Latest Post

धर्म व जग एक असण्याचा हा अर्थ पूर्णत: चुकीचा आहे, जो बहुतेक धर्मपरायण लोक लावतात, की उपासना तर अल्लाहची करावी. अनिवार्य धार्मिक कृत्ये व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केलेली कामे तर अल्लाहच्या आज्ञेनुसार अदा केली जावीत. उरल्या जागतिक बाबी, जशा राजनीती, सामाजिकता, अर्थकारण, सामूहिकता वगैरे. तर या बाबतीत त्याचप्रमाणे कृती केली जावी जशी दुसरे लोक करतात. राजनीतीत तशाच प्रकारे भाग घेतला जावा जसा एखाद्या अन्य व्यक्तीचा सर्वसत्ताधिकार मानणारे घेतात आणि समाधान मानावे की, इस्लामी राजनीतिचा हक्क अदा झाला. जर हे बरोबर असेल तर ही गोष्ट या टोकापर्यंत पोचेल की, 'बिस्मिल्लाह' (आरंभ करतो, अल्लाहच्या नावाने) म्हणून उजव्या हाताने दारू पिणे, पैगंबर मुहम्मद (स.) च्या कृतीचे अनुकरण ठरेल. राजनीतिक व्यवस्था इस्लामी असो अथवा गैरइस्लामी त्याचा पाया घातला जातो सर्वसत्ताधिकाराने, पहिले पाऊल म्हणून सर्वसत्ताधिकाराची समस्या सोडविली जाते. कोणत्याही राजनीतिक व्यवस्थेसंबंधी पहिला प्रश्न असा असतो की, त्यात सर्वसत्ताधिकारी कोणाला मानले गेले आहे? या प्रश्नाच्या उत्तरानेच इस्लामी राजनीती दुसऱ्या राजनीतीपेक्षा भिन्न आहे हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये रूपावर अधिक चर्चा नाही. सांस्कृतिक व वैचारिक उन्नतीने कोणतेही रूप धारण करावे. जर त्यात सर्वसत्ताधिकारी म्हणून अल्लाहला मानले असेल आणि त्यात नागरिकाची स्तिती वेसणरहित उंटाची नसेल. आपल्या स्वामीच्या इच्छेच्या अधीन एका सहाय्यकाची आहे, तर ती इस्लामी राजनीती होय. जर अल्लाहशिवाय कुणा दुसऱ्याचा सर्वसत्ताधिकार मानला जात असेल, तर ती इस्लामी राजनीती नव्हे. मग ती चालविणारी चाळीस दिवस जप-तप करण्यामध्ये लागलेली व्यक्ती असो अथवा हातात पवित्र कुरआन धारण करणारे धर्मपंडित असोत. कारण ज्या प्रकारे अल्लाहच्या उपासनेत इतर कोणाला सामील करणे अनेकेश्वरत्व आहे, तसेच त्याच्या सर्वसत्ताधिकारी असण्याच्या त्याच्या गुणात सामील करणे अथवा स्वत: सामील होणे अनेकेश्वरत्व व त्याच्याशी बंडखोरी आहे. "ला इलाहा इल्लल्लाहु"चा अर्थ जेथे अल्लाहशिवाय इतर कोणी उपास्य नाही असा आहे, तेथेच अल्लाहशिवाय अन्य कोणीही शासनकर्ता नाही असासुद्धा आहे. यापैकी एक मान्य करणे आणि दुसरे अमान्य करणे एकेश्वरत्वाच्या श्रद्धेच्याच काय बुद्धीच्यासुद्धा उलट आहे. जर हे अनेकेश्वरत्व आहे, तर हा मोठा अत्याचार आहे. “इन्नशिर्का लजुलमुन अजीम' अर्थात नि:संशय अनेकेश्वरत्व मोठा जुलूम आहे. या मोठ्या जुलमासह जर नकळत नसेल तर उपासना, नामस्मरण मी सांगू शकत नाही की, अल्लाहच्या तराजूत किती वजन प्राप्त करू शकतील. महान अल्लाह नि:संशय क्षमा करणारा व दयाळू आहे. परंतु जर तो तसाच भोळा-भाबडा असता, जसा की आमचे भोळे-भाबडे धार्मिक लोक त्याला समजतात, की केवळ तोंडी जमाखर्च करणाऱ्यांना तो आपल्या प्रामाणिक लोकांच्या समूहात सामील करून घेईल, तर किती चांगले झाले असते! पण वस्तुस्थिती अशी आहे की, एक मूर्ख मनुष्यदेखील जेव्हा एखाद्याला मित्र बनवितो तेव्हा त्याच्या सुंदर वर्णनशैली व दीर्घ वर्णनाने समाधानी होत नाही, तर त्याला विविध पद्धतीने तपासतो व पारखतो.
तर बंधुनो! “एकेश्वरत्व काय आहे?" चे हे उत्तर. याचा अर्थ असा की, महान अल्लाहच्या उपास्याच्या गुणाला व त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला वेगवेगळे ठेवले जाऊ नये आणि असेही केले जाऊ नये की, त्याच्या उपास्याच्या गुणाला व्यावहारिकरीत्या मानले जावे आणि त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला केवळ डोक्यात व पुस्तकात राहू दिले जावे. त्याचे व्यावहारिक स्वरूप असेच होऊ शकते की, आम्ही आपल्या उपासनेच्या भावनेला आणि आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या आवश्यकतेला दुसऱ्या सर्वसत्ताधिकाराच्या दावेदाराकडून व आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या दाव्याकडून तोंड फिरवून आणि एकाला दुसऱ्यात समाविष्ट करून आपल्या जुलूम करणाऱ्याला महाकोपी, शुचिर्भूत व पवित्र, अत्यंत मेहरबान व दया करणाऱ्या अल्लाहच्या हुजुरात सादर करावे. जर या दोघांना वेगवेगळे केले तर दोघे निर्जीव होतील. हा अल्लाहचा सर्वसत्ताधिकारदेखील एवढी मोठी कृपा आहे व त्यात इतकी विपुलता आहे की त्यांची गणना करणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे त्याच्या अन्य बक्षिसांची गणना संभव नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचा सर्वसत्ताधिकार मान्य करवून त्याच्या आज्ञा लागू करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जी युद्धे केली, तह केले, करार केले आणि एक राज्यप्रमुख म्हणून ते सर्वकाही आपल्या विशिष्ट शैलीत व अत्यंत पावित्र्य व शुचिर्भूततेने केले, जे अन्य सर्वसत्ताधिकाराच्या दावेदारांचे प्रतिनिधी करतात. तर मग त्यांना शासनाची रूची आणि ऐश्वर्याचा शौक होता काय? मग हे सर्वकाही त्यांनी का केले? ही गोष्ट स्पष्ट आहे की, बालकाचे शिक्षण केवळ प्रेम व ममता आणि प्रलोभन व प्रोत्साहनाने होत नाही, तर तंबी व शिस्तपालनाचीसुद्धा गरज असते. अगदी तसेच प्रत्येक चिंतन कृतीची व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे लोक तयार करण्यासाठी शक्तीचा प्रयोग करतात. इस्लामसुद्धा हेच करतो. अल्लाहच्या आवडीची माणसे तयार करण्यासाठी जेथे धर्मावरील दृढ श्रद्धा व सदाचार, प्रलोभन व प्रोत्साहन आणि धार्मिक प्रवचन व उपदेश आवश्यक आहे, तेथे शक्तीचा सोटासुद्धा आवश्यक आहे. आता ही गोष्ट प्रकाशमान दिनाप्रमाणे स्पष्ट झालेली आहे की, शक्तीचा हा सोटा जर अल्लाहच्या सर्वसत्ताधिकारी असण्याशी व त्याच्या प्रसन्नताप्राप्तीशी जोडलेला असेल, तर ही अल्लाहची मोठी कृपा आहे. जर हा सोटा या गोष्टीपासून मुक्त होऊन अपात्र हातात गेला तर माणसासाठी तितकेच मोठे संकट ठरेल.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास या प्रकाशात करा. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, जर माणसांची एखादी जमात त्या सत्य उपास्यांच्या सेवेत निमग्न होऊन त्याच्याच सर्वसत्ताधिकाराची गुलाम बनल्यास तिला या जगात असा सन्मान व प्रतिष्ठा, अशी शांतता व पवित्र जीवन मिळेल जे एखाद्या अन्य पद्धतीने मिळू शकत नाही. अल्लाहचा गुलाम आणि तो निराश्रित असावा, हे कसे शक्य आहे? आणि अशातली गोष्ट नव्हे की कधी काळी असे घडले होते, तर -
'आज भी हो जो इब्राहीम सा ईमा पैदा।
आग कर सकती है अंदाजे गुल्सिता पैदा॥'
अर्थात - जर आजसुद्धा पैगंबर इब्राहीम (अ.) सारखी अढळ श्रद्धा निर्माण झाली तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांना आगीत टाकले असता अल्लाहच्या कृपेने ती आग एका उद्यानात परिवर्तित झाली होती. तसला चमत्कार पुन्हा घडेल व आजदेखील आग उपवनात बदलेल.

इस्लामच्या जीवनपद्धतीमध्ये पवित्र व महत्त्वपूर्ण मानला जातो. पवित्र रमजानचे रोजे अर्थात उपवासाचे शुभागमन झाले आहे. चांद्रदर्शन झाल्यानंतर हा पवित्र महिना सुरू होतो. सर्वशक्तिमान परमकृपाळू, दयाळू ईश्वराकडून पवित्र रमजान महिन्याचे आगमन झाले आहे.
रमजान महिन्यात पवित्र कुरआन अवतरित झाले. जे मार्गदर्शन आहे अखिल मानवजातीसाठी आणि मार्गदर्शनाचे सुस्पष्ट प्रमाण आणि सत्य व असत्यादरम्यान फरक करणारी कसोटी आहे. पवित्र कुरआन ईश्वराकडून अखिल मानवजातीसाठी मोठी देणगी आहे. मानवी जीवन सुखी, समाधानी व आनंदी असावे हा कुरआनचा मुख्या उद्देश आहे. रमजान महिन्यात कुरआनचे अवतरण झाल्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूळ अरबी भाषेतील कुरआनचे मराठी, इंग्रजी, हिंदीसह जगातील अधिकांश भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत.
आपले आचारविचार व व्यवहार आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराच्या इच्छेनुसार आयुष्य घडविण्याचा आणि अखिल मानव समूहामध्ये प्रेम, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र रमजान आहे. या महिन्यात मानवाला सच्चरित्राचे प्रशिक्षण लाभते. मुस्लिम बांधवांकडून या महिन्यात पुण्यकर्म केले जाते. जणू एक पुण्यकर्म केले तर एक हजार पुण्यकर्म केल्याचे श्रेय मिळते. एक वेळची नमाज पठण कराल तर सत्तरपटीने त्याचे पुण्य ईश्वर देत असतो.
परमकृपाळू ईश्वराने रोजाची म्हणजेच उपवासाची आज्ञा दिली. इतर उपवासांपेक्षा या अनिवार्य उपवासाचे स्वरूप वेगळे आहे. उपवास फक्त पोटाचा नाही तर शरीरातील अवयवांचा आहे. डोळ्यांचा- कोणतीही वाईट गोष्ट पाहू नये, हाताने वाईट कृत्य करू नये, जिभेने वाईट संभाषण करू नये. कानाने वाईट शब्द ऐकू नये. पायाने वाईट मार्गावर चालू नये. अशा प्रकारे उपाशी राहून या पद्धतीने आचरण केले तर ईश्वराजवळ हा उपवास मंजूर होतो. उपवासामुळे अन्नपाण्याविना राहाव्या लागणाऱ्या वेदणेची जाणीव होते. भुकेलेल्यांना अन्नपाणी किती गरजेचे आहे कळते.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘रमजान सहानुभूतीचा, आपुलकीचा, दु:खनिवारण करण्याचा महिना आहे. मानवाची सेवा करून पुण्य मिळवा. मानवांची सेवा हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. निराधार विधवा स्त्री, अनाथ मुले, वृद्ध आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल.’
ईश्वराने श्रद्धावंतांवर जकात अर्थात कर अनिवार्य केला आहे. आपल्या उत्पन्नाच्या अडीच टक्के हिस्सा जकातीपोटी दान करावा. दानामुळे मानवी मनातील स्वार्थ आणि लालसेला पायबंद घालण्याचा प्रयत्न आहे. जकातीची रक्कम गोरगरीब, अडलेले, निराधार विधवा स्त्री, अनाथ मुलामुलींच्या कल्याणासाठी वापरावी. दीनदलितांचे दु:ख दूर करणे ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. जकात अशी द्या एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला कळू नये. जकात देण्याची ऐपत असेल अशा श्रद्धावंतांनी जकात द्यावी. परंतु सदका-ए-फित्र हे अनिवार्य दान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून पावणे दोन किलो गहू किंवा त्याची रक्कम गरजू व्यक्तीला द्यावी. सदकारूपी दान हे पवित्र रमजान महिन्यामध्येच दिले जाते.
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीच्या या काळात पवित्र रमजान महिन्यात श्रद्धावंतांनी उपवास, नमाज, तरावीह ही आपापल्या घरीच करावे जेणेकरून कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये. केंद्र व राज्य शासनाचे आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करावे. अखिल मानवजातीला या महाभयंकर आजारापासून ईश्वर मुक्त करेल.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘जर कुणी तुमच्याजवळ एखादी बातमी घेऊन आला तर तिची चौकशी करा. सत्यता पडताळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या मानवबंधूचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका. कुणाचीही बदनामी करू नका. इतरांचे नुकसान करणारी व्यक्ती ईश्वराला अजिबात आवडत नाही.’
अखिल मानवजातीला ईश्वर कोरोनामुक्त करो, हीच प्रार्थना!

-जमीर नारदेकर,  कसबे डिग्रज, (जि. सांगली)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘गुलामाला अन्न व कपडे देणे आणि तो सहन करू शकेल इतकेच कामाचे ओझे त्याच्यावर टाकले जावे हा त्याचा अधिकार आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
मूळ हदीस मध्ये ‘ममलूक’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ गुलाम आणि सेविका आहे, जे इस्लामच्या पुनरुत्थानापूर्वी अरब समाजात आढळत होते. लोक त्या गुलामांशी आणि  सेविकांशी पशुपेक्षाही वाईट व्यवहार करीत होते. त्यांना व्यवस्थित जेवण देत नव्हते की त्यांना व्यवस्थित कपडे घालायला देत नव्हते आणि इतके काम करून घ्यायचे की त्यांना ते  असह्य व्हायचे. जेव्हा इस्लामचे पुनरुत्थान झाले तेव्हा हा वर्ग अस्तित्वात होता. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिम समाजाला उपदेश दिला की त्यांच्याशी मानवतेचा व्यवहार करावा,  त्यांना तेच खायला व प्यायला द्या जे तुम्ही खाता-पिता आणि तेच कपडे घालण्यासाठी द्या जसे तुम्ही परिधान करता आणि त्यांना शक्य असेल तितकेच काम त्यांच्याकडून घ्या.
असाच व्यवहार तुमच्याबरोबर रात्रंदिवस राहणाऱ्या सेवकाशीदेखील करा. सेवकांशी कशी वागणूक असायला हवी हे जाणून घेण्यासाठी माननीय अबू कलाबा (रजि.) यांचे एक कथन पाहा.  अबू कलाबा (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय सलमान फारसी (रजि.) गव्हर्नर असताना त्यांच्याकडे एक मनुष्य आला. ते आपल्या हाताने पीठ मळत असल्याचे त्याने पाहिले.  त्याने विचारले, ‘‘हे काय?’’ सलमान फारसी (रजि.) म्हणाले, ‘‘मी माझ्या सेवकाला एका कामानिमित्त बाहेर पाठविले आहे आणि त्याच्यावर दोन्ही कामांचा भार टाकणे मला पसंत  नाही.’’

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सेविका व सेवक (गुलाम) तुमचे बंधु आहेत. त्यांना अल्लाहने तुमच्या ताब्यात दिले आहे. अल्लाहने ज्या भावाला तुमच्यापैकी एखाद्याच्या ताब्यात दिले असेल तर त्याने तेच खायला दिले पाहिजे जे तो स्वत: खातो आणि त्याच प्रकारचे कपडे नेसायला दिले पाहिजेत जे तो स्वत:  परिधान करतो आणि त्याच्यावर कामाचा इतका भार टाकू नये जो त्याच्या शक्तीच्या बाहेरचा असेल. जर त्याच्या शक्तीपेक्षा अधिक भार असलेले काम त्याला दिले गेले आणि ते  काम तो करू शकत नसेल तर त्याच्या कामात त्याची मदत करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी कोणा एकाचा सेवक जेवण बनवून त्याच्याजवळ घेऊन येईल आणि स्थिती  अशी आहे की त्याने जेवण बनविताना उष्णता व धुराचा त्रास सहन केलेला आहे, तेव्हा मालकाने त्याला आपल्याबरोबर बसवून जेऊ घालायला हवे. जेवणाचे पदार्थ कमी असतील तर  एक घास अथवा दोन घास त्यामधून त्याच्या हातात ठेवावेत.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या गुलामांवर व सेवकांवर आपल्या अधिकारांचा वाईट वापर करणारा स्वर्गात  (जन्नतमध्ये) दाखल होणार नाही.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्या लोकसमुदायात दुसऱ्या लोकसमुदायांच्या तुलनेत गुलाम व अनाथ अधिक असतील, असे आपणच  आम्हाला सांगितले नव्हते काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे, तेव्हा तुम्ही लोकांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणेच त्यांचे स्वागत करा आणि त्यांना तेच  जेवण द्या जे तुम्ही खाता.’’ (हदीस : इब्ने माजा)

माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अली (रजि.) यांना एक गुलाम दिला आणि म्हटले, ‘‘याला मारू नका, कारण मला नमाजीला  मारण्यापासून मनाई करण्यात आली आहे आणि मी याला नमाज अदा करताना पाहिले आहे.’’ (हदीस : मिश्कात)

इस्लाममध्ये सामुहिकतेला महत्त्व आहे. प्रत्येक बाबतीत सामुहिकतेला प्राधान्य देण्याकडे इस्लामचा कल असतो. नमाज घरामध्ये सुद्धा अदा करता येते परंतु ती मस्जिदमध्ये जाऊन सामुहिकरित्या अदा करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. नमाजप्रमाणेच जकातसुद्धा वैयक्तिकरित्या दिली जाऊ शकते आणि बहुतेक करून आजही वैयक्तिकरित्याच दिली जाते. मात्र जकातचा अगदी थोडा भाग आपल्या गरीब नातेवाईकांसाठी राखीव ठेवता येतो. बाकी सर्व जकात हा सामुहिकरित्या बैतुलमाल (सार्वजनिक निधी) मध्ये  द्यावा लागतो. मग एकत्रित झालेली जकातच्या राशीचा हिशोब करून त्या राशीचा कुरआनच्या सुरे तौबामधील आयत नं. 60 प्रमाणे 8 भागात विभागणी केली जाते व गरजवंतापर्यंत पोहोचविली जाते. ज्यावर्षी ज्या विभागामध्ये जास्त गरज असेल त्या विभागामध्ये समिती जास्त राशीची तरतूद करू शकते.
  
जकात कोणाला देते येते?
    सुरे तौबाच्या आयत क्र. 60 मध्ये म्हटलेले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”  
    1. फकीर 2. मिस्कीन म्हणजे सफेद पोश म्हणजे असे लोक जे वरकरणी सुस्थितीत वाटतात मात्र प्रत्यक्षात गरीब असतात. ते स्वत:च्या इज्जतीला भिऊन कोणासमोर हात पसरत नाहीत मात्र त्यांच्याकडे पाहून अंदाज येतो असे लोक. विशेषत: लॉकडाउनच्या काळात अशा लोकांची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडे लक्ष देउन या निधीतून त्यांची मदत केली जाउ शकते. 3. जकात वसूल करण्यासाठी नियुक्त केलेले लोक 4. तालीफे कुलूब (दिलजमाई) म्हणजे असे लोक ज्यांच्या मनात इस्लाम मध्ये येण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत. इस्लाममध्ये आल्यामुळे त्यांचे काही आर्थिक स्त्रोत बंद पडण्याची शक्यता आहे. असे लोक. 5. प्रवासी - यात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय सुद्धा सामील आहेत. प्रवास करत असतांना अचानक कोणाला काही घातपात झाला, अपघात झाला, चोरी झाली किंवा आणखीन काही अभद्र घटना घडली आणि ते सधन असून सुद्धा द्रव्यहीन झाले तर अशा लोकांची सुद्धा जकात मधून मदत करता येते. 6. मान सोडविण्यासाठी - साधारणत: याच्यात निर्दोष मुस्लिम ज्यांच्या माना काही कारणाने तुरूंगामध्ये अडकलेल्या आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभ करण्यासाठी जकातचा उपयोग करता येतो. 8. कर्जदारांना मदत करण्यासाठी. वरील प्रमाणे आठ विभागामध्ये जकातीतून खर्च केला जाऊ शकतो. याशिवाय, जकातीचा उपयोग अन्य कारणासाठी करता येऊ शकत नाही.
    आज साधारणपणे आपल्या देशात जकात ही सामुहिकपणे काढली जात नाही. त्यामुळे त्याची बरकतसुद्धा जाणवत नाही. छोट्या-छोट्या टुकड्यांमध्ये जकात दिली जात असल्यामुळे त्याचा फारसा लाभ कोणाला होत नाही. जकात एक सामुहिक-आर्थिक, इबादत आहे. प्रत्येक शहरामध्ये जकात एकत्रित करण्याची व्यवस्था तयार करणे अपेक्षित आहे. आदर्श स्थिती ही आहे की, प्रत्येक शहरामध्ये जबाबदार आणि अमानतदार लोकांची एक समिती गठित करण्यात यावी. त्या समितीकडे गावातल्या प्रत्येक साहेबे निसाब (जकात देण्यास पात्र) व्यक्तीने जकात जमा करावी. गोळा झालेल्या जकातीच्या रकमेचा अंदाज घेऊन मग समितीने वर नमूद आयातीमध्ये आठ विभागामध्ये आवश्यकतेप्रमाणे त्याची विभागणी करावी व गरजवंतांमध्ये त्याचे वितरण करावे.
    भारतामध्ये कुठलेही वर्ष असे जात नाही ज्यावर्षी कुठे ना कुठे दंगली होत नाहीत. दंगलीमध्ये होरपळून गेलेल्या लोकांना शासकीय मदत मिळत नाही. अशा वेळेस जकातीचा काही निधी राखीव ठेवला जावा व त्यातून या भरडल्या गेलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे. शिवाय अनेकवेळेस अपघातामध्ये अनेक कुटुंबामधील कमावती लोकं दगावतात. अशा परिस्थितीत घरच्या परदानशीन महिला आणि मुलं उघड्यार पडतात. अशा लोकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सुद्धा जकातच्या निधीचा उपयोग करता येईल. अनेक तरूण अनेक वर्षांपासून आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली तुरूंगामध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांच्या घरातील सदस्यांना वार्‍यावर सोडून देण्यात आलेले आहे. समाजातील कोणीही त्यांची पुढे होवून मदत करण्यासाठी तयार नाही. अशा कुटुंबांच्या मुलभूत गरजा दूर करण्यासाठी व त्या तरूणांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा जकातीचा पैश्याचा सदुपयोग करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र असे घडत नाही. मुस्लिम समाजात अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संघटित होण्यासाठी ज्या दर्जाचा विचार समाजामध्ये रूजणे आवश्यक आहे तो गेल्या 70 वर्षात रूजलेला नाही. त्यामुळे असंघटित समाजाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्या यातनांमधून हा समाज जात आहे. समाजातील बुद्धीवंत, उलेमा, प्रेस यांना याबाबतीत जनजागृती करता आलेली नाही. त्यामुळे घरासमोर जो जकात मागायला येईल, त्याला जकात देऊन जकात अदा केल्याचे समाधान मानण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. अनेक गैरसरकारी संस्था सुद्धा जकात गोळा करतात. मात्र कुरआनमध्ये सांगितलेल्या आठ विभागात त्याची विभागणी करून त्याचे वितरण काटकोरपणे करत असतील याची शक्यता कमीच आहे. जमाअते इस्लामी हिंद आणि काही मोजक्या संस्था अशा आहेत ज्या जकात जमा करण्याची आणि त्याचे काटकोरपणे वितरण करण्याची व्यवस्था बाळगून आहेत. या संस्थांच्या द्वारे स्वत:च्या आर्थिक व्यवहाराची सी.ए.कडून तपासणीसुद्धा केली जाते. एकूणच असंघटित जकात व्यवस्थेमुळे त्याचे हवे तसे परिणाम दिसून येत नाहीत. खरे तर आजकाल समाजमाध्यमांचा जमाना आहे.  जकात गोळा करणे व वितरीत करणे यासाठी या माध्यमाचा उपयोग करता येईल.
    जकात एक ईश्‍वरीय कर आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्यही वेगळे आहे. जगातील जेवढ्या काही कर व्यवस्था आहेत, त्या एकतर कमाईवर (इन्कम) किंवा विक्रीवर (सेल) कर लावतात. या दोन्ही प्रकारच्या कर व्यवस्थेमध्ये कराची चोरी करता येते. मात्र इस्लाममध्ये कमाईवरही टॅक्स लावला जात नाही आणि विक्रीवरही नाही. तुम्ही एका वर्षात एक कोटी कमाविले आणि एक कोटी खर्च केले तुमच्यावर कर शुन्य. इस्लाममध्ये कर बचतीवर लावण्यात आलेला आहे आणि बचत लपविता येत नाही. साधारणपणे बचतीवर एक वर्षे पूर्ण झाल्यावर 2.5 टक्के एवढी जकात देणे प्रत्येक साहेबे निसाब (सधन) व्यक्तीवर बंधनकारक आहे. भारतात सर्व प्रकारचे उदा. आयकर, विक्रीकर, जीएसटी, सेस इत्यादी कर देऊन सुद्धा सधन मुस्लिम स्वेच्छेने आपल्या बचतीवर 2.5 टक्के जकात अदा करतात आणि गरीबांची मदत करतात, ही आपल्यासाठी मान उंचावणारी आणि संतोषजनक बाब आहे.

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. ५१     पृष्ठे - ४०      मूल्य - 15          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/dljf5pffxwov1ti0riyr0q1krdrrdke2

Allah
अल्लाहला संपूर्ण अधिकार आहे की, तो जे इच्छील ती आज्ञा देईल. सेवकांना त्यासंबंधी कसे व का विचारण्याचा अधिकार नाही. जरी त्याच्या सर्व आज्ञा विवेक व कल्याणावर आधारित आहेत. परंतु मुस्लिम सेवक त्याच्या आज्ञेचे पालन अशासाठी करीत नाही की, ती त्याला योग्य वाटते अथवा कल्याणकारी समजतो, तर केवळ अशासाठी करतो की ही स्वामीची आज्ञा आहे. जी वस्तू त्याने निषिद्ध ठरविली आहे ती अशासाठी निषिद्ध आहे की, त्याने निषिद्ध ठरविली आहे आणि अशाच प्रकारे जी त्याने धर्मसंमत ठरविली आहे. तीसुद्धा कोणत्या अन्य आधारावर नव्हे, तर केवळ या आधारावर धर्मसम्मत आहे की जो अल्लाह या साऱ्या वस्तूंचा मालक आहे, तो आपल्या सेवकांना त्या वस्तूंच्या उपयोगाची परवानगी देतो. म्हणून पवित्र कुरआन पूर्ण भर देऊन हे तत्त्व ठरवितो की, वस्तूंच्या निषिद्ध व धर्मसम्मत असण्यासाठी स्वामीची परवानगी व प्रतिबंध असण्याशिवाय अन्य कोणत्याही आधाराची अजिबात गरज नाही. तशाच प्रकारे सेवकासाठी एखादे काम धर्मानुकूल असणे किंवा नसण्याचा आधार याच्याशिवाय अन्य काही नाही की, अल्लाह जी धर्मानुकूल ठरवील ती धर्मानुकूल आहे आणि जिला धर्म प्रतिकूल ठरवील ती धर्म प्रतिकूल.
(सुबोध कुरआन, भाग १)

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार


आयएमपीटी अ.क्र. 50     पृष्ठे - 48      मूल्य - 18          आवृत्ती - 3 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xis0qtrww4moaplz6cbhdtrst1zerbsp

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget