Latest Post

माननीय उमर (र.) निवेदन करतात,
एके दिवशी आम्ही अल्लाहच्या प्रेषितांच्या जवळ बसलो होतो. अचानक एक माणूस आमच्यासमोर आला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र होते व केस काळेभोर होते. त्याच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण नव्हता व आमच्यापैकी कुणी त्याला ओळखत नव्हते. तो पुढे होऊन प्रेषितांच्या गुडघ्याबरोबर गुडघे जुळवून त्यांच्यासमोर बसला आणि आपले हात प्रेषितांच्या मांडीवर ठेवून नम्रपणे म्हणाला,
“हे मुहम्मद (स.) ! इस्लाम काय आहे?"
प्रेषितांनी सांगितले, “इस्लाम म्हणजे अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत याची ग्वाही देणे, नमाज कायम करणे, जकात देणे, रमजानचे रोजे करणे आणि प्रवासाची ऐपत असल्यास बैतुल्लाहचा हज करणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले.”
आम्हाला आश्चर्य वाटले की हा माणूस प्रेषितांना प्रश्न विचारतो व त्याचे उत्तर बरोबर असल्याचे स्वत:च सांगतो. त्यानंतर त्या माणसाने विचारले, “ठीक, आता मला 'ईमान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, "ईमान'चा अर्थ हा की, अल्लाह, त्याचे फरिश्ते, त्याचे ग्रंथ, त्याचे प्रेषित, परलोक आणि चांगल्या व वाईट दैवावर श्रध्दा ठेवणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले." व पुन्हा त्याने विचारले, “मला ‘एहसान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “तुम्ही अल्लाहची उपासना अशाप्रकारे करा की, जणू तुम्ही त्याला पाहत आहात. तुम्ही जरी त्याला पाहत नसला तरी नि:संशय तो तुम्हाला पाहत आहे.”
त्याने पुन्हा विचारले, “मला त्या वेळेबद्दल (अंतिम निवाड्याचा दिवस) माहिती सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “ज्याला विचारले जात आहे, तो प्रश्नकर्त्यापेक्षा अधिक जाणत नाही."
तो माणूस म्हणाला, “ठीक, निदान मला त्या वेळेच्या काही निशाण्या तरी सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “दासी आपल्या मालकाला जन्म देईल. अनवाणी चालणारे व उघडे शरीर असणारे कंगाल व मेंढपाळ मोठमोठ्या इमारती बांधण्याच्या बाबतीत एकदुसऱ्याशी चढाओढ करतील."
नंतर तो माणूस निघून गेला आणि मी काही वेळ तेथे थांबलो.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले, “हे उमर ! हा प्रश्नकर्ता कोण होता हे तुला माहीत आहे काय?"
मी उत्तर दिले की, “अल्लाह व त्याचे प्रेषित यांनाच अधिक माहीत."
प्रेषितांनी सांगितले, “ते जिब्रईल (अ) होते. तुमच्याजवळ तुम्हाला तुमच्या दीनची शिकवण देण्यासाठी आले होते."
(मुस्लिम) अल्लाहच्या सर्व ग्रंथांवर, त्याच्या सर्व प्रेषितांवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले. त्याला लागणाऱ्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्था जशी अल्लाहने केलेली आहे, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या शिकवणीचीदेखील व्यवस्था केली आहे. ईश्वराने निरनिराळ्या काळात व भूभागात आपले प्रेषित पाठविले. त्यांच्यावर आपले ग्रंथ उतरविले प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत व कुरआन हा अल्लाहचा शेवटचा ग्रंथ आहे. या सर्व वस्तुस्थितीवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे.
दासी आपल्या मालकाला जन्म देईल, याचा अर्थ असा की संतती अवज्ञाकारी व विद्रोही निपजेल. मुले आई-वडिलांचा आदर राखणार नाहीत. त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणार नाहीत. आईला दासी समजून तिच्याबरोबर एखाद्या मालकाप्रमाणे वर्तणूक केली जाईल.
अपात्र लोकांच्या हाती अयोग्य मार्गाने भरमसाठ पैसा येईल व ते लोक मोठमोठ्या इमारती बांधून ईर्षा व गर्व करू लागतील आणि आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करीत राहतील.
जगात अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणावें, आता जगाचा शेवट जवळ आलेली आहे.

Human
इमानवंतांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्‍यांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्नाकोटापासून प्रारंभ झाला असेल. परंतु, आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला. वस्तुत: ही काहीशी आश्‍चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्‍न उत्पन्न होत राहिला आहे की, त्यांचे मौलिक अधिकार काय आहेत? मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्‍वात राहत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्‍न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की त्याचे अधिकार निश्‍चित केले जावेत. तितकीच आश्‍चर्याची गोष्ट ही सुद्धा आहे की या विश्‍वातील कोणतेही सजातीय असे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आपण पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्‍या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.
    निसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्‍या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो! कोणतीही हिंस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करून त्यांची थप्पी लावत असेल, खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्यांशी करतो. संभवत: हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे. जो महान अल्हाने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे ! माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे. सिंहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्‍या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्‍या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्‍या महायुद्धात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्‍या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुत: मानवी अधिकारांची निश्‍चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.        

- सय्यद अबुल आला मौदूदी रहे. (मानवाचे मौलिक अधिकार या पुस्तकातून)

पर्यावरण :
पर्यावरणाचा अर्थ शब्दकोषात स्थिती आणि स्वरूपाच्या अर्थासह वापरला जातो, ज्यास अरबीमध्ये ‘बाईट’ म्हणतात. पर्यावरणाचा एक अर्थ खालीलप्रमाणे आहे : जे व्यक्ती आणि समूहाभोवती असते आणि त्यास प्रभावित करते, त्याला म्हणतात नैसर्गिक पर्यावरण, सामूहिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण.
पर्यावरण हा शब्द आसपासच्या सर्व गोष्टींचा संदर्भ देतो.डॉ. सईदुल्लाह काझी लिहितात : ‘‘पर्यावरण प्रदूषण फक्त हवा, पाणी, जमीन आणि मातीशी संबंधित नाही तर त्यात नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांचादेखील समावेश आहे.’’ आपले जीवन आणि जगण्यासाठी ज्या गोष्टी आमच्याशी संबंधित आहेत त्या सर्व गोष्टी जसे की गृहनिर्माण, अन्न, पेय, श्वासोच्छवास, वैद्यकीय उपचार आणि काम, तसेच संवाद आणि संबंध अवलंबून असलेल्या सर्व बाबी. या संपूर्ण स्थितीला पर्यावरण म्हणतात.
जर पर्यावरणात समतोल असेल तर मानवी जीवन निरोगी आणि शांत राहील आणि जर पर्यावरण बिघडले तर जीव धोक्यात येईल. जीवनाच्या इतर सर्व बाबींबद्दल, इस्लाम आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सुवर्ण नियमदेखील प्रदान करतो ज्याद्वारे आपण इस्लाम धर्म आणि जगात दोन्ही ठिकाणी यश मिळवू शकतो.
याच कारणास्तव सर्वशक्तिमान अल्लाहने पर्यावरण संतुलित केले आहे. यामध्ये निर्माणकर्त्याची उच्च कारागिरी स्पष्ट नैसर्गिक पर्यावरण एका विशिष्ट मार्गाने तयार केले आहे, जोपर्यंत त्यामध्ये मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत ते संतुलित राहील, कारण अल्लाहने पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असलेला जीवनाचा प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्म आणि उपयुक्ततेसह तयार केला आहे. अल्लाहने सूचना दिली आहे की,
‘‘आम्ही भूतलाचा विस्तार केला, त्यात पर्वत रोवले, त्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि त्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली.’’ (कुरआन- १५:१९)
‘‘आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.’’ (कुरआन- १३:३)
कुरआनमधील या श्लोकांवरून हे स्पष्ट होते की अल्लाहने पृथ्वीवर सर्व काही संतुलित पद्धतीने तयार केले आहे. त्याने अशी वनस्पती तयार केली आहेत की एकीकडे जैविक प्रजातींचे अन्न व गरजा पूर्ण होतात आणि दुसरीकडे वनस्पतींचे प्रकार अशा तऱ्हेने तयार करण्यात आले आहेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
आपल्या सभोवती जी काही औषधी घटक आहेत त्यांना त्याच औषधी अवस्थेत ठेवण्यात यावे आणि त्यांना सर्व प्रकारच्या आण्विक आणि अवैद्यकीय विनाशांपासून सुरक्षित ठेवले जावे, याद्वारेच पर्यावरणाचे संतुलन प्रस्थापित होते, असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु जर मनुष्य या नैसर्गिक घटकांचा अविरतपणे वापर करीत राहिला तर त्यांचे संतुलन राखले जाणार नाही आणि याचा परिणाम असा होईल की ते नेहमीप्रमाणे जैवविविधतेच्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत.

(भाग २) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

हजरत अली बिन अबु तालीब यांचा जन्म इ.स.599/600 मध्ये झाला. त्यांच्या आई हजरत फातेमा ह्या काबागृहाचा तवाफ करत असतांनाच त्यांची प्रसुती झाली व त्यांनी एका बाळाला जन्म दिला. काबागृह म्हणजे अल्लाहचे घर व अल्लाहच्या घरी जन्मलेल्या बाळाचे नाव अल्लाहची सातत्याने आठवण देणारे असावे, यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या बाळाचे नाव अली ठेवले. ज्याचा शब्दकोशीय अर्थ उदार / उदात्त असा होतो.
    अबु तालीब हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वडील अब्दुल्लाह यांचे सख्खे भाऊ होते व अब्दुल्लाह हे प्रेषित सल्ल. यांच्या जन्माअगोदरच वारल्याने अबु तालीब यांनीच प्रेषित (सल्ल)यांचा प्रतीपाळ केला होता. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. आणि अली रजि. हे चुलतभाऊ होत. हजरत अली रजि. हे प्रेषित सल्ल. पेक्षा 30 वर्षांनी धाकटे होते. मात्र इस्लाम स्वीकारण्यामध्ये जगात त्यांचा चौथा तर मुलात पहिला क्रमांक होता. इस्लाम स्विकारतांना ते अवघे 8 वर्षांचे होते. हजरत अली हे प्रेषित सल्ल. यांचे विश्‍वासू साथीदार व जावाई होते. प्रेषित सल्ल. यांच्या कन्या फातीमा ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत. प्रेषित सल्ल. यांचा त्यांच्यावर एवढा विश्‍वास होता की, मदीनाला हिजरत करताना आपल्या स्थानी त्यांनी अंथरूनावर हजरत अली रजि. यांना झोपविले होते.

हजरत अली रजि. यांचे शौर्य
    शौर्याच्या बाबतीत हजरत अली रजि. व हजरत खालीद इब्ने वलीद रजि. हे इस्लामी इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. त्यातही हजरत अली रजि. यांचे शौर्य अतुलनीय असे होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण अशी दुधारी तलवार होती, जिचे नाव ’जुल्फेखार’ होते. त्या तलवारीपुढे भले-भले गुडघे टेकत. आजकाल प्रसिद्धीच्या झोतात असलेली तुर्की मालिका अर्तुर्गुल गाजी मधील प्रमुख पात्र असलेल्या नायकाच्या तोंडी जो संवाद आहे, त्याबाबतीत अशी अख्यायिका आहे की, ह. अली रजि. संबंधी तो संवाद जन्नतमधील फरिश्ते एकमेकांना बोलताना करत. तो संवाद म्हणजे, ’हजरत अलीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जुल्फेखारपेक्षा चांगली तलवार कोणतीच नाही’ याच तलवारीने हजरत अली यांनी इ.स.624 मध्ये बदरच्या युद्धात कुरैशच्या 30 लोकांना कंठस्थान घातले होते. त्यांच्या या शौर्यामुळेच प्रेषित सल्ल. यांनी त्यांना ’हैदर’ (न हरनारा) ही पदवी प्रदान केली होती. मुस्लिमांच्या सोबत राहून मुस्लिमांविरूद्धच कागाळ्या करणार्‍या मदिना येथील ज्यूंच्या दोन टोळ्या बनू कैनुका यांना इ.स. 625 व बनू कुरैजा यांना 626 मध्ये मदिनाबाहेर घालविण्याची कामगिरीही हजरत अली रजि. यांचीच.
    इ.स.625 मध्ये झालेल्या ओहदच्या लढाईत जरी मुस्लिमांना यश आले नव्हते तरी एकट्या अली रजि. यांनी आपल्या झुल्फेखारने 200 कुरैशींचा खात्मा केला होता. हे ऐतिहासिक सत्य अनेक इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. त्या दरम्यान त्यांच्या शरीरावर 16 जखमा झाल्या होत्या. मदिनातून पिटाळून लावलेल्या ज्यूंनी खैबरमध्ये वस्ती करून तेथील भक्कम असा किल्ला ताब्यात घेऊन मुस्लिमांविरूद्ध पुन्हा कागाळ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. हजरत अबुबकर रजि. व हजरत उमर रजि. यांनासुद्धा तो किल्ला सर करण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्यांनाही तो किल्ला सर करता आली नाही. उलट अनेक बिनीचे शिलेदार त्या मोहिमांमध्ये मृत्युमुखी पडले होते. शेवटी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना या मोहिमेसाठी बोलाविलेे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दोन्ही डोळे सुजून लाल झाले होते. अंगात ताप होता. तशाही परिस्थितीत ते हजर झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांची स्थिती पाहून आपल्या तोंड्यातील लाळ त्यांच्या डोळ्यांत लावली आणि मोहिमेवर रवाना केले. हजरत अली रजि. यांचे डोळे बरे झाले व ते मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी संपूर्ण ताकदीशी खैबरवर हल्ला चढविला. अनेक धडका देऊन खैबरचे मुख्य दारच उखडून टाकले. यात अली रजि. यांनी तीन पराक्रमी ज्यूंना आपल्या जुल्फेखारने कंठस्थान घातले. येणेप्रमाणे खैबर किंण्याची अशक्यप्राय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे खैबर जवळील ’फिदक’ येथील सुपीक जमीन लढाई न करता अली रजि. यांच्या ताब्यात आली. लढाई न करता किंल्यामुळे ही जमीन शरीयतच्या नियमाप्रमाणे प्रेषित सल्ल. यांची मालमत्ता बनली.
    इ.स.630 मध्ये मक्का विजयानंतर काबागृहात ज्या 360 मुर्त्या होत्या त्या फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांची मदत घेतली होती. उंचस्थानी विराजमान मुर्त्यांना तोडण्यासाठी विशेषत: हुबल नावाची मुर्ती फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना आपल्या खांद्यावर उभे करून ती मूर्ती फोडून टाकली होती. इतिहासामध्ये प्रेषितांच्या खांद्यावर पाय ठेवण्याचे सौभाग्य फक्त दोन लोकांच्या वाट्याला आले आहे. उपरोक्त प्रसंगी हजरत अली रजि. यांच्या वाट्याला व काबागृह किंल्यानंतर काबागृहाच्या वर चढून अजान देण्यासाठी हजरत बिलाल यांना आपल्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढण्याचा आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी चढून काबागृहावर उभे राहून अजान दिली होती. इ.स.631 पर्यंत अरबस्थानातील बहुतेक लोकांनी इस्लाम स्विकारलेला होता. न स्विकारणारे जे मुठभर लोक होते त्यांना त्या पवित्र भूमीतून निघून जाण्याचा आदेश कुरआनमध्ये आला होता. ते घोषणापत्र वाचण्याची जबाबदारीही हजरत अली रजि. यांनी पूर्ण केली होती.

हजरत अली रजि. व प्रेषित सल्ल. यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड
    इ.स. 632 मध्ये हज आटोपून मदिनेला परत येतांना खुम-ए-़गदीर येथे प्रेषित सल्ल. यांनी बोलताना सर्वांसमक्ष असे उद्गार काढले होते की, ”अली हे माझ्यासाठी तसे आहेत जसे हजरत हारून अलै. हे प्रेषित मुसा अलै. साठी होते. जो कोणी मला, ”मौला” (मार्गदर्शक) म्हणून स्विकारत आहे त्याने हजरत अली रजि. यांना सुद्धा, ” मौला” म्हणून स्विकारले पाहिजे. हे अल्लाह ! हजरत अलींच्या मित्राचा तू मित्र बन आणि शत्रूंचा शत्रू. ते ज्याला मदत करतील तू त्यांना मदत कर आणि जे त्यांना कमी लेखतील त्यांच्या आशा निष्फळ बनव”. प्रेषित सल्ल. यांच्या या म्हणण्यामुळे मुसलमानांमध्ये एक सामान्य विचार असा दृढ झाला होता की, हजरत अली रजि. हेच प्रेषित सल्ल. यांचे उत्तराधिकारी असतील. शिवाय ते प्रेषित सल्ल. यांचे जावाई असल्यामुळे व प्रेषितांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा दावा हा दावा नसून हक्क आहे, असाही लोकांचा समज होता. त्यातूनच प्रथम खलीफा म्हणून हजरत अबुबकर रजि. यांच्या निवडीला काही लोकांनी विरोध केला होता. नव्हे हजरत अबुबकर रजि. यांच्याविरूद्ध बंड करण्यासाठी उम्मैय्या कुळ गटातील अबु सुफियान सारख्या सरदारांनी हजरत अली रजि. यांना प्रोत्साहित केले होते. पण हजरत अली रजि. हे अत्यंत संयमी व्यक्तीमत्व होते. त्यांनी अशा सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर खलीफा पदाने तीन वेळेस हुलकावणी दिल्यावरही ते शांत राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हजरत फातीमा रजि. यांचा ठाम विश्‍वास होता की जनता हीच त्यांना खलीफा म्हणून निवडेल. तीन्ही वेळेस खलीफा निवडताना हजरत अली रजि. यांचे नाव हे प्रामुख्याने विचारात घेतले गेले होते. तरी परंतु, खलीफा पदाने तीन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली होती. तरी सुद्धा हजरत अली रजि. हे विचलित झालेले नव्हते. तिन्ही खलीफांनी त्यांचा उचित सन्मानसुद्धा राखला होता. पहिल्या दोन खलीफांनी तर त्यांना देशाचे प्रमुख काझी (न्यायाधिश) आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमले होते. तथापि, हजरत उस्मान रजि. यांनी त्यांचे काझी पद कायम ठेऊन सल्लागारपदी दुसर्‍याची नेमणूक केली होती.

चौथ्या खलीफा निवडीची प्रक्रिया
    हजरत उस्मान रजि. यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कुफा, बसरा आणि सिरीयाच्या दोन हजार मुस्लिमांनी मदिनामध्ये घुसून खलीफा उस्मान रजि. यांची हत्या करून मदिना शहर ताब्यात घेतले होते. मदिना मस्जिदीमधील सामुहिक प्रार्थनेचे नेतृत्वही तेच करू लागले. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. लोक आपापल्या घरात बसून होते. त्यांचा सामना करता येत नसल्या कारणाने हजरत उस्मान रजि. यांचे नातलग उमय्यी लोक सिरीयातील अमीर मुआविया रजि. यांच्याकडे निघून गेले होते. अराजक माजल्यामुळे मदिना शहराबाहेरच्या टोळ्यांनी सुद्धा मदिनेत येऊन लुटमार करण्यास सुरूवात केली होती. त्यात पर्शियन व रोमन साम्राज्यातून आलेल्या गुलामांची संख्या मोठी होती. इस्लामी साम्राज्याला राज्यप्रमुखच उरला नव्हता. तीन दिवस झाले तरी खलीफाचे नाव जाहीर झालेले नव्हते. बंडखोरांना परत जावयाचे होते. हजरत अली रजि., हजरत तल्हा रजि. व हजरत जुबेर रजि. यांच्यापैकी एक त्यांना खलीफा म्हणून पाहिजे होता. कारण बंडखोरांमध्येही तीन गट होते. इजिप्तचे, कुफाचे आणि बसराचे तीन गट होते. कुफाच्या बंडखोरांना हजरत जुबेर रजि. तर बसराच्या बंडखोरांना हजरत तल्हा रजि. हवे होते. मात्र इजिप्तच्या बंडखोरांना हजरत अली रजि. हवे होते. चौथ्या दिवशी बंडखोरांचा नेता मलिक बिन अश्तर याने खलीफा निवडीच्या प्रक्रियेची सुत्रे आपल्या हातात घेतली. हजरत अली रजि. यांना त्याने राजकीयदृष्ट्या तुम्हीच खलीफा होणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत अली रजि. यांनी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी पाचव्या दिवशी मलिक बिन अश्तर याने मदिनातील लोकांना मस्जिद-ए-नबवीमध्ये बोलावून खलीफा निवडा नसता अधिक रक्तपात होईल व त्यात तुमच्या सरदारांना उदा. हजरत अली, हजरत तल्हा, हजरत जुबेर रजि. सह अनेक प्रतिष्ठांना ठार केले जाईल, अशी धमकी दिली. तेव्हा लोकांनी मस्जिद-ए-नबवीमध्ये जमा होऊन अली रजि. यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या नावाच्या जयघोष ऐकूण हजरत अली रजि. हे स्वत: मस्जिद-ए-नबवीमध्ये हजर राहिले. हजर लोकांपैकी सर्वांनी त्यांना खलीफा म्हणून जबाबदारी उचलण्याची गळ घातली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मला क्षमा करा, जर तुम्ही अन्य व्यक्तीला खलीफा म्हणून निवडले तर. एकनिष्ठ नागरिक म्हणून मी त्यांच्या आज्ञा पाळण्यास बांधिल आहे. पण जर तुम्हाला मीच हवा असेल तर मी अधीच सांगून ठेवतो की, मी कोणाचे ऐकणार नाही. अल्लाहच्या ग्रंथानुसार व माझ्या न्याय बुद्धीनुसार प्रशासन करेन. सर्वांनी ही अट मान्य केली. तेव्हा हजरत अली रजि. यांनी खलीफा बनण्यास होकार दिला.
हजरत उस्मान रजि. यांच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजे 24 जून 656 रोजी हजरत अली रजि. यांनी सार्वजनिक रित्या झालेल्या एका कार्यक्रमात खलीफा म्हणून सुत्रे स्विकारली. शपथविधी पार पडल्यानंतर हजरत अली रजि. यांनी सर्वांना उद्देशून जे छोटेखानी भाषण केले ते खालीलप्रमाणे - ,” अल्लाहने आपल्याला एक असा ग्रंथ दिलेला आहे की, ज्यात लोकांना मार्गदर्शन व सर्व चांगला व वाईट गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. अल्लाहने बेकायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत, हे ही त्यात नमूद केलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वात मोठी बेकायदेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिमांचे रक्त सांडणे ही होय. अल्लाहने मुस्लिमांना बंधू म्हणून राहण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिम तोच होय जो की इतर मुस्लिमांना हाताने व जिभेने हानी पोहोचवत नाही. अल्लाहच्या आज्ञा पाळा. (संदर्भ : चार आदर्श खलीफा, शेषेराव मोरे, पान क्र. 485. )

- एम.आय.शेख

Madina
पूर्ण विश्व स्वयं अल्लाहने निर्माण केले, त्यानेच याची रचना केली. तोच एकटा या समस्त विश्वाचा स्वामी आहे. त्याच्याच मर्जी व आदेशाने समस्त कार्य सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ज्या कार्यासाठी तयार करण्यात आली ते कार्य ती करीत आहे. प्रत्येक वस्तूचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या ठराविक नियमांचे पालन प्रत्येक वस्तू विनातक्रार करीत आहे. पाणी वाहण्याचे, त्याचे बाष्पीभवन होण्याचे, बर्फ बनण्याचे विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत ते या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचे, ग्रह आणि नक्षत्रांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांचे किंचितही उल्लंघन कोणी करू शकत नाही. या नियमांबाहेर तसूभरही सरकण्याचे कोणातही सामर्थ्य नाही. आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, जमिनीतून फळे, फुले आणि धान्य मिळते. मात्र ही समस्त वनस्पती-सृष्टी स्वत:च्या मर्जीने काहीही करू शकत नाही. अर्थातच या विश्वातली प्रत्येक निर्मिती ज्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे ती तेच नेमून दिलेले काम नेमून दिलेल्या नियमानुसार सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. विश्वातील सर्वच वस्तू ज्याप्रमाणे अल्लाहची निर्मिती आहेत, त्याचप्रमाणे मानवदेखील अल्लाहची निर्मिती आहे, उत्कृष्ट रचना आहे. मानवाची निर्मिती, त्याचे जीवित राहणे, मरणे वगैरे सर्वकाही निश्चित करून देण्यात आले आहे. याच नेमून दिलेल्या कायद्यानुसार जन्मापासून अर्थात मातेच्या गर्भातील निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्य मानवाकडून होत असते. मानवसुद्धा या नियमांचे तसूभरही उल्लंघन करू शकत नाही. जन्माचे जे नियम आहेत, त्याच नियमानुसार तो जन्म घेऊ शकतो.डोळ्यांनी ऐकण्याचे, कानांनी बोलण्याचे, पायांनी खाण्याचे, तोंडाने चालण्याचे काम करू शकत नाही. तो निश्चितच आपले पूर्ण कार्य अल्लाहने नेमून दिलेल्या निसर्ग-नियमांनुसार करू शकतो. या नियमांच्या किंचितही बाहेर जाऊ शकत नाही.
मानवाचा आणखीन एक पैलू आहे आणि तो असा की मानवाचा दर्जा आणखीन इतर वस्तूंपेक्षा विशेष आहे. मानव हा या सृष्टीची विशेष निर्मिती आहे. अल्लाहने इतर निर्मितींना प्रदान न केलेले विवेकसामर्थ्य आणि बुद्धी केवळ मानवालाच प्रदान केली आणि याबरोबरच त्याला कार्यस्वातंत्र्य प्रदान केले, विचारस्वातंत्र्य प्रदान केले, भूमिकास्वातंत्र्य प्रदान केले. चांगला आणि वाईट या दोन्ही मार्गांपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ईशप्रदत्त शक्ती व सामर्थ्यचा चांगल्या आणि वाईट या दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो. अशाप्रकारे अल्लाहने मानवास एका पैलूने कार्यस्वातंत्र्य दिले.
अल्लाहने मानवास जे कार्यस्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर कसा करावा हा एक सर्वांत मूळ प्रश्न आहे. कारण याच स्वातंत्र्याचा वापर करण्यावर त्याच्या जीवनाचे यश आणि अपयश अवलंबून आहे. याच आधारावर जगाच्या व्यवस्थेचा सुधार आणि बिघाड अवलंबून आहे. तुम्ही कदाचित असेही म्हणू शकता की मानवास जे विवेकसामर्थ्य अल्लाहने प्रदान केलेले आहे, त्याचा वापर करून तो आपल्या कार्यस्वातंत्र्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. मात्र तुम्हाला हेदेखील स्वीकारावे लागेल की मानवाचे विवेकसामर्थ्यसुद्धा मर्यादित स्वरूपाचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीची विवेकशक्ती भिन्न असून तो आज घेतलेला निर्णय तीच व्यक्ती उद्या आपल्या अनुभवाच्या आधारावर आपला निर्णय बदलते. घेतलेला निर्णय आजच्या अनुभवाच्या आधारावर चुकीचा ठरविते. एकजण जो निर्णय योग्य ठरवितो, तोच निर्णय दुसराजण चुकीचा ठरवितो. भूतकाळातील घेण्यात आलेले निर्णय ज्याप्रमाणे आज आपण चुकीचे ठरवितो त्याचप्रमाणे आज आपण घेतलेला आणि योग्य वाटणारा निर्णय उद्या येणारी पिढी चुकीचा व अयोग्य ठरवू शकते. यावरून हेच सिद्ध होते की मानव हा केवळ आपल्या स्वत:च्या विवेकसामर्थ्यच्या आधारावर आपला जीवनमार्ग निश्चित करू शकत नाही. त्याला निश्चितच बिनचूक आणि कोणत्याहीत्रुटीपासून मुक्त असलेल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा प्रकारचे परिपूर्ण आणि बिनचूक मार्गदर्शन, जे माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातही योग्य असावे, प्रत्येक वृत्तीच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसाठी योग्य ठरावे.
आपण पाहतो की मानवास हे जीवन जगण्यासाठी असंख्य बाबींची आवश्यकता असते. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, पोषाख, निवारा आणि इतर बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्याचप्रमाणे मानव हा या सृष्टीत जन्मला असून त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची मोठ्या कौशल्याने निर्मिती करून देण्यात आलेली आहे. हवा, अन्न, पाणी, निवारा, स्वारी, कपडालत्ता आणि यासारख्या ना-ना वस्तू पुरविण्यासाठी पूर्णपणे प्रबंध अल्लाहने करून ठेवले आहेत. याचाच अर्थ असा की अल्लाहने मानवाची निर्मिती केली, जीवन प्रदान केले आणि त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त वस्तुंची योग्य प्रकारे व्यवस्था केली. म्हणजेच मानवास जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. आपले स्वातंत्र्य, आपली शक्ती आणि सामर्थ्यचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यास नितांत आवश्यक आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय मानव आपल्या स्वातंत्र्य, शक्ती आणि सामर्थ्यचा गैरवापर करू शकतो आणि अशा प्रकारे त्याचे जीवन विध्वंसाच्या मार्गावर जाऊ शकते. अर्थातच जीवन जगण्यासाठी भौतिक पदार्थ, अन्न, पाणी, निवारा वगैरेची ज्याप्रमाणे गरज आहे अगदी त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाचीसुद्धा मानवास नितांत गरज आहे. परमदयाळू आणि कृपाळू अल्लाहने मानवास जगण्याकरिता अन्न, पाणी, हवा आणि इतर वस्तूंची ज्याप्रमाणे पूर्णत: व्यवस्था केली, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनासाठीदेखील पूर्ण व्यवस्था केली आहे आणि यात नवल वाटण्यासारखेसुद्धा काहीही नाही. कारण हे तर मुळीच शक्य नाही की जो अल्लाह भावनांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विश्वात मातीच्या प्रचंड विशाल ग्रह-तारे, समुद्र, हवा, चंद्र व सूर्याला कामाला लावून अन्न, पाणी, निवारा आणि यासारख्या ना-ना अद्भूत वस्तूंची निर्मिती केली, तो दयाळू आणि कृपाळू अल्लाह मानवाच्या मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणार नाही.
मानव इतिहास आपल्या समोर आहे. देश आणि राष्ट्रांत मानवास जीवन जगण्यासाठी काही असे कायदे आहेत ज्याविषयी असा दावा करण्यात येतो की हे अल्लाहचे कायदे आहेत. प्रत्येक राष्ट्रात असे बरेचजण होऊन गेले ज्यांचा असा दावा होता की त्यांच्याकडे मानवाच्या योग्य मार्गदर्शनासाठी ईशसंदेश आहे. या महामानवांनी प्रत्येक काळात हे दाखविले की अल्लाहची मर्जी काय आहे आणि त्याने मानवास जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने व्हावा. या महामानवांनी प्रत्येक काळात सांगितले आहे की चांगले काय आहे नि वाईट काय आहे, सत्य काय आहे नि असत्य काय आहे, पुण्य काय आहे नि पाप काय आहे. ही वेगळी गोष्ट आहे की या बाबतीत बऱ्याच लोकांकडून मूळ सत्य अस्पष्ट होत गेले. उदा.- (१) काही लोकांनी या महामानवाच्या मूळ शिकवणीत इतर काहीजणांच्या शिकवणी समाविष्ट केल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आज मूळ शिकवणींना भेसळमुक्त करणे अशक्य होऊन बसले. (२) बऱ्याच लोकांनी या महामानवांच्या मूळ चारित्र्यास कथा-दंतकथा आणि साहित्याचा मुलामा दिला. यामुळे आज हे जाणून घेणे अशक्य झाले की कोणत्या महामानवाची शिकवण कोणती आहे. (३) काहीजणांनी या महामानवांना मानव म्हणून न स्वीकारता अल्लाहच्याच स्थानावर स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचजणांना भ्रम झाला की साक्षात ईश्वरच मानवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरला आणि या जगातून असत्य व अन्यायाचा नाश केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहचे मानवरूपात प्रकट होणे हे कोणत्याही प्रकारे शोभणीय नसून तो आपल्या काही नेक भक्तांना मानवाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडतो.
ज्या नेक भक्तींची अल्लाहने मानवजातीस सत्यमार्ग दाखविण्याकरिता निवड केली, त्यांनाच मुळात पैगंबर असे म्हणतात. अल्लाह त्यांना प्रत्येक दुराचारापासून मुक्त ठेवतो. त्यांना आपला संदेश देतो जेणेकरून अल्लाहचा हा संदेश त्यांनी मानवजातीपर्यंत पोचवावा. जी व्यक्ती अल्लाहवर तर श्रद्धा ठेवते आणि मान्य करीत नसेल की अल्लाहकडून काहीजण धर्ममार्ग, सत्यमार्ग अथवा न्यायाचा मार्ग दाखविण्यासाठी पैगंबर पाठविण्यात आले, तर तो त्याला मान्य असलेल्या धार्मिक शिकवणी वा ईशमार्गदर्शन हे अल्लाहकडूनच प्राप्त असण्याचा दावा कशाच्या आधारे करू शकतो? पैगंबर हे तर अल्लाह आणि त्याचे दास अर्थात मानवजात या दोहोंदरम्यान एक दुवा आहे. अर्थात असा प्रामाणिक पुण्यकर्मी माणूस जो अल्लाहचा संदेश मानवजातीपर्यंत पोचवितो यालाच पैगंबर अथवा पैगंबर असे म्हणतात.

लेखक
मुहम्मद जैनुल आबिदीन मन्सुरी
डॉ. मुहम्मद अहमद
डॉ. सय्यद शाहिद अली

अनुवादक
सय्यद जाकिर अली

मानवासमोर असे काही प्रश्न आहेत, ज्यांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- जीवन काय आहे? जीवनाचा दााष्टा कोण आहे? आपल्याकडून त्यास  काय अभिप्रेत आहे? त्याने आपल्याला हे जीवन कशासाठी दिले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हाच जीवनाचा अंत आहे काय? की मृत्यूनंतरही जीवन आहे? जर जीवन आहे तर यात सफल  होण्याचा कोणता मार्ग आहे? अथवा या पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी या ऐहिक जीवनात काय करावे लागेल?
वाचकगणांस पुस्तकाच्या अध्ययनामुळे जीवनाच्या या मूळ आणि महत्त्वपूर्ण सत्याला समजण्यासाठी तसेच त्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासंबंधी पूर्ण मदत मिळेल.

आयएमपीटी अ.क्र. 200      पृष्ठे - 40    मूल्य - 20                आवृत्ती - 2 (Jan 2016)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vuvnwe6wkofsoxi7wax6eolw5pd4ltj1

Muhammad
मुहम्मद (स.) यांचे आगमन केवळ अरबस्तानापुरते नव्हते, ते सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. झरतुष्ट्र, मोझेस, खिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे माजली होती. सत्य धर्म लोपला होता. खिश्चन धर्म आपापसातील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांती देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्तानाकडेही निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. पुन्हा हिंदूधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसात झगडत होते. शाक्तमते पुढे येत होती. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झाले. कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला. आणि बौद्धधर्म हिंदुस्तानाबाहेर सर्वत्र होता. त्याचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बौद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्धधर्म कोणास पटणार?बुद्धालाच त्यांनी देव केले!

स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दु:ख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळात मुहम्मद (स.) आले. त्यांचे येणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहम्मद (स.) यांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहम्मद (स.) यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंद मिळाला.
कोठे जन्मला हा महापुरुष? अरबस्तानात जन्मणाऱ्या पैगंबर मुहम्मद (स.) यांस दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानी जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळात तो जन्मलेला असावा. मुहम्मद (स.) यांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबागृहाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश, त्यांच्या घराण्यात जन्मले.

मक्का शहर अरबस्तानचे वेंâद्र होते. धर्माचे व व्यापाराचे उत्तर-दक्षिण दरीत ते वसले होते. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेही उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबागृहाचे पवित्र प्रार्थनागृह, प्रार्थनागृहाजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरे तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असे हे भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांततापूर्ण व्यक्ती हिंडताना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती व्यक्ती दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रूमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेले असे. कोण ती व्यक्ती? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्याचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत आणि डोके कसे आहे पाहा. भव्य विशाल डोके! आदरणीय डोके! तोंड जरा लांबट, पिंगट रंगाचे, तांबुस छटेचे आणि भुवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत! आणि दोन भुवयांच्या मध्ये ती पाहा एक ठसठशीत शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे आणि डोळेही काळेभोर, मोठे. ते डोळे काहीतरी शोधीत आहेत. कोठेतरी पाहत आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकही बाकदार व मोठे आहे आणि दात पहा किती स्वच्छ शुभ्र! दातांची फारच काळजी घेतो वाटते हा?आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे आणि हात पाहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. पोशाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पाहा. वाटेत मुले भेटली तर त्यांच्याजवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष राहत नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचे राज्य असते. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेही त्याच्यावर प्रेम होते. ती त्यांच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारात मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीनदीनाचा का असेना.

कोण होता तो? लोक त्याला ‘अल्-अमीन’ म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे, सन्माननीय असे होते की सर्वांना त्याच्याविषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे का पाहत आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेने का पाहत आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला वेडा म्हणू लागले. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतीरिवाज सोडा असे सांगत होता. हा हट्टी, माथेफिरू क्रांतिकारक आहे, असे आता लोक म्हणत व तो जाऊ लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का पैगंबर मुहम्मद (स.)? होय. होय, तेच ते शांतपणे रस्त्यातून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहम्मद (स.) होते. कुरैशांच्या कुळात, काबागृहाच्या उपाध्यायांच्या कुळात जन्मले होते.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget