Latest Post

जानेवारीला संध्याकाळी लातूरमध्ये ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमे अंतर्गत भेटीगाठी घेत असतांना एक तरूण भेटला व म्हणाला, ’’मला व्यसन सोडायचे आहे, काही केल्या ते सुटत नाहीये. मला आश्चर्य वाटतं की मुस्लिम तरूण व्यसन करत नाहीत, त्यांना हे कसं जमतं? कृपया सांगाल का?’’

ही त्या सर्व प्रतिक्रियांपैकी उत्कृष्ट होती जी या मोहिमेअंतर्गत बहुसंख्यांक बांधवांशी भेटी दरम्यान दिली गेली होती. हा एक तरूण होता व व्यसन सोडू इच्छित होता. माझे सहकारी निसार सिद्दीकी यांनी त्याचे थोडेशे समुपदेशन केले पण तो घाईत होता. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देवून व आमचा भ्रमणध्वनीक्रमांक घेवून तो अंबाजोगाईरोडच्या गर्दीत लोप पावला. तो पुन्हा भेटेल न भेटेल ही गोष्ट अलाहिदा पण त्याने माझ्या मनामध्ये विचारांचे एक वादळ अलगद सोडले होते, एवढे मात्र निश्चित.

अभियानामध्ये सर्वप्रकारच्या नागरिकांच्या भेटी घेण्याचा योग आला. आम्ही निस्वार्थ भावनेने समाज हितासाठी लोकांना भेटत असल्याचे लक्षात आल्याने अनेक नागरिकांनी आमच्यासमोर मन मोकळे केले. लोकं भरभरून बोलली. सर्वांच्याच मनामध्ये स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल काळजी होती. त्यांच्या चेहऱ्यावर सामाजिक मुल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासाची चिंता स्पष्ट दिसत होती. नैतिक मुल्यांच्या ऱ्हासापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला कसे वाचवावे? हे त्यांना कळत नव्हते. एका पोलीस बांधवाने तर असे सांगितले की, ’’आम्ही समाजाचे रक्षण करतोय पण समाज आमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल, असे वाटत नाही.’’ 

समाज खालपासून वरपर्यंत नासत चाललेला आहे व ह्या नासण्याच्या प्रक्रियेपासून समाजाला वाचविण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये, हे ही खरे. कारण सरकार काही करत नाही. सेवाभावी संस्था, सांस्कृतिक संघटनांच्या लक्षात समाजाच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम व त्या दुष्परिणामाचा वाढता परीघ सर्वांनाच आपल्या कवेत घेईल. पुढच्या पिढ्यांना नासवत जाईल, ही बाब कोणाच्याच लक्षात येत नाहीये. ज्यांच्या लक्षात आलेली आहे ते हतबल आहेत. कारण ऱ्हासाची कारणे व्यवस्थेमधून निर्माण झालेली आहेत व मुठभर लोक व्यवस्थेशी लढू शकत नाहीत. म्हणून अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये अंधारातून प्रकाशाकडे ही मोहिम तुम्ही हातात घेतली व आशेचा एक किरण निर्माण केला, याचे समाधान अनेक लोकांशी बोलतांना दिसून आले. 

अभियाना दरम्यान, अनेक सामाजिक समस्यांना जवळून पाहता आले. या समस्यांमध्ये सर्व समाजघटक सारखेच पीडित आहेत. कोणी कमी आहे कोणी जास्त आहे एवढाच काय तो फरक. सर्वात मोठी समस्या तरूणांमध्ये अश्लील सामुग्रीच्या वाईट प्रभावाची आहे. ही समस्या आता विद्यापीठ, महाविद्यालयांतून झिरपत माध्यमिक शाळांपर्यंत येऊन पोहोचली आहे. पालक चिंतीत आहेत की, ऑनलाईन्नलासेससाठी मुलांच्या हाती मोबाईल देणे गरजेचे आहे परंतु त्या मोबाईलमधील अश्लील सामुग्रीच्या वाईट परिणामांपासून आपल्या मुला-मुलींना कसे वाचवावे, हे त्यांना कळत नाहीये. या सामुग्रीमुळे तरूणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांच्या लैंगिक अभिरूची आणि वर्तनामध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून देशातील स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून अ‍ॅड. कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरनेटरवरून अश्लिल सामुग्री हटवावी यासाठी जनहित याचिका क्र. 177/2013 दाखल केली होती. तेव्हा केंद्र सरकारने न्यायालयात शपथ पत्राद्वारे ही सामुग्री हटविण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले होेते. यावरून या समस्येचे गांभीर्य ओळखता येईल. तसेच या समस्येचा सामना नागरिकांना स्वबळावर करावा लागणार आहे,  ही  अपरिहार्यताही आता लक्षात घ्यावी लागणार आहे. केवळ अश्लिलताच नव्हे तर इतर सर्व अनैतिक कृत्यांपासून तेच लोक सुरक्षित राहू शकतील ज्यांच्या ’नफ्स’ (स्व)वर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. पण हे एवढे सोपे नाही. नफ्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. एका विशिष्ट पद्धतीने स्वतःचे मानसिक प्रशिक्षण करावे लागते. त्यासाठी जेवढी प्रभावशाली आचारसंहिता इस्लाम देतो तेवढी प्रभावशाली आचारसंहिता जगात दूसरी उपलब्ध नाही.

भेटीगाठी दरम्यान वर नमूद समस्येखेरीज अंधश्रद्धा, अज्ञानता, व्यसनाधिनता, भांडण-तंटे, स्वार्थ, विश्वासघात, गृहकलह, नात्यातील अविश्वास, भ्रष्टाचार इत्यादी जुन्या समस्यांसुद्धा कायम असल्याचा अनुभव आला. शिक्षणामुळे सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि पडणार देखील नाही, हे ही उमजले. कारण जगात शिक्षणाच्या नावाखाली जे काही शिकविले जाते त्यातून विद्यार्थी पैसा कसा कमवावा? याचे कौशल्य तर आत्मसात करतात मात्र नैतिक वर्तन कसे करावे? याचे कौशल्य आत्मसात करीत नाहीत. कारण त्यांना ते शिकवलेच जात नाही. माणूस म्हणून कसे वागावे? दुसऱ्यांच्या प्रती दया,करूणा, त्याग व निःस्वार्थ प्रेम  कसे करावे? यासंबंधीचे शिक्षण कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील नाही. नैतिक वर्तनाचे महत्त्व त्यांना शिकविले जात नसल्या कारणाने समाजाचे सरळ दोन भाग पडलेले आहेत. एक - शोषक व दुसरा- शोषित. 

भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगती साधता न आल्याने जो समाज तयार झालेला आहे त्यातील लोकांच्या जीवनात तणाव निर्माण झालेला आहे किंबहुना तणाव त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. जीवनशैलीच अशी विकसित झालेली आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धाश्रमातील वृद्धापर्यंत सगळ्यांना काही ना काही तणाव सोसावा लागत आहे. आरोग्यदायी समाजाचे हे लक्षण कदापि नव्हे. आज समाजामध्ये अनाचार माजलेला आहे. त्यातून समाजाचे नैतिक अधःपतन होवून त्याचा सर्वात जास्त फटका समाजातील स्त्रिया, मुले व अंतिम घटकाला बसला आहे व बसत आहे. 

आज साधारणपणे तरूण-तरूणी जैविक रूपाने तर आई-वडिल बनत आहेत परंतु आपल्या मुलांवर नैतिक संस्कार करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. कारण ते स्वतःच नैतिक मुल्यांनी रिकामे आहेत.  परिणामी मूल्यहीन पिढी अस्तित्वात येत आहे व त्यांची संख्या पिढीगणिक वाढत आहे. 

उपाय

शंभर टक्के आदर्श समाज कधीच अस्तित्वात येवू शकत नाही. तसे पाहता आदर्श समाज म्हणायचे कशाला? हे अगोदर ठरवावे लागेल. तर त्याचे उत्तर असे की, ज्या समाजामध्ये बहुसंख्य लोक सभ्य, दयाळू, निर्व्यसनी, शोषणमुक्त, प्रेमळ, त्यागी, दुसऱ्यांचे अधिकार देणारे, कमकुवत गटाचे रक्षण करणारे असतील तो समाज आदर्श. असा समाज निर्माण करण्यासाठी समाजामध्ये नैतिक मुल्यांची जोपासणा करणे अनिवार्य ठरते. तसे पाहता नैतिकतेला जगात सर्वच ठिकाणी चांगले समजले जाते. प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये नितीमत्तेचे उपदेश केलेले आहेत. परंतु वर्तनात नैतिकतेला प्रत्यक्षपणे लागू करण्याची जी परिणामकारक योजना इस्लाम देतो तशी दूसरी योजना जगात अस्तित्वात नाही. केवळ नैतिक आचरणाची महत्ता सांगितल्याने किंवा उपदेश केल्याने कोणताही समाज नैतिक होत नाही. इस्लाम त्यासाठी गल्लोगल्ली मस्जिदींची स्थापना करून दिवसातून पाचवेळा लोकांना त्यात बोलावून नमाजद्वारे तसेच रमजानचे 30 उपवास करवून घेऊन त्यांच्या अध्यात्मिकतेला बळ देतो. तेव्हा कुठे लोक नैतिक आचरणासाठी प्रोत्साहित होतात. तसेच अनैतिक आचरणातून मिळणारे लाभ सोडण्यास व नैतिक आचरणातून होणारे नुकसान सहन करण्यास तयार होतात. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला या उंचीवर आणले जाणार नाही तोपर्यंत आदर्श समाज निर्माण होणार नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीची जबाबदारी कोणा एका गटाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. फक्त एकच उदाहरण देवून थांबतो की आज समाजामध्ये वृद्धांची समस्या इतकी जटील झालेली आहे की, वृद्धाश्रमापलिकडे त्यावर उपाय जगाला सुचलेला नाही. पण ही समस्या मुस्लिमांमध्ये नाही. याची जगाला आश्चर्य कसे वाटत नाही, याचेच आश्चर्य वाटते.  

मुळात मुस्लिम समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी असणे, त्यांच्यात वृद्धांची समस्या नसणे, व्याजासारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आर्थिक आतंकवादापासून दूर असणे, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी असणे,कन्याभ्रुण हत्येचे प्रमाण नगण्य असणे या आणि यासारख्या अनेक गुण वैशिष्ट्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाचे आदर्श समाज निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या प्रिय देशाला महासत्ता बनवायचे असेल तर या आणि यासारख्याच आणखीन इतर गुणवैशिष्ट्यांना आपल्यामध्ये रूजवावा लागेल. त्याची सुरूवात आपल्या घरातून करावी लागेल. जेव्हा प्रत्येक घर अशा या गुणवैशिष्ट्यांनी संपन्न होईल तेव्हा आदर्श समाज आपोआपच निर्माण होईल आणि भारत नैतिकदृष्ट्या जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होईल, यात शंका नाही. जय हिंद. 

- एम.आय. शेख


Samarkand

एकेकाळी म्हणजे रशिया येथील झार बादशाहांच्या सत्तेपूर्वी समरकंद नामक एक लहानसा देश होता. त्यावर मुस्लिम सैन्यांनी चढाई करून ते जिंकले होते. त्या वेळी तिथे एक रहस्यमय धर्माचे लोक राहात होते. आपल्या देशावर मुस्लिम सैन्यांनी हल्ला करून काबिज केल्याने ते दुःखी आणि रागावले होते. त्यांनी आपसात ठरवले की आपल्याकडील एका प्रतिनिधीला दमास्कस येथील मुस्लिम राजवटीचे अमीर-उल-मोमिनीन यांच्याकडे पाठवून त्यांना विनंती करावी. मुस्लिम लष्कराने आम्हाला अंधारात ठेवून कसा आमचा देश काबिज केला याची त्यांना माहिती देऊ.

यासाठी त्यांनी आपला प्रतिनिधी दमास्कसला पाठवला. त्याला अशी चिंता लागली की त्या मुस्लिम जगताचे सर्वेसर्वा अमीर-उल-मोमिनीनकडे जायचे कसे? त्याआधी त्यांचे अधिराज्य आशिया, आफ्रिका, यूरोप खंडांमध्ये होते. अशा अधिपती शासनकर्त्याकडे जायची त्याला भीती वाटू लागली. बऱ्याच खोट्या गोष्टी त्या वेळी त्या राजवटीबाबत प्रसिद्ध होत्या. लहानसहान चुकांना माफ केले जात नाही. त्यांना न आवडणारी गोष्ट जरी त्यांच्यासमोर कुणी बोलली तरी त्याला शिक्षा दिली जात असे. तो या गोष्टींमुळे विचलित आणि भयभीत अवस्थेतच कसाबसा दमास्कस येथे पोहोचल्यावर शहराच्या अलीशान इमारती पाहताच त्याच्यावर आणखीनच धाक बसला. चालता चालता एका भव्यदिव्य इमारतीसमोर जाऊन उभा राहिला. लोक त्या इमारतीतून बाहेर पडत होते, तर काही लोक आतमध्ये जात होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. तो प्रतिनिधी त्या इमारतीला राजाचा महाल समजत होता. पण इतक्यात भव्या इमारतीवर कुणाचा पहारा नसल्याचे त्याला दिसले. लोक स्वतंत्रपणे ये-जा करत होते. हे पाहून तो अचंबित झाला.

त्या लोकांमधून तोही चालू लागला. काय करावे त्याला सुचत नव्हते. एका अनोळखी इसमानं त्याला विचारलं, “काय हवंय? का आलात? कोण तुम्ही?”

याचं त्याने लगेच उत्तर दिलं, “मला खलीफांना भेटायचे आहे.”

एवढं सांगून तो स्वत:च घाबरू लागला. आपल्याकडून काही चुकलं की काय खलीफांचं नाव आदराणं म्हणायचं होतं की काय? अशा विचारांनी भिऊ लागला.

यावर तेथील माणसानं त्याला विचारलं, “मी तुला त्यांचं घर दाखवलं तर तुला आवडेल का?”

तो प्रतिनिधी म्हणाला, “म्हणजे हा त्यांचा महाल नाही वाटतं!”

“नाही, ही तर मशीद आहे. तुम्ही नमाज अदा केली का?” त्या अनोळखी व्यक्तीनं विचारलं.

तो प्रतिनिधी म्हणाला, “नाही. मला नमाज काय असते याची कल्पना नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं त्याच्या धर्माविषयी विचारलं. तो प्रतिनिधी म्हणाला, “मी समरकंदच्या काहिन पुरोहित लोकांच्या धर्माचं पालन करतो. ते सांगतात तसं करतो. धर्म काय असतो आणि काय नसतो याची मला कल्पना नाही.”

“तुमचा विधाता पालनकर्ता कोण?”

असं विचारल्यावर त्या प्रतिनिधीनं उत्तर दिलं, “समरकंद येथील धर्मस्थळातील भयभित करणारे देवता.”

“मग तुम्ही काही मागितल्यावर ते देतात काय आणि आजारी प़डल्यावर बरे करतात काय?”

प्रतिनिधी म्हणाला, “मला काहीही माहीत नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं समरकंदच्या त्या रहिवाशाला इस्लामविषयी सर्व माहिती दिली आणि म्हणाला, “चला आता मी तुम्हाला खलीफांचं घर दाखवतो.”

मशिदीच्या दुसऱ्या दरवाजातून ते दोघे बाहेर पडले आणि समोर एक सामान्य माणसाच्या घरासारखं एक घर होतं. समरकंदचा नागरिक म्हणाला, “तुम्ही मला इथं का आणलं? इथं तर ते गृहस्त मातीपासून भिंत बांधण्याचं काम करत आहेत.”

यावर दमास्कसच्या त्या नागरिकानं सांगितलं, “होय. हेच खलीफा आहेत.”

समरकंदचा प्रतिनिधी म्हणाला, “तुम्ही माझी चेष्टा करताय.”

तो माणूस म्हणाला, “नाही. मी अजिबात चेष्टा करत नाही. हेच अमीर-उल-मोमिनीन आहेत.”

दरवाजावर हाक दिल्यावर खलीफा स्वतः बाहेर आले. समरकंदच्या नागरिकाला येण्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं, “आमच्या मर्जीविना मुस्लिम सैन्यानं आमच्या देशावर कबजा केलाय.”

हे ऐकल्यावर खलीफा यांनी एका कागदावर काहीतरी लिहून त्याला दिलं आणि म्हटलं, “हे पत्र तिथल्या राज्यपालांकडे द्या.”

बरेच दिवस चालत तो समरकंदला परतला. त्यानं आपल्या धर्मपंडितांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्वांना विश्वास नव्हता की असे काही घडू शकेल. ते पत्र देण्यासाठी तेथील लोक मशिदीत आले. आणखीन एक माणूस त्या मशिदीत आला. दुवळे व सामान्य माणसासारखे दिसणारे ते काझी होते. त्यांनी ते पत्र वाचलं आणि समरकंदच्या सत्ताधाऱ्यांना वोलाबून घेतले. तिथल्या धर्मपंडितांना आपला अहवाल त्यांच्यासमोर देण्यास सांगण्यात आलं.

तेव्हा ते धर्मपंडित म्हणाले, “यांनी आमच्या देशावर आमची संमती नसताना ताबा घेतला आहे.”

मग काझींनी मुस्लिम सत्ताधिकाऱ्याला विचारलं, “हे सत्य आहे काय?”

त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही. युद्ध धोक्याचेच नाव आहे.”

यावर काझींनी त्यांना विचारलं, “तुम्ही इथल्या लोकांना आधी इस्लाम ध्रम समजावून सांगितला होता काय?”

याचं उत्तर त्यांनी नकारार्थी दिलं.

काझींनी निर्णय दिला की मुस्लिमांनी या देशातून निघून जावे आणि त्यांचा देश त्यांना परत करावा.

नंतर मुस्लिम सैन्य तो देश सोडून बाहेर निघताना पाहून तिथल्या धर्मपंडितांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, “असा जर हा धर्म असेल तर आम्ही तो स्वीकारण्याची घोषणा करतो.”

त्यानंतर तिथले सर्व नागरिक इस्लामी राजवटीत सामील झाले.


(संदर्भ – मासिक ‘जिन्दगी’, दिल्ली, लेखक- शेख अली तनतानवी यांच्या उर्दू भाषांतरावरून)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)


माननीय अनस (रजि.) यांचे निवेदन आहे.

एकदा आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत होतो. त्या वेळी पाऊस पडू लागला. अनस (रजि.) यांचे कथन आहे की त्यावेळी पैगंबरांनी अंगावरील कापड काढले आणि ते पावसात भिजू लागले. आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आपण असे का केले?’’

पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘यामुळे की पावसाचे हे पाणी आताच त्याच्या रब (स्वामी) कडून आले आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘आपल्या अंगावरील कापड काढले’’ म्हणजे डोक्यावरील किंवा पाठीवरील कापड काढले. या हदीसनुसार कळते की दासाला आपल्या प्रभुच्या कृपेविषयी अत्यंत संवेदनशील असले पाहिजे. आमच्यासाठी आवश्यक आहे की प्रभुची ताजी कृपा आमचे ईमान व जाणिवांना ताजेतवाणे करोत आणि आमच्याकडून अभिव्यक्ती व्हावी - प्रकट व्हावे की आम्ही ईशकृपेचे प्रत्याशी आहोत. आम्ही कधीही आणि कोणत्याच स्थितीत ईशकृपेची उपेक्षा करू शकत नाही.

पावसाचे पाणी ईशयोजनेनुसार पडत असते. या योजनेत दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ चालत नाही, अल्लाहशी याचा प्रत्यक्ष संबंध आहे. ते पावसाचे निरामय थेंब सर्वथा पवित्र असतात. कारण ईशद्रोही व अवज्ञाकारीचे हात तोपर्यंत त्याला स्पर्श करत नाहीत. म्हणून पावसाच्या या प्रथमसरी अत्यंत समृद्धशाली असतात. त्यांना आपल्या शरीरावर घेणे एक शुभेच्छा व शुभ मनोभाव व्यक्त करणे आहे.



लेखक - ईरफान खलिली

भाषांतर - अता मुहम्मद

हा एक हदीससंग्रह आहे आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि वाईट व दुर्गुणांना दूर करावे.

यात मानवी जीवन सावरण्यासाठी इस्लामची शिकवण अगदी सरळ व सोप्या भाषेत प्रस्तुत केली आहे ज्यामुळे कृती सहज शक्य होते.

आयएमपीटी अ.क्र. 242   पृष्ठे - 112    मूल्य - 40 आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/mv4roroa1r9zl9ktoz5rzz0s6ls5p5jp







कल्पना करा की ’अ’ नावाच्या एका मुलीने वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतले. विद्यापीठातून अनेक पदव्या मिळविल्या. 31 व्या वर्षी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर तिची निवड झाली. खूप संपत्ती कमाविली. खूप प्रसिद्धी मिळाली. कंपनीच्याच एका सहकार्‍यावर प्रेम केले. 4 वर्षापर्यंत त्याच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिली. काही कारणांमुळे त्यांचे बिनसले आणि ब्रेकअप झाल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली. आई-वडिलांनी आग्रह केल्यामुळे त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर 38 व्या वर्षी लग्न केले. 40 वर्षी आई झाली. तिला एक गोंडस मुलगी झाली. पण कंपनीमध्ये नियमित प्रमोशन होत असल्यामुळे कामाच्या जबाबदार्‍या वाढल्या. म्हणून पुन्हा-पुन्हा आई होण्याचा नैसर्गिक अधिकारी तिने स्वैच्छेने नाकारला. आयुष्यभर सातत्याने काम करत असल्यामुळे मुलीला फारसा वेळ देता आला नाही मात्र तिला पंचतारांकित शाळा आणि महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण तिने दिले. पण मुलगी पुढे चालून तिचे ऐकेणासी झाली. दरम्यान ज्याच्याशी लग्न झाले त्याला तिच्या लिव्ह इनची गोेष्ट कळाली. म्हणून त्याने तिला सोडून दिले. मग ती परत एकटी झाली. कंपनीमध्ये काम करत असतांना कधी-कधी सोशल ड्रिंकिंग करावी लागत असे. एकटी झाल्यामुळे नियमित दारू पिऊ लागली. घर, गाडी, पैसा, कार सर्वकाही मिळाले. पण मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाबरोबर पळून गेली. तब्बल 30 वर्षे तिला एकटे रहावे लागले. नातवंड नसल्यामुळे तिने कुत्रा आणि मांजर पाळले आणि शेवटी मेली. 

याउलट तिच्याच सोबतच्या ’ब’ नावाच्या एका मुलीचे 20 वर्षे संपताच पदवी पूर्ण होताच आई-वडिलांनी चांगले स्थळ पाहून लग्न लावून दिले. ती सासरी गेली. तिला तीन मुलं आणि एक मुलगी झाली. तिने मन लावून संसार केला. मुलांवर चांगले संस्कार केले. त्यांना भरपूर वेळ दिला. त्यांना व्यवस्थित शिक्षण दिले. त्यांचा रोजचा गृहपाठ व्यवस्थित करवून घेतला. सामान्य शाळा, महाविद्यालयात शिकूनही तिची सर्व मुलं उच्चविद्याविभूषित झाली. मुलगी सुंदर व संस्कारी असल्यामुळे चांगले स्थळ चालून आले. जावई आयएएस मिळाला. फुकटात लग्न झाले. तिन्ही मुलं लायक निघाली. एक भारतीय सेनेत अधिकारी, दूसरा खाजगी कंपनीत सीईओ तर तीसरा शिक्षक झाला. तिच्या उतारवयात तिला आणि तिच्या पतीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा सुरू झाली. उतारवयात नातवंडांचे भरपूर प्रेम मिळाले आणि काही वर्षानंतर ती सुद्धा वारली.

आपले डोळे बंद करा ! एक खोल श्‍वास घ्या आणि आपल्या हृदयावर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा कोणाचे आयुष्य यशस्वी झाले? ’अ’ चे का ’ब’ चे? या ठिकाणी ’अ’ ने जी जीवनशैली स्वैच्छेने स्वीकार केली ती पाश्‍चीमात्यांची जीवनशैली आहे. जिचा आज बहुतेक महिलांनी अंगीकार केलेला आहे. ’ब’ ची जीवनशैली इस्लामी तसेच प्राचीन भारतीय जीवनशैली आहे. ज्याचा त्याग आजच्या मुली करत आहेत. 

आजकाल ’भाग बिन्नी भाग’ नावाची एक तद्न फालतू वेबसेरीज नेटफ्लिक्स या ओटीटी (ओव्हर-द-टॉप मीडिया सर्व्हिस) प्लेटफॉर्मवर आली असल्याचे व त्यात ’अ’ ने अंगीकारलेल्या जीवनशैलीचे महिमामंडन केल्याचे त्या वेबसिरीजच्या समिक्षण अहवालावरून समजले. नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लेटफॉर्मसनीं आता सिनेथिएटर्सची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून, सर्व प्रकारचे कौटुंबिक बंधन झुगारणे म्हणजेच मुक्त जीवन जगणे असा साधा हिशोब हे लोक तरूण मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात यशस्वीसुद्धा होत आहेत. 

ह्या सर्व वेबसिरीज आणि इतर दृकश्राव्य माध्यमातून लोकांना नैतिक बंधन मुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यामागे फार मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. हॉलीवुड, टॉलीवुड, बॉलीवुड, फॅशन उद्योग, संगीत दारू, उद्योग इत्यादीमध्ये जगभर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि हे उद्योग कायम नफेत रहावेत म्हणून हे लोक सर्व माध्यमातून मुक्त जीवनशैलीचे महिमामंडन करत असतात. अवघं जग यांनी कवेत घेतलेले आहे. यांच्यासमोर इस्लामी जीवनशैली वगळता कोणत्याच जीवनशैलीचे आव्हान नाही. म्हणून शक्य त्या मार्गाने इस्लामची बदनामी करून तरूणांना त्याच्या शीतल, सरळ, स्वच्छ आणि नैतिक जीवनापासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न हे लोक करत असतात. कधी दाढी, कधी टोपी, कधी तीन तलाक, कधी बुरखा, कधी खोटा आतंकवाद वगैरे निवडक विषय घेऊन माध्यमातून चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणतात. कधी आपण पाहिले का की व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचे कल्याणकारी परिणाम ? इस्लामच्या नैतिक शिक्षा काय आहेत? जकातमुळे गरीबी कशी दूर होऊ शकते? परद्यामुळे महिलांचे संरक्षण कसे होते? इत्यादी विषयावर कोणी चर्चा घडवून आणल्याचे? कधीच नाही. याचं कारणच हे आहे की, हे लोक चांगल्या प्रकारे जाणून आहेत की, या विषयांवर चर्चा घडवून आणणे म्हणजे आपल्या अनैतिक उद्योगांचा स्वतःच्या हाताने गळा दाबणे होय? इस्लामला चुकीच्या पद्धतीने पोट्रेट करून जगासमोर मांडल्यामुळे सामान्य माणसं विशेषतः तरूण वर्ग फसतो आणि इस्लामपासून लांब जातो. पण अलिकडे ज्या समाजमाध्यमाच्या मार्फतीने हे लोक इस्लामची बदनामी करत आहेत त्याच माध्यमातून इस्लामचा खरेपणा लोकांच्या लक्षात येतो आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. 

या ओटीटी प्लेटफॉर्मवरून महिला व मुलींना स्वातंत्र्य आणि प्रगतीच्या नावाखाली अनैतिक जीवनाकडे आकर्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर इस्लाम हा   महिला आणि मुलींना कशा जीवनशैलीकडे बोलावितो हे पाहणे उद्बोधक ठरणार आहे. तर चला पाहूया थोडक्यात इस्लामच्या नजरेतून स्त्रीकडे. 

इस्लामच्या नजरेतून स्त्री

इस्लामच्या दृष्टीकोणातून पुरूषांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगा, भाऊ, पती आणि बाप, तसेच महिलांच्या जीवनाचे चार भाग आहेत. मुलगी, बहिण, पत्नी आणि आई. इस्लामने महिलांना अर्थाजनाच्या जबाबदारीतून पूर्णपणे मुक्त करून मानववंशाला जन्म देण्याची आणि त्यांच्या संवर्धनाची पुरूषांपेक्षाही महत्त्वाची जबाबदारी सुपूर्त केलेली आहे. अर्थार्जनांची संपूर्ण जबाबदारी पुरूषांची आहे. भौतिक कामं करून अर्थाजन करण्याची महिलांना जरी मुभा असली तरी ती त्यांची जबाबदारी नाही. महिलांच्या आयुष्यातील चारही टप्प्यात पुरूषांनी त्यांच्याशी कसे वागावे याची आचारसंहिताच शरीयतने ठरवून दिलेली आहे. कोणताही श्रद्धावान मुस्लिम पुरूष त्याबाहेर जाण्याचे धाडस करूच शकत नाही.

  महिलांचे सर्वात आदराचे पद हे गृहिणी पद होय. यापेक्षा महत्त्वाचे पद जगात दुसरे नाही. महिलांना स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी एवढे कारण पुरे आहे की, प्रत्येक पुरूष जन्मताच त्यांच्या कृपेवर विसंबून असतो. गृहिणी या पदाचे महत्त्व कमी करून दाखविणे हा ओटीटी प्लेटफॉर्म तसेच प्रत्येक दृकश्राव्य माध्यमांचा प्रमुख हेतू आहे. गृहिणी म्हणून जे काम महिला करतात ते कसे तुच्छ आहे व घराबाहेरची कामे किती सन्मानजनक आहेत हे त्यांच्याच नव्हे तर पुरूषांच्याही मनावर बिंबविले जाते आणि मुर्खासारखे समाजातील अनेक अज्ञानी लोक गृहिणींना कमी दर्जाच्या तर कामकाजी महिलांना श्रेष्ठदर्जाच्या (महिला) समजण्याची चूक करतो. हा गैरसमज इतका व्यापक आणि खोल रूजलेला आहे की, स्वतः गृहिणी असणार्‍या महिला हे श्रेष्ठ काम करत असूनसुद्धा स्वतःला कामकाजी महिलांच्या तुलनेत कमी लेखू लागतात. 

स्त्री-पुरूष दोघे समानतेचा अर्थ

1. इस्लाममध्ये पुरूषापेक्षा स्त्रीला तिप्पट अधिक महत्त्व दिलेले आहे. स्त्री-पुरूष समानतेचा अर्थ असा बिल्कुल नाही की दोघे सारखेच आहेत. दोघांची शारिरिक रचनाच नव्हे तर मानसिक रचनासुद्धा वेगवेगळी आहे. म्हणून जबाबदार्‍यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. उदा. एका स्त्रीला दोन मुले आहेत. एक आठ वर्षाचा आणि दूसरा एक वर्षाचा. तिला दोन्ही मुलं समान आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की ते दोघे सारखे आहेत. ती स्त्री मोठ्या मुलाला जेवण तर लहान मुलाला दूध देणे म्हणजे दोघांमध्ये भेदभाव करते असे नाही. 

2. स्त्रीयांना दर महिन्याला मासिक पाळी येते. त्यांना गर्भधारणा होते आणि या काळात त्यांना एका लांब कालावधीपर्यंत आराम करण्याची गरज असते. कामकाजी महिलांना ते शक्य होत नाही. मॅटर्निटी लिव्ह मिळते पण ती पुरेशी नसते. त्यामुळे काम करणार्‍या महिला ह्या पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या अधिकाराचा स्वेच्छेने त्याग करतात. 

3. काम करणार्‍या महिलांना कार्यालयीन काम करावे लागते. तसेच सोबतच्या सहकार्‍यांच्या आणि वरिष्ठांच्या लैंगिक प्रस्तावांचा सामना करावा लागतो. परत आल्यानंतर घरचे कामही करावे लागते. येणेप्रमाणे त्यांना तिहेरी ओझे घेऊन जीवन जगावे लागते. प्रसिद्ध अमेरिकन लेखक लिसा बेलकीन यांच्या 2003 साली आलेल्या पुस्तकामध्ये ज्याचे नाव ’ए लाईफ वर्क कन्फ्युजन ऑफ अ‍ॅन अनबॅलन्स्ड मॉम’ मध्ये लेखिकेने लिहिलेले आहे की, ”काम करणार्‍या महिलांचे जीवन द्विधेमध्येच संपून जाते. त्या पूर्णपणे बाहेरील कामही करू शकत नाहीत आणि घरच्या जबाबदार्‍याही पूर्णपणे पार पाडू शकत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वतःचेही जीवन ते मुक्तपणे जगू शकत नाहीत. 

4. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुरूष असल्यामुळे व त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा लागत असल्यामुळे जीवनामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते आणि नकोती नाती निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात होतात. ज्याचा अंत साधारणपणे गुन्हेगारीमध्ये होतो. 

5. जर स्त्रीही थकून भागून घरी येत असेल आणि पुरूषही थकून भागून घरी येत असेल तर कोण कोणाला सांभाळणार? कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”आणि त्याच्या संकेतचिन्हापैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात”(सुरे ः अर्रूम आयत नं. 21)

6. आई-वडिल दोघेही काम करणारे असतील तर मुलांच्या संगोपनावर त्याचा नक्कीच विपरित परिणाम होतो. मुलांच्या सांभाळासाठी जरी मेड ठेवली तरी तिला आईची सर येत नाही, हे कोणालाही मान्य करावे लागेल. 

7. दोघेही काम करणारे असतील तर घरात असणार्‍या वृद्धांच्या गरजांकडे कोणीच लक्ष देऊ शकत नाही. हेच कारण आहे की, वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

हे सत्य आहे की, प्रत्येक काळामध्ये समाजामध्ये काही स्त्रिया अशा असतात ज्यांचा कामकाज केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होत नाही. अशा महिलांना सुरक्षित वातावरणात काम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांना शोभेल, साजेल आणि झेपेल अशा क्षेत्रांना चिन्हीत करून त्यामध्ये त्यांना 100 टक्के आरक्षण देउन, सन्मानाने जगण्याचा हक्क देता येतो. परंतु अनुभव असा आहे की, प्रत्येक क्षेत्रात महिलांना सामावून घेउन एक प्रकारे त्यांच्यावर अत्याचाराच केला जातो.  

इस्लाम अगदी याविरूद्ध तत्वज्ञान सादर करतो. तो स्त्रीला घरात केंद्रीय भूमिका देवून तिच्या अवतीभोवती घरातील प्रत्येक सदस्याला फिरविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे घरातील स्त्री ही प्रमुख भूमिकेत येते व घरातील इतर सदस्य तिच्या परिघाभोवती फिरत असतात. अर्थाजन घरचा पुरूष व गृहव्यवस्थापन घरची स्त्री या दोहोंचा जोड एवढा गच्च बसतो की त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट नागरिक निपजतात व समाजाला उत्कृष्ट कुटुंब व्यवस्था मिळते. परिणामी, समाज सृजनशील होतो व देशाची सर्वांगीण प्रगती होती. 

लक्षात ठेवा मित्रानों ! जगात कधीच, कुठेच दुराचार्‍यांची नेतृत्वाखाली सदाचारी समाजव्यवस्था अस्तित्वात आलेली नाही. आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी आदर्श स्त्री-पुरूष लागतात व आदर्श स्त्री-पुरूष आदर्श कुटुंबातून येतात व आदर्श कुटुंब उत्तम लग्नव्यवस्थेद्वारे निर्माण होते. या व्यतिरिक्त जेवढ्या व्यवस्था आहेत त्या सर्वांमध्ये शेवटी नुकसान महिलेचे होते. कुटुंब व्यवस्थेला फॅशन उद्योगाच्या नफ्याखातर बदलण्याचे षडयंत्र वेळीच ओळखले नाही तर उध्वस्त कुटुंब व्यवस्था, मनोरोगी वृद्ध, लिंगपिसाट पुरूष, बलात्कारी तरूण, लज्जाविरहित स्त्रिया आणि मुल्यहीन समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राहत नाही. जी सर्वांसाठीच हानिकारक असते. 

बुद्धिवादी लोकांनी तरी किमान इस्लामने समाजामधील महिलेचे स्थान जे ठरवलेले आहे ते किती उत्कृष्ट आहे, याचा पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा जरूर अभ्यास करावा. जय हिंद !


- एम.आय.शेख



प्रत्येक वेळेस, पावला- पावलावर आर्थिकरित्या कमकुवत लोकांना पैशाची आवश्यकता असते. जे जेव्हा कुणाला पैशाची मागणी करतात, तेव्हा एक दोघांचा अपवाद सोडल्यास इतर त्याला सावकाराकडे जाण्याचा सल्ला देतात. याच व्याजाच्या चक्रात फसून तो आपल्या गरजा पूर्ण करतो. याप्रकारे सावकारी पद्धत सभ्य समाजात रुढ झालेली आहे. खरे पाहता सभ्य समाज आणि व्याजाची व्यवस्था एकमेकांच्या विरोधी आहे. एकाचे प्रभुत्व दुसर्‍यासाठी मृत्युचा संदेश आहे. या दोन परस्परविरोधी बाबींमध्ये कधीच सामंजस्य असू शकत नाही. जे व्यक्ती आणि समाजावर व्याज प्रणालीचे प्रभुत्व असते ते नेहमीच वास्तविक सुख आणि समृद्धीपासून वंचित असतात. त्यांच्यावर ईश्‍वर आपली कृपादृष्टी ठेवत नाही. असा समाज तक्रारीच्या आगीत जळत असतो. अशा ठिकाणी माणसं माणसाविषयी सहानुभूती ठेवण्याऐवजी एकमेकांचे रक्त शोषण्यात व्यस्त असतात. यालाच ते आर्थिक सफलता समजतात. लोकांचा असा विश्‍वास आहे की, जर ही व्यवस्था बंद केली तर जगाचे आर्थिक चक्र थांबून जाईल.  

आश्‍चर्यांची बाब ही की, 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 पर्यंत अमेरिकेच्या बर्टन वूड शहरातील माऊंट वॉशिंगटनमध्ये बँकींग व्यवस्थेवर कॉन्फ्रन्स घेण्यात आली. यामध्ये 44 देशांच्या 730 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यांचा उद्देश जगात वैश्‍विक वित्तीय व्यवस्था कशी लागू करावी यावर विचार करणे हा होता. त्यावेळेव व्याजाधारित आर्थिक व्यवस्थेस मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ती जगात लागू करण्यात आली. या वैश्‍विक कराराअंतर्गत एक बँक सुरू करण्यात आली, तिचे नाव ’इंटरनॅशनल बँक ऑफ सेलटमेन्ट’ ठेवण्यात आले. प्रत्येक देशासाठी कागदाचे एक चलन अनिवार्य करण्यात आले. कागदावर सुंदर चित्र छापून त्या चलनाचे मुल्य निर्धारित करणे याचा मुख्य उद्देश होता. कागदाचे मुल्य एक रुपयापासून तर पाच हजार रुपयांपर्यंतच्या वास्तविक स्विकार्हता होऊन जाते.

व्याजाच्या वापराने आपल्या शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. सावकारांच्या उन्मुलनाला सोप्या पद्धतीने समजने फार कठीन आहे. मनुष्याचे अस्तित्व फक्त भौतिक नसून नैतिक सुद्धा आहे. व्याज मनुष्याला स्वार्थी, कठोर हृदयी आणि निर्दयी बनवितो. त्याला पैसे आणि संसारिक लोभी बनवितो. व्याज मनुष्याला समाजातील पिडित व्यक्तींप्रति नैतिक जबाबदारीतून मुक्त करतो. आपल्या परिघात तो गतीहीन जीवन जगण्यास बाध्य करतो. यामुळे सेवा, सहकार्य, आपलेपणाचा स्वभाव नष्ट होत आहे़  आज या भौतिकता आणि पुंजीवादामुळे अतिथी सत्कारातही चहाचा कप सुद्धा व्याजाच्या दुष्प्रभावामुळे मागे ओढला जात आहे. कुणालाही जराशी सवड किंवा वेळ नाही की, आसपासच्या वातावरणाची समीक्षा करावी. आपला गरीब शेजारी, असहाय्य लोक किती समस्यांचा सामना करीत आहे हे बघायलाही वेळ नाही, ह्या सर्व जणू जुन्या गोष्टी झाल्या आहेत.

त्याच्यावर मायेची चादर टाकणारा कुणी नाही. त्यामुळेच आज गल्लोगल्ली सावकारांचे जाळे पसरले आहे, जे एखाद्या जळू प्रमाणे छोट्या राशीच्या मोबदल्यात व्याजावर व्याज चढवून अवैध वसूली करीत आहेत. हे सर्व होत असतांना समाज मात्र तंद्रीत गेल्याप्रमाणे वागतांना दिसतो, 

कर्जदारांमध्ये असेही लोक असतात जे हातावर आणून पानावर खाणारे आहेत. आपल्या परिवाराचे कसेबसे पालन पोषण करणार्‍या या लोकांवर कर्जाची परतफेड करण्याची मोठी जबाबदारी सुद्धा असते. मात्र यांना या संकटातून मार्ग दाखविणारा व यातून बाहेर काढणारा कुणीच नसतो. चांगल्या लोकांचे उदाहरण तसेच आहे ज्यात स्वयं दु:खात असतांना दुसर्‍याची मदत केली जाते. इतकेच नाही तर मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, मोठे व्यापारी, उद्योगपती आणि उद्योग यांचाही कर्जाशी जवळचा संबंध असतो. विविध उद्योग आवश्यकतेच्या नावावर कर्जाचे आदान प्रदान हा कर्करोगाप्रमाणे असाध्य रोगाचे रूप धारण करीत आहे. व्याजावर आधारित कर्ज प्राप्तीसाठी संगठित व सशक्तपणा बघायला मिळतो. व्याजासाठी नवनव्या आकर्षक योजना बघायला मिळतात. बोटांवर मोजता येणारे पुंजीपती या कर्ज व व्याजाच्या योजनांवर नियंत्रण ठेऊन आहेत. जेव्हा की हेच मोठे लोक कर्ज किंवा व्याज न देता अत्यंत सहजपणे ‘पळ’काढतात. त्यांना न्यायाच्या कठड्यात उभे करणे कठीन होऊन जाते. जेव्हा की अशाच वेळी गरीबांची बेआब्रु केली जाते.

देशात कर्जदरांना जीवंत राहणे कठीन झाले आहे व या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात अनेक क्षेत्र असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात. कर्जावरील व्याज आणि मुद्दल रक्कम परत न करण्याच्या परिस्थितीने पिडित व निराश व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडतो आहे आणि आपल्या कुटुंबाला समस्येच्या मार्गावर नेऊन सोडतात. अशी स्थिती सामान्य नागरिक, शासनकर्ते, राजकीय व्यक्ती, व्यापारी, शिक्षित आणि बुद्धिजीवी यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशातही सरकार आणि राजकारणातील जादूगर सहानुभूती आणि मानवतेचे ढोंग करण्यात मागे राहत नाही.

धर्मग्रंथानुसार आपल्याला शक्यतोवर कर्जापासून स्वत:ला वाचवायला हवे, मात्र आजच्या भौतीकतावादी युगात जीवनातील गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. यात बँकेकडून घेण्यात येणार्‍या आणि इतर माध्यमातून घेण्यात येणार्‍या कर्जाचा समावेश आहे. ‘लोन’ किंवा कर्ज घेण्यात काहीच वाईट नाही, मात्र जर कर्ज घेणार्‍याकडून कर्जाचे हप्ते फेडण्यात उशीर होत असेल, किंवा त्याला कर्जाचा परतावा करण्यात अडचण येत असेल, अशा परिस्थितीत कर्ज घेणार्‍याकडून व्याजाच्या रकमेची मागणी करणे हे माणवतेला कलंकित करणारे आहे.

वैदिक काळ प्राचिन भारतीय संस्कृतीचा एक कालखंड आहे. याच काळात वेदांची रचना करण्यात आली. हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर भारतात अनेक नवीन संस्कृतींचा जन्म झाला. वेदातही कर्जावर व्याज घेणार्‍यांचा उल्लेख ‘व्याजखाणारा’ असा करण्यात आला आहे. वेदातही व्याजाला वर्जीत ठरविण्यात आले. ‘जास्त धन प्राप्तीच्या लोभात, पैसे उधार देणार्‍याकडून संंबधित धन ईश्‍वरही हिसकावून घेतो’ (ऋग्वेद - 3:53:14).

बायबलच्या नियमांच्या आधारावर ख्रिस्ती धर्मातही व्याज घेण्याची निंदा करण्यात आली आहे. 1179 पासून व्याज घेणार्‍याला बहिष्कृत करण्यास सांगण्यात आले होते. कॅथलिक चर्च नुसार व्याज खाने निषिद्ध समजण्यात आले आहे. बायबल मध्ये व्याजाचा विरोध पुढील प्रमाणे केला आहे़ ‘तू आपल्या भावांना व्याजावर कर्ज देऊ नको, ते भोजन असो, पैसा असो किंवा इतर वस्तू असो.’ (बायबल अनुवाद व्यवस्था विवरण 23:19).

कुरआनमध्ये व्याजाला वर्जित ठरविण्यात आले आहे. ‘आणि जे लोक व्याज खातात, ते त्याच प्रकारे उठतात जसे तो व्यक्ती उठतो ज्याला सैतानाने हात लावून बावळट केले आहे, आणि ते म्हणतात व्यापार हा व्याजाप्रमाणेच आहे.’ जेव्हा की अल्लाहने व्यापाराला वैध आणि व्याजाला अवैध ठरविले आहे. अंतत: ज्याला त्याच्या ईश्‍वराकडून चांगला मार्ग मिळाला आणि तो सुधरला, तर जे काही त्याने आधी घेतले होते ते त्याच्याजवळ राहिले आणि नंतर निर्णय अल्लाह करणार. मात्र जो सुधरला नाही आणि पुन्हा तेच व्याज घेण्याचे कार्य केले तर त्याला नरकातील आग मिळेल, व ते नेहमी त्या आगीत राहतील. (कुरआन 2:275).

इस्लामच्या दृष्टीने व्याजाच्या निंदेसंदर्भात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांचा राग बघितल्यानंतर, इस्लामला मानणार्‍या कुणालाही ही परवानगी नाही की तो एका क्षणासाठीही प्रामाणिकपणा, अंतरात्माची हत्या करणार्‍या आणि बंधुभावाचा वैरी असणाजया व्याजाला सहन करेल.


- डॉ. एम.ए. रशीद 

(नागपूर) 



माननीय अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वर्ग (जन्नत) आणि याचप्रमाणे नरक (जहन्नम) सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या चपलांच्या तळव्यापेक्षासुद्धा त्याच्या अधिक जवळ आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे स्वर्ग व नरक यांना लांब समजून बसू नका. ते तर तुमच्या अतिनिकट आहेत. जन्नत (स्वर्ग) मधील देणग्या आणि त्यातील सुख-समाधान तसेच नरकातील आपत्ती, कष्ट इ. सर्वांचा आमच्या आचार-विचारांशी घनिष्ट संबंध आहे. आमचे कर्म व विचारांमुळेच आमचे जीवन स्वर्ग बनेल अथवा नरक बनेल. आमचे कर्म हे आमच्यापासून दूर व विलग असत नाही. कर्मानुसार आमचे अस्तित्व व व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते. कर्म जर सदाचारी व ईशपरायणशील असतील तर आमची जन्नत (स्वर्ग) आमच्यापासून काहीच दूर नाही. अथवा याच्या विपरित आमचे चारित्र्य व कर्म असतील आणि त्यामुळे प्रभु-स्वामीला आम्ही इतर काहीr समजू लागतो आणि तो जीवनमार्ग स्वीकारून बसतो जो मार्ग प्रभुला अप्रिय आहे. अशा स्थितीत आम्ही जन्नतऐवजी नरकाशी (जहन्नम) दृढ संबंध स्थापित करून बसलेलो असतो.


माननीय हुजैफा (रजि.) यांचे कथन आहे.

‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखादे वेळी काही संकटांना सामोरे जावे लागले तर नमाज अदा करू लागतात.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

हे यासाठी की दासासाठी सर्वांत मोठा आधार त्याचा प्रभु-स्वामी आहे. ईशसान्निध्याव्यतिरिक्त अन्य कोणते दुसरे शरणस्थळ असूच शकत नाही.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget