Latest Post

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते. मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये  द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते. ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.
  
जकात कोणाला देते येते?
    सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”  
    1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषत: लॉकडाउनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देउन या निधीतून त्यांची मदत केली जाउ शकते. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या-छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
    भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वार्‍यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या द्वारे स्वत:च्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत. खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे.  जकात गोळा करणे व वितरीत करणे यासाठी या माध्यमाचा उपयोग करता येईल.
    जकात एक ईश्‍वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात. या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5 टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही आपल्यासाठी मान उंचावणारी आणि संतोषजनक बाब आहे.

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. ५१     पृष्ठे - ४०      मूल्य - 15          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/dljf5pffxwov1ti0riyr0q1krdrrdke2

Allah
अल्लाहला संपूर्ण अधिकार आहे की, तो जे इच्छील ती आज्ञा देईल. सेवकांना त्यासंबंधी कसे व का विचारण्याचा अधिकार नाही. जरी त्याच्या सर्व आज्ञा विवेक व कल्याणावर आधारित आहेत. परंतु मुस्लिम सेवक त्याच्या आज्ञेचे पालन अशासाठी करीत नाही की, ती त्याला योग्य वाटते अथवा कल्याणकारी समजतो, तर केवळ अशासाठी करतो की ही स्वामीची आज्ञा आहे. जी वस्तू त्याने निषिद्ध ठरविली आहे ती अशासाठी निषिद्ध आहे की, त्याने निषिद्ध ठरविली आहे आणि अशाच प्रकारे जी त्याने धर्मसंमत ठरविली आहे. तीसुद्धा कोणत्या अन्य आधारावर नव्हे, तर केवळ या आधारावर धर्मसम्मत आहे की जो अल्लाह या साऱ्या वस्तूंचा मालक आहे, तो आपल्या सेवकांना त्या वस्तूंच्या उपयोगाची परवानगी देतो. म्हणून पवित्र कुरआन पूर्ण भर देऊन हे तत्त्व ठरवितो की, वस्तूंच्या निषिद्ध व धर्मसम्मत असण्यासाठी स्वामीची परवानगी व प्रतिबंध असण्याशिवाय अन्य कोणत्याही आधाराची अजिबात गरज नाही. तशाच प्रकारे सेवकासाठी एखादे काम धर्मानुकूल असणे किंवा नसण्याचा आधार याच्याशिवाय अन्य काही नाही की, अल्लाह जी धर्मानुकूल ठरवील ती धर्मानुकूल आहे आणि जिला धर्म प्रतिकूल ठरवील ती धर्म प्रतिकूल.
(सुबोध कुरआन, भाग १)

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. 50     पृष्ठे - 48      मूल्य - 18          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xis0qtrww4moaplz6cbhdtrst1zerbsp

अल्लाहने आपणास आज्ञा दिली होती की तुमच्या वारसाहक्कात सर्व मुलगे व मुली सामील आहेत. आपण याचे उत्तर काय देता? असे की आमच्या वाड वडिलांच्या कायद्यात मुलगे व  मुली सामील नाहीत. त्याशिवाय असे की आम्ही अल्लाहच्या कायद्याऐवजी वाड-वडिलांचा कायदा मानतो. कृपा करून मला सांगा की काय इस्लाम याचेच नाव आहे? आपणास सांगितले  जाते की हा घराण्याचा कायदा मोडा. आपल्यापैकी प्रत्येकजण म्हणतो की जेव्हां सर्वजण मोडतील तेव्हा मी सुद्धा मोडीन. जर दुसऱ्यांनी मुलीला संपत्तीतील हिस्सा दिला नाही आणि मी  दिला तर माझ्या घराची संपत्ती दुसऱ्याजवळ जाईल. परंतु दुसऱ्याच्या घराची माझ्या घरी येणार नाही. विचार करा की या उत्तराचा अर्थ काय आहे? काय अल्लाहच्या कायद्याची  अंमलबजावणी या अटीवरच केली जाईल की दुसऱ्याने केली तर आपण सुद्धा कराल? उद्या आपण म्हणाल की दुसऱ्यांनी व्यभिचार केला तर मी सुद्धा करीन. दुसरे चोरी करतील तर मी  सुद्धा करीन. म्हणजे दुसरे लोक जोपर्यंत सर्व अपराध सोडून देत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा सर्व अपराध करीत राहीन. गोष्ट अशी आहे की या बाबतीत तिन्ही मूर्त्यांचे पूजन होत आहे.  मनाची, वाडवडिलांची व अनेकेश्वरवाद्यांची सुद्धा गुलामी केली जात आहे आणि या तिन्ही प्रकारच्या गुलामींबरोबरच इस्लामचा सुद्धा दावा करता.
ही केवळ दोन उदाहरणे आहेत, नाहीतर डोळे उघडून पाहिले तर अशा प्रकारचे अनेक रोग आपल्या लोकांत पसरलेले आढळतील. आणि या सर्वात आपण हेच पहाल की कुठे एका मूर्तीचे   पूजन होत आहे, कुठे दोन मूर्त्यांचे तर कुठे तिन्ही मूर्त्यांचे. जर या मूर्त्यांचे पूजन होत असेल आणि त्यांच्याबरोबर इस्लामचा दावा सुद्धा आपण करीत असाल तर आपण कशी आशा  बाळगू शकता की आपल्यावर अल्लाहकडून त्या कृपेचा वर्षाव होईल जिचा वायदा खऱ्या मुसलमानाबरोबर केला गेला आहे?

ramzan
निर्विवादपणे यावर्षीचे रमजान सर्वच ईमानधारकांसाठी एक वेगळेपण सोबत घेऊन आलेे आहे. ते वेगळेपण म्हणजे बाहेरील कामाचा दरवर्षी असणारा दबाव यावर्षी नाही. नोकरदार घरी आहेत, व्यापारी घरी आहेत, विद्यार्थी घरी आहेत. एरव्ही फक्त महिलाच घरी असायच्या आज समाजातील प्रत्येक घटक घरी आहे. नुसताच घरी नाही तर त्याच्यावर बाहेरील कामाचा दबाव नसल्यामुळे रमजानचे रोजे ठेवण्यासाठी आणि कुरआनचा खुल्या मनाने अभ्यास करण्यासाठी कधी नव्हे एवढे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. रमजान म्हणजे कुरआन. कुरआनला समजण्यासाठी या रमजानच्या दबावमुक्त वातावरणाची संधी सोडणारे दुर्दैवी जीव     म्हणावे लागतील. पहिला आशरा (पहिले दहा दिवस) म्हणजे अल्लाहच्या आशिर्वादाचा आशरा. दूसरा आशरा मग्फिरत म्हणजे गुन्ह्यांपासून मुक्तीचा आशरा आणि तिसरा आशरा नरकाग्नीपासून सुटका मिळवून देणारा आशरा असतो. याची सर्वांनाच कल्पना आहे. या तिन्ही आशरांमध्ये सर्व रोजदारांनी कुरआनला समजण्यासाठी आपल्या दिवसाचे काही तास राखून ठेवायला हवेत. रोजा दरम्यानचा विशेषत: रात्रीचा जास्तीत जास्त वेळ नमाज आणि कुरआन समजण्यामध्येच व्यतीत करणे या वर्षी शक्य आहे. रमजान हा साधेपणाचा संदेश घेऊन येतो. यावर्षी जेवढा साधेपणा आहे तेवढा यापूर्वी कधीच नव्हता. या वर्षी कपडे खरेदीची लगबग नाही. इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीची लगबग नाही. ईदची नमाज ईदगाहवर होणारच नसल्याने घराबाहेर जाण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे विनाखर्चिक आणि अत्यंत साधेपणे ईद साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद मिळेल, यात वाद नाही. एरव्ही रमजानच्या रात्री ज्या महेफली रंगत होत्या यावर्षी ती रंगत नाहीत. आरडा-ओरडा नाही. दुकान सजलेली नाहीत. मिष्टान्न सजवून खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रश्‍नच नाही. विनाकारण चौकाचौकात उभे राहून बेकारचे जागरण ही नाही. तरावीहनंतर फजरपर्यंत तरूणांना घराबाहेर राहण्याचे कारण नाही. मौजमस्तीचा प्रश्‍न नाही. ना इफ्तार पार्ट्यांची झुंबड आहे, ना खरेदीची लगबग आहे. या सर्वांमध्ये होणारा अनाठायी खर्चही वाचणार आहे. जरी या सर्व गोष्टी नसल्या तरी एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे भरपूर वेळ आहे. आणि तनावमुक्त मनाने कुरआनला शांतपणे समजून घेण्याची अविस्मरणीय अशी संधी अल्लाहने या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे.
    हा रिकामा वेळ कसा घालवावा असा यक्ष प्रश्‍न अनेकांना पडलेला आहे. परंतु हा प्रश्‍न मुस्लिमांना पडण्याचे कारणच नाही. एरव्ही कुरआनला समजण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासाठी ही वेळ सोनेरी संधी आहे. लक्षात ठेवा बंधू भगिनीनों! जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक कुरआनचा संदेश गंभीरपणे आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तणुकीमध्ये सकारात्मक बदल घडणार नाहीत. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, कोरोना संपल्यानंतरच्या जगामध्ये मुस्लिमांना सकारात्मक भूमिका वठविण्याची तयारी करण्याची या रमजानमध्ये आपल्याला सुवर्णसंधी चालून आलेली आहे.
    वेळ घालविता येत नसल्यामुळे कित्येक लोकांमध्ये मानसिक आजार उत्पन्न होत आहेत. नैराश्य वाढत आहे. त्यातून आत्महत्यांचा दर वाढत चाललेला आहे. रिकामे डोके सैतानाचे घर असते. म्हणून या डोक्यामध्ये कुरआनचा संदेश रूजविण्याची या लॉकडाऊनच्या काळातील रमजान ही सुवर्ण संधी आहे, असे पुन्हा-पुन्हा नमूद करूनही माझे समाधान होत नाहीये. यापुढचे जग स्वच्छ, सुंदर आणि साधे असावे, अशी अनेकांची इच्छा राहणार आहे. त्यांच्यासमोर स्वच्छ, सुंदर आणि साध्या जीवनाचे रोल मॉडेल म्हणून उभे राहण्यासाठी आपल्याला आंतरबाह्य, स्वच्छ, सुंदर आणि साधेपणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून पुढे यावे लागेल. हे सद्गुण आपल्यात निर्माण करण्यासाठी रमजान जणूकाय लॉकडाऊनमध्ये आपल्याला मदतीला धाऊन आलेला आहे. या कालावधीमध्ये फालतू टीव्ही सिरीयल, अनैतिकतेकडे झुकणारे चित्रपट आणि मनाला मृतवत करणारे बेकारचे लाफ्टर शोज तसेच विनाकारण रक्तदाब वाढविणार्‍या टीव्ही चर्चासत्रांपासून आवर्जून दूर राहून आपले मन आणि बुद्धी कुरआनवर केंद्रित करणे, कुरआनचा संदेश आत्मसात करणे आणि तो इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज राहणे याचे एक प्रकारचे स्वयंप्रशिक्षण या रमजानमध्ये करवून घेण्याची ही संधी आहे. माणसाची प्रत्येक कृती त्याच्या अंतर्गत उर्मींचे (निय्यतचे) प्रकटन असते. म्हणून नियत कशी साफ ठेवावी, इतरांबरोबर सभ्यतेने कसे वागावे, माणुसकी कशी जपावी, लोकांच्या मदतीला कसे धावून जावे याची तयारी करण्याचा हा महीना आहे. बंधू-भगिनीनों पहा ! तबलिगी जमाअतच्या बंधू भगिनींची नियत साफ होती म्हणून ज्या मीडियाने त्यांना कोरोना जिहादी म्हणून हिनविले होते तेच जेव्हा आपला प्लाझ्मा देऊन लोकांचे प्राण वाचवू लागले तर त्यांना हाच मीडिया कोरोना वॉरियर म्हणून सलाम करत आहे. एका महिन्याच्या आत झालेला हा बदल मोलाचा आहे, एवढेच नसून विचार करणार्‍यांसाठी हा एक ईश्‍वरीय चमत्कारच आहे. यातून नियत कशी साफ ठेवावी, याचाही बोध मिळतो. कोणी निंदो, कोणी वंदो आपण मानवतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नरथ राहण्याचा गुण या तबलिगी बंधूंपासून शिकण्यासारखा आहे आणि या अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठी आपली इबादत, आपली बंदगी आणि कुरआनला समजण्याची आपली तयारी हीच आयुधे आहेत आणि याच आयुधांच्या बळावर कोरोनामुक्त जगामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय वाईट प्रवृत्तींशी लढा द्यावयाचा आहे. म्हणून पुन्हा तीच विनंती करून थांबते की, रमजाननिमित्त चालून आलेल्या संधीचा कुरआनची शिकवण आत्मसात करण्यासाठी उपयोग करून घ्या, बाकी मानवतेच्या सेवेचे काम आपल्या हातून कुरआन स्वत:च घेईल. शेवटी अल्लाह सुबहानहूतालाकडे दुआ करते की, आमच्या प्रिय भारत देशाला लवकर कोरोनामुक्त कर आणि जगामध्ये पुन्हा पुनर्लौकिक प्राप्त करून दे. आमीन.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789


सुमारे शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगची माहिती बालपणी ऐकताना भीती वाटत असे. कोरोना प्रत्यक्ष अनुभवताना जीवनच भेसूर होऊन बसले आहे. एका बाजूने जीवित हानी तर दुसऱ्या बाजुने वित्तहानी अशा दुहेरी संकटात सकल जग सापडले आहे. कोरोना विषाणू आहे असे मानले जात आहे. मात्र याची उत्पत्ती व त्यावरील उपाय काय याचा अद्याप तपास लागलेला नाही. अशातच तो स्थलपरत्वे कमी-अधिक होत आहे. तर काही ठिकाणी तो संपला असल्याचीही बातमी कानी पडत आहे. त्यातच हा लोक मानवनिर्मित की दैवी अशी चर्चाही ठिकठिकाणी होत आहे. अशा स्थितीत तो मानवनिर्मित नाही असे अनुमान उचित वाटते. कारण यावर अद्याप औषधच नाही.
उगवतो तो मावळण्यासाठी. तसेच येतो तो जाण्यासाठी या नियमास अनुसरून कोरोना केव्हा तरी जाणार तर आहेच. कारण तो आलेला आहे. मात्र त्याने आर्थिक संकट निर्माण केले आहे ते आम्हालाच घालवून लावावे लागणार आहे. हे संकट महाकाय असून ते महाकाळ टिकणारेही आहे. कोरोनाने कित्येक कुटुंबे बळी घेतली. अशातच अशा कुटुंबांतील निराधार, अनाथ, विधवा स्त्रिया, निराश्रित अशा सर्वांप्रती प्रत्येकाच्या मनी सहानुभूती आहेच. मात्र प्रत्येक जण या आर्थिक संकटाने चिंतातूर होऊन बसला आहे.
तूर्तास आपल्या शासनाने लोकांचे जीव कसे वाचतील इकडे लक्ष वेंâद्रित केले आहे आणि ते योग्यच आहे. याकरिता पुढील मार्गदर्शन केले आहे-
१) स्वच्छता राखा, २) शिस्त पाळा (नियम पाळा), ३) संयम राखा आणि ४) सहकार्य करा.
शासनाच्या या मार्गदर्शनाचा विचार करू लागलो तेव्हा यात काही अवघड आहे असे वाटले नाही. कारण या मार्गदर्शनाची महती इस्लामने १४५० वर्षांपूर्वीच जगाला विहीत केली आहे, ती अशी-

स्वच्छता
पाच वेळच्या नमाजच्या वेळी करावी लागणारी वुजू. लघुशंकेनंतर केला जाणारा पाण्याचा वापर तसेच लघुशंका बसून करण्याचे मार्गदर्शन जेणेकरून त्याचा एक थेंबही शरीरावर राहू नये वा कपड्यांवर पडू नये.

शिस्तपालन (नियमांचे पालन)
रोजाची सहरी आणि इफ्तारी या दोहोंची वेळ सूर्यास्तानुसार निश्चित ठरलेली असते. यात फरक केल्यास रोजा अपूर्ण किंवा निरर्थक ठरतो. तसेच सामूहिक नमाज इमामच्या सूचनांनुसार अदा न केल्यास ती अपूर्ण किंवा निरर्थक ठरते. यातून नियम पाळण्याचे मार्गदर्शन आहे.

संयम
रमजान मास उन्हाळ्यात आल्यास रोजे १६/१६ तासांचे किंवा स्थलपरत्वे अधिक तासांचे असतात. अशा वेळी भूक-तहान सहन करावी लागते आणि ती सहन करण्याकरिता मनावर ताबा केवळ संयमानेच मिळवता येतो. अशा तNहेने संकटसमयी संयम पाळता यावा म्हणून हे एक प्रकारचे प्रशिक्षण होय. हजयात्रेच्या वेळीदेखील आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहण्यासाठी अशाच संयमाची गरज असते.

सहकार्य
जकात आणि सदका याद्वारे सहकार्याचे मार्गदर्शन आहे. शिवाय या दोहोंद्वारे आर्थिक नियोजनाचेही मार्गदर्शन केलेले आहे.
कोरोना जाईल, त्यानंतर मात्र यक्षप्रश्न उभा ठाकलेला असेल तो आर्थिक संकटाचा. अशा वेळी शिस्तपालन, संयम आणि सहकार्य याबाबींची नितांत गरज असेल. शिवाय स्वीकारलेला पाश्चिमात्य अमर्याद आणि बेलगाम भौतिकवाद, चंगळवाद यास तत्वर कायमस्वरूपी घालवून लावणेही खरे तर काळाची गरज आहे.याचे एखादे उदाहरण विचारात घ्यायचे म्हटले तर लग्नकार्यातील पत्रिका. लग्नाच्या या आमंत्रणपत्रिकेसाठी शेकडो रुपये खर्च केले जातात. भरीला अहमत असतोच.
कुरआनने अनाठायी व अनावश्यक खर्चास मनाई तर केलीच आहे, शिवाय अहमला इस्लाममध्ये कोठे स्थानच दिलेले नाही. कारण अहम आणि सैतान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे मानवास सजदा करण्याच्या अल्लाहच्या आदेशासमयी दिसून आले आहे.
या महाकाय आणि महाकाळ टिकणाNया आर्थिक संकटास सामोरे जायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळण्याबरोबरच निकडीच्या गरजांवर खर्च होईल हे कटाक्षाने पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच काही वर्षांपूर्वी अन्नधान्याच्या दुष्काळाला सामोरे जाता यावे म्हणून शासनाकडून आलेच तर देशाचा विचार करून शासनास सहकार्य करणे मोलाचे ठरेल तेव्हाच हळूहळू का होईना या आर्थिक संकटातून पार पडणे शक्य होईल. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच. तसेच पवित्र रमजानमध्ये प्राप्त असलेल्या शबे कद्रची सुवर्णसंधी साधून अल्लाहकडे या महामारीव आर्थिक संकटातून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दुआ करणे उपयुक्त ठरेल.
कोरोना व त्याने उभे केलेले आर्थिक संकट या दोहोंच्या कात्रीत सापडले असताना रमजान मासाचे आगमन नेहमीप्रमाणे आनंदाबरोबरच दिसाला देणारेही आहे. कारण रमजानने जगाला जे दिले आहे ते अनमोल आणि अतुलनीय आहे.
सर्वश्रुत पवित्र महिन्याभराचे रोजे दिले. याच महिन्याभराच्या रोजांमुळे आरोग्य लाभते, भूक-तहान सहन करण्यासाठी आवश्यक असलेला संयम लाभतो. हाच संयम कोणत्याही संकटसमयी उपयुक्त ठरतो. रोजाद्वारे इतरांच्या उपाशी असण्याच्या स्थितीची जाणीव होऊन मदत, सहकार्य अशा मानवतावादी भावनांना उत्तेजन मिळते. इतरांची गरिबी दूर करण्यासाठी स्वत:चे आर्थिक नियोजन याच पवित्र महिन्यातील जकात व सदका यांची मदत होत असते. रोजासाठी सहरी व इफ्तारीद्वारे जे आदानप्रदान होत असते त्याद्वारे प्रेम व बंधुभाववाढीस मदत होते. अल्लाहला प्रिय असलेले चारित्र रोजाद्वारे प्राप्त होत असते ते त्यातील तकवामुळे. (तकवा म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे आणि हजरत मुहम्मद (स.) हे त्याचे पैगंबर व रसूल आहेत. हे ईमान आणि त्याचबरोबर सकल सृष्टीचा निर्माता, पालक व चालक, नियंता अल्लाहच. तो सृष्टीतील प्रत्येक घडामोड घडवीत असतो. प्रत्येक घडामोडीची त्याला माहिती असते आणि त्यानुसार त्याचा निवाडा अंतिम निवाड्याच्या दिवशी असेल. थोडक्यात त्याच्याप्रती प्रेम व भय हाच तकवा होय.)
रमजानने कुरआन हा अल्लाहचा अंतिम धर्मग्रंथ दिला ज्याने वर उल्लेखित मौल्यवान मार्गदर्शन केले. अल्लाहबाबतच्या ज्या अयोग्य कल्पना प्रचलित होत्या त्या दूर करून त्याचे वास्तव रूप सूरह इख्लासमध्ये तर आपल्याला सन्मार्ग  मिळावा म्हणून सूरह फातिहाद्वारे दुआ मिळाली. हे सर्व कुरआनमुळेच, ज्याचे अवतरण पवित्र रमजानमध्ये झाले. कुरआन प्रस्तुत होण्यास सुरूवात झाली रमजानमध्येच. अशी सुरूवात करणारे मुहम्मद बनि अब्दुल्ला अर्थात हजरत मुहम्मद (स.) पैगंबर दिले ते रमजानने. त्यांची गणना पहिल्या १०० महान व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष!
इस्लामी वर्षातील सर्वोत्तम रात्र बहाल करणारा रमजान आणि लोकांनी ज्या प्रेमानने या रमजान मासाचे स्वागत केले, संयमी रोजे ठेवले त्याचा आनंदही ईदे रमजान.
अशा या महान रमजानप्रती-
‘‘सबसे अच्छा मेहमान हमारा तू ऐ माहे रमजान
तूने दिया हमें कुरआन, बनाया जिसने हमें इन्सान
कितने व वैâसे अदा, हम करे तेरे अहसान,
हो सभीं को तू मुबारक, यही एक अरमान।’’

-बशीर अमीन मोडक, रत्नागिरी, मो.: ९९३०९८६९६४

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget