माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांचे कथन आहे.
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’
साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण
अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.
मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.


Post a Comment