इस्लाम-ईमान-एहसान

माननीय उमर (र.) निवेदन करतात,
एके दिवशी आम्ही अल्लाहच्या प्रेषितांच्या जवळ बसलो होतो. अचानक एक माणूस आमच्यासमोर आला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र होते व केस काळेभोर होते. त्याच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण नव्हता व आमच्यापैकी कुणी त्याला ओळखत नव्हते. तो पुढे होऊन प्रेषितांच्या गुडघ्याबरोबर गुडघे जुळवून त्यांच्यासमोर बसला आणि आपले हात प्रेषितांच्या मांडीवर ठेवून नम्रपणे म्हणाला,
“हे मुहम्मद (स.) ! इस्लाम काय आहे?"
प्रेषितांनी सांगितले, “इस्लाम म्हणजे अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत याची ग्वाही देणे, नमाज कायम करणे, जकात देणे, रमजानचे रोजे करणे आणि प्रवासाची ऐपत असल्यास बैतुल्लाहचा हज करणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले.”
आम्हाला आश्चर्य वाटले की हा माणूस प्रेषितांना प्रश्न विचारतो व त्याचे उत्तर बरोबर असल्याचे स्वत:च सांगतो. त्यानंतर त्या माणसाने विचारले, “ठीक, आता मला 'ईमान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, "ईमान'चा अर्थ हा की, अल्लाह, त्याचे फरिश्ते, त्याचे ग्रंथ, त्याचे प्रेषित, परलोक आणि चांगल्या व वाईट दैवावर श्रध्दा ठेवणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले." व पुन्हा त्याने विचारले, “मला ‘एहसान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “तुम्ही अल्लाहची उपासना अशाप्रकारे करा की, जणू तुम्ही त्याला पाहत आहात. तुम्ही जरी त्याला पाहत नसला तरी नि:संशय तो तुम्हाला पाहत आहे.”
त्याने पुन्हा विचारले, “मला त्या वेळेबद्दल (अंतिम निवाड्याचा दिवस) माहिती सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “ज्याला विचारले जात आहे, तो प्रश्नकर्त्यापेक्षा अधिक जाणत नाही."
तो माणूस म्हणाला, “ठीक, निदान मला त्या वेळेच्या काही निशाण्या तरी सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “दासी आपल्या मालकाला जन्म देईल. अनवाणी चालणारे व उघडे शरीर असणारे कंगाल व मेंढपाळ मोठमोठ्या इमारती बांधण्याच्या बाबतीत एकदुसऱ्याशी चढाओढ करतील."
नंतर तो माणूस निघून गेला आणि मी काही वेळ तेथे थांबलो.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले, “हे उमर ! हा प्रश्नकर्ता कोण होता हे तुला माहीत आहे काय?"
मी उत्तर दिले की, “अल्लाह व त्याचे प्रेषित यांनाच अधिक माहीत."
प्रेषितांनी सांगितले, “ते जिब्रईल (अ) होते. तुमच्याजवळ तुम्हाला तुमच्या दीनची शिकवण देण्यासाठी आले होते."
(मुस्लिम) अल्लाहच्या सर्व ग्रंथांवर, त्याच्या सर्व प्रेषितांवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले. त्याला लागणाऱ्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्था जशी अल्लाहने केलेली आहे, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या शिकवणीचीदेखील व्यवस्था केली आहे. ईश्वराने निरनिराळ्या काळात व भूभागात आपले प्रेषित पाठविले. त्यांच्यावर आपले ग्रंथ उतरविले प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत व कुरआन हा अल्लाहचा शेवटचा ग्रंथ आहे. या सर्व वस्तुस्थितीवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे.
दासी आपल्या मालकाला जन्म देईल, याचा अर्थ असा की संतती अवज्ञाकारी व विद्रोही निपजेल. मुले आई-वडिलांचा आदर राखणार नाहीत. त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणार नाहीत. आईला दासी समजून तिच्याबरोबर एखाद्या मालकाप्रमाणे वर्तणूक केली जाईल.
अपात्र लोकांच्या हाती अयोग्य मार्गाने भरमसाठ पैसा येईल व ते लोक मोठमोठ्या इमारती बांधून ईर्षा व गर्व करू लागतील आणि आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करीत राहतील.
जगात अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणावें, आता जगाचा शेवट जवळ आलेली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget