Latest Post

- सय्यद अबुल आला मौदूदी
मनुष्यशरीराचे निरीक्षण केल्यास कळते की यात शक्तीचा मोठा साठा ठेवला आहे. त्यात जीवनशक्ती, कार्यशक्ती आणि कामशक्ती एकाच वेळी उपलब्ध आहेत. याच ग्रंथी मनुष्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उपलब्ध करतात.
संस्कृतीची मूळ समस्या, शुद्ध संस्कृतीसाठी आवश्यक उपाय, कुटुंबाचा पाया, दुराचार व व्यविभचाराला आळा, दांपत्यजीवनाचे शुद्धरूप इ.विषयी चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 41     -पृष्ठे - 48      मूल्य - 22            आवृत्ती - 3 (2013)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/exz9ztq9e53pyw7rpvht3228dzw52ut7


माननीय अबू हुरैरा (र.) कथन करतात की एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे अल्लाहेच प्रेषित (स.)! एक भगिनी नफील (अनिवार्य नसलेली) नमाज अदा  करण्यात, नफील रोजे ठेवण्यात आणि दानधर्म करण्यात खूप प्रसिद्ध आहे. मात्र ती वाचाळपणाने शेजाऱ्यांना त्रास देते. तिच्याविषयी आपली काय भूमिका आहे?’’
पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ती जहन्नममध्ये (नरकाग्नीत) टाकली जाईल.’’ 
मग त्या व्यक्तीने विचारले, ‘‘दुसरी एक भगिनी नफील नमाज कमी अदा करते, नफील रोजे (उपवास) सुद्धा कमीच ठेवते आणि दानधर्मही कमीच करते. पनीरचे काही तुकडे गरिबांना  देते. मात्र ती आपल्या वाचेने शेजाऱ्यांना त्रास देत नाही. (शेजाऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होते.) तिच्याविषयी आपण काय म्हणाल?’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ती जन्नतमध्ये (स्वर्गात) जाईल.’’ (मिश्कात)
निरुपण
या हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेची महत्ता खूप स्पष्टपणे विषद केली आहे. नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्म याबरोबरच शेजाऱ्यांशी व्यवहार कसा  हे, ही बाब फार महत्त्वाची आहे. एक भगिनी पाच वेळच्या अनिवार्य नमाजीव्यतिरिक्त नफील नमाजही खूप अधिक अदा करते. रमजानच्या अनिवार्य उपवासांव्यतिरिक्त नफील रोजेही  खूप ठेवते आणि दानधर्मही खूप करते. मात्र तिच्यात एक दुर्गुण आहे तो हा की ती आपल्या वाचाळतेने शेजाऱ्यांना त्रास देते. त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत नाही. या दुर्गुणामुळे  तिची नफील नमाज, नफील रोजे व दानधर्म तिला जहन्नम अर्थात नरकाग्नीत जाण्यापासून रोखणार नाहीत.
मात्र दुसरी भगिनी नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मात जरी पहिलीपेक्षा कमी असली तरी शेजाऱ्यांशी असलेल्या सद्व्यवहारामुळे ती जन्नत अर्थात स्वर्गात जाईल! 
बोध हा आहे की माणसाची चारित्र्यसंपन्नता ठरविण्यासाठी केवळ नफील नमाज, नफील रोजा आणि दानधर्मच पुरेसे नाहीत तर शेजाऱ्यांशी त्याचा प्रत्यक्ष व्यवहार खूप खूप महत्त्वाचा  आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


मा. अबू हुरैरा (र.) कथन करतात की, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही, अल्लाहची  शपथ! तो मोमिन नाही, अल्लाहची शपथ! तो ईमानधारक नाही!’’ लोकांनी आश्चर्याने विचारले, ‘‘कोण? हे पैगंबर (स.)’’
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो माणूस कदापि ईमानधारक नव्हे जो शेजाऱ्यांना त्रास देत असेल वा छळत असेल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरूपण
माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची एक ओळख त्याचा शेजाऱ्यांशी व्यवहारसुद्धा आहे. जो शेजाऱ्यांना, मग ते कुठल्याही जातिधर्माचे असोत, त्रस्त करीत असेल, छळत असेल तो मुळीत  ईमानधारकच नाही अशी ठाम भूमिका पैगंबर (स.) घेतात. ईमानच नसेल तर चारित्र्य ते कुठले?
पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘अल्लाहची शपथ! तो मोमिन अर्थात मुस्लिम नाही जो स्वत: तर पोटभर जेवतो मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (मिश्कात)
‘ईमान’ खरे तर माणसाच्या मनात वास करतो. त्याचे उदाहरण असे आहे जणू मनात एक बीज रोवावे, ज्याचे एका महान वृक्षात रूपांतर व्हावे, ज्यापासून मानवजातीला गोड फळे  लाभावीत, सावलीही लाभावी आणि इतरही लाभ व्हावेत.
शेजाऱ्यापाचाऱ्यांशी सद्व्यवहार करणे, त्यांच्या सुखदु:खात सहकार्य करणे ही ‘ईमान’ची लक्षणे आहेत. या उलट शेजाऱ्यांना त्रास देणे, छळणे ही ‘ईमान’ नसल्याची लक्षणे आहेत. आपल्या  देशात जवळपास वीस कोटी मुस्लिम राहातात. उर्वरित ऐंशीनव्वद कोटी मुस्लिमेतर बांधव त्यांचे शेजारी आहेत. पैगंबरांचा शेजारधर्माचा हा एक उपदेश जरी मुस्लिमांनी अंमलात आणला  तरी इतर धर्मीयांमध्ये त्यांच्याविषयी  द्वेष, घृणा, मत्सर राहील का?
म्हणून कवीने म्हटलंय,
‘‘जुबां से कह भी दिया ला इलाह तो क्या हासिल?
दिलो निगाह जो मुसलमाँ नहीं, तो कुछ भी नहीं।’’
अर्थात- निव्वळ इस्लामचा उच्चार
करण्याला काहीच अर्थ नाही. आचारविचार, चारित्र्यात
इस्लाम नसेल तर सारे व्यर्थ आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


मा. अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात की, आम्हाला पैगंबरांनी उपदेश केला, ‘‘तरुणांनो, वैवाहिक पात्रता असणाऱ्यांनी जरूर विवाह करावा. त्यामुळे दृष्टी-संयम प्राप्त होतो आणि  माणूस चारित्र्यसंपन्न होतो. मात्र पात्रता नसणाऱ्यांनी रोजे (उपवास) ठेवावेत. रोजा वासनांवर नियंत्रण ठेवण्यात गुणकारी आहे.’’ (मुस्लिम व बुखारी)
निरुपण-
वैवाहिक पात्रता असणाऱ्याने अविवाहित राहणे कदापि योग्य नव्हे. त्याने जरूर विवाह करावा. वैध मार्गाने लैंगिक गरजेची परिपूर्ती केल्याने माणूस व्यभिचारापासून सुरक्षित होतो. अविवाहित व्यक्ती सदैव सैतानाच्या जबड्यात असते. विषयसुखाची भूक माणसाला वाममार्गाकडे नेऊ शकते. 
तरुण मुलामुलींना अधिक काळ वैवाहिक जीवनापासून वंचित ठेवल्याने समाजात अनेक घृणास्पद व अनैतिक समस्या फोफावतात. विषयसुखाचा एकमेव वैध मार्ग म्हणजे विवाह आहे. मानवजातीची जोडप्याच्या स्वरूपात निर्मिती ही अल्लाहची महान कृपाच आहे, असे कुरआन म्हणतो. पती-पत्नी एकमेकांच्या पोषाखासमान आहेत, असेही कुरआनात वर्णन आहे.  इस्लाम माणसाला चारित्र्यसंपन्नतेच्या उच्चतम शिखरापर्यंत पोहचवू इच्छितो. त्यासाठी विवाह अनिवार्य आहे. चारित्र्यसंपन्न व्यक्ती, चारित्र्यसंपन्न कुटुंब व चारित्र्यसंपन्न समाजनिर्मितीमध्ये विवाहाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र काही लोक विवाह करणे, संसार करणे इ. बाबींना अध्यात्मापासून वेगळे समजतात. हे कदापि योग्य नव्हे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा स्पष्ट सांगितले की, पत्नीशी संभोग करणेदेखील पुण्यच आहे. त्यावर एकाने आश्चर्याने विचारले की, ते कसे? पैगंबरांनी त्याला प्रतिप्रश्न केला की  जर तो व्यभिचार करत असेल तर ते पाप नव्हे काय? तो म्हणाला होय, ते पापच! मग पैगंबर म्हणाले की जर व्यभिचार करणे पाप असेल तर पत्नीशी संभोग करणे पुण्य का नसावे?
खरे तर अविवाहित माणसाची नीतिमत्ता कधी ढासळेल याचा नेम नाही. म्हणूनच आपण पाहतो आज समाजात तथाकथित चांगली वाटणारी माणसे, अगदी बुवा-बापूदेखील  व्यभिचारामुळे तुरुंगात खितपत आहेत.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मला अल्लाहने यासाठी पाठविले आहे की मी चारित्र्यसंपन्नतेला उच्चतम शिखरावर पोहचवावे.’’ (मुअत्ता इमाम मालिक)
निरुपण
चारित्र्यसंपन्नता हाच धर्माचा उद्देश आहे. ईश्वराने तमाम पैगंबरांकरवी अखिल मानवजातीला चारित्र्यसंपन्नतेचीच ताकीद केली आहे. चारित्र्यहीन माणूस जीवनाचे सार्थक करू शकत  नाही. उलट तो जीवनाचा सत्यानाश करतो. इस्लाममध्ये ‘तकवा’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तकवा अर्थात ईशभीरूता असेल तरच चारित्र्यसंपन्नता निर्माण होईल. 
कुरआनात नमाजसंबंधी म्हटले आहे, ‘‘नि:शंक, नमाज माणसाला वाईट कृत्यांपासून आणि निर्लज्जतेपासून दूर करते.’’
(कुरआन, २९ : ४५)
तद्वतच रोजांचा उद्देश विषद करताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले,
‘‘रोजा म्हणजे केवळ पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी सोडणे नव्हे! रोजा जिव्हेचा पण आहे, डोळ्यांचासुद्धा आहे, कानांचाही आहे आणि हातापायांचासुद्धा!’’
अर्थात खोटारडे न बोलणे, शिवीगाळ न करणे, निंदानालस्ती न करणे हा जिव्हेचा रोजा आहे. अश्लीलता व नग्नतेपासून दूर राहणे व जगाकडे वाईट नजरेने न पाहणे हा डोळ्यांचा रोजा  आहें. कोणावर अन्याय-अत्याचार न करणे, भ्रष्ट आचार न करणे हा हातांचा रोजा आहे.
जकातचाही वास्तविक उद्देश माणसाच्या चित्ताचे शुद्धीकरणच आहे.
सार्थक हज्ज (हज्जे मबरूर) संबंधी म्हटलेले आहे की त्यामुळे हाजीचे चारित्र्य अधिकाधिक शुद्ध व्हावे त्याने हर वाईट कृत्यापासून स्वत:ला रोखावे.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘आता तरी पुढे हाची उपदेश! नका करू नाश आयुष्याचा!
सकळांच्या पाया माझे दंडवत! आपुलाले चित्त शुद्ध करा!’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी चारित्र्यसंपन्नतेचा केवळ उपदेशच केला नाही तर त्यांचे स्वत:चे जीवनच आता अखिल मानवजातीसाठी जगाच्या अंतापर्यंत सर्वांगांनी चारित्र्यसंपन्नतेचे एक  श्रेष्ठतम व आदर्श उदाहरण आहे.

संकलन : डॉ. सय्यद रफीक


वर्तमानकाळात इस्लामचा सत्यनिष्ठ व सरळ मार्ग जाणून घेण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण व पवित्र ‘कुरआन’ या दोहोंखेरीज अन्य कुठलेही साधन नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे अखिल मानवजातीसाठी ईश्वराचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर प्रेषित धाडण्याची परंपरा व क्रम याची सांगता झाली. (१) मानवाला ज्या प्रमाणात आदेश देण्याचा व मार्गदर्शन करण्याचा ईश्वराचा मानस होता ते सर्वच्या सर्व त्याने आपल्या शेवटच्या प्रेषिताकरवी पूर्ण केले. आता ज्या कोणाला सत्याची आवड असेल व ईश्वराचा आज्ञाधारक दास (मुस्लिम) होण्याची त्याच्या मनाची इच्छा असेल त्याला ईश्वराच्या या शेवटच्या प्रेषिताशी ईमान व दृढश्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या शिकवणुकीचा स्वीकार करून त्यांनी दाखवून दिलेल्या पद्धतीनुसार त्यावर आचरण करणे अनिवार्य आहे.

प्रेषित्व समाप्तीचा युक्तिवाद -
प्रेषित्वासंबंधी सविस्तर हकीकत यापूर्वी सांगितली गेली आहेच. ती नीटपणे समजून घेतल्यास व तिच्यावर विचार-चिंतन केल्यास स्वतःची खात्री होईल की, प्रेषित प्रतिदिनी जन्माला येत नसतात. तसेच प्रत्येक जाती-वंशासाठी प्रत्येक काळी एक प्रेषित असणे हेही आवश्यक नाही. प्रेषिताचे जीवन खरेतर त्याने दिलेल्या शिकवणुकीच्या व मार्गदर्शनाच्या जिवंत अस्तित्वाचाच काळ आहे. जोपर्यंत त्याची शिकवण व उपदेश जिवंत आहेत तोवर जणू प्रेषित स्वतःच जिवंत आहेत. मागील प्रेषित या दृष्टीने जिवंत नाहीत कारण त्यांनी दिलेल्या शिकवणुकीत लोकांनी नंतर फेरबदल करून टाकले आहेत. त्यांनी आणलेल्या ग्रंथांपैकी एकसुद्धा त्याच्या मूळरूपात आज उपलब्ध नाही. प्रेषितांनी दिलेल्या ग्रंथाची मूळप्रत आमचेकडे आहे असा दावा खुद्द त्यांचे अनुयायीसुद्धा करू शकत नाही. त्यांना त्यांच्या प्रेषिताच्या जीवनचरित्राचासुद्धा विसर पडला आहे. या अगोदरच्या प्रेषितांपैकी एकाचेही खरेखुरे व विश्वसनीय असे जीवनचरित्र आज कोठेही उपलब्ध नाही.
त्यांचा जन्म कोणत्या काळात झाला, कोठे झाला, त्यांनी कोणकोणती कर्तृत्वे केली, त्यांनी कशा प्रकारचे जीवन व्यतीत केले, कोणती शिकवण दिली व लोकांना कोणत्या गोष्टीपासून परावृत्त केले, हेही निश्चितपणे व विश्वसनीयरीतीने सांगितले जाऊ शकत नाही. हाच त्यांचा मृत्यू आहे. या दृष्टिकोनातून ते आज जिवंत नाहीत. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) जिवंत आहेत कारण त्यांची शिकवण व मार्गदर्शन जिवंत आहे. जे कुरआन त्यांच्याकरवी अवतरले ते आपल्या मूळ शब्दांनिशी आजसुद्धा उपलब्ध आहे व त्यात एक अक्षराचा व कानामात्राचाही फेरबदल झालेला नाही. त्यांच्या जीवनातील घटना, त्यांची उक्ती, त्यांच्या कृती, हे सर्वच्या सर्व सुरक्षित आहेत. चौदाशे वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला असतानाही इतिहासात त्यांचे प्रतिबिंब इतके स्वच्छ व स्पष्ट दिसते की जणू आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनीच खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांना पाहात आहोत. जगातील कोणाही व्यक्तीचे जीवनचरित्र इतके सुरक्षित नाही जितके ते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आहे. जीवनातील प्रत्येक बाबतीत आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रापासून प्रत्येक प्रसंगी बोध घेऊ शकतो. हे याचे प्रमाण आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या नंतर अन्य प्रेषिताची आवश्यकता उरली नाही.

एका प्रेषितानंतर पुन्हा दुसरा प्रेषित येण्यासाठी केवळ खाली दिलेली तीन कारणेच असू शकतात.

  • पूर्वीच्या प्रेषिताने दिलेली शिकवण पूर्णपणे नष्ट झालेली असणे व ती शिकवण पुन्हा मानवांत प्रस्तुत करण्याची गरज निर्माण होणे.
  • पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांनी दिलेली शिकवण ही परिपूर्ण नसणे व तिच्यात सुधारणा व वृद्धी करण्याची गरज असणे.
  • पूर्वीच्या प्रेषितांनी दिलेली शिकवण एका विशिष्ट देशापुरतीच मर्यादित असणे व शेष जगासाठी प्रेषिताची गरज असणे. (२)

वर सांगितलेली तिन्हीही कारणे आता उरलेली नाहीत. त्याबद्दल स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मानवजातीला दिलेली शिकवण जिवंत आहे. त्यांनी पुरस्कारलेला धर्म कोणता होता, त्यांनी कशाचे मार्गदर्शन व उपदेश दिले, कोणती जीवनपद्धत रूढ केली, कोणती जीवनपद्धत संपविण्याचे व तिच्यापासून जनसमूहाला परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, हे सर्व जाणून घेण्यासाठी सुरक्षित व आवश्यक असणारी सर्व ऐतिहासिक साधने आज उपलब्ध आहेत. म्हणून जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेली शिकवण जर नष्ट झालेलीच नाही तर त्या शिकवणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणाही प्रेषिताच्या आगमनाची आवश्यकता उरलेली नाही.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या करवी संपूर्ण जगाला इस्लामची परिपूर्ण शिकवण दिली गेली असून त्यात काहीही कमी-अधिक करण्याची गरज उरलेली नाही.

तिच्यात कसलीही उणीव राहिलेली नाही की जी दूर करण्यासाठी कोणा दुसऱ्या प्रेषिताच्या आगमनाची गरज भासावी. असे दुसरे कारणही उरले नाही.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित्व देऊन पाठविले गेले, ते कोणत्या एका विशिष्ठ जातीवंशापुरतेच व एखाद्या देशापुरतेच मर्यादित नसून जगातील सर्व मानवजातीसाठी आहे. त्यांनी दिलेली शिकवण सर्व मानवजातीसाठी पुरेशी आहे. म्हणूनच कोणाही विशिष्ट जातीवंशासाठी आता वेगळा प्रेषित येण्याचीही गरज उरली नाही. अशा रीतीने तिसरे कारणही दूर झाले.
याच आधारावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘खातिमुन नबीय्यीन’ (अंतिम प्रेषित) म्हणजेच दुसऱ्या शब्दांत प्रेषित्वाच्या क्रमाची सांगता करणारा असे संबोधले गेले आहे. आज जगात अन्य कोणत्याही प्रेषिताच्या आगमनाची गरज उरलेली नसून केवळ स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुकरण करणाऱ्या आणि इतरांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या लोकांचीच आता आवश्यकता आहे. त्यांची शिकवण नीट समजून घ्यावी आणि त्यानुसार आचरण करावे. जे नियम घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले होते ते नियम संबंध जगात रूढ होऊन त्या नियमावर अधिष्ठित शासन व सत्ता या भूमंडलावर प्रस्थापित व्हावी केवळ याचीच आता गरज आहे.(३)

१) पाहा, दिव्य कुरआन सूरह ३३ आयत ४०.

२) चौथे कारण असेही असू शकते की यात असलेल्या एका प्रेषिताला सहाय्य करण्यासाठी दुसरा प्रेषित पाठविण्यात यावा, परंतु याचा उल्लेख आम्ही केवळ याच कारणासाठी केला नाही की पवित्र कुरआनमध्ये अशी दोनच उदाहरणे दिलेली आहेत. अशा या अपवादात्मक उदाहरणांवरून सहाय्यक प्रेषित पाठविण्याचा अल्लाहचा सर्वसाधारण नियम आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.

३) काही लोकांच्या मनात शंका येते की इस्लामने मानवी जीवनासाठी जे कायदेकानू व नियम दिले आहेत ते परिस्थितीनुरूप व काळानुरुप मनुष्याची साथ कशी देतील. काळानुरूप व परिस्थितीनुरुप नियम बदलत असणे उचित आहे. अशा प्रकारच्या गोष्टी चिंतन-मनन न करताच सांगितल्या जातात. या संदर्भात काही मूलभूत गोष्टी डोळ्यांसमोर असल्यास मनात अशा प्रकारची शंका येत नाही.

  • इस्लाम ईश्वराने अवतरित धर्म आहे. ईश्वराचे ज्ञान पूर्ण आहे. ईश्वराला काळाची सुरवात व अंत माहीत आहे. त्याला माहीत आहे की मनुष्याला कोणकोणत्या परिस्थितींना तोंड द्यावे लागेल.
  • इस्लामचे सिद्धान्त व नियम खरेतर मानवी प्रकृतीनुसार आहेत. समयपरिवर्तनाने मानवी प्रकृतीत परिवर्तन होत नाही.
  • हे समजून घेणे आहे की जीवनाचे मूलभूत सिद्धान्त व मूलभूत मान्यतांमध्ये फरक पडत नाही. समयाच्या प्रगती व परिवर्तनामुळे समाज व जीवनाचे केवळ बाह्यरूपातच परिवर्तन घडते. जीवनाच्या मौलिक व स्थायिक तत्त्वांमध्ये कोणतेच परिवर्तन येत नाही. इस्लामने मानवी जीवनासाठी जे सिद्धान्त व नियम दिले आहेत ते असे आहेत जे सदैव काम येणारे आहेत. ते नियम व सिद्धान्त शाश्वत आहेत. मनुष्याने ‘इज्तेहाद’ द्वारा म्हणजे आपल्या विवेकबुद्धीने काम घेऊन त्यांना एखाद्या काळात अथवा विकसित किंवा अविकसित समाजात लागू करू शकतो. इस्लामने दिलेले मौलिक सिद्धान्त आणि त्याने निश्चित केलेल्या जीवनाच्या मान्यता मनुष्याला नेहमी सरळ व सत्य मार्गावर मार्गस्थ करतील. इस्लाम मनुष्याच्या बुद्धीविवेकाचा आदर करतो. मनुष्याच्या मानसिक विकासासाठी हे आवश्यक होते की मनुष्याला त्याच्या बुद्धीविवेकाने काम करण्याची संधी प्राप्त होत जावी. मनुष्य आपल्या बुद्धीविवेकाने काम घेऊन ईश्वराने अवतरित प्रकाशात प्रत्येक युगात व समाजात स्वतःसाठी मार्ग काढू शकतो.

मानवी इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्व हे तात्कालीन सामाजिक वातावरणाने व परिस्थितीने प्रभावित झालेले असतात. परंतु या व्यक्तीची शान काही औरच आहे. त्याला घडविण्यात तात्कालीन परिस्थितीचा काहीच वाटा नाही. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होऊ शकत नाही की अरबाची तात्कालीन स्थिती त्या वेळी ऐतिहासिक रूपात अशा व्यक्तीच्या जन्माची मागणी करीत होती. ओढून ताणून तुम्ही असे म्हणू शकता की ऐतिहासिक कारण अशा नेत्याची मागणी करीत होते ज्याद्वारा तात्कालीन अव्यवस्था व भिन्नता नष्ट करून एक राष्ट्र बनवून इतर देशांना पराजित करून अरबांना समृद्ध करील. असा राष्ट्रवादी अरबी वैशिष्ट्याने परिपूर्ण नेता अन्याय, निर्दयता, रक्तपात, धोकाधडी करून अरब देशाला संपन्न करून साम्राज्याची निर्मिती करील आणि उत्तराधिकाऱ्यांसाठी हा वारसा सोडून जाईल. याशिवाय त्याकाळची अरबी इतिहासाची दुसरी मागणी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. हेगेल (Hegel)व माक्र्स (Marx)यांच्या इतिहासाच्या भौतिक व्याख्येनुसार तिथे एक राष्ट्र आणि एक साम्राज्य बनविणारा निर्माण होणे काळाची गरज होती. परंतु हेगेल व माक्र्सचे तत्त्वज्ञान या घटनेची व्याख्या करूच शकत नाही की त्या वेळी त्या स्थितीत एक असा मनुष्य जन्माला आला जो उत्तम नैतिक शिकवण देणारा, मानवतेला सावरणारा, आत्म्यांना शुद्ध करून त्यांना विकसित करणारा आणि अज्ञानाच्या अंधविश्वासांना व पक्षपातीपणाला नष्ट करणारा होता. अशा महात्म्याची दृष्टी जातीपाती, वंश, देशाच्या सीमा तोडून संपूर्ण मानवतेवर फैलावली, ज्याने आपल्या समाजासाठीच फक्त नव्हे तर मानवतेसाठी एक नैतिक आध्यात्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक व्यवस्थेचा पाया घातला. ज्याने आर्थिक व्यवहार, लोक राजकीय व आंतरराष्ट्रीय संबंधांना कल्पनाविश्वात नव्हे तर प्रत्यक्षात नैतिक आधारावर स्थापित करून दाखविले आणि आध्यात्मिकता व नैतिकतेचा संतुलित समावेश केला जे आजसुद्धा ज्ञान, तत्त्वज्ञान व बुद्धीची तशीच मुख्य कृती आहे जशी त्या वेळी होती. काय अशा व्यक्तीला अरब अज्ञानाच्या वातावरणाची उपज म्हणू शकाल?

असेच फक्त नाही की ही व्यक्ती तात्कालीन परिस्थितीची निर्मिती नाही तर जेव्हा आम्ही तिच्या किर्तीवर विचार करतो तर माहीत होते की काळ व स्थानाच्या बंधनांनी मुक्त आहे. तिची नजर स्थान व काळाच्या बंधनांना तोडत हजारो वर्षांच्या (Milleniums) पडद्यांना चिरून पुढे जाते. तो मनुष्याला प्रत्येक युगात व वातावरणात पाहतो आणि त्याच्या जीवनासाठी असे नैतिक व व्यावहारिक मार्गदर्शन करतो जे प्रत्येक स्थितीत योग्य ठरते. तो त्या विभुतिंपैकी नाही ज्यांना इतिहासाने गतकालीन करून ठेवले आहे. ते त्यांच्या काळातील एक चांगले नेता होते असेच आपण इतरांसाठी म्हणू शकतो. परंतु हा विश्वनेता असा आहे जो संपूर्ण मानवतेचा मार्गदर्शक आहे, जो काळाबरोबर प्रगती करत जातो आणि प्रत्येक युगात आधुनिक सिद्ध होतो जसा मागील युगात होता.

लोक ज्यांना उदारतेने इतिहास घडविणारे (Makers of History) अशी पदवी देतात ते खरे तर इतिहासाने घडविलेले असतात. (Creatures of History) खरे तर इतिहास घडविणारे संपूर्ण मानवी इतिहासात हेच एकमेव व्यक्तित्व आहे. या जगातील जेवढ्या नेत्यांनी इतिहासात क्रांती घडविली, त्यांच्या वृत्तांतावर विवेचनात्मक दृष्टी टाकल्यास कळून येते की पूर्वीपासून तिथे क्रांतीची कारणे उत्पन्न होत होती आणि ती कारणे स्वतः त्या क्रांतीची दिशा व मार्ग निश्चित करीत होती, ज्याच्या येण्याची ते मागणी करीत होते. क्रांतिकारी नेत्याने फक्त इतकेच केले की स्थितीच्या मागणीच्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी त्या अभिनेत्याची भूमिका पार पाडली ज्यासाठी स्टेज व कर्म पूर्वीपासून निश्चित होते. 

परंतु इतिहास घडविणारे व क्रांती करणाऱ्यांपैकी हेच एक असे व्यक्तिमत्त्व आहे की जिथे क्रांतीची कारणे नव्हती. तिथे त्याने स्वतः क्रांतीची कारणे निर्माण केली. जिथे त्या क्रांतीचे ‘बी’ (स्पिरीट) व व्यावहारिक योग्यता लोकांमध्ये नव्हती तिथे त्याने स्वतः उद्देशानुसार मनुष्य घडविले. स्वतःच्या व्यक्तित्वाला विरघळवून हजारो लोकांच्या मनात उतरविले आणि त्यांना तसेच बनविले जसे तो बनवू इच्छित होता. त्याच्या संकल्प सामर्थ्याने व बळाने स्वतःच क्रांतीची सामुग्री निर्माण केली, तिला आकार दिला आणि समयगतीला त्या मार्गावर चालविले ज्या मार्गावर तो चालवू इच्छित होता. वैभवशाली इतिहास घडविणारा आणि असा महान क्रांतिकारी मानवी इतिहासात तुम्हाला कुठे सापडतो?

सज्जड पुरावा
आता आपण या प्रश्नावर विचार करू या की, चौदाशे वर्षांपूर्वीच्या अंधकारमय जगात अरबसारख्या घोर अंधकारमय देशाच्या एका कोपऱ्यात एक मेंढपाळ, निरक्षर मरुस्थळवासी व्यक्तीच्या अंतरंगात इतके ज्ञान, इतके प्रकाश, बळ, इतके चमत्कार, इतकी प्रबळ व परिपूर्ण शक्ती-सामर्थ्य उत्पन्न होण्याचे कोणते साधन होते? लोक म्हणतात की ते सर्व त्याच्या मन व मस्तिष्काची उपज होती. माझे असे म्हणणे आहे की जर हे त्याच्या मन व मस्तिष्काची निर्मिती होती तर त्याला ईश्वर होण्याचा दावा करावयास हवा होता. त्याने जर असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्या जगाने कृष्णाला भगवान म्हणण्यात संकोच केला नाही, ज्याने बुद्धाला पूज्य बनविले आणि ज्या जगाने ईसा मसीह (अ.) यांना स्वेच्छेने खुदाचा पुत्र बनविले, तसेच ज्या जगाने हवा, पाणी, अग्निचीसुद्धा पूजा केली, त्या जगाने अशा महान कीर्तिमान व्यक्तीला ईश्वर मान्यच केले असते. परंतु पाहा तो स्वतः काय सांगत आहे. तो त्याच्या किर्ती व चमत्कारांपैकी एकाचेसुद्धा क्रेडीट स्वतः घेत नाही. तो म्हणतो, ‘‘मी एक मनुष्य आहे, तुमच्याचसारखा मनुष्य, माझ्याजवळ माझ्या स्वतःचे काहीच नाही, सर्वकाही ईश्वराचे आहे आणि ईश्वराकडूनच आहे. ही वाणी ज्याच्यासारखी दुसरी वाणी निर्माण करण्यात मानव असमर्थ आहे, ही माझी वाणी नाही? माझ्या बुद्धीची उपज नाही. या वाणीचा शब्द न शब्द ईश्वराकडून माझ्याकडे आला आहे. यासाठीची सर्व प्रशंसा ईश्वरासाठीच आहे. हे कार्य जे मी स्वतः केले, जे कायदेकानू मी बनविले, हे सिद्धान्त जे मी तुम्हाला शिकविले यापैकी काहीएक मी स्वतः घडवलेले नाही. मी स्वतःच्या योग्यतेने काहीसुद्धा निर्मित करण्याचे सामर्थ्य ठेवत नाही. मी प्रत्येक गोष्टीत ईश्वराच्या मार्गदर्शनाचा (Divine Guidance) मोहताज (आश्रित) आहे. ईश्वराकडून जे अवतरित होते तेच सांगतो व करतो.’’

पाहा, हे कशा प्रकारचे आश्चर्यजनक सत्य आहे! कशा प्रकारची सत्यता व सत्यवादिता आहे! खोटारडा व्यक्ती मोठा बनण्यासाठी दुसऱ्यांच्या कीर्तिचे क्रेडीटसुद्धा घेण्यात संकोच करीत नाही आणि त्याविषयी सहज माहीत होते की हे त्याने कोठून घेतले आहे. परंतु हा व्यक्ती त्या कीर्तिचा संबंधसुद्धा स्वतःशी जोडत नाही ज्याला तो स्वतःची कीर्ति (महानता) घोषित केली असती तर कोणी त्यास खोटा म्हटले नसते कारण कोणाजवळ त्याच्या वास्तविक उगमस्त्रोतापर्यंत पोहचण्याचे साधनमात्र नव्हते. सत्यतेचा यापेक्षा अधिक स्पष्ट पुरावा आणखीन कोणता असू शकतो? त्या व्यक्तीपेक्षा अधिक सच्चा आणखीन कोण असू शकतो ज्याला एका अत्यंत गुप्त साधनाद्वारा (दिव्यप्रकटन) असे अनुपम चमत्कार प्राप्त होतात आणि तो निःसंकोचपणे सांगतो की हे चमत्कार त्याला कोठून प्राप्त झाले? आता सांगा, का म्हणून आम्ही त्या व्यक्तीला सच्चा म्हणू नये?

पाहा, हे आहे आम्हा सर्वांचे नायक, संपूर्ण जगाचे पैगंबर (प्रेषित) मुहम्मद (स.)! त्यांच्या प्रेषित्वाचे उघड प्रमाण त्यांची सत्यता आहे. त्यांचे महान कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांचा पवित्र जीवनवृत्तांत, सर्वकाही इतिहाससिद्ध आहे. जो व्यक्ती शुद्धहृदयी, सत्यप्रियता आणि न्यायसंगत त्यांच्या जीवनाचे अध्ययन करील, त्याचा आत्मा साक्ष देईल की हेच ईश्वराचे पैगंबर-प्रेषित आहेत. ती वाणी जी त्यांनी सादर केली तो हाच कुरआन आहे ज्याचे तुम्ही अध्ययन करता. या अनुपम ग्रंथाचे जो कोणी खुल्या मनाने अध्ययन करील, त्याला मान्यच करावे लागेल की, हा ग्रंथ अवश्य ईशग्रंथच आहे. कोणीही अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती करू शकणार नाही.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget