Latest Post

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी रानटी लोकांतून नवी संस्फूर्त असे संघटित राष्ट्र निर्माण केले. त्यांना ईशज्ञान देऊन कृतार्थ केले, पवित्र केले. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातात रंगणारे असे अरब होते. त्यांना ‘तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय ईशपूजा’ असे ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनी एकत्र केले. विभक्त झालेल्या अरबांना त्यांनी जोडले. बंधुभावाने बांधले. संघटित केले. अनादिकाळापासून हे द्वीपकल्प अंधारात गुडुप होते. आध्यात्मिक जीवनाचे नावही नव्हते. ज्यूंच्या वा खिस्तांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रुढी, दृष्टता, दुर्गुण यांच्या घाणीत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत! मोठा मुलगा स्वत:च्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत, त्यांना स्वत:च्या बायका करी.
थोड्या वर्षांपूर्वी असा हा अरबस्तान होता. परंतु मुहम्मद (स.) यांनी केवढे स्थित्यंतर केले! जणू स्वर्गातील देवदूत खाली वावरायला आला. ज्यांची मने अर्धवट जंगली होती, अशांची मने भ्रातृभाव व प्रेम यांनी भरून गेली. अरबस्तान नैतिकदृष्ट्याही ओसाड वाळवंट होते. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथे पायमल्ली होत होती; परंतु मुहम्मद (स.) यांनी तेथे नैतिक नंदनवन फुलविले. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाची फुले फुलविली. मूर्तिपूजा व तद्नुषंगिक इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केले.
जो अल्लाह स्वत:च्या सामर्थ्यने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या एकमेव अल्लाहची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहम्मद (स.) यांनीच करून दाखविला. इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुन्हा आली नाही आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांची वाणी अत्यंत प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. अल्लाहचे अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणे, तीव्रपणे क्वचितच कोठे उपदेशिले गेले असेल, उद्घोषिले गेले असेल. अरब अत:पर केवळ ऐहिकदृष्टीचे राहिले नाहीत. मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असे जीवन असते. त्या पारलौकिक जीवनासाठी या जीवनात दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनात दाखविली पाहिजेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शिकविले.
हा जो अमूर्त ईश्वर तो अनाद्यनन्त आहे तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान, प्रेमसिंधू व दयासागर आहे. ही जी नवजागृती आली त्याचे मुहम्मद (स.) स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणू नवप्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यातून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वाहत होते आणि म्हणून मुहम्मद (स.) यांच्याविषयी भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणू आता एकच इच्छा झाली की त्या अल्लाहची सत्याने व पावित्र्याने सेवा करावी. अल्लाहची आज्ञा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जे जे सांगितले, जी जी वचने उच्चारिली, जे जे मार्गदर्शन केले, जी सत्ये दिली, ते सारे अरबांच्या हृदयात जणू कोरल्यासारखे झाले होते. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीती यांचे ऐक्य झाले. सद्सद्विवेकबुद्धीसाठी आनंदाने बलिदाने करणारे दिसू लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभू लागले. जगाला एवढी मोठी जागृती इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल.
मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत आपले कार्य पुरे केले. बुद्धाचे काम अशोकाने पुरे केले. खिस्ताचे कॉन्स्टंटाईनने, झरतुष्ट्राचे उरायसने, बनीइस्राईलांचे जोशुआने. परंतु मुहम्मद (स.) एक असे झाले ज्यांनी स्वत:चे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेही कार्य पुरे केले. जणू सारे काम अल्लाहच करवीत होता, मुहम्मद (स.) निमित्तमात्र होते, असे मुस्लिमांनी म्हटले तर त्यात काय आश्चर्य?
ज्याला कालपरवापर्यंत दगड फेकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधित आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्त्रप्रणाम, त्या महापुरुषाला.
मुहम्मद (स.) यांचे जीवन उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मांनी खच्चून भरलेले असे हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनी चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांना त्यांनी एक केले. अमर जीवनाच्या आशेने कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्तत: पडलेले किरण वेंâद्रिभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणे नाही. तडजोडीस वाव नाही.
अप्रतिहत धैर्याने हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधीच बाळगिली नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वत:च्या जणू संपूर्ण विसर त्यांना पडला होता. खिस्ताने निराकार प्रभूचा धर्म दिला; परंतु त्या धर्मात मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेत चुस्त गढून गेलेल्या अरबांना या न पढलेल्या फकीराने इतक्या प्रखरतेने ईश्वराची एकता पटविली की ती वज्रलेप झाली. ज्यांनी ज्यांनी म्हणून पैगंबरांची वाणी एकदा ऐकली, त्यांच्या मनावर ईश्वराचे अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय राहत नसे.

उमर (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“आचरण हेतूवर अवलंबून आहे आणि प्रत्येक माणसाला त्याच्या हेतूप्रमाणे फळ मिळेल. अल्लाह व त्याचे प्रेषित यांच्यासाठी माणसाने देशत्याग केला (हिजरत) तर ती त्यांच्यासाठी आहे आणि ऐहिक गरजेपोटी अगर एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करण्यासाठी त्याने देशत्याग केला (हिजरत) तर ज्या हेतूने त्याने तसे केले त्यासाठीच ते राहील."
(सर्वसंमत) 'हिजरत'चा अर्थ धर्मरक्षणासाठी स्थलांतर करणे. पूर्वी लोक मक्केहून मदीनेस प्रयाण करीत, त्याला 'हिजरत' म्हणत.
आचरणाचा अभिप्रेत अर्थ सदाचरण हा आहे. दुराचार कोणत्याही हेतूने केलेला असला तरी तो दुराचारच व ईश्वराजवळ त्याची काही किंमत नाही. सदाचारसुद्धा सद्हेतूने केलेला नसेल तर तोदेखील निरर्थकच व ईश्वराजवळ अशा आचरणाबद्दल काही फळ मिळत नाही.
नमाज अदा करणे हे चांगले आचरण. ईश्वराने नेमून दिलेले कर्तव्य म्हणून हे आचरण करीत राहिल्यास ईशदरबारी दासाची ही सेवा रुजू होऊन त्याला त्याचे फळ लाभेल. पण लोकांनी आपणास नमाजी म्हणावे, धार्मिक वृत्तीचा म्हणावे या हेतूने कोणी नमाज पढत असेल तर त्याची नमाज ईशदरबारी कवडीमोल आहे.
आचरण व त्यामागील हेतू यांचा विचार होऊनच अल्लाहच्या दरबारी त्यांचे चांगले वा वाईट फळ मिळते. अल्लाहच्या कृपेचा लाभ होण्यासाठी आचरणही चांगले हवे व त्यामागील हेतूही चांगला हवा.

waterfall
धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन पर्यावरणीय विनाशाला धार्मिक निष्ठा जबाबदार असल्याचा ठपका ठेवतो. मात्र याउलट, भौतिक जगावरील विश्वासाचा दृष्टिकोन पारलौकिक निष्ठेच्या तुलनेत पर्यावरणीय विश्वासापेक्षा अधिक हानिकारक आहे. वैज्ञानिक भौतिकवाद आणि लौकिक निराशावाद पर्यावरणीय नैतिकतेशी सुसंगत नाहीत.
जॉन हॉट (John F. Haught - an American theologian) यांच्या मते :
‘‘जर प्रत्येक गोष्ट ‘निरपेक्ष शून्यते’साठी निश्चित असेल आणि भौतिकवाद विश्वाकडे अत्यंत क्षुल्लक आणि अंतिम शोकांतिकेच्या रूपात पाहात असेल तर खरोखरच आपण तिची कदर केली असती? अशा तत्त्वज्ञाद्वारे आपल्याला पृथ्वीच्या सुंदर खजिन्याची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले जाऊ शकते?हे शक्य आहे, असे आम्हाला वाटते.’’
परलोकावरील श्रद्धा आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचे आमंत्रण देते, कारण निसर्गाकडे स्वतःची अंतर्गत भावी इच्छा असते ज्यासाठी आपण इच्छित आहोत, म्हणूनच निसर्गाचा नाश म्हणजे खरोखरच स्वतःला व ब्रह्मांडाला आपल्या भविष्यापासून नष्ट करणे होय. जगातील अनेक वस्तूंच्या अस्तित्वाचे नाविन्य सध्याचे युग आणि जगाच्या समाप्ती दरम्यान सातत्य ठेवण्याची आशा निर्माण करते. सुंदर वातावरण, नैसर्गिक आकांक्षांचे समाधान व आनंद, सुख व शांतीची इच्छा ही स्वाभाविक बाब असली तरी याच्या पूर्ततेसाठी सध्याचे जग पुरेसे नाही. यासाठी धर्म नंदनवनाची (स्वर्गाची) संकल्पना देतो जेथे या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जातात.
आपण पृथ्वी आणि नैसर्गिक जगाकडे नंदनवन म्हणून
पाहू नये, अशी परलोकावरील श्रद्धेची अपेक्षा आहे. त्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू नये तर ते पूर्ण होण्याची (पारलौकिक जीवनात) आशा बाळगू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे दोषही उघड करू शकतो. खरं तर, अनेक पर्यावरणीय समस्या स्वत:साठी सुखकारक स्वर्ग निर्माण करण्याच्या मनुष्याच्या तीव्र इच्छेचा परिणाम आहेत आणि यासाठीच तो नैसर्गिक देणग्या आणि त्याच्या मौल्यवान स्रोतांचा अंधाधुंध वापर करू लागतो. या जगात नंदनवनाची प्राप्ती (स्वर्गप्राप्ती) शक्य नाही. तथापि, कुरआनात उल्लेखित धर्मशास्त्र आणि स्वर्गातील बोधकथा एक उच्च ध्येय ठेवतात जेणेकरून हे ऐहिक जीवन नेहमीच ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार सर्वोच्च पूर्णतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
फक्त पारलौकिक संकल्पनेचा मानवी नैतिकतेशी जवळून संबंध आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. निवाड्याच्या दिवसाविषयी धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल कारण तो न्यायाचा दिवस आहे. हा विश्वास लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतो.
पर्यावरणीय इतिहासकार सायमन (एग्स्दह) पारलौकिक जीवनाचे महत्त्व असे सांगतात -
‘‘पृथ्वी केवळ एक तात्पुरते निवासस्थान आहे या कल्पनेवर आधारित सर्व मानवी क्रियाकलाप असले पाहिजेत (मनुष्य एक श्रेष्ठ निर्मिती असला तरी) आणि आपली कृती विश्वासाचे प्रकटीकरण म्हणून योग्यरित्या प्रशासित केली जाणे आवश्यक आहे. यामध्ये न्याय आणि धार्मिकता तसेच पर्यावरणाच्या समस्यांचे योग्यज्ञान आणि आकलनाचा समावेश आहे.’’
या चर्चेमुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यास मदत होते की पृथ्वीची पर्यावरण व्यवस्था नष्ट करण्याची परवानगी धर्माचा परिणाम नसून धार्मिक जागृतीच्या अभावाचा परिणाम आहे. जॉन हॉट (व्दप्ह प्aल्ुप्ू) यांनी याच मताचे समर्थन करताना धर्मनिरपेक्षतेला याच्या खऱ्या अपराधाबद्दल दोषी ठरवले. धर्मनिरपेक्षतेने ईश्वराला ब्रह्मांडापासून वेगळे करून बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी दिली. या मतांच्या प्रभावामुळे निसर्गावर मानवी वर्चस्वाची कल्पना नाहीशी झाली.
सर्व प्राणीमात्राची निर्मिती केल्यानंतर अल्लाहने त्यांना एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवले आणि याच आधारावर जगात संतुलन व समतोल राखला जातो. सर्व प्राणी, सजीव आणि निर्जीव, एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा हेतू पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. जर मनुष्य हे संतुलन बिघडवितो, या नैसर्गिक स्रोतांचा गैरफायदा घेतो, त्यांचा गैरवापर करतो किंवा त्यांचा अपव्यय करतो, त्यांना प्रदूषित करतो तेव्हा त्याचा लौकिक संतुलन आणि न्यायावर परिणाम होईल, जो स्वतः मनुष्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी या नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षण आणि अस्तित्वासाठी कार्य करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गाविरूद्धच्या लढाईत मनुष्याचा पराभव निश्चित आहे. परिणामस्वरूप असे म्हणता येईल की आधुनिक काळातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आधुनिक शोधांचा दुरुपयोगामुळे पर्यावरणीय संकट ओढवले गेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी धार्मिक शिकवण, नैतिक, मानसिक शुद्धतेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(भाग ४) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Success
आतापर्यंत ज्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला, त्या गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. मात्र यासाठी आपले मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणेही आवश्यक आहे. जर पूर्वीच आपण एखादा विशिष्ट विचार मनात घेऊन बसलो तर कोणतेही सत्य आपल्या अंत:करणास स्पर्श करू शकत नाही, हे निश्चित!शिवाय ज्या ज्या वेळी या जगात अथवा देशात धर्म हा आपल्या मूळ स्वरूपात आला, त्या प्रसंगी या मूळ धर्माकडूनसुद्धा हेच घोषित करण्यात आले. आजसुद्धा या गोष्टी कोणत्या न् कोणत्या स्वरूपात जगातील समस्त धर्मांत आढळतात. कारण असे की धर्म हा नेहमीच आपल्या मूळ स्वरूपानुसार एकच असतो आणि असे व्हावयासही हवे. अल्लाह एकच आहे! म्हणूनच त्याच्याकडून येणारा संदेशसुद्धा एकच असून त्याचे खरे नाव इस्लाम असे आहे. अर्थातच असा धर्म जो मानवास अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याची शिकवण देतो. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देश वा राष्ट्रात त्याच्या पैगंबरांच्या माध्यमाने जो धर्म आला, तो मुळात इस्लाम हाच धर्म होय. मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसे लोकांनी आपापल्या सवलतीनुसार परिवर्तन घडवून आणले. पाहिजे ते समाविष्ट केले आणि नको ते वजा केले. याच प्रकारातून मग विविध शाखा फुटल्या आणि बरेच कृत्रिम धर्म निर्माण झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच असून या मूळ धर्माचा आधार निम्नलिखित तीन गोष्टींवर आहे. (१) हे विश्व अल्लाहशिवाय निर्माण झालेले नसून अल्लाहशिवाय कार्यरत नाही. तो सर्वगुणसंपन्न असून त्याच्या समान इतर कोणीही नाही.(२)अल्लाहने आपली महत्त्वपूर्ण निर्मिती अर्थात मानवजातीस आपला संदेश पैगंबरांच्या माध्यमाने पाठविला आणि प्रत्येक  काळ  व  प्रत्येक  भूभागात  पाठविला. कोणासही यापासून वंचित ठेवले नाही. (३) समस्त मानवांना एके दिवशी आपल्या खऱ्या स्वामीसमोर अर्थात अल्लाहसमोर आपल्या भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येकास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट मोबदला मिळणारच.
या तीन गोष्टी इस्लामच्या मूलभूत गोष्टी असून इस्लाम हाच धर्म नेहमीकरिता अल्लाहकडून आलेला सत्यधर्म होय. सर्वांत शेवटी इस्लाम धर्म आपल्या मूळ, परिपूर्ण आणि अंतिम स्वरूपात अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत जगात आला. त्यांचे पूर्ण जीवन आजही आपल्या मूळ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही पैगंबराच्या जीवनाचा मूळ इतिहास आज उपलब्ध नाही.याचप्रमाणे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झालेला ईशग्रंथ अर्थात कुरआनसुद्धा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त जगात इतर कोणताही ईशग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. आता जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणलेला धर्म अर्थात इस्लाम धर्म मार्गदर्शन करू शकतो. या काळात स्वत:ला इस्लाम धर्माचा अनुयायी असण्याचा दावा करणारे भरपूर लोक आहेत. मात्र अल्लाहच्या दृष्टिकोनात खरा मुस्लिम केवळ तोच आहे, जो इस्लामच्या नियमांवर आपले विचार आणि भावना तसेच आपले जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. इस्लाम व कोण्या विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा, विशिष्ट भू-प्रदेशाचा अथवा विशिष्ट काळापुरता धर्म नसून तो अल्लाहकडून समस्त मानवजातीकरिता व जग अस्तित्वात असेपर्यंत एक विश्वव्यापी जीवनमार्ग आहे. या धर्माची सर्वप्रथम शिकवण अशी की मानवाने एकाच अल्लाहस या जगाचा निर्माता, पोशिंदा आणि पूज्य स्वीकारावे. त्याचीच एकट्याची आराधना करावी, त्याच्या आदेशांचे पालन करावे. इतर कोणासही त्याच्यासम ठरविता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा करता कामा नये, कोणाच्याही आदेशाचे पालन करता कामा नये. अर्थातच यावर पूर्ण विश्वाससुद्धा असावा की अल्लाहच पूज्य आणि आराध्य असून केवळ त्याच्या मर्जी व कायद्यानुसारच जीवनाची वाटचाल करावी, आपले तन-मन-धन केवळ त्याला समर्पित करावे, त्याच्याच समोर नतमस्तक व्हावे, त्यालाच मदत मागावी, त्याचाच धावा करावा आणि त्याच्याच मर्जीचे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत पालन करावे. या विश्वाचा व आपला स्वामी त्यालाच मानावे. त्याच्याव्यतिरिक्त इतक कोणाचीही आज्ञा पाळता कामा नये. इतर कोणाही व्यक्तीने दाखविलेला मार्ग स्वीकारून जीवनाची वाटचाल करून स्वत:चे वाटोळे करून घेता कामा नये.
जी व्यक्ती अशा स्वरूपात अल्लाहचा स्वीकार करते, ती ईशमार्गाशिवाय इतर कोणाच्याही मार्गदर्शनाचा अवलंब करू शकत नाही. स्वत:च्या इच्छा-अभिलाशा आणि आवडीनिवडीसुद्धा अल्लाहच्या मर्जीच्या स्वाधीन करते. अल्लाहने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिलेल्या जीवनमार्गानुसार जीवन जगून यशस्वी व कल्याणकारी जीवनाची वाट धरावी. इस्लामची दुसरी अट अशी आहे की अल्लाहने जीवन जगण्यासाठी जो मार्ग दिला तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिला आणि इस्लाम हेच त्याचे नाव होय. अर्थात माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मानावे आणि अशी धारणा ठेवावी की ते या समस्त जगवासियांकरिता अल्लाहचा संदेश घेऊन आले आणि सर्वांचे पैगंबर व कल्याणकारी सुधारक आहेत. त्यांच्यानंतर आता कोणीही पैगंबर येणार नाही. यासाठी त्यांच्यावर अल्लाहकडून अवतरित झालेला अंतिम ईशग्रंथ हा कुरआन असून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या ग्रंथानुसार स्वत: प्रत्यक्ष कर्म करून दाखविले. इस्लामची तिसरी धारणा अशी की मानवाने या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी की त्यास मृत्यूपश्चात आपल्या प्रत्येक कर्माचा अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. यासाठी त्यास परत जीवन प्राप्त होणार असून ते कधीही संपणारे नसेल. माणसास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला मोबदला स्वर्गरूपी जीवनाच्या स्वरूपात मिळणार आणि वाईट कर्मांचा मोबदला नरकाच्या यातनामय जीवनाच्या स्वरूपात मिळणार आहे, हे निश्चित!
या इस्लामच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शिकवणी असून या शिकवणी माणसाच्या अंत:करणाची साद होय. हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही!

- मौ. मुहम्मद फारूक खान

    पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रूंशी व्यवहार करूणामय, दया, प्रेम, ममत्व व सहानुभूती पूर्ण होता. पैगंबर (स.) यांना अल्लाहने समस्त मानव जातीसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणूनच त्यांनी शत्रूंबरोबर सुद्धा शत्रूंबरोबर सुद्धा न्यायपूर्ण व सदाचारी व्यवहाराची शिकवण दिली.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या कोणत्याही शत्रूंशी वैयिक्तक बदला घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही तर शत्रूंना दयाळुपणा आणि ममत्वाची वागणुक दिली, यास इतिहास साक्ष आहे. हे वर्णन पुस्तिकेत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 202    -पृष्ठे - 12     मूल्य - 08    आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/9ql9r0sxvj88lvowffxfgxr4nzplg3eq

मुहम्मद (स.) एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करू लागले. चाळिशी नुकतीच संपली होती आणि आयुष्याचा उरलेला भाग आता ईश्वरदत्त महान कार्यासाठी ते अर्पण करू लागले आणि त्याच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला? त्याच्याजवळच्या मंडळींनी, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाही. हा ईश्वरी पुरुष आहे असे त्यांना वाटले. त्यातही सर्वांत आधी खदीजा (रजि.) ती पहिली अनुयायी, पैगंबर मुहम्मद (स.) यांस ईशज्ञान झाले आहे असे जर कोणी पाहिल्याने विश्वासपूर्वक मानले असेल तर ते खदीजाने. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक ईश्वराची, मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदीजा (रजि.)  यांनी  मुहम्मद (स.) यांच्या ईश्वरी जीवनकार्यावर तिनेच प्रथम श्रद्धा ठेवली. इतकेच नव्हे तर पुढील विवादात तिने त्यांना सदैव धीर दिला. जेव्हा ते कावरेबावरे होऊन त्या रात्री तिच्याकडे आले व ‘‘खदीजे, खदीजे; पांघरुण घाल माझ्यावर, कपड्यात लपेट मला.’’ असे म्हणाले त्यावेळेस ईश्वराने खदीजेच्या रूपानेच जणू त्यांना धीर दिला, शांती दिली. तीच त्यांना म्हणाली, ‘‘उठा.’’ तिनेच त्यांचा बोजा हलका केला. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल ते बडबडू द्या. लक्ष नका देऊ, असे म्हणाली. ईश्वराने ज्ञान दिले, खदिजेने शांती व विश्वास दिला. दुसरे अनुयायी अली (रजि.) व तिसरा अनुयायी जैद (रजि.) झाला. तो गुलाम, ज्याला मुहम्मद (स.) यांनी एकदम मुक्त केले होते, त्याने हा नवधर्म घेतला आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबू बकर (रजि.), ते मक्केतील श्रीमंत व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे होते. मुहम्मद (स.) यांना ‘अल्-अमीन’ म्हणत, तसे यांना ‘अस्-सिद्दीक’ म्हणजे सच्चा असे म्हणत. मुहम्मद (स.)याहून दोनच वर्षांनी ते लहान होते. त्यांना काबाचा सेवक असेही म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषाने हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पाच या नवधर्मात आले. अबू बकर (रजि.) पुढे खलीफा झाले. तसेच पुढे खलीफा होणारे उस्मान (रजि.) हे मिळाले. उस्मान (रजि.) हा प्रतिस्पर्धी उमैया घराण्यातील होता. दुसरा अब्दुल रहमान (रजि.), तिसरा साद (रजि.)- ज्याने पुढे इराण जिंकून घेतला. चौथा खदीजा (रजि.) चा नातलग जुबैर (रजि.) आणि पाचवा तो शूर लढवय्या तल्हा (रजि.). उस्मानने नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनी उस्मान (रजि.)ला बांधले व विचारले, ‘‘पूर्वजांच्या धर्मापेक्षा तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तू घेत आहेस तो जोपर्यंत तू सोडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.’’ परंतु उस्मान (रजि.) उत्तरला, ‘‘त्या ईश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतो, की तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाही!’’
काही अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलही मिळाले. मक्केतील काही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हब्शी ‘बिलाल’(रजि.) इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहम्मद (स.) प्रेमाने म्हणत, ‘‘बिलाल म्हणजे अ‍ॅबिसिनियाचे सर्वोत्तम फळ आहे!’’
मुहम्मद (स.) यांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहम्मद (स.) यांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ती, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींना मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहम्मद (स.) यांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायींनी छळ सहन केले. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दु:खे सहन केली. बहिष्कार, मरण यांनाही तोंड दिले. मुहम्मद (स.) यांच्या ठायी त्यांना यत्किंचितही काळे दिसते तर अशी अडग श्रद्धा जन्मेल का? खिस्तावर त्यांच्या भावांचा जवळच्या मंडळींचा यत्किंचितही विश्वास नव्हता. परंतु मुहम्मद (स.) या बाबतीत दैववान होते. मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयीच्या अत्यंत प्रामाणिकपणाची खूण आहे.

माननीय इब्ने अब्बास (र.) निवेदन करतात, मी एकेदिवशी प्रेषितांच्या मागे उंटावर स्वार होतो, तेव्हा त्यांनी सांगितले,
“हे मुला! मी तुला काही गोष्टी शिकवितो, १. अल्लाहच्या दीनचे (जीवनपद्धतीचे) रक्षण कर. अल्लाह तुझा संरक्षक होईल. २. अल्लाहच्या दीनचे रक्षण कर. तुला अल्लाहची कृपा लाभेल. ३. मागावयाचे झाल्यास अल्लाहजवळ माग. तुला मदतीची गरज भासल्यास अल्लाहची याचना कर.
हे जाण की साऱ्या लोकांचे तुला फायदा पोहोचविण्याबद्दल एकमत झाले तरी ते तुला फायदा पोहोचवू शकत नाहीत. फक्त अल्लाहने निश्चित केले आहे त्याच प्रमाणात तुझा फायदा होईल आणि सर्वांनी मिळून तुझे नुकसान करण्याचे ठरविले तरी हे तुझे नुकसान करू शकत नाहीत. फक्त अल्लाहने ठरविले आहे त्याच प्रमाणात तुझे नुकसान होईल."
(मिश्कात) दीनचे रक्षण करणे म्हणजे इस्लाम धर्मानुसार आचरण करणे. इस्लामच्या सर्व आज्ञा पाळणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बिधाड, कमी-जास्त होऊ न देणे. इस्लाममध्ये नवीन प्रथा, गोष्टी, रूढी, रीतीरिवाज यांचा शिरकाव होऊ न देणे. इस्लामचे मूळ स्वरूप कायम राखणे.

माणसाने इस्लामचे संरक्षण केल्यास त्याला अल्लाहच्या कृपेचा लाभ होऊन त्याचे संरक्षण होईल.
सर्व काही अल्लाहच्या हाती आहे म्हणून माणसाने अल्लाहचीच याचना करावी व त्याचेच आज्ञापालन करावे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget