Latest Post


ह. अनस (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मित्र तीन प्रकारचे असतात. एक मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही कबरीपर्यंत पोहचेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन.’’ दुसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही गरिबांना जे काही दिलं तेवढंच तुमचं आहे आणि जे तुम्ही कुणाला दिलं नाही, स्वतःसाठी राखून ठेवलं तर ते तुमचं नाही, तर ते तुमच्या वारसदारांचं आहे.’’ ह्या मित्राचं नाव ‘माल’ आहे. तिसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही जथे कुठे असाल कबरीमध्येदेखील मी तुमच्या बरोबर राहीन आणि जेव्हा तुम्ही कबरीतून बाहेर याल त्या वेळेस देखील मी तुमच्या बरोबर राहीन.’’ या तिसऱ्या मित्राचं नाव ‘कर्म’ आहे. माणूस हैरान होऊन म्हणेल की अल्लाहची शपथ! मी तर तुला या इतर मित्रांच्या तुलनेत तुच्छ समजत होतो. (तरगीब, इस्तदराक)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही धनसंपत्ती आणि मालमत्ता गोळा करू नका. तुमच्यामध्ये दुनियेची लालसा घर करेल.’’

ह. आयेशा (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणत होते की, ‘‘ज्या कुणाला अल्लाहच्या भेटीची आवड असते, अल्लाहदेखील त्याच्या भेटीस पसंत करतो. आणि जो व्यक्ती अल्लाहच्या भेटीस पसंत करीत नाही, अल्लाहदेखील त्याला भेटण्यास नकार देतो.’’ ह. आयेशा (र.) यांनी यावर विचारले की अल्लाहच्या भेटीस पसंत न करण्याचा अर्थ काय? कुणीही मृत्यू पसंत करत नाही. असे असेल तर आमच्यापैकी सर्वच जण मृत्युला पसंत करत नाहीत.

प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वर्ग, अल्लाहच्या देणग्यांविषयी सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात अल्लाहशी भेट व्हावी अशी इच्छा होते. अशा माणसाशी अल्लाह देखील भेटू इच्छितो. आणि दुसरीकडे नाकारणाऱ्या माणसाला जेव्हा अल्लाहचा प्रकोप, त्याच्या नाराजीबाबत कळवले जाते तेव्हा असा माणूस अल्लाहच्या भेटीला पसंत करत नाही.’’ (मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे, कयामतच्या दिवशी अल्लाह अशा लोकांना यातना देणार नाही ज्यांनी या जगात अनाथांशी दयेचा व्यवहार केला असेल. त्यांच्याशी मायाळूपणे बोलले असतील आणि त्यांच्या अनाथावस्थेची आणि दुर्बलतेची त्यांना कीव वाटली असेल. आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्यांवर दबाव टाकत नसेल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘हे मुहम्मदच्या उम्मतचे लोकहो, मला शपथ आहे त्या अस्तित्वाची ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे. अल्लाह अशा लोकांच्या दानधर्माला स्वीकारणार नाही ज्याचे नातेवाईक त्याच्याकडून वंचित राहिले असतील.’’ (हुरैरा, तिबरानी)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात.


जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत

बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत

स्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो. 

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास

अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लाउडियस नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्ध पिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व  14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 

या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचेही व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केला. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या लोकांनी केले. 

व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण

अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या आकडेवारीप्रमाणे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज कार्डस एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा. 

मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली आणि म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही. 

मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता. 

इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाउले आधी संगीत, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली. 18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांच्या ठोकळ्यांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे शिल्प तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या वुड पोर्नोग्राफीने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.

1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्सनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली. 

अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो.

आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज अश्लील संवादासह उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलांवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात. 

ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज यांचा सनदशीर मार्गाने व जमेल तसा विरोध करावा. 

मुस्लिमांची जबाबदारी

सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की, 

1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).

2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).

व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.

मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकांत कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. काही वर्षापूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री कर्नाटकाच्या बेंगलुरू शहरामध्ये नवीन वर्षे साजरे करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणींचे सामुहिक विनयभंग व वस्त्रहरण करण्यात आले. हा इतिहास पाहता मुलींनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पोर्नोग्राफीच्या आहारी गेल्यामुळे आज अनेक पुरूष हे लैंगिकदृष्ट्या विकृत झालेले आहेत. वरूण सर्वच पुरूष सभ्य दिसतात. पण त्यांच्यात कोण विकृत आहे याचा अंदाज मुलींना करता येत नाही. म्हणून त्या अशा लांडग्यांच्या हल्ल्यांना बळी पडतात. अशा अनेक घटना रोज वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात. तरी त्याची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. हे आपले सामाजिक दुर्दैव आहे. याचे कारण असे की, अनैतिक गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासह जगण्याची सवय माणसांना लागते. 

या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्याने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.  

यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाही. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां! हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35). 

तरी पालकांनों व मुलींनो व्हॅलेंटाईन डे च्या जाळ्यात अडकू नका. स्वतःची सुरक्षा स्वतः करा. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, व्हॅलेंटाईन डे सारख्या अश्लील उत्सवामध्ये सामील न होण्याची समज व शक्ती आम्हा सर्वांना प्रदान कर आमीन. 

- एम.आय. शेख



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी एका व्यक्तीला टंचाईत मदत केली तर अल्लाह त्या व्यक्तीला या जगी आणि परलोकात मदत करील. जर कुणास असे वाटावे की अल्लाहने कयामतच्या दिवशी त्याची मदत करावी तर त्यांनी टंचाईत सापडलेल्या माणसाचा बोजा कमी करावा किंवा त्याला माफ करावे.

प्रेषित म्हणाले की ‘‘जर कुण्या माणसानं आपल्या मुस्लिम बांधवांच्या कृत्यांवर पडदा टाकला तर अल्लाह कयामतच्या दिवशी अशा व्यक्तीच्या कृत्यांवर पडदा टाकेल.’’

अबु हुरैरा म्हणतात की प्रषितांनी मुस्लिमांना उद्देशून सांगितले की तुम्ही श्रद्धेचा स्वीकार करत असाल तरी तुमच्या मनांमध्ये श्रद्धा पोहोचली नाही, तुम्ही एकमेकांच्या गोष्टी कुणाला सांगू नका आणि लोकांच्या गुपित गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नका. जर कुणी लोकांची गुपिते उघड करत असेल तर अल्लाह त्याच्या गुप्त गोष्टी बाहेर आणील आणि अशा माणसाला त्याच्या नातेवाईकांच्या नजरेतच बदनाम करील.

‘‘जे लोक श्रद्धावंतांमध्ये व्यभिचाराला प्रोत्साहन देऊ इच्छितात त्यांना या जगी आणि परलोकात यातनादायक शिक्षा दिली जाईल.’’ (कुरआन, सूरह नूर)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या भाऊबंदांना मदत करत राहतो, तोपर्यंत अल्लाह देखील अशा व्यक्तीला मदत देत असतो. जो कुणी आपल्या भावाच्या गरजा पूर्ण करण्यात व्यक्त असतो अल्लाह देखील त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो.’’

हजरत उमर (रजि.) म्हणतात, ‘‘सर्वोत्तम नेकी श्रद्धावंताना सदैव प्रसन्न ठेवत राहणे आहे. त्याला वस्त्रं नसतील तर त्यांची पूर्तता करा. तो भुकेला असेल तर त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा.’’

दुसरे खलीफा ह. उमर (रजि.) विधवा महिलांच्या घरी रात्रीच्या वेळी पाणी भरत असत. ह. अबु बाईल (र.) गल्ली-मोहल्ल्यातील वयस्क आणि निराधार महिलांची सेवा करत असत.

अबु दाऊद (रजि.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे त्यांचे अनुयायी जमले होते. ते प्रेषितांना एका व्यक्तीविषयी सांगत होते की आम्ही त्यांच्यासारखा नेक माणूस पाहिला नाही. जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर चालत होतो तेव्हा ते पवित्र कुरआनचे पठण करत असत. आम्ही सर्वजण कुठे थांबलो तर ते नमाज अदा करत ऱाहतात. त्यावर प्रेषितांनी त्यांना विचारले, ‘‘अशा वेळी त्यांच्या गरजा कोण पूर्ण करत होते?’’ प्रेषितांनी प्रत्येक गोष्टीविषयी विचारणा केली. त्यांच्या जनावरांची देखभाल कोण करत? हेदेखील विचारले. तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले की त्यांची सर्व कामे आम्ही करत होतो. यावर प्रेषित म्हणाले, ‘‘मग तर तुम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा महान आहात.’’

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) यांच्या पुढाकाराने अहमदनगर येथील कासिम खानी मस्जिद येथे UPSC , MPSC , NEET , JEE , LAW सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या स्टडी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण , स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली पुस्तके ,ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रोजेक्टर , अभ्यास करण्यासाठी स्टडी चेयर आणि विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मस्जिद चा वापर फक्त प्रार्थना करण्यापूर्ता मर्यादित न ठेवता ज्ञानोपासनेसाठी त्याचा वापर करणे हा आजच्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात देखील याच प्रकारे मस्जिद चा वापर हा ज्ञानदानासाठी केला जात असे. मस्जिद ही संस्था सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या दृष्टीने विविध आणि व्यापक कार्ये करत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामिक शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करण्यासाठी कुबा मस्जिद, अल-मीरबाद मस्जिद आणि नबवी मस्जिद ची निर्मिती मदिना येथे केली. मस्जिद मध्ये मुस्लिम, जगाच्या आणि परलोकाच्या चिंतेसाठी ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल शिकत आणि चिंतन करत. तेथूनच विचारवंत आणि दूरदर्शी विद्वान निर्माण होत असत.

कुरआनमध्ये 28 वेळा ’मस्जिद’  या शब्दाचा उल्लेख आला आहे तसेच सफ , बैत , बुयुत सारख्या संबंधित शब्दांचा संदर्भ घेतला तर कुरआनने नंतर 46 वेळा मस्जिद या विषयाला स्पर्श केला आहे. मस्जिद किंवा मस्जद या अरबी शब्दावरून मशीद हा शब्द आला आहे. शब्दशः याचा अर्थ सुजुद (सजदा) करण्याची जागा असा होतो. म्हणजेच अल्लाहच्या भक्तीचे प्रतीक म्हणून कपाळ जमिनीवर लावणे.या संदर्भानुसार ’मस्जिद’ म्हणजे नमाज पठण करण्यासाठी जागा म्हणून परिभाषित केले जाते.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मस्जिद विशेषत: लेक्चर हॉल म्हणून तयार केल्या गेल्या होत्या, नंतर हजरत उमर रजि. यांच्या कालखंडात शिक्षणाच्या हेतूसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यापूर्वी मस्जिद च्या इमारतीचे अनेक कोपरे शैक्षणिक क्रियाकलापांसाठी काटेकोरपणे राखीव ठेवण्यात आले होते. केवळ धार्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठीच नव्हे, तर मशिदींना इस्लामी सीमारेषेतील ज्ञानाच्या विविध शाखांच्या विकासासाठीचे स्थान मानले जाते. मशिदींना शिक्षणाची ठिकाणे मानण्याची परंपरा आजही कायम आहे. उदाहरणार्थ, इजिप्तमधील प्रसिद्ध अल-अझहर युनिव्हर्सिटी जे अल-अझहर मस्जिद मध्ये स्थापन करण्यात आली आहे. काही इस्लामिक देशांमध्ये अशा इतरही अनेक मस्जिद आहेत ज्या मस्जिद म्हणून ओळखल्या जात नाहीत परंतु विद्यापीठे म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी ट्युनिशियामधील अल-झायतुना मस्जिद, मोरोक्कोमधील अल-कारावीयिन मस्जिद आणि इजिप्तमधील अल अझहर मस्जिद इ.

भारतातही चेन्नई शहरातील मक्का मस्जिद ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (उर्वरित आतील पान 7 वर)

निवासी प्रशिक्षण आणि स्टडी सेंटर चालवते तसेच मुंबई आणि बिहार येथील हज हाऊस च्या इमारतीत देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.पण ही काही मोजकीच उदाहरणे आहेत. मस्जिद या संस्थेचा व्यापक लोक कल्याणकारी कार्यासाठी आणि ज्ञानोपासानेसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. म्हणूनच कासिम खानी मस्जिद , अहमनगर च्या व्यवस्थापक समितीने मस्जिद मध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर सुरू करण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

मस्जिद हे मानवी संसाधन निर्मितीचे आणि समुदाय परिवर्तनाच्या विकासाचे केंद्र म्हणून कार्यरत राहणे ही आजच्या काळातील आवश्यकता आहे. मस्जिद ही संस्था केवळ धार्मिक प्रार्थना करण्याचे स्थान एवढ्या एकाच कार्यासाठी मर्यादित न ठेवता त्यांचा व्यापक वापर समाज कल्याण आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून असला पाहिजे. ऐतिहासिकदृष्ट्या, मस्जिद जकात, जकात-अल-फितर, जिझिया, खराज, घनिमा आणि फाय मिळविण्यासाठी केंद्रे म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर मस्जिद मुस्लिमांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून देखील मानल्या जातात ज्यामध्ये व्यावसायिक व्यवहार, कर्ज आणि कृतींचा समावेश असत. यासोबतच संघर्ष निवारण, न्यायदान, लोकशाही पद्धतीने आपला अमीर निवडणे त्यांच्याशी संबंधित इतर सामाजिक मेळावे किंवा बैठका देखील मस्जिद मध्ये आयोजित केल्या जात असत. मस्जिद चा व्यापक आणि विधायक कार्यासाठी वापर करण्याची ही परंपरा कासिम खानी मस्जिद मध्ये पुन्हा सुरू करून भारतातील इतरही मस्जिद व्यवस्थापकांसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल मस्जिदच्या व्यवस्थापक समितीचे अभिनंदन.निश्चितच याचा उपयोग परिसरातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना होईल आणि ते विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजाची आणि देशाची सेवा करतील.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र चे नायब अमीर जमीर कादरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार,अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम शेख, हिंदुस्थानी समाज, जमाते इस्लामी हिंदचे सचिव डॉ. सय्यद रफीक पारनेरकर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जमीर कादरी म्हणाले,’जमाते इस्लामी हिंद ही संस्था देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असून भारताला जगातील पहिल्या तीन क्रमांकाची महासत्ता बनवणे हे त्यांचे लक्ष आहे. या कार्यासाठी नैतिक आणि चारित्र्यसंपन्न अधिकारी घडावेत यासाठी कासिम खानी मस्जिद स्टडी सेंटर सारखे आणखी स्टडी सेंटरची स्थापना येत्या काळात करण्यात येईल.’ ’शहेबाज मनियार यांनी मार्गदर्शन करताना इस्लाम मध्ये असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला अधोरेखित केले तसेच काळाची पावले ओळखून विविध कौशल्य आत्मसात करणे, तंत्रज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करणे , स्थानिक भाषेवर पकड निर्माण करणे, स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे, वेळेचे नियोजन करणे इ. गोष्टी या विद्यार्थ्यांच्या प्राथमिकता असाव्यात यावर भर दिला. याप्रसंगी जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या या पुढाकाराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- शहेबाज म. फारुख मनियार



माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्याने खऱ्या अर्थी ईमानचे समाधान प्राप्त केले.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

अल्लाहच्या दासत्वात स्वत:ला झोकून देऊन आणि इस्लामी शरियत (धर्मशास्त्र) ची उपासना करून आणि स्वत:ला पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शनासाठी वाहून घेऊन पूर्णत: संतुष्ट आहे, त्याचा निर्णय असा आहे की मला दुसऱ्या कोणाचे दासत्व करायचे नाही आणि प्रत्येक स्थिती इस्लामनुसार आचरण करणे आणि पैगंबरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या मनुष्याची स्थिती अशी असेल त्याने समजा ईमानचा गोडवा त्याने प्राप्त केला.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे आज्ञापालन करावयास हवे).'' (हदीस : मुस्लिम)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ''हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.'' पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.'' (हदीस : मुस्लिम)

अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र 'नफ्ल नमाज' (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ''मी नेहमी 'नफ्ल रोजे' (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही'' आणि तिसरा म्हणाला, ''मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.'' (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, ''तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!'' मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) 'नवाफिल' (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल, त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.'' (हदीस : मुस्लिम)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



महागाईच्या झळा त्यानांच बसतात जे हलाल (वैध) पद्धतीने संपत्ती कमावतात मात्र या जगात हराम (अवैध) पद्धतीने संपत्ती कमावण्याची पद्धत एवढी रूढ झालेली आहे की ती वाईट आहे याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. एवढेच नव्हे तर हराम पद्धतीने संपत्ती कमावणाऱ्यांना सामाजिक मान्यता मिळालेली आहे. यामुळे आर्थिक विषमता एवढी वाढलेली आहे की, आफ्रिकेतील मागास देशातील काही लोक पांढऱ्या मातीचे पेस्ट तयार करून त्यात मीठ मिसळून खात आहेत. तर प्रगत देशामधील लोक पंचपकवाने खाऊन मधुमेहाने मरत आहेत. आपल्या देशातही विषमतेने कळस गाठलेला आहे. तरूणांना रोजगार मिळत नाही. 2019 साली घोषित झालेल्या रेल्वेच्या परीक्षा अद्याप पूर्णत्वास गेेलेल्या नाहीत त्यामुळे संपूर्ण बिहारमधील तरूण पेठून उठलेले आहेत, रेल्वे जाळत आहेत. या पार्श्वभूमीवर ही आर्थिक विषमता का वाढते? तिला रोखण्यासाठी काही उपाय आहे काय? यावर या आठवड्यात चर्चा करणे अनाठायी होणार नाही. 

आर्थिक विषमतेचे मूळ कारण व्याज आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उपभोगतावादी जीवनशैलीला सरकारी मान्यता प्राप्त असते आणि या व्यवस्थेमध्ये सर्वाधिक महत्त्व संपत्तीला असते. विशेष म्हणजे या व्यवस्थेमध्ये अनैतिक पद्धतीने संपत्ती कमाविण्याला वाईट समजले जात नाही. विषमतेची सुरूवात येथूनच होते. भांडवलशाही व्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे. 

साम्यवादाच्या पाडावानंतर आजमितीला दोन अर्थव्यवस्था जगात अस्तित्वात आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था दूसरी इस्लामी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने जगातील सर्वच देशांचा ताबा घेतलेला आहे तर इस्लामी अर्थव्यवस्था बाल्यावस्थेत आहे. इतकी की तिचा परिचय करून द्यावा लागतो. परंतु ज्या दिवशी या दोन अर्थव्यवस्थांमधील फरक सामान्य लोकांच्या लक्षात येईल त्याच दिवशी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळून पडेल, यात शंका नाही. या दोन अर्थव्यवस्थेतील मूळ फरक व्याज होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला नफा समजले जाते, तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाला आर्थिक शोषणाचे मूळ कारण समजले जाते. मग प्रश्न असा उत्पन्न होतो की, या दोन विचारांपैकी कोणता विचार खरा आहे? मानवकल्याणासाठी योग्य आहे? 

व्याज म्हणजे काय? 

मूळ रकमेवर कर्जदाराकडून अनिवार्य पद्धतीने वाढीव रक्कम घेणे म्हणजे व्याज होय? ईश्वराने माणसामध्ये जी प्रवृत्ती ठेवलेली आहे त्यात काही गोष्टी चांगल्या म्हणून बाय डिफॉल्ट ठेवलेल्या आहेत. उदा. खरे बोलावे, आई-वडिलांची सेवा करावी, शोषण करू नये इत्यादी. जरा गांभीर्याने विचार केला तर कोणाच्याही लक्षात येईल की, व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या प्रतिकूल असे काम आहे. मुळात माणसाने जे कमाविले ते नशीबाने कमाविलेले असते. त्याच्यात त्याच्या मेहनतीचा फारसा वाटा नसते. कारण मेहनत तर सगळेच करतात. मेहनतीवर श्रीमंती अवलंबून असती तर शेतकरी वर्ग जगातील सर्वात श्रीमंत वर्ग ठरला असता. म्हणून नशीबाने जी संपत्ती मानवाने कमाविलेली आहे ती त्याने स्वतःवर खर्च करावी, आपल्या कुटुंबावर खर्च करावी, योग्य पद्धतीने भविष्यासाठी बचतही जरूर करावी, मात्र एवढं करूनही त्याच्याकडे संपत्ती शिल्लक राहत असेल तर त्याने ती धर्मादाय कामामध्ये खर्च करावी. चॅरिटी करण्याचे धाडस नसेल तर किमान त्याने त्या संपत्तीचा दुरूपयोग तरी करू नये, हा उदात्त हेतू इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये नाही. आपल्याकडे असलेली संपत्ती गरजवंतांना कर्जरूपाने देऊन अर्थात सावकारी करून अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेणे मानवी प्रवृत्तीच्या विरूद्ध आहे. 

व्यापारी बँकांकडून कर्ज घेणे?

व्यापारी बँकांकडून कोणी व्यावसायासाठी कर्ज घेत असेल तर त्याला योग्य म्हणता येणार नाही. कारण कर्जदार व्यावसायिकाला नफा हो का तोटा हो बँकेला व्याजासहित मूळ रक्कम परत करावीच लागते. काही अशा कारणांमुळे व्यावसाय तोट्यात गेला की ज्या कारणावर व्यापाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. उदा. पूर, भूकंप, लॉकडाऊन वगैरे... तरी व्यावसायिकाला व्याजासह मूळ रक्कम बँकेला परत द्यावीच लागते. व्यवसाय हा नेहमीच नफ्यात राहील, असे छाती ठोकपणे कोणीच म्हणू शकत नाही. अशा परिस्थितीत व्यावसायिकासमोर दोनच पर्याय असतात. एक तर माल्या, मोदी, सारखे विदेशात पळून जाणे किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करणे. व्याज माणसाला जीवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेतो.  म्हणून ईश्वराने व्याजाला निषिद्ध घोषित केलेले आहे. 

कमी दरावर व्याज घेणे?

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे श्रद्धावंतांनो! हे दाम दुप्पट व्याज खाण्याचे सोडून द्या आणि अल्लाहचे भय बाळगा, आशा आहे की सफल व्हाल.’’  (सुरे आले इमरान : आयत नं.130).  या आयातीचा अर्थ लावताना अनेकांची गफलत झालेली आहे. ती अशी की, अव्वाच्या सव्वा दराने व्याज घेऊ नये. मात्र कमी दराने व्याज घेण्यास काही हरकत नाही. हा अर्थ चुकीचा आहे. याचे कारण असे की, कुरआनच्या याच सुरहमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार करू नका.’’ (सुरे बनीइसराईल : आयत नं.31). तर याचा अर्थ असा घ्यावा का की, गरीबी व्यतिरिक्त दुसऱ्या कारणाच्या भीतीने संततीला ठार मारणे कुरआन संमत आहे? जसे कुठल्याही कारणास्तव कोणालाही ठार करणे कुरआन संमत नाही त्याचप्रमाणे कुठल्याही कारणाने व्याज घेणे कुरआन संमत नाही. 

इस्लामला भाडे घेणे मान्य आहे तर व्याज का नाही?

इस्लाममध्ये कुठलीही वस्तू भाड्यावर देणे मान्य आहे. उदा. दुसऱ्याच्या उपयोगासाठी आपले घर भाड्यावर देता येते, वाहन भाड्यावर देता येते व त्यावर भाडे घेता येते. तर त्याचप्रमाणे दुसऱ्याला रक्कम देऊन त्यावर व्याज का घेता येत नाही, तेही एका प्रकारचे भाडेच नव्हे काय? तर याचे उत्तर असे की, आपण जेव्हा घर किंवा वाहन भाड्यावर देतो तेव्हा ते नष्ट होत नाही  रक्कम मात्र नष्ट होते. उदा. एखाद्याने मुलीच्या लग्नासाठी एक लाख रूपये कर्ज घेतले तर 1 लाख रूपये लग्नामध्ये खर्च झाले म्हणजे ती रक्कम नष्ट झाली. घर किंवा वाहनामध्ये असे होत नाही. ते मूळ मालकाला परत मिळतात. खर्च झालेली रक्कम नव्याने उभी करावी लागते आणि हे काम अतिशय कठीण असते. त्यावर पुन्हा व्याज देणे ती तर आणखीन कठीण बाब ठरते. त्याची 1 लाख रूपये उभी करण्याची ऐपत असती तर त्याने कर्जच घेतले नसते. अशा परिस्थितीत मूळ रक्कम परत मागणे ठीक आहे पण त्यावर व्याज मागणे हे भाडे मागण्याऐवढे सहज नाही आणि शक्यही नाही. म्हणून इस्लामने रोख रकमेवर मोबदला व्याज रूपाने घेण्यास मनाई केलेली आहे. 

कर्जाऊ रकमेचे अवमूल्यन होते त्याचे काय? 

समजा ’अ’ने 10 लाख रूपये ’ब’ला पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्जाऊ दिले आणि ’ब’ने प्रामाणिकपणे पाच वर्षांनी त्याचे 10 लाख रूपये परत दिले. तरी ’अ’चे यात नुकसान होते. कारण पाच वर्षात 10 लाख रूपयाचे अवमूल्यन होते. महागाई वाढते. त्यामुळे दहा लाख रूपयांची ’फेस व्हॅल्यू’ जरी तितकीच असली तरी त्या 10 लाख रूपयांचे ’खरेदी मुल्य’ कमी होऊन जाते. अशा परिस्थिती काय करावे? 

इस्लाममध्ये कोणालाही अनुचित लाभ किंवा अनुचित नुकसानीमध्ये टाकण्यास परवानगी नाही. ’अ’ने 10 लाख रूपये देतांनाच ’ब’शी असा करार करावयास हवा की पाच वर्षानंतर 10 लाख रूपये खरेदी मुल्यासह परत करावे. हे खरेदी मूल्य ठरविण्यासाठी कंज्युमर प्राईस इंडेक्स किंवा सोन्याचे दर एकक म्हणून ठरविले जाऊ शकतात. येणेप्रमाणे ’ब’ला पाच वर्षानंतर 10 लाख रूपये नव्हे तर 10 लाख रूपयाचे खरेदीमुल्य जेवढे असेल तेवढे ’अ’ला परत करणे अनिवार्य ठरते, हे मात्र व्याज नाही. याला इस्लाममध्ये परवानगी आहे. 

ईश्वरीय धमकी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे. अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील  ’’ (सुरे अलबकरा : आयत नं. 279).

कुरआनमध्ये फक्त एकाच ठिकाणी मानवाला धमकी देण्यात आलेली आहे. ते ठिकाण म्हणजे वर नमूद आयात होय. या आयातीचा विषय अर्थातच ईश्वराला तीव्र नापसंत असलेला विषय म्हणजे व्याज होय. आज जगामध्ये सर्वत्र व्याजाधारित अर्थव्यवस्था सुरू आहे. असे समजले जाते की, व्याजामुळे विकास होतो आणि त्यासाठी युरोपियन देशांचे उदाहरण दिले जाते. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमुळे त्यांनी किती विकास केलेला आहे ते पहा.  परंतु एक गोष्ट विसरली जाते की, आयएमएफ आणि वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना अव्वाच्या सव्वा दराने अब्जावधींची कर्जे देऊन कोट्यावधी रूपयांचे व्याज वसूल केले जाते आणि त्या व्याजावर ज्याला जग नेत्रदिपक विकास समजतो तो साध्य केला जातो. म्हणजेच हा विकास नैसर्गिक विकास नसून गरीब राष्ट्रांचे रक्त शोषण करून साधलेला विकास आहे. इस्लामला असा विकास मान्य नाही. इस्लामला समतोल विकास मान्य आहे जो की, व्याज विरहित अर्थव्यवस्थेतच शक्य आहे. कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थित असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या. आणि जर दान करून टाकाल तर ते तुमच्यासाठी जास्त चांगले आहे, जर तुम्ही समजून घ्याल. ’’(सुरे अलबकरा आयत नं. :280)

याचा अर्थ असा आहे की, मानवकल्याण हे सर्वश्रेष्ठ ध्येय असायला हवे. व्यक्तीगत कर्ज असो की, का राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचे कर्ज असो, कर्जदार व्यक्ती असो, वित्तीय संस्था असो, उद्योगपती असो की व्यावसायिक असो तो अशा कारणामुळे कर्ज परत करू शकत नसेल की, जी कारणे त्याच्या हातात नाहीत. उदा. प्राकृतीक आपदा वगैरे... अशा परिस्थितीत त्याचे कर्ज माफ करणे आवश्यक ठरते. अमेरिकेमध्ये ’चॅप्टर-11’ नावाचा एक कायदा आहे. ज्यात एखादी बँक, कारखाना, व्यावसाय अशा कारणामुळे इन्सॉल्व्हंट (दिवाळखोर) झाला असेल जे कारण प्राकृतिक असेल, तर त्याला बेलआऊट पॅकेज देऊन दिवाळखोरीपासून वाचविणे सरकारचे कर्तव्य ठरेल, असे म्हटलेले आहे. मुस्लिमांनी कितीही गर्व केला तरी तो कमी आहे. ते यासाठी की आज अमेरिकेने जो कायदा केलेला आहे तो 1443 वर्षापूर्वी कुरआनने अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला आहे. 

व्याजामुळे खरेच संपत्ती वाढते काय?

कुरआनमध्ये आणखीन एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’जे व्याज तुम्ही देता जेणेकरून लोकांच्या मालमत्तेत मिसळून त्याची वाढ व्हावी, अल्लाहच्या जवळ ते वाढत नाही. आणि जी जकात तुम्ही अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याच्या इच्छेने देता, ती देणारेच वास्तविकतः आपल्या मालमत्तेत वाढ करतात. ’’ (सुरे अर्रूम आयत नं. 39).

सकृतदर्शनी व्याजामुळे संपत्तीत वाढ होत असतांना दिसत असली तरी त्यातील बरकत निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्यक्षात ती वाढ निरूपयोगी वाढ असते. किंबहुना कॅन्सरसारखी वाढ असते, जिच्याद्वारे सामाजिक स्वास्थ्याला गंभीर इजा पोहोचते. ही गोष्ट त्यांच्याच लक्षात येईल ज्यांना डोळसपणाने कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची सवय असते. आज व्याजामुळे मिळत असलेल्या अमाप संपत्तीमुळे किती सामाजिक नुकसान प्रगत राष्ट्रांना होत आहे, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. सध्या फक्त एवढेच लक्षात घेणे गरजेचे आहे की,हराम मार्गाने येत असलेली ही संपत्ती कधीच समाजाचे कल्याण करणारी नाही. 

व्याजाधारित कर्जाचा अंतिम परिणाम

नोव्हेंबर 2021 मध्ये एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) ने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे फक्त एका वर्षात म्हणजे 2020 साली 1 लाख 53 हजार 052 व्यावसायिकांनी व्यवसायात तोटा आल्यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी 29 टक्क्यांनी जास्त आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आकडेवारी तर वेगळीच.

एकंदरित एक गोष्ट स्पष्ट आहे की, व्याजामुळेच मानवतेची अपरिमित हानी होत आहे आणि यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. किती दिवस ही हानी सोसायची? याचा किमान बुद्धिवाद्यांनी विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे. आज ना उद्या जगाला इस्लामच्या व्याजमुक्त अर्थव्यवस्थेकडेच वळावे लागेल. यात शंका नाही. दुर्दैव या गोष्टीचे आहे की, 56 मुस्लिम राष्ट्र असून, एकाही राष्ट्रात शुद्ध अशी व्याजविरहीत अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. किंबहुना अशी अर्थव्यवस्था जगात कुठल्याच देशात अस्तित्वात येणार नाही, यासाठी अमेरिका आणि युरोपीय देश सतत डोळ्यात तेल घालून दक्ष असतात. त्यांना माहित आहे ज्या दिवशी इस्लामच्या कल्याणकारी व मानवतेला तारणारी व्याजविरहित अर्थव्यवस्था एखाद्या देशात यशस्वी होईल त्याच दिवशी कॉपीपेस्टच्या या काळामध्ये त्या अर्थव्यवस्थेचे अनुसरण इतर देशांकडून केले जाईल व आपली अर्थव्यवस्था रसातळाला जाईल. याच भीतीमुळे व्याजविरहीत अर्थव्यवस्थेबद्दल कधीच, कुठल्याच मीडिया हाऊसमध्ये डिबेट आयोजित केल्या जात नाहीत. उलट या विषयाकडे जगाचे लक्ष जाऊ नये म्हणून इस्लाम आणि मुस्लिमांवर वेगवेगळे आरोप मुद्दामहून लावून जगाचे लक्ष विचलित केले जाते. आज मुस्लिमांनी ओरडून जगाला सांगण्याची वेळ आलेली आहे की, इस्लामी अर्थव्यवस्थेशिवाय जगाला दुसरी कुठलीही अर्थव्यवस्था तारू शकत नाही, अन्यथा कुठल्याही अणुबॉम्बशिवाय जग आपोआप नष्ट होईल. 


-एम.आय.शेख



हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या कन्या ह. फातिमा (र.) यांच्या घरी गेले, पण त्यांची भेट न घेताच दरवाजातूनच परतले. कारण त्यांनी (ह. फातिमा र. यांनी) आपल्या घराच्या दरवाजावर रंगीत पडदे लावलेले होते. जेव्हा कधी प्रेषित कुठल्या प्रवासावरून परत यायचे तेव्हा ते प्रथम आपल्या कन्येची भेट घेत असत. पण त्या दिवशी प्रेषित त्यांना भेटल्याविनाच परतले होते. जेव्हा ह. अली (र.) (ह. फातिमा र. यांचे पती) घरी आले. त्यांनी फातिमा (र.) यांना दुःखद अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे कारण विचारले. ह. फातिमा यांनी प्रेषितांविषयी सांगितले की ते आपल्या घरी आले होते, पण दारातूनच परतले. हे ऐकून ह. अली (र.) प्रेषितांच्या सेवेत उपस्थित झाले आणि म्हणाले की हे प्रेषित! आपण आमच्या दारातूनच परतलात. यामुळे फातिमा (र.) फार दुःखी आहेत.

यावर प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला या दुनियेच्या वैभवाशी काय देणंघेणं. मला रंगीत पडद्यांचा काय मोह?’’

ह. अली (र.) फातिमा (र.) यांच्याकडे जाऊन प्रेषितांनी जे सांगितले ते कळवले. ह. फातिमा (र.) यांनी ह. अली (र.) यांना सांगितले की तुम्ही जा आणि प्रेषितांना विचारा, त्या पडद्यांचे मी काय करावे?

प्रेषित मुहम्मद (स.) ह. अली (र.) यांना म्हणाले, ‘‘फातिमांना सांगा ते पडदे कुणाला तरी देऊन टाका जेणेकरून ते त्यांचे वस्त्र शिवून परिधान करतील.’’ (मुसनद अहमद बिन हंबल)

ह. शफा बिन्त अब्दुल्लाह (र.) म्हणतात, ‘मी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे गेले त्यांनी माझी काही मदत करावी म्हणून. पण प्रेषितांनी क्षमा मागितली. मला काही दिलं नाही. नंतर मी माझ्या मुलीच्या घरी गेले. नमाजची वेळ झाली असताना देखील तिचे पती शरजील (र.) घरीच बसून होते. मी त्यांच्यावर रागावले.’ त्यावर शरजील (र.) म्हणाले. ‘मावशी तुम्ही उगाच माझ्यावर रागावत आहात. माझ्याकडे एकच वस्त्र होतं. ते प्रेषितांनी माझ्याकडून मागून घेतलं. मला परिधान करायला आता दुसरे कपडे नाहीत, म्हणून मी मशिदीत गेलो नाही.’ त्यावर ह. शफा (र.) म्हणाल्या, ‘माझे मातापिता प्रेषितांवर कुरबान. मी नाहक त्यांच्यावर रागावले. मला त्यांच्या बाबतीत माहिती नव्हती.’ शरजील (र.) म्हणतात, ‘माझ्याकडे एकच फाटलेले वस्त्र होते ज्यावर मी ठिगळ लावले होते.’ (तिर्मिजी, बहैकी)

मुस्लिमांच्या माता ह. आयेशा (र.) म्हणतात की ह. सफिया (र.) (प्रेषित मुहम्मद स. यांच्या पत्नी) ज्या अगोदर ज्यू धर्मिय होत्या. त्यांचा उंट आजारी पडला. ह. जैनब (र.) यांच्याकडे दोन उंट होते.

त्यांना प्रेषित म्हणाले, ‘‘तुम्ही आपला एक उंट सफिया यांना द्या.’’ ह. जैनब (र.) म्लणाल्या, ‘मी त्या ज्यू धर्मियास माझा उंट का देऊ?’

त्यावर प्रेषित मुहम्मद (स.) ह. जैनब (र.) यांच्याशी तीन दिवस काहीच बोलले नाहीत. (अबू दाऊद)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget