Latest Post

इस्लामची साक्ष काय आहे? हा एक समर्पक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर हे इस्लामला जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इस्लाम हा धर्म सत्य धर्म पूर्वनियोजित आहे. तीच स्थिती ‘इस्लामची साक्ष’च्या उत्तराची आणि त्याच्या व्यावहारिक स्वरुपाची आहे. हे नियोजन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यावहारिक जीवनाची देन आहे. सामान्यतः साक्षीला आपण एखाद्या व्यक्तीचे खरे दस्तऐवज (प्रतिज्ञापत्र) म्हणतो. इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून हे खरे दस्तऐवज म्हणजे प्रतिज्ञापत्र या जगापुढे सर्व लोकांना दाखविले पाहिजे. सत्याची साक्ष देण्याला दोन अंग आहेत एक शाब्दिक, तोंडी आणि दुसरे व्यावहारिक.
अ) तोंडी साक्ष: तोंडी साक्ष देणे म्हणजे इस्लामबद्दल त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून ते सर्वकाही माहिती इस्लामच्या आदेशांपर्यंतची मुस्लिमेतर बांधवांना अतिशय योग्य पध्दतीने देणे. माहिती त्यांच्यासमोर अशा पध्दतीने मांडणे की जेणेकरून एक खुला ग्रंथ त्यांच्या पुढे राहावा आणि त्यांना त्यांच्या श्रध्देविषयीचा दोष जाणून घेण्यास व इस्लामचे उघड सत्य आत्मसात करण्यास काही एक अडचण राहू नये. या कार्यासाठी काही अत्यावश्यक बाबींचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे.
१) प्रथमतः चर्चा ही त्यांच्या मूलभूत तत्त्वांविषयी व्हावी जेणेकरून त्यांना त्यांच्या श्रध्देविषयी उघड उघड कल्पना येऊन जावी. इस्लामविषयी माहिती देताना अल्लाह एकमेव ईश्वर आहे (एकेश्वरत्व) प्रेषित्व आणि पारलौकिक जीवनावर उघड चर्चा व्हावी. इस्लामचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ.विषयींचे आदेश त्यांना स्पष्ट करून सांगावेत. इस्लाम मानवी जीवनाच्या समस्या कशा प्रकारे सोडवतो आणि इस्लामच्या आज्ञाधारकतेत या क्षणभंगूर जीवनाचे साफल्य दडून बसले आहे याची स्पष्ट माहिती (उकल) त्यांना करून द्यावी.
२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इस्लाम आणि इस्लामेतर काय आहे याची बौध्दिक आणि तार्किक चर्चा करून गांभीर्याने त्यांना समजून सांगावेत. यासाठी आजचे प्रचलित धर्म तत्त्वज्ञान, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेविषयी इतंभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे मुस्लिमेतरांविषयी एक तार्किक बैठक तयार होते आणि त्यामुळे इस्लामेतर तत्त्वांना मुळासकट उखडून टाकण्यास मदतच होते. हे अशा पध्दतीने व्हावे की त्यांच्या भावनांना स्पष्टपणे उघड केले जावे आणि त्यांच्या श्रध्देमुळे आणि धार्मिक आचरणांमुळे मानवतेची कशी हानी होते हे समजून दिले पाहिजे. मुस्लिमेतर श्रध्दा आणि तत्त्वे हे सर्व इस्लामची साक्ष देण्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यांच्याशिवाय साक्ष देणे पूर्ण होऊ शकत नाही. इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देणे म्हणजे नवीन इमारत बांधण्यासारखे आहे आणि नवीन इमारतीसाठी सर्वप्रथम नवीन पाया घालणे अत्यावश्यक आहे. पायाविना इमारत अशक्य आहे. पायाभरणी झाल्यानंतरच इमारत व भिती उभ्या राहू शकतात. जनमानसात इस्लामचा पाया मजबूत व्हावा आणि त्यांच्या मनात आणि हृदयात घर करून राहावे यासाठी जमीन तयार करणे (पाया भरणे) अत्यावश्यक आहे. यासाठी जमिनीची मशागत तेव्हाच होईल जेव्हा आपण जमिनीत उगवलेले खोटे तत्त्व आणि श्रध्दांना उपटून त्यांचे मन निर्मळ बनवू शकू. जहाजात सामान तेव्हाच ठेवता येईल जेव्हा ते रिकामे असेल अन्यथा नाही. याच तत्त्वाने, इस्लाम मनुष्याच्या मनात तेव्हाच घर करून राहील जेव्हा ते इतर श्रध्दांपासून मोकळे आणि निर्मळ होईल. कुरआननुसार एकेश्वरत्व, प्रेषित्व आणि परलोकत्व यांनाच फक्त इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देण्यासाठी उपयोगात आणणे पुरेसे नाही. तर यासाठी अनेकेश्वरत्वाचा, असत्य धर्माचा स्वीकार करण्याचा आणि प्रेषित्वाविषयी आणि पारलौकिक तत्त्वाविषयी श्रध्दाहीनतेचा कडाडून निर्धारपूर्वक विरोध होणे अत्यावश्यक आहे. यासाठी अश्रध्देचे प्रकार आणि ही श्रध्दाहीनता त्यांच्या मनात कशी प्रवेशकरती झाली याचा ऐतिहासिक आढावा घेणे, तसेच त्यांच्या शिळ्या आणि खोट्या मनोकामनांना उघड करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्यांच्या तत्त्वांची निरर्थकता त्यांच्यासमोर उघड होते आणि त्यांना जमीनदोस्त करण्यास ते स्वतःहून तयार होतात. काबागृहातील ३६० मूर्तींना याच एकमेव पध्दतीने त्या लोकांनी स्वतः जमीनदोस्त केले होते. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तिला कुरआन स्पष्ट करीत आहे,
‘‘धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी तागूत (मूर्तींचा) इन्कार करून अल्लाहवर श्रध्दा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन २: २५६)
३) तिसरी बाब आहे इस्लामचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा तसेच इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा मित्रत्वाने, सौजण्याने आणि गोडीने अत्यंत व्यवस्थितपणे मांडला गेला पाहिजे. मृदुभाषेमध्ये लोकांना पटेल अशा प्रकारे तसेच सौहार्दपूर्ण चर्चेतून शास्त्रोक्त पध्दतीने उद्देश प्राप्ती सहज होते. कारण इस्लामचा प्रामाणिकपणा आणि इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा समोर आणणे ही काही फक्त शैक्षणिक बाब नाही. एक सत्यधर्म प्रचार आणि प्रसारकार्य आहे. बुध्दीविवेकास आवाहन करून श्रोत्याच्या मनात आणि हृदयावर इस्लामसंदेशाची खोलवर छाप पडणे आवश्यक आहे, अन्यथा सर्व व्यर्थ. यासाठी समोरच्या श्रोत्याच्या मानसिक स्थितीचा विचार करूनच त्याच्याशी संभाषण व्हावे. आमंत्रण देण्याची पध्दत, भाषा आणि तंत्र कुरआननुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. कुरआनची पध्दत प्रभावशाली असून कुरआनची भाषाशैलीसुध्दा सुसंगत अशी आहे. कुरआनचा संवाददेखील गोड आहे. गैरसमज निर्माण होईल अशी कुरआन संवादाची भाषाशैली मुळीच नाही. कुरआनची स्पष्ट शैली आहे आणि ती स्फूर्तीदायक आणि आकर्षक भाषणशैली आहे. कारण अरबांना ही शैली फार आवडत होती. दुसरीकडे वैश्विक तत्त्वे, नैसर्गिक नियम आणि दररोजच्या घटनांचा उल्लेख अत्यंत प्रभावीपणे आणि अनुकूल चर्चेतून मांडला गेला आहे. लोकांना इस्लामकडे आमंत्रिक करण्यासाठी अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना खालीलप्रमाणे उपदेश केला,
‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)
वरील तिन्ही गरजा या मूलाधाराचे व्यावहारिक स्वरूप आहे.
४) चौथी बाब इस्लामकडे आमंत्रण कार्य - हे एखाद्या सहानुभूतीमुळे अथवा राष्ट्राभिमानाने अथवा भाषणकौशल्याच्या प्रेरणेने प्रवृत्त झालेले मूळीच नसावे. जे काही सांगितले गेले ते गांभीर्यपूर्वक, श्रध्दापूर्वक आणि अल्लाहच्या प्रेमातून बाहेर पडले पाहिजे. ते मानवतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. हृदयातून आपले म्हणणे इतरांच्या चुकांसाठी शोक करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. श्रोत्यांची ही भावना झाली पाहिजे की सांगणारा (प्रचारक) आपणास काही नवीन देत आहे. आपणाकडून काहीही न घेता एक उघड सत्य आपणापुढे मांडत आहे. लोकांना इस्लामच्या कृपाछत्राखाली आणण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची जी चिता आणि प्रबळ आकांक्षा होती त्याला कुरआनने खालील शब्दांत वर्णन केले आहे,
‘‘बरे तर हे पैगम्बर (स.)! कदाचित तुम्ही यांच्यामागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रध्दा ठेवली नाही?’’ (कुरआन १७: ६)
ब) व्यावहारिक साक्ष: व्यावहारिक साक्ष अथवा पुरावा तो आहे जो इस्लामचा प्रचारक आपल्या प्रत्यक्ष जीवनातून देतो. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशः आणि मुस्लिम राष्ट्राने इस्लामचे खरे रूप प्रदर्शित केले पाहिजे.
त्यांची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर गाढ श्रध्दा पाहिजे. तसेच प्रेषितवाद आणि परलोकत्वाची श्रध्दासुध्दा अटळ पाहिजे आणि जीवनकार्यात त्याचे प्रतिबिब पडले पाहिजे. त्यांचा स्वभाव आणि वर्तणूक ही इस्लामच्या आदेशाबरहुकूम पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य कुरआन आणि हदीसनुसार नियंत्रित असणे अत्यावश्यक आहे.
त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्य अर्थात संपूर्ण जीवन अल्लाह आणि प्रेषित (स.) यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच नियंत्रित आणि संचलित असणे अत्यावश्यक आहे. ह्या प्रकारची आज्ञाधारकता इस्लामचे खरे रुप दर्शविते. ह्या आज्ञाधारकते मुळे जगाला कळून येते की कशा प्रकारचे नागरिक, कशा प्रकारचा समाज आणि सामाजिक व्यवस्था इस्लामला अभिप्रेत आहे.
व्यावहारिक साक्षीची स्थिती ही नैतिक किवा तोंडी साक्षी पेक्षा अत्यंत महत्वाची आहे. की ज्यांत प्रचारकाचे व्यावहारिक रूप लोकांसमोर येत नाही. तसेच नव्वद टक्के लोकांना धर्म प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून व्यावहारिक साक्ष अथवा पुरावाच अपेक्षित आहे. बौध्दिक आव्हान अथवा भावनात्मक आवाहन त्यांच्या आकलनापलिकडचे असते. ह्या संदर्भात येथे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्राचा पुरावा अपेक्षित आहे जो एक आदर्श आहे. त्यांनी लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले तेव्हा ते स्वतः इस्लामचे पाईक म्हणूनच. त्यांनी जेव्हा दुसऱ्यांना इस्लामच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले तत्पूर्वी ते स्वतः त्या आदेशा बरहुकूम आचरण करीत राहिले.
इस्लामचे हे खरे स्वरुप आहे. इस्लामचा खरा अर्थ हा आहे जो प्रमाण आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या इस्लामसाठीच्या प्रयत्नांचे मोजमाप करता येते. ह्या प्रमाणाच्या जितक्या जवळ व्यक्ती (मुस्लिम) असेल तितके ते ह्या कामी (इस्लाम प्रचार) यशस्वी ठरतात. ह्या ध्येयापासून दूर तेच राहतात जे ह्या प्रमाणापासून (स्टँडर्ड) पासून अथवा आदर्शापासून दूर राहतात.

ईश्वराचे आज्ञापालन करण्यासाठी ईश्वराच्या सत्तेचे व त्याच्या गुणवत्तेचे व त्याच्या पसंतीच्या पद्धतीचे आणि पारलौकिक जीवनातील शिक्षा तसेच पुरस्कारासंबंधी उचित व खऱ्या ज्ञानाची आवश्यकता आहे. हे ज्ञान असे असावयास पाहिजे की, ज्यावर तुमचा दृढविश्वास (ईमान) आहे.

दुसरे असे की अल्लाहने माणसाला अशा कठीण परीक्षेत तथा कसोटीत टाकलेले नाही की, त्याने स्वतःच आपल्या प्रयत्नाने हे सर्व ज्ञान प्राप्त करावे. उलट त्याने मानवातूनच काही महान व्यक्तींना (प्रेषित) ‘वही’ (दिव्य प्रकटन) द्वारा हे ज्ञान दिले आणि ते सर्व ज्ञान मानवापर्यंत पोहोचविण्याचा त्यांना आदेश दिला.

तिसरी गोष्ट अशी की, सर्वसामान्य माणसांची जबाबदारी केवळ एवढीच आहे की त्यांनी ईश्वराच्या खऱ्या प्रेषितांना ओळखावे. जेव्हा त्यांना हे कळून चुकते की, अमुक एक व्यक्ती ईश्वराचा वास्तविक प्रेषित आहे तेव्हा तो जी काही शिकवण देतो त्याचा स्वीकार करावा. तो जे काही आदेश देतो त्याचे पालन करावे व त्याचे अनुकरण करावे हे त्याचे कर्तव्य ठरते.

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत वजनदार वस्तू जी अंतिम निवाड्याच्या दिवशी मोमिनच्या तराजूमध्ये ठेवली जाईल ती म्हणजे त्याची नीतीमत्ता होय. अभद्र बोलणारा आणि अर्वाच्च कथन करणाराला अल्लाह अजिबात पसंत करीत नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण : ‘खलकुन हसनुन’चे स्पष्टीकरण देताना अब्दुल्लाह बिन मुबारक यांनी म्हटले आहे, ‘‘हुवा तला़कतुल व़िज्ह व ब़ज्लुल मअरु़फि व क़फ़्फल अ़जा.’’ (मनुष्याने एखाद्या हसतमुखाने भेटणे, अल्लाहच्या वंचित दासांवर धन खर्च करणे आणि कोणालाही त्रास न देणे यालाच चांगली नीतीमत्ता म्हणतात.)
    माननीय अली (रजि.) यांनी सांगितले,     ‘‘अश्लील बोलणारा आणि अश्लील गोष्टींचा प्रसार करणारा हे दोन्ही पाप सारखेच आहेत.’’ (हदीस : मिश्कात)
दुतोंडीपणा
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला अंतिम निवाड्याच्या दिवशी सर्वांत वाईट मनुष्य तो आढळेल जो जगात दोन चेहरे बाळगत होता. काही लोकांशी एका चेहऱ्याने भेटत होता आणि दुसऱ्या लोकांशी दुसऱ्या चेहऱ्याने.’’ (हदीस : मुत्त़फ़क अलैहि)
स्पष्टीकरण : दोन मनुष्यांमध्ये अथवा दोन समूहांमध्ये जेव्हा शत्रुत्व निर्माण होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी काही लोक असेही आढळतात जे दोन्हींकडे पोहोचतात आणि दोघांच्या होकाराला हो म्हणतात आणि त्यांच्या आपसांतील शत्रुत्वावर चर्चा करतात व ते वाढविण्याचा प्रयत्न करतात, हा फार मोठा दुराचार आहे.
    त्याचप्रमाणे काही लोक समोर अतिशय दृढ संबंध प्रगट करतात मात्र जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याची निंदा करण्यास सुरूवात करतात, हाच दुतोंडीपणा आहे.
    माननीय अम्मार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगात दुतोंडीपणाने वागणाऱ्या मनुष्याच्या तोंडात अंतिम निवाड्याच्या दिवशी आगीच्या दोन जिव्हा असतील.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या तोंडात आगीच्या दोन जिव्हा यासाठी असतील की जगात त्याच्या तोंडातून आग निघत होती जी दोन मनुष्यांच्या आपसांतील संबंधाला जाळून टाकत होती.
चुगलखोरी
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ लोकांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे अधिक ज्ञान आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘चुगलखोरी म्हणजे तू आपल्या बंधुचा उल्लेख त्याला न आवडणाऱ्या पद्धतीने करावा.’’ मग पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘मी उल्लेख करीत असलेली गोष्ट जर माझ्या बंधुमध्ये आढळत असली तरीही ती चुगलखोरीच ठरेल काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही उच्चारलेली गोष्ट जर त्याच्यात आढळत असेल तरीही ती चुगलखोरीच झाली आणि जर ज्याच्यात ती गोष्ट नाही त्या मनुष्याबाबत जर ती गोष्ट म्हटली गेली तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणे होईल.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : मोमिनला त्याच्या चुकीच्या वर्तनाबद्दल चांगल्या पद्धतीने टोकले गेले तर निश्चितच त्याला वाईट वाटणार नाही. त्याचप्रमाणे त्याच्या अपराधाची सूचना त्याच्या वरिष्ठांना दिली गेली तर तेही त्याला आवडेल, कारण हीदेखील त्याच्यात सुधारणा घडविण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही आपल्या मोमिन बंधुला समाजाच्या नजरेतून उतरविण्यासाठी त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या त्रुटी सांगाल तर त्याला खूप वाईट वाटेल. जो मनुष्य उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो आणि कोणत्याही प्रकारे मान्य करीत नाही, त्याचे दुराचरण व्यक्त करणे चुगलखोरी नसून त्याचा स्वभाव समाजासमोर उघड करणे फार मोठे पुण्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी याचेच मार्गदर्शन केले आहे.
    माननीय अबू सईद व जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरी व्यभिचारापेक्षाही मोठे पाप आहे.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! चुगलखोरी व्यभिचारापेक्षा मोठे पाप कसे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मनुष्य व्यभिचार करतो, मग पश्चात्ताप व्यक्त करतो तेव्हा अल्लाह त्याचा पश्चात्ताप कबूल करतो, परंतु जोपर्यंत तो मनुष्य ज्याची चुगलखोरी करण्यात आली आहे, त्या माणसाला क्षमा करीत नाही तोपर्यंत अल्लाह चुगलखोरी करणाऱ्याला क्षमा करणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चुगलखोरीचे एक प्रायश्चित्त हे आहे की ज्याची तू चुगलखोरी केली आहे त्या मनुष्याकरिता तू माफीची प्रार्थना करावी. अशाप्रकारे म्हणा– हे अल्लाह! तू माझी आणि त्याची मुक्ती कर.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जर तो मनुष्य उपस्थित असेल आणि त्याच्याकरवी आपला अपराध माफ करविला जाऊ शकत असेल तर करवून घ्यावा आणि जर तो मरण पावल्यामुळे अथवा तो कोठेतरी दूरवर गेल्यामुळे माफीसाठी जागाच उरली नसेल तर त्याच्याकरिता माफीच्या प्रार्थनेव्यतिरिक्त दुसरा मार्गच उरत नाही.
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मृतांना वाईट बोलू नका कारण ते आपल्या कर्मांपर्यंत पोहोचलेले आहेत.’’ (हदीस : बुखारी)


लेखक

सय्यद लुत्फुल्लह कादरी फलाही

मराठी अनुवाद

हुसेनखान  चांदखान पठान


सैयद कादरी फलाही यांनी कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात या विषयाला वाचकांपुढे ठेवले आहे. इस्लाम एक सर्वांगीण परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे.

मुस्लिमांचे आचरण सुधारण्यासाठी मातापित्यांशी चांगल्या वर्तणुकीसंबंधी पवित्र कुरआनातील आयती आणि हदीस संक्षिप्तपणे संकलन करून लेखकाने सुंदरपणे मांडणी केली आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाने आणि इस्लामविषयी नसल्यामुळे आज इतरांच्या हक्कांना सर्रास पायदळी तुडविले जात आहेत आणि नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचे प्रकार वाढतच आहेत. या विषयावरील कुरआनोक्ती आणि हदीसकथनांनी अधिकांधिकांवर ईशकृपा होईल आणि ते माता-पिता व नातेवाईकांचे हक्क जाणू लागतील जेणेकरून मोडकळीस आलेली कुटुंबव्यवस्था सावरू लागेल.


आयएमपीटी अ.क्र. 215   -पृष्ठे - 64    मूल्य - 30 आवृत्ती - 1 (2014)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/2lq84lw33jkgx6x87chipea7owutbw0c




- मुहम्मद फारूक खान -
मानवास जीवन मिळाले. त्यास या जीवनाचा अनुभव देखील होतो, मात्र असे लोक बोटावर मोजण्याइतकेच आढळतील ज्यांनी या जीवनाविषयी गांभीर्याने विचार केलेला असेल. साधारणतः मानव हा समतल आणि नाकासमोर पाहून जगण्याचा प्रयत्न करीत असतो. जीवनातील सखोल पैलूंवर विचार करण्यावर तो सहसा गांभीर्याने आपली विवेक शक्ती खर्ची करीत नसतो. याची काही स्पष्ट – अस्पष्ट कारणे आहेत.
    मनुष्य ज्या वातावरण व परिवेशात जगतो आणि त्यातील प्रचलित क्रिया कलाप व भावना वगैरेत इतका मग्न होत जातो की, त्याची पावले आपोआपच त्या दिशेत उचलली जातात आणि मग जीवनाविषयी गंभीर आणि मौलिक प्रश्नांवर विचार करण्याची त्याला सवडच मिळत नाही. परिणामी, मानव हा प्राप्त जीवनाच्या आणि जीवनाविषयीच्या मौलिक प्रश्नांना सहसा गांभीर्याने घेत नाही.
जीवन म्हणजे काय?
    जीवनाचा अर्थ काय आहे? आपण आलो कोठून आणि कोठे जाणार? जन्मापासून मृत्यूपर्यंत मिळालेल्या या अल्पशा अवधीमध्ये आपल्याला काय करावयाचे आहे? काय व्हायचे आहे? जीवन हे अभिशाप आहे की वरदान आहे? योगायोग आहे की यांच्याशी एखाद्या दायित्व अगर कर्तव्याचा संबंध आहे? आपोआप प्राप्त होणारे आहे की शोधून सापडणारे आहे? परिपूर्ण आहे की अपूर्ण आहे? सुरवात आहे की आदि ते अंतापर्यंत सर्व काही आहे? या जीवनाचा कोणी दातासुद्धा आहे की नाही? या प्रश्नांचे उत्तर कोठे सापडेल? कोण देईल? जर एखादा जीवनदाता असेलच तर त्याने या प्रश्नाचे उत्तर सुद्धा दिले की केवळ जीवन प्रदान करून समाधान मानले?
    वस्तुतः या प्रश्नांचा मानव जीवनाशी अत्यंत दृढ संबंध आहे. जगात कोणीही या प्रश्नांना जीवनाशी पृथक समजू शकत नाही. एवढेच नव्हे तर जीवनाचा आरंभच मुळात या प्रश्नांवर आधारित आहे. म्हणून या प्रश्नांवर मानव पूर्वीपासूनच विचार करीत आला आहे.   
    जीवनासंबंधी असलेल्या या प्रश्नांवर विचार करणे म्हजणे हा केवळ दार्शनिक अभिरूची आणि कल्पना विलास नसून मानवाच्या जीवंत इच्छा, आकांक्षा, कामना आणि गरजांशी याचा दृढ संबंध आहे. कारण मानव प्रत्येक गोष्टीची उपेक्षा करू शकतो. परंतु, आपल्या मनाला तो कुठे घेऊन जाईल?
मानवी मनाची प्रबळ इच्छा
    मानवी मनाची एक अत्यंत प्रबळ इच्छा अशी आहे की त्याच्या जीवनाचा कधीही अंत होता कामा नये. त्याला आपण मरावे असे मुळीच वाटत नाही. हे कधीही न संपणाऱ्या वसंत ऋतूचे स्वप्न उराशी बाळगून असतो. एकदाचा जन्म घेऊन मातीत सदासर्वदा लुप्त होण्याची त्याची मूळीच इच्छा नसते. त्याला हे आवडतच नाही की त्याच्या जीवनाचा मृत्यूच्या रूपात अंत व्हावा. म्हणूनच तो मृत्यूच्याही पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, मृत्यूपलीकडील रहस्याविषयी चित्र, विचित्र, विलक्षण आणि नाना-प्रकारच्या कल्पना करीत असतो.
इस पार प्रिये मधु है तुम हो, उस पार न जाने क्या होगा
    जीवनाच्या सुख, चैन, आनंदात तो इतका मग्न झालेला असतो आणि आनंदाच्या मोहपाशात तो इतका गुरफटून जातो की, त्याला या गोष्टीचा विचार करण्याची कधी सवडच मिळत नाही की, हे आनंद, हा प्रमोद आणि हा विलास कोठून प्राप्त झाला आणि किती काळ टिकणार आहे? मात्र दुःख आणि कष्ट असेल तर मात्र परिस्थिती अगदीच भिन्न असते. दुःख आणि कष्ट असल्यास माणूस मात्र या गोष्टीवर विचार करण्यासाठी विवश होतो की हे काय झाले? जो आनंद, सुख आणि प्रमोद आपल्या जीवनात होता तो का निघून गेला, कोणी व का हिरावून घेतला, हे सुख आपल्याकडे कायमस्वरूपी होते की क्षणभंगूर होते आणि शेवटी गेले तर नेहमी करिता गेले की परत आपल्याला मिळेल? मानवाचे हेच दौर्बल्य आहे आणि याच्याच परिणाम स्वरूपी तो स्वतः विषयी आणि या सृष्टीविषयी विचार करण्याची सहसा तसदी घेत नसतो. आपल्या अस्तित्व-स्त्रोताविषयी विचार करण्याच्या भानगडीत पडत नसतो. तो अशाही भानगडीत पडत नसतो की आपल्याला हे जीवन कसे आणि कोठून मिळाले, मात्र जेव्हा तो आपल्या प्रियजनांना मृत्यूशय्येवर तडफडत मरताना पाहतो तेव्हा मात्र त्याला जाग येते. अशा दुःखद परिस्थितीत त्याची हरवलेली शुद्धी परत येते. मन मस्तिष्कावरील सुख आणि मौज मस्तीची झिंग क्षणार्धात लुप्त होते. अगदी कठोर व पाषाण र्‍हृदयी व्यक्ती सुद्धा मृत्यूशी झूंज देणाऱ्या आणि मृत्यूच्या कू्र जबड्यात जगण्याचा आक्रोष करणाऱ्याची केविलवाणी अवस्था पाहून तात्काळ भानावर येते. मानसिक समाधाना करिता तिला भौतिक सुखसाधने व्यर्थ आणि निरर्थक व अस्तित्वशुन्य वाटू लागतात. मग तिच्यासमोर एक वस्तुस्थिती प्रकट होते की ”या ठिकाणी आत्मशांती व आत्मसमाधानासाठी जगातील कोणत्याही भौतिक सुखसामग्री व्यतिरिक्त कोणत्या तरी अन्य गोष्टीची आवश्यक आहे.”
    मृत्यू आणि दुःखाच्या या प्रसंगी आणखीन बऱ्याच गंभीर बाबींकडे आपले लक्ष जाते आणि हे स्वाभाविक आहे. साधारणतः आपली विवेक शक्ती जड होते आणि जीवनाच्या गहन समस्या गहन विषयाकडे आपले लक्ष जात नाही. मात्र दुःख, यातनाआणिसमस्यांच्याअनुभवामुळेविवेकशुन्यबुद्धीतचैतन्यसंचारते आणि म्हणूनच दुःख आणि यातनांच्या आरशातच माणसाला जीवनाच्या गंभीर स्वरूपाचे दर्शन घडते. सुख-शांती आणि आनंद व मौजमजेच्या वातावरणात जीवनाचा खरा अर्थ उलगडतच नाही. संवेदशनशील माणसाला मात्र निश्चितच या गोष्टीची जाणीव होते की जीवनातील सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा आणखीन असंख्य इच्छा-आकांक्षा अशा असतात ज्या पूर्ण होणे शक्य नसते. शिवाय अशा कित्येक कामना इतक्या उलट आणि आकर्षक असतात की मानवी स्वभावास त्याची उपेक्षा करणे शक्य नसते. त्या पूर्ण न होणे हे माणसाला अत्यंत दुःखद वाटतात.
    आपले प्रियजनांचे आपल्याला सोडून जाणे आणि नेहमी करिता त्यांचे दूर होणे, ही एक अशी हृदयद्रावक घटना आहे. जी सहन करणेदेखील अशक्य असते. अशा प्रसंगी माणूस पूर्णतः खचून जातो. तो नैराश्य आणि वैफल्याच्या भयानक सागरात बुडून जातो. त्याचेअंतर्मनहीगोष्टस्वीकारण्यासतयारचनसतेकीमरणारीव्यक्तीत्यालानेहमीसाठीसोडूनजातआहे. आपल्या डोळ्यांसमोर सर्वकाही घडत असताना पाहून सुद्धा नकळत त्याच्या मनात मरणाऱ्या व्यक्तीच्या पुनर्मिलनाची आशा निर्माण झालेली असते.
    बरेच जण सत्कार्यात व्यस्त असतात. त्यांचा त्याग आणि समर्पण महान असतो. मात्र त्यांच्या वाट्याला दुःख आणि अनादराशिवाय काहीही येत नाही. याउलट असंख्य दुष्कर्मी, दुष्ट व दुराचारी जीवनभर इतरांवर अन्याय व अत्याचार करीत असतात. त्यांनी लावलेल्या अन्याय व अत्याचाराच्या भयंकर आगीत मानवतेचे हवन होत असते. हे दुराचारी या आगीत असत्य आणि दुराचाराचे असे इंधन टाकीत असतात की, ही भयानक आग शतकानुशतके विझत नाही. त्यात जळणाऱ्या अन्यायग्रस्त आणि अत्याचार पीडितांचे काळीज फाडणारे अवार्त टाहो युगायुगांपर्यंत ऐकावयास मिळतो. मात्र असे दुष्ट आणि दुराचारी नेहमी मौजमजाच करीत असतात. त्यांना साधा काटाही रूतत नाही. त्यांना जीवनाचे सर्व भोगविलास भोगायला मिळतात. सर्वत्र आनंदी – आनंद आणि जीवाचे अवास्तव मागणी पुरविण्याची सामग्री उपलब्ध असते. या ठिकाणी एक संवेदनशील माणूस विचार करू लागतो की, हे काय चालले आहे? आपण काय पाहतोय? ही काय अवस्था आहे? चांगले कर्म करणाऱ्यांना आणि सदाचाऱ्यांना त्यांच्या सेवा,  पुण्य आणि सदाचाराचे काही फळ मिळेल काय?  या जगामध्ये सद्गुण आणि सदाचाराची भावना हा केवळ एक धोका तर नव्हे? पाप आणि पुण्य, सदाचार आणि दुराचार, न्याय आणि अन्याय व अत्याचारात मुळात तात्विक आणि प्रभावी फरक आहे की नाही?
    मग अशा संवेदनशील आणि विचारशील व्यक्तीच्या मनात हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो की, हे जीवन आणि हे सृष्टीचक्र नेहमी व सदाकरिता चालू असेल काय? त्याला हे सुद्धा दिसते की, या जीवनसृष्टीत माणूस एकीकडे मरण पावतो तर दुसरीकडे मात्र माणसांच्या जन्माचा क्रम सुरू असतो. पशु-पक्षी आणि वनस्पतींची सुद्धा हीच अवस्था आहे. त्यांचा वंश सुद्धा चालू आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागते. जीवन असण्याचा भास होतो.  पूर्ण सजीवसृष्टीने प्रस्थान केलेले असते आणि त्या ठिकाणी परत इतरांचा जन्म होतो, सर्वत्र जीवन फुललेले, बहरलेले दिसते. येथील जीवनक्रम सतत सुरू असते. मात्र हा क्रम असाच सुरू राहणार काय? लोक याप्रमाणे मरतील, त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांचा जन्म होत राहील, हा क्रम केव्हापर्यंत सुरू असेल की एकदाचा या क्रमाला कोठेतरी ब्रेक लागेल? वायु, जल, प्रकाश, ऊर्जा वगैरेंसारख्या भौतिक शक्ती अशाच प्रकारे नेहमी कार्यरत असतील का? की कधीतरी समाप्त होतील? ही विश्व व्यवस्था अशीच कार्यरत राहणार की एखाद्या निश्चित वेळेवर नष्ट होईल? मग यानंतर काय असेल? सर्वत्र फक्त पोकळीच असेल काय? की जगातील कार्यरत ऊर्जा शुन्यात विलीन होऊन नव्या जीवनाचा व नवीन विश्वाचा शुभारंभ होईल? अथवा या वर्तमान जीवनाचा मनोरम खेळ सदैवासाठी समाप्त होईल आणि मग कोणीही नसणार व काहीही नसणार? या करिता कोणीतरी बाकी राहणार काय, ज्याला या गोष्टीच्या आठवणी राहतील की या ठिकाणी एकदा कधीतरी जीवन नावाची बाब अस्तित्वात होती, येथे सजीवसृष्टी कार्यरत होती, जीवन बहरलेले आणि फुललेले होते, सुर्योदय होत होता, रात्र होताच चंद्र-ताऱ्यांची विलोभणीय चादर आकाशात मन आकर्षित करीत होती, पक्ष्यांचा कर्णमधूर चिवचिवाट होत होता, पाण्याचे खळखळणारे झरे वाहत होते. नयनरम्य दृष्य होते आणि जीवनाशी संबंधित मनोरम कथाराग-विराग व रूदन आणि हास्याची मैफल होती आणि हे सर्वकाही नेहमीसाठी नष्ट पावले.
    अथवा ही जीवनसृष्टी एकदाची अंत पावल्यावर परत एखादी प्रगतीशील व उच्चकोटीची जीवनसृष्टी अस्तित्वात येईल? जर अस्तित्वात आली तरी वर्तमान जगातील प्राणी यात दाखल होऊ शकतील काय की तेथे आपल्या व्यतिरिक्त इतर जनांचे वास्तव्य असेल? आणि जर या वर्तमान जगातील सजीवांना प्रवेश मिळालाच तर मग ते जीवन त्यांच्या वर्तमान जीवनाच्या एखाद्या पैलूचा ऋणी असेल काय? दुसऱ्या शब्दांत त्या जीवनामध्ये वर्तमान जीवनाच्या चांगल्या वाईट विचार, भाव, कर्म वगैरेंचाही आधार असेल किंवा नसेल?
    हे आणि अशाप्रकारची आणखीनही बरेच प्रश्न मानवीमन-मस्तिष्कात निर्माण होतात. मग या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर सापडणे कठीण होते किंवा समाधान होऊन जाते अथवा न झाल्यास त्याच्या नशिबी नैराश्य येते. एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाप्रमाणे त्याची मनोवृत्ती होत असते. या निराश मनोवृत्तीमुळे तो जीवनातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींशी समझोता करून जीवनाचा गाडा रेटत असतो. मिळेल ते स्वीकारीत असतो, न मिळाल्यास प्रयत्न करीत असतो आणि प्रयत्नानंतर ही मिळत नसेल तर मात्र समझोता आणि सबुरीने घेत असतो. म्हणूनच अशा मानसिक अवस्थेत अडकून तो याच वर्तमान जीवनावर आणि मिळेल त्याव समाधान मानून याच जीवनास प्रथम व अंतिम आणि सर्व काही समजून बसतो आणि याच विचार व समाधानाच्या आधारे जीवन जगत असतो, जीवनास आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला याच वर्तमान जीवनाचे सुख-दुःख वाटतात. याच जीवनातील प्राप्त होणाऱ्या यशास अंतिम यश आणि अपयशास अंतिम अपयश समजत असतो त्याच्या दृष्टीत याच जीवनातील यशापयश, सुखः दुख आणि जीवनातील चढउतारा शिवाय आणखीन कोठेही कशाचेच अस्तित्व नसते.    
    भविष्याकडून निराश झाल्यावर सुद्धा माणसाच्या समस्यांचा अंत होत नसतो. हे जरी मान्य केलेकी, हेच जीवन अंतिम जीवन आहे आणि यानंतर काहीही नाही. तरी सुद्धा हा प्रश्न बाकी राहतोच आणि उत्तराची मागणी करतो की सद्भावना, पुण्य आणि सदाचारासारख्या गोष्टी एखाद्या कविचा कल्पना विलास आहे? येथे संपत्ती आणि धनाला किंमत आहे मात्र माणसाला कवडी किंमत नाही. मग त्या जगाची अवस्थाही अशीच दयनीय आणि शोचनीय असेल काय की यापेक्षा भिन्न असेल? अथवा ही भिन्नता वर्तमान जीवनाचे विरोधात्मक रूप नसून विकासात्मक रूप असेल काय? (क्रमशः)
(उर्दूतून मराठी भाषांतर सय्यद जाकीर अली)

दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे.
‘‘मी ‘मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासनेकरिताच निर्माण केले!’’ (दिव्य कुरआन)
ईश्वराने जगात जेवढे प्रेषित पाठविले ते केवळ याच उद्देशांसाठी की, मानवास ईश्वराच्या उपासनेची शिकवण द्यावी.
‘‘अल्लाहचीच उपासना करा आणि सैतानापासून दूर राहा.’’ (दिव्य कुरआन) 
आता आपणा सर्वांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की, उपासना म्हणजे नेमके काय? तसेच इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देश पूर्ण होणे शक्यच नाही.
उपासनेची अज्ञानी कल्पना
इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ केवळ भक्ती (Worship) नसून तो ‘दासत्व’ (Obediance) या अर्थात व्यापलेला आहे. उपासनेचा अर्थ केवळ भक्तीपुरता मर्यादित ठेवणे ही अज्ञानी कल्पना आहे. अज्ञानी समुदायाचे लोक असे समजत असतात की, ज्याप्रमाणे मोठी माणसे सरदार, प्रमुख अथवा राजे-महाराजे स्तुती केल्याने प्रसन्न होतात, भेटवस्तू दिल्याने मेहेरबान होतात, त्यांच्यासमोर हात जोडल्याने व नतमस्तक होण्यामुळे ते आपल्यावर कृपा करतात, तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्याकडून आपली कामे करून घ्यावीत, नेमक्या अशाच तऱ्हेने त्यांच्या उपास्याची आपल्या उपासकांकडून अपेक्षा व मागणी असते. आपल्या उपासकाचीसुद्धा दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन व अजीजी करून त्यास प्रसन्न करावे आणि आपली मागणी पूर्ण करून घ्यावी. याच कल्पनेच्या आधारावर अज्ञानी धर्मांमध्ये काहीं विशेष पूजापाठ व कर्मकांडांना ‘उपासना’ असे नाव देण्यात आले आहे.
उपासनेची वैराग्यात्मक कल्पना
त्याचप्रमाणे इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ असासुद्धा नाही की, मानवाने व्यावहारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यावा आणि केवळ ईशभक्तीत रममान व्हावे, ध्यानस्थ वा समाधिस्थ (Madiation) व्हावे, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांना दाबून ठेवावे (Self Annihilation) व घोर तपश्चर्या करून (Spritual Exersises) आपली आत्मिक शक्ती वाढवावी अथवा साक्षात्कार आणि चमत्कारांची शक्ती आपल्यात निर्माण करावी. तसेच या व्यावहारिक जीवनाचा अर्थात संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी. उपासनेची ही कल्पना संन्यासी अथवा वैराग्य दृष्टिकोनावर आधारित आहे. या प्रकारात धर्म आणि सामाजिक जबाबदाऱ्या व व्यावहारिक जीवन हे आपसांत अगदी परस्पर विरुद्ध बाबी ठरतात. संसाराच्या जवाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग शोधणे अथवा पळ काढणे म्हणजे उपासना असा हा विचित्र दृष्टिकोन आहे. कारण या दृष्टिकोनामध्ये आत्मिक विकासाकरिता भौतिकतेतून मुक्त होणे वा सन्यास घेणे अनिवार्य आहे.
उपासनेची इस्लामी कल्पना
इस्लामच्या दृष्टिकोनात उपासनेची कल्पना उपरोक्त दोन्ही कल्पनांपेक्षा अगदीच भिन्न आहे. इस्लामचा दृष्टिकोन आहे की, मानव हा एकमेव ईश्वराचा दास आहे. मानवाचा निर्माता, पालनकर्ता आणि स्वामी केवळ एकमेव ईश्वरच आहे. ईश्वराने मानवास या भूतलावर आपला प्रतिनिधी नेमला आहे. त्याला काही जवाबदाऱ्या, अधिकार व महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या आहेत. मानवाचे कर्तृत्व म्हणजे आपला स्वामी अर्थात एकमेव ईश्वराचा उद्देश पूर्ण करणे, आणि आपल्या जवाबदाऱ्यांची जाण ठेवून कर्तव्य पूर्ण करणे, तसेच आपली शक्ती व अधिकार आपल्या वास्तविक स्वामीच्या कायद्यांनुसार आणि मजीनुसार वापरणे होय. मानवाच्या यशाचे रहस्य हे या गोष्टीत दडले आहे की, त्याने या ऐहिक जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा करून व प्राण पणाला लावून आपले कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि इमानेइतबारे आपल्या एकमेव स्वामी असलेल्या ईश्वराच्या आदेश व कायद्यांचे पालन करावे. आपल्या कर्तव्यपूर्तीची मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा तो आपल्या एकमेव स्वामी ईश्वरासमोर आपल्या कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठी उभा राहील, तेव्हा त्याच्या जीवनकार्यावरून हे सिद्ध होईल की, तो कर्तव्याची जाण असलेला आणि ईश्वराचा आज्ञाधारक एक दास होता. इस्लामच्या या स्पष्ट दृष्टिकोनानुसार उपासनेची हीच वास्तविकता आहे. उपासनेच्या उपरोक्त दोन्ही कल्पनांशी इस्लामी उपासनेचा कवडीमात्र संबंध नाही. जो माणूस थोडासा वेळ काढून भक्ती केल्यानंतर असे समजतो की, मी आपल्या उपास्याचा हक्क पूर्ण केला आणि मोकळा झालो, आता आपल्या व्यावहारिक जीवनात वाटेल तसे वागण्यास मुक्त आहे. त्याचे उदाहरण असे आहे, जणू एखादा असा कर्मचारी ज्याला तुम्ही चोवीस तासांकरिता चाकरीवर ठेवले आणि पूर्ण पगार देऊन त्याचे पालनपोषण करीत आहात, परंतु तो कर्मचारी केवळ सकाळी व संध्याकाळी येऊन तुम्हास साष्टांग नमस्कार घालून जातो, तुमच्या चरणात फुले वाहून जातो आणि मग इतर वेळेत टवाळक्या करीत फिरतो अथवा दुसऱ्याची चाकरी करीत राहतो. याचप्रमाणे जो माणूस जगामध्ये व्यावहारिक जीवनातून व जवाबदाऱ्यांतून पळ काढतो आणि सांसारिक जवाबदाऱ्या सोडून एकांतात जाऊन आपला पूर्ण वेळ नमाज पढण्यात व ईश्वराचे नामस्मरण करण्यात घालवतो, त्याचे उदाहरण असे आहे की, जणू एखाद्या माणसास तुम्ही आपल्या बागेच्या रखवलीकरिता नियुक्त केले, परंतु तो बागेची राखण न करता व तेथील कामकाज न करता सकाळ ते संध्याकाळ व संध्याकाळ ते सकाळपर्यंत तुमच्या समोर हात बांधून उभा आहे व तुमच्या स्तुतिगाणात चोवीस तास तल्लीन आहे आणि बागेसंबंधी तुम्ही त्यास जी कामे सोपविली होती, त्या कामांची रुपरेखा मोठ्या आनंदाने तुमच्यासमोर केवळ पठण करीत आहे आणि त्या आदेशांनुसार मुळीच कोणतेही काम करीत नाही, अशा माणसाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटेल ? अर्थात तुम्हाला जे वाटेल, तीच भूमिका व दृष्टिकोन इस्लामचा आहे. अशा कर्मचाऱ्यांशी तुम्ही जे वर्तन कराल, तेच वर्तन अशा चुकीच्या कल्पनेनुसार उपासना करणाऱ्यांशी ईश्वर करील.
इस्लामचा उपासनेविषयी दृष्टिकोन असा आहे की, मानवाचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या दासत्वात ((Whole time Servant)वा त्याच्या आदेशपालनात व्यतीत व्हावे. त्याने स्वतःस कायमस्वरुपी आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे दासत्व करायला हवे. अर्थात या जगामध्ये प्रत्येक बाब, प्रत्येक कार्य व प्रत्येक कृती ईश्वराने प्रदान केलेल्या कायद्यानुसार करावे. आपले झोपणे-जागणे, खाणे-पिणे, चालणे-फिरणे, अशाप्रकारे सर्वकाही ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार असावे. ईश्वराने ज्या संबंधात मानवास बांधले आहे, त्या सर्वांत तो बांधील असून हे संबंधसुद्धा ईश्वराच्याच मर्जी व कायद्यानुसार असावेत. ईश्वराने ज्या सेवा आणि कर्तव्य मानवास सोपविले आणि व्यावहारिक जीवनात ज्या जवाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या आहेत त्या ईश्वराच्या कायद्यानुसार स्वखुषीने पार पाडाव्यात. ईश्वराचा हा कायदा त्याने प्रेषितांच्या माध्यमाने मानवास प्रदान केला. मानवाने प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्य व कृतीस ईश्वराप्रती आपली जवाबदारी समजावी आणि याची पूर्णतः जाणीव ठेवावी की, आपल्या प्रत्येक कृती वा कार्याचा आपणास ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. आपल्या घरी पत्नी व मुलाबाळांशी, गल्ली वा मोहल्ल्यात आपल्या शेजार-पाजाऱ्यांशी, आपल्या सोसायटीत वा समाजात मित्र-मंडळींशी, आपल्या व्यवहारात संबंधितांशी वर्तन करतेवेळेस प्रत्येक बाबीत आणि प्रत्येक कामात ईश्वराने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. जेव्हा आपण रात्रीच्या काळोखात असू आणि आपल्याला पाहणारा पण कोणीच नसेल, अगदी अशा वेळीसुद्धा कोणतेही वाईट कर्म करताना याची प्रखर जाण असावयास हवी की, ईश्वर आपल्याला पाहात आहे. जेव्हा आपण एखाद्या जंगल अथवा अरण्यातही असू आणि ईश्वरीय अवज्ञा किवा अपराध करण्याची पुरेपूर संधी प्राप्त असेल, तसेच त्या ठिकाणी आपल्या अपराधाची साक्ष देणारासुद्धा कोणीच नसेल व कोणी अटक करणारा पोलीससुद्धा नसेल, अशा वेळीसुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव असावी की, आपल्या अपराधाची कोणी साक्ष देवो अथवा न देवो, पोलीस अटक करो अथवा न करो, ईश्वर मात्र आपले कर्म पाहात आहे आणि आपल्या या पापी कर्माचा ईश्वरास जाब द्यावा लागणार आहे. अशा प्रकारच्या ईशभयामुळे निश्चितच आपल्याकडून पातक कर्म घडण्याचे टळेल. अशा ईशभय अथवा ईशपरायणता किवा ईश्वराच्या नाराजीमुळे माणूस आपला मोठ्यात मोठा लाभसुद्धा सोडून देऊ शकतो. ज्या वेळी सत्य आणि इमानदारीमध्ये आपल्याला नुकसान उचलावे लागते, तेव्हा आपल्याला दुःख होण्याऐवजी या गोष्टीमुळे समाधान व शांती प्राप्त होते की, माझ्या सत्य व इमानदारीमुळे माझा ईश्वर माझ्यावर प्रसन्न होत आहे.
सांसारिक जीवन, व्यावहारिक जवाबदाऱ्या, मुलेबाळे सोडून एकांतात जाऊन बसणे, संन्यास व वैराग्य पत्करणे आणि ईश्वराच्या नावाचा जप करीत बसणे, ही मुळी उपासनाच नव्हे. उलट व्यावहारिक जीवनाच्या जवाबदाऱ्या आणि घर-परिवार ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार सांभाळणे हीच मुळात उपासना होय. ईशस्मरण म्हणजे जगातील ज्या बाबी माणसाला ईशस्मरणापासून गाफील करतात त्यांतच रहावे आणि ईश्वराच्या ध्यान आणि स्मरणापासून गाफील होता कामा नये. ऐहिक जीवनामध्ये ईश्वरीय कायदा मोडून अर्थात बेईमानी करून वा बट्टेबाजी आणि लबाडी करून अमाप संपत्ती कमविण्याच्या संधी असतात. अन्याय व अत्याचार करून भौतिक सुख मिळविता येते. तसेच ईश्वरीय मर्जी आणि कायदा पाळल्यामुळे मोठमोठ्या फायद्यांच्या संधी गमावून बसावे लागते. अशा प्रसंगी ऐहिक सुखाच्या लाभास बळी न पडता मोठमोठ्या संधी ईश्वराच्या मर्जीवर बळी चढविणे हेच ईश्वराचे वास्तविक स्मरण करणे होय. अशा प्रकारच्या व्यवहारात ईश्वराचे अशा प्रकारे स्मरण करावे. सत्ता हाती आली तरी हे विसरता कामा नये की, मी मानवांचा स्वामी अथवा उपास्य अगर ईश्वर नसून त्या सर्वशक्तिमान ईश्वराचा केवळ दास आणि सेवक आहे. न्यायदानाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यास एखाद्यावर अन्याय करण्याची शक्ती हाती आली असली तरी, हे विसरता कामा नये की, ईश्वराने माझ्यावर न्याय करण्याची जवाबदारी सोपविली आहे. या भूतलावरील अफाट भौतिक संपत्ती आणि भौतिक शक्ती हाती आली तरी, ही वास्तविकता विसरता कामा नये की, मी या संपत्ती आणि शक्तीचा मूळ मालक नसून केवळ रक्षक व अनामतदार आहे व मला एक-एक पैशाचा ईश्वरास हिशेब द्यावा लागणार आहे. कारण भूतलावरील समस्त संपत्तीचा वास्तविक स्वामी हा एकमेव ईश्वरच आहे. लष्कराचे प्रमुख असले तरी, ईश्वरासमोर जाब देण्याची जाणीव तुम्हाला शक्तीच्या तंद्रीत वा मस्तीत येऊन दुर्बलांवर अन्याय करण्यापासून परावृत्त ठेवील. राज्यकारभाराचे कठीण कार्य हाती आल्यावरसुद्धा सत्य, न्याय आणि सत्यसमर्थनाच्या कायमस्वरूपी ईश्वरीय नियमांच्या खडतर मार्गावर चालून दाखवावे. व्यवसाय, वित्त आणि उद्योगधंद्यात खुशाल प्रगती करावी, परंतु या प्रगतीच्या माध्यमांत पवित्र आणि अपवित्र अथवा वैध आणि अवैध बाबीमध्ये फरक ओळखून वैध मार्गाचाच अवलंब करावा. तुमच्या जीवनमार्गात प्रत्येक पावलावर निषिद्ध कमाई किवा अवैध बाबी अत्यंत सुंदर आणि मोहक स्वरुपात तुम्हास मोहिनी घालतील, परंतु तुम्ही त्या मोहिनीच्या आहारी जाता कामा नये, तुमची पावले डगमगता कामा नये. चोहीकडे अन्याय, अत्याचार, धोकेबाजी आणि व्यभिचाराचे मार्ग तुम्हास अगदी मोहक स्वरुपात आकर्षित करतील, ऐहिक आणि भौतिक सुखवस्तू यशाच्या स्वरुपात तुमच्यासमोर लोटांगण **घालतील, व्यभिचार आणि स्वैराचार आधुनिक प्रगतीचे रूप व सोंग घेऊन तुमच्यावर भुरळ टाकतील, परंतु तुमच्या अंतःकरणात ईश्वराचे स्मरण आणि त्याच्या समोर जाब देण्याच्या जाणिवेने तुम्ही या संपूर्ण अवैध बाबींचा त्याग कराल. ईश्वरीय कायदा स्थापन करण्याच्या मार्गात अगणित संकटे आणि समस्या दिसू लागतील, सत्याची कास धरण्यात आणि न्याय व सत्यावर तटस्थपणे कायम राहण्यात प्राण व संपत्तीचे नुकसान होताना दिसेल, तसेच ईश्वरीय कायदा आणि मर्जीनुसार जीवन जगण्याकरिता समस्त विश्वाचे वैर ओढवून घेण्यासमान असेल, परंतु तुमच्या उद्दिष्टाच्या अथांग सागरात किचितही हेलकावा येता कामा नये. अर्थात हीच आहे वास्तविक उपासना, याचेच नाव आहे ईश्वराचे स्मरण, हीच ती ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण आहे, ज्याच्याकडे दिव्य कुरआनाने अंगुलीनिर्देश करून म्हटले आहे की,
‘‘नमाज संपल्यावर भूतलावर अल्लाहची कृपा (उपजीविका) प्राप्त करा आणि अल्लाहचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हास यश मिळावे.’’ (दिव्य कुरआन)

बोले तैसा चाले,‘ या म्हणीनुसार आपण नेहमीच पाहतो की कोणत्याही समाजसुधारकाच्या शिकवणींचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होत असतो की स्वतः समाजसुधारक त्या शिकवणींवर आचरण करीत असतो. अन्यथा ‘लोकां सांगे विश्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण‘ अशी अवस्था असेल तर त्याच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव इतरांवर पडत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण हे नेमके कुरआनाच्या शिकवणींचे परिपूर्ण स्वरूप होय. ईश्वरी आदेशावर कशाप्रकारे आचरण असावे, याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक म्हणजेच त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) हे बालपणापासून खरे बोलणारे आणि लोकांच्या अनामतींचे रक्षण करणारे असल्याची ख्याती पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या याच गुणविशेषणामुळे ‘अमीन‘ व ‘सादिक‘ अर्थात सत्यवचनी व अनामतदार अशा गौरवास्पद विशेषणानी लोक संबोधित असत. त्यांनी कधीही अरब समाजातील अज्ञानता व अमानवी परंपरांचा बालपणापासूनच स्वीकार केला नाही. अन्याय व अत्याचारांची कधीही साथ दिली नाही. ते अत्यंत गंभीर, मधुरभाषी आणि दयाळू स्वभावाचे होते. इतरांचे दुःख त्यांना पाहवत नसे. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट उचलायचे, लोकांच्या आर्थिक अडचणी स्वतःचा कमाईतून खर्च करून सोडवायच्या, स्वतःजवळ पैसे नसल्यास इतरांकडून कर्ज घ्यायचे, मात्र कोणत्याही याचकास त्याची अडचण भागविल्याशिवाय परत करीत नसत. स्वतः भूकेले तहानलेले राहून इतरांचे पोट भरायचे. फक्त मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करायचे. अनाथ, वृद्ध, विधवा आणि गरिबांवर त्यांची विशेष कृपा असे. त्यांच्या याच दयाळू आणि कृपाळू वृत्तीमुळे ते समाजात सर्वांचे लाडके आणि प्रिय होते. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी स्वतःकरिता काहीही ठेवले नाही. जे प्राप्त झाले, ते इतरांना वाटले.
दरिद्री आणि रंजल्यागांजल्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी रंजल्यागांजल्यांसाठी कल्याण केले. एवढेच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या या अंतिम प्रेषितास जीवनभर कधीही पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. (संदर्भ : सीरतुन्नबी, प्रथम खंड) ते नेहमी म्हणत असत,
‘‘तुम्हास ईश्वराकडून जी सहायता आणि उपजीविका मिळते ती गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मदतीकरिता मिळते.‘‘ (संदर्भ : सहीह मुस्लिम)
त्यांच्या या वचनावरून हीच बाब स्पष्ट होते की आपल्याकडे असलेल्या संपत्ती, सामर्थ्य आणि शक्तीवर दीनदुबळ्यांचासुद्धा अधिकार आहे. त्यांचीच सेवा करण्यासाठी ईश्वराने आपल्याला हे ‘तन-मन-धन‘ प्रदान केलेले आहे.
संयम, शांती, दया आणि कृपाळू वृत्ती असलेल्या आदरणीय मुहम्मद (स.) यांची ही घटना अवश्य लक्षात घ्यावी. एकदा काय झाले की प्रेषित नेहमीप्रमाणे नमाज पढण्यासाठी मस्जिदकडे जात होते. रस्त्यात एका ‘ज्यू‘ समाजाच्या म्हातारीने त्यांच्या अंगावर कचरा फेकला. ते कचरा धुवून व कपडे बदलून परत मस्जिदीकडे गेले. हा नित्याचाच क्रम झाला. एके दिवशी म्हातारीचा कचराच अंगावर पडला नाही आणि प्रेषित अस्वस्थ झाले. ते सरळ म्हातारीस पाहायला व तिच्या खुशालीची विचारपूस करायला तिच्या घरी पोचले. म्हातारी आजारी पडली होती. प्रेषितांनी मोठ्या आपुलकीने तिची विचारपूस केली म्हणाले, ‘‘माते! आज तू माझ्या अंगावर कचरा फेकला नाही. म्हणून मला वाटले की कदाचित तू आजारी असावी. म्हणूनच तुला पाहायला आलो.‘‘ तिची शुश्रूषा केली. हा प्रकार पाहून म्हातारी दंग झाली. तिच्या डोळ्यांतून ढळा-ढळा अश्रु वाहायला लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांची हीच सहानुभूती आणि त्यांच्या मनातील सर्वांविषयी असलेले अपार प्रेम जेव्हा राजकीय आणि सामाजिक नभांच्या क्षितीजावर उगवले, तेव्हा समस्त मानवसमाज या सोनेरी किरणांनी उजळून निघाला. प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि वैरभावाचे अंधकार नष्ट झाले. कोणी स्वीकारो अथवा न स्वीकरो! वस्तुस्थिती तर हीच आहे की, समाजाची अशा प्रकारे निःस्वार्थ भावाने सेवा केल्याशिवाय लोकांच्या मनमस्तिष्कावर आणि हृदयावर कोणासही अधिराज्य गाजविता येत नाही, हा सृष्टीचा नियमच आहे. त्यागाशिवाय प्रेम आणि सहानुभूती निरर्थक होय! हेच सत्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का शहरावरील विजयाप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी याप्रसंगी लोकांना आणि समस्त मानवजातीस आपल्या अंतिम प्रवचनात स्पष्टपणे संबोधून म्हटले,
‘‘आज अज्ञानतेने बरबटलेल्या या वांशिक अभिमान आणि अहंकाराचा ईश्वराने नाश केला आहे. समस्त मानवजात आदम (अ.) अर्थात जगातील प्रथम मानवाची संतती असून आदमची निर्मिती मातीपासून झालेली आहे.‘‘ (संदर्भ : सीरतुन नबी, भाग - १)
मुळात हाच संदेश समस्त विश्वातील मानवांना ऐक्याची जबरदस्त आधारशिला उपल्बध करून देतो. प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी प्रचंड जमलेल्या जवळपास सव्वालाख लोकांवर दृष्टी टाकली आणि मग कुरैश कबिल्यावर दृष्टी टाकली. या ठिकाणी ते अन्यायी व अत्याचारी लोकसुद्धा होते, ज्यांनी प्रेषितांनी सुरु केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, प्रेषित आणि त्यांच्या सहकार्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यांना रक्तबंबाळ करून सोडले होते, त्यांना परिवार, संपत्ती आणि मायभूमीचा त्याग करण्यास भाग पाडले होते, कित्येकांना शहीद केले होते, कटकारस्थान कले होते, प्रत्येक प्रकारचा छळ केला होता. समस्त विश्वाकरिता दया आणि कृपा असलेल्या या अत्यंत उदार मनाच्या प्रेषितांनी त्यांना संबोधित करून विचारले,
‘‘आज मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार करणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?‘‘
या निष्ठूर, कठोरहृदयी, अन्यायी व अत्याचारी स्वभावाच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा स्वभाव किती उदार आणि दयाळू आहे! ते किती थोर आहेत! त्यांनी साद घातली,
‘‘तुम्ही आमचे परम बंधु आहात!‘‘
विश्वबंधुत्वाचे आणि सत्य व न्यायाचे स्थापक प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सार्वजनिक अभयदानाची व क्षमादानाची घोषणा करीत म्हटले,
‘‘आज तुम्हा सर्वांना अभय देण्यात येत आहे! तुम्हा सर्वांना क्षमा करील आहे!‘‘
ही क्षमाशीलता, दया, प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण जगाच्या मानवेतिहासात कोठेच सापडू शकत नाही. आज म्हणजे मक्केच्या विजयाच्या प्रसंगी प्रेषितांकडे सर्वकाही होते. सत्ता होती, लष्करी सामर्थ्य होते. त्यांच्या फक्त एकाच इशार्यावर इस्लामविरोधी कृत्य करणार्यांच्या रक्तने मक्का शहराची भूमी लाल झाली असती. मक्का त्यागण्याच्या प्रसंगी विरोधकांनी हडपलेल्या संपत्ती आणि मालमत्ता परत घेता आली असती, मात्र प्रेषितांच्या या उदारपूर्ण स्वभावाचे कौतुक करण्याचा मोह इतिहासतज्ञ आवरू शकला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या इस्लामविरोधक विचारवंतांनासुद्धा हे सत्य नाकारण्याचे धारिष्ट्य, झाले नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली ही क्रांती खरोखरेच अहिंसापूर्ण क्रांती होय.
इतिहासात ही बाब आपल्याला सातत्याने दिसून येते की एखाद्या समूहाने दुसर्या समूहावर जर का विजय प्राप्त केला की समजा विजेत्या पक्षाकडून लूटमार, हिंसा, सूड, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, मानभंग यासारख्या असंख्य बाबी घडतात. पराजयाची नामुष्की पत्करलेल्या पक्षाच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येतात. सर्वत्र अन्याय व अत्याचाराची आग लागलेली असते. दुसर्या महायुद्धाचे उदाहरण आजही इतिहासात प्रत्यक्ष पाहायला मिळते. या महायुद्धात फक्त पावने दोन कोटी लोकांच्या रक्तने लाल क्रांतीची लाल पहाट उगवली. या रक्तरंजित क्रांतीने इतिहासाची पाने आजही रक्तळलेली आहेत. अर्थात क्रांती म्हणजेच रक्तपात असे जणू समीकरणच झाले. मात्र इस्लामी क्रांती ही अहिसात्मक क्रांती होय, एवढे मात्र निश्चित! या क्रांतीची पहाट उगवली आणि मानवतेस अभय मिळाले. म्हणूनच मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती घोषित केले.
एक सामाजिक विश्लेषण
प्रारंभीच आपण इस्लामपूर्वीच्या अरब समाजाचे ‘सी.राइट मील्स‘ यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर तीन प्रकारे विश्लेषण केले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती मानवजातीने अनुभवली, त्यानंतर अरब समाजाचे याच तीन प्रकारांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले तर ते अशा प्रकारे होईल.
  1. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली. मानवसमाज ऐक्य आणि न्यायाच्या भक्कम आधारावर उभा राहिला. समाजाच्या प्रत्येक भागात शोषण आणि विरोधपूर्ण संबंध नष्ट होऊन त्या ठिकाणी न्यायसंगत आणि शोषणरहित संबंध स्थापित झाले. वांशिक आणि वर्णावर आधारित तसेच गरिबी आणि श्रीमंतीच्या आधारावर असलेला भेदभाव नष्ट झाला. उच्च-नीच आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावरील विषमता कायमची नष्ट झाली.
  2. मानवी इतिहासात या नवीन समाजास अत्यंत उच्च स्थान प्राप्त झाले. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले. अर्थात मानवतेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
  3. या नवनिर्मित समाजात जे लोक सत्तेमध्ये आले ते मानवतावादी, विनयशील, दयाळू, मानवसमानतेचे ध्वजवाहक, शोषणविरोधी मानसिकता असलेले आणि मानवतेचे खर्या अर्थाने प्रेरक होते. असत्यापासून दूर आणि सत्याची जीवंत उदाहरणे आहेत.
आजही जगाला याच परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आजच्या शोचनीय परिस्थितीत विव्हळत असलेल्या, व्याकूळ आणि भेदभावाच्या आगीत होरपळत असलेल्या मानवतेस मुक्ती देण्याची गरज आहे. सर्वत्र फक्त न्याय, प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचे नंदनवन फुलविण्याची गरज आहे, शेवटी एवढेच!

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget