Latest Post

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हजयात्रेचा निश्चय करणाऱ्या मनुष्याने ती लवकरात लवकर पूर्ण करावी; कारण कदाचित तो  आजारी पडेल, कदाचित प्रवासाचे वाहन उपलब्ध नसेल (म्हणजे प्रवासात अडथळा निर्माण होईल, प्रवासात एखादे संकट कोसळेल, प्रवासखर्च उरणार नाही) आणि कदाचित एखादी अशी  स्थिती निर्माण होईल ज्यामुळे हजयात्रेचा प्रवास अशक्य होईल. (याकरिता घाई करा, कोणती विवशता येईल सांगता येत नाही की ज्यामुळे तुम्ही तुमची हजयात्रा पूर्ण करू शकणार  नाही.) (हदीस : इब्ने माजा)

माननीय हसन (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांनी सांगितले, ‘‘माझी अशी इच्छा आहे की हजयात्रा करू शकणाऱ्या कोणकोणत्या लोकांनी हजयात्रा  केलेली नाही हे पाहण्यासाठी या शहरांमध्ये (इस्लामी राष्ट्रांमध्ये) काही माणसे पाठवावीत. मग त्यांनी त्या लोकांवर जिझिया कर (सक्षम मुस्लिमेतर नागरिकांकडून घेतला जाणारा  संरक्षण कर) आकारावा. हे लोक मुस्लिम नाहीत, हे लोक मुस्लिम नाहीत. (जर ‘मुस्लिम’ असते तर कधीचीच हजयात्रा पूर्ण केली असती. ‘मुस्लिम’चा अर्थ आहे स्वत:ला अल्लाहच्या  स्वाधीन करणारा, अथवा त्याने खरोखरच स्वत:ला अल्लाहच्या स्वाधीन केले आहे, तेव्हा तो कोणत्याही विवशतेशिवाय हजसारख्या महत्त्वाच्या उपासनाविधीबाबत निष्काळजीपणा कसा करू शकतो.) (हदीस : मुन्त़का)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य हज अथवा उमरा अथवा जिहादचा निश्चय करून आपल्या घरातून बाहेर पडला  असेल आणि वाटेत त्याला मृत्यू आला असेल तर अल्लाह त्याला तेच पुण्यकर्माचे फळ देईल जे तेथे हाजी, गाजी आणि उमरा करणाऱ्यांसाठी निश्चित आहे.’’ (हदीस : मिश्कात)

वैध कमाई
माननीय मिकदाम बिन मअदी करब यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वकमाईपेक्षा उत्तम भोजन कोणत्याही व्यक्तीने कधीही केले नाही आणि अल्लाहचे  पैगंबर दाऊद (अ.) स्वकमाईने आपला उदरनिर्वाह करीत होते.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

या हदीसचा उद्देश ईमानधारकांना भीक मागण्यापासून आणि दुसऱ्यांसमोर हात पसरण्यापासून रोखणे आहे आणि या गोष्टीचे प्रशिक्षण देणे आहे की मनुष्याने आपला उदरनिर्वाह स्वत:  कमविला पाहिजे, एखाद्या व्यक्तीवर भार बनून जीवन व्यतीत करू नये.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह पवित्र आहे आणि फक्त पवित्र धनच कबूल करतो आणि अल्लाहने ईमानधारकांना याच  गोष्टीचा आदेश दिला आहे ज्याचा त्याने पैगंबरांना आदेश दिला आहे. म्हणूनच तो म्हणतो, ‘हे पैगंबरांनो! पवित्र उपजीविका खा आणि सत्कर्म करा’ आणि ईमानधारकांना उद्देशून तो  म्हणतो, ‘हे ईमानधारकानो! ज्या पवित्र व वैध खाद्यपदार्थ आम्ही तुम्हाला दिले आहेत ते खा.’ मग पैगंबरांनी एका अशा मनुष्याचा उल्लेख केला जो खूप लांबून पवित्रस्थळी येतो,  मनोमालिन्याने वैतागलेला असतो आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उचलून म्हणतो, ‘हे माझ्या पालनकर्त्या!’ (आणि दुआ मागतो.) खरे तर त्याचे अन्न निषिद्ध आहे, त्याचे
पाणी निषिद्ध आहे, त्याचा पोषाख निषिद्ध आहे आणि निषिद्ध गोष्टींद्वाचे त्याचा उदरनिर्वाह चालतो; मग अशा मनुष्याची दुआ (प्रार्थना) का स्वीकारली जाईल. (हदीस : मुस्लिम)

- गुलाम रसूल देशमुख

    तलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला आहे.
    सध्या `तलाक' हा चर्चेचा व वादाचा विषय बनला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुस्लिमेतर तर सोडाच, स्वत: अनेक मुस्लिम तलाक म्हणजे काय? त्याचा उपयोग केव्हा, कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा या विषयी अनभिज्ञ आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 174   -पृष्ठे -16     मूल्य - 10      आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/zv9qr59huikwafejeio5skzbuio7w7p0

Truth
प्रश्‍न असा उत्पन्न होतो की, जर असे करायचे नसेल तर आपल्याला काय करावे लागेल? तुम्हाला जर हे कर्तव्य अनिवार्य आहे असे वाटत नसेल तर तुम्हाला ते अनिवार्य का वाटत नाही, यासंबंधीचा पुरावा द्यावा लागेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कर्तव्य अनिवार्य आहे तर मग तुम्हीच सांगा की, मुस्लिमांच्या एवढ्या संघटनांपैकी कोणती संघटना अशी आहे जी हे कर्तव्य पूर्ण करीत आहे? हे ही नाही तर मग तुमच्याकडे अशी अवस्था झाली आहे काय की, जे लोक या कर्तव्याला ओळखून ते पूर्ण करण्यासाठी उठले आहेत, त्यांनाच तुम्ही गुन्हेगार ठरवता.
    जमाअते इस्लामीवर असाही आरोप केला जातो की, तुम्ही तुमच्या नेत्याला ’अमीर किंवा इमाम’ का म्हणता? त्यांच्या मते अमीर किंवा  इमाम केवळ तीच व्यक्ती असते जी प्रत्येक बाबतीत स्वत:कडे अधिकार राखून असते आणि जिच्या हातात सत्तेची लगाम असते. ते आपल्या या म्हणण्याला पुष्टीदायक हदीससुद्धा सादर करतात. ज्यायोगे असे सिद्ध केले जाते की, इमामत (नायकत्व) केवळ तीन गोष्टींचेच असू शकते. 1. ज्ञानाची (इल्म) इमामत, 2. नमाजची इमामत, 3. जिहाद आणि युद्धाची इमामत. या शिवाय बाकी कुठल्याही प्रकारची इमामत इस्लामला मान्य नाही.
    वास्तविक पाहता हा आक्षेप तेच लोक घेतात ज्यांना इस्लामी दंड शास्त्रातील त्या भागातील हदीस माहित आहेत ज्या भागात इस्लामी सत्ता प्राप्त केल्यानंतर व्यवस्था स्थापन केली जाते. मात्र त्यांना हे माहित नाही की जेव्हा सत्ता गेलेली असेल, मुस्लिम हे सत्तेपासून दूर असतील, इस्लामी व्यवस्था अस्तव्यस्त झालेली असेल, त्या परिस्थितीमध्ये काय आदेश आहेत?
    मी त्यांना विचारतो की, अशा परिस्थितीत मुस्लिमांनी काय हेच काम करावे की, प्रत्येक माणसाने वेगवेगळे बसून फक्त प्रार्थना (दुआ) करावी की, ”हे अल्लाह! एखादा असा इमाम पाठव ज्याच्याकडे सर्वाधिकार असतील?” किंवा असे नेतृत्व कायम करण्यासाठी एखादी संघटना बांधून सामुहिक पद्धतीने प्रयत्न केले जावेत. जर त्यांना असं वाटत असेल की सामुहिक प्रयत्न करायला हवेत तर मेहरबानी करून त्यांनीच आम्हाला सांगावे की जमाअत बनविल्याशिवाय  कोणते सामुहिक प्रयत्न केले जावू शकतात? जर त्यांना असे वाटते की, जमाअत बनविल्याशिवाय, दुसरा कुठलाच मार्ग नाही तर मग कुठलीही जमाअत विना नेत्याच्या, अध्यक्षाच्या किंवा आमीरच्या शिवायही चालू शकेल काय? जर आक्षेप घेणारे या गरजेचाही स्वीकार करतात तर त्यांनी स्वत:च आम्हाला सांगावे की, इस्लामी उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी संघटना तयार केली जाईल, त्याच्या अध्यक्षाला इस्लाममध्ये कुठल्या शब्दाने संबोधतात? ते जो शब्द सुचवतील आम्ही तो शब्द मान्य करू फक्त अट एकच आहे की, तो शब्द इस्लामी असायला हवा. किंवा त्यांनी स्पष्ट रूपात असं सांगावे की इस्लाममध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतरचेच आदेश उपलब्ध आहेत. आणि सत्तेपासून दूर झाल्यानंतरच्या स्थितीमध्ये सत्ता परत कशी मिळविता येईल. यासंबंधी अल्लाहने कुठलेच मार्गदर्शन केलेले नाही. हे काम ज्याला करावयाचे असेल त्यांनी ते बिगरइस्लामी पद्धतीने आणि बिगर इस्लामी नावाने करायला हवेत. जर या लोकांचा असा हेतू नाही तर मग आम्ही हे कोडे सोडविण्यामध्ये असमर्थ आहोत की, सदर, लिडर आणि काईद वगैरे शब्द उपयोगात आणले जावेत तर ते सर्व यांना स्वीकार आहे. परंतु, अमीर हा शब्द ऐकताच ते का चिडतात?
    साधारणपणे लोकांना या प्रश्‍नाला समजण्यामध्ये तेंव्हा अडचण निर्माण होते जेव्हा पैगम्बर मुहम्मद सल्ल. च्या काळामध्ये अमीर किंवा इमाम हे शब्द वापरले गेले नव्हते. कारण त्या काळात इस्लामी सत्ता स्थापन झाली होती. ज्या काळात इस्लामी सत्ता कायम झाली नव्हती त्या काळी प्रेषित मुहम्मद सल्ल. पैगम्बरच्या नात्याने इस्लामच्या स्थापनेसाठीचे जे प्रयत्न होत होते त्याचे नेतृत्व आणि मार्गदर्शन ते स्वत: करीत होते. म्हणून त्या वेळेस आमीर किंवा इमाम हे शब्द वापरण्याचा प्रश्‍न उद्भवत नव्हता. मात्र संपूर्ण इस्लामी व्यवस्थेवर नजर टाकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होऊन जाते की, इस्लामी व्यवस्था ही मुस्लिमांच्या प्रत्येक सामुहिक कार्यामध्ये अनुशासन आणि संघशक्तीची मागणी करते. आणि इस्लामी व्यवस्था अनुशासन आणि संघशक्तीची खरी स्थिती हे निर्धारित करते की, संघटनेचे कार्य जमाअत तयार करून केले जावे. आणि जमाअतमध्ये जबाबदार व्यक्तीच्या आज्ञा ऐकणे आणि त्यानुसार कार्य करण्याची संवेदना जन्मजात असते आणि ही सुद्धा संवेदना जन्मजात असते की, तिचा एक आमीर ( अध्यक्ष) असावा. हज केला जावा तर सामुहिक केला जावा. म्हणून हजसाठी एक आमीर असावा. एवढेच नव्हे तर तीन माणसं जर प्रवास करत असतील तर त्यांनीही एक जमाअत म्हणून प्रवास करायला हवा आणि आपल्यामधून एकाची निवड अमीर म्हणून करायला हवी, असे निर्देश प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी देऊन ठेवलेले आहेत. इस्लामी शरियतची हीच आत्मा आहे की, जमाअतशिवाय इस्लाम नाही आणि अमारत (अध्यक्षता) शिवाय जमाअत नाही. आणि इताअत (आज्ञापालन) शिवाय जमाअत (अध्यक्षता) नाही. हे कथन हजरत उमर रजि. यांनी केले असल्याची इस्लामी इतिहासामध्ये नोंद आहे.
    म्हणून आपण शेवटी ह्या निर्णयापर्यंत पोहोचतो की, दीनच्या स्थापनेसाठी आणि लोकांसमोर सत्याची साक्ष देण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील ते करण्यासाठी सर्वप्रथम जमाअत तयार केले जाईल आणि तिच्या अध्यक्षाच्या रूपात जी व्यक्ती असेल तिला अमीर किंवा इमाम या शब्दाने संबोधले जाईल, हेच योग्य आहे. इमाम या शब्दाला दूसराही एक विशेष अर्थ जोडला गेलेला आहे म्हणून आम्ही टिकेपासून वाचण्यासाठी इमाम शब्द न वापरता आमच्या जमाअतच्या अध्यक्षासाठी आमीर या शब्दाचा उपयोग केलेला आहे.
(सदरील लेखमाला, शहादते हक या पुस्तकातील असून, मौलाना अबुल आला मौदूदी याचे लेखक आहेत.)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘निश्चितच अल्लाहने लोकांवर ‘सदका’ (दानधर्म) अनिवार्य केला आहे, जो त्यांच्यापैकी श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल आणि त्यांच्यापैकी  गरजवंतांमध्ये परतविला जाईल.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)

स्पष्टीकरण
‘सदका’ हा शब्द ‘जकात’ (ऐपतीप्रमाणे अनिवार्य दान) साठीही वापरला जातो, जी देणे आवश्यक आहे आणि येथे हाच अर्थबोध होतो. एखाद्या मनुष्याने स्वखुशीने अल्लाहच्या मार्गात खर्च केलेल्या संपत्तीवरदेखील जारी होत असतो. या हदीसमधील ‘तुरद्दु’ (परतविला जाईल) या शब्दाने स्पष्ट होते की श्रीमंतांकडून वसूल करण्यात आलेली ‘जकात’वर खरे तर  समाजातील गरीब आणि गरजवंतांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळवून दिला जाईल. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला अल्लाहने संपत्ती प्रदान केली आणि मग  त्याने त्या संपत्तीची ‘जकात’ अदा केली नाही, त्याची संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी (कयामत) डोक्यावर दोन काळे ठिपके असलेल्या (हा अतिशय विषारी होणाचा संकेत आहे)  अत्यंत विषारी सापाचे रूप धारण करील आणि तो त्याच्या गळ्यातील जोखड बनेल. मग त्याच्या दोन्ही जबड्यांना हा साप पकडेल आणि म्हणेल, मी तुझी संपत्ती आहे, मी तुझा खजिना आहे.’’ (हदीस : सहीह बुखारी)
मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या या आयतीचे पठण केले, ‘‘वला यहसबन्नल ल़जीना यब़खलूना.’’

स्पष्टीकरण
आपली संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यात कंजूषी करणारे लोकांनी असे समजू नये की त्यांची ही कंजूषी त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल, मात्र ती त्याच्यासाठी वाईट सिद्ध होईल.  त्यांची ही संपत्ती अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याच्या गळ्यातील जोखड बनेल. म्हणजे ती त्यांच्यासाठी विध्वंस वविनाशाचे कारण ठरेल.

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणता ऐकले की, ‘‘ज्या संपत्तीतून ‘जकात’ काढण्यात आली नाही आणि ती त्यातच मिसळली  गेली तर ती त्या संपत्तीचा विनाश करून टाकते.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
‘विनाश करणे’ म्हणजे असे नाही की एखाद्या मनुष्याने ‘जकात’ दिली नाही आणि स्वत:च खाल्ली तर कोणत्याही स्थितीत त्याची सर्व संपत्ती नष्ट होईल, असे नाही तर ‘विनाश’  म्हणजे ज्या संपत्तीपासून लाभ घेण्याचा त्याला अधिकार नव्हता आणि तो गरिबांचा हिस्सा होता, ती संपत्ती खाऊन त्याने आपल्या ‘दीन’ (जीवनधर्म) आणि ईमानचा विनाश केला.  इमाम अहमद बिन हंबल यांनी हेच स्पष्टीकरण दिले आहे आणि असेही आढळून आले आहे की ‘जकात’ खाणाऱ्याची संपूर्ण संपत्ती अचानक नष्ट झाली आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘फितरा’च्या ‘जकात’ला लोकसमुदायावर अनिवार्य केले जेणेकरून ती उपवासाच्या (रोजाच्या) स्थितीत रोजादारद्वारा घडणाऱ्या व्यर्थ आणि निर्लज्जपणाच्या  गोष्टींचे (पापांचे) प्रायश्चित्त बनावी आणि गरिबांच्या आणि गरजवंतांच्या भोजनाचे नियोजन व्हावे. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

‘सदका-ए-फित्र’ला ‘शरियत’ (इस्लामी धर्मशास्त्र) मध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत दोन वैशिष्ट्ये कार्यरत आहेत. एक रोजादाराकडून उपवासाच्या स्थितीत प्रयत्न करूनसुद्धा घडलेल्या त्रुटी व चुकाची त्या (सदका-ए-फित्र) द्वारे नुकसानभरपाई होते; आणि दुसरा उद्देश असा आहे की ज्या दिवशी सर्व मुस्लिम ईदचा आनंदोत्सव साजरा करीत  असतील त्या दिवशी समाजातील गरीब लोक त्या आनंदापासून वंचित न राहता त्यांच्या भोजनाचे थोड्या-फार प्रमाणात का होईना नियोजन व्हावे. कदाचित याच कारणास्तव मुस्लिमांच्या घरातील सर्वच लोकांवर ‘फित्रा’ (धर्मदान) अनिवार्य करण्यात आले आहे आणि ईदच्या नमाजपूर्वी त्याचे वितरण करण्यास सांगितले गेले आहे.

- सय्यद जलालुद्दीन उमरी
   
    या पुस्तिकेत मनुष्य समाज प्रिय आहे आणि समाजाचा आरंभ कुटुंबाने होतो, याविषयीची चर्चा प्रारंभी करून कुटुंबाचे महत्त्व आणि आवश्यकता विशद केली आहे. कुटुंब समाजाचा पाया आहे आणि कुटुंब पुरुष व स्त्रीच्या माध्यमाने अस्तित्वात येते.
    पुस्तिकेत कुटुंबाचे धर्मातील स्थान विशद करताना कुटुंबाची खरी निर्मिती पैगंबरांद्वारे होते. प्रेषितांनी कौटुंबिक जीवन व्यतीत केले आहे. हे स्पष्ट केले आहे. विवाहाचे वैधानिक महत्त्व, विवाहाची घोषणा, समाजाने विवाहकार्यास सहाय्य करावे, पति पत्नीचे अधिकार व त्यांचे उत्तरदायित्व, मतभेदांना दूर करण्याचे उपाय, कुटुंब ईशदेणगी आहे, इ. विषयांवर चर्चा आली आहे.

आयएमपीटीअ.क्र. 171    -पृष्ठे-16      मूल्य - 10            आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/l70ceclw393gssmyt0qeh80fwcqp51zg

रहेमतुल्लील आलमीन हज़रत मुहम्मद मुस्तुफ़ा सल्लल्लाहो अलैहे वसल्लम यांचे सर्वच संदेश  सोनेरी शब्दांनी लिहिण्यासारखे आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये पारिवारिक सदस्य, शेजारी, समाज आणि  देशवासियांसोबत भेटणे आणि त्यांच्याशी व्यक्तिगत  संबंध बनवून ठेवण्यात अनेक अशा गोष्टींचा आणि व्यवहारशी सामना करावा लागते जे कधीकधी मनाला पटत नाही. अशा परिस्थितीत कधी ते स्वीकार करण्यात अडचणी येतात तर कधी त्यांच्याशी संबंध खराब होण्याची शक्यता असते. जेव्हा कधी त्यांच्या संवेदना आणि आस्थेला  धक्का लागतो तर कधी त्यांच्या कटू बोलण्याचा सामना करावा लागतो तर कधी  आर्थिक नुकसानही होते. अशा परिस्थितीमध्ये चांगला व्यक्ती तोच असतो जो लोकांना दूर जाण्यास रोकूण त्यांना एकत्र जमा करून राहतो. प्रत्येक त्रासाला अल्लाहकरिता   सहन करतो आणि लोकांशी संबंध बनवून ठेवतो. अल्लाहच्या जवळ अशी व्यक्ती प्रिय आहे जो लोकांच्या त्रास सहन करूनही लोकांशी संबंध जोडून ठेवतो. हजरत मोहम्मद स.अ.व.यांनी सांगितले आहे कि  ’जो व्यक्ति लोकांशी मिळून मिसळून राहतो आणि त्यांच्याकडून होणार्‍या त्रासाला न  घाबरत धैर्य ठेवून वागतो ती व्यक्ति चांगली आहे अशा व्यक्ती पेक्षा जे लोकांशी मिळून मिसळून राहत नाही आणि त्यांच्याकडून होणार्‍या त्रासाला सहन करण्याचे धैर्य त्यांच्याकडे नाही.’
    हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी सांगितले कि ज्या व्यक्तिला असं वाटते कि त्याच्या उपजीविकेमध्ये वाढ व्हावी आणि त्याचे आयुष्य वाढावे तर त्याने आपल्या नातलगांशी चांगले वर्तन ठेवायला हवे. अल्लाहच्या प्रसन्नतेकरिता कुणाला भेट देने, प्रेम-भाव व्यक्त करने अल्लाह च्या नजरेत खूप प्रिय आणि अत्यंत  प्रशंसनीय कार्य आहे. अशा लोकांसाठी हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी अनेक  उद्घोषणा केल्या आहेत. अशा लोकांचे  अल्लाह समोर मोठे  स्थान आहे.  परलोकामध्ये अल्लाह त्यांना आपल्या सिंहासनच्या सावलीत जागा देईल व त्यांना माफ करेल. अल्लाह कयामतच्या दिवशी म्हणेेल, कुठे आहेत ते लोकं जे माझ्या महानतेकरिता एकमेकांशी प्रेम भावाने राहतात, आज मी त्यांना आपल्या सावलीत ठेवणार, आज माझ्या ऐवजी कुठलाही सहाय्यक नाही. संबंध तोड़ने आणि संपवणे या बद्दल हजरत मोहम्मद स.अ.व. यांनी कठोर निर्देशही दिले आहेत कि संबंध तोड़नारा जन्नत मधे प्रवेश करनार नाही. या संबंधी पवित्र कुरआन ची सुरा राद 25 मध्ये अल्लाहचे  फरमान आहे कि जो कोणी या संबंधांना तोडेल ज्यांना  अल्लाहने जोडण्याचा आदेश दिला आहे आणि जो जमीनीवर  सांप्रदायिकता पसरवत फिरेल ते धिक्काराचे हकदार आहेत. कयामतच्या दिवशी त्यांच्या करिता वाईट ठिकाण सुनिश्‍चित आहे. तुम्ही एकमेकांना पाहून व्यवहार करणारे बनू नये व  जर कोणी अत्याचार करत असेल तर आपणही तसे करू नये या उलट सर्वांशी मिळून मिसळून रहा. वाईटांसोबतही चांगले वागा म्हणजे आयुष्यात सर्व गोष्टी ठीक होतील.          - डॉ एम ए रशीद, नागपूर

Madina
ख्वाब टूटे मगर हौंसले तो जिंदा है
हम वो कौम हैं जहां मुश्किलें शर्मिंदा हैं
प्रेषितपूर्व काळात अरबी लोक इतके वाईट होते की कोणी त्यांच्यावर राज्य सुद्धा करू इच्छित नव्हते. मूर्ती पूजा करणारा, टोळ्या करून राहणारा, उंट आणि बकर्‍या पाळणारा, त्यांच्या चार्‍यासाठी वणवण भटकणारा, खजूर खाणारा, उंट आणि बकरीचे दूध पिणारा, काटक आणि राकट अरबी समाजामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात व्यापलेली होती. दारू, जुगार आणि व्याभिचार हे त्या काळी प्रचलित असलेले सर्वच अवगुण त्यांच्यात होते. गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात होती. गुलाम आणि स्त्रीया या दोन समाज घटकांवर जे अत्याचार होत होते त्याचे वर्णन एका लेखात करणे केवळ अशक्य.
    वाचकांच्या लक्षात यावे यासाठी सांगतो की, स्त्रीयांना त्या काळात काडीची किमत नव्हती. कोणी किती स्त्रीयांशी विवाह करावेत याला सीमा नव्हती, वडिलांच्या मृत्यूनंतर सख्खी आई वगळता मोठ्या मुलाच्या ताब्यात वारसा हक्काने बापाच्या सर्व बायका येत होत्या एवढा अनैतिक हा समाज होता. मुलींचा जन्म ही तिरस्करणीय बाब होती, म्हणून मुलगी झाली तर तात्काळ जीवंत गाढून मृत बालिका जन्माला आली असा संदेश देण्यासाठी सुईनींना मोठमोठे नजराने अगोदरच देऊन ठेवले जात. व्यापारी काफिल्यांना लुटण्याचा प्रकार त्यांच्या इतका अंगवळणी पडला होता की, इस्लाम स्विकारल्यानंतर अनेक बेदुईन (भटक्या) अरबांना हेच कळत नव्हते की, दुसर्‍यांच्या काफिल्याला लुटण्यामध्ये वाईट ते काय?
    मात्र त्यांच्या या सर्व दुर्गुुणांसह अनेक सद्गुणही त्यांच्यात होते.          - (उर्वरित पान 2 वर)
त्यासंदर्भात शोधनचे माजी संपादक सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी लिहिले आहे की,  ”बेदुईन (भटक्या) अरबाला जगात कुणाचीही भीती वाटत नसे. मानवाची नाही की संकटाची नाही. एक भय मात्र त्याला लागून होतं ते म्हणजे मरणोत्तर आपलं काय होणार? या जगी ते सदैव आनंदी जीवन जगायचे. भुकेवर त्यांचं नियंत्रण होतं. अधिकाची त्यांना इच्छा नव्हती. ते सुखी-समाधानी असायचे. उद्याचा विचार ते करीत नसत. या जगातल्या धनसंपत्तीनं वंचित असण्याचं त्यांना काहीच वाटत नसे. ते फार संयमी होते. प्रत्येक अरब आपल्या कबिल्याच्या शिष्टाचारांचं पालन करीत, परंपरा, चालीरीतींचा आदर करीत. सोपवलेली जबाबदारी आनंदानं पार पाडीत. मुक्त जीवन त्यांच्या अत्यंत आवडीचं. तसेच ते व्यावहारिक जीवनदेखील जगत. आपल्या बेदुईन जगण्यावर त्यांना कमालीचा गर्व, आनंद आणि समाधान वाटायचं. अशा प्रत्येक शक्तीशी ते संघर्ष करीत असत जी त्यांना गुलाम बनवून त्यांचा अपमान करू पाहत असे. (प्रेषित मुहम्मद सल्ल. नवयुवगाचे प्रणेते पान क्र. 3)
    त्यांच्या याच अंगभुत गुणांचा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भरपूर उपयोग करून घेतला. त्यांनी सांगितले की, ” जो जहालत (अज्ञान काळात) मध्ये चांगला तोच इस्लाममध्येही चांगला ठरेल.” आणि नेमकं तसच झालं. बघता-बघता अरबांचा मेकओव्हर झाला. ते जेवढे असभ्य होते तेवढे सभ्य झाले. इतके की शंभर वर्षाच्या आत पृथ्वीच्या एक तृतीयांश पृष्ठभागावर त्यांनी कल्याणकारी इस्लामी राज्यव्यवस्था कायम केली. अज्ञानता, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, विषमता, अन्याय आणि अत्याचाराला कंटाळलेल्या जनतेने ज्या-ज्या ठिकाणी मुस्लिम गेले त्या-त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले.
    आपल्याकडेच पाहना! मुस्लिम आक्रमकांमुळे भारतात इस्लाम पसरला असा व्यापक गैरसमज आज 21 व्या शतकातही बहुसंख्य लोकांमध्ये पसरलेला आहे. वास्तविक पाहता दक्षिण भारतात इस्लाम मलबारच्या मार्गे मुस्लिम व्यापार्‍यांसोबत आला, तर उत्तर भारतात सुफी संतांसोबत आला. या दोघांच्याही समता मुलक वागण्याने वर्णव्यवस्थेचे चटके सहण करणारा समाज त्यांच्याकडे आकर्षित झाला. मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमकांच्या तलवारीच्या जोरावर भारतात इस्लामचा प्रसार झाला, हे गृहितक मुदलातच चूक आहे, कारण तलवार असो का एके 47, शक्तीच्या बळावर कोणीही कोणाचे विचार बदलू शकत नाही, श्रद्धा बदलणे तर लांबच राहिले. असे करणे शक्य असते तर आज प्रत्येक देशात आधुनिक हत्यार आहेत, त्या बळावर लोकांच्या श्रद्धा सहज बदलता आल्या असत्या. त्या बदलता येत नाहीत यातच सर्व काही आले.
    प्रेषित सल्ल. यांनी 23 वर्षाच्या आपल्या प्रेषितत्वाच्या काळात जे युद्ध केले ते बहुतांशी रक्षात्मक होते. ज्या ठिकाणी आक्रमण केले असेल तेही स्वरक्षणार्थ घेतलेल्या पुढाकाराचे युद्ध होते. आणि आश्‍चर्य म्हणजे या 23 वर्षात झालेल्या युद्धांमध्ये फक्त 1 हजार 18 लोक मारले गेले. त्यात 250 मुस्लिम तर 750 विरोधक होते. यात बनू कुरैजा नावाच्या एका कबिल्याच्या 400 लोकांना जो मृत्यूदंड दिलेला होता त्यांचाही या आकडेवारीत समावेश आहे. म्हणजे ती आकडेवारी जर सोडली तर या सर्व युद्धात विरोधी पक्षांचे फक्त 350 लोकच मारले गेले. कल्याणकारी इस्लामी व्यवस्था स्थापन करण्यासाठी ही युद्धे मानवी इतिहासावर उपकारकच म्हणावे लागले. कारण एवढे लोक तर आपल्या देशात एका आठवड्यात रस्ते अपघातात मरण पावतात.
    इस्लामच्या प्रचार आणि प्रसारामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी खरी समता, खरा न्याय आणि खर्‍या करूणेची अमलबजावणी समाजामध्ये करून दाखविली. त्यांनी जमीन नव्हे मने जिंकली. लोकांना असभ्यतेकडून सभ्यतेकडे बोलाविले, प्रेमाने बोलाविले, त्यांच्यावर करूणेचा वर्षाव केला, त्यांना सोबत घेऊन जेवण केले, त्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्यांच्यामध्ये खरी-खुरी समता प्रस्थापित केली.
    फतेह मक्कानंतर जेव्हा काबागृहावर चढून अजान देण्याची वेळ आली तेव्हा शिडी नसल्यामुळे कधीकाळी गुलाम राहिलेल्या काळ्याकुट्ट हबशी आदिवासी व्यक्ती ज्यांचे नाव हजरत बिलाल रजि. होते. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या पवित्र खांद्यावर त्यांना पाय ठेवून काबागृहावर चढविले. हे दृश्य पाहणार्‍या हजारो लोकांच्या किंचाळ्या निघाल्या. या दृश्याने भारावून जावून कित्येक लोक रडू लागले. या दर्जाच्या समतेचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता. जे मुस्लिम लोक प्रेषित सल्ल. यांच्या पवित्र हाताला स्पर्श करण्यासाठी आसूसलेले असत त्या पवित्र प्रेषितांच्या पवित्र खांद्यावर पाय ठेऊन पवित्र काबागृहावर चढण्याचा मान कुठल्या कुलीन अरबी सरदाराला न मिळता हजरत बिलाल रजि. यांच्यासारख्या आदिवाशाला मिळाला. हे दृश्य पाहून लोकांना बिलाल रजि. यांच्या नशीबाचा हेवा वाटू लागला.
    प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार संक्षिप्तरित्या सांगायचा झाल्यास तो त्यांनी हज्जतुल विदाच्या दिवशी अराफातच्या मैदानात जे भाषण दिले होते तो होय. हा एका प्रकारचा मानवी हक्काचा पहिला जाहीरनामाच म्हणायला हवा.
    सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी प्रेषित सल्ल. यांचे भाषण त्यांच्या भाषेत खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे. ते लिहितात, प्रेषित सल्ल. म्हणाले की, ”अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही, तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.
    हे लोकहोे ! मी सांगतो ते ऐका. मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.
    आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसचं लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाह समोर एक दिवस हजर व्हायचंय. तुमच्या कर्मांची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घरादारांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्माची झडती द्यावी लागेल.
    अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.
    हे लोकहो ! अल्लाहनं तुम्हाला एकच स्त्री-पुरूषा पासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या त्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित आहे जो सदाचारी असेल.
    सारे मानव आदमची संतती आहे. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रतिष्ठा नाही की अरबेत्तरांना अरबांवर प्रतिष्ठा नाही. तसंच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणसावर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो! अल्लाहनं तुमच्या छोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.
    सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्टयाचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्द करतो.
    लोकहो ! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसेच तुमचे त्यांच्यावर अधिकार आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्या (पत्नी) म्हणून स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाई आणि दयेनं वागा.
    कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही देणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलाचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.
    पाहा ! माझ्यानंतर तुम्ही परत भरकटू नका. आपसांत रक्त सांडू नका. कुरैशच्या लोकांनो! तुमच्या मनांवर या जगाचं ओझं घेऊन तुम्ही अल्लाहसमक्ष उभं राहावं आणि दुसर्‍यांनी सत्कर्म घेऊन यावं असं होऊ नये. तसं झालं तर मी तुमच्या काही कामी येणार नाही.
    कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊ आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाला हात लावू नका. अन्याय करू नका.
    अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्यूपत्र करू नये.
    ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्याभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्यूदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.
    कोणी आपलं कुळ बदलू नये, दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील. कर्ज घेतल्यात ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या.
    मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ’कुरआन’ आहे ! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला, हे लक्षात ठेवा.
    लोकहो ऐका ! आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याला बराच काळ लोटून गेलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याचवेळी वर्षाचे बारा महिने ठरवले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांचं रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.
    तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा.
    ऐका ! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या अ‍ॅबिसीनियन (निग्रो)  गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याच्या आदेशाचं पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !
    लोकहो ! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खूश दिलानं. अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही जन्नतमध्ये प्रवेश कराल. आणि पाहा, एकाने केलेल्या गुन्ह्यासाठी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही. लोकहो ! माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?”
    लोक म्हणाले, ”तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.”
    लोकांचं हे बोलणं ऐकूण प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, ” अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस.”
    येणेप्रमाणे एका उम्मी (निरक्षर) प्रेषित सल्ल. यांच्या तर्फे अल्लाहने आपला धर्म पृथ्वीतलावरील सर्व लोकांसाठी पोहोचवला. आता जे या शिकवणीच्या विरूद्ध जगण्याचा प्रयत्न करतील ते अपयशी ठरतील आणि जे प्रेषित सल्ल. यांच्या या शिकवणीनुसार जगतील ते यशस्वी होतील. हाच प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार आहे.

- एम.आय.शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget