Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक उगवणाऱ्या सू्र्यासोबतच तुमच्यावर दानधर्म करणे अनिवार्य होते. दोन माणसांमध्ये न्याय करणे, एखाद्याला गाडीत स्वार होताना मदतीचा हात देणे, त्यांचे सामान उचलून गाडीत ठेवणे, लोकांना भलाईच्या गोष्टी सांगणे ही सर्व जणू दानधर्माची कार्ये आहेत. तसेच नमाजसाठी मशिदीकडे जाणे. जाताना रस्त्यात कुणाला इजा होईल अशी वस्तू रस्त्यावर दिसल्यास ती बाजुला सारणे या सगळ्या गोष्टी दान करण्यासारख्या आहेत. कुणाला वाईट कृत्यापासून रोखणे हेदेखील दान केल्यासारखे आहे. (संदर्भ – अबु हुरैरा, बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, कोणत्याही सत्कर्मास तुच्छ समजू नका. कुणाला रस्सीचा एक तुकडा दिला, एखादा खिळा दिला असेल, कुणाचे भांडे पाण्याने भरून दिले. आपल्या भावाशी आपुलकीने भेटणे किंवा त्यास नुसते जरी सलाम केला असेल तरी या सर्व गोष्टी सत्कर्म आहेत. प्रेषित नेकीची बरीच कार्ये आपल्या अनुयायींना सांगत असताना म्हणतात की तुमच्या हातून कसलेही सत्कर्म होत नसेल तर कमीतकमी कुणाला इजा पोहोचवू नका. असे करणेदेखील सत्कर्मच आहे. प्रेषितांना विचारण्यात आले की जर एखादा माणूस लोकांना लाजून एखाद्याच्या अंतिम यात्रेत सहभागी होत असेल तर त्याला मोबदला मिळणार का? प्रेषित म्हणाले, “त्यास दुप्पट मोबदला मिळेल. एक अंतिम यात्रेत सहभागी होण्याचा आणि दुसरा आपल्या गल्ली-मोहल्ल्यातील लोकांच्या भावनांचा विचार करून त्यात सहभागी झाल्याचा.”

नेकी ही आहे की अल्लाह, परलोक, पवित्र कुरआन, अल्लाहचे देवदूत आणि त्यांच्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवून आपल्या आवडीची संपत्ती आपल्या नातलगांना, गरजवंतांना, अनाथांना, प्रवाशांना आणि गुलामांना देणे. नमाज अदा करत राहाणे आणि जकात देणे, कुणाला वचन दिल्यास ते पूर्ण करणे ही सर्व नेकीची कर्मे आहेत. (संदर्भ – पवित्र कुरआन, २:१७७)



ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा नियम आहे. 

संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत.


जफर आदमी उसको न जानीएगा

हो वो कितना ही साहेबे फहम व जका

जिसे ऐश में यादे खुदा न रही 

जिसे तैश में खौफ-ए-खुदा न रहा

जकाल ’’मानवी गरजां’’मध्ये लोकांच्या ’इच्छा-आकांक्षा’ ही सामील झाल्याने लोकांचे आर्थिक वर्तन बिघडले आहे. यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, अनेक लोकांना अनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा जणू मॅनिआच झालेला आहे. त्यामुळे बाजारात कृत्रिम मागणी वाढते आहे. रात्रंदिवस जाहिरातींचा मारा करून अशी मागणी सातत्याने वाढत राहील, याची काळजी कार्पोरेट जगताकडून घेतली जात असल्यामुळे आदर्श आर्थिक वर्तन कसे असावे, यावर विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. 

संपत्ती गोळा करण्याची इच्छा 

मुफलिसी हिस-ए-लताफत को मिटा देती है

भूक आदाब के सांचे में ढल नहीं सकती

प्रत्येक माणसाला संपत्ती गोळा करण्याची नैसर्गिक इच्छा असते. त्यासाठी तो रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो. त्यातून प्राप्त केेलेल्या संपत्तीचा उपयोग करण्यासाठी तो स्वतंत्र असतो. यातूनच माणसाचे आर्थिक वर्तन ठरत असते. मात्र वर म्हटल्याप्रमाणे आधुनिक काळात, ’’गरज’’ या शब्दात चंगळवादी इच्छा आकांक्षांची सरमिसळ झाल्यामुळे बाजाराचे मागणी आणि पुरवठ्याचे गणित सातत्याने बिघडत आहे. श्रीमंत माणसे वाट्टेल ती किंमत देऊन त्यांच्या मनाला येईल त्या वस्तू मग गरज असो की नसो खरेदी करत असतात. त्यामुळे गरजेच्या अनेक वस्तू विनाकारण महाग होत जातात. याचा परिणाम कमी उत्पन्न गटातील लोकांवर होतो. त्यांच्यापर्यंत त्या वस्तूही पोहोचणे दुरापास्त होवून जातात ज्या जीवनावश्यक असतात. जी गत वस्तूंची तीच गत अत्यावश्यक सेवांची. उदा. शिक्षण किंवा आरोग्य सेवा. संपत्ती कमावण्यावर कुठलेही नैतिक बंधन नसल्याकारणाने व कायदेशीर बंधन झुगारण्याजोगे असल्याकारणाने अनेक लोक भ्रष्ट मार्गाने अमाप संपत्ती कमावतात व त्यातून दर्जेदार शिक्षण व आरोग्य सेवा खरेदी करतात. साहजिकच मग या दोन्ही जीवनावश्यक सेवा कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या हाताबाहेर जातात आणि ’आहे-रे’ आणि ’नाही-रे’ या दोन सामाजिक गटातील दरी अधिकाधिक रूंद होत जाते. 

भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये या विषमतेवर उपाय नाही. म्हणूनच जगात दिवसागणिक विषमता वाढत आहे. श्रीमंतांची डोळे दिपवणारी आर्थिक वर्तणूक पाहून गरीबांची मानसिक स्थिती  बिघडत आहे. त्यातूनच गुन्हेगारीचा जन्म होत आहे. म्हणूनच आज संघटितरित्या केली जाणारी गुन्हेगारी आधुनिक जगाची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. ’गन कल्चर’ वाढत आहे. माणसं किड्यामुंग्यासारखी मारली जात आहेत. नैतिकता रसातळाला जाऊन पोहोचली आहे. अमाप संपत्तीतून राजकीय पदे व प्रसंगी न्याय खरेदी करून स्वतःला मजबूत करण्यात श्रीमंतांना यश मिळत असल्याने लायक परंतु गरीब लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत आहे. 

आर्थिक वर्तणुकीचे इस्लामी नियम

भूक में इश्क की तहेजीब भी मिट जाती है

चाँद आकाश में थाली की तरह लगता है

नवश्रीमंतांच्या चमकदार चंगळवादी जीवन शैलीपासून  नैसर्गिकरित्या गरीबांना इर्ष्या होत असते. त्या इर्षेतून जागतिक स्तरावर गरीब व मध्यमवर्गीय लोकांचे आर्थिक वर्तन बिघडल्या कारणाने सर्वत्र आर्थिक व सामाजिक असंतुलन निर्माण झालेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये यावर उपाय नाही. उलट हे आर्थिक वर्तन बिघडण्यासाठी हीच व्यवस्था कारणीभूत असल्याचे एव्हाना सिद्ध झालेले आहे. माणसाची आर्थिक वर्तणूक नियंत्रित ठेवण्याची नैसर्गिक व्यवस्था कुरआनमध्ये दिलेली आहे. परंतु  हा एवढा दुर्लक्षित विषय आहे की, बहुसंख्य मुस्लिम लोकांमध्ये  सुद्धा यासंबंधीची पुरेशी जागरूकता नाही. 

कुरआनच्या शिकवणींचा सार असा आहे की, पृथ्वीच नव्हे तर सर्व सौर मंडलाचा मालक ईश्वर आहे. त्यातील सर्व संपत्तीचा मालक ईश्वर आहे. माणसं जन्माला येतात आणि आपल्या ईश्वरदत्त कौशल्यातून त्या ईश्वरीय संपत्तीचा काही भाग हस्तगत करतात त्याचा वापर करतात व सर्व संपत्ती येथेच ठेवून मरून जातात. कुरआनने माणसाच्या संपत्ती कमावण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत व खर्च करण्यावरही प्रतिबंध घातलेले आहेत. हे प्रतिबंध, ’’हलाल आणि हराम’’ या सज्ञेच्या माध्यमातून जगाला परिचित आहेत. कुरआनमध्ये हराम गोष्टी कोणत्या आहेत याची यादीच दिलेली आहे. त्या वगळता बाकी सर्व गोष्टी हलाल आहेत. इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा हा पहिला नियम आहे. कुरआनमध्ये असे म्हटलेले आहे की, ’’आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले आणि तुमच्यासाठी तेथे जीवनसामुग्री उपलब्ध केली, परंतु तुम्ही लोक कमीच कृतज्ञता व्यक्त करता.’’  (सुरे आराफ : आ.क्र.10)

या आयातीच्या शब्दरचनेवर गांभीर्याने विचार केला असता खालील गोष्टींचा बोध होतो. यात सुरूवातीलाच ईश्वराने मानवाला संबोधित करत म्हटलेले आहे की, आम्ही तुम्हाला भूतलावर अधिकारांनिशी वसविले. याचा अर्थ मूळ अधिकार माणसाचे नसून ते ईश्वराने प्रदान केलेले आहेत. स्पष्ट आहे मुळात अधिकार ज्याने प्रदान केलेले आहेत त्याच्याच मर्जीप्रमाणे त्या अधिकारांचा वापर केला जावा. तसा तो केला जात नसेल तर यात माणसाचा कृतघ्नपणा दिसून येतो. म्हणून आयातीच्या दूसऱ्या भागामध्ये ईश्वर म्हणतो की आम्ही तुम्हाला अधिकार दिले पण तुम्ही लोक माझ्याप्रती कमी कृतज्ञ आहात. म्हणजे या ठिकाणी ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी रहे. फार महत्त्वाचे मत नोंदवितात ते खालीलप्रमाणे,

’’ इन्सान को दुनिया में जिंदगी बसर करने के लिए जिस हिदायत व रहेनुमाई की जरूरत है, अपनी और कायनात की हकीकत और अपने वजूद की गर्ज व गायत समझने के लिए जो इल्म उसे दरकार है, और अपने अख्लाक (चांगल्या सवयी), तहेजीब (सभ्यता), मुआशरत (सामाजिक) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिए जिन उसूलों का वो मोहताज है, उन सबके लिए उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहेनुमा तस्लीम करना चाहिए और सिर्फ उसी हिदायत की पैरवी (अनुसरण) इख्तीयार करनी चाहिए जो अल्लाहने अपने रसूलों के जरीये से भेजी है. अल्लाह को छोडकर किसी दूसरे रहेनुमा की तरफ हिदायत के लिए रूजू करना और अपने आपको उसके रहेनुमाई के हवाले कर देना इन्सान के लिए बुनियादी तौर पर एक गलत तरीकेकार है. जिस का नतीजा हमेशा तबाही के सूरत में निकला है और हमेशा तबाही की सूरत ही में निकलेगा.’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन : खंड 2, पान क्र . 7, अनुच्छेद क्र. 4).

या आयातीचा अर्थ असाही घेतला जाऊ शकतो की, जीवन जगण्यासाठी ईश्वराने मानवाला जे अधिकार आणि वस्तू प्रदान केलेले आहेत ही त्याची केवळ, ’’कृपा’’ आहे. म्हणून त्यांचा वापर आवश्यक तेवढा व न्याय पद्धतीने करावा, असे केल्यास कोणालाच कधीही कसल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. परंतु भ्रष्ट पद्धतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी जी पद्धत जागतिक स्तरावर रूढ झालेली आहे व भांडवलशाही ने त्या पद्धतीला वैधता प्रदान केेलेली आहे त्यातून माणसाचे आर्थिक वर्तन बिघडले असून, त्याची शिक्षा माणसाला या जीवनातही मिळणार व मरणोपरांतही मिळणाार एवढे नक्की. चुकीच्या सामाजिक आणि आर्थिक वर्तनातून जगामध्ये जी अव्यवस्था माजलेली आहे त्यामुळे, ’’नाही रे ची’’ जी हानी होत आहे तिची भरपाई संसाधनांचा दुरूपयोग करणाऱ्यांनाच करावी लागणार आहे. म्हणूनच आपण पाहतो भ्रष्ट मार्गाने अनेकजण गडगंज संपत्ती कमवूनही समाधानी व आरोग्यदायी जीवन जगताना दिसून येत नाहीत. उलट मृत्यूपरांत जीवनामध्ये सुद्धा त्यांना ईश्वरासमोर खजील व्हावे लागेल. तो त्रास वेगळाच. कारण ईश्वराने प्रत्येक गोष्ट जोडीने जन्माला घातलेली आहे. पृथ्वीवरील जन्माची जोडी मरनोपरांतच्या जन्माशी घातलेली आहे. यदा कदा कोणी या जीवनात शिक्षा न भोगता सुटलाच तरी ईश्वरीय न्याय अपूर्ण राहणार नाही. मृत्यूपरांत त्याला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे, हा इस्लामी आर्थिक वर्तनाचा दूसरा नियम आहे. न्याय एक असा ईश्वरी गुण आहे ज्याला माणसाच्या प्रवृत्तीमध्येच ईश्वराने सामील केलेले आहे. म्हणूनच माणसाला न्याय आवडतो व अन्यायाची चीड येते. यावरूनच वाचकांच्या लक्षात एक गोष्ट येईल की जगात चुकीचे आर्थिक व सामाजिक वर्तन करून ज्यांनी संपत्तीच्या बळावर येथून कशीबशी सुटका जरी करून घेतली तरी मरणोपरांत त्यांची गाठ ईश्वराशी आहे, हे सत्य कोणालाच नाकारता येण्यासारखे नाही. कारण जीवनापेक्षा जास्त शास्वत सत्य मृत्यू आहे.

आर्थिक वर्तणुकीचा तीसरा सिद्धांत वैध मार्गाने संपत्ती कमाविणे आहे. हे प्रत्येकावर फर्ज (अनिवार्य) आहे. त्यामुळे योग्यता असूनही जर कोणी वैध मार्गाने काम न करता निरूद्देश जीवन जगत असेल तर तो ही ईश्वराच्या नजरेत गुन्हेगार आहे आणि आपल्या, ’’योग्यते’’चा दुरूपयोग करून भ्रष्ट पद्धतीने जीवन जगत असेल तर तो ही गुन्हेगार आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरले जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादाचा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा कदाचित तुम्हाला सफलता प्राप्त होईल.’’ (सुरे जुमआ : आयत नं. 10) 

या ईश्वरीय आदेशातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एक अजानची आवाज झाल्याबरोबर मुस्लिमांनी आपल्या सर्व व्यावसायिक गतीविधी तात्काळ थांबवायला हव्यात व नमाजसाठी मस्जिदीकडे जावयास हवे. याचा अर्थ व्यावसाय करणे आवश्यक आहे मात्र नमाज सोडून व्यावसाय करणे प्रतिबंधित आहे. जरी यात शुक्रवारचया नमाजाचा विशेष उल्लेख आहे तरी अजान होताच व्यवसाय थांबविण्याचा हा आदेश सर्वच नमाजांसाठी लागू असल्याचे मत इस्लामी विद्वानांचे आहे. हा आर्थिक गतीविधींचा चौथा सिद्धांत आहे. आपल्या कुवतीप्रमाणे संपत्ती गोळा करण्यासाठी काम धंदा करणे, व्यावसाय करणे हे प्रत्येकावर अनिवार्य करण्यात आले आहे. याचा दूसरा अर्थ असा जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांचा त्याग करणे (संन्यास घेणे) हराम आहे. तसेच जीवनावश्यक संसाधने गोळा करण्यामध्ये कुचराई करणे हे सुद्धा ईश्वराला नापसंत आहे. म्हणून मुस्लिमांमधील एक वर्ग जो जीवनावश्यक आर्थिक गतिविधींपेक्षा धार्मिक गतिविधींनाच अधिक महत्त्व देतो. त्याचे वर्तनही या आयातीमध्ये नमूद ईश्वरीय आदेशाविरूद्ध आहे. थोडक्यात माणसाची आर्थिक वर्तणूक ही संतुलित असावी. आर्थिक संसाधने गोळा करताना ईश्वर आणि त्याच्या आदेशांची हर हाल जपणूक केली जावी. संसाधनांचा संपूर्ण त्याग किंवा संसाधनांची अनियंत्रित प्राप्ती या दोन्ही गोष्टी ईश्वराला नापसंत आहेत. म्हणूनच मानवतेला मारक आहेत. हा इस्लामी आर्थिक वर्तणुकीचा पाचवा नियम आहे. थोडक्यात आर्थिक वर्तणुकीच्या ईश्वरीय नियमांचा परिचय देशबंधू तसेच बिगर इस्लामी जगाला करून देण्याची मुख्य जबाबदारी मुस्लिम समाजाची आहे. दुर्दैवाने मुस्लिम समाजातील बहुतेकांचे स्वतःचेच आर्थिक वर्तन या नियमांउलट असल्याने एवढ्या सुंदर व्यवस्थेचा परिचय आज जगाला नाही. म्हणून ही योग्य वेळ आहे, आता मुस्लिमांनी आपल्या वर्तनात सुधारणा करून ईश्वराला अपेक्षित आर्थिक वर्तणुकीच्या नियमांचा सर्वांना परिचय करून द्यावा. त्याशिवाय, आर्थिक शिस्त राखली जाणार नाही व आर्थिक शोषण कमी होणार नाही. पर्यायाने ’नाही रे’ गटातील शोषण असेच सुरू राहील. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आमचे आर्थिक धोरण तुला आवडत असलेल्या नियमांप्रमाणे सुधारण्याची व जगाला त्याचा परिचय करून देण्याची संधी व शक्ती प्रदान कर.’ आमीन. 



ह. अनस (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मित्र तीन प्रकारचे असतात. एक मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही कबरीपर्यंत पोहचेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन.’’ दुसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही गरिबांना जे काही दिलं तेवढंच तुमचं आहे आणि जे तुम्ही कुणाला दिलं नाही, स्वतःसाठी राखून ठेवलं तर ते तुमचं नाही, तर ते तुमच्या वारसदारांचं आहे.’’ ह्या मित्राचं नाव ‘माल’ आहे. तिसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही जथे कुठे असाल कबरीमध्येदेखील मी तुमच्या बरोबर राहीन आणि जेव्हा तुम्ही कबरीतून बाहेर याल त्या वेळेस देखील मी तुमच्या बरोबर राहीन.’’ या तिसऱ्या मित्राचं नाव ‘कर्म’ आहे. माणूस हैरान होऊन म्हणेल की अल्लाहची शपथ! मी तर तुला या इतर मित्रांच्या तुलनेत तुच्छ समजत होतो. (तरगीब, इस्तदराक)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही धनसंपत्ती आणि मालमत्ता गोळा करू नका. तुमच्यामध्ये दुनियेची लालसा घर करेल.’’

ह. आयेशा (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) म्हणत होते की, ‘‘ज्या कुणाला अल्लाहच्या भेटीची आवड असते, अल्लाहदेखील त्याच्या भेटीस पसंत करतो. आणि जो व्यक्ती अल्लाहच्या भेटीस पसंत करीत नाही, अल्लाहदेखील त्याला भेटण्यास नकार देतो.’’ ह. आयेशा (र.) यांनी यावर विचारले की अल्लाहच्या भेटीस पसंत न करण्याचा अर्थ काय? कुणीही मृत्यू पसंत करत नाही. असे असेल तर आमच्यापैकी सर्वच जण मृत्युला पसंत करत नाहीत.

प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वर्ग, अल्लाहच्या देणग्यांविषयी सांगितले जाते तेव्हा त्याच्या मनात अल्लाहशी भेट व्हावी अशी इच्छा होते. अशा माणसाशी अल्लाह देखील भेटू इच्छितो. आणि दुसरीकडे नाकारणाऱ्या माणसाला जेव्हा अल्लाहचा प्रकोप, त्याच्या नाराजीबाबत कळवले जाते तेव्हा असा माणूस अल्लाहच्या भेटीला पसंत करत नाही.’’ (मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्या अस्तित्वाची शपथ, ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे, कयामतच्या दिवशी अल्लाह अशा लोकांना यातना देणार नाही ज्यांनी या जगात अनाथांशी दयेचा व्यवहार केला असेल. त्यांच्याशी मायाळूपणे बोलले असतील आणि त्यांच्या अनाथावस्थेची आणि दुर्बलतेची त्यांना कीव वाटली असेल. आपल्या धर्माच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्यांवर दबाव टाकत नसेल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘हे मुहम्मदच्या उम्मतचे लोकहो, मला शपथ आहे त्या अस्तित्वाची ज्याने मला सत्यधर्म देऊन पाठवले आहे. अल्लाह अशा लोकांच्या दानधर्माला स्वीकारणार नाही ज्याचे नातेवाईक त्याच्याकडून वंचित राहिले असतील.’’ (हुरैरा, तिबरानी)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात.


जिंदगी भर का साथ हो निकाह की मुहब्बत

बेकार सी बात है ये हफ्ते भर की मुहब्बत

स्लाममध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाला मान्यता नाही. हे अगोदरच स्पष्ट करून मग या लेखाची सुरूवात करतो. 

व्हॅलेंटाईन डे चा इतिहास

अगदी संक्षिप्तरित्या सांगावयाचे झाल्यास इसवीसनाच्या तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लाउडियस नावाचा एक राजा होता. तो शूर पण युद्ध पिपासू होता. वीर्य पतनामुळे सैनिकांची शारीरिक शक्ती कमी होते, असा त्याचा समज होता. म्हणून त्याने आपल्या सैन्याला लग्न न करण्याचे फरमान जारी केले. त्याच्या या जुल्मी आदेशाचा विरोध तत्कालीन सेंट (संत) व्हॅलेंटाईन यांनी करत अनेक इच्छुक सैनिकांचे विवाह गुप्तपणे लावून दिले. क्लाउडियसला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद करून फाशीची शिक्षा सुनावली व  14 फेब्रुवारी 269 रोजी त्यांना फाशीवर लटकावण्यात आले. म्हणजे दुसऱ्यांची लग्न लावताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. 

या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून 14 फेब्रुवारी हा प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस म्हणून ब्रिटनमध्ये पाळण्याची प्रथा 19 व्या शतकात सुरू झाली. वास्तविक पाहता सेंट व्हॅलेंटाईन यांची पुण्यतिथी शांतपणे साजरी करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करून प्रकरण संपवता आले असते. मात्र प्रत्येक गोष्टीत कॉमर्स शोधणाऱ्या पाश्चिमात्य लोकांनी या घटनेचेही व्यापारीकरण केले. सेंट व्हॅलेंटाईन यांनी दुसऱ्यांचे कायदेशीर लग्न लावून दिले, म्हणजे परोपकार केला. अशा या परोपकारी धर्मगुरूंनी उदात्त भावनेतून केलेल्या नैतिक कृतीला व्हॅलेंटाईन डे च्या रूपाने अनैतिक प्रेमाचे उदात्तीकरण करून त्याला बटबटीत रूप देण्याचे पाप या लोकांनी केले. 

व्हॅलेंटाईन डे मागचे अर्थकारण

अमेरिकन ग्रीन कार्ड असोसिएशनच्या आकडेवारीप्रमाणे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे च्या हंगामात जगभरात एक अब्ज कार्डस एकमेकांना दिली जातात व ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. वाचकांना माहित असेल भरमसाठ किमतीची ही कार्डे प्रेमात आंधळे झालेले लोक पुढचा-मागचा विचार न करता वेड्यासारखे खरेदी करत असतात. यावरून या मुर्खतापूर्ण व्यवहारात होणाऱ्या अब्जावधी रूपयांच्या उलाढालीचा वाचकांना अंदाज यावा. 

मुळात हा खर्च कमी म्हणून की काय दरवर्षी फेब्रुवारीचा दूसरा आठवडा प्रेमाला समर्पित करण्याची शक्कल पाश्चिमात्य व्यापारी वृत्तीच्या पुरूषांच्या सुपिक डोक्यातून निघाली आणि म्हणूनच 7 फेब्रुवारी - रोज डे, 8 फेब्रुवारी प्रपोज डे, 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, 10 फेब्रुवारी टेडी डे, 11 फेब्रुवारी प्रॉमीस डे, 12 फेब्रुवारी हग डे, 13 फेब्रुवारी किस डे आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अशा अनेक कार्यक्रमांनी हा आठवडा भरलेला असतो. या सात दिवसांत अब्जावधी रूपयांची होणारी आर्थिक उलाढाला ही व्हॅलेंटाईन डे मागची खरी प्रेरणा आहे, यात दूमत नाही. 

मुळात 18 व्या शतकाच्या शेवटी व 19 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच युरोपमध्ये मुक्त लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू झाले होते. चर्च प्रभावहीन झाले होते, धार्मिक शिक्षणाची जागा भौतिक शिक्षणाने घेतलेली होती. विज्ञानाचा विकास तीव्र गतीने होत होता. तंत्रज्ञान वेगाने वाढत होते. औद्योगिक क्रांती नुकतीच झालेली होती. त्यामुळे युरोपमधील लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळत होता. 

इतिहास साक्षी आहे की, माणसाच्या हातात जेव्हा-जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा आला त्याची पाउले आधी संगीत, मग कोठे व त्यातून मुक्त लैंगिकतेकडे वळली. 18 व्या शतकातसुद्धा औद्योगिक क्रांतीमुळे आलेल्या भरमसाठ पैशाने युरोपीयन लोकांचा प्रवास मुक्त लैंगिकतेकडे सुरू झाला. आधी कार्विंग (कलाकुसर) केलेल्या लाकडांच्या ठोकळ्यांचा वापर करून स्त्री-पुरूषांच्या नग्न मुर्त्या, त्यांच्या गुप्तांगाचे शिल्प तयार करून विकले गेले. फ्रांसमध्ये या वुड पोर्नोग्राफीने अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता गाठली.

1839 मध्ये कॅमेऱ्याचा शोध लागला. 1855 मध्ये त्याद्वारे नग्न महिलांचे फोटो काढून विकण्याचा प्रयोग सुरू झाला. मात्र बाल्यावस्थेत असलेल्या या कलेची अडचण 1863 मध्ये तेव्हा दूर झाली जेव्हा प्रिंटरचा शोध लागला. आता अश्लिल चित्रांच्या लागेल तितक्या प्रती काढता येऊ लागल्या. जुगाराच्या पत्यांच्या पाठीमागच्या बाजूस अशी नग्न चित्रे वापरली गेली. 1876 मध्ये व्हीडीओ कॅमेऱ्याचा शोध लागला आणि खऱ्या अर्थाने अश्लिल चलचित्रांना चालना मिळाली. पहिला अश्लील चित्रफट लोमीर ब्रदर्सनी 1895 ला फ्रान्समध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटाचा दिग्दर्शक अल्बर्ट कोचर नावाचा व्यक्ती होता. या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली. 

अशा पद्धतीने 19 व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण युरोप अश्लील चलचित्रांच्या गर्तेत ढकलला गेला. चर्च निष्प्रभ झाल्यामुळे सैल झालेल्या धार्मिक बंधनाचा फायदा उचलत चतूर युरोपीयन पुरूषांनी व्यक्तीस्वातंत्र्य व महिला सबलीकरणाच्या नावाखाली घरंदाज महिलांना घराबाहेर काढण्यात यश मिळविले. भारतातही याच काळात अश्लील चित्रफीतिंनी व्हीडीओ कॅसेट, सीडी, डिव्हीडीच्या माध्यमातून मोठा धुमाकूळ घातला. साधारणपणे माणसे फार लवकर लैंगिक इच्छेच्या आहारी जातात. धार्मिक बंधने सैल असलेला समाज याला चटकन बळी पडतो.

आज जेव्हा लैंगिक चित्रफिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून एका क्लिकवर कॅटेगिरीवाईज अश्लील संवादासह उपलब्ध आहेत, सोबतीला भरपूर व्यक्तीस्वातंत्र्य आहे, हातात पैसा आहे, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि कॅम्पस बऱ्यापैकी मुक्त आहेत. तर या सर्वांचा उपयोग, ’अशा उद्योगासाठी’ केला गेला नसता तरच नवल. लक्षात ठेवा मित्रानों! आधुनिकतेच्या नावाखाली अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम महिला आणि मुलांवर होतो. त्यात अनेकींच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पुरूष मात्र नामानिराळे राहतात. 

ह्या प्रकारची थेरं ही भारताच्या महान हिंदू संस्कृती आणि महान इस्लामी संस्कृती या दोहोंच्या विरूद्ध आहे. म्हणून खरे तर गरज या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी संस्कृतीविरूद्ध एल्गार पुकारण्याची होती. मात्र सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन व इतर डेज यांचा सनदशीर मार्गाने व जमेल तसा विरोध करावा. 

मुस्लिमांची जबाबदारी

सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की, 

1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’ (सुरे बकरा आयत नं. 168-169).

2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’ (सुरे बनी इसराईल आयत नं. 32).

व्हॅलेंटाईन डेज असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलगकरून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात.

मुळात ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणाऱ्या इच्छा-आकांक्षांच्या गुलाम प्रवृत्तीच्या लोकांत कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणाऱ्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात. काही वर्षापूर्वी 31 डिसेंबरच्या रात्री कर्नाटकाच्या बेंगलुरू शहरामध्ये नवीन वर्षे साजरे करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरूणींचे सामुहिक विनयभंग व वस्त्रहरण करण्यात आले. हा इतिहास पाहता मुलींनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पोर्नोग्राफीच्या आहारी गेल्यामुळे आज अनेक पुरूष हे लैंगिकदृष्ट्या विकृत झालेले आहेत. वरूण सर्वच पुरूष सभ्य दिसतात. पण त्यांच्यात कोण विकृत आहे याचा अंदाज मुलींना करता येत नाही. म्हणून त्या अशा लांडग्यांच्या हल्ल्यांना बळी पडतात. अशा अनेक घटना रोज वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात. तरी त्याची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. हे आपले सामाजिक दुर्दैव आहे. याचे कारण असे की, अनैतिक गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा त्यांच्यासह जगण्याची सवय माणसांना लागते. 

या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुलींना या शोषणापासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे, तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तरूण जोडप्यांना गाठून मारहाण करण्यासारखे अघोरी प्रकार कदापी करू नयेत. त्याने फारसे काही साध्य होत नाही. त्यापेक्षा त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करावा.  

यासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाही. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां! हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती. (संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35). 

तरी पालकांनों व मुलींनो व्हॅलेंटाईन डे च्या जाळ्यात अडकू नका. स्वतःची सुरक्षा स्वतः करा. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, व्हॅलेंटाईन डे सारख्या अश्लील उत्सवामध्ये सामील न होण्याची समज व शक्ती आम्हा सर्वांना प्रदान कर आमीन. 

- एम.आय. शेख



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी एका व्यक्तीला टंचाईत मदत केली तर अल्लाह त्या व्यक्तीला या जगी आणि परलोकात मदत करील. जर कुणास असे वाटावे की अल्लाहने कयामतच्या दिवशी त्याची मदत करावी तर त्यांनी टंचाईत सापडलेल्या माणसाचा बोजा कमी करावा किंवा त्याला माफ करावे.

प्रेषित म्हणाले की ‘‘जर कुण्या माणसानं आपल्या मुस्लिम बांधवांच्या कृत्यांवर पडदा टाकला तर अल्लाह कयामतच्या दिवशी अशा व्यक्तीच्या कृत्यांवर पडदा टाकेल.’’

अबु हुरैरा म्हणतात की प्रषितांनी मुस्लिमांना उद्देशून सांगितले की तुम्ही श्रद्धेचा स्वीकार करत असाल तरी तुमच्या मनांमध्ये श्रद्धा पोहोचली नाही, तुम्ही एकमेकांच्या गोष्टी कुणाला सांगू नका आणि लोकांच्या गुपित गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू नका. जर कुणी लोकांची गुपिते उघड करत असेल तर अल्लाह त्याच्या गुप्त गोष्टी बाहेर आणील आणि अशा माणसाला त्याच्या नातेवाईकांच्या नजरेतच बदनाम करील.

‘‘जे लोक श्रद्धावंतांमध्ये व्यभिचाराला प्रोत्साहन देऊ इच्छितात त्यांना या जगी आणि परलोकात यातनादायक शिक्षा दिली जाईल.’’ (कुरआन, सूरह नूर)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या भाऊबंदांना मदत करत राहतो, तोपर्यंत अल्लाह देखील अशा व्यक्तीला मदत देत असतो. जो कुणी आपल्या भावाच्या गरजा पूर्ण करण्यात व्यक्त असतो अल्लाह देखील त्याच्या गरजा पूर्ण करत राहतो.’’

हजरत उमर (रजि.) म्हणतात, ‘‘सर्वोत्तम नेकी श्रद्धावंताना सदैव प्रसन्न ठेवत राहणे आहे. त्याला वस्त्रं नसतील तर त्यांची पूर्तता करा. तो भुकेला असेल तर त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा.’’

दुसरे खलीफा ह. उमर (रजि.) विधवा महिलांच्या घरी रात्रीच्या वेळी पाणी भरत असत. ह. अबु बाईल (र.) गल्ली-मोहल्ल्यातील वयस्क आणि निराधार महिलांची सेवा करत असत.

अबु दाऊद (रजि.) म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे त्यांचे अनुयायी जमले होते. ते प्रेषितांना एका व्यक्तीविषयी सांगत होते की आम्ही त्यांच्यासारखा नेक माणूस पाहिला नाही. जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर चालत होतो तेव्हा ते पवित्र कुरआनचे पठण करत असत. आम्ही सर्वजण कुठे थांबलो तर ते नमाज अदा करत ऱाहतात. त्यावर प्रेषितांनी त्यांना विचारले, ‘‘अशा वेळी त्यांच्या गरजा कोण पूर्ण करत होते?’’ प्रेषितांनी प्रत्येक गोष्टीविषयी विचारणा केली. त्यांच्या जनावरांची देखभाल कोण करत? हेदेखील विचारले. तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले की त्यांची सर्व कामे आम्ही करत होतो. यावर प्रेषित म्हणाले, ‘‘मग तर तुम्ही सर्वजण त्यांच्यापेक्षा महान आहात.’’

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)



प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) यांच्या पुढाकाराने अहमदनगर येथील कासिम खानी मस्जिद येथे UPSC , MPSC , NEET , JEE , LAW सारख्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. या स्टडी सेंटर मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शांत वातावरण , स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेली पुस्तके ,ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्रोजेक्टर , अभ्यास करण्यासाठी स्टडी चेयर आणि विविध तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मस्जिद चा वापर फक्त प्रार्थना करण्यापूर्ता मर्यादित न ठेवता ज्ञानोपासनेसाठी त्याचा वापर करणे हा आजच्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात देखील याच प्रकारे मस्जिद चा वापर हा ज्ञानदानासाठी केला जात असे. मस्जिद ही संस्था सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या दृष्टीने विविध आणि व्यापक कार्ये करत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामिक शिक्षणाची केंद्रे म्हणून काम करण्यासाठी कुबा मस्जिद, अल-मीरबाद मस्जिद आणि नबवी मस्जिद ची निर्मिती मदिना येथे केली. मस्जिद मध्ये मुस्लिम, जगाच्या आणि परलोकाच्या चिंतेसाठी ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल शिकत आणि चिंतन करत. तेथूनच विचारवंत आणि दूरदर्शी विद्वान निर्माण होत असत.

कुरआनमध्ये 28 वेळा ’मस्जिद’  या शब्दाचा उल्लेख आला आहे तसेच सफ , बैत , बुयुत सारख्या संबंधित शब्दांचा संदर्भ घेतला तर कुरआनने नंतर 46 वेळा मस्जिद या विषयाला स्पर्श केला आहे. मस्जिद किंवा मस्जद या अरबी शब्दावरून मशीद हा शब्द आला आहे. शब्दशः याचा अर्थ सुजुद (सजदा) करण्याची जागा असा होतो. म्हणजेच अल्लाहच्या भक्तीचे प्रतीक म्हणून कपाळ जमिनीवर लावणे.या संदर्भानुसार ’मस्जिद’ म्हणजे नमाज पठण करण्यासाठी जागा म्हणून परिभाषित केले जाते.

इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मस्जिद विशेषत: लेक्चर हॉल म्हणून तयार केल्या गेल्या होत्या, नंतर हजरत उमर रजि. यांच्या कालखंडात शिक्षणाच्या हेतूसाठी स्वतंत्र इमारत तयार करण्यापूर्वी मस्जिद च्या इमारतीचे अनेक कोपरे शैक्षणिक क्रियाकलापांसाठी काटेकोरपणे राखीव ठेवण्यात आले होते. केवळ धार्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठीच नव्हे, तर मशिदींना इस्लामी सीमारेषेतील ज्ञानाच्या विविध शाखांच्या विकासासाठीचे स्थान मानले जाते. मशिदींना शिक्षणाची ठिकाणे मानण्याची परंपरा आजही कायम आहे. उदाहरणार्थ, इजिप्तमधील प्रसिद्ध अल-अझहर युनिव्हर्सिटी जे अल-अझहर मस्जिद मध्ये स्थापन करण्यात आली आहे. काही इस्लामिक देशांमध्ये अशा इतरही अनेक मस्जिद आहेत ज्या मस्जिद म्हणून ओळखल्या जात नाहीत परंतु विद्यापीठे म्हणून ओळखल्या जातात. त्यापैकी ट्युनिशियामधील अल-झायतुना मस्जिद, मोरोक्कोमधील अल-कारावीयिन मस्जिद आणि इजिप्तमधील अल अझहर मस्जिद इ.

भारतातही चेन्नई शहरातील मक्का मस्जिद ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (उर्वरित आतील पान 7 वर)

निवासी प्रशिक्षण आणि स्टडी सेंटर चालवते तसेच मुंबई आणि बिहार येथील हज हाऊस च्या इमारतीत देखील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे.पण ही काही मोजकीच उदाहरणे आहेत. मस्जिद या संस्थेचा व्यापक लोक कल्याणकारी कार्यासाठी आणि ज्ञानोपासानेसाठी उपयोग होणे आवश्यक आहे. म्हणूनच कासिम खानी मस्जिद , अहमनगर च्या व्यवस्थापक समितीने मस्जिद मध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर सुरू करण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे.

मस्जिद हे मानवी संसाधन निर्मितीचे आणि समुदाय परिवर्तनाच्या विकासाचे केंद्र म्हणून कार्यरत राहणे ही आजच्या काळातील आवश्यकता आहे. मस्जिद ही संस्था केवळ धार्मिक प्रार्थना करण्याचे स्थान एवढ्या एकाच कार्यासाठी मर्यादित न ठेवता त्यांचा व्यापक वापर समाज कल्याण आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र म्हणून असला पाहिजे. ऐतिहासिकदृष्ट्या, मस्जिद जकात, जकात-अल-फितर, जिझिया, खराज, घनिमा आणि फाय मिळविण्यासाठी केंद्रे म्हणून कार्यरत आहे. इतकेच नाही तर मस्जिद मुस्लिमांच्या आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून देखील मानल्या जातात ज्यामध्ये व्यावसायिक व्यवहार, कर्ज आणि कृतींचा समावेश असत. यासोबतच संघर्ष निवारण, न्यायदान, लोकशाही पद्धतीने आपला अमीर निवडणे त्यांच्याशी संबंधित इतर सामाजिक मेळावे किंवा बैठका देखील मस्जिद मध्ये आयोजित केल्या जात असत. मस्जिद चा व्यापक आणि विधायक कार्यासाठी वापर करण्याची ही परंपरा कासिम खानी मस्जिद मध्ये पुन्हा सुरू करून भारतातील इतरही मस्जिद व्यवस्थापकांसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल मस्जिदच्या व्यवस्थापक समितीचे अभिनंदन.निश्चितच याचा उपयोग परिसरातील हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना होईल आणि ते विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजाची आणि देशाची सेवा करतील.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र चे नायब अमीर जमीर कादरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार,अहमदनगर येथील जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम शेख, हिंदुस्थानी समाज, जमाते इस्लामी हिंदचे सचिव डॉ. सय्यद रफीक पारनेरकर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जमीर कादरी म्हणाले,’जमाते इस्लामी हिंद ही संस्था देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असून भारताला जगातील पहिल्या तीन क्रमांकाची महासत्ता बनवणे हे त्यांचे लक्ष आहे. या कार्यासाठी नैतिक आणि चारित्र्यसंपन्न अधिकारी घडावेत यासाठी कासिम खानी मस्जिद स्टडी सेंटर सारखे आणखी स्टडी सेंटरची स्थापना येत्या काळात करण्यात येईल.’ ’शहेबाज मनियार यांनी मार्गदर्शन करताना इस्लाम मध्ये असलेल्या शिक्षणाच्या महत्त्वाला अधोरेखित केले तसेच काळाची पावले ओळखून विविध कौशल्य आत्मसात करणे, तंत्रज्ञानावर प्रभुत्व प्राप्त करणे , स्थानिक भाषेवर पकड निर्माण करणे, स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे, वेळेचे नियोजन करणे इ. गोष्टी या विद्यार्थ्यांच्या प्राथमिकता असाव्यात यावर भर दिला. याप्रसंगी जमाते इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन चे सदस्य आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. जमात-ए-इस्लामी हिंद अहमदनगर आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्या या पुढाकाराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

- शहेबाज म. फारुख मनियार



माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्याने खऱ्या अर्थी ईमानचे समाधान प्राप्त केले.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

अल्लाहच्या दासत्वात स्वत:ला झोकून देऊन आणि इस्लामी शरियत (धर्मशास्त्र) ची उपासना करून आणि स्वत:ला पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शनासाठी वाहून घेऊन पूर्णत: संतुष्ट आहे, त्याचा निर्णय असा आहे की मला दुसऱ्या कोणाचे दासत्व करायचे नाही आणि प्रत्येक स्थिती इस्लामनुसार आचरण करणे आणि पैगंबरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या मनुष्याची स्थिती अशी असेल त्याने समजा ईमानचा गोडवा त्याने प्राप्त केला.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे आज्ञापालन करावयास हवे).'' (हदीस : मुस्लिम)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ''हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.'' पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.'' (हदीस : मुस्लिम)

अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र 'नफ्ल नमाज' (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ''मी नेहमी 'नफ्ल रोजे' (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही'' आणि तिसरा म्हणाला, ''मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.'' (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, ''तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!'' मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) 'नवाफिल' (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल, त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.'' (हदीस : मुस्लिम)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget