Latest Post


मजबूत समाज हे मजबूत कुटुंबाच्या समुच्चयाचे नाव आहे. मजबूत कुटुंब मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत लोकांमुळे बनते आणि असे लोक ईशपारायणतेच्या माध्यमातून घडतात. जगात असे कुठेच आणि कधीच घडले नाही की मजबूत समाज हा व्यसनाने पोखरलेल्या दुराचारी लोकांमुळे अस्तित्वात आला. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वाखाली सातव्या शतकात जरूर एक मजबूत समाज अस्तित्वात आला होता. पण त्यांच्यानंतर हळूहळू तो समाज लोप पावत गेला. परंतु, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या प्रक्रियेद्वारे अरबांसारख्या रानटी समाजाचे रूपांतरण नैतिकदृष्ट्या मजबूत समाजात केले होत. ती प्रक्रिया शरीयतच्या रूपाने आज देखील अस्तित्वात आहे. स्वतः मुस्लिम समाज बऱ्यापैकी शरियतवर आचरण करत असल्यामुळे त्यांची कुटुंब व्यवस्था इतरांच्या तुलनेत मजबूत आहेत. म्हणूनच की काय मुस्लिम तरूण-तरूणी यांच्यामध्ये आत्महत्येसारख्या आत्मघाती कृत्यापासून ते व्यसनाधिनतेचे व अश्लिलतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

मात्र अलिकडे प्रगतीच्या नावाखाली जो काही भौतिकवाद समाजामध्ये बोकाळत चाललेला आहे त्यातून स्वार्थी समाज आकारात आलेला आहे. कुटुंबाचे अस्तित्व संकटात सापडलेले आहे. कुटुंबाला पर्याय म्हणून लीव इन रिलेशनशिपसारखी स्त्रियांवर अत्याचार करणारी अनैतिक पद्धत मोठ्या शहरात सुरू झालेली आहे. नव्हे रूढ झालेली आहे. पण ही पद्धत मजबूत कुटुंब तर सोडा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या नात्याला सुरक्षासुद्धा पुरविण्यास सक्षम नाही. इस्लामच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे जबाबदारी, नात्यांचे रक्षण होय. म्हणूनच शरियतने वैध लग्नाशिवाय इतर पद्धतीने अस्तित्वात येणाऱ्या कुटुंबांना निषिद्ध ठरविलेले आहे. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत अस्लम गाझी यांच्या मते मानवसमाजाचे सर्वांग सुंदर चित्र कुटुंबाच्या परिघामध्ये दिसून येते. यात पती-पत्नीचे एकमेकावरचे प्रेम, आई-वडिलांची कृपा, धाकट्यांवर प्रेम, मोठ्यांचा सन्मान, कुटुंबातील विवश किंवा दिव्यांग लोकांची मदत, वृद्धांचा आधार, अडी-अडचणींमध्ये एकमेकांच्या कामाला येणे, सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, आनंद आणि दुःखाच्या क्षणात एकत्र गोळा होणे. थोडक्यात असे कुटुंब म्हणजे छोटा समाजच असतो. हा छोटा समाज जेवढा मजबूत आणि सुंदर असतो तेवढाच मोठ्या समाजासाठी उपयोगी आणि मदतीचा असतो. मानवी गरजा ह्या झुंडीतून पूर्ण होत नाहीत. त्यांना पूर्ण करण्यासाठी पावलो-पावली नातेवाईकांची गरज पडते. आणि मजबूत कुटुंबातूनच मजबूत नाती निर्माण होतात. ज्याप्रमाणे वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या क्षमतेचा कस लागतो तसाच संकटाच्या समयी कुटुंबातील सदस्यांचा कस लागतो. कुटुंब मजबूत असेल तरच एकमेकाच्या सहकार्याने कुटुंबातील सदस्य त्या संकटावर मात करतात. नाती ही माणसाची मुलभूत गरज आणि अधिकार दोन्ही आहेत. ते आनंद आणि दुःख दोन्ही समयी उपयोगाला येतात. मात्र अलिकडे कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असतांना पाहतांना दुःख होते. 

ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळांपासून तुटल्यावर वाळून जाते त्याचप्रमाणे कुटुंबाचे सदस्य कुठल्याही कारणांमुळे कुटुंबापासून लांब गेल्यामुळे वाया जाण्याची शक्यता वाढते. आज अनेक तरूण मुलं-मुली उच्च शिक्षणाच्या निमित्ताने आपले कुटुंब सोडून मोठ्या शहरात किंवा विदेशामध्ये राहतात. तेथे त्यांच्यावर कुटुंबाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा मुलां-मुलींचे पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. कुटुंब हे समाजाचे मूळ घटक आहे म्हणून होता होईल तितके हे मजबूत कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. 

’’आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली,निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (सुरे अर्रूम : आयत नं. 21)

कोणत्याही श्रद्धावान कुटुंबाची सुरूवात एका मुलाच्या लग्नाच्या प्रस्तावाला एका मुलीने होकार दिल्याने होते. या प्रक्रियेद्वारे दोन कुटुंब एकत्र येतात आणि तिसऱ्या एका नवीन कुटुंबाची पायाभरणी होते. इस्लाममध्ये लग्नाची आवश्यकता पतीने पत्नीपासून संतोष प्राप्त करावा, या प्राथमिक हेतूने केलेली आहे. ज्याचे संकेत वर नमूद आयातीमध्ये दिलेले आहेत. याशिवाय, मानव वंशाचा विस्तार कुटुंब व्यवस्थेतून अपेक्षित आहे. वर नमूद आयातीमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेम आणि करूणा ही ईश्वरीय देणगी आहे. या मजबूत पायावर एका नवीन कुटुंबाची सुरूवात होते आणि लवकरच त्या कुटुंबामध्ये मुलांच्या स्वरूपात नवीन सदस्यांचा प्रवेश होतो. सुरूवातीला दोघांवर आधारित असलेले कुटुंब पुढे विस्तारत जाते आणि स्वतंत्र कुटुंबाचे स्वरूप धारण करते. या कुटुंबातून चांगले चारित्र्यवान आणि सभ्य स्त्री-पुरूष निर्माण होणे आवश्यक असते, असे तेव्हाच शक्य असते जेव्हा कुटुंब नावाची ही प्राथमिक ईकाई ही मजबूत तर समाज मजबूत. 

जमाअते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे येत्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मजबूत कुटुंब मजबूत समाज या नावाने जी मोहिम सुरू झालेली आहे ती आजच्या काळाची गरज आहे. कारण कुटुंब व्यवस्थेचा ठिसूळ होत चाललेला पाया पुनःश्च मजबूत केल्याशिवाय आपला समाज मजबूत होणार नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश या मोहिमेतून जाणार आहे. या मोहिमेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  


- मिनहाज शेख, 

पुणे (९८९०२४५५५०)



हजरत मुहम्मद (स.) यांचे नाव जगातील पहिल्या शंभर प्रसिद्ध व्यक्तींच्या सूचित पहिल्या क्रमांकावर असल्याचे वाचले आणि झालेला आनंद अविस्मरणीय असा होता. हजरत मुहम्मद (स.) यांचा जन्म (मक्का) आणि मृत्यू (मदीना) या दोन्ही घटना रबिऊल अव्व्ल महिन्यातील होत. हजरत मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि त्यांचे कार्य यांचे स्मरण रबिऊल अव्व्ल महिन्याच्या औचित्यातून करण्याचा या लेखाचा प्रयास आहे. माझ्या लेखासाठी प्रा. के. एस. रामाकृष्ण राव यांचे पुस्तक मुहम्मद (स.) आदर्श प्रेषित याचा आधार घेतला आहे.

ते लिहितात :- मुहम्मद (स.) प्रेषित, सेनापती, शासक, योद्धे, व्यापारी, उपदेशक, तत्त्वज्ञानी, राजनीतीज्ञ, वक्ते, समाजसुधारक, अनाथांचे पोषणकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, नायनिष्ठ आणि संत या सर्व भूमिकांमध्ये व मानवतेच्या सेवाकार्य क्षेत्रात त्यांची योग्यता महान विश्व्नायकाची आहे. जगभरात चारित्र्य नावाला उरले नव्हते, अनीती शिगेला पोहचलेली होती अशा वेळी गरज होती ती मानवतेच्या शिकवणीची. अल्लाहने या कामासाठी निवड केली मुहम्मद (स.) यांची, जे अशिक्षित होते मात्र प्रामाणिकपणा त्यांच्या नसानसांत भरलेला होता. या कामाची जबाबदारी म्हणून त्यांस लाभली, या लाभाबरोबरच ते अल्लाहचे पैगम्बरही बनले.

त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर विषयाची माहिती व प्रशिक्षण त्यांस देणे आवश्यक होते. अल्लाहने आवशयक ती माहिती व प्रशिक्षण दिले. त्यानंतर मुहम्मद पैगंबर (स.) यांनी त्यांचे कार्य हाती घेतले. ते कार्य होते एकेश्वरवाद पुनर्जीवित करणे, मानव समानतेचा अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहचविणे. अर्थात हे कार्य तेथील समूहास रुचेनासे होते तेव्हा त्यांनी मुहम्मद (स.) व त्यांचे सह्काऱ्यांचा अनन्वित छळ केला ज्यामुळे त्या सर्वांना मक्का सोडून मदीनेस जाणे भाग पडून ते मदीनेस गेले. एका बाजूने छळ चालू होता तर दुसऱ्या बाजूने पैगम्बर मुहम्मद (स .) यांनी अल्लाहची पाठराखण व सह्कार्यचे विश्वासच्या जोरावर कार्य चालू ठेवले परिणामी कारवाही वाढत गेली आणि स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करता येईल  याची खात्री झाली .या खात्रीचे पुढे हाती घेतलेले मिशन यशस्वीपणे १० वर्षाच्या  कालावधीत पूर्ण झाले .आणि याची देही याची डोळे सर्व काही घडून आलेचे समाधान लाभून वयाच्या ६३ व्या वर्षी हजरत मुहम्मद पैगम्बर (स .)अल्लाहला प्रिय झाले .

प्रा .के एस रामकृष्ण राव आणि काही भारतीय बुद्धिमान विचारवंत  या पुसकात नमूद केले आहे ते पुढील प्रमाणे : जर्मनचे मोठे कवी 'गोयटे' म्हणतात : 'हा ग्रथं प्रत्येक युगात लोकांवर आपला अत्याधिक प्रभाव पाडत राहील'                                                            

जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात पुढील शंभर वर्षात इंग्लंडच नव्हे तर संपूर्ण युरोपवर धर्म इस्लाम असेल . प्रा. हर्गरोन्ज (Hurgronje) यांच्या शब्दांत, इस्लामच्या पैगंबरांद्वारे प्रस्थापित राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय एकता आणि विश्वबंधुत्वाच्या नियमांना अशा सार्वभौमिक आधारांवर स्थापन केले आहे, जे इतर राष्ट्रांना मार्गदर्शन करीत राहातील. प्रा. हर्गरोन्ज पुढे लिहितात, वस्तुस्थिती ही की, राष्ट्रसंघाच्या धारणेस वास्तविक रूप देण्याकरिता इस्लामची ही कामगिरी आहे. जगातले कोणतेही राष्ट्र याचे उदाहरण सादर करू शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात, “इस्लाम ज्याने स्पेनला सभ्य बनविले, त्या इस्लामपासून ज्याने मोरोक्कोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविला आणि संपूर्ण विश्वाला बंधुभावाचे बायबल शिकविले. दक्षिण आफ्रिकेतील यूरोपियन इस्लामच्या विस्तारामुळे केवळ एवढ्यासाठी भयभीत आहेत की त्याच्या अनुयायींनी गौरवर्णीयांशी समानतेची मागणी करू नये? असे असेल तर त्यांचे भयभीत होणे योग्यच आहे. बंधुभाव पाप आहे, कृष्णवर्णीयांची गौरवर्णीयांशी समानता होण्याची त्यांना भीती वाटते. तर मग (इस्लामच्या प्रसाराने) त्यांच्या भयभीत होण्याचे कारणही लक्षात येऊ शकते. सरोजिनी नायडू म्हणतात ,"हा पहिला धर्म आहे ज्याने लोक्तांत्राची शिकवण दिली आणि त्याला एक व्यावहारिक रूप दिले . या करीता त्यांनी मस्जिद मधील सामूहिक नमाज हे उदाहरण घेतले आहे ते असे कि नमाज मध्ये श्रीमंत -गरीब , उच्च-निच्च ,राजा -रंक  आणि गोरा -काळा असा भेदभाव नाही . (pg 2)

इस्लाम बाबत थॉमस कार्लायलचे मत पुढे विचारत येईल ,ततपूर्वी  लेखक प्रा . के एस रामाकृष्ण राव यांनी केलेले  विवेचन पाहू .

मुहम्मद (स.) अनाथ आणि निरक्षर होते त्यांचा जन्म मक्का शहरात झाला होता त्या शहराततील लोक शीघ्रकोपी व सूडभावनचे होते .तर काही सुज्ञ होते मुहम्मद (स.) अशाच  सुज्ञ मंधील सर्वउत्तम होते ,त्यांच्यातील  प्रामाणिकपणा व न्यायी वृती  यामुळे तेथील आपसांतील भांडणात ते मध्यस्थी असत . मानव ,गुरेढोरे झाड -माड एकूणच सर्वप्रती ते दयावान होते . आणि तरीही त्यास अशा भयंकर छळाला सामोरे जावे लागले ,कि यातना असह्य होहून आपले घरदार सोडून शहर मदिना मध्ये जाऊन आश्रय घेतला त्यांच्यातिल सद्गुणा मुळे त्यांच्या सादचारामुळे त्यांनी हाती घेतलेली इस्लामी मानवतेचे मिशन मध्ये लोक सामील झाले होते . ते या छळाला  बळी पडले तरीही त्यांनी आपले या नेत्याची साथ प्रसंगी त्यांच्यातील काहींनी मरण पत्करून दिली . तर काहींनी स्वतःचे घरदार सोडून त्यांच्या बरोबर शहर मदिना जाऊन साथ दिली.

परिणामी या सोसलेल्या यातनांचे इनाम म्हणून मक्का शहर मुहम्मद (स.) त्यांच्या सहकार्यनच्या ताब्यात रक्ताचा एक थेंब सांडून न देता अल्लाहने दिले.

मुहम्मद (स.) नी ज्या यातना स्वतः सोसल्या त्या हि पेक्षा त्याना अधिक वेदना त्यांच्या सहकार्यस सोसाव्य लागल्या. आणि तसे त्याचं कृतितुन दिसूनही येत होते . परंतु त्यांनी हे सर्व जे काही सहन केले ते एका निश्चित ध्येयासाठी होते आणि ते ध्येय होते एकेश्वरवादचे सत्य ,मानवतेचे सत्य या सर्वाना अल्लाहने लोकांचे जीवन सुलभ शांती व समाधानाचे व्हावे म्हणून केलेले मार्गदर्शन अर्थात धर्म दिन इस्लाम लोकपर्यंत पोहचवावे ,अखेर ते पोहचले नंतर त्यानि केलेली कृती म्हणजे उच्चतम मानवतेत रोवलेला एक अवीसमरणीय ,अनमोल तुरा होता आणि तो होता ज्यानी छळून त्यांस व त्यांच्या सहकार्यास शहर मक्का सोडण्यास भाग पडले होते. त्या सर्वाना दिलेली क्षमा -माफी होय अदभूतच कारण माफी देताना मुहम्मद (स०)म्हणाले होते आज तुमच्यावर कोणताही अपराध नाही आणि तुम्ही सर्व स्वतंत्र आहात . page 3

मानवता टिकावी म्हणून हि इस्लामचे मार्गदर्शन आहे ते हे कि ,एकाधिकार ,व्याज ,बाजार पेठांवर कब्जा करणे साठेबाजी ,कृत्रिम टंचाई निर्माण करणे यांना अवैध ठरविण्यात आले शिवाय  व्यभिचार, जुगार ,दारू यानाही निषेध केले गेले . तर शिक्षण संस्था ,उपासना स्थळे ,रुग्णालये  आदि समजयोगी साधनांना प्राधान्य दिले गेले . अनाथालयाचा प्रारंभ मुहम्मद (स)याचे कडून झालेला होता आणि हे सर्व विचारांत घेऊन मुहम्मद (स .)  यांचे विषयी कार्लईल म्हणतात कि निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या या वाळवंटी पुत्राच्या ह्रदयात मानवता द्या आणि समता  स्वभाव निसर्गत: होता .याच कार्लईल व कवी गोयटे यांच्यातील या बाबतचा संवाद अब्दोधक  ठरेल .p4

पैगम्बर हजरत मुहम्मद (स०) यांचे  एकूणच जीवन चरित्राने बेहद खुश आणि प्रभावित झालेले थॉमस कार्लईल लिहितात"आणि मग इस्लामची देखील हि मागणी आहे ,आम्ही स्वतःला अल्लाह करिता समर्पित केले पाहिजे तो आमच्याशी जे काही करतो ,आम्हला जे काही पाठवितो ,मग तो मृत्यू का असेना किंवा त्याहून एखादी वाईट गोष्ट ,ती वास्तविक आमच्या भलाईची आणि आमच्याकरिता उत्तमच असेल. अशा प्रकारे आम्ही स्वतःला ईश्वराच्या प्रसन्ने करीता समर्पित करतो ". गोयटे विचारतात जर हा इस्लाम आहे तर आम्ही सर्व इस्लामी जीवन जगत नाही काय?"यावर कार्लईल लिहातांत "होय ,आमच्या पैकी ते सर्व जे नैतिक व सदाचारी जीवन जगतात ते सर्वच ज्ञान आणि प्रज्ञा आहे ,जी आकाशातून या भूतलावर अवतरीत केली आहे . पैगम्बर मुहम्मद (स०) याचे पवित्र जीवन त्यांचे पवित्र कुराण इस्लामचे मार्गदर्शन सर्वकाही झऱ्यातून वाहणाऱ्या निर्मल पाण्या सारखे असले तरी देखील तलवार ,स्त्रिया असे आक्षेप दूषित मनाचे काही लोक घेत आलेत आणि आजही ते आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात . जित्याची खोड हि म्हण तिचे ठिकाणी योग्यच परंतु ज्यांना नीट माहिती नसते अशाना इस्लाम वरील आक्षेप कसे अज्ञानातून असतात हे वेळोवेळी समाजातून सांगण्यात येत असतेच तरी देखील सभ्य माणसाने अशा खोडसाळपणा पासून दूर राहावे तसे प्रयत्न नेहमीच गरजेचे ठरतात .

           प्रा .के एस रामकृष्ण राव स्त्रियांचा इस्लामने केलेले उद्धाराबाबत लिहितात - इस्लाम स्त्री उद्धारक या रूपाने आला आणि  त्याने स्त्रीला पतृक वारसात हिस्सेदार बनविले .त्याने शेकडो वर्षपूर्वी स्त्रियांना मिळकतीचा अधिकर दिला आणि त्याच्या बारा शतका नंतर इ. स. १८८१ मध्ये इंग्लंड जो लोकतंत्र प्रणालीचा प्रणेता समजला जातो त्याने इस्लामचा हा सिद्धांत अंगीकारून त्या करीता विवाहित स्त्रियांचा विधिनियम नावाचा कायदा पास केला (आपण २६-१-१९५० पर्यंत ब्रिटिश डोमिनियन मध्ये होतो हे आरोपकर्त्यानी ध्यानी घेतलेले बरे बरका .) प्रा के एस रामकृष्ण राव याच्या हिंदीतील पुस्तकाचे भाषांतरकार अनुवादक मन्सूर आगानी म्हंटले आहे कि मुहम्मद (स ०) याचे बाबत असे पुस्तक हिंदी ,इंग्रजी साहित्यात ते काय उर्दू मध्ये हि सुलभ नाही . अर्थात प्रा रामकृष्ण राव आपले विवेचन पृ . २१ वर लिहितात :जे लोक श्रध्दा बाळगतात आणि सत्कर्म करतात केवळ तेच लोक स्वर्गात जाऊ शकतील ",हे कुरआनने वारंवार सांगितले आहे .जे लोक श्रध्दा बाळगतील ,पण तयानुसार आचरण करीत नसतील तर त्याचें इस्लाम धर्मात काहीच स्थान नाही . वरील प्रमाणेचे इस्लामी मार्गदर्शन करण्यात ज्या यातना सोसव्या लागल्या होत्या त्यांचा अभ्यासकांवर परिणाम होणे स्वाभाविक होते कारण मानवास मानवंतावादी  बनवणेच हे त्याचं कार्य असे २३ वर्ष चालूच होते अखेर वयाचे ६३ व्या वर्षी इस्मलाचे पैगम्बर हजरत मुहम्मद (स ०) अल्लाहचे महबुबना अल्लाहने आपले समीप घेतले . प्रा रामाकृष्ण राव याचे या समयीचे बोल कोणच्या हि डोळयांत अश्रू आणणारे असेच आहेत ते लिहितात = ज्या कपडयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यात  अनेक ठिगळे लावलेली होती . ते घर ज्या पासून संपूर्ण जगात प्रकाश पसरला ते अंधारात होते . कारण दिवा लावण्या करीता तेल सुद्धा नव्हते ..

-बशीर मोडक,

रत्नागिरी



हे लोक दुर्बलांचे, शोषितांचे, वंचितांचे भार उचलतात, पाहुणचार करतात, गरीबांच्या तक्रारींना वाईट मानत नाहीत, जे अपंग आहेत त्यांच्या गरजा भागवतात, अनाथांशी दयेने वागतात. आपत्ती कोसळल्यास संयम ढळू देत नाहीत. वचनपूर्ती करतात. आदरसन्मानाचे रक्षण करतात. ज्ञानी लोकांचा मान राखतात. त्यांना हवी असलेली मदत करतात. ज्या गोष्टींपासून ज्ञानी लोक सत्ताधाऱ्यांना रोखतात त्याचे आचरण करतात. त्यांच्याविषयी चांगले विचार बाळगतात. धार्मिक लोकांवर प्रेम करतात. दुर्बलांशी चांगला व्यवहार करतात. त्यांच्याशी न्याय्य वर्तन करतात. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुढे येतात. सत्यासमोर नतमस्तक होतात. लोकांच्या तक्रारींचे निवारण करतात. धार्मिक प्रवृत्तीचे असतात. आराधना-उपासना करतात. म्हणजे त्यांचे एकूण राजकारण याच सद्गुणांवर आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते. वरील सर्व सद्गुण चांगल्या राजकारण्याचे द्योतक आहेत. ते एखाद्या लहानशा भूभागाचे शासक असतो की एखाद्या अधिराज्याचे अधिपती असोत, हे राजकीय सद्गुण त्यांच्यामध्ये आवश्यक आहेत.

याउलट जेव्हा ईश्वर कुणा सत्ताधारी शासकाकडून त्याचे राज्य हिरावून घेतो तेव्हा तर अशा शासनकर्त्यामध्ये वाईट गुण निर्माण होतात. कारण त्यांच्यामध्ये राजकीय सद्गुण लयाला गेलेले असतात. त्यांच्या हातून त्यांचे राज्य काढून घेऊन ईश्वर दुसऱ्या एखाद्या जनसमूहातील शासकाच्या स्वाधीन करतो, त्यांना अशा शक्तींच्या लोकसमूहांच्या अधीन करतो, ज्यांच्यामध्ये वर उल्लेखित सद्गुण असतात. त्यांच्या कुकृत्यांमुळे त्यांची समृद्धी, त्यांचा मानसन्मान सर्वकाही त्यांना गमवावे लागते. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही एखाद्या देशाला, राष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे ठरवतो तेव्हा त्या राष्ट्रात धनसंपन्न लोकांची संख्या काढतो, मग असे लोक कुकर्म करू लागतात आणि त्यासाठी त्यांच्यावर प्रकोप कोसळवतो. त्यांना नेस्तनाबूद करून टाकतो.” एखाद्या समुदायाची सत्ता काढून टाकण्याचे मोठे संकेत असे की तो समुदाय आपल्या राज्यातील विद्वान, ज्ञानसंपन्न आणि लोकहितासाठी झटणारे, मानवतेच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्यांचा मानसन्मान करत नाही. एखाद्या समुदायात अशी वृत्ती दिसायला सुरुवात झाली तर त्या समुदायाचे त्या अनुषंगाने त्या राष्ट्राचे पतन जवळ आहे असे समजावे. ज्या समुदायाचे ईश्वर काही वाईट करण्याचे ठरवतो तेव्हा कोणतीही शक्ती त्या समुदायाला, राष्ट्राला वाचवू शकत नाही. पराभूत राष्ट्र लवकरच नामशेष लोते.

गुलाम राष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाखाली गेले असल्याने त्यांच्या अमलाखाली असते. त्यांच्याच मेहेरबानीने ते जगू लागते. त्यांचे मनोबल खचून जाते. त्यांची संततीदेखील कमकुवत होत जाते. त्यांचा जन्मदरही खाली होत जातो. ते आळशी बनतात. आळशी झाल्याने आणखीनच धीर खचतो. दुसऱ्या राष्ट्राच्या, लोकसमूहाच्या वर्चस्वाखाली जगत असताना त्यांच्या आपसातील वांशिक संबंध ढिले पडत जातात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत जाते. अशा लोकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या भावना दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. जगण्यात रस नसतो. ते स्वतःचेदेखील रक्षण करू शकत नाहीत. अशा मनोबलाबरोबरच त्यांची शारीरिक शक्तीदेखील कमकुवत होत जाते. कारण सत्ताधारी समूह त्यांच्या गत वैभवाला नष्ट करू पाहात आहे. कोणत्याही आक्रमण करणाऱ्या शक्तीसमोर ते आत्मसमर्पण करत राहतात.

पराभूत राष्ट्र-जनसमुदाय आपल्यावर ताबा मिळविलेल्याच्या आहारी जातात. फक्त शारीरिक गुलामीच नव्हे तर मानसिक गुलामीसुद्धा पत्करतात. त्याचा असा गैरसमज झालेला असतो की ज्यांनी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे त्यांच्यामध्ये खरेच कमालीचे सामर्थ्य असेल. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये घर करून बसल्यानंतर तो विजयी राष्ट्राकडे आकर्षित होत जातो. त्याची प्रत्येक कृती आणि उक्ती त्यांना लोभनीय वाटू लागते. त्यांच्यासारखेच जगणे अंगीकारण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतः आपल्यामध्ये त्याला अवगुण दिसू लागतात आणि स्वतःशीच ते घृणा करू लागतात.

(संदर्भ- इब्ने खल्दून, मुकद्दमा भाग-१)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद



माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

‘‘त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखाद्या व्यक्तीला धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीशी संबंधित करताना ऐकले नाही.’’

स्पष्टीकरण

म्हणजे प्रत्येक कामात पैगंबर मुहम्मद (स.) धार्मिक भावनेला दृष्टीसमोर ठेवत असत. त्यांच्या दृष्टिकोनातून धर्ममाहात्म्यापुढे सर्व गोष्टी तुच्छ होत्या. म्हणून रंगभेद व वंशभेदरहित प्राथमिकता नेहमी धर्माला प्राप्त होती. जो कोणी धर्मात श्रेष्ठ असेल त्याला पैगंबर दुसऱ्या लोकांवर प्राथमिकता देत असत, मग तो मनुष्य कोणत्याही कुटुंबाचा व कबिल्याचा का असेना.


लेखक - राजेंद्र नारायण लाल

भाषांतर - सय्यद मुजाहिद अली

राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक `इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवन व्यवस्था' यातील एक महत्त्वपूर्ण लेख `इस्लाम'ला या पुस्तिकेत प्रस्तुत करण्यात आले आहे. लेखक महोदयांनी तुलनात्मक विश्लेषण व चिंतन केल्यानंतर निष्कर्षाप्रत आले की इस्लाम मानवी समस्या सोडविण्याचा आधारभूत व एकमेव पर्याय आहे.

वाचकाने जर नि:पक्षपातीपणे व स्वच्छ मनाने इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या निर्णयाप्रत पोहोचेल की इस्लाम एक स्वयंसिद्ध वास्तविकता आहे.  

आयएमपीटी अ.क्र. 243  -पृष्ठे - 16   मूल्य-10      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/gv2hgl2zwjw9mx9l5c5jth6inryqb98j




जानेवारीला संध्याकाळी लातूरमध्ये ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमे अंतर्गत भेटीगाठी घेत असतांना एक तरूण भेटला व म्हणाला, ’’मला व्यसन सोडायचे आहे, काही केल्या ते सुटत नाहीये. मला आश्चर्य वाटतं की मुस्लिम तरूण व्यसन करत नाहीत, त्यांना हे कसं जमतं? कृपया सांगाल का?’’

ही त्या सर्व प्रतिक्रियांपैकी उत्कृष्ट होती जी या मोहिमेअंतर्गत बहुसंख्यांक बांधवांशी भेटी दरम्यान दिली गेली होती. हा एक तरूण होता व व्यसन सोडू इच्छित होता. माझे सहकारी निसार सिद्दीकी यांनी त्याचे थोडेशे समुपदेशन केले पण तो घाईत होता. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देवून व आमचा भ्रमणध्वनीक्रमांक घेवून तो अंबाजोगाईरोडच्या गर्दीत लोप पावला. तो पुन्हा भेटेल न भेटेल ही गोष्ट अलाहिदा पण त्याने माझ्या मनामध्ये विचारांचे एक वादळ अलगद सोडले होते, एवढे मात्र निश्चित.

अभियानामध्ये सर्वप्रकारच्या नागरिकांच्या भेटी घेण्याचा योग आला. आम्ही निस्वार्थ भावनेने समाज हितासाठी लोकांना भेटत असल्याचे लक्षात आल्याने अनेक नागरिकांनी आमच्यासमोर मन मोकळे केले. लोकं भरभरून बोलली. सर्वांच्याच मनामध्ये स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल काळजी होती. त्यांच्या चेहऱ्यावर सामाजिक मुल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासाची चिंता स्पष्ट दिसत होती. नैतिक मुल्यांच्या ऱ्हासापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला कसे वाचवावे? हे त्यांना कळत नव्हते. एका पोलीस बांधवाने तर असे सांगितले की, ’’आम्ही समाजाचे रक्षण करतोय पण समाज आमच्या कुटुंबाचे रक्षण करू शकेल, असे वाटत नाही.’’ 

समाज खालपासून वरपर्यंत नासत चाललेला आहे व ह्या नासण्याच्या प्रक्रियेपासून समाजाला वाचविण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये, हे ही खरे. कारण सरकार काही करत नाही. सेवाभावी संस्था, सांस्कृतिक संघटनांच्या लक्षात समाजाच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम व त्या दुष्परिणामाचा वाढता परीघ सर्वांनाच आपल्या कवेत घेईल. पुढच्या पिढ्यांना नासवत जाईल, ही बाब कोणाच्याच लक्षात येत नाहीये. ज्यांच्या लक्षात आलेली आहे ते हतबल आहेत. कारण ऱ्हासाची कारणे व्यवस्थेमधून निर्माण झालेली आहेत व मुठभर लोक व्यवस्थेशी लढू शकत नाहीत. म्हणून अशा निराशाजनक परिस्थितीमध्ये अंधारातून प्रकाशाकडे ही मोहिम तुम्ही हातात घेतली व आशेचा एक किरण निर्माण केला, याचे समाधान अनेक लोकांशी बोलतांना दिसून आले. 

अभियाना दरम्यान, अनेक सामाजिक समस्यांना जवळून पाहता आले. या समस्यांमध्ये सर्व समाजघटक सारखेच पीडित आहेत. कोणी कमी आहे कोणी जास्त आहे एवढाच काय तो फरक. सर्वात मोठी समस्या तरूणांमध्ये अश्लील सामुग्रीच्या वाईट प्रभावाची आहे. ही समस्या आता विद्यापीठ, महाविद्यालयांतून झिरपत माध्यमिक शाळांपर्यंत येऊन पोहोचली आहे. पालक चिंतीत आहेत की, ऑनलाईन्नलासेससाठी मुलांच्या हाती मोबाईल देणे गरजेचे आहे परंतु त्या मोबाईलमधील अश्लील सामुग्रीच्या वाईट परिणामांपासून आपल्या मुला-मुलींना कसे वाचवावे, हे त्यांना कळत नाहीये. या सामुग्रीमुळे तरूणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांच्या लैंगिक अभिरूची आणि वर्तनामध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून देशातील स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून अ‍ॅड. कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये इंटरनेटरवरून अश्लिल सामुग्री हटवावी यासाठी जनहित याचिका क्र. 177/2013 दाखल केली होती. तेव्हा केंद्र सरकारने न्यायालयात शपथ पत्राद्वारे ही सामुग्री हटविण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले होेते. यावरून या समस्येचे गांभीर्य ओळखता येईल. तसेच या समस्येचा सामना नागरिकांना स्वबळावर करावा लागणार आहे,  ही  अपरिहार्यताही आता लक्षात घ्यावी लागणार आहे. केवळ अश्लिलताच नव्हे तर इतर सर्व अनैतिक कृत्यांपासून तेच लोक सुरक्षित राहू शकतील ज्यांच्या ’नफ्स’ (स्व)वर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. पण हे एवढे सोपे नाही. नफ्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. एका विशिष्ट पद्धतीने स्वतःचे मानसिक प्रशिक्षण करावे लागते. त्यासाठी जेवढी प्रभावशाली आचारसंहिता इस्लाम देतो तेवढी प्रभावशाली आचारसंहिता जगात दूसरी उपलब्ध नाही.

भेटीगाठी दरम्यान वर नमूद समस्येखेरीज अंधश्रद्धा, अज्ञानता, व्यसनाधिनता, भांडण-तंटे, स्वार्थ, विश्वासघात, गृहकलह, नात्यातील अविश्वास, भ्रष्टाचार इत्यादी जुन्या समस्यांसुद्धा कायम असल्याचा अनुभव आला. शिक्षणामुळे सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि पडणार देखील नाही, हे ही उमजले. कारण जगात शिक्षणाच्या नावाखाली जे काही शिकविले जाते त्यातून विद्यार्थी पैसा कसा कमवावा? याचे कौशल्य तर आत्मसात करतात मात्र नैतिक वर्तन कसे करावे? याचे कौशल्य आत्मसात करीत नाहीत. कारण त्यांना ते शिकवलेच जात नाही. माणूस म्हणून कसे वागावे? दुसऱ्यांच्या प्रती दया,करूणा, त्याग व निःस्वार्थ प्रेम  कसे करावे? यासंबंधीचे शिक्षण कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील नाही. नैतिक वर्तनाचे महत्त्व त्यांना शिकविले जात नसल्या कारणाने समाजाचे सरळ दोन भाग पडलेले आहेत. एक - शोषक व दुसरा- शोषित. 

भौतिक प्रगतीबरोबर नैतिक प्रगती साधता न आल्याने जो समाज तयार झालेला आहे त्यातील लोकांच्या जीवनात तणाव निर्माण झालेला आहे किंबहुना तणाव त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. जीवनशैलीच अशी विकसित झालेली आहे की, शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धाश्रमातील वृद्धापर्यंत सगळ्यांना काही ना काही तणाव सोसावा लागत आहे. आरोग्यदायी समाजाचे हे लक्षण कदापि नव्हे. आज समाजामध्ये अनाचार माजलेला आहे. त्यातून समाजाचे नैतिक अधःपतन होवून त्याचा सर्वात जास्त फटका समाजातील स्त्रिया, मुले व अंतिम घटकाला बसला आहे व बसत आहे. 

आज साधारणपणे तरूण-तरूणी जैविक रूपाने तर आई-वडिल बनत आहेत परंतु आपल्या मुलांवर नैतिक संस्कार करण्यात ते सपशेल अपयशी ठरत आहेत. कारण ते स्वतःच नैतिक मुल्यांनी रिकामे आहेत.  परिणामी मूल्यहीन पिढी अस्तित्वात येत आहे व त्यांची संख्या पिढीगणिक वाढत आहे. 

उपाय

शंभर टक्के आदर्श समाज कधीच अस्तित्वात येवू शकत नाही. तसे पाहता आदर्श समाज म्हणायचे कशाला? हे अगोदर ठरवावे लागेल. तर त्याचे उत्तर असे की, ज्या समाजामध्ये बहुसंख्य लोक सभ्य, दयाळू, निर्व्यसनी, शोषणमुक्त, प्रेमळ, त्यागी, दुसऱ्यांचे अधिकार देणारे, कमकुवत गटाचे रक्षण करणारे असतील तो समाज आदर्श. असा समाज निर्माण करण्यासाठी समाजामध्ये नैतिक मुल्यांची जोपासणा करणे अनिवार्य ठरते. तसे पाहता नैतिकतेला जगात सर्वच ठिकाणी चांगले समजले जाते. प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये नितीमत्तेचे उपदेश केलेले आहेत. परंतु वर्तनात नैतिकतेला प्रत्यक्षपणे लागू करण्याची जी परिणामकारक योजना इस्लाम देतो तशी दूसरी योजना जगात अस्तित्वात नाही. केवळ नैतिक आचरणाची महत्ता सांगितल्याने किंवा उपदेश केल्याने कोणताही समाज नैतिक होत नाही. इस्लाम त्यासाठी गल्लोगल्ली मस्जिदींची स्थापना करून दिवसातून पाचवेळा लोकांना त्यात बोलावून नमाजद्वारे तसेच रमजानचे 30 उपवास करवून घेऊन त्यांच्या अध्यात्मिकतेला बळ देतो. तेव्हा कुठे लोक नैतिक आचरणासाठी प्रोत्साहित होतात. तसेच अनैतिक आचरणातून मिळणारे लाभ सोडण्यास व नैतिक आचरणातून होणारे नुकसान सहन करण्यास तयार होतात. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला या उंचीवर आणले जाणार नाही तोपर्यंत आदर्श समाज निर्माण होणार नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीची जबाबदारी कोणा एका गटाची नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे. फक्त एकच उदाहरण देवून थांबतो की आज समाजामध्ये वृद्धांची समस्या इतकी जटील झालेली आहे की, वृद्धाश्रमापलिकडे त्यावर उपाय जगाला सुचलेला नाही. पण ही समस्या मुस्लिमांमध्ये नाही. याची जगाला आश्चर्य कसे वाटत नाही, याचेच आश्चर्य वाटते.  

मुळात मुस्लिम समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण कमी असणे, त्यांच्यात वृद्धांची समस्या नसणे, व्याजासारख्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आर्थिक आतंकवादापासून दूर असणे, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी असणे,कन्याभ्रुण हत्येचे प्रमाण नगण्य असणे या आणि यासारख्या अनेक गुण वैशिष्ट्ये असणाऱ्या मुस्लिम समाजाचे आदर्श समाज निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या प्रिय देशाला महासत्ता बनवायचे असेल तर या आणि यासारख्याच आणखीन इतर गुणवैशिष्ट्यांना आपल्यामध्ये रूजवावा लागेल. त्याची सुरूवात आपल्या घरातून करावी लागेल. जेव्हा प्रत्येक घर अशा या गुणवैशिष्ट्यांनी संपन्न होईल तेव्हा आदर्श समाज आपोआपच निर्माण होईल आणि भारत नैतिकदृष्ट्या जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज होईल, यात शंका नाही. जय हिंद. 

- एम.आय. शेख


Samarkand

एकेकाळी म्हणजे रशिया येथील झार बादशाहांच्या सत्तेपूर्वी समरकंद नामक एक लहानसा देश होता. त्यावर मुस्लिम सैन्यांनी चढाई करून ते जिंकले होते. त्या वेळी तिथे एक रहस्यमय धर्माचे लोक राहात होते. आपल्या देशावर मुस्लिम सैन्यांनी हल्ला करून काबिज केल्याने ते दुःखी आणि रागावले होते. त्यांनी आपसात ठरवले की आपल्याकडील एका प्रतिनिधीला दमास्कस येथील मुस्लिम राजवटीचे अमीर-उल-मोमिनीन यांच्याकडे पाठवून त्यांना विनंती करावी. मुस्लिम लष्कराने आम्हाला अंधारात ठेवून कसा आमचा देश काबिज केला याची त्यांना माहिती देऊ.

यासाठी त्यांनी आपला प्रतिनिधी दमास्कसला पाठवला. त्याला अशी चिंता लागली की त्या मुस्लिम जगताचे सर्वेसर्वा अमीर-उल-मोमिनीनकडे जायचे कसे? त्याआधी त्यांचे अधिराज्य आशिया, आफ्रिका, यूरोप खंडांमध्ये होते. अशा अधिपती शासनकर्त्याकडे जायची त्याला भीती वाटू लागली. बऱ्याच खोट्या गोष्टी त्या वेळी त्या राजवटीबाबत प्रसिद्ध होत्या. लहानसहान चुकांना माफ केले जात नाही. त्यांना न आवडणारी गोष्ट जरी त्यांच्यासमोर कुणी बोलली तरी त्याला शिक्षा दिली जात असे. तो या गोष्टींमुळे विचलित आणि भयभीत अवस्थेतच कसाबसा दमास्कस येथे पोहोचल्यावर शहराच्या अलीशान इमारती पाहताच त्याच्यावर आणखीनच धाक बसला. चालता चालता एका भव्यदिव्य इमारतीसमोर जाऊन उभा राहिला. लोक त्या इमारतीतून बाहेर पडत होते, तर काही लोक आतमध्ये जात होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. तो प्रतिनिधी त्या इमारतीला राजाचा महाल समजत होता. पण इतक्यात भव्या इमारतीवर कुणाचा पहारा नसल्याचे त्याला दिसले. लोक स्वतंत्रपणे ये-जा करत होते. हे पाहून तो अचंबित झाला.

त्या लोकांमधून तोही चालू लागला. काय करावे त्याला सुचत नव्हते. एका अनोळखी इसमानं त्याला विचारलं, “काय हवंय? का आलात? कोण तुम्ही?”

याचं त्याने लगेच उत्तर दिलं, “मला खलीफांना भेटायचे आहे.”

एवढं सांगून तो स्वत:च घाबरू लागला. आपल्याकडून काही चुकलं की काय खलीफांचं नाव आदराणं म्हणायचं होतं की काय? अशा विचारांनी भिऊ लागला.

यावर तेथील माणसानं त्याला विचारलं, “मी तुला त्यांचं घर दाखवलं तर तुला आवडेल का?”

तो प्रतिनिधी म्हणाला, “म्हणजे हा त्यांचा महाल नाही वाटतं!”

“नाही, ही तर मशीद आहे. तुम्ही नमाज अदा केली का?” त्या अनोळखी व्यक्तीनं विचारलं.

तो प्रतिनिधी म्हणाला, “नाही. मला नमाज काय असते याची कल्पना नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं त्याच्या धर्माविषयी विचारलं. तो प्रतिनिधी म्हणाला, “मी समरकंदच्या काहिन पुरोहित लोकांच्या धर्माचं पालन करतो. ते सांगतात तसं करतो. धर्म काय असतो आणि काय नसतो याची मला कल्पना नाही.”

“तुमचा विधाता पालनकर्ता कोण?”

असं विचारल्यावर त्या प्रतिनिधीनं उत्तर दिलं, “समरकंद येथील धर्मस्थळातील भयभित करणारे देवता.”

“मग तुम्ही काही मागितल्यावर ते देतात काय आणि आजारी प़डल्यावर बरे करतात काय?”

प्रतिनिधी म्हणाला, “मला काहीही माहीत नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं समरकंदच्या त्या रहिवाशाला इस्लामविषयी सर्व माहिती दिली आणि म्हणाला, “चला आता मी तुम्हाला खलीफांचं घर दाखवतो.”

मशिदीच्या दुसऱ्या दरवाजातून ते दोघे बाहेर पडले आणि समोर एक सामान्य माणसाच्या घरासारखं एक घर होतं. समरकंदचा नागरिक म्हणाला, “तुम्ही मला इथं का आणलं? इथं तर ते गृहस्त मातीपासून भिंत बांधण्याचं काम करत आहेत.”

यावर दमास्कसच्या त्या नागरिकानं सांगितलं, “होय. हेच खलीफा आहेत.”

समरकंदचा प्रतिनिधी म्हणाला, “तुम्ही माझी चेष्टा करताय.”

तो माणूस म्हणाला, “नाही. मी अजिबात चेष्टा करत नाही. हेच अमीर-उल-मोमिनीन आहेत.”

दरवाजावर हाक दिल्यावर खलीफा स्वतः बाहेर आले. समरकंदच्या नागरिकाला येण्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं, “आमच्या मर्जीविना मुस्लिम सैन्यानं आमच्या देशावर कबजा केलाय.”

हे ऐकल्यावर खलीफा यांनी एका कागदावर काहीतरी लिहून त्याला दिलं आणि म्हटलं, “हे पत्र तिथल्या राज्यपालांकडे द्या.”

बरेच दिवस चालत तो समरकंदला परतला. त्यानं आपल्या धर्मपंडितांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्वांना विश्वास नव्हता की असे काही घडू शकेल. ते पत्र देण्यासाठी तेथील लोक मशिदीत आले. आणखीन एक माणूस त्या मशिदीत आला. दुवळे व सामान्य माणसासारखे दिसणारे ते काझी होते. त्यांनी ते पत्र वाचलं आणि समरकंदच्या सत्ताधाऱ्यांना वोलाबून घेतले. तिथल्या धर्मपंडितांना आपला अहवाल त्यांच्यासमोर देण्यास सांगण्यात आलं.

तेव्हा ते धर्मपंडित म्हणाले, “यांनी आमच्या देशावर आमची संमती नसताना ताबा घेतला आहे.”

मग काझींनी मुस्लिम सत्ताधिकाऱ्याला विचारलं, “हे सत्य आहे काय?”

त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही. युद्ध धोक्याचेच नाव आहे.”

यावर काझींनी त्यांना विचारलं, “तुम्ही इथल्या लोकांना आधी इस्लाम ध्रम समजावून सांगितला होता काय?”

याचं उत्तर त्यांनी नकारार्थी दिलं.

काझींनी निर्णय दिला की मुस्लिमांनी या देशातून निघून जावे आणि त्यांचा देश त्यांना परत करावा.

नंतर मुस्लिम सैन्य तो देश सोडून बाहेर निघताना पाहून तिथल्या धर्मपंडितांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, “असा जर हा धर्म असेल तर आम्ही तो स्वीकारण्याची घोषणा करतो.”

त्यानंतर तिथले सर्व नागरिक इस्लामी राजवटीत सामील झाले.


(संदर्भ – मासिक ‘जिन्दगी’, दिल्ली, लेखक- शेख अली तनतानवी यांच्या उर्दू भाषांतरावरून)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget