Latest Post

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे एकेदिवशी भल्या पहाटेच घरून निघाले आणि सुख व शांतीचा ईश्वरी संदेश देण्यासाठी गल्लोगल्ली फिरले. पूर्ण दिवस पायपीट करूनही एकही व्यक्ती प्रेषितांचा संदेश स्वीकारण्यास तयार झाला नाही. प्रेषित दिसताच त्यांच्याशी गुंडगिरी करणे व टवाळखोरी करणे, अशी योजनाच विरोधकांनी तयार केली होती. ज्यांच्या कल्याण व भलाईसाठी प्रेषित अहोरात्र झटत होते, तेच लोक स्वतःच्या कल्याणापासून दूर पळत होते. प्रेषित मुहम्मद(स) सायंकाळी खूप व्यथित झाले.
दुसर्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास मक्का शहराची जमीनच आता नापीक होत होती. चांगले व सज्जन लोक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याभोवती गोळा झाले होते आणि सज्जनता व शृजनशीलतेचा अभाव असणारेच तेवढे प्रेषितांचा विरोध करीत होते. ही दुःखद स्थिती पाहूनच कदाचित प्रेषितांनी मक्का शहराच्या बाहेर इतर मानवांना सत्य संदेश देण्याचा कार्यक्रम आखला. यासाठी ते माननीय जैद बिन हारिसा(र) यांना घेऊन ‘तायफ’ शहराकडे रवाना झाले.
हा खडतर प्रवास त्यांनी पायीच केला. रस्त्यात ज्या वस्त्या होत्या, तेथील लोकांना त्यांनी ईश्वरी धर्माचा संदेश दिला. हा प्रवास पूर्णतः एक महिन्याचा होता.
‘तायफ’चा भूप्रदेश खूप सुपीक आणि वैभवसंपन्न असल्याने तेथील लोकांना ईश्वराचा विसर पडलेला होता. चारित्र्य आणि नैतिकतेची बंधने झुगारुन ते स्वैर जीवन जगत होते. शिवाय व्याजखोरीमुळे तेथील लोकांच्या मानवी भावनांमध्ये खूप मरगळ आलेली होती.
‘तायफ’ शहरी पोहोचून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘सकीफ’ कबिल्याच्या प्रमुखांची अर्थात ‘अब्दे या लैल’, ‘मसऊद’ आणि ‘हबीब’ यांची भेट घेतली. प्रेषितांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि प्रभावपूर्ण सत्यधर्माचा संदेश देऊन समर्थन मागितले. परंतु ते तिन्हीही सरदार विपरित बुद्धीचे निघाले. प्रेषितांना एकाने उत्तर दिले की, ‘‘जर ईश्वरानेच खरोखर आपणास प्रेषित म्हणून पाठविले असेल तर तो काबागृहावरील ‘गिलाफ’चे तुकडेतुकडे करू इच्छितो.’’ (अर्थात ईश्वराने मूर्खपणाचाच निर्णय घेतला.)
दुसरा उत्तरला,
‘‘अरे तर ईश्वराला तुमच्यापेक्षा जास्त योग्य दुसरा कोणी प्रेषित बनविण्यासाठी मिळाला नाही काय?’’आणि तिसर्याने उत्तर दिले,
‘‘मी तर तुमच्याशी काहीच बोलू इच्छित नाही. कारण तुम्ही जर खरोखरच ईश्वराचे धाडलेले प्रेषित असाल तर तुमच्याशी बोलणे म्हणजे प्रेषिताचा अपमान ठरेल. जर तुमचे बोलणे खोटे असेल तर तुमच्याशी बोलणेच उचित ठरणार नाही.’’ या तिन्ही सरदारांची नकारार्थी उत्तरे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळजात जणू विषारी बाणांसारखी उतरली. परंतु ते संयमाचे पर्वत होते. त्यांनी मोठ्या धैर्याने म्हटले,
‘‘बरे ठीक आहे! तुम्ही या गोष्टी स्वतःपर्यंतच सीमित ठेवा. इतरांत सांगू नका!’’ परंतु या तिन्ही सरदारांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या विनंतीकडे कानाडोळा करून शहरातील टवाळ मुलांना, नोकरांना व गुलामांना प्रेषितांच्या मागे त्यांना शहराबाहेर काढण्यासाठी लावले. टवाळांचे टोळके प्रेषितांमागे लागले. त्यांच्यावर दगडांचा वर्षाव झाला, प्रेषितांचा रक्तस्त्राव झाला. प्रेषितांच्या पायांतील वाहना रक्ताने माखल्या, रखरखत्या उन्हात रक्तबंबाळ करून त्यांना शहराच्या बाहेर काढण्यात आले. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रचंड थकवा आला. अरब प्रदेशाच्या वाळवंटी वातावरणातील उष्णतेने त्यांना प्रचंड तहान लागली. सोबत असलेल्या माननीय जैद(र) यांनी त्यांचे रक्त साफ केले. ते दोघे शहराबाहेर आले आणि एका बागेत प्रेषितांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. शरीरातून रक्त आणि डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबायचे नाव घेत नव्हते. परंतु अतिदयाळू प्रेषितांनी या झाडाखाली दम घेऊन प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा! आपल्या अशक्तपणाची आणि विवशतेची फिर्याद केवळ तुझ्यासमोरच करतो. तूच माझा स्वामी आहेस. तू जर माझ्याशी प्रसन्न असला तर मला विरोधकांची मुळीच चिता नाही. मी केवळ तुझ्याच आश्रयाची याचना करतो. तुझ्याच कांतीमय मार्गदर्शनाची आशा बाळगतो की, ज्यामुळे अन्याय, अत्याचार आणि मार्गभ्रष्टतचे सर्व काळेकुट्ट अंधार हे सतमार्गात परिवर्तीत होतात आणि विश्वाच्या सर्व समस्यांचे निराकरण होते. तुझ्याशिवाय ही शक्ती व सामर्थ्य इतर कोणातच नाही.’’
बागेच्या मालकांनी आपल्या ‘अद्दास’ नावाच्या नोकराकरवी द्राक्षांची थाळी प्रेषितांना पाठविली. प्रेषितांनी स्वीकार केला. प्रेषितांनी ईश्वराचे नाव घेऊन द्राक्षे खाण्यासाठी हात पुढे केला. ईश्वराचे नाव कानी पडताच ‘अद्दास’ विस्मयचकित झाला, कारण खाण्यास सुरुवात करताना ईश्वराचे नामस्मरण करणे हे प्रेषितत्वाचेच गुणधर्म आहेत, हे त्यास चांगले ठाऊक होते. त्याने मोठ्या आस्थेने प्रेषित मुहम्मद(स) यांची सेवा केली. हा ‘अद्दास’ नावाचा नोकर मालकांकडे परत आला तेव्हा मालकांनी त्याची कानउघाडणी करून दम दिला की, मुहम्मद(स) यांच्या शब्दांत येऊन त्यांचा धर्म स्वीकारु नकोस! परंतु अद्दासने मालकांना उत्तर दिले की, ‘‘त्यांच्यापेक्षा कल्याणकारी मानव या जगात कोणीच नाही. कारण त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली जी केवळ प्रेषितच सांगू शकतो.’’
थोडी विश्रांती झाल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना जैद(र) यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ‘कर्नुस्सअलिब’ या ठिकाणी आणले. प्रेषितांचे रक्त धुतले. प्रेषितांनी या ठिकाणी विश्रांती घेतली. माननीय जैद(र) यांना प्रेषितांची ही अवस्था पाहून खूप दुःख होत होते. त्यांनी प्रेषितांना म्हटले की, ‘‘या ‘तायफ’वाल्यांना श्राप द्यावा.’’ परंतु अतिदयाळू प्रेषित म्हणाले,
‘‘मुळीच नाही, मला ईश्वराने मानवांसाठी दयाभावनांचा आदेश दिला. मी त्यांना श्राप कसा काय देईन? या लोकांनी जरी इस्लाम स्वीकारला नाही तर भविष्यात यांची संतती निश्चितच इस्लामचा स्वीकार करील.’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय जैद(र) तेथून ‘नखला’ या ठिकाणी काही दिवस राहिले. मग ‘मुतईम बिन अदी’च्या समर्थनामुळे प्रेषित काबागृहात परतले. त्यांनी काबागृहात प्रथम नमाज अदा केली आणि मग घरी परतले.
‘तायफ’च्या प्रचारदौर्यामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले त्यांना काही मोजक्या शब्दांत आम्ही वर्णन केले आहे. त्या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खरे तर शब्द अपुरे पडतात. ‘तायफ’ येथील सरदारांकडून झालेल्या अमानवी व्यवहाराचे प्रेषितांच्या शरीरावर आणि मनावर पडलेले घाव जाणून घेण्यासाठी एका मानवी भावनांनी भरलेल्या अंतःकरणाचीच गरज आहे.
एकदा प्रेषितपत्नी मा. आयशा(र) यांनी प्रेषितांना विचारले,
‘‘हे प्रेषिता! तुमच्यावर ‘उहुद’च्या युद्धाच्या दिवसांपेक्षाही जास्त कष्टदायक घटना कोणती घडली?’’ आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले,
‘‘हे आयशा! तुमच्या परिवारजणांकडून जो त्रास झाला, तो तर झालाच. परंतु त्याहीपेक्षा माझ्यावर जी कष्टदायक घटना घडली ती तायफ येथील प्रचारदौर्याच्या प्रसंगी घडली. तो दिवस माझ्यावर अतिशय कठीण होता की, ज्या दिवशी मी ‘तायफ’च्या सरदारांना सत्यधर्माचे निमंत्रण देत होतो आणि त्यांनी हे निमंत्रण झुगारुन लावले होते. त्याचे दुःख मला अनावर झाले होते.
‘तायफ’ वरून परत आल्यावरसुद्धा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी धीर सोडलेला नव्हता. त्यांनी आपली चळवळ अधिक तीव्र केली. कारण ईश्वराने पाठविलेले धैर्यवान प्रेषित जे समस्त विश्वासाठी हितैषी असतात आणि समस्त मानवजातीसाठी कल्याणाच्या वाटा उघडण्यासाठी असतात, ते निश्चय व संकल्पाचा एक मार्ग बंद पडताच दुसरा मार्ग काढतात.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी पाहिले की, मक्का शहराप्रमाणेच तायफ शहराची भूमीसुद्धा नापीक आहे, तेव्हा त्यांनी मक्का शहराबाहेर रस्त्यावर येऊन वाटसरूंना आपला संदेश पोहोचविण्यास सुरुवात केली. कधीकधी ते शेजारच्या एखाद्या वस्तीत जाऊन तेथील कबिल्यांच्या सरदारांपर्यंत पोहोचून इस्लामचा संदेश देत. अशा प्रकारे त्यांनी जवळपासच्या चौदा-पंधरा कबिल्यांपर्यंत सत्यधर्माचा संदेश पोहोचविला.
त्या काळात प्रेषित मुहम्मद(स) हे ‘किन्दा’ या कबिल्याच्या सरदारांना जाऊन भेटले व म्हणाले,
‘‘तुमच्या आजोबांचे नाव ‘अब्दुल्लाह’ (अर्थात एकाच ईश्वराचे दास) होते. तेव्हा तुम्हीसुद्धा एकाच ईश्वराची उपासना करून आपल्या आजोबांच्या नावाचा मान राखा आणि त्यानुसार आपले जीवन एकाच ईश्वराच्या आज्ञेस समर्पित करा!’’
‘हज’ करण्यासाठी येणार्या इतर कबिल्यांच्या लोकांनासुद्धा पूर्वीप्रमाणेच प्रेषितांनी इस्लामचा संदेश दिला.
एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘आमिर बिन सअ्सआ’ या कबिल्याच्या ‘बहैरा’ सरदारास इस्लामचा संदेश दिला. ‘बहैरा’ ने प्रेषितांना विचारले,
‘‘जर मी तुमच्या संदेशाचा स्वीकार करून तुमची साथ दिली आणि तुमच्या विरोधकांवर प्रभुत्व मिळविले, तर तुमच्यानंतर इस्लामी शासनाची धुरा माझ्या हाती येईल काय?’’
‘‘ते ईश्वराच्या अख्त्यारित आहे. तो ज्यास योग्य समजेल त्यास माझा वारस बनविल!’’ प्रेषित उत्तरले. मुळात ‘बहैरा’ असे समजत होता की, इस्लाम स्वीकारण्याच्या परिणामस्वरुप प्रेषितांचे राज्य स्थापन होईल. प्रेषितांनी या ठिकाणी राजकीय सौदेबाजी नाकारली. कारण सत्यधर्मात सौदेबाजीला कोणतेच स्थान नाही.
यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘हुजैल बिन शैबान’ कबिल्यात गेले. सोबत प्रेषितांचे परममित्र माननीय अबू बकर(र) हेही होते. कबिल्याच्या लोकांनी प्रेषितांचा संदेश मनःपूर्वक ऐकला. कबिल्याचा सरदार मफरुक म्हणाला,
‘‘आपला मूळ संदेश काय आहे?’’
यावर प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठण केली,
‘‘ईश्वर एकमेव उपास्य असून मी त्याने पाठविलेला प्रेषित आहे!’’ ही दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-अनआम’ची आयत क्र. १५२ आहे. ‘मफरुक’च्या सोबत ‘मुसन्ना’ आणि ‘हानी’ हे सरदारदेखील होते. सर्वांनी प्रेषितवाणीची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘ही वाणी तर अत्यंत मनाला हेलावून ठेवणारी आहे. परंतु आपली धारणा आणि श्रद्धा अचानक बदलणे म्हणजेच आमच्या पारंपरिक धर्माला सोडण्यासारखे होईल. हे आमच्यासाठी कठीण आहे. शिवाय ‘ईराण’चा सम्राट ‘किसरा’शी आमचा समझोता आहे की आम्ही त्यांच्याशिवाय कोणाच्याच प्रभावाधीन राहणार नाही.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांची स्पष्टोक्ती खूप पसंत केली आणि म्हणाले,
‘‘असो! आपल्या धर्माचे रक्षण ईश्वर स्वतःच करेल!!’’
इतक्या कबिल्यांना प्रेषित मुहम्मद(स) यांनी इस्लामचा संदेश दिला, परंतु त्या कबिल्यांचे दुदैवच! त्यांच्यापैकी एकानेही इस्लामचा स्वीकार केला नाही. एकार्थाने प्रत्येक प्रयत्न विफल होत गेले. एवढे असूनही प्रेषितांनी कधीच आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही.
अत्याचारांनी आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडल्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मानवसमाजाच्या शेतीत सत्यधर्माच्या संदेशाचे बी पेरूनही ते उगत नव्हते, तेव्हा याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आता मात्र एखादी प्रचंड मोठी घटना घडणार आहे.

या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका माननीय हमजा(र) यांनी अद्याप इस्लाम स्वीकार केला नव्हता. तसेच इतर विरोधकांप्रमाणे त्यांनी प्रेषितांचा विरोधही केला नव्हता. ते नेहमी शिकार करणे आणि सैरसपाटा करण्याच्या छंदातच मग्न असत. यामुळे त्यांना प्रेषितांच्या सत्यधर्माच्या संदेशाकडे लक्ष देण्याची सवडही मिळत नसे. एक दिवशी नेहमीप्रमाणे ते शिकारीवरून परत येत असताना ‘इब्ने जुदआन’ची दासी त्यांना रस्त्यात भेटली आणि त्यांना धिक्कारून म्हणाली, ‘‘हे अबू अम्मारा! (हमजा यांचे टोपण नाव) थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही येथे असता तर तुम्ही डोळ्यांनी पाहिले असते की, ‘अबू जहल’ याने तुमच्या पुतण्याशी (मुहम्मद(स) यांच्याशी) किती वाईट आणि अमानुष वर्तन केले. त्यांना शिवीगाळ केली. अंगावर माती आणि शेण टाकले, शारीरिक इजा पोहोचविली. धिक्कार असो तुमचा आणि तुमच्या ‘हाशिम’ परिवारजणांचा की त्या अनाथाच्या रक्षणार्थ हात उचलण्यासाठी तुमच्यात दम नाही!’’
माननीय हमजा(र) यांचा संताप अनावर झाला. ‘अबू जहल’ अजूनही तेथेच होता. माननीय हमजा(र) यांनी आपल्या धनुष्याचा वार त्याच्या डोक्यावर इतक्या जोरात मारली की, अबू जहल रक्तबंबाळ झाला. तसेच आवेशाच्या भरात त्यास खडसावले की, ‘‘तू मुहम्मद(स) यांना शिव्या देतोस आणि त्रस्त करतोस, तेव्हा कान उघडून ऐकून घे! आजपासून मीच प्रेषित मुहम्मद(स) यांचा धर्म स्वीकारतो. मग पाहतो की, मला रोखण्याची कोणात हिमत आहे!!’’
मग माननीय हमजा(र) सरळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन म्हणाले, ‘‘मुहम्मद(स)! मी तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे. अबू जहलने तुमच्यावर केलेल्या अत्याचाराचा मी बदला घेतला आहे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘काकावर्य! ज्या वेळेस आपण मूर्तीपूजा सोडून सत्यधर्माचा स्वीकार कराल, तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा असेल.’’
या ठिकाणी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या वैयक्तिक भावनांच्या समाधानापेक्षा जास्त काळजी सत्यधर्माच्या प्रसाराचीच आहे. त्यांचा उपदेश ऐकून माननीय हमजा(र) रात्रभर विचार करीत राहिले आणि पूर्ण विचारांतीच त्यांनी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी प्रेषितदरबारी येऊन इस्लामचा स्वीकार केला.
माननीय हमजा(र) यांच्या इस्लाम स्वीकारण्याची वार्ता मक्का शहरात वणव्यासारखी पसरली. इस्लामच्या अनुयायांना एकीकडे अत्यानंद झाला, तर दुसरीकडे विरोधक मात्र खूप संतापले. या घटनेच्या प्रतिक्रेयेत विशेषकरून अबू जहलचे त्यांच्याशी वैर जास्तच वाढले. त्याने आवेशपूर्ण घोषणा केली की, ‘‘जो माणूस मुहम्मद(स) यांचा वध करून त्यांचे शीर माझ्यासमोर हजर करील त्यास शंभर लाल रंगाचे उंट आणि एक हजार तोळे चांदी बक्षीस देण्यात येईल.’’ विशेषतः ‘अबू जहल’ याने आपले तरूण आणि युद्धपटू व कोणालाही न जुमानणारे भाचे माननीय उमर(र) यांना या कामासाठी उत्तेजित केले. (या वेळी माननीय उमर(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला नव्हता) माननीय उमर(र) यांनी तलवार उपसली आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या वधाचा पक्का निर्धार केला.
आधी ते सरळ माननीय अरकम(र) यांचा समाचार घेण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाले. रस्त्यात त्यांचे मित्र नुएम बिन अब्दुल्लाह भेटले व त्यांना विचारले, ‘‘हे उमर(र)! कोठे निघाला आहात?’’ ‘‘मी मुहम्मद(स) यांचा शीरच्छेद करण्यासाठी निघालो आहे!’’ उमर(र) ताडकन उत्तरले. ‘नुएम’ म्हणाले, ‘‘आधी आपल्या घरच्यांचा तर समाचार घ्या.’’
‘‘काय केले माझ्या घरच्या लोकांनी?’’ उमर(र) यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, ‘‘माझे कोणते घरचे लोक?’’
‘‘तुमची बहीण ‘फातिमा’ आणि मेहुणे ‘सईद बिन जैद’ यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि मानवकल्याणाकडे हाक देणार्यांच्या अनुयायांत सामील झाले.’’
‘नुएम’ यांचे उत्तर ऐकताच उमर(र) यांचा संताप अनावर झाला. त्यांनी माननीय अरकम(र) यांच्या घराची वाट सोडून प्रथम आपल्या बहीण-मेहुण्याचा समाचार घेण्यासाठी निघाले. दरवाजावर खटका दिला, तेव्हा दोघे पती-पत्नी माननीय खब्बाब(र) यांच्याकडून कुरआनची शिकवण घेत होते. दारावर जोरदार थाप ऐकताच घरच्यांनी ओळखले की, माननीय उमर(र) आले. ते तिघेजण खूप घाबरले. माननीय खब्बाब(र) यांनी घराच्या मागच्या भागात धूम ठोकली. बहीण फातिमा(र) यांनी दिव्य कुरआनची पाने लपविली आणि दार उघडले. उमर(र) संतापाच्या अतिरेकाने थरथर कापत होते. त्यांनी रागाच्या भरात आवेशोद्गार काढले,
‘‘माझ्या कानी आले की, तुम्ही दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. म्हणून तुम्हा दोघांना कायमचा धडा शिकविण्यासाठी आलो आहे!’’ एवढे सांगून ते माननीय सईद(र) यांच्यावर तुटून पडले. त्यांचे केस धरून त्यांना जमिनीवर पाडून अमानुषपणे बदडण्यास सुरुवात केली. माननीय फातिमा(र) आपल्या पतीच्या रक्षणार्थ आडवी आली आणि माननीय उमर यांचा एक जोरदार प्रहार फातिमा(र) च्या चेहर्यावर पडला. प्रहारामुळे त्या रक्त बंबाळ झाल्या. अशा अवस्थेतच माननीय फातिमा(र) दृढ निश्चयपूर्वक उद्गारल्या, ‘‘होय! आम्ही इस्लाम धर्म स्वीकार केला! ईश्वराच्या प्रेषितांच्या अनुयायांत सहभागी झालो! आता तुला काय करायचे ते करून घे! आमच्या हृदयावर शिक्कामोर्तब झालेले ईश्वरी चिन्ह तुला कधीच नष्ट करता येणार नाही!’’
रक्तबंबाळ झालेल्या आणि डोळ्यांत अश्रू आलेल्या बहिणीचे निश्चयपूर्ण वाक्य ऐकून माननीय उमर(र) यांचे बहिणीशी असलेले ममत्व जागृत झाले. आपल्या बहिणीच्या आपणच केलेल्या दुरावस्थेचा त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या संतापाची तीव्रता शमली. मग त्यांनी आपल्या बहिणीस प्रेमाने विचारले, ‘‘बरे तुम्ही जी वाणी वाचत होता ती मलादेखील दाखवा!’’ ‘‘तू त्या वाणीस नष्ट करशील!’’ बहीण फातिमा(र) उत्तरल्या. माननीय उमर(र) यांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, ‘‘मी वाचून परत देईन.’’ फातिमा(र) यांनी सांगितले, ‘‘उमर(र)! ही ईश्वराचीं वाणी आहे. शुचिर्भूततेशिवाय यास (कुरआनास) हात लावता येणार नाही. तू आधी स्नान करून मगच वाचायला घे.’’
माननीय उमर(र) यांनी बहिणीच्या विनंतीवरून स्नान केले. फातिमा(र) यांनी दिव्य कुरआन त्यांना दिले. या ठिकाणी ‘सूरह-ए-ताहा’ असलेले. पान उमर(र) पठण करू लागले. पठण करताना त्यांचे रोम रोम कापू लागले. दिव्य कुरआनचा त्यांच्या आंतरात्म्यावर कमालीचा प्रभाव होत होता. परिणामी त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि त्यांनी आरोळी ठोकली, ‘‘खरोखरच मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नसून मुहम्मद(स) ईश्वराचे प्रेषित आहेत.’’
त्यांची आरोळी ऐकताच घराच्या मागच्या भागात लपून बसलेले माननीय खब्बाब(र) समोर आले व म्हणाले, ‘‘हे उमर(र)! तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कालच ईश्वरदरबारी प्रार्थना केली होती की, ‘‘हे ईश्वरा! तू उमर बिन हिश्शाम (अबु जहल) आणि उमर बिन खत्ताब(र) या दोघांपैकी एकास इस्लाममध्ये दाखल करून इस्लामी आंदोलनास शक्ती प्रदान कर!’’ माननीय खब्बाब(र) यांच्यासोबत माननीय उमर(र) आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दरबारी हजर झाले. ‘‘हे उमर(र)! कोणत्या उद्देशाने आलात?’’ आदरणीय प्रेषितांनी नम्रपणे विचारले.
‘‘एकमेव ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचा स्वीकार करण्यासाठीच आलो!’’ माननीय उमर(र) भावूक होऊन उत्तरले. हे ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सर्व अनुयायी आनंदाने म्हणाले, ‘‘अल्लाहु अकबर!’’ (अर्थात ‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’)
माननीय उमर(र) हे अरब समाजातील अतिशय शूर, शक्तिशाली, महापराक्रमी व महाप्रतापी व्यक्ती समजले जात होते. माननीय हमजा(र) आणि उमर(र) या दोन शक्तींमुळे इस्लामी आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. मुस्लिमांवर अमर्याद अत्याचार होत असताना या व्यक्तीमुळे इस्लाम धर्माचा स्वीकार करून सत्याच्या आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. आता मात्र तेथील वातावरणात प्रचंड परिवर्तन झाले. माननीय उमर(र) यांनी विचार केला की, ‘कुरैश’ कबिल्यामध्ये ‘जमील बिन मअमर’ हा माणूस आपल्या इस्लामस्वीकृतीची वार्ता चांगल्यारीतीने पसरवू शकतो. म्हणून ते सकाळीसकाळीच त्याच्या घरी गेले आणि त्यास सांगितले की, ‘‘मी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या ईश्वरी धर्माचा स्वीकार केला आहे.’’ ‘जमील बिन मअमर’ याने तत्काळ चादर ‘‘हे कुरैश कबिल्याच्या लोकांनो! हा माणूस खोटे बोलत आहे. मी निधर्मी मुळीच झालो नाही! मी तर सत्यधर्माचा स्वीकार करून मुस्लिम झालो आहे आणि आपल्या अमानवी पारंपरिक असत्यधर्मांचा धिक्कार केला आहे!’’
माननीय उमर(र) यांची ही घोषणा ‘कुरैश’ कबिल्याच्या जखमेवर मीठ चोळणारी व त्यांच्यात लागलेल्या आगीत तेल ओतून भडका करणारी होती. हा भडका अतिशय तीव्र झाला. विरोधकांच्या तलवारी चमकल्या. माननीय उमर(र) यांच्यावर वार होत गेले. परंतु उमर(र) यांनी सर्वांचा मुकाबला केला. लढाई चालूच होती. एवढ्यात ‘कुरैश’ कबिल्याचा सरदार ‘आस बिन वाईल’ तेथे पोहोचला आणि मध्यस्थी करीत म्हणाला, ‘‘या व्यक्तीने (माननीय उमर(र) यांनी) स्वतःसाठी एक मार्ग निवडला आहे. तुम्हाला त्याच्याशी काय घेणे आहे?’’ असे म्हणून त्या ठिकाणी हे प्रकरण त्याने आवरते घेतले.
माननीय उमर(र) यांनी काबागृहात खुलेआम नमाज अदा करण्याची घोषणा केली आणि सर्व मुस्लिम उघडपणे काबागृहात नमाज अदा करू लागले. परिस्थितीत घडून येणारे हे एक जबरदस्त परिवर्तन होते. सत्यद्रोही शक्ती हताश होऊन हे सर्व काही होताना पाहत होती. सत्यधर्माच्या आंदोलनाचा हा महापूर ओसंडून वाहत होता आणि यात हळूहळू मोठमोठ्या व्यक्ती सामील होत होत्या.
आता मात्र इस्लामविरोधी शक्तींनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून इस्लामी आंदोलनाचा खातमा करण्यासाठी कंबर कसली. कुरैश कबिल्यातील विरोधकांनी संपूर्ण मक्कावासीयांना एकत्र करून करार केला की, ‘‘हाशिम’’ परिवाराचा (प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिवाराचा) सामाजिक बहिष्कार करावा. त्या परिवाराशी असलेले सर्व संबंध तोडण्यात यावे. सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात यावेत. ‘हाशिम’ परिवारास चांगलेच वेठीस धरण्यात यावे. इथपावेतो की, त्यांनी मुहम्मद(स) यांना आमच्या स्वाधीन करावे. मग आम्ही त्यांचा वध करून हे प्रकरण संपवून टाकू. हा करारनामा लिखित होता. हा काळ तब्बल तीन वर्षांचा होता.
या अमानुष करारामुळे ‘हाशिम’ परिवाराने ‘शैबे अबी तालिब’ या ठिकाणी आश्रय घेतला. एकार्थाने संपूर्ण इस्लामी परिवार तीन वर्षे नजरकैदेत होता. या बहिष्काराच्या करारामुळे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार बंद झाला. त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यात आला आणि इस्लामी आंदोलकांवर एक महान संकट कोसळले. अन्न मिळत नसल्याने प्रेषितांच्या अनुयायांना झाडाची पाने खाऊन दिवस कंठावे लागले. लहान लहान मुले अन्नावाचून अक्षरशः तडफडत होती.
‘एकदा हकीम बिन हिजाम’ या माणसास मुस्लिमांची दया आली. त्याने थोडेसे गहू आपल्या गुलामामार्फत गुपचूपपणे पाठविले. परंतु इस्लामद्रोही अबू जहल याची नजर पडताच तो ते धान्य हिसकावून घेऊ लागला. एवढ्यात ‘अबू बख्तरी’ तेथून जात होते. त्यांनी अबू जहलचे हे दुष्कृत्य पाहिले आणि अबू जहल यास सांगितले की, ‘सोडून द्या! पुतण्याने आपल्या आत्याकरिता पाठविले तर काय बिघडते.’’ अशा प्रकारे ‘हिश्शाम बिन अम्र’ हे लपून छपून धान्य पाठवित असत.
हाच ‘हिश्शाम बिन अम्र’ या अमानवी करारास निरस्त करण्यासाठी पुढे आला. मूळ गोष्ट अशी की, एकीकडे अत्याचार वाढत असताना दुसरीकडे त्या अत्याचाराविरुद्ध मानवी स्वभावात दयाळू भावना निर्माण होत असते. ‘हिश्शाम बिन अम्र’ हा जुहैर बिन अबि उमैया’कडे गेला आणि याविषयी त्याने अत्यंत प्रभावशाली व दयापूर्ण आपले मत मांडले. मग तो ‘मुतईम बिन अदी’ यास भेटला आणि शेवटी ‘अबू बख्तरी’ आणि ‘जमआ बिन असवद’ यांना भेटून मुस्लिमांच्या अत्याचारांविरुद्ध असलेले वातावरण बदलून टाकले. ‘हाशिम’च्या परिवारजणांनी सर्वसहमतीने योजना तयार केली आणि एकेदिवशी पवित्र काबागृहामध्ये संपूर्ण अरब समुदायास संबोधित करून म्हणाला, ‘‘हे मक्कावासीयांनो! हे कर्म कितपत उचित आणि योग्य आहे की, आपण सर्वांनी पोट भरून जेवायचे आणि चांगली वस्त्रे परिधान करावयाची आणि ‘हाशिम’ परिवारजणांना उपाशीपोटी आणि वस्त्रविरहित जीवन कंठित करण्यासाठी सोडून द्यावयाचे?’’ मग त्याने चेतावणी देताना सांगितले की, ‘‘ईश्वराची शपथ! अत्याचाराच्या आधारावर तयार झालेल्या सामाजिक बहिष्कार करणार्या करारपत्राचे मी जोपर्यंत तुकडे तुकडे करणार नाही, तोपर्यंत सुखाने श्वास घेणार नाही!’’
त्याचे हे शब्द ऐकताच ‘अबू जहल’ हा संतापलेल्या स्वरात म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! तू खोटारडा आहेस, तू ते करारपत्र मुळीच फाडू नये.’’ ‘जमआ बिन असवद’ ने ‘अबू जहल’ यास उत्तर दिले की,
‘‘ईश्वराची शपथ! तूच सर्वात जास्त खोटारडा आहेस. ज्या प्रणालीवर हा करार करण्यात आला आहे, तीच प्रणाली मुळात आम्हास मान्य नाही.’’
त्याचे समर्थन अबू बख्तरी यानेदेखील केले आणि म्हणता म्हणता सर्वांनीच ‘हिश्शाम बिन अम्र’चे समर्थन करण्यासाठी कंबर कसली. ‘अबू जहल’ला त्याच्या पायाखालची जमीन हलताना दिसू लागली आणि तो विवश झाला. पवित्र काबागृहाच्या भितीवर टांगण्यात आलेले बहिष्काराचे करारपत्र काढून नष्ट करण्यासाठी लोकांचे हात सरसावले. परंतु अश्चर्यम! आधीच ते करारपत्र वाळवी लागून नष्ट पावले होते. त्यावर केवळ ‘ईश्वराच्या नावे’ एवढेच शब्द बाकी राहिले होते. अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या समवेत असलेल्या हाशिम परिवाराच्या लोकांच्या नजरबंदीचा कठीण काळ संपुष्टात आला. हे प्रेषितत्वाचे दहावे वर्ष होते. आता मात्र पूर्वीपेक्षाही जास्त कठीण काळाची सुरुवात झाली होती.
या वर्षीच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका म्हणजेच माननीय अली(र) यांचे पिता अबू तालिब यांचे देहावसन झाले.
‘अबू तालिब’ हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची खूप मदत करीत. त्यांचे संरक्षण करीत आणि इस्लाम व मुस्लिमांवर येणार्या संकटांना परतवून लावीत असत. त्यांच्या देहावसानामुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) खूप व्यथित झाले. शिवाय प्रेषितांचे पिता त्यांच्या जन्मापूर्वीच वारलेले असल्याने ‘अबू तालिब’ हेच त्यांचे पालक होते. त्यांनी आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त काळजीपूर्वक प्रेषितांचे पालनपोषण केले. प्रेषित या आकस्मात दुःखातून सावरलेही नव्हते तोच त्यांची भार्या सन्माननीय खदीजा(र) यासुद्धा स्वर्गवासी झाल्या. सन्माननीय खदीजा(र) या प्रेषित मुहम्मद(स) यांच्या केवळ पत्नींच नसून इस्लाम स्वीकारणार्या त्या प्रथम महिला होत्या. त्यांनी प्रेषितांना खूप साथ दिली होती. ज्या वेळेस प्रेषिताचे अश्रू पुसणारा कोणी नव्हता, त्या वेळी यांनीच त्यांना सावरले होते. त्यांना मायेची ऊब दिली होती. धीर दिला होता. आपली संपूर्ण संपत्ती इस्लामी आंदोनासाठी समर्पित केली होती. प्रत्येक पावलावर प्रेषितांना साथ दिली होती. त्यामुळे प्रेषितांवर दुःखाचे एका पाठोपाठ दोन डोंगर कोसळले.
अर्थात, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे रक्षण करणारे अबू तालिब आणि आपल्या सर्वार्थाने
मदत करणार्या खदीजा(र) दोन्ही निवर्तले आणि विरोधकांचे धैर्य वाढले. त्यांचा विरोध अधिकच तीव्र झाला. ईश्वरी इच्छेला कदाचित हेच मान्य होते की, आता सत्याने आपले रक्षण स्वतःच करावे आणि स्वतःच आपला मार्ग शोधावा.
प्रेषितांचे कट्टर विरोधक असलेले व त्यांच्याच कुरैश कबिल्याचे लोक नीचपणावर उतरले. टवाळ मुलांच्या झुंडीच्या झुंडी प्रेषितांना यातना देण्यासाठी त्यांच्या मागे लावण्यात आल्या. प्रेषित मुहम्मद(स) नमाज अदा करतेवेळेस हलकल्लोळ माजविण्यात येत असे. शिवीगाळ करण्यात येत असे. अंगावर थुंकण्यात येत असे.
एकदा इस्लामचा विरोधक ‘अबू लहब’ याची दुष्ट पत्नी ‘उम्मे जमील’ हिने प्रेषित मुहम्मद(स) यांना ठार करण्याचा बेत रचला. प्रेषितांना शोधताना ती काबागृहात आली. परंतु प्रेषित तिला दिसले नाहीत. एकदा इस्लामद्रोही ‘अबू जहल’ यानेदेखील प्रेषितांना दगडाने ठेचून वध करण्याचा मानस केला. परंतु त्याला यश मिळाले नाही.
यातनांचा अंत होत नव्हता. मारझोडदेखील होत होती. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स) यांना मारझोड झाली. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अमानवी कृत्य करण्यात आले. परंतु प्रेषितांनी संयमाने आपला धर्मप्रचार सुरुच ठेवला.

‘शरिअत’ म्हणजे काय व शरिअत आणि ‘दीन’ मध्ये काय फरक आहे?
दीन (जीवनधर्म) व शरिअत 
इस्लाम धर्मानुसार तुम्ही अल्लाहच्या अस्तित्वावर व त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर श्रद्धा बाळगावी, तसेच पारलौकिक जीवनात या जगातील सत्कर्माबद्दल मिळणारे इनाम व दुष्कर्माबद्दल मिळणारी शिक्षा या गोष्टीवर अल्लाहच्या सच्चा प्रेषितांनी जी शिकवण दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ईमान धारण करावे. ईशग्रंथांना मान्य करून आपल्या स्वैर आवडीच्या व पसंतीच्या मार्गाचा परित्याग करावा. या ग्रंथांमध्ये जो मार्ग दाखवून देण्यात आला आहे त्या मार्गाचाच अवलंब करा. अल्लाहच्या प्रेषितांचेच अनुयायीत्व करा व इतर सर्व गोष्टी सोडून त्यांच्याच आज्ञांचे पालन करा. ‘इबादत’ (उपासना) मध्ये अल्लाहखेरीज इतर कोणाचाही समावेश करु नका. त्याच ‘ईमान’ व ‘इबादत’ चे नाव ‘दीन’ असे आहे. हे सर्व प्रेषितांच्या शिकवणीत समाविष्ट आहे.
यानंतर शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे काय हे पाहू या. शरिअत (धर्मशास्त्र) म्हणजे उपासना करण्याच्या पद्धती, सामाजिक नियम व कायदे, ‘हराम’ (निषिद्ध) व ‘हलाल’ (वैध) इ. तसेच धर्मसंमत व धर्मअसंमत यांच्या मर्यादा वगैरे. या विविध बाबींसाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने भिन्नभिन्न काळांत भिन्नभिन्न जातीवंशाच्या व जनसमूहांच्या अवस्थांनुसार आपल्या प्रेषितांकरवी वेगवेगळ्या शरिअत-पद्धती पाठविल्या होत्या, जेणेकरून प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला नीती व सभ्यतेची, संस्कृतीची वेगवेगळी शिकवण देऊन त्यांना एका विशाल कायद्याच्या पालनासाठी तयार करीत राहावे. जेव्हा हे कार्य पूर्ण झाले तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना तो विशाल कायदा देऊन पाठविले. त्या विशाल कायद्याची एकूण कलमे व तरतूदी सर्व विश्वासाठी आहेत. आता ‘दीन’ तर तोच आहे जो आधीच्या प्रेषितांनी शिकविला होता. परंतु मागील सर्व ‘शरिअत-पद्धती’ मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी अशी ‘शरिअत’ प्रस्थापित केली गेली आहे ज्यामध्ये समस्त मानवजातीसाठी उपासनांच्या पद्धती, सामाजिक नियम, आपापसातील व परस्परातील संबंधाचे व व्यवहाराचे नियम, ‘हराम’ व ‘हलाल’ यांच्या मर्यादा, सर्वांना सारख्या लागू आहेत.
शरिअतच्या आज्ञा जाणून घेण्याची साधने
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शरिअतचे नियम व आदेश जाणण्यासाठी आपल्याकडे दोन साधने आहेत. पवित्र ‘कुरआन’ व ‘हदीस’ ही ती साधने होत.
पवित्र ‘कुरआन’ हा ईशग्रंथ आहे व त्यातील प्रत्येक शब्द अल्लाहकडून आहे हे तर तुम्ही जाणताच. प्रश्न उरला हदीसचा, हदीस म्हणजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उक्ती व कृतीबद्दलची माहिती आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘कुरआन’ चे प्रत्यक्ष आचरणाने घडविलेले स्पष्टीकरण आहे. प्रेषित्वाच्या प्राप्तीनंतर सतत तेवीस वर्षांच्या कालावधीपर्यंत ते सदैव शिकवण व उपदेश, मार्गदर्शनाच्या कार्यात मग्न असत. आपल्या वाणीने व आचरणाने ते लोकांना हे दाखवून देत असत की, अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे. त्यांच्या अत्यंत प्रभावी जीवनकालात त्यांचे (सहाबी) साथीदार पुरुष व साथीदार स्त्रिया, त्यांचे आप्तेष्ट, तसेच त्यांच्या पत्नी ही सर्व मंडळी प्रेषित मुहम्मद (स.) यांची प्रत्येक उक्ती लक्ष देऊन ऐकत असत, प्रत्येक कृत्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करीत असत, तसेच त्यांना वेळोवेळी सामोऱ्या येणाऱ्या व्यावहारिक समस्यांबद्दल ते प्रेषिताकडून शरिअतच्या आदेशाची मागणी करत असत. प्रेषित मुहम्मद (स.) कधी सांगत असत की अमुक काम करु नका व जे लोक त्या वेळी हजर असत ते ही उक्ती ऐकून घेऊन स्मरणात ठेवीत असत. त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद (स.) एखादे कृत्य काही विशिष्ट पद्धतीने करीत असत आणि तसे करताना त्यांना प्रत्यक्ष पाहणारे लोक ती विशिष्ठ पद्धत लक्षात ठेवीत असत. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नाही अशा लोकांना ते तंतोतंत वर्णन करुन सांगत असत. तसेच प्रेषितांच्या समक्ष कधी एखादा मनुष्य एखादे कृत्य करी तेव्हा प्रेषित कधी स्तब्ध राहात अगर त्याबद्दल आपली पसंती वा नापसंती व्यक्त करीत असत. हे सर्व हजर असणारे लोक आपल्या स्मृतीत जतन करून ठेवीत असत. असे जे काही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सोबती व साथीदार स्त्री पुरुषांनी ऐकले, काहींनी ते पाठांतराने मुखोद्गत करुन टाकले, काहींनी लिखाण करून त्यांच्या नोंदी करून ठेवल्या आणि ती माहिती कोणाकडून मिळाली यांचीही नोंद ठेवली, या सर्व रिवायतींना (निवेदनांना) पुढे पुढे एकत्रीकरण करुन त्यांना पुस्तकी स्वरुप देण्यात आले. अशाप्रकारे ‘हदीस’ चा एक मोठा संग्रह उपलब्ध झाला. हदीसचा संग्रह करणाऱ्यात प्रामुख्याने इमाम मालिक (रह.), इमाम बुखारी (रह.), इमाम मुस्लिम (रह.), इमाम तिरमिजी (रह.), इमाम अबू दाऊद (रह.), इमाम निसाई (रह.), इमाम इब्ने माजा (रह.) यांनी संग्रह केलेले ग्रंथ अधिक प्रमाणित मानले जातात.
‘फिकाह’ नियमावली
कुरआन व हदीस यातील सर्व आदेशांचा अभ्यास व अध्ययन करुन काही इस्लाम धर्मश्रेष्ठींनी सामान्य माणसांना सोयीस्कर होईल अशा रितीने खुलासेवार नियमावली तयार केली असून त्या नियमांना ‘‘फिकाह’’ असे म्हणतात. प्रत्येक मनुष्य कुरआनमधील सर्व बारकावे नीट समजू शकत नाही, तसे माणसाला हदीसचेही इतके ज्ञान प्राप्त नसते की त्याने स्वतःच शरिअतचे आदेश जाणून घ्यावे. म्हणून ज्या धर्मश्रेष्ठींनी वर्षानुवर्षे अध्ययन व संशोधन करून जो ‘फिकाह’ संकलित करून ठेवला आहे, त्यांच्या उपकाराचे ऋण जगातील मुस्लिम कधीही फेडू शकत नाहीत.
आज जगातील कोट्यवधी मुस्लिम कसल्याही श्रमाविना शरिअतच्या नियमाचे पालन करीत आहेत. तसेच ईश्वराचे व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदेश जाणणे कोणालाही अवघड वाटत नाही. हे त्या धर्मश्रेष्ठींनी घेतलेल्या खडतर परिश्रमाचेच फळ आहे.
आरंभीच्या काळात अनेक धर्मश्रेष्ठींनी ‘फिकाह’ चे संकलन आपापल्या पद्धतीने करून ठेवले होते, परंतु पुढे फक्त चार फिकाहच अखेरीस उरले व जगातील मुस्लिम सर्वाधिक त्यांचेच आज्ञापालन करीत आहेत. त्या चार ‘फिकाह’ खालीलप्रमाणे आहेत.
(१) इमाम अबू हनीफा (रह.) यांची फिकाह. या फिकाहचे संकलन करण्यात इमाम अबू युसूफ (रह.), इमाम मुहम्मद (रह.), इमाम जाफर (रह.) व तसे आणखी काही श्रेष्ठ धर्मपंडितांचा सल्ला समाविष्ट होता. याला ‘फिकाह हनफी’ असे नाव आहे.
(२) इमाम मालिक (रह.) ची फिकाह. ही फिकाह ‘मालिकी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
(३) इमाम शाफई (रह.) ची फिकाह. याला ‘फिकाह शाफई’ असे म्हणतात.
(४) इमाम अहमद बिन हम्बल (रह.) ची फिकाह. याला फिकाह ‘हम्बली’ असे म्हटले जाते.
या चारही नियमावली (फिकाह चे संकलन) प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या निधनानंतर २०० वर्षांच्या कालावधीच्या आत संकलित झालेले आहेत. या चार फिकहमध्ये जे काही भेद आहेत ते अगदी स्वाभाविक फरक आहेत. एखादी घटना अथवा एखादा व्यवहार याची काही वेगवेगळे लोक जेव्हा सखोल चौकशी करतात किंवा एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या चौकशीच्या निष्कर्षात व त्यांच्या संकलित माहितीत थोडीफार तफावत अवश्य असतेच. परंतु वरील चारही धर्मश्रेष्ठी सद्हेतु धारण करणारे व मुस्लिमांचे हितचिंतक होते. म्हणून सर्व मुस्लिम या चारीही धर्मश्रेष्ठींना सत्याधिष्ठित मानतात.
अर्थातच आपल्या सर्व जीवनव्यवहारांसंबधी कोणतीही एकच फिकाह पद्धत अवलंबली जाऊ शकते. चार विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकत नाही; ही गोष्ट उघड आहे. म्हणून बहुतेक इस्लामी धर्मपंडितांचे असे मत आहे की मुस्लिमांनी या चार फिकाहपैकी कोणत्याही एकाचाच अवलंब करणे अगत्याचे आहे. याशिवाय इस्लाम धर्मपंडितांचा एक समूह असा आहे ज्याच्या म्हणण्यानुसार कोणत्याही एका विशिष्ट नियमावलीचा अवलंब करणे आवश्यक नाही, ज्ञान व माहिती असणाऱ्या प्रत्येक माणसाला ‘कुरआन’ व ‘हदीस’ मधून थेट आदेश प्राप्त करुन घ्यावयास हवे. जे विद्येपासून वंचित आहेत त्यांनी ज्या धर्मपंडितावर त्यांची श्रद्धा असेल त्याचे अनुकरण करावे. त्यांना ‘‘अहले हदीस’’ असे संबोधिले जाते. वरील चार समूहाप्रमाणे हा पाचवा समूहसुद्धा सत्त्याधिष्ठित आहे.
(१) मान. इमाम अबु हनीफा (रह.) ८० हि. (इ.स. ६९९) जन्माला आले. मृत्यू १७१ हि (इ.स. ७६७) मध्ये झाला. या फिकाहचे अनुयायी तुर्कस्तान, पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, इंडोचीन रशिया इ. मध्ये आहेत.
(२) मान. इमाम मालिक अनस - जन्म ९३ हि (इ.स.७१४), मृत्यू १७१ हि (इ.स.७९८). या फिकहचे मानणारे मॉरिशस अहजेरिया, सुडान, ट्युनिशिया, कुवेत व बहरीनमध्ये आहेत.
(३) मा. इमाम इदरीस बिन शाफई (रह.) जन्म १५० हि (इ.स. ७६७), मृत्यू २४० हि (इ.स.८५४). यांचे अनुयायी पॅलेस्टाईन, लेबेनान, इजिप्त, इराक, सऊदी, अरब, यमन व इंडोनिशियामध्ये आहेत.
(४) मा. इमाम अहमद बीन हम्बल (रह.) जन्म १६४ हि (इ.स. ७८०), मृत्यू २४१ हि. (इ.स. ८५५). यांचे अनुयायी अधिकांश सऊदी अरब, लेबेनान व सीरियामध्ये आहेत.
‘तसव्वुफ’ (आत्मशुद्धी)
फिकाहचा संबंध माणसाच्या दर्शनी कृतीशी आहे. फिकाह फक्त इतकेच पाहत असते की, तुम्हाला जसा व ज्या प्रकारे आदेश दिला गेला आहे, तो तुम्ही पार पाडला आहे किंवा नाही. जर तुम्ही तो आदेश पार पाडला असेल तर तुमच्या अंतःकरणाच्या स्थितीशी फिकाहला काही कर्तव्य नाही. मनाच्या स्थितीशी संबंध असणाऱ्या गोष्टीला ‘तसव्वुफ’(१) असे नाव आहे. उदाहरणार्थ तुम्ही नमाज पढता, या उपासनेत फिकाह केवळ इतकेच पाहतो की तुम्ही वजू नीट केला आहे किंवा नाही, काबागृहाकडे तोंड करून उभे आहात की नाही, नमाजचे सर्व अनिवार्य विधी केले किंवा नाही, नमाजमध्ये ज्या सूत्राचे पठन करावे लागते ते तुम्ही केले किंवा नाही. ज्या समयी जितकी ‘रकाआत’ नमाज ठरलेली आहे अगदी त्याच वेळी तुम्ही तितकीच नमाज अदा केली आहे किंवा नाही. इतके सर्व तुम्ही पूर्ण केले तर फिकाहच्या दृष्टीने तुमची नमाज पूर्ण झाली. परंतु उपासना करताना तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय होती, तुमच्या मनाची एकाग्रता ईश्वराकडे होती किंवा नाही, तुमचे मन या जगातील विचारापासून निर्मळ होते किंवा नाही. नमाजमुळे तुमच्या मनात ईशभय, ईश्वराचे सर्वज्ञानी व सर्वव्यापी असण्यावरील विश्वास व केवळ ईश प्रसन्नता प्राप्त करण्याची भावना निर्माण झाली किंवा नाही. या नमाजमुळे तुमची आत्मशुद्धी किती प्रमाणात झाली. तुमचे चारित्र्य कितपत सुधारले, नमाजने तुम्हाला किती प्रमाणात सच्चा व पक्का कृतीशील मुस्लिम बनवून सोडले, वरील सर्व बाबींचा तसव्वुफ उहापोह करतो.
१) कुरआनमध्ये यालाच ‘तझकिया’ (आत्मशुद्धी व ‘हिकमत’) असे म्हटले आहे. हदीसमध्ये याला ‘एहसान’ असे संबोधले गेले आहे व नंतरच्या लोकांत हीच गोष्ट ‘तसव्वुफ’ या नावाने सुप्रसिद्ध झाली.
नमाजच्या मूळ हेतूशी संबंध असणाऱ्या या सर्व बाबी जितक्या अधिकाधिक प्रमाणात तुमच्यात निर्माण होतील तितक्याच प्रमाणात तुमची नमाज ‘तसव्वुफ’च्या दृष्टीने अधिक परिपूर्ण होईल. या गोष्टींची जितक्या प्रमाणात तुमच्यात उणीव असेल तितक्याच प्रमाणात ‘तसव्वुफ’ तुमची नमाज दोषयुक्त ठरवील. याच तऱ्हेने ‘शरिअत’ चे जे काही आदेश ज्या स्वरुपात दिले गेले होते त्याच स्वरुपात तुम्ही त्यांचे पालन केले आहे किंवा नाही; फिकाह एवढेच पाहते. तर या आदेशांचे पालन करताना तुमच्या अंतःकरणात निष्ठा, प्रामाणिकपणा, सद्भाव व खरा आज्ञाधारकपणा किती प्रमाणात होता. या बाबींची चिकित्सा ‘तसव्वुफ’ करतो.
या दोहोंमधील फरक खालील उदाहरणावरुन अधिक स्पष्टपणे कळू सकतो. तुम्हाला जेव्हा एखादा मनुष्य भेटतो तेव्हा तुम्ही दोन दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता. एक म्हणजे तो शारीरिकपणे सुदृढ व निकोप प्रकृतीचा आहे किंवा नाही. तो आंधळा, लंगडा, पांगळा तर नाही? देखणा आहे की कुरुप, कपडे नीटनेटके व स्वच्छ आहेत की घाणेरडा आहे. तुमचा दुसरा दृष्टिकोन असा असेल की त्याचे चारित्र्य कशा प्रकारचे आहे? त्याच्या सवयी व गुणवैशिष्ठ्ये कशी आहेत. त्याची बुद्धिमत्ता व व्यवहारी ज्ञान कसे आहे, तो विद्वान आहे की अडाणी, सदाचारी आहे की दुराचारी? वरील पहिला दृष्टिकोन फिकाहचा आहे तर दुसरा दृष्टिकोन तसव्वुफचा आहे.
मैत्रीखातर जेव्हा तुम्हाला एखादा मनुष्य निवडायचा असेल तेव्हा त्याचे व्यक्तीमत्त्व तुम्ही या दोन्ही दृष्टिकोनांतून पडताळून पाहाल. त्याचे अंतरंग तसेच बाह्यरूप चांगले असावे अशीच तुमची इच्छा असेल. त्याचप्रमाणे शरिअतच्या आदेशांचे पालन बाह्यत्कारी व दर्शनी दृष्टीनेही अचूक असावे व मानसिक दृष्टिकोनाने ते निकोप असावे. अशाच प्रकारचे जीवन इस्लाममध्येही अधिक पसंत आहे. ज्याचे बाह्यत्कारी आज्ञापालन बरोबर आहे, परंतु अंतःकरणात जर आज्ञाधारकत्व नसेल तर त्याच्या कर्माची उपमा एका देखण्या परंतु मृत माणसासारखी आहे. तसेच ज्या माणसाच्या कर्मात आंतरिक सर्व गुण आहेत, परंतु त्याची दर्शनी कृती अचूक नसेल तर त्याला एखाद्या सभ्य व सदाचारी पण अत्यंत कुरुप व दिसावयास ओंगळ अशा माणसाची उपमा देता येईल.
या उदाहरणावरून तुम्हाला ‘फिकाह’ व ‘तसव्वुफ’ यांचा परस्पर संबंधही लक्षात आला असेल. परंतु खेदाची गोष्ट अशी की नंतरच्या काळात विद्येची व चारित्र्याची अधोगती झाली. त्यात अनेक दोष निर्माण झाले. तसेच ‘तसव्वुफ’ चा निर्मळ झराही गढूळ झाला. मार्ग चुकलेल्यांकडून मुस्लिमांनी, नाना प्रकारची बिगरइस्लामी तत्त्वे शिकून व त्यांना ‘तसव्वुफ’ च्या नावाखाली इस्लाममध्ये समाविष्ट करून टाकले. अनेक प्रकारच्या चमत्कारिक व विलक्षण श्रद्धा व पद्धतींना ‘तसव्वुफ’ ची लेबले चिकटवली गेली. त्यांना ‘कुरआन’ व ‘हदीस’मध्ये कसलेही स्थान नाही. नंतर या प्रवृत्तीच्या लोकांनी हळूहळू स्वतःला शरिअतच्या बंधनातूनही विमुक्त करून घेतले. तसव्वुफच्या शरिअतशी कसलाही संबंध नाही व हा मार्गच वेगळा आहे असे ते म्हणतात. सुफी माणसाला कायदा व नियमांचे बंधन पाळण्याचे कसले कर्तव्य आहे? अशा तऱ्हेचे विचार बहुतेक अडाणी सुफींच्या तोंडून ऐकावयास मिळतात. परंतु वास्तवात हे अगदी चूक आहे. शरिअतमधील आदेशाशी कसलाही संबंध नसलेला तसव्वुफ इस्लाममध्ये असण्यास वाव नाही. नमाज, रोजे, जकात व हजच्या बंधनातून मुक्त होण्याचा कोणाही सुफीचा हक्क नाही. जे सामाजिक नियम, आर्थिक नियम, आचार व व्यवहार, हक्क व कर्तव्ये, हलाल व हराम यांच्या मर्यादा अल्लाहने व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखवून दिले आहेत त्या नियमांविरुद्ध आचरण करण्याचे कोणत्याही सुफी माणसाला हक्क प्राप्त होत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे खरेखुरे अनुयायीत्व न करणाऱ्या व त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीचे पालन न करणारा माणूस हा मुस्लिम सुफी म्हणवून घेण्यासच पात्र नाही. खरेतर तसव्वुफ हे अल्लाह व त्याचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावरील गाढ प्रेम व आसक्तीचेंच नाव आहे. हे गाढ प्रेम तर अशी निकडीची मागणी करते की माणसाने अल्लाहच्या व त्याच्या प्रेषिताच्या आज्ञांचे पालन करण्यात तसूभरही कसूर करता कामा नये. म्हणून शरिअतपासून वेगळी अशी इस्लामी तसव्वुफ नामक कसलीही गोष्ट नाही. उलट शरिअतचे आदेश अत्यंत निष्ठापूर्वक व सद्भावनेने पाळणे तसेच आज्ञापालनात अल्लाहचे प्रेम व अल्लाहचे भय ओतप्रोत भरून टाकणे; याचेच नाव तसव्वुफ आहे.

कुरआनमध्ये हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला आहे.
‘‘तुम्ही ज्यांची भक्ती करता त्याच्या (अल्लाह) सह, ती सर्व नावे आहेत जी तुम्ही आणि तुमच्या वाडवडिलांनी ठेवलेली आहेत.’’
‘‘त्यांनी उत्तर दिले, काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा (भक्ती) करतो आणि त्यांच्याच सेवेत आम्ही लागलेलो असतो.’’ (कुरआन २६: ७१)
वरील कुरआन आयतींनुसार इतर कुणाची (अल्लाहला सोडून) पूजा अर्चा करणे अथवा भक्ती करणे म्हणजेच त्याची (इतरांची) उपासना करणे आहे. अनेकेश्वरवादीं आपल्या मूर्तींशी जो व्यवहार करतात त्यास पूजा (भक्ती) म्हणून येथे संबोधले आहे. म्हणूनच अनेकेश्वरवादी आणि त्यांच्या मूर्तींच्या दरम्यान जो संबंध प्रस्थापित होतो त्याला पूजा (भक्ती) असे म्हटले जाते.
‘‘जे लोक खोट्या ईश्वरांच्या (तागूत) भक्ती (पूजा) पासून अलिप्त राहिले आणि अल्लाहकडे रुजू झाले त्यांच्यासाठी खूशखबर आहे.’’ (कुरआन ३९: १७)
‘‘काय मी त्या लोकांचा निर्देश करु, ज्यांचा शेवट अल्लाहपाशी अवज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते अल्लाहने ज्यांचा धिक्कार केला. आणि ज्यांच्यावर त्याचा कोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड व डुक्कर बनविले गेले, ज्यांनी मूर्तींची (तागूत) ची भक्ती (पूजा) केली, त्यांचे स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते सन्मार्गापासून दूरवर भरकटलेले आहेत.’’ (कुरआन ५: ६०)
कुरआनच्या या आयतींनुसार कुणा एकाला सार्वभौम मान्य करून त्याच्या आदेशांचे स्वेच्छेने आज्ञापालन करणे म्हणजेच त्याची पूजा (भक्ती) करणे होय. जे खोट्या ईश्वरांशी असा व्यवहार करतात त्याससुध्दा पूजा (भक्ती) असे संबोधले गेले आहे. वरील आयतीत ‘‘तागूत’’ या शब्दाचा प्रयोग झाला आहे. अरेबिक भाषेत तागूतचा अर्थ होतो ‘‘मर्यादांचे उल्लंघन करणारा’’ तसेच विद्रोह करणारा. तत्त्वतः तागूत म्हणजे असा समुदाय जो दुसऱ्यांना अल्लाहच्या भक्ती (पूजा) पासून दूर ठेवतो आणि विनाशाकडे ढकलतो. याच अर्थाने सैतान आणि मूर्तींना ‘तागूत’ म्हणून संबोधले गेले आहे. याचप्रमाणे ते राज्यप्रमुख, उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी मंडळी आणि धार्मिक नेते ज्यांना अल्लाहच्या कोपचे भय नाही. तसेच जे अल्लाहच्या आदेशांची पायमल्ली करतात आणि जे आपले विचार व इच्छा यांना कायद्याचा दर्जा देतात असे सर्व लोक ‘तागूत’च्या व्याख्येत मोडतात. जे लोक यांचे आज्ञापालन करतात आणि अशा तागूतांचा (द्रोहींचा) आदर सन्मान करतात, त्यांना कायदेकानू बनविणारे आणि निर्णय (न्यायनिवाडा) करणारे ठरवतात, ते सर्वजण तागूतांचे श्रध्दापूर्वक आज्ञापालन करून त्यांना ईश्वरस्थानी बसवतात. कुरआन याच कृतीला ‘‘खोट्या ईश्वरांची पूजा’’ म्हणून ठरवतो. अशा लोकांची कृती त्यांच्या खोट्या ईश्वरांची (तागूत) ची पूजा (भक्ती) च आहे. स्वेच्छेने आणि आनंदाने अशा ‘तागूतांचे’ आज्ञापालन करणे दूसरे तिसरे काहीच नसून त्यांची भक्तीच आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेजाव केला व म्हणू लागले, काय आम्ही आमच्याचसारख्या दोन माणसांवर श्रध्दा ठेवावी? आणि माणसेही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे? म्हणून त्यांनी दोघांना खोटे ठरविले आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले.’’ (कुरआन २३ :४७)
‘‘उरले तुझे उपकार ज्यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहेस, तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी इस्राईलांना गुलाम बनविले होते.’’ (कुरआन २६: २२)
वरील कुरआनोक्तींनुसार हेच सिध्द होते की स्वेच्छेने आणि आनंदाने आज्ञाधारकता स्वीकारणेच फक्त भक्ती होत नाही तर अनेच्छेने, परंतु हेतुपुरस्सर आणि समजून-उमजूनसुध्दा ज्यांची आज्ञाधारकता स्वीकारली जाते तीसुध्दा भक्ती आहे. ज्यांची पूजा होते ते स्वतः मग सार्वभौम सत्तेत सहभागी समजत नसतील तरी ईश्वराचा दर्जा देऊन त्यांची भक्ती होते. (मग ती माणसं असोत (मृत अथवा जिवंत) की दगड-धोंडे, पशु-पक्षी, झाडे-झुडपे असोत) याचसाठी वरील कुरआनोक्तीमध्ये बनी इस्राईलांना गुलाम बनविले गेले असा उल्लेख आला आहे. कारण ते अल्लाहला सोडून इतरांची भक्ती करीत होते. ते स्वेच्छेने इतरांचे गुलाम बनले नव्हते. तात्कालीन राजकीय दबावामुळे आणि त्यांच्या कमकुवतपणामुळे त्यांना अत्याचारींच्या पुढे नतमस्तक व्हावे लागले. जो स्वतःला सार्वभौम समजतो आणि त्याची आज्ञाधारकता सरळ सरळ होत असेल तर हे कृत्यसुध्दा त्या राजाचे अथवा राज्यप्रमुखाची पूजा (भक्ती) आहे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आदमच्या मुलांनो, मी तुम्हाला आदेश दिला नव्हता काय की सैतानाची भक्ती करू नका, तो तुमचा उघड शत्रू आहे आणि माझीच भक्ती करा, हा सरळ मार्ग आहे?’’ (कुरआन ३६: ६९)
‘‘हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत?’’ (कुरआन १९: ४२)
‘‘बाबा, सैतानाची भक्ती करू नये.’’ (कुरआन १९: ४४)
वरील आयतींनुसार आणखी दुसऱ्या प्रकारच्या भक्तीचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणजे एखाद्याची पूर्ण अनावधानाने पूर्ण आज्ञाधारकतासुध्दा भक्तीच ठरते. येथे कुरआनची ही संकेतवचनं सैतानाच्या अशा भक्तीला स्पष्ट करत आहेत की लोकांचे आचरण आणि विश्वास हा सैतानाच्या भक्तीशी तंतोतंत जुळतो. तसे पाहता त्यांच्यापैकी कोणीही सैतानापुढे नतमस्तक होत नाही अथवा सैतानाची उपासना करीत नव्हता. त्यांच्यापैकी कोणीही सैतानाला आपला पालनकर्ता किवा मार्गदर्शक म्हणून स्वीकारले नव्हते आणि सैतानाबद्दल कुणालाही आदर नव्हता. दुसऱ्या लोकांप्रमाणेच या मंडळीच्या मनात सैतानाबद्दल तिरस्कारच होता. परंतु असे असतानासुध्दा त्यांना ‘सैतानाचे पुजारी अथवा भक्त’ म्हटले गेले. वरील आयतीत त्यांना स्पष्ट आदेश दिला की ‘‘सैतानाची भक्ती करू नका.’’ कुरआननुसार अनावधानाने जरी आज्ञाधारकता होत असेल आणि त्यांचे कृत्य आणि विश्वास सैतानाच्या किवा त्याच्या चेल्यांसारखे असतील तर ती ‘चुकून झालेली आज्ञाधारकता’सुध्दा सैतानाची भक्तीच ठरते.
कुरआनच्या वरील आयतींमध्ये भक्ती या शब्दाचा वापर रूपकात्मकरित्या झालेला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. हे कुरआन, हदीस अथवा शब्दकोशाच्या अगदी विरुध्द आहे. भक्ती (उपासना) या शब्दाचा अर्थ फक्त पूजा-अर्चा असा होत नाही तर त्याचा अर्थ वरील आयतींनुसारच कुरआनमध्ये सर्वत्र आला आहे. वर नमूद केलेल्या भक्तीचे चार प्रकार हे त्याच शब्दाच्या व्यापक अर्थाचे प्रभाग आहेत. भक्ती आज्ञाधारकता आहे. जाणीवपूर्वक आणि अजाणतेने केलेली आज्ञाधारकतासुध्दा भक्ती आहे. आज्ञाधारकतेविना भक्ती काहीही नाही. कुरआननुसार आज्ञाधारकता भक्ती (पूजा, उपासना) आहे, तर याचाच अर्थ असा आहे की आज्ञाधारकतेचे इतर तीन प्रकारसुध्दा भक्ती आहे. कुरआननुसार आज्ञाधारकता त्याचा खरा अर्थ तेव्हाच प्राप्त करते जेव्हा भक्ती आणि आज्ञाधारकता हे दोन्ही शब्द एकत्र वापरले जातात. अशा प्रकारे आज्ञाधारकता हा शब्द व्यापक आहे. ज्यामध्ये भक्ती आणि आज्ञाधारकता दोन्हींचा समावेश होतो. त्याचे स्वरूप व व्याप्ती धार्मिक गरजांचे आणि इस्लामी आदेशांचे पालन आहे

इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था काय आहे आणि जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम आम्ही त्या फरकाला चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे जो आध्यात्माची दृष्टीकोन कल्पना आणि इतर धर्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनामध्ये आढळून येतो. हा फरक चांगल्या प्रकारे अवगत न झाल्याने पुष्कळदा असे होते की इस्लामच्या आध्यात्मिक व्यवस्थेवर चर्चा करीत असताना माणसाच्या मनात पुष्कळशा अशा कल्पना वावरू लागतात ज्या सर्वसाधारणतः ‘आध्यात्मिकता’ या शब्दाशी संबंधित आहेत. या गोंधळात पडून माणसाला हे समजणे कठीण होते की शेवटी ही कसली आध्यात्मिक व्यवस्था आहे जी आत्म्याच्या सुपरिचित अशा क्षेत्रामधून जाऊन अस्तित्व व शरीराच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते आणि केवळ हस्तक्षेप करत नसून त्यांच्यावर अधिकार गाजवू इच्छिते.

तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही. आत्म्यासाठी शरीर आणि जडत्वाचे विश्व हा एक तुरूंग आहे. ऐहिक जीवनाच्या गरजा व आवडीनिवडी या त्या हातकड्या व बेड्या आहेत ज्यामध्ये आत्मा जखडला जातो. जगाचे व्यवहार व कारभार ही ती दलदल आहे, ज्यामध्ये रूतून आत्म्याची झेप संपुष्टात येते. या कल्पनेचा अनिवार्य परिणाम हा आहे की आध्यात्मिकता आणि संसारिकता यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. ज्या लोकांनी संस्काराचा अंगिकार केला आहे ते पहिल्या पावलालाच निराश होतात की आध्यात्मिकतेचा अवलंब करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. या गोष्टीने त्यांना भौतिकतेमध्ये गुरफूटन टाकलेले आहे. सामाजिक व्यवहार, संस्कृती, राजकारण, अर्थकारण वगैरे जीवनाची सारी क्षेत्रे आध्यात्मिकतेपासून वंचित झाली आणि त्यांनी आत्म्याच्या उन्नतीसाठी असे मार्ग शोधून काढले जे संसारिक जीवनाच्या बाहेरूनच निघून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक उन्नतीचा असा मार्ग तर शक्यच नाही जो संसारिक जीवनामधून जातो. त्याच्याजवळ आत्म्याच्या विकासासाठी शरीराला दुर्बल करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अशा शारीरिक कष्टाच्या पद्धती शोधून काढल्या ज्या मनाला मारणाऱ्या आणि शरीराला अचेतन किवा निर्जीव करणाऱ्या होत्या. आत्म्याच्या प्रशिक्षणासाठी अरण्य, पर्वत आणि एकांतवासाला त्यांनी उचिततम स्थाने समजली. यासाठी संस्कृतीच्या गोंगाटाने ज्ञानध्यान साधनेमध्ये व्यत्यय न येवो, आत्म्याच्या विकासाची याशिवाय दुसरी कोणतीही पद्धत त्यांना आढळून आली नाही की जग आणि संसारापासून दूर व्हावे आणि या सर्व संबंधांना तोडून टाकावे जे तिला भौतिकतेच्या विश्वाशी निगडित ठेवतात. शरीर व आत्म्याच्या ह्या विरोधाने माणसाच्या पूर्णत्वाचे पण दोन वेगवेगळे अर्थ व उद्दिष्टे निर्माण केली. एकीकडे ऐहिक जीवनाचे पूर्णत्व, याचा अर्थ हा ठरला की माणसाने फक्त भौतिक साधनाने समृद्ध व्हावे. आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला पक्षी, एक चांगली सुसर, एक उमदा घोडा व एक यशस्वी लांडगा बनावे. दुसरीकडे आध्यात्मिक जीवनाचे पूर्णत्व, ज्याचा अर्थ हा ठरला की माणसाने काही अलौकिक शक्तींचा स्वामी बनावे आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला रेडिओ सेट, एक सामर्थ्यशाली दुर्बीण आणि एक नाजुक सूक्ष्मदर्शक यंत्र बनावे किवा त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या शब्दांनी एका परिपूर्ण अशा दवाखान्याचे कार्य करावे.

इस्लामचा दृष्टिकोन याबाबतीत जगातील सर्व धार्मिक व तात्त्विक पद्धतीपासून वेगळा आहे. तो म्हणतो की मानवी आत्म्याला ईश्वराने जमिनीवर आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्यावर काही जबाबदाऱ्या व काही कर्तव्ये सोपविली गेली आहेत आणि त्या पार पाडण्यासाठी त्याला एक उत्कृष्ट व अनुरूप असे शरीर दिलेले आहे. हे शरीर त्याला फक्त यासाठी दिले गेले आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर आणि आपल्या संबंधित सेवेचे पालन करण्यासाठी त्याचा उपयोग करावा आणि म्हणून हे शरीर आत्म्याचा तुरूंग नसून त्याचा तो कारखाना आहे आणि या आत्म्याचा काही विकास जर शक्य आहे तर तो याच पद्धतीने शक्य आहे की त्याने या कारखान्यातील उपकरणे व शक्तींचा वापर करून आपली योग्यता प्रकट करावी आणि हे जगही एखादी शापित जागा नव्हे, ज्यामध्ये मानवी आत्मा येऊन फसलेला आहे, असे नसून याउलट जग हे एक असे कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये कार्य करण्यासाठी ईश्वराने त्याला पाठविलेले आहे. येथील अगणित वस्तू त्याच्या अधिकारात दिल्या गेल्या आहेत. येथे प्रतिनिधीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी इतर अनेक माणसेही त्याच्याबरोबर निर्माण केली गेली आहेत. येथे स्वाभाविक गरजेपोटी संस्कृती, समाज जीवन, व्यावहारिक जीवन, राजकारण आणि जीवनाची दुसरी क्षेत्रे त्याच्यासाठी अस्तित्वात आणली गेली आहेत. येथे जर आध्यात्मिक प्रगती शक्य असेल तर तिचे स्वरूप हे आहे की त्याने कार्यक्षेत्रात राहून कार्य करून आपली पात्रता सिद्ध करावी. हे जग म्हणजे त्याच्यासाठी एक परीक्षागृह आहे. जीवनाचा प्रत्येक पैलू आणि प्रत्येक क्षेत्र जणू एक प्रश्न पत्रिका आहे. घर, मोहल्ला, बाजार, मंडई, काऱ्यालय, कारखाना, शाळा, कचेरी, ठाणे, छावणी, संसद शांतिपरिषद व रणमैदान हया सर्व वेगवेगळ्या विषयावर प्रश्नपत्रिका आहेत. यापैकी एखादी जरी प्रश्नपत्रिका त्याने सोडविली नाही किवा पुष्कळशा प्रश्नपत्रिका तशाच सोडून दिल्या तर परिणाम त्याला शून्य मिळण्याखेरीज दुसरा काय होऊ शकतो? यशाची आणि प्रगतीची शक्यता जर होऊ शकते तर ती याचप्रकारे होऊ शकते की त्याने त्याला देण्यात आलेला सर्व कालावधी आणि आपले सर्व लक्ष परीक्षा देण्यासाठी वापरावे आणि जितक्या प्रश्नपत्रिका त्याला दिल्या गेल्या असतील त्यामध्ये त्याने काही ना काही करून दाखवावे.

अशाप्रकारे इस्लाम जीवनाबद्दलच्या वैराग्याच्या कल्पनेला रद्द करतो आणि माणसासाठी आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जीवनाबाहेर नसून तो जीवनामध्येच आहे हे स्पष्ट करतो. आत्म्याचा विकास, वृद्धी कल्याण व सफलतेची खरी जागा त्याच्या दृष्टीने जीवनाच्या ऐन प्रवाहामध्ये आहे, त्याच्या किनाऱ्यावर नव्हे. आता आम्हाला हे पाहिले पाहिजे की तो आमच्या प्रगती व अधोगतीची कसोटी काय ठरवितो? या प्रश्नाचे उत्तर याच प्रतिनिधीत्वाच्या कल्पनेमध्ये सामाविलेले आहे, ज्याचा मी नुकताच उल्लेख केलेला आहे. प्रतिनिधीच्या नात्याने माणूस आपल्या जीवनातील कृतीबद्दल ईश्वरासमोर जबाबदार-उत्तरदायी आहे. त्याचे कर्तव्य हे आहे की जमिनीवर जे अधिकार आणि जी साधने त्याला दिली गेली आहेत त्याचा वापर त्याने ईश्वराच्या इच्छेनुसार करावा. ज्या निरनिराळ्या प्रकारच्या संबंधानी त्याला दुसऱ्या माणसांच्याबरोबर निगडित केले गेले आहे त्यांच्याबाबतीत त्याने अशी वर्तणूक ठेवावी जी ईश्वराला पसंत आहे आणि आपले एकूण एक प्रयत्न व श्रम या मार्गात कारणी लावावेत की ही पृथ्वी आणि त्याच्या जीवनाची व्यवस्था जितकी उत्कृष्ट व्हावी असे ईश्वर इच्छितो तितकी ती उत्कृष्ट व्हावी. या सेवेला माणूस जबाबदारी, कर्तव्यपालन, भक्ती व आज्ञापालन आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करणे इ. गोष्टीसह जितक्या जाणिवेने पार पाडील त्याचप्रमाणात तो ईश्वराच्या निकट होईल आणि ईश्वराची जवळीक इस्लामच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगती आहे. याउलट तो जितका आळशी, कामचुकार व कर्तव्यविन्मुख होईल किवा तो जितका बंडखोर, द्रोही व अवज्ञाकारी होईल तितका तो ईश्वरापासून दूर होईल आणि ईश्वरापासून दूरत्वाचे नाव इस्लामी परिभाषेत आध्यात्मिक अवनती आहे.

या विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामी दृष्टिकोनानुसार धार्मिक व भौतिकवादी या दोघांचे कार्यक्षेत्र एकच आहे जेथे दोघे कार्य करतील, तथापि धार्मिक माणूस भौतिकवादी माणसांपासून अधिक तन्मयतेने कार्यमग्न असेल. घराच्या चार भितीपासून आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठापर्यंत जितके म्हणून जीवनाचे प्रश्न आहेत, धार्मिक माणूस भौतिकवादी माणसाप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याच्यापेक्षा काही अधिक प्रश्नाचा तो विचार करील. तथापि जी गोष्ट त्या दोघांचे मार्ग वेगवेगळे करील ती त्यांचे ईश्वरासंबंधाने स्वरूप ही आहे. धार्मिक माणूस जे काही करील ते या जाणिवेने करेल की तो ईश्वरासमोर जबाबदार आहे. या गरजेपोटी करील की त्याला ईश्वराची प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि या कायद्यानुसार करील जो ईश्वराने त्याच्यासाठी ठरवलेला आहे. याउलट भौतिकवादी माणूस जे काही करील ते बेजबाबदारीने करील. ईश्वराबद्दल बेपर्वा राहून करेल आणि आपल्या मन मानेल त्या पद्धतीप्रमाणे करील. हाच फरक धार्मिक माणसाचे सारे भौतिक जीवन पूर्णपणे आध्यात्मिक जीवन बनवितो आणि भौतिकवादी माणसाचे सारे जीवन आध्यात्म्याच्या प्रकाशापासून वंचित करतो.

आता मी थोडक्यात आपणास दाखवून देईन की इस्लाम ऐहिक जीवनाच्या या बिकट मध्यप्रवाहातून माणसाच्या आध्यात्मिक उत्कर्षाचा मार्ग कसा तयार करतो.

या मार्गाचे पहिले पाऊल ईमान आहे. म्हणजे माणसाच्या मनात व डोक्यात हा विचार कायम होतो की अल्लाहच त्याचा स्वामी, शासक व ईश आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे आणि अल्लाहचीच आज्ञा हा त्याच्या जीवनाचा कायदा आहे. हा विचार जितका दृढ व प्रभावी होईल तितकीच दृढ इस्लामी विचारसरणी बनेल आणि त्या प्रमाणात दृढनिश्चऱ्याने माणूस आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालू शकेल.

या मार्गाचा दुसरा टप्पा आज्ञापालन हा आहे म्हणजे माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडावी, प्रत्यक्षात त्या ईश्वराची ताबेदारी पत्करावी ज्याला श्रद्धेने आपला ईश्वर मानतो. याच आज्ञापालनाचे नाव कुरआनच्या भाषेत ‘इस्लाम’ आहे.

तिसरा टप्पा - ‘तक्वा’ संयम व विवेकाचा आहे. याला सर्वसामान्य भाषेत ‘‘कर्तव्यपरायणता व जबाबदारीची जाणीव’’ म्हणून ओळखले जाऊ शकते. तक्वा हा आहे की माणसाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये हे समजून कार्य करावे की त्याला आपल्या विचारांचा, वचनाचा आणि कृतीचा ईश्वरासमोर जाब द्यावयाचा आहे. ईश्वराने मनाई केलेल्या प्रत्येक कामापासून त्याने स्वतःला रोखावे. ईश्वराने आज्ञा केलेली प्रत्येक सेवा पार पाडण्यासाठी त्याने तयार व्हावे आणि पूर्ण सावधानतेने हलाल व हराम, योग्य व अयोग्य आणि चांगले व वाईट यांच्यामध्ये भेदभाव करून तारतम्याने वागावे.

शेवटचा व सर्वात उंट टप्पा ‘एहसान’ (समर्पण) आहे. एहसानचा अर्थ हा आहे की माणसाची इच्छा ईश्वराच्या इच्छेशी एकरूप व्हावी जी काही ईश्वराची आवड आहे, दासाची पण आवड तीच व्हावी आणि जे काही ईश्वराला नापसंत आहे त्यास दासानेही मनाने नापसंत करावे. ईश्वर आपल्या जमिनीवर ज्या वाईट गोष्टींना पाहू इच्छित नाही त्यापासून दासाने स्वतः वाचावे, इतकेच नव्हे तर त्यांना जगातून मिटवून टाकण्यासाठी त्याने आपली सारी शक्ती आणि आपली सारी साधने वापरावीत आणि ज्या चांगल्या गोष्टीनी ईश्वर आपल्या जमिनीला अलंकृत पाहू इच्छितो त्या चांगल्या गोष्टीनी दासाने फक्त आपल्या स्वतःचे जीवनच अलंकृत करण्यात समाधान व मानता आपल्या प्राणाची बाजी लावून त्या चांगल्या गोष्टी जगामध्ये पसरविण्याचा व त्या प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न करावा. या स्थानावर पोहोचल्यावर दासास आपल्या ईश्वराची अगदी जवळची निकटता प्राप्त होते आणि म्हणून हे माणसाच्या आध्यात्मिक विकासाचे उच्चतम स्थान आहे.

आध्यात्मिक प्रगतीचा हा मार्ग फक्त व्यक्तीसाठी नाही. तो जातिजमातीसाठी, समाजासाठी, देशासाठी पण आहे. एका व्यक्तीप्रमाणे एक समाज देखील ‘ईमान’, ‘इताअत’ व ‘तक्वा’ या टप्प्यांवरून पुढे जाऊन ‘एहसान’ च्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहचू शकतो आणि शासन देखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेसह मोमीन, मुस्लिम, संयमी व मोहसीन बनू शकते. इतकेच नव्हे तर वस्तुतः इस्लामचा हेतू त्याचवेळी पूर्णपणे पुरा होऊ शकतो जेव्हा एखादा देश संपूर्णपणे या मार्गावर चालू लागेल आणि एक संयमी व समर्पित असे शासन प्रस्थापित होईल.

आता आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेवर देखील एक नजर टाका जी व्यक्ती व समाज यांना याप्रकारे तयार करण्यासाठी इस्लामने निश्चित केली आहे. या व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत.

पहिला स्तंभ ‘नमाज’ आहे. ही रोज पाच वेळा माणसाच्या मनात ईश्वराची आठवण ताजी करते, त्याचे भय दाखवते, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करते, त्याचे आदेश वरचेवर समोर आणते आणि त्याच्या आज्ञापालनाचा सराव घडविते. ही नमाज केवळ वैयक्तिक नाही तर तिला जमातबरोबर अदा करणे बंधनकारक ठरविले गेले आहे. म्हणजे सारा समाज सामुहिकरीत्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास तयार होतो.

दुसरा स्तंभ ‘रोजा’ आहे. तो प्रत्येक वर्षी संपूर्ण एक महिना मुस्लिम व्यक्तीला वैयक्तिकपणे व मुस्लिम समाजाला सामुहिकरीत्या संयमाचे प्रशिक्षण घडवितो.

तिसरा स्तंभ ‘जकात’ आहे. जी मुस्लिमांमध्ये संपत्तीचा त्याग एकमेकाबद्दल सहानुभूती व सहकाऱ्याची भावना निर्माण करते. आजकल लोक चुकीने ‘जकात’ ला ‘कर’ म्हणून संबोधितात. तथापि ‘जकात’ कराहून अगदी भिन्न आहे. जकातचा अर्थ विकास व शुद्धी हा आहे. या शब्दाद्वारे इस्लाम ही वस्तुस्थिती माणसाच्या मनावर बिबवू इच्छितो की ईश्वराच्या प्रेमापोटी आपल्या बांधवाचे जे आर्थिक सहाय्य तुम्ही कराल त्याने तुमच्या आत्म्याचा विकास घडून येईल व तुमचे आचरण शुद्ध होईल.

चौथा स्तंभ ‘हज’ आहे. जे ईशभक्तीच्या केंद्रबिदूवर ईमानधारकांचा जागतिक समाज बनविते आणि असे एक आंतरराष्ट्रीय आंदोलन चालविते जे शेकडो वर्षांपासून सत्याच्या आवाहनाचा स्वीकार करण्याची तत्परता दाखवित आले आहे आणि ईश्वर इच्छिल तर शेवटपर्यंत ही तत्परता दाखवित राहील.

चारित्र्य व आचरणाच्या दृष्टीने जग आज ज्या ठिकाणी आहे तसेच ते चौदा शतकांपूर्वी याच ठिकाणी व याच स्थितीत होते. त्या वेळी इस्लामनेच त्याला खोट्या देवदेवतांपासून मुक्त केले होते. आजच्या खोट्या ईश्वरापासून इस्लामच मानवतेची सुटका करु शकतो. या ईश्वरांनी, हुकूमशाही, बादशाही, साम्राज्यशाही व भांडवलशाहीचे बुरखे घेतलेले आहेत. एकीकडे पाषाणहृदयी भांडवलदार गरीब मजुरांचे रक्त शोषण करुन आपल्या तिजोऱ्या भरीत आहेत, तर दुसरीकडे श्रमिकवर्गाच्या हुकूमशाहीच्या नावावर काही लोक आपल्या ईश्वरत्वाचा देखावा थाटून बसले आहेत. हे लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांचे स्वातंत्र्य चिरडून टाकीत आहेत. परंतु त्यांच्या तोंडी भाषा अशी असते की ते जनतेच्या इच्छेची पूर्ती करीत आहेत.

एक शंका व तिचे उत्तर

इस्लाम मानवासाठी स्वातंत्र्याचा संदेश आहे ही गोष्ट ऐकून काही लोकांच्या मनात असा प्रश्न उभा राहण्याचा संभव आहे की मग इस्लाम खुद्द मुस्लिमांनाच या जुलमी व अत्याचारी हुकूमशहांच्या पंजातून का सोडवीत नाही. ज्यांनी आज पूर्ण मुस्लिम जगाला स्वातंत्र्यापासून वंचित करुन साखळदंडाने बांधून ठेवलेले आहे आणि जे इस्लामच्या नावाखाली मुस्लिमांना हीन, दीन, नीच दर्जाचे बनवीत आहेत. या शंकेच्या उत्तरात आम्ही असे सविनय सांगू की हे खरेखुरे हुकूमशहा, जरी इस्लामच्या नावाचा वापर करीत असले तरी खरी वास्तवता अशी आहे की त्यांच्या शासनामध्ये इस्लामला कुठलेही अधिकार, स्थान प्राप्त नाही. तसेच त्यांच्या जीवनामध्ये वा आसपास इस्लामची एखादी झलकसुद्धा दृष्टीस पडत नाही हे तथाकथित मुस्लिम त्या मानवी समूहाशी संबंध बाळगतात ज्याच्यविषयी स्वतः अल्लाहची आज्ञा आहे की,

‘‘आणि जे लोक अल्लाहने दिलेल्या कायद्याप्रमाणे न्याय करणार नाहीत हे अत्याचारी होत.’’ (५:४४)

‘‘हे मुहम्मद ! तुमच्या पालनकर्त्यांची शपथ ! जोवर आपापसातील मतभेदांचा निवाडा करण्यासाठी तुम्हाला नेमत नाहीत, तोपर्यंत हे लोक ‘श्रध्दावंत’ होऊच शकत नाहीत. नंतर तुम्ही असा न्याय करा की त्यावर कोणालाही कमतरतेची जाणीव होऊ नये व त्या निवाड्याचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार करुन तो मानावा.’’ (४:६५)

ज्या इस्लामकडे आम्ही आज लोकांना बोलावितो आणि अशी इच्छा करतो की त्यांनी इस्लामला आपल्या जीवनात मार्गदर्शक बनवावे त्याचा त्या ‘इस्लाम’शी काडीचाही संबंध नाही, ज्याचा भूतकाळातील मुस्लिम शासकांनी अंगीकार केला आहे. या शासकांच्या मनात ईश्वरी कायद्याविषयी कसलाही आदर असल्याचे आढळून येत नाही. ज्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्या आदेशांना बाजूला सारुन टाकतात व मन मानेल तसे करतात व असे करताना त्यांना क्षणभरसुद्धा खंत वाटत नाही. प्रकाश व मार्गदर्शनाकरीता त्यांना आपल्या जीवनात त्याच्यापासून सहाय्य घेण्याची गरज भासत नाही. तसेच त्यांच्या निष्ठाही फक्त त्यांच्या पुरत्याच विशेष नाहीत. ते जेव्हा आपल्या पसंतीची एखादी वस्तु प्राप्त करतात तिचा ते अंगीकार करतात. मग भलेही युरोपच्या कुठल्याही देशाचे कायदे असोत अथवा शरीअतचे आदेश असोत. जी वस्तु वा जी गोष्ट त्यांच्या इच्छेविरुद्ध किवा त्यांच्या हिताविरुद्ध असते, तिला उचलून दूर फेकून देतात. हे लोक माणसाशीही निष्ठावान नाहीत, तसेच अल्लाहशीही नाहीत. ती माणसे व ईश्वर या दोहोंचे अतिरेक व अशिष्ठपणा, तसेच अमर्यादा करणारे आहेत, कारण त्यांच्या अंगीकाराची वा दूर झटकून टाकण्याची कसोटी, सत्य व न्याय यावर आधारलेली नसून त्यांची स्वतःची मते व त्यांच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा व स्वार्थावर आधारभूत आहेत.

आम्ही जो इस्लाम जाणतो, तो अभिमानी, अहंकारी बादशहांचे, तसेच घमंडी व जुलमी शासकांचे अस्तित्व सहन करीत नाही. सामान्यजनाप्रमाणेच तो या शासकांनाही ईश्वरी कायद्यांच्या शृंखलांनी बांधून ठेवतो. त्यासाठीच जर हे शासक राजी नसले तर त्यांना तो कायमचे नष्ट करुन टाकतो कारण,

‘‘जो (समुद्राच्या पाण्यावरील) फेस असतो तो उडून जातो व जी वस्तु माणसांना लाभप्रद आहे ती पृथ्वीवर स्थिरावते, शिल्लक राहते.’’ (१३:१७)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget