Latest Post

मानवी इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्व हे तात्कालीन सामाजिक वातावरणाने व परिस्थितीने प्रभावित झालेले असतात. परंतु या व्यक्तीची शान काही औरच आहे. त्याला घडविण्यात तात्कालीन परिस्थितीचा काहीच वाटा नाही. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होऊ शकत नाही की अरबाची तात्कालीन स्थिती त्या वेळी ऐतिहासिक रूपात अशा व्यक्तीच्या जन्माची मागणी करीत होती. ओढून ताणून तुम्ही असे म्हणू शकता की ऐतिहासिक कारण अशा नेत्याची मागणी करीत होते ज्याद्वारा तात्कालीन अव्यवस्था व भिन्नता नष्ट करून एक राष्ट्र बनवून इतर देशांना पराजित करून अरबांना समृद्ध करील. असा राष्ट्रवादी अरबी वैशिष्ट्याने परिपूर्ण नेता अन्याय, निर्दयता, रक्तपात, धोकाधडी करून अरब देशाला संपन्न करून साम्राज्याची निर्मिती करील आणि उत्तराधिकाऱ्यांसाठी हा वारसा सोडून जाईल. याशिवाय त्याकाळची अरबी इतिहासाची दुसरी मागणी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. हेगेल (Hegel)व माक्र्स (Marx)यांच्या इतिहासाच्या भौतिक व्याख्येनुसार तिथे एक राष्ट्र आणि एक साम्राज्य बनविणारा निर्माण होणे काळाची गरज होती. परंतु हेगेल व माक्र्सचे तत्त्वज्ञान या घटनेची व्याख्या करूच शकत नाही की त्या वेळी त्या स्थितीत एक असा मनुष्य जन्माला आला जो उत्तम नैतिक शिकवण देणारा, मानवतेला सावरणारा, आत्म्यांना शुद्ध करून त्यांना विकसित करणारा आणि अज्ञानाच्या अंधविश्वासांना व पक्षपातीपणाला नष्ट करणारा होता. अशा महात्म्याची दृष्टी जातीपाती, वंश, देशाच्या सीमा तोडून संपूर्ण मानवतेवर फैलावली, ज्याने आपल्या समाजासाठीच फक्त नव्हे तर मानवतेसाठी एक नैतिक आध्यात्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक व्यवस्थेचा पाया घातला. ज्याने आर्थिक व्यवहार, लोक राजकीय व आंतरराष्ट्रीय संबंधांना कल्पनाविश्वात नव्हे तर प्रत्यक्षात नैतिक आधारावर स्थापित करून दाखविले आणि आध्यात्मिकता व नैतिकतेचा संतुलित समावेश केला जे आजसुद्धा ज्ञान, तत्त्वज्ञान व बुद्धीची तशीच मुख्य कृती आहे जशी त्या वेळी होती. काय अशा व्यक्तीला अरब अज्ञानाच्या वातावरणाची उपज म्हणू शकाल?

असेच फक्त नाही की ही व्यक्ती तात्कालीन परिस्थितीची निर्मिती नाही तर जेव्हा आम्ही तिच्या किर्तीवर विचार करतो तर माहीत होते की काळ व स्थानाच्या बंधनांनी मुक्त आहे. तिची नजर स्थान व काळाच्या बंधनांना तोडत हजारो वर्षांच्या (Milleniums) पडद्यांना चिरून पुढे जाते. तो मनुष्याला प्रत्येक युगात व वातावरणात पाहतो आणि त्याच्या जीवनासाठी असे नैतिक व व्यावहारिक मार्गदर्शन करतो जे प्रत्येक स्थितीत योग्य ठरते. तो त्या विभुतिंपैकी नाही ज्यांना इतिहासाने गतकालीन करून ठेवले आहे. ते त्यांच्या काळातील एक चांगले नेता होते असेच आपण इतरांसाठी म्हणू शकतो. परंतु हा विश्वनेता असा आहे जो संपूर्ण मानवतेचा मार्गदर्शक आहे, जो काळाबरोबर प्रगती करत जातो आणि प्रत्येक युगात आधुनिक सिद्ध होतो जसा मागील युगात होता.

लोक ज्यांना उदारतेने इतिहास घडविणारे (Makers of History) अशी पदवी देतात ते खरे तर इतिहासाने घडविलेले असतात. (Creatures of History) खरे तर इतिहास घडविणारे संपूर्ण मानवी इतिहासात हेच एकमेव व्यक्तित्व आहे. या जगातील जेवढ्या नेत्यांनी इतिहासात क्रांती घडविली, त्यांच्या वृत्तांतावर विवेचनात्मक दृष्टी टाकल्यास कळून येते की पूर्वीपासून तिथे क्रांतीची कारणे उत्पन्न होत होती आणि ती कारणे स्वतः त्या क्रांतीची दिशा व मार्ग निश्चित करीत होती, ज्याच्या येण्याची ते मागणी करीत होते. क्रांतिकारी नेत्याने फक्त इतकेच केले की स्थितीच्या मागणीच्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी त्या अभिनेत्याची भूमिका पार पाडली ज्यासाठी स्टेज व कर्म पूर्वीपासून निश्चित होते. 

परंतु इतिहास घडविणारे व क्रांती करणाऱ्यांपैकी हेच एक असे व्यक्तिमत्त्व आहे की जिथे क्रांतीची कारणे नव्हती. तिथे त्याने स्वतः क्रांतीची कारणे निर्माण केली. जिथे त्या क्रांतीचे ‘बी’ (स्पिरीट) व व्यावहारिक योग्यता लोकांमध्ये नव्हती तिथे त्याने स्वतः उद्देशानुसार मनुष्य घडविले. स्वतःच्या व्यक्तित्वाला विरघळवून हजारो लोकांच्या मनात उतरविले आणि त्यांना तसेच बनविले जसे तो बनवू इच्छित होता. त्याच्या संकल्प सामर्थ्याने व बळाने स्वतःच क्रांतीची सामुग्री निर्माण केली, तिला आकार दिला आणि समयगतीला त्या मार्गावर चालविले ज्या मार्गावर तो चालवू इच्छित होता. वैभवशाली इतिहास घडविणारा आणि असा महान क्रांतिकारी मानवी इतिहासात तुम्हाला कुठे सापडतो?

सज्जड पुरावा
आता आपण या प्रश्नावर विचार करू या की, चौदाशे वर्षांपूर्वीच्या अंधकारमय जगात अरबसारख्या घोर अंधकारमय देशाच्या एका कोपऱ्यात एक मेंढपाळ, निरक्षर मरुस्थळवासी व्यक्तीच्या अंतरंगात इतके ज्ञान, इतके प्रकाश, बळ, इतके चमत्कार, इतकी प्रबळ व परिपूर्ण शक्ती-सामर्थ्य उत्पन्न होण्याचे कोणते साधन होते? लोक म्हणतात की ते सर्व त्याच्या मन व मस्तिष्काची उपज होती. माझे असे म्हणणे आहे की जर हे त्याच्या मन व मस्तिष्काची निर्मिती होती तर त्याला ईश्वर होण्याचा दावा करावयास हवा होता. त्याने जर असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्या जगाने कृष्णाला भगवान म्हणण्यात संकोच केला नाही, ज्याने बुद्धाला पूज्य बनविले आणि ज्या जगाने ईसा मसीह (अ.) यांना स्वेच्छेने खुदाचा पुत्र बनविले, तसेच ज्या जगाने हवा, पाणी, अग्निचीसुद्धा पूजा केली, त्या जगाने अशा महान कीर्तिमान व्यक्तीला ईश्वर मान्यच केले असते. परंतु पाहा तो स्वतः काय सांगत आहे. तो त्याच्या किर्ती व चमत्कारांपैकी एकाचेसुद्धा क्रेडीट स्वतः घेत नाही. तो म्हणतो, ‘‘मी एक मनुष्य आहे, तुमच्याचसारखा मनुष्य, माझ्याजवळ माझ्या स्वतःचे काहीच नाही, सर्वकाही ईश्वराचे आहे आणि ईश्वराकडूनच आहे. ही वाणी ज्याच्यासारखी दुसरी वाणी निर्माण करण्यात मानव असमर्थ आहे, ही माझी वाणी नाही? माझ्या बुद्धीची उपज नाही. या वाणीचा शब्द न शब्द ईश्वराकडून माझ्याकडे आला आहे. यासाठीची सर्व प्रशंसा ईश्वरासाठीच आहे. हे कार्य जे मी स्वतः केले, जे कायदेकानू मी बनविले, हे सिद्धान्त जे मी तुम्हाला शिकविले यापैकी काहीएक मी स्वतः घडवलेले नाही. मी स्वतःच्या योग्यतेने काहीसुद्धा निर्मित करण्याचे सामर्थ्य ठेवत नाही. मी प्रत्येक गोष्टीत ईश्वराच्या मार्गदर्शनाचा (Divine Guidance) मोहताज (आश्रित) आहे. ईश्वराकडून जे अवतरित होते तेच सांगतो व करतो.’’

पाहा, हे कशा प्रकारचे आश्चर्यजनक सत्य आहे! कशा प्रकारची सत्यता व सत्यवादिता आहे! खोटारडा व्यक्ती मोठा बनण्यासाठी दुसऱ्यांच्या कीर्तिचे क्रेडीटसुद्धा घेण्यात संकोच करीत नाही आणि त्याविषयी सहज माहीत होते की हे त्याने कोठून घेतले आहे. परंतु हा व्यक्ती त्या कीर्तिचा संबंधसुद्धा स्वतःशी जोडत नाही ज्याला तो स्वतःची कीर्ति (महानता) घोषित केली असती तर कोणी त्यास खोटा म्हटले नसते कारण कोणाजवळ त्याच्या वास्तविक उगमस्त्रोतापर्यंत पोहचण्याचे साधनमात्र नव्हते. सत्यतेचा यापेक्षा अधिक स्पष्ट पुरावा आणखीन कोणता असू शकतो? त्या व्यक्तीपेक्षा अधिक सच्चा आणखीन कोण असू शकतो ज्याला एका अत्यंत गुप्त साधनाद्वारा (दिव्यप्रकटन) असे अनुपम चमत्कार प्राप्त होतात आणि तो निःसंकोचपणे सांगतो की हे चमत्कार त्याला कोठून प्राप्त झाले? आता सांगा, का म्हणून आम्ही त्या व्यक्तीला सच्चा म्हणू नये?

पाहा, हे आहे आम्हा सर्वांचे नायक, संपूर्ण जगाचे पैगंबर (प्रेषित) मुहम्मद (स.)! त्यांच्या प्रेषित्वाचे उघड प्रमाण त्यांची सत्यता आहे. त्यांचे महान कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांचा पवित्र जीवनवृत्तांत, सर्वकाही इतिहाससिद्ध आहे. जो व्यक्ती शुद्धहृदयी, सत्यप्रियता आणि न्यायसंगत त्यांच्या जीवनाचे अध्ययन करील, त्याचा आत्मा साक्ष देईल की हेच ईश्वराचे पैगंबर-प्रेषित आहेत. ती वाणी जी त्यांनी सादर केली तो हाच कुरआन आहे ज्याचे तुम्ही अध्ययन करता. या अनुपम ग्रंथाचे जो कोणी खुल्या मनाने अध्ययन करील, त्याला मान्यच करावे लागेल की, हा ग्रंथ अवश्य ईशग्रंथच आहे. कोणीही अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती करू शकणार नाही.


वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत तो एक सर्वसाधारण अरब होता त्याकाळात या व्यक्तीला जगाने आश्चर्यकारक भाषणकर्ता म्हणून पाहिले नाही. कोणीही त्यास ज्ञानी, बुद्धीमत्तापूर्ण व तत्त्वदर्शितेच्या गोष्टी करताना ऐकले नव्हते. अध्यात्म, राजनीती, नैतिकता, अर्थकारण, समाजकारण व कायदेकानूविषयी बोलताना त्यास कोणीही ऐकले नव्हते. ईश्वर, देवदूत (फरिश्ते) ईशग्रंथ, प्राचीन जाती व प्रेषित, पारलौकिक जीवन, जन्नत व जहन्नमविषयी एक शब्दसुद्धा उच्चारताना ऐकले नव्हते.

उत्तम चरित्र, पवित्र आचरण व सदाचार त्यास अवश्य प्राप्त होता परंतु वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत त्या व्यक्तीमध्ये असाधारण असे काहीही नव्हते ज्यामुळे लोकांना वाटावे की पुढे हा एक असामान्य व्यक्ती बनणार आहे. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत लोक त्यास एक मौनप्रिय, शांतिप्रिय व अतिसज्जन व्यक्तीच्या रूपाने ओळखत होते. परंतु चाळीस वर्षानंतर जेव्हा तो गुफेतून एक नवीन संदेश प्राप्त करून बाहेर पडला तेव्हा त्याचा कायापालट झाला होता.
आता तो एक आश्चर्यकारक वाणी ऐकवित होता ज्याला ऐकून संपूर्ण अरब देश आश्चर्यचकित झाला. त्या वाणीच्या प्रभाव इतका होता की त्याचे कट्टर शत्रूसुद्धा त्या वाणीला ऐकण्यास भीत होते. कारण ती वाणी एखाद्यावेळेस मनात घर करून बसू नये. वाणीची उत्तमता समरसता व वर्णनशैली अशा प्रकारे प्रभावशाली व शक्तिशाली असल्याने संपूर्ण अरब देशाला ज्यात मोठमोठे कवि, वाक्पटू होते, त्या सर्वांना त्या वाणीने आव्हान दिले. सर्वांनी मिळून एक सूरह यासारखा रचून दाखवावा परंतु कोणीही अशा प्रकारचे धाडस केले नाही. ही एक अनुपम अशी वाणी अरब लोकांनी कधीही ऐकली नव्हती.

व्यापक संदेश
आता तो अचानक अपूर्व तत्त्वदर्शी, नैतिकता, सभ्यता व संस्कृतीचा एक अद्वितीय सुधारक, एक आश्चर्यजनक राजनीतिज्ञ, एक महान कायदेतज्ञ, एक उच्चश्रेणी जज तसेच एक अद्वितीय सेनापती बनून जगासमोर प्रकटला. त्या अशिक्षित, मरुस्थलवासी व्यक्तीने तत्त्वदर्शिता (ेंग्े्दस्) व बुद्धीमत्तेविषयी असे सांगण्यास प्रारंभ केला की तत्पूर्वी कोणीही सांगितल्या नव्हत्या आणि तद्नंतर कोणी सांगितल्या नाहीत. त्या निरक्षर व्यक्तीने अध्यात्म व ब्रह्मज्ञानाच्या महान प्रसंगावर निश्चयात्मक भाषण देणे सुरु केले. जनसमूहाच्या इतिहासापासून ते देशाच्या उन्नती व अवनतीच्या मूळ सिद्धान्तांवर व्याख्यान देऊ लागला. प्राचीन सुधारकांच्या कार्याचे समालोचन करून जगातील धर्मातील सत्य व असत्य तत्त्वांवर स्वतःचे विचार प्रकट करू लागला. तसेच विभिन्न जनसमूहांच्या परस्परातील भेदनीतीवर निर्णय देऊ लागला. तो नैतिकता व सभ्यतेची शिकवण देऊ लागला.

तो सामाजिक, आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचे नियम व कायदे बनवू लागला आणि अशी कायदेप्रणाली निर्माण केली की मोठमोठे विद्वान व बुद्धीवंत विचार-चिंतन करून व जीवनभराचे अनुभवांती त्यात अंतर्भूत असणाऱ्या बुद्धी विवेकाचा उलगडा त्यांना होतो. जगाच्या अनुभवात जसजशी वृद्धी होत आहे, तसतशी त्या नियमात सामावलेले विवेक अधिकाधिक दृगोच्चर होत असतात. हा मौनधारी शांतिप्रिय ज्याने जीवनात कधी तलवार बाजी केली नाही, कधीही सैनिक प्रशिक्षण घेतले नव्हते. तो जीवनात एकदाच दर्शक म्हणून लढाईत सामील झाला होता, पाहता पाहता तो एक धीरोदात्तवीर योद्धा बनला. असा महान सेनापती बनला ज्याने नऊ वर्षात संपूर्ण अरब देशावर विजय प्राप्त केला. तो असा अद्भूत सैनिक लीडर बनला की त्याने निर्माण केलेल्या सैनिक प्रबंध व युद्धनीतीच्या प्रभावाखाली सामुग्रीविहीन अरबांनी अल्पावधित तत्कालिन जगातील महानशक्ती (एल्जी झ्दैी) रोम व ईराण यांना परास्त केले.

हा एकान्तप्रिय व शांतीप्रिय व्यक्ती ज्यात कोणीही चाळीस वर्षापर्यंत राजनैतिक रूचिचा गंधसुद्धा अनुभवला नव्हता, तो अचानक महान समाजसुधारक (ींदिीसी) आणि महान नीतिज्ञ बनून प्रकट झाला आणि तेवीस वर्षाच्या अल्पावधित बारा लाख क्षेत्रफळाच्या वाळवंटी प्रदेशातील असंघटित भांडखोर, अज्ञानी, उदंड, असभ्य टोळ्यांना रेल, रेडिओ व प्रेसच्या साहय्यतेविना एक धर्म, एक सभ्यता, एक विधान व एक शासन प्रणालीच्या अधीन बनविले. त्याने त्यांच्या भावना व स्वभाव बदलून टाकले, त्यांचे आचरण बदलून टाकले. त्यांच्या अशिष्टतेला उच्चश्रेणीच्या शिष्टाचारात परिवर्तीत केले. त्यांच्या बर्बरतेला उत्तम नागरिकतेत, त्यांच्या कुचरित्र व अनैतिकतेला सुचरित्र, ईशभक्ती, संयम व श्रेष्टनैतिकतेत आणि त्यांच्या उदंडतेला व निरंकुशतेला अत्यंत नियमबद्धतेत आणि आज्ञापालनात परिवर्तीत केले. त्या वांझोट्या लोकसमूहात शतकानुशतके कोणी सत्चरित्र माणसाने जन्म घेतला नव्हता, त्याने त्या लोकसमूहास असे सत्पुरुषोत्पादक बनविले ज्यात हजारो महान मानव जन्माला आले आणि ज्यांनी जगाला धर्म, नैतिकता व सभ्यतेचे धडे शिकविण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यात संचार केला.

हे कार्य त्याने अत्याचार, धोकाधडी, बळपूर्वक व छळकपटाने केले नाही तर मनमोहक स्वभाव आत्म्यांवर राज्य करणारी सज्जनता आणि मस्तिष्कावर अधिकार गाजविणाऱ्या शिकवणीद्वारा केले. त्यांनी स्वतःच्या स्वभावाने त्यांच्या शत्रूंना मित्र बनविले, दया व अनुकंपेने मनं मऊ बनविली. न्याय व न्यायनिष्ठ शासन केले. सत्यतेपासून तसूभरसुद्धा दूर गेले नाही. युद्धासमयीसुद्धा कुणाशीही विश्वासघात केला नाही की, प्रतिज्ञाभंग केला नाही. कट्टर शत्रुंशीसुद्धा त्यानी कधीही अत्याचारपूर्ण व्यवहार केला नाही.

जे त्यांच्या रक्ताचे तहानलेले होते, त्याच शत्रुंनी त्यांच्यावर दगडमार केली, देशत्याग करण्यास विवश केले. पूर्ण अरब देशाला त्यांच्याविरुद्ध उभे केले आणि शत्रुत्वांत आंधळे बनून त्यांच्या चुलत्याचे काळीज काढून चावले होते. अशा शत्रुंना विजयप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी क्षमादान केले. त्यांनी कधीही स्वतःसाठी दुसऱ्याशी बदला घेतला नाही.

याशिवाय त्यांच्या आत्मसंयमी व निस्वार्थीपणाचा कळस तेव्हा झाला जेव्हा ते अरब देशाचे शासक बनले. त्या वेळी ते तसेच फकीर बनून राहिले जसे पूर्वी होते. झोपडीत राहत, चटईवर झोपत, जाडेभरडे कपडे नेसत आणि गरिबांप्रमाणे जेवण घेत असत. कधी कधी उपाशी झोपत आणि गरिबांची सतत सेवा करीत असे. ते रात्रभर ईश्वराच्या उपासनेत घालवित, मजुराप्रमाणे काम करीत असत. शेवटपर्यंत त्यांच्यात राजकीय दंभ व श्रीमंतीचा रूबाब व अहंकार निर्माण झाला नाही. ते सर्वसामान्यप्रमाणे लोकांना भेटत व त्यांच्यात मिसळत असत, त्यांच्या सुखदुःखात सामील होत असत. लोकांसमवेत बैठकीत बसण्याची ढब अशी होती की जर कोणी तिऱ्हाईत मनुष्य तिथे आला तर अरब जातीचा नायक व देशाचा शासक नेमका कोणता हे ओळखणे त्याला कठीण जात असे. इतके महान व्यक्तिमत्त्व असूनही एखाद्या क्षुल्लक माणसाशीसुद्धा अगदी बरोबरीचा व्यवहार करीत असे. जीवनभर खडतर परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात कसलीही कुचराई ती व्यक्ती करीत नाही. इतके करूनही स्वतःसाठी काही शिल्लक ठेवीत नाही. आपली सर्व मालमत्ता समाजाला दान करतो. अनुयायींवर स्वतःच्या संततीचे कसलेही हक्क ठेवले नाहीत. स्वतःच्या संततीला जकात स्वीकारण्याच्या हक्कापासून केवळ यासाठीच वंचित ठेवले की, न जाणो भविष्यात जकातची सर्व रक्कम त्याच्या संततीलाच दिली जाऊ लागेल.

मानवतेवर व्यापक प्रभाव
अशा या महान व्यक्तीने घडविलेले चमत्कार अद्याप संपलेले नाहीत. तिच्या महानतेचा नीटपणे अंदाज येण्यासाठी संपूर्ण विश्वावर एक नजर टाकू या. तुम्हाला असे दिसून येईल की, चौदाशे वर्षापूर्वीच्या काळोखमय युगात अरबस्तानातील रूक्ष वाळवंटी प्रदेशात जन्मलेला तो निरक्षर वाळवंटनिवासी; वास्तविकपणे नवयुगप्रवर्तक व संपूर्ण जगाचाच नेता आहे. त्याचे नेतृत्व त्याला नेता मानणाऱ्यांपुरतेच मर्यादित नसून न मानणाऱ्यांनाही ते लागू आहे. ज्यांना हे ज्ञान नाही की, ज्याच्याविरुद्ध ते बोलतात त्याचे मार्गदर्शन कशा प्रकारे त्यांच्या विचारसरणीत व भावना विश्वात आणि त्यांच्या जीवन सिद्धांतात, आचारसंहितेत आणि त्यांच्या आधुनिक युगाच्या आत्म्यामध्ये विलीन झालेले आहेत.

याच व्यक्तीने जगातील संकल्पना, धारणा व विचार प्रवाहाला भ्रम, अंधविश्वास, विलक्षणप्रियता व वैराग्यापासून मुक्ती देऊन बुद्धीवाद, यथार्थप्रियता व पवित्र भौतिक जीवनाकडे वळविले आहे. डोळ्यांनी दिसणाऱ्या चमत्कारांची मागणी करणाऱ्या या जगाला त्यानेच बौद्धिक चमत्कारास समजणे व त्यास सत्याची कसोटी मान्य करण्याची अभिरूची निर्माण केली. त्यानेच अनैसर्गिक गोष्टीत ईश्वराच्या ईशत्वाची चिन्हे शोधणाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्यांना निसर्गात ईशचिन्ह(Natural Phenomena) पाहण्यास शिकविले. अनुमान व कल्पनाविलासी वृत्तीला त्यागून बुद्धी, विचार, निरीक्षण व संशोधनाचा मार्ग दाखविला. त्यानेच बुद्धी, अनुभव व अंतर्ज्ञानाच्या विशिष्ट सीमा मनुष्याला दाखवून दिल्या. भौतिकवाद व अध्यात्मवादामध्ये ताळमेळ बसविला आणि धर्माशी ज्ञान व कर्माचा आणि ज्ञान व कर्माशी धर्माचा संबंध स्थापित केला. धर्मशक्तीपासून जगात ‘साइंटिफिक स्पीरिट’(Scientific Spirit)आणि ‘साइंटिफिक स्पीरिट’ पासून शुध्द धर्मवाद निर्माण केला. त्यानेच अनेकेश्वरत्व (शिर्क) व मूर्तिपूजेचा पाया उखडून टाकला आणि ज्ञानशक्तीने एकेश्वरत्वाचा (तौहीद) विश्वास असा मजबूतपणे स्थापित केला, ज्यामुळे अनेकेश्वरवादी (मुशरीक) व मूर्तिपूजकांचा धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा रंग ग्रहण करण्यास विवश बनला. त्यानेच नैतिकता व आध्यात्मिकतेच्या मौलिक धारणा बदलून टाकल्या. जे लोक वैराग्य (संन्यास) व इच्छादमन कार्यास विशुद्ध नैतिकता समजून होते; ज्यांच्या दृष्टिकोनातून मन व शरीराचा हक्क देण्यात व सांसारिक जीवनात भाग घेतल्याने आध्यात्मिक उन्नती तसेच मुक्ती प्राप्त होणे अशक्य प्राय आहे; अशांना त्यानेच नागरिकता, समाज व भौतिकतेच्या मध्ये नैतिकतेची श्रेष्ठता, आध्यात्मिक विकास, मुक्ती प्राप्तीचा मार्ग दाखविला. मग तोच आहे ज्याने मनुष्याला त्याच्या वास्तविक मूल्याचे ज्ञान करून दिले. जे लोक भगवान, अवतार व ईश्वर पुत्राशिवाय कोणालाही मार्गदर्शक आणि नेता मान्य करण्यास तयार नव्हते, त्या लोकांना त्यानेच दाखवून दिले की मनुष्य आणि तुमच्याचसारखा मनुष्य स्वर्ग राज्याचा प्रतिनिधी आणि ईश्वराचा प्रतिनिधी (खलीफा) होऊ शकतो. जे लोक प्रत्येक सामर्थ्यवानास ईश्वर बनवून टाकीत होते, त्यांना त्यानेच समजाविले की मनुष्य हा मनुष्यच आहे, इतर काहीही नाही. कोणीच पवित्र शासक व पालक बनून जन्माला आला नाही आणि कुणीही अपवित्रता, पराधीनता व दासतेने जन्मतःच डागाळलेला नाही. या शिकवणीमुळे जगात मानवी एकता, समानता, स्वाधिनता तसेच जनतंत्राच्या विचारप्रणालीचा मार्ग प्रशस्त झाला.

कल्पनाविश्वातून बाहेर पडून तुम्हाला या निरक्षर व्यक्तीच्या नेतृत्वाची व्यावहारिक फलनिष्पत्ती जगाच्या जीवनव्यवहारात, विधी-नियमात अतिप्रमाणात दिसून येते.

नैतिकता, सभ्यता, शिष्टाचार, स्वच्छता, पावित्र्याचे अनेक असे नियम आहेत जे त्याच्या शिकवणीत उगम पावून जगभर फैलावले आहेत. सामाजिक नियम जे त्याने बनविले, त्यांचा लाभ जगाने पुरेपूर घेतला आहे आणि आजसुद्धा घेत आहे. अर्थनीतीविषयीच्या ज्या सिद्धान्ताची शिकवण त्याने दिली, त्यापासून जगात अनेक आंदोलनांनी जन्म घेतला आणि आजसुद्धा होत आहेत. शासनाविषयी ज्या पद्धतींचा त्याने स्वीकार केला त्यापासून जगात राजकीय दृष्टिकोनात क्रांती घडून आली आणि होत आहे. न्याय-विधीचे जे सिद्धान्त त्याने बनविले होते, त्याद्वारा जगातील न्याय-विधी क्षेत्र अतिप्रभावित झाले आहे. युद्ध, करार व आंतरराष्ट्रीय सबंधाविषयीची सभ्यता ज्या व्यक्तीने व्यवहारात जगात स्थापित केली, तो तर अरबचा एक निरक्षर व्यक्ती आहे. जगाला पूर्वी हे तर माहीतच नव्हते की युद्धाची एक सभ्यता असते आणि देशादेशांमध्ये मानवी आधारावर (Common Humanity) संबंध दृढ होणे शक्य आहे.

मानवी इतिहासाच्या पार्श्वभूमीत या आश्चर्यकारक व्यक्तीचे उच्च व महान व्यक्तिमत्त्व उच्चतर दिसून येते की सुरवातीपासून आजपर्यंत जितके महान नेते होऊन गेलेत, त्या सर्वांचे व्यक्तिमत्त्व या व्यक्तित्वासमोर खुजे पडते. जगातील कोणताच नेता असा नाही ज्याच्या पूर्णत्वाचा प्रकाश मानवी जीवनाच्या सर्वांगावर पडलेला आहे. कोणी धारणा व सिद्धान्ताविषयीचा सम्राट आहे तर त्याला व्यावहारिक सामर्थ्य प्राप्त नाही. कोणी कर्मांचा पुतळा आहे, मात्र विचारसरणीत तो कोरा आहे. कोणाचे चमत्कार राजनीतीपर्यंत मर्यादित आहेत तर कोणी फक्त सामरिक प्रतीक आहे. एखाद्याची नजर सामाजिक जीवनाच्या एका क्षेत्रावर प्रभाव ठेवून असते तर दुसरी क्षेत्रे मात्र दुर्लक्षित असतात. कोणी नैतिकता व आध्यात्मिकतेलाच घेऊन बसले आणि राजनैतिक व आर्थिक क्षेत्राला विसरून बसले. कोणी याउलट राजनैतिक आर्थिक विषयाला घेतले आणि आध्यात्मिक व नैतिक क्षेत्राची उपेक्षा केली. सारांश इतिहासात प्रत्येक ठिकाणी अपूर्ण हिरो (नेता) दिसून येतो परंतु मानवी इतिहासात हे एकमेव व्यक्तिमत्त्व असे आहे जे सर्वगुणसंपन्न आहे. तो स्वतः एक तत्त्वज्ञानी आहे आणि स्वतःच्या तत्वज्ञानाला व्यावहारिक जीवनात प्रत्यक्षात आणणारासुद्धा आहे. तो सेनानायक, राजनीतिज्ञ, कायदे बनविणारा, नैतिकतेची शिकवण देणारा आणि धार्मिक व आध्यात्मिक नेतासुद्धा आहे. त्याची दृष्टी मानवी जीवनाच्या सर्वांगावर पडते आणि सूक्ष्म गोष्टीपर्यंत जाते. खाण्यापिण्याचे नियम आणि शारीरिक स्वच्छेतेपासून ते आंतरराष्ट्रीय विषयापर्यंत त्याचे आदेश लागू होतात. तो स्थायी सभ्यतेचा निर्माता आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये असे वास्तविक संतुलन निर्माण करतो ज्यामुळे कुठेच अधिकता, अपूर्णता, न्युनता दिसून येत नाही. काय जगात कोणी दुसरा मनुष्य अशा व्यापक गुणवैशिष्ट्यांचा तुमच्या नजरेत आहे?

तुम्ही स्वतः जेव्हा अमुक एक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे स्पष्टपणे ओळखता तेव्हा त्याच्या सांगण्याचा स्वीकार करणे, त्याच्या आज्ञांचे पालन करणे व त्याच्या पद्धतीचे अनुकरण करणे आवश्यक ठरते. एखाद्या माणसाला प्रेषित तर मानायचे व त्याचे सांगणे मात्र ऐकावयाचे नाही. हे बुद्धीला पटत नाही कारण त्याला प्रेषित मानण्याचा अर्थ असा की, तो जे काही सांगत आहे ते सर्व तो ईश्वराच्या वतीने सांगत आहे व जी काही कृती करीत आहे ती ईश्वरेच्छेनुसारच करीत आहे. आता त्याच्याविरुद्ध तुमची उक्ती व कृती ही ईश्वराविरुद्ध ठरेल व जी गोष्ट ईश्वराविरुद्ध असेल ती कदापि सत्यावर व न्यायावर अधिनिष्ठित असू शकत नाही. म्हणून एखाद्याला प्रेषित मानल्यानंतर ही गोष्ट अनिवार्य ठरते की, त्याचे सांगणे कसलीही शंकाकुशंका न बाळगता स्वीकारण्यात यावे व त्याच्या आदेशा पुढे नतमस्तक व्हावे. मग उद्देश व त्यामागील होणारा लाभ, तुम्हाला कळो वा न कळो. जे प्रेषिताकडून सांगितले गेले ते प्रेषितांकडून असणे हीच बाब सत्य असण्याचा पुरावा आहे. त्यात सर्व तत्त्वदर्शिता व हितकारक उपदेश सामावलेले असते. एखाद्या गोष्टीचे तुम्हाला आकलन होत नसेल तर दोष त्या गोष्टीचा नसून तुमच्या आकलनशक्तीचा आहे.

जो मनुष्य एखाद्या कलेत अथवा विद्येत पारंगत नाही, तो त्या कलेतील बारकावे जाणू शकत नाही, ही गोष्ट उघड आहे. जर असा मनुष्य त्या कलेत पारंगत असलेल्या व्यक्तीचे म्हणणे केवळ एवढ्यासाठीच मान्य करीत नसेल की, त्याला आकलन होत नाही तर असा मनुष्य किती मूर्ख असेल? जगातील प्रत्येक कार्यक्षेत्रात विशेषज्ञांची गरज असते आणि विसेषज्ञांकडे रुजू झाल्यावर त्याच्यावर श्रद्धा ठेवली जाते व त्याच्या कार्यात कसलीही ढवळाढवळ केली जात नाही. कारण सर्व माणसे सर्व प्रकारच्या कार्यात तज्ञ असू शकत नाहीत व सर्वकाही ते जाणू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा व चातुर्याचा वापर एक सर्वोत्तमसाठीच करावयास हवा. एक सर्वोत्तम तज्ञ शोधून काढा. एखाद्या व्यक्तीसंबंधी तुम्हास खात्री झाली की तो विशेषज्ञ आहे, तर त्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावा लागेल. मग त्याच्या कर्मात हस्तक्षेप करणे व प्रत्येक बाबीसंबंधी असे म्हणणे की आधी आम्हाला ते समजून सांगा नाहीतर आम्ही मान्य करणार नाही, असे वागणे हा शहाणपणा नसून शुद्ध मूर्खपणा आहे. एखाद्या वकिलास आपला खटला सुपूर्द केल्यावर त्याच्याशी एखाद्या मुद्यावर हुज्जत घातल्यास तुम्हाला त्याच्या कार्यालयातून तो बाहेर घालवून देईल. तसेच एखाद्या डॉक्टरला त्याने दिलेल्या औषधातील प्रत्येक घटकाबद्दल खुलासा विचारला तर तो तुमचा औषधोपचार बंद करील. असाच प्रकार धर्माबाबतही आहे. तुम्हाला ईश-ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे,

हे तुम्ही जाणू इच्छिता. स्वतः तुमच्याकडे या सर्व गोष्टी जाणून घेण्याचे साधन नाही. तेव्हा आता तुमचे हे कर्तव्य ठरते की, तुम्ही ईश्वराच्या खऱ्या प्रेषिताचा शोध घ्यावा. या शोधकार्यात तुम्हाला अत्यंत चातुर्याने व समंजसपणे वागावे लागेल, कारण जर तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाची निवड केलीत तर तो तुम्हाला चुकीच्या वाटेने नेईल. परंतु सर्व प्रकारचा शोध केल्यावर तुमची अशी खात्री झाली की, अमुक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे तर त्याच्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावयास हवा व त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावयास हवे.

प्रेषितांवर ईमान धारण करण्याची आवश्यकता
ईश्वरातर्फे प्रेषित जो मार्ग दाखवितो. तोच इस्लामचा सत्य व सरळ मार्ग आहे, हे तुम्हाला कळले आहे. आता तुम्ही स्वतःच हे समजू शकला की, प्रेषितांवर ईमान धारण करणे व त्यांच्या आज्ञेचे पालन व अनुकरण करणे सर्व मानवजातीला अनिवार्य आहे. जो मनुष्य प्रेषिताचा मार्ग सोडून स्वतःच्या बुद्धीनुसार मार्ग अनुसरतो, तो निश्चितपणे मार्गभ्रष्टच आहे.

याबाबतीत लोक अनेक प्रकारच्या विचित्र चुका करतात. काही लोक असे आहेत की, ते प्रेषितांची सत्यनिष्ठा मानतात, परंतु त्यावर ते ईमान धारण करीत नाहीत. तसेच त्यांचे आज्ञापालन करीत नाहीत. हे नुसते ‘श्रद्धाहीन’ (काफिर) नसून मूर्खही आहेत. कारण की प्रेषिताला खरा मानल्यानंतर त्यांची अवज्ञा करणे याचाच अर्थ असा होतो की असा मनुष्य जाणूनबुजून असत्याचा मार्ग अनुसरतो. यापेक्षा मोठी घोडचूक असू शकत नाही, हे उघड आहे.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्हास प्रेषितांचे अनुकरण करण्याची आवश्यकताच नाही. आम्ही आपल्या स्वयंबुद्धीने सत्याचा मार्ग जाणून घेऊ. हीसुद्धा एक मोठी चूक आहे. तुम्ही भूमितीचा अभ्यास केलेला आहे. तुम्हास हे माहीत आहे की एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकच सरळ रेषा असू शकते. तिच्याव्यतिरिक्त जितक्या रेषा असतील त्या एकतर वाकड्या असतील किंवा त्या दोन्हीबिंदूशी मिळणाऱ्या नसतील. अशीच वास्तवता सत्यमार्गाचीही आहे, ज्याला इस्लामच्या भाषेत ‘‘सिराते-मुस्तकीम’’ म्हणजे सरळ मार्ग असे म्हटले जाते. हाच मार्ग मनुष्यापासून प्रारंभ पावून ईश्वराप्रत जातो व भूमितीच्या या सिद्धांताप्रमाणेच तोसुद्धा एकच मार्ग असू शकतो. त्याच्याखेरीज जितके मार्ग असतील ते एकतर वेडेवाकडे असतील किंवा ते ईश्वरापर्यंत न पोहचणारे असतील. आता विचार करा की जो सरळ मार्ग आहे तो तर प्रेषिताने दाखवून दिला आहे व त्याशिवाय अन्य कोणताही सरळ मार्ग होऊच शकत नाही. हा मार्ग सोडून जो मनुष्य स्वतःच दुसरा मार्ग शोधील त्याला खालील दोन अवस्थांपैकी एक अवस्था अनिवार्यपणे प्राप्त होईल. एकतर त्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्गच सापडणार नाही. दुसरा जर सापडलाच तर तो अतिशय लांब व वक्र असा असेल. ती सरळरेषा असणार नाही तर ती अतिवक्र रेषा असेल. पहिल्या अवस्थेत तर त्याचा सर्वनाश उघड आहे. उरली दुसरी अवस्था तर तीसुद्धा निस्संशयपणे मूर्खपणाचीच असेल. निर्बुद्ध जनावरसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वक्र मार्ग सोडून सरळ मार्गानेच जातो. मग अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याला ईश्वराचा एक सदाचरणी दास सरळमार्ग दाखवित असताना तो म्हणतो की ‘‘मी तुम्ही दाखविलेल्या मार्गाने जाणार नाही व स्वतःच वेड्यावाकड्या मार्गाने भरकटत जाऊन मी माझे इच्छित स्थानापर्यंत पोहोचेन.’’

तुम्ही खोलवर विचार केल्यास कळून चुकेल की जो कोणी प्रेषितावर ईमान धारण करण्याचे नाकारतो त्याला ईश्वराप्रत पोहचण्यास कोणताही मार्ग सापडू शकत नाही, सरळ मार्गही नाही व वाकडाही नाही. कारण असे की, जो मनुष्य सत्यनिष्ठ व सदाचारी मनुष्याचे म्हणणे स्वीकारण्याचे व मान्य करण्याचे नाकारतो त्याच्या मस्तकात काही दोष नक्कीच असतो ज्या कारणाने तो सत्यापासून तोंड फिरवतो. त्याची बुद्धी व समंजसपणा दोषयुक्त असेल किंवा त्याच्या मनात अहंकार भरलेला असेल वा त्याचा स्वभावधर्म इतका वक्र असेल की तो सत्य व सदाचाराच्या गोष्टी स्वीकारण्यास तयारच होणार नाही. तो पूर्वजांच्या रूढीचे अंधानुकरण करणारा असेल व ज्या काही असत्य गोष्टी रूढींच्या स्वरूपात पूर्वापार चालत येत असतात त्याविरुद्ध कसलेही ऐकून घ्यायला तयार नसेल. तो आपल्या इच्छा वासनांचा दास असेल आणि प्रेषितांच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास यासाठीच नकार देत असेल की स्वीकार केल्यानंतर बेकायदेशीर गोष्टी व पापकर्म करण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरणार नाही. वर उल्लेखलेल्या सर्व बाबींपैकी एखादा जरी दुर्गुण कोणा माणसांत असेल तर त्याला ईश मार्ग सापडणे केवळ अशक्यप्राय आहे. एक खरा सदाचरणी व तटस्थ वृत्तीचा भला मनुष्य एका सच्चा प्रेषिताच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास नकार देईल, हे अशक्य आहे.

प्रेषित ईश्वराने पाठविलेले असतात व ईश्वराचाच असा आदेश आहे की, त्यांच्यावर ईमान धारण करा व त्यांच्या आज्ञा पाळा. असे असतांना जर कोणी प्रेषितावर ईमान धारण केले नाही तर ते ईश्वराविरुद्ध बंड ठरते. तुम्ही ज्या राज्यातील प्रजा असाल त्यातील राजाने नियुक्त केलेल्या शासकांनाही तुम्हास मान्य करावे लागेल. जर तुम्ही त्याला शासक मानावयास नकार दिला तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही खुद्द राजाज्ञेविरुद्ध बंड पुकारले. राजाला मानायचे व राजाने नियुक्त केलेल्या शासकास मानायचे नाही, या दोन्ही परस्पर विरोधी व विसंगत गोष्टी आहेत. ईश्वर व त्याने पाठविलेल्या प्रेषिताचेही उदाहरण याच प्रकारचे आहे. ईश्वर सर्व मानवजातीचा वास्तविक सम्राट आहे. ज्या माणसाला त्याने मानवजातीच्या उपदेशार्थ व मार्गदर्शनार्थ पाठविले व ज्याच्या आज्ञापालनाचा आदेश दिला, त्याला प्रेषित मानणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरते. इतर सर्व गोष्टींचे अनुकरण व आज्ञा पाळण्याचे सोडून देऊन केवळ त्याचीच आज्ञा पाळावयास हवी. त्यांच्यापासून तोंड फिरवणारा मग तो ईश्वरास मानणारा असो की न मानणारा कोणत्याही अवस्थेत तो ‘श्रद्धाहीन’च (काफिर) आहे.

माननीय इब्ने अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापाशी सकाळच्या प्रहरी बसलो होतो. इतक्यात काही लोक अंगावर कांबळें लपेटून हातात तलवार घेऊन आले. त्यांच्या शरीराचा बहुतांश भाग विवस्त्र होता आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक मुजर कबिल्याचे होते, म्हणजे जवळपास सगळेच मुजरी होते. त्यांचे दारिद्र्य आणि  गरिबी पाहून पैगंबरांचा चेहरा चिंतेमुळे पिवळा पडला. मग पैगंबर घरात गेले आणि बाहेर येऊन बिलाल (रजि.) यांना अजान देण्याचा आदेश दिला. (नमाजची वेळ झाली होती.) तेव्हा  बिलाल (रजि.) यांनी ‘अजान’ आणि ‘तकबीर’ (नमाज सुरू होण्यापूर्वी ‘अल्लाहु अकबर’ म्हणणे) चे पठण केले. पैगंबरांनी नमाजचे नेतृत्व केले आणि नमाजनंतर भाषण दिले, त्यात  पैगंबरांनी ‘सूरह निसा’ची पहिली आयत आणि ‘सूरह हश्र’च्या शेवटच्या ‘रुकूअ’मधील (चरणातील) पहिली आयत पठण केली. त्यानंतर म्हणाले, ‘‘लोकांनी अल्लाहच्या मार्गात सदका  (दान) द्यावे, दीन द्यावे, दिरहम द्यावे, कपडे द्यावेत, दोन शेर गहू द्यावेत, दोन शेर खजूर द्यावेत.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘इतकेच नव्हे तर एखाद्याकडे खजुराचा अर्धा तुकडा जरी  असेल तरी तो द्यावा.’’ भाषण ऐकल्यानंतर अन्सारांपैकी एक मनुष्य आपल्या हातात एक पिशवी घेऊन आला जी त्याच्या हातात मावतही नव्हती. मग लोकांनी एकापाठोपाठ एक  सदका (दान) देण्यास प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर मी धान्य आणि कपड्यांचे दोन ढीग पाहिले. लोकांनी अशा पद्धतीने सदका दिल्याचे पाहून पैगंबरांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा  दिसू लागल्या, जणू चेहऱ्यावर सोन्याचे पाणीच लावण्यात आले आहे. मग पैगंबरांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाममध्ये एखादी चांगली पद्धत सुरू करील त्याला त्याचा बदला मिळेल  आणि जे लोक या चांगल्या पद्धतीचा नंतर अवलंब करतील त्यांनाही त्याचे पुण्य मिळेल आणि काम करणाऱ्यांच्या बदल्यामध्ये घट केली जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्याने इस्लाममध्ये  एखाद्या वाईट पद्धतीची सुरूवात केली त्याला त्या पापाची शिक्षा मिळेल आणि नंतर त्याचे अनुकरण करणाऱ्यांचे पापदेखील त्याच्याच कर्मपत्रात लिहिले जाईल. तसेच अनुकरण  करणाऱ्यांचे पापांमध्ये काहीही घट केली जाणार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : इस्लामच्या दोन मूलभूत शिकवणी आहेत- पहिले एकेश्वरत्व आणि दुसरे अल्लाहच्या भक्तांपैकी गरीब व गरजवंतांवर कृपा व दया करणे. याच कारणास्तव पैगंबर  मुहम्मद (स.) यांचा चेहरा चिंतेने पिवळा पडला आणि जेव्हा त्यांच्यासाठी (गरीब व गरजवंतांसाठी) कपडे व अन्नधान्याची व्यवस्था झाली तेव्हा पैगंबरांचे मुखकमल सोन्यासारखे चमकू  लागले. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या भाषणात ‘सूरह निसा’ची पहिल्या आयतीचे पठण केले, त्याचा अर्थ असा आहे- ‘‘लोकहो, आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला  एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’  (कुरआन,४:१)
या आयतमध्ये अल्लाहने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक ‘वहदत-ए-इलाह’ आणि दुसरी ‘वहदत-ए-बनी आदम’. ‘वहदत-ए-इलाह’चा अर्थ आहे फक्त अल्लाह उपासना व  आज्ञाधारकतेचा हक्कदार आहे, यालाच ‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणतात. ‘वहदत-ए-बनी आदम’चा अर्थ आहे सर्व मानव एकाच माता-पित्याची लेकरे आहेत, म्हणून त्यांच्यादरम्यान कृपा  व दयेवर आधारित वर्तणूक व्हायला हवी. त्या गरिबांना पाहून सदका (दान) देण्यासाठी आवाहन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे या आयतीचे पठण स्पष्टपणे या गोष्टीकडे निर्देश  करते की समाजातील गरिबांची मदत न करणे अल्लाहचा क्रोध व रागाचे कारण बनते. 
तसेच ‘सूरह हश्र’ची जी आयत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पठण केली आहे त्याचा अनुवाद असा आहे, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि  प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत राहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी  तुम्ही करता.’’ (कुरआन,५९:१८) या आयतीचे पठण करून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या गोष्टीकडे इशारा केला आहे की गरिबांवर जी संपत्ती खर्च केली जाते ती मनुष्यासाठी  परलोकात संचय होतो, ती नष्ट होत नाही. ज्या मनुष्याने सर्वांत अगोदर सदका (दान) केले होते त्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्तुती केली आहे आणि म्हणाले, ‘‘त्याला त्याच्या  ‘सदका’चेही पुण्य लाभेल आणि त्याला पाहून इतर लोकांमध्येही सदका देण्याची भावना जागृत झाली त्याचाही बदला त्याला मिळेल.’’ 

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. पण ही शांती फक्त मर्यादित कुठल्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, किंवा घराण्यासाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे. इस्लाम हा  असा एकमेव धर्म आहे ज्यात अनेकेश्वरवादाला थारा नाही. जसे एक सुर्य, एक चंद्र, एक पृथ्वी तसेच एकच ईश्वर. इस्लाममध्ये जरी वेगवेगळ्या जाती, पंथ असल्या तरी सर्वांची  शिकवण एकेश्वरवादाचीच आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह’ म्हणजेच अल्लाह एक आहे व मुहम्मद सलअम् अल्लाहचे प्रेषित आहेत. हा इस्लामचा मुख्य पाया आहे.
मनुष्य त्याची दैनंदिन जीवनशैली जगत असताना एका विशिष्ट चौकटीत जगत असतो. प्रत्येक गोष्टीत, कामात तो काही नियमांचे पालन करत असतो. 
त्याचप्रमाणे ज्याने मानवाला  या सृष्टीला निर्माण केले त्या विधात्याने मनुष्याला एक जगण्याची कला शिकवली. काही नियम त्याच्या भल्या साठी लागू केले. त्या इस्लामी नियमानुसार जर मनुष्य जगत असेल तर खरोखरच त्याचे जीवन आनंदमयी व सुखकारक ठरेल. इस्लाम अत्यंत सोपा, सर्वांना पटेल, रूचेल आणि जीवनात आनंद आणणारा धर्म आहे.  इस्लामची इमारत मूळ पाच स्तंभांवर आधारलेली आहे. हे स्तंभ म्हणजे एकेश्वरवाद, नमाज, रोजा, जकात आणि हज. या पाच स्तंभांपैकी एक जरी स्तंभ मनुष्याच्या आयुष्यातून  ढासळत असेल तर त्या व्यक्तीचा धर्म अधुराच म्हणाव लागेल. 
‘तौहीद’ म्हणजे एकेश्वरवाद. फक्त एकच ईश्वराचा स्वीकार करणे. अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही व कोणीही पुजनीय नाही या गोष्टीवर मनपूर्वक श्रद्धा ठेवने यालाच तौहीद  म्हणतात.
दुसरा इस्लामी स्तंभ आहे ‘नमाज’. इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अल्लाहकडून भेट म्हणुन मिळालेली आहे व प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी नमाज अनिवार्य आहे.  आनंदाची बाब म्हणजे प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या जीवनात नमाजला अनन्य साधारण महत्त्व देतो.

तिसरे इस्लामी कर्तव्य आहे ‘रोजा’. रोजा म्हणजे उपवास. हा रोजा मनुष्याला त्यागाची शिकवण देतो. एक रोजेदार दिवसभर स्वत:ची तहान भूक विसरून पूर्णपणे स्वत:ला अल्लाहच्या  स्वाधीन करतो. रमजान हा असा महिना आहे जो आपल्याला वारंवार अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाग पाडतो. असा हा मंगलमय महिना.

‘जकात’ म्हणजे दान. समाजातील सक्षम लोकांना इस्लाम गरीब व गरजू लोकांना दान देण्याचा आदेश देतो. कोणीही व्यक्ती भुकेला, तहानलेला किंवा निर्वस्त्र राहू नये, निदान त्याच्या  प्राथमिक गरजा तरी लाभाव्यात यासाठी जकात दिली जाते आणि गरजूच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.

शेवटचे इस्लामी कर्तव्य आहे ‘हज’. पण जर कोणाची आर्थिक स्थिती नसेल हज करण्याची तर हज माफ आहे.. इस्लाम हा खूप सोपा धर्म आहे.. तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईकडे  पाहून स्मितहास्य केले तरी हजचे पुण्य पदरात पडले... 
एकंदरीत तथाकथित थोतांड बातम्यावरुन इस्लाम आणि मुसलमान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. दुसऱ्या समाजांसमोर इस्लामचे चित्र खूप वाईट रितीने मांडले जात आहे. पण  इस्लामचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यास लक्षात येते की इस्लाम हा तलवारीच्या जोरावर नव्हे तर सत्य व शांतीच्या जोरावर पसरला आहे. पैगंबर मुहम्मद सलअम् यांनी आयुष्यभर  संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. समाजात बंधुभाव टिकून राहण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या. शेवटी असे म्हणावे वाटते,
‘‘असे प्रेषित होउन गेले
समभावाची शिकवण देऊन गेले!
मानवजातीसाठी सर्व जीवन समर्पित केले!!’’

-अल्फिया तौकीर ईनामदार
अकोला / ७७०९०६२६६६

- डॉ. मॉरिस बुकाले
या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक शास्त्रज्ञांसाठी व सामान्य जनांसाठी एक बहुमूल्य संदेश आहे. कुरआन मनुष्याला बाह्य सृष्टीवर विचार व निरीक्षण करण्याचे आवाहन करतो तर त्यापासून त्याचा उद्देश केवळ अल्लाह फक्त सर्वशक्तीमान आहे. यावर भर देणे आहे. कुरआन काही वैज्ञानिक ग्रंथ नव्हे तर अत्युत्तम व अतुलनिय धार्मिक ग्रंथ आहे.
डॉ. मॉरिस बुकैले म्हणतात, ``सत्याविषयी असलेल्या शोधवृत्तीनेच माझे मार्गदर्शन केले आहे. बायबलचे कथन मात्र वैज्ञानिक दृष्ट्या स्वीकार करण्या योग्य नाही.''

आयएमपीटी अ.क्र. 38   -पृष्ठे - 24     मूल्य - 12          आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक :

- स. जलालुद्दीन उमरी
आजच्या युगात इस्लाम विषयी जे गैरसमज मुद्दाम पसरविले जातात. त्यापैकी एक म्हणजे इस्लामने स्त्रीवर अन्याय केला आहे. इस्लामने स्त्रीला पुरुषाबरोबरीचा दर्जा दिला नाही आणि त्यांच्या धावपळीवर अनेक निर्बंध घातले आहेत परिणामत: त्या जीवनाच्या स्पर्धेत मागे राहतात. इस्लाम स्त्रीला पुरुषाच्या अधिन ठेवतो इ.
परंतु या पुस्तकात लेखकाने स्पष्ट केले आहे की इस्लामनेच सर्व प्रथम स्त्री व पुरुष समान आहेत असा उद्घोष केला. इस्लामच्या दृष्टीने स्त्रीने घराची व पुरुषाने बाहेरची जबाबदारी उचलली पाहिजे. इस्लाम स्त्रीला घरची स्वामिनी व व्यवस्थापक आहे, तिने बाहेरचे जग सुंदर करण्यासाठी स्वत:चे घर ओसाड करू नये. घरची जबाबदारी पेलून मुस्लिम महिलांनी समाजात स्वाभाविक कार्यक्षेत्रात आश्चर्यजनक कामगिरी केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 39              -पृष्ठे - 80                  मूल्य - 30            आवृत्ती - 3 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/5b8mbww9nbd3skf1vudm1tbi9fp916cx


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget