Latest Post


धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव हे एकाच माता-पित्याची संतती असल्याने आपण समस्त मानव एकाच परिवाराचे सदस्य आहोत. आपसांत बंधु आणि नातलग आहोत. म्हणून प्रत्येकाचे एकमेकांवर हक्क आहेत. हे हक्क पूर्ण करणे नितांत आवश्यक आहे. जसी अल्लाहची दासत्व हदीसद्वारा माहीत होते अल्लाह कुफ्र व शिर्कशिवाय अल्लाहस वाटल्यास  इतर अपराधांची माफी देईल, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली मुळीच खपवून घेणार नाही व माफ करणार नाही जोपर्यंत मनुष्य स्वत: माफ करत नाही.

विवाहप्रसंगी मानवाधिकार आणि नातलगांचे अधिकार पूर्ण करण्याची शिकवण अत्यंत महत्त्वपूर्ण असून नववधू आणि वराच्या नातलग व याप्रसंगी हजर असलेल्या लोकांसाठी अमूल्य भेट आहे. पतीने पत्नीचे हक्क पूर्ण केल्यास, मुलांनी मात्यापित्यांचे, मातापित्यांनी मुलांचे आणि नातलगांनी एकदुसऱ्यांचे आणि शेजाऱ्यांने शेजाऱ्याचे तसेच प्रत्येकाने दुसऱ्याचे हक्क जर पूर्ण केले तर या भूतलावर स्वर्गरूपी नंदनवन बहरेल.

या आयतीवरून हे स्पष्ट होते की सर्व मानव एकाच माता-पित्याची संतती असून सर्वजण एकाच परिवार आणि एकाच वंशाचे सदस्य आहेत. म्हणून वर्ण आणि वंश तसेच जाती-पातीच्या आधारे कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. त्या आधारावर वरिष्ठ-कनिष्ठ आणि उच्च-नीच भेदभाव इस्लामने नष्ट केला आहे.



माननीय आएशा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा आधार घेऊन बसले असताना सांगितले, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि माझ्या जगतसखा! मला तुझी भेट घडू दे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

आयुष्यभर ईशमार्गात सक्रिय राहूनसुद्धा अल्लाहपाशी क्षमादान आणि दयेची, कृपेची याचना करीत आहेत आणि कामना करीत आहेत की ‘जीवनसखा’ची भेट घडावी. हीच विनम्रता आणि भक्तीभाव आहे जो ईमान (श्रद्धाशीलते) चा वास्तविक आत्मा, हृदय तथा प्राणसौंदर्य आहे.



- सय्यद सुजाअत हुसैनी

भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रुप धारण करतात.

ही पुस्तिका वाचकांना भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामीक उपाय कुरआन प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 252     -पृष्ठे - 48 मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/50ia0bgr9huh60hjr2lputz6jsfkevph






हजरत उमर (र.) यांनी सर्वप्रथम प्रतिनिधी सभा आणि मार्गदर्शक मंडळाची संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केले होते की सल्लामसलतीविना खिलाफत अवैध आहे. विशेष प्रसंगी मजलिसे शूरा (मार्गदर्शक मंडळ) भरविल्या जात होत्या. या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाजासाठी मस्जिदे नबवीमध्ये सभांचे आयोजन होत होते. विविध प्रांत आणि जिल्ह्यांचे जे अहवाल प्राप्त होत असत ह. उमर या सभेत सर्वांना त्याची माहिती देत असत. एखाद्या समस्येविषयी ह. उमर या सभेतील सभासदांशी विचारविनिमय करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आणि त्यानुसार त्यांचे निवारण केले जात असे.

मजलिसे शुराच्या सभासदांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांनाही शासकीय कामकाजाच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात असे. जिल्ह्यावर प्रभारींची नियुक्ती जनतेच्या सहभागानने केली जाई. काही प्रसंगी तर निवडणुकीच्या प्रक्रियेतून जिल्ह्यांचे प्रभारी निवडला जात असे. कुफा, बसरा आणि शाम (सीरिया) या जिल्ह्यांतील नागरिकांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील अशा व्यक्तींची निवड करावी जो सदाचारी, प्रामाणिक आणि सक्षम असावेत.

लोकतांत्रिक शास्त्र पद्धतीचे सौंदर्य असे की राज्यकर्ता – सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांना एकसारखे अधिकार प्राप्त असावेत. या उलट कोणते कायदे – नियम केले जाऊ नयेत.

सत्ताधारीला आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता होईल यापेक्षा जास्त त्याने राज्याच्या खजिन्यातून घेऊ नये. सामाजिक क्षेत्रात शासनकर्त्याला कोणते विशेष अधिकार, मानमरातब दिले जाऊ नयेत. त्याचे अधिकार मर्यादित असावेत. सामान्य नागरिकांना आपल्या राज्यक्त्यावर टीका-टिप्पणी करण्याची मुभा असावी. यापेक्षा अधिक अधिकार ह. उमर यांच्या पूर्वीच्या कोणत्याही काळात, कोणत्याही राष्ट्रात, कुण्या शासक-राज्यकर्त्याने दिलेले नव्हते. ह. उमर यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटले होते की,

"मला राष्ट्राच्या तिजोरीतून इतकाच खर्च दिला जावा, जो एका अनाथाच्या दैनंदिन गरजांची सोय करणअयासाठी आवश्यक असेल. जर मला श्रीमंती लाभली असती तर मला काहीही घेण्याचा अधिकार नसता. माझ्यावर तुमचे अनेकविध हक्काधिकार आहेत, ज्यांचा तुम्ही मला हिशोब मागितला पाहिजे. दुसरे असे की वाममार्गांनी राज्याच्या तिजोरीत भर घालू नये. माझ्या हाती कर आकारणी आणि युद्धापासून मिळालेल्या मालमत्तेच्या संपत्तीचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होता कामा नये. देशाची सुरक्षा आणि तुम्हाला खर्चासाठी सोय करणे माझ्यावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोणत्याही हानीकारक परिस्थितीपासून तुमची सुरक्षा करणं माझे कर्तव्य आहे."

(संदर्भ – अल-फारुक, मौलाना शिवली नुअमानी)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


जगात जेवढे काही धर्म आहेत त्यांना काहीतरी नाव आहे. धर्माचे नाव एका विशिष्ट व्यक्तीवर ठेवले जाते किंवा त्या वंशाच्या धर्मावर असते ज्यात तो वंश उदयास येतो.  उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म हा ईसा (अलैहिस्सलाम) यांच्या नावावर आहे. बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या नावावर आहे. ज्यू धर्माचे नाव ज्यूमधील एका कबिल्याच्या नावावर यहूदी ठेवलेले आहे ज्याचे नाव यहुदा होते. असाच प्रकार इतर धर्मांच्याबाबतीत आहे. पण इस्लाम धर्माचे नाव कोणत्या व्यक्ती अथवा वंशाच्या नावावर नाही. इस्लाम ही एक खास / विशिष्ट प्रवृत्तीला जाहीर करतो जी इस्लाम या शब्दात आहे. हे नाव कुठल्याही व्यक्तीने शोधून काढलेले नाही किंवा हे नाव एखाद्या वंशाच्या नावावर ठेवलेले आहे. याचा सबंध कोणा व्यक्ती किंवा देशाशीही नाही. फक्त इस्लामची गुणवैशिष्ट्ये लोकांमध्ये बानवणे याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात ते लोक जे सत्य बोलत होते, पवित्र आचरण करत होते ते सर्व मुस्लिम होते आहे आणि भविष्यातही राहतील. (अरबी भाषेत इस्लामचा अर्थ होतो आदेश मानने. इस्लाम या शब्दाचा दूसरा अर्थ शांती, आश्रय देणे, संरक्षण करणे सुद्धा आहे.) 

आपण पाहतो जगात आज जितक्या काही वस्तू आहेत ते एका नियमात बांधलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व आपल्या ठरवून दिलेल्या कक्षेतच फिरतात. पाणी, हवा, झाड-झुडपे सर्व काही एक नियमानुसार चालतात. मनुष्यासाठीही हे नियम आहेतच तो सुद्धा या नियमाप्रमाणेच श्वास घेतो, पाणी पितो, जेवन करतो त्याच्या शरीराचे सर्व अवयव काम करत असतात.  

या सर्व गोष्टी ज्या निर्मात्याने बनविल्या त्यानेच या नियमात या गोष्टींना बांधले आहे. संपूर्ण सृष्टी त्याचा आदेश मानणारी आहे. त्याप्रमाणे या सर्वांचा धर्म इस्लाम आहे व त्या सर्व गोष्टी मुसलमान आहेत. कारण ते आपल्या निर्मात्याचे म्हणजेच अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत आहेत. 

सूर्य,चंद्र, तारे, जमीन, वृक्ष, दगड, प्राणी या सर्व गोष्टी मुस्लिम आहेत व सर्व मनुष्यही मुस्लिम आहेत पण काही मनुष्य शिर्क व कुफ्र सारखे गुन्हा करून मुस्लिम बनण्यापासून वंचित राहतात. 

मनुष्याला आपले मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तो इस्लाम आत्मसात करून मुस्लिम होऊ शकतो पण हे त्याच्या निवडीची बाब आहे. 

एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो व त्यालाच आपला मालक समजतो आणि तो आपल्या जीवनात आपल्या निर्मार्त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो तो पूर्णपणे मुस्लिम आहे तो आता सत्य व शांतीच्या मार्गाने अनुकरण करेल. 

कुफ्र म्हणजे काय?

आता एक दुसरा व्यक्ती जो जन्मतः तर मुस्लिम आहे पण त्याने अल्लाहचे आदेश मानले नाहीत तर तो व्यक्ती काफीर आहे. कुफ्रचा अर्थ लपवने, नकार देणे किंवा पडदा टाकणे असा होतो. 

कुफ्रचे नुकसान

कुफ्र हे एक अज्ञान आहे, अथवा खरे अज्ञान कुफ्रच आहे. जो व्यक्ती आपल्या निर्मात्याला मानण्यास मनाई करत असेल ज्याने कार्बन, सोडियम व कितीतरी गोष्टींना मिळवून मनुष्य तयार केले. ज्याने एवढे सुंदर जग अगदी काटेकोरपणे बनवले ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्याचा आदेश मानण्यास नकार करणाऱ्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.

त्याने आता जीवनात कितीही ज्ञान आत्मसात केले तरीही त्याचा उपयोग नाही कारण त्याला ज्ञानाचे पहिले टोकच मिळाले नाही. 

सर्वात मोठे अत्याचार / दडपण कुफ्र आहे कारण आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. सर्व गोष्टींची प्रवृत्ती आहे कि ते अल्लाहच्या आदेशाचे पालन करावेत. पण कुफ्र करणारा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरूद्ध कामे करतो. 

कुफ्र म्हणजे दडपणे नव्हे तर बंड, कृतघ्नता व नमक-हरामीपण आहे. ज्या अल्लाहने बुद्धी दिली त्याच बुद्धीचा वापर अल्लाहविरूद्ध होत असेल तर त्याला बंड म्हणणार. ज्या अल्लाहमुळे आपण जगतो आहोत त्या अल्लाहचे आभार न मानणे व त्याविरूद्धच कारवाया करणे यालाच नमक-हरामी म्हणतात. 

कुफ्रमुळे जे काही नुकसान होते ते मनुष्याचेच होते. ज्या बादशाहची सल्तनत एवढी मोठी आहे कि वैज्ञानिकांनाही याच्या शेवटच्या टोकाचा शोध घेता आला नाही. त्या अल्लाहचे मनुष्याचे त्याला मानण्या न मानण्याने काही नुकसान होणार नाही.

कुफ्र करणाऱ्याला कधीच सत्याचा मार्ग सापडणार नाही व ज्ञान प्रप्त होणार नाही. त्याचे सामाजिक जीवन खराब होईल त्याची आर्थिक स्थिती खराब होईल. त्याची सत्ता खराब होईल, तो जगात अशांतता पसरवेल. हिंसा करेल, दुसऱ्यांचे हक मारेल, दडपशाही करेल कारण जो आपल्या निर्मात्याला ओळखत नाही त्यात काय नितीमत्ता आणि काय सत्य असणार तो आपली संपत्ती गैरप्रकारे कमवेल. आखिरतच्या दिवशी त्याचेच हात, पाय व इतर अवयव त्याच्या विरूद्ध अल्लाहच्या दरबारात ग्वाही देतील. 

इस्लामचे फायदे

अल्लाहने मनुष्याला विचार करण्याची, बरोबर-चूक कोणते ही ओळखण्याचा विवेक दिला आहे तसेच स्वातंत्र्यही दिले आहे. हे स्वातंत्र्यच खरी परीक्षा आहे. आपण या स्वातंत्र्याचा वापर कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे. आपण ईश्वराला ओखळून सत्य व त्याच्या कायद्याचे पालन करत असू तर आपल्याला यश मिळेल अन्यथा नाही. 

जो मुसलमान असेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याचा कल्याणासाठी करेल तो कधीच स्वतःला कुठल्याही गोष्टीचा मालक समजणार नाही त्यात अहंकार असणार नाही. 

तसेच इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचे ज्ञान मिळवून एक मुस्लिम आपल्या प्रयत्नाने एका काफीरापेक्षा मागे नसेल. पण दोघांत अंतर असेल. एक मुस्लिम चांगल्या पद्धतीने या ज्ञानाचा वापर करेल. भूतकाळात तो वंश ज्या जमाती नष्ट झाल्या त्यांच्यापासून तो बोध घेईल. 

मुसलमानाचे विचार हे सत्य. अल्लाहला मानणारे असतील तो सर्व काही अल्लाहचे आहे असे मोल व अल्लाहने दिलेल्या गोष्टींचा वापर अल्लाहच्या मर्जीच्या प्रमाणे तो करेल. कारण त्याला एकादिवशी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. 

असे ज्याचे विचार असतील तो स्वतःला वाईट कामांपासून मुक्त ठेवेल. तो आपल्या बुद्धीला वाईट विचारांपासून रोखेल. डोळ्यांनी, कानांनी वाईट काम करणार नाही. त्यांच्या तोंडून वाईट गोष्टी निघणार नाहीत. तो आपले हात अत्याचार करण्यासाठी उचलणार नाही, त्याचे पाय चुकीच्या जागी जाणार नाहीत. तो गैरप्रकारे ऐशआरामाचे जीवन जगणार नाही तर तो साधे जीवन जगेल. 

या व्यक्तीसारखा सभ्य कोणीही नसेल तो दोन्ही जगात यश संपादन करेल. त्याच्यासारखा सन्मान कोणाचा नसेल कारण तो अल्लाहशिवाय कोणासमोर झुकत नाही. त्याच्यासारखा ताकतवान कोणी नसेल कारण त्याच्या मनात अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नाही. तो थोड्या संपत्तीवरच समाधान मानणारा असेल तो सर्वांना प्रिय असेल कारण तो सर्वांची मदत करेल. सर्वांचे हक अदा करेल. 

मुस्लिमाची ही प्रवृत्ती बघितल्यानंतर एक मुस्लिम कधीच अस्वाभीमानी व खालच्या दर्जाचा राहूच शकत नाही.

या जगात अल्लाहच्या आदेशाचे पालन करून व सन्मानाने जीवन जगल्यानंतर त्या जगात अल्लाह कधीही न संपणारे खजीने आपल्या गुलामासाठी खुले करेल व अशाप्रकारे इस्लामचे अनुयायी दोन्ही जगांत यश संपादन करतात. 

इस्लाम हा धर्म कुण्या एका विशिष्ट देशाचे किंवा वंशाचे लोकांचे नाव नसून तो संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. प्रत्येक युगात प्रत्येक देशात जो व्यक्ती अल्लाहला जाणला व सत्याचे आचरण ज्याने केले ते सर्व मुस्लिम होते. त्यांचा धर्म इस्लाम होता. (संदर्भ : दिनीयात भाग 1 चा सार. )


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773


लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनाचा गांभीर्याने विचार करायला लोकांकडे वेळच नाही. उपजिविकेची काळजी लोकांना जीवनासंबंधी आणि विशेषतः मरणोत्तर जीवनासंबंधी विचार करण्याची संधीच देत नाही. जीवन काय आहे? शाप आहे की वरदान? ठरवून केलेली खेळी आहे की निव्वळ योगायोग? परिपूर्ण आहे का अपूर्ण ? आपल्याला कोणी जन्माला घातले की आपण आपोआप जन्माला आलो? जन्म देण्यामध्ये आई-वडिलांव्यतिरिक्त तिसरी कोणती शक्ती कार्यरत होती काय? होती तर मग ती शक्ती कोणती? ती कशी आहे? का तिने आपल्याला जन्माला घातले? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोठे सापडतील? ही सारी प्रश्नावली केवळ काल्पनिक नसून या मागे निश्चित असा कार्यकारणभाव आहे व तो कुरआनने मोठ्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखविलेला आहे. 

मुळात कुरआन एक नसून दोन आहेत. एक पुस्तक स्वरूपात तर दुसरा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वरूपात. जर फक्त पुस्तकाचे अवतरण झाले असते तर त्याचा परिणाम तेवढा झाला नसता जेवढा आज आहे. आज जवळ-जवळ 200 कोटी लोक मुस्लिम आहेत व ते गर्वाने स्वतःला मोहमेडन अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे पाईक असल्याचा उल्लेख करतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वारस म्हणून कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम मुस्लिमांचे आहे. फक्त कुरआन वाटप करून जमणार नाही तर स्वतः कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविल्याशिवाय इतरांना कुरआन काय आहे समजणार नाही. 

ज्याप्रमाणे गुलाबासोबत काटे असतात तसेच सामाजिक स्वातंत्र्यासोबत वाईट गोष्टी असतात. इस्लाम स्वतंत्र समाजामधून ’इव्हील’ म्हणजे वाईट गोष्टी समाप्त करू इच्छितो. दुसऱ्या जीवन व्यवस्थेमध्ये वाईट गोष्टींना उत्तेजन दिले जाते. 

प्रसिद्ध समाजशास्त्री अनिल उपाध्याय यांच्या मते इस्लाममध्ये कट्टरता आहे, हे सत्य आहे. पण ती कट्टरता सत्यासाठीची आहे, न्यायासाठीची आहे, मानव कल्याणाविषयी आहे. हीच कट्टरता लोकांना नकोय. या कट्टरतेमुळेच ते नाराज आहेत. त्यांना लवचिक व्यवस्था पाहिजे. इस्लाम त्याच्यासाठी तयार नाही. 

कुरआनचे मानवीय स्वरूप

कश्ती-ए-हक का जमाने में सहारा तू है

असरे नौरात है धुंदलासा सितारा तू है

मागच्या आठवड्यात आपण ’त्या 24’ आयातीचे विश्लेषण केले होते ज्या संंबंधी धिक्कारपात्र वसीम रिझवीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या आठवड्यात कुरआनच्या त्या आयातींचा उहापोह करण्याचा विचार आहे. ज्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. 

1. ’’पृथ्वीवर उपद्रव माजवू नका’’ (सुरे बकरा आयत नं.11)

2. ’’ईश्वर न्याय करणाऱ्यांना पसंत करतो’’ (सुरे अलमायदा आयत नं. 42)

3. ’’ निवाडा न्यायपूर्ण पद्धतीने करा’’ (सुरे अलमायदा आयत नं.42)

4. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’(सुरे अलमायदा आयत नं. 8)

जगाला न्यायाशिवाय दुसऱ्याच कुठल्याच गोष्टीची गरज नाही. - ताब्दुक ऍम्रे (प्रसिद्ध तुर्की सुफी संत) 

वरील सर्व आयातींमध्ये पृथ्वीमध्ये राहणाऱ्यांचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी त्या मुलभूत गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यांची गरज एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पहिल्या आयातीमध्ये म्हटलेले आहे की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका. म्हणजेच सभ्यतेने रहा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आयातीमध्ये न्यायाचे महत्त्व विशद केलेले आहे. न्याय निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्याय करतांना तुम्हाला अशा लोकांचाही विचार करावा लागेल जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांच्याशी तुमचे वैर आहे. त्या वैराचा परिणाम तुमच्या न्यायबुद्धीवर होवू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायाशिवाय सामाजिक शांतता प्रस्थापित होवू शकत नाही. राजकीय शक्तीने, लष्करी बळाने जरी लोकांची मुस्कटदाबी करता येत असली तरी तो एक ’सप्रेस्ड वॉर’ असतो. म्हणून इस्लाममध्ये न्याय करण्यास फार महत्त्व दिलेले आहे. न्याय करण्यासाठी न्यायबुद्धी अत्यंत जरूरी असते. न्यायबुद्धी निर्माण करण्यासाठी जागतिक दृष्टीकोण आवश्यक असतो आणि तो दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कुरआन म्हणतो की, ’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

जेव्हा जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची संतती आहे एवढा व्यापक दृष्टीकोण माणसाच्या विचारांचा ताबा घेतो तेव्हाच तो न्याय करू शकतो. संकुचित दृष्टीकोणाने न्याय कधीही होवू शकत नाही, ही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ गोष्ट आहे. धर्माच्या बाबतीत कुरआनचे म्हणणे स्पष्ट आहे की, 

1.’’ धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही.’’ (सुरे बकरा आयत नं. 256).

2. ’’ जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की, पृथ्वीतलावर सर्व (लोक) श्रद्धावंत / आज्ञाधारक अर्थात मुस्लिमच असावेत.’’ तर सर्व भूतलवासियांनी (तशी) श्रद्धा ठेवली असती. मग तू (काय) लोकांना भाग पाडशील. की ते श्रद्धावंत बनावेत?’’ (सुरे युनूस आयत नं.99)

इस्लामच्या बाबतीत असा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरलेला धर्म आहे. ही धारणा अतिशय चुकीची आहे. भारताच्या पूर्वेकडील मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनोई या मुस्लिम व 8 कोटी उइगर मुस्लिम असलेल्या चीन सारख्या देशांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की, मुस्लिमांनी कधीच या देशावर आक्रमण केलेले नव्हते. तरी सुद्धा ही राष्ट्रे मुस्लिम आहेत. इंडोनेशिया तर जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. स्पष्ट आहे, येथे इस्लाम आपल्या वैचारिक क्षमतेच्या आणि मुस्लिमांच्या चारित्र्याच्या बळावर विस्तारपावला. भारतासारख्या देशात जरी मुस्लिम आक्रमणकर्ते आले आणि इथे शेकडो वर्ष त्यांनी राज्य केले, तरी त्यांची आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती, संयोगाने ते मुस्लिम होते. अपवाद वगळता इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे कधीच धोरण नव्हते. मुळात ताकदीच्या बळावर श्रद्धा बदलता येते, हेच गृहितक चुकीचे आहे. 

वरील पहिल्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही. इस्लामच्या बाबतीत कोणावर जबरदस्ती करताच येत नाही. साधे अतिक्रमण करून मस्जिद बांधता येत नाही तर लोकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण कसे करता येईल? दुसऱ्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराची ही इच्छाच नाही की, पृथ्वीवरील सर्व लोकांना बळजबरीने मुस्लिम बनविण्यात यावे. स्पष्ट आहे त्याची जर तशी इच्छा असती तर पृथ्वीवर एकही माणूस बिगर मुस्लिम राहिला नसता. म्हणूनच मुस्लिमेत्तरांबरोबर विनाकारण युद्ध करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, 

1. ’’ आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.’’ (सुरे अलबकरा आयत नं. 190)

पहा! यात स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात. यात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर असा फरक नाही. जे तुमच्याशी लढतील त्यांच्याशी लढण्याची परवानगी दिलेली आहे. ही किती न्यायसंगत बाब आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे. उलट यात असे म्हटलेले आहे की, लढतांना अन्याय करू नका. म्हणजे या ठिकाणी शत्रुंशी लढतांना सुद्धा अतिरेक करण्यापासून रोखण्यात आलेले आहे. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कुरआन म्हणजे तीन गोष्टींचा समुच्चय आहे. कृपा, कृपा आणि कृपा.

2.  ’’जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला (दंगलखोर आणि अत्याचारी) दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती.  परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)’’  (सुरे अलबकरा आयत नं.:251)

या आयातीमध्ये अल्लाहच्या त्या वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे ज्यात ईश्वराने अत्याचारी गटांचा बिमोड दुसऱ्या न्याय गटांच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था ठेवली नसती तर पृथ्वीवरची सर्व व्यवस्थाच बिगडून गेली असती. हे असे सत्य आहे जे की, कोणत्याही सामान्य बुद्धिच्या माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

3. ’’मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष-स्त्रियां आणि मुलांकरिता लढत नाही जे दुर्बल असल्यामुळे त्यांचे दमन केले गेले आहे आणि (असे लोक) धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.’’  (सुरे अन्निसा आयत नं.:75). 

आयीन-ए-नौ से डरना तर्ज़े कुहन पे अड़ना

मंज़िल यही कठीण है कौमों की ज़िंदगी में 

या आयातीमध्ये एका अशा मुद्याकडे सभ्य आणि सक्षम लोकांना ईश्वराने आवाहन केलेले आहे की, तुम्ही सक्षम असून, त्या स्त्री- पुरूष आणि मुलांकरिता का लढू इच्छित नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत. साधारणपणे दुर्बलांचे रक्षण करणे हे सबलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याकडे या आयातींमध्ये न्यायप्रिय लोकांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आणि त्या अत्याचारग्रस्त लोकांच्याकडून अत्याचार कणाऱ्या लोकांविरूद्ध लढताना जी हिंसा होणार आहे त्या हिंसेला ईश्वराने ’न्याय हिंसा’ ठरवलेले आहे आणि हे सत्य समजण्यासारखे आहे. 

सरसकट बिगर मुस्लिमांच्याविरूद्ध कुठलेही कारण नसतांना ’लढा’ असे निर्देश देणारी एकही आयत कुरआनमध्ये नाही. उलट कुरआन म्हणतो की, 

1. ’’अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो.’’  (सुरे अलमुम्तहना आयत नं. 8).

ही आयत स्वयंस्पष्ट आहे. त्याच लोकाशी लढण्याची परवानगी आहे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेले असतील. धर्माच्या कारणावरून तुम्हाला घरातून बाहेर काढले असतील. बाकी कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्याशी न्यायपद्धतीने वागा. कारण असे लोकच ईश्वराला प्रिय आहेत. एवढे स्पष्ट उदाहरण दिलेले असतांना असे म्हणायला कुठे जागा राहते की, इस्लाम हा इतर धर्मियांचा द्वेष शिकवितो. त्यांच्याविरूद्ध हिंसा करायला प्रेरित करतो. 

या काही मोजक्या आयाती आहेत ज्या मी वाचकांच्या सेवेमध्ये सादर केलेल्या आहेत. अशा अनेक आयातींनी कुरआन भरलेले आहे. प्रश्न फक्त त्या आयातींचा मतीतार्थ समजून घेण्याचा आहे व याची प्राथमिक जबाबदारी मुस्लिमांची आहे. मुस्लिमेत्तरांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने कुरआनचा उपदेश पोहोचविणे हे त्यांच्या जीवनाचे उद्देश आहे. मुळात मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग कुरआनपासून व्यवहार्यरित्या तुटलेला असल्यामुळे कुरआनमधील निर्देशांचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. म्हणून अशा लोकांचे जीवनसुद्धा तणावग्रस्त आहे आणि भौतिकवादी लोकांच्या जीवनापेक्षा वेगळे नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे, इस्लाम तीन प्रकारच्या लोकांना पसंत नाही. एक- ज्यांच्या पर्यंत त्यांच्या मातृभाषेत इस्लामबद्दल पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. दोन - ते लोक जे मीडियाच्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. तीन - ते लोक   ज्यांना जगामध्ये मनमानी करावयाची आहे. अनैतिक जीवन जगायचे आहे. अनैतिक कृत्य करायची आहेत. अनैतिक पद्धतीने व्यवहार करायचे आहे. अनैतिक पद्धतीने साधन सामुग्री गोळा करायची आहे. अनैतिक व्यवसाय करायचे आहेत. जे लोक नैतिकतेचे पाईक आहेत, नैतिकतेला पसंत करतात. त्यांच्यासाठी गरज आहे ती या गोष्टीची की कुरआनचा परिचय प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सद्वर्तनातून करून द्यावा. तेव्हाच कुरआन विषयी असलेले गैरसमज बहुसंख्य बांधवांच्या मनातून दूर होतील.


- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget