Latest Post


जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. 

कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि हा जगातील सर्वात महत्त्वाचा विषय आहे. समस्त मानवजातीला ”अंधारातून प्रकाशाकडे” नेण्याचा कुरआनचा उद्देश आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे 22 ते 31 जानेवारी दरम्यान राबविल्या जाणार्‍या ”अंधारातून प्रकाशाकडे” या मोहिमेचा असा अर्थ काढला जावू शकेल की या मोहिमेदरम्यान, मानवाच्या अप्रगत अवस्थेतून प्रगत अवस्थेपर्यंतच्या आजपावेतोच्या स्थित्यंतराबद्दल चर्चा करण्याचा मानस असेल. परंतु येथे एवढा मर्यादित अर्थ नाही, कारण साधारणपणे प्रगती म्हणजे भौतिक प्रगती असा अर्थ काढला जातो. मात्र भौतिक प्रगती म्हणजेच सर्व काही नाही. मनुष्य जेव्हा भौतिक आणि नैतिक अशा दोन्ही प्रगती साध्य करतो तेव्हाच त्याचा सर्वांगीन विकास झाला अशी कुरआनची संकल्पना आहे. 

ही प्रगती साध्य करण्यासाठी खिलाफत अर्थात शासन ही संस्था उदयास आणली गेली. खिलाफत व्यवस्थेच्या अगोदर आणि त्यानंतर सुद्धा या व्यवस्थेव्यतिरिक्त शासनाचे अनेक प्रकार अस्तित्वात आले आणि लयास गेले. आज सर्वात जास्त लोकप्रिय शासन व्यवस्था म्हणजे भांडवलशाही लोकशाही व्यवस्था होय. यालाच कल्याणकारी लोकशाही असेही म्हटले जाते. या व्यवस्थेत संसाधनांची मालकी व्यक्तीची असल्या कारणाने याला सर्वश्रेष्ठ शासनप्रणाली समजली जाते. शीत युद्धानंतर जगात जवळ-जवळ सर्वच देशात ही शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. मात्र कुरआनला अपेक्षित असलेली संतुलित प्रगती साध्य करण्यामध्ये ही व्यवस्थाही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते. यात समग्र भौतिक आणि नैतिक प्रगती तर सोडा फक्त भौतिक प्रगती सुद्धा सर्वांची सारखी होत नाही. यात अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब अशी सामाजिक उतरंड अस्तित्वात आल्याचे दिसून येते. 

प्रेषितपूर्व काळातील अंधार

ये जब्र भी देखा है तारीख की नजरोंने 

लम्हों ने खता की थी सदीयों ने सजा पायी

आदिमानव अवस्थेपासून सातव्या शतकात येईपर्यंत जगात पूर्णपणे अंधार दाटलेला होता. राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, ते प्रजेला स्व:ला सजदा (वंदन)  करण्यास भाग पाडत होते, माणसाची गुलाम म्हणून खरेदी-विक्री होत होती, स्त्रियांना कवडीची किंमत नव्हती, त्यांचा जन्मच अशुभ मानला जाई, त्यांना जन्म:च जीवंत पुरले जाई त्या काळात महिलांच्या बाबतीत ख्रिश्‍चन धर्मगुरूंचे विचार अतिशय विकृत होते. तरतुलीयन नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे महिलासंबंधीचे मत असे होते की, ”ती सैतानाची प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे पुरूषाला घेऊन जाणारी आहे. ईश्‍वरीय कायद्यांना तोडणारी आणि पुरूषांना नष्ट करणारी आहे.”क्राईस्टोम नावाच्या ख्रिश्‍चन विचारकाचे स्त्रीच्या बाबतीत मत असे होते की, ती एक आवश्यक वाईटपण आहे. एक जन्मजात वासना, एक आवडणारे संकट, एक पारिवारीक संकट, एक नष्ट करणारी प्रिती, एक सजली सवरलेली आफत आहे” (संदर्भ : परदा, पृष्ठ क्र. 16). त्या काळात वेश्या व्यवसाय सुरू होता, छोट्या-छोट्या कारणांनी युद्धे होत होती, ती वर्षानुवर्षे चालत होती, अंधश्रद्धा प्रत्येक समाजात व्याप्त होती, मूर्तीपूजेचा जोर होता, पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती, गरीबांना काडीची किंमत नव्हती, त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत होते, बळी तो कानपीळीचे तत्व सर्वत्र समान पद्धतीने लागू होते. खोटे बोलण्याला चातुर्य समजले जाई, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता, भारतात तर अस्पृश्यतेसह चातुवर्ण व्यवस्था, सतिप्रथा आणि देविदासी प्रथा जोरात सुरू होती, दारू  पिण्याला प्रतिष्ठा प्राप्त होती, समाजामध्ये जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जाई, त्यावर बायकोला डावावर लावण्याइतपर्यंत मजल जाई, लूटमार सामान्य बाब होती, विधवांचे हाल होते, पुनर्विवाहाला परवानगी नव्हती, तिला वारसा हक्क देण्याबद्दल कुठल्याच समाजात विचारसुद्धा करण्यात येत नव्हता.

इ.स.वी.च्या सातव्या शतकात जगात जेवढा अंधार दाटला होता तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच अंधार आज 21 व्या शतकातही दाटलेला आहे. हे खरे आहे काय? तसे पाहता सकृतदर्शनी तर जगात चोहिकडे रोशनाई आहे, प्रकाशाने जग उजळून निघाले आहे, घर, रस्ते, मॉल सगळे एलईडीच्या झगमगाटाने उजळत आहे, मानवाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स करण्यापर्यंत प्रगती साधलेली आहे, तंत्रज्ञानाने जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावलेले आहेत, एवढ्या सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत की, आज सामान्य माणसाला ज्या सोयी उपलब्ध आहेत, त्या पूर्वीच्या काळात राजा-महाराजांना सुद्धा उपलब्ध नव्हत्या. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पादन होत आहे, कारखाने दिवसरात्र चालू आहेत, उद्योगधंद्यांनी चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनाचे पूर्वीचे सर्व किर्तीमान उध्वस्त केलेले आहेत, छोट्या दुकानापासून मोठ्या मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तूच काय चैनीच्या वस्तूंचीही रेलचेल आहे. एवढेच नव्हे तर मनोरंजनाची अत्याधुनिक साधने मानवाचे मन रिझविण्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. महिलांना जमीनीपासून अवकाशापर्यंत मुक्त संचार करण्याची सोय आहे. त्यांना आर्थिकरित्या समर्थ करण्यासाठी समाजाने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. मग जमाअते इस्लामी हिंदला असे का वाटत आहे की आज समाजामध्ये अंधार दाटला आहे व समाजाला प्रकाशाकडे नेण्याची गरज आहे? 

या प्रश्‍नाचे उत्तर असे आहे की जग आज जरी दैदिप्यमान दिसत असेल तरी या डोळे दिपवणार्‍या प्रगतीमध्येच मानवतेची अधोगती लपलेली आहे. अंधार युगात राजे प्रजेला कस्पटासमान लेखत होते, आजही सत्ताधारी जनतेला कस्पटासमानच लेखत आहेत. याचे ताजे उदाहरण दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आहे. 40 दिवसांपेक्षा जास्त कडाक्याच्या थंडीत शेतकरी बसलेले असून, 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा या न त्या कारणाने बळी गेलेला आहे. तरी सुद्धा शासनकर्ते त्यांची दखल घेण्यास तयार नाहीत. म्हणजेच ते जनतेला कस्पटासमान लेखत आहेत. व्याजाच्या माध्यमातून गरीबांची कष्टाची कमाई भांडवलदार लूटत आहेत. माणसांची गुलाम म्हणून खरेदी विक्री जरी होत नसली तरी त्या गरीब मजुरांची अवस्था गुलामापेक्षा फारशी वेगळी नाही. स्त्रीयांना त्या काळातही कवडीची किंमत नव्हती आणि आजही नाही. त्या काळात वेश्याव्यवसाय सुरू होता आजही सुरू आहे. त्या काळात स्त्रियांना जन्मताच जीवंत गाडले जाई आजही भ्रुणहत्या केली जाते. किंबहुना त्या जन्म घेणारच नाहीत, याचे गर्भलिंग परीक्षण करून व्यवस्था केली जाते. त्या काळात युद्ध सुरू होती आजही युद्ध सुरू आहेत. ती वर्षानुवर्षे चालत होती आजही वर्षानुवर्षे चालत आहेत. तेव्हाही मनुष्यबळाची हानी होत होती आजही होत आहे. त्या काळी अंधश्रद्धा व्याप्त होती आजही व्याप्त आहे. त्या काळी मुर्तीपूजेचा जोर होता आजही आहे. त्याकाळी पुरोहित वर्गाचे वर्चस्व होते; आजही आहे, उच्चनीचतेची भावना प्रबळ होती; आजही आहे, गरीबांना किंमत नव्हती; आजही नाही. त्या काळी गरीबांवर अत्याचार होत होते; आजही होत आहेत. त्या काळी खोटे बोलण्याला चातुर्य मानले जाई आजही मानले जाते. त्याकाळी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार व्याप्त होता; आजही आहे. फरक एवढाच झालेला आहे की, भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या पद्धती ह्या सभ्य झालेल्या आहेत.  

मानवकल्याण म्हणजे काय? 

इस्लामचे पहिले आणि शेवटचे उद्देश मानवकल्याण आहे. या जगातही आणि परलोकातही माणसाचे कल्याण व्हावे यासाठी 1 लाख 24 हजार प्रेषितांना अल्लाहने पृथ्वीवर वेळोवेळी आपला संदेश देऊन पाठविले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मानवकल्याण कशाला म्हणायचे हे अगोदर निश्‍चित केले गेले पाहिजे. कारण दारूविक्रीशी संबंधित व्यक्तींना दारूच्या व्यवसायात तर वेश्याव्यवसायाशी संबंधित व्यक्तींना वेश्या व्यवसायात तर सिनेसृष्टीतील व्यक्तींना सिनेसृष्टीत मानवकल्याण आहे असे प्रामाणिकपणे वाटत असेल. पण कुठलाही समजदार व्यक्ती याला मानवकल्याण म्हणणार नाही. मग मानवकल्याण म्हणजे शेवटी आहे तरी काय? तर त्याचे उत्तर असे की, इस्लाम केवळ धर्म नाही तर ती जीवन जगण्याची एक परीपूर्ण ईश्‍वरी व्यवस्था आहे व ईश्‍वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीमुक्त आहे. या जीवन पद्धतीमध्ये दिल्याप्रमाणे ’साध्य’ म्हणजे मानवकल्याण आणि ’साधन’ म्हणजे शरियत होय. जगात सुरू असलेल्या सर्व मानवविरोधी कृत्यांचा त्याग करून अल्लाहने दिलेल्या पद्धतीचा अंगीकार करणे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडून जाणे होय. ती कृती कोणती आणि तो प्रकाश कोणता या प्रश्‍नाचे उत्तर कुरआनमध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे. 

”आणि घोषणा कर की, सत्य आले आणि असत्य नष्ट झाले. असत्य तर नष्ट होणारच आहे” (सुरे बनीइसराईल आयत नं. 81) 

  कोंबडा झाकल्याने उजाडायचे राहत नाही आणि कितीही खोटा प्रचार केला तरी इस्लाम सत्य धर्म असल्याची जाणीव प्रामाणिक लोकांना होतेच आणि ते त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. जीवनाचा उद्देश न ओळखता सृष्टीकर्त्याच्या सृष्टीत निरूद्देश जगणे म्हणजे कृतज्ञ बणून जगणे होय. असे जीवन जगणारे लोक संतुष्ट राहूच शकत नाहीत. ते कायम असंतुष्ट असतात. अब्जावधींची संपत्ती, मोठमोठे बंगले, गाड्या, विमाने असून सुद्धा ते समाधानी राहत नाहीत. मरेपर्यंत चैनीच्या वस्तू गोळा करत राहणे आणि एक दिवस सगळे सोडून मरूण जाणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्देश असते. अशा परिस्थितीत सत्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय निरूद्देश जीवनाला सार्थकत्व प्राप्त होत नाही. सत्य लक्षात आल्याशिवाय, असत्याचा नाश होत नाही, अशा परिस्थितीत प्रश्‍न निर्माण होतो की सत्य काय आहे? तर त्याचे उत्तर आहे, सत्य अल्लाह आहे आणि त्याने ठरवून दिलेली जीवन पद्धती आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. 

याशिवाय, कुरआनमध्ये दुसर्‍या ठिकाणी म्हटलेले आहे की, ” जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांचा समर्थक व सहायक अल्लाह आहे आणि तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशात आणतो आणि जे लोक द्रोहाचा मार्ग अवलंबितात त्यांचे समर्थक व सहायक तागूत (सैतानी पद्धत) आहेत. आणि ते त्यांना प्रकाशापासून ओढून अंधाराकडे घेऊन जातात. हे नरकाग्नीमध्ये जाणारे लोक आहेत जेथे हे सदैव राहतील.” (सुरे बकरा आयत नं. 257). जे लोक अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांना अल्लाहकडून अदृश्य पद्धतीने मदत प्राप्त होते. त्यांच्या जीवनातून हराम आणि अपवित्र गोष्टी नष्ट होतात व त्या जागी हलाल आणि पवित्र गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच ते अंधकारातून प्रकाशाकडे येतात व आपले जीवन सार्थक करतात. जे अल्लाह आणि त्यांच्या प्रेषितांनी दिलेल्या जीवन पद्धतीचा इन्कार करतात आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतात ते षड्रिपूंच्या आहारी जाऊन या जीवनामध्येही अयशस्वी होतात आणि मरणोपरांत नरकाग्नीमध्ये फेकल्या जातात. 

जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. त्यांचा दुस्वास केला जातो. त्यांच्यावर आतंकवादाचे आरोप केले जातात. प्रेषित सल्ल. यांचे व्यंगचित्रे काढली जातात. रात्रंदिवस प्रसार माध्यमातून त्यांची बदनामी केली जाते. मुन्शी प्रेमचंदनी यांनी म्हटलेले आहे, ”खुदगर्जी में इन्सान पागल हो जाता है.” इस्लाम सोडून इतर जीवन पद्धतीमध्ये जगणारी माणसं साधारणपणे खुदगर्ज अर्थात स्वार्थी जीवन जगत असतात. इतके की वेड्यासारखे वागू लागतात. आज जगामध्ये सकृतदर्शनी जरी प्रगतीचा प्रकाश दिसत असला तरी हे वरवरचे वेष्टन आहे आत डोकाऊन पाहता सर्वत्र अंधकार आहे. या अंधकाराला आपल्या जीवनातून घालवायचे असल्यास पूर्वगृह सोडून इस्लामचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. 

मुस्लिमांची जबाबदारी

माणसाच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी इस्लाम सक्षम आहे. हे जरी खरे असले तरी हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यात मुस्लिम समाज कमी पडलेला आहे. हे मान्य करावेच लागेल. जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक सर्वप्रथम आपल्या समाजातील वाईट प्रवृत्तींचा व्यवहारिकरित्या नायनाट करणार नाहीत तोपर्यंत त्यांना हा संदेश दुसर्‍या समाजापर्यंत प्रभावीरित्या पोहोचविता येणार नाही. प्रेषितांच्या जीवनाचा उद्देश नैतिकरूपाने श्रेष्ठ समाज निर्माण करणे हा होता. त्यासाठी मुस्लिम समाजाने आपल्यामधील नैतिक अ:पतनाची सर्व कारणे सर्वप्रथम दूर करणे गरजेचे आहे. मात्र हे करत असतांनाच अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा ईश्‍वरीय संदेश जगाला देण्याचेही कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे. कारण कित्येकदा संदेश देणार्‍यांपेक्षा संदेश ऐकणारे जास्त सक्षम असतात आणि त्या संदेशाला स्वीकारताना व प्रत्यक्ष जीवनात राबविताना त्याला फारसे कष्ट करावे लागत नाहीत. शिवाय, कुरआनहाची ही शिकवण हीच आहे की, ”तथापि उपदेश करीत रहा कारण उपदेश श्रद्धावंतांसाठी लाभदायी आहे” (सुरे अज्जारियात आयत नं. 55) म्हणून कुरआनच्या शिकवणीचा हा उपदेश सतत करत राहिल्याने आपल्या जीवनातून अंधकार दूर करण्याबरोबर दुसर्‍यांच्या जीवनातूनही तो दूर जाईल, यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून स्वागत. 


- एम.आय. शेख

(लेखक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक असून, शोधनचे स्तंभलेखक आहेत. मो.9356727219 )


 


माननीय मुगीरा बिन शोबा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) नमाजमध्ये दीर्घकाळ उभे राहात, त्यामुळे त्यांचे पाय सुजले जात असत. पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘तुम्ही इतकात्रास का घेता जेव्हा की तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी अल्लाहचा कृतज्ञ दास बनू नको?’’

स्पष्टीकरण

‘‘तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत.’’ हा संकेत कुरआनच्या खालील आयतीकडे आहे,

‘‘हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाहने तुमची पुढील व पाठीमागील प्रत्येक उणीव माफ करावी आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी व तुम्हाला सरळमार्ग दाखवावा.’’ (दिव्य कुरआन, ४८:१-२) ‘‘मी ईश्वराचा कृतज्ञ दास बनू नको?’’ म्हणजे उपासनेचा उद्देश (इबादत) केवळ हाच नाही की आमचे अपराध व उणिवांना माफ केले जावे आणि ईश्वराकडून आमची पकड होण्याचे भय व शिक्षा देण्याचे भय व संशय राहू नये. इबादत (उपासना) व प्रणिपातचा एक उद्देश आपल्या प्रभुप्रति कृतज्ञता व्यक्त करणेसुद्धा आहे, याचे आमच्यावर अगणित उपकार आहेत. त्यानेच आमचे मागील पुढील सर्व गुन्हे माफ केले आहेत. आपल्या या प्रभुप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा सर्वोत्तम विधी हा आहे की दासाने आपल्या प्रभुसमोर कृतज्ञतेच्या प्रगाढ व उत्कट भावनेसह नतमस्तक व्हावे.

शंका : कुरआनच्या आयतीतील विषय क्रमवार नाहीत, पुनरावृत्ती जास्त आहे आणि लेखन कुशलतेचा अभाव आहे. असा ग्रंथ ईशग्रंथ कसा असू शकतो?

कोणताही सार्थक, सफल व उपयोगी ग्रंथ आपल्या उद्देश, हेतु आणि विषयाच्या केंद्रीकरणाला धरून चालते. आपल्या हेतुनुसार अनुवूâल भाषाशैली आणि विषयप्रवीणता अवलंबिली जाते. ती आपल्या ध्येय व अंतिम परिणामापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित मार्ग ठरवते. यात कोणत्याही बाबीची कमतरता त्या ग्रंथाच्या सफलतेत अडचण निर्माण करेल, या दृष्टिकोनातून कुरआनबाबत विचार केला तर त्याची साहित्यिक सुंदरता आणि लक्ष-सिद्धीची प्रवीणता आणि वाङ्मय कला-कौशल्ये स्पष्ट होतात.

एखाद्या ग्रंथाच्या वाचनासाठी त्याचा विषय आणि हेतू जाणून घेणे आणि कला-कौशल्याचे सूक्ष्म अवलोकन आवश्यक आहे. कुरआन काही साधारण ग्रंथ तर नाही. याची भाषाशैली मानव-रचित ग्रंथांपेक्षा भिन्न आहे. यास समजण्यासाठी थोडी मेहनत करावीच लागेल. एकाहून अधिक वेळा त्याचे योग्य रूप समजून घ्यावे लागेल.

जर साहित्याच्या विद्याथ्र्याला सांख्यिकी विषयाचे पुस्तक दिले अथवा इतिहासाच्या विद्याथ्र्याला अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय पुस्तक दिले तर त्याच्यासाठी विचित्र परिस्थिती निर्माण होईल, याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो. हे असे याकरिता होते की तो त्या विषयाच्या आधारभूत सिद्धान्त आणि विषयापासून अनभिज्ञ आणि अपरिचित आहे. कुरआन मात्र मानवी जीवनाविषयीच चर्चा करतो, त्यामुळे अपरिचित असल्याची भावना नसते. तरीपण धर्माबाबत संकुचित कल्पना माणसाच्या हृदयात घर करून राहत असल्याने सुरूवातीला स्वाभाविकपणे समस्या उत्पन्न होतात. अशा समस्या काही ठिकाणीच उत्पन्न होतात, ज्यांचे समाधान करणे सहज शक्य होते.

कुरआन लिखितरूपात अवतरित झाला नाही. तो लहान लहान भागांत भाषण व आवाहनाच्या रूपाने अवतरित झाला आहे. देवदूताचा आवाज पैगंबरांनी ऐवूâन ते लिहून घ्यायला लावले. अवतरित अंश त्या वेळच्या घटनेवर, परिस्थितीवर आधारित असे. वर्तमान परिस्थितीच्या बऱ्याच गोष्टी गौण समजून विषय पुढे सरकत गेला.

लोकांसमोर त्या वेळी परिस्थितीची जाण होती व त्यांच्यासमोर कुरआनचे आवाहन होते, त्यामुळे त्यांना समजायला कठीण गेले नाही. दुसरी गोष्ट अशी की कुरआन थोडक्यात सिद्धान्त मांडत असे. तसे जर केले नसते तर ग्रंथ अत्यंत मोठा झाला असता आणि सुरक्षा आणि पाठांतरासाठी मोठा अडसर ठरला असता. अशा प्रकारे संक्षिप्त रूपात व्यापक गोष्टी मांडणे ही विशिष्ट कला त्या वेळी अरबांत एक विशेषता मानली जात.

कुरआनचा प्रत्येक अध्याय (सूरह) एका केंद्रीय विषयावर आधारित आहे. काही गोष्टींच्या बाबतीत विस्तृत माहितीनंतर परत केंद्रीय विषयावर येत असे. यामुळे ाâमभंग झाल्याची जाणीव होते. याचप्रकारे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती ध्यान आकृष्टकरण्यासाठी केली आहे जे सिद्धान्ताचे अभिन्न अंग आहेत. या पुनरावृत्तींत शब्द आणि भाषाशैलीत परिवर्तन करून असे सौंदर्य उत्पन्न केले गेले आहे की ते दोष नसून गुणांचा अनुभव होतो. परंतु अनुवाद करताना ध्वनिसरलता व शब्दांची ठेवण पूर्णत: उतरवणे शक्य नाही. यामुळे अनुवादाच्या माध्यमातून कुरआनचे अध्ययन करणारे या पुनरावृत्तीच्या सौंदर्याचे दर्शन व लाभ घेऊ शकत नाहीत.

कुरआन या जगाला आणि परलोक जीवनाला परस्पर पूरक आणि आश्रित, पराधीन तथ्याच्या रूपात प्रस्तुत करतो. मानवाच्या डोक्यात उत्पन्न होणारी जिज्ञासा आणि भ्रमाच्या निवारणासाठी लहान लहान आयती अद्भुत चमत्कार दाखवितात. मनोविज्ञानाच्या गहन गोष्टीला न समजणारे वर वर उदासीन भावाने पुढे जातात. कुरआनचे एक एक वाक्य (आयत) चिंतन मनन करण्याचे आवाहन करते. सहज व सरासरी अध्ययन करण्यासाठी हा ग्रंथ नाही.

कुरआनची आपली स्वत:ची विशिष्ट लेखनकला आहे. त्यात क्षणाक्षणांत विषयात बदलाव येत असतो. कधी आकाशाबाबत गोष्ट होत असेल तर अकस्मात विषय न बदलता जमिनीबाबत गोष्ट सुरू होते. जगातील गोष्टींच्या दरम्यान अचानक पारलौकिक विषय सुरू होऊन जातो. याचप्रकारे संबोधनाचे पात्र अचानक बदलते. कधी अल्लाहचे संबोधन सुरू असतानाच मध्येच पैगंबर (स.) यांना संबोधित केले जाते. कधीकधी हे निश्चित करणे कठीण जाते की हे संबोधन कुणाकडून आणि कुणासाठी आहे. असे होणे ही एक प्रकारची विशिष्ट कला आणि प्रभावाचे प्रदर्शन होय.

त्याची ओळख पटल्यावर त्याच्या सौंदर्याचे अवलोकन होऊ शकते.

कुरआनची अशी एक विशिष्ट शैली आहे की एखाद्या घटनेच्या विवरणांत एक बाजू स्पष्ट होते आणि यावरून निश्चित होते की दुसरी बाजू काय असू शकते. परंतु कुरआन स्पष्ट शब्दांत ते उघड करीत नाही आणि ती गोष्ट वाचकांवर विश्वासाने सुपूर्द केली जाते की ते बुद्धीचा उपयोग करून समजून घेतील. त्या गुप्त अंशाचे विवरण न मिळाल्याने एका साधारण वाचकाला क्रमाची विकृती जाणवू लागते. म्हणून वाचकाने फक्त ग्रंथावर अवलंबून न राहता आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करून अर्थ ग्रहण करणे, सतर्वâ राहणे आवश्यक आहे.

उदाहरणाकरिता विपरीत गुणाच्या पदार्थाचे विवरण याप्रकारे करणे की ज्या एकाच्या गुणाचे वर्णन केले जावे की त्या गुणाला दुसऱ्या पदार्थासाठी सोडून दिले जावे जेणेकरून वाचक त्या गुणाला स्वत: समजून घेईल, तसेच दुसऱ्या पदार्थाच्या त्या गुणाचे वर्णन केले जावे ज्याच्या विपरीत गुणाला पहिल्या पदार्थांत सोडून दिले जावे. याची बरीच उदाहरणे कुरआनात सापडतील. चांगले आणि वाईट गुणांचे लोक, स्वर्ग आणि नरक, दिवस आणि रात्र इत्यादींचे वर्णन... इ.

येथे आपण दिवस-रात्रचे एक वर्णन पाहू या -

``तो अल्लाहच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनविली की तिच्यांत संतोष प्राप्त करावा व दिवसाला प्रकाशमान बनविले.'' (दिव्य कुरआन - १०:६७, २७:८६)

येथे रात्रीला आराम करण्यासाठी लाभदायक दाखवले गेले आहे आणि `अंधकारा'चे वर्णन केले नाही जो `रात्री'चा एक गुण आहे. याकरिता की त्याच्या विपरीत `दिवस' प्रकाशमान असल्याचे वर्णन दिले आहे. प्रकाशमानच्या विरुद्ध गुण `अंधकारमय' हा अर्थ वाचक आपल्या कल्पनेने बुद्धीने समजून घेईल. रात्री `आराम' करण्याचे वर्णन आहे तर त्याच्याविरुद्ध दिवसा परिश्रम करणे व उपजीविकेसाठी प्रयत्न करण्याचे वर्णन लपवून ठेवले आहे, येथे पाठकाने स्वत:ची बुद्धी चालवून पूर्तता करावी. पूर्ण गोष्ट जर उघड केली तर ती या प्रकारे असेल.

``तोच आहे ज्याने तुमच्यासाठी रात्रीला (अंधकारमय) बनविले, म्हणून तुम्ही त्यात आराम करावा, सुख उपभोगावे आणि दिवसाला प्रकाशमान बनविले (कारण प्रकाशात आपला काम-धंदा आणि परिश्रम करावे.)''

`आयती'मधील वर्णन पाठकाला विचित्र आणि अपूर्ण जाणवेल. परंतु काव्यगुणांनी परिचित माणूस त्यात जे कौतुक आहे, त्या सरळ सरळ व उघड वर्णनांत नाही हे सहज जाणून घेतो.

याचबरोबर या आयतीत एक चमत्कार लपलेला आहे जो अनुवादामुळे स्पष्ट होत नाही. ज्या शब्दाचा अनुवाद ``प्रकाशमान'' अथवा ``रोशन' केला गेला आहे, त्याचा मूळ शब्द अरबी भाषेत ``मुबसिरा'' आहे ज्याचा अर्थ असा ``पाहताना'' अथवा ``डोळे उघडे ठेवत''. याचा विपरित अर्थ ``अंधकार'' नसून ``डोळे मिटलेला'' असा होईल. तात्पर्य असे की त्याच्यापासून अंधकार आणि प्रकाश आहे. परंतु पाहणे, डोळे उघडे ठेवणे अथवा डोळे मिटणे हे प्राण्यांची सवय आहे. निर्जीव वस्तुत या हालचालीला मानवीकरण (म्हणजे निर्जीव वस्तू व्यक्ती आहेत असे समजणे) केले गेले. याप्रकारे रात्र आणि दिवस आमचे सहचर बनले आहेत. अशा वर्णनाने प्रभावात वृद्धी होत जाते.

या प्रकारची उदाहरणे कुरआनात भरपूर आहेत. जेव्हा वाचक कुरआन पाठ (तिलावत) करतो, तेव्हा साऱ्या घटना चलचित्रपटासारख्या त्याच्या मेंदूत गतिशील आणि जीवित रूपात उपस्थित होतात. वाचक त्याच्यासोबत या सहयात्रेला जाऊ लागतो.

कुरआनची लहान लहान वाक्ये मानवाच्या हृदयाला प्रभावित करतात. त्याचे हृदय चैतन्यमय असेल तर ही वाक्ये बाणाप्रमाणे सरळ प्रवेश करून कायापालट करतात. काही नमुने येथे देण्यात येत आहेत.

``हे मानवा! कोणत्या गोष्टीने तुला आपल्या पालनकर्त्याच्या बाबतीत संभ्रमात टाकले, ज्याने तुला निर्माण केले, तुला नखशिखांत व्यवस्थित केले, तुला प्रमाणबद्ध बनविले आणि ज्या रूपात इच्छिले तुला जोडून तयार केले.''

(दिव्य कुरआन - ८२ : ६-८)

``हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे भय बाळगा आणि प्रत्येक इसमाने हे पहावे की त्याने उद्यासाठी काय संरजाम केला आहे. अल्लाहचे भय बाळगत रहा. अल्लाह खचितच त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी तुम्ही करता.''

(दिव्य कुरआन - ५९ : १८)

``काय श्रद्धावंतांसाठी अद्याप ती वेळ आली नाही की त्यांची हृदये अल्लाहच्या स्मरणाने द्रवली जातील आणि त्याने अवतरलेल्या सत्यापुढे नमतील?''

(दिव्य कुरआन - ५७ : १६)

``काय या लोकांनी कुरआनवर विचार केला नाही अथवा हृदयांवर त्यांच्या कुलुपे लागलेली आहेत?'' (दिव्य कुरआन - ४७ : २४)

सारांश, कुरआनच्या काव्यगुण आणि भाषा-शैलीबाबत अज्ञान असल्याकारणाने एक साधारण वाचकासमोर समस्या उभ्या राहतात. कुरआनात काव्यसौंदर्य आणि साहित्यिक सौंदर्य इतके अधिक आहेत की अरबचे साहित्यिक व कवी यांनी कुरआन अवतरणानंतर आपले कविता करणे सोडून दिले. विचारल्यावर त्यांनी सांगितले की आता कुरआननंतर यापुढे अशी चांगली रचना निर्माण करूच शकत नाही.

कुरआनच्या फार थोड्या `तफसीर' (भाष्य व टीका) लिहिल्या गेल्या ज्यांत साहित्यिक मर्म ठळकपणे मांडले गेले. अधिकांश कुरआनचे नियम-विधान, शिक्षा आणि व्यावहारिक उपयोगाचे विवरण हेच तफसीरचे मुख्य विषय असत. हेच कारण आहे की अधिकांश वाचक या दृष्टिकोनातून अध्ययन करीत नाही आणि मुस्लिम तर श्रद्धेपायी आणि ईश-कोपाच्या भयाने समजून घेण्याच्या मार्गातील अडीअडचणीला खुल्या दिलाने सांगत पण नाही. त्यामुळे अधिकांश लोक या ज्ञानापासून वंचित राहिले आहेत. 



अल्लाहने मानवाला बुद्धी दिली आहे ज्याद्वारे तो ज्ञानप्राप्ती करतो. त्याला विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती बहाल केली आहे, ज्याद्वारे तो चांगल्या आणि वाईटाची पारख करू शकतो. खरे आणि खोटे ओळखण्याची जन्मजात कुव्वत माणसाला लाभलेली आहे. या साऱ्याबरोबरच त्यास इच्छा, योजना, अधिकार आणि स्वातंत्र्यही दिलेले आहे. विचार आणि विवेकाचा उपयोग करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मानवाला दिले गेले आहे. माणूस शिकला सवरलेला नसला तरी या सर्व उपजत गोष्टींमुळे चूक आणि बरोबर, खरे आणि खोटे, चांगले आणि बाईट याबद्दलची पारख त्याला आपसुकच येते. प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणत्या न कोणत्या वळणावर त्याच्या निर्मितीबाबतचे प्रश्न पडतातच. त्याचबरोबर मरणोपरांत आपले काय होईल हाही प्रश्न अधूनमधून छळत असतो. प्रत्येक माणूस आपले ज्ञान, आपले विचार आणि विवेकानुसार या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. माणूस अशिक्षित असला तरी त्याला त्याच्या निर्मात्याचा ध्यास असतो.

जगातील सारी विश्वविद्यालये अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या आठ-दहा शतकांत प्रस्थापित झालेली आढळतात. मग त्यापूर्वी सारे लोक अज्ञानी होते काय? किंबहुना आधुनिक विज्ञान हे अलीकडच्या दोन-तीन शतकांत प्रस्थापित झाले आणि प्रगल्भ झाले असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाच्या निर्मितीपासूनच अल्लाहने प्रत्येक मानवाला मग ती स्त्री असो की पुरुष बुद्धी, विवेक, आकलन, वैचारिक बैठक, निर्णयक्षमता त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिले आहे.

आधीपासूनच श्रद्धावंत आणि नास्तिक यांचे आपले आपले हेवेदावे आणि विचार आहेत. आधुनिक विज्ञानवादी ही सारी सृष्टी कोणी निर्माण केली नसून ती स्व: निर्माण झालेली आहे असे मानतात. तर श्रद्धावंत या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे असा दृढ विश्वास बाळगून आहेत. खरे पाहता विश्वातील प्रत्येक वस्तू नियमांच्या व बंधनांच्या अधीन आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपापल्या कक्षेत नियमबद्ध भ्रमण करीत असून ते आपला वेग तसूभरही कमीजास्त करू शकत नाहीत. वस्तु: अंतरिक्षातील सर्व लहानमोठ्या ग्रहापासून पृथ्वीतलावरील अगदी सूक्ष्म जीव-जंतू असो की अणु-रेणू असो सर्वांना त्यांना घालून दिलेल्या नियमातच रहावे लागते. खुद्द मानवदेखील निसर्गनियमांच्या अधीन आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू, प्राणीमात्र, जीवजंतू, वनस्पती यांच्यासाठीही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची उत्पत्ती होते आणि क्षतीही. ईश्वरी नियमानुसारच सारे सजीव त्यांना घालून दिलेल्या काळाच्या मर्यादेत जिवंत राहून जगतात आणि मरणही पावतात. साक्षात मानवाच्या जीवनाचा आढावा घेतल्यास तोसुद्धा या नियमांच्या अधीन आहे असे सिद्ध होते. किंबहुना जो माणूस स्व:च्या ताकदीवर आणि हिमतीवर गर्व करतो त्याच्या श्वासोच्छवास, हृदयाचे आकुंचन प्रसरण, चालत असताना हातांची होणारी लयबद्ध हालचाल, त्याची पचनसंस्था इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा त्याच्या हातात नाही.

काय आहे अंधार?

एखादा इसम आपल्या जन्मदात्या मातापित्याच्या अस्तित्वालाच मानत नसेल तर अशा माणसास आपण काय म्हणाल? ही सारी सृष्टी अशीच किंवा आपोआपच निर्माण झालेली नसून या सृष्टीचा एक निर्माता आहे असा ठाम विश्वास श्रद्धावंताचा आहे. नास्तिक आणि आधुनिक विज्ञानवादी या सिद्धान्तांना मानत नसले तरी ते आपल्या दाव्यास सिद्धही करू शकलेले नाहीत. विश्वातील बहुतांशी लोक ईश्वराचे अस्तित्व मानतात, कारण श्रद्धा ही मानवी स्वभाव आहे. बहुतांशी लोक कोणा न् कोणावर श्रद्धा बाळगून असतात. काहींची श्रद्धा देवावर, गुरू, बुवा, बाबा, पीर, फकीर, ऋषीमुनी, देवी-देवता, प्राणिमात्र इतकेच नव्हे तर पंचमहाभुतातील अग्नी, वायू, जल, आकाश, ग्रह-तारे, चंद्र, सूर्य यापासून ते थेट सैतान, राक्षसावरही असते. जो तो आपल्या मर्जीनुसार, परंपरेनुसार किंवा त्याला झालेल्या साक्षात्कारानुसार आपली श्रद्धा ठेवतो. आपण ज्याला पूज्य मानतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे काय? याचा आपला विवेक वापरून जो विचार करत नाही तो खरा अंधारात आहे. डोळे असून आंधळा आहे, ज्ञान असून अज्ञानी आहे, ऐकू येणारा असून बहिरा आहे. जगातील असे कोट्यावधी लोक अशा अंधाराच्या खाईत आपले जीवन व्यतीत करीत आहेत. खरा ईश्वर कोण, आपला निर्माता कोण, आपल्या निर्मितीचा उद्देश काय, मरणानंतर आपले काय होईल? असे प्रश्न या अंधारातल्या लोकांना पडत नसतील? मानवाच्या स्व:च्या मर्यादा आहेत. असे असूनसुद्धा माणूस ‘अश्रफुल मखलुकात’ म्हणजेच अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. सृष्टीतील सर्व सजीवांपैकी केवळ मानवाला बुद्धी मिळाली आहे ज्याद्वारे तो विचार करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला स्व:चे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. आपल्या हिताचे आणि अहिताचेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे. अशी बुद्धिमत्ता, वैचारिक पातळी, निर्णयप्रक्रिया आणि स्वातंत्र्य हे मानवाशिवाय कोणत्याही प्राण्यास नाही, त्यामुळेच तर मरणोपरांत जीवनात ऐहिक जीवनातील पापपुण्यांचा हिशेब फक्त मानवाचाच घेतला जाईल, इतर प्राण्यांचा नाही. त्यामुळे आपण माणूस म्हणून जगताना आपल्या निर्मात्यास ओळखण्याची, त्याची उपासना करण्याची, त्याच्यावर श्रद्धा बाळगण्याची किंवा न बाळगण्याची मुभा अल्लाहने मानवाला दिली आहे. सृष्टीतल्या इतर सर्व गोष्टी जसे सूर्य, चंद्र, तारे, आकाश, धरणी, झाडेझुडपे इतकेच काय सर्व प्राणीसुद्धा अल्लाहचीच उपासना करतात. अल्लाहची उपासना करण्याचे व न करण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे.

खरे तर अल्लाहने मानवाची निर्मिती अल्लाहच्या उपासनेसाठीच केलेली आहे. कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे, ’’आणि आम्ही (अल्लाहने) जिन्न आणि मानव यांना आमच्या उपासनेसाठी निर्माण केले आहे.’’ (कुरआन, 51:56) याचा अर्थ मानवाची निर्मितीच मुळात अल्लाहच्या उपासनेसाठीच झालेली आहे. परंतु त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता आणि विवेक याचा वापर करून अल्लाहची उपासना करायची की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. तसेच सृष्टीत अशी अनेक चिन्हेही दाखवलेली आहेत ज्यातून अल्लाहच्या अस्तित्वाचे प्रकटीकरण होते.

तुम्ही अल्लाहची उपासना करा किंवा न करा तो तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत दाणापाणी देण्याची व्यवस्था करतो. त्याने तुमची निर्मिती केली आहे त्यामुळे तुम्हाला दाणापाणी देण्याची जबाबदारीही घेतली आहे. प्रथम मानवाच्या निर्मितीपासून अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीस विविध प्रकारे मार्गदर्शनही केलेले आहे. विश्वाच्या विविध स्थळी आणि वेळी आपले पैगंबर पाठवून मानवाला असे ठाम आणि स्पष्टपणे सांगितले की, ’’अल्लाहशिवाय उपासनेयोग्य कोणीच नाही.’’ हा एकमेव संदेश देण्यासाठी आणि मानवाला सन्मार्ग दाखविण्यासाठी विविध ग्रंथांचे वेळोवेळी अवतरणही केले. आता इतके सर्व स्पष्ट सांगितलेले असताना जर एखाद्या व्यक्तीने अल्लाहचा इन्कार केला अथवा त्याची उपासना नाकारली तर तो खरेच इतक्या लख्ख आणि स्वच्छ प्रकाशातही गडद अंधाराच्या अधिपत्याखाली नाही काय? त्यामुळे प्रत्येक माणसाने आपण ज्याची पूजा करतो, ज्यांची उपासना करतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा हा अंधार अधिकाधिक गडद होत जाऊन आपण त्यात सामावले जाऊ हे जाणून घेतले पाहिजे. हा जाणून घेण्याचा काळ केवळ आपल्या मृत्यूच्या काळापूर्वीची वेळ आहे. त्यानंतर मात्र या अंधारातून उजेडाकडे जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा होतो की जे अल्लाहवर विश्वास ठेवतात, त्याची उपासना करतात, त्याला आपला निर्माता मानतात आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करतात त्यांनाच मरणोपरान्त जीवनात जन्नत मिळणार आहे. यात महत्त्वाची अट अशी की, अल्लाहशिवाय इतर कोणाचीच उपासना त्यांनी करू नये आणि त्याच्या उपासनेत कोणासही भागीदार बनवू नये. त्याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत असे मानणे आणि सत्कार्य करणेही अत्यावश्यक आहे. नेमके हेच कलमा-ए-तौहीदमध्ये म्हटलेले आहे. ते असे- लाइलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह अर्थात- अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही (उपासनेयोग्य) आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.

जो यावर विश्वास ठेवत नाही, अल्लाहची उपासना करीत नाही तो खऱ्या अंधारात आहे. आपण उच्च विद्याविभूषित असलो तरी धर्माच्या बाबतीत कधीच खोलवर जात नाही. वाडवडिलांपासून किंवा पारंपरिकदृष्ट्या जे धार्मिक संस्कार आपल्यावर होतात तेच आपण बरोबर मानून त्याचीच अंमबजावणी करतो आणि तसेच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर करतो. हेच आपल्यावर केलेले संस्कार योग्य आणि बरोबर आहेत की नाही याची तपासणी करणे आपले कर्तव्य नाही काय? किंबहुना डोळस असून शुद्ध आंधळेपणाने आपण त्यावर आचरण करतो. खरे तर हा आपला बौद्धिक अंधार आहे. आपल्या ईश्वराला ओळखण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा कधीच वापर करत नाही. ही आपली बौद्धिक दिवाळखोरी नाही का?

जे अल्लाहची उपासना करणार नाहीत, त्यास आपला निर्माता मानणार नाहीत, अशा व्यक्ती जे त्रिवार सत्य आहे ते लपवतात अथवा त्याचा इन्कार करतात अशांनाच काफीर असे संबोधले जाते. हे त्रिवार सत्य म्हणजे अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव निर्माता, मालक, पालनकर्ता आहे आणि केवळ तोच उपासनेच्या लायक आहे. किंबहुना साऱ्या सृष्टीने फक्त त्याची उपासना करणे हा त्याचा हक्क आहे. मरणोपरांत जीवनात अल्लाहची उपासना न केल्यामुळे, त्यास आपला निर्माता मानण्यास इन्कार करणारे तोट्यात राहतील. नरकाग्नीत त्यांना शिक्षा दिली जाईल आणि त्यातून ते बाहेर कधीच येणार नाहीत. कुरआन मजीदमध्ये असा उल्लेख आहे की, जे अल्लाहचा इन्कार करतात त्यांनी इहलोकी जीवनात कितीही सत्कार्य केले तरी पारलौकिक जीवनात ती सर्व सत्कार्ये मृगजळाप्रमाणे असतील. परंतु अल्लाह कोणावरही अन्याय कधीच करीत नाही. त्याचा इन्कार करणाऱ्यासही त्याच्या सत्कार्याचा योग्य तो मोबदला तो याच जीवनात देतो, मग तो मोबदला त्याच्या संपत्तीच्या स्वरूपात असेल, प्रसिद्धीच्या स्वरूपात असेल, आरोग्याच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या मुलांबाळांच्या स्वरूपात असेल.

‘कुफ्र’ या शब्दाचा खरा अर्थ लपवणे किंवा झाकणे असा आहे आणि जो मनुष्य अल्लाहच्या सत्याचा इन्कार करणारा आहे तो श्रद्धाहीन आहे. त्यालाच काफीर असे म्हटले जाते. कुफ्र हे एक घोर अज्ञान आहे आणि अल्लाहशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान काय असू शकते? खरे तर कुफ्र एक अत्याचार आहे. कृतघ्नता आहे. अल्लाहशी प्रतारणा, विद्रोह आहे. त्यामुळे मनुष्याने वेळीच या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या निर्मात्यास अर्थात अल्लाहला ओळखून त्याच्या उपासनेच्या उजेडाकडे आपले पाऊल टाकले पाहिजे. तरच आपल्याला मरणोपरांत जीवनात खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.

प्रकाशाच्या वाटा

कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

‘‘जे ईमानधारक आहेत त्यांचा मित्र अल्लाह आहे. तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशाकडे आणतो.‘‘ (कुरआन, 2:257)

खरे तर अंधाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारांनाही वेगवेगळे पदर आहेत. या उलट प्रकाश हा एकमेवाद्वितीय आहे. एकदा प्रकाशाची किरणे आली की कोणत्याही प्रकारच्या अंधकाराला जागाच उरत नाही. परंतु हा उजेड प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे मात्र दूर केले पाहिजेत. कारण अंधार करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. उदा. तुम्ही डोळे बंद करा अंधार होईल, तुम्ही पडद्याआड व्हा अंधार होईल किंवा अशी कोणतीही गोष्ट करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत उजेड पोहचणार नाही. परंतु तुम्ही डोळे उघडले तर समोर उजेड दिसेल. उजेडाच्या साऱ्या वाटा केवळ अल्लाहपासून सुरू होतात, कारण तोच या सृष्टीचा निर्माता आहे आणि पालनकर्ताही. अल्लाहने म्हटले आहे,

’’अल्लाह श्रद्धावंताचा मित्र आहे आणि श्रद्धाहीनांचा कोणी वाली नाही.‘‘ (कुरआन, 47:11)

या संदेशाद्वारे अल्लाह हे सांगू इच्छितो की जे अल्लाहवर श्रद्धा ठेवून त्याची उपासना करून श्रद्धावंत झाले आहेत त्यांना त्याने त्याच्या खऱ्या उजेडात आणले आहे. त्यांच्या आयुष्यभर ते त्या प्रकाशाच्या झगमगाटात राहतील. हा प्रकाश ईमानाचा आहे, श्रद्धेचा आहे. हा उजेड दाखवण्यासाठी अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीसाठी वेगवेगळे पैगंबर पाठविले. वेगवेगळ्या धर्मग्रंथांचे अवतरण वेगवेगळ्या वेळी केले. कुरआन मजीद हा ग्रंथ अवतरित करून अल्लाहने कयामतपर्यंत सकल मानवजातीला उजेडाचा स्रोत निर्माण करून दिला आहे. म्हणून अल्लाह कुरआन मजीदमध्ये म्हणतो-

’’हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे जेणेकरून तुम्ही मानव समाजास अंधारातून प्रकाशाकडे आणाल हे अल्लाहच्या आज्ञेने आणि त्या सर्वशक्तिमान अल्लाहच्या मार्गाकडे.‘‘ (कुरआन, 14:1)

याचा अर्थ असा होतो की अल्लाह आपला निर्माता आहे आणि त्याने सर्व पैगंबरांना आज्ञा दिली की त्यांच्या अनुयायांना अंधारातून प्रकाशाकडे आणा. वरील आयतीत अल्लाहने दोन गोष्टींचा उहापोह केला आहे तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि त्यानंतर अल्लाहच्या मार्गावर मार्गक्रमण. उजेडाकडील प्रवास म्हणजे अल्लाहवर श्रद्धा आणि सन्मार्ग होय. आणखी एका ठिकाणी कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

’’अल्लाह आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे.‘‘ (कुरआन, 24:35)

या आयतीद्वारे अल्लाहने स्पष्ट केले आहे की तोच खऱ्या प्रकाशाचा स्रोत आहे. त्यामुळे जे अल्लाहची मर्जी प्राप्त करण्यासाठी शांततामय सन्मार्गावर चालतात त्यांना अल्लाहच श्रद्धाहीनतेच्या अत्यंत खोल आणि काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मदत करतो आणि त्यानुसार मार्गदर्शनही करतो.

उजेडाची ही वाट अत्यंत खडतर असली तरी ज्यास अल्लाहची मर्जी प्राप्त होते त्यास ती सहज साध्य होते. प्रकाशाची ही वाट त्याचे इहलोकातील जीवनच फक्त सुखी, समृद्ध, समाधानी करत नाही तर परलोकातही त्यास जन्नतच्या स्वरूपात कायमस्वरूपी उजेडप्राप्ती होते. हा प्रकाश त्यानंतर कधीही न संपणारा आहे. खरे तर या जीवनरूपी परीक्षेचे ते फलितच आहे. यासाठी आपल्या बुद्धीचा, सद्सद्विवेकाचा, विचारशक्तीचा वापर करून आपल्या अंतापूर्वी आपल्या निर्मात्यास ओळखले की तो सर्वशक्तिमान अल्लाह आपल्याला या जीवनातच वेढणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारातून आणि मरणोपरांत नरकाग्नीच्या यातनेपासून वाचवेल. त्यामुळे आता आपणच ठरवायचे आहे की कायमस्वरूपी अंधारात आणि नरकाग्नीत राहण्यासाठी कोणाही ऐऱ्यागैऱ्याची पूजा उपासना करायची की सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्याप्रती सश्रद्ध होऊन सन्मार्गावर चालून त्याची उपासना करून इहलोक आणि परलोकातही प्रकाशाचा मार्ग धरून यशाचे वाटेकरी व्हायचे.

बंधूभगिनीनो! आपण सारे एकाच आदम आणि हव्वाची लेकरे आहोत. आपले आयुष्य केवळ खाणेपिणे, उठणे-बसणे, झोपणे-जागणे, कमावणे-खाणे, चंगळमस्ती करणे यासाठी नसून आपल्या खऱ्या निर्मात्यास ओळखून त्याची उपासना करण्यासाठी आहे. जो अल्लाहला नाकारून इतरांना पूज्य मानतो तो खऱ्या अंधारात आहे आणि अशा स्थितीत त्याचा मृत्यू झाल्यास तो नरकाग्नीच्या खाईत लोटला जाईल आणि कायमस्वरूपी शिक्षा भोगेल. जो अल्लाहसाठी आपले सर्वस्व वाहील, फक्त त्याचीच उपासना करेल आणि त्याच्या प्रेषितांच्यामार्फत दाखविलेल्या मार्गावर चालेल तो अक्षय प्रकाशाच्या लखलखाटात राहील. त्यास जन्नत अर्थात स्वर्गप्राप्ती होऊन तिथला तो कायम निवासी राहील. आता आपण ठरवायचे की अंधारात गुरफटून राहायचे की प्रकाशाशी हातमिळवणी करायची. 


- डॉ. इकबाल मिन्ने

(लेखक : औरंगाबादचे रेडिओलॉजिस्ट असून, विख्यात साहित्यिक आहेत. संपर्क मो.- 7040791137)



माननीय जुन्दुब बिन अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त मला हे स्वीकार्य नाही की तुम्हांपैकी कोणी माझा प्रगाढ मित्र असावा. कारण ईश्वराने मला त्याचा मित्र बनविले आहे जसे त्याने इब्राहीम (अ) यांना त्याचा मित्र बनविले होते.’’

स्पष्टीकरण

अल्लाहसोबत दासाचे प्रगाढ प्रेम असणे यास ‘खुल्लत’ म्हणतात. अशाच प्रकारे माणसासोबत अल्लाहच्या प्रेमातिरेकाससुद्धा ‘खुल्लत’ म्हटले जाते. हे प्रेम खरेतर अल्लाहच्या प्रभुत्वाची अनिवार्यता आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कथनाचा अर्थ, अल्लाहने मला त्याचा दोस्त (खलील) बनविले आहे. याचा अर्थ होतो की, तो माझा मित्र आहे. माझ्या हृदयावर खरेतर त्याचेच अधिपत्य आहे. मी त्याच्यात बिलवूâल हरवून गेलो आहे. त्याच्या प्रेमाने माझ्या हृदयात घर केले आहे.

अशा प्रकारचे अत्यंतिक प्रेम केवळ एकाचसाठी असू शकते. ‘खुल्लत’मध्ये दुसऱ्याची भागीदारी असंभव आहे. एका कविचे काव्य आहे, ‘‘माझी प्रियतमा माझ्या अंतरात आत्म्यासारखी व्याप्त आहे’’ आणि याचमुळे ‘खलील’ला ‘खलील’ म्हटले जाते.

शंका : कुरआनच्या कथनात परस्पर अंतर-विरोध अथवा विरोधाभास आढळतो. परंतु कुरआन तर असे आवाहन करतो की त्यात विरोधा-भास नाही.

कुरआन एक संतुलित आणि सामंजस्यपूर्ण ग्रंथ आहे. यातील कथन आणि वक्तव्यात विसंगती नाही. हा एक असा असाधारण गुण आहे जो अन्यत्र मिळणार नाही. मुख्य रूपाने बहुविध ज्ञानव्यापक नियम-व्यवस्थेत ग्रंथात चुका अनिर्वाय असतात. कुरआन विभिन्न परिस्थितीत थोडा थोडा करून २३ वर्षाच्या कालावधीत अवतरित झाला आहे. अशा स्थितीत यात अगणित विरोधाभास आणि नियमांची भिन्नता असली पाहिजे. परंतु तसे नाही, कुरआनची एक कडी दुसऱ्या कडीसोबत याप्रकारे गुंतलेली आहे की नियम व कायदा याप्रकारे एक-दुसऱ्याबरोबर परस्पर समन्वय साधून आहेत. सामंजस्यरूप धारण केले आहे, जसे एखाद्या मशीन व यंत्राचे भाग एकमेकांत गुंतलेले असून कार्यरत आहेत. कुरआन आपल्या या गुणाचे वर्णन याप्रकारे करीत आहे,

``काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाही? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.''

(दिव्य कुरआन - ४ : ८२)

कुरआनद्वारा स्थापित मानदंड हा कायमस्वरूपी मानदंड आहे. त्यात कसलाही आंतर्विरोध कुरआनच्या वर्णनात उत्पन्न होत नाही. परंतु विविध प्रसंग व वस्तूचे विवरण क्रमांक बदलल्याने जो प्रभाव वाढविण्यासाठी विशेष हेतुने केलेला आहे, काही विशिष्ट परिस्थितीत सामान्य नियम टाळून काही आदेश दिले गेले आहेत, त्यांना विरोधाभास अथवा आंतर्विरोध म्हणता येणार नाही. जगाच्या प्रत्येक कायद्यात आणि व्यवस्थेत `अपवाद'चे स्थान आहेच. भाषेच्या नियमांतसुद्धा `अपवाद' पाहायला मिळतो. ही लवचिकता आणि सरलतेचे द्योतक आहे. असे जर नसेल तर कठोरतेचे व विविधतेचे स्वरूप प्राप्त होईल. आंतर्विरोध त्या वेळेला झाला असता जेव्हा त्याचा एक नियम दुसऱ्या नियमाला लागू पडण्यात अडचण आली असती. आंतर्विरोध नसण्याचा अर्थ असा की उद्देश आणि मौलिक नियमांत उलटफेर व्हायला नको. असे कुरआनमध्ये कोठेही आढळत नाही की, एक नियम दुसऱ्या नियमाला निष्क्रिय आणि अप्रभावी बनवेल. एका गोष्टीला सत्य ठरवून त्याच गोष्टीला दुसऱ्या ठिकाणी खोटे ठरवून देईल, असे कदापि शक्य नाही.

कुरआनात नमुद केले आहे,

``त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिन्नला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही.'' (दिव्य कुरआन - ५५ : ३९) 

याच्या विरुद्ध बऱ्याच ठिकाणी कुरआन ने नमुद केले आहे.

``तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात.'' (दिव्य कुरआन - १५ : ९२-९३)

आणि याचप्रमाणे,

``आणि थोडे थांबवा यांना काही विचारावयाचे आहे यांना.'' (दिव्य कुरआन - ३७ : २४)

येथे पहिल्या `आयती'मध्ये प्रलय दिनी अपराध्याला विचारण्याचा नकार दिला आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या `आयती'त विचारपूस करण्याची गोष्ट सांगितली आहे. या दोन्ही बाबतीत विरोध दिसून येत आहे.

याचे समाधान असे होते की जेथे जेथे या `आयती' आल्या आहेत त्यावेळेच्या प्रसंगाबाबत व त्याच्या मागे-पुढे घडलेल्या प्रसंगाबाबत पूर्ण गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. अभ्यास केल्यानंतर तथ्य समोर येते आणि जाणवणाऱ्याचा विरोध संपुष्टात येतो.

एक समाधान हेच की दोन वेगवेगळ्या प्रसंगी ही गोष्ट सांगितलेली आहे. अपराध्याची चौकशी केल्यानंतर, त्याच्या कर्माचे रेकॉर्ड दाखविल्यानंतर स्पष्ट केले जाईल. मग नंतर त्याला नरकाकडे घेऊन जाताना तो काही विनंती, विनवणी करेल तर त्यावेळी त्याच्या विनवणीवर चौकशी होणार नाही. जसे पुढे कुरआनात नमूद केले आहे,

``गुन्हेगार तेथे आपल्या चेहऱ्यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरून फरफटले जाईल.'' (दिव्य कुरआन - ५५ : ४१)

त्यांचे चेहरे स्वत:च साक्ष देतील की ते अपराधी आहेत, तसेच त्यांच्या कर्माची नोंदही त्यांना अपराधी सिद्ध करीत आहे. आता मात्र त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची गरज नाही. त्यांना आता फरफटत यातनागृहात नेण्यात येत आहे.

दुसरे समाधान असे की विचारल्यावर ते नकार देतील तेव्हा तर अल्लाहच्या विशाल ज्ञानापुढे त्यांचा अपराध सिद्ध झाला असेल. त्याला पुन्हा विचारण्याची गरज नाही. जर विचारणा झालीच तर अपराधींना त्यांच्या अपराधाला स्पष्ट करण्याच्या हेतूने विचारले जाईल. जगात असताना तर `हिशेबाचा दिवस' ते अमान्य करीत. आता स्वत: पाहिला ना तो दिवस! या फटकाऱ्याने त्या अपराधींच्या यातनेत वाढ होईल. जसे वरील आयतीत आपण पाहिले आहे.

पवित्र कुरआनात एका ठिकाणी म्हटले आहे,

``हे पैगंबर (स.) यांना सांगा, काय तुम्ही त्या ईश्वराशी कुप्रâ (द्रोह) करता आणि दुसऱ्यांना त्याचा तुल्यबळ ठरविता ज्याने पृथ्वीला दोन दिवसात बनवून टाकले? तोच तर सर्व जगवासियांचा पालनवर्ता आहे. त्याने (पृथ्वीला अस्तित्त्वांत आणल्या नंतर) वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यांत समृद्धी ठेवली आणि तिच्यांत सर्व मागणाऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी व गरजेप्रमाणे योग्य अंदाजाने अन्नधान्याची साधने उपलब्ध करून दिली. ही सर्व कामे चार दिवसांत उरकली. मग त्याने आकाशाकडे लक्ष दिले, जे त्यावेळी धुरासमान होते. तेव्हा त्याने दोन दिवसांत आकाश बनवून टाकले.'' (दिव्य कुरआन - ४१ : ९-१२)

कुरआनात अन्य सात ठिकाणी (७:५४, १०:३, ११:७, २५:५९, ३२:४, ५०:३८) असे दाखविले आहे की पृथ्वी, आकाश आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे, त्यांची निर्मिती सहा दिवसांत पूर्ण झाली. परंतु वरील `आयातीत' पृथ्वी दोन दिवसांत, पृथ्वी वरील जीवजंतू, पर्वत इत्यादी चार दिवसांत, नंतर आकाश दोन दिवसांत बनविले. या प्रकारे सृष्टीच्या निर्मितीत आठ दिवस लागले. या गोष्टींत काही मेळ बसत नाही.

दुसरी शंका ही की धरतीची निर्मिती आकाशापूर्वी दाखविली आहे. कुरआन ७९:३० मध्ये आकाश निर्मितीनंतर पृथ्वीनिर्माण, पसरविणे, अंथरण्याची गोष्टसांगितली आहे. या दोन्ही गोष्टींत विरोधाभास जाणवतो. 

शंकेचे निरसन :

या दोन प्रकारच्या शंकांचे निरसन याप्रकारे आहे. वरील `आयतीत' पृथ्वीच्या निर्माणाचे सविस्तर वर्णन आहे. नंतर संक्षिप्त रूपाने पुनरुक्ती आहे. दोन दिवसांत पृथ्वीrच्या निर्मितीनंतर पर्वत, वनस्पती, जीव-जंतू इत्यादींच्या निर्मितीसाठी अतिरिक्त दोन दिवस लागले. एवूâण चार दिवस झाले. पृथ्वीच्या निर्मितीनंतर जीव-जंतूसाठी चार दिवस नाही लागले. मग दोन दिवसांत आकाशाची निर्मिती या प्रकारे एवूâण चार अधिक दोन असे सहा दिवस झाले.

येथे दिवसाचा अर्थ एक दीर्घकाळ, जसे कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे ,

 `` एक अशा दिवसात ज्याचे प्रमाण तुमच्या  गणनेनुसार एक हजार वर्ष आहे.'' (दिव्य कुरआन ,३२:५)

पृथ्वीrची निर्मिती व आकाश निर्मिती यात पहिले काय? याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. दोन्ही कथनांप्रमाणे असे प्रतीत होते की दोन्हींचे निर्माणकार्य एकत्रित झाले आहे. काही निर्मिती आकाशची व काही निर्मिती धरतीची. जेव्हा एकाच्या निर्मितीची चर्चा सुरू असताना असा अर्थ नाही की दुसरी निर्मिती पूर्ण झाली आहे. जेव्हा कोणी आपले घरकाम सुरू करतो तर जमिनीवर, भिंतीवर, छतावर प्रत्येक भागात थोडे थोडे काम मागे पुढे सुरू राहते, जेवढे निर्माणासाठी जरूरीचे आहे. यावरून निर्माणकार्याची कल्पना केली जाऊ शकते.

एक दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की मागे-पुढे वर्णन करण्याचा अर्थ असा की निर्माणकार्याकडे लक्ष वेधणे होय. काळाच्या दृष्टिकोनातून पहिले वर्णन केलेले निर्माणकार्य पहिले असेल असे नाही.

एका व्यक्तीने स्वत:चे घर उभारले. नंतर त्याने बंगला बांधला. त्यानंतर विहीर खणली. एका मित्राला आपल्या निर्माणकार्याचा परिचय करून देताना म्हणतो, हे मित्रा!ही पाहा विहीर, तो पाहा बंगला ज्याचे बांधकाम मी करून घेतले आणि ते पाहा एक मोठे घर जे मी माझ्या मिळकतीने उभारले. कोणाचेही सहाय्य लाभलेले नाही.

या वर्णाने त्याचा हेतू फक्त हाच की मोठमोठाली कामे एक-एक करून तुमच्या समोर मांडली. इथे त्याचा हेतू असा नाही की पहिले कोणते काम केले व नंतर काय केले. पुन्हा मी घर बनविले. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी वर्णन केलेल्या वस्तूचे निर्माण केल्यानंतर घर बनविले. इथे `पुन्हा'ने तात्पर्य असे की ``नंतर हेही'' याचप्रकारे कुरआनमध्ये धरतीनंतर आकाशनिर्मितीचा उल्लेख आहे, पण त्याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे धरतीची निर्मिती अल्लाहने केली आहे. त्याचप्रकारे आकाशाची निर्मितीही अल्लाहने एकटेच केली आहे.

एक असेही मत आहे की, ``आकाशाच्या निर्मितीनंतर धरतीला अंथरणे''चे वर्णन (कुरआन ७९:३०) प्रमाणे असे सिद्ध होत नाही की धरतीच्या निर्मितीचे वर्णन आहे. धरती फार पूर्वी तयार झाली. नंतर हजारों वर्षानंतर पर्वत, समुद्र व सपाटीकरण झाले. धरतीच्या `अंथरूणा'चा अर्थ असा की भूतल जीवांसाठी उपयोगी होणे होय. म्हणून निर्माणकार्य नंतरचे असे म्हणता येणार नाही.

समाधानासाठी विवरण हे असंभव नाही. म्हणून `आयती'मध्ये विरोध मानणे आवश्यक नाही.



सर्व लोकांना आपल्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याचे समान हक्क आहेत आणि आपल्या धर्माप्रमाणे अनिर्बंधपणे आचरण करण्याचा व त्याचा प्रसार व प्रचार करण्याचा हक्क राहील. (भारतीय घटना कलम २५) धार्मिक स्वातंत्र्याच्या या कलमामुळे एखाद्या समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या व त्याला त्याच्या धार्मिक शिकवणींविरूद्ध आचरण करण्यास भाग पाडणाऱ्या अशा कोणत्याही नागरी कायद्याला वावच राहात नाही. जर असे केले तर तो धर्मामध्ये हस्तक्षेप होईल. लोकांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे जे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिले आहे त्याचा काय उपयोग? घटनेचे हे कलम रद्द करावे किंवा ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या रक्षणाची हमी द्यावी.

भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिमांना त्यांच्यावर समान नागरी कायदा जबरदस्तीने लादण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते. समान नागरी कायदा फक्त त्या लोकांवर बंधनकारक राहील जे स्वखुशीने त्याचे बंधन स्वीकारण्यास तयार होतील. असा कायदा करण्याचे काम भावी पार्लमेंटचे राहील. 

प्रत्येक व्यक्तीला तो ज्या गटाचा किंवा समुदायाचा आहे, त्या जातीच्या पर्सनल लॉप्रमाणे आचरण करण्याची त्याला पूर्ण मुभा राहील. जगामध्ये कितीतरी धर्मनिरपेक्ष देश आहेत की तेथे मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग आपल्याकडेच का हा हस्तक्षेप होतो? राष्ट्रीय एकात्मता यावर न्या. वाय. व्ही. चंद्रचूड यांनी सांगितले होते, ‘‘सर्वांसाठी विवाहाचा एक कायदा झाल्यास राष्ट्रीय एकतेसाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. पण यामुळे जेव्हा अल्पसंख्य जमातींना ही जाणीव होईल की त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांना नाहीसे केले जात आहे. तर त्यांची प्रतिक्रिया चांगली राहणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या संबंधावर त्याचा प्रतिकुल परिणाम होईल.’’ 

प्रत्येक मुस्लिमाला बंधनकारक किंवा अनिवार्य नियम कुरआनने दिलेले असताना काही आधुनिक विचार असणारे मुस्लिमसुद्धा आहेत. त्यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये आधुनिक

संस्कृतीच्या प्रवाहानुसार बदल करण्याचे ठरवून आपले गट तयार केले आहेत. त्यांच्या मते इस्लामची सामाजिक व्यवस्था आता जुनी झाली आहे. ती आताच्या आधुनिक काळाशी मेळ खात नाही. शरिया कायद्यातून मुक्त होऊन स्त्री पुरुष समान दर्जा राहील असा समाज बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना माहीत नाही की कुरआनमध्ये स्त्रियांना कोठेही कमी लेखले गेलेले नाही. उलट त्यांना पुरुषांपेक्षा जास्तच उच्च स्थान दिले आहे.

ईश्वराने सर्व मानवजातीच्या हिताचेच योग्यप्रकारे शरिया कायदे केले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्वâल, भारतीय महिला मंच या आणि यासारख्या संघटनांनाही समान नागरी कायदा हवा आहे. धर्मनिरपेक्ष एकात्मता निर्माण करण्यावर यांचा भर असतो. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी शास्त्रीय दृष्टिकोन, आधुनिक शिक्षण, कुरआनचा आधुनिक ज्ञानावर आधारित अर्थ लावण्यावर भर दिला होता.

पारसी, खिश्चन धर्मामध्येसुद्धा इस्लाम धर्माप्रमाणे दत्तक कायदा अस्तित्वात नाही. परंतु जुव्हेनाइल जस्टीस कायद्यान्वये सर्व धर्मीयांना कोणत्याही धर्माचे मूल दत्तक घेता येते. समान नागरी कायदा हा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नसून खिश्चन, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत, आदिवासी यांच्यासुद्धा पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून समान नागरी कायदा जबरदस्तीने थोपण्याचा प्रयत्न देशाच्या एकता आणि अखंडतेला विभाजन करणारा आहे.

‘लॉ कमिशन ऑफ इंडिया’ने १६ प्रश्नांची एक प्रश्नावली काढलेली होती. या प्रश्नांत अधिकाधिक प्रश्न मुस्लिमांशी संबंधित होते. सरकार एकीकडे लॉ कमिशनच्या माध्यमातून तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. सर्वोच्च न्यायालय तीन तलाक आणि बहुविवाह पद्धत बंद करण्याच्या दिशेने निर्णय घेऊ पाहात आहे. तलाक देण्याच्या मुस्लिम पतींच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. लग्न, तलाक, या गोष्टी धार्मिक आहेत. त्यामुळे हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नाही. भारतात प्रदीर्घ काळापासून सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. समान नागरी कायद्याला राष्ट्रीय एकात्मतेशी जोडणे अयोग्य आहे. गोळवलकर गुरुजी जे ज्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक होते त्या वेळी म्हणाले होते, ‘‘जे लोक समान नागरी कायद्याच गोष्ट करतात ते मूर्ख आहेत. या राष्ट्राला एकात्मतेची खरी गरज आहे, सारखेपणाची नाही.’’ निसर्गसुद्धा एकसारखा नाही. ऋतुसुद्धा एकसारखे नाहीत. दिवसाचे २४ तासांचे

वेळापत्रकसुद्धा एकसारखे नाही. मनुष्यप्राणी, सर्व वेगवेगळ्या जाती-कुळातील बनविले ईश्वराने, देशात वा जगात कोठेही विभिन्न श्रद्धा, धर्म, रुढीपरंपरा, रितीरिवाज, समाज पद्धती बनविल्या आहेत, त्यांना एकसारखेपणात आणणे कितीतरी अवघड आहे.

जर सरकारला काही करायचे असेल तर त्याने महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा. कोपर्डी आणि त्यासारखे अक्षम्य अपराध करणाऱ्यांवर शरई कायद्यानुसार कडक शिक्षा द्यावी. सच्चर कमिशनने मुस्लिमांसाठी केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात १५ टक्के आरक्षण लागू करावे, शिक्षणाच्या वाटा सुलभ कराव्यात. निर्दोष मुलांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांची हकनाक शिक्षा देऊन त्यांचे आयुष्य बरबाद करू नये. त्यांना मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या संधी नाकारू नयेत. स्त्रीभ्रूणहत्या कायदा कडक करावा.

प्रत्येक मुस्लिम ईश्वराने अवतरित केलेली जीवनव्यवस्था व मुस्लिम पर्सनल लॉला शरियतचा एक अविभाज्य घटक मानतो, तो मुस्लिम पर्सनल लॉचा विरोधक व समान नागरी कायद्याचा समर्थक कसा होईल? ईश्वराची कृपा आहे की याबाबतीत मुस्लिम जागृत आहेत. यामध्ये सर्व संघटनांचे मुस्लिम एकत्र आहेत. यामध्ये महिलासुद्धा आहेत. याचे उदाहरण म्हणजे स्वाक्षरी अभियान. याला सर्व थरांतील महिला आणि पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सर्व तळागाळातील लोक एका ठिकाणी एका वेळ लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहेत. आम्ही शरिया कायद्याबाबत पूर्णपणे समाधानी आहोत. कृपया यात काडीचाही बदल होणार नाही आणि तो बदलण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो बदलणे आम्हाला मंजूर नाही. सरकारने मुस्लिमांचा दृष्टिकोन योग्य प्रकारे जाणून घ्यावा. मुस्लिमेतर समाजाचे गैरसमज दूर करावेत. मीडियाने चुकीचा इस्लाम लोकांना दाखवू नये. सरकारने लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करावा जातीचे भांडवल, मतांचे भांडवल करून आपसांत गैरसमज न पसरविता गुण्यागोविंदाने सर्वांनी एकत्र राहावे, हीच आम्हा मुस्लिम जनतेची रास्त मागणी आहे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget