जकात


अल्लाहने धनवान मुस्लिम पुरुष व स्त्रियांवर दरवर्षी जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरवले आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किंतीची रोख रक्कम वर्षाखेरीस शिल्लक राहिल्यास त्या रकमेतून अडीच टक्के जकात अदा करायची आहे. साडेतास तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किमतीची रक्कम म्हणजे या प्रमाणापेक्षा  जितकी संपत्ती शिल्लक राहील त्या सर्व संपत्तीवर जकात द्यावी लागेल. संपत्तीमध्ये नुसती रोख रक्कम नसून व्यापारी माल, पशुधन असल्यास ते आणि शेतजमीन असेल तर त्यातील पिकांवर सुद्धा जकात द्यावी लागेल. व्यापारी मालामध्ये दुकानात, कारखान्यात वर्षाखेरीस जेवढ्या किंमतीचा माल शिल्लक राहील त्यावरसुद्धा जकात द्यावी लागते. या अर्थासंबंधी अल्लाहने जी योजना केली आहे त्याचे उद्दिष्ट असे की “जो माल अल्लाहने आपल्या प्रेषितांना (आणि त्यांच्यानंतर) मुस्लिमांना दिलेला आहे तो नातेवाईकांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी आणि प्रवाशांसाठी दिला जावा. कारण धनसंपत्ती फक्त धनवान लोकांमध्येच फिरत राहू नये.” (पवित्र कुरआन) जकात व्यवस्थापन आणि तिच्या वाटपासंबंधी असे म्हटले आहे की “जकात, गोरगरीबांसाठी, निराधारांसाठी आणि त्या्चया व्यवस्थापनावर जे कर्मचारी नियुक्त केले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांची दिलजमाई करावयाची आहे अशांसाठी तसेच जे गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आहे.” (पवित्र कुरआन-९:६०) जकात तर अनिवार्य कर्तव्य आहे ती द्यावीच लागेल, जशी नमाज अदा करावी लागते, उपवास करावा लागतो तसेच त्याव्यतिरिक्त इतर दानधर्मही करावे लागतात. आणि किती दानधर्म करावा त्यास मर्यादा नाही. “ते विचारतात, काय खर्च करावा? याचे उत्तर अल्लाह देतो की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून जे काही शिल्लक राहील ते सर्व दानधर्मात खर्च करून टाकावे.” (पवित्र कुरआन) जकात आणि दानधर्म मानवाधिकार आहेत आणि उपासना, नमाज रोजा हे अल्लाहचे अधिकार आहेत. दोन्हींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. दानधर्म इस्लामी व्यवस्थेचा मूळ गाभा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget