Latest Post


माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,

पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.

सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल  (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.



पवित्र कुरआनात म्हटले आहे की, “लोकहो, आपल्या विधात्याची भीती बाळगा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले. त्यापासून त्यांची जोडपी निर्माण केली आणि त्या उभयतांपासून असंख्य पुरुष व स्त्रिया विखुरल्या. अल्लाहचे भय बाळगा, ज्याच्या नावानं तुम्ही एकमेकांशी आपल्या हक्कांची मागणी करता. तसेच आपल्या नातेसंबंधांची जाण ठेवा. अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.” (४:१) इस्लामपूर्व काळात लोक पत्नींना काहीच महत्त्व देत नव्हते. त्यांना क्षुल्लक कारणांनी मारझोड केली जायची. तलाक द्यायचे आणि पुन्हा परत घ्यायचे. त्यांना आईवडील असो की पती, मुले-मुली- कुणाच्याही वारसामध्ये हक्क दिला जात नव्हता. एका पत्नीशी विवाहसंबंध संपवायचा असेल तर तिला आई म्हणून जाहीर करायचे. म्हणजे स्त्रीला कोणताही मानवाधिकार नव्हता. इस्लामने जाहीर केले की पतीवर पत्नीचा तेवढाच अधिकार असेल जेवढा एका पतीचा त्याच्या पत्नीवर. पुढे जाऊन पवित्र कुरआनने स्त्रीला प्रत्येक नात्यात पती असो की त्याचे आईवडील, बहीण-भाऊ, तिची संतती, सर्वांच्या मालमत्तेत वारसाहक्क दिला. पती आणि पत्नींना आपल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेकांचा आधार बनविला. ते एकमेकांचे सहचर आहेत. एकमेकांसाठी वस्त्र आहेत ज्यापासून त्यांच्या उणिवांचे रक्षण होते. वस्त्राद्वारे जसे सौंदर्य लाभते तसेच पतीपत्नी एकमेकांचे सौंदर्य आहेत. ते एकमेकांची पूर्तता करतात. पवित्र कुरआनने म्हटले आहे की, “त्या तुमची वस्त्रे आहेत आणि तुम्ही त्यांची वस्त्रे आहात.” वैवाहिक जीवनात पतीला कुटुंबाच्या प्रमुखपदी ठेवतो. कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तो व्यस्त असतो. पत्नी आपल्या पतीच्या मागे स्वतःचे रक्षण करते. त्याच्या परवानगीशिवाय इतर कोणा पुरुषाला घरी येऊ देत नाही. वैवाहिक जीवनासंबंधी कुरआनात म्हटले आहे की, “अल्लाहच्या संकेतांमधील हे एक संकेत आहे की त्याने तुमच्याच अस्तित्वातून तुमच्यासाठी पत्नींना जन्म दिला जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून सुखसमाधान प्राप्त करावे. तुमच्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि कृपा निर्माण केली.” (३०:२१)

संकलन

- सय्यद इफ्तिखार अहमद



स्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा -

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 

- पूजा वडगावकर



बंधुनो! हे ज्ञान ज्याच्या गरजेविषयी मी तुम्हाला सांगत आहे त्यावर तुमचे आणि तुमच्या संततीचे मुस्लिम असणे, मुस्लिम म्हणून राहणे अवलंबून आहे. ही काही हलकी गोष्ट नाही की त्यापासून निष्काळजी बनून राहावे. तुम्ही तुमच्या शेतीवाडीच्या कामात गाफील राहात नाही. तुमच्या शेतीला पाणी देणे आणि पिकाचे रक्षण करण्यातसुद्धा गाफील राहात नाही. जनावरांना चारा देण्यात गाफील राहात नाही. तुमच्या धंद्याच्या कामात गाफील राहात नाही; ते केवळ या कारणासाठी की त्यात गाफील राहाल तर उपाशी मराल आणि प्राणासारखी प्रिय गोष्ट व्यर्थ होईल. मग मला सांगा की ते ज्ञान प्राप्त करण्यात का गाफील राहाता ज्यावर तुमचे मुस्लिम बनणे आणि मुस्लिम राहणे अवलंबून आहे? काय यात हा धोका नाही की ईमानसारखी प्रिय गोष्टनष्ट होईल? काय ईमान जिवापेक्षा अधिक प्रिय नाही? तुम्ही प्राणाचे रक्षण करण्यासाठी जितका वेळ व जितके श्रम खर्च करता तितका वेळ व त्या श्रमाचा दहावा भागसुद्धा ईमानचे रक्षण करण्यासाठी खर्च करू शकत नाही का?

मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.



माननीय अबू   सईद खुदरी (रजि.) सांगतात,

पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असे. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे एखादी अप्रिय व स्वभावाशी प्रतिवूâल गोष्ट पाहिल्यास लज्जाशीलतेमुळे तोंजाने जरी पैगंबर मुहम्मद (स.) काही सांगत नसत, परंतु त्या अप्रियतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असत.

पडद्यात (बुरखा) असणाऱ्या कुमारिका अति लज्जाशील व लाजाळू असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात लज्जाशीलता त्यांच्यापेक्षासुद्धा अधिक होती.

५७) माननीय अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस (रजि.) सांगतात,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वभावात अश्लीलता नव्हती आणि कोणतेच अश्लील कृत्य ते करत नसत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)



अल्लाहने धनवान मुस्लिम पुरुष व स्त्रियांवर दरवर्षी जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरवले आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किंतीची रोख रक्कम वर्षाखेरीस शिल्लक राहिल्यास त्या रकमेतून अडीच टक्के जकात अदा करायची आहे. साडेतास तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किमतीची रक्कम म्हणजे या प्रमाणापेक्षा  जितकी संपत्ती शिल्लक राहील त्या सर्व संपत्तीवर जकात द्यावी लागेल. संपत्तीमध्ये नुसती रोख रक्कम नसून व्यापारी माल, पशुधन असल्यास ते आणि शेतजमीन असेल तर त्यातील पिकांवर सुद्धा जकात द्यावी लागेल. व्यापारी मालामध्ये दुकानात, कारखान्यात वर्षाखेरीस जेवढ्या किंमतीचा माल शिल्लक राहील त्यावरसुद्धा जकात द्यावी लागते. या अर्थासंबंधी अल्लाहने जी योजना केली आहे त्याचे उद्दिष्ट असे की “जो माल अल्लाहने आपल्या प्रेषितांना (आणि त्यांच्यानंतर) मुस्लिमांना दिलेला आहे तो नातेवाईकांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी आणि प्रवाशांसाठी दिला जावा. कारण धनसंपत्ती फक्त धनवान लोकांमध्येच फिरत राहू नये.” (पवित्र कुरआन) जकात व्यवस्थापन आणि तिच्या वाटपासंबंधी असे म्हटले आहे की “जकात, गोरगरीबांसाठी, निराधारांसाठी आणि त्या्चया व्यवस्थापनावर जे कर्मचारी नियुक्त केले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांची दिलजमाई करावयाची आहे अशांसाठी तसेच जे गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आहे.” (पवित्र कुरआन-९:६०) जकात तर अनिवार्य कर्तव्य आहे ती द्यावीच लागेल, जशी नमाज अदा करावी लागते, उपवास करावा लागतो तसेच त्याव्यतिरिक्त इतर दानधर्मही करावे लागतात. आणि किती दानधर्म करावा त्यास मर्यादा नाही. “ते विचारतात, काय खर्च करावा? याचे उत्तर अल्लाह देतो की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून जे काही शिल्लक राहील ते सर्व दानधर्मात खर्च करून टाकावे.” (पवित्र कुरआन) जकात आणि दानधर्म मानवाधिकार आहेत आणि उपासना, नमाज रोजा हे अल्लाहचे अधिकार आहेत. दोन्हींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. दानधर्म इस्लामी व्यवस्थेचा मूळ गाभा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget