.
एस.आय.ओ.चे अध्यक्ष रिझवान खान यांनीही आपले विचार व्यक्त केले. मौ. उबेर काझी यांच्या अध्यक्षीय समारोपानंतर वकारअहमद अलीम यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात सुश्राव्य कुरआन पठणाने झाली. अजीमोद्दीन शेख यांनी अत्यंत सूचकतेने सूत्रसंचालन केले. शेवटी मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनंदिन जीवनात कित्येकदा अशी परिस्थिती निर्माण होते की निर्णय घेणे फार अवघड जाते. दोन पर्याय समोर असतात आणि त्यांचे दोन परिणामही डोळ्यांसमोर दिसू लागतात. हे  करावे की ते करावे? असा प्रश्न पडतो. अशा वेळी इतरांशीही सल्लामसलत करावी लागते. यातून कितीतरी पर्याय सुचवले जातात. पण प्रश्न नेमका सुटेल याची शाश्वती नसते.
माणसाच्या निर्माणकर्त्याने बरे-वाईट पारखण्याकरिता बुद्धी दिली आहे, जिच्या जोरावर आज झालेली भौतिक प्रगती आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. तरीही आपण आपल्या  प्रश्नांवर नेमका तोडगा काढण्यात का अपयशी ठरतो?
अशी अडचणीची वेळ फक्त व्यक्तीपुरती मर्यादित नसून सामाजिक स्तरावरही सर्वत्र दिसून येते. सामाजिक जीवनातीलही कित्येक प्रश्नांवर असंतोषाचा भडका उडताना जगभर दिसून  येतो. नवरा-बायकोचे अधिकार व कर्तव्ये यामध्ये समतोल साधता न आल्यामुळे उडणारे खटके, मालकवर्ग आणि कामगारबंधू यांच्या दरम्यान होणारे संघर्ष, व्यक्तीस्वातंत्र्य आणि  समाजहीत यातून निर्माण होणारे वाद इत्यादी बोलकी उदाहरणे आहेत.
जगामध्ये आजपर्यंत जितके वाद, तंटे उद्भवले आणि आजही बघायला मिळतात, त्याचे कारण हेच आहे की तथाकथित बुद्धिजीवींनी अशा समस्यांकडे एकतर्फी नजरेने बघितले आणि  तोडगा म्हणून असमतोल उपाय राबविण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिगत असो वा सामाजिक प्रत्येक स्तरावर शांतता भंग होण्याचे मूळ कारण हेच आहे.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धीची माणसे या जगामध्ये पूर्वीही होती आणि आजही आहेत. अशा लोकांनी नेहमीच हे मान्य केले की जीवनरूपी प्रवासात फक्त आपली बुद्धीच आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही तर ज्याने आपल्याला प्रवासाला धाडले आहे त्याची मार्गदर्शिका आपल्या सोबत असणे अत्यंत जरुरी आहे नाही तर प्रवासात खूप अडचणी निर्माण  होतील. विचाराअंती ही माणसे दोन निर्णयांप्रत पोहोचली, एक हा की, ही सृष्टी काही आपोआप निर्माण झालेली नाही तर या सृष्टीचा एक निर्माणकर्ता आहे. दुसरा असा की माणसाचे  जीवन हे फक्त या जगापुरतेच मर्यादित नाही तर पुढे आणखी एक जीवन आहे, ज्यामध्ये जीवनभर केलेल्या बऱ्या-वाईट कर्मांचे परिणाम प्रत्येकासमोर येतील. त्यांनी निरीक्षण केले की  या जगामध्ये कर्मांचे परिणाम साधारणत: निघत नाहीत. येथे तर सदाचारी लोकांच्या नशिबी दु:ख, यातना, कष्ट येतात आणि दुराचारी लोक ऐश व आरामाचे जीवन व्यतीत करतात.  पण सृष्टीचा निर्माणकर्ता न्यायी आहे. तो जरूर प्रत्येकाचा हिशोब घेईल.
निर्मळ स्वभाव आणि सद्सद्विवेकबुद्धी असल्यामुळे या विचारांप्रत पोहोचल्यावर त्याच्या अंतर्मनाची हीच प्रार्थना होती की हे पालनकर्ता आम्हांस थेट तुझ्यापर्यंत पोहोचणारा मार्ग दाखव  आणि आम्हाला सरळमार्गी बनव. आम्हाला भीती वाटते की सरळमार्गावरून प्रवास करता करता एखाद्या आडवाटेवर आम्ही वळलो तर कदाचित ती वाट आम्हाला भटकवणारी किंवा विनाशाच्या खाईत लोटणारी ठरू शकते.
याच मार्गदर्शनासाठी म्हणजे लोकांचा जीवनप्रवास सुखाचा व्हावा आणि मरणोत्तर जीवनातही ते सफल व्हावेत म्हणून अल्लाहाने जवळपास आपले सव्वा लाख पैगंबर या जगामध्ये  पाठविले आणि त्यांच्यामार्फत आपला संदेश, आपले मार्गदर्शन पोहोचविले. जगामध्ये आलेल्या अनेक पैगंबरांपैकी अंतिम पैगंबर हजरत मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा असो)  आहेत आणि अवतरित झालेल्या अनेक संदेशांपैकी अंतिम संदेश कुरआन आहे.
कुरआनच्या सुरुवातीला सूरह फातिहा हा अध्याय आहे. हा अध्याय एक प्रार्थना आहे, याचना आहे. ही प्रार्थना कुरआनच्या सुरुवातीला निश्चित करण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही या  ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर प्रथम अल्लाहकडे अशा प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थना कशी करावी? हेही मार्गदर्शन केले गेले आहे.

‘अल्लाहच्या नावाने जो अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात करण्यासाठी यापेक्षा अधिक योग्य व चांगल्या शब्दांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या शब्दांमध्ये अल्लाहचा परिचय करून देण्यात आला   आहे आणि त्याच्या गुणांचा उल्लेख आहे. ‘रहमान’, ‘रहीम’ हे शब्द ‘र ह म’ या धातूपासून बनलेले आहेत. ‘रहमान’ ही शब्दरचना जोरदार आणि जोशपूर्ण कैफियत दर्शवणारी आहे तर  ‘रहीम’ या शब्दरचनेत निरंतरता, सदैवपणाची कैफियत आहे; म्हणजे अल्लाहची दया, कृपा बरसणारी आहे आणि ही जोरदार कृपावृष्टी कधीही थांबणारी नाही तर निरंतर होत राहणारी  आहे. कोणत्याही काळापुरती मर्यादित नाही तर ही कृपावृष्टी पूर्वीही होती, आजही होत आहे आणि पुढेही होत राहणार. जसे समुद्रात उसळणाऱ्या जोरदार लाटा आणि निरंतर वाहणाऱ्या  नदीचा प्रवाह यांची एकत्र कल्पना करणे अवघड आहे तसेच अल्लाहाच्या या गुणवैशिष्ट्यांची एकत्र कल्पना करणे आपल्याला शक्य नाही.

‘सर्व स्तुती, कृतज्ञता अल्लाहसाठी आहे जो साऱ्या विश्वांचा स्वामी, पालनकर्ता आहे.’

जगात कुठेही व कोणत्याही स्वरूपात जे सौंदर्य दिसून येते, वैभव-समृद्धी दिसून येते, ज्या ज्या सामथ्र्यांचा आपणास अनुभव होतो त्या सर्वांचा मूळ स्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रत्येक  स्तुती, प्रशंसा याला पात्रही फक्त तोच निर्माणकर्ता आहे. तोच साऱ्या विश्वांचा स्वामी आहे आणि तोच अल्लाह साऱ्या विश्वांचा पालनकर्ताही आहे. त्याने माणसाला असंख्य देणग्यांनी उपकृत केले आहे, हे मान्य करून फक्त त्याचेच कृतज्ञ व आभारी बनून जगले पाहिजे. भूक लागल्यावर आपण जेवण करतो जेवणानंतर त्याचे आभार प्रकट करताना म्हणावे की,
‘‘हे पालनकर्ता! आम्ही तुझे आभारी आहोत, आमच्या
पोटाची आग विझवण्यासाठी तू काय काय निर्माण केले!’’
दिवसभर काम केल्यानंतर माणूस पार थकून जातो व त्याला आपोआप झोप लागते. सकाळी उठल्यावर जेव्हा सारा थकवा निघून जातो तेव्हा माणसाने हे बोलले पाहिजे की, ‘‘हे   अल्लाह काय छान व्यवस्था आहे तुझी! रात्री अंधार झाला म्हणून सर्वत्र शांतता पसरली आणि मला सुखाची झोप लागली ज्यामुळे सारा थकवा दूर झाला, मी तर मेल्यागत झालो होतो.’’
सकाळी उठल्याबरोबर शौचालयाकडे जाणे हा जीवनाचा भाग आहे. तेथून आल्यानंतरही माणसाने हेच म्हणावे की प्रत्येक आभार, धन्यवाद अल्लाहसाठीच आहे, ज्याने शरीरव्यवस्था  अशी बनवली की त्रासदायक वस्तू दूर होऊन तब्येत फ्रेश झाली. यासारख्या आंतरिक व बाह्य कितीतरी देणग्या माणसाला मिळालेल्या आहेत म्हणून ज्याने दिल्या त्याचाच कृतज्ञ व  आभारी बनून राहिले पाहिजे.

‘अत्यंत कृपाळू, सदासर्वदा दयाळू आहे.’
त्याची, दया, कृपा अनंत आहे. त्याला सीमा नाही. त्याचा दयाळूपणा कायमचा आहे, निरंतर, सदैव आहे. ‘निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा आहे.’ तो फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो  न्यायीसुद्धा आहे. कयामत म्हणजे न्यायनिवाड्याच्या दिवशी जेव्हा संपूर्ण मानवजातीला पुन्हा जिवंत केले जाईल आणि प्रत्येकाच्या जीवनकार्याचा तपास होईल. सदाचारी लोकांना  त्यांच्या सदाचाराचे भरपूर फळ मिळेल आणि दुराचारी लोकांना त्यांच्या कर्माची योग्य ती शिक्षा भोगावी लागेल. जीवनाच्या परीक्षेत कोण सफल झाला आणि कोण असफल ठरला या  निकालाचा तो दिवस असेल. त्या निर्णयाच्या दिवसाचा सर्वेसर्वा फक्त अल्लाह आहे. न्यायनिवड्याचे सर्वाधिकार फक्त त्याच्याच हातात असतील. शिक्षेपासून सुटण्यासाठी तेथे कसलीही  धनसंपत्ती कामी येणार नाही. नातेवाईक, मित्रमंडळी कोणीही मदतीला येणार नाहीत. राजा असो वा रंक कोणीही कुणासाठीही काहीच करू शकणार नाही, कारण प्रत्येकाला फक्त  स्वत:ची चिंता लागलेली असेल. त्या दिवशी सर्वांना ऐकू येईल की, ‘‘आज सत्ता कुणाची आहे?’’ म्हणजे आज राजाधिराज कोण आहे, वास्तविक साम्राज्य कुणाचं आहे? उत्तर दिले  जाईल, ‘‘एकमेव सामथ्र्यशाली अल्लाहचं.’’ ‘आम्ही फक्त तुझीच भक्ती करतो.’
हे अल्लाह आमच्यावर तुझी अनंत कृपा आहे. तू अत्यंत कृपाळू, दयाळू आहेस आणि तू न्यायीसुद्धा आहेस. तूच आमचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, मालक आहेस. म्हणूनच आम्ही हे  मान्य करतो की आम्ही फक्त तुझेच भक्त, गुलाम, दास आहोत. आम्ही फक्त तुझीच भक्ती, उपासना करतो आणि करत राहणार. फक्त तुझीच आज्ञापालन करतो आणि करत  राहणार.

‘आणि आम्ही फक्त तुझ्याकडेच मदतीची याचना करतो.’
खरा साहाय्यक तूच आहेस. फक्त तुझ्याच मदतीवर आमचा विश्वास आहे. तुझ्याशिवाय आम्ही कोणत्याही पैगंबरांची, संताची, देवदूतांची किंवा तू निर्माण केलेल्या सृष्टीतील कोणत्याही  वस्तूची आम्ही भक्तीही करत नाही व त्यांच्याकडे मदतीची याचनाही करत नाही. तू दिलेल्या सद्सद्विवेकबुद्धीमुळे आम्ही तुला ओळखू शकलो. आम्ही न मागताही तू आम्हांला भरपूर  दिले. आता आमची गरज एवढीच आहे की,

‘आम्हाला सन्मार्गी चालव.’

आम्हाला तो सन्मार्ग, सरळमार्ग दाखव आणि त्यावर चालण्याची शक्ती दे जो मार्ग थेट तुझ्यापर्यंत पोहोचतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचारविचार, वागणुकीमध्ये आम्हाला तो मार्ग  दाखव जो सत्य आहे, जो या जीवनातही खऱ्या उन्नतीचा, प्रगतीचा जामीन आहे आणि ज्यामध्ये मरणोत्तर जीवनातही कल्याणाची शाश्वती आहे.

‘त्या लोकांचा मार्ग ज्यांच्यावर तू कृपा केलीस.’
तो सन्मार्ग, सरळमार्ग जो तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला. जगात आलेल्या सर्व पैगंबरांचा मार्ग, त्यांच्या सर्व सत्यनिष्ठ अनुयायींचा मार्ग, अशा मार्गावर चालताना जे शहीद झाले आणि  या सर्वांच्या पावलांवर पावले टाकीत जगणाऱ्या सदाचारी व चारित्र्यवान लोकांचा मार्ग, जे सर्व तुझ्या प्रसन्नतेचे पात्र ठरले.

‘जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.’
अल्लाहचा प्रकोप त्या लोकांवर प्रकटला ज्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा, जीवनपद्धतीचा मनापासून स्वीकार केला नाही. फक्त काही रूढी-परंपरांचा त्यांनी स्वीकार केला. ईशआदेशाच्या  विरुद्ध आपली मनमानी केली, अन्याय अत्याचाराचा मार्ग धरला, अशा सर्व लोकांना सुधरण्यासाठी भरपूर वेळ दिली गेली पण एका ठराविक वेळेनंतर त्यांना या जगातही शिक्षा मिळाली  आणि मरणोत्तर जीवनात अजून हिशोब व्हायचा बाकी आहे.
मार्गभ्रष्ट ते लोक आहेत ज्यांना उत्तम मार्गदर्शन केले गेले पण भावनेच्या भरात त्यांनी धर्मशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध अवास्तव श्रद्धा बाळगल्या. पैगंबराला अल्लाहचा पुत्र  मानण्याचे महापाप केले. धर्मशास्त्रात निर्देश नसतानाही संसारत्याग करण्यासारख्या नवीन प्रथा सुरू केल्या आणि प्रकृतीच्या विरुद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात सरळ मार्गापासून ते खूप  दूर निघून गेले.

‘हे अल्लाह आमची प्रार्थना स्वीकार कर!’
सूरह फातिहा भक्तांनी मार्गदर्शनासाठी केलेली एक याचना आहे. अल्लाह त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून संपूर्ण कुरआन त्यांच्या समोर ठेवता आणि सांगतो की हाच तो सरळमार्ग आहे  ज्याची तुम्हास तळमळ लागली आहे. हा ग्रंथ तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्याचा सरळ मार्ग दाखवेल आणि तुमच्या जीवनातील असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये योग्य दृष्टिकोन   ठेवण्यास मदत करेल. या अध्यायाद्वारे आपणास काही गोष्टींचा बोध होतो. एक हा की, आपल्या जीवनात व्यक्तिगत स्तरावर जेव्हा जेव्हा गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते त्या त्या  वेळी आपण आपल्या निर्माणकर्त्याला, पालनकर्त्याला हाक मारावी आणि फक्त त्याच्याचकडे मदतीची याचना करावी. संबंधित विषयावर त्याने काय मार्गदर्शन केले हे जाणून घेण्याचा  प्रयत्न करावा. कारण माणसाला जीवनातील टप्प्या टप्प्यावर, पावला पावलावर याची गरज भासते.
दुसरा हा की बुद्धिमत्ता ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे आणि त्याचा वापर केव्हा व कसा करावा याबाबतीत ही कुरआनमध्ये भरपूर मार्गदर्शन आहे, पण सामाजिक  स्तरावरील काही मुख्य प्रश्नांवर आपण हे मान्य केलेच पाहिजे की फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण त्यांना सोडवू शकत नाही.
कौटुंबिक वाद निर्माण होण्यास कारणीभूत असणारी समस्या ही आहे की, पती-पत्नीमध्ये अधिकार आणि कर्तव्याबाबतीत कोणते संतुलित नियम असावेत? हे निश्चित करणे मानवाला  शक्य नाही. कारण मानव एक तर स्त्री आहे किंवा पुरुष. या विषयावर जेव्हा स्त्री विचार करेल तेव्हा ती आपली भावना, आपल्या संवेदना यावर लक्ष देईल. पुरुषांच्या भावना, त्यांच्या   जाणिवांची कल्पनाही करणे तिला शक्य होणार नाही. अधिकार व कर्तव्यासंबंधी जेव्हा पुरुष विचार करेल तेव्हा त्याला स्वत:च्या जाणिवा तर माहीतच असणार पण स्त्रीच्या भावना,  संवेदना त्याला काय कळणार? शेवटी तो जे काही नियम बनवेल त्यामध्ये नक्कीच आपले वर्चस्व ठेवणार. फक्त एकच अस्तित्व असे आहे जो दोघांचा निर्माणकर्ता आहे. तो अल्लाह  आहे, जो दोघांवरही प्रेम करतो. तो दोघांचा शुभचिंतक आहे म्हणून या बाबतीत त्याचे मार्गदर्शन घेणे अत्यंत जरुरी आहे.
दुसरे; व्यक्ती आणि सामाजिक संबंधांमध्ये संतुलन कसे राखता येईल? पालकांना, वडीलधाऱ्या माणसांना वाटते की आम्ही जो हुकूम देऊ मुलांनी तो नेहमी मुकाटपणे मान्य करायलाच  हवा. मुलं म्हणतात, आम्हाला स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. शासन व्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना वाटते की आम्ही जे जे निर्णय घेऊ जनतेने त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे. नागरिक  म्हणतात आमच्या स्वातंत्र्यावर का गदा आणता? जगभरात स्वातंत्र्य, फ्रीडम हा नारा किती लोकप्रिय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. होय! व्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य, पण  आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देण्याइतपत व्यक्तीस्वातंत्र्य दिले जावे का? सार्वजनिक ठिकाणी कसलेही चाळे करण्याची खुली मुभा असावी का? कायदेकानू आणि नैतिकतेचा विचार  व्हायला नको? हजारो लोकांचे नुकसान करून एखाद्याने स्वत:चा फायदा करून घेणे हे कसले व्यक्तीस्वातंत्र्य? याच प्रश्नांवर गरज भासते अशा संतुलित नियमांची ज्यामध्ये व्यक्तीही  मोकाट होऊन समाज विघातक बनू नये आणि समाजव्यवस्थाही बेछूट होऊन इतकी सशक्त होऊ नये की व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाईल. म्हणूनच या प्रश्नावरही आपण आपल्या  निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे जरुरी आहे.
तिसरी मोठी समस्या भांडवलदार आणि श्रमिक वर्गाची आहे. एकीकडे भांडवलदारांचे उत्पन्न अवाढव्य वाढतच आहे तर दुसरीकडे श्रमिकांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशी होत  असल्याचे सामाजिक चित्र आपणासमोर आहे. एकीकडे पैशाची उधळपट्टी तर दुसरीकडे एक वेळच्या जेवणाची गैरसोय. ही विषमता असलेल्या समाजामध्ये भौतिक प्रगतीच्या आणि  विकासाच्या गप्पा मारणे योग्य नाही.
दुसरी बाजू अशी की श्रमिकांना त्यांच्या हक्कांपेक्षा जास्त दिल्यास भांडवल नुकसानीत येण्याचा धोका असतो. ही भीती असेल तर भांडवल व भांडवलदार मैदानात का व कसे टिकेल?  असे कित्येक प्रश्न व समस्या आहेत ज्यामुळे आज जगभरात अशांतता पसरलेली दिसून येते. म्हणूनच जीवन प्रवास सुखात, शांततेत पूर्ण व्हावा आणि या जगातही आणि मरणोत्तर  जीवनातही संपूर्ण मानवजात सफल व्हावी याकरिता सर्वांनी ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणे हे सर्वांच्या भलाईचे आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, (जेव्हा ‘सूरह शुअरा’ची आयत ‘वऩिजर अशीरतकल अ़करबीन’ (आपल्या जवळच्या नातेवाईकांना भय दाखवा) चे अवतरण झाले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरैशांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, ‘‘हे कुरैशच्या लोकांनो! स्वत:ला नरकाच्या आगीपासून वाचविण्याची चिंता करा, मी अल्लाहच्या कोपाला  तुमच्यापासून जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्दे मनाफच्या वंशजांनो! मी तुमच्यावरील अल्लाहच्या कोपाला जरादेखील टाळू शकत नाही. हे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब! (पैगंबरांचे  काका) मी अल्लाहच्या प्रकोपाला तुमच्यापासून जरादेखील हटवू शकत नाही. हे सफिया! (पैगंबरांची आत्या) मी तुमच्यावरील अल्लाहच्या प्रकोपाला जरादेखील हटवू शकत नाही. हे  माझ्या कन्ये, फातिमा! (रजि.) तू माझ्या संपत्तीतील जेवढे काही मागशील ते मी देऊ शकतो, परंतु अल्लाहच्या प्रकोपाला तुझ्यावरून हटवू शकत नाही (तेव्हा स्वत:ला वाचविण्याची  चिंता करा, ईमान आणि अनुसरणच तेथे कामी येईल).’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक दिवस पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्या दरम्यान प्रवचन दिले. त्यात त्यांनी ‘माले गनिमत’ (युद्धात सापडलेली संपत्ती) च्या   चोरीची घटना अतिशय महत्त्वपूर्णरित्या सादर केली. मग पैगंबर म्हणाले, ‘‘मला तुमच्यापैकी कोणी अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती आढळू नये की त्याच्या मानेवर जोरजोरात   ओरडणारा उंट आहे आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा (या पापाच्या संकटापासून वाचवा)! तेव्हा मी म्हणेन, मी तुझी काहीही मदत करू शकत  नाही, मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी या स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादा घोडा खिदळत आहे  आणि तो मनुष्य म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! धावा! मला मदत करा. तेव्हा मी म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. मी तुझ्यापर्यंत जगात ही गोष्ट पोहोचविली  होती; मला तुमच्यापैकी कोणीही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत आढळू नये की त्याच्या मानेवर एखादी शेळी बसली आहे आणि ती ओरडत आहे आणि तो मनुष्य म्हणत   आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा. तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्याकरिता काहीही करू शकत नाही, मी तुला जगात आज्ञा पोहोचविल्या होत्या; मी  तुमच्यापैकी कोणाला अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर एखादा मनुष्य बसला आहे आणि तो ओरडत आहे आणि ज्याच्या खांद्यावर  बसलेला आहे तो मनुष्य म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! या, मला मदत करा! तेव्हा मी त्यांच्या उत्तरादाखल म्हणेन, मी येथे तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात  ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणास अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थितीत पाहू इच्छित नाही की त्याच्या मानेवर कपड्यांच्या चिंध्या लटकत आहेत आणि तो  म्हणत आहे, हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत करा, तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती; मी तुमच्यापैकी कोणासही अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा स्थिती पाहू इच्छित नाही त्याच्या मानेवर सोने-चांदीचे ढीग आहेत आणि तो म्हणत आहे की हे अल्लाहचे पैगंबर! मला मदत  करा! तेव्हा मी त्याच्या उत्तरादाखल म्हणेन, मी तुझ्या पापाच्या शिक्षेला जरादेखील कमी करू शकत नाही, मी तुला जगात ही गोष्ट पोहोचविली होती.’’ (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण
जनावरांचे ओरडणे आणि कपड्यांचे लटकण्याचा असा अर्थ आहे की ‘माले गनिमत’ (युद्धात आढळलेली संपत्ती) च्या या चोऱ्या अंतिम निवाड्याच्या दिवशी लपविता येणार नाहीत. प्रत्येक पाप ओरडून ओरडून सांगेल आणि तो पापी असल्याचे जाहीर करील. माहीत असावे की हे फक्त ‘माले गनिमत’च्या चोरीबाबतच विशिष्ट आहे असे नाही, प्रत्येक मोठ्या पापाची  हीच स्थिती असेल. अल्लाह त्या वाईट शिक्षेपासून प्रत्येक मुस्लिमाला वाचवो आणि वाईट स्थिती येण्याअगोदर पश्चात्तापाची ईशकृपा लाभो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget