Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी एका व्यक्तीला टंचाईत मदत केली तर अल्लाह त्या व्यक्तीला या जगी आणि परलोकात मदत करील. जर कुणास असे वाटावे की अल्लाहने कयामतच्या दिवशी त्याची मदत करावी तर त्यांनी टंचाईत सापडलेल्या माणसाचा बोजा कमी करावा किंवा त्याला माफ करावे.

प्रेषित म्हणाले की ‘‘जर कुण्या माणसानं आपल्या मुस्लिम बांधवांच्या कृत्यांवर पडदा टाकला तर अल्लाह कयामतच्या दिवशी अशा व्यक्तीच्या कृत्यांवर पडदा टाकेल.’’

अबु हुरैरा म्हणतात की प्रषितांनी मुस्लिमांना उद्देशून सांगितले की तुम्ही श्रद्धेचा स्वीकार करत असाल तरी तुमच्या मनांमध्ये श्रद्धा पोहोचली नाही, तुम्ही एकमेकांच्या गोष्टी कुणाला सांगू नका आणि लोकांच्या गुपित गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नका. जर कुणी लोकांची गुपिते उघड करत असेल तर अल्लाह त्याच्या गुप्त गोष्टी बाहेर आणील आणि अशा माणसाला त्याच्या नातेवाईकांच्या नजरेतच बदनाम करील.

‘‘जे लोक श्रद्धावंतांमध्ये व्यभिचाराला प्रोत्साहन देऊ इच्छितात त्यांना या जगी आणि परलोकात यातनादायक शिक्षा दिली जाईल.’’ (कुरआन, सूरह नूर)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या भाऊबंदांना मदत करत राहतो, तोपर्यंत अल्लाह देखील अशा व्यक्तीला मदत देत असतो. जो कुणी आपल्या भावाच्या गरजा पूर्ण करण्यात व्यक्त असतो अल्लाह देखील त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो.’’

हजरत उमर (रजि.) म्हणतात, ‘‘सर्वोत्तम नेकी श्रद्धावंताना सदैव प्रसन्न ठेवत राहणे आहे. त्याला वस्त्रं नसतील तर त्यांची पूर्तता करा. तो भुकेला असेल तर त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा.’’

दुसरे खलीफा ह. उमर (रजि.) विधवा महिलांच्या घरी रात्रीच्या वेळी पाणी भरत असत. ह. अबु बाईल (र.) गल्ली-मोहल्ल्यातील वयस्क आणि निराधार महिलांची सेवा करत असत.

अबु दाऊद (रजि.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे त्यांचे अनुयायी जमले होते. ते प्रेषितांना एका व्यक्तीविषयी सांगत होते की आम्ही त्यांच्यासारखा नेक माणूस पाहिला नाही. जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर चालत होतो तेव्हा ते पवित्र कुरआनचे पठण करत असत. आम्ही सर्वजण कुठे थांबलो तर ते नमाज अदा करत ऱाहतात. त्यावर प्रेषितांनी त्यांना विचारले, ‘‘अशा वेळी त्यांच्या गरजा कोण पूर्ण करत होते?’’ प्रेषितांनी प्रत्येक गोष्टीविषयी विचारणा केली. त्यांच्या जनावरांची देखभाल कोण करत? हेदेखील विचारले. तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले की त्यांची सर्व कामे आम्ही करत होतो. यावर प्रेषित म्हणाले, ‘‘मग तर तुम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा महान आहात.’’

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) यांच्या पुढाकाराने अहमदनगर येथील कासिम खानी मस्जिद येथे UPSC , MPSC , NEET , JEE , LAW सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या स्टडी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण , स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली पुस्तके ,ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रोजेक्टर , अभ्यास करण्यासाठी स्टडी चेयर आणि विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मस्जिद चा वापर फक्त प्रार्थना करण्यापूर्ता मर्यादित न ठेवता ज्ञानोपासनेसाठी त्याचा वापर करणे हा आजच्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात देखील याच प्रकारे मस्जिद चा वापर हा ज्ञानदानासाठी केला जात असे. मस्जिद ही संस्था सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या दृष्टीने विविध आणि व्यापक कार्ये करत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामिक शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करण्यासाठी कुबा मस्जिद, अल-मीरबाद मस्जिद आणि नबवी मस्जिद ची निर्मिती मदिना येथे केली. मस्जिद मध्ये मुस्लिम, जगाच्या आणि परलोकाच्या चिंतेसाठी ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल शिकत आणि चिंतन करत. तेथूनच विचारवंत आणि दूरदर्शी विद्वान निर्माण होत असत.

कुरआनमध्ये 28 वेळा ’मस्जिद’  या शब्दाचा उल्लेख आला आहे तसेच सफ , बैत , बुयुत सारख्या संबंधित शब्दांचा संदर्भ घेतला तर कुरआनने नंतर 46 वेळा मस्जिद या विषयाला स्पर्श केला आहे. मस्जिद किंवा मस्जद या अरबी शब्दावरून मशीद हा शब्द आला आहे. शब्दशः याचा अर्थ सुजुद (सजदा) करण्याची जागा असा होतो. म्हणजेच अल्लाहच्या भक्तीचे प्रतीक म्हणून कपाळ जमिनीवर लावणे.या संदर्भानुसार ’मस्जिद’ म्हणजे नमाज पठण करण्यासाठी जागा म्हणून परिभाषित केले जाते.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मस्जिद विशेषत: लेक्चर हॉल म्हणून तयार केल्या गेल्या होत्या, नंतर हजरत उमर रजि. यांच्या कालखंडात शिक्षणाच्या हेतूसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यापूर्वी मस्जिद च्या इमारतीचे अनेक कोपरे शैक्षणिक क्रियाकलापांसाठी काटेकोरपणे राखीव ठेवण्यात आले होते. केवळ धार्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठीच नव्हे, तर मशिदींना इस्लामी सीमारेषेतील ज्ञानाच्या विविध शाखांच्या विकासासाठीचे स्थान मानले जाते. मशिदींना शिक्षणाची ठिकाणे मानण्याची परंपरा आजही कायम आहे. उदाहरणार्थ, इजिप्तमधील प्रसिद्ध अल-अझहर युनिव्हर्सिटी जे अल-अझहर मस्जिद मध्ये स्थापन करण्यात आली आहे. काही इस्लामिक देशांमध्ये अशा इतरही अनेक मस्जिद आहेत ज्या मस्जिद म्हणून ओळखल्या जात नाहीत परंतु विद्यापीठे म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी ट्युनिशियामधील अल-झायतुना मस्जिद, मोरोक्कोमधील अल-कारावीयिन मस्जिद आणि इजिप्तमधील अल अझहर मस्जिद इ.

भारतातही चेन्नई शहरातील मक्का मस्जिद ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (उर्वरित आतील पान 7 वर)

निवासी प्रशिक्षण आणि स्टडी सेंटर चालवते तसेच मुंबई आणि बिहार येथील हज हाऊस च्या इमारतीत देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.पण ही काही मोजकीच उदाहरणे आहेत. मस्जिद या संस्थेचा व्यापक लोक कल्याणकारी कार्यासाठी आणि ज्ञानोपासानेसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. म्हणूनच कासिम खानी मस्जिद , अहमनगर च्या व्यवस्थापक समितीने मस्जिद मध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर सुरू करण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

मस्जिद हे मानवी संसाधन निर्मितीचे आणि समुदाय परिवर्तनाच्या विकासाचे केंद्र म्हणून कार्यरत राहणे ही आजच्या काळातील आवश्यकता आहे. मस्जिद ही संस्था केवळ धार्मिक प्रार्थना करण्याचे स्थान एवढ्या एकाच कार्यासाठी मर्यादित न ठेवता त्यांचा व्यापक वापर समाज कल्याण आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून असला पाहिजे. ऐतिहासिकदृष्ट्या, मस्जिद जकात, जकात-अल-फितर, जिझिया, खराज, घनिमा आणि फाय मिळविण्यासाठी केंद्रे म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर मस्जिद मुस्लिमांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून देखील मानल्या जातात ज्यामध्ये व्यावसायिक व्यवहार, कर्ज आणि कृतींचा समावेश असत. यासोबतच संघर्ष निवारण, न्यायदान, लोकशाही पद्धतीने आपला अमीर निवडणे त्यांच्याशी संबंधित इतर सामाजिक मेळावे किंवा बैठका देखील मस्जिद मध्ये आयोजित केल्या जात असत. मस्जिद चा व्यापक आणि विधायक कार्यासाठी वापर करण्याची ही परंपरा कासिम खानी मस्जिद मध्ये पुन्हा सुरू करून भारतातील इतरही मस्जिद व्यवस्थापकांसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल मस्जिदच्या व्यवस्थापक समितीचे अभिनंदन.निश्चितच याचा उपयोग परिसरातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना होईल आणि ते विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजाची आणि देशाची सेवा करतील.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र चे नायब अमीर जमीर कादरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार,अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम शेख, हिंदुस्थानी समाज, जमाते इस्लामी हिंदचे सचिव डॉ. सय्यद रफीक पारनेरकर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जमीर कादरी म्हणाले,’जमाते इस्लामी हिंद ही संस्था देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असून भारताला जगातील पहिल्या तीन क्रमांकाची महासत्ता बनवणे हे त्यांचे लक्ष आहे. या कार्यासाठी नैतिक आणि चारित्र्यसंपन्न अधिकारी घडावेत यासाठी कासिम खानी मस्जिद स्टडी सेंटर सारखे आणखी स्टडी सेंटरची स्थापना येत्या काळात करण्यात येईल.’ ’शहेबाज मनियार यांनी मार्गदर्शन करताना इस्लाम मध्ये असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला अधोरेखित केले तसेच काळाची पावले ओळखून विविध कौशल्य आत्मसात करणे, तंत्रज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करणे , स्थानिक भाषेवर पकड निर्माण करणे, स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे, वेळेचे नियोजन करणे इ. गोष्टी या विद्यार्थ्यांच्या प्राथमिकता असाव्यात यावर भर दिला. याप्रसंगी जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या या पुढाकाराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- शहेबाज म. फारुख मनियार



माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्याने खऱ्या अर्थी ईमानचे समाधान प्राप्त केले.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

अल्लाहच्या दासत्वात स्वत:ला झोकून देऊन आणि इस्लामी शरियत (धर्मशास्त्र) ची उपासना करून आणि स्वत:ला पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शनासाठी वाहून घेऊन पूर्णत: संतुष्ट आहे, त्याचा निर्णय असा आहे की मला दुसऱ्या कोणाचे दासत्व करायचे नाही आणि प्रत्येक स्थिती इस्लामनुसार आचरण करणे आणि पैगंबरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या मनुष्याची स्थिती अशी असेल त्याने समजा ईमानचा गोडवा त्याने प्राप्त केला.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे आज्ञापालन करावयास हवे).'' (हदीस : मुस्लिम)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ''हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.'' पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.'' (हदीस : मुस्लिम)

अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र 'नफ्ल नमाज' (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ''मी नेहमी 'नफ्ल रोजे' (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही'' आणि तिसरा म्हणाला, ''मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.'' (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, ''तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!'' मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) 'नवाफिल' (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल, त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.'' (हदीस : मुस्लिम)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



महागाईच्या झळा त्यानांच बसतात जे हलाल (वैध) पद्धतीने संपत्ती कमावतात मात्र या जगात हराम (अवैध) पद्धतीने संपत्ती कमावण्याची पद्धत एवढी रूढ झालेली आहे की ती वाईट आहे याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. एवढेच नव्हे तर हराम पद्धतीने संपत्ती कमावणाऱ्यांना सामाजिक मान्यता मिळालेली आहे. यामुळे आर्थिक विषमता एवढी वाढलेली आहे की, आफ्रिकेतील मागास देशातील काही लोक पांढऱ्या मातीचे पेस्ट तयार करून त्यात मीठ मिसळून खात आहेत. तर प्रगत देशामधील लोक पंचपकवाने खाऊन मधुमेहाने मरत आहेत. आपल्या देशातही विषमतेने कळस गाठलेला आहे. तरूणांना रोजगार मिळत नाही. 2019 साली घोषित झालेल्या रेल्वेच्या परीक्षा अद्याप पूर्णत्वास गेेलेल्या नाहीत त्यामुळे संपूर्ण बिहारमधील तरूण पेठून उठलेले आहेत, रेल्वे जाळत आहेत. या पार्श्वभूमीवर ही आर्थिक विषमता का वाढते? तिला रोखण्यासाठी काही उपाय आहे काय? यावर या आठवड्यात चर्चा करणे अनाठायी होणार नाही. 

आर्थिक विषमतेचे मूळ कारण व्याज आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उपभोगतावादी जीवनशैलीला सरकारी मान्यता प्राप्त असते आणि या व्यवस्थेमध्ये सर्वाधिक महत्त्व संपत्तीला असते. विशेष म्हणजे या व्यवस्थेमध्ये अनैतिक पद्धतीने संपत्ती कमाविण्याला वाईट समजले जात नाही. विषमतेची सुरूवात येथूनच होते. भांडवलशाही व्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे. 

साम्यवादाच्या पाडावानंतर आजमितीला दोन अर्थव्यवस्था जगात अस्तित्वात आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था दूसरी इस्लामी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने जगातील सर्वच देशांचा ताबा घेतलेला आहे तर इस्लामी अर्थव्यवस्था बाल्यावस्थेत आहे. इतकी की तिचा परिचय करून द्यावा लागतो. परंतु ज्या दिवशी या दोन अर्थव्यवस्थांमधील फरक सामान्य लोकांच्या लक्षात येईल त्याच दिवशी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळून पडेल, यात शंका नाही. या दोन अर्थव्यवस्थेतील मूळ फरक व्याज होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला नफा समजले जाते, तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला आर्थिक शोषणाचे मूळ कारण समजले जाते. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, या दोन विचारांपैकी कोणता विचार खरा आहे? मानवकल्याणासाठी योग्य आहे? 

व्याज म्हणजे काय? 

मूळ रकमेवर कर्जदाराकडून अनिवार्य पद्धतीने वाढीव रक्कम घेणे म्हणजे व्याज होय? ईश्वराने माणसामध्ये जी प्रवृत्ती ठेवलेली आहे त्यात काही गोष्टी चांगल्या म्हणून बाय डिफॉल्ट ठेवलेल्या आहेत. उदा. खरे बोलावे, आई-वडिलांची सेवा करावी, शोषण करू नये इत्यादी. जरा गांभीर्याने विचार केला तर कोणाच्याही लक्षात येईल की, व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या प्रतिकूल असे काम आहे. मुळात माणसाने जे कमाविले ते नशीबाने कमाविलेले असते. त्याच्यात त्याच्या मेहनतीचा फारसा वाटा नसते. कारण मेहनत तर सगळेच करतात. मेहनतीवर श्रीमंती अवलंबून असती तर शेतकरी वर्ग जगातील सर्वात श्रीमंत वर्ग ठरला असता. म्हणून नशीबाने जी संपत्ती मानवाने कमाविलेली आहे ती त्याने स्वतःवर खर्च करावी, आपल्या कुटुंबावर खर्च करावी, योग्य पद्धतीने भविष्यासाठी बचतही जरूर करावी, मात्र एवढं करूनही त्याच्याकडे संपत्ती शिल्लक राहत असेल तर त्याने ती धर्मादाय कामामध्ये खर्च करावी. चॅरिटी करण्याचे धाडस नसेल तर किमान त्याने त्या संपत्तीचा दुरूपयोग तरी करू नये, हा उदात्त हेतू इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये नाही. आपल्याकडे असलेली संपत्ती गरजवंतांना कर्जरूपाने देऊन अर्थात सावकारी करून अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या विरूद्ध आहे. 

व्यापारी बँकांकडून कर्ज घेणे?

व्यापारी बँकांकडून कोणी व्यावसायासाठी कर्ज घेत असेल तर त्याला योग्य म्हणता येणार नाही. कारण कर्जदार व्यावसायिकाला नफा हो का तोटा हो बँकेला व्याजासहित मूळ रक्कम परत करावीच लागते. काही अशा कारणांमुळे व्यावसाय तोट्यात गेला की ज्या कारणावर व्यापाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. उदा. पूर, भूकंप, लॉकडाऊन वगैरे... तरी व्यावसायिकाला व्याजासह मूळ रक्कम बँकेला परत द्यावीच लागते. व्यवसाय हा नेहमीच नफ्यात राहील, असे छाती ठोकपणे कोणीच म्हणू शकत नाही. अशा परिस्थितीत व्यावसायिकासमोर दोनच पर्याय असतात. एक तर माल्या, मोदी, सारखे विदेशात पळून जाणे किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करणे. व्याज माणसाला जीवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेतो.  म्हणून ईश्वराने व्याजाला निषिद्ध घोषित केलेले आहे. 

कमी दरावर व्याज घेणे?

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे श्रद्धावंतांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.’’  (सुरे आले इमरान : आयत नं.130).  या आयातीचा अर्थ लावताना अनेकांची गफलत झालेली आहे. ती अशी की, अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेऊ नये. मात्र कमी दराने व्याज घेण्यास काही हरकत नाही. हा अर्थ चुकीचा आहे. याचे कारण असे की, कुरआनच्या याच सुरहमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका.’’ (सुरे बनीइसराईल : आयत नं.31). तर याचा अर्थ असा घ्यावा का की, गरीबी व्यतिरिक्त दुसऱ्या कारणाच्या भीतीने संततीला ठार मारणे कुरआन संमत आहे? जसे कुठल्याही कारणास्तव कोणालाही ठार करणे कुरआन संमत नाही त्याचप्रमाणे कुठल्याही कारणाने व्याज घेणे कुरआन संमत नाही. 

इस्लामला भाडे घेणे मान्य आहे तर व्याज का नाही?

इस्लाममध्ये कुठलीही वस्तू भाड्यावर देणे मान्य आहे. उदा. दुसऱ्याच्या उपयोगासाठी आपले घर भाड्यावर देता येते, वाहन भाड्यावर देता येते व त्यावर भाडे घेता येते. तर त्याचप्रमाणे दुसऱ्याला रक्कम देऊन त्यावर व्याज का घेता येत नाही, तेही एका प्रकारचे भाडेच नव्हे काय? तर याचे उत्तर असे की, आपण जेव्हा घर किंवा वाहन भाड्यावर देतो तेव्हा ते नष्ट होत नाही  रक्कम मात्र नष्ट होते. उदा. एखाद्याने मुलीच्या लग्नासाठी एक लाख रूपये कर्ज घेतले तर 1 लाख रूपये लग्नामध्ये खर्च झाले म्हणजे ती रक्कम नष्ट झाली. घर किंवा वाहनामध्ये असे होत नाही. ते मूळ मालकाला परत मिळतात. खर्च झालेली रक्कम नव्याने उभी करावी लागते आणि हे काम अतिशय कठीण असते. त्यावर पुन्हा व्याज देणे ती तर आणखीन कठीण बाब ठरते. त्याची 1 लाख रूपये उभी करण्याची ऐपत असती तर त्याने कर्जच घेतले नसते. अशा परिस्थितीत मूळ रक्कम परत मागणे ठीक आहे पण त्यावर व्याज मागणे हे भाडे मागण्याऐवढे सहज नाही आणि शक्यही नाही. म्हणून इस्लामने रोख रकमेवर मोबदला व्याज रूपाने घेण्यास मनाई केलेली आहे. 

कर्जाऊ रकमेचे अवमूल्यन होते त्याचे काय? 

समजा ’अ’ने 10 लाख रूपये ’ब’ला पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्जाऊ दिले आणि ’ब’ने प्रामाणिकपणे पाच वर्षांनी त्याचे 10 लाख रूपये परत दिले. तरी ’अ’चे यात नुकसान होते. कारण पाच वर्षात 10 लाख रूपयाचे अवमूल्यन होते. महागाई वाढते. त्यामुळे दहा लाख रूपयांची ’फेस व्हॅल्यू’ जरी तितकीच असली तरी त्या 10 लाख रूपयांचे ’खरेदी मुल्य’ कमी होऊन जाते. अशा परिस्थिती काय करावे? 

इस्लाममध्ये कोणालाही अनुचित लाभ किंवा अनुचित नुकसानीमध्ये टाकण्यास परवानगी नाही. ’अ’ने 10 लाख रूपये देतांनाच ’ब’शी असा करार करावयास हवा की पाच वर्षानंतर 10 लाख रूपये खरेदी मुल्यासह परत करावे. हे खरेदी मूल्य ठरविण्यासाठी कंज्युमर प्राईस इंडेक्स किंवा सोन्याचे दर एकक म्हणून ठरविले जाऊ शकतात. येणेप्रमाणे ’ब’ला पाच वर्षानंतर 10 लाख रूपये नव्हे तर 10 लाख रूपयाचे खरेदीमुल्य जेवढे असेल तेवढे ’अ’ला परत करणे अनिवार्य ठरते, हे मात्र व्याज नाही. याला इस्लाममध्ये परवानगी आहे. 

ईश्वरीय धमकी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे. अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील  ’’ (सुरे अलबकरा : आयत नं. 279).

कुरआनमध्ये फक्त एकाच ठिकाणी मानवाला धमकी देण्यात आलेली आहे. ते ठिकाण म्हणजे वर नमूद आयात होय. या आयातीचा विषय अर्थातच ईश्वराला तीव्र नापसंत असलेला विषय म्हणजे व्याज होय. आज जगामध्ये सर्वत्र व्याजाधारित अर्थव्यवस्था सुरू आहे. असे समजले जाते की, व्याजामुळे विकास होतो आणि त्यासाठी युरोपियन देशांचे उदाहरण दिले जाते. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमुळे त्यांनी किती विकास केलेला आहे ते पहा.  परंतु एक गोष्ट विसरली जाते की, आयएमएफ आणि वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना अव्वाच्या सव्वा दराने अब्जावधींची कर्जे देऊन कोट्यावधी रूपयांचे व्याज वसूल केले जाते आणि त्या व्याजावर ज्याला जग नेत्रदिपक विकास समजतो तो साध्य केला जातो. म्हणजेच हा विकास नैसर्गिक विकास नसून गरीब राष्ट्रांचे रक्त शोषण करून साधलेला विकास आहे. इस्लामला असा विकास मान्य नाही. इस्लामला समतोल विकास मान्य आहे जो की, व्याज विरहित अर्थव्यवस्थेतच शक्य आहे. कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल. ’’(सुरे अलबकरा आयत नं. :280)

याचा अर्थ असा आहे की, मानवकल्याण हे सर्वश्रेष्ठ ध्येय असायला हवे. व्यक्तीगत कर्ज असो की, का राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे कर्ज असो, कर्जदार व्यक्ती असो, वित्तीय संस्था असो, उद्योगपती असो की व्यावसायिक असो तो अशा कारणामुळे कर्ज परत करू शकत नसेल की, जी कारणे त्याच्या हातात नाहीत. उदा. प्राकृतीक आपदा वगैरे... अशा परिस्थितीत त्याचे कर्ज माफ करणे आवश्यक ठरते. अमेरिकेमध्ये ’चॅप्टर-11’ नावाचा एक कायदा आहे. ज्यात एखादी बँक, कारखाना, व्यावसाय अशा कारणामुळे इन्सॉल्व्हंट (दिवाळखोर) झाला असेल जे कारण प्राकृतिक असेल, तर त्याला बेलआऊट पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचविणे सरकारचे कर्तव्य ठरेल, असे म्हटलेले आहे. मुस्लिमांनी कितीही गर्व केला तरी तो कमी आहे. ते यासाठी की आज अमेरिकेने जो कायदा केलेला आहे तो 1443 वर्षापूर्वी कुरआनने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला आहे. 

व्याजामुळे खरेच संपत्ती वाढते काय?

कुरआनमध्ये आणखीन एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’जे व्याज तुम्ही देता जेणेकरून लोकांच्या मालमत्तेत मिसळून त्याची वाढ व्हावी, अल्लाहच्या जवळ ते वाढत नाही. आणि जी जकात तुम्ही अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या इच्छेने देता, ती देणारेच वास्तविकतः आपल्या मालमत्तेत वाढ करतात. ’’ (सुरे अर्रूम आयत नं. 39).

सकृतदर्शनी व्याजामुळे संपत्तीत वाढ होत असतांना दिसत असली तरी त्यातील बरकत निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्यक्षात ती वाढ निरूपयोगी वाढ असते. किंबहुना कॅन्सरसारखी वाढ असते, जिच्याद्वारे सामाजिक स्वास्थ्याला गंभीर इजा पोहोचते. ही गोष्ट त्यांच्याच लक्षात येईल ज्यांना डोळसपणाने कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची सवय असते. आज व्याजामुळे मिळत असलेल्या अमाप संपत्तीमुळे किती सामाजिक नुकसान प्रगत राष्ट्रांना होत आहे, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. सध्या फक्त एवढेच लक्षात घेणे गरजेचे आहे की,हराम मार्गाने येत असलेली ही संपत्ती कधीच समाजाचे कल्याण करणारी नाही. 

व्याजाधारित कर्जाचा अंतिम परिणाम

नोव्हेंबर 2021 मध्ये एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) ने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे फक्त एका वर्षात म्हणजे 2020 साली 1 लाख 53 हजार 052 व्यावसायिकांनी व्यवसायात तोटा आल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी 29 टक्क्यांनी जास्त आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आकडेवारी तर वेगळीच.

एकंदरित एक गोष्ट स्पष्ट आहे की, व्याजामुळेच मानवतेची अपरिमित हानी होत आहे आणि यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. किती दिवस ही हानी सोसायची? याचा किमान बुद्धिवाद्यांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे. आज ना उद्या जगाला इस्लामच्या व्याजमुक्त अर्थव्यवस्थेकडेच वळावे लागेल. यात शंका नाही. दुर्दैव या गोष्टीचे आहे की, 56 मुस्लिम राष्ट्र असून, एकाही राष्ट्रात शुद्ध अशी व्याजविरहीत अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. किंबहुना अशी अर्थव्यवस्था जगात कुठल्याच देशात अस्तित्वात येणार नाही, यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश सतत डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. त्यांना माहित आहे ज्या दिवशी इस्लामच्या कल्याणकारी व मानवतेला तारणारी व्याजविरहित अर्थव्यवस्था एखाद्या देशात यशस्वी होईल त्याच दिवशी कॉपीपेस्टच्या या काळामध्ये त्या अर्थव्यवस्थेचे अनुसरण इतर देशांकडून केले जाईल व आपली अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. याच भीतीमुळे व्याजविरहीत अर्थव्यवस्थेबद्दल कधीच, कुठल्याच मीडिया हाऊसमध्ये डिबेट आयोजित केल्या जात नाहीत. उलट या विषयाकडे जगाचे लक्ष जाऊ नये म्हणून इस्लाम आणि मुस्लिमांवर वेगवेगळे आरोप मुद्दामहून लावून जगाचे लक्ष विचलित केले जाते. आज मुस्लिमांनी ओरडून जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे की, इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय जगाला दुसरी कुठलीही अर्थव्यवस्था तारू शकत नाही, अन्यथा कुठल्याही अणुबॉम्बशिवाय जग आपोआप नष्ट होईल. 


-एम.आय.शेख



हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या कन्या ह. फातिमा (र.) यांच्या घरी गेले, पण त्यांची भेट न घेताच दरवाजातूनच परतले. कारण त्यांनी (ह. फातिमा र. यांनी) आपल्या घराच्या दरवाजावर रंगीत पडदे लावलेले होते. जेव्हा कधी प्रेषित कुठल्या प्रवासावरून परत यायचे तेव्हा ते प्रथम आपल्या कन्येची भेट घेत असत. पण त्या दिवशी प्रेषित त्यांना भेटल्याविनाच परतले होते. जेव्हा ह. अली (र.) (ह. फातिमा र. यांचे पती) घरी आले. त्यांनी फातिमा (र.) यांना दुःखद अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे कारण विचारले. ह. फातिमा यांनी प्रेषितांविषयी सांगितले की ते आपल्या घरी आले होते, पण दारातूनच परतले. हे ऐकून ह. अली (र.) प्रेषितांच्या सेवेत उपस्थित झाले आणि म्हणाले की हे प्रेषित! आपण आमच्या दारातूनच परतलात. यामुळे फातिमा (र.) फार दुःखी आहेत.

यावर प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला या दुनियेच्या वैभवाशी काय देणंघेणं. मला रंगीत पडद्यांचा काय मोह?’’

ह. अली (र.) फातिमा (र.) यांच्याकडे जाऊन प्रेषितांनी जे सांगितले ते कळवले. ह. फातिमा (र.) यांनी ह. अली (र.) यांना सांगितले की तुम्ही जा आणि प्रेषितांना विचारा, त्या पडद्यांचे मी काय करावे?

प्रेषित मुहम्मद (स.) ह. अली (र.) यांना म्हणाले, ‘‘फातिमांना सांगा ते पडदे कुणाला तरी देऊन टाका जेणेकरून ते त्यांचे वस्त्र शिवून परिधान करतील.’’ (मुसनद अहमद बिन हंबल)

ह. शफा बिन्त अब्दुल्लाह (र.) म्हणतात, ‘मी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले त्यांनी माझी काही मदत करावी म्हणून. पण प्रेषितांनी क्षमा मागितली. मला काही दिलं नाही. नंतर मी माझ्या मुलीच्या घरी गेले. नमाजची वेळ झाली असताना देखील तिचे पती शरजील (र.) घरीच बसून होते. मी त्यांच्यावर रागावले.’ त्यावर शरजील (र.) म्हणाले. ‘मावशी तुम्ही उगाच माझ्यावर रागावत आहात. माझ्याकडे एकच वस्त्र होतं. ते प्रेषितांनी माझ्याकडून मागून घेतलं. मला परिधान करायला आता दुसरे कपडे नाहीत, म्हणून मी मशिदीत गेलो नाही.’ त्यावर ह. शफा (र.) म्हणाल्या, ‘माझे मातापिता प्रेषितांवर कुरबान. मी नाहक त्यांच्यावर रागावले. मला त्यांच्या बाबतीत माहिती नव्हती.’ शरजील (र.) म्हणतात, ‘माझ्याकडे एकच फाटलेले वस्त्र होते ज्यावर मी ठिगळ लावले होते.’ (तिर्मिजी, बहैकी)

मुस्लिमांच्या माता ह. आयेशा (र.) म्हणतात की ह. सफिया (र.) (प्रेषित मुहम्मद स. यांच्या पत्नी) ज्या अगोदर ज्यू धर्मिय होत्या. त्यांचा उंट आजारी पडला. ह. जैनब (र.) यांच्याकडे दोन उंट होते.

त्यांना प्रेषित म्हणाले, ‘‘तुम्ही आपला एक उंट सफिया यांना द्या.’’ ह. जैनब (र.) म्लणाल्या, ‘मी त्या ज्यू धर्मियास माझा उंट का देऊ?’

त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) ह. जैनब (र.) यांच्याशी तीन दिवस काहीच बोलले नाहीत. (अबू दाऊद)



पुणे (कलीम अजीम) 

1857चा स्वातंत्र्य संग्राम मिला-जुला म्हणजे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलेला लढा होता. ह्या एकतेला पाहून इंग्रज घाबरले आणि त्यांनी सत्तेसाठी दोन समुदायामध्ये फूट पाडायचे प्रयत्न सुरू केले. हिंदू-मुस्लिमांना वेगळे पाडले. आपल्याकडील काही स्वार्थी नेते त्याला बळी पडले. आजही हेच सुरू आहे, त्यामुळे दोन सुमदायामध्ये वेगळेपणाची दरी वाढत चाललेली आहे, ही दरी कमी करण्यासाठी समाज संवाद महत्त्वाचा आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.

पुण्यात रविवारी (ता. 23) कौसर बाग मस्जिद येथे समाज संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या प्रसंगी देशमुख बोलते होते. सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या मस्जिद परिचय मेळाव्याला परिसरातील अनेक गैरमुस्लिम स्त्री-पुरुष नागरिक व मान्यवर उपस्थित होते. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्याचे पाण्याची बाटली व खजूर देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना नमाजपूर्वी केले जाणारे वजू (स्वच्छता) काय असते, ते कसे करावे व त्याचे महत्त्व सांगण्यात आले.

एसआयओ या विद्यार्थी संघटनेच्या स्वयंसेवकांनी मान्यवरांना बाहरेचा सर्व परिसर फिरवून दाखविला. शिवाय इतर माहितीदेखील दिली. त्यानंतर मस्जिदीच्या गाभाऱ्यात जिथे इमाम नमाजचे नेतृत्व करतो, तिथे सर्वांना घेऊन जाण्यात आले. अली इनामदार यानी मस्जिदीच्या आतल्या रचनेचा परिचय करून दिला. प्रा. रशीद शेख यांनी मस्जिदची रचना, निर्मिती, जानिमाज, पुस्तके, नमाजच्या वेळा, दररोज नमाजमध्ये इमाम कुठली वचने पठण करतो, त्या श्लोकाचे अर्थ इत्यादी समजावून सांगितली.

त्यानंतर अज़ान देऊन त्याचे शब्दश: भाषांतर करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष नमाज अदा करण्यात आली. मुफ्ती नवेद यांच्या मधाळ किराअतने नमाज संपन्न झाली. भेट देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांनी गाभाऱ्यात बसून प्रत्यक्ष नमाज पाहिली. त्यानंतर जमाअते इस्लामी हिंदचे डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी नमाजमध्ये पठण करण्यात आलेल्या कुरआनच्या वचनांचा सार व त्याचा अर्थ समजावून सांगितला. तत्पूर्वी निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते गाजिउद्दीन रिसर्च सेंटर व डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन प्रकाशित ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पुस्तकावर बोलताना सरफराज अहमद म्हणाले, हजरत बिलाल हे एक हब्शी गुलाम होते, त्यांना मुक्त करून प्रेषितांनी समानता आणि आदर, सन्मानाचा एक महत्त्वाचा संदेश दिला. इस्लामचे ते प्रथम मुअज्जीन होते. त्यांना काबागृहावर चढून अजान देण्यासाठी प्रेषितांनी निमंत्रण दिले, ती वर्णव्यवस्थेविरोधात इस्लामची पहिली चळवळ होती, असे म्हटले.

मस्जिद परिचयाचा मुख्य कार्यक्रम दीड तास चालला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला. त्यानंतर परिसरातच समाज संवाद कार्यक्रम झाला. सरफराज अहमद यांनी मस्जिदीचा सामाजिक व सांस्कृति तथा राजकीय इतिहासाची पुनर्मांडणी केली. मस्जिदे ऐकेकाळी राजकीय व सामाजिक कल्याणाची केंद्र होती, ती स्वतंत्र व मुक्त विद्यापीठे होती. इजिप्तचे अल अजहर, देवबंदचे विद्यापीठ हे सुरुवातीला मस्जिदी होत्या. त्यानंतर त्यांचे विद्यापीठात रुपांतर झाले, आज आपल्या मस्जिदी आधुनिक शिक्षणाची केंद्रे व्हावीत, असे ते म्हणाले. इस्लामचा सामाजिक व आर्थिक विचार त्यांनी उपस्थितासमोर मांडला. मस्जिदी गरिब, निराश्रीतासाठी निवारा आहेत, तसेच ते गरजवंतासाठी अन्नछत्र आहेत. मस्जिदींचा वापर फक्त नमाजसाठी न होता, इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी आणि परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांच्या विधायक कार्यासाठीदेखील झाला पाहिजे, असेही सरफराज म्हणाले.  ह्या मेळाव्यात साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी इस्लामी संस्कृतीवर विचार मांडले. वेगेवेगळ्या काळातील समाजाला समजून घेण्यासाठी अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे सांगत शिरसाठ म्हणाले, संस्कृती असो किंवा चालिरिती, परंपरामध्ये काळाचा विचार करून काही गोष्टी अंतर्भूत झालेल्या असतात. परंतु काळ बदलतो, परिस्थिती बदलते तसे त्यातले काही कालबाह्य झालेले असते किंवा काही योग्य ठरणार नसते त्यामुळे संस्कृती, समाज पुढे जायचा असेल तर समाजासाठी जे चांगले आहे, परंपरेतून आलेले, धर्मातून आलेले, श्रद्धेतून, विश्वासातून आलेले ते आपण टिकवावे, अधिक समृद्ध करावे. आणि जे-जे कालबाह्य आहे किंवा सदोष आहे, ते मागे टाकून पुढे जायला पाहिजे, असे केले नाही तर समाजाला एक प्रकारचे साचलेपण येते.

दिल्लीहून आलेल्या ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे चेअरमन अ‍ॅड. शरफुद्दीन अहमद यांनी समूह संवादावर भर दिला. तसेच हिंदू-मुस्लिमांनी प्रचारी संदेशांना बळी न पडता, आपल्या आसपासच्या सर्व धर्मीय नागरिकांशी संवाद प्रस्थापित करावा, असे म्हटले.सलोखा मंचचे प्रमोद मुजुमदार उपस्थिताशी संवाद साधत म्हणाले, देशातील, शहरातील अल्पसंख्यांना विश्वासात घेणे ही बहुसंख्याकाची जबाबदारी आहे. सामाजिक सद्भाव टिकवून अल्पसंख्याकाशी, मुस्लिमांशी संवाद साधणे ही आज गरजेचे आहे. धर्मकेंद्री राजकारण होत असलेल्या सततच्या हल्ल्यामुळे मुस्लिम हवालदिल झालेला आहे, अशा मुस्लिमांच्या पाठिशी ‘सलोखा’  आहे. त्यामुळे आम्ही सर्वांना विश्वास देतो की, आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. सलोखा मंचच्या डॉ. संजिवनी कुलकर्णी यांनी मुस्लिमांविषयी होत असलेल्या अप्रचाराला बळी पडू नये, असे सांगितले. युक्रांदच्या नीलम पंडित आपल्या एेंशी वर्षीय आईला घेऊन आलेल्या होत्या. मस्जिद पाहून आई खूप कृतार्थ झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

या परिचय मेळाव्यात लोकायत, नोइंग गांधी, संविधान संवादक फोरमचे पदाधिकारी व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांनी प्रत्यक्ष मस्जिद पाहून आत्मिक समाधान वाटले, अशा भावना व्यक्त केल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तबलीग जमात (पुणे)चे विशेष प्रयत्न होते. असे उपक्रम विविध शहरात व दिल्ली मरकजपर्यंत पोहोचविण्याची हमी तबलीगच्या संघटकांनी दिली. कौसर बाग मस्जिद कमिटीने परिसरातील गैरमुस्लिम सोसायटीमध्ये जाऊन मस्जिद परिचयासाठी अनेकांना निमंत्रणे पाठविली होती. तसेच पोलीस, आईबी यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. सावित्री-फातिमा विचार मंचचे अली इनामदार यांनी समाज संवाद मेळाव्याचे सर्व नियोजन व अन्य व्यवस्थेचे संयोजन केले होते. तसेच उपस्थितांना मार्दगर्शनही केले. कलीम अजीम यांनी सर्व निमंत्रित पाहुण्याचे आभार मानले. मस्जिदमध्ये दाखविण्याकरिता विशेष असे काही नसते. तसेच लपविण्याकरितादेखील असे काही नसते. त्यामुळे अगदी कोणीही, कधीही येऊन मस्जिद पाहू शकतो. मस्जिदीबद्दल होत असलेल्या अप्रचाराला बळी पडण्याआधी परिसरातील एखाद्या मस्जिदला भेट द्या, असेही त्यांनी सांगितले. राहिलेल्या त्रुटी व उणीवा पुढच्या परिचय मेळाव्यात भरून काढण्याचे आश्वासन कलीम यांनी दिले. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटी, तबलीग जमात यांचे विशेष आभार मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांचा हातभार लागला, अशा सर्वांचे त्यांनी अभार मानले.

कार्यक्रमाला राष्ट्र सेवा दलाचे संदेश भंडारे, सलोखा मंचचे सर्व पदाधिकारी, युक्रांदचे संदीप बर्वे, ऑल इंडिया लॉयर कौन्सिलचे एड. संतोष जाधव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. सर्वजण आपल्या मित्र-सहकाऱ्यांना घेऊन कार्यक्रमाला आले होते. पारनेहूर रफिक सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच कौसर बाग मस्जिद कमिटीचे सेक्रेटरी जफर खान उपस्थित होते. कार्यक्रमाला हजर असेलल्या प्रत्येकांना साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ आणि ‘बिलाल इब्न रबाह’ पुस्तके वितरित करण्यात आली. तसेच संदेश लायब्ररीच्या कार्यकर्त्यांनी कुरआनची मराठी प्रतही सर्वांना भेट दिली. ह्या समाज संवाद कार्यक्रमाला व्यक्तिगत निमंत्रणे पाठवून निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेच काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिलेले होते. विशेष म्हणजे मस्जिद कमिटीच्या नोटीस बोर्डवर मराठी भाषेत सूचना लिहिण्यात आलेली होती. त्यानुसार मस्जिद पाहण्यासाठी हिंदू-मुस्लिम समुदायातील स्त्रिया मोठ्या संख्येने हजर झालेल्या होत्या. कार्यक्रमाला आलेला चांगला प्रतिसाद पाहून नियमित मस्जिद परिचय व समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सावित्री-फातिमा विचार मंचच्या वतीने कळविण्यात आले.



हजरत जाबिर (र.) म्हणतात, एक दिवस प्रेषित मुहम्मद (स.) बनी अमरो बिन औफ यांच्या मोहल्ल्यात गेले.

प्रेषित म्हणाले, ‘‘हे अनसारचे लोक.’’

तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्ही हजर आहोत. हे अल्लाहचे प्रेषित.’

प्रेषित त्यांना उद्देशून सांगू लागले, ‘‘इस्लामपूर्वीच्या काळात तुम्ही अल्लाहची उपासना करत नसत, दुर्बल आणि निराधार लोकांचा बोजा उचलत असत, आपल्या मिळकतीतून गरीबांना देत होता, प्रवाशी लोकांना मदत करीत, पण जेव्हा अल्लाहनं तुम्हाला आणि प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचे उपकार तुमच्यावर केले तेव्हा तुम्ही आपल्या बागांच्या भोवती भिंती उभ्या करता. माणसांनी जर तुमच्या बागेतले फळ खाल्ले असेल तर अल्लाह तुम्हास त्याचा मोबदला देईल. तसेच पशुपक्ष्यांनी फळं खाल्ली तर त्याचादेखील मोबदला दिला जाईल.’’

हजरत जाबिर (र.) म्हणतात की लोकांनी प्रेषितांचे म्हणणे ऐकून आपल्या बागांभोवतीच्या भिंती काढून टाकल्या. (तरगीब, तरतीब, )

हजरत अब्दुल्लाह बिन उमर म्हणतात की जेव्हा कधी प्रेषित मुहम्मद (स.) मला काही माल देत असत मी त्यांना म्हणत होतो, 'जे लोक माझ्यापेक्षा अधिक वंचित असतील अशा लोकांना द्या.'

प्रेषित त्यांना उत्तर देत की ‘‘हा माल घेऊन टाका. जेव्हा कधी तुम्ही कुणाशी काही न मागता माल दिला गेला आणि तुम्ही त्याची अपेक्षाही केली नव्हती, तर असे देणे घेत जा. ते साठवून ठेवा. आवश्यकता असल्यास त्याचा उपयोग करा आणि वाटल्यास ते दान करा. जे तुम्हाला मिळाले नसेल त्याची लालसा करू नका.’’

हजरत अब्दुल्लाह बिन उमरचे पुत्र म्हणतात की म्हणूनच माझे पिता कधी कुणाकडे काही मागत नसत. आणि जर कुणाला न मागताच कुणी काही दिले असेल तर ते नाकारत नव्हते. (बुखारी, मुस्लिम)

ऐनिया इब्ने हसन एकदा आपले चुलते हुर बिन कैस यांच्याकडे गेले, हुर बिन कैस हे खलीफा ह. उमर (र.) यांच्या फार जवळचे होते.

ऐनिया आपल्या चुलत्यास म्हणाले की ‘तुम्हाला ह. उमर (र.) यांची जवळीक लाभली आहे. मला त्यांना भेटायचे आहे. त्यासाठी परवानगी मिळवून द्या.’

ह. उमर (र.) यांनी ऐनिया यांना भेटण्यास परवानगी दिली. ऐनिया ह. उमर (र.) यांच्याशी बोलताना म्हणाले की, ‘तुम्ही आम्हाला काही जास्त माल देत नाही की आमच्या बाबतीत न्याय्य वागणूक सुद्धा देत नाही.’

ह. उमर (र.) यांना याचा फार राग आला. ऐनिया यांना शिक्षा देण्याचा विचार करू लागले.

तेवढ्यात हुर बिन कैस यांनी ह. उमर (र.) यांना पवित्र कुरआनची एक आयत ऐकवली, त्याचा अनुवाद असा,

‘‘लोकांना माफ करा. नेकी आणि परोपकाराचा संदेश द्या आणि अडाणी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा.’’ (कुरआन, ८:१९९)

‘हे महाशय अशिक्षित आहेत, त्यांची चूक माफ करा.’ हे ऐकून ह. उमर (र.) यांचा राग संपला आणि ऐनिया यांना क्षमा करून टाकले. (बुखारी, इब्ने अब्बास)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget