इस्लाम व जिहाद

पाश्चात्य साम्राज्यांनी मध्ययुगीन कालखंडापासून जिहाद विरूद्ध प्रचंड प्रचार केला, जिहादचे भयानक चित्र रेखाटले आणि लोकांची मते कलुषित करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. हे सर्व अशा वेळी झाले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच अत्याचारांनी अर्धे जग पीडित बनले होते. आजसुद्धा युरोप आणि अमेरिका स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय हितासाठी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे बाँबफेकी विमाने व आधुनिक शस्त्रास्त्रानिशी वाटेल त्या देशावर हल्ला करून तुटून पडतात. त्यांचे तसे कृत्य अगदी तर्कसंगत व योग्य आहे, असे सभ्य व शिष्ट शब्दात जगाला पटविण्याचे प्रयत्न केले जातात पण इस्लाम व जिहाद हे शब्द त्यांच्या कानांवर पडल्याबरोबर दुष्प्रचाराची ‘टेप रेकॉर्ड’ लगेच सुरू केली जाते.
‘जिहाद’ हा अरबी भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अखंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणे’असा आहे ‘भगिरथ प्रयत्न’ हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो. त्या प्रयत्नात कसलीही उणीव राहू नये, अगदी त्यासाठी प्राण पणाला लावण्याची गरज पडली, तरी मागे हटू नये. जिहाद केवळ रणांगणांवरच होतो, असे नसून अल्लाहच्या ‘दीन’(जीवनव्यवस्था) चा प्रसार करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी, दुष्कर्मापासून निर्मळ असा सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर केल्या जाणार्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाला ‘जिहाद’ असे नाव देतात. अशा प्रयत्नात एखादे वेळी हातात शस्त्र घेण्याची गरज पडू शकते, परंतु मूलतः जिहाद केवळ शस्त्रांनीच केला जातो असे नाही. कुरआनमध्ये कित्येक वेळा जिहादची आवाहने केली आहेत, ती केवळ प्राण पणाला लावण्यासाठीच नव्हती, तर आपल्या धनसंपत्तीचे बलिदान करायला सांगितले गेले. इस्लाम जेव्हा आपल्या अनुयायींना जिहादचे आवाहन करतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो, की धरणीवर होत असलेला कलह, अन्याय व अत्याचार नष्ट करण्यासाठी, आपले सर्वस्व पणाला लावून शिकस्तीचे प्रयत्न केले जावेत.
इस्लाम व न्याय
इस्लाम हे काही विशिष्ट धार्मिक विधी व ठराविक उपासना करण्याचे नाव नाही, तर ती एक संपूर्ण जीवनव्यवस्था आहे, ही गोष्ट स्पष्ट झालीच आहे. इस्लामची प्रस्थापना करण्यात पैगंबरासमोर जे उद्दिष्ट होते, त्याचा गाभा अथवा केंद्रबिदू ‘न्याय’ स्थापन करणे, हाच होता. अन्याय व शोषण यापासून मुक्त समाज निर्माण करणे, हेच तर इस्लामचे उद्दिष्ट आहे. न्याय स्थापन करण्याचे आदेश कुरआनने वारंवार दिले आहेत. प्रेषित मुहम्मद(स.) यांचीही तीच ताकीद होती. त्यांचे संपूर्ण जीवन न्यायस्थापनेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
इस्लाममध्ये न्यायाची अर्धवट कल्पना नाही. प्रत्येक व्यक्तीला कुरआनचे फर्मान आहे की तिने दृढतेने न्यायीपणावर राहावे. केवळ सामाजिक न्यायच नव्हे, तर व्यक्तिगत न्यायही प्रस्थापित केला जावा. माणसांनी आपल्या सर्व संबंधात व व्यवहारात न्यायाची कास सोडू नये. कुरआनचे फर्मान आहे,
हे ईमानधारकांनो! न्यायाचे ध्वजधारक व्हा आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. मग तो न्याय व ती साक्ष तुमच्या स्वतःच्या विरूद्ध, तुमच्या माता-पित्याच्या विरूद्ध अथवा तुमच्या नातलगांच्या विरूद्ध का असेना.- सूरह : आले इमरान - १३५
निःसंशय अल्लाह न्याय व भलाई करण्याचा व नातेवाइकांना(त्यांचा हक्क) देण्याचा आदेश देत आहे आणि अश्लील कृत्ये, दुष्कृत्ये व शिरजोरीपासून रोखत आहे. हे ईमानधारकांनो! अल्लाहखातर न्यायावर दृढतेने टिकून राहाणारे बना. न्यायाची साक्ष देताना, एखाद्या गटाशी असलेल्या वैराने तुम्हाला न्याय सोडण्यास उद्युक्त करावे, असे कदापि होता कामा नये. न्याय करा. तीच धर्मपरायणतेशी अनुकूल गोष्ट आहे.- सूरह : माईदा-८
इस्लाम केवळ त्या न्यायाची गोष्ट बोलत नाही, जो न्यायालयात मिळत असतो, किबहुना तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, अशी व्यवस्था करतो. राजकारणाच्या बाबतीत, अर्थकारणाच्या बाबतीत तसेच माणसाच्या कौटुंबिक जीवनात तो न्याय स्थापन करतो. त्या न्यायाचा लाभ बालकांना, महिलांना, श्रमिकवर्गाला, गोरगरिबांना व समाजातील पीडित व शोषित माणसांपर्यंत पोचत असतो.
इस्लाम व गुन्हेगारी
उजेड व काळोख जसा एका ठिकाणी राहू शकत नाही, त्याचप्रमाणे इस्लामच्या उपस्थितीत गुन्हेगारी आपला तळ टाकू शकत नाही. इस्लामी कानून अशी नैतिक व आर्थिक व्यवस्था प्रदान करतो जी माणसाला गुन्हे करण्यापासून रोखते, त्याला परावृत्त करते. शिवाय इस्लाम असे सामाजिक वातावरण निर्माण करतो, ज्यात गुन्हा करण्याला कमीत कमी अवसर उरतो. त्यानंतरही घडलेल्या गुन्ह्यांसाठी अशी कडक सजा देण्याचा इस्लाम आदेश देतो, ज्यामुळे गुन्हेगारांना जरब बसावी.
इस्लामने निर्धारित केलेल्या कडक शिक्षांवर पाश्चिमात्य जगात फार मोठी ओरड व टीका केली जाते. ती सजा क्रूर व कठोर असल्याचे म्हटले जाते. वास्तवता अशी आहे की गुन्ह्याचे स्वरूप व सजा यामध्ये संतुलन राखले गेले आहे. जसा गुन्हा असेल तशी सजा दिली जाते. जघन्य व निर्घृण गुन्ह्यांबाबत शिक्षा दिली जाऊ नये, तर काय केले जावे? निर्घृण गुन्ह्यांसाठी कठोर सजा दिल्याने माणुसकीची बाजू दुर्बल पडत नाही, उलट ती प्रबळ बनते व एक स्वस्थ व अपराधविरहित समाजाच्या निर्मितीसाठी ती साहाय्यभूत ठरते. खून, बलात्कार, चोर्या-दरोडे यासारखे गुन्हे प्रत्येक कालखंडात होत आले आहेत, परंतु या तथ्याला इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा एखादा इस्लामी समाज स्थापन झाला, तेव्हा तेव्हा त्याने निर्घृण गुन्ह्यांचे पूर्ण निर्मूलन करून सोडले. अमेरिकेचे उदाहरण घ्या. तेथे प्रत्येक सेकंदाला चोरी होते, काही मिनिटांच्या अंतराने खून होतो आणि बलात्कार तर आता गुन्हा राहिलेलाच नाही. त्याच्या तुलनेत सौदी अरबस्तानाचे उदाहरण घ्या. खरे तर तेथेही संपूर्ण इस्लाम लागू नाही, पण इस्लामी शिक्षेचा नियम नक्कीच आहे. तेथे चोरीची घटना क्वचितच कधी तरी घडते आणि खून तर वर्षभरात क्वचित घडून येतो.
Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget