Latest Post

येत्या दोन दिवसात रमजानचे आगमन होत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र इतर वर्षांप्रमाणे या वर्षाचे रमजान वेगळे असून, संपूर्ण लॉकडाउनमध्ये रमजानचा महिना आलेला आहे. हा महिना कसा साजरा करावा, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्वेही ठरवून दिलेली आहेत. देशाचा कायदा पाळण्याचा आदेश आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून मिळतो. म्हणून शारीरिक अंतर राखून लांब राहून हे रमजान साजरे करावे लागणार आहेत. म्हणून पाचवेळेसची नमाज आणि तरावीहची विशेष नमाज मस्जिदमध्ये जावून अदा करणे यावर्षी शक्य होणार नाही, याची खंत आपल्या सर्वांनाच आहे. मात्र कोरोनाला हरविण्यासाठी हृदयावर दगड ठेउन आपल्याला मस्जिदीपासून लांब रहावे लागणार आहे. रमजान म्हटलं की, सार्‍यांची लगबग असते. मार्केटमध्ये प्रचंड उलाढाल होते. रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत असते. वेगवेगळे चमचमीत पदार्थांनी हॉटेल आणि गाडे सजलेले असतात. यावर्षी मात्र असे काहीच होणार नाही. एका दृष्टीने जरी हिरमोड करणारी ही परिस्थिती असली तरी दुसर्‍या दृष्टीने आत्मचिंतन करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एकांतामध्ये अभ्यास चांगला होतो. रमजानमध्ये कुरआनला समजण्यासाठी एकांताममध्ये अभ्यास करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. एरव्ही तर कुरआन समजून घेण्याला अनेक लोकांना वेळ नसतो. पण आता ही वेळ चालून आलेली आहे. म्हणून प्रत्येकाने ही संधी सोडू नये. कारण कोणी काहीही म्हणो, कुरआन हीच यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
    अल्लाहवर विश्‍वास ठेवणार्‍या प्रत्येक नागरिकासाठी ही एक चारित्र्यसंवर्धनाची संधीच आहे. आज भारतामध्ये पाश्‍चात्य असभ्यतेचा प्रभाव खोलपर्यंत रूजलेला आहे. पावलापावलावर खोटेपणा, विश्‍वासघातकीपणा, अश्‍लिलता इत्यादी विकारांनी थैमान घातलेले आहे. चांगल्या माणसांना जगणे मुश्किल करून टाकलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांचे हे राष्ट्रीय आणि धार्मिक कर्तव्य आहे कि, आपल्या प्रिय देशबांधवांपर्यंत सत्य आणि चांगुलपणाचा संदेश पोहोचविणे. रमजान म्हणताच सगळीकडे एक चैतन्याचे वातावरण निर्माण करते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना रोजे ठेवण्याचा उत्साह असतो. दिवसभर उपाशी राहून इबादत केल्याने एका वेगळ्याच आत्मीक आनंदाची अनुभूती होते. वर्षभर जे लोक इस्लामी उपासनेपासून अंतरराखून असतात ते सुद्धा रमजानच्या महिन्यामध्ये मनापासून इबादत करण्यामध्ये तल्लीन होतात. अनेक लोक ठरवून सुट्ट्या घेतात व या 30 दिवसाच्या तजकिया-ए-नफ्स (आत्म्याचे शुद्धीकरण) मोहिमेमध्ये उत्साहाने सहभागी होतात. तसे पाहता प्रत्येक समाजामध्ये उपवास ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. मात्र रमजानमधील रोजे हे इतर उपवासापेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे असतात. सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या पेय आणि पदार्थाचे सेवन न करता राहणे हे केवळ आत्मीक बळानेच शक्य होते. नसता दुपारच्या जेवणाला तासभर उशीर झाला तर सहन होत नाही. रमजानमध्ये मात्र महिनाभर दिवसभर उपाशी राहूनसुद्धा माणसे शांत राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाहनी माणसाची रचना दोन गोष्टींपासून केलेली आहे. एक त्याचे शरीर आणि दूसरे त्याची आत्मा. शरीर रक्त, मांस, हाडे यांच्यापासून बनलेले आहे व दृश्य आहे. (उर्वरित  मात्र आत्मा अदृश्य आहे. आत्म्याच्या बाबतीत कुरआनमध्ये म्हटलेले आहे कि, हा आत्मा म्हणजे ’अम्र-ए-रब्बी’ म्हणजेच अल्लाहचा आदेश आहे. ज्याप्रमाणे शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आत्मा सुद्धा आजारी पडतो. ज्याप्रमाणे शरीराला पोषणाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्यालाही पोषणाची गरज असते. शरीराचे पोषण अन्न, पाण्याने होते तर आत्म्याचे पोषण इबादते इलाही(अल्लाहच्या उपासने) ने होते. आणि उपासनेचा उत्कृष्ट आविष्कार नमाज आणि रोजा आहे. रोजा ही एक अदृश्य इबादत आहे. एखाद्या माणसाने रोजा ठेवला म्हणजे स्वखुशीने त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. कोणासाठी? फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहासाठी. म्हणजे रोजा एक अशी इबादत आहे, ज्याचा संबंध अल्लाह आणि त्याचा बंदा दोघांमध्येच आहे. नमाजला जात असतांना सगळे लोक पाहत असतात. पण रोजा आहे का नाही? हे लोकांना कळत नाही. हे फक्त सर्वश्रेष्ठ अल्लाहला कळते. रोजामुळे तक्वा (चांगले चारित्र्य) वाढतो. लहापणापासून मुस्लिम मुलांना रोजा ठेवण्याची सवय लावली जाते. त्यातून त्यांचे चारित्र्य घडते, ते असे की- लहान मुले जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा ते अल्लाहला घाबरून संधी असूनही पाणीही पीत नाहीत आणि जेवणही करीत नाहीत. समजा त्यांनी लपून घोटभर पाणी पीले तरी त्यांना कोणी पाहणारा नसतो. मात्र ते स्वमर्जीने अल्लाह पाहत आहे, म्हणून पाणी पीत नाहीत. यात त्यांच्या आत्म्याचे प्रशिक्षण होते. अल्लाहचे भय मनात निर्माण होण्यासाठी मदत होते. हीच मुले मोठी हाऊन देशाचे नागरिक बनतात आणि अल्लाहच्या भयाने वाम मार्गापासून दूर राहतात. लहानपणी जर का पूर्वजाद्वारे व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले नाहीत तर हीच मुले मोठी झाल्यावर वाईट गोष्टींच्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. रोजाचा मूळ उद्देशच चारित्र्य संवर्धन असल्यामुळे या महिनाभरात रोजदारांकडून कसून मेहनत घेतली जाते. भल्या पहाटे उठून मर्जी नसतानांनाही, भूक नसतांनाही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून काहीतरी खावं लागतं. त्यानंतर दिवसभर इच्छा असूनही, भूक असूनही केवळ अल्लाहचा आदेश आहे म्हणून अन्न आणि पाण्यासारख्या एरव्ही हलाल असलेल्या गोष्टींपासून दूर रहावे लागते. परत त्यात पाच वेळेसची नमाज आली. त्याशिवाय, 20 रकात अतिरिक्त तरावीहची नमाज आली. म्हणजे एकंदरित इबादतीचा भरगच्च कार्यक्रम असतो . मात्र यावेळेस सामुहिक नमाज वगळता बाकीचे सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पाडता येवू शकतात. त्यातही शासकीय निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. 30 दिवसाच्या सततच्या या खडतर जीवन व्यवस्थेमुळे माणसाला एवढी उर्जा मिळते की, पुढच्या रमजानपर्यंत ती टिकते. पुढच्या रमजानपर्यंत 11 महिन्याचा जो काळ असतो त्या काळात येणार्‍या वेगवेगळ्या प्रलोभनांना रोजातून मिळालेल्या उर्जेमुळे मुस्लिम व्यक्ति बळी पडण्याची शक्यता कमी असते. रोजाच्या संदर्भात नुसते उपाशी राहून उपयोग नाही. यासंबंधी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे, रोजा फक्त उपाशी राहण्याचे नाव नाही. तर डोळ्याचा रोजा, हाताचा रोजा, पायाचा रोजा, कानाचा रोजा सर्वार्थाने रोजा म्हणजे रोजा ठेवणार्‍याने डोळ्यांनी वाईट पाहू नये, हाताने वाईट करू नये, त्याची पावले वाम मार्गाकडे उठू नये, कानांनी वाईट ऐकू नये, कोणाशी भांडू नये, कोणी भांडायला आला तर त्याला नम्रपणे सांगावे की मी रोजात आहे. एकंदरित ही एक महिन्याची पवित्र जीवनपद्धती रोजा ठेवणार्‍या व्यक्तिस एवढी आत्मीक शक्ती प्रदान करते की, समाजासाठी ती व्यक्ति उपयोगी होवून जाते. आज समाजामध्ये राहणारे अनेक लोक समाजहिताच्या विरूद्ध वागताना दिसून येतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी उपकारक ठरण्याऐवजी अपकारक ठरत असते. रोजाच्या माध्यमातून आदर्श व्यक्तिंची निर्मिती करावी, ज्यायोग्य एक आदर्श समाजाची रचना होईल, हाच उद्देश आहे. शऊरी (समजून उमजून) पद्धतीने रोजा ठेवणे यासाठी प्रचंड माणसिक तयारीची गरज लागते. तर मित्रांनों! या दोन दिवसात आपली मानसिक तयारी करून घ्या आणि रमजानच्या स्वागतासाठी तयार व्हा.

- बशीर शेख

अज्ञानकाळात (अर्थात इस्लामपूर्व काळात) अरबवासी मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते, परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेषदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलतानादेखील त्यांची मान शरमेने खाली जात होती. इतकेच नव्हे तर काही कठोरहृदयी बाप आपल्या हाताने आपल्या निष्पाप (अल्पवयीन) मुलींना जिवंत दफन करीत होते कुरआनने म्हटले आहे,
"अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.''                (दिव्य कुरआन, 42 : 49 - 50)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली,
"अल्लाहने एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे कोणतीही कसोटी घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या मुली त्या व्यक्तीकरिता नरकापासून वाचण्याचे साधन असतील.''    (हदीस : बुखारी)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
"तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिनी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर तो स्वर्गात निश्चितच प्रविष्ट होईल.''                (हदीस : तिर्मिजी)
एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"जी व्यक्ती दोन मुलींचे त्यांच्या तारूण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने (एकत्र) येऊ.'' असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखविली.    (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात,
"ज्याला मुलगी असेल त्याने तिला दफन केले नाही अथवा तिच्याशी उपेक्षेने वागला नाही किंवा तिच्याऐवजी आपल्या मुलास प्राधान्य दिले नाही, तर अल्लाह त्यास स्वर्गात स्थान देईल.''    (हदीस)
एकदा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.''     (हदीस : मुसनद अहमद)
माननीय सुराका (रजि.) यांना अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले,
"सर्वात मोठे दान कोणते हे मी तुम्हाला सांगू नये काय?''
माननीय सुराका (रजि.) यांनी नम्रपणे सांगितले, ""हे अल्लाहचे पैगंबर (स.)! आपण अवश्य सांगावे.''
पैगंबर म्हणाले, ""आपल्या त्या मुलीवर उपकार कर जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.''     (हदीस)
    अशाप्रकारे इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकारदेखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपातसुध्दा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे.

निरीक्षणाबरोबर अनुमान व भ्रामक कल्पनेच्या साहाय्याने निश्चित केले जाणारे दुसरे मत असे की, हे जग आणि ते शरीर मानवासाठी एक यातनागृह आहे. मानवाचा आत्मा एक शिक्षा भोगणारा कैदी म्हणून या बंदीगृहात कैद केला गेला आहे. सुखोपभोग, इच्छा व वासना आणि त्यासंबंधीने मानवाला भासणाऱ्या सर्व गरजा वास्तविकता या बंदीगृहाची साखळदंड आहेत. मनुष्य जितका या जगाशी व या जगातील वस्तूंशी संबंध ठेवील तितका जास्त तो या साखळदंडात अडकत जाणार आणि अधिक प्रकोपास पात्र ठरणार. मुक्तीचा मार्ग याशिवाय अन्य कोणताच नाही की, जीवनाच्या सर्व भानगडींपासून संबंध तोडले जावेत, इच्छा व वासना नष्ट केल्या जाव्यात, सुखोपभोगाशी काडीमोड घेतली जावी, शारीरिक गरजा आणि वासनापूर्तला नकार दिला जावा, रक्त व मांसाच्या संबंधामुळे निर्माण झालेले सर्व प्रेम मनातून बाहेर घालविले जावेत आणि आपला शत्रू म्हणजे मन व शरीराला इंद्रिय दमन आणि घोर तपश्चयेंद्वारे इतक्या यातना दिल्या जाव्यात की आत्म्यावर त्यांचे नियंत्रण राहू नये. अशाप्रकारे आत्मा हलका आणि स्वच्छ व निर्मळ होईल. त्यामुळे त्याला मुक्तीच्या उƒ स्थानाप्रत उÈाण घेण्याची शक्ती प्राप्त होईल.
या मतानुसार जे वर्तन निर्माण होते त्याची गुणवैशिष्टये अशी-
पहिले असे की, त्यामुळे माणसाची एकूण प्रवृत्ती व त्याचा कल सामूहिकतेकडून वैयक्तिकतेकडे आणि संस्कृतीकडून रानटी अवस्थेकडे वळतो. तो जग आणि जागतिक जीवनापासून तोंड फिरवून उभा राहतो. जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. त्याचे संपूर्ण जीवन असहकार आणि असहयोगाचे जीवन बनते. त्याचे आचरण जास्त करून नकारात्मक  स्वरूपाचे होते.
दुसरे असे की, या मतामुळे सदाचारी लोक जगाच्या व्यवहारापासून दूर होऊन आपल्या मुक्तीच्या काळजीत एकांतवासाकडे धाव घेतात आणि जगाचे सर्व व्यवहार दुष्ट लोकांच्या हातात येतात.
तिसरे असे की, या मताच्या संस्कृतीवर जितक्या प्रमाणात प्रभाव होतो तितक्याच प्रमाणात लोकांत नकारात्मक नीतिमत्ता, असंस्कृतपणा आणि व्यक्तिगत स्वरुपाच्या प्रवृत्ती आणि निराशात्मक विचार निर्माण होतात, म्हणून प्रत्येक अत्याचारी सत्ता त्यांना सहजपणे नियंत्रणात आणू शकते. खरे म्हणजे हा दृष्टिकोन सामान्यजणांना अत्याचारापुढे लोटांगण घालणारे बनविण्यात जादूसमान प्रभाव राखतो.
चौथे असे की, मानवी स्वभावाशी या विरक्तिवादी दृष्टिकोनाचा सतत संघर्ष होत राहतो, त्यात बव्हंशी या दृष्टिकोनाचा पराभवच होत असतो. मग जेव्हा याचा पराभव होतो तेव्हा आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्याला निमित्तांच्या छत्राखाली आश्रय ¿यावा लागतो. म्हणून कोठे प्रायश्चित्ताचे तत्त्व निर्माण होते, कोठे भौतिक प्रेमाचे सोंग भरले जाते तर कोठे संन्यासाच्या पडद्याआड असा भोगवाद अवलंबिला जातो की, ज्याची भौतिकवादींनासुद्धा लाज वाटावी.

- डॉ. एम. जियाउर्रहमान आज़मी

भाषांतर - बादशाह बार्शीकर

इस्लामी जगताचा ह्या दिव्य विचाराचा वारसा कोणी पुढे न्यायचा ? आजच्या भारतीय नेत्यांची क्षुद्र स्वार्थासाठी आपसात चाललेली हाणामारी, राष्ट्र मेले तरी आम्ही चैनित जगलो पाहिजे हा अट्टाहास. चोहोकडून अंधारून आल्या सारखे वाटते.
तेव्हा अचानक प्रकाशाचा झोत, कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या रूपाने हे भाषांतर करताना जाणवला. क्षणकाल अंतरबाह्य उजळून निघाल्याची सुखद जाणीव मनाला झाली.
इस्लाम हा एक केवळ तथाकथित धर्म नाही. तर ती वैश्विक एकात्मतेची जाणीव आहे. वाचकांना विनंती आहे. त्यांनी कसलेही पूर्वग्रह मनात न आणता इस्लाम समजून घ्यावा.

आयएमपीटी अ.क्र. 92       पृष्ठे - 120    मूल्य - 25          आवृत्ती - 1 (2004)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/ole08p8jkyogs2jwa1d32otm3b86t31c




माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह आणि पारलौकिक जीवनावर ईमान (श्रद्धा,  विश्वास) बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय खुवैलिद बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह व पारलौकिक जीवनावर ईमान (श्रद्धा,  विश्वास) बाळगणाऱ्या लोकांनी आपल्या पाहुण्याचे मन:पूर्वक स्वागत केले पाहिजे. पहिला दिवस पुरस्काराचा असतो, यात पाहुण्याला उत्तमोत्तम जेऊ घातले पाहिजे आणि पाहुणचार तीन दिवसांपर्यंत आहे. (म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या पाहुणचारात नैतिक औपचारिकपणा  दाखविण्याची आवश्यकता नाही.) त्यानंतर जे काही तो करेल त्याच्यासाठी तो दानधर्म असेल. पाहुण्याने आपले आतिथ्य करणाराला संकटात  टाकून त्याच्याबरोबर राहणे अवैध व चुकीचे आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये अतिथी आणि आतिथ्य करणारा या दोघांना उपदेश करण्यात आला आहे. आतिथ्य करणाराला या गोष्टीचा उपदेश करण्यात आला  आहे की त्याने आपल्या अतिथीचा पाहुणचार करावा, त्याचे मन:पूर्वक स्वागत करावे. पाहुणचाराचा अर्थ फक्त जेवण-खाण करण्यापुरताच मर्यादित नसून त्याच्याशी आनंदी मुद्रेने बोलणे, उत्साहाने वागणे हे सर्व आले. पाहुण्याला उपदेश करण्यात आला आहे की जेव्हा एखाद्याकडे पाहुणा बनून   गेल्यानंतर तेथेच ठिय्या मारून राहू नये जेणेकरून आतिथ्य करणारा वैतागला जावा. ‘हदीस मुस्लिम’मधील एका हदीसकथनात या हदीसचे  चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, ‘‘एखाद्या मुस्लिमाने आपल्या बंधुकडे तो  वैतागून जाईपर्यंत किंवा त्याला संकटात टाकून वास्तव्य करणे एका मुस्लिमाकरिता अवैध आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तो  कशा प्रकारे त्याला संकटात टाकील?’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ते अशाप्रकारे की तो स्वत: त्याच्याकडे पाहुणा बनून आला असेल आणि अधिक  दिवस राहिला असेल तेव्हा त्याच्याकडे आतिथ्य करण्यासाठी काहीही नसेल.’’

शेजाऱ्याचे अधिकार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमान बाळगत नाही  (किंवा मुस्लिम नाही).’’ विचारले गेले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! कोण ईमान बाळगत नाही?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याचा शेजारी त्याच्या  त्रासापासून सुरक्षित नसेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जिब्रिल (अ.) मला शेजाऱ्याशी चांगला व्यवहार करण्यास  वारंवार सांगत राहिले. एक क्षण असा आला की ते शेजाऱ्याला शेजाऱ्याचा वारसच बनवितात की काय असे मला वाटू लागले. (हदीस : मुत्तफक  अलैह) माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले की ‘‘तो मुस्लिम नाही जो   स्वत: पोटभर जेवतो आणि त्याच्या बाजूला राहणारा शेजारी उपाशी राहतो.’’ (हदीस : मिश्कात)

माननीय अबू जर (रजि.) यांना पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अबू जर! जेव्हा तू मांसाचा रस्सा शिजवशील तेव्हा त्यात थोडे पाणी अधिक  टाक आणि आपल्या शेजाऱ्यांचीही काळजी घे.’’ (हदीस : मुस्लिम)

इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्त्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
"अल्लाहच्या संकेतांपैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.''     (दिव्य कुरआन,  30 : 21)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
"पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.''    (दिव्य कुरआन, 4 : 34)
कधीकधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सद्वर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
"त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.''    (दिव्य कुरआन, 4 : 19)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
"जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.''    (हदीस : अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
"कोणत्याही ईशभक्ताने (मोमीन) कोणत्याही धर्मपरायण (मोमीना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.''   
    (हदीस : मुस्लिम)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""ईमानधारकांपैकी परिपूर्ण ईमानधारक तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.''     (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
""हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.'    (हदीस : मुस्लिम)

त्या मतांपैकी एक मत असे आहे की, सृष्टीची ही व्यवस्था विनास्वामी तर नाही, परंतु तिचा केवळ एकच स्वामी (अधिपती व पालनकर्ता) आहे असे नाही, तर तिचे अनेक स्वामी (अधिपती व पालनकर्ते) आहेत. सृष्टीच्या निरनिराळ्या शक्ती¨चे निरनिराळे सूत्रधार आहेत, तसेच माणसाचे सुदैव व दुदैव, त्याचे यशापयश आणि त्याची हानी व लाभ अनेक शक्ती¨च्या कृपा व अवकृपेवर अवलंबून आहे. सदरहू मत ज्या लोकांनी स्वीकारले आहे, ज्यांनी मग तर्क लढवून हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की, दैवी शक्ती कोठे कोठे आणि कोणाकोणाच्या हातात आहे. असे करताना ज्या ज्या वस्तूंवर त्यांची दृष्टी जाऊन खिळली त्यांना त्यांनी देव मानले आहे.
या मताच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो त्याची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत -
पहिले असे की, त्यामुळे माणसाचे उभे जीवन भ्रामक कल्पनेचे माहेरघर बनते. माणूस कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्याविना केवळ आपल्या भ्रामक कल्पनेने बऱ्याचशा वस्तूंसंबंधी असे मत निश्चित करतो की, त्या चमत्कारिकरीत्या त्याच्या भाग्यावर इष्ट वा अनिष्ट प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे तो इष्ट प्रभावाच्या भ्रामक आशेत आणि दुष्ट प्रभावाच्या काल्पनिक भीतीत गुरफटला जाऊन आपल्या बऱ्याचशा शक्ती¨ना व्यर्थरीतीने वाया घालवून बसतो, कोठे एखाद्या कबरी व समाधीशी अपेक्षा करतो की, त्या त्याचे कार्य सिद्ध करतील, तर कोठे एखाद्या मूर्तीवर भिस्त ठेवतो की, ती त्याचे भाग्य उजळेल, कोठे एखाद्या काल्पनिक वि¿नहत्र्याला खूश करण्यासाठी धावपळ करतो, तर कोठे अशुभ शकुनामुळे वैफल्यग्रस्त होतो व शुभ शकुनाच्या आधारे कपोलकल्पित किल्ले उभारतो. अशा सर्व गोष्टी त्याचे विचार व प्रयत्नांना स्वाभाविक कृतीच्या मार्गापासून दूर करून एका अगदी अनैसर्गिक मार्गावर टाकतात.
दुसरे असे की, या मतामुळे पूजाअर्चा, नवस व नैवेद्य आणि इतर विधी व रूढींची एक लांबलचक नियमावली तयार होते. त्यात गुरफटून माणसाच्या शक्ती व प्रयत्नांचा मोठा भाग निरर्थक उद्योगांत खर्च होतो.
तिसरे असे की, जे लोक अनेकेश्वरवादी भ्रामक कल्पनेत गुरफटलेले असतात त्यांना मूर्ख बनवून आपल्या जाळ्यात अडकविण्याची चलाख व्यक्ती¨ना चांगलीच संधी मिळते. एखादा राजा होऊन बसतो आणि सूर्य, चंद्र व इतर देवांशी आपला वंशसंबंध जोडून लोकाची अशी खात्री पटवितो की, ""आम्हीसुद्धा देवापैकी आहोत, तुम्ही आमचे दास आहात.'' एखादा पुरोहित अथवा मुजावर होऊन विराजमान होतो आणि म्हणतो की, ""तुमचा लाभ व तुमची हानी ज्यांच्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. तुम्ही आम्हाला माध्यम बनविल्याशिवाय त्यांच्याप्रत पोचू शकत नाही.'' कोणी ताईत, गंडे आणि मंत्र व तंत्र चे सोंग करून लोकांची अशी खात्री पटवितो की, आमच्या या गोष्टी चमत्कारिकरीत्या तुमच्या गरजा भागवतील, मग अशा चाणाक्ष लोकांच्या वंशजांना कायमस्वरूपी घराण्याचे व वर्गाचे रूप येते, मग कालांतराबरोबर त्यांचे हक्क व अधिकार आणि प्रभाव व प्रतिष्ठेत वाढ होत जाऊन त्यांची पाळेमुळे खोलवर रूतली जात असतात. अशा प्रकारे या धारणेद्वारे शाही घराणे, धार्मिक व आध्यात्मिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या ईशत्वाचे जोखड सर्व माणसांच्या मानगुटीवर बसते. हे ढोंगी देव त्यांना अशा प्रकारे आपले सेवक बनवितात की, जणू ते त्यांच्यासाठी दूध देणारे व स्वारी आणि ओझे वाहणारी जनावरे आहेत.
चौथे असे की, हा दृष्टिकोन ज्ञानविज्ञान आणि कला व तंत्राज्ञानासाठी, साहित्य व तत्त्वज्ञानासाठी आणि संस्कृती व राजकारणासाठी कोणताही कायमस्वरूपी पाया उपलब्ध करीत नाही, तसेच या कपोलकल्पित देवांपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही की, ज्याचे नियमितपणे पालन व्हावे. या ढोंगी देवांशी माणसाचा संबंध केवळ या हद्दीत मर्यादित असतो की, माणसाने त्यांची कृपा व साहाæय प्राप्त करण्यासाठी केवळ पूजेच्या काही विधी पूर्ण कराव्यात, उरले जीवनाचे इतर व्यवहार तर त्यांच्यासंबंधी नियम व कायदे करणे, अंमलबजावणीच्या पद्धती ठरविणे माणसाचे स्वत:चे काम आहे.
अशा प्रकारे अनेकेश्वरवादी समाज प्रत्यक्षात त्याच सर्व मार्गांवर चालतो ज्या मार्गांचा उल्लेख निव्वळ अज्ञानासंबंधी आताच मी केला आहे. तीच नीतिमत्ता, तेच आचरण, तीच सांस्कृतिक पद्धत, तीच आर्थिकव्यवस्था आणि तेच शिक्षण व साहित्य, या सर्व दृष्टींनी अनेकेश्वरवादाच्या वर्तनात आणि निव्वळ अज्ञानाच्या वर्तनात कोणताही मौलिक स्वरूपाचा फरक नसतो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget