Latest Post

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे  म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्टनिश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ किंवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि महिलांनीदेखील ऐकला.

प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि समस्त निसर्गावर विचारमंथन करीत नाही तोपर्यंत त्याला सत्यमार्ग सापडणे कठीण आहे. या मंथनातून त्याला का जगावे, कोणासाठी  जगावे की अनंत अडचणीतून मुक्त होण्यासाठी आत्महत्या करावी की करू नये, या प्रश्नाची उत्तरे मिळतात. ईश्वर प्रत्येकाला झेपेल एवढेच ओझे त्याच्यावर लादतो. कोणावरही अधिकचे ओझे टाकत नाही. तसेच मनुष्य स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत येतो. मात्र तो याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. त्याला सतत असे वाटते की, परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे, पण प्रत्यक्षात परिस्थितीवर नियंत्रण अल्लाहचे असते. त्यामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून परिस्थिती अनुकूल असो का प्रतिकूल असो अल्लाहवर विश्वास ठेऊन जीवन जगल्यास आत्महत्येपर्यंत जाण्याची गरजच भासत नाही.
खरे तर प्रत्येक मनुष्य हा खलीफा आहे. त्याला अश्रफुल मख्लुकात म्हटले जाते. म्हणजेच सर्वश्रेष्ठ जीव. मात्र तो स्वतःला ओळखण्यात गफलत करतो. तो ईशमार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करण्याला प्राधान्य देत नाही. ईश्वराच्या मार्गदर्शनाला त्याच्या नियमांना आणि त्याच्या निर्मितीचा योग्य फायदा घेत नाही. तो थोडयाश्या सुखासाठी मोठे गुन्हे करून बसतो. आपल्या चुका सुधारून सत्मार्गाचा अवलंब करण्याकडे डोळेझाक करतो. जो व्यक्ती सत्याचा मार्ग अवलंबवितो तो सत्यात मग्न होतो. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक असतो. वाईट मार्गात जरी त्याला भरपूर फायदा मिळत असला तरी त्याला तो स्वैच्छेने तिलांजली देतो आणि समाधानी राहतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो आपले पाय डगमगू देत नाही. त्या व्यक्तीला निश्चित सत्यमार्ग सापडतो तो ईश्वराच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त होतो आणि ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी ठरतो. मात्र एखाद्याला त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने वारंवार सत्याचा मार्ग लक्षात आणून देखील तो व्यक्ती जर थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा सुखासाठी असत्य मार्ग स्वीकारत असेल तर त्याला त्यामध्ये गुरफटविले जाते. तो इतका त्या असत्य मार्गात तल्लीन होऊन जातो की, त्याला आपला गुन्हा, गुन्हा दिसत नाही तर ते त्याच्या जगण्याचे अंग बनते. आणि त्याला हा मार्ग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. त्याला हे करताना जराही मागच्या पुढच्या जबाबदारीचे भान राहत नाही. मात्र असे नाही की प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःच्या चुकामुळेच आत्महत्या करतो कधी-कधी दुसऱ्याकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाला कंटाळूनही आत्महत्या करतो. मात्र अशा व्यक्तींना धैर्याने काम करायला हवे.
खरे तर मनुष्याने स्वतःच्या अस्तित्वावर विचारमंथन करायला सुरूवात केली तर तो निश्चितच स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून ईश्वरीय मार्गाचा अवलंब करू शकतो. मनुष्याची निर्मिती, निर्मितीनंतर त्याला जे नातलग, समाज आणि निसर्गाचे सानिध्य मिळते ते त्याच्या इच्छेनुसार कमी आणि ईश्वरीय इच्छेनुसार जास्त असते. ईश्वराने त्याला काय हवे यापेक्षा त्याच्या फायद्याचे काय आहे हे देऊन टाकलेले असते किंबहुना त्याच्यासमोर ठेवलेले असते. त्याला जन्म देऊन सोडलेले नसते तर त्याला मार्गदर्शन मिळावे म्हणून ईश्वर, पैगंबर, संत, महात्म्यांचे मार्गदर्शन त्याच्यासमोर असते. फक्त त्याला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याएवढे परिश्रम करावे लागते. या परिश्रमात त्याला सत्याच्या कसोटीवर उतरावे लागते. त्याला काही अधिकार बहाल केलेले असतात. या बहाल केलेल्या अधिकारात जर तो सत्मार्गाने चालला तर त्याच्या नशीबात जे काही लिहिले आहे ते त्याला मिळते, एवढे मात्र नक्की. मात्र जर तो मनुष्य त्याला दिलेल्या अधिकाराचा मनमानी पद्धतीने वापर करत गेला तर त्याचा सगळा दोष त्याच्यावर येतो. त्यामुळे प्रत्येकजण जे जीवन जगत असतो त्यासाठी तो स्वतःच जबाबदार असतो. कारण प्रत्येकाला विशेषाधिकारासोबत ईश्वरीय मार्गदर्शन आत्मसात करण्याचा अधिकार आहे.
जन्म आणि मार्ग...
कितीही मोठा व्यक्ती या एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्मास आला आणि कितीही गरीब व्यक्ती एखाद्या गरीब घरात जन्मास आला तरी त्या दोघांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती सारखीच आहे. त्या दोघांच्या निर्मितीमध्ये ईश्वरीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून काहीच फरक नसतो. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांची पसंद ना पसंद वेगळी असते. मात्र त्या दोघांच्या वाढीसाठी मुलभूत जीवनावश्क वस्तू ह्या सारख्याच असतात. क्वचितच अपवादात्मक फरक असतो. मात्र त्या दोघांची जसजशी वाढ होते. त्यांच्या मेंदूवर कोरले जाणारे जे विचार असतात आणि तो जो समाज बघतो त्यातून त्याची पुढील जडणघडण ठरते. मात्र दोघांना समाजात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी पहावयास मिळतात. त्यासाठीच ईश्वराने प्रत्येकाला एक विवेक दिलेला आहे की तो चांगल्या आणि वाईटातील फरक त्याचा मनाला दाखवून देतो. यामधील जो सत्य मार्गाचा अवलंब करतो भविष्यात तोच नावारूपाला येतो आणि आपली एक ओळख निर्माण करतो. त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. सत्यमार्गावर चालताना कधी-कधी अतीवाईट गोष्टींचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी जो धैर्याने त्या गोष्टींचा सामना करतो तोच यशस्वी ठरतो. जो व्यक्ती सत्य मार्गावर चालतो तो कधीच एकटा नसतो तर त्यासोबत ईश्वराची कृपा असते. त्यामुळे तो कितीही मोठे संकट आले तरी लिलया त्यामधून बाहेर पडतो. असत्याच्या मार्गावर कित्येक लोकांना मोठे होताना आपण पाहतो. ते गुन्हे करतात, लोकांना त्रास देतात तरी त्यांचे नुकसान होत नसल्याचे आपणाला दिसून येते. मात्र त्या लोकांचे अनंतकालीन नुकसान होत राहते. त्यांच्या हातून ज्या लोकांवर अत्याचार होतो त्या पीडितांना ऐहिक जीवनात न्याय नाही मिळाला तरी ईश्वराच्या दरबारात त्यांना निश्चित न्याय मिळणार आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, यासाठीच तर आखिरत (मरणोप्परांत जीवन) आहे.

- बशीर शेख

madina
मुस्लिम तर प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहेतच. ते त्यांना महानतम व अंतिम ईशदूत मानतात. आणि ते त्यांच्या प्रत्येक वचन, प्रत्येक कार्य व प्रत्येक शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यांनी प्रेषितांवर (ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर) कितीही श्रद्धा ठेवली व त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. मुस्लिमेतर विद्वान प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी काय म्हणतात?
या शृंखलेत केवळ भारत व युरोपातील मुस्लिमेतर विद्वानांची मते व त्यांचे कथन एकत्रित केलेले आहे.

जर्मन इतिहासकार डोश लिहितो -
"हर्ष व विषाद प्रेम व ममता, शौर्य व वीरतेची ती विशाल पुकार जिचा तरल ध्वनि आमच्या कानात प्रवेश करतो ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात पूर्ण आवाज बाळगत असे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना सर्वात जास्त सुभाष्य व उच्च-भाष्य लोकांशी केवळ बरोबरीचे करावी लागेली नाही तर त्यांच्यावर श्रेष्ठत्वदेखील प्राप्त करावे लागले आणि आपल्या कथनाच्या सुभाष्यतेला व उच्चतेला आपल्या प्रेषित्वाच्या दाव्याचा पुरावा म्हणूनदेखील सिद्ध करावे लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी कवींनी विपुल प्रमाणात प्रेम काव्याची रचना केलेली होती. अन्तराने प्रेमीच्या दशेचे चित्रण एका प्रसिद्ध कथेत केले होते. ज्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानच्या कवींचा सरदार परंतु नरकवासियांचा नेता म्हणून संबोधिले, त्या 'इमरुलकैस' ने प्रेमाच्या नितांत उच्च व दिव्य-कोटीच्या पदांची रचना केली होती आणि मद्यपान व चंद्रमुखी, रजतवदनी प्रेमिकांच्या प्रशंसेत भाषेची सुलभता व अलंकाराची नदी प्रवाहित केली होती. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रेम-काव्यही छंदबद्ध केले नाही. या नश्वर जगातील सुख-दुखांना छंदबद्ध केले नाही. अरबस्थानाच्या पाणीदार तलवारीची चमक, वेसणधारी उंट किंवा अरबस्थानातील ईर्ष्या, द्वेष व सूड उगविण्याची इच्छा अथवा एखाद्या जाती व घराण्याच्या बापजाद्यांच्या शौर्य कथांना त्यांनी छंदबद्ध केले नाही की एखादे विशेष वर्णन केले नाही की ज्या योगे हे ज्ञात व्हावे की त्यांच्या दृष्टीने मानव शरीरात काहीही तथ्य नाही. व त्याच्या नशिबी केवळ विनाश आहे. सारांश असा की त्यांनी लोकांना कविता व वाङ्मय प्रकार शिकविले नाहीत तर त्यांना इस्लाम शिकविले व अशाप्रकारे शिकविले की पृथ्वी व आकाशाला भेटून स्वर्ग व नरकाला साकार करून दाखविले.”
- (एजाजुत्तंजील, पृ. ६३)

लेखक - अबू मुहम्मद इमामुद्दीन राम नगरी

भाषांतर - डॉ. उमर कहाळे

प्रस्तुत पुस्तकात  आदर्श खलिफांच्या शासनाचे संक्षिप्त विवरण केले आहे. या अपेक्षेने की, कदाचित हिन्दु-मुस्लिम अगर कोणत्याही जातीचा अगर धर्माचा मनुष्य शासनाशी संलग्न आहे त्याला याच्या वाचनाने ईश्वर सन्मार्ग प्रदान करेल. तसेच सर्वसामान्य वाचक या सत्ता भोगणाऱ्या अधिकाऱ्यांना या आदर्शावर चिंतन करण्यास बाध्य करेल आणि जर असे घडले व  देशात शांती व प्रेम स्थापित झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल तसेच ही मनःपूर्वक अभिलाषा देशभक्तीची खरी ज्योत आहे.

आयएमपीटी अ.क्र. 84    पृष्ठे - 104     मूल्य - 20      आवृत्ती - 1 (2003)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s3f9smayivj6no2xwezdmyngvgppajyc

Kaba Sharif
विधिवत इस्लाम
धर्मशास्त्रीय व विधिवत इस्लाममध्ये माणसाच्या अंत:करणाची स्थिती पाहिली जात नाही व पाहिली जाऊ शकत नाही, तर केवळ त्याच्या तोंडी स्वीकृती व या गोष्टीस पाहिले जाते की तो ती आवश्यक चिन्हे प्रकट करतो किंवा नाही की ज्या तोंडी स्वीकृतीच्या पुष्टीसाठी आवश्यक आहेत.
जर एखाद्या माणसाने तोंडाने अल्लाह, प्रेषित (महम्मद स.), पवित्र करआन, परलोक व अन्य ईमानच्या (विश्वासाच्या) गोष्टी मान्य असल्याचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्या आवश्यक अटीसुद्धा पूर्ण केल्या ज्यांच्यामुळे त्या मान्य केल्याचा पुरावा मिळतो, तर त्याला इस्लामच्या वर्तुळात घेतले जाईल आणि सर्व बाबतीत त्याच्याशी मुस्लिम समजून व्यवहार केला जाईल. परंतु ही गोष्ट केवळ या जगापुरती आहे आणि ऐहिकदृष्ट्या ती कायदेशीर व सांस्कृतिक आधार उपलब्ध करून देते की ज्यावर मुस्लिम समाजाची रचना केली गेली आहे. याचा उद्देश याशिवाय अन्य काही नाही की अशा स्वीकृतीने जितके लोक मुस्लिम समाजात दाखल होतील त्या सर्वांना मुस्लिम मानले जाते. त्यांच्यापैकी कोणालाही अनेकेश्वरवादी ठरविले जात नाही. त्यांना एकमेकांवर धार्मिक, कायदेशीर, नैतिक व सामाजिक अधिकार प्राप्त असतात. त्यांच्या दरम्यान वैवाहिक संबंध प्रस्थापित होतात, वारसा संपत्तीची विभागणी होते आणि इतर सांस्कृतिक संबंध अस्तित्वात येतात.

वास्तविक इस्लाम
परंतु पारलौकिक जीवनात मानवाची मुक्ती आणि त्याला मुस्लिम व मोमिन ठरविला जाणे आणि अल्लाहच्या प्रिय दासांमध्ये त्याची गणना होणे या विधिवत मान्यतेवर अवलंबून नाही तर तेथे अस्सल गोष्ट माणसाची अंत:करणाची स्वीकृती, त्याच्या हदयाचा कल व त्याचे आनंदाने व आवडीने आपल्या स्वत:ला पूर्णपणे अल्लाहच्या हवाली करणे होय.
 या जगात जे तोंडाने मान्य केले जाते ते केवळ इस्लामी न्यायाधीश, सामान्यजन व मुस्लिमांसाठी आहे, कारण ते केवळ प्रकट वस्तूच पाहू शकतात. परंतु अल्लाह माणसाच्या हृदयाला व त्यातील बाबींना पाहतो आणि त्याच्या ईमानचे मापन करतो.
त्याच्यापाशी ज्याप्रकारे माणसाचे परीक्षण केले जाते ते असे आहे की त्याचे जिणे व मरणे, त्याची प्रामाणिकता, त्याची आज्ञाधारकता व दासता आणि त्याचे संपूर्ण जीवनकार्य अल्लाहसाठी होत आहे की अन्य कोणासाठी? जर अल्लाहसाठी होत असेल तर तो मुस्लिम व मोमिन ठरेल आणि जर अन्य कोणासाठी होत असेल तर तो मुस्लिमही ठरणार नाही आणि मोमिनसुद्धा नाही. या दृष्टीने जो जितका निकृष्ट निघेल तितकाच त्याचा ईमान व इस्लाम निकृष्ट असेल. मग या जगात त्याची गणना कितीही श्रेष्ठ मस्लिमात झाली असेल आणि त्याला कितीही मोठ्या हुद्दयाने विभूषित केले गेले असेल.
अल्लाहजवळ केवळ या गोष्टीची किंमत आहे की जे काही त्याने तुम्हाला दिले आहे ते सर्वकाही तुम्ही त्याच्या मार्गात लावले किंवा नाही? जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तोच हक्क दिला जाईल जो प्रामाणिक लोकांना व उपासनेचा हक्क अदा करणाऱ्यांना दिला जातो. तुम्ही जर एखादी गोष्ट अल्लाहच्या उपासनेपासून वेगळी ठेवली तर तुमची ही मान्यता की तुम्ही मुस्लिम झाला म्हणजे स्वत:ला अल्लाहच्या हवाली केले, ही केवळ एक खोटी स्वीकृती ठरते. यामुळे जगातील लोक फसतील, या फसवणुकीमुळे तुम्हाला मुस्लिम समाजात स्थान मिळू शकेल, यामुळे जगात तुम्हाला मुस्लिमासारखे सर्व हक्क मिळू शकतील, परंतु अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला प्रामाणिक लोकांत स्थान देऊ शकत नाही.
जर तुम्ही मी दर्शविलेल्या या विधिवत व वास्तविक इस्लाममधील फरकाचा विचार केला तर तुम्हाला कळेल की याचे परिणाम केवळ पारलौकिक जीवनातच वेगळे होतील असे नव्हे तर या जगातसुद्धा एका मोठ्या प्रमाणावर वेगळी परिणती होईल. जगात जे मुस्लिम आज आढळतात ते सर्व दोन प्रकारांत विभाजित केले जाऊ शकतात.

'तौहीद' म्हणजे केवळ अल्लाहचे अस्तित्व मान्य करणे असा अर्थ होत नाही. जगात असा कोणताच समाज नव्हता व आजही नाही जो अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतो. जगात फार पूर्वीपासून नास्तिक अस्तित्वात आहेत. रशियाचे नास्तिकत्व तर सर्वांना माहीतच आहे. पण रशियाचे नास्तिकशासक एक पंचमांश नागरिकांनासुद्धा अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करण्यास राजी करू शकले नाहीत. आश्चर्य म्हणजे ते गेले चाळीस-पन्नास वर्षे नास्तिकतेचा प्रचार करीत आहेत व या प्रचारासाठी शक्ती व संपत्तीचा बेछूट व्यय करीत आहेत. गंमतीची गोष्ट अशी की, मागच्या जागतिक युध्दात जेव्हा जर्मन फौजा विजयी होत रशियात शिरु लागल्या तेव्हा स्टालिनने स्वत: जनतेस आवाहन केले की, मस्जिद व चर्चमध्ये जाऊन अल्लाहची प्रार्थना करा की, त्याने आमची रक्षा करावी. याचाच अर्थ असा की, जे लोक अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतात, तेच वेळ पडल्यास अल्लाहसमोर हात पसरून दयेची याचना करतात. सारांश मानव कधीही अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करू शकला नाही आणि करु शकणार नाही.
'तौहीद' (एकेश्वरत्व) म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे असे होते. जगातील कोणताही समाज सर्व शक्तींना (आराध्यांना) ईश्वर मानत नाही.
भारतातील अनेकेश्वरत्वी परमात्मा हाच ईश्वर आहे असे मानतात. भूतकालीन झरतुष्ट्री (इराणी अग्निपूजक) ईश्वर एक आहे असे मानत असत. कुरआन मक्कावासी अश्रध्दावंताना विचारतो की, त्यांना कोणी जन्म दिला? ते उत्तर देतात अल्लाहाने!' त्यांना पुन्हा विचारले जाते की, धरती व आकाश कोणी निर्माण केले? ते पुन्हा म्हणतात, 'अल्लाहाने!' पुरातन कालापासून आजपर्यंत माणूस दिशाभूल करणाऱ्यांमुळे गोंधळला गेला आहे. सर्वांना माहीत आहे की, 'ईश्वर एक आहे', तरीही ते अनेक शक्तींची (ईश्वरांची) पूजा करण्याची चूक करीत असतात.

Polytheism
कुरआनचे अध्ययन केल्यास लक्षात येते की, अल्लाह जो विश्वाचा निर्माता, मार्गदर्शक व सर्वांचा पालनकर्ता आहे, केवळ तोच ईश्वर आहे, या तत्त्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्यात आली आहे. हीच बाब मानवी मनावर बिंबविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. कुरआनने अल्लाहचे अस्तित्व पटवून देण्यापेक्षा तोच सर्वांचा पालनकर्ता असून केवळ तोच ईश्वर आहे या तत्त्वाची पुष्टी केली आहे. नास्तिकतेबाबत कुरआनात विशेष चर्चा नाही, मात्र अनेकेश्वरत्वाचे अनेक आयतींद्वारा खंडन करण्यात आले आहे. अल्लाहसह इतरांनाही ईश्वर मानण्यासंदर्भात लोक चार प्रकारच्या चुका करतात. (१) अल्लाहसोबत इतरांची आराधना करणे. (२) ईशगुण इतरांना प्राप्त असल्याबाबत श्रद्धा बाळगणे. (३) । अल्लाहसमान इतरांनाही शक्ती वा सामर्थ्य प्राप्त असते, अशी श्रद्धा बाळगणे. (४) । अल्लाहचे हक्क इतरांना बहाल करणे. १) अल्लाहसोबत इतरांना आराध्य मानण्याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास ख्रिस्ती धर्मीयांचा उल्लेख करता येईल. ते येशु ख्रिस्तांना अल्लाह-पुत्र मानतात. अल्लाह कोणत्याही सजीव प्राण्याचे रुप घेऊन अवतार धारण करतो, ही कल्पनाच मुळी फोल आहे. अल्लाह जो संपूर्ण विश्वाचा सृजनकर्ता आहे, तो एका माणसाचे रूप धारण करील, ही बुद्धीस न पटणारी बाब आहे. अल्लाहचा पुत्र मानणे म्हणजे माणसाला अल्लाहचा दर्जा देण्याचा अनेकेश्वरत्वी दृष्टीकोन आहे. अशाच प्रकारे अनेकेश्वरत्वी देवदूतांना अल्लाहच्या मुली मानतात. राम हा अल्लाहचा अवतार होता असे, मानणेही अनेकेश्वरत्वी श्रध्देचे उदाहरण आहे. २) ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात असे मानणे हाही अनेकेश्वरत्वाचा प्रकार आहे. अल्लाह संपूर्ण विश्वातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकत असतो. अल्लाहला संपूर्ण विश्वातल्या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे. जगाच्या पाठीवरून कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिलेली आरोळी त्यास ऐकू येते. तो एकाच समयी सर्वकाही बघू शकतो. अल्लाह सर्वकाही एकाच वेळी पाहू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो, अशा प्रकारे दुसऱ्या शक्ती वा व्यक्तींनाही पाहता येते, ऐकता येते, सर्वकाही समजते असे मानणे म्हणजे एकेश्वरत्वास नाकारणे होय. एखादी व्यक्ती बिछाण्यावर पडल्या पडल्या एखाद्या महापुरुषाला (संत-साधूला) मदतीकरिता हाक देत असेल, तर ईशगुण त्या महात्म्यासही प्राप्त आहे असे तो समजत आहे, असा अर्थ निघतो. ३) अशाच त-हेने जे अधिकार अल्लाहस प्राप्त आहेत ते मानवासही प्राप्त आहेत, असे मानणे म्हणजे मानवाची अल्लाहशी बरोबरी करणे मानले जाईल. अल्लाह सर्व प्राण्यांचा भाग्यविधाता आहे. अल्लाहने मनुष्याला जे काही दिले आहे त्यात कोणीही कमी-जास्त फरक करू शकत नाही. अल्लाहच्या इच्छेविरुद्ध कोणीही कोणास ठार करू शकत नाही व अल्लाह एखाद्याला ठार करू इच्छित असेल तर त्याला जगातल्या सर्व शक्ती एकत्र येऊनही वाचवू शकत नाहीत. माणसाने अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनासुद्धा प्राप्त आहेत, असा विश्वास बाळगणे फार मोठी चूक आहे. ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात, अल्लाह इतर सजीवांचे रूप धारण करतो, अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनाही प्राप्त असतात या धारणे वा श्रध्देमुळेच माणसे अनेकेश्वरत्वी होऊन ईश्वरेतरांची पूजा-अर्चा वा उपासना करण्याची चूक करतात. मनुष्य त्याच शक्ती वा व्यक्तीची उपासना करतो जिच्यापासून त्याचे भाग्य निश्चित होण्याची त्याला शक्यता वाटते. जर त्याच्या मनात दृढ विश्वास असेल की, अल्लाहव्यतिरिक्त इतर कोणत्याच शक्तीला अल्लाहसारखे सामर्थ्य व अधिकार प्राप्त नाही तर तो अनेकेश्वरत्वाकडे वळणार नाही. ४) उपरोक्त तिन्ही कारणांमुळे मनुष्य अनेकेश्वरत्वाकडे वळतो. माणसांनी अल्लाहची उपासना करायला हवी, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे, पण चुकीच्या धारणांमुळे तो इतरांची उपासना करू लागतो. कुरआनच्या शिकवणीनुसार, अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीच ईश्वर वा उपास्य होऊ शकत नाही. अल्लाह सर्वकाही ऐकतो, सर्वकाही पाहतो, तो सर्वज्ञ आहे व तोच सर्वशक्तिमान आहे, तोच प्रार्थना ऐकू शकतो, प्रार्थना मान्य करू शकतो. म्हणून त्याचे दासत्व स्वीकार करायला हवे. त्याचीच उपासना करायला हवी. कुरआनात बऱ्याच वेळा याच बाबींचा उल्लेख केला गेला आहे. उद्देश्य हाच की, मनुष्याने अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही पूज्य (आराध्य) मानू नये.
ज्याप्रमाणे आराध्याच्या बाबतीत माणूस चूक करतो, तसाच तो पालनकर्त्याच्या बाबतीतही चूक करतो. 'रब' म्हणजे पालनकर्ता. 'इलाहा' व 'रब' (आराध्य व पालनकर्ता) या दोन्ही संज्ञाच्या बाबतीत मानवाने चुकीच्या धारणा निर्माण करून अल्लाहनिर्मित व अल्लाहद्वारेच अस्तित्वात असलेल्या सजीव व निर्जीवांना उपास्य मानले आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget