Latest Post

moon
मशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारणपणे चंद्रकोरीच्या उपयोग केला जातो. पहिली चंद्रकोर पाहूनच रमजानचे रोजे सुरु होतात आणि त्यानंतर येणार्‍या ’शवाल’ या अरबी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रकोर पाहूनच रमजानची सांगता होते आणि दुसर्‍या दिवशी ईद साजरी केली जाते. अशाप्रकारे ही चंद्रकोर एकप्रकारे नैसर्गिक कॅलेंडरच आहे. कुरआनात  याविषयी म्हटले आहे -
”तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्‍चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. ” - कुरआन  (10:5)
या श्‍लोकात वाढत्या आणि कमी होणार्‍या चंद्रकला या फक्त तारखा निश्‍चित करण्यासाठीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. यापेक्षा जास्त चंद्राचे महत्व इस्लाम धर्मात नाही.
मशीद, मदरसा किंवा मुस्लिमांची लग्न पत्रिकेवर बहुतेकवेळा चंद्रकोर काढलेली असते. काही मुस्लिमबहुल देशांच्या राष्ट्रध्वजावरही चंद्रकोर काढलेली असते. त्यामुळे आमच्या बर्‍याच मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, मुसलमान हे चंद्राची पूजा करत असतात.
मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सण 1924 पर्यंत मुसलमानांची एक वैश्‍विक सत्ता होती, त्याचे मुख्यालय तुर्कस्थानातील इस्तंबूल होते. तेथील खलिफा हा जगातील समस्त मुस्लिमांचा खलिफा गृहीत धरला जात होता. त्या उस्मानी खिलाफत (राज्य प्रणाली)च्या ध्वजावर हिलाल (चंद्रकोर) होती. तेव्हापासून मुस्लिमांचे एक सांस्कृतिक चिन्ह चंद्रकोर बनले. अशाप्रकारे यामागे ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. परंतु याला काहीही धार्मिक आधार मुळीच नाही. चंद्र एक उपग्रह असून तो आपले काहीही बरे वाईट करू शकत नाही, तो पूज्य अजिबात नाहीये, ही समस्त मुस्लिमांची धारणा आहे, इस्लामचीही तीच भूमिका आहे. फक्त मुस्लिम समाज सौर कालगणना (सोलर केलेंडर) ऐवजी  ”चांद्र कालगणना (लुनार केलेंडर)” नुसार आपले धार्मिक सण उत्सव साजरा करत असतो आणि ही कालगणना चंद्रावर अवलंबून असते.
चंद्र कालगणनेनुसार वर्ष हे 365 ऐवजी 355 किंवा 354 दिवसांचेच असते. त्यामुळे सौर कॅलेंडरच्या वर्षाच्या तुलनेत ते दरवर्षी दहा -दहा दिवस मागे मागे येत असते. त्यामुळे पूर्ण 36 वर्षात रमजान हा महिना पूर्ण इंग्रजी वर्षात फिरत असतो. त्यामुळे रमजान हा एखाद्या देशात कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंड हिवाळ्यात तर कधी ओल्या पावसाळ्यात येतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकांना नेहमीच एकाच ऋतूत रोजे ठेवण्याची पाळी येत नाही. सौर कॅलेंडरनुसार जर रोजे ठेवले गेले असते तर काही विशिष्ट देशांना भर उन्हाळ्यात दर वर्षी रोजे ठेवावे लागले असते. पण चंद्र कालगणनेचा हा नैसर्गिक फायदा रोजेधारकांना होतो.
अशाप्रकारे निसर्गनियमांवर आधारित इस्लाम धर्म हा निसर्ग नियमांचे पालन करण्याचे एकप्रकारे संकेत देतो. कारण इस्लाम हा नैसर्गिक धर्म आहे. रमजानमधील आकाशातील चंद्रकोर जणू स्मित हास्य करत हेच सांगत असते.
   - नौशाद उस्मान, औरंगाबाद

कोरोना : ईद-उल-फित्रच्या डिजिटल शुभेच्छा

रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र. जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव. जगभरातील ईद साजरा करण्याचा पॅटर्नही एकच आणि रोजाचाही पॅटर्नही एकच. फक्त भौगोलिक घटनाक्रमावरून थोडा फार एखाद दिवसाचा किंवा सहर, इफ्तार आणि ईद साजरी करण्यातला वेळेचा फरक. महिनाभराच्या कठीण उपवासानंतर रोजेधारकांना बक्षीसाच्या स्वरूपात अल्लाहकडून भेट म्हणून ईदचा दिवस. या दिवशी समाजातील सर्वच स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने ईद साजरी करतात. शेजारी, मित्रपरिवाराला सोबत घेत, गळा भेट घेऊन, ईद मुबारक म्हणत आणि एकाच पंगतीत बसवून स्वत: सर्वांना शिरखुर्मा आणि इतर रूचकर पदार्थ भरवितात. यात भर पडते ती अत्तर आणि सुरम्याची. हा माहोल एवढे सुख आणि समाधान देतो की कितीही कुणाबद्दल कटूता असलीतरी त्याला माफ करत आलींगन द्यायला भाग पाडतो. मात्र यंदा यावर  मोठ्या प्रमाणात विरझन पडले आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने या सणावर बंधने आली आहेत. एका ठिकाणी जमू शकत नाहीत, एकत्र नमाज अदा करू शकत नाहीत, एकमेकांना आलिंगन देउ शकत नाहीत. यंदाच्या सर्व शुभेच्छाही डिजीटल असतील. दोन दिवसावर ईद आली आहे. यंदाची ही ईद घरातच साजरी करावयाची आहे.
रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिम बांधवाला त्यातल्या त्यात रोजेधारकाला स्वत:ला बदलायला, विचार करायला आणि दान, धर्म करायला प्रेरित करतो. संयम, आत्मीयता आणि माफ करण्याच्या प्रवृत्ती या महिन्यात अधिक वृद्धींगत होते. त्याची फलश्रुती ईदच्या दिवशी दिसते. कुठल्याही सणादिवशी लोक आपल्या कुटुंबातील लोकांसोबत रममाण असतात. मात्र ईदच्या दिवशी कुटुंबापेक्षा अधिक मित्रांना, शेजार्‍यांना, ओळखीच्या व्यक्तींना, परिसरातील गरीबांच्या सेवेत अधिक जातो. त्यांना आग्रहाने घरी बोलावून शिरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी भाग पाडतो. घरातील प्रत्येकाचे कोणी ना कोणी मित्र असतात. लहानगा असेल तर त्याचे मित्र, मोठा असेल तर त्याचे मित्र. म्हणजेच या दिवशी घरातल्या सर्व लहान, थोरांच्या सर्वधर्मीय जवळच्या व्यक्तीना घरी बोलावून जेवू घातल्याशिवाय ईद साजरी झाल्यासारखी वाटतच नाही. गळा भेट घेऊन ईद मुबारक म्हणणे, एवढीच भेट या दिनी स्विकारली जाते. ज्यामुळे चेहर्‍यावर नूर बहरत असतो आणि स्मीत हास्याने ईदची खुशी झळकत असते. ही खुशी चेहर्‍यावर फुलविण्यात मोठा वाटा असतो तो घरातील स्त्रीयांचा. कारण त्यांच्या परिश्रमामुळेच सर्व काही मिष्टान्न तयार झालेले असतात. खासकरून ईदच्या दिवशी शिरखुर्म्याची चव ही सर्वश्रेष्ठ स्वादापैकी एक असते. तसा स्वाद इतर दिवशी येत नसल्याचा मित्रपरिवाराचं म्हणण आलं. मात्र यंदा, कोरोनामुळे जवळीक कमी झाली आहे. प्रेमात अंतर पडले आहे.
रमजानमध्ये कोणाला काय मिळते?
अल्लाहने कुरआनमध्ये म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ : सुरह बकरा आयत नं.183). म्हणजेच अल्लाहकडून इमानधारकांसाठी चारित्र्यनिर्माणाची भेट मिळते. सर्वचजण म्हणतात, उत्तम चारित्र्य ही यशाची गुरूकुल्ली असते. ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनातही. रोजाच्या काळात कठीण प्रशिक्षण असते. त्यामुळे महिनाभर नियमानुसार रोजे करणे, तरावीहची नमाज अदा केल्यामुळे रोजेधारकाला उत्तम शरीरयष्ठी प्राप्त होते. त्याचे शरीर निरोगी बनते. रोजा माणसामध्ये भुकेची जाणीव उत्पन्न करतो. अन्न धान्यांची कदर करायला शिकवितो. पाण्याची महत्ता वाढवितो.  या सर्वांमुळे अन्नदान करायला माणूस प्रेरित होतो. तसेच रमजान गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी श्रीमंताना प्रेरित करतो. ते म्हणजे जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून. जकातमुळे तर समाजातील जवळपास 8 गटातील लोक सुखावतात. कुरआनच्या सुरे तौबात म्हटले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकाही जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”
म्हणजेच 1. फकीर 2. मिस्कीन, 3. जकात वसूल करणारे 4. तालीफे कुलूब. 5. प्रवासी, 6. निर्दोषींना सोडविणे 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभतेसाठी  8. कर्जदारांना कर्जमुक्त करण्यासाठी.
सदका म्हणजे गरीबांना करण्यात येणारे दान आणि फित्रा म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावने दोन किलो गहू अथवा तत्सम रक्कम गरीबांमध्ये दान करणे. यामध्ये श्रीमंत, मध्यमवर्गीय आदींचा समावेश होतो. याचा अर्थ गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत होते. आणि शेवटी एवढे अल्लाहने या रोजेधारकांसाठी ईदची सर्वात मोठी भेट दिली आहे. ईदची नमाज सामुहिकपणे ईदगाहवर अदा करण्याला प्राधान्य आहे. ज्यामुळे सामुहिकपणे प्रार्थना होते आणि येथे सर्वांच्या भेटीगाठी होतात. आणि आनंदाने ईदगाहून शांततेने लोक आपापल्या घरी जातात. मात्र यावर्षी असे होणे शक्य नाही. रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र ही एकात्मता, सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढविण्यासाठी अल्लाहकडून प्रत्येक इमानधारकाला मिळालेली भेटच आहे.
आदरणीय सआद बिन औस रजि. आपले वडील औस यांच्या हवाल्याने सांगतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ” जेव्हा ईद-उल-फित्रचा दिवस येतो तेव्हा अल्लाहचे दूत प्रत्येक रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि घोषणा करतात की, ’ हे मुस्लिमानों! आपल्या पालनकर्त्याकडे चला जो फार मोठा कृपाळू आहे. जो पुण्यकर्म करण्याचा आदेश देतो आणि ते करण्याची क्षमता देतो. आणि त्यावर परत बक्षीसही देतो. तुम्हाला त्याच्याकडून (प्रेषितांच्या मार्गाने) तरावीहची अतिरिक्त नमाज अदा करण्याचा आदेश झाला. त्याचेही तुम्ही पालन केले. दिवसा रोजा ठेवण्याचा आदेश झाला तुम्ही रोजेही केले. आपल्या पालनकर्त्याचा आदेश तुम्ही पूर्णपणे मानला तर आता चला आपापले बक्षीस घ्या.”
जेव्हा ईदची नमाज संपते तेव्हा एक ईशदूत घोषणा करतो की, ” हे लोकांनों ! तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुक्ती दिलेली आहे. आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. अशा पद्धतीने ही आठवण ठेवत की हा दिवस बक्षीसाचा दिवस आहे. जगामध्ये याला भलेही ईदचा दिवस म्हटले जात असेल मात्र परलोकांमध्ये याला बक्षीसाचा दिवस म्हटले जाते. (संदर्भ : तरगीब : अलमंजुरी, हदीस प्रभा पेज नं.41) . शोधनच्या सर्व वाचकांस ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा. अल्लाहकडे दुआ आहे की, माझ्या या प्रिय देशास व बांधवांस कोरोनापासून मुक्ती दे. सर्व व्यवहार सुरळीत होउ देे, सर्वांना सद्बुद्धी दे आणि प्रेम व सद्भावना वाढीस लागू दे. आमीन.

- बशीर शेख

हे मान्य केल्यानंतर की मनुष्याने एखाद्या आज्ञेच्या अधीन राहणे त्याची स्वत:ची गरज आहे, नाही तर एक मनुष्य दुसऱ्यासाठी संकट बनेल. असा प्रश्न उभा राहतो की, या सामाजिक प्राण्याला मर्यादेच्या बंधनात ठेवणारा कोण असावा? अखेर माझा हुकूम तुमच्यावर व तुमचा हुकूम माझ्यावर का चालावा? हुकूम चालविण्याचा हा अधिकार कोठून व कोणत्या आधारे प्राप्त होतो? त्याचबरोबर ही गोष्टसद्धा दृष्टीसमोर असावी की, हुकूम चालविणे आणि लोकांचे मस्तक आपल्यासमोर नमविणे इतकी रूचकर गोष्ट आहे की, यापेक्षा अधिक कोणतीही चविष्ट गोष्ट मनुष्याला शोधून काढणे शक्य झाले नाही. ही गोष्ट इतकी चवदार आहे की, तिच्यासाठी भावाने भावाचा गळा कापलेला आहे. पुत्र पित्याशी दोनहात करण्यास सरसावला आहे. तिच्यासाठी कोण सूर्याचा प्रतिनिधी बनला? कुणी चंद्राशी संबंध जोडले? फिरऔन, सूर्यवंशी व चंद्रवंशी याच गोष्टीचा चमत्कार आहे. कोणी एखाद्या अन्य नामधारी ईश्वराचा प्रवक्ता बनला. थोडक्यात असे की, ईश्वराच्या सेवकांवर आपली आज्ञा चालविण्याच्या आवडीने मानवाकडून ते सर्वकाही करविले, जे त्याच्या डोक्यात येऊ शकत होते. रक्ताच्या नद्या वाहविल्या गेल्या. पृथ्वीचे तुकडे तुकडे करविले गेले. राष्ट्रांनी हल्ले चढविले. जातींना वांशिक श्रेष्ठत्वाची मदिरा पाजली गेली. धार्मिक वेड उत्पन्न केले गेले, म्हणजेच, ज्या कोणत्या प्रकारे शक्य झाले, सामान्य लोकांचा आपल्या या आकांक्षेसाठी उपयोग केला गेला. यापेक्षाही मोठे संकट असे की, जेव्हा सत्यासाठी संघर्ष केले गेले आणि ईश्वराच्या सेवकांना सेवकांच्या गुलामीतून मुक्तता प्रदान करून देण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा त्यांनासुद्धा त्याच जमातीचे समजले गेले व समजाविले गेले.
हळूहळू जेव्हा बादशाही लोकशाहीचा काळ आला आणि मानव बौद्धिक व सांस्कृतिक उन्नती करता करता अशा ठिकाणी पोचला की प्रत्येक गोष्टीचे व प्रत्येक पद्धती व तत्त्वाचे विश्लेषण करून निश्चित करू लागला, तेव्हा त्याच दोन गोष्टी ज्यांचा आताच उल्लेख आला, अधिक स्पष्ट रूपात समोर आल्या. एक अशी की, एकाला दुसऱ्यावर आपली आज्ञा चालविण्याचा अधिकार कोठून व का मिळाला? दुसरी अशी की, ज्याला कोणाला हुकूम चालविण्याचा अधिकार असेल अथवा त्याला हा अधिकार दिला गेला, त्याने प्रत्येक दोष व उणिवांपासून स्वच्छ, शुचिर्भूत व पवित्र असले पाहिजे. पहिल्या गोष्टीसंबंधी निश्चित केले गेले की, प्रत्येकाच्या आईने त्याला स्वतंत्र म्हणून जन्म दिला आहे, त्याच्यावर कुणाची मर्जी चालू नये. एखाद्या कुलीनाचीही नाही आणि एखाद्या पोपचीही नाही. न एखाद्या राजाची न कोणत्या ईश्वराची. तर त्यावर स्वत: त्याचीच मर्जी चालली पाहिजे. ही मर्जी कशी चालेल? त्याचे प्रकार एकापेक्षा अधिक आहेत. दुसऱ्या गोष्टीसंबंधी मानवी बुद्धीने विचार केला की, सर्वसत्ताधिकार आणि दोष व उणिवांत विरोध आहे. सर्वसत्ताधिकाऱ्याला दोष, उणिवांपासून स्वच्छ व चुकापासून मुक्त असणे आवश्यक आहे. या गरजेपोटी त्यांनी ज्या कोणा सर्वसत्ताधिकाऱ्याला राजमुकूट घातला त्याला शुचिर्भूत व पवित्र गृहीत धरले; या गोष्टीचा विचार न करता की, तो असा असो वा नसो. इटलीत मुसोलिनीच्या काळात जागोजागी लिहिले होते, "मुसोलिनी चुका करीत नाही." यापूर्वी चर्चकाळात जागोजागी लिहिलेले असे, "पोप चुका करीत नाही." मानवी वृद्धी ही गोष्ट मान्य करीत नाही की, चुका करणारी व्यक्ती सर्वसत्ताधिकारी बनू शकते. 'रूसो' ज्याची देणगी वर्तमान निधर्मी लोकशाही आहे, त्यानेसुद्धा जेव्हा सामान्यजनांना सर्वसत्ताधारी बनविले तेव्हा त्याच्यासमोर अशी अडचण आली की, जनसमूह ज्याला सामान्य लोक मूर्ख म्हणतात, त्याला शुचिर्भूत व पवित्र कसे मानावे व मानावयास लावावे? म्हणून त्याने आम लोकांची इच्छा अथवा Common will च्या नावाने निर्मिती केली व त्याला निर्दोष व अचूक गृहीत धरले. हे सर्व अशासाठी की, कोणत्याही राजनैतिक व्यवस्थेचा पाया सर्वसत्ताधिकारी असतो आणि त्याला मानल्याशिवाय कोणतीही राजनैतिक व्यवस्था प्रत्यक्षात येऊ शकत नाही आणि सर्वसत्ताधिकाऱ्याला शुचिर्भूत व पवित्र मानल्याशिवाय अन्य उपाय नाही. मी शपथपूर्वक सांगू शकतो की, मी बालपणापासून “सुब्बूहुन कु सुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वरूह" पठन करीत असे. याचा अर्थसुद्धा माहीत होता. परंतु जेव्हा राजनैतिक व्यवस्थेच्या सर्वसत्ताधिकाऱ्याच्या अपेक्षित आवश्यक गुणांनी परिचित झालो, तेव्हा कुठे कळले की, 'शुचिर्भूत व पवित्र' चा अर्थ असा आहे. कदाचित सर्वसामान्य मुस्लिमांप्रमाणे मीसुद्धा नकळतपणे विचार न करता काहीसा असाच नि:संदिग्ध विचार बाळगत होतो की, ज्याप्रमाणे राजेलोक स्तुतिकाव्यावर खूश होऊन बक्षिसे देत असत, त्याप्रमाणे महान अल्लाहसुद्धा प्रसन्न होत असेल की, माझे सेवक किती चांगले आहेत की माझे गुणगान करीत आहेत. माझी प्रशंसा करीत आहेत. मला शुचिर्भूत व पवित्र मानीत आहेत. अल्लाहसंबंधी ही कल्पना अनिच्छेने विचार केल्याशिवाय बनते. पण आता मी इतक्या विचार व चिंतनानंतर मनातून उसळणाऱ्या विश्वासाने सांगतो की, अल्लाहला आमच्या स्मरण व प्रशंसेची गरज नाही. आम्ही त्याच्या त्या गुणांचे याचक आहोत. आम्ही त्याची गरज नाही. तो जगातील सर्वांत मोठे सत्य असण्याबरोबरच आमची सर्वांत मोठी गरज आहे. आम्ही त्याला व त्याच्या गुणांना समजू शकत नाही. आमच्याजवळ त्याला व त्याच्या गुणांना समजण्याचे कोणतेही साधन नाही. हे त्याचे उपकार आहे की, त्याने आम्हाला आपल्या व आपल्या गुणांचा परिचय देण्याची व्यवस्था केली. त्याने आम्हाला हे दाखविण्याची व्यवस्था केली की, त्याच्याशी आमचा संबंध कसा असावयाचा पाहिजे. त्याने आम्हाला आपले गुण अशासाठी दाखविले आहेत की, त्याप्रमाणे आम्ही त्याच्याशी संबंध जोडावेत. केवळ जिभेने त्याच्या गुणांचे वर्णन करून थांबू नये तर त्या गुणांना धारण करणाऱ्याच्या इच्छेवर स्वत:ला पूर्णपणे सोपवावे.
आता ही गोष्ट विचारणीय आहे की, महान अल्लाह जो खरोखर सर्वसत्ताधिकारी आहे. त्याचाच सर्वसत्ताधिकार का आवश्यक आहे? कोणत्या कारणामुळे 'सर्वसत्ताधिकार केवळ त्या अद्वितीयालाच शोभा देतो?'
जरा विचार करा. तो मनुष्य जो स्वत: लहानसे जग आहे, जो अगणित पात्रतेचा स्वामी आहे, ज्याने आपल्या सर्व पात्रतांना अद्याप ओळखले नाही, ज्याने सृष्टीची अनेक लपलेली रहस्ये उलगडली आहेत, ज्याने सृष्टीतील अनेक गोष्टींना आपल्या अधीन केले आहे, तो पाण्यात माशापेक्षा अधिक चांगले पोहतो. हवेत उड्डाण करण्यात पक्ष्याना मागे टाकले आहे, चंद्रावर ध्वज गाडले आहे आणि मंगळावरसुद्धा पोहचला आहे; अशा माणसावर कोणाचा हकूम चालावयास पाहिजे? एक सामान्य बुद्धीचा माणूसदेखील सांगेल की, अशा महान मनुष्यावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान असेल आणि ज्याचे ज्ञान असीम असेल. अशा विवेकी माणसावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक विवेक बाळगणारा असेल, ज्याचा विवेक अथांग असेल. तो नि:पक्षपाती असावा. तो एखाद्याची बाजू घेणारा व एखाद्याचा विरोधी नसावा. तो कोणत्याही वंशाचा नसावा की ज्यामुळे वंशवादाची शंका यावी. तो कोणत्याही जमातीचा नसावा की एखाद्याने त्याच्या जमातवादी स्वार्थाला बळी पडावे. तो कोणत्याही वर्गाशी संबंधित नसावा की एखाद्या वर्गवादास बळी पडावा. त्याच्यात कोणाविरुद्ध तिरस्कार व सूडभावना नसावी. त्याचे ज्ञान इतके विस्तृत व सखोल असावे की तो भविष्यातील उद्यालासुद्धा तितकाच जाणणारा असावा जितका तो वर्तमान जाणतो. या गुणांना धारण करणारा सांगा या जगात कोण आहे? एखादा पीरसाहेब? एखादा पंडित? एखादा पोप? एखादा राजा? कुणी मुसोलिनी? कुणी हिटलर? अथवा सामान्यजनातील बहुसंख्य? यांच्यापैकी कोणात हे गुण आढळतात का? या गुणाविना एखाद्याला सर्वसत्ताधिकारी मानून त्याच्या अधीन होणे श्रेष्ठ मानवतेचा अपमान नव्हे काय? पण जाऊ द्या, श्रेष्ठ मानवतेला एखाद्या आंधळ्याच्या हाती देणे म्हणजे आपल्याच पायांनी चालत जाऊन विनाशाच्या खाईत पडणे नव्हे काय? __अशा श्रेष्ठ व उच्च मनुष्यावर तर त्याचा हुकूम चालावयास पाहिजे, जो सर्व प्रकारच्या उणिवांपासून मुक्त असावा. तो “फअआलुल्लिमा युरीद" (अर्थात - जो तो इच्छितो चांगले करतो) असावा. “ला युसअलु अम्मा यफअलु" (अर्थात - प्रश्न केला जात नाही त्याला जो काही तो करतो) असावा. जो शुचिर्भूत व पवित्र असावा. शुचिर्भूतता व पवित्रतेविना सर्वसत्ताधिकाऱ्याचा मुकूट कोणालाही शोभा देत नाही आणि जर त्याला एखाद्याने बळजबरीने उचलून नेले तर तो जगासाठी संकट बनतो.

prayer
 मुसलमान असण्यासाठी कमीत कमी कोणत्या अटी आहेत. मनुष्याने कमीत कमी  काय असणे आवश्यक आहे की जेणे करून तो मुसलमान म्हणविण्यास पात्र असावा.

कुफ्र (अनेकेश्वरवाद) काय आहे आणि इस्लाम काय आहे?

ही गोष्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की अनेकेश्वरवाद (नास्तिकता) काय आहे आणि इस्लाम काय आहे? अनेकेश्वरवाद अथवा नास्तिकता ती आहे  ज्यात मनुष्य अल्लाहची आज्ञा पाळण्यास नकार देतो. आणि इस्लाम तो आहे ज्यात मनुष्य केवळ अल्लाहच्या आज्ञेचे पालन करतो. तो अशा प्रत्येक पद्धती अथवा कायदा किंवा  आज्ञेचे पालन करण्यास नकार देतो जी अल्लाहने पाठविलेल्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध असते. इस्लाम आणि अनेकेश्वरवाद (नास्तिकता. अल्लाहचा इन्कार) मधील हा फरक पवित्र  कुरआनमध्ये स्पष्टपणे दाखविला गेला आहे. म्हणून फर्माविले गेले आहे की,“जे अल्लाहने उतरविलेल्या मार्गदर्शनानुसार निर्णय करीत नाहीत असलेच लोक वास्तविकतः अनेकेश्वरवादी (इन्कार करणारे) आहेत."
-सूरतुल माइदाह-४४

निर्णय करण्याचा अर्थ असा नव्हे की जो खटला न्यायालयात जाईल केवळ त्याचाच निकाल अल्लाहच्या ग्रंथानुसार हावा, तर वास्तविकता याचा अर्थ तो. निकाल अथवा निर्णय आहे जो  प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात सदैव करीत असतो. प्रत्येक वेळी तुमच्या समोर हा प्रश्न उभा राहतो की अमुक काम करावे किवा करु नये? अमुक गोष्ट अशी केली जावी की तशी  केली जावी? अशा सर्व प्रसंगी एक पद्धत अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या प्रेषितांची परंपरा दर्शविते आणि दुसरी पद्धत माणसाच्या स्वतःच्या इच्छा अथवा बापजाद्यांच्या चालीरीती किंवा  मानवनिर्मित कायदे दर्शवितात. मग जो मनुष्य अल्लाहने दाखविलेली पद्धत सोडून एखाद्या अन्य पद्धतीनुसार काम करण्याचा निर्णय घेतो तो वास्तविकत: नास्तिकतेची (अल्लाहचा   इन्कार करण्याची पद्धत अवलंबितो. जर त्याने आपल्या संपूर्ण जीवनात याच पद्धतीचे अवलंबन केले असेल तर तो पूर्णपणे काफिर (इन्कार करणारा, आहे. जर तो काही बाबतीत तर  अल्लाहच्या आदेशांना मानत असेल आणि कांही बाबतीत आपल्या इच्छांना अथवा चालीरीतींना किंवा मानवाच्या कायद्याला अल्लाहच्या कायद्यावर प्राधान्य देत असेल तर जितक्या  प्रमाणात तो अल्लाहच्या कायद्याचे उल्लंघन करतो तितक्या प्रमाणात तो काफिर ठरतो. एखादा अर्धा काफिर आहे, कुणी एक-चतुर्थांश काफिर आहे. कुणी एक-दशांश काफिर आहे  आणि कुणी विसाव्या भागाने काफिर आहे. एखादा मनुष्य अल्लाहच्या कायद्याचे जितके उल्लंघन करतो तितकाच तो काफिर ठरतो.
इस्लाम याशिवाय अन्य काही नाही की माणसाने केवळ अल्लाहचा दास असावे. तो स्वमन, वंश व टोळी, मौलवी व पीर (संत) वगैरेंचाही दास असू नये आणि जमीनदार, तहसीलदार  आणि मॅजिस्ट्रेट किंवा अल्लाहला सोडून कोणाचाही त्याने दास असू नये. पवित्र कुरआनमध्ये फर्माविले आहे
"हे पैगंबर! (स.) ग्रंथधारकांना सांगा की या, आम्ही आणि तुम्ही एका अशा गोष्टीवर सहमत होऊ जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान एकसमान आहे. (म्हणजे जी गोष्ट तुमच्या   पैगंबरानेही सांगितली आहे. आणि अल्लाहचा प्रेषित असण्याच्या नात्याने मी सद्धा तीच गोष्ट सांगत आहे.) ती गोष्ट अशी की एक तर आम्ही अल्लाहशिवाय कोणाचेही दास बनून राहू नये, दुसरी अशी की ईश्वरत्वात कोणासही भागीदार करू नये आणि तिसरी गोष्ट अशी की आमच्यापैकी कोणत्याही माणसाने कोणत्याही माणसाला अल्लाहच्या जागी आपला मालक व  आपला स्वामी बनवू नये. या तीन गोष्टी जर त्यांनी मान्य केल्या नाही तर त्यांना सांगा की साक्षी रहा आम्ही तर मुसलमान आहोत म्हणजे आम्ही या तिन्ही गोष्टी मान्य करतो." -सूरह आले इमरान : ६४

"काय ते अल्लाहच्या आज्ञापालनाशिवाय अन्य एखाद्याची आज्ञा पाळू इच्छितात? वास्तविकतः अल्लाह तर तो आहे ज्याच्या आज्ञेचे पालन कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीवरील व  आकाशातील प्रत्येक वस्तु करीत आहे आणि सर्वांना त्याच्याकडेच परतावयाचे आहे."
- सूरह आले इमरान : ८३

या दोन्ही आयतीत एकच गोष्ट सांगितली गेली आहे. ती अशी की खरा धर्म अल्लाहची ताबेदारी व आज्ञापालन करणे होय. अल्लाहच्या उपासनेचा अर्थ असा नव्हे की फक्त पाच वेळा  त्याच्यापुढे सिजदा (नमाज पढणे) करावा. तर त्याच्या उपासनेचा अर्थ असा आहे की रात्री व दिवसा सदैव त्याच्या आज्ञेचे पालन करावे. ज्या गोष्टींची त्याने मनाई केली आहे, ती करू  नये आणि ज्या गोष्टीचा हुकुम दिला आहे त्याची अम्मलबजावणी करावी. प्रत्येक बाबतीत हे पहावे की अल्लाहची काय आज्ञा आहे. हे पाहू नये की तुमचे स्वतचे मन काय सांगत  आहे, तुमची बुद्धी काय म्हणते, वाड-वडिलांनी काय केले होते, कुळ व भाऊकीची काय इच्छा आहे, मौलवी साहेब आणि पीर (साधु) साहेब काय म्हणत आहेत आणि अमुक साहेबांची  काय आज्ञा आहे किंवा अमुक साहेबांची काय इच्छा आहे. जर तुम्ही अल्लाहच्या आज्ञेला डावलून कोणाचेही ऐकले तर तुम्ही त्याला ईश्वरत्वात भागीदार बनविले. त्याला तो दर्जा दिला  जो केवळ अल्लाहचा दर्जा आहे. आज्ञा देणारा तर केवळ अल्लाहच आहे.

"उपासनेच्या लायक तर केवळ तोच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. पृथ्वी व आकाशातील प्रत्येक वस्तु त्याच्या आज्ञेचे पालन करीत आहे."  - सूरतुल अनआम : ५७

रोजे अर्थात उपवासाची संकल्पना सर्वच धर्मात आहे, मात्र रमजानचे रोजे थोडेशे वेगळे आहेत. यामध्ये सुर्योदयापूर्वी जेवण करणे अपेक्षित आहे तर सूर्योदयानंतर जेवण करण्याची परवानगी आहे. दरम्यानच्या 14 तासाच्या काळात काही सुद्धा खाण्यापिण्याची परवानगी नाही. हे रोजे सतत 30 दिवस ठेवणे अनिवार्य आहे. रोजांचा हा काळ शरिराची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा असतो. मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक हे खडतर रोजे जरी लिलया ठेवत असले तरी मुस्लिमेत्तर बंधूंना त्याचे नवल वाटते. काहींचा असा ही अंदाज असतो की येवढे खडतर रोजे ठेवल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असावा. म्हणून आज याच विषयावर चर्चा करूया.
    मुळात रोजा ठेऊन जो उद्देश साध्य करावयाचा आहे तो शारीरिक नसून मानसिक आहे. तथापि मानसिक फायद्यांबरोबर रोजांचे अनेक शारीरिक फायदे ही आपोआप प्राप्त होतात हे ओघानेच आले. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” हे श्रद्धावंत मुस्लिमानों ! तुमच्यावर रोजे अनिवार्य करण्यात आलेले आहेत ज्या प्रमाणे तुमच्या अगोदरच्या प्रेषितांच्या समुदायांवर अनिवार्य केले गेलेले होते. यामुळे आशा आहे की, तुमच्यामध्ये तक्वाचे (चारित्र्याचे) गुण उत्पन्न होतील.”  (सुरे बकरा आयत नं.183).
    याचा अर्थ रोजे मुसलमानांमध्ये चांगले चारित्र्याला आवश्यक असणारे गुण निर्माण करतात. ते गुण कसे निर्माण होतात? हा आजाचा विषय नाही, म्हणून आपण तो सोडून देऊ. आजचा विषय रोजांमुळे आरोग्याला काय फायदे होतात? हा आहे. 

    शारीरिक फायदे
    1. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
    2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्र सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो.
    3) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. त्यांना एवढे सुद्धा कळत नसते की घास खूप चाऊन त्याची पेस्ट करून पोटात ढकलायचा असतो, कारण दात तोंडात असतात पोटात नाही. नशा करणार्‍या लोकांबद्दल तर काही बोलायला नको. जरी दारू सेवनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येत असली तरी त्यामुळे स्वत:च्या पचन संस्थेला जबर नुकसान सोसावे लागते. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याची सवय ही सामान्य सवय आहे. म्हणून अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले जात असल्याने पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वत:च्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोनेक्टिन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते.
    4) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते. सहसा या गोष्टी सोडण्यासाठी जो मनोनिग्रह लागतो तो फार कमी लोकांत असतो. ज्यांच्यात नसतो रमजान त्यांच्यासाठी या सवई सोडण्याची सुवर्ण संधी असते. रोजांच्या सायकलमध्ये जराशी इच्छा शक्ती दाखवली तरी ती या सर्व व्यसनांपासून मुक्त होण्यास पुरेशी असते. 

    घातक आजारांपासून सुटका
    सतत उपाशी राहिल्याने आपल्या शरिरातील पेशी ह्या अगोदर आपल्या शरिरातील अतिरिक्त चर्बी व त्यानंतर अतिरिक्त पेशींना खाऊन नष्ट करतात याला ऑटोफॅगी प्रक्रिया असे म्हणतात. यामुळे शरिरातील वाईट पेशी नष्ट होतात. रोजांमुळे ही प्रक्रिया नकळत आपल्या शरिरात घडते व आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या शरिरात निर्माण झालेल्या वाईट (जहरी) पेशी ज्यात कँसरच्या पेशी सुद्धा असू शकतात सततच्या रोजांमुळे कधी नष्ट होतात ते. ही एक मोठी रिसर्च आहे जिचा गाभा मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. ऑटोफॅगी एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ ’स्वत:ला खाऊन टाकने’ असा होतो. हा शोध एवढा महत्वपूर्ण होता की 2016 चा नोबेल पुरस्कार ऑटोफॅगी सिद्धांतांचे जनक शरिर शास्त्राचे जपानचे वैज्ञानिक योशिनोरी ओसुमी यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
    येणेप्रमाणे रोजांमुळे शरिराला अनेक फायदे मिळतात पण हो! हे फक्त निरोगी व्यक्तींना मिळतात. जे लोक आजारी असतील व सतत मेडीकल सुपरविझन खाली असतील हे फायदे त्यांच्यासाठी नाहीत हे ओघाने आलेच.
चुकीच्या सवयी
 अडानीपणा आणि आरोग्यविषयक जागरूकतेच्या अभावामुळे अनेक मुस्लिम दिवसभर रोजा ठेऊन संध्याकाळी इफ्तार करतांना भयंकर चुका करतात. रस्त्यावर विक्रीला ठेवले गेलेले व तळलेले अनेक पदार्थ उदा. भजे, मिर्च्या, समोसे, चिकन 65 सारखे मैद्याचे व निकृष्ट हरभर्‍याच्या पिठाचे पदार्थ खातात. हे पदार्थ चवीला जेवढे रूचकर असतात तेवढेच पचनसंस्थेला घातक असतात. यांच्याशिवाय टरबूज, खरबूज व अनेक फळे सुद्धा इफ्तारमध्ये खाल्ली जातात. आणि लगेच भरपूर जेवण केले जाते व ढसाढसा पाणी पिले जाते. हा अतिशय चुकीचा पायंडा समाजात पडलेला आहे. यामुळे पोटात या विषम पदार्थांची सरमिसळ होऊन पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो. हेच कारण आहे की, रमजानमध्ये अनेक लोकांना अपचनाचा विकार जडतो. म्हणून इफ्तारमध्ये चार दोन खजूर आणि चार-दोन फळांचे घास घेऊन थोडेसे साधे पाणी पिऊन ते पचेपर्यंत साधारणत: एकाद तास थांबून जेवण करणे केव्हाही हिताचे. तरावीहच्या नमाजनंतर जेवण केले तर ते अधिक चांगले. जेवणानंतर साधारणत: एक-दोन किलोमीटर पायी चालणे गरजेचे असते. सहेरीमध्ये सुद्धा हलके आणि थोडे जेवण अपेक्षित असते. रमजान दरम्यान खाण्या-पिण्याच्या सवयी राखण्यात ज्यांना अपयश येते त्यांचे रमजान नंतर वजन वाढल्याचे सुद्धा लक्षात येईल. म्हणून कमी खाणे, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच कमी पाणी पिणे वगैरे सवयी लावून घेतल्या पाहिजेत. रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारण 45 मिनिटानंतर भरपूर पाणी पिल्यास हरकत नाही. 

    मनोवैज्ञानिक फायदे
    फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वत: होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. आज जगाला चारित्र्यवाण लोकांची किती गरज आहे हे आपल्यातील प्रत्येकजण जाणून आहे. नमाजी, रोजादार, दाढी, टोपी ठेवणारे लोक ज्या क्षेत्रात असतील त्या क्षेत्रात आपल्या चांगल्या चारित्र्याने वेगळा ठसा उमटवत असतात. अशा लोकांवर विश्‍वास ठेवतांना कोणालाच अडचण वाटत नाही. किंबहुणा अनेक लोक अशाच लोकांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देतात.
    अलिकडे मीडियाच्या दुष्प्रचारामुळे अनेक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या जात आहेत. ताजे उदा. पहा, लॉकडाऊनमध्ये दूध आणायला जाणारे लोक पोलिसांचा मार खात आहेत आणि दारू आणायला जाणारे लोक सुरक्षित आहेत. असेच काहीशे मुस्लिमाबद्दल झालेले आहे. मुस्लिमांमध्ये असलेल्या नसलेल्या दुर्गुंणाचेच चर्वण नियमितपणे माध्यमांवर केले जात असल्यामुळे सामान्य जनतेला इस्लाम काही तरी भयंकर आणि मुस्लिम म्हणजे दानव वाटत आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाही. इस्लाम नितांत सुंदर धर्म आहे आणि रोजे मुस्लिमांना दरवर्षी मानसिक व शारीरिक बळ प्राप्त करून देण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा करतात.

- एम.आय.शेख

आपण सर्व लॉकडाऊनमध्ये आहोत. काही दिवसात दोन महिने पूर्ण होतील. लॉकडाऊनमुळे लोकांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरिबांव्यतिरिक्त सामान्य कामगार वर्गही व्यवसाय बंद पडल्यामुळे बेरोजगार झाला आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत रमजानचा पवित्र महिनाही सुरू आहे. लोक स्वत:च्या घरात इबादत करत आहेत. आमच्या मस्जिदी बंद आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार काही दुकाने आणि शॉपिंग मॉल्स सुरू करण्यास परवानगी  दिलेली आहे. या भारी लॉकडाऊनमध्ये दुकाने आणि मॉल्स उघडण्याचा काय अर्थ आहे याचा स्वत: चा विचार करा. अशा परिस्थितीत दुकाने उघडल्यास लोक खरेदीसाठी तुटून पडतात. ज्यामुळे लोकांमध्ये शारीरिक अंतर राखता येणार नाही. कोरोना पसरविण्याचा धोका वाढेल. यापूर्वी तबलीगी जमात सदस्यांवर आरोप होता की त्यांच्यामुळेच कोरोना पसरला आहे. तर ईदच्या शॉपिंगच्या बहाण्याने आपण आणखी एक आरोप स्वत:वर लावून घ्यायचा काय? आणि गोदी मीडियाला मग पुन्हा एकदा मुस्लिमांना जबाबदार धरायला आवडेल. यावेळी निश्‍चय करूया की, आपण कोरोना संपेपर्यंत कोणतीच अनावश्यक खरेदी करणार नाही. गरिबांना या पैशातून मदत करू आणि आपल्या अल्लाहला संतुष्ट करू जेणेकरुन आपण या साथीच्या रोगापासून लवकर मुक्त होऊ शकू.
    जेव्हा ही सवलत चालू असेल तेव्हा रमजान महिन्याचे शेवटचे दहा दिवस असतील. ईद म्हणजे आनंदाचे नाव आणि प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार हा आनंद साजरा करतो. आम्ही महिनाभर उपवास ठेवल्यानंतर ईद उल-फितर साजरी करतो. ही सर्वशक्तिमान अल्लाहकडून भेट आहे; खासकरुन जे उपवास करतात त्यांच्यासाठी. इस्लामने आपल्याला शरीयतच्या मर्यादेत आनंद मिळविण्याचा अधिकार दिलेला आहे. ईदचा दिवस संपूर्ण मुस्लीम उम्माहसाठी महत्वाचा आहे. नवीन कपडे, नवीन पादत्राणे, बांगड्या, झुमके, नवीन चादरी, पडदे आणि कानातील बाली आणि अन्य आनंददायी वस्तूंची खरेदी करण्याचा हा मौसम आहे. सर्व लोक आपल्या आसपासच्या भागात एकाच ठिकाणी एकत्र जमतात आणि ईदची नमाज अदा करतात, सर्वजण हसून आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद साजरी करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चांगले वस्त्र परिधान करणे होय. ईदच्या दिवशी नवीन कपडे आणि शिरखुर्मापान बंधनकारक जरी नसले तरी आपल्या संस्कृतीमध्ये या दिवशी शिरखुर्म्याची देवाणघेवाण आवश्यक अशी रीत झालेली आहे. ईद-उल-फितरच्या दिवशी प्रेषित सल्ल. विषम संख्येत खजूर खाल्यानंतर प्रार्थनेला जात असत. खजूर तर उपलब्ध असल्यास उत्तमच असतात. नवीन कपडे शिवणे, ते घालणे देखील योग्य आहे. हजरत मुआद बिन रजि. ने यांनी सांगितले की, मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे, ”जिस शख्स ने अल्लाह तआला के डर से लिबास में फुजूल खर्ची से अपने आप को बचाया, हालांके वो उसपर कादिर था, तो कल कयामत के रोज अल्लाह तआला तमाम इन्सानों के सामने इस को बुलायेगा और जन्नत में जेवरात में से जो वो चाहेगा पिनायेगा (तिर्मिजी).” हजरत जाबिर रजि. यांच्याकडून वर्णन आहे की, एक व्यक्ती नबी सल्ल. यांच्या सेवेत मळकट कपडे परिधान करून आला होता त्यावेळेस त्यास म्हटले होते की, ”तुम्हाला कपडे धुवायला काही सापडले नाही काय?” (निसाई, मुसनद अहमद).
    शक्यतो पैशाची उधळपट्टी न करता एखाद्याने चांगले आणि स्वच्छ कपडे घालावेत असे गृहित धरुन तथापि, ईदच्या दिवशी नवीन किंवा चांगले कपडे घालणे मुस्तहब (अल्लाहला पसंत ) आहे. अल्लाहने जर एखाद्याला संपत्ती दिली असेल तर ईदच्या दिवशी नवीन कपडे घालण्यास काहीच हरकत नाही. परंतु प्रत्येक गोष्टीत संयम असणे आवश्यक आहे आणि कपड्यांमध्ये गर्विष्ठपणा, गर्व आणि उच्छृंखलता टाळणे आवश्यक आहे.
    जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा रोग सुरू आहे आणि त्यामुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. ज्यामुळे लोक चिंतेत आहेत, लोक बेरोजगार आहेत. तथापि, लोक सर्व प्रकारच्या अडचणीत आहेत. या निमित्ताने मुस्लिमांचे उच्च नेतृत्व आणि थोर विद्वान लोक जनतेला यावर्षी स्वत: साठी कपडे शिवू नयेत, असा सल्ला देत आहेत. मुलांनाही यंदा ईदसाठी नवीन कपडे मिळणार नाहीत, असा सल्ला देण्याचे आवाहन करीत आहेत. खरेदी करेल त्याऐवजी ते या पैशातून गरिबांना मदत करतील. आपण बरीच वर्षे ईदसाठी नवीन कपडे परिधान केलेले आहेत. एक वर्ष ईदची खरेदी न करता आपण आपल्याकडे असलेल्या कपड्यांमधून एखादा चांगला जोड परिधान करावेत. तसेच परिसरातील गरीब व्यक्तींनाही शिल्लक जोड द्यावेत.
    ईद-उल-फितरच्या दिवशी कोणतीही खरेदी करु नये असे मी संपूर्ण मुस्लीम उम्माह यांना आवाहन करते. एक प्रकारे हे आमचे संरक्षण असेल. मॉल खुले असले तर तिथे गर्दी असणारच. लॉकडाऊन शिथिल केल्याने काय परिणाम होउ शकतात याची चुनूक 4 मे रोजी दारूची दुकाने उघडली होती तेव्हा दिसून आलीच ना. मग पुन्हा मॉलमध्ये जावून विषाची परीक्षा कशाला पहायची.चांगले होईल जर आहे आमच्या मस्जिदी उघडल्या जातील. आम्हाला असेही माहित आहे की असे बरेच लोक आहेत जे फक्त ईदच्या निमित्ताने कपडे खरेदी करतात. पण आता अल्लाहला खुश करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान माना. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की हे, लॉकडाऊनच्या काळात ईद खरेदीसाठी झुंबड होणार नाही आणि शारीरिक अंतर राखले जाईल, यासाठी पोलीस आणि महानगरपालिका, नगरपालिकाच्या लोकांना निर्देश द्यावेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका राहणार नाही.

सय्यदा तबस्सुम मंजूर नाडकर, मुंबई
(लेखिका : गोशा महिला आणि मुले स्टार न्यूज टुडे व गोशा वूमन अँड चिल्ड्रेन इंडिया उर्दू टाईम्सच्या संपादिका आहेत. मो. 9870971871.)

लेखक - सय्यद अबुल आला मौदुदी
 

भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार

आयएमपीटी अ.क्र. 52     पृष्ठे - 64      मूल्य - 12          आवृत्ती -  (2016)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/bsg8cfjj6p8q55pdsdouy41hyuzlfup3

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget