Latest Post


सभ्यतांच्या उदय आणि ऱ्हासाबद्दल काही विचार या आधीच्या लेखात मांडले आहेत. आणखीन काही गोष्टींचा या संदर्भात तपास करताना असे दिसून येते की सभ्यतांचा विस्तार होत असताना किंबा एका ठराविक स्थितीस पोहोचल्यानंतर त्यांना ज्या समस्यांशी तोंड द्यावे लागते, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे प्रत्युत्तर देण्याची त्यांची क्षमता असते किंवा नाही. मुळात सभ्यतांचा जन्म कठीण प्रसंगातून होतो. अशा कोणत्याही सभ्यतेच्या अनुयायांमध्ये समोरील आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी नसेल तर त्या सभ्यतांचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही सभ्यतेचा प्रवास सतत सुरू असावा लागतो. एक व्यक्ती असो की समाज अथवा त्यापासून उदयास आलेली सभ्यता हे सर्व या विश्वाचे (Universe) घटक आहेत. ज्या प्रकारे धरती इतर ग्रह, धरतीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व या विश्वाचे घटक आहेत. हे ब्रह्मांड निर्मितीनंतर स्थिर नसून आपल्या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर सदैव विस्तारत आहे. एका व्यक्तीपासून जसे कुटुंब जन्माला येते, त्यापासून समाज, संस्कृती; तसेच या जगातील सर्व सभ्यता विस्तारत आहेत. हा सृष्टीचा नियम आहे. जर काही कारणाने विश्वातील एखादे अस्तित्व या सृष्टीच्या नियमाविरूद्ध जात असते तर मग त्याचा मृत्यू अटळ आहे. अशाच प्रकारे सभ्यतांना विस्तारायला हवे. त्या सभ्यतेमध्ये विस्तारासाठी पूरक तत्त्वे असायला हवीत. कोणत्याही संस्कृती-सभ्यतेमध्ये विभाजनाला थारा नसतो. यासाठी ती सभ्यता साऱ्या मानवजातीला आकर्षित करणे गरजेचे असते. जर मानवजातीला वेगवेगळ्या निकषांवर विभागले जात असेल तर ही प्रक्रिया सृष्टीच्या नियमांविरूद्ध जात आहे असे समजले जावे आणि नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्या सभ्यतेची नैतिक मूल्ये सर्वसमावेशक असायला हवेत. जर समाजातील मानवांना निरनिराळ्या निकषांवर विभागले गेले तर मग संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरेत विभाजन होईल. याचा अर्थ संस्कृतीचे रूपांतर परंपरेत होईल. परंपरा कोणत्याही मानवी समूहासाठी प्रगतीची दारे उघडत नाही. प्रगतीचे दार बंद झाले की ती संस्कृती स्वतःहून आपला विनाश ओढवते. तसेच सभ्येमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या त्या सभ्यतेतील माणसामाणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. वंश, वर्ण, जात अशा प्रकारचे भेदभाव जर माणसामाणसांमध्ये केले जाऊ लागले तर ती संस्कृती स्वतःच विभाजनाकडे जाते. अशा संस्कृतीवर आधारित सभ्यतादेखील मग एक सभ्यता म्हणून शिल्लक राहात नाही.

जगात ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने मानवजातीची विभागणी केली, पण ही विभागणी वर्ण, वंश, जात या निकषांवर नाही. ख्रिस्ती धर्माने मानवजातीला ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती अशी विभागणी केली, तर दुसरीकडे इस्लाम धर्माने सकल मानवजातीची विभागणी श्रद्ध आणि अश्रद्ध अशी केली. म्हणजे ही बिभागणी अटळ नाही. आज जे लोक ख्रिस्ती नाहीत उद्या ते ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू शकतात. तसेच ज्या लोकांनी इस्लाम धर्मावर आज श्रद्धा ठेवलेली नाही ते उद्या श्रद्धा बाळगू शकतात.

कोणतीही वैश्विक सभ्यता ज्या धर्मावर ती आधारित असेल त्या धर्माची विचारधारा देखील वैश्विक असायला हवी. म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंगत असायला हवी. त्याच्या शिकवणी एखाद्या विशिष्ट समाज-समूहासाठी, भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशांसाठी, विशिष्ट जाती-समुदायासाठी नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी असायला हवी. त्याचे संबोधन साऱ्या मानवजातीला असायला हवे. या निकषांवर जगातील दोन सभ्यतांमध्ये बरेच साम्य आहे. एक ख्रिस्ती आणि दुसरे इस्लाम. या दोन्ही सभ्यता ज्या धर्मावर आधारित आहेत त्यांच्या शिकवणी साऱ्या मानवजातीसाठी आहेत. यासाठी ईश्वराची कल्पना एकत्वाची असावी. इस्लाम धर्मात एकमेव ईश्वराची कल्पना असल्याने सारी मानवजात समान आहे. समानता ज्या सभ्यतेत नसेल ती सदोष असेल आणि दीर्घकाळानंतर त्या सभ्यतेत विभागनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एकाच ईश्वराने साऱ्या मानवजातीला एक पुरुष आणि एका स्त्रीच्या जोडप्याद्वारे जन्म दिला असल्याने सारे मानव एकसमान आहेत. जर मानसामाणसांत भेदभाव केला गेला तर तो धर्माच्या शिकवणींविरूद्ध असल्याने त्याला महत्त्व उरत नाही. ख्रिस्ती धर्मात ईश्वराचे तीन रूप मानले जात असल्याने काही प्रमाणात त्या धर्माच्या अनुयायांमध्ये समानतेचा अभाव आढळतो. एका प्रख्यात इतिहासकाराने असे म्हटले आहे की पाश्चिमात्य राष्ट्रवादाने राष्ट्रवादाच्या विषाणूला जन्म दिला म्हणून ख्रिस्ती सभ्यता एकसंघ राहू शकली नाही. आज ज्या सभ्यतेला ख्रिस्ती सभ्यता म्हणतात ती खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य सभ्यता आहे.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सभ्यतेने मानवजातीच्या विकासात योगदान द्यायला हवे. आज जगात पाश्चात्य सभ्यतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याचे कारण असे की मानवी जीवनाचा एकही पैलू त्यांनी असा सोडला नाही ज्याच्या विकासात पाश्चात्य विचारवंतांनी आपले योगदान दिले नसेल. विज्ञानाचे क्षेत्र असो की मानवजातीच्या आरोग्याचे तंत्रज्ञान असो की इतर कोणतेही क्षेत्र, या सर्वांमध्ये पाश्चिमात्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. पण त्याचबरोबर जगातील इतर राष्ट्राचा नाश करण्यात देखील पाश्चात्य सभ्यताच सर्वांत अग्रेसर आहे. त्याचे हे कर्तृत्व सृष्टीच्या नियमांविरूद्ध असल्याने त्याला याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागणार आहेत हेदेखील निश्चित. ख्रिस्ती धर्मियांच्या आधी मुस्लिम शास्त्रज्ञांनी विद्वानांनी जगभर ज्ञानाचा प्रसार केला. ते विज्ञानाचे क्षेत्र असो की तंत्रज्ञानाचे मुस्लिम वैज्ञानिकांनी बरेच शोध लावलेले आहेत. बरेच तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, इतिहास, वाड्मय आणि इतर ज्ञानाच्या साऱ्या स्रोतांची सुरुवात मुस्लिमांनी केली. नंतरच्या काळात यूरोपियनांनी हा वारसा पुढे चालवतच इतर नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाचा विकास केला, जो आम्ही सध्या पाहात आहोत. खगोलशास्त्र आणि अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रांमध्येदेखील मुस्लिमांनी बरेच संशोधन केले. जगातली पहिली नासासारखी वेधशाळा तुर्कीमध्ये होती.

इस्लामी शिकवणींची सुरुवातच मानवजातीच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या आदेशाने होते. कोणतीही मुस्लिम व्यक्ती जोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असत नाही तोवर तो सदाचारी होऊ शकत नाही. कोणत्याही सभ्यतेला धर्माचा, धार्मिक ग्रंथाचा मुलाधार नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकू शकत नाही. धर्माशी बंड करून जगात कम्युनिझमची विचारधारा विकसित करण्यात आली. त्या विचारधारेवर आधारित राष्ट्र सभ्यतेची निर्मिती करताना रशिया, चायना वगैरे देशांमध्ये २-४ कोटी लोकांची हत्या केली गेली. मानवजातीचे रक्त सांडून जी सभ्यता जगात रुजविण्याचे प्रयत्न केले गेले ती जेमतेम ५० वर्षे टिकली नाही. चायनाने उघडपणे जरी कम्युनिझमशी फारकत घेतली नसली तरी त्या राष्ट्रात ती नष्ट झाली आहे. नावापुरता कम्युनिस्ट पक्ष जीवंत ठेवला आहे, ते जगाला दाखवण्यासाठी. निधर्मी सभ्यता असो की निधर्मी राज्यसत्ता मानवजातीने त्यांना कधीही महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. सभ्यतेचा आधार नेहमी धार्मिक शिकवण, आचारविचार, नीतीशास्त्र, धार्मिक विधी राहिला आहे.

पण या धार्मिक शिकवणींचा आधार कोणता? प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ असतात ज्यांना धर्माचे, धार्मिक शिकवणींचे मूळ समजले जाते. पण हे धार्मिक ग्रंथ कशाच्या आधारवर आहेत? ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ मानवाने रचलेले, साकारलेले नाहीत, तर ते एकमेव ईश्वराने पाठवलेले आहेत. या ग्रंथांमध्ये ज्या शिकवणी आहेत त्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या नाहीत तर बुद्धिमत्ताच या शिकवणींचा मुलाधार आहे, असे जाहीरपणे घोषणा करतात. शिवाय धर्मग्रंथामधील शिकवणी शंकास्पद नसायला हव्यात. कुरआनातील शिकवणींची सुरुवातच अशी होते की हा धर्मग्रंथ अल्लाहने पाठविलेला आहे यात शंका नाही आणि त्याबरोबर या धर्मग्रंथातील कोणतीही गोष्ट अशी नाही जी शंकास्पद असेल. जगाने कितीही ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला असला तरी आजदेखील इस्लामचा धर्मग्रंथ कुरआनातील कोणत्याही गोष्टींना विज्ञानाने आव्हान दिलेले नाही.

सांगायचे तात्पर्य हे की कोणत्याही सभ्यतेच्या शिकवणींचा मुलाधार भक्कम असणे गरजेचे आले. जर यात त्रुटी आढळत असतील तर मग एक तर तो ग्रंथ मानवाने रचलेला आहे किंवा यातील मजकुरामध्ये मानवांनी आपल्या आवडीनिवडीनुसार ढवळाढवळ केलेली असेल.


- सय्यद इफ्तिखार अहमद




इस्लामने आवश्‍यकतेपेक्षा अधिक धन जमा करण्यास निषिद्ध ठरविलेआहे. इस्लामची अपेक्षा आहे की जो काही माल आपल्याजवळ आहे एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करा अथवा दुसऱ्यांदा द्या. ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील आणि अशा प्रकारे पूर्ण संपत्ती समाजात फिरत राहील एका ठिकाणी जामा राहणार नाही.परंतु तुम्ही जर असे करत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे अडीच टक्के रक्कम प्रति वर्ष काढून घेतली जाईल आणि तिला त्या लोकांच्या सहय्यतेत खर्च केले जाईल जे आर्थिक संघर्षात भाग घेण्याच्या योग्य नाहीत किंवा संघर्ष अथवा प्रयासाव्यतिरिक्त जे आपला पूर्ण वाटा मिळण्यापासून वंचित आहेत याचे नाव जकात आहे. याच्या प्रबंधाची पद्धत इस्लामने प्रस्तुत केली आहे. जकात समाजाच्या संयुक्त कोषात जमा केली जाते. कोषागार त्या सर्व लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जातो ज्यांना मदतीची गरज आहे ही समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे. यामुळे त्या सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंधन असल्याने निर्माण होत असतात. भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामांमध्ये लावण्यावर विवश करीत असते आणि जिच्या कारणास्तव जीवन विमा आदींची गरज असते ती ही आहे की प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली आणि काहीही शिल्लक ठेवले नसेल तर उपाशी मरेल. मुलाबाळांसाठी काही सोडल्याविनाच जर कोणी व्यक्ती मेली तर ते दारोदार भटकतील आणि भिकेचा तुकडा ही मिळवू शकणार नाहीत. आजारी पडल्यावर शिल्लक नसेल तर उपाय सुद्धा करू शकणार नाही.

घर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला किंवा कोणती आणखी आपत्ती आली तर कुठूनही त्याला साह्यता मिळण्याची आशा नाही. याचप्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकत असते. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार देतो त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर उपाशी राहिल. भांडवलशाहीच्या इनामा पासून तोंड फिरवून त्याला दोन वेळची भाकरी मिळणे कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेच्या जग विळख्यात आहे की, एकीकडे लाखो करोडो माणसे वंचितावस्थेत आहेत आणि दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहेत. परंतु त्याला विकत घेतले जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवांच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे कारण हेच आहे की वंचित लोकापर्यंत जीवन सामग्री पोहोचविण्याचा कोणताही प्रबंध नाही. या सर्वामध्ये क्रयशक्ती निर्माण केली जावी आणि ती आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जावेत. सारांश हा की व्यापार उद्योग आणि कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिना याद्वारे सर्व बिघडाना दूर करतो. बैतूलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाच्या भूमिकेने हजर आहे. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बायतुल माल मधून आपला हक्क घेऊन यावा. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची काय गरज. आपण आपल्या मुलाबाळांना सोडून समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकता. आपल्या मागे सरकारी खजिना त्यांचा जवाबदार आहे. आजारपण वृद्धत्व आणि प्राकृतिक संकटे मग ती आसमानी असो वा जमिनी प्रत्येक परिस्थितीत बैतुलमाल आपला स्थाई सहाय्यक आहे. भांडवल शाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाही. बैतूलमाल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. बैतूलमाल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांना गरजेचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मालाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो एका ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे तो वारसा हक्काचा कायदा आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव याकडे आहे की जी संपत्ती एका व्यक्तीने साठविली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत हि पद्धत अवलंबवीत की ज्या संपत्तीला एक व्यक्ती साठवूण -साठवून एका ठिकाणी कैद करत राहिला होता, तो मरताच ती वाटून दिली जावी. इस्लामी कायद्यात मुले -मुली ,आई वडील, भाऊ बहिण आणि पत्नी सर्व एका व्यक्तीचे वारस आहेत. आणि एका नियमानुसार सर्वांमध्ये पैतृक संपत्तीचे वाटणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबचे नातेवाईक शोधले जातील आणि त्यांच्यामध्ये ही संपत्ती वाटण्यात येईल. कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जीभेने म्हटलेला मुलगा मानण्याचा हक्क नाही. या स्थितीत पूर्ण समाज त्याचा वारस आहे. त्याची साठवलेली सर्व संपत्ती बैतुलमाल मध्ये जमा केली जाईल या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोडो अथवा अब्जावधीची संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन पिढ्यांमध्ये ती सर्व लहान लहान तुकड्या मध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील.

मी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थांचा उल्लेख केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध औद्योगिक विवाद त्यांचे जे नीपटारे तथा उद्योग धंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जिऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी इस्लामी कायद्यात पूर्ण संभावना सुद्धा ठेवली गेलेली आहे. त्यांना या संक्षिप्त लेखात प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्याप्रकारे आयात-निर्यातीचा कर आणि देशाचे व्यापारी माल आणण्यावर आणि घेऊन जाण्याच्या प्रतिबंधाना हटवून गरजेच्या सामानांचा स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे. त्याचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधी सुद्धा मिळाली नाही की प्रशासनिक व्यवस्था सिविल सेवा आणि सेनेच्या खर्चांना संभावित सीमेपर्यंत घटवून आणि न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटी ला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरुन त्या आर्थिक ओझ्याला इतके हलके केले आहे की, करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहुन वाढलेल्या खर्चामध्ये खपून टाकण्याऐवजी समाजाच्या सुख सुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान केलेली आहे. यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती मोठी कृपा बनून जाते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञांतापूर्ण संकीर्णता वारसाहक्कात मिळालेली आहे तसेच गैर सलामी शासनयंत्रणेने आपले प्रभुत्व जमविल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे, त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेक्षणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. आशा, आहे की एकही न्यायप्रिय व्यक्ती असा भेटणार नाही की जे मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला सर्वात अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धीसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज असेल की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालविले जाऊ शकते तर मी त्याला निवेदन करीन की कृपया या गैरसमजाला मनातून काढून टाकावे. या आर्थिक व्यवस्थेचा घनिष्ठ संबंघ इस्लामच्या राजनैतिक, न्यायिक, कायदेविषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेवर कायम आहे आणि ती नैतिक व्यवस्था ही स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर टिकून आहे की आपण एका सर्वशक्तिशाली आणि सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजावे. मृत्यूनंतर पार लोकिक जीवनाला मानावे आणि हे सुद्धा स्वीकार करावे की परलोकात अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणी नुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मुहम्मद सल्लम यांनी जे नियम आणि कायदे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याचा एक भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे, ती पूर्णतः अल्लाहच्या आदेशावर आधारित आहे, यावर दृढ विश्वास ठेवा जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसहि आपल्या योग्य आत्म्याने चालू शकणार नाही आणि न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उल्लेखनीय लाभ उठवू शकाल.

(भाग - ४ समाप्त)

- अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



‘‘दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेले आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही.’’ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\

‘‘ ज्या मुल्यांमुळे माणसाचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते त्या मुल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता)’’ - जॉर्ज जॅकब दोलिओ (फ्रेंच तत्ववेत्ता)

धर्मनिरपेक्षता ही आधुनिक काळातील जागतिक जीवनशैली आहे यात शंका नाही. विशेष करून फ्रेंच राज्यक्रांती (1789 ते 1799) नंतर जगात धर्मनिरपेक्षतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुल्ल्यांचा उदो-उदो केला गेला व आजही केला जातो आहे. तुम्ही जर गुगलला प्रश्न विचारला की फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावर परिणाम काय? तर तुम्हाला उत्तर देईल की, ’’फ्रेंच राज्यक्रांतीमुळे आर्थिक, सामाजिक समतेची भावना जगभर पसरली. धार्मिक स्वातंत्र्य आणि सहनशिलतेचा प्रचार वाढला. नागरिकांना स्वातंत्र्य प्रदान केले गेले. व्यक्ती स्वातंत्र्याला मान्यता मिळाली. या क्रांतीने जगाला लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयतेची प्रेरणा दिली.’’ धर्मनिरपेक्षतेनंतर अलिकडे ज्या लोकशाही मुल्याला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे ते म्हणजे राष्ट्र होय. आधुनिक जगामध्ये राष्ट्रवादाच्या स्थानाइतके उंच स्थान दुसऱ्या कुठल्याच मुल्याला नाही.  

निर्विवादपणे वरील सर्व मुल्य ही उच्च मानवी मुल्य आहेत मात्र प्रत्यक्षात ही मुल्य जमीनीवर कुठेच दिसून येत नाहीत. धर्मनिरपेक्षतेचे स्थान बहुसंख्यवादाने घेतलेले आहे. या संदर्भात डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे खालीलप्रमाणे-’’दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेलेे आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही. (संदर्भ : डॉ. आंबेडकर 1947 स्टेट अँड मायनॉरिटीज, https://drambedkar.co.in/wp-content/uploads/books/category2/11states-and-minorities.pdf, retrived on 10-07-2021)


स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य,  धर्मनिरपेक्षता ही सर्व मानवनिर्मित मुल्य आहेत आणि ही मुल्य जर प्रत्यक्षात जमिनीवर लागू केली गेली नाहीत तर जनता सत्ताधाऱ्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. म्हणूनच ट्रम्प सारखे धटिंगन बायबलवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतरही सत्तेत येताच सर्व लोकशाही मुल्यांना पायाखाली चिरडून फक्त गोऱ्यांच्या हितासाठीच सरकारची सर्व शक्ती पणाला लावतो. आपल्याच देशातील काळ्या नागरिकांना शत्रु सारखी वागणूक देतो. बाहेरून येऊन अमेरिकेला महान बनविणाऱ्या अप्रवासी लोकांना पक्षपाती वागणूक देतो. प्रसंगी त्यांचे मुडदे पाडण्यासाठी लोकांना प्रेरित करतो. एवढेच नव्हे तर देशाच्या संसदेवर चालून जाण्यासाठी चिथावणी देतो. थोडक्यात ही मानवनिर्मित जीवनपद्धती असल्याने त्रुटीपूर्ण आहे आणि याच त्रुटींचा लाभ उठवत धोरणी राजनेते आपल्या जाती-धर्माचे राजकारण करतात व बाकींच्यांना वाऱ्यावर सोडून देतात. 

इस्लामी जीवनशैली

तुफानों से आँख मिलाओ

सैलाबों पर वार करो

मल्लाहों का चक्कर छोडो

तैर के दरिया पार करो

धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैली शिवाय इस्लामवर आधारित लोकशाही जीवनशैलीही जगात अस्तित्वात असून ती ईश्वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीविरहित आहे. प्रसारमाध्यमे हाती नसल्यामुळे ही जीवनशैली जगामध्ये फारसी परिचित नाही  उलट प्रसारमाध्यमे हाती एकवटलेली असल्यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैलीचा परिचय सर्व जगाला आहे. इस्लामी जीवनशैलीचे वैशिष्ट्ये म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधूता, धर्मनिरपेक्षता, आर्थिक आणि व्यक्ती स्वातंत्र्यच नव्हे तर समग्र मानवकल्याण हे या जीवनशैलीमध्ये निहित आहे. इस्लामी लोकशाही जीवनशैलीचा दुरूपयोग धर्मनिरपेक्ष लोकशाही पद्धतीप्रमाणे करता येत नाही, हे या शैलीचे दूसरे वैशिष्ट्ये आहे. कारण याचा दुरूपयोग केल्यास या जीवनात व मरणोपरांत जीवनात दोन्हीमध्ये त्याचा हिशोब घेतला जाणार आहे हे इस्लामी सत्ताधाऱ्यांना कायम लक्षात ठेवावे लागते. 

प्रत्यक्षात ही जीवनशैली कशी आहे याचा परिचय खालीलप्रमाणे - 

1. अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान : आयत क्र.19) 

या आयातीमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाची ही श्रद्धा आहे की, इस्लामी जीवनशैली हीच खरी जीवनशैली असून याद्वारेच मानवाचे खरे कल्याण साधले जाऊ शकते. हा केवळ माझा अंदाज नसून कुरआनने ही बाब अधिक स्पष्ट करताना स्वतःच म्हटले आहे की, 

2. ’’आणि ह्या अपेक्षेने कि माझ्या आदेशांच्या पालनाने तुम्हाला त्याचप्रकारे कल्याणाचा मार्ग लाभावा ज्या प्रकारे (तुम्हाला या गोष्टीने सफलता लाभली की) मी तुमच्यामध्ये खुद्द तुमच्यामधूनच एक प्रेषित पाठविला जो तुम्हाला आमचे संदेश ऐकवीत आहे. आणि तुमचे जीवन पवित्र करून तुम्हाला ग्रंथ व विवेकाची शिकवण देत आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवीत आहे ज्या तुम्हाला माहीत नाहीत.’’(सुरे बकरा : आयत नं. 151).

स्पष्ट आहे की, पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा माणसा-माणसांंमध्ये भांडण झाले तेव्हापासून मानवी समुहामध्ये समन्वयासाठी अनेक संस्था अस्तित्वात आल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची संस्था धर्म आहे. धर्माद्वारे एक विशिष्ट अशी जीवनशैली निश्चित केली जाते. त्या जीवनशैलीच्या परिघाबाहेर कोणालाच जाता येत नाही. हे अशासाठी केले जाते की त्यातून सर्वच माणसांचे कल्याण साधता यावे, परंतु इस्लाम व्यतिरिक्त इतर सर्व धर्म ही मानवनिर्मित असल्यामुळे किंवा मानवांनी हस्तक्षेप केल्यामुळे विकृत झाल्यामुळे, त्यातून मानवकल्याण साध्य होणे शक्य नाही. जेव्हा जग सभ्य युगात पोहोचले तेव्हा ईश्वराने शेवटचे प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल. यांना पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व माणसांचा मार्गदर्शक म्हणून पाठविले आणि कुरआनला मानवी जीवनाची आचारसंहिता म्हणून अवतरित केले. यामुळे आता मनाप्रमाणे वागण्याची सोय राहिलेली नाही. 

3. इस्लामी जीवनशैली जरी ईश्वराला पसंत असली आणि तीच सर्व मानवांनी अंगीकारावी अशी जरी ईश्वरीय इच्छा असली तरी या जीवनशैलीला बळजबरीने ईश्वराने मानवावर लादलेले नाही. म्हणूनच कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की,’’ धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत (ईश्वराशिवाय इतर शक्ती) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला की जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’  (सुरे बकरा : आयत नं. 256).

या आयातीनुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, इस्लामी जीवनशैली ही ऐच्छिक जीवनशैली आहे. ज्यांनी तिचा अंगीकार केला ते यशस्वी झाले व ज्यांनी तिला नाकारले त्याचे त्यांना मुल्य चुकवावे लागले व प्रलयाच्या दिवसापपर्यंत चुकवत रहावे लागेल. कुरआनच्या अवतरणाचा मुख्य उद्देशच मानवाला उच्च नैतिक मुल्यांचे मार्गदर्शन करणे होय. या व्यतिरिक्त जेवढेही मार्गदर्शन जगामध्ये आहे ते कुठे ना कुठे जाऊन मानवाला अपाय करते. उदा. धर्मनिरपेक्ष लोकशाही ही अतिशय उत्कृष्ट जीवन पद्धती जरी असली तरी तिचे प्रत्यक्ष स्वरूप काय आहे हे डॉ. आंबेडकरांच्या वर नमूद विचारावरून एव्हाना स्पष्ट झालेले आहे व या जीवन पद्धतीचा किती दुरूपयोग होतो हे आपण आपल्या डोळ्यांनी रोज पाहत असतो. 

अल्लाहचे सहाय्यक कोण?

ना शरियत ना तरिकत ना हकीकत ना मजाज

कौन काफीर तुझको कहेता है के मुसलमान है तू

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे सहाय्यक बना ज्याप्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, ’’कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?’’ आणि हवारींनी उत्तर दिले होते, ’’आम्ही आहोत अल्लाहचे सहायक.’’ त्यावेळी बनीइस्राईलच्या एका गटाने श्रद्धा ठेवली आणि दुसर्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रद्धावंतांचे त्यांच्या शत्रुविरूद्ध समर्थन केले आणि तेच विजयी ठरले.’’  (सुरे सफ : आयत नं.14)

वर नमूद आयत जरी येशू ख्रिस्तांना उद्देशून कुरआनमध्ये आलेली आहे तरी त्यातील आदेश येशू ख्रिस्तानंतरचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांना सुद्धा लागू पडते. या आयाती संदर्भात स्पष्टीकरण देतांना मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी लिहितात, ’’अल्लाहचे सहाय्यक बना याचा अर्थ असा मुळीच नाही की (अल्लाह क्षमा करो) अल्लाह मानवकल्याणाचे काम स्वतः करू शकत नाही व त्याला माणसाच्या सहाय्यतेची गरज आहे, असे यासाठी म्हटलेले आहे की, अल्लाहची जरी इच्छा असली की मानवाने इस्लामी जीवन शैलीचा अंगीकार करावा त्यासाठी इस्लामवर श्रद्धा बाळगावी, कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करावे, वाईट कृत्यांपासून दूर रहावे तरी तो आपली ही इच्छा आपल्या (ईश्वरीय) शक्तीने मानवावर थोपवू इच्छित नाही’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)

ईश्वराने मानवाला सर्वश्रेष्ठ जीव बनवून बुद्धी प्रदान केली आणि चांगला आणि वाईट यामधील फरक करण्याची समज दिली, पृथ्वीवर कुरआनचे मार्गदर्शन पाठविले, प्रेषित सल्ल. आणि त्यांचे सहकारी साहबा रजि. यांच्या मार्फतीने ते मार्गदर्शन यशस्वीपणे सातव्या शतकात अरबास्थानामध्ये यशस्वीपणे राबवून दाखविले. तो समाज उत्कृष्ट मानवी समुह होता. ज्याने 100 वर्षे एक तृतीयांश पृथ्वीवर आपला ठसा उमटविला. तेच मार्गदर्शन माणसाने आपल्या मर्जीने स्वीकारावे ही ईश्वराची मर्जी आहे. त्यासाठी ईश्वराने उपदेशाची पद्धत अवलंबिलेली आहे; जबरदस्ती केलेली नाही. मौलाना मौदूदी म्हणतात, ’’या ईश्वरीय मार्गदर्शनाचा स्वतः मर्जीने ज्यांनी स्वीकार केला त्यांना मोमीन (खरे मुस्लिम) म्हणतात, ज्यांनी त्याची जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली त्याला विश्वसनीय आणि आबिद (भक्त) म्हणतात, जो त्या पुढच्या पायरीवर पोहोचतो आणि ईश्वरीय मर्जीप्रमाणे स्वतः रूपांतरित होऊन जातो त्याला मुत्तकी (चारित्र्यवान) म्हणतात, जो चांगल्या कामामध्ये आणखीन एक पाऊल पुढे जातो आणि इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करतो आणि इस्लामी जीवनशैलीला स्वतःच्या आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नरत राहतो त्याला ईश्वर, स्वतःचा सहाय्यक (मददगार) म्हणून मान्यता देतो आणि इस्लामी जीवनशैलीचे हे सर्वात उंच शीखर होय.’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अभियान

देखी गई ना मुझसे अंधेरों की सरकशी

खुद आफताब बनके निकलना पडा मुझे

भौतिक जीवनशैलीच्या अतिरेकामुळे आज जीवनाचा उद्देश फक्त कमाविणे, खाणे आणि मनोरंजनात व्यस्त राहणे इतकेच राहून गेलेले आहे. जनता आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक अदृश्य अशी दरी निर्माण झालेली आहे. सत्ताधारी हे जनकल्याणाच्या नावाखाली स्वतःचे पोटभरण्याचे धंदे करत आहेत. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, स्त्रीयांवर अत्याचार वाढलेले आहेत, मुलांची तस्करी होत आहे, दारू आणि ड्रग्ज यांचा मुक्त हस्ते वापर होत आहे, व्याजाधारित अर्थव्यवस्थेने शेतकरीच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांनाही आत्महत्या करण्यास विवश केलेले आहे, सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनी कोट्यावधी रूपयाचे घोटाळे करून विदेशात पलायन केलेले आहे, त्यांना परत आणण्याची सरकारची मुळीच इच्छा नाही, त्यामुळे अनेक बँका बुडालेल्या आहेत, बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईने सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने राष्ट्रवाद आणि जातीयतेची मात्रा जनतेला देऊन व्यस्त ठेवण्याचे काम सुरू केले आहे. 

एकंदरित या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्ये केवळ सकारात्मक विचारांची मात्राच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी उमेद देऊ शकते म्हणून जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ हे अभियान सुरू केलेले आहे. यातून जास्तीत जास्त लोकांना जमाअते इस्लामीचा परिचय करून देऊन त्यांना अल्लाहचे सहाय्यक म्हणून तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे. शीतल पवित्र आणि उच्च नैतिकतेने परिपूर्ण जीवन जगण्याची जगातील सर्वात प्रभावशाली पद्धत जर कुठली असेल तर ती इस्लामी जीवनपद्धती आहे. या पद्धतीचे महत्त्व दुसऱ्यांना पटवून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव वाढविणे आणि कोविडमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीनंतर हलाखीचे जीवन जगत असलेल्या जनतेमध्ये अंतर्गत ऊर्जा निर्माण करून भविष्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचा उद्देश असून, या मोहिमेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी जमाअतचे तत्वज्ञान समजून घेऊन स्वतःला अल्लाहचे सहाय्यक बनविण्यासाठी प्रयत्न करावा. इस्लामचा हा सर्वोच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची समज, अल्लाह आपल्या सर्वांना देओ आणि आपल्या या प्रिय देशाला जगामध्ये नैतिक दृष्ट्या उच्च स्थानावर नेण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये निर्माण करो, हीच प्रार्थना. आमीन. 

- एम.आय.शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget