वाईट गुमानापासून दूर रहा

ह. अबु हुरैरा (रजी.) कथन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘एखाद्यासंबंधी वाईट गुमान करण्यापासून दूर रहा. कारण वाईट गुमान सर्वाधिक अशी खोटी गोष्ट  आहे. एखाद्यासंबंधी बरे-वाईट जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्यासंबंधी जासूसी करू नका, आपापसात ईर्ष्या करू नका. आपापसात द्वेष करू नका, एखाद्याशी नाते-संबंध तोडू  नका. ईश्वराचे भक्त आहात तर बंधु म्हणून रहा.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण-
आमच्या हृदयात आणि विचारात पवित्रता नसेल तर स्पष्ट समजून घ्या, वाईटपणा (बुराई) आमच्या व्यक्तिमत्वाला सुरक्षित राहू दिले नाही, आणि ही अत्यंत चिन्ताजनक बाब आहे. ह. अब्दुल्लाह बिन अम्र कथन करतात की, अल्लाहचे अंतीम प्रेषित यांनी फर्माविले आहे, ‘‘तुमच्यामधील सर्वात श्रेष्ठ ते लोक आहेत, जे नैतिकतेच दृष्टीने तुमच्यात सर्वात उच्च आहेत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लीम)
श्रेष्ठत्व हे रंग, रूप, वर्ण, भाषा, देश, जातीवर अवलंबून नाही तर, व्यक्तीमधील नैतीकतेवर अवलंबून असते. जीवनमूल्ये निश्चित करण्यामध्ये नैतीकता हीच निर्णायक बाब आहे.  नैतिकता वस्तुत: स्वाभाविक भान आणि अनुभूतीचे दुसरे नाव आहे. व्यक्तीच्या विविध कृतीद्वारे ती प्रकट होत असते. मानवाच्या व्यक्तिगत आणि सामुहिक जीवनाचा कुठलाही अंश  नैतीकतेपासून स्वतंत्र वा वेगळा नाही. 

श्रद्धावंतांची कसोटी (परीक्षा)
माननिय अबु हुरेरा (रजी.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इमानधारक (श्रद्धावंत) पुरुषांची आणि स्त्रीयांची वेळोवेळी अल्लाहतर्फे कसोटी घेतली जात राहते. कधी त्यांच्यावर संकट येते तर कधी त्यांच्या संततीवर. कधी त्याची धनसंपत्ती नष्ट होते. या सर्व संकटांमध्ये जो धैर्य, संयम राखतो त्याच्या हृदयाची स्वच्छता, शुद्धता होत राहते आणि तो दुराचारापासून दूर होत राहतो. येथपावेतो की जेव्हा तो अल्लाहशी भेट घेतो, तर अशा अवस्थेत भेटतो की त्याच्या कर्म लेखात कोणताही गुन्हा राहत नाही. हदीस :  तिर्मिजी
वरील हदीस आणि कुरआनी आयातीद्वारे असा बोध होतो की, संकटे ही श्रद्धावंतांवर येत असतात. पण संकटांना घाबरून, श्रद्धावंतांनी सत्यनिष्ठताचा त्याग करू नये; संकटाला पाठ  दाखविण्याऐवजी संयमाने, धिराने त्याला सामोरे जावे. निराश होवून आत्महत्या सारख्या पापमार्ग स्विकारू नये. धैर्य व संयमानेच संकटांना सामोरे गेल्यास निश्चितच त्याला  ईश्वराकडून या भौतीक जगात, तसेच मृत्यूपश्चात पारलौकीक जगात ईश्वराकडून पुरेपूर मोबदला मिळू शकतो.
तिबरानी या हदीस संकलकांनी माननिय मुआज बिन जबल (रजी.) यांच्याद्वारे एक कथन उल्लेखिले आहे ज्यात हा मजकूर सांगीतला गेला आहे की, ‘‘जेव्हा जीवनधर्माच्या राजकीय
व्यवस्थेत बिघाड होईल, तेव्हा मुस्लीमांवर असे शासक येतील, जे समाजाला चुकीच्या दिशेने नेतील. जर त्यांचे म्हणणे मान्य केले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे म्हणणे  कोणी मान्य केले नाही तर ते त्याला ठार मारतील. तेव्हा यावर लोकांनी विचारले, ‘‘अशा परिस्थितीत आम्हाला आपण (स.) कोणते मार्गदर्शन करता’’? तेव्हा प्रेषित (स.) यांनी  सांगितले, ‘‘तुम्हाला तेच काही त्या काळात करावे लागेल जे मरियम पूत्र ह. इसा (अ.स.स.) यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यांना करवतीने चिरले गेले, आणि सुळावर चढविले गेले. परंतु  असत्यापूढे त्यांनी शरणागती पत्करली नाही. अल्लाहच्या आज्ञापालनात मरणे, त्या जीवनापेक्षा अधीक चांगले आहे, जे अल्लाहच्या अवज्ञेत व्यतीत व्हावे.

Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget