Latest Post

- नौशाद उस्मान

रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. त्या परंपरेची माहिती


कल्पना करा कि,  समजा एकेरात्री आपण झोपेत असतांना कुणीतरी आपल्याला पलंगासहित उचलून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेऊन दिले तर सकाळी उठून आपण काय करणार? लागलीच त्या हॉटेलमधील सुखसोयींचा सर्रास वापर करायला सुरुवात करणार का? नाही. आधी याची माहिती काढणार, आपल्याला इथे कोण आणि कशासाठी आणलं? इथे आपण ज्या सुविधा घेणार आहोत त्याचा शेवटी हिशोबही द्यावा लागेल की असेच सुटणार आहोत? 

तसंच आपण या जगरूपी पंचतारांकित हॉटेलमध्ये आईच्या कुशीत डोळे उघडलेत आणि या हॉटेलमधील सोयीसुविधांचा लाभ घेऊ लागलो. पण याचा विचार आपण करतो का की, आपल्याला इथे आणणारा कोण आहे? की या सर्व सोयी सुविधा, या नैसर्गिक देणग्यांचा कुठेतरी हिशोबही द्यावाच लागणार आहे का?

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एवढा विचार करायची कुणाला उसंतच मिळत नाही. म्हणून नेहमीच्या दैनंदिनीतुन काही दिवस काढून एकांतात चिंतन मनन करणे आवश्यक आहे. थोडे एकांतात थांबून स्वतःचा, स्वतःच्या भोवतालच्या जगाविषयी आत्मचिंतनदेखील करणे आवश्यक आहे. आपलं लक्ष्य काय आणि त्यासाठी आपण आतापर्यंत केलेले प्रयत्न किती? कशासाठी करायचे वगैरे या सर्व गोष्टींकडे माणसाचं कधी कधी दुर्लक्ष होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपला निर्मिक कोण? त्याला आपल्या कर्माचा जाब द्यावा लागणार आहे कि नाही? त्याने आपल्यासाठी ग्रंथरूपी जे मार्गदर्शन प्रेषितामार्फत दिले आहे, त्यात एक माणूस म्हणून माझे काय कर्तव्य आहे? 
या सर्वांसाठी त्या ग्रंथाचे वाचन, पठन, चिंतन मनन, अल्लाहचे नामःस्मरण करण्याकरिता रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात मशिदीत एका कोपऱ्यात काही लोकं एकांतवासात जातात, त्याला ''एतेकाफ'' म्हणतात. 

प्रेषित मुहम्मद सल्लम रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत एतेकाफ करत असत. त्यांच्या पत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका निवेदन करतात कि, ''अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (सल्लम) रमजानच्या अखेरच्या दहा दिवसांत एतेकाफ करायचे आणि जगाचा निरोप घेईपर्यंत त्यांनी हे (ही परंपरा) सुरूच ठेवले होते.'' (संदर्भ: हदिस अल-बुखारी शरीफ)
एतेकाफ सर्वसाधारणपणे मशिदीतच केला जातो. काही उलेमा मशिदीबाहेर एखाद्या खोलीतही एतेकाफ करण्याचे मान्य करतात. इराणची राजधानी तेहरानमधील विद्यार्थी तर चक्क विद्यापीठातच एतेकाफ करत असल्याची छायाचित्रे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. महिला घरीच एका खोलीत एकांतात एतेकाफ करतात. 
एतेकाफमध्ये एकदा का मशिदीत प्रवेश केला तर फारच महत्वाचं काम (एखाद्या अंत्ययात्रेत जाण्यासारखे काम) असल्याखेरीज पूर्ण दहा दिवस बाहेर पडता येत नाही. जेवणे, झोपणे आणि इतर सर्व कामे मशिदीतच केले जातात. मशिदीत यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. सांयकाळी सूर्यास्तानंतर मशिदीत प्रवेश केला जातो ते दहाव्या दिवशी सूर्यास्तापर्यंत मशिदीतच मुक्काम केला जातो, बाहेर पडता येत नाही. यादरम्यान कुणाशीही अनावश्यक गप्पा मारता येत नाही. मौन राहण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त कुणाला काही महत्वाचे असेल तर बोलू शकता. सहेरी आणि इफ्तार तसेच रात्रीच्या जेवणासाठी घरची मंडळी मशिदीतच डबा पाठवत असतात. 

एतेकाफमध्ये सर्वसाधारणपणे रोजच्या नमाजसह अल्लाहचे नामःस्मरण करणे, कुरआनचे चिकित्सक पद्धतीने अध्ययन करणे, हदीस (प्रेषित वचन) चे अध्ययन करणे, दुसऱ्या मुतकिफ (एतेकाफकरी लोकांचे) प्रबोधन करणे किंवा त्यांच्याकडून प्रबोधन करवून घेणे  आणि आराम करणे तसेच इतर विधी उरकणे यांचा समावेश असतो. यादरम्यान माणूस आपल्या घर संसाराशी दूर असल्याने पूर्ण एकाग्रचित्त होऊन अल्लाहची आराधना करू शकतो, चिंतन मनन करू शकतो. अनेक लोकांना दहा दिवसांचा एतेकाफ शक्य नसतो, तेंव्हा शेवटच्या एक किंवा तीनच दिवसांचा एतेकाफ करतात. आदल्या दिवसाच्या सूर्यास्तापासून दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत एक दिवस गृहीत धरला जातो. एतेकाफ संपल्यानंतर प्रपंचासाठी घरी परत येतांना नव्याने जीवन सुरु करत असल्याचा आभास होतो, कारण एक नवी ऊर्जा याद्वारे मिळालेली असते.


(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

एरवी फक्त पाच वेळची नमाजच पढली जाते. परंतु रमजानमध्ये उशिरा रात्री जगभरातील सर्वच मशिदीत सामूहिकरीत्या अधिकची एक विशिष्ट दीर्घ नमाज पढली जाते, त्याला तराविह म्हटले जाते. रात्रीची ('इशा'ची) नमाज झाल्यानंतर लगेच ही नमाज पढली जाते. आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या काळात ही नमाज वैयक्तिकरीत्या पढली जायची. परंतु प्रेषितांनंतरचे दुसरे आदर्श खलिफा आदरणीय उमर फारूक यांनी ती सार्वजनिकरित्या पढण्याची परंपरा सुरु केली. ही नमाज अनिवार्य (फर्ज) नसून सुन्नत (प्रेषित-परंपरा म्हणून) आहे.

यात सर्वसाधारणपणे कुरआनच्या ३० खंडांपैकी दररोज एक किंवा दुध खंड पठन केला जातो आणि अशाप्रकारे या नमाजमध्ये पूर्ण महिनाभरात एक कुरआन श्रवण केले जाते. या नमाजचे नेतृत्व करणाऱ्यांना पूर्ण कुरआन मुखोद्गत असते, अशा लोकांना ''हाफिज'' म्हणतात. मदरशात अनेक अभ्यासक्रमापैकी एक 'हाफिज' बनण्याचादेखील अभ्यासक्रम असतो. अनेक ठिकाणी गावोगावी असे हाफिज इतर शहरांतून महिन्याभरासाठी खास आमंत्रित केले जातात. महिन्याअखेरीस त्यांना मशिदीत मोहोल्ल्यातील लोकांतर्फे किंवा मशीद व्यवस्थापन समितीतर्फे भेट वस्तू देऊन कपडे व इतर खर्च देऊन सम्मान सत्कार केला जातो. 

या तराविहमध्ये वीस रकाअत नमाज पढली जाते. रकाअत हे नमाज पढण्याचे एकप्रकारचे एकक आहे. 'अल्लाह हू अकबर (याचा अर्थ अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, इथे अकबर बादशहाचा काहीएक संबंध नाहीये. अकबर म्हणजे सर्वश्रेष्ठ) असे हाफिजने म्हणताच सर्व जण दोन्ही हाथ कानांपर्यंत उंचावून नंतर पोटावर किंवा छातीवर दोन्ही हाथ एकमेकांवर बांधतात. नंतर हाफिज साहेब कुराणातील आयती (श्लोक) पठन करतात. सर्व जन खांद्याला खांदा लावून रांगांमध्ये शांतपणे ते कुरआन पठन ऐकतात. कुणीही इकडे तिकडे पाहत नाही. जणु सर्वांना समाधी लागली आहे. नंतर पुन्हा हाफिज अल्लाह हू अकबर म्हणतो. तेव्हा सगळे अर्धे वाकून घुडग्यावर हाथ ठेवतात. याला ''रूकुअ'' म्हणतात. हाफिज नंतर म्हणतात 'समिल्लाहू निअमल हमिदा (अल्लाहनं त्याचं ऐकून घेतलं ज्याने कुणी त्याचे स्तवन म्हटले). सर्वजण सरळ उभे राहतात. नंतर पुन्हा अल्लाहू अकबर असे हाफिजने म्हटल्यावर सगळे एका दमात नतमस्तक होतात, याला सजदा म्हणतात. असे एका नंतर एक दोन सजदे केले जातात. सजदा अशाप्रकारे सरळ उभे राहून कुराणाचे श्लोक ऐकणे, रूकुअ करणे, नंतर सरळ उभे राहूने, नंतर दोन सजदे करणे या नमाजच्या पूर्ण प्रक्रियेला एक रकाअत म्हणतात. तराविहमध्ये असे वीस रकाअत पढले जातात. 

प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी या तराविह मध्ये कधी आठ रकाअत तर कधी बारा तर कधी वीस रकाअत पढल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. त्यामुळे काही मशिदीत आठ रकाअत तर काही मशिदीत वीस रकाअत तराविह पढली जाते. यामुळे अध्यात्मिक आणि पारलौकिक लाभ तर मिळतोच शिवाय शारीरिक व्यायामदेखील भरपूर होतो. अशाप्रकारे रमजानचे रोजे आणि तराविह हे भक्ताला ईशपरायण तर बनवतातच, शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि चपळ देखील बनवते जेणेकरून त्याचा उपयोग त्याला सामाजिक परिवर्तनाच्या कामात व्हावा. काही मशिदीत तर महिलांसाठीदेखील ही नमाज पढण्याची विशेष व्यवस्था केली जाते. 
या तराविहच्या नमाजमध्ये रात्रीच्या निरव शांततेत तल्लीन होऊन भक्ताचा भगवंताशी संबंध आणखीनच दृढ होत जातो.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

- नौशाद उस्मान

जगातले ते फार मोजके युद्ध ज्यांनी जगाच्या राजकीय व सांस्कृतिक घडामोडींवर दूरगामी परिणाम झाला, त्यापैकी एक असलेले प्रेषितकालीन युद्ध म्हणजे ''बद्रचे युद्ध'' जे रमजान महिन्यातच घडले होते. रमजान, रोजे आणि त्या युद्धाचा कसा संबंध आहे, ते जाणून घेण्यासाठी त्या युद्धाची माहिती घेणे आवश्यक आहे.
पार्श्वभूमी -
प्रेषित मुहम्मद सल्लम यांची चळवळ मक्केतल्या प्रस्थापितांच्या पुरोहितगिरीच्या मुळावरच उठली होती. त्यामुळे त्यांनी प्रेषित सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ सुरु केला होता. मर्यादेपेक्षा जास्त छळ सुरु झाल्यामुळे शेवटी त्यांनी मदिन्याकडे स्थलांतर (हिजरत) केले. प्रेषितांच्या मक्केतील अनेक अनुयायिनींही हिजरत केली. मदिन्यात स्थायिक झाल्यानंतर तिथे त्यांनी इमान, न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्यवर आधारित एक व्यवस्था कायम केली. त्यामुळे मक्केकर मोठ्या युद्धाच्या तयारीत होते. प्रेषितांच्या अनुयायींना मात्र सुरुवातीला कुणावरही हाथ उगारण्याची परवानगी नव्हती. पण हिजरतच्या दोन वर्षांनंतर स्वतः अल्लाहने (ईश्वराने) युद्धाची परवानगी कुराणाचा हा श्लोक अवतरवून दिली -
''ज्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यात आलेले आहे, त्यांना (युद्ध करण्याची ) परवानगी देण्यात येत आहे. कारण त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. अन अल्लाह त्यांना विजयी करण्यास निश्चितच समर्थ आहे. या लोकांना त्यांच्या घरातून अन्यायपूर्वक बाहेर घालविले गेले आहे. केवळ या कारणासाठी, कारण ते म्हणतात, ''आमचा पालनकर्ता (एकमेव) अल्लाह आहे.'' 
- कुरआन (२२: ३९-४०)

या श्लोकात संरक्षणासाठी युद्ध करण्याची त्या लोकांसाठी परवानगी दिली गेली आहे, ज्यांना घरदार सोडून लेकरांबाळांसोबत, आपल्या नातेवाईकांना सोडून देशाबाहेर विस्थापितांचे जीवन जगण्यास भाग पाडले गेले होते.

घडामोडी -
मक्केकरांनी मदिन्यावर हल्ला करण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसाठी पैसा गोळा करण्याचे ठरविले. त्यासाठी खास सत्तर व्यापाऱ्यांचा तांडा सैनिकांसह सीरियाला पाठविण्यात आला. मदिनेवर हल्ला करण्याची आर्थिक तयारी म्हणून पाठविलेला हा तांडा सीरियाहून परतत असतांना त्यांच्या सैनिकांवर हल्ला करण्याची योजना प्रेषितांनी बनवली.

प्रेषित त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बद्र या मोक्याच्या ठिकाणी निघाले. मात्र ते पोहोचण्याआधीच मक्केकरांचे आर्थिक केंद्र असलेला तो तांडा तिथून निसटला. त्या तांड्याचे नेतृत्व अबू सुफियानकडे होते. ते नंतर प्रेषितांचे अनुयायी बनले, पण या युद्धावेळी ते शत्रुपक्षाचे प्रमुख होते. त्यांना मुसलमान हल्ला करण्यासाठी येत असल्याचा सुगावा लागला आणि त्यांना कुमक पाठविण्यासाठी मक्केला निरोप पाठवला. परंतु मक्केची कुमक येण्यापूर्वीच ते माल घेऊन तांड्यासोबत मक्केकडे निघून गेले. त्यानंतर मक्केहून निघालेल्या जवळपास हजार सैनिकांची कुमक बद्र मध्ये येऊन धडकली आणि त्यांनी युद्धाचे आव्हान केले. प्रेषितांसोबत फक्त ३१३ अनुयायी होते, तरी त्यांनी अल्लाहवर विश्वास ठेऊन ते आव्हान स्वीकारले. 

दि. १७ रमजान हिजरी २ (१३ मार्च ६२४) चा तो ऐतिहासिक दिवस. प्रत्यक्ष लढाईपूर्वी प्रेषितांनी अल्लाहला स्मरून नतमस्तक होऊन प्रार्थना केली. 
युद्धापूर्वी प्रेषित नेहमी सैनिकांना खालीलप्रमाणे काही सूचना करत असत -
१) महिला व लहान लेकरांना मारू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
२) वृद्ध लोकांना आणि गुहेत असणाऱ्या भिक्कूना मारू नका. (संदर्भ: बैहिकी शरीफ, नायलूल औतार)
३) मजूर, कामगारांना ठार मारू नका (संदर्भ: अहमद शरीफ )
४) अपंग, दिन दुबळ्या लोकांना मारू नका (संदर्भ: अल - मुगनी )
५) शत्रूंच्या प्रेतांची विटंबना करू नका (संदर्भ: मुस्लिम शरीफ)
६) शरण आलेल्यांना ठार मारू नका (संदर्भ: कुरआन - ९:५ )
७) युद्धकैद्यांना खाऊ पिऊ घाला (संदर्भ: कुरआन - ७६:८) 
८) युद्धभूमीवरील झाडे, पिके विनाकारण उद्ध्वस्त करू नका, तेथील गुरं, ढोरं, जनावरांना विनाकारण इजा करू नका (संदर्भ: आलं-मुवत्ता)  
९) धर्मात कोणतीही जोरजबरदस्ती नाही. (संदर्भ: कुरआन २:२५६)
घोर युद्ध झाले. प्रेषितांचे हबशी (आफ्रिकन आदिवासी) असलेले सेवक आदरणीय बिलाल यांनी त्यांचा पूर्वाश्रमीचा अत्याचारी मालक उमैय्याला भाला फेकून ठार केले. शत्रूकडचे ७० ठार झाले, ज्यात शत्रूचा म्होरक्या अबू जहलही मारला गेला, तर प्रेषितांकडचे फक्त १४ जन शहिद झाले. प्रेषितांच्या अनुयायींना अल्लाहची मदत लाभली. म्हणूनच शत्रूचे जवळपास तिप्पट सैनिक असूनही इमानवंतांचा विजय झाला.
बोध -
अल्लाहवर विश्वास ठेऊन कोणतेही आव्हान स्वीकारले आणि युद्धसदृश्य परिस्थितीतही संयम आणि नैतिकता सोडली नाही तर विजय हमखास आपलाच असतो. मग रमजानच्या रोजा ठेवणाऱ्या सैनिकांनाही अल्लाह बळ पुरवितो. एकांतातही पाणी न पिणाऱ्या रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वावर, त्याच्या प्रभुत्वावर विश्वास असतो, हा विश्वास वृद्धिंगत करणे, हा तर रोजचा उद्देश आहे. तसेच आळस सोडून सामाजिक चळवळीत युद्ध पातळीवर कार्य करण्यासाठी चपळ बनविणेही याचा उद्देश आहे. सध्या फक्त सोशल मीडियावरच सक्रिय असणाऱ्या चळवळींनी या रामजाननिमित्त तरी आभासी विश्वातून थोडेसे बाजूला होऊन वास्तविकतेच्या जमिनीवर सक्रिय व्हावे हीच अपेक्षा!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

इस्लाममध्ये रमजानला एवढे महत्व का? त्याची कुरआनाच्या आधारे दिलेली माहिती

रमजान हा सुरुवातीला अरबी कॅलेंडरमधील नवव्या क्रमांकाचा सर्वसामान्य महिन्यासारखा एक महिना होता. मग त्याला एवढे महत्व का प्राप्त झाले? याचे उत्तर कुरआनात सापडते -
कुरआनात अल्लाह सांगतो -
''रमजान तो महिना आहे ज्यात कुरआन अवतरित झाले, जे समस्त मानवांकरिता मार्गदर्शन आणि सत्य - असत्य स्पष्ट करण्याचे मापदंड आहे.'' - कुरआन (२:१८५)
याचा अर्थ रमजानला कुरआनच्या अवतरणामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता हे अवतरण झाले म्हणजे नेमके काय झाले? हे सविस्तरपणे आपण पाहू या-
प्रेषित मुहम्मद सल्लम यांना प्रेषित्व प्राप्त होण्यापूर्वी म्हणजे ते चाळीस वर्षांचे होते त्यावेळी त्यांना या सृष्टीच्या निर्मिकाची तीव्रतेने ओढ लागली होती. ते अल्लाहचे नामःस्मरण, चिंतन-मनन  करण्याकरिता मक्का शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या हिरा गुहेत जाऊन बसायचे. रमजानच्या महिन्यातील अशाच एका रात्री ते त्या गुहेत चिंतन मनन करत असतांना त्यांना ''जीब्रइल'' नावाचे ईशदूत (फरिश्ते) दिसले. फरिश्ते हे अल्लाहचे दूत असतात. त्यांना वेगवेगळे काम अल्लाहने सोपवलेले आहेत. ते नेमके कसे दिसतात, त्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्याबद्दल फार जास्त माहिती सापडत नाही. जीब्रइल हे त्यापैकी सर्वात महत्वाचे फरिश्ते मानले जातात. त्यांच्याकडे प्रेषितांपर्यंत अल्लाहचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी असते. असे संदेश ते प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यापूर्वीही आलेल्या अनेक प्रेषितांपर्यंत पोहोचवत होते.
प्रेषित मुहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांच्यापूर्वीही जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित आलेले आहेत. भूतलावरील पहिले मानव आदम हे इस्लामचे पहिले प्रेषितदेखील होते. त्या प्रेषितांकडेही जीब्रइल हेच ईशदूत येत होते. त्या रात्रीही तेच जिब्रइल अल्लाहचा संदेश घेऊन आले होते. काही इतिहासकार सांगतात कि, त्यांनी सोबत एक प्रकाशमान पटलावर लिहिलेले शब्द दाखवत प्रेषित मुहम्मद सल्लम यांना सांगितले -
''इकरा (वाचा)''
प्रेषितांनी उत्तर दिले कि, ''मला वाचता येत नाही.'' कारण प्रेषित हे उम्मी (अक्षरशून्य) होते. त्यांचा कुणीही गुरु नव्हता. गुरुविनादेखील मुक्ती शक्य आहे, हे प्रेषितांनीच जगाला कृतीतून शिकविले. जिब्रइल यांनी प्रेषितांना छातीशी घट्ट धरले आणि पुन्हा सांगितले -
''वाचा!''
असे तीनवेळा झाल्यानंतर प्रेषितांनी वाचायला सुरुवात केली. त्या प्रसंगानंतर पुढे कुरआनचा एक एक अध्याय वेगवेगळ्या प्रसंगानुरूप अवतरित होत गेला. अवतरित झाल्यानंतर प्रेषित ते मुखोदगत करून घ्यायचे. अल्लाहने प्रेषितांना कुरआन पाठ करण्याची एक जबरदस्त क्षमता प्रदान केली होती. अध्याय अवतरित होण्याचे तीन प्रकार होते. एक तर फरिश्ता मानवी रूपात येऊन अध्याय सांगायचा, दुसरा प्रकार म्हणजे स्वप्नात अध्याय सांगितला जायचा आणि तिसरा प्रकार म्हणजे अध्याय थेट अल्लाहकडून प्रेषितांच्या हृदयावर अवतरित होत होते. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी फार जड जात होती. कोणतीतरी जड वस्तू विजेसारखी आकाशातून येऊन हृदयावर पडत असल्याचा आभास त्यांना व्हायचा आणि तो अध्याय त्यांच्या मनःपटलावर जणू कोरला जायचा. नंतर तो अध्याय प्रेषित लोकांसमोर पठन करायचे आणि लोकं ते झाडांच्या पानावर, जनावरांच्या चामड्यावर किंवा लाकडांच्या पाटयावर लिहवून घेत होते. पुढे खलिफा उस्मान गनी यांनी एक आयोग नेमून त्या मूळ प्रतीच्या अनेक लिपिबद्ध करून त्याच्या शंभर प्रति जगभरात पाठवून दिल्या. आजही त्या अस्तित्वात आहे. अशाप्रकारे कुरआन रमजान महिन्यात अवतरण्यास प्रारंभ होऊन प्रेषितांद्वारे अल्लाहकडून (भगवंताकडून) भक्तांपर्यंत पोहोचला. पण या ज्ञानरूपी गंगोत्रीची सुरुवात याच रमजानमध्ये झाली होती. याच महिन्यात जगभरात कुराणाचा समता व एकत्वाच्या संदेशाचा जमजम झरा वाहू लागला होता.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र कुरआनचे इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, मात्र रमजानमध्ये ते आणखी जास्त आहे.

रमजानमध्ये कुरआन इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त पठण केले जाते, श्रवण केले जाते. कारण रमजान व कुरआन यांचा फार घनिष्ट संबंध आहे. ज्याप्रकारे एखाद्या वृत्तपत्राचा पहिला अंक ज्या दिवशी प्रकाशित होतो, त्याच तारखेला दरवर्षी त्याचा वर्धापन दिवस साजरा करण्याची पद्धत काही ठिकाणी असते. अशाप्रकारे रमजान हा जणू कुरआनचा एकप्रकारे वर्धापन मास आहे. कारण याच महिन्यात कुरआनचा पहिला श्लोक अल्लाहकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अवतरित झाला होता.

या महिन्यात जे रोजे अनिवार्य करण्यात आले त्याचा उद्देशही रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन लोकांना ईशपरायण बनविणे आहे. ईशपरायण म्हणजे ईश्वराने, अल्लाहने जे करायला सांगितले ते सत्कर्म करणे आणि जे करायला मनाई केली ते करू नये. मग अल्लाहने काय करायला सांगितले आणि कशाला मनाई केली हे कसे माहीत होईल? तर त्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून कुरआन अवतरित केले. अशाप्रकारे रमजान, कुरआन व रोजे यांचा आपसात घनिष्ट संबंध आहे.
या कुरआनचा विषय 'माणूस' आहे. जीवन कसे जगावे, प्रेषितांनी आणि इतर महापुरुषांनी जीवन कसे जगले, त्यांना त्याचा योग्य मोबदला कसा मिळाला आणि पारलौकिक मोबदला कसा मिळणार आहे, तसेच ज्या वाईट लोकांनी अल्लाहचा कल्याणकारी संदेश नाकारला त्यांचे लौकिक व पारलौकिक नुकसान कसे झाले त्याचे सोदाहरण विवेचन यात आलेले आहेत. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात निर्णय घेतांना कोणते निकष वापरावे याचे सुंदर मार्गदर्शन यात आहे.

हा एक अध्यात्मिक ग्रंथ तर आहेच, शिवाय यात संपूर्ण जीवन व्यवस्थेचे कायदे देखील आहेत. हे कायद्याचे पुस्तकदेखील आहे. अल्लाह, प्रेषितांचे प्रेषित आणि मरणोत्तर जीवनाचे अस्तित्व हे काही ठिकाणी वैज्ञानिक दाखले देऊन भोवतालच्या सृष्टीची तसेच कुरआनचीही चिकित्सा करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. सारांश असा कि, अल्लाहने कुरआनात सर्वोच्च स्थान मानवी जीवाला दिलेले  आहे. अल्लाहसाठी मानवापेक्षा कोणतीच निर्मिती श्रेष्ठ नाहीये. हा सन्मान माणसाला अल्लाहने कुरआनात दिला आहे. म्हणूनच अल्लाहने एका जीवाची हत्या म्हणजे पूर्ण मानवतेची हत्या संबोधले आहे. (संदर्भ: अध्याय- ५, श्लोक क्र. ३२)

परंतु कुराणविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे कुरआनचा एखादा श्लोक समजून घेण्यासाठी तो कोणत्या परिस्थतीत अवतरला, त्या पार्श्वभूमीनुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ गांधीजींनी ''अंग्रेजो भारत छोडो'' म्हटले तर याचा अर्थ प्रत्येक युरोपियन मूळच्या माणसाने भारत सोडून दिला पाहिजे आणि पुन्हा कधी त्या देशातल्या कोणत्याच माणसाने भारतात पायच ठेवला नाही पाहिजे, असा होत नाही. कारण गांधीजींनी ते फक्त जुलमी सत्ताधारी इंग्रजांना उद्देशून बोलले होते, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतो. तसेच कुरआनचा एखादा श्लोक युद्धप्रसंगी अवतरीत झाला आणि त्यात मुस्लिमेतरांवर कारवाई म्हणून त्यांना मारण्याचा आदेश आला तर याचा अर्थ प्रत्येक युगातल्या प्रत्येक मुस्लिमेतराला ठार करण्याचा तो आदेश नसून, जुलमी सत्ताधारीशी जर युद्ध झाले तर त्यावेळी वैध मार्गाने करावयाची कार्रवाईसंबंधी तो नियम असतो. याचा अर्थ कुरआन कालबाह्य आहे, असे नाही. तर ती परिस्थिती भविष्यातही उदभवू शकत असल्यामुळे तो आदेश त्रिकालाबाधित ठरतो. परंतु तो आदेश सरसकट एखाद्या समाज किंवा धर्मसमूहाविरुद्ध नसतो. म्हणून कुरआनचा अभ्यास शक्यतोवर त्यावरील भाष्य ( तफसीर)मधून केलेला बरा . कारण त्याच्या तळटिपांत त्या त्या श्लोकाची अवतरण काळ आणि पार्श्वभूमी दिलेली असते. अशा पद्धतीने कुरआनचा अभ्यास केल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात. अशाप्रकारे कुरआन समजून घेतल्यास रमजान समजून घेणे सोपे जाते आणि ते आवश्यक आहे. आज मराठीसहित सर्व भारतीय भाषेत कुरआन उपलब्ध आहे. अगदी नेत्रहीन बांधवांकरिता ब्रेल लिपीतही त्याचे भाषांतर उपलब्ध आहे. मग या रमजानमध्ये वाचणार ना कुरआन?


- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र रमजान महिन्यात महिलाही रोजे ठेवतात. धार्मिक रिवाज पाळतात. त्याचवेळी इफ्तारी, सहरीसाठी कुटुंबीयांसाठी रुचकर पदार्थही त्याच रांधतात. त्याविषयीची माहिती
संस्कृतीचं रक्षण आपल्या देशात खऱ्या अर्थानं कुणी करत असतील तर त्या महिलाच.  सण, उत्सवात महिलांची फार मोठी भूमिका असते, तशीच रमजानमध्येही महिलांची फार महतवाची भूमिका आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. याच रमजानच्या एके रात्री प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अल्लाहकडून (ईश्वराकडून) कुराणाचा पहिला श्लोक ''इकरा (वाचा/शिका)'' पहिल्यांदाच अवतरित झाला. त्याबरोबरच त्यांना प्रेषित्व प्राप्त झाल्याची घोषणाही याच महिन्यात झाली. त्यानंतर प्रेषितांनी ईश्वरी संदेशाच्या प्रचाराचा प्रारंभ केला तो त्यांच्या पत्नी आदरणीय खतिजा यांना इस्लामची दीक्षा देऊन. अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्याकडून इस्लामची दीक्षा घेणारी सर्वात पहिली व्यक्ती एक स्त्रीच होती आणि ती ऐतिहासिक घटना रमजानमध्येच घडली. आदरणीय खतिजापासून तर आज जगाच्या जवळपास दोनशे कोटी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलाय आणि तो त्यांनी स्वीकारला. पण या लोकशिक्षणाची सुरुवात एका स्त्रीपासून प्रेषितांनी सुरु केली होती हे विशेष.

आजही रमजान महिन्याच्या दैनंदिन सोपस्कारात महिला फार महत्वाची भूमिका निभावतात. ती स्वतः आणि घरचे लोकं रोजा ठेवतात म्हणून त्यांच्या सहेरीकरिता ती रात्रीच तयारी करून ठेवते. कणिक भीजवून फ्रीजमध्ये ठेवते, तर कधी मटन उकळून फ्रीजमध्ये ठेऊन देते. मूग किंवा वाटाणे वगैरेची एखादी डिश सहेरीला करायची असेल तर रात्रीच ते भिजवून ठेवते.

आजकाल औरंगाबादमध्ये सहेरीची अंतिम वेळ जवळपास साडे चार वाजता आहे. अशावेळी महिलांना तीन साडे तीन वाजताच उठावे लागते. तब्बल पावणेचार वाजेपर्यंत स्वयंपाक आटपून घरच्या मंडळींना झोपेतून उठवतात आणि जेवण वाढतात. स्वतःदेखिल त्यांच्यासोबत सहेरी करून रोजा ठेवतात. ती थकली असेल तर काही पुरुषदेखील स्वतः स्वयंपाक करून तिला जेवू घालतात. प्रेषित स्वतः देखिल काहीवेळा स्वयंपाक करून त्यांच्या पत्नींना जेवू घालायचे. ही प्रेषित परंपरा आहे.
सहेरी करून सगळे नमाज पढतात, महिलादेखील नमाज पढतात. महिलांनादेखील मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे, पण घरी नमाज पढण्याची सवलत दिलेली आहे. नाहीतर भल्या पहाटे उठून स्वयंपाक केल्यावर नमाजसाठी दूर एखाद्या मशिदीत जाणे त्यांना अवघड गेले असते. या सवलतीचा आपल्या देशात महिला पुरेपूर लाभ घेत सहसा घरीच नमाज पढतात. मुंबई, दिल्ली व इतर काही ठिकाणी मात्र काही महिला मशिदीत जाऊन नमाज पढतात.

नमाजनंतर काही महिला कुराणाचे पठण करतात तर काही महिला थकल्यामुळे आराम करतात. बऱ्याच शहरात आजकाल ''समाअत ए कुरआन'' म्हणून खास फक्त महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत. त्यात एखादी आलेमा (पुरुष मौलवी किंवा आलिम असतो तशी महिला देखील आलेमा असते) कुरआनचे अरबीत पठन करते, त्याचे उर्दूत भाषान्तर वाचते आणि नंतर त्याचे निरूपण स्थानिक भाषेत समजाऊन सांगते. दोन ते तीन तासांचा तर कुठे कुठे चार तासांचा  हा कार्यक्रम असतो. कुरआनच्या तीस खंडांपैकी दररोज एका खंडाचे पठन केले जाते. औरंगाबादमध्ये सध्या जमाअत ए इस्लामी हिंद या एकाच संघटनेच्या महिला आघाडीतर्फे शहरात विविध ठिकाणी असे जवळपास चाळीस ''समाअत ए कुरआन''चे वर्ग चालतात. इतर संघटनांची संख्या वेगळी. ही एकप्रकारे महिलांमध्ये प्रबोधनाची लोकशिक्षणाची चळवळच आहे.
त्यांनतर अनेक महिला आराम करतात. दुपारची आणि सूर्यास्तापूर्वीची नमाज पढली जाते. पुरुषही ही नमाज पढतात. लहान लेकरांसाठी कधी कधी थोडेसे काही तयार करावे लागते. पण सहसा महिनाभर दुपारी एकप्रकारची महिलांना सुट्टीच असते. मात्र संध्याकाळी पाच नंतर पुन्हा त्यांची लगबग सुरु होते. कारण सूर्यास्तानंतर इफ्तार करावयाचा असतो. खरं म्हणजे इफ्तार हा साध्या पद्धतीने देखील केला जातो. पण दिवसभर खाणे पिणे बंद असल्यामुळे काहीतरी खास खावं म्हणून थोडेफार फराळाचं तयार करून घेतात. सूर्यास्तानंतर घरच्या सर्वांसोबत इफ्तार केला जातो. इफ्तार नंतर नमाज पढतात. मग रात्रीचे जेवण उरककल्यानंतर रात्रीची ''तराविह'' ही खास दीर्घ नमाज पढली जाते. काही ठिकाणी महिलांची स्वतंत्र तराविहची नमाज होते, त्याचे नेतृत्व महिला-मौलवीच (आलेमाच) करते. रात्री त्या आराम करतात.  अशाप्रकारे महिलांचा रमजानची दैनंदिनी संपते. यात पुरुष मंडळीही त्यांना नक्कीच हातभार लावतात, पण किचनक्वीन असतात त्या फक्त महिलाच!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम 'मेसहेराती' करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय
सहेरी करण्यासाठी लोकांना जाग आणण्याकरिता काही लोकं घरोघरी जाऊन आवाज देऊन उठवतात. त्यांना 'मेसहेराती' म्हणतात. हे मेसहेराती लोकं गल्ली बोळात फिरून काही खास भक्ती गीते गात असतात, त्यांना ''सदा ए रमजान'' देखील म्हटले जाते. याला आपण 'रमजानची भूपाळी' म्हणू या.

सर्वात पहिले मेसहेराती आदरणीय बिलाल हबशी (निग्रो) होते. जुन्या काळात भा.रा. तांबेंची भूपाळी ''उठ उठी गोपाळा ...'' ही फार प्रसिद्धीस पावली होती. कारण सकाळी उठण्याचे महत्व जुन्या लोकांना कळले होते. सकाळी आणि विशेष करून पांढरं फाटण्यापूर्वीच्या वेळी वातावरणात एक प्लाझ्मा स्टेट तयार होते. म्हणजे एकावर एक असलेल्या हवेच्या थरावरचे ओझोनचे महत्वाचे थर हे खालील हवेच्या थरात मिसळले जाते आणि त्यावेळी प्रदूषणरहित शुद्ध हवा उपलब्ध होते. पण अशावेळी बंदिस्त घरात ढाराढूर झोपणारे निसर्गाच्या या देणगीला पारखे होतात. म्हणूनच आज वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातले आहे. फार कमी जण याबद्दल जागृत आहेत.

यावेळी उठण्याचे फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक कारणे देखील आहेत. उठायला उशिर झाला तर दिवसाची इतर कामे पुढे पुढे ढकलली जातात. कधी कधी त्या कामांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी काढावी लागते तर व्यापाऱ्यांना दुकान अर्धा दिवस बंद करावे लागते. सकाळी उठून दुकान उघडणाऱ्यांचा धंदा नेहमीच जोरात असतो. म्हणूनच त्या एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे -
''पहाटेचं झोपणं हे रोजीरोटीला आडकाठी आणणे आहे.''

अशाप्रकारे सहेरच्या वेळी खाने हे रोजाधारकाला फक्त अध्यात्मिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिक फायद्याच्या सवयीदेखील लावते.
पण आजकाल अलार्म घड्याळे, मोबाईल अलार्ममुळे या मेसहिरातींची गरज नाही, असे सांगण्यात येते. म्हणून हे मेसहेराती शहरी भागातून लुप्त झाले आहेत. पण आलं;अलार्म वाजल्यानंतरही घडीचे बटन किंवा मोबाईल अलार्मचे 'स्नूज'ऐवजी 'डिसमिस'चे बटन दाबून पुन्हा झोपणारे तरुण महाभाग खूप आहेत. अशा लोकांना सकाळी उठणे हे एक दिव्य वाटते. काही देशात तर अलार्म वाजल्यावर इलेक्ट्रिक पलंग हा आपोआप वर खाली हलवून त्यावर झोपणाऱ्याला जागे करतो, अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा माणसाची जागा मशीन घेऊच शकतं नाही, हेच खरं. त्यामुळे आजही या मेसहेरातीची गरज आहेच आहे.

ग्रामीण भागात आजही हे मेसहेरातीं बाकी आहेत. परंतु त्यांना आता फार विकृत नाव देण्यात आले आहे - ''सहेरी के फकीर''. खरे म्हणजे हे भिकाऱ्यांचे काम नाही, यापूर्वी नव्हते. एक धर्मकार्य आणि समाजकार्य म्हणून विनामूल्य ही सेवा केली जात होती, त्यामुळे त्या कार्याची अस्मितादेखील जिवंत होती. परंतु आज त्यांना 'सहेरी के फकीर' म्हणून ईदच्या दिवशी थोडं जास्त धान्य दान (फितरा) म्हणून दिला जातो. हे काम कुणी दुसरे करत नसल्यामुळे आणि पोटाला प्रपंच देखील लागलेला असल्याने जे फकीर लोकं हे करत आहेत, तेही काही कमी नाही. काही मेसहेराती भूपाळीसोबतच खंजेरी, डफलीदेखील वाजवतात. याचा फायदा सकाळी उठणाऱ्या मुस्लिमेतर चाकरमान्यांनाही होतो. आज झोपलेल्या समाजाला बोधप्रत भूपाळी गाऊन जागे करणाऱ्या मेसहेराती आणि मराठीत अजरामर प्रभातगीते लिहिणाऱ्या भा.रा.तांबेंची खरंच गरज आहे!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget