ईश्वर आणि त्याची गुण वैशिष्ट्ये

इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे. त्याला कधी झोप अथवा थकवा येत नाही. त्याला पश्चात्ताप होत नाही किंवा त्याला कोणी धोका देऊ शकत नाही. कुठल्याही कामाकरिता त्याच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्याला कोणत्याही गोष्टीची लालसा नाही. मानव, संपूर्ण सृष्टी, विश्व व प्रत्येक वस्तू त्याच्या आज्ञेत आहेत. ईश्वर आणि सृष्टी एक नाही. त्यांचे स्वतंत्र वेगवेगळे अस्तित्व आहे. ईश्वराने सृष्टीला निर्माण केले आहे, वाढविले व सजविले आहे. त्याच्या या निर्माणकार्यामध्ये त्याला त्याग करण्याची किंवा बळी अगर बलिदान देण्याची गरज नाही. सृष्टीची निर्मिती, देखभाल किंवा आदेश देणे हे ईश्वराचे अगदी सोपे काम आहे. (तो मानवाकरिता मार्गदर्शन, त्याच्या पापाची, गुन्ह्याची क्षमा किंवा अन्यायकर्त्याची शिफारस अथवा दुसऱ्या कोणत्याही हेतूने मानवी किंवा प्राण्यांच्या रुपामध्ये येत नाही.) त्याला कोणताही पुत्र नाही, की जो त्याच्या मदतीकरिता पृथ्वीवर जन्मावा. या सर्व विकृत भावनांपासून तो पवित्र आणि समर्थ आहे. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू ईश्वराची बाजू घेत नाही आणि ईश्वरदेखील कोणाच्याही बाजूने नाही. तसेच त्याला त्याच्या बरोबरीचा जोडीदार नाही. तो अजोड, अतूल व अदृश्य आहे. त्याला खालपासून वरपर्यंत कोणी पाहू शकत नाही. तो सर्वव्यापी आहे. सर्व वस्तूंना पाहणारा आहे. तो प्रत्येकाचे म्हणणे ऐकणारा, एवढेच नव्हे तर मानवाच्या हृदयामध्ये, मनामध्ये येणारे विचार, हेतू, इच्छा, आकांक्षासुद्धा जाणणारा अंतर्ज्ञानी आहे. त्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्याचे ज्ञान प्रत्येक गोष्टींनी व्यापलेले आहे. तो प्रत्येक माणसाच्या अगदी जवळ आहे. त्याला कोणाच्या मध्यस्थीची किंवा कोणाच्या शिफारशींची गरज नाही व तो मानवाची प्रार्थना, भक्ती कोणत्याही माध्यमाविना अगर शिफारशींशिवाय ऐकतो. संकटग्रस्त माणसाची फिर्याद ऐकतो व प्रत्येकाच्या मदतीस येतो. तो सर्वश्रेष्ठ, सर्वाधीश आहे.
याउलट सर्वजण ईश्वराचेच लाचार व आज्ञाधारक आहेत. सर्व सत्कर्माची गुणवैशिष्ट्ये त्याचीच व त्याच्याचसाठी आहेत. सामर्थ्य, मोठेपणा, उत्कर्षाचा उगमसुद्धा ईश्वरामध्येच आहे. तो न्यायी व न्यायदाता आहे. अन्यायाच्या प्रत्येक वाईट पैलूंपासून पवित्र आहे. तो जे काही कार्य करतो ते आपल्या ज्ञानाने आणि बुद्धिकौशल्याने करतो. त्याचे कायदे व आदेश सृष्टीच्या, विश्वाच्या कणाकणांमध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यांचे पालन केले जाते. पृथ्वी आणि त्यावरील निर्मिती या सर्व गोष्टी त्याच्या अधिपत्याखाली आहेत. मानवाच्या ऐच्छिक व अनच्छिक जीवनामध्ये सुद्धा त्याचेच आदेश व आज्ञा पाळल्या जातात. ईश्वरच या सृष्टीचा आणि मानवाचा योग्य व सत्य स्वामी आहे.
म्हणूनच मानवाच्या वस्तुनिष्ठ जीवनाकरितादेखील त्याचेच आदेश, कायदे-कानून आहेत. तो कृपावान व अत्यंत दयाळू आहे. त्याची दया, कृपा सर्व चराचरामध्ये सामावलेली, व्यापलेली आहे. संपूर्ण मानवजातीवर त्याची असीम दया, अनंत कृपा व देणग्या आहेत. या जगामध्ये सर्वांत मोठी कृपा आणि देणगी ‘ईश्वरीय धर्म’ (इस्लाम) आहे, जो मानवतेकरीता, मानवाच्या मार्गदर्शनाकरीता या ऐहिक आणि पारलौकिक जीवनामध्ये यश प्राप्त करण्याकरिता दिला आहे. त्याचे जे सेवक व भक्त त्याची भक्ती करतात, त्याच्या आज्ञेचे पालन करतात, त्याच्या धर्माचे पालन निःस्वार्थपणे करतात आणि त्याच्या सन्मार्गामध्ये आपले प्राण, संपत्तीची आहुती देतात, संकटकाळामध्ये त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कायम दृढ राहतात; अशांना सर्वशक्तिमान, सर्वसंपन्न आणि बुद्धिमान ईश्वर मदत करतो, त्यांना साथ देतो आणि त्यांना आपल्या निकट करुन प्रसन्न करतो आणि प्रसन्न होतो. सर्वज्ञानी ईश्वर त्यांना पारलौकिक जीवनात प्रामाणिक निवडक भक्तांमध्ये, सेवकांमध्ये सामील करुन स्वर्गामध्ये उच्चस्थान देईल व अनंत, अगणित देणग्यांचा, भेटींचा, कृपेचा वर्षाव करील. ऐहिक जीवन असो की पारलौकिक जीवन दोन्ही जीवनांमध्ये, त्याच्याच आदेशांचे व आज्ञांचे पालन केले जाते. त्याची मदत असेल तर कोणी त्याला अंकित व अधीन करू शकणार नाही. त्याने आपली दया, कृपा नाकारली तर त्या मनुष्याला वाचविणारा कोणी असणार नाही. मानवांना या जगामध्ये तोच पाठवितो आणि तोच त्यांना अन्न-पाणी देतो. व्यक्ती व समाज आणि त्यांचा उत्कर्ष, उन्नती व अधोगती त्याच्याच हातामध्ये आहे. त्याच्या कौशल्याने जाती-वंशसुद्धा अवकर्षाला व अधोगतीला पोहोचतात आणि व्यक्तीलादेखील मृत्यु येतो. मृत्युनंतर मानवाला परत त्याच्याच जवळ जायचे आहे. इहलोक व परलोक दोन्हींमध्ये त्याचा ईश्वराशी संबंध येणार आहे आणि त्यालाच प्रसन्न करुन त्याचीच भक्ती करुन दोन्ही लोकांमध्ये मनुष्य यशस्वी आणि सफल होणार आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget