Latest Post

Islamic Law
न्याय म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे. अन्यायग्रस्ताला वस्तुतः न्यायाची खरी व्याख्या ताबडतोब समजते. परिभाषा करायची असेल तर दोन वस्तु अगदी तंतोतंत समान प्रमाणात वाटणे म्हणजे न्याय, अर्थात अफरातफरीमध्ये समतोल कायम करणे म्हणजेच कायद्याच्या भाषेत न्याय होय. दुसर्या भाषेत असे की एखाद्या प्रकरणात सत्यानुसार निवाडा करण्यात यावा.
कोणत्याही समाजाची सामाजिक बंधने अबाधित ठेवायची असेल तर न्याय हाच मूळ आधार होय. या शिवाय समाजव्यवस्था टिकू शकत नाही. हेच कारण आहे की समाज आणि राज्य टिकविण्यासाठी इस्लामने न्यायव्यवस्थेला असे महत्त्व दिले, जे इतर कोणत्याच धर्मात देण्यात आले नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘ईश्वर न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नहल - ९०)
न्यायपूर्ण वर्तन हेच ईशपरायणतेचा परमोच्च दर्जा असल्याचे कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ईश्वरासाठी सत्यावर अढळ राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ८)
न्याय स्थापन करण्याचे विविध प्रसंग असतात. पहिल्या प्रसंगी मानवाने स्वतः आपल्यावरच न्याय स्थापन करावा. याचा अर्थ असा आहे की त्याने इतरांसाठीही तेच पसंत करावे, जे स्वतःसाठी करतो. त्याच प्रमाणे स्वतःच्या अधिकारांइतकीच त्याला इतरांच्या अधिकारांचीही जाणीव असावी. म्हणून कुरआनात ही बाब सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे की, न्यायाची स्थापना करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःवर आणि आपल्या नातलग आणि सगेसोयर्यांवर स्थापन करा. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहणारे आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो वा गरीब, ईश्वर तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली, तर समजून असा की जे काही तुम्ही करता, ईश्वराला त्याची पूर्ण माहिती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३५)
हीच गोष्ट प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अशाप्रकारे वर्णन केली आहे,
‘‘शपथ आहे त्या ईश्वराची, ज्याच्या हाती माझे प्राण आहे, ती व्यक्ती श्रद्धावंत(मुस्लिम) असूच शकत नाही, जो आपल्या शेजार्यासाठी तीच बाब पसंत करीत नाही, जी स्वतःकरीता पसंत करते.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
नेमक्या याच विचारसरणीचा अभाव असल्याचे आज पूर्ण समाजात आणि जगामध्ये अरेरावी माजली आहे. इतरांची चिता जळू द्या, मात्र आपली पोळी तुपात भाजली पाहिजे, या आधुनिक काळातील विचारसरणीमुळे असंख्य जणांचे अधिकार पायदळी चिरडले जात आहेत. यातूनच गुन्हेगारीचे अक्राळविक्राळ राक्षस न्याय, मानवता आणि नैतिकताचा बळी घेत आहे. मात्र इस्लामच्या या मोजक्या विचारसरणीचा अवलंब केला तर निश्चितच गुन्हेगारीवर आळा बसेल आणि मानवतेला अन्यायास बळी पडून न्यायासाठी दारोदार ठेचाळत हिडण्याची दुर्दैवी पाळी येणार नाही.
न्याय स्थापन करण्याचा दुसरा प्रसंग हा राज्य अगर शासन होय. राज्यशासनानुसार न्याय स्थापन करता येते, मात्र हे लक्षात असावे की, याआधारावर शासन स्थापन जर करायचे असेल तर शासकाने स्वतः आपल्यावर न्यायाची स्थापना करावी. प्रेषित मुहम्मद(स.) आणि सुरुवातीच्या काळातील चारीही इस्लामी शासकांची न्यायव्यवस्था हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे स्वतः सक्तीने यावर कार्यरत होते.

- मु. जैनुल आबिदीन मंसुरी
    या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.
    इस्लाम द्वेषाने पीडित होऊन इस्लामला आणि मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नांची तकीसिद्ध व ठोस पुराव्यांसहित उत्तरे देऊन देशातील सौहार्दाच्या वातावरणात विष कालवणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे.

आयएमपीटी अ.क्र. 189  -पृष्ठे - 12   मूल्य - 08          आवृत्ती - 2 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/96o9e4784t6skkjyrnobf95udr5pw1wn

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे युवकांनो! तुमच्यापैकी जो निकाहची (विवाहाची) जबाबदारी उचलू शकतो त्याने  निकाह करून घेतला पाहिजे कारण तो दृष्टी खाली ठेवतो आणि लज्जास्थानांचे रक्षण करतो. (म्हणजे नजरेला इकडे-तिकडे भटकण्यापासून आणि वासनाविषयक शक्तीला अनियंत्रित  होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्यात सक्षम नाही त्याने कामवासनेचा जोर शमविण्यासाठी कधी कधी रोजा धारण करावा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो, तिच्या संपत्तीच्या आधारावर, तिच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर आणि तिच्या ‘दीन’च्या (धर्माच्या) आधारावर. तर तुम्ही ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) स्त्रीशी विवाह करा, तुमचे भले   होईल.’’(हदीस : मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
स्त्रीमध्ये या चार गोष्टी पाहिल्या जातात. कोणी संपत्ती पाहतो, कोणी घराण्याची प्रतिष्ठा पाहतो आणि कोणी तिच्या रूप व सौंदर्यामुळे तिच्याशी विवाह करतो आणि कोणी तिच्या धर्मपरायणतेला पाहतो. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना उपदेश दिला आहे की खरी गोष्ट जी पाहण्याची आहे ती तिची (दीनदारी) धर्मनिष्ठा आणि (तकवा) संयम आहे.  त्याचबरोबर जर आणखीन सर्व गुणवैशिष्ट्येदेखील त्यात सामील झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु धर्मश्रद्धा विसरणे आणि फक्त संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर विवाह  करणे मुस्लिमांचे काम नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रियांशी त्यांच्या रूप व सौंदर्यामुळे विवाह करू नका, कदाचित त्यांचे सौंदर्य त्यांना  नष्ट करील आणि त्यांच्या श्रीमंतीकडे पाहून त्यांच्याशी विवाह करू नका, कदाचित त्यांची संपत्ती त्यांना अवज्ञा व उद्धटपणात परिवर्तीत करील, म्हणूनच ‘दीन’च्या आधारावर विवाह  करा आणि काळ्या वर्णाची ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) सेविका अल्लाहच्या दृष्टीने गौरवर्णी चांगल्या घराण्याची स्त्रीपेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुन्तका)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जर तुमच्याकडे विवाहाचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचा ‘दीन’ व स्वभाव तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही तिच्याशी विवाह करा. जर तुम्ही असे  केले नाही तर पृथ्वीवर मोठा उपद्रव निर्माण होईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
ही हदीस अगोदरच्या हदीसकथनाचे समर्थन करणारी आहे. पैगंबर मुहम्मद (स.) सांगण्याचा अर्थ असा की विवाहाच्या बाबतीत पाहण्याची गोष्ट म्हणजे ‘दीन’ व स्वभाव आहे. जर हे न   पाहता धनसंपत्ती व घराण्याची प्रतिष्ठा पाहिली गेली तर मुस्लिमांमध्ये त्यामुळे मोठा उपद्रव निर्माण होईल. जे लोक इतके भौतिकवादी बनतील की ‘दीन’ त्यांच्या नजरेतून उतरेल  आणि धनसंपत्तीच त्यांच्यासाठी पाहण्याची गोष्ट बनली तर असे लोक ‘दीन’ची शेती सिंचित करण्याचा विचारच कसा करतील? या स्थितीला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उपद्रव म्हटले  आहे.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी नमाजचा महामंत्र (तशह्हुद) देखील शिकविला आणि निकाहचा महामंत्रदेखील. इब्ने   मसऊद यांनी नमाजचा महामंत्र सांगितल्यानंतर म्हटले की आणि निकाहचा महामंत्र असा आहे की ‘‘कृतज्ञता व स्तुती फक्त अल्लाहसाठीच आहे, आम्ही त्याचीच मदत मागतो, आम्ही   त्याच्याकडूनच मुक्तीची अपेक्षा करतो आणि आपल्या अस्तित्वाच्या दुष्टव्याच्याकरिता अल्लाहचा आश्रयात स्वत:ला झोकून देतो, ज्याला अल्लाहचे मार्गदर्शन लाभले (आणि मार्गदर्शन  इच्छिणाऱ्यालाच तो मार्गदर्शन देतो) त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि ज्याला त्याने मार्गभ्रष्ट केले (आणि मार्गभ्रष्ट फक्त त्यालाच करतो जो मार्गभ्रष्ट होऊ इच्छितो)  त्याला कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही, आणि मी साक्ष देतो की अल्लाहव्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व पैगंबर आहेत.’’

Earth
न्यायाचे तीन पैलू आहेत
वैधानिक न्याय, सामूहिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय न्याय.
वैधानिक न्याय
वैधानिक न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय मिळावा. कोणत्याही प्रकारचा वांशिक, आर्थिक, प्रादेशिक, धार्मिक भेद न पाळता आणि आपला व परका न समजता अन्यायपीडितास न्याय देणे हे इस्लामी कायद्याचे पहिले दंडविधान होय. इतिहासामध्ये इस्लामने प्रस्थापित केलेल्या न्यायव्यवस्थेची असंख्य उदाहरणे विरोधकांना तोंडघशी पाडणारे आहेत. विस्तार भयास्तव येथे केवळ एका घटनेचाच उल्लेख करण्यात येत आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळामध्ये एका उच्चकुलीन अर्थात कुरैश परिवारातील स्त्रीने चोरी केली व प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामी दंडविधानानुसार तिचे हात कापण्याचा निवाडा दिला. मात्र कुरैश परिवारजणांना प्रेषितांचा हा निर्णय त्यांच्या प्रतिष्ठेस धक्का लावणारा वाटला. त्यांना वाटले की आपण इतके उच्चकुलीन आहोत आणि समाजामध्ये आपली प्रतिष्ठा राहणार नाही. हात कापण्याच्या शिक्षेमुळे आपण समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. म्हणून त्यांनी प्रेषितांच्या जवळचे असलेले उसामा बिन झैद(र.) यांना या बाबतीत शिफारस करण्यास सांगितले की, या शिक्षेत काही कमी करावी. मात्र जेव्हा ही सगळी हकीकत उसामा(र.) यांनी सांगितली, तेव्हा प्रेषित मुहम्मद(स.) यांना खूप संताप चढला आणि त्यांनी स्पष्टपणे बजावले की,
‘‘हे तुम्हाला काय झाले की ईश्वराने निश्चित केलेल्या शिक्षांमध्ये कमतरता करण्याची शिफारस करतात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुमच्या पूर्वीचे मानवसमुदाय याच कारणास्तव नष्ट झाले आहेत. त्यांच्यातील प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा गुन्हा करीत, तेव्हा तिला शिक्षा देत नसे आणि साधारण व्यक्ती जेव्हा एखादा अपराध करीत तेव्हा तिला शिक्षा देत असे. मी तुम्हाला स्पष्टपणे बजावतो की, जर माझी मुलगी फातिमा(र.) हिने जरी चोरी केली असती तर तिलासुद्धा शिक्षा देण्यात माझी आत्मप्रतिष्ठा आडवी आली नसती. ईश्वराची शपथ! मी तिचेही हात कापले असते.‘‘(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह - बुखारी)
इस्लाममध्ये वैधानिक न्यायाचे हेच वैशिष्ट्य आहे की न्याय हा सर्वांसाठी कोणाताही भेदभाव न पाळता करणे आवश्यक आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘तुम्ही मुस्लिमांपैकी जेव्हा कोणी न्यायाधीश न्यायनिवाडा करीत असेल, तेव्हा त्याने रागाच्या भरात निर्णय देता कामा नये, आणि न्यायालयात हजर असलेल्या पक्ष प्रतिपक्षादरम्यान बसविण्यात आणि पाहण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये. एवढेच नव्हे तर इशारा करण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - जामिउस्सगीर)
सामूहिक न्याय अगर सामाजिक न्याय
कोणत्याही मानवास स्पृश्य-अस्पृश्य, प्रतिष्ठित-अप्रतिष्ठित, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत आणि आपला परका न मानता समाजातील प्रत्येक व्यक्तीस केवळ माणूस या नात्याने समानरित्या न्यायदानास सामाजिक न्याय असे म्हणता येईल. याच न्यायाची शिकवण इस्लामने दिली आणि केवळ शिकवणच न देता ही न्यायव्यवस्था स्थापन करण्याचा जागतिक आणि ऐतिहासिक विक्रम नोंदविला. कुरआनाने श्रेष्ठत्वाचा अगर प्रतिष्ठेचा आधार सदाचार आणि ईशपरायणतेस देऊन समस्त मानवजातीतील सडक्या व बुरसटलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे कृत्रिम भेदभाव नष्ट करून लोकांना केवळमात्र मानवाचा दर्जा दिला आणि याच आधारे न्यायव्यवस्था स्थापन केली. कुरआनात सडेतोडपणे म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित माणूस तो आहे, जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)म्हणजेच प्रतिष्ठा ही ईशपरायणता आणि सज्जनतेतच आहे.
दुसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीस या गोष्टीचा जन्मसिद्ध अधिकार आहे की त्याने आपल्या पात्रता व शिक्षण-प्रशिक्षणानुसार काम करावे. शिक्षण-प्रशिक्षण, प्रगती आणि विकासाची दारे सर्वांसाठीच खुली आहेत. कोणावरही कोणतेही काम करण्याची बळजबरी करणे अगर त्याचे शोषण करणे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परखडपणे घोषणा केली आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने ज्या माणसाकडून मजुरी करून घेतली आणि त्याची मजुरीची रक्कम दिली नाही, त्या व्यक्तीविरुद्ध(स्वयं) ईश्वराने युद्धाचे रणशिंग फुंकले.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच एखाद्या माणसाकडून काम करून घेतल्यावर त्याच्या कामाचा मोबदला न देणे म्हणजे ईश्वरी कोपास बळी पडणे होय. म्हणजे कोणाची मजुरीची रक्कम बुडविणारा माणूस हा मुस्लिम होऊच शकत नाही.
आंतरराष्ट्रीय न्याय
इस्लामने न्याय स्थापन्याची गोष्ट केवळ मुस्लिमांपर्यंतच मर्यादित ठेवली नसून समस्त जगात मुस्लिम आणि मुस्लिमेतरांतही काहीच भेदभाव न बाळगता न्याय स्थापन करण्याची शिकवण दिली आहे. जे लोक अद्यापही इस्लामच्या न्यायप्रिय छत्रछायेत आलेले नाहीत अशा लोकाशीही धर्माच्या आधारावर द्वेष आणि कलह ठेवण्याची इस्लामने मुळीच परवानगी दिली नाही. न्याय म्हणजेच न्याय आणि तो प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क असल्याने मुस्लिमेतरांनाही सारख्याच प्रमाणात मिळावा, मुस्लिमेतरांशीही मुस्लिमांनी स्नेहपूर्ण संबंध ठेवावेत, समता व बंधुभावाची जोपासना करावी, हीच इस्लामची मुख्य भूमिका आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे,
‘‘ईश्वर तुम्हास या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही अशा मुस्लिमेतर जणांशी सदाचार आणि न्यायपूर्ण रितीने वागावे, जे धर्माच्या बाबतीत तुमचा विरोध करीत नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला तुमचे घरदार सोडण्यास भाग पाडले नाही.(अर्थात घर परिवार त्यागण्यास विवश करण्याचे अत्याचार केले नाही.) ईश्वर न्याय करणार्यांना पसंत करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-मुमतिहना - ८)
याच शिकवणीवर आपले आचरण असावे आणि याच आचरणास प्रकारच्या न्यायपूर्ण आधार बनवून इस्लामी कायदा असलेल्या राज्यात मुस्लिमतरांचेही अधिकार मुस्लिमांसम ठरविण्यात आले आहेत. ज्या सवलती आणि संधी व प्रगतीची दारे मुस्लिमांसाठी उघडी आहेत, तीच दारे मुस्लिमेतरांसाठीही उघडी आहेत. इस्लामी शासनाने ज्या जवाबदार्या मुस्लिम रयतेवर टाकल्या आहेत, त्या मुस्लिमेतर रयतेवरसुद्धा टाकल्या आहेत. मुस्लिम आणि मुस्लिमेतर या दोघांना एकच कायदा अगर दंडविधान लागू असेल. उदाहरणार्थ, खून करण्याची शिक्षा इस्लामी कायद्याने देहदंड अगर मृत्यूदंड निश्चित केली आहे. या संविधानानुसार एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिमेतराचा खून केला असेल तर खुन्यास देहदंड अगर मृत्यूदंडाची शिक्षा होणारच.(संदर्भ : इस्लामी शासनात मुस्लिमेतरांचे अधिकार, लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट मुंबई) इस्लामी न्यायव्यवस्थेच्या या सर्वसामान्य परिचयातून आपल्या लक्षात आलेलेच असेल की, इस्लामने न्यायव्यवस्थेला किती जबरदस्त महत्त्व दिले आहे. एवढेच नव्हे तर इस्लाम धर्म हा मुळात या विश्वामध्ये न्यायाची स्थापना करण्यासाठीच आला आहे. इस्लामी न्यायप्रणाली ही मानवाच्या प्रत्येक क्षण आणि प्रत्येक पडणारे पाऊल आणि प्रत्येक कर्म व क्षेत्राला व्यापलेले आहे. अगदी धंदा-व्यापारातही आणि माणसाच्या अर्थार्जनातही न्याय हीच कसोटी ठरविण्यात आली आहे. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे लोकहो! अगदी तंतोतंत न्यायानुसार मोजमाप करून देवाणघेवाण करा आणि लोकांना त्यांच्या हक्कांच्या वस्तूंमध्ये घट करून देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका!‘‘(संदर्भ : सूरह-ए-हूद - ८५)

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/nwjurk1evv1e3b9ndt82ejfhgyr3j8d1

काही दिवसांपूर्वी ‘निकाह-हलाला’ आणि इतर बाबींची संवैधानिक वैधता ठरवण्याकरिता प्रकरण संवैधानिक खंडपीठाकडे वर्ग केले होते. त्याबाबत वृत्तपत्रांत ही  बातमी प्रकाशित झाली   होती. सदर बातमी प्रकाशित करताना ‘निकाहहलाला’बद्दल जसा उल्लेख करण्यात आला त्यावरून असे दिसून येते की समाजात ‘निकाह-हलाला’बद्दल बरेच गैरसमज आहेत. मुस्लिम  पर्सनल लॉ (शरियत अप्लिकेशन) अधिनियम, १९३७ नुसार विवाह / घटस्फोटाबद्दल भारतातील सर्व न्यायालये इस्लामी शरियतप्रमाणे न्यायनिवाडा करतात.

गैरसमज
समाजात ‘निकाह- हलाला’ एक प्रकारची विवाहपद्धती असल्याचा चुकीचा समज आहे. ‘निकाह-हलाला’ या प्रकारच्या कोणत्याही विवाहपद्धतीचे इस्लामी शरियतमध्ये अस्तित्व नाही. असाही गैरसमज आहे  की मुस्लिम पुरूषाने आपल्या पत्नीला तलाक  दिल्यानंतर जर त्या पतीला त्याच स्त्रीशी पुन्हा लग्न करायचे असेल तर तिला एखाद्या परपुरुषाशी निकाह (विवाह) करून त्याच्याशी  शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतरच त्याच्याकडून घटस्फोट झाल्यानंतर तिचा पहिला पती तिच्याशी पुन्हा विवाह करू शकतो. पत्नीची इच्छा नसतानाही बळजबरीने ‘निकाह-हलाला’  या नावाने तिला एका परपुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावा लागतो, परंतु हे सर्व समज अत्यंत चुकीचे आहेत. पहिल्या पतीशी विवाह करण्याच्या उद्देशाने ही पद्धत इस्लामी  शरियतमध्ये वर्ज्य आहे. हा गैरसमज मुस्लिम पुरुषांच्या तलाक कायद्याच्या अपूर्ण ज्ञानामुळे निर्माण झालेला आहे.

‘निकाह-हलाला’ची वास्तविकता
‘निकाह-हलाला’बद्दल गैरसमज व  त्याचे वास्तव समजावून घेण्याकरिता इस्लामी शरियतप्रमाणे दांपत्य जीवनशैली, तलाक/घटस्फोटबद्दल तरतुदींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. इस्लामी शरियतप्रमाणे मुस्लिम  पती-पत्नीला आपली जीवनशैली पवित्र कुरआन व हदीस (पैगंबर मुहम्मद स. यांची जीवनशैली) प्रमाणे जगणे अपेक्षित आहे. पती-पत्नी दोघांना समान हक्क आहेत. (कुरआन, २:२२८)  इस्लामी शरियतप्रमाणे पत्नीचा निर्वाह करण्याची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. स्वयंपाक करण्याची जबाबदारी पत्नीची नाही. पतीची जबादारी आहे की तयार जेवण पत्नीस उपलब्ध  करून द्यावे. तसेच मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पूर्णत: पतीवर आहे. (कुरआन, २:२३३) पत्नी जन्मलेल्या बाळाला दूध पाजण्यास बाध्य नाही. जर  पत्नीने बाळाला दूध पाजले तर विशिष्ट परिस्थितीत ती दूध पाजल्याबद्दलचा मोबदला मागू शकते. (कुरआन, ६५:६) पती-पत्नीने आपसात प्रेमाने राहाणे हे इस्लामी शरियतला अपेक्षित  आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, ‘‘सर्वांत उत्तम व्यक्ती ती आहे जिचा व्यवहार आपल्या कुटुंबाशी चांगला आहे.’’

पती-पत्नींमध्ये जर वाद झाल्यास पतीला असे सुचविले आहे की त्याने आपल्या पत्नीची चूक माफ करावी व तिच्यात काही कमतरता आढळून येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे,  कारण अल्लाहने (ईश्वराने) तिच्यात इतर काही चांगले गुण, संस्कार प्रदान केले आहेत त्या आधारे पतीने आपले वैवाहिक जीवन सुरळीत चालवावे. (कुरआन, ४:१९) जर वाद वाढतच  जात असेल तर त्या वेळेस पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दोघांनीही आपसात भांडण मिटवून घेतले पाहिजे. (कुरआन, ४:१२८) त्यानंतरही वादाचे निवारण  होत नसेल तर इस्लामी शरियतप्रमाणे असे अपेक्षित आहे की पती व पत्नीने त्यांचे वाद संपुष्टात आणण्याकरिता त्यांनी त्यांच्याकडून एक एक मध्यस्थ नेमला पाहिजे आणि त्या  मध्यस्थामार्फत आपला वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (कुरआन, ४:३५) मध्यस्थामार्फत वाद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सफल होत नसेल तर पतीने तलाक /  घटस्फोटाबद्दल विचार करावा. जर पतीच्या मताप्रमाणे त्याला पत्नीला घटस्फोट देणे आवश्यक झाले असेल तर अशा परिस्थितीत त्याने आपल्या पत्नीस तिची मासिक पाळी संपून ती  पवित्र झाल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध न ठेवता एक तलाक द्यावा. अशा प्रकारच्या तलाकला ‘तलाक-ए-रजई’ म्हणतात. सदर तलाक दिल्यानंतरही पतीला तो तलाक पुढी तीन  मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासाच्या आत रद्द करता येतो. त्या काळात पतीने आपल्या पत्नीस घराबाहेर काढू नये. सदर काळात पत्नी आपल्या पतीच्या घरातच राहील. अशा  परिस्थितीत तिला असे सूचित केले आहे की तिने चांगला बनाव शृंगार करावा जेणेकरून पती तिच्याकडे आकर्षित व्हावा आणि त्याने दिलेला तलाक रद्द करण्यास तो प्रेरित व्हावा. पती  दिलेला तलाक जाहीरपणे रद्द करू शकतो किंवा त्याने जर आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर दिलेला तलाक आपोआप रद्द होतो. (कुरआन, २:२२९ व सूरह अल तलाक मध्ये याबद्दल सविस्तर उल्लेख आहे.) कदाचित पतीने दिलेला एक तलाक परत न घेतल्यास तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांग्रमासानंतर ती तलाक कायम होईल.  म्हणजेच ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल, या तलाक पद्धतीला ‘तलाक-ए-अहेसन’सुद्धा म्हणतात.
आता तलाक कायम झाल्यानंतर पती पत्नीपासून स्वतंत्र झाली. ती कोणाशीही लग्न करू शकते. त्याचबरोबर आपल्या पहिल्या पतीशी लग्न करण्याची तिला मुभादेखील आहे. पती  स्वत: होऊन पुन्हा आपल्या पत्नीशी लग्न जुळवू शकत नाही. पत्नीच्या संमतीने दोघे पुन्हा लग्न नवीन महर रक्कम ठरवून करू शकतो. जर पत्नीने होकार दिला आणि त्यांचे पुन्हा  लग्न झाले तर हे त्यांचे दुसरे लग्न होईल. गैरसमजुतीप्रमाणे त्यांच्या या पुनर्विवाहाला ‘हलाला’ करण्याची बाधा नाही. पुनर्विवाह झाल्यानंतरही पतीपत्नीला वरीलप्रमाणे जीवनशैली अमलात आणावी लागेल आणि पुन्हा वाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे पद्धत वापरावी लागेल. दुर्दैवाने त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि तो वरीलप्रमाणे संपुष्टात आला नाही तर  उपरोक्त पद्धत वापरून पती आपल्या पत्नीस दुसऱ्यांदा एक तलाक-ए-रजई देऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट काळात तलाक रद्द न केल्यास पत्नी पुन्हा आपल्या पतीपासून  स्वतंत्र होईल. परंतु पहिल्या तलाकप्रमाणे ही दुसरी तलाक दिल्यानंतरही पती-पत्नी पुन्हा नवीन महर रक्कम ठरवून पुन्हा लग्न करू शकतात. अशा प्रकारे हा आपसात तिसऱ्यांदा  विवाह (दुसरा पुनर्विवाह) होईल, ज्याला ‘हलाला’ची आवश्यकता राहाणार नाही. तिसऱ्यांदा विवाह (दुसरा पुनर्विवाह) झाल्यानंतरही असे अपेक्षित आहे की पती-पत्नीने आपली जीवनशैली  इस्लामी शरियतप्रमाणे चालवावी व दुदैर्तवाने पुन्हा वाद झाल्यास वरीलप्रमाणे निवारण करण्याचा प्रयत्न करावा. जर वाद संपुष्टात आला नाही तर पतीने तलाक देण्यासाठी  वरीलप्रमाणेच पद्धत अमलात आणावी. परंतु पतीने तिसऱ्यांदा तलाक दिली त्याच क्षणी ती तलाक म्हणजे ‘तलाक-एमुगल्लजा’मध्ये परिवर्तीत होईल. त्यांचे पती-पत्नीचे नाते संपुष्टात  येईल आणि पत्नी पतीपासून कायमची स्वतंत्र होईल. आता तो पती आपल्या पत्नीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. त्याचे सर्व हक्क संपुष्टातयेतील. (कुरआन, २:२३०)
आता पत्नी तिच्या इच्छेनुसार कोणासोबतही लग्न करू शकते, परंतु आपल्या पहिल्या पतीशी लग्न करू शकत नाही. वरीलप्रमाणे तीन वेळा तलाक झाल्यानंतर पत्नी आपल्या  इच्छेनुसार इतर व्यक्तीशी लग्न केले तर तिला व तिच्या दुसऱ्या पतीला आपले जीवन वरील पद्धतीनेच जगावे लागेल. वादविवाद झाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे त्यांनी आपले  वादविवाद संपुष्टात आणावेत, अशीच इस्लामी शरियतची अपेक्षा आहे.  वाद संपुष्टात न आल्यास वरील पद्धतीप्रमाणे दुसरा पती तिला तलाक देऊ शकतो. दोन वेळा तलाक देऊन परत  घेऊ शकतो व तिसऱ्या वेळेस तलाक दिल्यास तिला परत घेता येणार नाही. दोन वेळा ‘तलाक-एरजई’ तीन मासिक पाळीच्या काळात किंवा तीन चांद्रमासाच्या काळात परत घेऊ  शकतो. परंतु न घेतल्यास ती तलाक ‘तलाक-ए-बायन’मध्ये परिवर्तीत होईल. अशा प्रकारे नैगसर्गिकरित्या ‘तलाक-ए-बायन, ‘तलाक-ए-अहसन’ किंवा ‘तलाक-एमुगल्लजा’ होताच ती  आपल्या दुसऱ्या पतीपासूनसुद्धा कायमची स्वतंत्र होईल. आता ती आपल्या दुसऱ्या पतीशी पुन्हा लग्न करू शकत नाही. आता ती इतर कोणा व्यक्तीसोबत लग्न करण्यास स्वतंत्र होईल.  परंतु ती इच्छेनुसार आता आपल्या पतीसोबतच्या लग्नाला होकार देऊ शकते. (कुरआन, २:२३०, २३२) अशा प्रकारे पहिला पती पुन्हा तिच्याशी लग्न करू शकतो. या सर्व प्रसंगाला  ‘हलाला’ म्हणतात. परंतु हे सर्व नैसर्गिकरित्या घडले पाहिजे. जर कोणी ठरवून असे करत असेल तर ते धर्मात वर्ज्य, अमान्य व निषिद्ध आहे. इस्लामी शरियतप्रमाणे विवाह उभय  पक्षांत एक दिवाणी स्वरूपाचा करार आहे. स्त्री त्या करारास एक स्वतंत्र पक्ष आहे. तिच्यावर बळजबरी करून कोणी विवाह करू शकत नाही अथवा पुनर्विवाहाकरिता बळजबरी करू  शकत नाही. निश्चितच कोणतीही पत्नी असा तीन वेळा पुनर्विवाह करून तीन तीन वेळा तलाक देणाऱ्या पतीशी पुन्हा लग्न करणार नाही. वर नमूद सर्व बाबींचा विचार करून आपण  समजू शकतो की कोणी स्त्री ठरवून अशा प्रकारचा अमल करून आपल्या पहिल्या पतीशी लग्न करावयास तयार होणार नाही. हा गैरसमज आहे की, इस्लाम धर्मात स्त्रीला स्वातंत्र्य   नाही व तिच्या संमतीशिवाय तिचा विवाह किंवा पुनर्विवाह केला जातो. वस्तुत: स्त्रीला आपले निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. परंतु वरील इस्लामी शरियत पद्धतीची माहिती न  घेता या पद्धतीबाबत भरपूर गैरसमज करण्यात आलेले आहेत.
जुन्या काळात अरब देशात अमलात असलेली तलाक पद्धत व नियमवरील सर्व तलाक व पुन्हा विवाह पद्धती समजून घेण्याकरिता पैगंबर मुहम्मद (स.) या जगात आले त्या वेळेस  असलेली परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. त्या वेळेस कोणत्याही धर्मात किंवा कायद्यात विराह झाल्यानंतर घटस्फोट घेण्याची पद्धत किंवा नियम अस्तित्वात नव्हता. परंतु अरब  देशात घटस्फोट/तलाकची पद्धत विचित्र स्वरूपात अस्तित्वात होती. त्या वेळेस अरब देशात पती आपल्या पत्नीवर खूप अन्याय करत होते. छळ करण्याचे स्वरूप त्यांनी असे निवडले  होते की अरब समाजातील पती आपल्या पत्नीस एक तलाक द्यायचे व पुढील तीन मासिक पाळीच्या काळात किंवा चांद्रमासाच्या आत ती तलाक रद्द करून टाकायचे. अशी तलाक  देऊन तलाक रद्द करण्याचा अमल आपल्या पत्नीबरोबर ते हजारो वेळा करायचे. आपल्या पत्नीस विवाहसंबंधाच्या सुखापासून कायमचे वंचित ठेवायचे आणि तिला आपल्यापासून स्वतंत्र   पण होऊ देत नसत. त्या वेळच्या तलाक नियमाप्रमाणे ती रद्द केल्यामुळे पत्नी आपल्या पत्नीच्या लग्नसंबंधात अडकून राहायची व तिचा छळ होत राहायचा. अशा प्रकारे ती आपल्या  पतीपासून स्वतंत्र व्हायची नाही आणि पती तलाक नियमाचे खेळ करत राहायचे. त्या काळात इस्लामी शरियतप्रमाणे पतीचे तलाक रद्द करण्याचे अधिकार फक्त दोनदा मर्यादित  करण्यात आले आणि पत्नी तिसऱ्या वेळेस तलाक देताच आपल्या पतीपासून आपोआप स्वतंत्र होऊन जायची. अशा प्रकारे स्त्रियांचा छळ संपुष्टात आला.
मुस्लिम समाजाला आवाहनउपरोक्त तलाक पद्धत (‘तलाक-ए-रजई’ म्हणजेच ‘तलाक- ए-अहेसन) हीच पद्धत सर्वोत्त तलाक पद्धती आहे. जर वर नमूद पद्धत न अवलंबता तलाक दिली  तर त्याचा अमल होत असला तरीही आणि इतर तलाक पद्धती जरी इस्लामी शरियतप्रमाणे मान्य असेल किंवा त्याचा अमल लागू होत असेल तरीही सर्व इस्लाम धर्मीयांनी वरीलप्रमाणे  एकच तलाक पद्धत अंमलात आणावी व इतर तलाक पद्धती आपल्या स्मरणातून वगळून टाकाव्यात. अशा प्रकारे सर्व समाजाचे इस्लामी शरियत नियम व पद्धतीबद्दल गैरसमज दूर होतील आणि सर्व भारतीय समाजाला याची जाणीव होईल की ठरवून ‘निकाह-हलाला’ करण्याची कोणतीही पद्धत इस्लाम धर्मात नही आणि असे ठरवून करणे इस्लामी शरियतप्रमाणे
वर्जित, अमान्य व निषिद्ध आहे.

- शेख अकबर शेख जाफर
(न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी)

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी व्याज खाणाऱ्याची, व्याज देणाऱ्याची, त्याच्या दोन्ही साक्षीदारांची आणि व्याजव्यवहार लिहून  ठेवणाराची निर्भत्सना केली आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी निर्भत्सना केली आहे ते पाप किती मोठे असेल हे आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर निसाई हदीसकथनानुसार जाणूनबुजून व्याज घेणे, देणे, साक्ष देणे   आणि लिहून ठेवणाऱ्यांची अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) निर्भत्र्सना करतील. अर्थात अंतिम निवाड्याच्या दिवशी अशा लोकांसाठी (जर पश्चात्ताप न करता मरण  पावले) पापमुक्ती नव्हे तर निर्भत्सना करतील.

लाच
माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यांचा आणि लाच घेणाऱ्यांचा धिक्कार असो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लाच देणाऱ्यावर आणि ती घेणाऱ्यावरदेखील अल्लाहचा धिक्कार असो. (हदीस : मुन्तका)

स्पष्टीकरण
लाच दुसऱ्यांच्या हक्काधिकारांचे हनन करून स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी शासनाच्या लिपिकांना आणि अधिकाऱ्यांना दिली जाणाऱ्या वस्तू किंवा रकमेस ‘लाच’ म्हणतात. आपला  वैध हक्क प्राप्त करण्यासाठी खोटारड्या राज्य प्रशासनाच्या धोकेबाज कमचाऱ्यांना, मनाच्या पूर्ण द्वेषासह आपल्या खिशातून ठराविक रक्कम काढून देणे भाग पडते, त्याशिवाय आपला  हक्क प्राप्त होत नाही. या कारणास्तव हा आज्ञाधारक (मोमिन) अल्लाहने इच्छिले तर त्याच्याकडून धिक्कारला जाणार नाही. अशा स्थितीत आणखीन अधिक मागणी करतात की  अल्लाहच्या ‘दीन’ला वर्चस्व व प्रभुत्व प्राप्त होवो.

संदिग्धतेपासून दूर राहणे
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘वैधही स्पष्ट आहे आणि निषिद्धही, परंतु या दोन्हींदरम्यान काही गोष्टी अशा आहेत  ज्या संदिग्ध (संशयास्पद) आहेत. जो मनुष्य संदिग्ध गोष्टांपासून स्वत:चा बचाव करील तो त्यापेक्षा अधिक उघड पापांपासून वाचेल. तसेच जो मनुष्य संदिग्ध पापकृत्ये करण्यात  बहादुरी दाखवील तर उघड पापकृत्यांमध्ये तो मागे पडण्याची शक्यता आहे आणि पापकृत्ये करण्यापासून अल्लाहने त्याला रोखले आहे. (ज्यात कोणाला जाण्याची परवानगी नाही आणि  त्यात परवानगीशिवाय घुसणे अपराध आहे.) जे जनावर मनाई करण्यात आलेल्या विभागाभोवती चरते, त्याचे मनाई करण्यात आलेल्या विभागात जाऊन पडण्याची शक्यता खूपच  अधिक आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ असा आहे की जी वस्तू निषिद्ध असल्याचे अजिबात माहीत होत नाही आणि वैध असल्याचे स्पष्टपणे कळत नाही, अशा वस्तूचे काही पैलू  वैध वाटत असतील आणि काही निषिद्ध दिसत असतील तर त्याच्याजवळ न फिरकणे हेच मोमिनचे (अल्लाहच्या आज्ञाधारकाचे) काम आहे. जो संदिग्ध वस्तूंपासून दूर जातो, तो उघड  निषिद्ध कर्म कसे करू शकतो? जर एखादा मनुष्य संदिग्ध वस्तूंना निषिद्ध समजूनदेखील त्या घेत असेल तर त्याचा परिणाम असा होईल की मन उघड निषिद्ध वस्तू घेण्यात बहादूर व  धाडसी बनेल आणि ही  मनाची अतिशय भयानक स्थिती आहे, हे उघड आहे. माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार,

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखादा मनुष्य अल्लाहच्या सदाचारी दासांच्या यादीत येऊ शकत नाही जोपर्यंत पापकृत्य घडण्याच्या भीतीने ती गोष्ट सोडत नाही ज्यात कसलेही  पाप नाही.’’ (हदीस : तिर्मिजी)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget