Latest Post

आज भी हो गर बराहीम सा इमां पैदा
आग कर सकती है अंदा़ज-ए-गुलिस्ताँ पैदा
करा ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यातील 12 नामांकित, पंचतारांकित हॉटेल्समध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापे मारून तब्बल सात हजार तरूण-तरूणींना बेधूंद अवस्थेत अटक केली. यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. हा छापा ना पहिला आहे ना शेवटचा. ही सात हजार तरूण मंडळी फक्त 12 हॉटेल्समधील आहेत. याशिवाय इतर हॉटेल्स, धाबे आणि पब मधील तरूण-तरूणी, शिवाय संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण देशात अशा पद्धतीच्या जीवन जगणार्‍यांची संख्या किती असेल याचा अंदाज सुद्धा करता येणार नाही. 
मुंबई पुण्यामध्ये उशीरा रात्रीपर्यंत रेव्ह पार्ट्यांची संस्कृती घट्ट रूजलेली आहे. उशीरा रात्रीपर्यंत जागणे, ड्रग्स घेणे, डान्स करणे, सकाळी उशीरा उठणे हे या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जीवनाला उध्वस्त करणार्‍या या संस्कृतीचा बहुतेक लोकांनी जीवन पद्धती म्हणून स्विकार केलेला आहे. हे असेच आहे जसे विषाला अमृत समजणे. 
  अशा पद्धतीचे जीवन जगणार्‍या लोकांपैकी अनेक लोक असेही आहेत की, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सूर्य उगवतांना पाहिलेला नाही. स्वार्थ, फसवणूक, भ्रष्टाचार, व्याज, अश्‍लीलता, अनैतिकता या व्यवस्थेचे गुण विशेष आहेत. स्पष्ट आहे अशी जीवन पद्धती ज्या लोकांनी अंगिकारली आहे त्यांचे जीवन तणावपूर्ण राहणार आणि जीवनाचा अंत वेदनादायक होणार. अशा जीवन व्यवस्थेमध्ये फक्त तारूण्य आणि सौंदर्याला महत्व असते. लहान मुलं आणि वृद्धांना अशा व्यवस्थेमध्ये स्थान नसते. समाजामध्ये वाढणार्‍या वृद्धाश्रमांची संख्या या गोष्टीचा पुरावा आहे. इस्लाम पूर्व काळात सुद्धा बहुतांशी लोकांनी अशीच भ्रष्ट व अनैतिक जीवन पद्धती अवलंबिलेली होती. 
जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पृथ्वीतलावरील लोक जरी बदलत असले, जुने जाउन नवीन येत असले, तरी त्यांची मूळ प्रवृत्ती बदलत नाही. आंधळ्या माणसाचा हात धरून त्याला रस्ता पार करण्यासाठी मदत करणे हे आज पासून 10 हजार वर्षापूर्वी सद्वर्तन होते, आजही सद्वर्तन आहे आणि  अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या सूर्योदर्यापर्यंत सद्वर्तन राहील. भ्रष्ट आचरण आजपासून 10 हजार वर्षापूर्वी वाईट कृत्य होते, आजही वाईट कृत्य आहे आणि अंतिम निवाड्याच्या सूर्योदयापर्यंत ही वाईट कृत्यच राहणार. काही गोष्टी कालातीत असतात. काळाबरोबर त्या बदलत नसतात. माणसांची प्रवृत्ती त्याचपैकी एक आहे. ती कधीच बदलत नाही. म्हणून या प्रवृत्तीचे नियमन करणारे नियम ही बदलत नाहीत. याच कारणाने म्हटले जाते की, इस्लामी जीवन यापन पद्धती ईश्‍वरीय आहे म्हणून त्रुटीशुन्य आहे. म्हणूनच अपरिवर्तनीय आहे. 
माणसांनी पृथ्वीवर सुख समाधाने रहावे या मिशनसाठी अल्लाहने पृथ्वीवर अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी माणसांच्या भ्रष्ट आचरण व अनैतिक प्रवृत्तीवर अंकुश ठेऊन आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच मिशनचा एक भाग म्हणून साडेचार हजार वर्षापूर्वी मक्का शहरामध्ये हजरत इब्राहीम अलै. यांचा जन्म झाला. त्या काळातील विकृत झालेल्या समाजापासून दूर मक्केच्या वाळवंटात , अल्लाहच्या आदेशाने त्यांनी आपली पत्नी हाजरा व लहान बाळ हजरत इस्माईल अलै. यांना सोडून दिले व येथूनच एका नव्या आदर्श समाज रचनेची पायाभरणी झाली. तेथूनच पुढे हजरत इब्राहीम अलै. यांचा वंश वाढला. कालौघात त्याचे दोन कबिले झाले. एकाला बनी इसराईल तर दूसर्‍याला बनी इस्माईल असे म्हणतात. 
अल्लाह को प्यारी है कुर्बानी 
कुठल्याही समाजात मुबलक प्रमाणात असे लोक नेहमीच असतात की जे आपल्या पोषणासाठी समाजातील श्रीमंत लोकांकडे आशेने पाहत असतात. मात्र व्याजाधारित जीवन पद्धतीमध्ये श्रीमंत लोकांची गरीब लोकांसाठी त्याग करण्याची प्रवृत्तीच नष्ट होते. व्याजामुळे माणसं जितकी स्वार्थी बनतात तितकी दुसर्‍या कशानेच बनत नाहीत. म्हणून अशा समाजात गरीब वर्ग श्रीमंत वर्गाचा मनोमन दुःस्वास करत असतो. संधी मिळताच या दुःस्वासाची अभिव्यक्ती हिंसक घटनांमधून होते. मागच्याच आठवड्यात 9 ऑगस्ट रोजी बंदच्या दरम्यान वाळूजच्या एमआयडीसीमध्ये 60 पेक्षा जास्त बंद कारखान्यांमध्ये सामान्य जनतेकडून जी विध्वंसक तोडफोड झाली ते याच दुःस्वासाचे प्रत्यक्ष रूप होते. श्रीमंत आणि गरीबांमध्ये विषमतेचे मूळ कारण व्याजाधारित समाज व्यवस्था आहे. इस्लामच्या मूळ उद्देशापैकी आर्थिक समता हे एक प्रमुख उद्देश आहे. ही आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने दरवर्षी येणार्‍या दोन सणांमध्ये मुस्लिमांना त्याग करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. रमजान नंतर येणार्‍या ईद-उल-फित्रच्या वेळी प्रत्येक साहेबे माल (श्रीमंत) व्यक्तीस गरीबांच्या कल्याणासाठी आपल्या बचतीवर 2.5 टक्के आर्थिक त्याग करावा लागतो. तर ईदुल अजहा च्या वेळी जनावराची कुर्बानी देऊन त्याचे मांस गरीबांना मोफत वाटावे लागते. मात्र ईदुल अजहाचा अर्थ गरीबांना मोफत मांस वाटणे एवढ्यापर्यंतच मर्यादित नाही. मुळात जनावराची कुर्बानी ही रूढ अर्थाने जनावराचा बळी नव्हे तर अल्लाहकडून मागणी आल्यास आपण प्रसंगी स्वतःच्या जीवाची कुर्बानी करण्यास तयार आहोत. या भावनेची ती प्रतिकात्मक अभिव्यक्ती असते. यासाठी इब्राहीम अलै. यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाची म्हणजे इस्माईल अलै. यांची कुर्बानी देण्याचा जो खरा प्रयत्न केला त्याची आठवण म्हणून दरवर्षी ईद-उल- अजहाच्या पर्वामध्ये प्रत्येक साहेबे माल मुस्लिम व्यक्ती जनावराची कुर्बानी करावी लागते. 
येणेप्रमाणे ईद-उल-फित्रला आर्थिक त्याग तर ईद-उल-अजहाला कुठलाही त्याग करण्यास आपण सदैव तयार आहोत याचे प्रात्यक्षिक देऊन मुस्लिमांचे दरवर्षी दोन वेळा प्रशिक्षण केले जाते व त्यांना सातत्याने त्याग करण्यासाठी प्रेरित केले जाते. ह्याच प्रशिक्षणाच्या बरकतीमुळे आज देशातील मुस्लिम समाज सर्वाधिक दारिद्र रेषेखाली असतांनासुद्धा समाजातील श्रीमंत वर्गाकडून केल्या जाणार्‍या आर्थिक त्यागावर जगतो आहे. सरकारची भरीव मदत मिळत नसताना, उलट सापत्न वागणूक मिळत असतानासुद्धा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल हा समाज उचलत नाही, यातच सारे आले. 
सरळ आणि पवित्र जीवनपद्धतीची सातव्या शतकात म्हणजे प्रेषितांच्या काळात जेवढी गरज होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज आज आहे. जागतिक स्तरावर मानव समाजाची ही गरज भागविण्याचे सामर्थ्य फक्त इस्लामी जीवनव्यवस्थेमध्येच आहे. 
जीवनाला जोपर्यंत इस्लामी व्यवस्थेच्या आधीन आपण आणणार नाही तोपर्यंत तणावरहित जीवन जगता येणार नाही. याची कल्पना किमान मुस्लिमांना तरी यावयास हवी. परंतु, माध्यमांच्या सततच्या अपप्रचारामुळे इस्लामी जीवनव्यवस्थे विषयी एवढी नकारात्मक मानसिकता निर्माण झालेली आहे की, मुस्लिमेत्तरांचे तर सोडा अनेक मुस्लिमांचाच या जीवन पद्धतीवर विश्‍वास राहिलेला नाही. अशा ’रौशन खयाल’ (पुरोगामी) मुस्लिमांनी जाणून बुजून इस्लामला फक्त काही ’इबादतींपुरता’ मर्यादित करून बाकी जीवनामध्ये व्याजाधारित भांडवलशाही जीवन पद्धतीचा स्विकार केलेला आहे. हे जेवढे मोठे दुर्देव आहे तेवढेच मोठे आव्हान सुद्धा आहे. स्वतःला इस्लामी म्हणवून घेणार्‍या संस्था, संघटनांना हे आवाहन स्वीकारावे लागेल व एक स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त नैतिक जीवन जगून आदर्श जीवनाचे प्रात्यक्षिक देशबांधवांसमोर मांडावे लागेल. 
समाज हा फार हुशार असतो. कोणता डॉक्टर हुशार आहे? कोणता वकील तज्ज्ञ आहे? कोणत्या हॉटेलमध्ये चांगले जेवण मिळते? हे समाजाला माहित असते. तर कोणती जीवन पद्धती त्यांच्यासाठी हिताची आहे? हे त्यांना समजू शकणार नाही, असे गृहित धरणे म्हणजे स्वतःची फसवणूक करवून घेणे आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ’अ‍ॅडव्हर्सिटी इज द बेस्ट युनिव्हर्सिटी’. याच म्हणीला सार्थ ठरवत भयानक विपरित परिस्थितीमध्ये सुद्धा मक्कामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि त्यांच्या सहाबा रजि. यांनी ज्या प्रकारे आपल्या वाणी आणि वर्तनाने इस्लामचा जो नमुना पेश केला. ठीक तोच नमूना आजच्या विपरित परिस्थितीतही मुस्लिमांना आपल्या वाणी आणि वर्तनाने देशबांवांसमोर पेश करावा लागेल. 
सारांश समाजहितासाठी सातत्याने त्याग करत राहणे हाच उद्देश्य ईद-उल- अजहाचा आहे. बस्स. अल्लाह आपल्या सर्वांना समाजातील गरीब घटकांच्या कल्याणासाठी सातत्याने त्याग करण्याची सद्बुद्धी देओ. आमीन.

- एम.आर.शेख 

इस्लामचे पाच स्तंभ आहेत. इमान (श्रद्धा), नमाज, रोजा, जकात आणि हज. इमान म्हणजे अल्लाह एक असल्याचा व त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. असल्याचा अंतःकरणातून  स्वीकार करणे. यालाच अरबी भाषेमध्ये तौहिदसुद्धा म्हणतात.म्हणतात. शिवाय, यालाच इस्लामचा अव्वल कलमा म्हणजे पहिले वचन म्हणतात. यावरच इस्लामची पूर्ण इमारत उभी  आहे.
जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने अल्लाह एक असल्याचा व त्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. असल्याचा स्वीकार करतो तेंव्हा पुढील चार गोष्टी म्हणजे नमाज, रोजा, जकात आणि हज   
त्याच्यासाठी अनिवार्य होवून जातात.
नमाजला अरबी भाषेमध्ये सलात म्हणतात. नमाजला प्रार्थना सुद्धा म्हटले जाते. नमाजची आत्मा ही प्रार्थना (दुआ) हीच आहे. नमाज दिवसातून पाच वेळेस अनिवार्य करण्यात आलेली आहे. यात शंका नाही की नमाज एकप्रकारची नदी आहे जी माणसाच्या आत्म्याला दिवसातून पाच वेळेस धुवून स्वच्छ करते.
नमाजचा आदेश मुस्लिमांसाठी मिळणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. कोणत्याही अडचणीच्या वेळेस नमाज हीच मुस्लिमांना साथ देत असते. अल्लाहशी जवळीक साधण्याची  नमाजपेक्षा दूसरी सार्थक इबादत नाही.
रोजा या शब्दाला अरबीमध्ये सौम असा पर्यायी शब्द आहे. ज्याचा शब्दकोषीय अर्थ स्वतः होऊन थांबणे असा होतो. रोजा सुद्धा अल्लाहसाठी अत्यंत प्रिय अशी इबादत आहे. म्हणून  म्हटले जाते की, कोणत्याही सद्‌वर्तनाचा बदला इशदूत माणसापर्यंत पोहोचवतात. मात्र रोजा असे एक सद्वर्तन आहे ज्याचा मोबदला अल्लाह स्वतः साधकास देतो. म्हणून रोजा हा शुद्ध  अल्लाहसाठीच आरक्षित असल्याची भावना संपूर्ण मुस्लिम समाजामध्ये आहे. या रोजांच्या माध्यमातून चांगल्या चारित्र्याची निर्मिती अल्लाहला अपेक्षित आहे आणि प्रामणिकपणे रोजा  ठेवल्याने चांगल्या चारित्र्याची निर्मिती होतेच हा सार्वत्रिक अनुभव आहे.
यानंतर जकात ही एक आर्थिक इबादत आहे. श्रीमंतांवर कर लावून त्यापेक्षा गरीबांचे कल्याण साधण्याचे जकात एक सर्वमान्य साधन आहे. सोने जसे तापविल्याने शुद्ध होते तसेच संपत्ती ही जकात दिल्याने शुद्ध होते, अशी मुस्लिम समाजाची मान्यता आहे. जकातमुळे संपत्ती विषयक आकर्षण कमी होते.
व्याजाधारित जीवन व्यवस्थेमध्ये संपत्तीचे आकर्षण मरेपर्यंत संपत नाही. नियमितपणे जकात अदा करणाऱ्या व्यक्तीच्या मनात संपत्तीविषयी अनैसर्गिक आकर्षण निर्माणच होवू  शकत नाही. यात शंका नाही.
वरील इबादतींप्रमाणेच हज सुद्धा एक पवित्र इबादत आहे. हज जीवनातून एकवेळेस पुरेशी आर्थिक तरतूद आणि आरोग्य असणाऱ्या प्रत्येक मुस्लिम स्त्री पुरूषावर अनिवार्य करण्यात आलेले आहे. ही अल्लाहच्या उपासनेची प्राचीन पद्धती आहे. हजचा शब्दकोषीय अर्थ इरादा किंवा निर्णय असा होतो. याचा अर्थ अल्लाहच्या घराच्या दर्शनासाठी आपण रहात असलेल्या पृथ्वीच्या कोपऱ्यापासून मक्कापर्यंत प्रवास करून जाण्याचा इरादा करणे असा आहे. मक्का येथे सध्या अस्तित्वात असलेल्या काबागृहाची रचना हजरत इब्राहीम अलै. यांच्या काळात  झालेली आहे. त्यांनी आपले पुत्र इस्माईल अलै. सलाम यांच्या मदतीने हे बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याला तवाफ असे म्हणतात. हज करण्याची एक  विशिष्ट अशी विधी असते. दरवर्षीच्या ईदुल अजहाच्या काळात हज यात्री मक्कामध्ये गोळा होतात. काबागृह हे पृथ्वीतलावरील अल्लाहचे पहिले घर आहे. यापूर्वी पृथ्वीवर कुठेच  अल्लाहचे घर नव्हते. कित्येक पैगंबरांनी मक्कामध्ये येवून या काबागृहामधे इबादत केलेली आहे. असे जरी असले तरी हजरत इब्राहीम अलै. यांच्यापूर्वीही काबागृह अस्तित्वात होते.  पण कालौघात जीर्ण होवून पडल्यामुळे इब्राहीम (अलै.) यांनी जुन्याच काबागृहाच्या पायावर नवीन काबागृहाची निर्मिती केली. सुरे हज मधे या बांधकामाचा तपशील आलेला आहे.  हजच्या संदर्भात एक रोचक तथ्य असे आहे की, सतत तीन दिवस स्वप्नात पैगंबर हजरत इब्राहीम (अलै.) यांनी आपला एकुलता एक पुत्र हजरत इस्माईल (अलै.) याची कुर्बानी देत असल्याचे दृश्य पाहिले. पैगंबरांचे स्वप्न हे स्वप्न नसून ईश्वराचा इशारा असतो. म्हणून इब्राहीम अलै. यांनी इस्माईल अलै. यांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. तेव्हा त्या आज्ञाधारक  पुत्राने आपल्या पैगंबर पित्याला आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याची विनंती करत आपण कुर्बान होण्यास तयार असल्याचे नि:संशय सांगितले. जेव्हा इब्राहीम अलै. यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या डोळयावर पट्टी बांधून आपल्या प्रिय पुत्राच्या मानेवर सुरी चालविली. तेव्हा क्षणाधार्थ इशदूत तेथे आले आणि त्यांनी त्यांच्या तावडीतून इस्माइल अलै.  सलाम यांना बाजूला करून त्या ठिकाणी दुंबा (मेंढा) ठेवून दिला व सुरी मेंढ्याच्या मानेवर फिरविली गेली. जेव्हा कुर्बानी पुर्ण झाली तेव्हा इब्राहीम अलै. यांनी डोळयाची पट्टी काढली  तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते आश्चर्य चकित जाले तेंव्हा आकाशवाणी झाली की ’’हे इब्राहीम तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. आम्ही अशा  पुण्यवान माणसांची कदर करतो.’’ इब्राहीम अलै. यांची ही कुर्बानी अल्लाहला इतकी प्रिय आहे की, प्रलयाच्या दिवसापर्यंत प्रत्येक सधन मुस्लिम स्त्री पुरूषाला दरवर्षी जनावराची कुर्बानी  देवून इब्राहीम अलै.सलाम यांच्या त्यागाची आठवण राहण्यासाठी अल्लाहने इमानधारकांना आदेशित केलेले आहे.
याच घटनेची आठवण ठेवण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव ’’लबैक अल्लाहुम्मा लब्बैक’’ (हजर आहे मी हजर आहे) म्हणत मक्काकडे दरवर्षी ईदुल अजहाच्या काळात  येतात.
प्रेषित सल्ल. यांनी एकदा फर्माविले की, ’अल्लाहने हजचा स्विकार केला तर हाजीला जन्नतची प्राप्ती होती.’ त्यांनी मुलं, महिला, वृद्ध आणि कमकुवत लोकांच्या हजला जिहादसुद्धा  म्हटलेले आहे. काही लोक खर्चाला भिवून हज करण्यासाठी टाळाटाळ करतात. यावर प्रेषितांनी अस्से म्हंटलेले आहे की ’’हज एक अशी इबादत आहे ज्यामुळे गुन्हे आणि दारिद्रय असे दूर होते जसे भट्टीमध्ये लोखंड किंवा सोने-चांदी तप्त झाल्यानंतर त्यांच्यातील भेसळ दूर होते.’’ जेव्हा हाजी हज करण्यासाठी मक्का येथे पोहोचतात तेव्हा त्यांची मानसिकता पार  बदलून जाते. काबागृहाचे दर्शन होताच त्याला आपल्या घरा-दाराचा, मुला- बाळांचा, आप्त नातेवाईकांचा, आपल्या व्यवसायाचा सर्वांचाच विसर पडतो. त्याचे व्यक्तीत्व काबागृहाच्या  दर्शनाने भारून जाते.
हजला जाणारे हाजी तेथे पोहोचण्यापूर्वीच आपल्या अंगावरील मौल्यवान चीज, वस्तू, भारी कपडे काढून दोन पांढऱ्या चादरी शरिरावर गुंडाळून अगदी याचकासारखे काबागृहासमोर उभे राहतात आणि इबादतीमध्ये तल्लीन होऊन जातात. कोणकोणत्या देशाचा आहे, कोणत्या पदाचा आहे, कोणत्या दर्जाचा आहे, काळा आहे का गोरा आहे, अरब आहे का अजम आहे याचे भान कोणालाच राहत नाही. सगळे एकाच स्तरावर, एकाच दिशेने मार्गक्रमण करत असतात. हजच्या काळात कुठल्याही प्रकारची चैन करता येत नाही. डोक्याचे केस काढून टाकलेले  असतात. महिलांना कुठल्याही प्रकारचा श्रृंगार करता येत नाही. पतीपत्नी जरी असतील तरी या काळामध्ये त्यांना शरिरसंबंध स्थापन करता येत नाहीत. एकंदरित अतिशय केविलवाण्या  स्थितीत काबागृहासमोर हाजी स्वतःला अल्लाहच्या समोर याचकासारखा सादर करतो जणू काही तो अल्लाहसमोर आपली असहाय्यता व्यक्त करत असतो. हजमध्ये प्रत्यक्ष हजर होवून  हाजी अल्लाहचे मोठेपण, त्याची स्तुती करत विशेष इबादत करतो, विशेष नमाज अदा करत असतो. जणूकाही तो आपल्या इमाना (श्रद्धे) चे नविणीकरण करत असतो. या काळामध्ये  कुठलेही वाईट विचार हाजींच्या मनाला स्पर्शसुद्धा करीत नाहीत. काबागृहाचे पवित्र वातावरण कठोरात कठोर मन असलेल्या लोकांनासुद्धा इतके प्रभावित करते की, अशी माणसे सुद्धा  ढसाढसा रडत असतात.हजच्या आवश्यक विधी पूर्ण करून जेव्हा हाजी परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा तो असा शुद्ध होवून जातो जणूकाही त्याने आईच्या उदरातून नुकताच जन्म  घेतलेला आहे. 
हजमध्ये जगभरातील विभिन्न भाषा बोलणारे लोक एकत्रित आलेले असतात. हज एवढे सामाजिक समतेचे दूसरे उदाहरण जगात मिळू शकत नाही. साधारणतः 30 लाख लोक अगदी  शिस्तबद्धपणे दरवर्षी हजच्या इबादतीसाठी मक्का आणि मदिना शहरामध्ये येत आणि जात असतात. एवढ्या मोठ्या जनसमुहामध्ये कुठलेच वाईट कृत्य घडत नाही. ही सुद्धा आश्चर्यजनक गोष्ट म्हणावी लागेल. तरूण स्त्रीला एकटीला हज करता येत नाही. तिला सोबत महेरम (रक्ताचा पुरूष नातेवाईक) सोबत ठेवावा लागतो. हज अनिवार्य झाल्याबरोबर तो  जितक्या लवकर अदा करणे शक्य होईल तिथक्या लवकर अदा करण्यात यावा. विनाकारण उशीर केल्यास ते कृत्य अल्लाहला नाराज करणारे ठरते. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करते  की, अल्लाहने प्रत्येक मुस्लिमाला हज करण्याचे सौभाग्य द्यावे. आमिन 

फेरोज़ा तस्बीह
मिरजोळी, चिपळूण,
रत्नागिरी
9764210789

मानवी जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? त्याची वास्तविक मागणी कोणती? ते सुशोभित व यशस्वी करण्यासाठी उपाययोजना कोणत्या? कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केल्याने जीवनात बहर येऊ शकतो? याचा आपण कधी विचार केला आहे काय? ईश्वराने जग निर्माण केले आणि त्यात मानवास सर्व प्राणीमात्रांत श्रेष्ठ बनविले, हे उघड सत्य आहे. मानवास इतर जीवांच्या तुलनेत विशिष्ट शक्ती व योग्यता प्रदान करून त्याने मानवांवर कृपा केली आहे. त्याने बुद्धीबरोबरच विचार करण्याची व निर्णय घेण्याची शक्तीदेखील प्रदान केली. आचारविचार स्वातंत्र्याचा अधिकार दिला. मानवाने हवे तर चांगले काम करून ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करावी आणि हवे तर वाईट कर्म करून ईश्वराची नाराजी व कोपाचे भागीदार बनावे, याबाबत त्याच्या स्वातंत्र्यात परीक्षादेखील ठेवली. ईश्वराने सांगितलेल्या मार्गाचा मानवाने अवलंब करावा आणि त्याची प्रसन्नता प्राप्त करावी, यातच मानवाचे शहाणपण आहे. ईश्वर मोठा दयाळू आहे. त्याने आपल्या जीवनाकरिता शेकडो साधने निर्माण केली. धरती व आकाश बनविले, सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांची रचना केली, हवा, पाणी इत्यादींचे नियोजन केले, खाण्या-पिण्याच्या अनेक वस्तू बनविल्या. त्याने या सर्वांपेक्षाही मोठा उपकार असा केला की, मानवांचे मार्गदर्शन आणि त्यांना प्रकाशमान सरळमार्ग दाखविण्याकरिता आपले प्रेषित पाठविण्याचा क्रम सुरू केला. हा क्रम अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर समाप्त झाला. कारण दुसरा एखादा प्रेषित येण्याची आवश्यकताच उरली नाही. अल्लाहने मानवांना त्यांच्या जीवनाचा खरा उद्देश सांगण्याकरिता, त्यास सुशोभित करण्याकरिता आणि यशस्वी बनविण्याकरिता ज्या प्रेषितांना पाठविले ते सर्व सत्कर्मी, सद्गुणी व चांगले मानव होते. सर्वांनी मानवांना इस्लामची शिकवण दिली. मानवांना अल्लाहची मर्जी सांगितली. सर्वांनी अल्लाह एक असल्याचा उपदेश दिला. तोच तुमचा व सर्व जगाचा उपास्य आहे. त्याचीच पूजा, उपासना व भक्ती करा. त्याच्याच पुढे नतमस्तक व्हा, त्याच्याचकडे मदतीची प्रार्थना करा आणि त्याच्याच आज्ञांचे पालन करत असताना सत्कर्म व चांगुलपणासह जीवन व्यतीत करा. तुम्ही असे केले तरच त्याचा उत्तम मोबदला मिळेल आणि स्वर्गात स्थान लाभेल, परंतु जर तुम्ही असे केले नाही आणि अल्लाहकडून देण्यात आलेल्या आचारविचार व अधिकार स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले नाही, तर शिक्षा मिळेल आणि नरकात दाखल होण्यास पात्र ठराल. काळ लोटला तसे या शिकवणींना लोक विसरत गेले आणि त्यांच्यात नैतिकता व धारणांसंबंधी दोष निर्माण होत राहिले. अत्यंत कृपाशील व दयावान अल्लाहने मानवांचे दारिद्रय दूर करण्याकरिता आणि त्यांच्या सुधारणा व मार्गदर्शनाकरिता जगाच्या कानाकोपऱ्यात आपले प्रेषित पाठविले. त्यांनी लोकांना अल्लाहच्या मर्जीनुसार मार्गक्रमण करून जीवन व्यतीत करण्याची पद्धत सांगितली.
मानवी सभ्यतेच्या विकासाबरोबरच जनसुविधांचादेखील विकास झाला. परिवहन, दळणवळणासाठी रस्ते निर्माण झाले, ये-जा करण्यासाठी साधने वाढली. जगातील विविध समुदाय आणि प्रांतात राहणाऱ्या मानवांदरम्यान संफ वाढला. जलमार्ग शोधले गेले आणि व्यापाराबरोबरच आचारविचारांची देवाणघेवाण होऊ लागली. मानवी जीवनाचा मुख्य उद्देश काय? त्यांचा सहज स्वाभाविक धर्म कोणता होता आणि आहे? अल्लाहजी मर्जी काय आहे? मानवास निर्माण करण्यामागचा उद्देश कोणता? मानव कशा तऱ्हेने आपल्या पालनकर्त्यांची प्रसन्नता व निकटता प्राप्त करू शकतो? इत्यादी, सर्वकाही जगातील लोकांना संबोधून परखडपणे सांगण्यासाठी जर संपूर्ण जगाकरिता ईश्वरीय जीवनव्यवस्था पाठविली गेली तर ती जगाकरिता पुरेशी होईल, याकरिता हीच वेळ उचित आहे. म्हणूनच सर्वशक्तिमान अल्लाहने आपले एक सर्वोत्तम दास प्रेषित मुहम्मद (स.) यांना अरबस्थानात पाठविले आणि त्यांच्यावर प्रेषितत्वाचा क्रम थांबविला. यात कमालीची विवेकबुद्धी आढळते. अरबस्थानात प्रेषित मुहम्मद (स.) यांना पाठविण्याचे एक कारण असे होते की, अरबस्तान जगातील अशा ठिकाणी आहे जेथून आशिया, युरोप व आफ्रिका सर्व जवळ आहेत. अरबस्थान या सर्वांच्या मधोमध स्थित आहे. येथून संपूर्ण जगाला संबोधित करण्याची सोय होऊ शकते. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना इस्लामची संपूर्ण शिकवण आणि जीवनपद्धती सोपवून अल्लाहकडून पाठविण्यात आलेला त्याचा एकमात्र प्रिय धर्म-इस्लाम जगातील सर्व मानवांना जीवनाचा सरळमार्ग दाखविण्याकरिता पाठविले. मानवांना प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मौल्यवान शिकवण दिली, तीच यापूर्वी आलेल्या प्रेषितांचीदेखील शिकवण होती.
मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो! ज्याने तुम्हाला जन्माला घातले तोच तुमचा खरा स्वामी आहे. त्याचेच दासत्व स्वीकारा. तो एक आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. अल्लाहला सर्व प्रकारचे सामर्थ्य प्राप्त आहे. तुम्ही त्याच्याच आज्ञांचे पालन करा. त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. मीदेखील त्याचाच दास आहे. मी त्याच्याच आदेशांचे पालन करतो. अल्लाहने मला आपला प्रेषित बनविले आहे. ज्या गोष्टींमुळे तो प्रसन्न होतो त्या सर्व गोष्टी त्याने सांगितल्या आहेत आणि ज्या गोष्टी त्याला पसंत नाहीत त्यादेखील त्याने सांगितल्या आहेत. जे लोक मला अल्लाहचा प्रेषित मानतील, त्याने पाठविलेला ग्रंथ (कुरआन) सत्य मानतील आणि अल्लाहने पाठविलेल्या आदेशांचे पालन करतील तेच यशस्वी होतील. जग परीक्षास्थळ आहे. परलोकीय जीवन हेच खरे जीवन आहे. मृत्यूनंतर एक दिवस सर्व मानव पुन्हा जिवंत केले जातील. सर्वजण अल्लाहच्या समक्ष हजर राहतील. जो मनुष्य जगातील जीवनात अल्लाहच्या मर्जीनुसार वागेल, तो त्या जीवनात सदैव सुखात राहील आणि ज्याने अल्लाहच्या आदेशांचे पालन केले नाही त्याच्याकरिता दुःखद यातना आहेत.’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचे आदेश जसेच्या तसे मानवांपर्यंत पोहोचविले आणि स्वतः त्यानुसार जीवन व्यतीत केले. मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि कार्यांचा मानवांवर दीर्घकालीन प्रभाव पडला. जेव्हा प्रेषितांचे जगात आगमन झाले तेव्हा संपूर्ण जगावर अज्ञानता आणि अंधविश्वास याचा अंधकार पसरला होता. लोक आपल्या वास्तविक ईश्वरास विसरले होते आणि अनेक प्रकारचे उपास्य निर्माण केले होते. मानवी सभ्यता विविध कुसंस्कारांमध्ये अडकून बधिर झाली होती. प्रेषितांच्या अनुपम व्यक्तिमत्त्वामुळे मानवाच्या वैयक्तिक तसेच सामाजिक कुसंस्कार व कुप्रवृत्तींचा लोप झाला. मानवाच्या बिघडलेल्या स्वभावात सुधारणा झाली आणि मानवी समाजात नवीन क्रांती व चेतना निर्माण झाली. मस्जिदपासून बाजारापर्यंत, शाळेपासून न्यायालयापर्यंत आणि घरापासून सार्वजनिक स्थळे; सर्व ठिकाणी परिवर्तन आढळू लागले आणि मानवाची चोहोबाजूंनी प्रगती होऊ लागली. तसेच नैतिकता, न्याय व सद्गुणांवर आधारित जीवनाची आधारशिला बसविली गेली. प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्यानंतरचे चार आदरणीय खलीफांच्या कारकिर्दीत असाच आदर्श समाज अस्तित्वात आला होता. असे प्रत्येक काळात शक्य आहे, अगदी आजदेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणी व त्यांनी अवलंबलेल्या पद्धतींचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास हे जग सुख-शांती व कुशलतेचा पाळणा बनू शकते. तसेच मानव इहलोक व परलोकातील यश संपादन करू शकतो. इस्लामद्वारा एक असा स्वस्थ व आदर्श समाज अस्तित्वात येऊ शकतो, जो अत्याचार, अन्याय, उच्च-नीच, भेदभाव, स्पृश्यास्पृश्य आणि शोषण इत्यादी कुप्रथांपासून मुक्त असेल. अट अशी की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणी व त्यांच्या जीवनपद्धतींचे अनुकरण केले जावे.
अल्लाहचे अंतिम प्रेषित आणि महान व्यक्तिमत्त्व प्रेषित मुहम्मद (स.) यांचा मानवी सभ्यतेवर एक मोठा उपकार हादेखील आहे की, त्यांनी मानवांच्या सर्व नाते-संबंधांना मजबूत आधारावर उभे केले. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आणि सर्वांचे अधिकार व कर्तव्य निश्चित केले. याच कारणास्तव प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ज्या इस्लामी राज्याची स्थापना केली, त्यात कसलाही वर्गसंघर्ष व मतभेद नव्हता. त्यात वंशाचा गर्व व पिढीच्या संकुचित दृष्टीचा पूर्णतः अभाव होता. त्यात धनवान-निर्धन, शिक्षित-अशिक्षित सर्व एकमेकांचे भाऊ बनले. त्यात गुन्ह्यांचे प्रमाण अगदी नगण्य होते. लोक एकमेकांवर अत्याचार करणारे, सरकारी संपत्ती व जबाबदारीत अफरातफर करणारे आणि लाच घेणारे नव्हते. प्रत्येकजण एक-दुसऱ्याच्या मदतीला धावत होता. ही खरोखरच एका नवीन जगाच्या पुनर्बांधणीची मोहीम होती. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या २३ वर्षांच्या प्रेषितत्वाच्या जीवनात लाखो मानवांचे जीवन बदलून टाकले. त्यांना पूर्णतः एकेश्वरवादी बनविले आणि त्यांच्यात अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचेही दासत्व कदापि न स्वीकारण्याची सुदृढ भावना विकसित केली. प्रेषितांनी त्यांना एकत्र करून एक नवीन सामाजिक व राजनैतिक व्यवस्था बनविली. त्यांनी या व्यवस्थेचा अवलंब करून संपूर्ण जगास हे दाखवून दिले की, त्यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या तत्त्वांच्या आधारे कशा प्रकारचा आदर्श समाज व जीवन निर्माण होते. इतर जीवनप्रणालींच्या तुलनेत ती जीवनव्यवस्था पवित्र, शुद्ध व कल्याणकारी आहे. या महान कार्यामुळेच प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘जगाचा नेता’ असे म्हटले जाते. त्यांचे हे कार्य कोणा विशिष्ट जाती वा समुदायासाठी नव्हते, तर संपूर्ण मानवजातीकरिता होते. ही मानवतेची संयुक्त अनामत, ठेव असून त्यावर कोणाचा अधिकार कोणापेक्षा कमी वा जास्त नाही. ज्या कोणाची इच्छा असेल तो यापासून लाभान्वित होऊ शकतो. किबहुना प्रत्येकाने याचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. अल्लाहचा ग्रंथ कुरआनमध्ये म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित! आम्ही तर तुम्हाला जगवासियांकरिता कृपा बनवून पाठविले आहे.’’ (कुरआन २१: १०७)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन पूर्णतः इतिहासाच्या प्रकाशात आहे. त्यांची शिकवण व जीवनाच्या बाबतीत आम्ही जे काही जाणू इच्छितो ते जाणू शकतो. त्यांचे वैयक्तिक, सामाजिक व राजनैतिक जीवन स्पष्टपणे उघड आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे जो कोणी खुल्या अंतःकरणाने अध्ययन करील, तो या निष्कर्षाला पोहोचेल की, प्रेषित मुहम्मद (स.) संपूर्ण मानवतेचे हितैषी, उपकारक, उद्धारक आणि पथप्रदर्शक व आदर्श आहेत. त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करून प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुधारू शकते.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनावर संक्षिप्त दृष्टी टाकू या, ज्यामुळे सर्वसामान्य व प्रेषितांच्या दरम्यान कोणते नाते व मधुर संबंध आहे; हे त्यांना स्पष्टपणे कळू शकेल. मुहम्मद (स.) यांचा जन्म अरबस्थानातील प्रसिध्द शहर मक्केत १२ रबीउल अव्वल, सोमवारी इ. स. ५७१ मध्ये प्रतिष्ठित कुरैश घराण्यात झाला होता. जन्माअगोदरच त्यांचे वडील अब्दुल्लाह यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी पालनपोषण केले, मग त्यांच्या निधनानंतर त्यांचे काका अबू तालिब यांनी पालनपोषण केले. मुहम्मद (स.) सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव शांत, आकर्षक आणि विनम्र असल्यामुळे कुटुंबीय व शहरातील लोक त्यांचा आदर करीत. त्यांच्या प्रामाणिकपणाची व सद्गुणांची सर्वत्र चर्चा होऊ लागली. कुरैशचे लोक व्यापारी होते. मुहम्मद (स.) यांचे काका अबू तालिबसुद्धा व्यापार करीत असत. मुहम्मद (स.) १२ वर्षांचे असताना काकांबरोबर व्यापाराच्या निमित्ताने शाम (सीरिया) ला गेले. तरुणपणी व्यवसायाकरिता इतर व्यापाऱ्यांबरोबर माल घेऊन स्वतः जाऊ लागले. मुहम्मद (स.) देवाणघेवाण व धंद्यात अतिशय प्रामाणिक व सत्यवचनी असल्यामुळे लोक त्यांना ‘सच्चा’ व ‘विश्वासू’ या उपाधिसह बोलवीत असत.
त्यांची कीर्ती ऐकून खदीजा नामक एका धनवान विधवेनेदेखील त्यांना व्यापाराचे सामान घेऊन प्रवासास पाठविले. माननीय खदीजा त्यांचे काम, प्रामाणिकपणा व खरेपणामुळे खूपच प्रभावित झाल्या आणि मोठमोठ्या सरदारांच्या लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी विवाहाकरिता आपल्या एका मैत्रिणीद्वारा त्यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव आपल्या काकांच्या अनुमतीने स्वीकारून मुहम्मद (स.) यांनी त्यांच्याशी विवाह केला. विवाहसमयी माननीय खदीजांचे वय ४० वर्षे होते तर मुहम्मद (स.) २५ वर्षांचे होते.
त्या काळच्या सामाजिक कुप्रथा आणि लोकांच्या समस्यांमुळे मुहम्मद (स.) खूपच दुःखी होते. ते मक्केपासून अंदाजे ६ मैलांच्या अंतरावर असलेल्या ‘हिरा’ नामक गुहेत जाऊन अल्लाहचे स्मरण करीत आणि लोकांना संकटमुक्त करण्याची त्याच्याकडे प्रार्थना करीत. त्यांचे वय ४० वर्षे असताना अल्लाहने त्यांना ‘प्रेषितत्व’ बहाल केले. एक दिवस गुहेत मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहकडून ‘ईश्वरी संदेश’ अवतरला आणि भटकलेल्या मानवतेला सरळमार्ग दाखविण्याची आणि ईश्वरी संदेश मानवांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. अल्लाहने मानव कल्याणाकरिता मुहम्मद (स.) यांच्यावर पवित्र ग्रंथ कुरआन अवतरण्याचा क्रम सुरू केला. हा क्रम २३ वर्षांत पूर्ण झाला. अल्लाहकडून ‘ईश्वरी संदेश’ अवतरणे आणि प्रेषित बनविण्याबरोबरच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचा धर्म-प्रचाराचा कालखंड सुरू होतो. अल्लाहच्या आदेशानुसार ते मानवांच्या मार्गदर्शनाचे कार्य करीत राहिले. समाजातील स्वार्थी व सत्ताधारी लोकांनी त्यांचा जोरदार विरोध केला. सज्जन व उपेक्षित लोकांनी त्यांच्या शिकवणींचा स्वीकार केला आणि मुस्लिम बनले. मुहम्मद (स.) व त्यांच्या सहकाऱ्यांवर मक्केतील दुष्ट लोकांनी ना-ना प्रकारचे अत्याचार केले.
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सत्यधर्माचे आमंत्रण आणि प्रचार-प्रसाराचे कार्य निर्भीडपणे सुरूच ठेवले. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत अल्लाहचा संदेश पोहचविला. ते लोकांना अल्लाहच्या उपासनेकडे बोलवीत, त्याच्या एकत्वाची शिकवण देत, अल्लाहबरोबर कोणा दुसऱ्याला भागीदार ठरविण्यापासून परावृत्त करीत. मूर्ती, दगड, झाडे आणि जिन्नची पूजा करू देत नसत. पोटच्या मुलींना जिवंत गाडू देत नसत. व्यभिचार, मद्य आणि जुगाराचे दुष्परिणाम समजावून सांगत. मनाला वाईट विचारांपासून, जिभेला घाणेरड्या वक्तव्यापासून, शरीराला व कपड्यांना गलिच्छपणापासून पवित्र ठेवण्याचा उपदेश करीत. केवळ अल्लाहच संपूर्ण सृष्टी व जगाचा निर्माता आहे. मानव, सूर्य, चंद्र, तारे सर्व त्यानेच निर्माण केले असून सर्व त्याचेच आश्रित आहेत. अल्लाहच प्रार्थना ऐकणारा, इच्छा व आकांक्षा पूर्ण करणारा आहे. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीस त्याच्या समक्ष आपल्या जीवनाचा हिशेब द्यावा लागणार आहे आणि कर्मानुसार अल्लाह बक्षीस व शिक्षा देईल म्हणजेच स्वर्ग व नरक, असा उपदेश मुहम्मद (स.) लोकांना देत असत. मक्केतील दुष्ट लोकांनी त्यांना व त्यांच्या साथीदारांना त्रास व यातना देणे चालूच ठेवले. प्रेषित मुहम्मद (स.) व त्यांच्या संपूर्ण वंशाचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला. ते व त्यांचे कुटुंबीय एका घाटीत जाऊन राहिले आणि तीन वर्षांपर्यत मोठमोठ्या संकटांना तोंड दिले. लोकांना बऱ्याचवेळा झाडांची पाने खाऊन दिवस कंठावे लागत होते, इतकेच नव्हे तर वाळलेले कातडे भाजून खाण्याची वेळ येऊन ठेपली. मक्केतील इस्लामच्या प्रचार-प्रसारामध्ये मोठमोठे अडथळे उभे करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असतानाच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केबाहेर इस्लामचा संदेश पोहोचविण्याचा निश्चय केला. ताइफ शहरात ते गेले असताना तेथील लोकांनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केला. सतवणुकीचा क्रम जेव्हा अधिक वेगाने सुरू झाला तेव्हा त्यांना व त्यांच्या साथीदारांना स्वतःची जन्मभूमी सोडणे भाग पडले. ते व त्यांचे साथीदार मदीना शहरात गेले. मक्केतील विरोधकांनी तेथेही त्यांच्यावर हल्ला केला. अनेक लढाया झाल्या. तरीसुध्दा अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) विरोधकांशी मोठ्या उदारतेने वागत होते. जेव्हा मक्केत दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी मदीनेतून धन व जीवनावश्यक सामुग्री पाठविली. इस्लामी संदेश लोकांपर्यंत पोहचत राहिला आणि इस्लाम अरबस्थानात सर्वत्र पसरला. लोक सत्यमार्ग अवलंबून जीवनाचा उद्धार करू लागले.
मक्का एकेश्वरवादाचे प्राचीन केंद्र होते. येथूनच प्रेषित मुहम्मद (स.) यांना आपली जन्मभूमी सोडून मदीनेला जाणे भाग पडले होते. अल्लाहच्या कृपेने इस्लाम एकसारखा वाढत गेला आणि सरतेशेवटी त्यांनी मक्केवर विजय मिळविला. मुस्लिमांची सेना जेव्हा मक्केजवळ पोहचली तेव्हा लपूनछपून टेहळणी करणाऱ्या कुरैशांचे एक सरदार अबू सुफियान यांना मुस्लिमांनी ताब्यात घेतले. त्यांना प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे करण्यात आले, परंतु त्यांनी या कट्टर शत्रूला अत्यंत दयाळूपणाची वागणूक दिली. अबू सुफियान अशा वागणुकीमुळे खुपच प्रभावित झाले आणि मुस्लिम बनून मुस्लिमांच्या सेनेत सामील झाले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का विजयानंतर मक्कावासी खूपच आशंकित व भयभीत झाले होते. त्यांनी मुस्लिमांना फारच यातना दिल्या होत्या आणि त्यांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केले होते. परंतु मुहम्मद (स.) त्यांना संबोधून म्हणाले, ‘‘आज तुमच्यावर कोणताही आरोप नाही. जा तुम्ही सर्वजण स्वतंत्र आहात.’’
प्रेषित प्रेम, दया व करुणेचे सागर होते. अल्लाहने त्यांना ‘संपूर्ण विश्वाकरिता कृपा’ बनवून पाठविले आहे. एक-दोन नव्हे तर आपल्या सर्वच शत्रूंना आणि विरोधकांना क्षमादान देऊन त्यांना सन्मान प्रदान करणारी एखादी व्यक्ती या जगाच्या इतिहासात शोधूनही सापडणार नाही. अशा प्रकारचा मानवतेचा सर्वोत्तम आदर्श मुहम्मद (स.) यांनी सादर केला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनातच अरबस्थानातील एका मोठ्या विभागावर सत्याचे राज्य प्रस्थापित झाले. राज्यात गरिबांना, उपेक्षितांना व पीडितांना पूर्ण सन्मान लाभला.
मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही ज्या प्रकारचे जेवण ग्रहण करता त्याच प्रकारे जेवण आपल्या गुलामांनादेखील जेवू घाला, तुम्ही ज्या प्रकारचे कपडे परिधान करता तसलेच कपडे आपल्या गुलामांनाही परिधान करण्यास द्या, कारण तेदेखील अल्लाहचे दास आहेत. त्यांना त्रास देणे योग्य ठरणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘हे लोकहो! तुमचा पालनकर्ता एक आहे, याची तुम्हाला जाण असू द्या. तुमचा पिता (आदरणीय आदम अलै.) एक आहे. कोणा अरबाला एखाद्या अरबेतरावर कसलेही श्रेष्ठत्व नाही, तसेच कोणा अरबेतराला एखाद्या अरबावर श्रेष्ठत्व नाही, गोऱ्याला काळ्यावर आणि काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही. श्रेष्ठत्व फक्त ईशपरायणता व संयम बाळगणाऱ्याला लाभते.’’
अर्थात- वर्ण, जात, वंश, देश, प्रांत हे श्रेष्ठत्वाचे आधारस्तंभ नाहीत. प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व, श्रद्धा व चारित्र्यावर आधारित असतात.
मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘जो स्वतः पोटभर भोजन करतो आणि त्याचा शेजारी उपाशी झोपतो, तो मनुष्य श्रद्धावंत नसतो.’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी महिलांशी दुर्व्यवहार केला जात होता. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे शोषण केले जात असे आणि त्यांना भोगविलासाची वस्तू समजले जायचे. मुहम्मद (स.) यांनी ही दुष्ट मानसिकता बदलून टाकली आणि महिलांना त्यांचे स्वाभाविक अधिकार देऊन समाजात त्यांना आदर-सन्मान प्रदान केला.
मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘जो तुमच्यात शिष्टाचाराच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे तो श्रध्दावानांत श्रध्देच्या दृष्टीने सर्वांत परिपूर्ण आहे आणि जो महिलांबाबत शिष्ट विचार बाळगतो तोच तुमच्यात सर्वोत्तम आहे.’’
ते पुढे म्हणतात, ‘‘महिलांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा. तुमचा महिलांवर आणि महिलांचा तुमच्यावर अधिकार आहे.’’
त्याचप्रमाणे मुलींच्या बाबतीत भेदभाव आणि अत्याचारपूर्वक वागणुकीस नष्ट करून त्यांनी असेदेखील सांगितले की, ‘‘जो मनुष्य आपल्या मुलींचे चांगल्या प्रकारे पालनपोषण करील आणि मुलगा व मुलगी यामध्ये भेदभाव करणार नाही, तो स्वर्गात माझ्यासमवेत वास्तव्य करील.’’
प्रेषित मुहम्मद (स.) शूर तर होतेच त्याचबरोबर अत्यंत मृदु स्वभावाचे होते. दुर्बलांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्या बाबतीत मवाळपणाचा आदेश देत असत. मुहम्मद (स.) सोमवार दिनांक १२ रबीउल अव्वल, हिजरी सन ११ रोजी ठीक दुपारपूर्वी स्वर्गवासी झाले. मानवाने आपल्या एकमात्र स्रष्टा आणि पालनकर्त्याने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करूनच जीवन व्यतीत करावे. त्यामुळे तो इहलोक व परलोकात यश संपादन करू शकेल. हाच त्यांच्या जीवन व शिकवणींचा सार व उद्देश होता.

बंधुंनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी मी पुन्हा तुमच्यात दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणे सर्वांचे जीवन मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याचि वेळ येईपर्यंत असे प्रेमाने बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करू. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधी विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा झाडा द्यावा लागेल. मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने सहानुभूतीने वागवा. कठोर नका होऊ. दयाळू रहा. तुम्ही ईश्वराच्या जामीनकीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? परमेश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
"तसेच तुमच्यावर कोणीही विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वर्ज्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे. व्याज देऊ नये. मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील."
आणी तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षात ठेवा की, कसेहि झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने नाही वागवता कामा. मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुसलमान एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. तुमचे सर्वांचे एक जणू भ्रातृमंडळ, एक तुमचा महान भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर रहा, सावध रहा.

प्रेषित परंपरेचा मानवजातीत कसा प्रारंभ झाला व विकसित व उन्नत होत होत एका शेवटच्या महान प्रेषितावर तिचा कसा शेवट झाला; हे आपण पाहू या.
आपण हे ऐकलेच असेल की ईश्वराने सर्वाआधी एका मानवाला निर्माण केले. नंतर त्या माणसापासून त्याचे युगल बनविले व त्यापासून पुढे मानवी वंशवृद्धी केली आणि अगणित शतकानुशतकांपासून ती संपूर्ण भूमीवर पसरलेली आहे. जगात जितकी माणसे जन्मली ते सर्व त्या प्राथमिक युगलचीच संतान होत. सर्व जातीधर्माचा धार्मिक व ऐतिहासिक उल्लेख या गोष्टीशी सहमत आहे की मानवजातीचा आरंभ एकाच मनुष्यापासून झाला आहे. विज्ञानाच्या संशोधनाद्वाराही हे सिद्ध झालेले नाही की भूमंडलावर निरनिराळया भागांत वेगवेगळी माणसे निर्माण केली गेली. उलट अधिकतर वैज्ञानिक विद्वानांचे असे अनुमान व मत आहे की सर्वाआधी एकच मनुष्य निर्माण झाला असेल. जेथे मानववंश आढळतो, तो त्याच एका पहिल्या मानवाची1संतान आहे.
१) हे वास्तव की संपूर्ण मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे, जात पात, उच्चनीचसंबंधी भेदभावाचे समूळ उच्चाटन करते आणि सर्व एक दुसऱ्यांचे बंधु आहेत, हे सिद्ध होते. जातीयतेमुळे मानवसमाजात बिघाड निर्माण झाला आहे आणि त्याने रौद्ररूप धारण केले आहे या समस्येचे निराकरण मानवी विश्व-व्यापकतेत आहे.
आपल्या वंशजांना इस्लामी जीवनपद्धतीचे शिक्षण द्यावे. अर्थात त्यांना हे दाखवावे की तुमचा व संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. त्याचीच तुम्ही उपासना करा. त्याच्या समोर आपले मस्तक टेका. त्याच्याशीच सहाय्याची करूणा भाका आणि त्याच्या इच्छेनुसार जगात सदाचरणाने व न्यायाने आपले जीवन व्यतीत करा. तुम्ही अशा प्रकारे आचरण केले तर तुम्हाला योग्य ईनाम (मोबदला) मिळेल. जर तुम्ही त्याची अवज्ञा कराल तर कठोर शिक्षा मिळेल.
आदरणीय आदम (अ.) यांच्या संततीपैकी जे लोक भले होते ते आपल्या पित्यांनी दाखविलेल्या सरळ मार्गाने चालत राहिले. परंतु जे लोक दुष्ट व वाईट होते त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हळूहळू हरप्रकारची दुष्कृत्ये व कुश्रद्धा पसरत गेली. कोणी चंद्र, सूर्य, तारे कोणी वृक्षाची, पशूची व नद्यांची उपासना सुरू केली. काहींनी असा विचार केला की, वायू, जल, अग्नि, रोगराई तसेच आरोग्य व निसर्गाच्या इतर सत्तेचे व सामर्थ्यांचे ईश्वर वेगवेगळे आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उपासना करावयास हवी ज्यायोगे ते सर्व प्रसन्न होऊन आमच्याशी दयाळू होतील. अशा तऱ्हेने अज्ञानापोटी ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजेची अनेक रूपे प्रकटली आणि त्यापासून अनेक धर्म निर्माण झाले. हा तो काळ होता जेव्हा आदरणीय आदम (अ.) यांची वंशवेल जगाच्या विभिन्न भागांत पसरली होती. भिन्नभिन्न जाती बनल्या होत्या. प्रत्येक जातीने आपला एक नवीन धर्म बनविला होता आणि प्रत्येकाच्या रूढी-परंपरा वेगळ्या होत्या. ईश्वराच्या विस्मरणाबरोबरच लोकांना त्या नियमांचेही विस्मरण झाले जे आदरणीय आदम (अ.) यांनी आपल्या संततीला शिकविले होते. लोकांनी केवळ आपल्या तुच्छ इच्छावासनांचेच पालन आरंभिले. हर प्रकारच्या वाईट रूढी व प्रथा निर्माण झाल्या. सर्व प्रकारच्या अज्ञानपूर्ण विचारांचा प्रसार झाला. चांगले व वाईट जाणण्यासाठी चुका करण्यात आल्या. अनेक वाईट गोष्टींना चांगले मानण्यात आले व कित्येक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या गेल्या.2
आता ईश्वराने प्रत्येक जातीत व वंशात, प्रेषित पाठविण्यास आरंभ केला आणि ते लोकांना त्याच इस्लामची शिकवण देऊ लागले जी शिकवण आदरणीय आदम (अ.) यांनी सर्वप्रथम माणसांना दिली होती. या प्रेषितांनी आपापल्या जातीवंशांना विसर पडलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. एकाच ईश्वराची उपासना करण्याची त्यांना शिकवण दिली. ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजा करण्यापासून लोकांना परावृत्त केले. अज्ञानापोटी आलेल्या रूढींचे उच्चाटन केले. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत दाखविली. उचित नियम व आदेश दाखवून देऊन त्यांचे पालन करण्याचा आदेश दिला. भारत, चीन, इराण, इराक, इजिप्त, आफ्रिका, युरोप थोडक्यात असे की जगात कोणताही देश असा नाही जेथे ईश्वराकडून त्याचे सच्चे प्रेषितांचे आगमन झाले नाही. त्या सर्वांचा धर्म एकच होता तो हाच धर्म होता ज्याला ‘इस्लाम’ असे म्हणतात.(२) इतके जरूर होते की त्यांच्या शिकवणीची पद्धत व जीवनाचे नियम व कायदे थोडेसे भिन्न होते. ज्या तऱ्हेचे अज्ञान प्रत्येक जातीत पसरले होते, तेच दूर करण्यावर अधिक भर दिला गेला. ज्या प्रकारचे असत्य विचार प्रचलित होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावरच अधिक भर दिला गेला. संस्कृती, सभ्यता, ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने सर्व जाती प्राथमिक अवस्थेतच होत्या म्हणून त्यांना सरळ व सोपी शिकवण व साधे धर्म-नियम व विधान दिले गेले. जसजशी प्रगती व उन्नती होत गेली तसतसे शिकवणीला व धर्म विधानांनाही विकसित रूप दिले गेले. परंतु हा फरक केवळ बाह्यात्कारीच होता. सर्वांचा आत्मा एकच होता. श्रद्धेत ‘तौहीद’ (एकेश्वरत्व), व्यवहारात भलेपणा व सदाचार आणि आखिरत (पारलौकिक जीवन) च्या शिक्षा व मोबदल्यावर सर्वांची श्रद्धा व दृढ विश्वास होता.
प्रेषितांशी माणसांनी विचित्र असा दुर्व्यवहार केला. पहिल्यांदा त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार देण्यात आला. काहींना आपल्या मायभूमीतून हुसकून लावण्यात आले. काहींचा वध करण्यात आला. काहींना आयुष्यभर शिकवण व उपदेश करूनसुद्धा मोठ्या मुष्किलीने केवळ दहापाच अनुयायी प्राप्त होऊ
२) सर्वसाधारणपणे लोकांचा एक मोठा असा गैरसमज आहे की, इस्लामचा उदय आदरणीय मुहम्मद (स.) कडून झाला आहे. हा गैरसमज येथपर्यंत झालेला आहे की, आदरणीय मुहम्मद (स.) यांना इस्लामचे संस्थापक मानण्यात येते. वास्तविकपणे ही एक अत्यंत मोठी चूक असून प्रत्येक अभ्यासकाच्या मनातून ती पूर्णपणे दूर केली गेली पाहिजे. प्रत्येक अभ्यासकाने ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की, अगदी आरंभापासून मानवजातीचा इस्लाम हाच एकमेव व खराखुरा धर्म आहे. पृथ्वीवर ज्या काळी व ज्या स्थळी ईश्वराकडून प्रेषित आले, त्या सर्वांनी याच एका धर्माची लोकांना शिकवण दिली. परंतु ईश्वराचे हे निवडक दास आपले कर्तव्य ठामपणे करीत राहिले. शेवटी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम घडला. मोठमोठे जाती-वंशाचे समूह त्यांचे अनुयायी बनले. त्यानंतर मार्गभ्रष्टतेने वेगळे रूप धारण केले. जगातून प्रेषितांचे प्रयाण होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना मिळालेल्या शिकवणुकीत हळूहळू बदल केला. त्यांच्यावर अवतरलेल्या ईशग्रंथात आपले विचार व मत मिसळले. उपासनांच्या निरनिराळ्या प्रकारांचा अंगीकार केला.
काहींनी तर खुद्द प्रेषितांचीच उपासना व आराधना सुरू केली. कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा अवतारच मानले (म्हणजे खुद्द ईश्वरच मानवी रूपात प्रकटला होता) कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा पुत्र मानले तर आणखी कोणी आपल्या प्रेषिताला ईशत्वाचा सहभागी मानले. अशा रितीने माणसांनी एक अद्भूत आत्मवंचनेचे कृत्य सुरू केले. ज्या व्यक्तींनी एकेश्वरत्वाची शिकवण दिली होती आणि मूर्तीपूजेचे खंडन केले होते, मनुष्याने त्यांच्याच मूर्ती बनवून त्यांचीच उपासना सुरू केली. या प्रेषितांनी जे काही नियम व आचारसंहिता आपल्या अनुयायांना दिले होते तेही तऱ्हेतऱ्हेने विकृत करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अज्ञानयुक्त व अडाणीपणाच्या रूढींचा समावेश करण्यात आला. मानवनिर्मित नियमांची त्यामध्ये सरमिसळ करण्यात आली, ती इतकी की कांही शतके लोटल्यानंतर हे जाणून घेण्याचे कसलेही साधनच शिल्लक उरले नाही की प्रेषितांनी दिलेली खरी शिकवण व खरी आचारसंहिता कोणती आहे व नंतर लोकांनी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची मिसळ व भेसळ केली.3
खुद्द प्रेषितांची जीवनचरित्रेसुद्धा आख्यायिका व दंतकथामध्ये अशा रितीने मिश्रित झालेली आहेत की, त्या बाबतीत कोणतीही गोष्ट विश्वासार्ह उरली नाही. तरीसुद्धा प्रेषितांनी केलेले प्रयत्न अगदीच व्यर्थ व वाया गेले नाहीत. मिसळ व भेसळ झाली असूनही काहीतरी मूळ सत्य अनेक धर्मात अल्पशा प्रमाणात शिल्लक उरले आहे. ईश्वराची जाणीव व पारलौकिक जीवनाची जाणीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व धर्मांत आढळते. चांगुलपणा, सदाचार यांची काही तत्त्वे सर्व जगात मान्य केली गेली.
सर्व जातीवंशाच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक जातीवंशाला इतपत तयार करून सोडले की, जगात अशा एका धर्माची शिकवण प्रसारित केली जावी की जो धर्म निस्संशयपणे व एकमुखाने सर्व मानवजातीचा धर्म असेल.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आरंभी प्रत्येक जातीवंशात वेगवेगळे प्रेषित येत असत आणि त्यांची शिकवण त्यांच्या जातीवंशापर्यंतच मर्यादित असे. याचे कारण असे की, त्याकाळी सर्वच जाती-वंश एकमेकापासून वेगळे होते. एकमेकांत मिसळत नसत. जणू काय प्रत्येक जात व वंश आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत मर्यादित होती. अशा काळी कोणतीही सर्वसाधारण व एकत्रित शिक्षण, शिकवण यांचा सर्व जाती-वंशात प्रसार करणे अत्यंत कठीण होते. शिवाय भिन्न भिन्न जाती-वंशाची अवस्था एकमेकापासून खूपच वेगळी होती. अज्ञानरुपी अंधकार चहुकडे मोठ्या प्रमाणात होता. अशा अज्ञानापोटी, श्रद्धा व आचार यात जी विकृती निर्माण झाली होती, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात आढळत असे. म्हणूनच ईश्वराच्या प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला वेगळी शिकवण व उपदेश दिला. असत्य विचारांचे हळूहळू उच्चाटन करून उच्चप्रतीच्या नियम व विधानाचे पालन करण्याची शिकवण दिली जाई. अशा तऱ्हेने या जातीवंशाला शिकवण देण्यात किती हजार वर्षे लोटली ते ईश्वरालाच ठाऊक. प्रगती करता करता अखेरीस ती वेळ आली जेव्हा मानवजात बाल्यावस्थेतून निघून तारुण्यावस्थेत पोहोचू लागली होती. व्यापार, कला कौशल्य यांच्या प्रगतीबरोबरच जातीजातीत परस्पर संबंध निर्माण झाले. चीन व जपानपासून ते युरोप व आफ्रिकेतील दूरवरच्या देशांमध्ये जलमार्गाने तसेच खुष्कीच्या मार्गाने दळणवळण सुरू झाले. बहुतेक जातीवंशांत लेखन कलेचा प्रसार व प्रचार सुरु झाला. विद्या व कला यांचा प्रसार झाला. विभिन्न जातीवंशात ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. मोठमोठ्या राज्यांची स्थापना करून अनेक देशांना तसेच अनेक जातीवंशांना एकाच राजनैतिक व्यवस्थेमध्ये जोडून टाकले.
अशा रीतीने त्यापूर्वी मानवजातीत आढळून येणारा दुरावा व परकेपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे इस्लामची एक शिकवण व एक धर्मविधान संपूर्ण जगासाठी पाठविणे शक्य झाले. आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानवाची अवस्था इतकी प्रगत झाली होती की जणू तो स्वतःच एका सामान्य धर्माची मागणी करु लागला होता. बौद्धमत हा काही परिपूर्ण धर्म झालेला नव्हता व त्यात केवळ काही नैतिक नियमच होते. परंतु तो भारताबाहेर जपान व मंगोलियापर्यंत व दुसरीकडे अफगाणिस्तान व बुखारापर्यंत पसरला. त्याचे प्रचारक दूरदूरच्या देशापर्यंत जाऊन पोचले. याच्या काही शतकानंतरच ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आदरणीय ईसा (त्यांचेवर ईश्वराची कृपा असो) इस्लामचीच शिकवण घेऊन आले होते, परंतु त्यांच्या पश्चात ख्रिश्चन धर्माच्या नावाने एक अपूर्ण व दोषयुक्त धर्म रचण्यात आला. ख्रिश्चनांनी या धर्माचा प्रसार इराणपासून आफ्रिका व युरोपमधील दूरदूरच्या देशांत केला. या घटना आम्हाला हे दर्शवितात की, जग त्याकाळी एक सामान्य मानवी धर्माची मागणी करीत होते. तसे करण्यात त्याची इतकी तयारी झाली होती की, जेव्हा एक परिपूर्ण व सत्यधर्म त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने अपक्व आणि अपूर्ण धर्माचाच मानवजातीत प्रसार करण्यास प्रारंभ केला.

पूर्णपणे प्रेषितांना आज्ञांकित होणे हे अनुयायीसाठी अत्यावश्यक आहे. ही सर्वप्रथम गरज आहे श्रध्दावंत होण्याची. धर्मासाठी आणि दैवी नियमांसाठी हे आवश्यक आहे की प्रेषित जे काही सांगतील त्यास अनुयायींनी कुचराई न करता अंगीकारले पाहिजे. प्रेषित जे काही सांगतील अनुयायींना समजो अथवा न समजो, त्यांनी ते त्वरीत खरे आणि चांगले म्हणून स्वीकार केला पाहिजे. हा प्रेषितांचा दर्जा स्वतः अल्लाहनेच ठरवून दिलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘यांना सांगा की आम्ही जो कोणी प्रेषित पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांचा आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी, जर यांनी ही पध्दत अंगीकारली असती की जेव्हा हे स्वतःवर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाजवळ क्षमायाचना केली असती, तर निःसंशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.’’ (कुरआन ४: ६४)
ही आज्ञाधारकता आणि शरणागती फक्त मौखिक स्वरूपाचीच नसावी तर ती प्रेषिताच्या आज्ञेला गांभीर्यपूर्वक आणि मनाने स्वीकार करणारी असावी. अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांच्या आज्ञांकित राहण्याबद्दल कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘हे मुहम्मद (स)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रध्दावंत होऊ शकत नाहीत. जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत. मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनातदेखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावे.’’ (कुरआन ४: ६५)
हे स्वभाविकतः अत्यावश्यक आहे. वरील संकेतवचनात नमूद केलेली प्रेषिताची संकल्पना व्यतिरिक्त दुसरी अस्वाभाविक ठरेल. मनुष्य हा निर्माण केला गेला आहे मुळात अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकतेसाठीच फक्त! प्रेषित हे माध्यम आहे अल्लाहचे आदेश आणि संदेश जाणून घेण्यासाठी. म्हणून प्रेषितांचे पूर्णतः आणि गांभीर्यपूर्वक अनुकरण अनिवार्य आहे. हे खरे आहे की एखादी व्यक्ती रस्ता चालूनच एखाद्या ठिकाणी पोहचू शकते किंवा एखादा हवाई प्रवाशी विमानाने प्रवास करूनच हवाई प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे व्यक्ती अल्लाहचे मार्गदर्शन तोपर्यंत प्राप्त करूच शकत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स) यांचा सच्चा अनुयायी बनत नाही. कुरआन स्पष्ट करीत आहे की जेव्हा जेव्हा प्रेषितांनी त्यांच्या प्रेषित्वांची घोषणा केली, तेव्हा त्यांनी लोकांपासून अपेक्षा ठेवली की,
‘‘म्हणून तुम्ही अल्लाहच्या रोषचे भय बाळगा आणि माझे (प्रेषित) आज्ञांकित राहा.’’ (कुरआन २६: १२६)
खरे तर हे संकेतवचन स्पष्ट करीत आहे की अल्लाहची शरणागती आणि आज्ञाधारकता यांना प्राप्त तेव्हाच करून घेता येईल जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांचे पूर्ण अनुकरण केले जाईल. प्रेषितच फक्त सांगू शकतात की अल्लाहचे आदेश काय आहेत आणि आपण त्यांना कसे आचरणात आणावेत. म्हणून तर अल्लाहने फक्त त्याचीच शरणागती पत्करण्यास सांगितले नाही तर त्याबरोबर प्रेषितांची आज्ञाधारकता स्वीकारण्याचासुध्दा आदेश दिलेला आहे.
वस्तुतः प्रेषितांनी धर्माच्या बाबतीत जे काही सांगितले आहे ते सर्व अल्लाहकडून आहे, प्रेषितांची ही स्थिती त्यांच्या कार्याला आणखी जास्त महत्त्व प्रदान करते. म्हणून त्यांचे आज्ञांकित होणे (प्रेषितांची आज्ञा पाळणे) म्हणजे अल्लाहची आज्ञा पाळण्यासारखे कृत्य आहे.
‘‘हे मुहम्मद (स), आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगम्बर बनवून पाठविले आहे आणि यासाठी अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. ज्याने पैगम्बराची आज्ञा पाळली त्याने खरे म्हणजे अल्लाहचे आज्ञापालन केले आणि जो पराडः मुख झाला तर आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठविले नाही.’’ (कुरआन ४: ७९-८०)
थोडक्यात, प्रेषित्वांवर श्रध्दा ठेवणे ही अत्यावश्यक अट आहे. प्रेषितांचे पूर्ण आज्ञापालन करण्यासाठी प्रेषितांचे अनुयायी वर वर आणि दिखाऊ आज्ञाधारकता दाखविणारे मुळीच नसतात. प्रेषितांवरील श्रध्देत थोडीसुध्दा चलबिचल ही श्रध्देच्या मुळावर घाव घालणारी ठरते. असे करणे हे दुसरे तिसरे काहीच नसून प्रेषितांच्या महान कार्याबद्दलचे घोर अज्ञान आहे. असा मनुष्य अज्ञानाच्या घोर अंधारात चाचपडत असतो.

कुरआनोक्ती आहे,
‘‘तो आपल्या इच्छेने बोलत नाही, हा तर एक दिव्यबोध आहे जो त्याच्यावर अवतरला जातो. त्याला जबरदस्त बलशालीने शिकविले आहे.’’ (कुरआन ५३: ३-५)
जेव्हा असे म्हटले जाते की प्रेषित जे काही शिकवतात ते सर्व अल्लाहकडून असते. हे म्हणण्याला विस्तृत अर्थ आहे.
ही शिकवण दोन प्रकारची आहे.
१) अल्लाह प्रत्यक्ष अथवा दूताकरवी प्रेषितांना देतो.
२) प्रेषित दिव्य प्रकटनानुसार अथवा दिव्यबोधनुसार काही नीतिनियम तयार करीत असत.
पहिल्या प्रकारची शिकवण मूळ स्वरुपाची आणि अल्लाहने प्रत्यक्ष अवतरित केलेली आहे तर दुसरी अप्रत्यक्ष आणि प्रेषितांनी दिव्यबोधच्या प्रकाशात तयार केलेली आहे. परंतु हेतु आणि पावित्र्यात दोन्ही शिकवणी सारख्या आहेत.
निष्पापपणा आणि प्रेषित
प्रेषित निष्पाप आहेत. त्यांच्या हातून धार्मिक-प्रकारची चूक न होणे अटळ आहे. त्यांची इच्छा, आकांक्षा, वागणूक, विचार, आचार हे सर्वप्रकारच्या वाईटांच्या विरोधातील पुरावेच होत. ते धर्मबाह्य बाबतीत चूक करणे शक्य आहे, परंतु याचा त्यांच्या प्रेषित्वावर काहीच परिणाम होत नाही. त्यांचा निष्पापपणा दर्शवितो की दिव्य प्रकटनाचा अर्थबोध घेताना त्यांच्याकडून चूक होणे अशक्य आहे. तसेच दिव्यबोधाच्या प्रकाशात नीतिनियम तयार करताना अथवा ईशादेश आचरणात आणताना त्यांच्याकडून हलगर्जीपणा अथवा एखादी चूक अजिबात होणार नव्हती. म्हणून त्यांच्या इतर बाबींसाठी (धर्मबाह्य) त्यांच्या निष्पापपणावर काहीच परिणाम होणार नव्हता.
प्रेषित हे विचार करीत नाहीत अथवा चूक करीत नाहीत म्हणून निष्पाप होते असे मुळीच नाही तर वस्तुस्थिती वेगळी आहे. इतर मानवांसारखेच प्रेषितांच्या हातून चूक होणे सहाजिक आहे. परंतु प्रेषितांची ही चूक करण्याची पात्रता कधीच घडून येत नसे, कारण त्यांचे विचार आणि दृष्टी त्यांच्या नैतिकतेइतकीच परिपूर्ण अशी होती. एकीकडे प्रेषित मुहम्मद (स) दिव्य प्रकटनाचा उद्देश जाणून होते आणि त्या प्रकाशात ते नीतिनियम बनवित असत. दुसऱ्या बाजूला त्यांना त्यांच्या ‘स्व’वर पूर्ण नियंत्रण होते. त्यांचे नैतिक अधिष्ठान, अल्लाहचे भय आणि परलोकाविषयीचे ज्ञान अतिउच्च दर्ज्याचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या हातून पापकर्मे घडतील अशी कधीच भीती नव्हती. हे त्यांच्या निष्पापपणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होते.
पण हे फक्त एकमेव वैशिष्ट्य प्रेषित मुहम्मद (स) यांच्या निष्पापपणाचे नाही. त्यांना निष्पापपणाचा उच्च दर्जा प्राप्त होण्यास दिव्यबोध आणि त्यांचे आत्मिक निरीक्षण हेसुध्दा कारणीभूत आहे. खरे तर हे दिव्य निरीक्षणच त्यांना बौध्दिक आणि नैतिक चुकांपासून दूर ठेवत होते. प्रेषितांच्या हातून चूक अशी होतच नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यांच्या हातून चुका घडत होत्या, परंतु जेव्हा असे घडत तेव्हा त्यांना अल्लाहकडून सावधानतेचा इशारा त्वरित मिळत असे. दुसऱ्यापर्यंत ही चूक पोहचण्याअगोदर त्यास दिव्यबोधाद्वारे अगदी दुरूस्त केले जात असे. जेव्हा त्यांना काही विपरीत (चूक) आपल्या हातून घडावे असे मनोमन वाटे तेव्हा त्यांची अतिउच्च दर्ज्याची नैतिकशक्ती त्या अइच्छेला गाडून टाकत असे. कुविचार आणि अनाचाराबरोबर दोन हात करताना त्यांची उच्च दर्ज्याची नैतिक शक्तीच फक्त मुकाबला करीत नसे, तर त्याबरोबर दिव्यबोधसुध्दा लढाईत सामील होत असे आणि त्या कुविचाराचा तथा दुष्टकर्माचा कायमचाच नाश करीत असत.
प्रेषितांचा निष्पापपणा हा प्रेषितशृंखलेच्या महान कार्यासाठी अत्यावश्यक होता. प्रेषित जर खोटे बोलत असतील. पूर्वग्रहदूषितता आणि दिव्यप्रकटनाचे चुकीचे अर्थ लावत असतील तर त्यांच्यावर कोण वेडा विश्वास ठेवणार होता? लोक अशा व्यक्तीवर विश्वास तरी कसा ठेवणार की तो अल्लाहचा संदेश त्यांच्यापर्यंत ढवळाढवळ करून पोहोचवित आहे? असा मनुष्य मानवी चारित्र्याचा अनुकरणीय असा आदर्श जगापुढे ठेऊ शकत नाही कारण त्याचे स्वतःचेच चारित्र्य हे हीन दर्जाचे आणि दुसऱ्याला उपदेश करण्यालायक नसते. प्रेषित्व पूर्णतः असफल ठरते जर ते प्रेषित या महान कार्यासाठी दिव्यप्रकटनापुढे पूर्णपणे आज्ञाकित होण्याचे उदाहरण जगापुढे ठेवण्यास असमर्थ ठरणार होते.
प्रेषित हे निष्पाप होते म्हणजे ते व्यक्ती म्हणूनसुध्दा निष्पाप होते. बौध्दिक आणि शारीरिक भ्रष्ट आचारांचा (भ्रष्टाचार) तिटकारा त्यांना होता. हे अशामुळे की ते अल्लाहचे खास उफत केलेले दास होते. दुसऱ्या कोणाला हा दर्जा प्राप्त होऊच शकत नाही. भले तो कितीही धार्मिक, नैतिक का असेना. मनुष्याचे विचार आणि आचार हे निष्पापपणाला पोहचू शकतील, पण हे अशक्य आहे की त्याची नैतिकता चूक करण्यापलीकडील आणि विचाराने दैवी बोधाचा अचूकपणे अर्थ काढण्याचे बौध्दिक सामर्थ्य प्राप्त करणारी आहे, हे अशक्य कोटीचे आहे. म्हणून हा शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जोपर्यंत व्यक्ती हे जाणून घेत नाही की प्रेषित मुहम्मद (स) हेच फक्त निष्पाप आहेत आणि हे सत्य त्या व्यक्तीच्या हृदयात खोलवर जाऊन पोहोचत नाही, तोपर्यंत ही व्यक्ती प्रेषितांवर मनापासून प्रेम करूच शकत नाही आणि त्यांचा खरा अनुयायी आणि अज्ञांकित बनून राहू शकत नाही. अशा स्थितीत प्रेषितांबरोबर कोणी भागीदार ठरविण्याचे पाप त्या व्यक्तीकडून अनायासे घडून जाते.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget