Latest Post

waterfall
धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन पर्यावरणीय विनाशाला धार्मिक निष्ठा जबाबदार असल्याचा ठपका ठेवतो. मात्र याउलट, भौतिक जगावरील विश्वासाचा दृष्टिकोन पारलौकिक निष्ठेच्या तुलनेत पर्यावरणीय विश्वासापेक्षा अधिक हानिकारक आहे. वैज्ञानिक भौतिकवाद आणि लौकिक निराशावाद पर्यावरणीय नैतिकतेशी सुसंगत नाहीत.
जॉन हॉट (John F. Haught - an American theologian) यांच्या मते :
‘‘जर प्रत्येक गोष्ट ‘निरपेक्ष शून्यते’साठी निश्चित असेल आणि भौतिकवाद विश्वाकडे अत्यंत क्षुल्लक आणि अंतिम शोकांतिकेच्या रूपात पाहात असेल तर खरोखरच आपण तिची कदर केली असती? अशा तत्त्वज्ञाद्वारे आपल्याला पृथ्वीच्या सुंदर खजिन्याची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले जाऊ शकते?हे शक्य आहे, असे आम्हाला वाटते.’’
परलोकावरील श्रद्धा आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचे आमंत्रण देते, कारण निसर्गाकडे स्वतःची अंतर्गत भावी इच्छा असते ज्यासाठी आपण इच्छित आहोत, म्हणूनच निसर्गाचा नाश म्हणजे खरोखरच स्वतःला व ब्रह्मांडाला आपल्या भविष्यापासून नष्ट करणे होय. जगातील अनेक वस्तूंच्या अस्तित्वाचे नाविन्य सध्याचे युग आणि जगाच्या समाप्ती दरम्यान सातत्य ठेवण्याची आशा निर्माण करते. सुंदर वातावरण, नैसर्गिक आकांक्षांचे समाधान व आनंद, सुख व शांतीची इच्छा ही स्वाभाविक बाब असली तरी याच्या पूर्ततेसाठी सध्याचे जग पुरेसे नाही. यासाठी धर्म नंदनवनाची (स्वर्गाची) संकल्पना देतो जेथे या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जातात.
आपण पृथ्वी आणि नैसर्गिक जगाकडे नंदनवन म्हणून
पाहू नये, अशी परलोकावरील श्रद्धेची अपेक्षा आहे. त्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू नये तर ते पूर्ण होण्याची (पारलौकिक जीवनात) आशा बाळगू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे दोषही उघड करू शकतो. खरं तर, अनेक पर्यावरणीय समस्या स्वत:साठी सुखकारक स्वर्ग निर्माण करण्याच्या मनुष्याच्या तीव्र इच्छेचा परिणाम आहेत आणि यासाठीच तो नैसर्गिक देणग्या आणि त्याच्या मौल्यवान स्रोतांचा अंधाधुंध वापर करू लागतो. या जगात नंदनवनाची प्राप्ती (स्वर्गप्राप्ती) शक्य नाही. तथापि, कुरआनात उल्लेखित धर्मशास्त्र आणि स्वर्गातील बोधकथा एक उच्च ध्येय ठेवतात जेणेकरून हे ऐहिक जीवन नेहमीच ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार सर्वोच्च पूर्णतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
फक्त पारलौकिक संकल्पनेचा मानवी नैतिकतेशी जवळून संबंध आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. निवाड्याच्या दिवसाविषयी धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल कारण तो न्यायाचा दिवस आहे. हा विश्वास लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतो.
पर्यावरणीय इतिहासकार सायमन (एग्स्दह) पारलौकिक जीवनाचे महत्त्व असे सांगतात -
‘‘पृथ्वी केवळ एक तात्पुरते निवासस्थान आहे या कल्पनेवर आधारित सर्व मानवी क्रियाकलाप असले पाहिजेत (मनुष्य एक श्रेष्ठ निर्मिती असला तरी) आणि आपली कृती विश्वासाचे प्रकटीकरण म्हणून योग्यरित्या प्रशासित केली जाणे आवश्यक आहे. यामध्ये न्याय आणि धार्मिकता तसेच पर्यावरणाच्या समस्यांचे योग्यज्ञान आणि आकलनाचा समावेश आहे.’’
या चर्चेमुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यास मदत होते की पृथ्वीची पर्यावरण व्यवस्था नष्ट करण्याची परवानगी धर्माचा परिणाम नसून धार्मिक जागृतीच्या अभावाचा परिणाम आहे. जॉन हॉट (व्दप्ह प्aल्ुप्ू) यांनी याच मताचे समर्थन करताना धर्मनिरपेक्षतेला याच्या खऱ्या अपराधाबद्दल दोषी ठरवले. धर्मनिरपेक्षतेने ईश्वराला ब्रह्मांडापासून वेगळे करून बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी दिली. या मतांच्या प्रभावामुळे निसर्गावर मानवी वर्चस्वाची कल्पना नाहीशी झाली.
सर्व प्राणीमात्राची निर्मिती केल्यानंतर अल्लाहने त्यांना एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवले आणि याच आधारावर जगात संतुलन व समतोल राखला जातो. सर्व प्राणी, सजीव आणि निर्जीव, एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा हेतू पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. जर मनुष्य हे संतुलन बिघडवितो, या नैसर्गिक स्रोतांचा गैरफायदा घेतो, त्यांचा गैरवापर करतो किंवा त्यांचा अपव्यय करतो, त्यांना प्रदूषित करतो तेव्हा त्याचा लौकिक संतुलन आणि न्यायावर परिणाम होईल, जो स्वतः मनुष्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी या नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षण आणि अस्तित्वासाठी कार्य करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गाविरूद्धच्या लढाईत मनुष्याचा पराभव निश्चित आहे. परिणामस्वरूप असे म्हणता येईल की आधुनिक काळातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आधुनिक शोधांचा दुरुपयोगामुळे पर्यावरणीय संकट ओढवले गेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी धार्मिक शिकवण, नैतिक, मानसिक शुद्धतेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(भाग ४) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Success
आतापर्यंत ज्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला, त्या गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. मात्र यासाठी आपले मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणेही आवश्यक आहे. जर पूर्वीच आपण एखादा विशिष्ट विचार मनात घेऊन बसलो तर कोणतेही सत्य आपल्या अंत:करणास स्पर्श करू शकत नाही, हे निश्चित!शिवाय ज्या ज्या वेळी या जगात अथवा देशात धर्म हा आपल्या मूळ स्वरूपात आला, त्या प्रसंगी या मूळ धर्माकडूनसुद्धा हेच घोषित करण्यात आले. आजसुद्धा या गोष्टी कोणत्या न् कोणत्या स्वरूपात जगातील समस्त धर्मांत आढळतात. कारण असे की धर्म हा नेहमीच आपल्या मूळ स्वरूपानुसार एकच असतो आणि असे व्हावयासही हवे. अल्लाह एकच आहे! म्हणूनच त्याच्याकडून येणारा संदेशसुद्धा एकच असून त्याचे खरे नाव इस्लाम असे आहे. अर्थातच असा धर्म जो मानवास अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याची शिकवण देतो. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देश वा राष्ट्रात त्याच्या पैगंबरांच्या माध्यमाने जो धर्म आला, तो मुळात इस्लाम हाच धर्म होय. मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसे लोकांनी आपापल्या सवलतीनुसार परिवर्तन घडवून आणले. पाहिजे ते समाविष्ट केले आणि नको ते वजा केले. याच प्रकारातून मग विविध शाखा फुटल्या आणि बरेच कृत्रिम धर्म निर्माण झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच असून या मूळ धर्माचा आधार निम्नलिखित तीन गोष्टींवर आहे. (१) हे विश्व अल्लाहशिवाय निर्माण झालेले नसून अल्लाहशिवाय कार्यरत नाही. तो सर्वगुणसंपन्न असून त्याच्या समान इतर कोणीही नाही.(२)अल्लाहने आपली महत्त्वपूर्ण निर्मिती अर्थात मानवजातीस आपला संदेश पैगंबरांच्या माध्यमाने पाठविला आणि प्रत्येक  काळ  व  प्रत्येक  भूभागात  पाठविला. कोणासही यापासून वंचित ठेवले नाही. (३) समस्त मानवांना एके दिवशी आपल्या खऱ्या स्वामीसमोर अर्थात अल्लाहसमोर आपल्या भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येकास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट मोबदला मिळणारच.
या तीन गोष्टी इस्लामच्या मूलभूत गोष्टी असून इस्लाम हाच धर्म नेहमीकरिता अल्लाहकडून आलेला सत्यधर्म होय. सर्वांत शेवटी इस्लाम धर्म आपल्या मूळ, परिपूर्ण आणि अंतिम स्वरूपात अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत जगात आला. त्यांचे पूर्ण जीवन आजही आपल्या मूळ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही पैगंबराच्या जीवनाचा मूळ इतिहास आज उपलब्ध नाही.याचप्रमाणे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झालेला ईशग्रंथ अर्थात कुरआनसुद्धा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त जगात इतर कोणताही ईशग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. आता जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणलेला धर्म अर्थात इस्लाम धर्म मार्गदर्शन करू शकतो. या काळात स्वत:ला इस्लाम धर्माचा अनुयायी असण्याचा दावा करणारे भरपूर लोक आहेत. मात्र अल्लाहच्या दृष्टिकोनात खरा मुस्लिम केवळ तोच आहे, जो इस्लामच्या नियमांवर आपले विचार आणि भावना तसेच आपले जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. इस्लाम व कोण्या विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा, विशिष्ट भू-प्रदेशाचा अथवा विशिष्ट काळापुरता धर्म नसून तो अल्लाहकडून समस्त मानवजातीकरिता व जग अस्तित्वात असेपर्यंत एक विश्वव्यापी जीवनमार्ग आहे. या धर्माची सर्वप्रथम शिकवण अशी की मानवाने एकाच अल्लाहस या जगाचा निर्माता, पोशिंदा आणि पूज्य स्वीकारावे. त्याचीच एकट्याची आराधना करावी, त्याच्या आदेशांचे पालन करावे. इतर कोणासही त्याच्यासम ठरविता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा करता कामा नये, कोणाच्याही आदेशाचे पालन करता कामा नये. अर्थातच यावर पूर्ण विश्वाससुद्धा असावा की अल्लाहच पूज्य आणि आराध्य असून केवळ त्याच्या मर्जी व कायद्यानुसारच जीवनाची वाटचाल करावी, आपले तन-मन-धन केवळ त्याला समर्पित करावे, त्याच्याच समोर नतमस्तक व्हावे, त्यालाच मदत मागावी, त्याचाच धावा करावा आणि त्याच्याच मर्जीचे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत पालन करावे. या विश्वाचा व आपला स्वामी त्यालाच मानावे. त्याच्याव्यतिरिक्त इतक कोणाचीही आज्ञा पाळता कामा नये. इतर कोणाही व्यक्तीने दाखविलेला मार्ग स्वीकारून जीवनाची वाटचाल करून स्वत:चे वाटोळे करून घेता कामा नये.
जी व्यक्ती अशा स्वरूपात अल्लाहचा स्वीकार करते, ती ईशमार्गाशिवाय इतर कोणाच्याही मार्गदर्शनाचा अवलंब करू शकत नाही. स्वत:च्या इच्छा-अभिलाशा आणि आवडीनिवडीसुद्धा अल्लाहच्या मर्जीच्या स्वाधीन करते. अल्लाहने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिलेल्या जीवनमार्गानुसार जीवन जगून यशस्वी व कल्याणकारी जीवनाची वाट धरावी. इस्लामची दुसरी अट अशी आहे की अल्लाहने जीवन जगण्यासाठी जो मार्ग दिला तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिला आणि इस्लाम हेच त्याचे नाव होय. अर्थात माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मानावे आणि अशी धारणा ठेवावी की ते या समस्त जगवासियांकरिता अल्लाहचा संदेश घेऊन आले आणि सर्वांचे पैगंबर व कल्याणकारी सुधारक आहेत. त्यांच्यानंतर आता कोणीही पैगंबर येणार नाही. यासाठी त्यांच्यावर अल्लाहकडून अवतरित झालेला अंतिम ईशग्रंथ हा कुरआन असून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या ग्रंथानुसार स्वत: प्रत्यक्ष कर्म करून दाखविले. इस्लामची तिसरी धारणा अशी की मानवाने या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी की त्यास मृत्यूपश्चात आपल्या प्रत्येक कर्माचा अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. यासाठी त्यास परत जीवन प्राप्त होणार असून ते कधीही संपणारे नसेल. माणसास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला मोबदला स्वर्गरूपी जीवनाच्या स्वरूपात मिळणार आणि वाईट कर्मांचा मोबदला नरकाच्या यातनामय जीवनाच्या स्वरूपात मिळणार आहे, हे निश्चित!
या इस्लामच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शिकवणी असून या शिकवणी माणसाच्या अंत:करणाची साद होय. हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही!

- मौ. मुहम्मद फारूक खान

    पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रूंशी व्यवहार करूणामय, दया, प्रेम, ममत्व व सहानुभूती पूर्ण होता. पैगंबर (स.) यांना अल्लाहने समस्त मानव जातीसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणूनच त्यांनी शत्रूंबरोबर सुद्धा शत्रूंबरोबर सुद्धा न्यायपूर्ण व सदाचारी व्यवहाराची शिकवण दिली.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या कोणत्याही शत्रूंशी वैयिक्तक बदला घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही तर शत्रूंना दयाळुपणा आणि ममत्वाची वागणुक दिली, यास इतिहास साक्ष आहे. हे वर्णन पुस्तिकेत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 202    -पृष्ठे - 12     मूल्य - 08    आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/9ql9r0sxvj88lvowffxfgxr4nzplg3eq

मुहम्मद (स.) एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करू लागले. चाळिशी नुकतीच संपली होती आणि आयुष्याचा उरलेला भाग आता ईश्वरदत्त महान कार्यासाठी ते अर्पण करू लागले आणि त्याच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला? त्याच्याजवळच्या मंडळींनी, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाही. हा ईश्वरी पुरुष आहे असे त्यांना वाटले. त्यातही सर्वांत आधी खदीजा (रजि.) ती पहिली अनुयायी, पैगंबर मुहम्मद (स.) यांस ईशज्ञान झाले आहे असे जर कोणी पाहिल्याने विश्वासपूर्वक मानले असेल तर ते खदीजाने. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक ईश्वराची, मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदीजा (रजि.)  यांनी  मुहम्मद (स.) यांच्या ईश्वरी जीवनकार्यावर तिनेच प्रथम श्रद्धा ठेवली. इतकेच नव्हे तर पुढील विवादात तिने त्यांना सदैव धीर दिला. जेव्हा ते कावरेबावरे होऊन त्या रात्री तिच्याकडे आले व ‘‘खदीजे, खदीजे; पांघरुण घाल माझ्यावर, कपड्यात लपेट मला.’’ असे म्हणाले त्यावेळेस ईश्वराने खदीजेच्या रूपानेच जणू त्यांना धीर दिला, शांती दिली. तीच त्यांना म्हणाली, ‘‘उठा.’’ तिनेच त्यांचा बोजा हलका केला. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल ते बडबडू द्या. लक्ष नका देऊ, असे म्हणाली. ईश्वराने ज्ञान दिले, खदिजेने शांती व विश्वास दिला. दुसरे अनुयायी अली (रजि.) व तिसरा अनुयायी जैद (रजि.) झाला. तो गुलाम, ज्याला मुहम्मद (स.) यांनी एकदम मुक्त केले होते, त्याने हा नवधर्म घेतला आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबू बकर (रजि.), ते मक्केतील श्रीमंत व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे होते. मुहम्मद (स.) यांना ‘अल्-अमीन’ म्हणत, तसे यांना ‘अस्-सिद्दीक’ म्हणजे सच्चा असे म्हणत. मुहम्मद (स.)याहून दोनच वर्षांनी ते लहान होते. त्यांना काबाचा सेवक असेही म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषाने हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पाच या नवधर्मात आले. अबू बकर (रजि.) पुढे खलीफा झाले. तसेच पुढे खलीफा होणारे उस्मान (रजि.) हे मिळाले. उस्मान (रजि.) हा प्रतिस्पर्धी उमैया घराण्यातील होता. दुसरा अब्दुल रहमान (रजि.), तिसरा साद (रजि.)- ज्याने पुढे इराण जिंकून घेतला. चौथा खदीजा (रजि.) चा नातलग जुबैर (रजि.) आणि पाचवा तो शूर लढवय्या तल्हा (रजि.). उस्मानने नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनी उस्मान (रजि.)ला बांधले व विचारले, ‘‘पूर्वजांच्या धर्मापेक्षा तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तू घेत आहेस तो जोपर्यंत तू सोडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.’’ परंतु उस्मान (रजि.) उत्तरला, ‘‘त्या ईश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतो, की तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाही!’’
काही अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलही मिळाले. मक्केतील काही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हब्शी ‘बिलाल’(रजि.) इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहम्मद (स.) प्रेमाने म्हणत, ‘‘बिलाल म्हणजे अ‍ॅबिसिनियाचे सर्वोत्तम फळ आहे!’’
मुहम्मद (स.) यांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहम्मद (स.) यांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ती, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींना मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहम्मद (स.) यांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायींनी छळ सहन केले. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दु:खे सहन केली. बहिष्कार, मरण यांनाही तोंड दिले. मुहम्मद (स.) यांच्या ठायी त्यांना यत्किंचितही काळे दिसते तर अशी अडग श्रद्धा जन्मेल का? खिस्तावर त्यांच्या भावांचा जवळच्या मंडळींचा यत्किंचितही विश्वास नव्हता. परंतु मुहम्मद (स.) या बाबतीत दैववान होते. मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयीच्या अत्यंत प्रामाणिकपणाची खूण आहे.

माननीय इब्ने अब्बास (र.) निवेदन करतात, मी एकेदिवशी प्रेषितांच्या मागे उंटावर स्वार होतो, तेव्हा त्यांनी सांगितले,
“हे मुला! मी तुला काही गोष्टी शिकवितो, १. अल्लाहच्या दीनचे (जीवनपद्धतीचे) रक्षण कर. अल्लाह तुझा संरक्षक होईल. २. अल्लाहच्या दीनचे रक्षण कर. तुला अल्लाहची कृपा लाभेल. ३. मागावयाचे झाल्यास अल्लाहजवळ माग. तुला मदतीची गरज भासल्यास अल्लाहची याचना कर.
हे जाण की साऱ्या लोकांचे तुला फायदा पोहोचविण्याबद्दल एकमत झाले तरी ते तुला फायदा पोहोचवू शकत नाहीत. फक्त अल्लाहने निश्चित केले आहे त्याच प्रमाणात तुझा फायदा होईल आणि सर्वांनी मिळून तुझे नुकसान करण्याचे ठरविले तरी हे तुझे नुकसान करू शकत नाहीत. फक्त अल्लाहने ठरविले आहे त्याच प्रमाणात तुझे नुकसान होईल."
(मिश्कात) दीनचे रक्षण करणे म्हणजे इस्लाम धर्मानुसार आचरण करणे. इस्लामच्या सर्व आज्ञा पाळणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बिधाड, कमी-जास्त होऊ न देणे. इस्लाममध्ये नवीन प्रथा, गोष्टी, रूढी, रीतीरिवाज यांचा शिरकाव होऊ न देणे. इस्लामचे मूळ स्वरूप कायम राखणे.

माणसाने इस्लामचे संरक्षण केल्यास त्याला अल्लाहच्या कृपेचा लाभ होऊन त्याचे संरक्षण होईल.
सर्व काही अल्लाहच्या हाती आहे म्हणून माणसाने अल्लाहचीच याचना करावी व त्याचेच आज्ञापालन करावे.

पर्यावरणीय संकटाची खरी कारणे

पर्यावरणीय संकट हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा परिणाम आहे हे नाकारता येत नाही. वैज्ञानिक युगात एका तासातील विनाश हा गैर-वैज्ञानिक युगातील हजारो वर्षांच्या विश्वाच्या विनाशापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की विज्ञान स्वतः दोषी आहे, परंतु ही एक दैवी देणगी आहे ज्यामुळे ब्रह्मांडातील शक्तींवर विजय मिळविणे आणि त्याचा उपयोग करणे आमच्याकरिता शक्य झाले आहे. पश्चिमेमध्ये आधुनिक विज्ञानाचा विकास निरीश्वरवादाच्या प्रभावाखाली झाला असल्याने ते कोणत्याही प्रकारच्या मूलभूत व्यवस्थेपासून मुक्त आहे, त्याचे संपूर्ण लक्ष्य भौतिक प्रगतीवर केंद्रित आहे. त्याने या आध्यात्मिक उत्क्रांतीकडे आणि परिणामी मानवी प्रगतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. धर्मनिरपेक्ष भौतिकवादाच्या प्रभावाखाली असलेली सभ्यता, ईश्वर व पारलौकिक संकल्पनेशी पूर्णपणे अपरिचित आहे. तिचे मूळ स्वार्थ आणि शोषणावर आधारित आहे, ज्यामध्ये मनुष्याचे अंतिम लक्ष्य साधेपणा, भौतिकवाद, सुख शोधणे आणि पाशवी वृत्तीचा अवलंब आढळून येतो. भावनांच्या समाधानाशिवाय आणि शारीरिक इच्छांच्या पूर्ततेशिवाय काहीही नाही. मानवी प्रगतीऐवजी मानवी विनाशात आधुनिक साधने आणि संसाधने वापरली जात आहेत आणि भौतिक प्रगतीचे शिखर गाठूनदेखील आत्मिक समाधान शून्य आहे. याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
आधुनिक भौतिक सभ्यतेने मनुष्याला ईश्वर आणि निसर्गापासून विभक्त केले आहे आणि केवळ त्याच्या आत्म्याचाच नाश केला नसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय व्याधीमुळे त्याचे शारीरिक अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, विचारवंत आणि बुद्धिजीवी पर्यावरणीय संकटाची कारणे कार्यरत आहेत. मुस्लिम आणि बिगर मुस्लिम विद्वान पर्यावरणीय संकटाला नैतिकतेचे आणि मूल्यांचे संकट म्हणत आहेत, जो खरे तर मानवी जीवनातील आध्यात्मिक पोकळीचा परिणाम आहे. पर्यावरणीय संकटाचे विश्लेषण करताना, विविध विचारवंतांनी लोभ, दारिद्र्य, संपत्तीचे असमान वितरण, लोकसंख्यावाढ, असीमित आर्थिक वाढीची लालसा, उद्योग, राष्ट्रीयत्व, सैन्यवाद, उपभोक्तावाद आणि भौतिकवाद यामागील कारणे दर्शविली आहेत. आणि त्याच्या निराकरणासाठी, नम्रता, कृतज्ञता, न्याय, दया आणि सजीवांसाठी असलेले प्रेम यासारख्या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर जोर देण्यात आला आहे, परंतु नैतिक मूल्यांचा वास्तविक स्रोत धर्म आहे, नास्तिकवाद नाही आणि धर्माशिवाय नैतिक मूल्यांची कल्पना करणे अशक्य आहे.
सध्याची परिस्थिती ही व्यक्तिशः आणि समाजावरील धर्माची पकड ढिली पडण्याचा परिणाम आहे, कारण मानवी चरित्र सुधारण्यासाठी आणि नैतिक बदनामी रोखण्यासाठी धर्मापेक्षा प्रभावी आणि सामथ्र्यवान प्रेरणा दुसरी असूच शकत नाही.
‘न्यूयॉर्क अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अध्यक्ष क्रॅसी मेरीस म्हणाल्या:
‘‘शिष्टाचार व आदर, औदार्य, चरित्र, नैतिकता, उच्च आदर्श आणि ज्यांना दैवी गुण म्हटले जाऊ शकते ते निरीश्वरवादातून निर्माण होऊ शकत नाहीत, जो खरे तर त्याची निर्मिती हाच एक विचित्र प्रकार आहे ज्यात माणूस स्वत:ला ईश्वराच्या जागी ठेवतो. विश्वास आणि श्रद्धाविना सभ्यता नष्ट होईल. शिस्तीचे परिवर्तन अराजकतेत होईल, आत्मनियंत्रण अदृश्य होईल आणि सर्वत्र विनाशा पसरेल. ईश्वरावरील आपली श्रद्धा आणखीन दृढ करण्याची सध्या गरज आहे.’’
जबाबदार व संतुलित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी आणि नीतिमान सभ्यतेच्या स्थापनेसाठी ईश्वर आणि पारलौकिक जीवनाच्या संकल्पनेची आवश्यकता आहे. वहीदुद्दीन खान यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘‘खरे तर सभ्यता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचे एकमेव आणि योग्य उत्तर म्हणजे धर्म होय. धर्म आपल्याला वास्तविक, विधिमंडळ, कायद्याचा सर्वात योग्य आधार, जीवनाच्या प्रत्येक बाबतीत सर्वांत योग्य मार्गदर्शन करतो, ज्याच्या प्रकाशात आपण जीवनाचा संपूर्ण आराखडा बनवू शकतो. ते मार्गदर्शन कायद्याचा मानसिक पाया प्रदान करतो. या मार्गदर्शनाशिवाय हा कायदा व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतो. त्याच्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीकरिता समाजात अनुकूल वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे धर्म आपल्याला सर्व काही प्रदान करतो. आपल्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी आम्हाला जे हवे आहे ते देतो तर निरीश्वरवाद यापैकी काहीही देऊ शकला नाही आणि खरोखर देऊ शकत नाही.’’
(भाग ३) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

Dua
या सृष्टीचा निर्माता, पोशिंदा, स्वामी व प्रभू परम दयाळू व कृपाळू अल्लाह असून तो मानवजातीच्या कल्याणकारी मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठवितो, जे या जगाच्या पाठीवर वसणाऱ्या समस्त मानवांना योग्य मार्गदर्शन करतात, सत्य-असत्य, खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि चांगल्या-वाईटाचा फरक सांगतात. सत्याची, न्यायाची आणि सदाचाराची स्थापना करतात. माणसास माणूस बनवितात.
मात्र आपण याबरोबरच हेसुद्धा पाहिले आहे की मानव हा एक स्वतंत्र आणि स्वावलंबी जीव आहे. तो इतर सजीवांप्रमाणे विवश, निष्प्रभ आणि हतबलसुद्धा नाही. चांगल्या आणि वाईट, सत्य आणि असत्य मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य त्याच्यात आहे. सत्याचा मार्ग हा पैगंबरांनी दाखविलेला मार्ग असून पैगंबरांच्या मार्गाविरूद्ध असलेला मार्ग म्हणजे असत्य, अन्याय व दुराचाराचा मार्ग होय. या जगाच्या इतिहासात लोकांनी याच दोन मार्गांपैकी एका मार्गाची निवड केली आहे. आजही याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ईशमार्गावर चालणारेही आहेत आणि ईशद्रोहीसुद्धा आहेत.
या परिस्थितीवर गंभीरपणे जर आपण विचार केला तर हा प्रश्न उभा राहतो की सरळमार्गी आणि दुष्कर्मी वा अन्यायी लोकांत साम्य आहे काय? दोघांचा परिणाम सारखाच होईल काय? मुळीच नाही. शक्यही नाही. कारण अल्लाहकडून मार्गदर्शन अथवा जीवनाचा योग्य आणि सत्यमार्ग मिळाल्यास तसेच हा सत्यमार्ग स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असूनही न स्वीकारणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात येणार नाही आणि स्वीकारणाऱ्यांना त्यांच्या आज्ञाधारकतेचा कोणताही बदला मिळणार नाही, हे तर बुद्धीला मुळीच पटणारे नाही.
अल्लाहच्या पैगंबरांनी अल्लाहचा संदेश मानवजातीला प्रदान केला व या संदेशाबरोबरच या वस्तुस्थितीबाबतही खबरदार केले आहे की वर्तमान जीवनाची ही मुदत मुळात एका परीक्षेपुरता कार्यकाळ आहे. अल्लाहने मानवास चांगले वा वाईट निवडण्याचे जे स्वातंत्र्य प्रदान केले, ते यासाठीच केले की मानवाची परीक्षा घ्यावी की कोणती व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आणि चांगल्या प्रकारे वापर करते, सदुपयोग करते आणि कोणती व्यक्ती याचा दुरुपयोग करते. अल्लाहने मानवजातीस मार्गदर्शन देण्याचा एक पैलू हादेखील आहे की लोकांनी हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि याचा योग्य व पुरेपूर मोबदला प्राप्त करावा. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मार्गदर्शन डावलले आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून मनमानी केली, त्यांना याची शिक्षाही भोगावी लागणार. म्हणूनच अल्लाहच्या पैगंबरांनी मानवजातीस स्पष्ट शब्दांत खबरदार केले की हे वर्तमान जीवन कर्म करण्याचे कार्यक्षेत्र आहे. या जीवनात जी व्यक्ती अल्लाहने दाखविलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनाची  वाटचाल करील, अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर जीवन व्यतीत करील, नेकी आणि सदाचाराचे जीवन व्यतीत करील, त्यास याचा उत्तम मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या मार्गाविरूद्ध जीवन व्यतीत करील, त्या व्यक्तीस कठोर शिक्षा मिळेल. त्यांनी याविषयीदेखील मानवजातीस खबरदार केले की आम्ही (पैगंबर) अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समस्त मानवांना हे दाखवू इच्छितो की हा विश्वरूपी कारखाना एके दिवशी नष्ट करण्यात येईल. समस्त मानवजातीस परत जीवित करण्यात येईल आणि प्रत्येकास प्रभु, अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. या गोष्टीचा जाब की अल्लाहने प्रदान केलेल्या शक्ती व सामर्थ्यचा, स्वातंत्र्य व क्षमतेचा, कौशल्य व पात्रतेचा वापर कोणत्या व कशा पद्धतीने केला. अल्लाहच्या मर्जीनुसार केला की त्याच्या अवज्ञेनुसार केला. याबरोबरच अल्लाहने आपल्या पैगंबरांच्या माध्यमाने हेदेखील स्पष्ट केले की अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याचे प्रचंड बक्षीस मिळेल, अर्थात अविनाशी असलेली स्वर्गप्राप्ती होईल. याउलट अल्लाहची अवज्ञा करून इतर कुणाच्या आज्ञेनुसार वा मर्जीनुसार जीवन जगण्याचे फलित अत्यंत वाईट मिळेल, अर्थात कधीही न संपणाऱ्या नरकयातना मिळतील. यातून कधीही सुटका होणार नाही.
मृत्यूनंतर परत जीवन मिळणार की नाही, मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल, याविषयीची माहिती मिळविण्याची साधने आपल्याकडे नाहीत. काहींचे मत आहे की आपले हेच वर्तमान जीवन एवढेच आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणे हे केवळ एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जर असे असते तर प्रश्नच मिटला असता. यावर विचार करण्याची गरजसुद्धा पडली नसती. कसले पुण्य आणि कसले पाप? पद्धतशीरपणे मस्तपैकी जीवन भोगायचे नि मरून जायचे, संपले! मात्र ही वस्तुस्थिती विसरण्यासारखी मुळीच नाही की आपल्या वर्तमान जीवनाशी या कल्पनाविलास वाटणाऱ्या बाबीचा दृढ संबंध आहे. विशेषत: आपल्या नैतिक जीवनाचा तर याशीच संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण थोड्या वेळेसाठी असे समजू या की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवन नाही आणि आपल्या जीवनाचा वा भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार नाही, ज्या जीवनाच्या यशापयशाची मदार वर्तमान जीवनावर आहे. तर याचा परिणाम निश्चितच आपल्या वर्तमान जीवनावर असा होईल की आपल्या जीवनातून पाप-पुण्याचा कोणताही मोबदला जर मिळत नसेल आणि पापाची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नसेल तर मग चांगले आणि सदाचाराचे विनाकारण लचांड गळ्यात घालून घ्यायचेच कशाला? मग वाटेल तसे जगायचे. नैतिकता, मानवता आणि सदाचाराची बिनधास्त होळी करायची. आपले जीवन रंगवून घेण्यासाठी इतरांच्या रक्ताने बिनधास्त शिमगा खेळायचा, वाटेल त्याला खपवायचे, वाटेल ते हिसकावून घ्यायचे, साऱ्यावर आपलीच मनमानी स्थापन करायची. कारण जीवन हे एकदाच मिळालेले असते, ते वाटेल तसे भोगायचे, मौज-मजा करण्याची कोणतीही संधी चुकवायची नाही. कारण आपल्याला कोण विचारणार, आपला कोण जाब घेणार? मात्र हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. यावर गंभीरपणे विचार केल्याशिवाय मुळीच गत्यंतर नाही. आपल्याला यावर विचार करावाच लागणार आहे की मृत्यूनंतरच्या जीवनातील यशापयशाचे परिणाम आपल्या वर्तमान जीवनावर काय होतात.
आपण जर यावर खरोखरच विचार केला तर आपल्याला हे स्पष्टपणे आढळून येईल की या जगात बरेच लोक चांगले व वाईटही आहेत आणि बरेचजण सदाचारी व दुराचारीही आहेत. दुराचारी लोक अत्यंत मौज-मस्तीत जीवन व्यतीत करून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या जीवनात समस्त सुखसाधने असतात. तर याउलट सदाचारी व सद्वर्तनी लोक दु:ख, समस्या, अडचणी आणि ना-ना प्रश्नांशी झुंजत असताना दिसतात. असेच समस्याग्रस्त जीवन कंठून ते या जगातून निघून जातात. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की जे लोक सद्वर्तनी, सत्यनिष्ठ आणि सदाचारी असतात व याच सत्यनिष्ठतेपायी संकटमय जीवन जगत असतात, अल्लाहच्या निर्णयाचे प्रत्येक संकटमय पावलावर स्वागतच करीत असतात, मोठमोठ्या संकटांना न घाबरता आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सत्याची कास सोडत बसतात, न्याय आणि सदाचाराकरिता अख्खे जीवन अल्लाहला सर्मिपत करतात आणि याच सत्याच्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून जीवनाची सांगता करतात, त्यांच्या मनात निश्चितच ही जाणीव तीव्रपणे उचंबळून येते की जगाचा निर्माता व पोशिंदा प्रभू अल्लाह निश्चितच न्यायी आहे, तो आपल्या सत्यनिष्ठा व सदाचाराचा, आपल्या भावनांच्या बलिदानांचा, आपल्या सत्य समर्पणाचा निश्चितच उत्तम मोबदला देईल. या सदाचाराच्या बदल्यात एका अशा स्थायी, समाधानकारक, दु:खरहित आणि आनंददायी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. एका अशा जीवनाची गरज आहे जेथे निश्चितच सदाचाराचे चांगले फळ आणि दुराचाराची शिक्षा मिळावी. शिवाय ज्या माणसाला या गोष्टीवर विश्वास असेल की या विश्वाचा रचयिता, निर्माता, सृष्टा, पोशिंदा, प्रभु अल्लाह आहे आणि त्यानेच हे सारे काही आपल्या सामर्थ्यने निर्माण केले, आपले स्वामित्व गाजविले, आपल्या प्रभुत्वाने सारी सृष्टी पोसली, तोच प्रभु अल्लाह निश्चितच सहजरित्या परत ही सृष्टी निर्माण करील. यात त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. अशा अमर्याद सामर्थ्यशाली निर्मात्या प्रभु अल्लाहसाठी प्रत्येक मानवास परत जीवन देण्यात काहीही अडचण येणार नाही. मग शेवटी अल्लाहच्या पैगंबरांनी परलोकी जीवनाची जी खबर अथवा वार्ता दिली, त्यात मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आणखीन एक सांगायचे झाल्यास तुम्ही कदाचित म्हणाल की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचे फलित मिळण्यासाठी दुसऱ्या जीवनाची काय गरज आहे? हे तर या जीवनातही शक्य आहे! येथेसुद्धा दु:ख आहे, कष्ट आहे, सुख-समाधान आहे. येथेही उच्च-नीच आहे आणि या आधारावर हेदेखील जर मान्य करण्यात आले की याच जगात आपल्या पाप-पुण्याईचा मोबदला प्राप्त करण्यासाठी याच जगात वारंवार माणूस जन्म घेऊ शकतो. पुण्याईच्या बदल्यात सुखी-समाधानी जीवन प्राप्त होऊ शकते, पापकर्मांच्या मोबदल्यात दु:ख व यातनामय जीवन मिळू शकते. मात्र यावर थोडाजरी विचार केला तर तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर विश्वास येईल की पाप-पुण्याच्या बदल्यात या वर्तमान जीवनात तर काहीही मिळणे शक्य नाही. जर आपण हे मान्य केले की सध्या अडीअडचणीत असलेली व्यक्ती मागच्या जन्मीच्या पापाची फळे भोगत असून सुखी-समाधानी व्यक्ती मागील जन्माच्या पुण्याची फळे चाखत आहे, तर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की या जगात सर्वप्रथम पाऊल ज्या व्यक्तीने ठेवले होते, त्यास कोणत्या जन्माच्या पुण्य अथवा पापाचे फळ भोगण्यासाठी या जगात पाठविण्यात आलेले होते?कारण यापूर्वी तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक जीवन नव्हते. यापेक्षाही आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे लोक सुखी-समाधानी आहेत अथवा समस्या व संकटांनी ग्रस्त जीवन कंठीत आहेत, त्याच्यासंबंधी हे सांगता येणे शक्य नाही की ते पुण्यकर्माची बक्षिसे प्राप्त करताहेत की पापाची कडू फळे चाखत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दीन-दु:खी आणि संकटग्रस्त व्यक्तीस पाहा. कदाचित तो या अवस्थेच्या स्वरूपात शिक्षा भोगत असेल. कारण मागच्या जन्मी कदाचित त्यास धन-दौलत अगर सत्ता मिळालेली असेल आणि त्याने कदाचित दुराचार वा पापकर्मे केली असतील आणि त्याच्या परिणामस्वरूपी तो या जन्मी शिक्षा भोगत असेल. याबरोबरच हेदेखील शक्य आहे की ही अवस्था मागील जन्मातील चांगल्या कर्मांचे उत्तम बक्षीस भोगण्यासाठी असावी. कारण मागच्या जन्मी तो कदाचित एखादा प्रामाणिक कुत्रा असावा आणि त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्यास हे मानवी जीवन मिळालेले असेल. मग हे जीवन समस्या आणि संकटांनी ग्रस्त का असेना. शिवाय या अडचणींव्यतिरिक्त आणखीन एक मोठी अडचण अशी दिसते की या जन्मात माणूस पुढील जन्मासाठी काही कष्ट करून पुण्याईची कमाई करीत असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हणणे वावगे ठरणार नाही की या वर्तमान जीवनात माणूस पुढील जन्मासाठी काही पुण्य कमावित असेल अथवा पुढील जीवनाच्या यशापयशाची पूर्ण भिस्त या जीवनाच्या पुण्य व पापकर्मांवर असेल. मग यातदेखील आणखीन एक अडचण अशी निर्माण होते की एक माणूस एकीकडे शिक्षा भोगत आहे वा बक्षीस मिळवित आहे आणि दुसरीकडे तर हीच शिक्षा आणि बक्षीस त्याच्या पुढील जन्माकरिता यशापयशाचे कारण ठरत असेल, हे कोणत्याही पैलूने बुद्धिसंमत वाटत नाही.
या समस्त बाबींव्यतिरिक्त आणखीन एक पैलू असा की आपण जर कोणत्याही दृष्टिकोनानुसार या वारंवार जन्म घेण्यावर विचार केला तर ते शक्य वाटत नाही. या जीवात जो माणूस जेवढी कर्मे करतो, ती सर्व प्रकरणे त्याच्या जीवनाबरोबरच संपूर्ण जाणारी बाब मुळीच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नराधमाने एखाद्या निष्पाप माणसाचा वध केला आणि जर त्या खुन्यास या अपराधास्तव फाशीची शिक्षा देण्यात आली तर हे प्रकरणदेखील इथेच संपत नाही. कारण त्याचा एक गुन्हा असा होता का त्याने एका निष्पाप माणसाला जीवातून उठविले. मात्र याबरोबरच मृताच्या परिवारास असंख्य आर्थिक, मानसिक छळ सोसावा लागला. बिचाऱ्याची मुलेबाळे रस्त्यावर आली, पत्नी विधवा व निराधार झाली. मुले अनाथ झाल्याने शिक्षणाची सोय झाली नाही आणि दर-दर भीक मागून अख्खे जीवन व्यर्थ घालवावे लागले. शिवाय नंतरच्या कित्येक पिढ्या या दुष्कृत्यामुळे वाया गेल्या अर्थात त्याच्या खून करण्याच्या अपराधाचे परिणाम फक्त मृतकासच नव्हे तर परिवार, समाज आणि न जाणो कोणाकोणास भोगावे लागले असतील. जर सत्य आणि न्यायासहित त्यास त्याच्या पापाची पूर्णपणे शिक्षा द्यायची झाल्यास केवळ फाशी दिल्याने कसे चालेल?मृतकाच्या परिवारजनांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय? जर फाशी होताच त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्यास कुत्रा अथवा मांजराच्या जन्मी घालण्यात आले तर ते असे ठरेल जणू एखाद्याचे खाते बंद करण्यापूर्वीच त्याचा हिशेब पूर्ण करण्याचा एखाद्याने निर्णय घ्यावा. हीच परिस्थिती पुण्यकर्मांचीदेखील आहे. माणूस बरीच कर्मे अशी करतो, ज्यांचे उत्तम परिणाम त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा मानवजातीस प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखादी शाळा काढली. जोपर्यंत लोक त्या शाळेत शिक्षण घेत राहतील तोपर्यंत त्यास याचे पुण्य लाभत असेल. कोण जाणे किती शतकांपर्यंत ही शाळा सुरू राहील आणि लोकांना शिक्षणासारखी अमूल्य संपत्ती प्राप्त होत राहील. अशा अवस्थेत त्याला मेल्यानंतर तात्काळ त्याच्या पुण्याचा मोबदला कसा देता येईल. कारण अद्याप त्याच्या पुण्यकर्माचे खातेच बंद झालेले नसणार.
अशाप्रकारे विचार केल्यास हीच बाब स्पष्ट होते की जर माणसाला त्याच्या पुण्य वा पापाचे योग्य फलित मिळावयास हवे असेल तर त्यास एक असे जीवन हवे जे हे जग नष्ट झाल्यानंतर सुरू व्हावे आणि ते परलोकी जीवन कायमस्वरूपी व स्थायी स्वरूपाचे असावे. ज्या ठिकाणी माणसाला पूर्ण रूपाने त्याच्या पुण्य वा पापांची फलिते मिळणे शक्य व्हावे. कारण या वर्तमान जगातील क्षणभंगूर जीवन या फलितांसाठी पुरेसे ठरू शकत नाही, मात्र निश्चित!

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget